Wednesday, June 12, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » घर-अंगण

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » घर-अंगण

गृहकर्ज घेताना..

अर्थसहाय्य आणि करबचतीमुळे नवीन घर खरेदी करताना ग्राहक घराची संपूर्ण किंमत देण्यास अनुत्सुक असतात. या मुख्य कारणामुळे पुष्कळ लोक नवीन घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतात. घरासाठी कर्ज घेताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात…

कर्जमागणी अर्ज कसा करावा, किती कर्ज मिळू शकतं, अन्य अटी आणि शर्ती, तसंच अस्थायी आणि स्थायी (फ्लोटिंग आणि फिक्स्ड) व्याजदर म्हणजे नेमकं काय, यातील कोणता व्याजदर स्वीकारावा. अशा प्रश्नांचं निरसन वेळीच होणं गरजेचं असतं. गृहकर्ज शक्यतो राष्ट्रीयीकृत बँक अथवा केवळ घरासाठी वित्तपुरवठा करणा-या एचडीएफसी, जीआयसी गृहफायनान्स, एलआयसी होम फायनान्स यांसारख्या वित्तीय संस्थांकडून घ्यावं. गृहकर्जासाठीचा कर्जमागणी अर्ज सर्व संस्थांचा साधारणपणे सारखाच असतो.

त्यामध्ये प्रामुख्याने पुढीलप्रमाणे माहिती आणि कागदपत्रं द्यावी लागतात : 

  • अर्जदाराची स्वत:ची माहिती उदा : नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो, पॅनकार्ड, सध्या राहत असलेल्या घराचा दाखला.
  • नोकरी/व्यवसाय याबाबतची माहिती.
  • वार्षिक उत्पन्न आणि त्याबाबतची पूरक कागदपत्रं (गेल्या ३ वर्षाचे फॉर्म १६, व्यावसायिक असल्यास मागील ३ वर्षाचे ताळेबंद) 
  • फ्लॅट खरेदीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर बिल्डरबरोबर झालेल्या कराराची प्रत आणि करार करतेवेळी बिल्डरला दिलेल्या रकमेची पावती द्यावी. जर आपण आपल्या प्लॉटवर घर बांधणार असाल, तर मंजूर प्लॅनची कॉपी, खर्चाबाबतचं कंत्राटदाराचं पत्र, प्रॉपर्टी निर्वेध असल्याचा वकिलाचा टायटल रिपोर्ट, कमेन्समेंट सर्टिफिकेट. 
  • अर्ज करताना अर्जदाराची अन्य काही र्कज असल्यास त्यांचा तपशील आणि नावं याविषयीची माहिती.
  • जर बँकेने जामीनदार मागितला असल्यास संबंधितांची वरील मुद्दा क्र. १, २, ३ आणि ५ नुसारची सर्व माहिती आणि कागदपत्रं.

आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ पट आणि घराच्या किमतीच्या ८० ते ८५ टक्के कमी असणा-या रकमेइतकं कर्ज मिळू शकतं. असं असलं तरी आपली सध्या असलेली र्कज आणि त्यापोटी होणारी दरमहा आपल्याकडून परतफेड विचारात घेऊन कर्ज रक्कम ठरवली जाते. जर व्यक्तीने आणखी काही कर्ज काढलं असल्यास काही कारणाने अनियमित अथवा थकीत असेल तर कर्ज नाकारलं जातं. याशिवाय कर्ज देणारी बँक कर्ज प्रस्ताव संमत करण्यापूर्वी 'सीबीएल' रिपोर्ट घेत असतात. यासाठी लागणारी फी अर्जदाराकडून वसूल केली जाते. या 'सीबीएल' अहवालाद्वारा अर्जदाराच्या पूर्वी घेतलेल्या कर्जाबाबत माहिती आणि परतफेडीबाबतचा अनुभव बँकेस मिळतो. हा अहवाल जर समाधानकारक नसल्यास तो बँकेकडून नाकारला जातो. सीबीएल रिपोर्ट घेणं आता बँकांना बंधनकारक आहे. हा सीबीएल अहवाल अर्जदार अर्ज करण्यापूर्वी स्वत:सुद्धा घेऊ शकतो. हा अहवाल ४७० रुपयांचा डीडी 'सीबीएल'कडे पाठवून किंवा ऑनलाइन पद्धतीने मिळवता येतो. पॉइंटच्या स्वरूपात दिला जातो. साधारणपणे ७००हून अधिक पॉइंट असल्यास अर्जदाराच्या कर्जप्रकरणाचा विचार केला जातो. पूर्वी कर्ज घेतलं नसल्यास 'नो हिस्टरी' असा अहवाल दिला जातो. तरी शक्यतो कर्जाचा अर्ज करण्यापूर्वी आपण आपला सीबीएल अहवाल घ्यावा. या अहवालाद्वारे आपल्याला आपल्या कर्जमंजुरीचा आधीच अंदाज येऊ शकतो. या अहवालामुळे पुढे होणारी निराशा आणि मनस्ताप टाळता येतो.

संयुक्त कर्जाचा पर्याय

पती-पत्नी दोघंही नोकरी अथवा व्यवसाय करत असतील, तर अशा वेळी संयुक्त (जॉइंट) नावावर कर्ज घेणं फायदेशीर ठरतं. एक तर यामध्ये दोघांचं उत्पन्न एकत्र करून त्यानुसार एकत्रित उत्पन्नाच्या ५ पट आणि घराच्या किमतीच्या ८० आणि ८५ टक्के दरम्यान कमी असणा-या रकमेचं कर्ज मिळू शकतं. शिवाय प्राप्तिकराच्या कलम ८०-सी नुसार मुद्दल परतफेड अािण कलम २४ नुसार १.५ लाखांपर्यंतच्या व्याजाचा फायदा दोघांनाही मिळतो. मात्र यासाठी 'ईएमआय' दोघांच्या संयुक्त खात्यातून किंवा दोघांची वेगळी खाती असतील तर त्यातून होणं अपेक्षित आहे.

गृहकर्जावर व्याज हे अस्थायी किंवा स्थायी (फ्लोटिंग अथवा फिक्स्ड) पद्धतीने आकारलं जातं. काही बँका याबाबत अर्जदारास पर्याय देऊ करतात. असं असलं तरी बहुतेक सर्व व्यापारी बँका फ्लोटिंग रेटच देऊ करतात. तर सहकारी बँका फिक्स्ड रेटने व्याजआकारणी करतात. काय आहे हा अस्थायी दर (फ्लोटिंग रेट)? फ्लोटिंग रेट हा संबंधित बँकेच्या बेस रेटशी निगडित असतो. तो बँकेनुसार कमी-अधिक असतो. सध्या बहुतेक सर्व बँकांचा मूलभूत व्याजदर १० ते ११ टक्क्यांच्या दरम्यान आहे. व्याजदर वाढल्याने कर्ज परतफेडीची मूळ मुदत वाढते. तर व्याजदर कमी झाल्याने मुदत कमी होते, परंतु जर वाढत्या दराने होणारी कर्जफेडीची मुदतवाढ टाळायची असेल, तर त्या प्रमाणात ईएमआय वाढवणं गरजेचं आहे. हे शक्य नसेल तर बोनस, पगारवाढीचा फरक यांसारखी एकमुठी मिळणारी रक्कम कर्ज खात्यात भरावी.

गृहकर्जाच्या अटी व शर्ती काय आहेत?

  • निवासी भारतीय किंवा 'एनआरआय' गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात. 
  • अर्जदाराचं वय २१ वर्षापेक्षा जास्त असावं. 
  • कर्जाची मुदत ५ ते २० र्वष इतकी असते, मात्र कर्ज परतफेड वयाच्या ६५च्या आत होणं आवश्यक आहे. 
  • जास्तीत जास्त २५ र्वष जुन्या घरास कर्ज दिलं जातं. अपवादात्मक स्थितीत जास्त जुन्या घरास कर्ज दिलं जातं. मात्र यासाठी बँकेच्या मान्यताप्राप्त इंजिनीअरकडून इमारतीच्या मजबुतीबाबत प्रमाणपत्र मिळणं आवश्यक असतं. 
  • कर्ज घेताना कर्ज रकमेइतका विमा उतरवणं आवश्यक असतं. 
  • कर्ज घेऊन घेण्यात येणारं घर बँकेत मॉग्रेज करून तारण म्हणून द्यावं लागतं. असे मॉग्रेज रजिस्टर अथवा इक्विटेबल पद्धतीने करता येते. व्यापारी बँका इक्विटेबल पद्धतीने तर सहकारी बँका रजिस्टर पद्धतीने मॉग्रेज करून घेतात. 
  • पाच वर्षानंतर गरज पडल्यास दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी झालेल्या परतफेडीच्या ९० टक्के इतकं नवीन कर्ज मिळू शकतं. 
  • याशिवाय घराची किंमत जर २५ लाखांच्या आत असेल आणि कर्जाची रक्कम १५ लाखांच्या आत असेल, असं कर्ज प्राधान्य क्षेत्रात येत असल्याने त्यावर एक टक्क्यांइतकी व्याजावर सबसिडी दिली जाते. मग ही रक्कम कर्ज खात्यात जमा केली जाते.

काही बँका होम सेव्हर पद्धतीने गृहकर्ज देऊ करतात. यामध्ये कर्जदाराचे बचतखाते (सेव्हिंग अकाउंट) कर्ज खात्याला लिंक केलं जातं. त्यामुळे बचत खात्यावरील शिल्लक बाकी गृहकर्जाच्या नावे बाकीतून वजा करून उर्वरित रकमेवर व्याज आकारणी केली जाते. यामुळे आपल्या खात्यातील शिल्लक रकमेमुळे व्याज वाचवता येतं. ही शिल्लक रक्कम हवी तेव्हा काढताही येते.

सध्या बहुतेक बँका गृहकर्जासाठी इन प्रिन्सिपल (तत्त्वत:) मंजुरी देतात. यामुळे इच्छुक व्यक्तीस आपल्याला किती कर्ज मिळू शकेल याचा अंदाज येऊन त्यानुसार घर शोधता येतं. असं इन प्रिन्सिपल (तत्त्वत:) मंजुरीपत्र सहा महिन्यांपर्यंत चालू शकतं.

अलीकडेच बँका रिव्हर्स मॉग्रेज पद्धतीचं कर्जही देऊ लागल्या आहेत. यामुळे आपण जरी उमेदीच्या काळात कर्जफेड करीत असलो, तरी हेच घर आपल्याला गरज पडल्यास उतार वयात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहून नियमित उत्पन्नाची तरतूदही करू शकतो.

गृहकर्जाचा निर्णय लवकरात लवकर घेऊन त्यांची वेळेवर परतफेड करणं फायद्याचं तर आहेच, शिवाय यामुळे आपल्या स्वत:च्या घरात राहण्याचं समाधानसुद्धा मिळतं.

गृहकर्जात लाइफ इन्शुरन्सचा सहभाग

गृहकर्ज सोयीस्कर असू शकतं. असं कर्ज घेताना सूक्ष्म िपट्र वाचा, असं नमूद केलेलं असतं. याचा अर्थ असा की, आपण दिलेल्या प्रिन्सिपल पेमेंटच्या एवढंच घर आपल्या मालकीचं असतं. बाकीचं उर्वरित गृहकर्ज किंवा अर्थसहाय्य कंपनीच्या मालकीचं असतं.

संपूर्ण प्रिन्सिपल पेमेंट देण्यास १० ते १५ र्वष किंवा २० वर्षसुद्धा लागू शकतील.

लाइफ इन्शुरन्स असणं आपल्याला मन:शांती प्रदान करतं. म्हणजे काही अनपेक्षित घडल्यास आपल्या कुटुंबाला सर्व आíथक पािठबा मिळतो. इथे लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचं उत्पन्न मदत करतं. लाइफ इन्शुरन्सच्या शिल्लक कर्जाची राशी फेडण्यास आणि आपल्या कुटुंबासाठी घर ठेवण्यात वापर होऊ शकतो.

कर्जराशीची काळजी घेणारी लाइफ इन्शुरन्स पॉलिसी कशी खरेदी करता येईल?

ब-याच वित्त कंपन्या किंवा गृहकर्ज देणा-या कंपन्या कर्ज घेणा-यांनी कर्जासाठी तारण प्रदान करावं, अशी अपेक्षा करतात. साधारणपणे तारण म्हणून प्रदान केलेली मालमत्ता हे घरच असतं. तथापि, कर्जराशीच्या समतुल्य असलेली लाइफ इन्शुरन्स पॉलिसी, पॉलिसीचं हाउसिंग तसंच वित्त कंपन्यांना देत असलेले लाभ कर्जासाठी तारण म्हणून प्रदान करू शकतात.

काही हाउसिंग कंपन्या कर्ज घेणा-यांद्वारे दिलेल्या हप्त्यामध्ये अतिरिक्त कर्जाची रक्कम जोडतात. इन्शुरन्स काढलेल्याचा मृत्यू कर्जाची मुदत सुरू असताना झाल्यास शिल्लक राशी इन्शुरन्स पॉलिसीचं उत्पन्न हाउसिंग किंवा वित्त कंपन्यांना देते.

कष्टाच्या बचतीमुळे नवीन घरास केलेलं अर्थसहाय्य आता आपली पुष्कळ जमा झालेली सेिव्हग्ज आपल्या नवीन घरामध्ये गुंतली गेली आहे. नवीन घर खरेदी करणं एक नवीन प्रारंभ करण्यासारखं वाटतं. म्हणून आता आपण आपल्या इन्शुरन्स आवश्यकतेचं पुन्हा मूल्यमापन करा. कारण आपली सेव्हिंग दीर्घ कालावधीसाठी गुंतवली गेली आहे. अर्थात, या सर्व बाबी तपासल्या तर घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

Read More »

पित्रे बिल्डिंग-एक कुटुंब

डोंबिवलीच्या टुमदार वाडा संस्कृतीत १९५१ मध्ये फडके रोडवर उभी राहिलेली पहिली बिल्डिंग वजा चाळ म्हणजे पित्रे बिल्डिंग. एक चाळ, एक मजली आणि इतर दोन्ही दुमजली. गिरगावातील चाळींप्रमाणे आतील भागात तीन बाजूंनी बि-हाडं आणि मधे एक मोकळा चौक. तर बाहेर रस्त्याच्या बाजूला अंगण, त्यावरचा मांडव, विहीर, कृष्णकमळ, विलायती फणस, चाफा ही झाडे असा बिल्डिंगच्या सभोवतालचा परिसर ही पित्रे बिल्डिंगची शान होती. डोंबिवलीतील गणेशोत्सव, आप्पा दातार चौकात रंगणारी दिवाळी पहाट, गुढीपाडव्याची नववर्ष स्वागतयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या सभा यांची साक्षीदार असलेली ही चाळ आता शहरीकरण आणि पुनर्विकासाच्या ओघात केवळ आठवणीपुरतीच राहिलीय.

अनंत हरी पित्रे, बाळकृष्ण हरी पित्रे आणि मधुकर पित्रे यांनी या बिल्डिंगचं हे कुटुंब उभारलं. मार्च १९६७ पासून भाडेकरू म्हणून त्यांच्याशी जोडलं गेलेलं नातं, त्यांच्या प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्यामुळे आजही टिकून आहे. मुंबईतून डोंबिवलीसारख्या गावात स्थलांतरीत होताना मनात धाकधुक होतीच; पण या चाळीतील रहिवाशांचा एकमेकांशी असलेला घरोबा, एकोप्यामुळे ती दूर झाली. येथील ब्राह्मण, मराठा तसंच मद्रासी, गुजराथी अशा सर्व भाडेकरूंनी आपल्या कुटुंबाप्रमाणे एकमेकांचे सण, उत्सव, हळदीकुंकू समारंभ, लग्न, मुंज एकत्रितपणे साजरे केले. 

