Wednesday, June 12, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » घर-अंगण

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » घर-अंगण

गृहकर्ज घेताना..

अर्थसहाय्य आणि करबचतीमुळे नवीन घर खरेदी करताना ग्राहक घराची संपूर्ण किंमत देण्यास अनुत्सुक असतात. या मुख्य कारणामुळे पुष्कळ लोक नवीन घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतात. घरासाठी कर्ज घेताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात…

कर्जमागणी अर्ज कसा करावा, किती कर्ज मिळू शकतं, अन्य अटी आणि शर्ती, तसंच अस्थायी आणि स्थायी (फ्लोटिंग आणि फिक्स्ड) व्याजदर म्हणजे नेमकं काय, यातील कोणता व्याजदर स्वीकारावा. अशा प्रश्नांचं निरसन वेळीच होणं गरजेचं असतं. गृहकर्ज शक्यतो राष्ट्रीयीकृत बँक अथवा केवळ घरासाठी वित्तपुरवठा करणा-या एचडीएफसी, जीआयसी गृहफायनान्स, एलआयसी होम फायनान्स यांसारख्या वित्तीय संस्थांकडून घ्यावं. गृहकर्जासाठीचा कर्जमागणी अर्ज सर्व संस्थांचा साधारणपणे सारखाच असतो.

त्यामध्ये प्रामुख्याने पुढीलप्रमाणे माहिती आणि कागदपत्रं द्यावी लागतात : 

  • अर्जदाराची स्वत:ची माहिती उदा : नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो, पॅनकार्ड, सध्या राहत असलेल्या घराचा दाखला.
  • नोकरी/व्यवसाय याबाबतची माहिती.
  • वार्षिक उत्पन्न आणि त्याबाबतची पूरक कागदपत्रं (गेल्या ३ वर्षाचे फॉर्म १६, व्यावसायिक असल्यास मागील ३ वर्षाचे ताळेबंद) 
  • फ्लॅट खरेदीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर बिल्डरबरोबर झालेल्या कराराची प्रत आणि करार करतेवेळी बिल्डरला दिलेल्या रकमेची पावती द्यावी. जर आपण आपल्या प्लॉटवर घर बांधणार असाल, तर मंजूर प्लॅनची कॉपी, खर्चाबाबतचं कंत्राटदाराचं पत्र, प्रॉपर्टी निर्वेध असल्याचा वकिलाचा टायटल रिपोर्ट, कमेन्समेंट सर्टिफिकेट. 
  • अर्ज करताना अर्जदाराची अन्य काही र्कज असल्यास त्यांचा तपशील आणि नावं याविषयीची माहिती.
  • जर बँकेने जामीनदार मागितला असल्यास संबंधितांची वरील मुद्दा क्र. १, २, ३ आणि ५ नुसारची सर्व माहिती आणि कागदपत्रं.

आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ पट आणि घराच्या किमतीच्या ८० ते ८५ टक्के कमी असणा-या रकमेइतकं कर्ज मिळू शकतं. असं असलं तरी आपली सध्या असलेली र्कज आणि त्यापोटी होणारी दरमहा आपल्याकडून परतफेड विचारात घेऊन कर्ज रक्कम ठरवली जाते. जर व्यक्तीने आणखी काही कर्ज काढलं असल्यास काही कारणाने अनियमित अथवा थकीत असेल तर कर्ज नाकारलं जातं. याशिवाय कर्ज देणारी बँक कर्ज प्रस्ताव संमत करण्यापूर्वी 'सीबीएल' रिपोर्ट घेत असतात. यासाठी लागणारी फी अर्जदाराकडून वसूल केली जाते. या 'सीबीएल' अहवालाद्वारा अर्जदाराच्या पूर्वी घेतलेल्या कर्जाबाबत माहिती आणि परतफेडीबाबतचा अनुभव बँकेस मिळतो. हा अहवाल जर समाधानकारक नसल्यास तो बँकेकडून नाकारला जातो. सीबीएल रिपोर्ट घेणं आता बँकांना बंधनकारक आहे. हा सीबीएल अहवाल अर्जदार अर्ज करण्यापूर्वी स्वत:सुद्धा घेऊ शकतो. हा अहवाल ४७० रुपयांचा डीडी 'सीबीएल'कडे पाठवून किंवा ऑनलाइन पद्धतीने मिळवता येतो. पॉइंटच्या स्वरूपात दिला जातो. साधारणपणे ७००हून अधिक पॉइंट असल्यास अर्जदाराच्या कर्जप्रकरणाचा विचार केला जातो. पूर्वी कर्ज घेतलं नसल्यास 'नो हिस्टरी' असा अहवाल दिला जातो. तरी शक्यतो कर्जाचा अर्ज करण्यापूर्वी आपण आपला सीबीएल अहवाल घ्यावा. या अहवालाद्वारे आपल्याला आपल्या कर्जमंजुरीचा आधीच अंदाज येऊ शकतो. या अहवालामुळे पुढे होणारी निराशा आणि मनस्ताप टाळता येतो.

संयुक्त कर्जाचा पर्याय

पती-पत्नी दोघंही नोकरी अथवा व्यवसाय करत असतील, तर अशा वेळी संयुक्त (जॉइंट) नावावर कर्ज घेणं फायदेशीर ठरतं. एक तर यामध्ये दोघांचं उत्पन्न एकत्र करून त्यानुसार एकत्रित उत्पन्नाच्या ५ पट आणि घराच्या किमतीच्या ८० आणि ८५ टक्के दरम्यान कमी असणा-या रकमेचं कर्ज मिळू शकतं. शिवाय प्राप्तिकराच्या कलम ८०-सी नुसार मुद्दल परतफेड अािण कलम २४ नुसार १.५ लाखांपर्यंतच्या व्याजाचा फायदा दोघांनाही मिळतो. मात्र यासाठी 'ईएमआय' दोघांच्या संयुक्त खात्यातून किंवा दोघांची वेगळी खाती असतील तर त्यातून होणं अपेक्षित आहे.

गृहकर्जावर व्याज हे अस्थायी किंवा स्थायी (फ्लोटिंग अथवा फिक्स्ड) पद्धतीने आकारलं जातं. काही बँका याबाबत अर्जदारास पर्याय देऊ करतात. असं असलं तरी बहुतेक सर्व व्यापारी बँका फ्लोटिंग रेटच देऊ करतात. तर सहकारी बँका फिक्स्ड रेटने व्याजआकारणी करतात. काय आहे हा अस्थायी दर (फ्लोटिंग रेट)? फ्लोटिंग रेट हा संबंधित बँकेच्या बेस रेटशी निगडित असतो. तो बँकेनुसार कमी-अधिक असतो. सध्या बहुतेक सर्व बँकांचा मूलभूत व्याजदर १० ते ११ टक्क्यांच्या दरम्यान आहे. व्याजदर वाढल्याने कर्ज परतफेडीची मूळ मुदत वाढते. तर व्याजदर कमी झाल्याने मुदत कमी होते, परंतु जर वाढत्या दराने होणारी कर्जफेडीची मुदतवाढ टाळायची असेल, तर त्या प्रमाणात ईएमआय वाढवणं गरजेचं आहे. हे शक्य नसेल तर बोनस, पगारवाढीचा फरक यांसारखी एकमुठी मिळणारी रक्कम कर्ज खात्यात भरावी.

गृहकर्जाच्या अटी व शर्ती काय आहेत?

  • निवासी भारतीय किंवा 'एनआरआय' गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात. 
  • अर्जदाराचं वय २१ वर्षापेक्षा जास्त असावं. 
  • कर्जाची मुदत ५ ते २० र्वष इतकी असते, मात्र कर्ज परतफेड वयाच्या ६५च्या आत होणं आवश्यक आहे. 
  • जास्तीत जास्त २५ र्वष जुन्या घरास कर्ज दिलं जातं. अपवादात्मक स्थितीत जास्त जुन्या घरास कर्ज दिलं जातं. मात्र यासाठी बँकेच्या मान्यताप्राप्त इंजिनीअरकडून इमारतीच्या मजबुतीबाबत प्रमाणपत्र मिळणं आवश्यक असतं. 
  • कर्ज घेताना कर्ज रकमेइतका विमा उतरवणं आवश्यक असतं. 
  • कर्ज घेऊन घेण्यात येणारं घर बँकेत मॉग्रेज करून तारण म्हणून द्यावं लागतं. असे मॉग्रेज रजिस्टर अथवा इक्विटेबल पद्धतीने करता येते. व्यापारी बँका इक्विटेबल पद्धतीने तर सहकारी बँका रजिस्टर पद्धतीने मॉग्रेज करून घेतात. 
  • पाच वर्षानंतर गरज पडल्यास दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी झालेल्या परतफेडीच्या ९० टक्के इतकं नवीन कर्ज मिळू शकतं. 
  • याशिवाय घराची किंमत जर २५ लाखांच्या आत असेल आणि कर्जाची रक्कम १५ लाखांच्या आत असेल, असं कर्ज प्राधान्य क्षेत्रात येत असल्याने त्यावर एक टक्क्यांइतकी व्याजावर सबसिडी दिली जाते. मग ही रक्कम कर्ज खात्यात जमा केली जाते.

काही बँका होम सेव्हर पद्धतीने गृहकर्ज देऊ करतात. यामध्ये कर्जदाराचे बचतखाते (सेव्हिंग अकाउंट) कर्ज खात्याला लिंक केलं जातं. त्यामुळे बचत खात्यावरील शिल्लक बाकी गृहकर्जाच्या नावे बाकीतून वजा करून उर्वरित रकमेवर व्याज आकारणी केली जाते. यामुळे आपल्या खात्यातील शिल्लक रकमेमुळे व्याज वाचवता येतं. ही शिल्लक रक्कम हवी तेव्हा काढताही येते.

