Saturday, June 1, 2013

कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही





कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही

मालवणमध्ये भुयारी गटार योजनेची कामे रखडण्याला कंत्राटदार जबाबदार आहेत. मात्र, त्यामुळे लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते.
मालवण- मालवणमध्ये भुयारी गटार योजनेची कामे रखडण्याला कंत्राटदार जबाबदार आहेत. मात्र, त्यामुळे लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. मात्र, भुयारी गटार योजनेतील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. कंत्राटदाराने कोणत्याही परिस्थितीत जिल्हाधिका-यांनी दिलेल्या मुदतीनुसार डिसेंबर अखेपर्यंत भुयारी गटार योजनेचे काम दर्जेदार पद्धतीने संपवले पाहिजे. अन्यथा कंत्राटदारांना काळया यादीत टाकले जाईल, असा इशारा राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते तथा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी दिला.
मालवणातील भुयारी गटार योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नितेश राणे यांनी गुरुवारी नगरपालिकेस भेट दिली. यावेळी नगरसेवक व अधिका-यांकडून योजनेच्या कामांची माहिती घेतली. यावेळी भुयारी गटार योजनेच्या कामात दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट झाल्याने राणे यांनी संबंधित कामातील कंत्राटदारांना बोलावून त्यांना खडे बोल सुनावले.
भुयारी गटार योजनेच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याने यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. कंत्राटदारांवर वचक न राहिल्याने ही कामे रखडल्याचे नितेश राणे म्हणाले. यावेळी सुधाकर पाटकर यांनी योजनेच्या कामाची सविस्तर माहिती देत कंत्राटदारांकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिले. कामासाठी तज्ज्ञ अभियंते नेमण्यासाठी नगरपालिकेने कंत्राटदारांना वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष होत असून आतापर्यंत केवळ २७ टक्के काम झाले असल्याचे पाटकर यांनी सांगितले. यावर नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त करत कंत्राटदारांना वारंवार मुदतवाढ मिळत असूनही दर्जेदार काम होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर राणे यांनी कंत्राटदारांना बोलावून घेतले. कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल राणे यांनी कंत्राटदारांना चांगलेच फैलावर घेतले. कंत्राटदारांनी केलेल्या कामाच्या दिरंगाईमुळे लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे नितेश राणे म्हणाले.
मनुष्यबळाची कमतरता असताना काम दिलेल्या वेळेत कसे होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कुठल्याही दिरंगाईला पाठीशी घातले जाणार नाही. नियोजित वेळेत काम न झाल्यास वेळप्रसंगी कंत्राटदारांना काळया यादीत टाकण्याबाबत जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे नितेश राणे म्हणाले.
मालवणच्या भुयारी गटार योजनेच्या कामावर आपण स्वत: लक्ष ठेवणार असून कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०१३पर्यंत काम पूर्ण झालेच पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष आचरेकर यांनी मालवण नगर परिषदेच्या इतरही प्रश्नांवर नितेश राणे यांचे लक्ष वेधले.

Read More »

बुडीत कर्जाबाबत कठोर नियमावली

देशातील बॅँकांच्या बुडीत कर्जाबाबत रिझव्‍‌र्ह बॅँकेने चिंता व्यक्त करून कर्ज पुनर्रचना करतानाचे नियम अधिक कडक केले असून याबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे.
मुंबई- देशातील बॅँकांच्या बुडीत कर्जाबाबत रिझव्‍‌र्ह बॅँकेने चिंता व्यक्त करून कर्ज पुनर्रचना करतानाचे नियम अधिक कडक केले असून याबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. जागतिक निकषाप्रमाणे ही तरतूद आणण्यात आली आहे. ज्यामुळे बुडीत कर्जे कमी होतील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे.
बॅँकांना कर्जाची पुनर्रचना करताना यापूर्वी दोन टक्के तरतूद करावी लागत होती, मात्र आजपासून पाच टक्के तरतूद करावी लागणार आहे. जुन्या कर्ज पुनर्रचना प्रकरणांना टप्प्याटप्प्याने हे नियम लागू केले जाणार आहेत.
बॅँकांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण हे संयमाचा कडेलोट करणारे असून एक एप्रिल २०१५ पासून ही सवलत बंद होणार आहे. गेल्या काही वर्षामध्ये सार्वजनिक तसेच खासगी बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण वाढले आहे. ज्यामुळे बँकांच्या नफ्याला फटका बसला आहे. आरबीआयच्या या नव्या नियमावलीने बुडीत कर्जावर काही प्रमाणात आळा बसणार आहे.
सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुनर्रचना केलेले खात्याचे वर्गीकरण बुडीत खात्यात केले जात नाही. मात्र नवीन नियमानुसार पुनर्रचना केलेले खातेही बुडीत खाते समजले जाणार आहे. त्यामुळे बँकांना बुडीत कर्जासाठी अधिक तरतूद करावी लागणार आहे. त्याचा मोठा परिणाम बॅँकांच्या नफ्यावर होणार आहे. पुनर्रचना केलेल्या कर्ज खात्यांचे प्रमाण कमी करावे, असा सल्ला बॅँकांना दिला आहे. त्यामुळे बॅँकांवरील भार कमी होईल, रिझव्‍‌र्ह बॅँकेने सांगितले.

Read More »

मंगळावर वाहत्या पाण्याचे भक्कम पुरावे

नासाच्या क्युरियॉसिटी या अंतराळवाहनाने(रोव्हर) मंगळावरील वाहत्या पाण्याचे भक्कम पुरावे उपलब्ध केले आहेत.
नासाच्या क्युरियॉसिटी या अंतराळवाहनाने(रोव्हर) मंगळावरील वाहत्या पाण्याचे भक्कम पुरावे उपलब्ध केले आहेत. यापूर्वी उपग्रहांकडून पाठवण्यात आलेल्या छायाचित्रांद्वारे या ग्रहावर नद्या किंवा झ-यांचे जाळे असल्याचे दिसत असले तरी या ग्रहावर यापूर्वी पाठवण्यात आलेल्या रोव्हर मोहिमांमध्ये तेथील वाहत्या पाण्याचे मर्यादित पुरावे दिले होते.
मात्र, आता क्युरियॉसिटी या मोहिमेअंतर्गत या रोव्हरचे पृथ्वीवरून नियंत्रण करणा-या पथकाने मंगळावरील खडकांचे सखोल विश्लेषण केले आहे. मंगळावरील खडकांच्या विश्लेषणात त्यांना जीवसृष्टीला पोषक असणारी, पाणी धारण करणारी खनिजे आणि सेंद्रीय संयुगे किंवा रासायनिक घटक आढळले आहेत. नासाच्या मंगळ विज्ञान प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी क्युरियॉसिटीच्या डोक्यावर बसवलेल्या 'मास्टकॅम' या कोणत्याही वस्तूचे सूक्ष्म बारकावे दाखवणा-या संवेदनशील कॅमेरा प्रणालीने घेतलेल्या छायाचित्रांचा त्यासाठी वापर केला आहे. या प्रणालीमध्ये दोन कॅमे-यांचा समावेश आहे.
क्युरियॉसिटी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मंगळावर ज्या ठिकाणी उतरले होते, त्या ठिकाणापासून ते पुढे सरकत गेले आणि सध्या ते 'येलोनाइफ बे' नावाच्या ठिकाणी संशोधन करत आहे. या भागात या रोव्हरने एका विशाल खडकाचे छायाचित्र घेतले आहे. या खडकाची निर्मिती अनेक गोल दगडगोटय़ांपासून झालेली आहे व हे दगडगोटे अनेक सेंटिमीटर जाड अशा गाळामुळे एकमेकांना चिकटले असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.
अशा प्रकारची रचना असलेल्या खडकांमुळे पूर्वी मंगळ उबदार होता व त्याच्या पृष्ठभागावर अनेक किलोमीटर लांब पाणी वाहत होते, याचे संकेत मिळत आहेत, असे या पथकातील कॅमे-याचे नियंत्रण करणा-या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. वाहत्या पाण्याकडून झालेल्या कार्यामुळे खडकांची अशा प्रकारची रचना तयार होते. तसेच या दगडगोटय़ांचे बारकाईने निरीक्षण केल्यावर ते एका किंवा अनेक वेगाने वाहणा-या उथळ झ-यांनी वाहून आणल्याचे दिसत आहे. हा झरा एक मीटर खोल असावा आणि त्याचा वेग सेकंदाला ०.२ किंवा ०.७५ मीटर असावा, असा त्यांचा अंदाज आहे. नदीमधील या अवशेषांमुळे तेथे द्रवरूप पाण्याचा प्रवाह होता, असा ठाम विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.


Read More »

सिंधुदुर्गातील ५२ गावांमध्ये पाणी प्रश्न

सिंधुदुर्गातील जवळपास १९९ गावात भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठयाची कामे हाती घेण्यात आली. मात्र यातील ५२ गावांमधील ग्रामस्थांना पाणी मिळालेले नाही.
सिंधुनगरी- सिंधुदुर्गातील जवळपास १९९ गावात भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठयाची कामे हाती घेण्यात आली. मात्र यातील ५२ गावांमधील ग्रामस्थांना पाणी मिळालेले नाही. त्यामुळे या योजनांची पूर्ण चौकशी पूर्ण करून ग्रामीण पाणीपुरवठा समित्यांवर कारवाई करावी, असे आदेश जलव्यवस्थापन समिती सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निकिता परब यांनी दिले.
जिल्ह्यात भारत निर्माण योजनेची कामे सुरू झाली. मात्र गावच्या पाणीपुरवठा समितीने ही कामे पूर्णत्वाकडे नेली नाहीत तसेच हिशेबही पूर्ण केला नाही. देवगडमधील वानिवडेसारख्या गावात ४२ लाख खर्च झाले मात्र ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही. येथील ५२ गावांमध्ये पाण्याचा प्रश्न कायम आहे. जर गावच्या समित्या ही कामे पूर्ण करत नसतील व हिशेब देत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेशही अध्यक्षांनी दिले. जलव्यवस्थापन समितीची सभा निकिता परब यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. यावेळी उपाध्यक्ष मधुसूदन बांदिवडेकर, सभापती निकिता तानावडे, प्रमोद कामत, अनिल कांदळकर, अंकुश जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. वाय. जाधव, अन्य खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील ११७ हॉटेलांची तपासणी
जिल्ह्यातील ११७ हॉटेलांची तपासणी करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत सर्वच हॉटेलची तपासणी पूर्ण करण्यात येईल. हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे पिण्याचे पाणी तसेच काम करणारे कर्मचारी यांची तपासणीही आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्याचे डॉ. सोडल यांनी सांगितले.
विलवडेतील साथ आटोक्यात
विलवडे येथील अतिसाराची साथ पूर्णपणे आटोक्यात आली आहे. २४ तारखेपासून तेथे एकही रुग्ण सापडलेला नाही. ही साथ दूषित पाण्यामुळेच उद्भवली होती. मैलामिश्रित पाणी विहिरीत मिसळल्याने ही साथ आली, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. त्याच ठिकाणी कॉल-याचे १२ रुग्ण आढळले होते.

Read More »

कोळसा नियंत्रणमुक्त करा

देशातील कोळसा क्षेत्राला सरकारने नियंत्रणमुक्त करून खाजगी उद्योगांना त्यांच्या खाणीतील कोळसा विकण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) सरकारकडे केली आहे.
नवी दिल्ली- देशातील कोळसा क्षेत्राला सरकारने नियंत्रणमुक्त करून खाजगी उद्योगांना त्यांच्या खाणीतील कोळसा विकण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) सरकारकडे केली आहे.
सीआयआयने खनिज वाटप पद्धत याबाबतचा अहवाल तयार केला आहे. या अहवालात कोळसा उद्योग नियंत्रणमुक्त करून खाजगी कंपन्यांना त्यांचा कोळसा विकण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा निर्माण होऊ शकेल, असे अहवालात म्हटले आहे.
कोळसा खाणींचे १९७३ साली राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर कोल इंडिया ८० टक्के कोळसा उत्पादन करीत आहे. खाजगी कंपन्यांही ऊर्जा, पोलाद, सिमेंट उद्योगाची कोळशाची गरज भागवू शकतात. त्यामुळे विकासाचा वेग वाढू शकेल, असे सीआयआयने सांगितले. खासगी कंपन्यांना कोळसा खाण वाटप आणि उत्खननास परवानगी दिल्यास त्याचा एकूण उत्पादनाला फायदा होईल. कोळसा क्षेत्रात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढवण्यासाठी कोळसा नियंत्रणमुक्त करणे आवश्यक असल्याचे सीआयआयने म्हटले आहे.
जागतिक स्तरावरील सवरेत्कृष्ट कार्यपद्धतीचा समावेश भारतीय खनिज धोरणात यायला हवा. विशेषत: कोळसा उद्योग नियंत्रणमुक्त करणे आणि खाजगी उद्योगांना कोळसा खाणी शोधण्यात मदत करणे आदींमध्ये गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे.
कोळसा उद्योगासाठी स्वतंत्र नियामक संस्था उभारली जाणे गरजेची आहे. कोळसा वाटप प्रक्रियेचे व्यवस्थापन, नवीन खाणींचा शोध, खाणींचे नियोजन व विकास आदी कामे त्यांच्याकडे सुपूर्द करायला हवीत, असेही अहवालात नमूद केले.

Read More »

घालमेल करणारा घराघरांतला सदस्य

काय? तो एक छोटा आयताकृती पडदा..!! १९७२ पासून मुंबईत. ७३ पासून पुणे आणि परिसरांत आणि त्यानंतर, गेल्या चाळीस वर्षात, महाराष्ट्रांत सर्वदूर.
काय? तो एक छोटा आयताकृती पडदा..!! १९७२ पासून मुंबईत. ७३ पासून पुणे आणि परिसरांत आणि त्यानंतर, गेल्या चाळीस वर्षात, महाराष्ट्रांत सर्वदूर. ग्रामीण भागांतील अगदी वाडया-वस्त्यांपासून हवेल्या, चिरेबंदी वाडय़ांपर्यंत, शहरांतल्या आणि महानगरांतल्या झोपडपट्टय़ांपासून ते आकाशाला गवसणी घालू पाहणा-या टोलेजंग इमारतींतल्या उच्चभ्रू समाजातल्या घराघरांपर्यंत, त्या राहणा-या अबाल-वृद्ध माणसांच्या मनांत रुजलेला, बहरलेला.. एखादी अस्तित्वात नसलेली बाब, अचानक अनावृत्त.. Discover.. व्हावी आणि सगळी मंडळी त्याच्या प्रभावांत चकित, अचंबित होत, वाहवत जावीत नां, त्यातलाच हा प्रकार..
हा पडदा आपल्या घरातला एक सदस्य असल्यासारखा. त्याची इतकी सवय झाली आहे आपल्याला की आपण, आपली सुख-दु:ख, व्यथा-विवंचना, उमेद-उत्साह, आकांक्षा-अपेक्षा यांच्या प्रतिबिंबासाठी, परिपूर्तीसाठी दिवसेंदिवस त्याचे अतिवेगानं गुलाम होत चाललोय. कधी कधी पडद्यावरच्या, अर्थाअर्थी आपला काही संबंध नसलेल्या, द्विमितींतल्या, हलत्या, चालत्या-बोलत्या चित्रांच्या, बहुतांश वेळा, नाटकी, खोटय़ा भावभावनांशी आपण स्वत:ला इतकं निगडित करतो आहोत, की त्यापोटी ख-याख-या नातेसंबंधांशी, सुहृदांसाठी, प्रसंगी भांडणं करीत वैर पत्करायलासुद्धा आपण तयारी दर्शवायला लागलोय..
बरं नाहिये हे पण खरं आहे..
आता गेली चाळीस वर्ष मी या चित्रवाणी मनोरंजन व्यवसायात आहे, पण मला प्रकर्षानं जाणीव झाली या सगळ्यांची गेल्या शनिवारी.. आयपीएलच्या उपांत्य सामन्यादरम्यान.. कोलकोत्याच्या ईडन गार्डन मैदानावरच्या मुंबई इंडियन्स् आणि राजस्थान रॉयल्स् यांच्यातल्या लढतींत.. माझ्या वयाला आणि त्याबरोबर वाढ होणं अपेक्षित असलेल्या परिपक्वतेला छेद देणारं विचित्र वर्तन माझ्याकडून त्या दिवशी नकळत घडत होतं..
'पुढचं पाऊल' मधल्या विरंगुळ्याच्या क्षणांदरम्यान, सर्फिग करीत सामना दाखवणा-या वाहिनीकडे जावं, तर तिथं नाणेफेकीचं पुढचं पाऊल काही पडत नव्हतं.. इकडं रूपेच्या आचरट, अर्तक्य उलटं पाऊल थांबलं तरी आपली तिकडं चर्चाच सुरू. खूप चिडचीड होत होती. कधी एकदा सामना सुरू होऊन, अखेरचं षटक संपून, माझा मुंबई इंडियन्स् संघ जिंकतोय, असं झालं होतं. आता बधा डवाइन् स्मिथ्, पोलार्ड, जॉन्सन् काय माझे कोणी लागत होते कां..
अर्थाअर्थी काही संबंध नव्हता आमचा. पण पडद्यानं आमच्या नात्याची वीण गेला महिना सव्वा महिना इतकी घट्ट केली होती, की त्यांच्या कामगिरी, कर्तबगारीकडं अतिरेकी अपेक्षेनं बघत होतो मी.. पाऊस.. तो थांबल्यावर, खेळपट्टीच्या परत परत तपासण्या, त्यात आरआर नं जिंकलेली नाणेफेक. पॅड्-ग्लव्ह् घालून, अजून पडणा-या दुष्ट थेंबांपासून, हातातली बॅट् वाचवीत, डग आउटमधले अस्वस्थ अजिंक्य राहाणे आणि अजिंक्य राहुल द्रविड.. उगाचच सगळेच फासे उलटे पडत असल्यासारखं भासत होतं..
माझा पुणेकर भाचा बसला होता शेजारी. त्याला मुंबईशी काही देण-घेण नव्हतं.. हसत होता माझी अवस्था बघून.. मला आणखी चिडवण्यासाठी. अहो, नाही म्हटलं तरी आयुष्याची उणीपुरी तीस-चाळीस उमेदीची र्वष या काम करू इच्छिणा-या प्रत्येक हातात पुरेपूर दाम ठेवणा-या मोहमयी, माया नगरीनं, आपल्या हातात माया ममतेनं जोजवलं, जोपासलं होतं मला.. माझी मुंबई, म्हणतानासुद्धा ऊर भरून येतं अजून.. असो..
थांबला एकदाचा पाऊस. सुरुवात फारशी बरी न झालेल्या आरआर नं शेवटच्या चार षटकांत, तब्बल ६५ धावा कुटत, मुंबईच्या, 'कुथत'वाटचालीची तजवीज करून ठेवली.. कारण दोनच दिवसांपूर्वीच्या, 'पिवळ्यां'बरोबरच्या पराजयाच्या जखमा ताज्या होत्या अजून मनांत. स्मिथची आणि आदित्यची बॅट बोलायला लागली.. आणि विजयाच्या आशा पल्लवीत होत होत्या तोच.. हाय रे दैवा..! आदित्यपाठोपाठ दिनेश, रोहित, पोलार्ड परतले की हो तंबूंत..! माझा दुष्ट भाचा गडगडाटी हसायला लागला आणि मी त्याला अद्वातद्वा, अवाच्या सव्वा बोलायला लागलो.. 'तू..तू.. अपशकुनी आहेस..
पुढच्या सामन्याच्या वेळी (ती वेळ येऊ दे रे..) पाऊल टाकू नको माझ्या घरांत..!' वगरै अंधश्रद्धेने बरबटलेले उद्गार (दुस-या दिवशी मलाच माझी लाज वाटली हो..) रायडू बाद ! एक षटक ९ धावा.. नवीन गोलंदाजानं अचाट धर्य दाखवत मारलेला अतक्र्य चौकार, मग एक चोरटी धाव.. आणि अखेर दोन चेंडू, एक घाव आणि भज्जीचा उत्तुंग षट्कार..
हुश्श्..
अरे या, 'चक्षुर्वै:सत्यम्' नाटय़ापुढे, कसलं काय नि कसलं काय..! रायडू बाद झाल्यावर, हाडाच्या मुंबैकरांच्या, आठ-दहा विकेट्स.. मी खात्रीनं सांगतो.. नक्की पडल्या असणार मुंबैत..! काही जण दिवे बंद करून, निराश होत ते, 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' अशी वेळ येऊ नये म्हणून, घबराटीनं वाढलेल्या घामाच्या धारा पुसत झोपायच्या प्रयत्नालासुद्धा लागले असतील..!हे सगळं कां घडतं? तर तो घरातला एक सदस्य. आपणच करून घेतलेला.. छोटा आयताकृती पडदा..आपल्या जीवाची घालमेल घडवून आणतो..पटलं ?


Read More »

फॉर्म्युला

नाटकाचं छोटं रूप म्हणजे एकांकिका! या एकांकिकेचा विषय कसा सापडतो, विषय सापडला की त्याचं नाटयात रुपांतर कसं होतं, त्यातली पात्रं, त्यांच्यातील नाटय, विविध प्रसंग याचा डोलारा कसा उभारावा जेणेकरून प्रेक्षकांच्या अंतर्मनाचा ठाव घेईल, थोडक्यात कोणतीही एकांकिका कशी लिहावी याचा फॉर्म्युला सांगणारा हा लेखप्रपंच!
स्पर्धेच्या एकांकिका म्हटल्या की त्यांचे काहीसे फॉर्मुले तयार झालेत. स्पर्धेच्या सादरीकरणाला नेमकं काय लागतं याची मेख ज्या लेखकास अवगत, तो स्पर्धेतला यशस्वी लेखक. यशस्वीतेला पायाशी लोळण घालायला लावणारा लेखक मिळणा-या मानधनामुळे इन्कम टॅक्स रिटर्न्‍स फाइल करू शकतो. त्या अनुषंगाने लेखक म्हणून करिअर करू इच्छिणा-या नवलेखकांनी हे फॉर्म्युले आत्मसात करायला हवेत, अन्यथा त्यांनी नाटक या साहित्य प्रकाराला 'हात' घालू नये.
मिळालेली एक-दोन पारितोषिके नक्कीच तीन-चार सिरिअल्स मिळवून देतात. एखाद्या सोप सिरिअलचे महिन्याला पंचवीस एपिसोड टी.व्ही.वर दिसतात. एका एपिसोडचे सध्या मिळणारे मानधन साधारण रुपये तीन हजार, गुणिले पंचवीस म्हणजे महिन्याअंती पंच्याहत्तर हजार कुठेच गेले नाहीत. दोन सिरिअल्स असतील तर दीड लाख आणि तीन असतील तर सव्वा दोन लाखाचे महिना उत्पन्न असलेला लेखक जागोजागी मीडियात दिसू लागलाय. त्यामुळे नवलेखकांना करिअरचा एक वेगळा मार्ग उपलब्ध झालाय.. यात अतिशयोक्ती अजिबात नाही, कारण उदाहरण द्यायचंच झाल्यास माझं द्यावं लागेल.
३१ डिसेंबर २०१० तारखेला नवीन वर्षाचा संकल्प म्हणून हाती असलेल्या चार मालिकांचं लिखाण बंद केलं, याला कारणं अनेक होती. एक लेखक आणि मालिका चार..! कुठल्याच विषयात पूर्णत: लक्ष केंद्रित करता येत नव्हतं. त्यात मालिकावाल्या ई. पी. चा (एक्झिक्युटीव्ह प्रोडय़ूसरचा) ससेमिरा, सेटवर येऊन लिखाण करण्याचा असायचा. एका माणसाला ते शक्य नसल्याने मी हाताखाली मालिका लिहायला असिस्टंट्स नेमले. पेपर तपासायची सवय असल्याकारणाने एपिसोड तपासायचो. असिस्टंट फोनवरून मला ईपीची 'गरज' सांगायचे. मग त्या एपिसोडमध्ये त्यांच्या गरजा आमच्या लिखाणामुळे डोकावायच्या.
एका स्वतंत्रपणे लिखाण करणा-यासाठी ही प्रक्रिया अगम्य आणि अनाकलनीय होती. त्यातही सामंजस्याने वागून मालिका इंडस्ट्रीला सेवा पुरवत राहिलो. परिणामी लेखन बोथट होत गेलं आणि भाषा सपक..! एकांकिका लिहून कमीत कमी शब्दांत, कमीत कमी वेळात आशय मांडायची लागलेली सवय पूर्णत: नामशेष होण्याच्या मार्गावर होती. आमच्या अन्य लेखक मित्रांनी मला त्या व्यसनाच्या जाळ्यातून वेळीच मागे ओढलं म्हणून वाचलो.. अन्यथा हा कॉलम लिहिण्याची लायकी शिल्लक राहिली नसती.
लिखाणाला समृद्धी येते ती केवळ सातत्याने लिखाण केल्यानं.. हा समज चुकीचा आणि प्रासंगिकतेला धरून आहे, याची खात्री झालीय, म्हणून हे विधान खोडून काढण्याचा माझा प्रयत्न आहे. लिखाणाला भरपूर वाचनाची, मननाची आणि चिंतनाची जोड हवीच. आज मी एकांकिका लिखाणाच्या फॉर्मुल्यासंबंधी लिहिणार आहे. अर्थात, माझ्या आकलन क्षमतेनुसार..!
नाटक जन्माला येतं तेच मुळी नाटय घेऊन, विचार घेऊन, सादरीकरणाची क्षमता व शक्याशक्यता अंगी बाळगून, नाटककार हा कुठल्याही दृक्-श्राव्य कलाप्रकारांपैकी विचारात घेतल्या जाणा-या कलाप्रकाराशी केवळ निगडितच नव्हे तर त्यातील जाणकारच असावा. नाटक म्हटलं की त्यात स्थापत्यकलेपासून ते विपणनापर्यंतच्या (मार्केटिंग) कलाप्रकारांचा विचार होणं आवश्यक आहे, त्यामुळे नाटककाराची निर्मिती ही कुठल्याही चित्रापेक्षा किंवा गायनापेक्षा थोर समजणं क्रमप्राप्त ठरतं. नाटक ज्या स्थळी घडणार त्या स्थळाचा विचार करून त्यानुसार नेपथ्य रचनेसाठी दिलेल्या रंगसूचना म्हणजे स्थापत्यकलेचं भान असल्याशिवाय कल्पनाचित्र तयार करणं कठीणच आहे.
पात्ररचना, पात्राची स्वभाव गुणवैशिष्टयं म्हणजे एखाद्या मानसशास्त्रज्ञानं जन्मास घातलेली व्यक्तिचित्रं. मूळ कथावस्तूचा विचार करता निर्माण केलेल्या पात्रांची रचना म्हणजे नाटय़. मनोरंजनाचा स्तर वाढवण्यासाठी त्यात पेरलेल्या काव्यरचना म्हणजे गेयता आणि संगीताचं भान असल्याचं सम्यक दर्शन. नाटकाच्या भावतरंगांची दृश्यात्मकता अधोरेखित करण्यासाठी प्रकाशयोजना तथा रंगभूषेचा संहितेत उल्लेख म्हणजे आहार्य आणि सात्त्विक अभिनयाचं लेखकास असलेलं ज्ञान. या सर्व बाबींचा वापर लिखाणात झाला तरच तुमच्या नाटकाला परिणामांचं परिमाण प्राप्त होतं.
पहिल्यांदा विषय सापडणं आणि तो सापडला की त्याचं रूपांतरण नाटय़ात कसं होईल याचा विचार कुठलाही लेखक करणारच, मग नाटय घडवणारी पात्रं, त्यांची नाटय़ातली उपस्थिती यावर संहितेचा डोलारा उभारला जातो. त्या डोला-याला उंची प्राप्त होते. कथावस्तू त्यानुसार आशयाच्या अनुषंगाने मार्ग काढत राहते. कथावस्तू सशक्त बनवण्यासाठी प्रसंगरचना एकामागोमाग एक अशा रीतीने रचाव्या लागतात की त्या कथासूत्रास गती प्राप्त होते. हीच गती प्रेक्षकांच्या अंतर्मनाचा ठाव घेऊन नाटयाशी बांधून ठेवण्याचं काम करते.
सर्वात शेवटी विचारात घ्यायची गोष्ट म्हणजे लिखाणाच्या विषयाशी जोडली गेलेली विचारांची खोली. ती एकदा प्राप्त झाली की लेखकाची संहिता प्रयोगशील होण्यास वेळ लागत नाही, पण मग उंची, गती, खोली मोजण्याची परिमाणं कोणती? हे कुणीही सुज्ञ विचारणारच.. तर अशा फूटपट्टय़ा बाळगणा-यांच्या शोधात मीदेखील आहे.
मध्यंतरी एका स्पर्धेत टी. के. टोपे रात्र महाविद्यालयानं सादर केलेली 'आम्ही एकांकिका शोधत आहोत' लक्षात राहिलीय ती याच कारणांसाठी, की सादर होणा-या एकांकिकांसाठी पारितोषिक हेच एक परिमाण सर्वमान्य झालंय. मग हे परिमाण व्यक्तिनुरूप अथवा परीक्षकांनुरूप का बदलतं? तर त्या परीक्षकांची त्या त्या वेळची निर्णयक्षमता.. हेच त्याचं उत्तर असू शकतं.
एखादी संहिता मग ती नाटकाची असो वा चित्रपटाची, योग्य आणि सामायिक परिमाण साधत असेल तर पारितोषिकांचं परिमाण का बदलायला लावते? एखाद्या स्पर्धेत ती प्रथम क्रमांकावर असते तर एखाद्या स्पर्धेत दुर्लक्षित का ठरते? एकांकिका शोधण्यात सर्वात जास्त वेळ याच गोष्टींवर खर्च होत असतो. एखादा लेखक सेल्समनच्या रूपात हजर होऊन एखाद्या नाटयसंस्थेच्या दारात उभा ठाकतो. आपल्या पोतडीतून निरनिराळ्या विषयांवर आधारित असलेल्या एकांकिका स्पर्धक ग्राहकांच्या समोर मांडतो. स्पर्धेसाठी नेमका कुठला विषय परीक्षकांना आवडू शकतो, यावर भाष्य व चर्चा होते, त्यातून सर्वमताने निर्णय होऊन एकांकिका निवडली जाते. या गमतीच्या प्रक्रियेत लेखकाची भूमिका सेल्समनचीही असू शकते, हे मात्र विचार करायला भाग पाडणारं आहे. म्हणजेच स्पर्धेच्या सादरीकरणासाठी चोख असे फॉम्र्युले जन्माला आलेत, असं दुर्दैवानं म्हणायलाच लागतं.
नाटक हा भास आहे. हे विधान भरतमुनींपासून भक्ती बर्वेपर्यंत सर्वानी उच्चारलंय. मग वास्तवाचं भान राखणारं नाटय़ कसं असतं? वास्तवाचा विचार करता भास निर्माण करणा-या नाटकांना खोटं नाटक म्हणता येतं का? मुळात चार भिंतीत घडणारं नाटय़ प्रेक्षकांना दिसावं म्हणून गृहीत धरलेल्या भिंतीची उपलब्धता नसल्या कारणाने खोटं मानावं का? नाटय़प्रसंग ठळकपणे मांडण्याच्या अट्टहासापायी अथवा हव्यासापोटी अंगीकारलेली प्रायोगिक क्लृप्ती नाटय़ाविष्काराचा खोटेपणा सिद्ध करते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या निमित्तानं तपासायला हवीत.
एखादा लेखक स्वानुभवावर नाटय़रचना करत असेल किंवा त्यात अनुभवजन्य प्रसंगांची योजना करत असेल तर तो भास कसा, या प्रश्नांची उत्तरं अस्तित्ववादाला छेद देणारी आहेत. नाटय़ाचा विचार अध्यात्माच्या पातळीवर होवो वा नव्याने जन्मास आलेल्या सुप्त रंगभूमीच्या (सबकॉन्शिअस थिएटर) पातळीवर, वास्तववादाला धरूनच चालणार..! केवळ शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा एखाद्या नटानं प्रेक्षकांच्या दृष्टीने न्याय देऊन अभिनीत केली, म्हणून तो भास निर्माण केला गेला अथवा वास्तवसापेक्ष नेपथ्य, आभासी रचना म्हणजे भास, म्हणण्याची विधानं मागे पडू लागलीयत. नव्हे ती नव्यांच्या नाटक चळवळीतून बदलण्याच्या शक्यता निर्माण झाल्यात.
रंगभूमीवर होणारे नवनवीन प्रयोग कृतिशील अथवा केवळ प्रयोगशील न राहता, त्यातून वेगवेगळ्या मंचीय व्याख्या आणि सिद्धांत (थिअरीज) नव्याने निर्माण होण्याच्या शक्यता जन्म घेताहेत. आणि हे केवळ एकांकिका किंवा दीर्घाकाच्या माध्यमातूनच पडताळले जाताहेत. या सैद्धांतिक प्रयोगांची दखल घेण्याची पात्रता समीक्षकांच्या अंगी असेलच असं नाही.
कारण छापून येणारी प्रत्येक नाटय़समीक्षा ही एक तर कथावस्तू तरी मांडणारी असते किंवा मुलाखतीवर आधारभूत..! अशा स्वरूपाची समीक्षा लिहिणारे परीक्षक म्हणून प्रयोगकर्त्यांच्या समोर येतात आणि मग मात्र फुटपट्टय़ा तयार होण्याची क्रिया आपसूकच घडते, घडवली जाते. प्रश्न आहे तो नवीन येणा-या पिढीसमोर नाटक म्हणजे केवळ मनोरंजन या व्याख्येला, नाटक म्हणजे केवळ भास या विधानाला आणि नाटय़ म्हणजे त्रिमित कलाविष्कार या समजुतीला, आम्ही छेद देणार आहोत का? की फॉर्म्युलाबाज नाटक स्पर्धेत आणखी एका सादरीकरणाची भर घालणार आहोत? हा..!