मद्रासी कुटुंबीयांकडे ओनम, नवरात्रोसारख्या सणाला आख्खी चाळ लोटायची. प्रसाद म्हणून वाटल्या जाणा-या गोड अप्प्यांवर सर्व जण तुटून पडायचे. राजे कुटुंबीयांकडे श्रावणात पिठोरी अमावस्येला होणारी पूजा एक पर्वणीच असायची. गोपाळकाल्याला दोन चाळींमधील चौकात दहीहंडी बांधली जायची. ती फोडण्यासाठी बालगोपाळांमध्ये चुरस असली तरी कधी कोणाची भांडणं झाली नाहीत. पाऊस पडत असतानाही हंडीसाठी लागलेल्या थरांवर पाणी टाकण्यात वेगळी मज्जा यायची. अशात कित्येकदा थर कोसळत असे. हंडी फोडल्यानंतर पाऊस-थंडीमुळे गारठणा-या मुलांच्या अंगावर भराभर गरम पाणी ओतलं जाई. त्यानंतर दही-पोहे खाताखाता रंगणा-या गप्पांमुळे दिवस कसा सरायचा, हे कळायचंही नाही.

चाळीतील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणपती मंदिरातील गणेशोत्सवाला साजेसा आमचा समोरचा पित्रे बिल्डिंगचा उत्सव असायचा. फडके रोडवरच्या अंगणातील पत्र्याच्या मांडवात हा उत्सव साजरा व्हायचा. १५ ऑगस्टपासूनच सर्वाना त्याचे वेध लागायचे. त्यासाठी वर्गणी काढण्यापासून सजावट, गणपतीची मूर्ती ठरवणं, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कलाकारांना निमंत्रण, स्पर्धा, बक्षिसं यासाठी रात्री बैठकांवर बैठका होत असत. पंडित भीमसेन जोशी, पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. राम मराठे, मधुवंती दांडेकर, नकलाकार वि. र. गोडे यांसारख्या मंडळींचे कार्यक्रम-मैफली मध्यरात्रीपर्यंत रंगल्या आहेत. त्याला चाळीतील रहिवाशांबरोबर अन्य नागरिकही गर्दी करत. आरती-नैवेद्याचा मान आलटून-पालटून सर्वानाच मिळत असे. विसर्जनाच्या दिवशी तीन-चार तास ढोल, ताशे आणि लेझीमच्या तालावर चालणारी मिरवणूक हे आणखी एक खास आकर्षण. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण त्यात सहभागी होत असत. विसर्जन झाल्यावर कोणाच्या तरी घरी श्रमपरिहारासाठी कॉफी आणि भेळेचा कार्यक्रम व्हायचा.

नवरात्रात चाळीतील मुली, महिला दररोज भोंडल्याचा फेर धरत असत. त्यानंतर खिरापत ओळखण्यासाठी त्यांची चढाओढ लागत असे. दस-याच्या दिवशी सोनं लुटण्यासाठी मुलांची वरात एका घरातून दुस-या घरात अशी चाळभर निघत असे. दिवाळीत चाळ नटायची ती मोठमोठय़ा रांगोळ्या आणि घरी बनवलेल्या कंदिलांनी. दिवाळीच्या पहिल्या पहाटे फडके रोडवर लोटणा-या डोंबिवलीकरांमध्ये चाळही सहभागी व्हायची. ग्रामदैवत असलेल्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर तरुण-तरुणींचे ग्रूप चाळी खालीच रेंगाळायचे. दिवाळीचा पाडवा, भाऊबीज आणि पुढे तुलसी विवाहापर्यंत उत्साही वातावरण असायचं. गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेचा समारोपही इथे होत असल्यामुळे कार्यक्रम पाहण्यासाठी डोंबिवलीकर चाळीच्या पहिल्या-दुस-या मजल्यावर गर्दी करत.

चाळीतील खोल्या १० बाय १२ च्या, इतक्या लहान. पण आमच्या घरात काही कार्य निघालं तर सगळी चाळ म्हणजे एक घर. चाळीतील मधल्या चौकात-घरातही लग्न-मुंजीसारखं कार्य व्हायचं. अंगणातील मांडव ही पाहुणे मंडळींची बसायची जागा. हा मांडव पित्रे बिल्डिंगची एक शोभा होती. मुलांना खेळण्याची जागा तर पावसाळ्यात गुरा-वासरांसाठी निवारा होता. पण फडके रोडच्या रुंदीकरणात हा मांडव इतिहासजमा झाला. सुखं-दु:खं वाटायला माणसं लागतात हे या चाळीत कधी जाणवलंच नाही.

चाळ म्हटलं की, भाडणं आलीच. पण मुलांची भांडणं मुलांनीच आणि मोठय़ांची मोठय़ांनीच सोडवायची, हा इथला एक अलिखित नियमच असल्यामुळे ती तातडीने सोडवलीही जात. मुलंबाळं अंगावर ल्यालेली नांदती ही चाळ होती. पण पुनर्विकासाच्या ओघात दोन चाळींच्या जागेवर आता टोलेजंग टॉवर उभा राहिला आहे. शेवटची आमचीच एक चाळ शिल्लक असून, या कुटुंबाच्या केवळ आठवणीच उरल्या आहेत.

कालाय तस्मै नम:!

Read More »

अशी वाढवा झाडे

जागेच्या कमतरतेमुळे आपली बागसुद्धा आता आपल्या बाल्कनी किंवा हॉल, स्वयंपाकघराच्या खिडक्यांपुरती मर्यादित झाली आहे.

वाढते शहरीकरण आणि जागेची कमतरता यांमुळे दिवसेंदिवस संसाराचा पसारा प्रत्येकालाच आवरता घ्यावा लागत आहे. जागेच्या कमतरतेमुळे आपली बागसुद्धा आता आपल्या बाल्कनी किंवा हॉल, स्वयंपाकघराच्या खिडक्यांपुरती मर्यादित झाली आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यासाठी तुमच्या बागेसाठी खास गार्डनिंग टिप्स -

पावसात हवेत आद्र्ता आणि ओलावा जास्त असतो. त्यामुळे झाडं जोमाने वाढतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडांची वाढ अधिक जोमाने करायची असल्यास योग्य वेळेस छाटणी करावी. म्हणजे पावसात त्यांना छान नवीन पालवी फुटेल.

या दिवसात झाडांसाठी शक्यतो नैसर्गिक खत वापरावं. सुकलेलं शेणखत उत्तम पर्याय आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडाच्या मुळाशी शेणखत घाला. रासायनिक खतांचा वापर पावसाळ्यात आवर्जून टाळा.

शक्य असल्यास झाडांच्या कुंडीतली माती बदला. त्यात नवीन माती वापरा.

पावसाळ्यात पाण्याची अजिबात कमतरता नसते. अशा वेळी झाडांची विशेष काळजी घ्या. अतिरिक्त पाणी वाहून जाईल याची विशेष काळजी घ्या. कारण झाडांच्या मुळात पाणी साचून राहून झाडं कुजण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य रीतीने होईल अशा कुंडय़ांचा उपयोग झाडं लावण्यासाठी करावा.
बागेत नव्याने झाडं लावायचा विचार करत असाल तर या पावसाळ्यात ओवा, आंबेहळद, अळू लावायला अजिबात विसरू नका. श्रावणात या भाज्या नक्की उपयोगी पडतील.

पावसात फुलांमध्ये गुलाब, जाई, जुई, मोगरा, तेरडा, लिली ही फुलझाडं लावण्यास काहीच हरकत नाही. या फुलांना पावसात चांगला बहर येतो. सुगंध आणि रंगाची छान जोड बगीच्याला मिळेल.

Read More »

कानमंत्र सुरक्षित घराचा

असुरक्षितता हा जणू आजच्या युगाचा मंत्रच बनला आहे. नोकरीपासून रस्ताप्रवासापर्यंत सर्वत्र आपलं बस्तान मांडलेल्या या असुरक्षिततेच्या विळख्यातून घरही सुटलेलं नाही. किंबहुना, अलीकडील काळात घरांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची बनली आहे. घरफोडी, चोऱ्या ही कारणे आहेतच, पण आग लागण्यासारख्या घटनाही अलीकडील काळात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या घरकुलाच्या सुरक्षिततेसाठी काही ठोस उपाययोजना करणं ही काळाची गरज ठरली आहे. यासाठी तंत्रज्ञानाचाही आधार घेता येईल

 चोरीच्या वाढत्या घटनांच्या बातम्या नेहमीच वर्तमानपत्रातून वाचायला मिळत असतात. अशा वेळी रात्री-बेरात्री घरात थोडंसं खुट्ट झालं की आपली झोप चटकन उडते आणि आपण घरभर फिरून येतो. असं होऊ नये म्हणून घर अशा प्रकारे सुरक्षित करावं की, आपल्याला कुठलीही चिंताच लागू नये. घराची आणि घरातल्यांची सुरक्षितता आपण स्वत: करू शकतो. मात्र, त्यासाठी थोडा समजूतदारपणा, सावधगिरी आणि जागरूकता राखणं गरजेचं आहे. 

पिप होल आवश्यक : सर्वप्रथम दरवाजावर 'पिप होल' असावं. म्हणजे बाहेर कोण आलं आहे, हे चटकन समजतं. अशा प्रकारचं होल अलीकडे प्रत्येक ठिकाणीच असतं. मात्र घरात लहान मुलं असतील तर हे पिप होल मुलांच्या उंचीनुसार बनवावं. जेणेकरून त्यांनाही बाहेर कोण आलं आहे, हे समजेल.

दोन दरवाजे : घराला मुख्य दरवाजासोबत आणखी एक मजबूत दरवाजाही असावा. तसंच गच्ची असल्यास आणि बाल्कनीच्या दरवाज्याबाबतदेखील सुरक्षा व्यवस्था असावी. या मार्गाद्वारे बाहेरच्या व्यक्तीला आपल्या घरात थेट प्रवेश मिळू शकतो, हे लक्षात ठेवावं.

तंत्रज्ञानाचा आधार घ्या : घरात ओळख दर्शवणारी सुरक्षितता म्हणजे 'बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन' असावा. याद्वारे आपली बोटं, हात किंवा चेहऱ्याच्या ओळखीने दरवाजा उघडेल किंवा लावता येऊ शकेल. घराच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्थादेखील निश्चित करावी. जेणेकरून रात्रीदेखील आपणाला बाहेरच्या हालचाली सहजपणे बघता येतील. याव्यतिरिक्त घराच्या मुख्य दरवाजावर व्हीडिओ डोअर फोन लावल्यास उत्तम ठरेल.

आपत्कालीन परिस्थितीसाठीची तयारी : घरात अशी कुठलीही वस्तू ठेवू नये जी चटकन आग पकडणारी असेल. अशा कुठल्याही आपत्कालीन स्थितीसाठी घरात इमर्जन्सी एक्झीट असावी. जे आतून सहजपणे उघडू शकेल. इलेक्ट्रीसिटी वायरिंग, स्विच बोर्ड इत्यादी गोष्टी चांगल्या स्थितीत असाव्यात, जुन्या नकोत. शॉर्ट सíकट झाल्यास धुरावर किंवा आगीवर पाणी टाकू नये. तर मेन स्विच बंद करावा आणि घराच्या बाहेर यावं. मुलांच्या बाबतीत दुर्घटना होण्याची शक्यता थोडी जास्त असते कारण मुलं धोक्यांबाबत गांभीर्याने विचार करू शकत नाहीत. मूल जर चार वर्षापेक्षा मोठं असेल, तर त्याला धोक्यांबाबत आणि त्याच्या परिणामांबाबत सांगावं, जेणेकरून ते स्वत: आपली सुरक्षितता राखू शकेल.

मुलांना करा सजग : दरवाजा कोणी ठोठावल्यास अथवा बेल वाजवल्यास सर्वप्रथम पिपहोलमधून बघावं, अनोळख्या व्यक्तीसाठी कधीही दरवाजा उघडू नये, हे मुलांना आवर्जून सांगावं. खिडक्यांवर स्लायिडग दार लावणं योग्य नाही. कारण इथून मूल पडू शकतं. म्हणून अशा खिडक्यांना जाळी जरूर लावावी. खिडकी, गच्ची अथवा बाल्कनीजवळ असं कुठलंही फर्निचर ठेवू नये ज्यावर मूल चढून पडू शकेल. गच्चीची किंवा बाल्कनीची पॅरापिट वॉल उंच ठेवावी.

इतर काळजी : घरात क्लिअर ग्लास म्हणजे ज्या काचेतून आरपार बघता येईल, अशी काच असल्यास त्यावर गडद रंगाची स्क्रिन किंवा स्टिकर लावावं, ज्यामुळे मुलांना समजेल की ही काच आहे, याला धडकू नये. घराला सेल्फलॉक डोअर किंवा लॅच कुलूप असेल तर मुलांना एकटं सोडू नये आणि चावी घेतल्याशिवाय बाहेर निघू नये. कारण दरवाजा बंद झाल्यास मूल आत अडकू शकतं.

सुरक्षित घरासाठी सेल्फलॉकच्या दोन ते तीन किल्ल्या ठेवाव्यात. घराला डबलडोअर असावं. त्यापैकी बाहेरचा दरवाजा धातूचा आणि आतला दरवाजा लाकडाचा असावा. मुख्य आणि आतील दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारची लॉकिंग व्यवस्था असावी. त्यासाठी नॉर्मल लॉक, डेड बोल्ट्स, सिरम लॉक, फ्लोर लॉक इत्यादींचा वापर करावा. दरवाज्यावर सेफ्टी चेन असावी. म्हणजे अनोळखी व्यक्तीसाठी पूर्ण दरवाजा उघडावा लागणार नाही. घरात येणा-या कुठल्याही व्यक्तीकडे म्हणजे टेलिफोन दुरुस्त करणारा, टीव्ही दुरुस्त करणारा किंवा मीटर रीडिंग घेणारा कोणीही आल्यास त्याच्याकडे ओळखपत्र जरूर मागावं. आपल्या कामवाल्या बाईबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. नियमानुसार पोलिस स्टेशनमध्ये तिचं नाव, पत्ता नोंदवावा.

आपण कुठे बाहेर फिरायला जाणार आहोत, याची माहिती कोणाला देऊ नये. घराचा दरवाजा, खिडकी, बाल्कनी किंवा गच्चीजवळ मोठं झाड नसावं जेणेकरून, त्याचा आधार घेऊन कुणीही सहज वर चढू शकेल. बाहेर जाताना घराची किल्ली कोणालाही देऊ नये. बंगला असल्यास घराला चहूबाजूंनी भिंत (बाउंड्री वॉल), काटेरी झाडांचं कुंपण किंवा तार लावावी. घरात एक पाळीव कुत्रादेखील ठेवावा. घरातील प्रत्येक लहान-मोठय़ा वस्तूंवर काही ओळखीची चिन्हं लावावीत, जेणेकरून आपली वस्तू चुकून चोरीला गेल्यास ती चटकन ओळखता येईल.

एखादी व्यक्ती संशयास्पद आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. घराचे पडदे जाड आणि गडद रंगाचे असावेत. जेणेकरून कोणीही आतील मौल्यवान वस्तू डोकावून बघू शकणार नाही. सुट्टयामध्ये बाहेर जाणार असाल तर सेल्फलॉक नक्की लावावं आणि घरातील एखादा दिवा सुरू ठेवावा. यामुळे घरात कुणीतरी आहे, असं वाटेल. यासाठी टायमर असणा-या दिव्यांचा वापर करावा. घराच्या सुरक्षिततेसाठी अशा काही उपायांचा वापर करावा. 

Read More »

गृहखरेदीत हवा

घरांच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात घर किंवा जमीन घेणं हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरत आहे. घर खरेदीने गुंतवणूक तर होतेच पण पैसा सत्कारणी लागल्याचं समाधानही मिळतं. मात्र, ही बाब वाटते तितकी सोपी नाही. आयुष्यभराची मिळकत घरावर खर्च होणार असते. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकणं आवश्यक आहे. 

घरामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय कधीही तोटयात जात नाही. कारण हल्ली राहत्या घरांची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळेच लहान आणि मोठया शहरांतील घरांच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळतात. रिअल इस्टेटच्या क्षेत्रामध्ये आणखी तेजी येणार आहे. ही तेजी केवळ पुण्या-मुंबईसारख्या मोठया शहरांमध्येच नव्हे तर लहान गावांमध्येही बदल घडवून आणणारी आहे. त्यामुळे तेथील घरांच्या किमतीही वाढणार आहेत, किंबहुना वाढू लागल्या आहेत. अशा वेळी घर खरेदी डोळसपणे केल्यास विकासक आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल. त्यासाठी पुढील काळजी घेणं आवश्यक आहे.

> घर खरेदी करण्यापूर्वी..