सध्या बहुतेक बँका गृहकर्जासाठी इन प्रिन्सिपल (तत्त्वत:) मंजुरी देतात. यामुळे इच्छुक व्यक्तीस आपल्याला किती कर्ज मिळू शकेल याचा अंदाज येऊन त्यानुसार घर शोधता येतं. असं इन प्रिन्सिपल (तत्त्वत:) मंजुरीपत्र सहा महिन्यांपर्यंत चालू शकतं.

अलीकडेच बँका रिव्हर्स मॉग्रेज पद्धतीचं कर्जही देऊ लागल्या आहेत. यामुळे आपण जरी उमेदीच्या काळात कर्जफेड करीत असलो, तरी हेच घर आपल्याला गरज पडल्यास उतार वयात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहून नियमित उत्पन्नाची तरतूदही करू शकतो.

गृहकर्जाचा निर्णय लवकरात लवकर घेऊन त्यांची वेळेवर परतफेड करणं फायद्याचं तर आहेच, शिवाय यामुळे आपल्या स्वत:च्या घरात राहण्याचं समाधानसुद्धा मिळतं.

गृहकर्जात लाइफ इन्शुरन्सचा सहभाग

गृहकर्ज सोयीस्कर असू शकतं. असं कर्ज घेताना सूक्ष्म िपट्र वाचा, असं नमूद केलेलं असतं. याचा अर्थ असा की, आपण दिलेल्या प्रिन्सिपल पेमेंटच्या एवढंच घर आपल्या मालकीचं असतं. बाकीचं उर्वरित गृहकर्ज किंवा अर्थसहाय्य कंपनीच्या मालकीचं असतं.

संपूर्ण प्रिन्सिपल पेमेंट देण्यास १० ते १५ र्वष किंवा २० वर्षसुद्धा लागू शकतील.

लाइफ इन्शुरन्स असणं आपल्याला मन:शांती प्रदान करतं. म्हणजे काही अनपेक्षित घडल्यास आपल्या कुटुंबाला सर्व आíथक पािठबा मिळतो. इथे लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचं उत्पन्न मदत करतं. लाइफ इन्शुरन्सच्या शिल्लक कर्जाची राशी फेडण्यास आणि आपल्या कुटुंबासाठी घर ठेवण्यात वापर होऊ शकतो.

कर्जराशीची काळजी घेणारी लाइफ इन्शुरन्स पॉलिसी कशी खरेदी करता येईल?

ब-याच वित्त कंपन्या किंवा गृहकर्ज देणा-या कंपन्या कर्ज घेणा-यांनी कर्जासाठी तारण प्रदान करावं, अशी अपेक्षा करतात. साधारणपणे तारण म्हणून प्रदान केलेली मालमत्ता हे घरच असतं. तथापि, कर्जराशीच्या समतुल्य असलेली लाइफ इन्शुरन्स पॉलिसी, पॉलिसीचं हाउसिंग तसंच वित्त कंपन्यांना देत असलेले लाभ कर्जासाठी तारण म्हणून प्रदान करू शकतात.

काही हाउसिंग कंपन्या कर्ज घेणा-यांद्वारे दिलेल्या हप्त्यामध्ये अतिरिक्त कर्जाची रक्कम जोडतात. इन्शुरन्स काढलेल्याचा मृत्यू कर्जाची मुदत सुरू असताना झाल्यास शिल्लक राशी इन्शुरन्स पॉलिसीचं उत्पन्न हाउसिंग किंवा वित्त कंपन्यांना देते.

कष्टाच्या बचतीमुळे नवीन घरास केलेलं अर्थसहाय्य आता आपली पुष्कळ जमा झालेली सेिव्हग्ज आपल्या नवीन घरामध्ये गुंतली गेली आहे. नवीन घर खरेदी करणं एक नवीन प्रारंभ करण्यासारखं वाटतं. म्हणून आता आपण आपल्या इन्शुरन्स आवश्यकतेचं पुन्हा मूल्यमापन करा. कारण आपली सेव्हिंग दीर्घ कालावधीसाठी गुंतवली गेली आहे. अर्थात, या सर्व बाबी तपासल्या तर घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

Read More »

पित्रे बिल्डिंग-एक कुटुंब

डोंबिवलीच्या टुमदार वाडा संस्कृतीत १९५१ मध्ये फडके रोडवर उभी राहिलेली पहिली बिल्डिंग वजा चाळ म्हणजे पित्रे बिल्डिंग. एक चाळ, एक मजली आणि इतर दोन्ही दुमजली. गिरगावातील चाळींप्रमाणे आतील भागात तीन बाजूंनी बि-हाडं आणि मधे एक मोकळा चौक. तर बाहेर रस्त्याच्या बाजूला अंगण, त्यावरचा मांडव, विहीर, कृष्णकमळ, विलायती फणस, चाफा ही झाडे असा बिल्डिंगच्या सभोवतालचा परिसर ही पित्रे बिल्डिंगची शान होती. डोंबिवलीतील गणेशोत्सव, आप्पा दातार चौकात रंगणारी दिवाळी पहाट, गुढीपाडव्याची नववर्ष स्वागतयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या सभा यांची साक्षीदार असलेली ही चाळ आता शहरीकरण आणि पुनर्विकासाच्या ओघात केवळ आठवणीपुरतीच राहिलीय.

अनंत हरी पित्रे, बाळकृष्ण हरी पित्रे आणि मधुकर पित्रे यांनी या बिल्डिंगचं हे कुटुंब उभारलं. मार्च १९६७ पासून भाडेकरू म्हणून त्यांच्याशी जोडलं गेलेलं नातं, त्यांच्या प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्यामुळे आजही टिकून आहे. मुंबईतून डोंबिवलीसारख्या गावात स्थलांतरीत होताना मनात धाकधुक होतीच; पण या चाळीतील रहिवाशांचा एकमेकांशी असलेला घरोबा, एकोप्यामुळे ती दूर झाली. येथील ब्राह्मण, मराठा तसंच मद्रासी, गुजराथी अशा सर्व भाडेकरूंनी आपल्या कुटुंबाप्रमाणे एकमेकांचे सण, उत्सव, हळदीकुंकू समारंभ, लग्न, मुंज एकत्रितपणे साजरे केले. 

मद्रासी कुटुंबीयांकडे ओनम, नवरात्रोसारख्या सणाला आख्खी चाळ लोटायची. प्रसाद म्हणून वाटल्या जाणा-या गोड अप्प्यांवर सर्व जण तुटून पडायचे. राजे कुटुंबीयांकडे श्रावणात पिठोरी अमावस्येला होणारी पूजा एक पर्वणीच असायची. गोपाळकाल्याला दोन चाळींमधील चौकात दहीहंडी बांधली जायची. ती फोडण्यासाठी बालगोपाळांमध्ये चुरस असली तरी कधी कोणाची भांडणं झाली नाहीत. पाऊस पडत असतानाही हंडीसाठी लागलेल्या थरांवर पाणी टाकण्यात वेगळी मज्जा यायची. अशात कित्येकदा थर कोसळत असे. हंडी फोडल्यानंतर पाऊस-थंडीमुळे गारठणा-या मुलांच्या अंगावर भराभर गरम पाणी ओतलं जाई. त्यानंतर दही-पोहे खाताखाता रंगणा-या गप्पांमुळे दिवस कसा सरायचा, हे कळायचंही नाही.

चाळीतील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. गणपती मंदिरातील गणेशोत्सवाला साजेसा आमचा समोरचा पित्रे बिल्डिंगचा उत्सव असायचा. फडके रोडवरच्या अंगणातील पत्र्याच्या मांडवात हा उत्सव साजरा व्हायचा. १५ ऑगस्टपासूनच सर्वाना त्याचे वेध लागायचे. त्यासाठी वर्गणी काढण्यापासून सजावट, गणपतीची मूर्ती ठरवणं, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कलाकारांना निमंत्रण, स्पर्धा, बक्षिसं यासाठी रात्री बैठकांवर बैठका होत असत. पंडित भीमसेन जोशी, पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. राम मराठे, मधुवंती दांडेकर, नकलाकार वि. र. गोडे यांसारख्या मंडळींचे कार्यक्रम-मैफली मध्यरात्रीपर्यंत रंगल्या आहेत. त्याला चाळीतील रहिवाशांबरोबर अन्य नागरिकही गर्दी करत. आरती-नैवेद्याचा मान आलटून-पालटून सर्वानाच मिळत असे. विसर्जनाच्या दिवशी तीन-चार तास ढोल, ताशे आणि लेझीमच्या तालावर चालणारी मिरवणूक हे आणखी एक खास आकर्षण. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण त्यात सहभागी होत असत. विसर्जन झाल्यावर कोणाच्या तरी घरी श्रमपरिहारासाठी कॉफी आणि भेळेचा कार्यक्रम व्हायचा.

नवरात्रात चाळीतील मुली, महिला दररोज भोंडल्याचा फेर धरत असत. त्यानंतर खिरापत ओळखण्यासाठी त्यांची चढाओढ लागत असे. दस-याच्या दिवशी सोनं लुटण्यासाठी मुलांची वरात एका घरातून दुस-या घरात अशी चाळभर निघत असे. दिवाळीत चाळ नटायची ती मोठमोठय़ा रांगोळ्या आणि घरी बनवलेल्या कंदिलांनी. दिवाळीच्या पहिल्या पहाटे फडके रोडवर लोटणा-या डोंबिवलीकरांमध्ये चाळही सहभागी व्हायची. ग्रामदैवत असलेल्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर तरुण-तरुणींचे ग्रूप चाळी खालीच रेंगाळायचे. दिवाळीचा पाडवा, भाऊबीज आणि पुढे तुलसी विवाहापर्यंत उत्साही वातावरण असायचं. गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेचा समारोपही इथे होत असल्यामुळे कार्यक्रम पाहण्यासाठी डोंबिवलीकर चाळीच्या पहिल्या-दुस-या मजल्यावर गर्दी करत.