Read More »

'रेस'

करमणुकीची अनेक माध्यमं आहेत. त्यांना कधी कधी व्यसनाचं आणि व्यवसायाचं स्वरूप  मिळतं. खेळही त्याला अपवाद नाहीत. काही खेळं तर व्यसन व व्यवसाय म्हणूनच नावारूपाला आले आहेत. त्यातलाच एक खेळ म्हणजे घोडयांच्या शर्यतीचा. रेसकोर्सवर घडलेल्या या काही गमतीजमती.
घोडयांच्या रेसची दुनियाच निराळी, एका वेगळ्याच मस्तीत, बेहोशीत जगणारी! 'येनकेन प्रकारे पैसा कमावणं' हे एकमेव ध्येय मनी बाळगूनच लोक इथे येतात त्यासाठी वाटेल त्या क्लृप्त्या लढवतात. विलासदत्त राऊत म्हणजे रेसचे जुने जाणते अभ्यासक व आमचे गुरू! 'कोणत्याही घोडय़ावर बेटिंग करणार नाही' या अटीवरच मला महालक्ष्मी रेसकोर्सवर घेऊन आले होते. तिथे प्रत्यक्ष घडलेली ही घटना!
त्या दिवशी पाच बी वर्गाची रेस होती. कोणतीही रेस न जिंकलेले दहाबारा घोडे त्या रेसमध्ये पळणार होते. अभ्यासू पंटर्स ही रेस कधीच खेळत नाहीत, कारण या रेसमध्ये कसलेच लॉजिक चालत नाही. प्रत्येक घोडय़ावर सप्रमाणात बेटिंग झालं होतं. सर्वाना चार ते सहा रु. भाव दिला गेला होता. रेसच्या दहा मिनिटं आधी एकाएकी एका नगण्य घोडय़ावर, भाईजानवर जबरदस्त बेटिंग होऊ लागलं. रेस सोडा, पण बोर्डावरही हा कधी पहिल्या पाचात आला नव्हता. भाईजानवर अॅप्रेंटिस जॉकी बसणार होता. त्याला चाबूक वापरण्याची परवानगी नव्हती. विशेष म्हणजे भाईजानचा मालकही रिंगमध्ये नव्हता. तरीही भाईजान हॉट फेव्हरीट झाला होता.
पॅडॉकमधील घोडे बाहेर पडू लागले. रेस बाराशे मीटरची होती. भाईजान निमूटपणे त्याच्या ड्रॉ नंबरवर उभा राहून इशाऱ्याची वाट पाहत होता. स्टार्टरने शिट्टी वाजवून तांबडे निशाण खाली केलं. स्टुअर्टची गाडीही पुढे निघाली. भाईजान रोक्ट्रन पळणाऱ्या थव्यामध्ये होता. भाईजानवर तुफान बेटिंग करणारे पंटर्स निराश झाले होते. रेस अर्ध्या अंतरावर आली. तेव्हा मात्र भाईजान सुसाट सुटला. आघाडीवरच्या सात घोडय़ांना लीलया मागे टाकून विनिंग पोस्टवर एकटाच निघाला. क्षणार्धात त्याने विनिंग पोस्टही पार केला.
पंटर्सनी हल्लागुल्ला करत रेसकोर्स अक्षरश: डोक्यावर घेतलं. स्टुअर्ट आश्चर्याने आणि संतापाने भाईजानकडे पाहू लागला. कारण नवखा घोडा इतक्या सहजासहजी जिंकणं शक्यच नव्हतं. भाईजानचे वजनही बरोबर होते. पांढरा गोळा वर गेला होता. भाईजान रेस जिंकला होता. बुकींनी विजेत्या पंटर्सना पैसे वाटण्यास सुरुवात केली होती. पांढरा गोळा म्हणजे सर्व काही बरोबर असल्याचा सिग्नल त्यांना मिळाला होता.
भाईजान घामानं निथळत होता. जॉकी कपडे बदलण्यास निघून गेला होता. मोतद्दार भाईजानला तबेल्यात घेऊन जाण्यासाठी आले होते. स्टुअर्टनी भाईजानकडे नजर टाकली तो त्याला थोडा संशय आला. घोडय़ाच्या पायाशी काळ्या रंगाचं घामाचं थारोळं होतं. स्टुअर्टनी रुमालाने घोडय़ाची पाठ घासली तर रुमाल काळाकुळीत झाला व रुमाल जिथे घासला तेथे भाईजानची तांबडय़ा रंगाची कातडी दिसू लागली. भाईजान तर काळा घोडा होता. याचा अर्थ रेस जिंकलेला घोडा भाईजान नव्हता.
स्टुअर्टनी भाईजानच्या अश्वशिक्षकाला बोलावून घेतलं. त्यांच्यासमोर भाईजानच्या अंगावर बादलीभर पाणी ओतलं. तो घोडा आपल्या मूळ तांबडय़ा रंगात चमकू लागला होता. क्लबच्या कर्मचाऱ्यांनी खोगीर लगाम काढून त्या घोडय़ाला धुऊन पुसून काढलं. त्याच्यावरील मार्किंग (खुणा) तपासलं. रेसकोर्सवर प्रत्येक घोडय़ाचं वेगळं मार्किंग असतं. (ओळखखूण असते.) क्लबच्या रजिस्टरप्रमाणे तो घोडा भाईजान नव्हे तर गोल्डन स्लिपर होता आणि गोल्डन स्लिपर हा पहिल्या वर्गाचा अनुभवी घोडा होता. याचाच अर्थ भाईजान ज्या सहजतेने, वेगाने, दिमाखाने बी क्लासच्या बारा घोडय़ांची रेस जिंकला होता तो रन प्रत्यक्षात गोल्डन स्लिपरचा होता.
कुणीतरी क्लबची व बुकींची प्रचंड फसवणूक केली होती. पंटर्सना पूर्ण पेमेंटही झालं होतं. रेसचा निकाल जाहीर होऊन पंधरा मिनिटं झाली होती. पैशांचं सर्व वाटप पूर्ण झालं होतं. भाईजानच्या अश्वशिक्षकाने लबाडी केली होती. त्याचं ट्रेनिंग लायसन्स काढून घेण्यात आलं, रेसकोर्सवर प्रवेशबंदी घालण्यात आली. भाईजानचा विजय डिसक्वालीफाय करण्यात आला. तेव्हापासून रेसच्या आधी घोडय़ांचे मार्किंग क्लबच्या रजिस्टरवरून तपासण्याचा प्रघात अस्तित्वात आला.

Read More »

नन्ना रे नन्ना रे..

लंडनला गेलेला कुणी भारतीय लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड पहायला पोहोचला नाही, असे सहसा होत नाही. तिथले अधिकृत मार्गदर्शक अशा भारतीयांना हमखास लॉर्ड्सच्या इमारतीमध्ये दुस-या मजल्यावर असलेली भारतीय क्रिकेट संघाची ड्रेसिंग रूम दाखवतात. तिथल्या कोचांवर आणि खुच्र्यावर भारतीय संघातील कर्ते-धर्ते कोण कुठे बसतात ते दाखवतात. तिथे एक ब्लॅक लेदरची एक्झिक्युटिव्ह चेअर आहे. ती आहे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी याची. तिथे म्हणे ढोणी आत शिरला की थेट या चेअरवर विसावतो, खुर्ची रूमच्या कोप-यातील टीव्हीकडे वळवतो आणि टीव्हीवर मॅच वा जाहिराती बघत बसतो, कुणाशी फारसा बोलत नाही.. हे माहिती असलेल्या क्रिकेटवेडय़ांना, आयपीएलमधील सामन्यांच्या फिक्सिंगचे एवढे वादळ घोंघावत असतानाही ढोणीने तोंडाला लावलेल्या चिकटपट्टीचे नवल विशेष वाटणार नाही. खुद्द ढोणीच्याच चेन्नई सुपर किंग्ज संघाविषयी इतका गोंगाट सुरू असतानाही ढोणी मात्र मौन धारण करून बसला आहे. लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रूममधील त्याचे वर्तन लक्षात घेतले तर मौनात जाण्याचे धडे ढोणीने फार पूर्वीपासून आत्मसात केले असणार हे सांगण्यासाठी कुणा भविष्यवेत्याची गरज नाही. नुकताच भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना झाला तेव्हा आणि लंडनला उतरल्यावर झालेल्या दोन्ही पत्रकार परिषदांमध्ये ढोणीने तोंड उघडले होते पण, आयपीएल स्पॉटफिक्सिंगच्या प्रश्नांचे गुगली पत्रकारांकडून सुरू झाल्यावर त्याने लगेचच 'नन्ना रे नन्ना रे.. आता नाही नंतर बोलीन रे, योग्य वेळी तोंड उघडेन रे..' अशी राजकीय भाषा सुरू केली. क्रिकेटच्या आखाडय़ात आता इतक्या राजकीय मंडळींचा वावर असतो आणि त्यांच्यातच इतकी खडाखडी सुरू असते की ढोणीला त्यांची राजकीय भाषा आत्मसात करायला अजिबात कष्ट पडले नसावेत. शिवाय मौनात असताना या भाषेचे धडे गिरवायला त्याला भरपूर वेळही मिळत असणार.. ढोणीचा आयपीएलमधील संघच फिक्सिंगचा केंद्रबिंदू असताना आणि ढोणीने कर्णधार म्हणून मय्यपनला संघाच्या डावपेचांची माहिती दिली असताना त्याच्यावर संशयाची सुई रोखली जाणे साहजिक आहे. मौनात जायला ढोणीने अगदी योग्य वेळ निवडली आहे.


Read More »

तुटीवर नियंत्रण मिळवण्यात यश

कर संकलनामध्ये झालेली वाढ आणि खर्चकपातीवर भर दिल्याने २०१२-१३ या वर्षात वित्तीय तुटीला नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आले आहे.
नवी दिल्ली- कर संकलनामध्ये झालेली वाढ आणि खर्चकपातीवर भर दिल्याने २०१२-१३ या वर्षात वित्तीय तुटीला नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आले आहे. या वर्षात वित्तीय तूट ४.८ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. याआधी वित्तीय तूट ५.२ टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
२०१२-१३ मध्ये १०.३८ लाख कोटींचा महसूल मिळेल, असा अंदाज सरकारने अर्थसंकल्पामध्ये व्यक्त केला होता. प्रत्यक्ष कर संकलनात घट झाली असली तरी अप्रत्यक्ष कर संकलन वाढले. ज्यामुळे सरकारला कर स्वरुपातील महसूल जादा मिळाला असल्याचे अर्थ खात्यातील एका अधिका-याने सांगितले.
गेल्या वर्षात प्रत्यक्ष करातून ५.६५ लाख कोटींपेक्षा जास्त महसूल मिळाला. तर ४.६९ लाख कोटी अप्रत्यक्ष करांतून मिळाले असल्याचे अर्थ खात्याने म्हटले आहे. तसेच गेल्या वर्षभरात सरकारी खर्चाचा आकडा १४.३० लाख कोटींवर गेला. गेल्या वर्षभरात ७,००० कोटींचा कर महसूल वाढला. ज्यामुळे तूट नियंत्रणात आली असल्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले.
सरकारने तूट नियंत्रणासाठी दिलेला शब्द पाळला आहे. तुटीला पाच टक्क्यांच्याही खाली आणण्यात सरकार यशस्वी झाले आहे, ज्यामुळे परकीय गुंतवणूकदारांचा सरकारवरील विश्वास आणखी वाढेल, असे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी सांगितले. दोन ते तीन महिन्यांपूर्वी वित्तीय तुटीबाबत गुंतवणूकदारांमध्ये धास्ती होती. तूट अपेक्षेप्रमाणे कमी झाल्याने ही धास्ती गेली असून सरकारबाबतचा विश्वास वाढला असल्याचे अहलुवालिया यांनी सांगितले.
चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट एकूण देशांतर्गत उत्पादन दराच्या (जीडीपी)च्या ४.८ टक्के किंवा तीन टक्क्यांपर्यंत राहील, असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे.
चालू आर्थिक वर्षात महसूलवाढीवर भर दिला जाईल. या वर्षात वित्तीय तूट ४.८ टक्क्यांपर्यंत नियंत्रणात ठेवण्याचे लक्ष्य आहे. – पी. चिदंबरम, अर्थमंत्री

Read More »

'पावर' बाज दिग्दर्शक

मराठी करमणूकसृष्टीत अनेक प्रतिभावान कलावंत आहेत. दिग्दर्शकांची एक समृद्ध फळीच मराठी चित्रपटसृष्टीला लाभली आहे. यातल्या अनेकांच्या कलाकृती रसिकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. त्यांना यश मिळालं असलं तरी मराठीतल्या दिग्दर्शकांची दुसरी फळीही तितकीच सशक्त आहे. त्यांच्या वाटय़ाला फार प्रसिद्धी आली नसेल, मात्र त्यांच्यातली प्रतिभा कुणीही नाकारली नाही. असाच एक दिग्दर्शक विजय राणे. 'राजा शिवछत्रपती' व 'बाजीराव मस्तानी' या मालिकांचा यशस्वी दिग्दर्शक असलेला विजय आता मोठय़ा पडद्यावर आलाय. त्याच्या 'बाळूमामा' या चित्रपटाला प्रभातचा विशेष पुरस्कारही मिळालाय तर त्याचा 'पावर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. अशा दिग्दर्शक म्हणून पावरबाज ठरलेल्या विजय राणेशी मारलेल्या या गप्पा -
आपण या क्षेत्रात दिग्दर्शक म्हणूनच काम करायचं असं कधी ठरवलं?
रुईयात होतो तेव्हापासूनच मला एकांकिकांचं वेड होतं. अनेक एकांकिकामध्ये अभिनय केला. पुढे महर्षी दयानंद कॉलेजसाठी 'घुशी' या एकांकिकेचं दिग्दर्शन केलं. त्या एकांकिकेनं त्या वर्षातली जवळजवळ सगळीचं बक्षीसं जिंकली. तिथून माझ्यातला आत्मविश्वास दुणावला. इतर कलाकारांप्रमाणेच मी अभिनयाने सुरुवात केली होती. कोणतीही एकांकिका वाचायचो तेव्हा ती सादर कशी करायची याचाच विचार अधिक करायचो. दुसरं असं की केवळ अभिनय करण्यापेक्षा दिग्दर्शक म्हणून पुढे येणं माझ्यासाठी अधिक सुरक्षित होतं. त्यामुळे आता दिग्दर्शन हेचं करिअर करायचं मी निश्चित केलं. महाविद्यालयीन स्तरावर मी अनेक एकांकिका दिग्दर्शित केल्या. मात्र मला ज्या पद्धतीनं कलाकृती सादर करायच्या होत्या, त्यासाठी मला रंगमंचापेक्षा चित्रपट माध्यमच अधिक जवळचं वाटलं. तेव्हा चित्रपटाचं तंत्र शिकवणा-या संस्था मोठया प्रमाणात नव्हत्या. मग मी अनेकांकडे उमेदवारी करत चित्रपटाचं तंत्र शिकून घेतलं.
सुरुवातीचे प्रयत्न काय होते?
चित्रपटाचं तंत्र शिकून घेतल्यानंतर त्याचा अविष्कार करण्याची संधी शोधत होतो. काही एजन्सीजकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय. त्यानंतर 'केल्याने होत आहे रे' नावाचा स्वत:चा पहिला दिग्दर्शकीय माहितीपट केला. हा माहितीपट मूकबधिरांच्या प्रश्नावर आधारीत होता. त्यानंतर आणखी काही माहितीपट तयार करण्याची संधी मिळाली. 'राजापूरची गंगा' हा माहितीपट केला. त्याचबरोबर काही औषध व खतांच्या कंपन्यांसाठी शेतीविषयक असे माहितीपट तयार केले. त्यांना मिळालेला प्रतिसाद चांगला होता. त्या काळात अशा अनेक जाहिराती व माहितीपटांचं काम केलं. हे काम करताना माझं पूर्ण समाधान होत नव्हतं, मात्र मला काही तरी नवीन करायला मिळतं होतं, ज्या अनुभवांनी दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध होत होतो. त्यानंतर मग मी मालिकांकडे वळलो. पुढे दूरदर्शनसाठी मी गंगाधर पानतावणे यांच्या साथीनं शिवाजी महाराजांवर एक मालिका केली. त्या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
'राजा शिवछत्रपती' ही मालिका तुला कशी मिळाली?
'राजा शिवछत्रपती' ही मालिका सुरू झाली तेव्हा मी दिग्दर्शक नव्हतो. ती मालिका पाहाताना मी अस्वस्थ होत असे. मला शिवाजी महाराजांवर मालिका करण्याचा अनुभव होताच. आम्ही केलेली मालिका कमी खर्चात तयार केली होती. त्यामुळे साहाजिकच अनेक तडजोडी कराव्या लागल्या होत्या. त्या काळातच माझी नितीन देसाई यांच्याबरोबर भेट झाली. त्यांनी मला ही मालिका करणार का, असं विचारलं. माझ्यासाठी ती एक पर्वणीच ठरली. अत्यंत भव्यदिव्य स्तरावर आम्ही ती मालिका केली. त्या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला हे तुम्ही जाणताच. त्यानंतर काय? असा विचार करत असतानाच नितीन देसाई यांनी 'बाजीराव मस्तानी' या मालिकेचा प्रस्ताव ठेवला. ती मालिकाही अतिशय भव्यदिव्य पद्धतीनं सादर करण्यात आली, तिलाही प्रेक्षकांनी चांगल्या प्रकारे स्वीकारलं.
चित्रपटांमध्ये तुझी कारकीर्द कशी होती?
मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवातीला काम करायचो. मात्र आपण स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शित करावा, असं अनेक दिवस मनात होतं. 'बाजीराव मस्तानी' या मालिकेनंतर माझ्याकडे बाळूमामा यांच्यावर चित्रपट कराल का, अशी विचारणा करण्यात आली. त्याआधी त्यांचं कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात फिरलो. मला असं जाणवलं की त्यांचं कार्य खरोखरंच खूप मोठं आहे. त्यांच्यावरील चित्रपटही तशाच प्रकारचा असायला हवा. आम्ही कामाला सुरुवात केली. त्यांची जत्रा चित्रित करताना मला हे जाणवलं की ही जत्रा आणि तिचं स्वरूप योग्य पद्धतीनं दाखवायचं असेल तर त्याचं चित्रीकरण हवेतून करायला हवं. म्हणूनच आम्ही चित्रीकरणासाठी हेलिकॉप्टर वापरलं. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला. प्रभातसारख्या संस्थेनं या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट संत चित्रपट' असा पुरस्कार दिला.
'पावर' या सिनेमाची थीम काय आहे?
'पावर' हा सिनेमा वेगळा होता. तो एक सामाजिक चित्रपट होता. त्याचं कथानक अतिशय गंभीर होतं. त्याची ट्रीटमेंट करताना सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा विचार केला. त्यांच्यापर्यंत कथा पोहोचवायची असेल तर ती त्यांच्याच भाषेत पोहोचवायला हवी, हे मी ताडलं. त्यानुसार हा सहज आपल्या अवतीभवती घडतोय अशा प्रकारची ट्रीटमेंट मी या चित्रपटाला दिली. माझं सगळय़ात मोठं बलस्थान होतं ते माझे कलाकार. अनेक मोठमोठे कलाकार या चित्रपटात आहेत. नागेश भोसले, अनंत जोग, उदय टिकेकर यांच्यासारख्या कलाकारांकडून मला हवं तसं काम मी करून घेऊ शकलो. त्यांनीही मला पूर्ण सहकार्य दिलं. मला त्यांच्यातल्या कलाकारांकडून काम करून घ्यायचं होतं, त्यांच्यातल्या स्टारकडून नव्हे. त्यांनीही अगदी खुल्या दिल्यानं या भूमिका केल्या. त्यामुळे हा चित्रपट पाहताना आपण एक वेगळा चित्रपट पाहत आहोत याची जाणीव प्रेक्षकांना झाल्याशिवाय राहात नाही. या चित्रपटात एकाच वेळेस अनेक पैलू आपल्यासमोर येतात. सध्याच्या काळातल्या असहाय्य स्त्रियांच्या जीवनाविषयी भाष्य करत असतानाच सध्याची राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीही विशद करून दाखवतो. म्हणजेच एका बाजूला हा चित्रपट राजकीय जीवन दाखवतो, तर दुस-या बाजूला मानवी मूल्यांविषयी बोलतो. त्यामुळे एक सर्वकष चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. हा चित्रपट करण्याची संधी दिल्याबद्दल मी माझ्या निर्मात्यांचाही त्याचप्रमाणे माझ्या तंत्रज्ञांचाही आभारी आहे. हा चित्रपट सगळय़ांनी आवर्जून पाहावा एवढंच मी यावेळी सांगेन. आजच्या घडीचा हा एक चांगला राजकीय पट असेल.


Read More »

कोकणाची शैक्षणिक आघाडी

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि उच्च शिक्षणाची नवी दालने उघडणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला व आपणाला हव्या असणा-या नव्या शैक्षणिक दालनांमध्ये आपल्या निवडीप्रमाणे व कुवतीप्रमाणे प्रवेश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि उच्च शिक्षणाची नवी दालने उघडणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला व आपणाला हव्या असणा-या नव्या शैक्षणिक दालनांमध्ये आपल्या निवडीप्रमाणे व कुवतीप्रमाणे प्रवेश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. दरवर्षीच्या निकालांची काही वैशिष्टये असतात. यंदाच्या निकालाची वैशिष्टये ही की, यंदाही कोकण विभागाने गेल्या वर्षाप्रमाणे बाजी मारून निकालात पहिला क्रमांक पटकावला आहे तर एकूण नऊ विभागांमध्ये मुंबईचा क्रमांक आठवा म्हणजे शेवटून दुसरा आला आहे. मात्र, यंदा या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी जरी वाढली असली तरी गुणवत्ता घसरली आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोकणचे ८५.८८ विद्यार्था उत्तीर्ण झाले असून त्यांनी आपल्या या धवल यशाचा झेंडा उंच फडकत ठेवला आहे. कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ८९.६४ असून रत्नागिरीची टक्केवारी ८३.६९ इतकी आहे. कोकण विभागाच्या या यशाच्या सातत्याने कोकणसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाहीत, उलट शहरी भागांची मक्तेदारी मोडून काढून आपण त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहोत, हे त्यांनी दाखवून दिले आहे. अर्थात कोकणातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा ध्यास, अभ्यासूवृत्ती, प्रयत्न करण्याची जिद्द, सर्वत्र उपलब्ध झालेले उच्च दर्जाचे लिखित व मौखिक मार्गदर्शन यामुळे हे विद्यार्थी आज परीक्षेत आघाडीवर आहेत. कोकणच्या खालोखाल औरंगाबाद ८५.२६ टक्के व त्या खालोखाल कोल्हापूर ९४.१४ टक्के यांचा क्रमांक आहे. लातूर पॅटर्नसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूरचा निकाल ८३.५४ असून त्याचा क्रमांक पाचवा आहे. राज्याचा एकूण निकाल ७९.९५ म्हणजे जवळजवळ ८० टक्के आहे. हा निकाल काही कमी नाही. यातही इतर अनेक परीक्षांप्रमाणे विद्यार्थिनीनींच बाजी मारली असून विद्यार्थिनी ८४.०४ टक्के व विद्यार्थी ७६.६२ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व विभागात मुलीच मुलांपेक्षा टक्केवारीत आघाडीवर आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना काही पेपर कठीण गेल्याने या विद्यार्थ्यांना निकालाची धास्ती वा टक्केवारीत घसरण होईल, अशी भीती होती. पण विज्ञान शाखेचाच निकाल सर्वात जास्त म्हणजे ९१.३० इतका लागला. त्याखालोखाल वाणीज्य आणि कला शाखेची टक्केवारी आहे. बारावीच्या परीक्षेला राज्यात १० लाख ९८ हजार ७०९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी आठ लाख ७० हजार ४३० उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात मुंबई विभागाचा क्रमांक आठवा आहे व या विभागातील ठाण्याचा क्रमांक पहिला तर मुंबई शहराचा क्रमांक तिसरा आहे. याचा अर्थ एके काळी दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये आघाडी घेण्याची मक्तेदारी असलेल्या मुंबईची मक्तेदारी सध्यातरी 'निकाला'त निघाली आहे. या परीक्षेचे आणखी एक वैशिष्टय असे की, यंदा इंग्रजी आणि मराठी विषयात उत्तीर्ण होणा-या विद्यार्थाची टक्केवारी गेल्या वर्षीपेक्षा वाढली आहे. यंदा मराठी या विषयात ९४.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर इंग्रजी या विषयात ८५.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची टक्केवारी जरी चांगली असली तरी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पार घसरली आहे. याचे एक कारण असे की, यंदा विद्यार्थी विज्ञान आणि गणित विषयांच्या नव्या अभ्यासक्रमाला प्रथमच सामोरे जात होते. शिवाय विज्ञानाच्या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका या कठीण होत्या. त्यातही भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका बरीच कठीण होती. यामुळे विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना खूपच कमी गुण मिळाले. यामुळे या विद्यार्थ्यांची गुणांची टक्केवारी चांगलीच घसरली. त्यामुळे ज्यांना दहावीत ९० टक्के गुण मिळाले त्यांना पहिला वर्गही मिळाला नाही. डोंबिवलीत दहावीत ९४ टक्के गुण मिळवलेला एक हुशार विद्यार्थी नापासच झाला. असे अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थ्यांना भोतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका कठीण गेली होती. अनेक विद्यार्थी ही उत्तरपत्रिका देऊन बाहेर आल्यावर अगदी रडवेले आणि हताश झाले होते. त्यामुळे गुरुवारी परीक्षेचा निकाल लागेपर्यंत अनेकांची छाती भीतीने धपापत होती. भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका खूप कठीण होती, अशी जरी विद्यार्थ्यांची तक्रार होती तरी त्याला इतरही बाबी कारणीभूत होत्या. एक म्हणजे यंदा परीक्षेची पद्धत नवीन होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे उपलब्ध नव्हती. दुसरे कारण म्हणजे मुंबई शिक्षण मंडळाच्या पदाधिका-यांच्या मते, विद्यार्थी अलीकडे पाठयपुस्तकांकडे अजिबात दुर्लक्ष करून खासगी शिकवण्यांमधून मिळणा-या मार्गदर्शनावर व तेथे मिळणा-या यशस्वी सूत्रांवर भर देतात. त्यामुळे यंदा पाठयपुस्तकातील अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने काढलेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थी गोंधळून गेले व त्यांना ती प्रश्नपत्रिका कठीण वाटली. विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकांकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे. विज्ञान विषयात कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची खूपच पंचाईत होणार आहे, यात शंका नाही. कारण या विषयात काठावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सामायिक प्रवेश परीक्षेला (सीईटी) बसण्याचे स्वप्न भंग पावण्याची शक्यता आहे. इंजिनीयरिंगची यंदा अखेरची प्रवेश परीक्षा 'एमटी-सीईटी' पार पडली आहे. त्यातील गुणांसोबत बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र मिळून विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. या तिन्ही विषयात मिळून १३५ गुण मिळणे आवश्यक आहे. हे जमले नाही तर या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाकडे वळावे लागणार आहे. 'सीईटी'साठी लागणा-या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांची अनिवार्य टक्केवारी गेल्या वर्षी ५० टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत शिथील करण्यात आली होती. यंदा भौतिकशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना खूप कठीण गेल्याने आवश्यक गुणांची टक्केवारी शिक्षण मंडळ आणखी कमी करणार का, हे पाहावे लागेल. हे विद्यार्थी आता विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांकडे वळण्याची शक्यता असल्याने तेथे विद्यार्थ्यांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शालेय शिक्षण विभागाने राबवलेले कॉपीमुक्त अभियान. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला व कॉपीमध्ये खूप घट झाली आहे. बारावीची ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे नव्या क्षितीजाकडे पावले टाकण्याची संधी. या संधी खूप आहेत. म्हणून कुणी निराश होण्याचे कारण नाही. यश तुमचेच आहे. मुंबई शहरासारख्या उत्तम शैक्षणिक सुविधांची वानवा असतानाही कोकण विभागाने शैक्षणिक क्षेत्रात सलग दुस-या वर्षी आघाडी घेतली असून कोकणातील नवीन पिढीची वाटचाल खूपच आशादायी आहे.


दुष्काळाचा ससेमिरा कायमचा थांबवा!


नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या दुष्काळाच्या आणि अभूतपूर्व पाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यातून महाराष्ट्र जात आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने व पडलेला पाऊसही अवकाळी झाल्याने पिकांचे नुकसान तर झालेच पण पाणी आणि गुरांच्या दाणा-वैरणीची टंचाई निर्माण झाल्याने शेतक-यांना आपली गुरेढोरेही वाचवणे बरेच कठीण गेले. विशेषत: मराठवाडयात परिस्थिती तीव्र आहे.
Read More »
सर्फबोर्डवरून पदार्पण करणारा नवा नायक!