घर खरेदी करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीची योजना आखावी. खरेदी करायची स्थावर मालमत्ता भविष्यात किती फायद्याची ठरू शकेल, याचा विचार करावा. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकाच्या मनात काल्पनिक रचना (मॉडेल) तयार असणं चांगलं. त्यानुसार घराची शोधाशोध करणं सोपं जातं. घर घेतल्यानंतर 'आपण हे घर का घेतलं' हा निर्णय पुन्हा बदलता येत नाही. सुधारताही येत नाही. त्यामुळे ही खबरदारी आधीच घेणं आवश्यक असतं. कुठल्याही ठिकाणी प्रॉपर्टी घेताना केवळ बातम्यांवर विश्वास ठेवू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी चांगला रिअल इस्टेट एजंट, वकील, बँक यांचा सल्ला घ्यावा. उत्साहाच्या भरात एखादं घर खरेदी करताना आपण मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे मोजतो आणि नंतर नुकसान सहन करावं लागतं.

घर खरेदी करणं ही आपण करत असलेल्या गुंतवणुकांपैकी सर्वात मोठी गुंतवणूक असू शकते! एक छोटं नियोजन आपल्याला आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करण्यात मदत करेल.

नवीन घर खरेदी करण्यासाठी आपण कर्ज घेतलं असल्यास आणि कोणत्याही अनिश्चित घटनेमध्ये घरावरील अस्तित्वात असलेलं कर्ज फेडण्यास असक्षम असल्यास बचावाचा एक पर्याय म्हणजे पुरेसा लाइफ इन्शुरन्स आपल्याकडे असणं गरजेचं असतं. आवश्यक असलेला लाइफ इन्शुरन्स घेतल्याने, आपण घेतलेलं घर, आपलं कुटुंब आपल्या मालकीचं करण्यात सक्षम होतं.

स्थावर मालमत्ता खरेदी करताना बहुतेक वेळा ग्राहकाच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळेच ती खरेदी करण्यापूर्वी हे प्रश्न नक्की विचारा-

बिल्डरकडे (विकासक) योग्य सरकारी परवानगी म्हणजे महापालिका, विभाग विकास प्राधिकरण, वीज नियामक मंडळ आणि पाणीपुरवठा विभाग इत्यादींच्या परवानग्या आहेत का ?

कोणत्याही इमारतीचं बांधकाम सुरू करण्याचं प्रमाणपत्र विकासकाकडे आहे का?

विकासकाकडे जमिनीचं क्लीअर टायटल आहे का?

तयार ताबा घेण्यायोग्य विकासकाकडे मालमत्तेचं, मालमत्ता पूर्णत्वाचं प्रमाणपत्र आहे का? तसंच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे जागेचा ताबा मिळण्यापूर्वी मिळालं आहे का?

गृहकर्जातून घर घेताना बिल्डरकडे बँकेला तारण म्हणून ठेवण्याकरता त्या जागेचं अधिक ना हरकत प्रमाणपत्र आहे का? कारण हे प्रमाणपत्र त्याला विक्रीचा करार केल्याच्या नोंदणीनंतर लगेच द्यायचं असतं.

सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्या मालमत्तेचं डाउन पेमेंट करण्यास सुरुवात होते. त्यानंतर थोडया थोडया कालावधीनंतर पैशाचा भरणा करायचा असतो. या प्रत्येक टप्प्यानंतर खरेदीदाराला नियमितपणे खालील कागदपत्रं मिळावयास हवीत, तो त्याचा हक्क आहे.

विक्री कराराची कॉपी.

पैसे मिळाल्याची पावती.

विक्री कराराची नोंदणीकृत प्रत.

पझेशन रिसीट.

घर खरेदी करणा-याने वकिलाकडून विकासकाकडे जमिनीचा कायदेशीर अधिकार असल्याचं प्रमाणपत्र मिळवावं. गरज पडल्यास वकिलाकडून त्याचा अभ्यास करून घ्यावा. यामुळे तुमच्या फसवणुकीचा मार्ग बंद होईल. हे आवश्यक आहे..

हल्लीच्या टेक्नोसॅव्ही युगात प्रत्येक जण इंटरनेट सर्फिंग करत असतात. या माहितीच्या महाजालातून शहरात असलेल्या मालमत्तेची माहिती तो मिळवत असतो. असं असलं तरी जागेचा शोध ऑनलाइन घेत असताना आवडलेल्या जागेच्या ठिकाणी एकदा तरी भेट द्यावी. बिल्डरकडे असलेली सर्व कागदपत्रं, करार आणि मालमत्तेची प्रमाणपत्रं नीट तपासावीत. आजूबाजूच्या दुस-या जागांचे दर पडताळून पाहा. बांधकामाचा दर्जा, फ्लॅटमध्ये देण्यात येणाऱ्या इतर सुविधा जसं की फ्लोरिंग, किचन फिटिंग्ज इत्यादी तपासा. विकासकाने दिलेला नकाशा, जागेच्या बांधकामासाठी वापरलेल्या सामानाची गुणवत्ता, यांची योग्य माहिती घ्या. पिण्याचं पाणी, पाणी साठवण्याची जागा, नसíगक उजेड यांची गरज, वायुविजन, पाण्यासाठीची जोडणी, मलनि:सारण इत्यादी गोष्टींची माहिती नीट करून घ्या. त्याचबरोबर सर्वसामान्य सुविधा गटात(कॉमन सव्‍‌र्हिस एरिया) मोडणाऱ्या सर्व गोष्टी पडताळून पाहा आणि तिचा दर योग्य आहे का, याचाही अभ्यास करा. महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा, भूकंपविरोधी बांधकाम, पार्किंग सुविधा, लिफ्ट्स, पर्यायी मार्ग, जिने, गच्चीवर जाण्याचे मार्ग आणि सुरक्षा यांचाही अभ्यास करा.


 बांधकामाधीन अवस्थेतल्या इमारतीत घर खरेदी करताना..

काही जण इमारत बांधली जात असताना त्यात फ्लॅट प्री-बुकिंग करतात. तयार घरांपेक्षा निर्मितीप्रक्रियेतील घरांसाठी दर थोडा कमी असतो. शिवाय पैसे उभे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. कधी कधी प्रकल्प वेळेत पूर्ण करणं काही विकासकांना शक्य होत नाही. त्यामुळे ग्राहकांनीच बांधकामाधीन इमारतीत घर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची पडताळणी करणं गरजेचं आहे. ही इमारत कोणत्या विभागात येणार आहे? दोन ते तीन वर्षाच्या कालावधीत ती बांधून होणार आहे की नाही, याची माहिती घ्या. जिथे विकासकाम अधिक जोराने चालू आहे, तिथे घरांचे दर अधिक असतील, मात्र बांधकाम चालू असेल, तो विभाग अद्याप विकसित व्हायचा असेल, तर तिथे कमी असतील.


 आवश्यक मंजुरी

'इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल (आयओडी)' आणि 'कमेन्समेंट सर्टिफिकेट (सीसी)' मिळाल्यावरच बिल्डर बांधकाम सुरू करू शकतो . 'आयओडी' साधारणत: वर्षभरासाठी असते. त्यानंतर त्याचं नूतनीकरण (रिन्यू) करावं लागतं. तुम्हाला ज्या मजल्यावर घर घ्यायचं आहे, त्या मजल्यासाठी 'सीसी' मिळाल्यावरच बुकिंग करा.


मालकीहक्क

संबंधित फ्लॅटवर बिल्डरचा मालकीहक्क असेल तरच तो ती मालकी अन्य ग्राहकाकडे हस्तांतरित करू शकतो. त्यामुळे घर घेण्यापूर्वी मालकीहक्क तपासून पाहायला हवा. तो ग्राहकाचा हक्कच आहे. 'टायटल सर्च'साठी वकिलाचा सल्ला घेता येईल. गृहकर्जासाठी अर्ज केल्यावर कर्जमंजुरी देण्यापूर्वी बँकाही 'टायटल सर्च' करतात. कर्जासाठी प्रोसेसिंग फी द्यावी लागली तरी सुरुवातीलाच कायदेशीर बाबी स्पष्ट होतात.


 सॅम्पल फ्लॅट

मार्केटिंगचा एक पर्याय म्हणून काही बिल्डर सॅम्पल फ्लॅट तयार करतात. आपला फ्लॅट कसा दिसेल, याचा नमुना ग्राहकांना यामुळे बघता येतो. आपल्या घरातील वैशिष्टय, बारकावे आणि अन्य पैलू सॅम्पल फ्लॅटप्रमाणेच असतील, याची खात्री बिल्डरकडून करून घ्यावी. तुमच्यात आणि बिल्डरमध्ये झालेल्या करारानुसार सर्व सोयीसुविधा सॅम्पल फ्लॅटमध्ये आहेत का, त्या तुमच्याही फ्लॅटला मिळणार आहेत का, तेही बघावं.


 मालमत्तेचा 'मॉर्गेज' मार्ग

बिल्डर बँका आणि एनबीएफसीकडून कर्ज घेतो आणि तो गृहप्रकल्प बँकेकडे तारण ठेवतो. बांधकाम सुरू असलेला फ्लॅट घेताना संबंधित रकमेचा चेक बिल्डरने आपल्या विशिष्ट बँकेतील विशिष्ट खात्याच्या नावाने काढायला सांगितल्यास समजावं की, संबंधित प्रकल्प तारण ठेवलेला आहे. त्या प्रकल्पातील फ्लॅट घेण्यासाठी बँकेचं 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) घ्यावं लागतं. त्यामध्ये फ्लॅटचा सर्व तपशील असावा लागतो. बिल्डरने बँकेकडून घेतलेले पैसे परत न केल्यास बँक इमारतीचा ताबा घेऊ शकते आणि फ्लॅट खाली करण्यास सांगू शकते. पण 'एनओसी' घेतली असल्यास हे संकट टळू शकतं.


 वेगवेगळे खर्च

किंमत कमी पडावी म्हणून बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅटला पसंती दिली जाते. पण ही खरेदी करताना स्टॅम्प डयुटी आणि रजिस्ट्रेशन, इलेक्ट्रिक मीटर, गॅस कनेक्शन, फíनचर, फिटिंग यासाठी येणारा खर्चही विचारात घ्यावा. मोठय़ा गृहप्रकल्पांमध्ये बिल्डर पाच वर्षापर्यंत अ‍ॅडव्हान्स मेंटेनन्स डिपॉझिट घेतात.


 विकासकाची प्रतिमा

व्यवहार करण्यापूर्वी विकासकाची विश्वासार्हता, त्याचे आतापर्यंतचे प्रकल्प, कामगिरी आणि प्रतिमा यांची खातरजमा करून घ्यावी. मोठे आणि चांगले नाव असलेल्या बिल्डरच्या प्रकल्पांचा विचार केलेला बरा. कारण त्यांच्याकडे अंमलबजावणीची क्षमता आणि संसाधनं तुलनेने जास्त असतात. या क्षेत्रात नवीन असलेल्या विकासकांशी व्यवहार करताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा. रिअल इस्टेट मार्केट कोसळल्यास सर्वाधिक फटका त्यांना बसण्याची शक्यता असते.


 विक्रीबाबत अटी

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तुम्ही फ्लॅट घेतला असेल आणि तो पूर्ण होत आला असताना वाढलेल्या किमतीला तुम्हाला तो विकायचा असेल तर तशा तरतुदी बिल्डरसोबतच्या करारामध्ये आधीच करायला हव्यात. बिल्डर सेल अ‍ॅग्रीमेंटमध्ये 'नो सेल' अशी तरतूद करतात. बांधकाम पूर्ण झाल्यावर किती काळाने फ्लॅट विकता येईल, ते त्यामध्ये नमूद केलेलं असतं. हा कालावधी दीड ते तीन वर्षाचा असतो. त्यापूर्वीच फ्लॅट विकायचा असेल तर बिल्डरकडून 'एनओसी' घ्यावं लागतं.


 घरास अर्थसहाय्य करण्यासाठी कर्ज

बरेच लोक (अर्थसहाय्य आणि कर बचतीमुळे) नवीन घर खरेदी करताना त्यांच्या घराची संपूर्ण किंमत देण्यास अनुत्सुक असतात. या मुख्य कारणामुळे पुष्कळ लोक नवीन घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतात.


 गृहकर्ज घेतेवेळी

कर्जमागणी अर्ज कसा करावा, किती कर्ज मिळू शकतं, अन्य अटी आणि शर्ती, तसंच अस्थायी आणि स्थायी (फ्लोटिंग आणि फिक्स) व्याजदर म्हणजे नेमकं काय, यातील कोणता व्याजदर स्वीकारावा, अशा प्रश्नांचं निरसन वेळीच होणं गरजेचं असतं.

गृहकर्ज शक्यतो राष्ट्रीयीकृत बँक अथवा केवळ घरासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या एचडीएफसी, जीआयसी होम फायनान्स, एलआयसी होम फायनान्स यांसारख्या वित्तीय संस्थांकडून घ्यावं. गृहकर्जासाठीचा कर्जमागणी अर्ज सर्व संस्थांचा साधारपणे सारखाच असतो.

त्यामध्ये प्रामुख्याने पुढीलप्रमाणे माहिती आणि कागदपत्रं द्यावी लागतात.

अर्जदाराची स्वत:ची माहिती-उदाहरणार्थ नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो, पॅनकार्ड, निवासाचा दाखला.

नोकरी/व्यवसाय याबाबतची माहिती.

वार्षकि उत्पन्न व त्याबाबतची पूरक कागदपत्रं (मागील ३ वर्षाचे फॉर्म १६, व्यावसायिक असल्यास मागील ३ वर्षाचे ताळेबंद)

फ्लॅट खरेदीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर विकासकाबरोबर झालेल्या कराराची प्रत आणि करार करतेवेळी त्याला दिलेल्या रकमेची पावती

Read More »

बैठकीला द्या लोककलेचा रंग

घर कितीही आधुनिक असलं तरी ते कुठेतरी आपल्या संस्कृतीशी जोडलं जावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याच हौसेपायी बैठकीच्या खोलीत पारंपरिक सजावट करण्यावर भर दिला जातो. या सजावटीने घराची शान तर वाढतेच पण काँक्रिटच्या जंगलातही त्याला मातीचा वास येतो. तुमची पारखी नजर जितकी चांगली तितकी या बाबतीत तुम्ही उत्कृष्ट सजावट करू शकता. असे अस्सल मातीतले नमुने गोळा करून त्यांनी तुमची बैठकीची खोली सजवलीत तर त्याचं वेगळेपण का नाही उठून दिसणार?

घर सजवणं ही एक कला आहे. आजकाल धकाधकीच्या जीवनात त्यासाठी फार वेळ मिळत नाही, हे अगदी खरंय. पण आजूबाजूला हिंडताना थोडी तीक्ष्ण नजर ठेवली तर घराच्या सजावटीचे अनेक चांगले पर्याय सहज उपलब्ध होताना दिसतील. घराच्या बैठकीच्या खोलीची सजावट कशी करायची, हा ब-याच जणांसमोर मोठा प्रश्न असतो. महागडं फर्निचर, उंची पडदे आणि आधुनिक यंत्र आणली तरी मनासारखी सजावट होतेच असं नाही.

अनेकदा उपलब्ध जागेत बसणारं चांगलं फर्निचर मिळत नाही. शिवाय त्याच्या रोजच्या देखरेखीचं काम वाढतं, ते निराळंच. छोटी जागा आणि बजेटमधली सजावट या दोन्हींवर मात करायची असेल तर आणखी एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे पारंपरिक वस्तूंचा वापर करून बैठकीची खोली सजवण्याचा. त्यात तुमची कल्पकताही दिसेल शिवाय तुम्हाला पाहिजे तेव्हा ते बदलणं सहज शक्य होईल. इतरांपेक्षा आपल्या घराच्या सजावटीला जरा वेगळेपणा देण्यासाठी त्यात बरंच काही करता येईल.
पाहुण्यांचं स्वागत करताना बैठकीच्या खोलीचा प्रामुख्याने वापर होतो. घरातला आपलाही बराच वेळ याच खोलीत जातो, त्यामुळे त्याच्या सजावटीकडे लक्ष द्यायलाच हवं. यात आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा सुरेख संगम साधता येईल.