चाळीतील खोल्या १० बाय १२ च्या, इतक्या लहान. पण आमच्या घरात काही कार्य निघालं तर सगळी चाळ म्हणजे एक घर. चाळीतील मधल्या चौकात-घरातही लग्न-मुंजीसारखं कार्य व्हायचं. अंगणातील मांडव ही पाहुणे मंडळींची बसायची जागा. हा मांडव पित्रे बिल्डिंगची एक शोभा होती. मुलांना खेळण्याची जागा तर पावसाळ्यात गुरा-वासरांसाठी निवारा होता. पण फडके रोडच्या रुंदीकरणात हा मांडव इतिहासजमा झाला. सुखं-दु:खं वाटायला माणसं लागतात हे या चाळीत कधी जाणवलंच नाही.

चाळ म्हटलं की, भाडणं आलीच. पण मुलांची भांडणं मुलांनीच आणि मोठय़ांची मोठय़ांनीच सोडवायची, हा इथला एक अलिखित नियमच असल्यामुळे ती तातडीने सोडवलीही जात. मुलंबाळं अंगावर ल्यालेली नांदती ही चाळ होती. पण पुनर्विकासाच्या ओघात दोन चाळींच्या जागेवर आता टोलेजंग टॉवर उभा राहिला आहे. शेवटची आमचीच एक चाळ शिल्लक असून, या कुटुंबाच्या केवळ आठवणीच उरल्या आहेत.

कालाय तस्मै नम:!

Read More »

अशी वाढवा झाडे

जागेच्या कमतरतेमुळे आपली बागसुद्धा आता आपल्या बाल्कनी किंवा हॉल, स्वयंपाकघराच्या खिडक्यांपुरती मर्यादित झाली आहे.

वाढते शहरीकरण आणि जागेची कमतरता यांमुळे दिवसेंदिवस संसाराचा पसारा प्रत्येकालाच आवरता घ्यावा लागत आहे. जागेच्या कमतरतेमुळे आपली बागसुद्धा आता आपल्या बाल्कनी किंवा हॉल, स्वयंपाकघराच्या खिडक्यांपुरती मर्यादित झाली आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यासाठी तुमच्या बागेसाठी खास गार्डनिंग टिप्स -

पावसात हवेत आद्र्ता आणि ओलावा जास्त असतो. त्यामुळे झाडं जोमाने वाढतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडांची वाढ अधिक जोमाने करायची असल्यास योग्य वेळेस छाटणी करावी. म्हणजे पावसात त्यांना छान नवीन पालवी फुटेल.

या दिवसात झाडांसाठी शक्यतो नैसर्गिक खत वापरावं. सुकलेलं शेणखत उत्तम पर्याय आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडाच्या मुळाशी शेणखत घाला. रासायनिक खतांचा वापर पावसाळ्यात आवर्जून टाळा.

शक्य असल्यास झाडांच्या कुंडीतली माती बदला. त्यात नवीन माती वापरा.

पावसाळ्यात पाण्याची अजिबात कमतरता नसते. अशा वेळी झाडांची विशेष काळजी घ्या. अतिरिक्त पाणी वाहून जाईल याची विशेष काळजी घ्या. कारण झाडांच्या मुळात पाणी साचून राहून झाडं कुजण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य रीतीने होईल अशा कुंडय़ांचा उपयोग झाडं लावण्यासाठी करावा.
बागेत नव्याने झाडं लावायचा विचार करत असाल तर या पावसाळ्यात ओवा, आंबेहळद, अळू लावायला अजिबात विसरू नका. श्रावणात या भाज्या नक्की उपयोगी पडतील.

पावसात फुलांमध्ये गुलाब, जाई, जुई, मोगरा, तेरडा, लिली ही फुलझाडं लावण्यास काहीच हरकत नाही. या फुलांना पावसात चांगला बहर येतो. सुगंध आणि रंगाची छान जोड बगीच्याला मिळेल.

Read More »

कानमंत्र सुरक्षित घराचा

असुरक्षितता हा जणू आजच्या युगाचा मंत्रच बनला आहे. नोकरीपासून रस्ताप्रवासापर्यंत सर्वत्र आपलं बस्तान मांडलेल्या या असुरक्षिततेच्या विळख्यातून घरही सुटलेलं नाही. किंबहुना, अलीकडील काळात घरांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची बनली आहे. घरफोडी, चोऱ्या ही कारणे आहेतच, पण आग लागण्यासारख्या घटनाही अलीकडील काळात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या घरकुलाच्या सुरक्षिततेसाठी काही ठोस उपाययोजना करणं ही काळाची गरज ठरली आहे. यासाठी तंत्रज्ञानाचाही आधार घेता येईल

 चोरीच्या वाढत्या घटनांच्या बातम्या नेहमीच वर्तमानपत्रातून वाचायला मिळत असतात. अशा वेळी रात्री-बेरात्री घरात थोडंसं खुट्ट झालं की आपली झोप चटकन उडते आणि आपण घरभर फिरून येतो. असं होऊ नये म्हणून घर अशा प्रकारे सुरक्षित करावं की, आपल्याला कुठलीही चिंताच लागू नये. घराची आणि घरातल्यांची सुरक्षितता आपण स्वत: करू शकतो. मात्र, त्यासाठी थोडा समजूतदारपणा, सावधगिरी आणि जागरूकता राखणं गरजेचं आहे. 

पिप होल आवश्यक : सर्वप्रथम दरवाजावर 'पिप होल' असावं. म्हणजे बाहेर कोण आलं आहे, हे चटकन समजतं. अशा प्रकारचं होल अलीकडे प्रत्येक ठिकाणीच असतं. मात्र घरात लहान मुलं असतील तर हे पिप होल मुलांच्या उंचीनुसार बनवावं. जेणेकरून त्यांनाही बाहेर कोण आलं आहे, हे समजेल.

दोन दरवाजे : घराला मुख्य दरवाजासोबत आणखी एक मजबूत दरवाजाही असावा. तसंच गच्ची असल्यास आणि बाल्कनीच्या दरवाज्याबाबतदेखील सुरक्षा व्यवस्था असावी. या मार्गाद्वारे बाहेरच्या व्यक्तीला आपल्या घरात थेट प्रवेश मिळू शकतो, हे लक्षात ठेवावं.

तंत्रज्ञानाचा आधार घ्या : घरात ओळख दर्शवणारी सुरक्षितता म्हणजे 'बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन' असावा. याद्वारे आपली बोटं, हात किंवा चेहऱ्याच्या ओळखीने दरवाजा उघडेल किंवा लावता येऊ शकेल. घराच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्थादेखील निश्चित करावी. जेणेकरून रात्रीदेखील आपणाला बाहेरच्या हालचाली सहजपणे बघता येतील. याव्यतिरिक्त घराच्या मुख्य दरवाजावर व्हीडिओ डोअर फोन लावल्यास उत्तम ठरेल.

आपत्कालीन परिस्थितीसाठीची तयारी : घरात अशी कुठलीही वस्तू ठेवू नये जी चटकन आग पकडणारी असेल. अशा कुठल्याही आपत्कालीन स्थितीसाठी घरात इमर्जन्सी एक्झीट असावी. जे आतून सहजपणे उघडू शकेल. इलेक्ट्रीसिटी वायरिंग, स्विच बोर्ड इत्यादी गोष्टी चांगल्या स्थितीत असाव्यात, जुन्या नकोत. शॉर्ट सíकट झाल्यास धुरावर किंवा आगीवर पाणी टाकू नये. तर मेन स्विच बंद करावा आणि घराच्या बाहेर यावं. मुलांच्या बाबतीत दुर्घटना होण्याची शक्यता थोडी जास्त असते कारण मुलं धोक्यांबाबत गांभीर्याने विचार करू शकत नाहीत. मूल जर चार वर्षापेक्षा मोठं असेल, तर त्याला धोक्यांबाबत आणि त्याच्या परिणामांबाबत सांगावं, जेणेकरून ते स्वत: आपली सुरक्षितता राखू शकेल.

मुलांना करा सजग : दरवाजा कोणी ठोठावल्यास अथवा बेल वाजवल्यास सर्वप्रथम पिपहोलमधून बघावं, अनोळख्या व्यक्तीसाठी कधीही दरवाजा उघडू नये, हे मुलांना आवर्जून सांगावं. खिडक्यांवर स्लायिडग दार लावणं योग्य नाही. कारण इथून मूल पडू शकतं. म्हणून अशा खिडक्यांना जाळी जरूर लावावी. खिडकी, गच्ची अथवा बाल्कनीजवळ असं कुठलंही फर्निचर ठेवू नये ज्यावर मूल चढून पडू शकेल. गच्चीची किंवा बाल्कनीची पॅरापिट वॉल उंच ठेवावी.

इतर काळजी : घरात क्लिअर ग्लास म्हणजे ज्या काचेतून आरपार बघता येईल, अशी काच असल्यास त्यावर गडद रंगाची स्क्रिन किंवा स्टिकर लावावं, ज्यामुळे मुलांना समजेल की ही काच आहे, याला धडकू नये. घराला सेल्फलॉक डोअर किंवा लॅच कुलूप असेल तर मुलांना एकटं सोडू नये आणि चावी घेतल्याशिवाय बाहेर निघू नये. कारण दरवाजा बंद झाल्यास मूल आत अडकू शकतं.