बॉलिवुडमध्ये येण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. हीरो होण्यासाठी दररोज देशाच्या कानाकोप-यांतून अनेक तरुण-तरुणी या मायानगरीकडे कूच करतात. त्यातल्या काहींना यश मिळतं, तर काहींना नाही.
बॉलिवुडमध्ये येण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. हीरो होण्यासाठी दररोज देशाच्या कानाकोप-यांतून अनेक तरुण-तरुणी या मायानगरीकडे कूच करतात. त्यातल्या काहींना यश मिळतं, तर काहींना नाही. बालिवुडमध्ये सतत ननवनीन नायक-नायिकांचा शोध सुरूच असतो. सध्या या नव्या नायकांमध्ये निर्माता कुमार तोरानी यांचा मुलगा गिरीश कुमार याची भर पडली आहे. त्याच्यासोबत आहे श्रुती हसन. प्रभुदेवा दिग्दर्शित 'रमय्या वस्तावैया' या चित्रपटातून तो या रुपेरी पडद्यावर चमकणार असून हा रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट येत्या १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
'रमय्या वस्तावैया' हे शब्द अनेक वर्ष भारतीय प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहेत. राज कपूर यांनी आपल्या एका चित्रपटातल्या गीताने अजरामर केलेलं हे गाणं प्रत्येक अंताक्षरीचा अविभाज्य भाग आहे. अनेकांना हे शब्द रशियन वाटतात. मात्र हे तमिळ भाषेतील शब्द असून त्यांचा अर्थ 'राम परत आलाय' असा आहे. याच शीर्षकाने तमिळमध्ये गाजलेल्या सिनेमाचा हा रिमेक आहे. राम नावाच्या एनआरआय मुलाची भूमिका गिरीश कुमारने साकारली आहे.
सुरुवातीला कमल हसनची मुलगी एवढीच ओळख असलेल्या श्रुतीनं टॉलिवुड आणि बॉलिवुडमधील अनेक चित्रपटांत काम करून स्वत:ची अशी खास ओळख निर्माण केली आहे. दोघांच्याही घरात चित्रपटाचं वातावरण. कमल हसन ज्येष्ठ निर्माता, दिग्दर्शक तर कुमार तोरानी यांची ओळखही अनेक यशस्वी व भव्य-दिव्य सिनेमांचे निर्माते म्हणून प्रसिद्ध आहे. श्रुती त्या मानानं या क्षेत्रात बरीच रुळलेली आहे.
'लक','दिल तो बच्चा है जी' या दोन चित्रपटांचा तिला अनुभव आहे. 'लक' या तिच्या पदार्पणातल्या चित्रपटानं विशेष यश संपादन केलं नसलं तरी एक चांगली अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. तिला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.मात्र पदार्पणाची गिरीशला थोडीफार भीती आहे, ते साहजिकच आहे. प्रेक्षक, विशेषकरून तरुण मुली आपल्याला कशा स्वीकारतील याकडे त्यानं विशेष लक्ष दिलंय. सलमान व हृतिक हे आवडते नायक असलेला गिरीश आता रणबीर, इमरानसारख्या चॉकलेट हीरोंच्या पंक्तीत बसायला सिद्ध झालाय.
'रमय्या वस्तावैया' या चित्रपटातील राम परदेशात शिक्षण घेऊन गावी परतलेला असून तो थोडा मस्तीखोर, गोंडस आणि मित्रांचा लाडका आहे. तो मनापासून एका मुलीवर प्रेम करतो आणि प्रेमासाठी तो काहीही करू शकतो. सोना (श्रुती) या आपल्याच दुनियेत जगणा-या, छोटय़ा गावातल्या भोळ्या-भाबडय़ा मुलीची भूमिका श्रुती साकारणार आहे. त्या दोघांचं प्रेम हा या चित्रपटाचं बलस्थान (यूएसपी) आहे. प्रेम मिळवण्याची त्यांची धडपड आपल्याला या चित्रपटातून दिसणार आहे.
या चित्रपटातली त्याची एण्ट्रीच सर्फिग करतानाची आहे.
आतापर्यंत विमानातून, गाडय़ांमधून किंवा इतर वाहनांतून अनेकांनी या रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. मात्र गिरीश चक्क सर्फिग करतच आपल्यासमोर येणार आहे. सर्फबोर्डवरून अंगावर लाटा घेत समुद्रात केलेल्या कसरती म्हणजे सर्फिग! मात्र गिरीशसाठी ते काही सोप्पं नव्हतं. त्यासाठी त्यानं खास सर्फिग शिकून घेतलं. आपल्या भूमिकेच्या सर्वच पैलूंचा त्याने अभ्यास केला आणि गेली तीन वर्ष त्यावर प्रचंड मेहनत घेतली.
गिरीशचं पदार्पण केवळ निर्मात्याचा मुलगा म्हणून झालेलं नाही. तर त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. या माध्यमाचं तंत्र शिकून घेण्यासाठी त्यानं सुरुवातीला पडद्यामागं राहून बरंच काम केलं आहे. या माध्यमातील प्रत्येक कष्टाची त्याने ओळख करून घेतलीय. या अनुभवानंतरच वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यानं या चित्रपटात पदार्पण केलं. भूमिकेसाठी स्वत:ची इमेज तयार करताना त्याने नृत्यदेखील शिकून घेतलं. तोरानी यांनी जेव्हा प्रभुदेवा यांच्याकडे या चित्रपटाचं दिग्दर्शन सोपवायचं ठरवलं तेव्हा गिरीशला अभिनय शिकायला पाठवू का, असंदेखील तोरानी यांनी प्रभुदेवा यांना विचारलं होतं.
प्रभुदेवा यांनी गिरीशची ऑडिशन घेतली. त्याला डान्सच्या सरावासाठी पंचवीस गाणी दिली होती. विशेष म्हणजे, त्याच्यासाठी कोरिओग्राफरसुद्धा गिरीशला प्रशिक्षित करत होते. आता प्रभुदेवा यांच्यासारखे नृत्यनिपुणच दिग्दर्शन करतायत असं म्हटल्यावर डान्स तर त्याला परफेक्ट लागणारच. या ऑडिशनमध्ये तो पास झाला. सिद्धिविनायकाला पायी जात असताना त्याचं सिलेक्शन झाल्याची बातमी त्याला प्रभुदेवा यांनी फोनवरून सांगितली. त्याच्यासाठी बॉलिवुडच्या एण्ट्रीचा मार्ग मोकळा झाला.
आपल्या या एण्ट्रीचं क्रेडिट त्यानं त्याचे पप्पा व गणपतीबाप्पा यांना दिलं. या संधीचं त्याने सोनं करून दाखवलं. आपल्या या भूमिकेसाठी गिरीशनं जबरदस्त मेहनत घेतलीय. नायकाच्या दृष्टीनं त्याचं वजन फार होतं. ते घटवण्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली. त्यासाठी त्याला चिझकेक, पिझ्झा, गाजरचा हलवा हे आवडते पदार्थ वज्र्य करावे लागले. चित्रीकरणादरम्यान कधी हे पदार्थ खाण्याचा मोह झाला तर त्यासाठी त्याला दुप्पट मेहनत करावी लागायची. त्याच्या बॉडीबिल्डिंगच्या प्रशिक्षणासाठी खास दक्षिण आफ्रिकेतून प्रशिक्षकांना बोलावण्यात आलं होतं. थोडक्यात, या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जे जे करायचं आहे ते ते त्याने मोठय़ा भक्तिभावानं केलंय.
श्रुती साकारत असलेली सोना ही फार वेगळी आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा ही संपूर्णपणे वेगळी अशी भूमिका आहे. या चित्रपटात ती गावातली एक साधीभोळी तरुणी साकारतेय. आपल्या गावाच्या बाहेरही न गेलेल्या या मुलीच्या आयुष्यात एक परदेशी स्थायिक मुलगा येतो. त्याने तिच्या जीवनाचे बदलणारे रंग ती आपल्या अभिनयातून साकारणार आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर किती यश मिळतं हे तिच्यासाठी गौण आहे. चित्रपटाचं यश केवळ अभिनेत्यांवर अवलंबून नसतं, असं ती म्हणते. त्यापेक्षा ती आपलं सर्व लक्ष आपल्या अभिनयावर केंद्रित करते.
गिरीशनं सावध खेळी करत बॉलिवुडमध्ये प्रवेश केलाय. दक्षिणेत गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक त्याने पदार्पणासाठी निवडला. प्रभुदेवा यांच्यासारखा दिग्दर्शक, त्याचबरोबर संपूर्ण परिवारानं एकत्र पाहावं, असं कथानक. त्यामुळे त्याला यशाची खात्री आहे. आपला चित्रपट प्रेक्षकांनी परिवारासोबत बघावा, असं त्याला मनापासून वाटत होतं, त्यामुळे अ‍ॅक्शन हीरोपेक्षा चॉकलेट हीरो म्हणून येणंच त्यानं पसंत केलं. दिलदार सलमान खान आणि धक्धक् गर्ल माधुरी दीक्षित हे त्याचे रोल मॉडेल आहेत.
मात्र श्रुतीला अद्याप तिचा रोल मॉडेल गवसला नाही. कोणासारखं बनण्यापेक्षा स्वत:चं स्थान निर्माण करणं तिच्यासाठी महत्त्वाचं आहे, असं ती मानते. तिच्यासोबत काम करण्या-या गिरीशची स्तुती करायला ती विसरली नाही. आपल्या वडिलांच्या चित्रपटात तू कधी दिसणार, या प्रश्नावर श्रुती मात्र अनुत्तरीतच राहिली. आता वडिलांना तिचं काम आवडलं नाही की ती वडिलांसोबत काम करायला ती स्वत:च उत्सुक नाही, याचा उलगडा काही झाला नाही.

Read More »

ट्रेक लोणावळ भीमाशंकरचा

पाऊस थोडा पडून गेलेला असतो. त्यामुळे वातावरणात थोडा गारवा आलेला असतो. द-या-खो-यात सभोवताली हिरव्या रंगाच्या विविध छटा दिसू लागतात. अशा वातावरणात ट्रेकला जाण्याची मजा काही निराळीच असते. थकवा जाणवत नाही. लोणावळा ते भीमाशंकरच्या ट्रेकचा हा अनुभव
लोणावळा ते भीमाशंकरचा ट्रेक आम्हा गिरिप्रेमींचा सर्वात आवडता ट्रेक. हा ट्रेक करण्याचा योग जुळून आला विक्रमसिंगमुळे. तेही २०११ सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यावेळी आम्हा दोघांसोबत भरत छत्रेही होते. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे वातावरणही मस्त होतं. जणू हिरवा शालूच परिधान केलाय, असं वर्णन कोणीही त्या ट्रेकदरम्यान दिसलेल्या निसर्गाचं केलं असतं.. इतक्या त्या परिसरात हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहण्यास मिळाल्या. या ट्रेकनंतर वर्षभर सह्याद्रीत ट्रेक तसंच क्लाइंबिंगसाठी जाणं झालं.
मात्र निसर्गाचं इतकं ताजं दर्शन कधीच घडलं नाही. त्यामुळे पुन्हा पुढल्या वर्षी (२०१२) साधारण सप्टेंबर महिन्यात पुन्हा लोणावळा ते भीमाशंकरचा ट्रेक करण्याचं ठरवलं. या ट्रेकसाठी माझ्यासोबत प्रसाद सावंत, योगेश मेस्त्री, उज्ज्वला विश्वासराव, भूषण गुरव, सागर दळवी, साधना चंदनशिवे, जितेन पाटील ही ट्रेकर मंडळी होती. गाडीचं आरक्षणही आम्ही आधीच करून ठेवलं होतं.
५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी मुंबई सोडली. दुस-या दिवशी (६ सप्टेंबर २०१२) पहाटे अडीचच्या सुमारास लोणावळा स्टेशनला उतरलो. समोरच पोलिस दत्त म्हणून हजर होते. 'आता आपली चौकशी होणार..' मनात शंकेची पाल चुकचुकली. सुदैवाने तसं काही घडलं नाही. स्टेशनवर काही माणसं झोपली होती. विश्रांती घेण्याचा विचार मनात डोकावला, पण तसं केल्यास भीमाशंकरला पोहोचण्यास उशीर झाला असता. त्यामुळे तोंडावर पाणी मारून मारून झोप घालवली. शेजारीच असलेल्या एसटी स्टँडमध्ये आम्ही गेलो. तेवढय़ात पावसाला सुरुवात झाली. घडय़ाळात पाहतो तर पहाटेचे साडेतीन वाजले होते. पाऊस थांबायचं काही नाव घेईना.
काही केल्या पहाटे तुगारलीचं धरण कापायचंच होतं. त्यामुळे त्या मोठय़ा पावसात रेनकोट चढवून, सोबतची सॅक भिजणार नाही याची काळजी घेत पुढचं मार्गक्रमण करू लागलो. ठरवल्याप्रमाणे तुगारलीच्या धरणाचा पहिला टप्पा गाठला. तेवढय़ात पाऊस थांबला. एरवी पाऊस पडून गेल्यावर उकडतं. मात्र तुगारलीच्या धरणावर तसं काहीच जाणवलं नाही. मस्त हवा होती. धरणावरून पुढे तुगारलीच्या वस्तीत गेलो. तिथे कुत्रे आमच्या स्वागतासाठी होतेच. तिथून थोडं अंतर चालून गेल्यावर राजमाचीचा फाटा आला. राजमाचीवरून वाळवडकडे गेलो. वाळवड गावात असणा-या धर्मशाळेत थांबलो. पहाटेचे साडेसहा वाजले होते. मोबाइलवर साडेसातचा आलार्म लावून आम्ही झोपी गेलो.
बरोब्बर साडेसात वाजता अलार्म वाजल्यामुळे जाग आली. ताजेतवाने होऊन आम्ही ढाक भैरीच्या वाटेला लागलो. एका मोठय़ा नदीच्या काठावरून जाऊ लागलो. तिथलं पाणी एकदम स्वच्छ आणि चविष्ट होतं. मिनरल वॉटरपेक्षा कितीतरी चविष्ट होतं. ढाकला डाव्या हाताला ठेवून वरती गेलेल्या वाटेने सरळ कुसूरच्या पठारावर जायचं होतं. मात्र जावं की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत आम्ही अडकलो होतो. कारण या पठारावर दूपर्यंत कोणाची वस्ती नाही. पठारावर फक्त एकच घर आहे. धनगरवाडी आहे. पण थोडी लांब आहे. शेवटी कसंबसं बळ एकवटून कसूरच्या पठारावरून चालू लागलो. त्या पठाराचा अर्धा टप्पा पूर्ण करत नाही तर वाटेत एक ओहोळ लागला.
त्या ओहोळाच्या पाण्याने हातपाय स्वच्छ धुतले. थकवा कुठल्या कुठे निघून गेला. सोबत असलेला सुका खाऊ आम्ही खाऊ लागलो. तेवढय़ात उजव्या हाताला झाडातून थोडासा विचित्र आवाज आला. रेडा ओरडतो तसा. रेडा आपल्यावर चाल करून येईल की काय, या भीतीपोटी आम्ही तिथून पळ काढला. त्या गडबडीत आम्ही कुसूरच्या पठारावर रस्ता भरकटलो. तेवढय़ात बरोबर असलेला नकाशा पाहिला. नकाशात दोन दगड चिन्हाने दर्शवले होते. ते दगड आमच्या शेजारी होते. त्यामुळे आम्ही घाबरून कुसूरच्या पठारावरून पळत सुटलो तरी ऑन ट्रॅक होतो. सावळेगावाच्या शेजारी. त्यावेळी संध्याकाळचे सहा वाजले होते. रात्रीचा मुक्काम सावळे गावात केला.
तिस-या दिवशी (७ सप्टेंबर २०१२) आम्हाला सकाळी सात वाजता जाग आली. तयारी करून पुढच्या मोहिमेसाठी निघालो. भीमाशंकरच्या खाली जिथे गणेशघाट आणि शिडीघाट वेगळा होतो, तिथे राहण्याचं आमच्या मित्रांनी ठरवलं होतं, पण मला भीमाशंकर करून मुंबईला घरी जायचं होतं. सावळेगावातून भीमाशंकरच्या वाटेने जाणं सोप्पं नव्हतं.
पावसामुळे रस्ता थोडा चिखलाचा झाला होता. तरीही आम्ही रस्ता तुडवत चाललो होतो. मधेच खारी दिसल्या. भीमाशंकरला जाताना वाटेत कमळजाईचं मंदिर लागलं. कमळजाईच्या पठारावर खेकडे दिसले. ते पकडून खाली सोडण्याचा खेळ आम्ही दहा ते पंधरा मिनिटं केला. मात्र विशेष मजा आली आली नाही. सर्वच खेकडे छोटे छोटे होते. अजून दोन तासांत भीमाशंकरला पोहोचायचं होतं. कमळजाईवर गेलो तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. भीमा नदी ओलांडेपर्यंत दुपारचा एक वाजला. अखेर भीमाशंकर मंदिर गाठलं. तिथून शिडीघाटाने खाली जायचं ठरवलं. शिडीघाटाने खाली जाण्याची ती आमची पहिलीच वेळ होती. त्यामुळे गणेशघाटाने खाली जाणं टाळलं. शिडीघाटाने जाताना पहिलाच धबधबा लागला. त्या धबधब्याखाली मनसोक्त भिजून घेतलं. पुन्हा खाली चालायला सुरुवात केली. एका ठिकाणी बुळबुळीत जागेवरून पाय घसरलाही. तरीही खचून न जाता शिडीघाट उतरू लागलो. गणेशघाट आणि शिडीघाटाकडून येणा-या रस्त्यावर आलो तेव्हा हायसं वाटलं. सुदैवाने आम्हाला वाटेत मुंबईला येणारी आरामबस मिळाली. तीच पकडून मुंबईचा रस्ता धरला.

मस्त भ्रमंती लडाखची
हिमालयाचं रांगडं रूप पाहायचं असेल तर लडाख प्रांतात गेलं पाहिजे. देशातील जम्मू-काश्मीर राज्यातला हा भाग तिथल्या अनोख्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. उंचच उंच पर्वत, बर्फाच्छादित शिखरं आणि खोल दऱ्या.. या सा-या भव्यतेचं दर्शन घेताना एका वेगळ्या जगात आल्याचं आपल्या लक्षात येतं. निळंशार आकाश, गोठलेले नदीप्रवाह आणि क्षितिजापर्यंत दिसणारा भूभाग यापैकी डोळ्यात काय काय साठवावं आणि काय नाही, याचं कोडं पडावा इतका हा देखणा प्रांत आहे. असं हे आगळंवेगळं लडाख वसलंय काराकोरम आणि हिमालय अशा दोन बलाढय़ पर्वतरांगांमध्ये. भारतीय भूप्रदेश अशायायी भूप्रदेशावर आदळल्यामुळे निर्माण झालेल्या घडीच्या पर्वतांचं भूगर्भीय नवल आपल्याला इथे पाहायला मिळतं. वारा आणि पाण्याच्या प्रभावाने इथे नसíगक शिल्पं तयार झाली आहेत. काळ्या मानेचा क्रौंच, सोनेरी गरुड, दाढीवालं गिधाड, पांढऱ्या पंखांचा रेडस्टार्ट, चंडोलच्या विविध जाती, गुलाबी चटक, हिमालयीन गिधाड आणि चुकार तितर असे पक्षी इथे दिसतात. तिबेटी रानगाढव, हिमालयीन निळी मेंढी, पर्वतीय बकरी, पर्वतीय उंदीर, अगामा सरडे व अपोलो फुलपाखरे इथे आढळतात. रानफुलांनी हा प्रदेश समृद्ध आहे.
शिबिराचा कालखंड : १२ ते २० जुलै २०१३
शुल्क : २९,८०० रुपये (सभासद) आणि ३०,४०० (अन्य)
नोंदणी : २२८७१२०२, २२८२१८११
अधिक माहितीसाठी संपर्क : bnhs.programmes@gmail.com

सफर केनियन वन्यजीव पंढरीची
ज्या जंगलात सिंह, वाघ, गेंडा, हत्ती आणि रानरेडे (गवे) असतात, ते जंगल अन्नसाखळीच्या दृष्टीने उत्तम समजलं जातं. आफ्रिकेतील केनियाचं जंगल याला अपवाद नाही. त्यामुळे पृथ्वीतलावरचं सर्वात समृद्ध जंगल अशी केनियाच्या जंगलाची ओळख आहे. तिथे १५० विविध जातींचे पक्षी आणि ३० जातींचे प्राणी आढळतात. विषुववृत्त ओलांडून उत्तर केनियातील साम्बुरू राष्ट्रीय उद्यान, नवाशा सरोवरात होडीतून पाणघोडे आणि पाणपक्षी पाहणं, क्रेसेंट बेटावर पायी फिरणं, नाकुरू सरोवरात हजारो रोहित तसंच झोळीवाले बघणं, मसाई मारामध्ये विविध प्रकारची कुरंग हरणं, झेब्रे नि जिराफ पाहणं हा केनियाच्या जंगल सफारीतील निराळाच अनुभव असतो. पूर्व आफ्रिकेतील सिंह, चित्ता, दोन शिंगी गेंडे, रानरेडा, ठिपकेवालं तरस, आफ्रिकन हत्ती, नाईल मगर तर पक्ष्यांमध्ये शहामृग, सचिवपक्षी, लावण्य मैना, विविध प्रकारचे धनेश, माळढोक आणि खंडय़ा पक्षी हे दुर्मीळ पक्षी, प्राणी तसंच जलचरांच्या जातीही इथे पाहता येतील. आफ्रिकेतील खासकरून केनियातील हे जंगल सौंदर्य पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे 'बीएनएसएस'ने. केनियन वन्य पंढरीतील 'बीएनएचएस'चं तेरावं शिबिर आहे.
शिबिराचा कालखंड : १० ते १९ ऑगस्ट २०१३
शुल्क : १,५६,००० रुपये. नोंदणी : २२८७१२०२, २२८२१८११
अधिक माहितीसाठी संपर्क : bnhs.programmes@gmail.com

Read More »

नक्षलवादाचे कडवे आव्हान

नक्षलवादी किंवा माओवादी यांचा भारताच्या सुरक्षेला किती धोका आहे, याविषयी आपल्या देशातील बुद्धिजीवी वर्गात आणि राजकीय नेत्यांत वैचारिक गोंधळ आहे. माओवाद्यांचे आव्हान शस्त्राच्या बळावर मोडून काढायचे की, परिवर्तन, विकासाच्या मार्गाने मोडून काढायचे, या संदर्भातही मतभेद आहेत. माओवाद्यांची समस्या कशी हाताळायची, यावर अशी नुसतीच चर्चा होत असताना माओवादी मात्र आपला कार्यभाग साधून रिकामे होतात आणि देशात पुन्हा चच्रेला उधाण येते. छत्तीसगडमध्ये काँग्रेस यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर किमान राजकीय क्षेत्रात तरी माओवाद्यांचे आव्हान कठोरपणे मोडून काढायला हवे, यावर एकमत झाले आहे. माओवाद्यांनी प्रत्यक्ष घटना आणि थेट देशालाच आव्हान देण्याची वाट न पाहता त्यांच्याविरोधात कठोर मोहीम प्रत्यक्षात राबवली गेली पाहिजे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची हत्या करण्याची धमकी ब्लॉगवर दिली आहे. नक्षलवाद्यांनी आता आधुनिक शस्त्रास्त्रांबरोबर आधुनिक तंत्रज्ञान अवगत केले आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. नक्षलवादाचे आव्हान आता वाढून आणखी कडवे होत आहे, हे याचेच लक्षण आहे.
कोणतीही घटना घडली की, तावातावाने काही काळ चर्चा करायची आणि कालांतराने तो विषय गुंडाळून ठेवायचा ही भारतीय समाजमनाची सवय झाली आहे. नक्षलवाद्यांनी किंवा माओवाद्यांनी कोणतीही कारवाई केली की, हे लोक दहशतवाद्यांपेक्षाही भयंकर आहेत इथपासून ते त्यांच्याविरोधात कोणतेही पाऊल उचलणे कसे चुकीचे आहे, इथपर्यंत सगळी चर्चा होते. त्यातून निष्पन्न काही होत नाही आणि या चर्चेतून कोणती दिशाही दिसत नाही. राजकीय मंडळींना या माओवाद्यांचे काय करायचे, या चिंतेने गेली अनेक वष्रे ग्रासले आहे. सुरुवातीला आदिवासींच्या समस्यांसाठी लढणारे म्हणून नक्षलवाद्यांना सहानुभूती मिळाली. आजही ही सहानुभूती काही प्रमाणात आहे. खरे तर नक्षलवाद्यांनी भारतीय घटनेला आणि सरकारला सरळ आव्हान दिले आहे. त्यामुळे देशद्रोही म्हणून त्यांच्याविरोधात कारवाई करणे आवश्यक आहे. अन्य ठिकाणी कुठे किरकोळ घटनेचा बाऊ करत देशाचा अपमान झाला असा गळा काढणारा वर्ग नक्षलवाद्यांनी सरळसरळ देशाच्या घटनेला आव्हान दिलेले असतानाही गप्प बसला आहे.
आदिवासी आणि जंगले यांचा नक्षलवादी हत्यारे म्हणून वापर करतात, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. नक्षलवाद्यांना आदिवासींच्या भल्याची, विकासाची काहीही चिंता नाही. आता छत्तीसगडमध्ये झालेला हल्ला हा सरकारने सुरू केलेल्या सलवा जुडूम आणि ग्रीन हंट या मोहिमा बंद कराव्यात म्हणून करण्यात आला, असे माओवाद्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. महेंद्र कर्मा आणि नंदकिशोर पटेल यांच्या हत्येसाठी खरे तर माओवाद्यांनी हा हल्ला केला. पण त्यात त्यांनी जवळजवळ २७ जणांना ठार केले. महेंद्र कर्मा यांना दोन गोळया झाडून प्रथम जखमी करण्यात आले आणि नंतर नक्षलवाद्यांच्या महिला गटाने हत्यारांनी भोसकून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. हत्या झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर नाचले. मात्र, काँग्रेसच्या निष्पाप कार्यकर्त्यांना मारल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
महेंद्र कर्मा यांच्या पुढाकाराने सलवा जुडूम सुरू झाली. २००५मध्ये छत्तीसगडमधील काही आदिवासींनी माओवाद्यांविरोधात आंदोलन सुरू केले. आदिवासींना तेंदूची पाने गोळा करण्यास आणि निवडणुकीत सहभागी होण्यास नक्षलवाद्यांनी/माओवाद्यांनी त्यांना मनाई केली होती. आदिवासींना हे मान्य नव्हते. काँग्रेसने सलवा जुडूमला पाठिंबा दिला. आदिवासींना माओवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रे आणि प्रशिक्षण देण्यात आले. असे प्रशिक्षण घेणा-या आदिवासींना विशेष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जायचे. त्यांना १५०० ते दोन हजार रुपयांपर्यंत मानधनही दिले जात होते. नंतर छत्तीसगडमध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारनेही सलवा जुडूम चळवळीला पाठिंबा दिला आणि ती सुरू ठेवली. सलवा जुडूमचा अर्थ आहे शांतीमोर्चा. या चळवळीला किंवा मोहिमेला मोठे यश मिळाले. आदिवासी सरकारच्या बाजूने उभे राहिल्याने माओवाद्यांच्या जंगलांमधील कारवायांची आणि त्यांच्या ठावठिकाणांची माहिती सुरक्षा दलांना मिळू लागली.
मात्र या अभियानाला मानवाधिकार कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. सलवा जुडूम म्हणजे हिंसक संघर्ष वाढवणारी मोहीम आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला. सरकार गरीब आदिवासींचा वापर शस्त्रासारखा करून त्यांना माओवादी/नक्षलवाद्यांविरोधात लढवत आहेत, असा आरोप या मंडळींनी केला. शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने सलवा जुडूम अवैध असल्याचे घोषित केले.
ही चळवळीचा जोर कमी होत आहे, हे लक्षात येताच माओवाद्यांनी गरीब आदिवासींवर सूड उगवायला सुरुवात केली. जनता अदालत भरवून अनेक गावक-यांना ठार करण्यात आले. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही छत्तीसगड सरकारने सलवा जुडूम मोहीम मागे घेतली नाही. माओवाद्यांना याचा मोठा राग होता.
नक्षलवादी हे दहशतवाद्यांसारखेच गुन्हेगार आहेत, हे आपण सर्वात आधी मान्य केले पाहिजे. नक्षलवादी कोण आहेत हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यांच्याविरोधात कारवाई करायची की, नाही हेच निश्चित होणार नाही आणि करायचा निर्णय झालाच तर त्या निर्णयाविरोधात राजकीय यंत्रणेतील लोकच मोडता घालताना दिसतात. पी. चिदंबरम गृहमंत्री असताना त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कठोर पावले उचलली तेव्हा त्यांच्याच पक्षाच्या दिग्विजय सिंग यांनी त्यांच्यावर टीका केली. असे झाले तर त्या उपायांमधील हवाच काढून घेतली जाते.
संधीसाधू राजकारणामुळेही ही समस्या फोफावली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी माओवाद्यांना हाताशी धरून सत्ता हस्तगत केली. माओवाद्यांचे प्राबल्य असलेल्या सर्व राज्यांमध्ये थोडय़ा फार फरकाने सगळेच राजकीय पक्ष माओवाद्यांशी मिळते जुळते घेण्याचा प्रयत्न करतात. आता छत्तीसगडमधील हल्ल्यानंतर माओवाद्यांविरोधात निर्णायक पावले उचलण्याची गरज सर्वच राजकीय पक्षांना वाटू लागली आहे, हे महत्त्वाचे आहे.
अर्थात हे नुसते वाटून चालणार नाही. त्या दृष्टीने ठोस धोरणही आखले पाहिजे आणि योग्य समन्वयाने ते अंमलातही आणले पाहिजे. पंजाबमधील दहशतवाद याच निश्चयाने संपुष्टात आणण्यात आला होता. माओवाद्यांना वठणीवर आणणे कठीण असले तरी अशक्य नाही. दुसरे म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाही मूल्यांवरच घाला घालण्यासाठी हे लोक बसलेले आहेत. हे एकदा पक्के ठरवले तर त्यांच्याविरोधात कारवाई करताना डगमगण्याचेही कारण नाही. शेवटी माओवाद्यांपेक्षा भारत नावाच्या देशाची ताकद मोठी आहे. माओवाद्यांना निष्प्रभ करणे शक्य आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि पोलिसांकडे पुरेसे शस्त्रबळ देण्याची मात्र गरज आहे.
माओवाद्यांनी पोलीस आणि सर्वसामान्य लोकांकडून आपला मोर्चा आता राजकीय नेत्यांकडे वळवला आहे. कदाचित म्हणूनच सगळे राजकीय पक्ष एका सुरात बोलू लागले आहेत. ते काही असले तरी या निमित्ताने जर माओवाद्यांविरोधात ठोस उपाययोजना करण्याच्या दिशेने काही हालचाल झाली तर ते देशाच्या हिताचे ठरेल.

Read More »

तंबाखूविरोधी कायदा कागदावरच

तंबाखूजन्य पदार्थानी आपल्या देशातील नागरिकांभोवतीचा फास किती घट्ट आवळला आहे आणि त्यातून आजची तरुणपिढी आणि इतर नागरिक कसे कर्करोगासारख्या घातक आजारांना बळी पडत आहेत.
तंबाखूजन्य पदार्थानी आपल्या देशातील नागरिकांभोवतीचा फास किती घट्ट आवळला आहे आणि त्यातून आजची तरुणपिढी आणि इतर नागरिक कसे कर्करोगासारख्या घातक आजारांना बळी पडत आहेत, याचे तपशील दरवर्षी ३१ मे रोजी म्हणजे तंबाखू विरोधी दिनादिवशी सर्वत्र प्रसिद्ध होत असतात. याशिवायही सातत्याने अनेक संस्थांकडून तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी पाहण्या केल्या जातात. एका पाहणीच्या निकषाप्रमाणे दरवर्षी आठ ते नऊ लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडतात. सरकारकडूनही तंबाखूजन्य पदार्थाचे धोके दर्शवणा-या जाहिरातींच्या माध्यमातून प्रबोधन केले जाते. याशिवाय पालक, डॉक्टर्स, समाजसुधारक, सामाजिक कार्यकत्रे आपापल्या परीने या जीवघेण्या व्यसनापासून परावृत्त राहण्यासाठी सल्ले देत असतात.गुटखाबंदीच्या निर्णयाचे काही तंबाखू-पान विक्रेत्यांकडूनसर्रास उल्लंघन केले जाते. त्याची चोरटया मार्गाने कशी विक्री होत आहे, हे नुकतेच समोर आले आहे. आता अशाच प्रकारची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईमधील तंबाखू विक्रेत्यांनी 'सिगारेटस् अँड अदर टोबॅको प्रॉडक्टस्' म्हणजेच 'कोटपा' या कायद्यालाही अशाच प्रकारे हरताळ फासला आहे. २००३मध्ये हा कायदा अंमलात आला. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. तसेच लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास या कायद्याद्वारे मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर या कायद्याच्या कलम सहानुसार सिगारेटस् किंवा तंबाखू उत्पादनांची विक्री करणा-या विक्रेत्याने आपल्या दुकानामध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांची जाहिरात मोठया शब्दात नमूद करणे बंधनकारक केले आहे. परंतु, 'सलाम बॉम्बे' या संस्थेतर्फे मुंबईतील २४ प्रभागांमध्ये केलेल्या पाहणीनुसार ११०० दुकानांपैकी ९८ टक्के विक्रेत्यांनी या सूचनेला केराची टोपली दाखवल्याचे दिसून आले. या दुकानांमध्ये अशा प्रकारची कोणतीही सूचना दिसून आली नाही. काही दुकानांनी ती लावली होती. पण ती सहज नजरेस पडणारी नव्हती. हा कायद्याचा भंग आहे. राज्याच्या इतर भागातही तीच परिस्थिती आहे. या कायद्यातील वयोमर्यादेबाबतच्या सूचनांची तर विक्रेत्यांकडून सरसकट पायमल्ली होताना दिसते. कित्येक अल्पवयीन मुले अशा टप-यांवर सर्रास जाऊन तंबाखूजन्य पदार्थ, विडया, सिगारेट, मावा इत्यादींची खरेदी करताना दिसतात. शाळेच्या परिसरात अशा विक्रेत्यांना मनाई आहे. हाही नियम ग्रामीण भागांमध्ये पाळला जात नाही. डॉ. कल्याण गंगवाल यांनी गुरुवारी तंबाखू व्यसनमुक्तीसाठी काही मागण्या केल्या आहेत. तंबाखू, गुटखा आणि सिगारेट या पदार्थाचा अमलीपदार्थाच्या यादीत समावेश करावा, तसेच देशातील तंबाखूचे क्षेत्रफळ टप्प्याटप्प्याने कमी करून अफूप्रमाणे तंबाखूच्या शेतीवरही बंदी घालावी, असे त्यांचे म्हणणे आहे. अशी कडक पावले उचलण्याची वेळ आता आली आहे.