घर कितीही आधुनिक असलं तरी ते कुठेतरी आपल्या संस्कृतीशी जोडलं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याच हौसेपायी बैठकीच्या खोलीत पारंपरिक सजावट करण्यावर भर दिला जातो. या सजावटीने घराची शान तर वाढतेच पण काँक्रिटच्या जंगलातही त्याला मातीचा वास येतो. अशी बैठक तयार करताना प्रथम काही गोष्टी मनाशी पक्क्या ठरवायला हव्यात. आपल्याला लोककलेला प्राधान्य देऊन बैठक सजवायची असेल तर त्याचे सजावटीचे नमुने गोळा करायला सुरुवात करायला हवी. अगदी पडदे, गालिचे आणि बैठकीवर ठेवायच्या उश्यांच्या अभ्य्रापासून एकेका गोष्टीची आखणी करावी लागेल.

भिंतीवरील पेंटिंग, वॉल हँगिंग, फ्लॉवरपॉट, टी-पॉय किंवा दिव्याची सोय करतानाही याचा विचार सतत आपल्या मांडणीशी जुळता म्हणजेच लोककलेचा वापर करून केला गेला आहे ना याकडे लक्ष ठेवायला हवं. त्यासाठी तुम्हाला आजूबाजूला वावरताना डोळे उघडे ठेवूनच वावरावं लागेल. कोठेही अशी सजावटीची वस्तू दिसली की, त्याचा आपल्या बैठकीत उपयोग होईल का, याचा विचार करावा लागेल. अशा वस्तू खरेदी करण्यासाठी महागडी हस्तकलेची दुकानंच पालथी घालावीत, असं नाही. अगदी रस्त्याच्या कडेला बसलेल्या एखाद्या विक्रेत्याकडेही काही चांगल्या वस्तू सहज मिळून जातात. तुम्ही स्वत: चित्रकला किंवा भरतकाम अगर तत्सम कलेचे जाणकार असाल तर त्यातली काही वेगळी कलाकृती स्वत: तयार करू शकता.

अशा पद्धतीने लोककलेचा रंग बैठकीला द्यायचा झाल्यास त्याची सुरुवात घराच्या रंगापासून करायला हवी. हॉलला रंग देताना तो मातीच्या रंगाशी मिळता-जुळता द्यावा. किंवा एखादी भिंत गेरू रंगात रंगवून घ्यावी. म्हणजे त्यावर हस्तकलेचा नमुना असलेलं एखादं वॉलपेंटिंग किंवा राजस्थानी पेंटिंग लावता येईल. आजकाल बैठकीच्या खोलीला अगदी सांस्कृतिक रंग देण्यासाठी त्यातली एक भिंत वारली पेंटिंग करून घेण्याची पद्धत आहे, तेही छान दिसते. भिंतींच्या रंगावर उठून दिसतील अशी पिवळ्या किंवा बदामी रंगातील पेंटिंग आणखी छान दिसतील. दरवाज्याच्या किंवा खिडक्यांच्या चौकटीदेखील अशा पारंपरिक चित्रकलेच्या माध्यमातून फळा-फुलांची नाजूक नक्षी काढून रंगवता येतील. वारली पेंटिंगऐवजी तुम्ही पौराणिक कथांचा आधार घेऊन एखादं चित्र काढून ती िभत रंगवू शकता किंवा तिथे रामायण, महाभारतातील कथेवर आधारित एखादं वॉल पेंटिंग लावू शकता.

मुख्य बैठकीची व्यवस्था करताना या सगळ्या सजावटीला साजेशी भारतीय बैठक ठेवलीत तर उत्तमच. दोन- गाद्या घालून त्यावर भरतकाम केलेल्या चादरी आणि उश्या ठेवल्यात तर खोलीला एक वेगळाच लुक येईल. त्याच्या जोडीला बांबूचं फर्निचर ठेवायलाही हरकत नाही. जुने मुढ्ढे नवीन रंग देऊन पुन्हा बैठकीत आणा. केनच्या फर्निचरचा कलात्मक वापर करून त्यावरही कलाकुसर केलेले सोफा कव्हर्स आणि उश्या ठेवल्या तर बैठकीला एक एथनिक लुक यायला काय वेळ लागेल? भारतीय बैठक नको असेल आणि कमी बजेटमध्ये काम करायचं असेल तर आणखी एक करता येईल. घरात ब-याच गोष्टींचे लाकडी-पुठ्ठय़ाचे बॉक्स येतात. त्यात रद्दी भरून ते जड करा. त्यावर हलकीशी पातळ गादी किंवा रजई घाला आणि वरून चांगली चादर अंथरा म्हणजे सेटीसारखी व्यवस्था तयार होईल.

पडद्यांमध्येही तुम्ही अगदी एथनिक लुक देऊ शकता. त्यासाठी पडद्यांची गरज नाही. लांब पट्टय़ाच्या चटया मिळतात. (राजस्थान, हिमाचल, दिल्लीकडे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.) त्याची चांगली रंगसंगती निवडा. त्या पट्टय़ा खिडक्यांवर सोडा. उन्हाळ्याच्या दिवसात वाळ्याचे पडदे सोडून त्यावर पाणी मारलं तर वेगळ्या एसीची गरजच नाही. अशा दिवाणखान्यात लोककलेच्या सजावटीच्या वस्तूंना मात्र नीट स्थान द्यायला हवं. मधे एखादा लाकडी टी-पॉय ठेवून त्यावर नक्षीदार फ्लॉवरपॉट किंवा सुरई ठेवलीत तरी फारच छान दिसेल.

या खोलीत दिव्यांची सोयही वेगळ्या पद्धतीने करायला हवी. रात्रीच्या वेळी मंद प्रकाशात हा सगळा जामानिमा उठून दिसेल. त्यासाठी वेताच्या गोल मडक्यात दिवे सोडावेत. इथे मॅजिक लॅम्प लावायला हरकत नाही. त्यात तेल फक्त आत सोडायची सोय असते. दिवा उलटा केल्यावर ते बाहेर येत नाही. हा तेलाचा दिवा पाच-सहा तास चालतो. सावंतवाडी, गोवा या बाजूला हे खास दिवे मिळतात.

दिवाळीत पणत्या ठेवण्यासाठी मिळणा-या मोठय़ा दिव्यांचाही शो पीस म्हणून चांगला वापर करता येईल. वेत किंवा काथ्यापासून बनवलेले की-चेन होल्डर किंवा न्यूजपेपर स्टँड अशा काही गोष्टी उपयुक्ततेबरोबरच या सजावटीला आणखी शोभा देतील. आपल्या सांस्कृतिक खजिन्यात अशा गोष्टींची कमतरता नाही. तुम्ही त्याचा किती कलात्मक पद्धतीने वापर करता, त्यावर तुमच्या बैठकीच्या खोलीला लोककलेचा रंग चढेल, हे नक्की!

Read More »

आज्यांनो, दागिने सांभाळा!

अलीकडे घरफोडीपेक्षाही भर रस्त्यांतही चो-यांचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. हे प्रकार विशेषत: घडतात ते साठी ओलांडलेल्या स्त्रियांच्या बाबतीत आणि त्याही त्यांच्या राहत्या घराच्या आसपासच्या आवारातच! त्यामुळे मध्यमवयीन स्त्रियांच्या बाबतीत सुरक्षेचे प्रश्न नव्याने उद्भवले आहेत. मात्र स्त्रियांनीच यासाठी दक्ष राहिलं आणि आपल्या आसपास लक्ष ठेवलं तर हे प्रकार टाळता येऊ शकतात..

त्या आजी चांगल्या धीराच्या. म्हटल्या तर एकदम स्मार्ट. पटकन फशी पडणा-या नाहीत. पण परवा चोरटय़ांनी त्यांच्या हातातल्या बांगडय़ा लांबवल्या. तेही सोसायटीच्या आवारातून. बहुधा चोरटे आधीपासून पाळत ठेवून असावेत. आजी सकाळी एकटय़ाच फिरायला बाहेर पडतात. सुरुवातीला एक जण धावत धावत आला आणि घाब-याघुब-या आवाजात आजींना म्हणाला तिकडे नाक्यावर सराफाचं दुकान फोडलंय. आजी तुम्ही ताबडतोब घरी जा, इथे फिरणं सुरक्षित नाही. आणि तो धावत धावत निघून गेला.

दोन मिनिटं होतायत न होतायत तोच पाठून दुसरा माणूस धावत आला. इथून कुणी धावत गेलं का, म्हणून आजींना विचारू लागला. आजी म्हणाल्या हो. अहो, मोठा दरोडा पडलाय. तुम्ही इथे काय करताय, म्हणून तो आजींवरच ओरडला. आजी तर घाबरून गेल्या. मग लगेच म्हणाला, इथे सुरक्षित नाही. तुमचे सोन्याचे दागिने काढून रुमालात ठेवा. त्याने स्वत:चा रुमाल काढला.

आजींना वाटलं की तो बहुधा पोलिसच असावा. म्हणून त्यांनी घाईघाईने बांगडय़ा आणि मंगळसूत्र काढून रुमालात ठेवलं आणि त्याने तो रुमाल आजींकडे दिला आणि तो धावत धावत निघून गेला. आपले दागिने त्या रुमालात सुरक्षित आहेत या भ्रमात आजी घरी आल्या आणि रुमाल उघडून बघतात तो त्यात दुसरेच खोटे दागिने होते. आपण गंडवलो गेलो आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं.. पण उशीर झाला होता.

दुस-या आजींच्या बाबतीत साधारण असंच घडलं. पण त्यांना सांगितलं गेलं की, तुमच्या मुलाचा अपघात झालाय. त्याला प्रचंड लागलंय. हॉस्पिटलमध्ये गहाण ठेवायला बांगडय़ा द्या, वेळ नाही जास्त. त्यांनी गडबडीत बांगडया काढून दिल्या.परवा ठाण्यात एका आजींच्या पाटल्यांच्या बाबतीतही असंच घडलं. थोडी गडबड सुरू आहे. अंगावर दागिने ठेवू नका. काढून एका पिशवीत ठेवा. पिशवीत दागिने ठेवल्यावर बाइकवरच्या चोरांनी वेगाने येऊन पिशवी पळवली.

एका आजींच्या बाबतीत तर खूपच दुर्दैवी प्रसंग घडला. एका चोरटय़ांनी त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपला मोबाइल सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे दिला आणि एका चहाच्या टपरीबाहेर बसवून चहा दिला आणि आलोच म्हणून सांगून तो गायब झाला. प्रत्यक्षात त्याने चहात सफाईने गुंगीचं औषध टाकलं. आणि तो बहुधा आजी बेसावध होण्याची वाट पाहत जवळपासच असावा.

मात्र कर्मधर्मसंयोगाने आजींच्या सोसायटीतली एक मुलगी तिथून जात होती आणि कधीही हॉटेलात न बसणा-या आजी इथे कशा याचं आश्चर्य वाटून तिने त्यांना हटकलं. त्यांच्या चेह-यावरची गुंगी पाहून ती आजींना घेऊन गेली. मात्र दिवसभर उपास असल्यामुळे आजींना त्या औषधाची विषबाधा झाली आणि त्यात त्यांचा अंत झाला.

हे सगळे प्रकार साधारण साठी ओलांडलेल्या स्त्रियांच्या बाबतीत मोठय़ा प्रमाणात घडताहेत. आणि बहुतांश घटना राहत्या घराच्या आसपासच घडल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय मध्यमवयीन स्त्रियांच्या बाबतीत सुरक्षेचे प्रश्न नव्याने उद्भवले आहेत. आयुष्यभर जपलेला दागिना चोर असे हातोहात लंपास करताना दिसत आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे एकटंदुकटं फिरताना हल्लीच्या दिवसात सोन्याचे दागिने घालूच नयेत. दुसरं म्हणजे तुमच्या सोसायटीच्या परिसरात किंवा लिफ्टमध्ये तुम्ही खूप सुरक्षित आहात अशा भ्रमात राहू नये.

प्रत्येक पावलावर दक्षता ठेवून सावधानता बाळगावी. सोसायटीतील वॉचमन किंवा सेवाकार्यासाठी येणा-या लोकांशी अघळपघळ गप्पा मारू नये. बोलण्याची वेळ आलीच तर घरातल्या गोष्टी सांगू नये. त्यानिमित्ताने विश्वास संपादन करून तुमची माहिती काढली जाऊ शकते. घरातले पुरुष किती वाजता येतात, किती वाजता जातात, फिरण्याची वेळ कोणती, वगैरे माहिती देऊ नये. परिसरात अनाहूत बाइकवाला फिरत असेल तर लगेच सुरक्षा व्यवस्थेला किंवा पोलिसांना कल्पना द्यावी. दुपारच्या वेळी हेल्मेटधारी बाइक फिरताना दिसल्यास नंबर टिपून ठेवावा.

शक्य झाल्यास तरुणांच्या मदतीने हटकावे. फेरीवाल्यांना परिसरात प्रवेश देऊ नये. तसेच सर्वेक्षणासाठी आल्याचं निमित्त सांगणा-यांची ओळखपत्रे कसून तपासावीत. ही चौकशी त्यांना अपमानास्पद वाटली तरी त्याबाबतीत ढिसाळपणा करू नये. दरोडा, चोरी, आग वगैरेसारख्या आपत्कालीन घटना किंवा निकटवर्तीयांच्या अपघाताबद्दल सांगून कुणी घाबरवून टाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर भांबावून न जाता प्रतिचौकशी करावी. चार ओळखीच्या लोकांना बोलावून घ्यावे. दागिने किंवा तुमच्या जवळील मौल्यवान वस्तूंबद्दल कुणी विषय काढल्यास संशयाची सुई त्याच्याकडे वळवून सावधान राहावं.

Read More »

गृहसजावटीचा कानमंत्र

गृहसजावट ही एक कलाच आहे. मात्र कलात्मक पद्धतीने घर सजवताना अनेक छोटया-मोठया गोष्टींचं तंत्र बाळगावं लागतं. ते बाळगलं गेलं तर गृहसजावट आकर्षक दिसण्याबरोबरच समतोलितही दिसते. त्यासाठीच्याच या काही टिप्स, खास तुमच्यासाठी..

दिवाणखाना, स्वयंपाकघर आणि इतर खोल्यांमध्ये अनावश्यक वस्तूंचा भरणा टाळावा.
घरातला कोपरा सजवण्यासाठी नेहमी गडद रंगसंगतीचा वापर करावा. एखादा कोपरा कुंडीनेदेखील उठावदार दिसतो.
दिवाणखान्यातली रचना एकसंध असावी. विरोधाभास करणारी रंगसंगती असल्यास ती चुकीची रंगसंगती होणार नाही, याकडे लक्ष द्यावं.
दिवाणखान्यात कोणतंही फर्निचर घेताना जागेचा पुरेपूर वापर करावा. सगळ्यांना बसायला पुरेपूर जागा मिळेल, अशी रचना असावी.
दिवाणखान्याला रंग देताना ऑफ व्हाइट, क्रीम, लेमन यलो, पिस्ता किंवा गुलाबी असे रंग निवडावेत. मात्र जागा मोठी असेल तर एखादी भिंत गडद रंगाची करावी.
दिवणाखान्यात लावले जाणारे फोटो नेहमी हसरे, खेळकर किंवा डोळ्यांना सुखद वाटतील असे असावेत.
प्रवेशद्वार हे आकर्षक त्याहीपेक्षा स्वच्छ असावं आणि त्याचा रंग नेहमी गडद असावा.
बैठक व्यवस्थेमध्ये स्टोअरेज व्यवस्थेचाही विचार करावा. केन किंवा रबरवूडचे फर्निचर आकर्षक दिसते.
मुलांच्या खोल्यांमध्ये अभ्यासाचं टेबल, कपडय़ांचं स्वतंत्र कपाट आणि पलंगासोबतच्या स्टोअरेजमध्येही प्रत्येक वस्तू मुलांना चटकन हाताशी येतील अशाच असाव्यात.
मुलांच्या खोलीला रंग देताना मुलांचं वय, त्यांचा स्वभाव यांचा विचार करून रंग द्यावा.
स्वयंपाकघरातील शोकेस आधुनिक असावी. तसंच किचन ट्रॉलीज आणि कपाटाची रंगसंगती मिळतीजुळती असावी.
रोजच्या फोडण्यांमुळे श्वास कोंडू नये म्हणून मोठी खिडकी, एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी बसवावी.
सगळ्या प्रकारची छोटी-मोठी भांडी हाताला चटकन सापडतील अशीच असावीत.
घरासमोरच्या टेरेसवर कुंडय़ा किंवा झाडं लावून एक छोटेखानी बागही करता येते.
घराची भव्यता दिसण्यासाठी आरसा किंवा भव्य निसर्गचित्राचा वापर करावा.
घरातली फूलझाडं शक्य असल्यास ऋतू किंवा आठवडा किंवा पंधरवडय़ानुसार बदलत राहावी. म्हणजे घर आकर्षक दिसतंच आणि मन प्रसन्न राहतं.
घरी येणा-या पाहुण्यांना कपडे दिसणार नाहीत अशा ठिकाणी ते वाळत घालावेत. गॅलरीत रॅक करून घ्यावा.
कपडे वाळत घालताना शक्यतो एकसारखे कपडे एका रांगेत घालावेत. कसेही वाळत घातलेले कपडे विचित्र दिसतात. त्यामुळे घराची शोभा जाते.
सगळ्यांनी एकत्र बसून जेवण्याची जागा म्हणजे डायनिंग रूम. तिथे सगळ्यांना एकत्र बसता येईल इतकी जागा असवी.