सुरक्षित घरासाठी सेल्फलॉकच्या दोन ते तीन किल्ल्या ठेवाव्यात. घराला डबलडोअर असावं. त्यापैकी बाहेरचा दरवाजा धातूचा आणि आतला दरवाजा लाकडाचा असावा. मुख्य आणि आतील दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारची लॉकिंग व्यवस्था असावी. त्यासाठी नॉर्मल लॉक, डेड बोल्ट्स, सिरम लॉक, फ्लोर लॉक इत्यादींचा वापर करावा. दरवाज्यावर सेफ्टी चेन असावी. म्हणजे अनोळखी व्यक्तीसाठी पूर्ण दरवाजा उघडावा लागणार नाही. घरात येणा-या कुठल्याही व्यक्तीकडे म्हणजे टेलिफोन दुरुस्त करणारा, टीव्ही दुरुस्त करणारा किंवा मीटर रीडिंग घेणारा कोणीही आल्यास त्याच्याकडे ओळखपत्र जरूर मागावं. आपल्या कामवाल्या बाईबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. नियमानुसार पोलिस स्टेशनमध्ये तिचं नाव, पत्ता नोंदवावा.

आपण कुठे बाहेर फिरायला जाणार आहोत, याची माहिती कोणाला देऊ नये. घराचा दरवाजा, खिडकी, बाल्कनी किंवा गच्चीजवळ मोठं झाड नसावं जेणेकरून, त्याचा आधार घेऊन कुणीही सहज वर चढू शकेल. बाहेर जाताना घराची किल्ली कोणालाही देऊ नये. बंगला असल्यास घराला चहूबाजूंनी भिंत (बाउंड्री वॉल), काटेरी झाडांचं कुंपण किंवा तार लावावी. घरात एक पाळीव कुत्रादेखील ठेवावा. घरातील प्रत्येक लहान-मोठय़ा वस्तूंवर काही ओळखीची चिन्हं लावावीत, जेणेकरून आपली वस्तू चुकून चोरीला गेल्यास ती चटकन ओळखता येईल.

एखादी व्यक्ती संशयास्पद आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. घराचे पडदे जाड आणि गडद रंगाचे असावेत. जेणेकरून कोणीही आतील मौल्यवान वस्तू डोकावून बघू शकणार नाही. सुट्टयामध्ये बाहेर जाणार असाल तर सेल्फलॉक नक्की लावावं आणि घरातील एखादा दिवा सुरू ठेवावा. यामुळे घरात कुणीतरी आहे, असं वाटेल. यासाठी टायमर असणा-या दिव्यांचा वापर करावा. घराच्या सुरक्षिततेसाठी अशा काही उपायांचा वापर करावा. 

Read More »

गृहखरेदीत हवा

घरांच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात घर किंवा जमीन घेणं हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरत आहे. घर खरेदीने गुंतवणूक तर होतेच पण पैसा सत्कारणी लागल्याचं समाधानही मिळतं. मात्र, ही बाब वाटते तितकी सोपी नाही. आयुष्यभराची मिळकत घरावर खर्च होणार असते. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकणं आवश्यक आहे. 

घरामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय कधीही तोटयात जात नाही. कारण हल्ली राहत्या घरांची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळेच लहान आणि मोठया शहरांतील घरांच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळतात. रिअल इस्टेटच्या क्षेत्रामध्ये आणखी तेजी येणार आहे. ही तेजी केवळ पुण्या-मुंबईसारख्या मोठया शहरांमध्येच नव्हे तर लहान गावांमध्येही बदल घडवून आणणारी आहे. त्यामुळे तेथील घरांच्या किमतीही वाढणार आहेत, किंबहुना वाढू लागल्या आहेत. अशा वेळी घर खरेदी डोळसपणे केल्यास विकासक आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल. त्यासाठी पुढील काळजी घेणं आवश्यक आहे.

> घर खरेदी करण्यापूर्वी..

घर खरेदी करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीची योजना आखावी. खरेदी करायची स्थावर मालमत्ता भविष्यात किती फायद्याची ठरू शकेल, याचा विचार करावा. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकाच्या मनात काल्पनिक रचना (मॉडेल) तयार असणं चांगलं. त्यानुसार घराची शोधाशोध करणं सोपं जातं. घर घेतल्यानंतर 'आपण हे घर का घेतलं' हा निर्णय पुन्हा बदलता येत नाही. सुधारताही येत नाही. त्यामुळे ही खबरदारी आधीच घेणं आवश्यक असतं. कुठल्याही ठिकाणी प्रॉपर्टी घेताना केवळ बातम्यांवर विश्वास ठेवू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी चांगला रिअल इस्टेट एजंट, वकील, बँक यांचा सल्ला घ्यावा. उत्साहाच्या भरात एखादं घर खरेदी करताना आपण मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे मोजतो आणि नंतर नुकसान सहन करावं लागतं.

घर खरेदी करणं ही आपण करत असलेल्या गुंतवणुकांपैकी सर्वात मोठी गुंतवणूक असू शकते! एक छोटं नियोजन आपल्याला आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करण्यात मदत करेल.

नवीन घर खरेदी करण्यासाठी आपण कर्ज घेतलं असल्यास आणि कोणत्याही अनिश्चित घटनेमध्ये घरावरील अस्तित्वात असलेलं कर्ज फेडण्यास असक्षम असल्यास बचावाचा एक पर्याय म्हणजे पुरेसा लाइफ इन्शुरन्स आपल्याकडे असणं गरजेचं असतं. आवश्यक असलेला लाइफ इन्शुरन्स घेतल्याने, आपण घेतलेलं घर, आपलं कुटुंब आपल्या मालकीचं करण्यात सक्षम होतं.

स्थावर मालमत्ता खरेदी करताना बहुतेक वेळा ग्राहकाच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळेच ती खरेदी करण्यापूर्वी हे प्रश्न नक्की विचारा-

बिल्डरकडे (विकासक) योग्य सरकारी परवानगी म्हणजे महापालिका, विभाग विकास प्राधिकरण, वीज नियामक मंडळ आणि पाणीपुरवठा विभाग इत्यादींच्या परवानग्या आहेत का ?

कोणत्याही इमारतीचं बांधकाम सुरू करण्याचं प्रमाणपत्र विकासकाकडे आहे का?

विकासकाकडे जमिनीचं क्लीअर टायटल आहे का?

तयार ताबा घेण्यायोग्य विकासकाकडे मालमत्तेचं, मालमत्ता पूर्णत्वाचं प्रमाणपत्र आहे का? तसंच ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे जागेचा ताबा मिळण्यापूर्वी मिळालं आहे का?

गृहकर्जातून घर घेताना बिल्डरकडे बँकेला तारण म्हणून ठेवण्याकरता त्या जागेचं अधिक ना हरकत प्रमाणपत्र आहे का? कारण हे प्रमाणपत्र त्याला विक्रीचा करार केल्याच्या नोंदणीनंतर लगेच द्यायचं असतं.

सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्या मालमत्तेचं डाउन पेमेंट करण्यास सुरुवात होते. त्यानंतर थोडया थोडया कालावधीनंतर पैशाचा भरणा करायचा असतो. या प्रत्येक टप्प्यानंतर खरेदीदाराला नियमितपणे खालील कागदपत्रं मिळावयास हवीत, तो त्याचा हक्क आहे.

विक्री कराराची कॉपी.

पैसे मिळाल्याची पावती.

विक्री कराराची नोंदणीकृत प्रत.

पझेशन रिसीट.

घर खरेदी करणा-याने वकिलाकडून विकासकाकडे जमिनीचा कायदेशीर अधिकार असल्याचं प्रमाणपत्र मिळवावं. गरज पडल्यास वकिलाकडून त्याचा अभ्यास करून घ्यावा. यामुळे तुमच्या फसवणुकीचा मार्ग बंद होईल. हे आवश्यक आहे..

हल्लीच्या टेक्नोसॅव्ही युगात प्रत्येक जण इंटरनेट सर्फिंग करत असतात. या माहितीच्या महाजालातून शहरात असलेल्या मालमत्तेची माहिती तो मिळवत असतो. असं असलं तरी जागेचा शोध ऑनलाइन घेत असताना आवडलेल्या जागेच्या ठिकाणी एकदा तरी भेट द्यावी. बिल्डरकडे असलेली सर्व कागदपत्रं, करार आणि मालमत्तेची प्रमाणपत्रं नीट तपासावीत. आजूबाजूच्या दुस-या जागांचे दर पडताळून पाहा. बांधकामाचा दर्जा, फ्लॅटमध्ये देण्यात येणाऱ्या इतर सुविधा जसं की फ्लोरिंग, किचन फिटिंग्ज इत्यादी तपासा. विकासकाने दिलेला नकाशा, जागेच्या बांधकामासाठी वापरलेल्या सामानाची गुणवत्ता, यांची योग्य माहिती घ्या. पिण्याचं पाणी, पाणी साठवण्याची जागा, नसíगक उजेड यांची गरज, वायुविजन, पाण्यासाठीची जोडणी, मलनि:सारण इत्यादी गोष्टींची माहिती नीट करून घ्या. त्याचबरोबर सर्वसामान्य सुविधा गटात(कॉमन सव्‍‌र्हिस एरिया) मोडणाऱ्या सर्व गोष्टी पडताळून पाहा आणि तिचा दर योग्य आहे का, याचाही अभ्यास करा. महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा, भूकंपविरोधी बांधकाम, पार्किंग सुविधा, लिफ्ट्स, पर्यायी मार्ग, जिने, गच्चीवर जाण्याचे मार्ग आणि सुरक्षा यांचाही अभ्यास करा.