Read More »

बारावीच्या निकालात मुंबईची घसरण

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालामागोमाग राज्य शिक्षण मंडळाचाही निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा मंडळाच्या औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, लातूर विभागीय मंडळाचा निकाल मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. तर कोकण विभागाने पुन्हा बाजी मारत 'कोकण पॅटर्न' कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर आठव्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या मुंबईची घसरण चिंताजनक आहे. मुंबई विभागाच्या निकालावर कोणत्या बाबींचा परिणाम होत आहे याचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या काळात शिक्षक संघटनांच्या आंदोलनांमुळे राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातही मुंबई आणि इतर शहरी भागात या आंदोलनाची तीव्रता जास्त असल्याने त्याचे परिणाम येथील विद्यार्थ्यांवर कमी अधिक फरकाने दिसून आले. शिक्षकांनी वर्षभर केलेल्या श्रमाची पोचपावती विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेवर अवलंबून असते. यामुळे परीक्षांचा कालावधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. परंतु या महत्त्वाच्या कालावधीत शिक्षकांची आंदोलने झाल्याने त्यात सर्वात मोठे नुकसान विद्यार्थ्यांचे झाले. हा कालावधी मुंबईसारख्या शहरी विभागातील विद्यार्थ्यांसाठी मारक ठरला, असे दिसत आहे.
परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांची कोंडी
बारावीची परीक्षा सुरू होतानाच राज्यातील तब्बल सहा ते सात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण संघटनांनी सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर कोणत्याही प्रकारे दहावी-बारावीच्या परीक्षा होऊ देणार नाही आणि झाल्या तर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणार नाही असा इशारा दिला होता. दुसरीकडे अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा १६ शिक्षण संस्था आणि ८ संघटनांनी एकत्र येऊन शालेय शिक्षण विभागाला आणि एकूणच विद्यार्थ्यांनाही परीक्षेच्या तोंडावर कोंडीत पकडण्याचा प्रकार सुरू केला होता. संस्थांना वेतनेतर अनुदान व इमारत भाडय़ाची मागील, थकबाकीची मागणी पुढे करत दहावी-बारावीची परीक्षा अडचणीत आणली होती. ही थकबाकी द्या अन्यथा एकही वर्ग दहावी-बारावीच्या परीक्षेला उपलब्ध करून देणार नाही, असा इशारा दिल्यामुळे बारावीच्या परीक्षेवर संस्थाचालकांनी निर्माण केलेले संकट घोंघावत होते.
विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष
वर्षभर मेहनत केलेल्या मुंबई आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अशा आंदोलनांचा काय परिणाम होईल याचे कोणालाही देणेघेणे उरले नव्हते. ज्या काही शिक्षण संस्थांनी मोर्चा-आंदोलने केली, त्यातील बहुतेक शिक्षक हे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील शाळांमधील होते. विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा संस्थाचालकांचे हित त्यांनी महत्त्वाचे मानले. त्यामुळेच शिक्षक, शिक्षण संस्था संघटनांच्या या आंदोलनाचा थेट परिणाम मुंबई व परिसरातील विद्यार्थ्यांच्या निकालावर झाला. मागील वर्षी चौथ्या क्रमांकावर असलेला मुंबई विभाग आठव्या क्रमांकावर येऊन बसला.
चिकाटी व श्रमाचा 'कोकण पॅटर्न'
नव्यानेच स्थापन झालेल्या कोकण विभागाने बारावीच्या परीक्षेत निर्माण केलेला नवा पॅटर्न यंदाही कायम ठेवला आहे. शिक्षण मंडळाकडून चालविण्यात आलेल्या कॉपीमुक्त अभियानाचा सर्वाधिक फटका लातूर, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी विभागांना बसल्यामुळे मागील दोन वर्षात या विभागांचे निकाल मोठय़ा वेगाने घसरले. तर लातूर पॅटर्नचाही कॉपीमुक्त अभियानाच्या दणक्यामुळे पुरता फज्जा उडाला. मात्र, या तुलनेत कोकण विभागाने या अभियानाला प्रतिसाद देऊन मेहनत, चिकाटी आणि श्रमातून यश कसे मिळू शकते हे राज्याला दाखवून दिले.
'सीबीएसई' आणि राज्य शिक्षण मंडळ
राज्यात गेल्या काही वर्षामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) परीक्षांचा बराच गाजावाजा केला जातोय. परंतु त्या शाळांमध्ये असलेल्या सोयी-सुविधा, शिकवण्याच्या पद्धती, अभ्यासक्रमाची लवचिकता आणि या परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षात घेणे आवश्यक आहे. त्या तुलनेत राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्याचा आवाका खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. त्यातही शिक्षण मंडळाने या परीक्षांसाठी केलेल्या बदलांचे अनेक चांगले परिणाम दिसत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत सीबीएसईचा निकाल केवळ दोन टक्क्यांनी तर राज्य शिक्षण मंडळाचा निकाल मागील वर्षापेक्षा तब्बल पाच टक्क्यांनी वाढला. ही एका नव्या पर्वाची सुरुवात म्हटली तर वावगे ठरणार नाही. त्यातही राहिला प्रश्न गुणवत्तेचा. तिथेही शिक्षण मंडळाने अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे येत्या काही वर्षात सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळातील गुणवत्ता आणि निकालाच्या टक्केवारीत फारसा फरक उरणार नाही.
खासगी क्लासवर पालकांचा विश्वास
मुंबईत कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या दीड हजारांच्या आसपास आहे. या महाविद्यालयांच्या विविध शाखेतून २ लाख ६६ हजार ४४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी २ लाख ४ हजार ६५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर या तीनही शहरांमध्ये खासगी महाविद्यालयांप्रमाणेच खासगी क्लासेसचा मोठय़ा प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. कमीत कमी गुंतवणूक आणि जास्तीत जास्त नफा या क्षेत्रात असल्याने खासगी क्लासच्या चालकांकडून लाखो रुपयांच्या जाहिराती सगळीकडे लावल्या जातात. मुंबईत रेल्वेचे एकही स्थानक या जाहिरातींपासून सुटलेले नाही. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले तब्बल ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी खासगी क्लासच्या मार्गदर्शनामुळे उत्तीर्ण झाल्याचा दावा या जाहिरातींमधून केला जात असल्याचे पाहायला मिळते. यामुळे दहावी-बारावीसाठी महाविद्यालयातील शिक्षणाची गरज उरलीच नाही की काय, असे वाटू लागते. अशा प्रकारची मानसिकता पैसेवाल्या पालकांमध्ये तयार होऊ लागली आहे. याचा परिणाम होणे स्वाभाविक आहे.
क्लासवाल्यांचे चुकीचे मार्गदर्शन
या वेळी झालेल्या बारावीच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा नीट अभ्यास केला तर या सर्व प्रश्नपत्रिका पुस्तकांतील अभ्यासक्रमावरच आधारित असल्याचे दिसते. त्यामुळे क्लासला न जाणा-या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसते तर मुंबईसह पुण्यात क्लासवाल्यांच्या चाकोरीबद्ध शिकवण्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले स्पष्टपणे दिसून येते. याचा सर्वाधिक फटका मुंबई विभागाला बसलेला आहे. लाखो रुपयांचे शुल्क आकारणा-या या क्लासेसवर कोणाचेही नियंत्रण उरलेले नाही. त्यांच्याकडून शिकवण्यात येणा-या कोणत्याही अभ्यासक्रमाची तपासणी होत नाही. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होतो. म्हणूनच पुण्याचा निकाल दीड टक्क्यांनी घसरला. मुंबईच्या टक्केवारीत अंशत: वाढ झाली असली तरी बाकीच्या विभागांच्या मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या टक्केवारीमुळे मुंबई आठव्या क्रमांकावर फेकली गेली. यापुढेही या क्लासेसवर आणि खासगी शैक्षणिक प्रकाशन संस्थांवर कोणाचाही अंकुश राहिला नाही तर मुंबई, पुणे, नागपूर या शहरातील निकालांची अधोगती मोठय़ा प्रमाणात होईल यात शंका नाही.


Read More »

पाणखेळातला गुरू

प्रदीप पाताडे गेली २५ वर्षे वॉटर स्पोर्ट्सशी निगडित आहेत. सागरी खेळाच्या क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्यांनी या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये एचआर विभागात त्यांनी १९८८ ते २०१० या काळात नोकरी केली. पण त्यांना या पाणखेळांसाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. प्रदीप पाताडे यांच्या या अनोख्या पॅशनविषयी त्यांच्याशी बातचीत
तुम्ही या पाणखेळाकडे वळलात कसे ?
माझे काका 'एनएससीआय'मध्ये स्वीमिंग शिकवत असत. पण बाकी कोणालाही घरात स्वीमिंग येत नव्हतं. त्यांच्या मताप्रमाणे स्वीमिंग वगैरे सगळे मोठय़ा लोकांचे खेळ आहेत. एका सुट्टीत काका मला म्हणाले की, 'तुम्ही स्वीिमग शिकून काय करणार?' म्हटलं 'ठीक आहे'. मग १९८८च्या सुमारास मी 'वायएमसीए'मध्ये स्वीमिंगचा सभासद झालो आणि स्विमिंग शिकलो. 'मफतलाल बोटिंग क्लब' हा खूप मोठा क्लब आहे. माझा एक मित्र खटाव मिलमध्ये कामाला होता. तो आणि मी एकाच बसने सकाळी प्रवास करायचो. त्याने मला विचारलं की, 'अरे प्रदीप कुठे जातोस?' मी सांगितलं, 'मी स्वीमिंग शिकायला 'वायएमसीए'ला जातो.' तेव्हा तो म्हणाला की, मी मफतलालचा कमिटी मेंबर आहे. एक दिवस ये, मी ओळख करून देतो. त्यानंतर १९९० मध्ये मी या संस्थेचा सभासद झालो आणि या क्षेत्राशी जोडला गेलो.
या खेळांना सर्वाधिक प्रतिसाद कधी असतो?
भारतात अजूनही लोक वॉटर स्पोर्टस् क्लबचे सभासद होतील अशी संस्कृती नाही. बऱ्याचशा पाणखेळांबद्दल लोकांना मूलभूत माहितीही नाही. विंडसर्फिग हा शिडाचा सर्फबोर्ड वाऱ्यावर मनोव्हर करून खेळला जाणारा खेळ आहे. शिडाच्या शिगेला धरून बोर्डवर उभं राहून हा खेळ खेळला जातो. त्यात वारा, दिशा, समुद्री लाटा आणि प्रवाह तसेच शारीरिक संतुलन या सर्व गोष्टींची कसोटी लागते. कयांकिंगमध्ये एक छोटं निमुळतं फायबरचं होडकं असतं. त्यात एक किंवा दोघे जण बसू शकतात. सागरी लाटांवर वल्हवून हा खेळ खेळला जातो. स्टँडअप पॅडलिंग हे कयाकिंगच्या बोटीवर बसण्याऐवजी उभं राहून वल्हवलं जातं. कनॉइंग या खेळात होडी थोडी मोठी असते. पण तो कयाकिंगसारखाच प्रकार.
हे सागरी खेळ लोकप्रिय होण्यासाठी मी एक योजना चालू केली. ८ महिन्यांसाठी १५ हजार रुपये तुम्ही भरायचे. त्यात तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल, तुम्ही आमची साधनं वापरू शकता शिवाय शनिवार-रविवारी मोकळा असेल तेव्हा तुम्ही येऊन वॉटर स्पोर्टस्ची कयाकिंग, कनॉइंग, विंडसर्फिग करू शकता. सप्टेंबरपासून आम्ही सुरुवात करतो. ऑक्टोबर-डिसेंबरच्या सुट्टय़ांमध्ये हौस म्हणून आलेली अनेक माणसं हा खेळ पुढेही सुरू ठेवतात. कारण आजकाल अनेक पालकांनाही वाटतं की आपल्या पाल्याने काहीतरी वेगळं शिकावं. त्यामुळे ते अशा उपक्रमांच्या शोधात असतात. त्यामुळे सुट्टय़ांमध्ये अनेक मुलं इकडे येतात. पण हा खेळ खेळायचा असेल तर मुख्य अट अशी की, तुम्हाला स्वीमिंग येत असलं पाहिजे. हल्ली बहुतेक मुलांना स्वीमिंग येत असतं. त्यामुळे लोक येतात. फक्त मुलंच असं नाही. वयाची पन्नाशी ओलांडलेली माणसंही या खेळासाठी उत्सुक असतात. पण मी शक्यतो त्यांना सांगतो की नका खेळू. कारण जर तुम्ही शारीरिकदृष्टय़ा फिट असाल तर प्रश्न नसतो. पण नाहीतर हा खेळ कठीण आहे.
गिरगाव चौपाटी इथल्या तुमच्या 'रे वॉटर स्पोर्टस्'बाबत सांगा..
'रे वॉटर स्पोर्टस्' या खेळांचं प्रशिक्षण देते. आम्ही विंडसर्फिग, कयाकिंग आणि स्टँडअप पॅडलिंग शिकवतो. कयाकिंग जास्त लोकप्रिय आहे. कारण ते कोणीही सहज शिकू शकतं. विंडसर्फिग शिकण्यासाठी अचूक अंदाजक्षमता असणं अत्यंत आवश्यक असते. कारण हवेची दिशा, बोर्डवरचा समतोल सांभाळावा लागतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्थैर्य या खेळासाठी अत्यावश्यक आहे. पण हा खेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा माझा प्रयत्न आहे. कारण या खेळाची मजा काही औरच आहे. एकदा तुम्ही हा खेळ शिकलात की आयुष्य जगावं कसं हे तुम्हाला आपसूकच कळतं. कारण समुद्रात तुम्ही एकटे असता. कधी वळायचं, निसर्गाच्या किती जवळ जायचं, कुठे थांबायचं, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता सुट्टय़ांमध्ये २०० लोक विंडसर्फिगची मजा घेता तर ३०-४० लोक नेहमी येणारे आहेत. पण बॅच पूर्ण होण्यासाठी मी थांबत नाही. जर तुम्ही शिकायच्या तयारीने आला असाल तर मी ट्रेनिंग लगेच चालू करतो. कोणताही वॉटर स्पोर्ट तुम्ही एक दिवस आलात आणि शिकून गेलात असं होत नाही. त्यात सातत्य आवश्यक असतं. बेसिक जर पक्कं झालं नाही तर वर्षानुर्वष तुम्ही स्ट्रगलच करत राहता. 'टेक्निक' समजणं महत्त्वाचं.
हा खेळ खेळायला येणारे लोक आवड म्हणून येतात की करिअर करण्याच्या दृष्टीने?
हा खेळ खेळायला येणारे बहुतांश लोक हे नवीन अनुभव घेण्यासाठीच येतात. पण करिअर करण्यासाठीही या क्षेत्रात भरपूर वाव आहे. कारण मुळात हा खेळ कठीण आणि महाग असल्याने फार लोक या खेळाकडे वळत नाहीत. त्यामुळे इकडे स्पर्धा कमी आहे. या खेळाची साधनांची किंमत दीड लाखांपासून पुढे चालू होते. हे सगळे बोर्ड्स आणि इतर साधनं विदेशातून मागवावी लागतात. करिअर करायचं असेल तर तुमच्याकडे स्वत:चा बोर्ड पाहिजे. त्यामुळे ज्यांना हे परवडत असेल, त्यांनी या खेळाकडे करिअर म्हणून पाहायला काहीच हरकत नाही.
तुम्ही या क्षेत्रात यायचं ठरवल्यावर घरच्यांचा पाठिंबा कसा होता?
सुरुवातीला कोणीच पाठिंबा दिला नाही. कोणाला फारसं कौतुक नव्हतं. अनेक बोलणीसुद्धा खाल्लेली आहेत. मफतलाल क्लबचा मेंबर झालो तेव्हा माझ्या घरी माहिती नव्हतं की मी असे वेगवेगळे खेळ खेळतो. त्यांना मी एवढंच सांगितलेलं की मी पोहतो. मफतलालचा सभासद झाल्यानंतर पहिल्याच वर्षी मी त्यावेळच्या नेहमीच्या विजयी स्पर्धकांना मागे टाकत कनोइंग, विंडसर्फिग आणि रोइंग या तीनही स्पर्धा पहिल्या क्रमांकाने जिंकलो. त्यावेळी हा निकाल सर्वानाच आश्चर्यचकित करणारा होता. तेव्हापासून प्रेरित होऊन मी हा खेळ गांभीर्याने घेतला. घरी निकाल कळल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला पाठिंबा द्यायला सुरुवात केली.
एखादा लक्षात राहिलेला अनुभव सांगा.
मुंबई-मँगलोर हा प्रवास आम्ही केलेला. मुंबई ते देवगड – ४५ तास, देवगड ते गोवा – ४५ तास, गोवा ते मँगलोर – ३५ तास असं थांबत आम्हाला तो प्रवास पूर्ण करायचा होता. बोटीतच जेवण करायचं होतं. आम्ही ४ जणांनी मिळून तो प्रवास केलेला. तेव्हा जीपीआरएस नव्हतं. नकाशा आणि एका पुस्तकाच्या आधारे आम्ही तो प्रवास पूर्ण केलेला. वाऱ्याची दिशा, लाइट हाऊस यांच्याकडे लक्ष द्यायचं होतं. अशा प्रवासांमध्ये एक माणूस कायम झोपलेला असतो. कारण प्रत्येकाला ८ तासांची झोप आवश्यक असते. एक माणूस जेवण करत असतो. या प्रवासात आम्ही खडतर प्रवास म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं. जराशी चूक मृत्यूच्या दारात नेऊन ठेवणारी ठरली असती.
वॉटर स्पोर्टस्ने तुम्हाला काय दिलं ?
या खेळाने मला वेगळी ओळख दिली. मी नोकरी करत असताना चारचौघांमधला एक म्हणून गणला गेलो असतो. पण आज जेव्हा अनेक डीसीपी, एसीपी, डॉक्टर, अ‍ॅडव्होकेट अशीही माणसं येतात, मला 'सर' म्हणतात, कुठे गेलो तर लोक एक 'विंडसर्फर' म्हणून ओळख करून देतात तेव्हा मिळणारा आनंद आणि समाधान अवर्णनीय आहे. शिकवण्याची मजा दुस-या कशातच नाही. एकेकाळी मी स्पर्धा खेळलो. कारण शेवटी पहिल्या क्रमांकाची नशा काही वेगळीच असते. पण आता मला स्पर्धाच्या मागे लागायचं नाही. मला आता ट्रेनिंग, मार्केटिंग या गोष्टींकडेसुद्धा लक्ष द्यायचं आहे. कारण परदेशात तुम्ही जर वॉटर स्पोर्टस्चे प्रशिक्षक असाल तर तुम्हाला उसंत नसते. पण भारतात हा खेळ लोकांपर्यंत पोहोचवायला हवा. त्याशिवाय लोक याकडे वळणार नाहीत. हा खेळ तुम्हाला 'स्वतंत्र' कसं व्हावं हे शिकवतो, कसं जगायचं हे शिकवतो. प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच उचलावं लागतं. समुद्रात असताना सगळे निर्णय तुमचे तुम्हाला घ्यायचे असतात. जर तुम्हाला कळत असेल की या रस्त्यावर मला धोका असू शकतो, तर योग्य वेळीच तुम्ही तुमचा रस्ता बदलला पाहिजे.
प्रदीप पाताडे यांची विद्यार्थिनी १४ वर्षीय मालविका जोशी हिने गोवा येथे झालेल्या विंडसर्फिगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. पुढच्या दोन महिन्यातच ती प्रशिक्षण घेण्यासाठी इटलीला जात असून युथ ऑलिम्पिकसाठी तिची निवड झाली आहे.
प्रदीप पाताडे, राजीव भाटिया आणि मिरांग मनेक आणि हे एकत्रितपणे 'रे स्पोर्टस् अकॅडमी' चालवतात. 'बर्थ डे पार्टी ऑन कयाक' यासारख्या काही नवीन संकल्पनांद्वारे अधिकाधिक लोकांना या खेळाकडे वळवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. ही संस्था इतर काही सामाजिक उपक्रमही राबवते.
'आदित्य बिर्ला वर्ल्ड अकॅडमी' या शाळेच्या सहकार्याने 'रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम' हा उपक्रमही राबवला जातो.
रे स्पोर्टस्चे प्रवेश शुल्क
कयाकिंग – रु. ४,४००/- एकूण ६ तास
(दररोज एक तास)
विंडसर्फिग – रु. ७,५००/- एकूण १० तास
(दररोज एक तास)
स्टँडअप पॅडलिंग – रु. ६,५००/- एकूण ६ तास
(दररोज एक तास)

Read More »

विद्यानगरीत नक्षलवाद्यांचे जाळे

छत्तीसगडमध्ये झालेल्या क्रूर आणि अत्यंत दुर्दैवी अशा नक्षली हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांच्या विरुद्धची मोहीम अधिक तीव्रतेने राबवण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.
छत्तीसगडमध्ये झालेल्या क्रूर आणि अत्यंत दुर्दैवी अशा नक्षली हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांच्या विरुद्धची मोहीम अधिक तीव्रतेने राबवण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. नक्षलवाद ही एकटया छत्तीसगडची समस्या नाही. देशातील २०० हून अधिक जिल्हे नक्षलवादाने प्रभावित आहेत. महाराष्ट्राबाबत बोलायचे तर आजवर गडचिरोली, चंद्रपूर हे दोनच जिल्हे नक्षलवादी कारवायांनी बाधित आहेत, असे मानले जात होते. परंतु गेल्या काही वर्षात ही परिस्थिती बदलली आहे. नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागात आपली पाळेमुळे रुजवण्यासाठी कंबर कसली आहे. मध्यंतरी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील सात मुले नक्षलवादी तत्त्वज्ञानाकडे आकृष्ट होऊन गडचिरोलीच्या जंगलात गेली असल्याचे आढळून आले होते. 'कबीर कला मंच' या संस्थेच्या माध्यमातून कलेतून समाजजागृती करणारी ही मुले हातात बंदुका घेऊन समाजाचा हिंसक पद्धतीने बदला घेण्यास कशी तयार झाली, याबाबत सर्वत्र खेदजनक आश्चर्य वर्तवण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासामधून शहरातील अनेक महाविद्यालये, सांस्कृतिक व सामाजिक संस्था आणि औद्योगिक वसाहती अशा सर्व क्षेत्रात नक्षलवाद्यांनी जाळे पसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे चळवळीसाठी निधी उभारणी, तरुण-तरुणींची भरती तसेच परराज्यातील फरारी संशयितांना आश्रय देण्यासाठी नक्षलवाद्यांकडून 'आयटी हब' असलेल्या पुण्याचा वापर केला जात आहे. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेली माहिती तर याहून अधिक धक्कादायक आहे. शहरी भागांमध्ये तळ उभे करण्याची नक्षलींची योजना असून आगामी काळात पुण्याला लक्ष्य केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती सरकारला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब सरकार, पोलीस यंत्रणा आणि समाज अशा तिन्हींसाठीही महत्त्वाची असून आगामी काळात खूप मोठी सर्तकता बाळगणे आवश्यक आहे. माओवादी पुण्यामध्ये केवळ त्यांना सहानुभूती दाखवणारे समर्थक शोधत नाहीत तर इथून तरुणांना वेचून थेट आपल्या कारवायांमध्ये ओढत आहेत. यासाठी महाविद्यालयांमधील भडक डोक्याच्या तरुणांचे ब्रेन वॉश करून त्यांना चळवळीत ओढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मध्यंतरी अटक झालेल्या माओवाद्यांना सोडण्याची मागणी करणारी पत्रके पुणे शहरात उघडपणे झळकत होती. तुरुंगात असलेल्या माओवाद्यांच्या अधिकारांच्या समर्थनार्थ मागणी सप्ताह पाळण्याचे आवाहनही या पत्रकांद्वारे करण्यात आले होते. नक्षलवाद, दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीचे माहेरघर बनत चाललेल्या पुण्याकडे प्रशासन, तपासयंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि जबाबदारीतून हात झटकणारा समाज अशा सर्वानीच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच बाहेरील राज्यातून शिक्षणासाठी, नोकरीसाठी, धंद्यासाठी आलेल्या लोकांची संबंधित संस्थेने वा ते भाडयाने राहत असलेल्या घरमालकांनी पोलिसांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ती केली नसल्यास त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. कारण या नोंदणीमुळे संशयितांचा माग काढण्याची प्रक्रिया सुलभ होत असते. शेवटी नक्षलवाद आणि त्यांच्या हिंसक कारवाया हे भारतीय लोकशाहीला दिलेले आव्हान आहे. त्याचा मुकाबला सर्वानी मिळूनच करायला हवा.

Read More »

दक्षिणायन

भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी मुंबईत रोवली. तिथेच ही हिंदी चित्रपटसृष्टी बहरली. कोल्हापुरात प्रभात फिल्म कंपनीबरोबर अनेक दाक्षिणात्य तंत्रज्ञ होते. प्रभात कंपनी पुण्यात आली, त्या वेळी हे तंत्रज्ञ मद्रासला गेले. त्यांच्याबरोबर असलेल्या तंत्राच्या मदतीने त्यांनी तिथे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी वसवली. प्रेक्षकांचा पाठिंबा, सर्जनशील दिग्दर्शक, साहित्याची पार्श्वभूमी व आर्थिक समृद्धी याबरोबरच सिनेमा इथली संस्कृतीच बनला. या संस्कृतीचा प्रभाव इतर चित्रपटसृष्टीवरही पडला. हिंदी चित्रपटसृष्टीने तर सुरुवातीपासूनच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांवर आधारित चित्रपट केले. आज या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा या दक्षिणायनचा आढावा-

तमिळ, तेलुगू, मल्याळम व कन्नड या भाषांत चित्रपटनिर्मिती करणारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, 'साऊथ' म्हणूनही सगळ्य़ांनाच परिचित आहे. हिंदीपेक्षा खर्चिक असली तरीही वर्षभरात सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती ही तमिळ भाषेतच होते. इतकंच नव्हे तर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक असे विविध विषय तिथे हाताळले जातात. केवळ व्यावसायिकच नव्हे तर अनेक प्रभावी कलात्मक चित्रपटांची निर्मितीही दक्षिणेत झाली आहे.
दाक्षिणात्य चित्रपट यशस्वी होण्याची अनेक कारणं आहेत. मुख्य म्हणजे कथानक हा त्यांचा पाया असून एकापेक्षा एक कथानकांवर आधारित चित्रपटांची निर्मिती इथे झाली आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड या चारही भाषांमध्ये असलेली साहित्याची समृद्ध परंपरा या चित्रपटांच्या कथानकांमध्ये प्रतिबिंबित होत असते. त्याचबरोबर नवनिर्मितीची आस असलेल्या अनेक लेखकांची एक मोठी फळीच या भाषांमध्ये असल्याने त्याचाही परिणाम या चित्रपटांवर झालेला दिसून येतो.
सर्जनशील दिग्दर्शन हे या भाषांमधल्या चित्रपटनिर्मितीचे आणखी एक वैशिष्टयच म्हणावं लागेल. एकापेक्षा एक महान दिग्दर्शकांनी व त्यांच्या कथानक सांगण्याच्या शैलीने आतापर्यंत प्रेक्षकांवर आपला प्रभाव टाकला आहे. काहीशी भडक रचना असलेले हे चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्यात नेहमीच यशस्वी ठरले आहेत. सादरीकरणाच्या नवनव्या शैली व चित्रपटांवर असलेलं प्रगाढ प्रेम यावर हे चित्रपट यशस्वी होताना दिसतात. हिंदी चित्रपट हॉलिवुडची नक्कल करत धन्यता मानत असताना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीनं एकापेक्षा एक मूळ कथा प्रेक्षकांना दाखवल्या.
बॉक्स ऑफिसवर त्यांना मिळालेल्या यशानं प्रेरित होऊन अनेक हिंदी निर्मात्यांनी या चित्रपटांचे रिमेक तयार केले. त्या रिमेकनाही भारतभरातल्या प्रेक्षकांनी उत्साहानं स्वीकारलं. हिंदीत गेल्या काही वर्षात प्रदर्शित झालेल्या व यशस्वी ठरलेल्या चित्रपटांकडे नजर टाकल्यास मूळ दाक्षिणात्य सिनेमांनी लक्षणीय यश मिळवल्याचं दिसून येईल.
आजही चित्रपट हे परदेशी माध्यम आहे. प्रगत राष्ट्रांकडून दररोज नव्या तंत्रज्ञानाची त्यात भर पडत असते. दाक्षिणात्यांचे सुरुवातीपासूनच तंत्रज्ञानावर विशेष प्रेम आहे. आजही कॅमेरामन, संकलक, प्रयोगशाळा व स्पेशल इफेक्ट या क्षेत्रांत त्यांचं वर्चस्वच दिसून येतं. मूळ तंत्रात आपल्या कल्पनेनं विविध प्रयोग करणं त्यांना आवडतं. त्या कल्पनाशक्तीचा मोठा फायदा चित्रपट उद्योगाला झाला. त्याचबरोबर उच्च साहित्यिक पार्श्वभूमी व पौराणिक कथाकल्पनांचा सार्वत्रिक स्वीकार यामुळेही इथले चित्रपट परिणामकारक आहेत.
दक्षिणेत चित्रपट निव्वळ मनोरंजनाचं माध्यम नसून ती त्यांची एक भावनिक गरज बनली आहे. साहजिकच कुठेही आढळून न येणारी प्रचंड प्रेक्षकसंख्या दक्षिणेतील चित्रपटांना लाभते. साहजिकच याचा परिणाम त्यांच्या व्यवसायवाढीवर होतो. सिनेमाचे बजेट व दर्जा राखण्यासाठी करण्यात आलेली मोठी गुंतवणूक यामुळेही या चित्रपटांचा प्रभाव राहिला आहे. चित्रपट निर्मितीत असलेली शिस्त ही दाक्षिणात्य चित्रपट यशस्वी ठरण्याचं मुख्य कारण आहे.
अधिक फायदा, अधिक खर्चिक चित्रपट हे त्यांचं सूत्रच बनलं आहे. त्या जोडीला परिणामकारक भावनिक नाटय़, वेगवान पटकथा, स्टंट व भडक रंगांचा वापरही महत्त्वाचा ठरला आहे. कर्णमधुर संगीत व दिलखेचक नृत्य हेही दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशस्वीतेत मोलाची भूमिका बजावताना दिसतात. कथानकाच्या वैश्विक जाणिवांमुळे या कथा पुढे कोणत्याही भाषेत सहज यशस्वी होतात.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा परदेशाशी नेहमीच जवळचा संबंध राहिला आहे. त्यामुळे तिथलं तंत्र इथे सहज येतं. काही परदेशी तंत्रज्ञान तर हिंदीच्याही आधी या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये वापरलं गेल्याचं दिसून आलंय. हिंदीत 'क्रिश' या चित्रपटातून पहिल्यांदा वायरच्या साहाय्यानं अनेक धोकादायक स्टंट करण्यात आले होते. तसे स्टंट दक्षिणेत कितीतरी आधी केले जात होते. दाक्षिणात्य संस्कृतीला समृद्ध अशी नृत्य व नाटकांची परंपरा आहे. त्याचा उपयोग या चित्रपटसृष्टीने करून घेतलाय. एकंदरीतच भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, साहित्यिक समृद्धीच्या वापरानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीही समृद्ध झालेली दिसून आली आहे.

जबरदस्त सेलिब्रिटी स्टेटस 
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या सुपरस्टारला खूप महत्त्व असतं. आपल्या आवडत्या नायकाला परमेश्वरच समजलं जातं. अशा आवडत्या नायकाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी त्याच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक केला जातो. ठिकठिकाणी गगनचुंबी होर्डिग्ज उभारली जातात. हे त्यांच्या चित्रपटसृष्टीचं वैशिष्टय़च म्हणावं लागेल. या सुपरस्टारसाठी वेडी झालेली माणसंही आहेत. अशा प्रकारचं सेलिब्रिटी स्टेट्स हिंदीत आजतागायत कुणीही अनुभवलं नसावं.

राम और शाम
दिलीप कुमार यांच्या अभिनयाने रंगलेला १९६७ मधला हा सिनेमा म्हणजे तेलुगू चित्रपट 'रामाडू भिमाडू'चा हिंदीतला रिमेक होता. या चित्रपटात एन. टी. रामाराव यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १९६४ मध्ये आला होता. या तेलुगू चित्रपटात पहिल्यांदा डबलरोल तंत्राचा वापर करण्यात आला होता. डी. रामानायडू दिग्दर्शित या चित्रपटानं उत्पन्नाचे अनेक विक्रम मोडले होते. त्याचा हिंदी 'राम और श्याम' हा तापी चाणक्य यांनी दिग्दर्शित केला होता. राम और शाम या चित्रपटातल्या गीतांनी व दिलीप कुमार यांच्या अभिनयानं त्या काळी मोठी खळबळ माजवली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगलंच यश मिळवलं. वाहिदा रेहमान, मुमताज व प्राण यांच्या भूमिकाही प्रचंड गाजल्या होत्या. या चित्रपटाच्या कथानकात उत्तर भारताला रुचेल असे अनेक बदल करण्यात आले होते. त्यातूनच हिंदी चित्रपटनिर्मात्यांना एक नवं साधन व यशाची गुरुकिल्लीच सापडली, असं म्हणायला हरकत नाही.


जुडवा
दोन जुळया भावांमुळे त्यांच्या जीवनात काय काय गमतीजमती होऊ शकतात हे दाखवणारा सलमान खान, करिष्मा कपूर आणि रंभा यांचा 'जुडवा' हा १९९७ मध्ये आलेला चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातल्या सगळय़ाच भूमिकांना लोकांनी डोक्यावर घेतलं. डेव्हिड धवन यांनी हा चित्रपट नागार्जुन अभिनीत 'हॅलो ब्रदर' या चित्रपटावरून घेतला होता. नागार्जुनचा 'हॅलो ब्रदर' या तमिळ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. एका बाजूला वेगवान कथानक दर दुसरीकडे एकमेकांमध्ये गुंतलेल्या प्रसंगातली हास्यनिर्मिती ही खास दाक्षिणात्य शैली या चित्रपटानं हिंदीत आणली. ही खास दक्षिणात्य शैली पुढे अनेक हिंदी चित्रपटांमधून दिसून आली.

बिवी नं १
दोन बायकांमध्ये फसलेल्या नवऱ्याची कथा सांगणारा हा चित्रपट १९९९ साली आला. या चित्रपटानं चांगलंच यश मिळवलं. हा चित्रपट १९९५ साली आलेल्या 'साथी लीलावती' या तेलुगू चित्रपटाचं हिंदी रूप आहे. सुरळीत संसार सुरू असलेला एक उच्चाधिकारी एका मॉडेलच्या प्रेमात पडतो. त्यानंतर त्याच्या जीवनात काय काय घडामोडी होतात हे दाखवणारा हा चित्रपट. सलमान खान नायक असलेल्या या चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका करिष्मा कपूरनं तर प्रेयसीची भूमिका सुश्मिता सेननं केली आहे. दक्षिणेतल्या या चित्रपटात कमल हसन, कल्पना व हीरा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हिंदी चित्रपटातली अनिल कपूरची भूमिका या चित्रपटात रमेश अरविंद यांनी केली आहे.

वोह सात दिन
अनिल कपूर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासह नसिरुद्दीन शाह यांच्या अभिनयाने गाजलेल्या 'वोह सात दिन' या चित्रपटानं अनिल कपूरचं बॉलिवुडमध्ये बस्तान बसवलं होतं. हा चित्रपट 'अंथा इझु नाटकल' या १९८१ साली आलेल्या तेलुगू चित्रपटांवरून घेतला होता. हिंदीत मास्टर राजू याची भूमिकाही विशेष गाजली होती. एका बाजूला तारुण्यसुलभ भावना व दुसरीकडे सांस्कृतिक जबाबदारी अशा कात्रीत सापडलेल्या एका मुलीची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. १९८३ साली आलेला हा चित्रपट त्याच्या वेगळय़ा कथेमुळे व कलाकारांच्या अभिनयानं गाजला होता. तेलुगू चित्रपटात अनिल कपूरची भूमिका के. भाग्यराजा यांनी केली होती. त्यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन व निर्मिती केली होती हे विशेष. ''माझी प्रेयसी तुझी पत्नी होऊ शकते, मात्र तुझी पत्नी माझी प्रेयसी होऊ शकत नाही, ती आपली संस्कृती नाही.'' हा या चित्रपटातला संवाद तेव्हा प्रचंड गाजला होता. हिंदीबरोबरच हा चित्रपट कन्नड भाषेतही तयार करण्यात आला. 'वोह सात दिन' मध्ये पद्मिनी कोल्हापुरेच्या भूमिकेचं कौतुक झालं. तसंच तमिळमध्ये अंबिका या अभिनेत्रीची भूमिकाही विशेष गाजली होती.