Read More »

ग्लासांना द्या नवा लुक

आपलं घर सुंदर दिसावं म्हणून आपण गृहसजावटीचे नवनवीन प्रयोग करत असतो. घरातील अंतर्गत सजावटीमध्येही आपली कल्पकता झळकत असते.

आपलं घर सुंदर दिसावं म्हणून आपण गृहसजावटीचे नवनवीन प्रयोग करत असतो. घरातील अंतर्गत सजावटीमध्येही आपली कल्पकता झळकत असते. घरात पाहुणे आल्यावर प्रथमत: आदरातिथ्याची सुरुवात होते, ती ग्लासातून पाणी देण्याने.

अँटिक शेप्समध्ये ग्लास आताशा बाजारात मिळू लागले असले तरी ते ब-याचदा साध्या काचेचे असतात. अशा साध्या काचेच्या ग्लासेसना थोडासा रंगीबेरंगी लुक घरच्या घरी आपल्याला देता येऊ शकतो. कसं ते पाहू या.. बाजारात त्यासाठी खास ग्लास पेंट्स आणि काचेवर चिकटवता येईल अशी विशिष्ट गोंदही मिळते.

ग्लास पेंटमध्ये ही पारदर्शी गोंद मिसळून ग्लासाच्या तळापासून वर आकर्षक रंगसंगतीत नुसत्या ठिपक्यांची रचनात्मक डिझाइन जरी केली तरी ते खूप सुंदर दिसतं. तुमची चित्रकला जर खास असेल तर मात्र तुम्ही सुरेख नक्षीकामही या ग्लासांवर करू शकता. पाहा मग, घरात प्रवेशकर्त्यां पाहुण्यांना तुम्ही या पहिल्याच आदरातिथ्यात कसं खूश करून टाकाल ते!

Read More »

गृहसजावटीसाठी स्टेन्सिल्स आर्ट

चार भिंतींचं असलं तरी ते 'घर' असतं. या भिंतींमुळे जगाच्या आणि आपल्यामध्ये एक कुंपण असतं. त्यामुळे 'आपलं जग' ठरवता येतं. कदाचित म्हणूनच लौकिकार्थाबरोबरच गृहसजावटीमध्येही भिंतींच्या सजावटीला अधिक प्राधान्य दिलं जात असावं. घराच्या भिंती रंगवण्यासाठी अलीकडे वेगवेगळे प्रयोग केले जातात. 'स्टेन्सिल्स आर्ट' हा त्यापैकीच एक. खोलीच्या स्वरूपानुसार एखाद्या भिंतीवर स्टेन्सिल्सचा वापर करून सुरेख पेंटिंग करता येतं. ही कला फारशी खर्चिक आणि वेळखाऊ नसल्याने सर्वसामान्यांनाही सहजपणे तिचा उपयोग करता येतो.

इंटिरिअर डेकोरेशन ही संकल्पनाच मुळात इतकी व्यापक आहे की, घरातील प्रत्येक भागाचा वेगवेगळ्या पद्धतीने आणि कल्पकतेने वापर करून घराचं सौंदर्य खुलवता येतं. त्यामुळेच भिंती, दरवाजे, खिडक्या, छत, फ्लोरिंग या सर्वामध्ये केले जाणारे बदल हे घराच्या सौंदर्याचं परिमाण ठरवत असतात. असं असलं तरी गृहसजावटीत महत्त्वाची ठरते ती भिंतींची सजावट. कारण घरात येणा-या प्रत्येक व्यक्तीची पहिली नजर ही भिंतींकडे जाते. या भिंतींच्या सौंदर्यावरून घराच्या एकूण रचनेची आणि तिथल्या वातावरणाची कल्पना येते. उदाहरणार्थ, घरातील भिंतींवर जर रेघोटय़ा ओढल्या असतील, शाई सांडली असेल तर घरात एखादं लहान मूल असल्याचं कळून येतं. घराच्या भिंतींना खूप भेगा पडल्या असतील, ओल आली असेल तर घराचं बांधकाम कच्चं असल्याचं निदर्शनास येतं. एकूण काय, तर भिंती म्हणजे घराचा आरसा असतात. त्यामुळेच वॉल डेकोरेशनला इंटिरिअरमध्ये बरंच महत्त्व आहे. 

अलीकडे भिंती सजवण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. वेगळ्या रंगाचा वापर करून चार भिंतींपैकी एखादी भिंत उठावदार (हायलाइट) करण्याचा ट्रेण्ड सध्या जोरात आहे. नुसताच एक सलग रंग देण्यापेक्षा ती भिंत अधिक आकर्षक बनवण्यासाठी अलीकडे स्टेन्सिल्सचा वापर केला जातो.

'स्टेन्सिल्स आर्ट' ही अतिशय सुरेख आणि आकर्षक अशी भिंत सजवण्याची कला आहे. यामुळे खोली खूपच आकर्षक आणि सुरेख सजवलेली दिसते. स्टेन्सिल्समुळे घराची भिंत सुंदर आणि फारच प्रसन्न दिसू लागते. स्टेन्सिल्सने भिंत सजवणं ही कला फारशी अवघड नाही आणि फारशी खर्चिकही नाही. घरातील काही भिंती फारच अनाकर्षक दिसत असतात. स्टेन्सिल्स अशा छोटय़ा छोटय़ा जागांना जिवंतपणा देतात. स्टेन्सिल्स फारशा महागही नसतात. सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात यांची किंमत असते. तसंच फारसा पसारा न करता आणि अधिक रंगांचा वापर न करता भिंत आकर्षक रूपात सजवता येते.

यासाठी रंग आणि चित्राचा विषय प्रत्येकाच्या आवडीने निवडता येतो. म्हणूनच या कलेला 'लोककला' असंही म्हणतात. तसंच स्टेन्सिल्स आर्टचा वापर मुलांच्या खोलीत एखाद्या बोधकथेच्या रूपातही करता येतो. यासाठी गडद रंगांचा वापर करता येईल. त्यामुळे मुलांची खोली अधिक प्रसन्न आणि टवटवीत दिसू लागेल. बरेच जण रंगांबाबत जरा जास्तच वेगवेगळे प्रयोग करतात. त्यामागे फारसा कलात्मक विचार केला जात नाही. त्यामुळे भिंती आणि अंतिमत: खोली तितकीशी आकर्षक दिसत नाही. म्हणूनच आपल्या आवडीने रंगांची निवड करताना थोडा कलात्मकतेने विचार करणं खूप गरजेचं असतं. स्टेन्सिल्सची निवड करतानाही ती कोणत्या खोलीसाठी वापरणार आहे, याचा विचार करूनच करावी. त्याचबरोबर भिंतींचा रंग, खोलीतील फर्निचर यानुसार डिझाइनचा रंग निवडावा. स्टेन्सिलचा वापर करून एका विशिष्ट प्रकारच्या वातावरणाची निर्मिती करता येते. त्यामुळे रंगसंगतीचं अचूक ज्ञान असणं यामध्ये आवश्यक ठरतं.

भिंतींवर स्टेन्सिल्सच्या सहाय्याने डिझाइन काढताना आजूबाजूच्या आणि भिंतीवरील सर्व वस्तू काढून टाकाव्यात. पेंटर वापरतात त्या टेपच्या सहाय्याने नेमक्या कोणत्या जागेवर डिझाइन करायचं, हे ठरवता येईल. नंतर रंगांची निवड करून स्टेन्सिलचं कार्ड घ्यावं. चाकूसारख्या तीक्ष्ण वस्तूने किंवा कटरने कार्डमधून स्टेन्सिल्स वेगळी करावी. नंतर ती भिंतीवर धरून स्पंज किंवा स्टेन्सिल्स ब्रशच्या सहाय्याने रंगकाम सुरू करावं. यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर करता येतो. उदा. आर्टिस्टिक पेंट, ऑइल पेंट, हाउसहोल्ड लॅटेक्स पेंट.. इत्यादी. तुमच्या बजेटमध्ये जे बसेल त्याची निवड करा आणि पेंटिंगला सुरुवात करा. यासाठी तुमची कलात्मकता आणि निर्मितीक्षमता भरभरून वापरता येईल. रंग देताना नेमक्या आकारातच देण्याची काळजी घ्यावी. त्याबाहेर रंग जाऊ देऊ नये. एकाच भिंतीवर खूप जास्त रंगांचा वापर करू नये. यासाठी मिक्स अ‍ॅण्ड मॅचची थीम छान दिसते. स्टेन्सिल्समध्ये झाडाची फांदी आणि पक्षी, नाजूक फुलांचा सडा, एखादी नाजूक स्त्री प्रतिमा अशी कितीतरी डिझाइन्स उपलब्ध आहेत. भिंतींचा रंग बदलणार नसाल तर आहे, त्या रंगाला मॅच होणारा रंग निवडून स्टेन्सिलच्या सहाय्याने चित्र काढता येईल. स्वयंपाकघरासाठी वेगवेगळ्या भाज्या, फळे असे डिझाइन निवडता येईल. स्टेन्सिल्स भिंतीवर चिकटवण्यासाठी चांगल्या अ‍ॅडेसिव्हचा वापर करावा. तसेच स्टेन्सिल्सवर प्रोटेक्टिव्ह कोट लावावा. त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं.

प्लेन रंगाने चार भिंती रंगवण्याचे दिवस आता संपले. त्याचबरोबर एक भिंत गडद करण्याचा ट्रेण्डही चलतीत असला तरी त्यात नावीन्य नाही. मग इंटिरिअर करताना नवं काय करायचं हा प्रश्न पडतो. अशा वेळी आपल्यातील कल्पकता, आधुनिकता यांचा सुरेख संगम साधून स्टेन्सिल्सच्या मदतीने घराच्या भिंतींना एक आर्टिस्टिक लूक देऊन सजवता येईल. त्यामुळे घरात येणा-या प्रत्येकाचं लक्ष चटकन त्याकडे वेधलं जाईल.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

पुदिना कोथिंबीर पराठा, अडाई, रक्तानुबंध, बार्ली-मूग सुप


पुदिना कोथिंबीर पराठा


आता पाऊस सुरू झाला आहे. या मोसमात चटपटीत खाण्यापासून आपण स्वत:ला रोखू शकत नाही. मात्र अशा खाण्याने पोट बिघडण्याची शक्यता हमखास. पुदिना- कोथिंबीर मुळातच पचनासाठी उत्तम. त्यामुळे खमंगतेबरोबरच पौष्टिकता अनुभवायची असेल तर हा पुदिना-कोथिंबीर पराठा नक्की करून पाहा.
साहित्य :  दोन कप गव्हाचे पीठ, पाव कप पुदिना पाने (बारीक चिरून), पाव कप कोथिंबीर (बारीक चिरून), दोन मिरच्या- एकदम बारीक चिरून, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, अर्धा कप दही, एक चमचा चाट मसाला, एक चमचा गरम मसाला, चवीपुरते मीठ, तीन चमचे तेल आणि पराठे भाजण्यासाठी तेल..
कृती :  एक परातीत गव्हाचे पीठ, पुदिना, कोथिंबीर, मिरची, जिरे, ओवा, दोन चमचे तेल आणि चवीपुरते मीठ घालून एकत्रित करावे. दही घालून छान मळून घ्यावे. त्याचा गुळगुळीत गोळा बनवून त्याला बाहेरून तेलाचा हात लावावा म्हणजे पीठ सुकणार नाही. आणि साधारण अर्धा तास हा गोळा झाकून ठेवावा.
दोन. मळलेल्या पिठाचे साधारण सहा गोळे करून घ्यावे.
पातळ पोळी लाटून त्यावर थोडे तेल लावावे. त्यावर थोडा चाट मसाला आणि गरम मसाला भुरभुरावा. हातातील उघडझाप करणा-या पंख्यासारख्या घडय़ा घालाव्यात. सर्व पदर वर दिसतील अशा प्रकारे धरावे. नंतर एक टोक हातात धरून दुसरे टोक पहिल्या टोकाभोवती फिरवावे. आणि घट्ट रोल करावा. सर्व पदर वर दिसले पाहिजेत.
थोडे पीठ भुरभुरवून परत लाटावे. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकावे. भाजताना थोडे तेलही घालावे. पराठा तयार झाला की दोन्ही हातात धरून अगदी अलगद चुरगळावा म्हणजे सर्व पदर व्यवस्थित सुटतील. मात्र जोरात चुरगळू नये. अशा पद्धतीने मध्यम आकाराचे पराठे बनवावेत. गरमागरम पराठे दही किंवा लोण्याबरोबर सादर करावेत.
टीप : पुदिना कोथिंबीर पराठा डाएट पराठा करण्यासाठी तेल न घालता पराठा बनवावा. फक्त हा पराठा किंचित कोरडा होतो.

Read More »

पाऊस पायावर झेलताना..

उन्हाळा आणि हिवाळ्यात जशी चेहरा, त्वचेची काळजी महत्त्वाची तशी पावसाळ्यात पायांची. सतत पावसात भिजून तसंच ओल्या चप्पल, सॅण्डल, शूज पायात राहिल्याने जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते. पायांच्या नखांना सूज येणे, पायाला खाज येणं, पायाच्या तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये भेगा पडणं अशा समस्या उद्भवतात. हे त्रास टाळण्यासाठी योग्य ती काळजी आता सुरुवातीलाच घेऊयात.. शेवटी सौंदर्याच्या परिभाषते 'कोमल' पायांनाही तितकंच महत्त्व आहे..
पावसातून भिजून आल्यास पाय स्वच्छ अ‍ॅण्टिसेप्टीक लिक्विडने धुऊन घ्या आणि लगेच पायाचे तळवे, बोटांच्या मधली जागा स्वच्छ पुसून कोरडी करा.
सहा पायांच्या बोटांमध्ये अगदी छोटीशी जरी भेग पडली असेल तर पाय धुऊन कोरडे करून लगेच अ‍ॅण्टिसेप्टीक पावडर किंवा क्रीम लावा. त्यामुळे पुढे मोठा त्रास होणार नाही.
पावसाळ्यात पायाचे तळवे मऊ ठेवण्यासाठी जर तुम्ही मॉइश्चरायझर क्रीम लावून बाहेर निघत असाल, तर तसं करणं आवर्जून टाळा.
'फूट स्पा', विशेषत: 'फिश पेडिक्युअर' पावसाळ्यात करू नये, कारण ते करताना जास्त वेळ तुमचे पाय पाण्याच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्वचा नरमते. आणि अशा कोमल त्वचेला इजा होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर पेडिक्युअर करताना वापरण्यात आलेलं साहित्य र्निजतुक केलेलं आहे का, हाही मुद्दा महत्त्वाचा ठरतो. त्याची पडताळणी करून मगच पेडिक्युअर करावे.

घरच्याघरीही पायांची योग्य काळजी घेता येऊ शकते. लिंबाची साल घेऊन ती नखांवर चोळावी किंवा टबभर गरम पाण्यात सोडा किंवा एक चमचा मीठ टाकून पंधरा-वीस मिनिटे पाय बुडवून ठेवावेत आणि मग वापरात नसलेल्या टुथब्रशने पायांची नखं, तळवे साफ करावेत. यामुळे पायांवरचे जंतूही निघून जातात आणि नख-पेरांमध्ये साचलेला मळसुद्धा..