 बांधकामाधीन अवस्थेतल्या इमारतीत घर खरेदी करताना..

काही जण इमारत बांधली जात असताना त्यात फ्लॅट प्री-बुकिंग करतात. तयार घरांपेक्षा निर्मितीप्रक्रियेतील घरांसाठी दर थोडा कमी असतो. शिवाय पैसे उभे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. कधी कधी प्रकल्प वेळेत पूर्ण करणं काही विकासकांना शक्य होत नाही. त्यामुळे ग्राहकांनीच बांधकामाधीन इमारतीत घर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची पडताळणी करणं गरजेचं आहे. ही इमारत कोणत्या विभागात येणार आहे? दोन ते तीन वर्षाच्या कालावधीत ती बांधून होणार आहे की नाही, याची माहिती घ्या. जिथे विकासकाम अधिक जोराने चालू आहे, तिथे घरांचे दर अधिक असतील, मात्र बांधकाम चालू असेल, तो विभाग अद्याप विकसित व्हायचा असेल, तर तिथे कमी असतील.


 आवश्यक मंजुरी

'इंटिमेशन ऑफ डिसअप्रूव्हल (आयओडी)' आणि 'कमेन्समेंट सर्टिफिकेट (सीसी)' मिळाल्यावरच बिल्डर बांधकाम सुरू करू शकतो . 'आयओडी' साधारणत: वर्षभरासाठी असते. त्यानंतर त्याचं नूतनीकरण (रिन्यू) करावं लागतं. तुम्हाला ज्या मजल्यावर घर घ्यायचं आहे, त्या मजल्यासाठी 'सीसी' मिळाल्यावरच बुकिंग करा.


मालकीहक्क

संबंधित फ्लॅटवर बिल्डरचा मालकीहक्क असेल तरच तो ती मालकी अन्य ग्राहकाकडे हस्तांतरित करू शकतो. त्यामुळे घर घेण्यापूर्वी मालकीहक्क तपासून पाहायला हवा. तो ग्राहकाचा हक्कच आहे. 'टायटल सर्च'साठी वकिलाचा सल्ला घेता येईल. गृहकर्जासाठी अर्ज केल्यावर कर्जमंजुरी देण्यापूर्वी बँकाही 'टायटल सर्च' करतात. कर्जासाठी प्रोसेसिंग फी द्यावी लागली तरी सुरुवातीलाच कायदेशीर बाबी स्पष्ट होतात.


 सॅम्पल फ्लॅट

मार्केटिंगचा एक पर्याय म्हणून काही बिल्डर सॅम्पल फ्लॅट तयार करतात. आपला फ्लॅट कसा दिसेल, याचा नमुना ग्राहकांना यामुळे बघता येतो. आपल्या घरातील वैशिष्टय, बारकावे आणि अन्य पैलू सॅम्पल फ्लॅटप्रमाणेच असतील, याची खात्री बिल्डरकडून करून घ्यावी. तुमच्यात आणि बिल्डरमध्ये झालेल्या करारानुसार सर्व सोयीसुविधा सॅम्पल फ्लॅटमध्ये आहेत का, त्या तुमच्याही फ्लॅटला मिळणार आहेत का, तेही बघावं.


 मालमत्तेचा 'मॉर्गेज' मार्ग

बिल्डर बँका आणि एनबीएफसीकडून कर्ज घेतो आणि तो गृहप्रकल्प बँकेकडे तारण ठेवतो. बांधकाम सुरू असलेला फ्लॅट घेताना संबंधित रकमेचा चेक बिल्डरने आपल्या विशिष्ट बँकेतील विशिष्ट खात्याच्या नावाने काढायला सांगितल्यास समजावं की, संबंधित प्रकल्प तारण ठेवलेला आहे. त्या प्रकल्पातील फ्लॅट घेण्यासाठी बँकेचं 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) घ्यावं लागतं. त्यामध्ये फ्लॅटचा सर्व तपशील असावा लागतो. बिल्डरने बँकेकडून घेतलेले पैसे परत न केल्यास बँक इमारतीचा ताबा घेऊ शकते आणि फ्लॅट खाली करण्यास सांगू शकते. पण 'एनओसी' घेतली असल्यास हे संकट टळू शकतं.


 वेगवेगळे खर्च

किंमत कमी पडावी म्हणून बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅटला पसंती दिली जाते. पण ही खरेदी करताना स्टॅम्प डयुटी आणि रजिस्ट्रेशन, इलेक्ट्रिक मीटर, गॅस कनेक्शन, फíनचर, फिटिंग यासाठी येणारा खर्चही विचारात घ्यावा. मोठय़ा गृहप्रकल्पांमध्ये बिल्डर पाच वर्षापर्यंत अ‍ॅडव्हान्स मेंटेनन्स डिपॉझिट घेतात.


 विकासकाची प्रतिमा

व्यवहार करण्यापूर्वी विकासकाची विश्वासार्हता, त्याचे आतापर्यंतचे प्रकल्प, कामगिरी आणि प्रतिमा यांची खातरजमा करून घ्यावी. मोठे आणि चांगले नाव असलेल्या बिल्डरच्या प्रकल्पांचा विचार केलेला बरा. कारण त्यांच्याकडे अंमलबजावणीची क्षमता आणि संसाधनं तुलनेने जास्त असतात. या क्षेत्रात नवीन असलेल्या विकासकांशी व्यवहार करताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा. रिअल इस्टेट मार्केट कोसळल्यास सर्वाधिक फटका त्यांना बसण्याची शक्यता असते.


 विक्रीबाबत अटी

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तुम्ही फ्लॅट घेतला असेल आणि तो पूर्ण होत आला असताना वाढलेल्या किमतीला तुम्हाला तो विकायचा असेल तर तशा तरतुदी बिल्डरसोबतच्या करारामध्ये आधीच करायला हव्यात. बिल्डर सेल अ‍ॅग्रीमेंटमध्ये 'नो सेल' अशी तरतूद करतात. बांधकाम पूर्ण झाल्यावर किती काळाने फ्लॅट विकता येईल, ते त्यामध्ये नमूद केलेलं असतं. हा कालावधी दीड ते तीन वर्षाचा असतो. त्यापूर्वीच फ्लॅट विकायचा असेल तर बिल्डरकडून 'एनओसी' घ्यावं लागतं.


 घरास अर्थसहाय्य करण्यासाठी कर्ज

बरेच लोक (अर्थसहाय्य आणि कर बचतीमुळे) नवीन घर खरेदी करताना त्यांच्या घराची संपूर्ण किंमत देण्यास अनुत्सुक असतात. या मुख्य कारणामुळे पुष्कळ लोक नवीन घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेतात.


 गृहकर्ज घेतेवेळी

कर्जमागणी अर्ज कसा करावा, किती कर्ज मिळू शकतं, अन्य अटी आणि शर्ती, तसंच अस्थायी आणि स्थायी (फ्लोटिंग आणि फिक्स) व्याजदर म्हणजे नेमकं काय, यातील कोणता व्याजदर स्वीकारावा, अशा प्रश्नांचं निरसन वेळीच होणं गरजेचं असतं.

गृहकर्ज शक्यतो राष्ट्रीयीकृत बँक अथवा केवळ घरासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या एचडीएफसी, जीआयसी होम फायनान्स, एलआयसी होम फायनान्स यांसारख्या वित्तीय संस्थांकडून घ्यावं. गृहकर्जासाठीचा कर्जमागणी अर्ज सर्व संस्थांचा साधारपणे सारखाच असतो.

त्यामध्ये प्रामुख्याने पुढीलप्रमाणे माहिती आणि कागदपत्रं द्यावी लागतात.

अर्जदाराची स्वत:ची माहिती-उदाहरणार्थ नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो, पॅनकार्ड, निवासाचा दाखला.

नोकरी/व्यवसाय याबाबतची माहिती.

वार्षकि उत्पन्न व त्याबाबतची पूरक कागदपत्रं (मागील ३ वर्षाचे फॉर्म १६, व्यावसायिक असल्यास मागील ३ वर्षाचे ताळेबंद)

फ्लॅट खरेदीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर विकासकाबरोबर झालेल्या कराराची प्रत आणि करार करतेवेळी त्याला दिलेल्या रकमेची पावती

Read More »

बैठकीला द्या लोककलेचा रंग

घर कितीही आधुनिक असलं तरी ते कुठेतरी आपल्या संस्कृतीशी जोडलं जावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याच हौसेपायी बैठकीच्या खोलीत पारंपरिक सजावट करण्यावर भर दिला जातो. या सजावटीने घराची शान तर वाढतेच पण काँक्रिटच्या जंगलातही त्याला मातीचा वास येतो. तुमची पारखी नजर जितकी चांगली तितकी या बाबतीत तुम्ही उत्कृष्ट सजावट करू शकता. असे अस्सल मातीतले नमुने गोळा करून त्यांनी तुमची बैठकीची खोली सजवलीत तर त्याचं वेगळेपण का नाही उठून दिसणार?

घर सजवणं ही एक कला आहे. आजकाल धकाधकीच्या जीवनात त्यासाठी फार वेळ मिळत नाही, हे अगदी खरंय. पण आजूबाजूला हिंडताना थोडी तीक्ष्ण नजर ठेवली तर घराच्या सजावटीचे अनेक चांगले पर्याय सहज उपलब्ध होताना दिसतील. घराच्या बैठकीच्या खोलीची सजावट कशी करायची, हा ब-याच जणांसमोर मोठा प्रश्न असतो. महागडं फर्निचर, उंची पडदे आणि आधुनिक यंत्र आणली तरी मनासारखी सजावट होतेच असं नाही.