गज़नी
आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला सर्वाधिक यशस्वी ठरलेला हा चित्रपट म्हणजे दक्षिणेतल्या 'गज़नी' या चित्रपटाचाच रिमेक होय. या चित्रपटाचं वैशिष्टय म्हणजे दक्षिणेत यशस्वी झालेल्या या रिमेकबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. या चित्रपटाचं लाँचिंग करताना आमीरने नेमकं या चित्रपटातलं रोमँटिक गाणं दाखवून पत्रकारांचाही बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला होता. २००८ साली आलेल्या या चित्रपटाने ३०० कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा गाठल्याचे होर्डिग हा त्या वेळी चर्चेचा विषय झाला होता. मूळ इंगजीवरून तयार करण्यात आलेला हा चित्रपट मात्र तमिळ चित्रपटाचीच हिंदी आवृत्ती होता. मूळ 'गज़नी' हा सिनेमा २००५ साली तयार करण्यात आला होता. या चित्रपटात सुरिया (सूर्या) या अभिनेत्यानं संजय रामास्वामी ही भूमिका केली होती. ती हिंदी चित्रपटात संजय सिंघानिया म्हणून दाखवण्यात आली. असीनची 'कल्पना' नामक भूमिका तशीच ठेवण्यात आली. हिंदी व तमिळ हे दोन्ही चित्रपट आर. मुरुगोस यांनी दिग्दर्शित केलं होतं. दोन्ही चित्रपटांनी यश मिळवलं असलं तरी तमिळच्या तुलनेनं हिंदी सिनेमा अधिक प्रभावशील असल्याचं मत अनेक समीक्षकांनी व्यक्त केलं. यासारखेच अनेक दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत आले. अनेक चित्रपटांनी हिंदीतही कमालीचं यश मिळवलं. अनेक चित्रपट हे केवळ हिंदीतचं नव्हे तर इतर भाषांमध्येही तयार करण्यात आले.

आणखी काही रिमेक चित्रपट
हेरा फेरी – रामोजी राव स्पीकिंग (मल्याळम)
एक द पॉवर ऑफ एस – अथाडू (तमिळ)
सिंघम (अजय देवगण) – सिंघम
(सूर्या शिवकुमार)
फोर्स – काखा काखा (तमिळ)
तेरे नाम (सलमान खान) – सेतू (तमिळ)
सनडे – अनुकाकुंडा ओका राजू (तमिळ)
खुशी (फरदीन व करिना) – खुशी (जोसेफ विजय, ज्योतिका)
शक्ती – अंतपुरम (तमिळ)
मि. अँड मिसेस खिलाडी – आ ओखा अडाक्का (तमिळ)
खट्टा मिठा – वेलानावूड नाडू (मल्याळम)

Read More »

ट्रेक लोणावळा भीमाशंकरचा

पाऊस थोडा पडून गेलेला असतो. त्यामुळे वातावरणात थोडा गारवा आलेला असतो. द-या-खो-यात सभोवताली हिरव्या रंगाच्या विविध छटा दिसू लागतात. अशा वातावरणात ट्रेकला जाण्याची मजा काही निराळीच असते. थकवा जाणवत नाही. लोणावळा ते भीमाशंकरच्या ट्रेकचा हा अनुभव

लोणावळा ते भीमाशंकरचा ट्रेक आम्हा गिरिप्रेमींचा सर्वात आवडता ट्रेक. हा ट्रेक करण्याचा योग जुळून आला विक्रमसिंगमुळे. तेही २०११ सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यावेळी आम्हा दोघांसोबत भरत छत्रेही होते. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे वातावरणही मस्त होतं. जणू हिरवा शालूच परिधान केलाय, असं वर्णन कोणीही त्या ट्रेकदरम्यान दिसलेल्या निसर्गाचं केलं असतं.. इतक्या त्या परिसरात हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहण्यास मिळाल्या. या ट्रेकनंतर वर्षभर सह्याद्रीत ट्रेक तसंच क्लाइंबिंगसाठी जाणं झालं. मात्र निसर्गाचं इतकं ताजं दर्शन कधीच घडलं नाही. त्यामुळे पुन्हा पुढल्या वर्षी (२०१२) साधारण सप्टेंबर महिन्यात पुन्हा लोणावळा ते भीमाशंकरचा ट्रेक करण्याचं ठरवलं. या ट्रेकसाठी माझ्यासोबत प्रसाद सावंत, योगेश मेस्त्री, उज्ज्वला विश्वासराव, भूषण गुरव, सागर दळवी, साधना चंदनशिवे, जितेन पाटील ही ट्रेकर मंडळी होती. गाडीचं आरक्षणही आम्ही आधीच करून ठेवलं होतं.
पाच सप्टेंबर २०१२ रोजी रात्री ११ वाजून १० मिनिटांनी मुंबई सोडली. दुस-या दिवशी (सहा सप्टेंबर २०१२) पहाटे अडीचच्या सुमारास लोणावळा स्टेशनला उतरलो. समोरच पोलिस दत्त म्हणून हजर होते. 'आता आपली चौकशी होणार..' मनात शंकेची पाल चुकचुकली. सुदैवाने तसं काही घडलं नाही. स्टेशनवर काही माणसं झोपली होती. विश्रांती घेण्याचा विचार मनात डोकावला, पण तसं केल्यास भीमाशंकरला पोहोचण्यास उशीर झाला असता. त्यामुळे तोंडावर पाणी मारून मारून झोप घालवली. शेजारीच असलेल्या एसटी स्टँडमध्ये आम्ही गेलो. तेवढयात पावसाला सुरुवात झाली. घडयाळात पाहतो तर पहाटेचे साडेतीन वाजले होते. पाऊस थांबायचं काही नाव घेईना. काही केल्या पहाटे तुगारलीचं धरण कापायचंच होतं. त्यामुळे त्या मोठया पावसात रेनकोट चढवून, सोबतची सॅक भिजणार नाही याची काळजी घेत पुढचं मार्गक्रमण करू लागलो. ठरवल्याप्रमाणे तुगारलीच्या धरणाचा पहिला टप्पा गाठला. तेवढयात पाऊस थांबला. एरवी पाऊस पडून गेल्यावर उकडतं. मात्र तुगारलीच्या धरणावर तसं काहीच जाणवलं नाही. मस्त हवा होती. धरणावरून पुढे तुगारलीच्या वस्तीत गेलो. तिथे कुत्रे आमच्या स्वागतासाठी होतेच. तिथून थोडं अंतर चालून गेल्यावर राजमाचीचा फाटा आला. राजमाचीवरून वाळवडकडे गेलो.
वाळवड गावात असणा-या धर्मशाळेत थांबलो. पहाटेचे साडेसहा वाजले होते. मोबाइलवर साडेसातचा आलार्म लावून आम्ही झोपी गेलो. बरोब्बर साडेसात वाजता अलार्म वाजल्यामुळे जाग आली. ताजेतवाने होऊन आम्ही ढाक भैरीच्या वाटेला लागलो. एका मोठया नदीच्या काठावरून जाऊ लागलो. तिथलं पाणी एकदम स्वच्छ आणि चविष्ट होतं. मिनरल वॉटरपेक्षा कितीतरी चविष्ट होतं. ढाकला डाव्या हाताला ठेवून वरती गेलेल्या वाटेने सरळ कुसूरच्या पठारावर जायचं होतं. मात्र जावं की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत आम्ही अडकलो होतो. कारण या पठारावर दूपर्यंत कोणाची वस्ती नाही. पठारावर फक्त एकच घर आहे. धनगरवाडी आहे. पण थोडी लांब आहे. शेवटी कसंबसं बळ एकवटून कसूरच्या पठारावरून चालू लागलो. त्या पठाराचा अर्धा टप्पा पूर्ण करत नाही तर वाटेत एक ओहोळ लागला. त्या ओहोळाच्या पाण्याने हातपाय स्वच्छ धुतले. थकवा कुठल्या कुठे निघून गेला. सोबत असलेला सुका खाऊ आम्ही खाऊ लागलो. तेवढयात उजव्या हाताला झाडातून थोडासा विचित्र आवाज आला. रेडा ओरडतो तसा. रेडा आपल्यावर चाल करून येईल की काय, या भीतीपोटी आम्ही तिथून पळ काढला. त्या गडबडीत आम्ही कुसूरच्या पठारावर रस्ता भरकटलो. तेवढयात बरोबर असलेला नकाशा पाहिला. नकाशात दोन दगड चिन्हाने दर्शवले होते. ते दगड आमच्या शेजारी होते. त्यामुळे आम्ही घाबरून कुसूरच्या पठारावरून पळत सुटलो तरी ऑन ट्रॅक होतो. सावळेगावाच्या शेजारी. त्यावेळी संध्याकाळचे सहा वाजले होते. रात्रीचा मुक्काम सावळे गावात केला.
तिस-या दिवशी (सात सप्टेंबर २०१२) आम्हाला सकाळी सात वाजता जाग आली. तयारी करून पुढच्या मोहिमेसाठी निघालो. भीमाशंकरच्या खाली जिथे गणेशघाट आणि शिडीघाट वेगळा होतो, तिथे राहण्याचं आमच्या मित्रांनी ठरवलं होतं, पण मला भीमाशंकर करून मुंबईला घरी जायचं होतं. सावळेगावातून भीमाशंकरच्या वाटेने जाणं सोप्पं नव्हतं. पावसामुळे रस्ता थोडा चिखलाचा झाला होता. तरीही आम्ही रस्ता तुडवत चाललो होतो. मधेच खारी दिसल्या. भीमाशंकरला जाताना वाटेत कमळजाईचं मंदिर लागलं. कमळजाईच्या पठारावर खेकडे दिसले. ते पकडून खाली सोडण्याचा खेळ आम्ही दहा ते पंधरा मिनिटं केला. मात्र विशेष मजा आली आली नाही. सर्वच खेकडे छोटे छोटे होते. अजून दोन तासांत भीमाशंकरला पोहोचायचं होतं. कमळजाईवर गेलो तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. भीमा नदी ओलांडेपर्यंत दुपारचा एक वाजला. अखेर भीमाशंकर मंदिर गाठलं. तिथून शिडीघाटाने खाली जायचं ठरवलं. शिडीघाटाने खाली जाण्याची ती आमची पहिलीच वेळ होती. त्यामुळे गणेशघाटाने खाली जाणं टाळलं. शिडीघाटाने जाताना पहिलाच धबधबा लागला. त्या धबधब्याखाली मनसोक्त भिजून घेतलं. पुन्हा खाली चालायला सुरुवात केली. एका ठिकाणी बुळबुळीत जागेवरून पाय घसरलाही. तरीही खचून न जाता शिडीघाट उतरू लागलो. गणेशघाट आणि शिडीघाटाकडून येणा-या रस्त्यावर आलो तेव्हा हायसं वाटलं. सुदैवाने आम्हाला वाटेत मुंबईला येणारी आरामबस मिळाली. तीच पकडून मुंबईचा रस्ता धरला.

Read More »

पाणखेळातला गुरू

प्रदीप पाताडे गेली २५ वर्षे वॉटर स्पोर्ट्सशी निगडित आहेत. सागरी खेळाच्या क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्यांनी या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये एचआर विभागात त्यांनी १९८८ ते २०१० या काळात नोकरी केली. पण त्यांना या पाणखेळांसाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. प्रदीप पाताडे यांच्या या अनोख्या पॅशनविषयी त्यांच्याशी बातचीत-
तुम्ही या पाणखेळाकडे वळलात कसे ?
माझे काका 'एनएससीआय'मध्ये स्वीमिंग शिकवत असत. पण बाकी कोणालाही घरात स्वीमिंग येत नव्हतं. त्यांच्या मताप्रमाणे स्वीमिंग वगैरे सगळे मोठया लोकांचे खेळ आहेत. एका सुट्टीत काका मला म्हणाले की, 'तुम्ही स्वीमिंग शिकून काय करणार?' म्हटलं 'ठीक आहे'. मग १९८८च्या सुमारास मी 'वायएमसीए'मध्ये स्वीमिंगचा सभासद झालो आणि स्विमिंग शिकलो. 'मफतलाल बोटिंग क्लब' हा खूप मोठा क्लब आहे. माझा एक मित्र खटाव मिलमध्ये कामाला होता. तो आणि मी एकाच बसने सकाळी प्रवास करायचो. त्याने मला विचारलं की, 'अरे प्रदीप कुठे जातोस?' मी सांगितलं, 'मी स्वीमिंग शिकायला 'वायएमसीए'ला जातो.' तेव्हा तो म्हणाला की, मी मफतलालचा कमिटी मेंबर आहे. एक दिवस ये, मी ओळख करून देतो. त्यानंतर १९९० मध्ये मी या संस्थेचा सभासद झालो आणि या क्षेत्राशी जोडला गेलो.
या खेळांना सर्वाधिक प्रतिसाद कधी असतो?
भारतात अजूनही लोक वॉटर स्पोर्टस् क्लबचे सभासद होतील अशी संस्कृती नाही. ब-याचशा पाणखेळांबद्दल लोकांना मूलभूत माहितीही नाही. विंडसर्फिग हा शिडाचा सर्फबोर्ड वा-यावर मनोव्हर करून खेळला जाणारा खेळ आहे. शिडाच्या शिगेला धरून बोर्डवर उभं राहून हा खेळ खेळला जातो. त्यात वारा, दिशा, समुद्री लाटा आणि प्रवाह तसेच शारीरिक संतुलन या सर्व गोष्टींची कसोटी लागते. कयांकिंगमध्ये एक छोटं निमुळतं फायबरचं होडकं असतं. त्यात एक किंवा दोघे जण बसू शकतात. सागरी लाटांवर वल्हवून हा खेळ खेळला जातो. स्टँडअप पॅडलिंग हे कयाकिंगच्या बोटीवर बसण्याऐवजी उभं राहून वल्हवलं जातं. कनॉइंग या खेळात होडी थोडी मोठी असते. पण तो कयाकिंगसारखाच प्रकार.
हे सागरी खेळ लोकप्रिय होण्यासाठी मी एक योजना चालू केली. आठ महिन्यांसाठी १५ हजार रुपये तुम्ही भरायचे. त्यात तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल, तुम्ही आमची साधनं वापरू शकता शिवाय शनिवार-रविवारी मोकळा असेल तेव्हा तुम्ही येऊन वॉटर स्पोर्टस्ची कयाकिंग, कनॉइंग, विंडसर्फिग करू शकता. सप्टेंबरपासून आम्ही सुरुवात करतो. ऑक्टोबर-डिसेंबरच्या सुट्टयांमध्ये हौस म्हणून आलेली अनेक माणसं हा खेळ पुढेही सुरू ठेवतात. कारण आजकाल अनेक पालकांनाही वाटतं की आपल्या पाल्याने काहीतरी वेगळं शिकावं. त्यामुळे ते अशा उपक्रमांच्या शोधात असतात. त्यामुळे सुट्टयांमध्ये अनेक मुलं इकडे येतात. पण हा खेळ खेळायचा असेल तर मुख्य अट अशी की, तुम्हाला स्वीमिंग येत असलं पाहिजे. हल्ली बहुतेक मुलांना स्वीमिंग येत असतं. त्यामुळे लोक येतात. फक्त मुलंच असं नाही. वयाची पन्नाशी ओलांडलेली माणसंही या खेळासाठी उत्सुक असतात. पण मी शक्यतो त्यांना सांगतो की नका खेळू. कारण जर तुम्ही शारीरिकदृष्टया फिट असाल तर प्रश्न नसतो. पण नाहीतर हा खेळ कठीण आहे.
गिरगाव चौपाटी इथल्या तुमच्या 'रे वॉटर स्पोर्टस्'बाबत सांगा..
'रे वॉटर स्पोर्टस्' या खेळांचं प्रशिक्षण देते. आम्ही विंडसर्फिग, कयाकिंग आणि स्टँडअप पॅडलिंग शिकवतो. कयाकिंग जास्त लोकप्रिय आहे. कारण ते कोणीही सहज शिकू शकतं. विंडसर्फिग शिकण्यासाठी अचूक अंदाजक्षमता असणं अत्यंत आवश्यक असते. कारण हवेची दिशा, बोर्डवरचा समतोल सांभाळावा लागतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्थैर्य या खेळासाठी अत्यावश्यक आहे. पण हा खेळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा माझा प्रयत्न आहे. कारण या खेळाची मजा काही औरच आहे. एकदा तुम्ही हा खेळ शिकलात की आयुष्य जगावं कसं हे तुम्हाला आपसूकच कळतं. कारण समुद्रात तुम्ही एकटे असता. कधी वळायचं, निसर्गाच्या किती जवळ जायचं, कुठे थांबायचं, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता सुट्टयांमध्ये २०० लोक विंडसर्फिगची मजा घेता तर ३०-४० लोक नेहमी येणारे आहेत. पण बॅच पूर्ण होण्यासाठी मी थांबत नाही. जर तुम्ही शिकायच्या तयारीने आला असाल तर मी ट्रेनिंग लगेच चालू करतो. कोणताही वॉटर स्पोर्ट तुम्ही एक दिवस आलात आणि शिकून गेलात असं होत नाही. त्यात सातत्य आवश्यक असतं. बेसिक जर पक्कं झालं नाही तर वर्षानुर्वष तुम्ही स्ट्रगलच करत राहता. 'टेक्निक' समजणं महत्त्वाचं.
हा खेळ खेळायला येणारे लोक आवड म्हणून येतात की करिअर करण्याच्या दृष्टीने?
हा खेळ खेळायला येणारे बहुतांश लोक हे नवीन अनुभव घेण्यासाठीच येतात. पण करिअर करण्यासाठीही या क्षेत्रात भरपूर वाव आहे. कारण मुळात हा खेळ कठीण आणि महाग असल्याने फार लोक या खेळाकडे वळत नाहीत. त्यामुळे इकडे स्पर्धा कमी आहे. या खेळाची साधनांची किंमत दीड लाखांपासून पुढे चालू होते. हे सगळे बोर्ड्स आणि इतर साधनं विदेशातून मागवावी लागतात. करिअर करायचं असेल तर तुमच्याकडे स्वत:चा बोर्ड पाहिजे. त्यामुळे ज्यांना हे परवडत असेल, त्यांनी या खेळाकडे करिअर म्हणून पाहायला काहीच हरकत नाही.
तुम्ही या क्षेत्रात यायचं ठरवल्यावर घरच्यांचा पाठिंबा कसा होता?
सुरुवातीला कोणीच पाठिंबा दिला नाही. कोणाला फारसं कौतुक नव्हतं. अनेक बोलणीसुद्धा खाल्लेली आहेत. मफतलाल क्लबचा मेंबर झालो तेव्हा माझ्या घरी माहिती नव्हतं की मी असे वेगवेगळे खेळ खेळतो. त्यांना मी एवढंच सांगितलेलं की मी पोहतो. मफतलालचा सभासद झाल्यानंतर पहिल्याच वर्षी मी त्यावेळच्या नेहमीच्या विजयी स्पर्धकांना मागे टाकत कनोइंग, विंडसर्फिग आणि रोइंग या तीनही स्पर्धा पहिल्या क्रमांकाने जिंकलो. त्यावेळी हा निकाल सर्वानाच आश्चर्यचकित करणारा होता. तेव्हापासून प्रेरित होऊन मी हा खेळ गांभीर्याने घेतला. घरी निकाल कळल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला पाठिंबा द्यायला सुरुवात केली.
एखादा लक्षात राहिलेला अनुभव सांगा.
मुंबई-मँगलोर हा प्रवास आम्ही केलेला. मुंबई ते देवगड – ४५ तास, देवगड ते गोवा – ४५ तास, गोवा ते मँगलोर – ३५ तास असं थांबत आम्हाला तो प्रवास पूर्ण करायचा होता. बोटीतच जेवण करायचं होतं. आम्ही चार जणांनी मिळून तो प्रवास केलेला. तेव्हा जीपीआरएस नव्हतं. नकाशा आणि एका पुस्तकाच्या आधारे आम्ही तो प्रवास पूर्ण केलेला. वा-याची दिशा, लाइट हाऊस यांच्याकडे लक्ष द्यायचं होतं. अशा प्रवासांमध्ये एक माणूस कायम झोपलेला असतो. कारण प्रत्येकाला आठ तासांची झोप आवश्यक असते. एक माणूस जेवण करत असतो. या प्रवासात आम्ही खडतर प्रवास म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं. जराशी चूक मृत्यूच्या दारात नेऊन ठेवणारी ठरली असती.
वॉटर स्पोर्टस्ने तुम्हाला काय दिलं ?
या खेळाने मला वेगळी ओळख दिली. मी नोकरी करत असताना चारचौघांमधला एक म्हणून गणला गेलो असतो. पण आज जेव्हा अनेक डीसीपी, एसीपी, डॉक्टर, अ‍ॅडव्होकेट अशीही माणसं येतात, मला 'सर' म्हणतात, कुठे गेलो तर लोक एक 'विंडसर्फर' म्हणून ओळख करून देतात तेव्हा मिळणारा आनंद आणि समाधान अवर्णनीय आहे. शिकवण्याची मजा दुस-या कशातच नाही. एकेकाळी मी स्पर्धा खेळलो. कारण शेवटी पहिल्या क्रमांकाची नशा काही वेगळीच असते. पण आता मला स्पर्धाच्या मागे लागायचं नाही. मला आता ट्रेनिंग, मार्केटिंग या गोष्टींकडेसुद्धा लक्ष द्यायचं आहे. कारण परदेशात तुम्ही जर वॉटर स्पोर्टस्चे प्रशिक्षक असाल तर तुम्हाला उसंत नसते. पण भारतात हा खेळ लोकांपर्यंत पोहोचवायला हवा. त्याशिवाय लोक याकडे वळणार नाहीत. हा खेळ तुम्हाला 'स्वतंत्र' कसं व्हावं हे शिकवतो, कसं जगायचं हे शिकवतो. प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच उचलावं लागतं. समुद्रात असताना सगळे निर्णय तुमचे तुम्हाला घ्यायचे असतात. जर तुम्हाला कळत असेल की या रस्त्यावर मला धोका असू शकतो, तर योग्य वेळीच तुम्ही तुमचा रस्ता बदलला पाहिजे.
=प्रदीप पाताडे यांची विद्यार्थिनी १४ वर्षीय मालविका जोशी हिने गोवा येथे झालेल्या विंडसर्फिगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. पुढच्या दोन महिन्यातच ती प्रशिक्षण घेण्यासाठी इटलीला जात असून युथ ऑलिम्पिकसाठी तिची निवड झाली आहे.
=प्रदीप पाताडे, राजीव भाटिया आणि मिरांग मनेक आणि हे एकत्रितपणे 'रे स्पोर्टस् अकॅडमी' चालवतात. 'बर्थ डे पार्टी ऑन कयाक' यासारख्या काही नवीन संकल्पनांद्वारे अधिकाधिक लोकांना या खेळाकडे वळवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. ही संस्था इतर काही सामाजिक उपक्रमही राबवते. ='आदित्य बिर्ला वर्ल्ड अकॅडमी' या शाळेच्या सहकार्याने 'रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम' हा उपक्रमही राबवला जातो.
रे स्पोर्टस्चे प्रवेश शुल्क
कयाकिंग – रु. ४,४००/- एकूण सहा तास (दररोज एक तास)
विंडसर्फिग – रु. ७,५००/- एकूण १० तास (दररोज एक तास)
स्टँडअप पॅडलिंग – रु. ६,५००/- एकूण सहा तास (दररोज एक तास)

Read More »

रिव्हर्स स्विंग – एक जून २०१३

क्रिकेटच्या मैदानातील रंजक किस्से
१८९९
महान क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांच्या सवरेत्तम कारकीर्दीचा शेवट. ५०व्या वर्षी ट्रेंटब्रिजवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या (२२व्या) कसोटीत त्यांना २९ धावाच (२८ आणि १) करता आल्या.

१९२८
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये एकही धाव न देता पाच विकेट्स घेणारे पर्सी मिल्स पहिले गोलंदाज ठरले. त्यांनी सॉमरसेटविरुद्ध (६.४-६-०-५) ब्रिस्टॉलमध्ये ही कामगिरी करताना ग्लुस्टरशायरला १० विकेट्सनी विजय मिळवून दिला.

१९८५
भारताचा यष्टिरक्षक, फलंदाज दिनेश कार्तिकचा जन्म. कार्तिकने कसोटी आणि वनडेत हजार धावांचा टप्पा गाठला आहे. कसोटीत एक शतक त्याच्या नावावर आहे.
वेस्ट इंडिजतर्फे एका दिवसात तीनशे धावा करणारे व्हिव्हियन रिचर्ड्स पहिले फलंदाज ठरले. त्यांनी टॉन्टनमध्ये वॉर्विकशायरविरुद्ध ३२२ धावांची खेळी केली. सॉमरसेटच्या इतिहासातील ती सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली. पुढील २१ वर्षे रिचर्ड्स यांचा विक्रम अबाधित राहीला.

२००२
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएचा जॉर्जजवळ (वेस्टर्न केप) विमान अपघातात मृत्यू झाला. ५३ सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद भूषवणाऱ्या तसेच सवरेत्तम कर्णधार असा नावलौकीक असलेल्या क्रोनिएची कारकीर्द 'मॅचफिक्सिंग' प्रकरणाने डागाळली. एप्रिल २००० मध्ये त्याने 'मॅचफिक्सिंग' प्रकरणाची कबुली दिली.

२००८
भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या (बीसीसीआय) पहिल्यावहिल्या डोमेस्टिक लीग अर्थात आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीचा अंतिम सामना मुंबईत झाला. चेन्नई सुपर किंग्जवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत राजस्थान रॉयल्सनी जेतेपद पटकावले. अर्थात ही लीग इतकी प्रतापी ठरेल, असे त्यावेळी वाटले नव्हते.

Read More »

वसईत आजपासून एसटी बंद

 एसटी महामंडळाने शनिवारपासून वसई ग्रामीण व शहर भागाला जोडणारी एसटीची सहा मार्गावरील बससेवा बंद करण्याचे ठरवले आहे. यामुळे एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे

वसई - एसटी महामंडळाने शनिवारपासून वसई ग्रामीण व शहर भागाला जोडणारी एसटीची सहा मार्गावरील बससेवा बंद करण्याचे ठरवले आहे. यामुळे एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. वसई-विरार पालिकेच्या परिवहन सेवेमुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या घटल्याचे कारण राज्य परिवहन महामंडळाने दिले आहे. प्रवाशांची संख्या घटल्याने तोटा होत असल्याचे कारण पुढे करत 'एसटी'ने परस्पर हा निर्णय घेतल्याचे वसई-विरार पालिकेचे महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.
'प्रवाशांच्या सेवेसाठी', असे ब्रीद असलेल्या एसटी महामंडळाने १ जूनपासून वसई ग्रामीण व शहर भागाला जोडणारी एसटीची सहा मार्गावरील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वसई महापालिकेने ३ ऑक्टोबर २०१२ रोजी सुरू केलेल्या परिवहन सेवेच्या बसेस जवळपास २२ मार्गावर धावत आहेत. या बससेवेला चांगला प्रतिसाद लाभत असल्याने एसटीच्या प्रवाशांची संख्या घटू लागली आहे. त्यामुळे तोटा होत असल्याचे कारण पुढे करत 'एसटी'ने हा परस्पर निर्णय घेतल्याचे वसई- विरार पालिकेचे महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.
एसटीसोबत स्पर्धा नाही
एसटी महामंडळासोबत आमची स्पर्धा नाही. प्रवाशांना सुविधा देण्यासाठीच परिवहन सेवा सुरू केली आहे. तसे पाहता पालिकेच्या पारिवहन सेवेलाही नुकसान सोसावे लागत आहे. एसटी महामंडळाने चांगली सेवा देऊन स्पर्धेत उतरावे. एसटीपेक्षा परिवहनचे दर आम्ही कमी ठेवू शकलो. मात्र, एसटी तोटय़ा जावू नये, यासाठी आमचे दर समान ठेवले आहेत. -भरत गुप्ता, परिवहन समन्वयक
रिक्षावाले खिसा कापणार
वसईत सहा मार्गावर एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने महापालिकेच्या परिवहन सेवेवर प्रवाशांचा भार पडणार आहे. एसटीच्या काही फे-या रात्रीच्या वेळेसही सुरू असतात. रात्री बारानंतर परिवहन सेवा बंद होते. त्यामुळे उशिरा येणा-या प्रवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. एसटीच्या फे-या बंद झाल्याने वसईकरांचा खिसा कापण्यासाठी उत्सुक असलेल्या रिक्षावाल्यांची चंगळ होणार आहे. रात्रीच्या वेळेस महापालिकेची परिवहन सेवा बंद झाल्यानंतर घर किंवा इच्छित ठिकाण गाठण्यासाठी प्रवाशांना रिक्षाशिवाय पर्याय राहणार नाही.
या मार्गावरील फे-या बंद होणार!
वसई स्थानक ते होळी, वसई स्थानक ते किल्ला बंदर, वसई स्थानक ते वसई गाव, वसई पूर्व ते सातिवली, नालासोपारा- विरार ते अर्नाळा या सहा मार्गावरील बस सेवा बंद करण्यात येणार आहे.
एसटीच्या फे-या बंद करण्यामागे राजकारण
वसई- विरार महापालिका लवकरच विनामूल्य प्रवास योजना सुरू करणार असल्याचे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक अजीव पाटील यांनी सांगितले. तसा प्रस्ताव आगामी महासभेत मांडण्यात येईल. पालिकेने यासाठी प्रवाशांकडून काही सूचनाही मागवल्या आहेत. वसई- विरार परिसरात काही ठराविकमार्गापर्यंतचा प्रवास विनामूल्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. एसटीच्या फे-या बंद करण्यामागे मोठे राजकारण असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

Read More »

अनधिकृत घरांमध्ये राहणा-यांना रस्त्यावर येऊ देणार नाही

''ठाणे महापालिकेत काँग्रेसची सत्ता नसली तरी येथील जनता आमचीच आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील अनधिकृत घरांमध्ये लाखो गोरगरीब राहत असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर येऊ देणार नाही.

ठाणे - ''ठाणे महापालिकेत काँग्रेसची सत्ता नसली तरी येथील जनता आमचीच आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील अनधिकृत घरांमध्ये लाखो गोरगरीब राहत असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर येऊ देणार नाही. अनधिकृत घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी उल्हासनगरच्या धर्तीवर योजना तयार करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. या रहिवाशांना सुख-समाधानाचे जीवन जगता यावे, यासाठी आपण प्रयत्न करू,'' अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथील गोरगरीब जनतेला दिलासा दिला.
ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डवलेनगर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या वचनपूर्ती मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी काँग्रेस शहर अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर, महिला अध्यक्ष ज्योती ठाणेकर आदी उपस्थित होते. 'ठाणे महापालिकेत गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असून, त्यांच्या नेत्यांमुळेच अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत,' असा टोला लगावून ते म्हणाले, येथील जनतेने निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मते दिली नसली तरी आम्ही सूड उगवत नाही. अनधिकृत इमारतींमध्ये राहणा-यांना वा-यावर न सोडता सरकार त्यांची काळजी घेईल, असा विश्वास त्यांनी दिला.
''ठाण्यात अनेक वर्ष शिवसेना- भाजप युतीची सत्ता असतानाही त्यांचे नगरसेवक, आमदार व नेत्यांनी येथे कोणते परिवर्तन केले. हिंमत असेल तर त्यांनी आपल्या विकासकामांची यादी जाहीर करावी,'' असे आव्हान उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. राज्यात १४ वर्षे व दिल्लीत साडेनऊ वर्षे कॉँग्रेसची सत्ता असून आम्ही जाहीरनाम्यात जनतेला दिलेली वचने पूर्ण केली आहेत. राज्य व केंद्र सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोहचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने डवलेनगर येथे आयोजित केलेल्या वचनपूर्ती मेळाव्यात राणे बोलत होते. ठाण्यातील जनतेने शिवसेना- भाजप युतीला मतदान करून चूक केली असली, तरी २०१४च्या निवडणूकीत कॉँग्रेसवर विश्वास दाखवावा आणि ठाणे महापालिकेची सत्ता आमच्या हाती सोपवावी. या शहराचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दच राणे यांनी या वेळी दिला.
केंद्र सरकारने जागतिक आर्थिक मंदी असतानाही देशाचा विकासदर ६ टक्क्यांवर कायम ठेवला. हे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचेच श्रेय असल्याचे राणे यांनी सांगितले. नदेगा योजनेद्वारे रोजगाराची हमी, वैद्यकीय सेवांसाठी आर्थिक मदत, पंतप्रधान सडक योजना, महानगरपालिकांना रस्त्यांसह विविध विकासकामांसाठी दिलेला निधी यांची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकार अन्नसुरक्षा विधेयक आणणार असून, त्याद्वारे देशातील गोरगरीब जनतेला अतिशय स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नारायण राणे यांनी या वेळी कॉँग्रेस कार्यकर्ते व पदाधिका-यांना मार्गदर्शनही केले. '२०१४च्या लोकसभा निवडणुकीतील लढाई काँग्रेसला जिंकायची असेल, तर योग्य नियोजन करावे. एकमेकांचे फक्त पाय न खेचता लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
'मराठी माणसाच्या वाताहतीला शिवसेना जबाबदार'
''ज्या मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला, त्याच मुंबईत मराठी टक्का घसरला. मुंबईतून मराठी माणूस कमी झाला आणि तो ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसईपर्यंत जाऊन पोहोचला. मराठी माणसाच्या झालेल्या या वाताहतीस शिवसेनाच जबाबदार आहे, अशा शब्दांत नारायण राणे यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. बेकार तरुणांना शिवसेनेने कोणता उद्योग दिला. मातोश्रीसाठी अनेक मराठी तरुणांनी दगड अंगावर झेलले. गिरण्यांच्या जमिनी विकल्या गेल्या, पण मराठी कामगार देशोधडीला लागला. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी ४२० कोटींना कोहिनूर गिरणी विकत घेतली. पण मराठी तरुणांना नोक-या मात्र त्यांनी दिल्या नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
बेकायदा बांधकामांचे पैसे वपर्यंत पोहोचले
ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे केली. त्यातून मिळालेले पैसे वपर्यंत पोहोचवण्यात आले. अनधिकृत बांधकाम करून जनतेच्या जिवाशी खेळणा-या मंडळींनाच ठाणेकर जनता पुन्हा निवडून देते, हे दुर्दैव आहे, असे राणे यांनी सांगितले.