पायांची नखं कापलेलीच असू द्या, जेणेकरून आतमध्ये माती साचणार नाही.
बंद शुज वापरणं टाळा, त्यात पाणी साचून राहते. सॉक्स वापरणेही पावसाळ्यात टाळा. पावसातून भिजून आल्यानंतर चप्पल, सॅण्डल धुवायला विसरू नका.
नवीन चपला विकत घेत असाल तर, प्लॅस्टिक किंवा रबरापासून बनवलेल्या घ्या. पावसात त्या लवकर सुकतात आणि जास्त वेळ ओल्या राहत नाहीत.
शक्य असल्यास पावसाळ्यात झोपण्यापूर्वी ऑलिव्ह किंवा बदाम तेल लावून झोपावं.

Read More »

काल्पनिक बद्धकोष्ठता


अनेकदा पोट दुखून येतं, भरल्यासारखं वाटतं.. तेव्हा बद्धकोष्ठता आहे असं आपल्याला वाटतं. अनेकदा ही बद्धकोष्ठता काल्पनिक असते. मग त्यावर आपण जुलाबासाठीची जहाल औषधं घेतो. पण त्याने परिणाम उलटेच होतात. या त्रासाचं मूळ कारण काही वेगळंच असतं..
''विनय, तुम्ही तुमच्यासोबत आणलेल्या सगळ्या फाइल्स, रिपोर्ट्स आणि वेगवेगळ्या अनेक डॉक्टरांनी सुचविलेल्या औषधांकडे बघता मला असं वाटतं की, तुम्हाला निव्वळ बद्धकोष्ठता आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे, मी नाडीसुद्धा तपासून पाहिली. या सर्वाचा निष्कर्ष एकच आहे की, तुमचं पोट खराब आहे आणि या सर्वाचं कारण बद्धकोष्ठता हे आहे. आजतागायत तुम्ही केलेल्या चिकित्सेने (औषधोपचाराने) काही फायदा झाला नसल्यामुळे आज तुम्ही माझ्याकडे आले आहात.
पण तुम्ही तुम्हाला होणा-या त्रासाची नेमकी लक्षणं सांगितलीत तर मी काय मार्गदर्शन करावं, हे ठरू शकेल'', वैद्यराजांनी सूचना केली.
त्यावर विनय उत्तरला, ''वैद्यराज, मला वाटतं की आपण नाडीवरच बरंच काही सांगू शकता. आम्हाला बोलायचीसुद्धा गरज नाही. मला आयुर्वेदावर खूपच विश्वास आहे. आतापर्यंत मी पाच-सहा वैद्यांची भेट घेतली.
अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनाही भेटून आलो. तुम्ही बद्धकोष्ठता म्हणत असाल तरी मला एकदम भरल्यासारखं, चोक-अप झाल्यासारखं होत नाही. दिवसातून दोन वेळा तरी शौचास जावं लागतं. गेली सात-आठ वर्षे मला हा त्रास आहे. पोट गच्च वाटतं. वरच्यावर शौचाला जाऊन यावंसं वाटतं. कुठे तरी मी वाचलंय की, सकाळी शौचास जाऊन आल्यावर पोट रिकामं होतं आणि हलकं वाटतं. जर पोट गच्च वाटत असेल तर त्याला 'बद्धकोष्ठता' म्हणतात. मला शौचास गेल्यावर असं वाटतं की, पोट साफ होईल. प्रेशरसुद्धा येतं, पण थांबतं.
बेंबीच्या खाली दोन बाजूस मळ साठून आहे, असं वाटत असतं. तिथे जाडपणा वाटतो आणि क्वचित दुखतंसुद्धा. गेल्या सात-आठ वर्षात अनेक वैद्यांच्या सल्ल्यानुसार, हरडा, त्रिफळा, इसबगोल यांसारखी औषधंही घेऊन पाहिली. अशा प्रकारे जुलाबाच्या औषधांमुळे शौचाला पातळ होते, ब-याचदा पाणी पण निघतं. मी अगदी थकून जातो. पण जुना साठलेला मळ निघत नाही. जुलाबासाठी स्ट्राँग औषध-एनिमासुद्धा घेऊन पाहिलं, पण पाहिजे तसा फायदा होत नाही.''
आता विनयच्या प्रोफेशनवर एक प्रकाशझोत टाकूयात. तो एक प्रोफेशनल चार्टर्ड अकाउंटंट आहे. प्रॅक्टिस उत्तमपणे सुरू आहे. खूपच व्यस्त असतो, तो आपल्या कामात. जेवणाची वेळ ठरलेली नाही. दुपारी दोन-तीन च्या मध्ये आणि रात्री ९.३०-१० च्या मध्ये जेवतो. झोपायला मात्र दररोज १२-१ वाजतात. सकाळी उशिरा उठतो आणि कुठलाही व्यायाम करत नाही. याचं कारण, त्याला वेळ मिळत नाही हे आहे. खाण्यापिण्याचा मात्र तो प्रचंड शौकीन आहे. यापूर्वी अनेक वैद्यांनी बरीच पथ्ये त्याला सुचवली. पण, 'शक्य असेल तेवढीच पथ्य मी पाळीन' हा त्याचा खाक्या. आणि आता त्याच्या या अटीवर मी त्याला औषधयोजना सुचवायची आहे खरी.
पण खरं सांगायचं तर ह्या पेशंटच्या तपासणीमध्ये कुठेही, कसल्याच प्रकारचा अडथळा, जुनाट मळ, ग्रंथी आहे.. असं वाटत नव्हतं. 'कोलोनोस्कोपी' केल्याने आतडयामध्ये जुनाट मळ, ग्रंथी स्वरूपाने अडथळा, गॅस दिसून येतो, त्यातलाही कुठला प्रकार इथे नव्हता. याव्यतिरिक्त इतर रिपोर्ट्ससुद्धा नॉर्मल आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून कधी स्वेच्छेने तर कधी वैद्यांना विचारून वरच्यावर जुलाबाचे औषध घेत राहिल्यामुळे आतडय़ांवर जुलाब घेण्याची सवय लागली. अतिप्रमाणात काम, शारीरिक ताण आणि मानसिक ताणतणावामुळेही हे घडत असतं.या सगळ्याचं मूळ शेवटी आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आहे.
त्यासाठी जीवनशैली बदलणं, ती समतोल करणं हिताचं आहे. या समतोलपणात जेवणाच्या वेळेत बदल आणणं, व्यायाम करणं तसंच योगाभ्यास करणं गरजेचं आहे. मन शांत ठेवणं आवश्यक आहे. हळूहळू जुलाब घेण्याची सवयी मोडून योग्य आहाराकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, हे विशेष महत्त्वाचे! 


Read More »

मधुमेह आणि आयुर्वेद


आहारा-विहारामधील बेशिस्त, अनियमितता या गोष्टी ब-याच रोगांना आमंत्रण ठरतात, हे मधुमेहासारख्या व्याधींकडे पाहून लक्षात येतं. मधुमेहावर आयुर्वेदाने चिकित्सा सांगितलेली आहे. विविध नसर्गिक घटकांचा उपयोग करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास आयुर्वेदशास्त्र सांगते. केवळ रक्तातील साखर कमी करणे हा या चिकित्सेचा उद्देश नाही, तर त्याचबरोबर शरीराच्या झिजत चाललेल्या धातुघटकांची झीज थांबवून त्यांचे सारत्व वाढवणे हादेखील चिकित्सेचा उद्देश आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मधुमेहाचं प्रमाण वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये मधुमेहाचा रुग्ण प्रत्येक पॅथीमधील उपचार करून घेण्याच्या मागे लागतो. आयुर्वेदात काही औषध आहे का, असं विचारत अनेक मधुमेही वैद्यांकडे येतात, ते भलीमोठी तपासण्यांची जंत्री घेऊनच.
अमुक महिन्यांपूर्वी रक्तातील साखर एवढी होती, आता एवढी आहे, त्याचप्रमाणे लघवीवाटे या प्रमाणात साखर जाते आहे, वगरे.. मग आयुर्वेदाची भूमिका नेमकी काय? मधुमेहासंदर्भात अर्थातच आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये इतर रोगांप्रमाणेच सविस्तर वर्णन सापडतं. त्याची कारणं, लक्षणं तसंच चिकित्सेबद्दल केलेलं मार्गदर्शन यांचा थोडक्यात आढावा घेणं गरजेचं आहे.
मुळात 'मधुमेह' हा रोग मूत्राशी संबंधित आहे, असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. मूत्राला या रोगामध्ये माधुर्य येतं आणि मूत्रप्रवृत्ती अनेक वेळा व मोठय़ा प्रमाणात होते. प्रमेह या रोगात मूत्राच्या स्वरूपात बदल होतो. मूत्रप्रवृत्ती जी स्वच्छ हवी, ती होत नाही.
निरनिराळ्या स्वरूपात ती होते आणि त्या स्वरूपानुसार प्रमेहाचे एकूण २० (वीस) प्रकार आयुर्वेदाने वर्णन केले आहेत. या प्रकारामध्ये वात, पित्त आणि कफ या तीन दोषांनुसार प्रकार आहेत. यामध्ये कफदोषामुळे होणारे दहा प्रकार, पित्तदोषामुळे होणारे सहा प्रकार आणि वातदोषामुळे होणारे चार प्रकार आहेत.
'मधुमेह' हा प्रकार वातदोषामुळे होणा-या प्रमेहाच्या चार प्रकारांपैकी एक आहे.
प्रमेहाची कारणे :
प्रमेह या रोगाची कारणं आयुर्वेद ग्रंथांमध्ये वर्णन केली आहेत. मधुमेहाला तीच लागू होतात. ही कारणे खालीलप्रमाणे -
१) खूप वेळ आराम करणं, झोप घेणं.  २)  अधिक खाण्याची सवय असणं.  ३)  दह्यासारखे स्रव वाढवणारे पदार्थ अधिक प्रमाणात खाणं.  ४)  थंड प्रदेशात राहणा-या प्राण्यांचे मांस खाणं. ५)  गुळापासून बनवलेले विविध पदार्थ जास्त प्रमाणात खाणं. ६)  अतिथंड, अतिस्निग्ध असे पदार्थ खाणं. तसंच त्यांचं प्रमाणही जास्त असणं. ७)  कफदोष वाढवणा-या इतरही पदार्थाचं अतिरिक्त सेवन करणं. ही प्रमेहाची सांगितलेली कारणं आहेत.
आज जर मधुमेही रोग्यांची नीट विचारपूस केली तर वर सांगितलेल्या कारणांपैकी काहीतरी कारण त्या रोग्यांमध्ये दिसून येतं. तेव्हा आहार-विहारामधील
बेशिस्त, अनियमितता या गोष्टी ब-याच रोगांना आमंत्रण ठरतात, हे पुन्हा एकदा या निमित्ताने लक्षात घ्यायला हवं.
प्रमेह कसा होतो?
वर सांगितलेली कारणं घडल्यामुळे शरीरामध्ये 'विकृत' कफदोष निर्माण होतो. त्याला आयुर्वेदाने 'क्लेद' अशी संज्ञा दिली आहे. या क्लेदामुळे शरीरामध्ये जडत्व येतं. कोणत्याही कामामध्ये उत्साह वाटेनासा होतो. हा क्लेद मूत्रवहनसंस्थेमध्ये जाऊन त्या ठिकाणी विकृती निर्माण करतो आणि विविध प्रकारचे मेह उत्पन्न होतात. त्यापैकी एक 'मधुमेह' होय. मधुमेही व्यक्तींमध्ये क्लेद वाढल्याने हळूहळू धातू शिथिल व्हायला लागतात. मूत्राला माधुर्य येतं. पुढे पुढे तर शरीरातील सातही धातूंचे 'ओज' शरीराबाहेर जाऊ लागते आणि म्हणूनच मधुमेही व्यक्ती चिडचिड करताना आढळतात.
काहींमध्ये एखाद्या विषयीची भीती निर्माण होते. ही लक्षणं 'ओज' कमी झाल्याने होतात. या रोगात एकूणच शरीराचं 'माधुर्य' वाढतं. ब-याच रोग्यांमध्ये तळपाय, तळहाताची आग होते. काही मधुमेहींच्या हाता-पायाला मुंग्या येतात, ते बधिर होतात. मधुमेही व्यक्तींमध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती आढळतात. काही व्यक्ती स्थूल मधुमेही असतात. त्यांच्यामध्ये धातूंची विकृत स्वरूपात वृद्धी आणि शैथिल्य आढळतं. दुस-या प्रकारच्या मधुमेही व्यक्ती कृश (बारीक) असतात. या व्यक्तींमध्ये वातदोषाच्या अधिक्यामुळे धातू क्षीण होत जातात.
मधुमेही व्यक्तींमध्ये दिसणा-या लक्षणांमध्ये वारंवार मूत्रप्रवृत्तीला जाणं, अधिक तहान लागणं, अधिक भूक लागणं, घाम अधिक येणं आदींचा समावेश होतो. मधुमेहाचं निदान करताना साखरेचं रक्तातील व मूत्रातील प्रमाण पाहत असताना या इतरही लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
मधुमेहावर आयुर्वेदाने चिकित्सा सांगितलेली आहे. विविध नसर्गिक घटकांचा उपयोग करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास आयुर्वेदशास्त्र सांगतं. केवळ रक्तातील साखर कमी करणं, हा या चिकित्सेचा उद्देश नाही, तर त्याचबरोबर शरीराच्या झिजत चाललेल्या धातुघटकांची झीज थांबवून त्यांचं सारत्व वाढवणं हादेखील चिकित्सेचा उद्देश आहे.
आवळा आणि हळद ही दोन औषधं मधुमेहात श्रेष्ठ ठरतात, असं 'वानग्भट' या ग्रंथकाराने म्हटलं आहे. एकूणच प्रमेहाच्या सर्व प्रकारांवर या औषधांचा चांगला परिणाम होतो. या दोन औषधांचं चूर्ण प्रकृतीनुसार वैद्यकीय सल्ल्याने योग्य प्रमाणात घेतल्यास फायदा होतो. शिलाजीताचाही मधुमेहात काही प्रमाणात उपयोग होतो.
मधुमेहामध्ये प्रामुख्याने कडू चवीच्या वनस्पतींचा उपयोग केला जातो. शरीरातील माधुर्य यामुळे काही प्रमाणात कमी होतं. यामध्ये गुळवेल, गुड्मार, काडेचिराईत, मेथी-बीज, जांभूळ-बीज आदी अनेक द्रव्यांचा समावेश होतो. मात्र त्या व्यक्तीस कोणतं द्रव्य चिकित्सेसाठी वापरायचं, हे मात्र त्या व्यक्तीची तपासणी करून ठरवावं लागतं. केवळ ही सर्व द्रव्यं एकत्र करून ती कुणाही मधुमेही व्यक्तीने वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणं हिताचं नाही. याखेरीज खैर व सुपारी यांचा काढा मधुमेहींना प्रशस्त सांगितलेला आहे. प्रमेह गजकेसरी नावाचं एक औषधही मधुमेहासाठी सांगितलेलं आहे.
या औषधांबरोबरच गोड पदार्थाच्या खाण्यावर आपलं संपूर्ण नियंत्रण असणं आवश्यक असतं. वैद्यकीय सल्लागाराने दिलेल्या सल्ल्यानुसार साखरेचे, गुळाचे पदार्थ, मिठाई आदी टाळणं हिताचं ठरतं. त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात व्यायाम करणं, फिरायला जाणं या गोष्टीही चिकित्सेला नक्कीच पूरक ठरतात.
मधुमेही रुग्णामध्ये 'थकवा' हे लक्षण खूप मोठय़ा प्रमाणावर आढळतं.
यासाठी अश्वगंधा, शतावरी आदी वनस्पतीजन्य औषधांचा उपयोग केल्यास थकवा कमी होतो. आवळा-चूर्ण आणि हळद यांचं मिश्रण करून रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ घेतल्यास त्यामुळे रात्री लघवीचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे तेलिया असणा ही वनस्पतीदेखील मधुमेहात चांगली उपयोगी पडते. गरम पाण्यामध्ये असण्याची भरड टाकून ते पाणी गाळून प्यायल्यास त्यानेही फायदा होतो. अर्थात यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.