अनेकदा उपलब्ध जागेत बसणारं चांगलं फर्निचर मिळत नाही. शिवाय त्याच्या रोजच्या देखरेखीचं काम वाढतं, ते निराळंच. छोटी जागा आणि बजेटमधली सजावट या दोन्हींवर मात करायची असेल तर आणखी एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे पारंपरिक वस्तूंचा वापर करून बैठकीची खोली सजवण्याचा. त्यात तुमची कल्पकताही दिसेल शिवाय तुम्हाला पाहिजे तेव्हा ते बदलणं सहज शक्य होईल. इतरांपेक्षा आपल्या घराच्या सजावटीला जरा वेगळेपणा देण्यासाठी त्यात बरंच काही करता येईल.
पाहुण्यांचं स्वागत करताना बैठकीच्या खोलीचा प्रामुख्याने वापर होतो. घरातला आपलाही बराच वेळ याच खोलीत जातो, त्यामुळे त्याच्या सजावटीकडे लक्ष द्यायलाच हवं. यात आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा सुरेख संगम साधता येईल.

घर कितीही आधुनिक असलं तरी ते कुठेतरी आपल्या संस्कृतीशी जोडलं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याच हौसेपायी बैठकीच्या खोलीत पारंपरिक सजावट करण्यावर भर दिला जातो. या सजावटीने घराची शान तर वाढतेच पण काँक्रिटच्या जंगलातही त्याला मातीचा वास येतो. अशी बैठक तयार करताना प्रथम काही गोष्टी मनाशी पक्क्या ठरवायला हव्यात. आपल्याला लोककलेला प्राधान्य देऊन बैठक सजवायची असेल तर त्याचे सजावटीचे नमुने गोळा करायला सुरुवात करायला हवी. अगदी पडदे, गालिचे आणि बैठकीवर ठेवायच्या उश्यांच्या अभ्य्रापासून एकेका गोष्टीची आखणी करावी लागेल.

भिंतीवरील पेंटिंग, वॉल हँगिंग, फ्लॉवरपॉट, टी-पॉय किंवा दिव्याची सोय करतानाही याचा विचार सतत आपल्या मांडणीशी जुळता म्हणजेच लोककलेचा वापर करून केला गेला आहे ना याकडे लक्ष ठेवायला हवं. त्यासाठी तुम्हाला आजूबाजूला वावरताना डोळे उघडे ठेवूनच वावरावं लागेल. कोठेही अशी सजावटीची वस्तू दिसली की, त्याचा आपल्या बैठकीत उपयोग होईल का, याचा विचार करावा लागेल. अशा वस्तू खरेदी करण्यासाठी महागडी हस्तकलेची दुकानंच पालथी घालावीत, असं नाही. अगदी रस्त्याच्या कडेला बसलेल्या एखाद्या विक्रेत्याकडेही काही चांगल्या वस्तू सहज मिळून जातात. तुम्ही स्वत: चित्रकला किंवा भरतकाम अगर तत्सम कलेचे जाणकार असाल तर त्यातली काही वेगळी कलाकृती स्वत: तयार करू शकता.

अशा पद्धतीने लोककलेचा रंग बैठकीला द्यायचा झाल्यास त्याची सुरुवात घराच्या रंगापासून करायला हवी. हॉलला रंग देताना तो मातीच्या रंगाशी मिळता-जुळता द्यावा. किंवा एखादी भिंत गेरू रंगात रंगवून घ्यावी. म्हणजे त्यावर हस्तकलेचा नमुना असलेलं एखादं वॉलपेंटिंग किंवा राजस्थानी पेंटिंग लावता येईल. आजकाल बैठकीच्या खोलीला अगदी सांस्कृतिक रंग देण्यासाठी त्यातली एक भिंत वारली पेंटिंग करून घेण्याची पद्धत आहे, तेही छान दिसते. भिंतींच्या रंगावर उठून दिसतील अशी पिवळ्या किंवा बदामी रंगातील पेंटिंग आणखी छान दिसतील. दरवाज्याच्या किंवा खिडक्यांच्या चौकटीदेखील अशा पारंपरिक चित्रकलेच्या माध्यमातून फळा-फुलांची नाजूक नक्षी काढून रंगवता येतील. वारली पेंटिंगऐवजी तुम्ही पौराणिक कथांचा आधार घेऊन एखादं चित्र काढून ती िभत रंगवू शकता किंवा तिथे रामायण, महाभारतातील कथेवर आधारित एखादं वॉल पेंटिंग लावू शकता.

मुख्य बैठकीची व्यवस्था करताना या सगळ्या सजावटीला साजेशी भारतीय बैठक ठेवलीत तर उत्तमच. दोन- गाद्या घालून त्यावर भरतकाम केलेल्या चादरी आणि उश्या ठेवल्यात तर खोलीला एक वेगळाच लुक येईल. त्याच्या जोडीला बांबूचं फर्निचर ठेवायलाही हरकत नाही. जुने मुढ्ढे नवीन रंग देऊन पुन्हा बैठकीत आणा. केनच्या फर्निचरचा कलात्मक वापर करून त्यावरही कलाकुसर केलेले सोफा कव्हर्स आणि उश्या ठेवल्या तर बैठकीला एक एथनिक लुक यायला काय वेळ लागेल? भारतीय बैठक नको असेल आणि कमी बजेटमध्ये काम करायचं असेल तर आणखी एक करता येईल. घरात ब-याच गोष्टींचे लाकडी-पुठ्ठय़ाचे बॉक्स येतात. त्यात रद्दी भरून ते जड करा. त्यावर हलकीशी पातळ गादी किंवा रजई घाला आणि वरून चांगली चादर अंथरा म्हणजे सेटीसारखी व्यवस्था तयार होईल.

पडद्यांमध्येही तुम्ही अगदी एथनिक लुक देऊ शकता. त्यासाठी पडद्यांची गरज नाही. लांब पट्टय़ाच्या चटया मिळतात. (राजस्थान, हिमाचल, दिल्लीकडे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.) त्याची चांगली रंगसंगती निवडा. त्या पट्टय़ा खिडक्यांवर सोडा. उन्हाळ्याच्या दिवसात वाळ्याचे पडदे सोडून त्यावर पाणी मारलं तर वेगळ्या एसीची गरजच नाही. अशा दिवाणखान्यात लोककलेच्या सजावटीच्या वस्तूंना मात्र नीट स्थान द्यायला हवं. मधे एखादा लाकडी टी-पॉय ठेवून त्यावर नक्षीदार फ्लॉवरपॉट किंवा सुरई ठेवलीत तरी फारच छान दिसेल.

या खोलीत दिव्यांची सोयही वेगळ्या पद्धतीने करायला हवी. रात्रीच्या वेळी मंद प्रकाशात हा सगळा जामानिमा उठून दिसेल. त्यासाठी वेताच्या गोल मडक्यात दिवे सोडावेत. इथे मॅजिक लॅम्प लावायला हरकत नाही. त्यात तेल फक्त आत सोडायची सोय असते. दिवा उलटा केल्यावर ते बाहेर येत नाही. हा तेलाचा दिवा पाच-सहा तास चालतो. सावंतवाडी, गोवा या बाजूला हे खास दिवे मिळतात.

दिवाळीत पणत्या ठेवण्यासाठी मिळणा-या मोठय़ा दिव्यांचाही शो पीस म्हणून चांगला वापर करता येईल. वेत किंवा काथ्यापासून बनवलेले की-चेन होल्डर किंवा न्यूजपेपर स्टँड अशा काही गोष्टी उपयुक्ततेबरोबरच या सजावटीला आणखी शोभा देतील. आपल्या सांस्कृतिक खजिन्यात अशा गोष्टींची कमतरता नाही. तुम्ही त्याचा किती कलात्मक पद्धतीने वापर करता, त्यावर तुमच्या बैठकीच्या खोलीला लोककलेचा रंग चढेल, हे नक्की!

Read More »

आज्यांनो, दागिने सांभाळा!

अलीकडे घरफोडीपेक्षाही भर रस्त्यांतही चो-यांचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. हे प्रकार विशेषत: घडतात ते साठी ओलांडलेल्या स्त्रियांच्या बाबतीत आणि त्याही त्यांच्या राहत्या घराच्या आसपासच्या आवारातच! त्यामुळे मध्यमवयीन स्त्रियांच्या बाबतीत सुरक्षेचे प्रश्न नव्याने उद्भवले आहेत. मात्र स्त्रियांनीच यासाठी दक्ष राहिलं आणि आपल्या आसपास लक्ष ठेवलं तर हे प्रकार टाळता येऊ शकतात..

त्या आजी चांगल्या धीराच्या. म्हटल्या तर एकदम स्मार्ट. पटकन फशी पडणा-या नाहीत. पण परवा चोरटय़ांनी त्यांच्या हातातल्या बांगडय़ा लांबवल्या. तेही सोसायटीच्या आवारातून. बहुधा चोरटे आधीपासून पाळत ठेवून असावेत. आजी सकाळी एकटय़ाच फिरायला बाहेर पडतात. सुरुवातीला एक जण धावत धावत आला आणि घाब-याघुब-या आवाजात आजींना म्हणाला तिकडे नाक्यावर सराफाचं दुकान फोडलंय. आजी तुम्ही ताबडतोब घरी जा, इथे फिरणं सुरक्षित नाही. आणि तो धावत धावत निघून गेला.