Read More »

अंकितचे नातलग लग्नासाठी मुंबईत

आयपीएलच्या स्पॉटफिक्सिंगमध्ये अडकलेला मुंबईकर अंकित चव्हाण मूळचा राजापूरचा. या तालुक्यातील पांगरे बुद्रुक हे त्याचे मूळ गाव असून, तिथे त्याचे नातेवाईक राहतात.

राजापूर - आयपीएलच्या स्पॉटफिक्सिंगमध्ये अडकलेला मुंबईकर अंकित चव्हाण मूळचा राजापूरचा. या तालुक्यातील पांगरे बुद्रुक हे त्याचे मूळ गाव असून, तिथे त्याचे नातेवाईक राहतात. २ जून रोजी होणा-या लग्नासाठी अंकितला जामीन मंजूर झाल्याने तिथे राहणारे चव्हाण कुटुंबीय सुखावले असून, ते शुक्रवारी मुंबईला रवाना झाले.
मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने नेहा सांबरी व अंकित चव्हाण यांचा विवाह होणार आहे. त्यांचा साखरपुडा गेल्यावर्षी १ जुलैला झाला होता. सध्या नेहा आयटी कंपनीत काम करत आहे. रूपारेल महाविद्यालयात शिकताना तिचे आणि अंकितचे प्रेमसंबंध जुळले.
'तो खूप साधा आहे. लग्न ही केवळ औपचारिकता असून आम्ही केव्हाच एकरूप झालो आहोत. त्याच्यापासून दूर जाण्याचा मी विचारच करू शकत नाही. या कठीण काळात मी त्याच्यासोबत उभे राहणे गरजेचे आहे,' असे नेहाने सांगितले.पांगरेबुद्रुक चिंचवाडी धरण प्रकल्प येथील रहिवासी आणि सध्या सावंतवाडीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भांडारपाल असलेले विष्णू सीताराम तथा बंडय़ा चव्हाण यांचा अंकित हा पुतण्या. दरवर्षी राजापुरातील आपल्या घरी अंकित येतो, असे त्यांनी सांगितले.


Read More »

रेसकोर्सचा निर्णय सरकारच घेईल

 महालक्ष्मी रेसकोर्सच्या जमिनीचा भाडेकरार शुक्रवारी संपुष्टात आला असून, ही जमीन ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी शिवसेना उतावीळ आहे. मात्र मागील वेळेस रॉयल टर्फ क्लबचा भाडेकरार १९९४ साली संपुष्टात आल्यानंतर २००४ साली त्याचे नूतनीकरण झाले होते,

मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्सच्या जमिनीचा भाडेकरार शुक्रवारी संपुष्टात आला असून, ही जमीन ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी शिवसेना उतावीळ आहे. मात्र मागील वेळेस रॉयल टर्फ क्लबचा भाडेकरार १९९४ साली संपुष्टात आल्यानंतर २००४ साली त्याचे नूतनीकरण झाले होते, अशी माहिती आयुक्त सीताराम कुंटे यांनी देत, जागा ताब्यात घेण्यासाठी केलेल्या ठरावाबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाईल, असे सांगून राज्य सरकारच यावर निर्णय घेईल, अशी अप्रत्यक्षरीत्या कबुली दिली आहे.
महालक्ष्मी रेसकोर्सवरील जागा राज्य सरकार व महापालिकेकडे विभागली गेली आहे. येथील ५ लाख ९६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा राज्य सरकारकडे, तर २ लाख ५५ हजार चौरस मीटरची जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. मात्र या जागेवर अनेक प्रकारची आरक्षणे असून, सीआरझेडसह काही वास्तू हेरिटेज टूबीअंतर्गत येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. या जागेचा भाडेकरार अद्याप असल्यामुळे ही जागा ताब्यात घेण्याविषयी या क्षणी बोलणे उचित ठरणार नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
मात्र महापालिकेचे सभागृहनेते यशोधर फणसे यांनी, गटनेत्यांच्या बैठकीपुढे ही जागा ताब्यात ठेवण्यासाठी एक पत्र दिले होते. या निर्णयाची प्रत सरकारकडे पाठवून महापालिकेचे म्हणणे कळवले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. भाडेकरार संपल्यानंतर जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेचे अधिनियम आहेत. त्यामुळे जेव्हा जशी वेळ येईल, तसा त्या कायद्याचा वापर केला जाऊ शकतो, असेही आयुक्तांनी या वेळी सूचित केले.

बाळासाहेबांच्या नावाचा आग्रह शिवसेनेने सोडला
रेसकोर्सची जागा मुंबई महापालिकेने ताब्यात घेऊन, त्यावर भव्य उद्यान उभारावे आणि त्याला बाळासाहेबांचे नाव द्यावे, असे सांगणा-या शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा आग्रह सोडला. या उद्यानाला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, असे आपण कधीही म्हणालो नव्हतो, असे घूमजाव त्यांनी केले. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या मालकीच्या रेसकोर्सच्या भाडेकराराची मुदत शुक्रवारी संपली आहे. हा भूखंड महापालिकेने ताब्यात घेऊन त्यावर भव्य उद्यान उभारावे, असा मानस महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. हे नवे उद्यान कसे असेल, याचे सादरीकरण त्यांनी या परिषदेत केले. शिवसेनाप्रमुखांचे नाव दिल्यास विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नावाचा आग्रह सोडला आहे.

महापालिका आज पाठवणार सरकारला पत्र
मुंबई रेसकोर्सची मुदत ३१ मेला संपुष्टात आल्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने राज्य सरकार देण्यासाठी पत्र तयार केले आहे. या पत्रावर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आयुक्तांनी स्वाक्षरी केली नव्हती. नगरविकास खात्याला लिहिलेल्या या पत्रात ही जागा ताब्यात घेऊन महापालिकेला द्यावी; अथवा सरकारने घ्यावी, किंबहुना दोघांनीही संयुक्त ताब्यात घ्यावी, असे म्हटले आहे. गटनेत्यांच्या ठरावाच्या प्रतीसोबत हे पत्र जोडून आयुक्त शनिवारी ते नगरविकास खात्याकडे पाठवतील, असे खात्रीलायक वृत्त आहे. आयुक्तांच्या टेबलावर हे पत्र मागील दीड महिन्यापासून पडले असून, केवळ या प्रकरणाला राजकीय रंग चढल्यामुळेच त्यांनी सावध भूमिका घेत भाडेकरार संपल्यानंतरच ते सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला होता, असे म्हटले जात आहे.

Read More »

स्वामी विवेकानंदांच्या विचारांनीच भारत बलशाली होईल

 'संपूर्ण जगाला विश्वशांतीचा संदेश देणा-या स्वामी विवेकानंदांचे विचार भारतासाठी बहुमोल आहेत. त्यांच्या विचारांनीच भारत बलशाली होऊ शकेल,' असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला.
मुंबई - 'संपूर्ण जगाला विश्वशांतीचा संदेश देणा-या स्वामी विवेकानंदांचे विचार भारतासाठी बहुमोल आहेत. त्यांच्या विचारांनीच भारत बलशाली होऊ शकेल,' असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला.
सुमारे १२० वर्षापूर्वी मुंबई बंदरातून शिकागोतील धर्म परिषदेला निघालेल्या स्वामी विवेकानंदांच्या या ऐतिहासिक प्रवासानिमित्त शुक्रवारी 'रामकृष्ण मिशन' आणि 'ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन' या संस्थांच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल के. शंकरनारायणन, राजशिष्टाचारमंत्री सुरेश शेट्टी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर व रामकृष्ण मिशनचे स्वामी सर्वलोकनंदन उपस्थित होते.
३१ मे १८९३ रोजी मुंबई बंदरातून स्वामी विवेकानंदांनी शिकागोला प्रयाण केले. या प्रवासाने जगाला महत्त्वपूर्ण भारतीय विचार दिले. मात्र या विचारांची आज भारताला आणि वैयक्तिक पातळीवर सर्वानाच गरज आहे. विवेकानंदांनी जातीभेद आणि जाचक रूढी-परंपरांना विरोध केला. जगाला बंधुभावाचा आणि सौहार्दाचा संदेश दिला. आपल्या शिकवणीतून त्यांनी पौर्वात्य आणि पश्चिमात्य शिकवणीचा सुरेख संगम घातल्यानेच भारत आज नावारूपाला आला आहे. मात्र आजघडीला शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचेही मुखर्जी यांनी या प्रसंगी सांगितले.
स्वामींनी मुंबईला तीनदा भेट दिली. या भेटीदरम्यान, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या महाराष्ट्रातील थोर समाजसुधारकांशी स्वामींची गाठ पडली. मात्र भेटीची नोंद इतिहासात कुठेही सापडत नसल्याची खंत रामकृष्ण मिशनचे स्वामी सर्वलोकानंदन यांनी व्यक्त केली. दरम्यान, स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यावर 'ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन'चे प्रमुख सुधींद्र कुलकर्णी व मुख्य अधिकारी राधा विश्वनाथन यांनी लिहिलेल्या 'स्वामी विवेकानंद इन मुंबई अँड महाराष्ट्र' आणि 'अ मंक फ्रॉम बाँबे' या पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते झाले.

Read More »

दिल्लीतील बिल्डर आनंद सक्सेनाचीही चौकशी

 'आयपीएल सट्टेबाजी'प्रकरणी गुन्हे शाखा आता दिल्लीतील बिल्डर आनंद सक्सेना याचीही चौकशी करणार आहे.

मुंबई - 'आयपीएल सट्टेबाजी'प्रकरणी गुन्हे शाखा आता दिल्लीतील बिल्डर आनंद सक्सेना याचीही चौकशी करणार आहे. गुन्हे शाखेने त्याला समन्स बजावले असून, सक्सेनाला मुंबईत बोलावण्यात आले असल्याचे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सट्टेबाज टिंकू यालाही गुन्हे शाखेने अधिकृतरीत्या अटक केली आहे. तर गोवा पोलिसांनी अटक केलेल्या अन्य एका सट्टेबाजाचाही ताबा गुन्हे शाखा घेणार आहे.
आनंद सक्सेनाची विंदूशी मागील १५ वर्षापासून ओळख आहे. आनंदनेच विंदूची ओळख सट्टेबाज संजय जयपूर व पवन जयपूर यांच्याशी करून दिली होती. गुन्हे शाखेच्या तपासानुसार, विंदूने आनंदसाठीही सट्टेबाजी केल्याचे समोर आले असून, काही महिन्यांपूर्वीच विंदू व आनंदची भेट झाली होती. त्या वेळी या दोघांत सट्टेबाजीबाबत बोलणे झाल्याचे विंदूच्या चौकशीत पुढे आले आहे.
दरम्यान, गोवा पोलिसांनी अटक केलेल्या सहा सट्टेबाजांपैकी परेश भाटिया याचादेखील ताबा गुन्हे शाखा घेणार असून, त्यासाठी न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेल्या अश्विन अगरवाल ऊर्फ टिंकू याला शुक्रवारी गुन्हे शाखेने अधिकृतरीत्या अटक केली असून, शनिवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.
गुन्हे शाखेच्या ताब्यात चेन्नईतील हॉटेल मालक
चेन्नईतील हॉटेल व्यावसायिक विक्रम अगरवाल याची शुक्रवारी गुन्हे शाखेने चौकशी केली. रॅडिसोन ब्लू इगमोर या हॉटेलचा मालक असलेल्या विक्रमने विंदूची ओळख मय्यपनशी करून दिली होती. या दोघांच्याही चौकशीत त्याचे नाव आल्याने, तो मुंबई पोलिसांच्या रडारवर आला होता. त्याने पत्नीच्या नावावरील सीमकार्डच्या साहाय्याने आयपीएल सामन्यांदरम्यान किट्टी या सट्टेबाजाशी १००हून अधिक वेळा संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शनिवारी गुन्हे शाखेने अगरवाल याला पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.
चार आरोपींच्या पोलिस कोठडीत ३ जूनपर्यंत वाढ
मुंबई : स्पॉटफिक्सिंगमधील अटक आरोपी विंदू दारासिंग, अल्पेश पटेल, प्रेम तनेजा आणि गुरुनाथ मय्यपनची पोलिस कोठडी किल्ला न्यायालयाने ३ जूनपर्यंत वाढवली आहे. फिक्सिंग प्रकरणात आणखी माहिती मिळवण्यासाठी या आरोपींची कोठडी वाढवण्याचा अर्ज गुन्हे शाखेने शुक्रवारी न्यायालयाकडे केला असता तो मंजूर करण्यात आला आहे.

Read More »

बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराचा खर्च राजकीय पक्षांना करण्याची गरज नाही

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंसंस्कारावेळी शिवाजी पार्क येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही व एलईडी स्क्रीन यासाठी केलेल्या सुमारे ५ लाखांच्या खर्चावरून उठलेल्या वादानंतर महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी हा खर्च राजकीय पक्षांनी करण्याची गरज नाही.

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंसंस्कारावेळी शिवाजी पार्क येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही व एलईडी स्क्रीन यासाठी केलेल्या सुमारे ५ लाखांच्या खर्चावरून उठलेल्या वादानंतर महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी हा खर्च राजकीय पक्षांनी करण्याची गरज नाही, असे स्पष्ट करत शिवसेना आणि मनसेला चांगलीच चपराक लगावली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल्याने त्याचा खर्च सरकारच्या वतीने उचलण्यात आला. मात्र त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांच्या विनंतीवरून शिवाजी पार्कमध्ये सीसीटीव्ही व एलईडी स्क्रीन बसवण्यात आल्या. त्यासाठी ४ लाख ९९ हजार ४४० रुपयांचा खर्च महापालिकेच्या वतीने करण्यात आला.
या खर्चावरून उठलेल्या वादानंतर शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेश अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांना सोपवण्यात आला होता. मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनीही हा खर्च मनसेच्या वतीने करण्यात येईल, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर एवढे दिवस शांत असलेल्या आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
''बाळासाहेबांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याने त्यासाठी सरकारचा पैसा वापरला जाणार आहे. महापालिकेने केलेला खर्च राज्य सरकारकडून वसूल करण्यासाठी त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यामुळे या खर्चाचा भार कुणा राजकीय पक्षांनी उचलण्याची गरज नाही, असे कुंटे म्हणाले.

Read More »

खासगी विद्यापीठांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

राज्यात स्वयंअर्थसाहाय्यित शाळांच्याच धर्तीवर स्थापन करण्यात येणा-या खासगी विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मुंबई - राज्यात स्वयंअर्थसाहाय्यित शाळांच्याच धर्तीवर स्थापन करण्यात येणा-या खासगी विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांमुळे ज्यांच्याकडे ठरावीक रक्कम, जागा आणि काही सोयी उपलब्ध असतील, अशा कोणत्याही संस्था आणि महाविद्यालयांना विद्यापीठ स्थापन करता येणार असल्याने राज्यात आणि विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसारख्या मोठय़ा शहरांत खासगी विद्यापीठांचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे.
राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संमती दिल्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. मात्र या विधेयकात राज्य घटनेनुसार, आरक्षण धोरणाची तरतूद नसल्याने राज्यपालांनी ते सरकारला परत केले आहे. त्यानंतर हे विधेयक दोन्ही सभागृहांकडून मागे घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात ही विद्यापीठे स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सरकारच्या निर्णयानुसार राज्यात कोणत्याही विश्वस्त संस्था, सोसायटी अथवा शैक्षणिक संस्थांना विद्यापीठ स्थापन करता येईल. शिवाय ज्या महाविद्यालयांत पाच वर्षापासून पदव्युत्तर विभाग कार्यरत आहेत, अशी महाविद्यालये विद्यापीठात रूपांतरित होणार आहेत.
आरक्षण मिळेल, पण नावापुरते!
राज्य सरकारने संमत केलेले विधेयक नाकारल्यानंतर यातून पळवाट म्हणून विद्यापीठांनी ५० टक्के आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. मात्र या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांला शैक्षणिक शुल्क अथवा इतर कशासाठीही सरकारकडून एक रुपयाही देण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शुल्काप्रमाणाचे या विद्यार्थ्यांनाही प्रवेश घ्यावे लागतील. या विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे शुल्क किमान ५० हजारपासून २० लाखांच्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा असेल, त्यांनाच येथे प्रवेश मिळतील. त्यातही हे आरक्षणाचे प्रवेश गुणवत्ता यादीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर केले जातील. त्यांनतर जर या जागा भरल्या नाहीत तर आरक्षित जागांवर इतर जागा भरल्या जातील. मात्र कोणत्याही स्थितीत हे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त दिले जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.

या विद्यापीठासाठी शहरी भागात १० एकर, ग्रामीण भागात ५० एकर तालुका-जिल्हा स्तरावर २५ एकर आणि विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी १५ एकर जमीन आवश्यक आहे. ही जमीन स्वत:च्या मालकीची नसेल तर ती ३० वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर असणे आवश्यक आहे.


Read More »

मुंबई विद्यापीठात आठ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

कला, विज्ञान, वाणिज्य शाखांसाठी मुंबई विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीला दुस-या दिवशीही विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला.

मुंबई - कला, विज्ञान, वाणिज्य शाखांसाठी मुंबई विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीला दुस-या दिवशीही विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तब्बल ८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केल्याची माहिती विद्यापीठातील अधिका-यांनी दिली.
मुंबई विद्यापीठात होणा-या ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रियेतून विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कला, विज्ञान, वाणिज्य आणि विधी (पाच वष्रे) महाविद्यालयातील यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश दिले जाणार आहेत.
यात कला, वाणिज्य, विज्ञान यासोबतच बी.एम.एम., बी.एम.एस., एम.एस., बी.एस.डब्ल्यू., बी. एस्सी (आयटी) बी.एस्सी (नॉटिकल आणि होम सायन्स मेरिटाइम हॉस्पिटिलिटी, फोरेन्सिक सायन्य इत्यादी), बी.कॉम (बी.अँडआय), बी.कॉम. (अकाउंटिंग अँड फायनान्स), बी.कॉम. (फायनान्स अँड मार्केट), बी.कॉम. (आउटसोर्सिग अँड फायनान्स), बी.कॉम. (बँकिंग अँड इन्शुरन्स), एफवाय बी.एस्सी. (बायो-टेक्नॉलॉजी), एफवाय बीएसडब्ल्यू आणि बीएमएस इत्यादी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Read More »

आयआयटीच्या 'स्मार्टसेन्स'चा जागतिक गौरव

मधुमेहासाठी विविध तपासण्यांचा अहवाल केवळ एका रक्ताच्या थेंबात आणि काही मिनिटांत उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई आयआयटीतील प्राध्यापकांनी तयार केलेल्या 'स्मार्टसेन्स' या डिव्हाईसचा जागतिक स्तरावर गौरव करण्यात आला आहे.

मुंबई - मधुमेहासाठी विविध तपासण्यांचा अहवाल केवळ एका रक्ताच्या थेंबात आणि काही मिनिटांत उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई आयआयटीतील प्राध्यापकांनी तयार केलेल्या 'स्मार्टसेन्स' या डिव्हाईसचा जागतिक स्तरावर गौरव करण्यात आला आहे.
अमेरिकेतील हेल्थकेअर इनोव्हेशन टेक्नॉलॉजी लॅब (एचआयटीएलएबी) या संस्थेने न्यूयार्क येथे आयोजित केलेल्या हेल्थकेअर इनोव्हेशन वर्ल्ड कप या स्पध्रेत 'स्मार्टसेन्स'ला जागतिक स्तरावरील तिस-या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.
भारत, चीन आदी आशिया खंडातील देशांत किमान दोन तासांतून एकदा रक्त घेऊन मधुमेहाची तपासणी केली जाते. मात्र या चाचणीचा अहवाल येण्यासाठी किमान आठ ते बारा तासांचा अवधी लागतो, परंतु आयआयटी मुंबईतील बायोसायन्य व इंजिनीअरिंगचे प्राध्यापक डॉ. मयुर सदवाना आणि डॉ. रोहित श्रीवास्तव यांनी शोधून काढलेल्या 'स्मार्टसेन्स' डिव्हाइसमुळे लाखो मधुमेही रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
केवळ एका रक्ताच्या थेंबातून मधुमेहींना शरीरातील साखरेचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, पीएच इत्यादी अनेक बाबींची माहिती एका मिनिटात आणि त्याच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या सर्व तपासणीसाठी मधुमेहाच्या रुग्णाला किमान २ ते ८ हजार रुपये मोजावे लागतात. मात्र 'स्मार्टसेन्स' डिव्हाइसमुळे या तपासण्या केवळ ३०० रुपयांत होतील, अशी माहिती या डिव्हाइसचे निर्माते डॉ. मयुर सदवाना यांनी 'प्रहार'शी बोलताना दिली.
'स्मार्टसेन्स' दीड वर्षात बाजारात
'स्मार्टसेन्स' डिव्हाइस तयार करण्यासाठी डॉ. मयुर सदवाना आणि डॉ. रोहित श्रीवास्तव यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. या डिव्हाइसचा आकार लँडलाइन दूरध्वनीच्या आकाराप्रमाणे आहे. या डिव्हाइसचे मॉडेल तयार असून, बाजारात ते दीड वर्षात येईल. त्यापूर्वी येत्या सहा महिन्यांत याचे देश-विदेशासाठीच्या मान्यता आणि त्याचे मॉडेल बनून तयार होईल.


Read More »

जनसाधारण बुकिंग केंद्रांना प्रतिसाद वाढला

 मध्य रेल्वेवर प्रवाशांना सहज आणि लवकरात लवकर तिकीट मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनसाधारण तिकीट बुकिंग केंद्रांना (जेटीबीएस) सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला.

मुंबई - मध्य रेल्वेवर प्रवाशांना सहज आणि लवकरात लवकर तिकीट मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनसाधारण तिकीट बुकिंग केंद्रांना (जेटीबीएस) सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला.
मात्र आता या केंद्रांना प्रवाशांनीच प्राधान्य दिले आहे. जेटीबीएसमधून तिकीट खरेदी करताना एक रुपया अधिक मोजावा लागतो. तरीही प्रवाशांकडून या योजनेला प्रतिसाद वाढत आहे. दरम्यान, एटीव्हीएम प्रणालीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे दिसते. त्याऐवजी ते रेल्वे स्थानकांत खिडकीवरून तिकीट घेणे पसंत करत आहेत. मध्य रेल्वेच्या एका निरीक्षणातून हे समोर आले आहे.
तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी व्हावी, यासाठी मध्य रेल्वेवर सीव्हीएम कूपन प्रणाली सुरू करण्यात आली होती. याला २०१० आणि २०११ मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रणालीच्या माध्यमातून २०१० ला २ लाख तर २०११ मध्ये ३ लाख तिकिटे दररोज विकली जात होती. मात्र या यंत्रात येणारे बिघाड आणि प्रवाशांच्या तक्रारींनंतर सीव्हीएम कूपन बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. त्यानंतर एटीव्हीएम तिकीट प्रणाली मध्य रेल्वेने आणली.
त्यासाठी सध्या २५० पेक्षा जास्त यंत्र बसवण्यात आली आहेत. मात्र गेल्या चार वर्षाची आकडेवारी पाहता, सीव्हीएम कूपनच्या तुलनेत एटीव्हीएमला मिळालेला प्रतिसाद अल्प आहे. २०१० साली या माध्यमातून दिवसाला ३० हजारच तिकिटे विकली जात होती. तब्बल चार वर्षानी हा आकडा एक लाखाच्या आसपास गेला.
गेल्या दोन वर्षापासून अस्तित्वात आलेली जेटीबीएस तिकीट प्रणाली लोकांच्या पसंतीला उतरत आहे.
सध्या मध्य रेल्वेवर १४० जेटीबीएस केंद्र आहेत. २०१२ साली यातून रोज ५० हजारांच्या आसपास तिकीट विक्री होत होती. तर २०१३ मध्ये हा आकडा दुप्पट झाला असून, आता रोज एक लाख तिकिटे विकली जात आहेत. विशेष म्हणजे २०१० आणि २०११ मध्ये या माध्यमातून केवळ हजार ते दीड हजार तिकिटे दररोज विकली जात होती, मात्र आता एक रुपया अधिक देऊनही प्रवासी या तिकीट प्रणालीकडे वळत आहेत.


Read More »

श्रीनिवासन यांनी फेटाळला आयसीसीचा दावा

गुरुनाथ मय्यपन हा सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याची कोणतीही पूर्वसूचना आयसीसीकडून देण्यात आली नव्हती, असे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली – गुरुनाथ मय्यपन हा सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याची कोणतीही पूर्वसूचना आयसीसीकडून देण्यात आली नव्हती, असे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. श्रीनिवासन यांच्यापाठोपाठ बीसीसीआयचे संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनीही अशी कोणतीही पूर्वसूचना मिळाली नसल्याचे स्पष्ट केले.
एसीएसयूच्या अधिका-यांकडून सूचना आल्याची मय्यपनची कबुली
मय्यपनच्या सट्टेबाजीतील सहभागाबाबतचा संशय आयसीसीला आला होता. त्याबाबत मय्यपनला आयसीसीच्या 'अ‍ॅन्टी करप्शन अँड सिक्युरिटी युनिटच्या(एसीएसयू) एका अधिकाऱ्याने काळजी घेण्याची सूचना केली होती, अशी बाब मय्यपनच्या चौकशीत पुढे आली आहे. गुन्हे शाखा आता याप्रकरणाबाबत आयसीसीशी संपर्क साधणार आहे.
सट्टेबाजी आणि सट्टेबाजांशी संबंधांच्या संशयावरून अटक करण्यात आलेला मय्यपनला आयपीएल दरम्यान आयसीसीच्या एसीएसयूच्या एका अधिका-याने संपर्क साधून काळजी घेण्याची सूचना केली होती. त्यावेळी घाबरलेला मय्यपनने त्याबाबतची माहिती याप्रकरणातील दुसरा आरोपी विंदू दारासिंगला दिली होती. याबाबत गुन्हे शाखेने चौकशीदरम्यान मय्यपनला विचारले असता त्यानेही ही बाब मान्य केली. एप्रिल महिन्यात आयसीसीच्या या अधिकाऱ्याचा दूरध्वनी आल्याचे त्याने चौकशीत सांगितले.
दरम्यान, घाबरलेल्या मय्यपनने विंदूसोबतचे संबंध व सट्टेबाजीमुळे या अधिकाऱ्याला अधिक माहिती विचारली नाही आणि या सर्व प्रकाराची कुणकुण आयसीसीला लागल्याचे गृहीत धरले. त्यानंतर त्याने विंदूलाही सतर्क राहण्याबाबत सांगितल्याचे गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. विशेष म्हणजे याबाबत आयसीसीच्या वतीने मय्यपनला लेखी स्वरूपात कोणतीही माहिती का देण्यात आली नाही, या प्रश्नाचे उत्तर अद्याप उलगडले नाही.

सिद्धार्थ त्रिवेदीची दिल्ली न्यायालयात साक्ष
राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज सिद्धार्थ त्रिवेदीने शुक्रवारी साकेत जिल्हा सत्र न्यायालयात श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्याविरोधात साक्ष नोंदवली. मात्र त्रिवेदी साक्षीदार म्हणून भूमिका बजावणार का याबाबत सांगण्यास दिल्ली पोलिस आयुक्त नीरज कुमार यांनी नकार दिला. आपल्यालाही बुकींकडून विचारणा झाली होती मात्र आपण त्यांची 'ऑफर' धुडकावली असे त्रिवेदीने पोलिसांना सांगितल्याचे समजते. त्याबाबत आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला आपण गेल्यावर्षी सांगितले होते, असा दावाही त्याने केला आहे. बुकींनी त्याला भेटवस्तूही 'ऑफर' केल्या होत्या आणि पार्टीलाही बोलावले होते मात्र त्रिवेदीने त्यास स्पष्टपणे नकार दिला. स्पॉटफिक्सिंगसाठी अन्य दोन परदेशी क्रिकेटपटूंकडे ते गेले होते, असाही खुलासा त्रिवेदीने केला आहे.

इंग्लिश कौंटी क्रिकेटपटूंचीही चौकशी
लंडन : इंग्लंडमध्ये कौंटी खेळणारे २० पेक्षा जास्त क्रिकेटपटू आणि दोन पंच यांची आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून शुक्रवारी चौकशी करण्यात आली. या क्रिकेटपटूंचा बांगलादेश प्रिमियर लीगमध्ये सहभाग होता. रवी बोपारा, ओवेस शहा आदींचा त्यात समावेश आहे. दरम्यान, एकाही मॅचफिक्सिंगमध्ये समावेश नसल्याचे समोर आले.

राजस्थान आणि चेन्नई संघांचीही चौकशी होणार
बंगळूरु : बीसीसीआयने स्थापन केलेल्या तीन सदस्यांच्या चौकशी आयोगामार्फत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांचीही चौकशी होणार आहे. मंगळवारी बीसीसीआयने नियुक्त केलेल्या या तीन सदस्यांच्या आयोगाकडून संबंधित संघांची चौकशी होणार आहे, असे आयोगावर असणारे निवृत्त न्यायाधिश जयराम चौटा यांनी सांगितले. तपासाची पद्धत कशी असेल असे त्यांना विचारले असता, आयोगाचा अध्यक्ष नेमल्यावर पुढील दिशा ठरवू असे ते म्हणाले. दरम्यान, चौकशी आयोगावर अध्यक्षांपासून (श्रीनिवासन) कोणाचाही दबाव नाही, असे चौटा यांनी स्पष्ट केले.

Read More »

घरासाठी नंबर लागला

'म्हाडा'चे घर यावेळी तरी लागते की नाही,' अशा चिंतेत असणारे तसेच घरासाठी पहिल्यांदाच अर्ज करणारे 'बघूया काय घडते ते,' असे म्हणत शुक्रवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात अनेक जण 'म्हाडा'च्या सोडतीसाठी जमले होते.

मुंबई - 'म्हाडा'चे घर यावेळी तरी लागते की नाही,' अशा चिंतेत असणारे तसेच घरासाठी पहिल्यांदाच अर्ज करणारे 'बघूया काय घडते ते,' असे म्हणत शुक्रवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात अनेक जण 'म्हाडा'च्या सोडतीसाठी जमले होते.
सकाळी १०.१५ वाजता सोडत काढण्यास सुरुवात झाली. पहिले विजेते घोषित झाले आणि तुतारी व ढोलताशांच्या झालेल्या निनादामुळे भाग्यवंतांचा आनंद द्विगुणीत झाला. 'म्हाडा'चे दक्षता अधिकारी रामराव पवार यांच्या खुमासदार शैलीतील सूत्रसंचालन व दिलफेक मुशायराने वातावरणात रंग आणला. त्यांच्या शेरोशायरीला अनेकांनी दाद दिली.
'म्हाडा'च्या सोडतीत ८७,६४७ अर्जदारांमधून १,२२० अर्जदार भाग्यवंत ठरले. पहिल्या सत्रात घरांच्या १२ संकेतस्थळांची तर दुपार नंतरच्या सत्रात उर्वरित १३ संकेतस्थळांतील विजेते घोषित करण्यात आले. यंदा कमी घरे असल्याने व 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर सोडतीचा निकाल जाहीर करण्यात आल्याने अनेकांनी हॉलमध्ये गर्दी करण्याऐवजी घरी बसूनच निकाल पाहणे पसंत केले.
उपस्थित विजेत्यांचा 'म्हाडा'तर्फे सत्कार करण्यात आला. सोडतीत विजेते ठरलेल्यांपैकी काहींनी पहिल्यांदाच तर काहींनी प्रत्येक सोडतीच्या वेळी अर्ज केले होते. यात कलाकार, खासगी कंपनीतील चालक, स्वातंत्र्यसैनिक, कार्यालयातील शिपाई, भाडय़ाने घर परवडत नसल्याने गावाकडे शेतीवाडी करण्याचा विचार करणारे, आदी गरजू भाग्यवंत अर्जदार होते.
विरारच्या घरांची सोडत दिवाळीत
विरार-बोळिंज येथील २,४५० घरांची सोडत येत्या दिवाळीत तर मुंबई व कोकण मंडळाची पुढच्या वर्षीच्या मे महिन्यात ३ हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी सांगितले.
पाच वर्षात एक लाख घरे बांधणार
सर्वसामान्यांना परवडणा-या किमतीत घरे देणा-या 'म्हाडा'ने पुनर्विकासातून येत्या पाच वर्षात एक लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नागरिकांचे मुंबईतील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने गृहसंचय (हाऊसिंग स्टॉक) करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी राज्यभरात ५० ते ६० एकर जमीन म्हाडाने खरेदी केली असून, जवळपास १० ते १२ हजार घरे उपलब्ध होतील, असे म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी सांगितले. अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना घर लागल्यानंतर त्यांना कमी उत्पन्नामुळे कर्ज मिळत नाही, त्यामुळे घराचा ताबा मिळणे कठीण होते. त्यामुळे येत्या काही महिन्यांत त्यांच्या उत्पन्नाबाबत निर्णय घेऊन त्यांची गृहकर्ज प्रकरणांची समस्या दूर करण्यात येईल, असेही गवई यांनी सांगितले. पुण्याच्या थेऊर येथे सुमारे १५० एकर जमीन खरेदी करण्याचा म्हाडाने विचार केला आहे. येथील एका साखर कारखान्याने ही जमीन देण्याचे मान्य के ले आहे. मात्र, येथील जमीन घेतल्यानंतर त्यावेळच्या रेडिरेकनर किमतीतच घरे देण्याचे जमले तरच ही जमीन म्हाडा विकत घेणार आहे.