Read More »

झुरक्याने होतो जीवनाला परका !

तंबाखूच्या सेवनामुळे होणारे कर्करोग, फुप्फुसाचे रोग सर्वश्रुत आहेत. मात्र या आजाराचे गांभीर्य दिवसांगणिक वाढत आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने धूम्रपानामुळे उद्भवणा-या कोरोनरी अर्थात हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांसबंधित विकाराविषयीची विस्तृततामांडणारा लेख..
तंबाखू किंवा तत्सम हानिकारक गोष्टींवर अधिक कर लादून त्या गोष्टींच्या किमतींमध्ये प्रशासनाने बरीच वाढ केली आहे. मात्र त्याचा फारसा उपयोग होत असल्याचे दिसून येत नाही, असंच म्हणावं लागेल. प्रसिद्धी माध्यमांमधून १८ वर्षाखालील मुलांनी धूम्रपान करू नये, असा संदेश वारंवार दाखवण्यात येतो. अनेक प्रकारचे नियम व अटी आहेच. परंतु तंबाखूमिश्रित पदार्थाचे सेवन करून अकाली मृत्युमुखी पडलेल्या भारतातील रुग्णांची संख्या लक्ष्य वेधून घेणारी आहे. दरवर्षी होणा-या ४,४०,००० मृत्यूंपैकी २.४ लाखांपेक्षा अधिक मृत्यू हे धूम्रपान केल्यामुळे होत आहेत. धूम्रपान करणा-या व्यक्तींच्या मृत्यूस बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. त्यात रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होणारे अडथळे, विविध प्रकारचे कर्करोग, ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (obstructive pulmonary disease) हा फुप्फुसांमध्ये होणारा एक चिवट रोग यांसारख्या आजारांचा समावेश आहे.
'अथरोस्लेरोसिस (रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे)' हा आजार म्हणजे धूम्रपानामुळे होणा-या सर्वाधिक मृत्यूंसाठी कारणीभूत ठरणारा आजार आहे. याविषयी केल्या गेलेल्या विविध अभ्यासांतून ही बाब स्पष्ट झाली आहे की, धूम्रपान हे कोरोनरी (हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांसबंधित) हृदयविकार होण्याचे प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे पुढे हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता बळावते. तंबाखूशी संबंधित आजार म्हणजे जागतिक स्तरावरील लोकांच्या आरोग्याशी निगडित गंभीर समस्या बनली आहे. या विषयीच्या सर्वेक्षणानुसार, जगभरात १.१ दशलक्ष व्यक्ती धूम्रपान करतात आणि धूम्रपान करत असलेल्या २५० लक्ष व्यक्ती भारतात राहतात.

हृदय आणि रक्तवाहिन्यांवर धूम्रपानाचा होणारा परिणाम:-

> तंबाखूमध्ये असलेल्या रसायनांमुळे रक्तपेशींना धोका पोहोचू शकतो. तसंच हृदयाचं कार्य, रक्तवाहिन्यांची रचना आणि त्यांच्या कार्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अर्थातच या विपरित परिणामांमुळे अथरोस्लेरोसिस हा आजार होण्याची शक्यता अधिक वाढते.
> अथरोस्लेरोसिस (Atherosclerosis) हा एक असा आजार आहे, ज्यामुळे रक्त वाहून नेणा-या धमन्यांमध्ये मेणासारखा चिकट पदार्थ जमतो. ज्यामुळे कालांतराने हा चिकट पदार्थ घट्ट होऊन धमन्यांचा मार्ग अरुंद करतो. याचा परिणाम ऑक्सिजनने परिपूर्ण असलेलं रक्त शरीराच्या इतर भागांपर्यंत वाहून नेण्याच्या प्रक्रियेवर होतो.
> कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये जर हा चिकट पदार्थ जमा झाला तर कोरोनरी हृदयविकार (Coronary Heart Disease- C.H.D) उद्भवतो. काही काळानंतर या सीएचडीमुळे छातीत दुखणं, हृदयविकाराचा झटका येणं, हृदय बंद पडणं, ऐरिथमियस किंवा मृत्यूपर्यंतचे प्रसंग ओढवू शकतात.
> त्यामुळे हृदय विकाराची समस्या उद्भवण्यामागे धूम्रपान हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर रक्तातील कोलेस्टरॉलची कमी-जास्त पातळी, उच्च रक्तदाब, वाढलेलं वजन आणि स्थूलपणा यांसारख्या समस्यादेखील तितक्याच कारणीभूत ठरू शकतात. धूम्रपानाची सवय असल्यास हृदयविकार होण्याची शक्यता अधिक वाढते.
> धूम्रपानामुळे पेरिफेरल आर्टेरियल डिसीझ (peripheral arterial disease- P.A.D.) हा आजार होण्याची शक्यताही अधिक वाढते. पी.ए.डी. या आजारामध्ये, डोके आणि इतर अवयवांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये चिकट पदार्थ जमा होतो. त्यामुळे पी.ए.डी हा आजार असलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकार, हृदयविकाराचा झटका येणं आणि स्ट्रोक यांची शक्यता अधिक असते.
> धूम्रपान कितीही कमी अधिक प्रमाणात केलं तरी त्याचे परिणाम विपरीतच होतात. काही व्यक्तींमध्ये विशेषत: गर्भनिरोधक औषधे घेणा-या महिला आणि मधुमेह असणा-यामध्ये या आजाराचं प्रमाण वाढत आहे.
> धूम्रपान करताना तोंडावाटे बाहेर फेकल्या जाणा-या धुरासही 'सेकंडहँड स्मोक' म्हणतात. 'सेकंडहँड स्मोक' हा धुराचा एक असा प्रकार आहे, जो सिगारेट, सिगार किंवा पाइपच्या जळत्या बाजूने येतो. 'सेकंडहँड स्मोक'मध्येही धूम्रपानातून शरीरात ओढल्या जाणाऱ्या अनेक रसायनांचा समावेश असतो. विशेष म्हणजे धूम्रपान करणा-या व्यक्तींना ज्याप्रमाणे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजाराचा धोका संभवतो, त्याचप्रमाणे धूम्रपान न करणा-या व्यक्तींना 'सेकंडहँड स्मोक'मुळे धोका उद्भवू शकतो. लहान मुलं, किशोर वयातील मुलांमध्ये भविष्यात 'सीएचडी' होण्याची शक्यताही 'सेकंडहँड स्मोक'मुळे वाढते आहे, कारण यामुळे:
> एचडीएल कोलेस्टरॉलचं प्रमाण (काहीवेळेस याला चांगलं कोलेस्टरॉल म्हटलं जातं) कमी होतं.
> रक्तदाब वाढतो.
> हृदयातील पेशींची हानी होते.
'सेकंडहँड स्मोक'मुळे उद्भवणारे धोके हे मुदतपूर्व जन्माला आलेल्या आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (आरडीएस) ही समस्या असणाऱ्या नवजात बालकांमध्ये अधिक आढळतात. तसंच दम्याची प्रकृती असणा-या मुलांनाही यामुळे अधिक त्रास होऊ शकतो.


टप्प्याटप्प्याने धूम्रपान सोडले तर ..
पहिला टप्पा - २० मिनिटांनंतरतुम्ही हवा दूषित होणे थांबवू शकाल. तुमचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके कमी होतील आणि हात आणि पायांचे तापमान वाढेल.
दुसरा टप्पा –  ८ तासांनंतरतुमच्या रक्तातील कार्बन मोनोक्सॉईडची पातळी सामान्य स्थितीस येऊन तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढेल.
तिसरा टप्पा - २४ तासांनंतरतुम्हाला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होईल.
चौथा टप्पा - ४८ तासांनंतरनव्‍‌र्ह एंडिंग्जना निकोटिनच्या अभावाची सवय होईल. तसेच चव आणि वास ओळखण्याची तुमची क्षमता पूर्वपदावर येईल.
पाचवा टप्पा – २ आठवडे किंवा ३ महिन्यानंतरशरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारून व्यायाम करण्याची क्षमता वाढेल. त्याचबरोबर खोकला, सायनस कंजेशन, थकवा आणि श्वासलागणे यांसारख्या समस्यांचे प्रमाण कमी होईल.
सहावा टप्पा - १ वर्षानंतरहृदय विकार उद्भवण्याचा धोका धूम्रपान न करणा-या व्यक्तीइतकाच निम्म्याने कमी होईल.
सातवा टप्पा - ५ ते १५ वर्षानंतरधूम्रपान ज्यांनी कधीही केलेले नाही त्यांच्याइतकाच तुम्हालासुद्धा स्ट्रोकचा त्रास होण्याची शक्यता कमी होईल.
आठवा टप्पा - १० वर्षानंतरफुप्फुसांच्या आजाराने मृत्यू येण्याचा धोका हा आयुष्यभर कधीही धूम्रपान न करणा-या व्यक्तीइतकाच कमी होईल. तोंड, स्वरयंत्र,अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रिपड आणि स्वादुपिंड यांसारख्या अन्य प्रकारच्या कर्करोगांची शक्यता कमी होते.

Read More »

तुम्हाला अकारण थकल्यासारखं वाटतंय?


व्यवस्थित खाणंपिणं आणि विश्रांती घेऊनही तुम्हाला दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवते का? अनेकांना ही समस्या भेडसावत असते. या समस्येची कारणं तुमच्या दिनचर्येतच आहेत. जेवणाच्या चुकीच्या वेळा, चुकीची पद्धती आणि व्यायामाचा अभाव या कारणांवर उपाययोजना करायला हव्यात.
''वैशाली आता उठशील का? आठ वाजून गेलेत. खूप उशीर झालाय. तुझे सासरे आणि नवरा दोघेही थोडयाच वेळात ऑफिसला जायला निघतील. सकाळी जेवणात काय बनवायचं हे मला सांगितलंस तर कुकर लावते. तयार होऊन किचनमध्ये ये. तुझी तब्येत तर ठीक आहे ना?''
''अरे बापरे! आठ वाजले? मला तर कळलंच नाही. लवकर लवकर बाबांसाठी ब्रेकफास्ट तयार करते. जेवणाचं नंतर बघू. हल्ली मी खूप थकते हो आई! झोपून झाल्यावरसुद्धा शरीरात स्फूर्ती वाटत नाही. अंग जड वाटतंय, जणू अनेक वर्षापासून थकलंय. सुगंधा उठली का? सध्या शाळेला सुट्टया आहेत त्यामुळे सकाळची धावपळ करावी लागणार नाही, अन्यथा आता काहीही करावसं वाटत नाहीए.''
''मला समजतं गं! लग्न होऊन या घरात आल्यापासून तू धावपळ करतेयस! पण गेल्या एक-दीड वर्षापासून मी पहातेय, पूर्वीसारखी तुझ्या अंगात स्फूर्ती नाही. पण तुझ्या बाबतीत सांगायचं तर तुझं वय कमी आहे. शारीरिक श्रम फारसे करावे लागत नाहीत. घरातली धुणे-झाडू-फरशी-भांडी या कामांसाठी मदतीला बाई आहे. सुगंधा तर स्कूल बसने जाते. घरात आपण अवघी चार माणसं आहोत. तुला आलेला थकव्याचे कारण जीवनशैली किंवा चुकीची आहारयोजना असू शकते.''
''खरं आहे आई, हल्ली मी खाण्यापिण्याच्या बाबतीत खूपच अनियमित झाले आहे. हल्ली मी चीज, आइस्क्रीम, तसंच तळलेले आणि पचायला जड पदार्थ खात असते. गेल्या दोन वर्षात माझं वजन १० किलोंनी वाढलं आहे. तुमच्यासारखं नियमित फिरायला जाणं, व्यायाम करणं हे सर्व मला जमत नाही. आम्ही रोज बाराच्या आधी झोपतही नाही आणि सकाळी सातच्या ठोक्यापर्यंत उठणंही होत नाही. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून तुमच्यासारखे व्यायामसुद्धा करायचे आहेत. दुपारी झोपणं थांबवायचं आहे.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला कुठलाही आजार नाही, तरी मला हातापायाचे मांसपेशी दुखत राहतात. गुडघे दुखतात. सतत डोकं दुखत असतं. पोट जड वाटतं. तुम्ही याला आम्लामुळे 'अपक्व अवरस' होणारे लक्षण आहे. काम केल्याने थकवा येणं स्वाभाविक आहे. काम न केल्याने सुद्धा जेव्हा थकवा येतो, तेव्हा काय करावं?''
''आम्ही साठीला आलो. आमच्याशी तुमची तुलना होणार नाही. पण आमचंही जागरण होतं. झोप पूर्ण होत नाही. थकवा येतो. आमच्याने जास्त श्रम होत नाही. थोडे श्रम केल्यावर थकवा येणं, हे नैसर्गिक आहे. या वयात शरीराची बरीच झीज झालेली असते. आणि अन्य धातूंचे पोषणही होत नाही त्यामुळे थकवा वाढतो. पण मी नियमित मॉर्निग वॉक करते. थोडेच पण नियमित व्यायाम करते. तसंच आठवडय़ातून दोन-तीन वेळा शरीराचे मालिश करून घेते. वेळेत जेवते आणि खारीक, खजूर, अंजीर आणि बदाम नियमित खाते. यामुळे माझे स्वास्थ्य चांगलं राहतं. फारसा थकवा येत नाही.

तुम्ही तरुणांनीही या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. त्यात विशेष असं काही नाही. व्यवस्थित योग्य वेळी झोपणं, योग्य आहार, थोडेफार व्यायाम करणं आवश्यक आहे. तुला अ‍ॅनेमिक डिप्रेशन, इन्फेक्शन किंवा इतर कुठलेही रोग नाहीत. मासिक पाळीचा त्रास नाही. (ह्या रोगांमुळे सुस्ती येणे, थकवा येणे स्वाभाविक आहे.)

तुम्ही रात्री उशिरा जेवण घेता ते योग्य नाही. जेवण साधारण सायंकाळी आठ च्या आतच घ्यायला हवं. आणि हो, टीव्ही बघत जेवणाची जी पद्धत आहे त्यामुळे खूप नुकसान होतं. ती आधी बंद करा. त्याऐवजी थोडं खाली फिरून आलात तर शरीराला व्यायाम मिळेल. आणि त्याशिवाय ध्यान आणि प्राणायाम करणं शक्य झालं तर सुदृढ आयुष्य जगता येईल.''

Read More »

बार्ली-मूग सुप

नेहमीचे तेच तेच पदार्थ खाउन घरी कंटाळा येतो म्हणुन काही तरी दुसरे खाऊ  म्हणुन बार्ली मूग सुपची चव घेऊ. 
साहित्य : ३/४ वाटी मोड आलेले मूग, ३-४ तास पाण्यात भिजवून ठेवलेली बार्ली १/२ वाटी, दोन टोमॅटो, दोन गाजर, एक कांदा, थोडीशी पानकोबी, २/३ ठेचून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या, किसून घेतलेले आले, ५-६ कढीपत्त्याची पाने, १ चक्री-फूल, दीड चमचा मालवणी मसाला (सांबार किंवा पावभाजी मसाला चालेल), लिंबाचा रस आणि मीठ चवीप्रमाणे, १ टेबलस्पून तेल, १/२ चमचा जिरे
कृती : मोड आलेले मूग आणि बार्ली एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. दोन वेगवेगळ्या पातेल्यात थोडं पाणी घालून या दोन्ही गोष्टी प्रेशर कुकरमध्ये तीन शिटय़ा येईपर्यंत शिजवून घ्याव्यात. (दोन्ही गोष्टी एका भांडय़ात एकत्रच शिजवल्या तरी चालतील) नंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे आणि चक्री-फूल घालावे. त्यानंतर ठेचलेल्या लसूण पाकळ्या, आले, गाजर, टोमॅटो, कांदा इत्यादी घालून परतावे. वरून थोडे पाणी घालून गाजर मऊ होऊपर्यंत झाकण ठेवून शिजू द्यावे.
आता त्यात कढीपत्त्याची पाने, पानकोबी, शिमला मिरची घालावेत. वरून मालवणी मसाला आणि एक ग्लास पाणी घालावे. मिश्रण उकळले की, त्यात शिजवलेली मूग आणि बार्ली घालावी. मग पळीने किंवा पावभाजीच्या चपटया चमच्याने हे मिश्रण घोटून घ्यावे. आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर पंधरा मिनिटे शिजू द्यावे. अधून-मधून दोन-तीन वेळा मिश्रण ढवळावे.
आता चवीप्रमाणे यात लिंबू रस आणि मीठ घालावे. मिश्रण घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालावे आणि एक उकळी आणून गॅस बंद करावा. असे हे पोटभरीचे गरम सुप तयार आहे. त्यावर बटर किंवा क्रीम, कोथिंबीर घातली की हे खूप खाण्यासाठी एकदम तयार!
टीप : मुगाऐवजी चवळी, काबुली चणे, राजमा, मुगडाळ,
मसुरडाळ वापरली तरी चालेल. तेलाऐवजी बटर वापरल्यास स्वाद अजून चांगला येतो.