दोन मिनिटं होतायत न होतायत तोच पाठून दुसरा माणूस धावत आला. इथून कुणी धावत गेलं का, म्हणून आजींना विचारू लागला. आजी म्हणाल्या हो. अहो, मोठा दरोडा पडलाय. तुम्ही इथे काय करताय, म्हणून तो आजींवरच ओरडला. आजी तर घाबरून गेल्या. मग लगेच म्हणाला, इथे सुरक्षित नाही. तुमचे सोन्याचे दागिने काढून रुमालात ठेवा. त्याने स्वत:चा रुमाल काढला.

आजींना वाटलं की तो बहुधा पोलिसच असावा. म्हणून त्यांनी घाईघाईने बांगडय़ा आणि मंगळसूत्र काढून रुमालात ठेवलं आणि त्याने तो रुमाल आजींकडे दिला आणि तो धावत धावत निघून गेला. आपले दागिने त्या रुमालात सुरक्षित आहेत या भ्रमात आजी घरी आल्या आणि रुमाल उघडून बघतात तो त्यात दुसरेच खोटे दागिने होते. आपण गंडवलो गेलो आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं.. पण उशीर झाला होता.

दुस-या आजींच्या बाबतीत साधारण असंच घडलं. पण त्यांना सांगितलं गेलं की, तुमच्या मुलाचा अपघात झालाय. त्याला प्रचंड लागलंय. हॉस्पिटलमध्ये गहाण ठेवायला बांगडय़ा द्या, वेळ नाही जास्त. त्यांनी गडबडीत बांगडया काढून दिल्या.परवा ठाण्यात एका आजींच्या पाटल्यांच्या बाबतीतही असंच घडलं. थोडी गडबड सुरू आहे. अंगावर दागिने ठेवू नका. काढून एका पिशवीत ठेवा. पिशवीत दागिने ठेवल्यावर बाइकवरच्या चोरांनी वेगाने येऊन पिशवी पळवली.

एका आजींच्या बाबतीत तर खूपच दुर्दैवी प्रसंग घडला. एका चोरटय़ांनी त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपला मोबाइल सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे दिला आणि एका चहाच्या टपरीबाहेर बसवून चहा दिला आणि आलोच म्हणून सांगून तो गायब झाला. प्रत्यक्षात त्याने चहात सफाईने गुंगीचं औषध टाकलं. आणि तो बहुधा आजी बेसावध होण्याची वाट पाहत जवळपासच असावा.

मात्र कर्मधर्मसंयोगाने आजींच्या सोसायटीतली एक मुलगी तिथून जात होती आणि कधीही हॉटेलात न बसणा-या आजी इथे कशा याचं आश्चर्य वाटून तिने त्यांना हटकलं. त्यांच्या चेह-यावरची गुंगी पाहून ती आजींना घेऊन गेली. मात्र दिवसभर उपास असल्यामुळे आजींना त्या औषधाची विषबाधा झाली आणि त्यात त्यांचा अंत झाला.

हे सगळे प्रकार साधारण साठी ओलांडलेल्या स्त्रियांच्या बाबतीत मोठय़ा प्रमाणात घडताहेत. आणि बहुतांश घटना राहत्या घराच्या आसपासच घडल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय मध्यमवयीन स्त्रियांच्या बाबतीत सुरक्षेचे प्रश्न नव्याने उद्भवले आहेत. आयुष्यभर जपलेला दागिना चोर असे हातोहात लंपास करताना दिसत आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे एकटंदुकटं फिरताना हल्लीच्या दिवसात सोन्याचे दागिने घालूच नयेत. दुसरं म्हणजे तुमच्या सोसायटीच्या परिसरात किंवा लिफ्टमध्ये तुम्ही खूप सुरक्षित आहात अशा भ्रमात राहू नये.

प्रत्येक पावलावर दक्षता ठेवून सावधानता बाळगावी. सोसायटीतील वॉचमन किंवा सेवाकार्यासाठी येणा-या लोकांशी अघळपघळ गप्पा मारू नये. बोलण्याची वेळ आलीच तर घरातल्या गोष्टी सांगू नये. त्यानिमित्ताने विश्वास संपादन करून तुमची माहिती काढली जाऊ शकते. घरातले पुरुष किती वाजता येतात, किती वाजता जातात, फिरण्याची वेळ कोणती, वगैरे माहिती देऊ नये. परिसरात अनाहूत बाइकवाला फिरत असेल तर लगेच सुरक्षा व्यवस्थेला किंवा पोलिसांना कल्पना द्यावी. दुपारच्या वेळी हेल्मेटधारी बाइक फिरताना दिसल्यास नंबर टिपून ठेवावा.

शक्य झाल्यास तरुणांच्या मदतीने हटकावे. फेरीवाल्यांना परिसरात प्रवेश देऊ नये. तसेच सर्वेक्षणासाठी आल्याचं निमित्त सांगणा-यांची ओळखपत्रे कसून तपासावीत. ही चौकशी त्यांना अपमानास्पद वाटली तरी त्याबाबतीत ढिसाळपणा करू नये. दरोडा, चोरी, आग वगैरेसारख्या आपत्कालीन घटना किंवा निकटवर्तीयांच्या अपघाताबद्दल सांगून कुणी घाबरवून टाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर भांबावून न जाता प्रतिचौकशी करावी. चार ओळखीच्या लोकांना बोलावून घ्यावे. दागिने किंवा तुमच्या जवळील मौल्यवान वस्तूंबद्दल कुणी विषय काढल्यास संशयाची सुई त्याच्याकडे वळवून सावधान राहावं.

Read More »

गृहसजावटीचा कानमंत्र

गृहसजावट ही एक कलाच आहे. मात्र कलात्मक पद्धतीने घर सजवताना अनेक छोटया-मोठया गोष्टींचं तंत्र बाळगावं लागतं. ते बाळगलं गेलं तर गृहसजावट आकर्षक दिसण्याबरोबरच समतोलितही दिसते. त्यासाठीच्याच या काही टिप्स, खास तुमच्यासाठी..

दिवाणखाना, स्वयंपाकघर आणि इतर खोल्यांमध्ये अनावश्यक वस्तूंचा भरणा टाळावा.
घरातला कोपरा सजवण्यासाठी नेहमी गडद रंगसंगतीचा वापर करावा. एखादा कोपरा कुंडीनेदेखील उठावदार दिसतो.
दिवाणखान्यातली रचना एकसंध असावी. विरोधाभास करणारी रंगसंगती असल्यास ती चुकीची रंगसंगती होणार नाही, याकडे लक्ष द्यावं.
दिवाणखान्यात कोणतंही फर्निचर घेताना जागेचा पुरेपूर वापर करावा. सगळ्यांना बसायला पुरेपूर जागा मिळेल, अशी रचना असावी.
दिवाणखान्याला रंग देताना ऑफ व्हाइट, क्रीम, लेमन यलो, पिस्ता किंवा गुलाबी असे रंग निवडावेत. मात्र जागा मोठी असेल तर एखादी भिंत गडद रंगाची करावी.
दिवणाखान्यात लावले जाणारे फोटो नेहमी हसरे, खेळकर किंवा डोळ्यांना सुखद वाटतील असे असावेत.
प्रवेशद्वार हे आकर्षक त्याहीपेक्षा स्वच्छ असावं आणि त्याचा रंग नेहमी गडद असावा.
बैठक व्यवस्थेमध्ये स्टोअरेज व्यवस्थेचाही विचार करावा. केन किंवा रबरवूडचे फर्निचर आकर्षक दिसते.
मुलांच्या खोल्यांमध्ये अभ्यासाचं टेबल, कपडय़ांचं स्वतंत्र कपाट आणि पलंगासोबतच्या स्टोअरेजमध्येही प्रत्येक वस्तू मुलांना चटकन हाताशी येतील अशाच असाव्यात.
मुलांच्या खोलीला रंग देताना मुलांचं वय, त्यांचा स्वभाव यांचा विचार करून रंग द्यावा.
स्वयंपाकघरातील शोकेस आधुनिक असावी. तसंच किचन ट्रॉलीज आणि कपाटाची रंगसंगती मिळतीजुळती असावी.
रोजच्या फोडण्यांमुळे श्वास कोंडू नये म्हणून मोठी खिडकी, एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी बसवावी.
सगळ्या प्रकारची छोटी-मोठी भांडी हाताला चटकन सापडतील अशीच असावीत.
घरासमोरच्या टेरेसवर कुंडय़ा किंवा झाडं लावून एक छोटेखानी बागही करता येते.
घराची भव्यता दिसण्यासाठी आरसा किंवा भव्य निसर्गचित्राचा वापर करावा.
घरातली फूलझाडं शक्य असल्यास ऋतू किंवा आठवडा किंवा पंधरवडय़ानुसार बदलत राहावी. म्हणजे घर आकर्षक दिसतंच आणि मन प्रसन्न राहतं.
घरी येणा-या पाहुण्यांना कपडे दिसणार नाहीत अशा ठिकाणी ते वाळत घालावेत. गॅलरीत रॅक करून घ्यावा.
कपडे वाळत घालताना शक्यतो एकसारखे कपडे एका रांगेत घालावेत. कसेही वाळत घातलेले कपडे विचित्र दिसतात. त्यामुळे घराची शोभा जाते.
सगळ्यांनी एकत्र बसून जेवण्याची जागा म्हणजे डायनिंग रूम. तिथे सगळ्यांना एकत्र बसता येईल इतकी जागा असवी.

Read More »

ग्लासांना द्या नवा लुक

आपलं घर सुंदर दिसावं म्हणून आपण गृहसजावटीचे नवनवीन प्रयोग करत असतो. घरातील अंतर्गत सजावटीमध्येही आपली कल्पकता झळकत असते.