म्हाडात नोकरी लागण्यापूर्वी सतत पाच वेळा घरासाठी अर्ज केला, मात्र घर लागले नाही. म्हाडात रुजू झाल्यावर प्रथमच अर्ज केला. पवईत ३०० घरांच्या संकेत असलेल्या उच्च उत्पन्न गटातील घर लागले. हे घर महाग असल्यामुळे मुलीने आर्थिक मदत केली, शिवाय बँकेतून आवश्यक ते कर्ज मिळाल्यास घर घेणे शक्य होणार आहे.
- डी. के. जगदाळे, म्हाडाचे सहमुख्य अधिकारी
मुंबईत स्वत:चे घर व्हावे, अशी इच्छा होती. परंतु ते पूर्ण करणे जमत नव्हते. कं पनीतील माझ्या साहेबाने म्हाडाच्या घरासाठी अर्ज कर, असे सांगितले. सुरुवातीला दुर्लक्ष केले पण त्यानंतर बघू या अर्ज करून म्हणून प्रथमच घरासाठी अर्ज भरला व घरही लागले. माझे स्वप्न पूर्ण झाले. झोपडीतील भाडय़ाच्या घरातून आता हक्काच्या घरात जाण्याचा आनंद मी उपभोगणार आहे.
- नारायण मुदलीयार, पार्ले.

एकटय़ाच्या वेतनात कुटुंब चालवावे लागते. विक्रोळीतल्या भाडय़ाच्या घरात राहतो. पाच हजार घराचे भाडे, त्यात बहीण मनोरुग्ण असल्याने तिच्या औषधोपचाराचा खर्च परवडत नाही. त्यामुळे मुंबईत घर घेणे शक्यच नाही. पण माझी पत्नी फारच जिद्दी. तिनेच अर्ज भरला आणि घरही लागले. आम्हाला इतका आनंद झाला आहे, की त्यासाठी शब्द नाहीत.
- दीपक महाजन, परिवहन कार्यालय, शिपाई

सोडतीसाठी यंदा प्रथमच अर्ज केला. सोडतीचे ठिकाणही माहिती नव्हते. पत्ता विचारत विचारत येथे पोहोचलो. हॉलमध्ये आल्यानंतर काही मिनिटांतच माझ्या नावाची घोषणा झाली. मला वाटते, सोडतच माझी वाट पाहात होती. माजी सैनिक म्हणून देशासाठी सेवा केली. बिल्डरांपेक्षा म्हाडावर माझा विश्वास आहे. त्यामुळे घर घ्यायचे तर म्हाडाचे, असेच ठरवले. आणि मला घरही लागले. वयाच्या ६२ व्या वर्षी माझे घराचे स्वप्न पूर्ण झाले.
- प्रमोद सावंत, माजी सैनिक, डोंबिवली

मी मूळचा तूळजापूरचा. मुंबईत आल्यावर अभिनेता म्हणून काम करताना स्वत:चे घर नाही, याची खंत होती. यापूर्वी सात वेळा सोडतीत अर्ज करण्याबाबत फक्त विचार केला. पण प्रत्यक्ष अर्ज भरला नाही. पाच वर्षे भाडय़ाच्या घरात राहतो आहे. गेल्या वर्षी लग्न झाले आणि स्वत:चे घर असण्याची अपेक्षा वाढली. यापूर्वी अभिनेता जितेंद्र जोशीला घर लागले आहे. ती प्रेरणाही होती. त्यामुळे ठरवले फक्त विचार करायचा नाही, तर अर्जच करायचा. घर लागणारच, असा आत्मविश्वास होता आणि तसेच झाले. पवई येथे घर लागले. मी सध्या वाहिन्यांवरील मालिकांमध्ये काम करतो आहे. बऱ्यापैकी नावारूपाला आलो आहे.
- शंतनू गंगणे, अभिनेता

Read More »

मान्सूनसाठी महापालिका सज्ज

मुंबईत येत्या ७ जूनला पावसाचे आगमन होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबई - मुंबईत येत्या ७ जूनला पावसाचे आगमन होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मान्सूनसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली असून, नालेसफाईची कामे ७० टक्के पूर्ण झाली असल्याची माहिती शुक्रवारी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच पाणी तुंबणा-या ठिकाणी निचरा करण्यासाठ पंप बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांसह जलजन्य आजार तसेच भरतीच्यावेळी विशेष पथक तैनात करण्यात येणार असल्याचेही कुंटे यांनी सांगितले.
बृहन्मुंबईसाठी आपत्कालिन कायदा २००५ मध्ये अमलात आल्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त हे याचे प्रमुख अधिकारी आहेत. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेच्यावतीने करण्यात येणा-या व्यवस्थेची माहिती महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता, मनीषा म्हैसकर यांच्यासह उपायुक्त मिलिन सावंत, आपत्कालिन विभागाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
आपत्कालीन परिस्थितीसाठी महापालिकेची तयारी
नालेसफाईची कामे ७० टक्के पूर्ण
त्नमोठय़ा भरतीचे १८ दिवस धोक्याचे. तर २५ जून आणि २४ जुलै हे दोन दिवस अतिधोक्याचे.
त्नपाणी तुंबणा-या १८५ ठिकाणी २२० पंप बसवणार
त्न१८,७५० झाडांची छाटणीचे काम पूर्ण
७११ मृत झाडे तोडली
जलजन्य आजारांसाठी ३१७७ खाटा राखीव, अतिदक्षता विभागात १३८ खाटा
६ समुद्रकिना-यांवर ४२ जीवरक्षकांसह ४६ कंत्राटी कोळी जीवरक्षक तैनात
अग्निशमन दलाची ६ पथके व नागरी संरक्षण दलाचे ३०० जवान समुद्रावर तैनात
१५० महापालिका शाळांमध्ये निवारा शेड
भारतीय नौदलाची ९ पथके जुनपासून मुंबईत तैनात
मुंबई मान्सून संकेतस्थळाद्वारे पावसाची अचूक माहिती देणार
आणीबाणी उद्भवल्यास १४ संस्थांशी समन्वय साधणार


Read More »

महापालिकेकडून ६० कोटी 'खड्डय़ात'

मुंबईत गेल्या वर्षी बुजवण्यात आलेल्या सुमारे २१ हजार खड्डय़ांच्या जागी यंदा पुन्हा खड्डे पडल्यास ते बुजवणे संबंधित कंत्राटदाराला बंधनकारक असेल.
मुंबई - मुंबईत गेल्या वर्षी बुजवण्यात आलेल्या सुमारे २१ हजार खड्डय़ांच्या जागी यंदा पुन्हा खड्डे पडल्यास ते बुजवणे संबंधित कंत्राटदाराला बंधनकारक असेल. त्यामुळे यावर्षी पुन्हा तेथेच खड्डे पडल्यास ते बुजवण्यासाठी एकही पैसा खर्च करावा लागणार नाही, असा दावा शुक्रवारी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी केला.
त्यामुळे यंदा खड्डय़ांवरील खर्च कमी होणे अपेक्षित असतानाही त्यासाठी सुमारे ६० कोटी रुपयांच्या खर्चालाच मान्यता देण्याची मागणी प्रशासनाने निवेदनाद्वारे स्थायी समितीकडे केली आणि स्थायीनेही त्याला मान्यता देत कोटय़वधी रुपये खड्डय़ात घालण्याचा निर्णय घेतला.खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने सात परिमंडळांमध्ये प्रत्येकी दोन कंत्राटदारांची निवड केली असून, त्यांना प्रत्येकी ४ कोटी रुपयांचे काम देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये परिमंडळ पाचमधील 'एम-पूर्व' व 'पश्चिम' या दोन विभागांसाठी ५.५२ कोटी, 'एल' विभागासाठी ४ कोटी, परिमंडळ सहामधील 'एन' व 'एस' विभागासाठी ५.६७ कोटी व 'टी' विभागासाठी ४.३० कोटी इतक्या रकमेच्या खर्च अपेक्षित आहे. यासाठी वंडर टेक्नॉलॉजीस, शौनक इन्फ्रास्ट्रक्चर, एटीजी, मे. अंजनी लॉजिस्टिक्स आणि हिंदुस्थान कोलाज या कंपन्यांच्या कोल्डमिक्स तंत्राचा वापर करण्यात येणार आहे.
प्रतिचौरस मीटरसाठी दीड हजार रुपये
खड्डे बुजवण्यासाठी या तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर कंत्राटदारांना संयुक्त काम देण्यात आले आहे. कुलाबा ते गिरगाव आदी भागांतील खड्डे बुजवण्यासाठी निवडलेल्या लँडमार्क कार्पोरेशन आणि वंडर टेक्नॉलॉजीस या कंपन्यांनी प्रति चौरस मीटर करता १,५१५ रुपयांचा भाव आकारला आहे. तर एसटीजी मे अंजनी लॉजिस्टिक्स तंत्रज्ञान कंपनी व अताशा आशीर्वाद बिल्डर्स यांनी कमी म्हणजे प्रति चौरस मीटरसाठी ९९९ रुपयांचा दर आकराला आहे. पेव्हरब्लॉकच्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते काढून नव्याने बसवणे आदी कामेही या सर्व कंपन्यांकडून केली जाणार आहेत.
गुप्तांना धरले धारेवर
पूर्व उपनगरातील ११७ रस्त्यांसाठी निविदा काढून कंत्राटदारांच्या वादात निविदाच रद्द करून नव्याने निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे पावसाळ्यात येथील रस्त्यांवर मोठय़ाप्रमाणात खड्डे पडणार आहेत. जर हे काम दुस-या क्रमांकावरील कंपनीसोबत तडजोड करून दिले असते तर किमान त्या रस्त्यांची जबाबदारी त्यांच्यावर राहिली असती व त्यांनी ते दुरुस्त केले असते. त्यामुळे याचा तीव्र विरोध करत असीम गुप्ता यांना मनोज कोटक यांनी हरकतीच्या मद्याद्वारे धारेवर धरले. स्थायी समितीने अध्यक्ष राहुल शेवाळे यांनीही ही परिस्थिती गुप्ता यांच्यामुळेच उद्भवल्याचे ताशेरे ओढत त्यांनाच जबाबदार ठरवले आहे. परंतु, हा प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगून जरी कंत्राट दिले असते तरीही पावसाळ्यापूर्वी काम झाले नसते, असा खुलासा गुप्ता यांनी केला.


Read More »

तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी २ जून रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे तीनही मार्गावरील लोकल वाहतूक विलंबाने होण्याची शक्यता आहे.

मुंबई - देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी २ जून रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे तीनही मार्गावरील लोकल वाहतूक विलंबाने होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर सीएसटी-कुर्लादरम्यान अप धिम्या मार्गावर तसेच वडाळा ते माहीमदरम्यान अप आणि डाउन या दोनही मार्गावर सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसटीकडे येणाऱ्या गाडय़ा या मुख्य मार्गावरून चालवण्यात येतील. तर हार्बरवरील सीएसटी-वांद्रे अंधेरी सेवा सकाळी १०.२० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.
पश्चिम रेल्वेवर माहीम ते अंधेरीदरम्यान हार्बर अप अणि डाउन मार्गावर सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जम्बोब्लॉक घेण्यात येईल. यामुळे काही चर्चगेट-अंधेरी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर हार्बर मार्गावर एकही गाडी उपलब्ध होणार नाही.

Read More »

उद्धव ठाकरे करतात मुंबईकरांची दिशाभूल

बृहन्मुंबईत काम करण्याकरता महापालिकेला अधिकार नाहीत. त्यामुळे ते महापालिकेला मिळण्यासाठी राज्य सरकारने कायदा करावा, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुंबई – बृहन्मुंबईत काम करण्याकरता महापालिकेला अधिकार नाहीत. त्यामुळे ते महापालिकेला मिळण्यासाठी राज्य सरकारने कायदा करावा, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परंतु, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनीच महापालिकेला बृहन्मुंबईत कुठेही काम करण्याचे अधिकार आहेत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना अधिकाराच्या नावाखाली विकासाच्या न केलेल्या कामांपासून तोंड लपवण्यासाठी मुंबईकरांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदुरकर यांनी शुक्रवारी केला.
पावसाळ्यात मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नागरी समस्यांबाबत मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेत समस्यांचे निवेदन दिले. या वेळी आमदार कालिदास कोळंबकर, कृष्णा हेगडे, चरणजितसिंग सप्रा, अलका देसाई, विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम, सुनील मोरे, प्रवीण छेडा, अजंता यादव, धर्मेश व्यास, शिवाजी सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नालेसफाईची कामे योग्यप्रकारे करावीत, तसेच साफ केलेल्या नाल्यात कुणी कचरा अथवा घाण टाकणार नाही, याची खबरदारी घेत दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली. त्याचबरोबर पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूसह कावीळ, लेप्टोस्पायरोसिस, ताप यासारख्या उद्भवणा-या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा तसेच महापालिकेसह खासगी रुग्णालयांत अतिरिक्त खाटांची सुविधा पुरवावी, तसेच विभागांमध्ये वेळोवेळी औषधांची फवारणी करावी, वाहतुकीची कोंडी करणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे तसेच झाडांच्या फांद्या तोडण्यात याव्यात, १ जूननंतर कोणत्याही झोपडपट्टयांवर पावसाळा संपेपर्यंत कारवाई करण्यात येऊ नये, आदी मागण्याही करण्यात आल्या. यावेळी आयुक्त कुंटे यांनी या शिष्टमंडळाला प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. मात्र पुन्हा एकदा शिष्टमंडळ आपली भेट घेऊन याचा आढावा घेईल, असे यावेळी चांदूरकर यांनी आयुक्तांना सांगितले.
'भ्रष्टाचाराची सीआयडी चौकशी करा'
मुंबईत महापालिकेत अधिकारी व कंत्राटदार यांच्यात संगनमत असून त्यांची भ्रष्ट युती असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाचाच नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपाची गंभीर दखल घेत याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी चांदूरकर यांनी केली आहे. किरीट सोमय्या हे भाजपचे नेते असून त्यांनी जबाबदारीने हे आरोप केलेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read More »

पावसाळ्यापूर्वीची कामे उरकण्यासाठी रेल्वेची धावपळ

पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असतानाही मध्य आणि पश्चिम रेल्वेची नालेसफाईसह अन्य कामे अजूनही शिल्लक आहेत. मात्र, असे असले तरी मध्य रेल्वेने आतापर्यंत ८० टक्के कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे.

मुंबई - पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असतानाही मध्य आणि पश्चिम रेल्वेची नालेसफाईसह अन्य कामे अजूनही शिल्लक आहेत. मात्र, असे असले तरी मध्य रेल्वेने आतापर्यंत ८० टक्के कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. तर पश्चिम रेल्वेला कामे पूर्ण करण्यासाठी अजूनही एक आठवडा लागणार आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे उरकण्यासाठी रेल्वे प्रशासनाची सध्या धावपळ उडाली आहे.
पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत होणे हे नेहमीचेच आहे. पाणी साचू नये आणि वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. पण ते सर्व पाण्यातच जातात असा पूर्वानुभव आहे. या वर्षी मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेला नालेसफाई आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या इतर समस्यांना तोंड देण्यासाठी सुमारे १ कोटी ७९ लाख देऊ केले आहेत.
त्यानुसार मध्य रेल्वेने पाणी साचणाऱ्या ३५ स्थानक परिसरांमध्ये पंप बसवले आहेत. त्यामुळे या भागांत साचलेले पाणी तात्काळ बाहेर काढणे शक्य होणार आहे. तर रेल्वे रूळांलगत असलेल्या लहान-मोठय़ा ८० नाल्यांची आतापर्यंत सफाई करण्यात आली आहे. उरलेली कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. पावसाळ्यात प्रवाशांना त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पश्मिच रेल्वेला पावसाळ्याची कामे पूर्ण करण्यासाठी अजूनही एक आठवडा लागणार आहे. पश्चिम रेल्वेने आतापर्यंत पाणी साचणाऱ्या ५८ ठिकाणी पाण्याचे पंप लावले आहेत. तर ४३ नाल्यांची साफसफाई केली आहे. मुंबई महापालिकेने पश्चिम रेल्वेला ४४ लाख रुपये दिले आहेत.
भरतीचा फटका नाही
पावसाळ्यात जून महिन्याच्या २४, २५ आणि २६ तारखेला सर्वात मोठी भरती येणार आहे. ही भरती दुपारी एक आणि अडीचच्या दरम्यान असेल. यावेळी जवळपास पाच मीटपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. याच कालावधीत जोरदार पाऊस होण्याची ही शक्यता आहे. पण असे असले तरी रेल्वे वाहतुकीवर त्याच परिणाम होणार नाही, असा दावा रेल्वेने केला आहे. दुपारी जरी जोरदार पाऊस झाला तरी सायंकाळपर्यंत सर्व स्थिती पूर्ववत होऊ शकते, असा रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


Read More »

मंत्रालयात मिळणार उपनगरी रेल्वेचे तिकीट

 उपनगरी रेल्वे तिकीट आतापर्यंत रेल्वे स्थानक किंवा जनसाधारण तिकीट बुकिंग केंद्रावर मिळत होते. पण आता हेच तिकीट मंत्रालयातही मिळणार आहे.

मुंबई - उपनगरी रेल्वे तिकीट आतापर्यंत रेल्वे स्थानक किंवा जनसाधारण तिकीट बुकिंग केंद्रावर मिळत होते. पण आता हेच तिकीट मंत्रालयातही मिळणार असून, त्यासाठी मध्य रेल्वे तेथे एक एटीव्हीएम मशिन बसवणार आहे.

यामुळे त्याचा फायदा मंत्रालयातील कर्मचा-यांबरोबरच राज्यभरातून येथे येणा-या नागरिकांना होईल. त्याचबरोबर रेल्वे स्थानकांबाहेरील सार्वजनिक ठिकाणीही आता ही मशिन बसवण्यात येणार असून, खासगी कार्यालयांच्या परिसरातही ती बसवण्याचा मध्य रेल्वे विचार करत आहे.
मंत्रालयात विविध कामानिमित्त दररोज राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात नागरिक येतात. मुंबईबाहेरून येणा-या नागरिकांना रेल्वेचे तिकीट कुठे मिळते, याची कल्पना नसते. शिवाय त्यांना रेल्वे तिकीट खिडक्यांसमोरील रांगांमध्ये अनेकदा ताटकळत राहावे लागते. त्यामुळे मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय रोखण्यासाठी तेथेच त्यांना तिकीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी मंत्रालयात एक एटीव्हीएम मशिन बसवले जाणार आहे. याचा फायदा मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही होईल, असे मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागातील अधिका-यांनी सांगितले.
त्याचबरोबर तिकीट खिडक्यांसमोर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी काही सरकारी, खासगी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी एटीव्हीएम सुविधा उपलब्ध करून देण्याची मध्य रेल्वेची योजना आहे. त्याची सुरुवात मंत्रालयापासून होत आहे. तर सार्वजनिक ठिकाण म्हणून ठाण्याच्या वर्तकनगरची निवड करण्यात आली आहे.
या ठिकाणीही एटीव्हीएम मशिन बसवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करून कोणत्या खासगी कार्यालयात एटीव्हीएम मशिन बसवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, भविष्यात वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि परळ येथील कॉर्पोरेट कार्यालयांच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा मध्य रेल्वेचा मानस असल्याचे या अधिका-यांनी सांगितले.


Read More »

इन्फोसिसचे नेतृत्व पुन्हा नारायण मूर्तींकडे

इन्फोसिसचे माजी अध्यक्ष एन.आर.नारायणमूर्ती यांची पून्हा कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आणि अतिरिक्त संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुंबई – माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी इन्फोसिसच्या व्यवस्थापकीय मंडळात मोठा फेरबदल झाला आहे. माजी अध्यक्ष एन.आर.नारायणमूर्ती यांची पून्हा कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आणि अतिरिक्त संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.
संचालक मंडळाच्या शनिवारी सकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इन्फोसिसने प्रसिध्दीपत्रकाव्दारे ही माहिती दिली. आजपासूनच तात्काळ प्रभावाने ही निवड झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.  बॅंकिंग तज्ञ के.व्ही.कामत चेअरमनपदाचा राजीनामा देणार असून, ते स्वतंत्र संचालक म्हणून जबाबदारी संभाळणार आहेत. तंत्रज्ञान उद्योगासमोरील आव्हाने आणि कंपनीच्या समभागधारकांचे हित लक्षात घेऊन कंपनीच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
नारायण मूर्ती यांची नेतृत्व करण्याची क्षमता आणि प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन, पून्हा त्यांच्याहाती कंपनीची सूत्रे सोपविण्यात आली आहे. एस.गोपाळक्रिष्णन कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी संभाळणार आहेत. एस.डी.शिबुलाल कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदावर कायम रहाणार आहेत. नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती यांचे कंपनीत पदार्पण होत असून, तो कार्यकारी सहाय्यक म्हणून काम करणार आहे. नारायण मूर्ती यांनी १९८१ मध्ये इन्फोसिसची स्थापना केली. २१ वर्ष ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. २०११ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

Read More »

श्रीनिवासन उद्या राजीनामा देणार ?

भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी रविवारी सकाळी चेन्नईमध्ये बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक बोलवली आहे.

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी रविवारी सकाळी चेन्नईमध्ये बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक बोलवली आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून, या बैठकीत श्रीनिवासन राजीनामा देण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या अन्य पदाधिका-यांनी राजीनामा दिल्याने, श्रीनिवासन यांचे आसन डळमळीत झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून श्रीनिवासन राजीनामा न देण्यावर अडून बसले होते. मात्र बीसीसीआयमध्ये ते संपूर्णपणे एकाकी पडल्याने राजीनामा देण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरलेला नाही असे सूत्रांनी सांगितले.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांनी शनिवारी सकाळीच पत्रकारांना, २४ तास थांबा तुम्हाला मोठी बातमी मिळेल असे सूचक विधान करुन श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले आहेत.
रविवारी सकाळी अकरा वाजता चेन्नईमध्ये ही बैठक होत आहे. माजी अध्यक्ष सशांक मनोहर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. मनोहर यांना या बैठकीचे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. सध्या बोर्डामध्ये ते कुठल्याही पदावर नाहीत.

Read More »

मारुतीच्या वाहन विक्रीत घट

मे २०१३ मध्ये मारुतीच्या एकूण वाहन विक्रीमध्ये १४.४ टक्के घसरण झाली आहे.

नवी दिल्ली – भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझूकी इंडियाने शनिवारी मे महिन्याचा विक्री अहवाल जाहीर केला. मे २०१३ मध्ये मारुतीच्या एकूण वाहन विक्रीमध्ये १४.४ टक्के घसरण झाली आहे. मे महिन्यात मारुतीच्या ८४,६७७ युनिटची विक्री झाली आहे. गतवर्षीच्या मे २०१२ मध्ये ९८,८८४ युनिटची विक्री झाली होती.
मारुतीच्या देशांतर्गत बाजारपेठेतील विक्रीत १३ टक्के घट झाली आहे. देशांतर्गत बाजारत मे मध्ये ७७,८२१ युनिटची विक्री झाली. मे २०१२ मध्ये ८९,४७८ युनिटची विक्री झाली होती. मारुती सुझूकी इंडियाने परिपत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात मारुतीच्या निर्यातीत २७.१ टक्के घट नोंदवण्यात आली होती.
वाहन विक्रीत घट झाली असली तरी, मारुतीच्या मिनी सेगमेंट वॅगनार, अल्टो या कारच्या विक्रीमध्ये मात्र ५.१ टक्क्याने वाढ झाली आहे. मे २०१२ मध्ये २९,८९५ युनिटसची विक्री झाली होती. हेच प्रमाण या मे महिन्यात ३१,४२७ युनिट आहे.

Read More »

"ज्ञान गंगा"

लातूरमधील दयानंद एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या समारोप कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल के.शंकर नारायणन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका पुस्तिकेचे प्रकाशन केले.


Read More »

"एलपीजी योजनेचा शुभारंभ"

एलपीजी ग्राहकांना थेट लाभ पोहचविणा-या योजनेचे आंध्रप्रदेशमध्ये उदघाटन करताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री पानाबाका लक्ष्मी, मुख्यमत्री किरण कुमार रेड्डी आणि अन्य.


Read More »

पाकमध्ये सत्तांतर होताच न्यायाधीशाची बदली

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणांची सुनावणी करणा-या न्यायाधीशाची बदली झाली आहे.

लाहोर - पाकिस्तानात संत्तातर होताच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणांची सुनावणी करणा-या न्यायाधीशाची बदली झाली आहे. पीएमएल-एन सरकारने सूत्रे स्वीकारण्याच्या एकदिवस आधी ही बदली झाली आहे.
न्यायाधीश अब्दुल खालीक यांना लाहोर उच्च न्यायालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे. सत्तेवर येणा-या पीएमएल-एन सरकारच्या निर्देशांवरुन खालीक यांची ही बदली झाली आहे. शरीफ यांना त्यांच्याविरोधातील कुठल्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात प्रगती नको आहे त्यामुळे ही बदली झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवाझ शरीफ यांचा भाऊ शहाबाझ शरीफ आणि अन्य कुटुंबियांविरोधात आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी तीन खटले सुरु आहेत. याच भ्रष्टाचारांच्या प्रकरणांवरुन मागचे सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी अनेकदा अडचणीत आली होती. त्यांच्या पंतप्रधानांनाही पायउतार व्हावे लागले होते.

Read More »

कर्मा यांच्या सुरक्षा अधिका-याचा मृत्यू

काँग्रेसचे दिवगंत नेते महेंद्र कर्मा यांच्या खासगी सुरक्षा अधिका-याचा शनिवारी रायपूरमधील रामकृष्ण केअर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रायपूर – काँग्रेसचे दिवगंत नेते महेंद्र कर्मा यांच्या खासगी सुरक्षा अधिका-याचा शनिवारी रायपूरमधील रामकृष्ण केअर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गेल्या आठवडयात छत्तीसगडमधील बस्तर जिल्हयात नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्यात कर्मा यांचे पीएसओ सियाराम सिंहही गंभीर जखमी झाले होते. मेहंद्र कर्मा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. सियाराम सिंह यांच्या निधनाने या हल्ल्यातील मृतांची संख्या २८ झाली आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सियाराम सिंह अनेक गोळया लागल्या होत्या.
शरीरातील महत्वाचे अवयव निकामी झाल्याने सियाराम सिंह यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. संदीप दवे यांनी सांगितले. गोळया लागल्याने त्यांच्या अनेक अवयवांना संसर्ग झाला होता. रामकृष्ण केअर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अन्य दहाजखमींच्या प्रकृतीला धोका नसल्याचे दवे यांनी सांगितले.

Read More »

"न्यायाची शपथ"

पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे निवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती संजय क्रिष्णा कौल यांना हरयाणाचे राज्यपाल जगन्नाथ पहाडिया यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.


Read More »

"धर्माची शिकवण"

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांचे धरमशाळा येथील बौध्द मंदिरात आगमन झाले. ते येथे विद्यार्थ्यांना बौध्दधर्मासंबंधी शिकवण देणार आहेत.


Read More »

प्रीती राठीचे निधन

वांद्रे येथील अ‍ॅसीड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीती राठीचे शनिवारी दुपारी निधन झाले.
मुंबई- वांद्रे येथील अ‍ॅसीड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीती राठीचे शनिवारी दुपारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर बॉम्बे हॉस्टिपलमध्ये उपचार सुरू होते. तसेच प्रीतीच्या शरिरात सतत रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वरिष्ठ प्लास्टीक सर्जन डॉ. अशोक गुप्ता यांनी सांगितले.

प्रीतीसाठी मेणबत्त्या का पेटल्या नाहीत?


Read More »

गजराज पाण्यात उतरताच..

मे महिन्याची अखेर, उकाडा वाढलेला. मुलांच्या शाळांच्या सुट्टय़ाही आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचल्या आहेत. त्यातली साप्ताहिक सुट्टी राणीच्या बागेत घालवण्याचा निर्णय घेतला. सध्या रिसॉर्ट्स आणि पार्कच्या भाऊगर्दीत या राणीच्या बागेकडे काहीसं दुर्लक्षचं होताना दिसतंय. म्हणून मुद्दामहून हीच जागा निवडली. राणीच्या बागेचं लहानपणीचं मनात खोल दडलेलं आर्कषणही होतंच, सोबत कुटुंबीयही! साप्ताहिक सुट्टी असली तरी आम्हा छायाचित्रकारांची कलात्मक दृष्टी आम्हाला शांत बसू देत नाही. हातात कॅमेरा असेल तर आपसूकच 'क्लिक'च्या बटणाकडे बोट जातं. आतापर्यंत अनेकदा राणीच्या बागेत गेलो असलो तरी तिथे फारसे प्राणी नाहीत म्हणून प्रत्येक वेळी निराशाच हाती आलेली. पण या वेळेस मात्र बागेतल्या गजराजांनी मला फोटो काढण्याचा मनमुराद आनंद दिला. मी राणीच्या बागेत प्रवेश करतोन् करतो तोच हत्तींचं एक जोडपं पाण्यात खेळायला उतरलं. उन्हाच्या झळांचा त्रास कमी करण्याचा त्यांचा हा 'शीतल' प्रयत्न. त्यातही एकमेकांच्या अंगावर सोंडेने तुषार उडवत त्यांचं पाण्यात खेळणं सुरू होतं. त्यांना असं पहुडताना पाहून या खेळात मग त्यांचा माहुतही सहभागी झाला. हत्तींच्या या पाण्यातील मौजेची योग्य ती फ्रेम साधण्यासाठी मी मात्र किमान दोन तास उन्हात उभा असलो तरी त्यांच्या खास पोझेज् मला सुखावणा-या होत्या..


Read More »

पुन्हा मूर्ती

एन.आर.नारायणमूर्ती यांची पुन्हा इन्फोसिसचे कार्यकारी अध्यक्ष आणि अतिरिक्त संचालक म्हणून निवड करण्यात आली.



Read More »

बिल गेट्स यांची अमिर खानला भेटण्याची इच्छा

 मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणा-या आमीर खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मुंबई – मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणा-या आमिर खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "सत्यमेव जयते" कार्यक्रमामुळे जागतिक पातळीवर आमिर खानची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आमिरच्या या कामामुळेच गेट्स यांनी त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याआधी जगप्रसिद्ध टाइम मासिकाने आमिरचा समावेश जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये केला होता.
बील गेट्स यांनी आपल्या ब्लॉगवर अमिर खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉलिवूड स्टार अमिरला भेटण्याची खूप उत्सुकता आहे. लहान मुलातील कुपोषणाबाबत "युनिसेफ" सोबत अमिर काम करत असल्याचे एकले आहे, असे गेट्स यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे.
"सत्यमेव जयते" या कार्यक्रमामुळे भारतातील अनेक प्रश्न चर्चा झाली. त्यावर सरकारने पावले उचलण्यासाठी प्रयत्न केल्याचे गेट्स यांनी म्हटले.
या कार्यक्रमातून अमिरने स्त्री भ्रूण हत्या,लहान मुलांचे लैंगिक शोषण आणि हुंडाबळी यांसारख्या प्रश्नावर प्रकाश टाकला होता.


आमिर खान 'द पायोनिअर', टाइमकडून गौरव


जगप्रसिद्ध टाइम मासिकाने भारतीय चित्रपट सृष्टीतील 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अशी ओळख असलेल्या आमिर खानचा समावेश जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये केला आहे.
Read More »
राष्ट्रपती साईबाबांच्या दर्शनाला

दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर आलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी शिर्डी येथील साईबाबा मंदिराला भेट दिली.


Read More »

शिल्पा शेट्टी

दिल्ली येथे झालेल्या एका ब्रँड प्रमोशनाच्या दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीची उपस्थिती.





Read More »

नक्षलवाद्यांच्या चकमकीत जवानाचा मृत्यू

छत्तीसगडमधील धामतरी जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय सुरक्षा दलातील एका जवानाचा मृत्यू झाला.
रायपूर- छत्तीसगडमधील धामतरी जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय सुरक्षा दलातील एका जवानाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खल्लारी गावात झालेल्या चकमकीत एस.के.दास याचा मृत्यू झाला. सीआरपीएफची २११ जणांची तुकडी मोहिमेवर असताना ही चकमक झाली. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार केला. यात दास यांचा मृत्यू झाला.
राज्यातील बस्तर जिल्ह्यातल २५ मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला होता.