Read More »

रक्तानुबंध

आपल्या शरीरात रक्त गोठणं अथवा त्याची गुठळी बनणं आणि पुन्हा ती विरघळणं ही प्रक्रिया सहज रूपात सुरू असते. रक्ताची गुठळी निसर्गत: बनण्याच्या या वैशिष्टयामुळेच जखम झाल्यानंतर रक्त वाहणं आपोआप थांबतं. जखम बरी झाल्यानंतर या गुठळ्या विरघळूनदेखील जातात. परंतु ज्या वेळी या प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होते, तेव्हा रक्ताची गुठळी तशीच राहते. दीर्घकाळ यावर उपचार न झाल्यास ते गंभीर रोगाचे रूप धारण करू शकते. ब्लड क्लॉटिंग अर्थात रक्ताची गुठळी होणं म्हणजे काय? ते कसे होते, त्याची निर्मिती आणि त्यापासून बचाव कसा करता येऊ शकतो, याबाबत जाणून घेऊ.
 आपल्या शरीरात रक्तवाहिन्यांद्वारे रक्त वाहत असते. सतत वाहणारं हे रक्त हृदयापर्यंत जातं आणि पंपिंगद्वारे शुद्ध झाल्यानंतर शरीराच्या अन्य मुख्य अवयवांकडे आणि पेशींपर्यंत पोहोचतं. हेच रक्त पुन्हा धमण्यांद्वारे हृदयाकडे पुन्हा पाठवलं जातं. हृदयापर्यंत पाठविण्याच्या या प्रक्रियेत धमण्या आकुंचन पावतात, कारण शरीराच्या पेशी रक्त परत पाठवण्यासाठी ताकद लावतात. याच वाहत्या रक्तामध्ये कधी कधी 'क्लॉट' म्हणजेच गुठळी बनते. ही रक्ताची गुठळी आपोआपच बनते. सामान्य प्रक्रियेमध्ये ही गुठळी क्षतीग्रस्त नलिकांची दुरुस्ती करण्याचं कामदेखील करते.
असं झालं नाही तर, जखम झाल्यानंतर शरीरातील रक्ताचं वाहणं रोखणं अवघड होऊन बसेल. रक्तातील प्लाझ्मामध्ये प्लेटलेटस् आणि प्रोटिन्स असतात. जखम झालेल्या ठिकाणी ते रक्ताच्या गुठळ्या निर्माण करून रक्त वाहणं रोखतात. सामान्यत: जखम बरी झाल्यानंतर रक्ताची गुठळी आपोआप विरघळते. पण रक्ताची गुठळी न विरघळणं आणि दीर्घकाळापर्यंत तशीच राहणं आरोग्यासाठी धोकादायक असतं. त्यासाठी तपासणी आणि उपचाराची गरज असते. उपचार न करता दीर्घकाळ तसेच राहिल्यास रक्ताच्या गुठळ्या धमण्या अथवा नसांमध्ये जातात आणि शरीरातील कुठल्याही भागात म्हणजे डोळे, हृदय, मेंदू, फुप्फुसे, किडनी इत्यादी ठिकाणी जाऊन त्या अवयवांचं काम बाधित करतात.
डोळे : रक्ताच्या गुठळ्या शरीराच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. ही गुठळी रक्तप्रवाहाद्वारे डोळ्यामध्ये पोहोचू शकते. ही गुठळी आपल्याला दिसेल की नाही, हे ती डोळ्यांतील कुठल्या भागात आहे यावर अवलंबून असते. यामुळे डोळ्यांमध्ये वेदना आणि नजर अस्पष्ट होणं, ही लक्षणं दिसतात. अनेकदा या गुठळ्या आपोआपच बऱ्या होतात. पण तरीही याबाबत वेळीच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण बरेचदा यासाठी शस्त्रक्रियादेखील करावी लागते.
मेंदू : मेंदूमध्ये रक्ताची गुठळी असल्यास या गुठळीचा परिणाम जोपर्यंत शारीरिक क्रिया, हालचालींवर दिसत नाही तोपर्यंत त्याची चटकन माहिती होत नाही. या संकेतांमध्ये संभावित पक्षाघात, बोलणं आणि समजण्यास अडचण, चक्कर येणं इत्यादींचा समावेश होतो. अनेकदा उलटीदेखील येऊ लागते. परिस्थिती गंभीर असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.
हृदय किंवा फुप्फुसे :  ज्या वेळी फुप्फुसे किंवा हृदयामध्ये रक्ताची गुठळी बनते तेव्हा त्याची लक्षणं हृदयाचा झटका येण्यासारखीच असतात. छातीच्या भागात वेदना होतात. श्वास घ्यायला अडचण येऊ लागते आणि जबडा किंवा मानेमध्ये वेदनेचा अनुभव येऊ शकतो. पाठ आणि हातांमध्येदेखील वेदना होऊ शकतात. तसंच हृदयात गुठळी बनणं, हे हृदयाचा झटका येण्याचं कारण बनू शकतं.
पाय आणि हात :  जर रक्ताची गुठळी पाय किंवा हातामध्ये बनली तर ज्या ठिकाणी ती बनली आहे, त्याच्या खालच्या भागात आणि हाताच्या कुठल्याही भागात सूज येऊ शकते. पाय आणि हाताच्या गुठळ्यांच्या सामान्य लक्षणांमध्ये त्वचेवर लाली येणं, अधिक गरम होणं आणि अस्वस्थता इत्यादी लक्षणांचा समावेश होतो.
अस्पष्ट लक्षणं :  रक्ताच्या गुठळ्या झाल्यास अन्य प्रकारची एकत्रित लक्षणं निर्माण होऊ शकतात. यामध्ये गुडघे आणि मनगटावर कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे रेषा आणि लाल दाणे दिसतात. रक्तातील प्लेटलेट्सची संख्या अधिक प्रमाणात कमी होते. तेव्हा नाक आणि हिरडयातून रक्तस्रवदेखील होऊ शकतो. त्वचेमध्येदेखील रक्तस्रव होऊ शकतो. हा रक्तस्रव छोटयाछोटया लाल डागांच्या स्वरूपात दिसतो. या समस्येवर वेगवेगळ्या पद्धतीने इलाज केले जातात. गुठळीचे स्थान आणि रुग्णाचे आरोग्य यावर ते अवलंबून असते.
उपचार :  या समस्येसाठी अ‍ॅण्टीकोग्युलँट्स म्हणजे गुठळी बनण्यास रोखणारं औषध दिलं जातं. 'क्लॉट ब्लस्टर्स' म्हणजे रक्ताची गुठळी विरघळवणारं औषध दिलं जातं. 'कॅथेटर निर्देशित थ्रंबोलायसिस' ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कॅथेटर नावाची एक लांब नळी शस्त्रक्रियेद्वारे शरीरात टाकली जाते आणि रक्ताच्या गुठळीजवळ नेली जाते. त्याठिकाणी गुठळी विरघळवणारं औषध सोडलं जातं. साकळलेलं रक्त -हास पावण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. थ्रोंबक्टॉमी – शिरेतून किंवा धमनीतून साकळलेलं रक्त वा गुठळी काढणं, यांसारखे वेगवेगळे उपचार केले जातात.

Read More »

मयुराचे पोट का दुखत होते?

सध्या लग्न आणि पाटर्य़ाचा 'सीझन' जोरात सुरू आहे. पंगतीत वा बुफेमध्ये ताव मारून जेवणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच.. आणि त्यासोबतच उद्भवणारे पोटासंदर्भातील विविध आजार आणि दुखणी यांनाही आयत आमंत्रणच..! पण कधी कधी पोट दुखण्याची इतर अनेक कारणंही असू शकतात. या सगळ्यांवर उपाय मात्र एकच असू शकतो.
मयुराचं आता कसं आहे? तिला आता बरं वाटतयं का? रात्री उशिरा फोनवर बोलणं झाल्यावर लगेचच फोन ठेवून दिला. म्हटलं सकाळी उठल्यावर विचारू. मयुराचं पोटं आणि ओटीपोटही खूप दुखतं होतं. फुगलंही होतं. त्यामुळे तिला नीट बसताही येतं नव्हतं आणि झोपणं तर कठीणचं होतं. रात्री साधारण तीन वाजण्याच्या सुमारास दुखायला सुरुवात झाली. सुरुवातीला वाटलं की, पाळी येणारं असेल म्हणून दुखत असावं. एरवीही मासिक पाळीच्या वेळी खूपच त्रास होत असतो. पहिल्या दिवशी खूपच दुखत असल्यामुळे 'पेनकिलर'ची गोळी घ्यावीच लागते. तशीच तिची ती गोळीही घेऊन झाली होती. पण दीड तासांनंतरही दुखणं कमी न झाल्यामुळे काळजी वाटायला लागली.
गेल्या चार-पाच दिवसांपासून तिला थोडं 'युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन'ही झालं होतं. मयुराच्या आईने त्यांच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'पेनकिलर घेतलेली असल्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही. पोटदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते. पेनकिलरनेही दुखणं कमी झालं नाही तर सकाळी दाखवायला घेऊन या, वाटल्यास सोनोग्राफी करून पाहू या,' असं त्यांनी सांगितल्यावर मयुराच्या आई जरा निश्चिंत झाल्या. पण सकाळी दहाच्या सुमारास तिचं पोट जास्तच फुगलं, कडक झालं आणि मळमळायला लागलं.
तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्यावं असं त्यांना वाटायला लागलं. तितक्यात वैद्यबुवांची आठवण झाली. मी एकदा खाल्लेलं पचण्यासाठी औषध दिलं होतं. ते त्यांनी मयुराला दिलं. त्याने तिला बरं वाटलं.
अचानक असं का झालं? कशामुळे दुखत होतं. मी नेमकं काय औषध दिलं? मयुराच्या आईला प्रश्न मात्र पडले.
मी म्हणालो, तुम्ही काल संध्याकाळी लग्नाला गेला होतात. तिथे खाण्यामध्ये काही (अपथ्यकर) खाल्लं गेलं असेल? या उन्हाळ्यामध्ये मी कुठेही जेवयाला जात नाही आणि जावंच लागलं तर आमरस, बासुंदी किंवा कोणत्याही प्रकारची मिठाई तर अजिबात खात नाही.
मयुराच्या आई म्हणाल्या, 'तुम्ही म्हणता हे खरं आहे. पण आमच्या मयुराला गोड आवडत नाही. म्हणून तिच्या ताटात आमरस, बासुंदी किंवा मिठाई असे पदार्थ असूच शकत नाहीत. मला ठाऊक आहे की तिला भूक लागली नव्हती, म्हणून तिने खूपच कमी खाल्लं होतं. तरीही पोटदुखी, पोट फुगणं, उलटया झाल्यास प्रथम शंका जेवणातील पदार्थावरच येणं साहाजिकच आहे. अजीर्णपणामुळे, वाताने पोट फुगल्यामुळे, मासिक पाळीचा त्रास आदी कारणांमुळे उद्भवणा-या दुखण्यामुळे किंवा 'युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन'मुळे हे दुखणं आहे, असं आम्हाला वाटत होतं. परंतु त्याचं नक्की कारण ठरवता येतं नव्हतं.
फॅमिली डॉक्टरांनी दिलेली औषधसुद्धा घेऊन झाली. शेवटी वैद्यबुवा आठवले. तुम्हाला फोन केला.'
खरं तर फोनवर बोलून रोगाचं निदान होऊ नव्हतं. परंतु अपचन, युटीआय आणि मासिक पाळी या तिन्ही शक्यता विचारात घेऊन एक अतिशय सोपं पण तितकंच गुणकारी औषध सुचवलं. ते म्हणजे पुदिन्याचा अर्क. पुदिन्याचा अर्क या तिन्ही त्रासांवर उत्तम औषध आहे. पुदिन्याच्या अर्कासोबतच त्यामध्ये तुळस, ओवा आणि चित्रक (वनौषधी) यांचं एकत्रित मिश्रण वैद्यबुवांनी मयुराला द्यायला सांगितलं. त्यानंतर सुदैवाने तिला अध्र्या तासात खूप बर वाटलं आणि ती शांत झोपली.
पुदिना अन्न पचवतो. लघवीचं प्रमाण वाढवतो. तसंच ताप, चामडीचे विकार, खोकला, सुकलेला कफ पातळ होण्यासाठी तसंच वारंवार येणा-या उचक्या अशा विविध समस्यांवरही देता येतं.
पुदिन्याच्या चटणीचा रोजच्या आहारात समावेश केल्यास वात आणि कफ या संदर्भातील अनेक आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय होतो.
पण मला सांगताना अतिशय आनंद होतोय, की मयुराला आता यापुढे पोटासंबंधित दुखण्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या 'पेनकिलर्स' घ्याव्या लागणार नाहीत. पुदिन्यामुळे मयुराची पचनशक्तीही सुधारेल. तसंच लघवीच्या इन्फेक्शनच्या आणि पाळीच्या वेळी पोटदुखीच्या त्रासापासूनही हळूहळू सुटका होईल.

Read More »

अडाई

सुट्टीच्या काळात लहान मुलं खेळायला बाहेर निघतात.पण खेळण्या बरोबरच पोष्टीक आहारांची सुद्धा त्यांना गरज असते.
साहित्य : १ भाग हरभरा डाळ (चणा डाळ), १ भाग मूग डाळ (शक्यतो साल असलेली), १ भाग उडीद डाळ (साल असलेली), १ भाग तूरडाळ, १ भाग तांदूळ (ब्राउन राइस वापरल्यास उत्तम), चार लाल सुक्या मिरच्या, २ ते ३ लसूण पाकळय़ा, २ चमचे खोबरं (ओलं किंवा सुकं खोबरं. कोणतेही चालेल), डोसे काढण्यासाठी तेल आणि चवीपुरतं मीठ.
कृती : सर्व डाळी आणि तांदूळ नीट निवडून धुऊन पाण्यात कमीत कमी सहा ते सात तास भिजत ठेवावेत. त्यात लालमिरची आणि लसूण घालावी. त्यानंतर सहा ते सात तासांनंतर त्यातलं पाणी बाजूला काढून घ्यावं. भिजवलेली धान्यं मिक्सर किंवा फूड प्रोसेसरमधून बारीक करावीत. शक्यतो जितकं बारीक करता येईल तितकं करावं. त्यात गरज लागेल तसं धान्य भिजवलेलं पाणीच घालावं. शेवटी मीठ आणि खोबरं घालावं.
अडाईसाठीचं पीठ साधारण डोशाच्या पिठासारखंच पातळ असावं. गरम नॉनस्टिक तव्यावर नेहमीच्या डोशासारखे डोसे करावेत. अडाई नेहमीच्या डोशापेक्षा थोडे जाडसर असतात. चटणीबरोबर खायला द्यावेत.
टीप : अडाईचं पीठ आंबवलं नाही तर चालतं. पण पिठात किसलेल्या भाज्या घालणार असलात तर पीठ खूप जास्त दिवस ठेवू नये.
पौष्टिक मूल्य : या रेसिपीत जीवनसत्त्व 'अ' आणि 'ब'चं प्रमाण असतं. शिवाय या पदार्थातून प्रथिनं आणि कबरेदकंही आपल्या शरीरात जातात. अडाईमध्ये भाज्या घातल्या तर फायबरचं प्रमाण वाढेल. हा तमीळ पद्धतीचा डोसा लहान मुलांना आवडेल. खोबरं आणि हरभ-यांच्या चटणीबरोबर तो चविष्ट लागतो.

Read More »