आपलं घर सुंदर दिसावं म्हणून आपण गृहसजावटीचे नवनवीन प्रयोग करत असतो. घरातील अंतर्गत सजावटीमध्येही आपली कल्पकता झळकत असते. घरात पाहुणे आल्यावर प्रथमत: आदरातिथ्याची सुरुवात होते, ती ग्लासातून पाणी देण्याने.

अँटिक शेप्समध्ये ग्लास आताशा बाजारात मिळू लागले असले तरी ते ब-याचदा साध्या काचेचे असतात. अशा साध्या काचेच्या ग्लासेसना थोडासा रंगीबेरंगी लुक घरच्या घरी आपल्याला देता येऊ शकतो. कसं ते पाहू या.. बाजारात त्यासाठी खास ग्लास पेंट्स आणि काचेवर चिकटवता येईल अशी विशिष्ट गोंदही मिळते.

ग्लास पेंटमध्ये ही पारदर्शी गोंद मिसळून ग्लासाच्या तळापासून वर आकर्षक रंगसंगतीत नुसत्या ठिपक्यांची रचनात्मक डिझाइन जरी केली तरी ते खूप सुंदर दिसतं. तुमची चित्रकला जर खास असेल तर मात्र तुम्ही सुरेख नक्षीकामही या ग्लासांवर करू शकता. पाहा मग, घरात प्रवेशकर्त्यां पाहुण्यांना तुम्ही या पहिल्याच आदरातिथ्यात कसं खूश करून टाकाल ते!

Read More »

गृहसजावटीसाठी स्टेन्सिल्स आर्ट

चार भिंतींचं असलं तरी ते 'घर' असतं. या भिंतींमुळे जगाच्या आणि आपल्यामध्ये एक कुंपण असतं. त्यामुळे 'आपलं जग' ठरवता येतं. कदाचित म्हणूनच लौकिकार्थाबरोबरच गृहसजावटीमध्येही भिंतींच्या सजावटीला अधिक प्राधान्य दिलं जात असावं. घराच्या भिंती रंगवण्यासाठी अलीकडे वेगवेगळे प्रयोग केले जातात. 'स्टेन्सिल्स आर्ट' हा त्यापैकीच एक. खोलीच्या स्वरूपानुसार एखाद्या भिंतीवर स्टेन्सिल्सचा वापर करून सुरेख पेंटिंग करता येतं. ही कला फारशी खर्चिक आणि वेळखाऊ नसल्याने सर्वसामान्यांनाही सहजपणे तिचा उपयोग करता येतो.

इंटिरिअर डेकोरेशन ही संकल्पनाच मुळात इतकी व्यापक आहे की, घरातील प्रत्येक भागाचा वेगवेगळ्या पद्धतीने आणि कल्पकतेने वापर करून घराचं सौंदर्य खुलवता येतं. त्यामुळेच भिंती, दरवाजे, खिडक्या, छत, फ्लोरिंग या सर्वामध्ये केले जाणारे बदल हे घराच्या सौंदर्याचं परिमाण ठरवत असतात. असं असलं तरी गृहसजावटीत महत्त्वाची ठरते ती भिंतींची सजावट. कारण घरात येणा-या प्रत्येक व्यक्तीची पहिली नजर ही भिंतींकडे जाते. या भिंतींच्या सौंदर्यावरून घराच्या एकूण रचनेची आणि तिथल्या वातावरणाची कल्पना येते. उदाहरणार्थ, घरातील भिंतींवर जर रेघोटय़ा ओढल्या असतील, शाई सांडली असेल तर घरात एखादं लहान मूल असल्याचं कळून येतं. घराच्या भिंतींना खूप भेगा पडल्या असतील, ओल आली असेल तर घराचं बांधकाम कच्चं असल्याचं निदर्शनास येतं. एकूण काय, तर भिंती म्हणजे घराचा आरसा असतात. त्यामुळेच वॉल डेकोरेशनला इंटिरिअरमध्ये बरंच महत्त्व आहे. 

अलीकडे भिंती सजवण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. वेगळ्या रंगाचा वापर करून चार भिंतींपैकी एखादी भिंत उठावदार (हायलाइट) करण्याचा ट्रेण्ड सध्या जोरात आहे. नुसताच एक सलग रंग देण्यापेक्षा ती भिंत अधिक आकर्षक बनवण्यासाठी अलीकडे स्टेन्सिल्सचा वापर केला जातो.

'स्टेन्सिल्स आर्ट' ही अतिशय सुरेख आणि आकर्षक अशी भिंत सजवण्याची कला आहे. यामुळे खोली खूपच आकर्षक आणि सुरेख सजवलेली दिसते. स्टेन्सिल्समुळे घराची भिंत सुंदर आणि फारच प्रसन्न दिसू लागते. स्टेन्सिल्सने भिंत सजवणं ही कला फारशी अवघड नाही आणि फारशी खर्चिकही नाही. घरातील काही भिंती फारच अनाकर्षक दिसत असतात. स्टेन्सिल्स अशा छोटय़ा छोटय़ा जागांना जिवंतपणा देतात. स्टेन्सिल्स फारशा महागही नसतात. सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात यांची किंमत असते. तसंच फारसा पसारा न करता आणि अधिक रंगांचा वापर न करता भिंत आकर्षक रूपात सजवता येते.

यासाठी रंग आणि चित्राचा विषय प्रत्येकाच्या आवडीने निवडता येतो. म्हणूनच या कलेला 'लोककला' असंही म्हणतात. तसंच स्टेन्सिल्स आर्टचा वापर मुलांच्या खोलीत एखाद्या बोधकथेच्या रूपातही करता येतो. यासाठी गडद रंगांचा वापर करता येईल. त्यामुळे मुलांची खोली अधिक प्रसन्न आणि टवटवीत दिसू लागेल. बरेच जण रंगांबाबत जरा जास्तच वेगवेगळे प्रयोग करतात. त्यामागे फारसा कलात्मक विचार केला जात नाही. त्यामुळे भिंती आणि अंतिमत: खोली तितकीशी आकर्षक दिसत नाही. म्हणूनच आपल्या आवडीने रंगांची निवड करताना थोडा कलात्मकतेने विचार करणं खूप गरजेचं असतं. स्टेन्सिल्सची निवड करतानाही ती कोणत्या खोलीसाठी वापरणार आहे, याचा विचार करूनच करावी. त्याचबरोबर भिंतींचा रंग, खोलीतील फर्निचर यानुसार डिझाइनचा रंग निवडावा. स्टेन्सिलचा वापर करून एका विशिष्ट प्रकारच्या वातावरणाची निर्मिती करता येते. त्यामुळे रंगसंगतीचं अचूक ज्ञान असणं यामध्ये आवश्यक ठरतं.

भिंतींवर स्टेन्सिल्सच्या सहाय्याने डिझाइन काढताना आजूबाजूच्या आणि भिंतीवरील सर्व वस्तू काढून टाकाव्यात. पेंटर वापरतात त्या टेपच्या सहाय्याने नेमक्या कोणत्या जागेवर डिझाइन करायचं, हे ठरवता येईल. नंतर रंगांची निवड करून स्टेन्सिलचं कार्ड घ्यावं. चाकूसारख्या तीक्ष्ण वस्तूने किंवा कटरने कार्डमधून स्टेन्सिल्स वेगळी करावी. नंतर ती भिंतीवर धरून स्पंज किंवा स्टेन्सिल्स ब्रशच्या सहाय्याने रंगकाम सुरू करावं. यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर करता येतो. उदा. आर्टिस्टिक पेंट, ऑइल पेंट, हाउसहोल्ड लॅटेक्स पेंट.. इत्यादी. तुमच्या बजेटमध्ये जे बसेल त्याची निवड करा आणि पेंटिंगला सुरुवात करा. यासाठी तुमची कलात्मकता आणि निर्मितीक्षमता भरभरून वापरता येईल. रंग देताना नेमक्या आकारातच देण्याची काळजी घ्यावी. त्याबाहेर रंग जाऊ देऊ नये. एकाच भिंतीवर खूप जास्त रंगांचा वापर करू नये. यासाठी मिक्स अ‍ॅण्ड मॅचची थीम छान दिसते. स्टेन्सिल्समध्ये झाडाची फांदी आणि पक्षी, नाजूक फुलांचा सडा, एखादी नाजूक स्त्री प्रतिमा अशी कितीतरी डिझाइन्स उपलब्ध आहेत. भिंतींचा रंग बदलणार नसाल तर आहे, त्या रंगाला मॅच होणारा रंग निवडून स्टेन्सिलच्या सहाय्याने चित्र काढता येईल. स्वयंपाकघरासाठी वेगवेगळ्या भाज्या, फळे असे डिझाइन निवडता येईल. स्टेन्सिल्स भिंतीवर चिकटवण्यासाठी चांगल्या अ‍ॅडेसिव्हचा वापर करावा. तसेच स्टेन्सिल्सवर प्रोटेक्टिव्ह कोट लावावा. त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं.

प्लेन रंगाने चार भिंती रंगवण्याचे दिवस आता संपले. त्याचबरोबर एक भिंत गडद करण्याचा ट्रेण्डही चलतीत असला तरी त्यात नावीन्य नाही. मग इंटिरिअर करताना नवं काय करायचं हा प्रश्न पडतो. अशा वेळी आपल्यातील कल्पकता, आधुनिकता यांचा सुरेख संगम साधून स्टेन्सिल्सच्या मदतीने घराच्या भिंतींना एक आर्टिस्टिक लूक देऊन सजवता येईल. त्यामुळे घरात येणा-या प्रत्येकाचं लक्ष चटकन त्याकडे वेधलं जाईल.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe

No comments:

Post a Comment