Read More »

अटी मान्य करा, तर राजीनामा

आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्याची तयार दाखवली आहे.
चेन्नई- आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्याची तयार दाखवली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी तीन अटी घातल्या आहेत.
काय आहेत श्रीनिवासन यांच्या अटी
1) आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीत ते निर्दोष आढळले तर त्यांची बीसीसीआच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करावी.
२) आयसीसीच्या बैठकीत श्रीनिवासनच भारताचे प्रतिनिधीत्व करतील.
2) संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांना पुन्हा बीसीसीआयच्या कार्याकारणीवर घेऊ नये.

Read More »

महेंन्द्र सिंग धोनी

चँपियन्स ट्रॉफीच्या सरावाच्या दरम्यान डोळ्याला दुखापत झालेल्या कौशल परेरियाला सावरताना कर्णधार महेंन्द्र सिंग धोनी  



Read More »

» आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी राजीनामा दिला » आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिला राजीनामा

» आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी राजीनामा दिला
» आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिला राजीनामा

Read More »

राजीव शुक्ला यांचा राजीनामा

स्पॉटफिक्सिंग प्रकरणी आता आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नवी दिल्ली- स्पॉटफिक्सिंग प्रकरणी आता आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्पॉफिक्सिंग प्रकरणी राजीनामा देणारे शुक्ला हे तिसरे पदाधिकारी ठरले आहेत. याआधी बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे आणि खजिनदार अजय शिर्के यांनी शुक्रवारी राजीनामा दिला होता.
आयपीएलमधील नुकत्याच झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपण राजीनामा देत असल्याचे शुक्ला यांनी म्हटले आहे. राजीनामा देण्याआधी आपण जगदाळे आणि शिर्के यांच्याशी चर्चा केल्याचे शुक्ला यांनी सांगितले.

अटी मान्य करा, तर राजीनामा »


Read More »

मिरगाची लगबग (फोटो गॅलरी)

मृग नक्षत्राला सुरुवात होण्यास अगदी काही दिवसांचा कालावधी उरला असताना शेतकरी, गृहिणी, मच्छीमार यांची एकच लगबग सुरू होते, ती म्हणजे त्याच्या आगमनाच्या तयारीची.
मृग नक्षत्राला ग्रामीण भागात मिरग म्हणतात. मृग नक्षत्राला सुरुवात होण्यास अगदी काही दिवसांचा कालावधी उरला असताना शेतकरी, गृहिणी, मच्छीमार यांची एकच लगबग सुरू होते, ती म्हणजे त्याच्या आगमनाच्या तयारीची. गृहिणींना तिखट, मसाला तयार करायचा असल्याने मिरच्या आणि मसाल्याच्या पदार्थाची खरेदीची लगबग सुरू होते. त्याचप्रमाणे कोकणात मासे हे प्रमुख अन्न असल्याने त्यातच पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने सुकी मासळी खरेदीसाठी महिलांची गर्दी होते.
कोकणात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. त्यामुळे पावसाच्या पूर्वी शेतीसंबधी अनेक गोष्टी शेतक-यांना करणे भाग पडते. यामध्ये पेरणीपूर्वी शेती साफ करणे, बांधबंदिस्ती करणे, लाकडे भरणे, गुरांसाठी गोठा तयार करणे, पेंढा-गवत ही वैरण भरणे, पेरणीसाठी नांगर, कुदळ, बी-बियाणे खरेदी करणे.. सध्या नांगर, कुदळ आदींच्या खरेदीसाठी लोहार शाळेत शेतक-यांची गर्दी होत आहे. वैरण घेऊन जाणा-या बैलगाडया नजरेस पडताना दिसतात. ग्रामीण भागात ही गडबड तर शहरात छत्री, रेनकोट, पत्र्यांवर, घरांवर टाकण्यासाठी प्लॅस्टिकच्या कापडाची खरेदी आदींची लगबग सुरू आहे. सगळ्यांनाच वेध लागले आहेत ते मृगाच्या आगमनाचे.


Read More »

एक दिवस आधीच

हवामान खात्याच्या अंदाजाच्या एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला.



Read More »

मान्सून आलाs रेss

मान्सून शनिवारी एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असून, सात जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली- प्रचंड उकाडयाने त्रस्त झालेली जनता आणि दुष्काळाने होरपळणारे शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या पावसाचे आगमन लवकरच होणार आहे. नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) शनिवारी एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असून, सात जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मान्सूनने शनिवारी अरबी समुद्राचा दक्षिण भाग, केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकचा दक्षिण भाग आणि तामिळनाडूतील काही भागांत आगमन केल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले. त्यामुळे या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस झाला आहे. केरळमधील अनेक परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. ४८ तासांत वादळी वा-यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केरळमध्ये मान्सून दोन जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र त्यापूर्वी एक दिवस आधीच मान्सून केरळात दाखल झाला. गेल्या पाच वर्षामध्ये मान्सूनच्या आगमनाचे अंदाज एक-दोन दिवसांनी चुकले आहेत. गेल्या वर्षी एक जूनचा अंदाज वर्तवण्यात आला असताना, मान्सून मात्र केरळमध्ये पाच जून रोजी दाखल झाला.

Read More »

अन्यायाविरोधात लढा

 अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी सामान्य नागरीक सुद्धा पत्रकाद्वारे प्रतिक्रीया देण्यास सज्ज झाले.

हे तर मानसिक खच्चीकरण
अल्पवयीन बालिकेपासून ते प्रौढ महिलांपर्यंत कोणत्याही स्त्रीवर बलात्कार करून हत्या केल्याची वा लैंगिक शोषण झाल्याची बातमी झळकली नाही, असा एकही दिवस जात नाही, ही बाब चिंताजनकच म्हणावी लागेल. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बलात्कार वा लैंगिक शोषण ही एक भयानक विकृती आहे व ती व्यक्तिसापेक्ष असल्याने तिची व्यापकताही अमर्याद व विशाल आहे. या विकृतीला रोखण्यासाठी संबंधित कायदे जरी केले असले तरी न्याय मिळविण्यासाठीची प्रक्रिया ही फार विलंबाची व किचकट असल्याने तिच्या वाटेलाच सहसा कोणी जात नाही. परिणामत: अशा बलात्कारित महिलांचे मानसिकदृष्टया कमालीचे खच्चीकरण होते. कारण अशा पीडित महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा कलुषित वा अन्यायकारकच असतो. एकीकडे अंतराळात झेप घेणा-या आणि 'एव्हरेस्ट'चे सर्वोच्च शिखर गाठणा-या महिला आपल्या यथोचित आत्मप्रतिष्ठेचे दर्शन घडवत असताना त्याच वेळी बलात्कारासारख्या संकटांना सामोरे जाताना मात्र मनोदौर्बल्याचाच परिचय घडवितात, यावरून स्त्रियांची आत्मप्रतिष्ठा आजही धोक्यात आहे, असेत
सूचित होते.
- मधुकर ताटके, गोरेगाव (प.)


स्त्रियांनीच लढा उभारायला हवा
महात्मा फुले, सावित्री फुले यांनी प्रथम स्त्रियांना भारतात आत्मप्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला, परंतु अजूनही दीडशे वर्षानंतर स्त्रियांची प्रतिष्ठा धोक्यात असावी, ही आधुनिक समाजाला लागलेली कीड आहे. स्त्री अजूनही परंपरागत अनिष्ठ चालीरितींच्या मानसिक गुलाम आहेत. अजून स्त्रियांचा खुलेआम लिलाव होतो, विक्री होते. कुटुंबात स्त्रियांना स्वनिर्णयाचा अधिकार नाही. स्त्री ही भोगवस्तू आहे, या संकल्पनेतून बाहेर पडण्याची समाजाची मानसिकता बदलली आहे काय? अजूनही स्त्री कौटुंबिक अत्याचाराच्या बळी आहेत. लैंगिक अत्याचाराच्या बळी स्त्रियाच आहेत, परंतु जिथे समाज जागृत आहे, जिथे संघटना आहेत, या संघटना जनजागृतीचे काम करतात. महिला स्वत:च्या हक्काविषयी जागृत आहेत, तिथे महिलांना सन्मान मिळतो. ब-याच वेळा लैंगिक शोषणाविरुद्ध महिला तक्रार करायला घाबरतात. कारण त्यांना घरातून तसेच समाजातून पाठिंबा मिळत नाही, याला आपली समाज व्यवस्था कारणीभूत आहे, हे नाकारून चालणार नाही. नवीन कायदा अद्याप तळागाळापर्यंत पोहोचलेला नाही. स्त्रियांना आत्मप्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी स्वत: स्त्रियांना आत्मसन्मानासाठी प्रशिक्षित करून स्त्रियांनीच आत्मसन्मानतेचे लढे उभारले पाहिजेत.
- हरीश बडेकर, मुंबई.


समाज बदलायला हवा
खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात महिलांचे लैंगिक शोषणाचे प्रकार नेहमीच घडतात, पण याबाबतीत महिला तोंड उघडण्यास नकार देतात. आजही महिला अशा घटनांची वाच्यता करण्यास घाबरतात. अश्लील चित्रपट, प्रक्षोभक दृश्ये, अश्लील वेबसाइट, अश्लील पुस्तके वाचन, त्यात कमजोर सेन्सॉर बोर्ड अश्लील चित्रपटावर बंदी घालण्यास धजावत नाही. या सर्व गोष्टी लैंगिक शोषणास जबाबदार आहेत. लोकांनी महिलांकडे बघण्याची मानसिकता बदलली पाहिजे. आज नव्वद टक्के महिलांना घराबाहेर असुरक्षित वाटते, ही बाबच एका सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी आहे. कायदा कठोर व्हायला हवा. मात्र त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलायला हवी. पुरुषांनी स्त्रियांबाबत आदर व प्रेम बाळगायला हवे, तसाच स्त्रियांनीही पुरुषांबाबत आदर व प्रेम बाळगायला हवे, फक्त कायदे कठोर करून महिलांचे लैंगिक शोषण संपणार नाही. समाजाचे मन बदलायला हवं. तोपर्यंत स्त्री-पुरुषांची समानता प्रत्यक्षात उतरणं शक्य होणार नाही.
- रामचंद्र मेस्त्री, घाटलेगाव- चेंबूर.


नुसते कायदे नकोत
आपल्या देशाचं दुर्दैव आहे की, आपल्याकडे नुसती चर्चा केली जाते. खरे तर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. जे कायदे आहेत, त्यांची नीट अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा राजकीय वरदहस्तांचा उपयोग करून कित्येक गुन्हेगार मोकाट फिरतात. शिवाय नुसते कायदे करून भागणार नाही, तर लोकांनीच पुढाकार घेऊन प्रभावी अशी चळवळ उभारली पाहिजे. जेणेकरून सरकार स्त्री अत्याचाराला प्रतिबंध घालणाऱ्या कायद्यांच्या अंमलबजावणीत हयगय करणार नाही. आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रांत गेली तरी, अजूनही लोकांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. तो दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जर हा दृष्टिकोन व मागासलेली मानसिकता बदलली तर नक्कीच स्त्री ही अभिमानाने व सुरक्षेच्या भावनेने या समाजात वावरेल.
- नामदेव काटकर, विलेपार्ले (पूर्व).


कायद्याचा दुरुपयोग नको
जगात स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्दयाने रान उठविले असले तरी नजीकच्या काळात या दोहोंमधील दरी वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. स्त्रियांवर होणारे अत्याचार हे पाचविलाच पुजलेले असल्यामुळे या अत्याचारांवर अंकुश ठेवणार कोण, हाच मोठा प्रश्न आहे. दिल्लीतल्या 'दामिनी' प्रकरणानंतर संपूर्ण देशाला बलात्काराची तीव्रता जाणवली असली, तरी या अगोदर बलात्कार होत नव्हते का? मग तेव्हा कुणी का रस्त्यावर उतरले नाही? महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात कडक कायदा केल्यानंतर त्याचा दुरुपयोग होत असल्याचे मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदविल्यामुळे एकच खळबळ माजली असली, तरी हा कायदा म्हणजे महिलांसाठी जणू ब्रह्मास्त्रच. कारण काही प्रकरणांमध्ये महिलांनीही पुरुषांना उगाचच गोवल्याची उदाहरणे ताजी आहेत. त्यामुळे स्त्रीवर्गानेसुद्धा सद्य:स्थितीवर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा समाजात अराजकता माजू शकते.
- उदय वाघवणकर, जोगेश्वरी (पूर्व).


महिलांनी संघटित व्हावे
खाजगी, शासकीय व निमशासकीय सर्वच क्षेत्रांत महिलांचे शोषण नेहमीच होत असते. अगदी पोलिस दलही याला अपवाद नाही. फक्त ते प्रसारमाध्यमांपर्यंत न आल्याने त्याला वाचा फुटत नाही. अर्थात, सत्य कधी लपून राहत नसल्याने एक दिवस तेही बाहेर येते. वरिष्ठांच्या दबावाखाली असे घृणास्पद प्रकार होतात हे सत्य असले तरी टाळी काही एकाच हाताने वाजत नाही. त्यामुळे बहुतांश प्रकरणांमध्ये महिलांचीही मूकसंमती असण्याची शक्यता असते. काही जणी नाइलाजास्तव इच्छा – अनिच्छांच्या बळी ठरतात. तर बहुतेक प्रकरणांमध्ये स्वत:च्या बदनामीच्या भीतीने अन्याय सहन केला जातो. नोकरदार स्त्रियांना वेळेच्या सवलती, बदली, बढती, रजा मंजुरी आदी समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने नाइलाजाने बळी पडावे लागते. काही वेळा स्त्रीचे सुंदर दिसणेही कारणीभूत ठरते. गैरमार्गाने मिळणाऱ्या पैशामुळे लैंगिक स्वैराचार, व्यभिचार, खोटी प्रतिष्ठा, स्त्रियांची कामुक वेशभूषा, वर्तणूक, पाश्चिमात्य विचारसरणी यामुळे नैतिक अध:पतन झाल्याने लोकांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. मग तिला प्रतिष्ठा, आत्मसन्मान कोण देणार? याचा महिलांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. लैंगिक सुखासाठी वखवखलेल्या नराधमांना अब्रूची चाड न राखता महिलांनी प्रामाणिकपणे संघटित होऊन योग्य तो धडा शिकवला पाहिजे.
- पांडुरंग भाबल, भांडुप (प.)


सुंदर दिसणे शाप की वरदान
महाराष्ट्र राज्य पुरोगामी म्हटले जाते. पण अजूनही येथे महिलांवर अत्याचार, बलात्कार व लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहे. कार्यालयात काम करणा-या महिला कर्मचा-यांना वरिष्ठ अधिका-यांच्या दबावाखाली काम करावे लागते. महिला कर्मचारी ज्या क्षेत्रात असतात, तेथील अधिका-यांच्या नजरा त्या महिलांवर असतात. कामामध्ये चुका दाखवून जास्त वेळ काम करून घेणे, कॅबीनमध्ये बोलावून एकांतात गप्पा मारणे, अशा रीतीने त्यांचा छळ केला जातो. परंतु त्या महिला नोकरी जाण्याच्या भीतीने या गोष्टीची वाच्यता करत नाहीत. पण महिलांनी अशा गोष्टीला वेळीच वेसण घालणे जरुरीचे आहे. संघटित होऊन त्यांच्याविरुद्ध आवाज उठवणे व त्यांना अशा गोष्टींपासून परावृत्त करणे व उच्चपदस्थ अधिका-यांकडे त्याबाबत तक्रार करणे गरजेचे आहे. एखादी वस्तू सुंदर असणे गुन्हा नाही. ते तर जन्मता असते. म्हणून त्यांच्याकडे वासनेच्या नजरेने बघणे, छळ करणे, हे आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे. विचार बदलण्याची आज गरज आहे. महिलांनी सक्षम, सशक्त, संयमी बनून या विरुद्ध दंड थोपटले पाहिजेत, म्हणजे अशा 'रावणांना' पुन्हा या आधुनिक 'सीतेकडे' बघण्याची हिंमत होणार नाही.
-हरिभाऊ खरनार, उल्हासनगर (ठाणे)


कर्मचा-यांचे समुपदेशन व्हावे
स्त्रियांना सध्या जगभर पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांत संधी मिळत असल्या तरी त्यांच्यातील नैसर्गिक शरीराकर्षणाचा गैरफायदा घेऊन काही स्त्रिया ठरावीक लाभ पदरात पाडून घेत असतात. पण याचे प्रमाण पार अल्प असल्याचे दिसून येते. कुठल्याही आस्थापनांत काम करताना पुरुष वरिष्ठ असेल, तर त्याच्या लैंगिक छळाविरुद्ध तक्रार केल्यास नोकरीवर गदा येण्याच्या भीतीने अनेक महिला हा अन्याय गप्प बसून सहन करतात. सध्याच्या महागाईच्या जगात अर्थार्जन करून संसारास हातभार लावण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचा असा गैरफायदा बालपणापासून पुरुषी वर्चस्वाची भावना मनात रुजलेले वरिष्ठ घेत असतात. हे टाळण्यासाठी कुठल्याही कार्यालयात काम करताना आत्मप्रतिष्ठा जपून कसे राहायचे, याबाबत नोकरीवर ठेवताना कर्मचा-यांचे समुपदेशन केले पाहिजे. तसेच एखाद्याच्या गैरवर्तनाची पुराव्यासह तक्रार कुणाकडे व कशी करावी, ती सिद्ध करण्यासाठी तिचा पाठपुरावा कसा करायचा ही माहिती कर्मचा-यांना द्यावी.
-डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम.


महिलांनी कायद्याचा वापर करावा
आजच्या आधुनिक युगात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया वावरत आहेत. नोकरी- व्यवसायात मोठमोठी आव्हाने पेलत आहेत. किरण बेदी, मीरा बोरवणकर, सुनीता विल्यम, कल्पना चावला, इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, बेनझीर भुत्तो, जयललिता, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी इत्यादींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी स्त्रीअत्याचार प्रतिबंधक कायदा आहे. त्याचा स्त्रियांनी पुरेपूर वापर करावा. लिंग-पिसाटवृत्तीचे महाभाग सर्वच क्षेत्रांत असतात. म्हणून, त्यांना घाबरून 'न' जाता त्यांच्याशी कणखरपणे दोन हात करा. आपल्याबरोबरच्या सहका-यांना, आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन उद्भवणारा त्रास सांगा. यातून नक्कीच चांगला मार्ग निघेल. सहकारी आणि घरच्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे लिंग-पिसाटांना रोखणे सोपे होईल. धिरटया घालणारी गिधाडे नष्ट होतील. कायमचा बंदोबस्त होईल.
- महादेव गोळवसकर, घाटकोपर.


अधिकाराचा गैरवापर
आज मुली शिक्षित झाल्या आहेत. पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून सर्वच क्षेत्रांत त्या आघाडीवर आहेत. त्यात आपापल्या माणसांना त्यांचा हेवा वाटत आहे. सध्या नोकरीच्या निमित्ताने सर्वत्र महिला पुरुषांबरोबर काम करत असताना एखाद्या अधिकारी पुरुषाने लैंगिक शोषणासाठी मागणी करणे म्हणजे अतिरेकीपणाच आहे, अशांना लगेच कामावरून कमी तरी करावे अन्यथा दुसरीकडे बदली करावी. कायदे करूनही महिलांबाबत अजूनही पुरुषी विकृतपणा जात नाही. कारण कायदे करूनही त्यात पळवाटा आहेत. तसेच काही महिला आपल्या व घरच्यांची अब्रू जाऊ नये म्हणून गप्प बसतात. अशा वेळी इतर महिलांनी एक होऊन अशा प्रवृत्तीविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज व्हावे. अन्याय करणा-यापेक्षा अन्याय सहन करणेही मोठा गुन्हा आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.
- सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी (पूर्व).


एकजुटीने सामना करावा
'हर औरत को चौथे कमरे की तलाश है', असे अमृता प्रीतम यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. बाईचे आयुष्य स्वयंपाकघर, माजघर आणि शयनघराभोवतीच फिरत राहते. स्वत:चा शोध घेणारी बिनगराडयाची जागा, ज्याच्या खिडक्या, दरवाजे ती स्वत: उघड- बंद करू शकेल, अशी खोली तिला सहसा लाभत नाही, हे या विधानामागचे वास्तव आहे. विलक्षण ताकदीची ही लेखिका हे लिहून गेली, त्याला तीसहून अधिक वर्षे नक्कीच लोटली असतील. पण बाईमाणसाचा हा चौथ्या खोलीचा शोध अद्याप चालूच आहे. आजच्या स्त्रीच्या या संभ्रमावस्थेला ती स्वत: आणि संपूर्ण समाज जबाबदार आहे, तसेच पुरुषप्रधान व्यवस्था स्त्रियांच्या हक्कांवर गदा आणून तिला कमकुवत ठेवण्याचे अतोनात प्रयत्न करतात. तिला पायातील वहाण म्हणून पायातच कशी ठेवता येईल, हाच त्यांचा प्रयत्न असतो. स्त्रियांना एका वस्तूपलीकडे स्थान नसणा-या सामाजिक परिस्थितीत चंगळवादाच्या बळी स्त्रियाच ठरत आहेत. प्रमोशन किंवा क्रिमी ट्रान्सफरच्या गोंडस लेबलमागून सेक्सची मागणी व्यवहार्य नसून कर्तृत्ववान महिलांचं खच्चीकरण करणारी नक्कीच आहे. मुख्य म्हणजे स्त्री हक्कांची चळवळ ही पुरुषांविरुद्धची चळवळ नसून 'पुरुषप्रधानते'विरुद्धची आहे, हे स्वत: पुरुषप्रधानतेतून बाहेर येऊन माणूसपणाची वाटचाल करत सकारात्मक कृतीतून दाखवण्याची नितांत गरज आहे.
- दिलीप अक्षेकर, माहीम.


विरोध करा
आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे बहुतेक स्त्रिया कार्यालयात वरिष्ठ अधिका-यांकडून होणारा अन्याय चूपचापपणे सहन करतात. अत्याचार सोशिक स्वभावानुसार सहन केल्याने अप्रत्यक्षात अत्याचारी अधिका-याला प्रोत्साहन दिल्यासारखे होते. तक्रार केल्यास आपली बदनामी होण्याची भीती त्या स्त्रीला वाटत असावी. शिवाय तक्रार केली तरीही कायद्याच्या कासवगती कारभारानुसार प्रकरणाचा निर्णय खूप दिरंगाईने लावला जातो. त्यामुळे पीडित स्त्रीची अवस्था खूप वाईट होते. मात्र स्त्री धारिष्ट अबाधित राखत याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. आपण 'त्यातले' नसल्यामुळे त्या कृत्याविरोधात आवाज उठवून विरोध दर्शविला, तर ताठ मानेने समाजापुढे एक आदर्श म्हणून मिरवता येईल. स्त्रियांनी अत्याचाराविरुद्ध आवाज उठविला तरच दुसरा कुणी अशा प्रकारचे धाडस करण्यास धजावणार नाही.
- नरेश नाकती, बोरिवली (प.)


स्त्रीला दुर्गावतार घेणे जरुरी!
सध्या देशाच्या विविध भागांमध्ये होणारे महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. कारण सध्याचे सरकार कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलेले आहे. आज महिला जरी पुरुषांबरोबर समपातळीवर काम करीत असल्या तरी, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सरकारी कार्यालये, महाविद्यालये, महानगरपालिका अशा असंख्य विभागांमध्ये वरिष्ठ अधिकारी कित्येकदा महिलांच्या कमजोरीचा फायदा उठवतात. अश्लील बोलणे, अंगलटपणा किंवा पिळवणूक अशा गोष्टींचा भडीमार करतात. अशा त्रासामुळे महिलावर्ग कधीही कुठेही वाच्यता करण्यास किंवा तक्रार करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे अशा कार्यालयीन वरिष्ठांचे फावते. ते सर्रास महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळय़ात ओढण्याचा प्रयत्न करतात. आजच्या स्त्रीने उंबरठयापलीकडे जाता स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे केवळ स्त्री असल्याने अन्याय सहन करणे, हे तिच्या रणरागिणी प्रतिमेला शोभणारे नाही. समाजात वावरायचे असेल तर अशा वासनेच्या आहारी गेलेल्या नराधमांविरुद्ध कडक पावले उचलून त्यांना शासन करणे जरुरीचे आहे. त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा,अन्यथा महिला वर्गाला जगणे मुश्कील होईल.
- राजेंद्र सावंत, टिटवाळा (पू.)


विकृत अधिका-यावर कारवाई हवीच
महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यातून त्यांची होणारी कुंचबणा काही नवी नाही. असे अन्याय अनादी काळापासून सुरू आहेत, पण आता त्याचे स्वरूप बदलले आहे. काळही बदलला, मात्र महिलांवर होणा-या अत्याचारांचे शुक्लकाष्ट काही बदललले नाही. आज पाच वर्षाच्या बालिकेपासून ६० वर्षाच्या वृद्धेवरही बलात्कार केल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. अशा बातम्या ऐकून लाजेने मान खाली घालण्याखेरीज आपल्या हाती काहीच नसते. परस्त्रीला सन्मानाने वागवले पाहिजे, हा छत्रपती शिवरायांचा आदर्श आज दुर्दैवाने इतिहासजमा झालेला आहे. या प्रकारामुळे महामंडळाची प्रतिमा तर डागाळली आहेच, पण राज्याच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे. ही स्थिती बदलली पाहिजे, त्यासाठी धमक आणि धडाडी आवश्यक आहे.
- राजा मयेकर, लोअर परळ.


 सरकारी पातळीवर उदासीनता नको
अलीकडे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सतत ऐरणीवर येत आहे. सरकारी क्षेत्र असो वा खाजगी, दोन्हींमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना घडतच आहेत. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी महिला समित्या स्थापन व्हायला हव्यात. त्यात सेवाभावी संस्थेतील तसेच कायदेतज्ज्ञ असणाऱ्या महिलांचा समावेश असावा. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देताना, त्यांचा वाढता सहभाग लक्षात घेता त्यांचे कामाचे ठिकाणी होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी स्वतंत्र कायद्याची आवश्यकता आहेच. असा कायदा करतानाही लैंगिक छळाची नेमकी व्याख्या होणे गरजेचे आहे. केवळ स्पर्शाच्या साहाय्याने, हावभाव करून किंवा अश्लील चित्रे दाखवून स्त्रियांचा छळ केला जातो, असे नाही, त्यासाठी अन्य काही बाबीही जबाबदार ठरतात. या सा-या गोष्टींचा विचार या कायद्यात केला जायला हवा. मुख्य म्हणजे यासंदर्भात विविध कार्यालयांमध्ये जनजागृती व्हायला हवी.
याशिवाय अशा छळासंदर्भात कोणाकडे तक्रार दाखल करायची, त्याबाबत कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो, गुन्हा सिद्ध झाल्यास काय करता येऊ शकते, याची माहिती सर्वत्र दिली जाणे गरजेचे आहे. शेवटी कायदा कितीही चांगला असला तरी त्याबाबतची नेमकी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणेच महत्त्वाचे ठरते. याशिवाय या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारी पातळीवर उदासीनता राहू नये, अशी अपेक्षा आहे. कारण समाजातील अपप्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी कायदे पुरेसे असले, तरी त्यांची नीट अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आजही समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालता आलेला नाही. सगळय़ात महत्त्वाची बाब म्हणजे कार्यालयातील महिलांची लैंगिक छळासंदर्भात व्याख्या व्यापक व्हायला हवी, असे प्रकार घडल्यानंतर दोषींना कठोर शासन होण्याबरोबरच असे प्रकार घडूच नयेत, म्हणून तातडीने पावले टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे.
- दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई.


 वाचकांचे व्यासपीठ
 मान्सूनसाठी महापालिका सज्ज?
मान्सून दारावर पोहोचला तरी मान्सूनपूर्व तयारीचा भाग असलेली नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आदी विविध कामे सुरूच आहेत. महापालिका दरवर्षी पाणी तुंबणार नाही, असे दावे करते. मात्र तरीही पाणी साचण्याच्या घटना घडतातच. यंदाही मुंबई महापालिका, ठाणे महापालिकांसह रेल्वे व इतर यंत्रणांनी नालेसफाई व इतर कामे समाधानकारक झाल्याचे दावे केले आहेत, ते खरे ठरतील का? मान्सूनपूर्व कामांना दरवर्षी उशीर का होतो? २००५च्या प्रलयानंतर आज ८ वर्षानी तरी प्रशासकीय यंत्रणांनी धडा घेतला आहे, असे वाटते का? मुंबईतील मिठीने गेल्या काही वर्षांत रौद्रावतार दाखवला नसला तरी मिठीची कामे योग्यरीत्या होत आहेत, असे वाटते का? पावसाळ्यात उद्भवणा-या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे का?

Read More »














पुन्हा पद भूषवण्यास जगदाळे अनुत्सुक

बीसीसीआयमध्ये पुन्हा पद भूषवण्यास उत्सुक नसल्याचे नुकताच राजीनामा दिलेले सचिव संजय जगदाळे यांनी शनिवारी सांगितले.
इंदूर- बीसीसीआयमध्ये पुन्हा पद भूषवण्यास उत्सुक नसल्याचे नुकताच राजीनामा दिलेले सचिव संजय जगदाळे यांनी शनिवारी सांगितले. ''मी राजीनाम्यावर ठाम आहे. त्यामुळे पुन्हा कुठलेही पद भूषवण्याची माझी इच्छा नाही.
माझी सचिवपदाची कारकीर्द चांगली झाली, असे मला वाटते. आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणाने क्रिकेटची प्रतिमा मलीन झाली आहे. फिक्सिंग प्रकारांना आळा घालणे, कठीण आहे.
मात्र असे प्रकार घडू नयेत म्हणून तसेच चाहत्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बीसीसीआय प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे,''असे जगदाळे यांनी म्हटले.

Read More »

शारापोवा चौथ्या फेरीत

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रशियाच्या मारिया शारापोवाने चीनच्या जी झेंगवर ६-१, ७-५ असा विजय मिळवत चौथ्या फेरीत प्रवेश केला.


Read More »

कोकणात वादळी पाऊस

सावंतवाडी तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे घरांची पडझड झाली.


Read More »

प्रहार बातम्या- एक जून २०१३
नमस्कार प्रहार बातम्यांमध्ये आपल स्वागत..

» मान्सून केरळमध्ये दाखल
» अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी प्रीती राठीचं निधन
» इन्फोसिसच्या अध्यक्षपदी नारायणमूर्ती यांची निवड
» आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांचा राजीनामा
» बीसीसीआयच्या कार्यकारीणीची रविवारी बैठक
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा…01062013

Read More »

शारापोवा, अझारेंका चौथ्या फेरीत

गतविजेती आणि दुसरी सीडेड रशियाची मारिया शारापोवासह तिसरी सीडेड बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंकाने शनिवारी फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीची चौथी फेरी गाठली.
पॅरिस- गतविजेती आणि दुसरी सीडेड रशियाची मारिया शारापोवासह तिसरी सीडेड बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंकाने शनिवारी फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीची चौथी फेरी गाठली.
मारिया शारापोवाला चौथी फेरी गाठण्यासाठी थोडा घाम गाळावा लागला. मात्र तिने चीनच्या जी झेंगवर ६-१, ७-५ असा विजय मिळवला. पहिला सेट सहज जिंकल्यावर दुस-या सेटमध्ये शारापोवा एका क्षणी २-४ अशी पिछाडीवर होती. तिथून ४-४ बरोबरी साधल्यावरही चुरस कायम राहिली. शेवटी ५-५ बरोबरीनंतर पुढील दोन गेम जिंकत शारापोवाने विजय नोंदवला. तिसरी मानांकित बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने ३१व्या मानांकित फ्रान्सच्या अ‍ॅलिझ कॉर्नेटचा ४-६, ६-३, ६-१ असा पराभव करत चौथी फेरी गाठली. पहिला सेट गमावल्यावर अझारेंकाने वेळीच स्वत:ला सावरले.
या लढतीत तिच्या ब-याच सव्‍‌र्हिसही चुकीच्या झाल्या. १३वी मानांकित फ्रान्सच्या मारियन बाटरेलीला घरच्या प्रेक्षकांसमोर तिस-या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. २०१० फ्रेंच ओपन विजेती इटलीच्या फ्रान्सेस्का शियावोनने बाटरेलीचा ६-२, ६-१ असा पराभव केला. आता चौथ्या फेरीत अझारेंका आणि शियावोन आमनेसामने येतील.
या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत मजल गाठून सर्वाचे लक्ष वेधून घेणारी अमेरिकेची २०वर्षीय स्लोआन स्टीफन्सने न्यूझीलंडच्या मॅरिना इरॅकोविचचा ६-४, ६-७, ६-३ असा पराभव केला. याबरोबरच १७वी मानांकित स्लोआनने चौथी फेरी गाठली. पुरुष एकेरीत १३वा मानांकित की निशीकोरीने २४वा मानांकित फ्रान्सच्या बेनोइट पैरेवर ६-३, ६-७, ६-४, ६-१ अशी मात करत चौथी फेरी गाठली.
तत्पूर्वी, शुक्रवारी उशीरा झालेल्या लढतींमध्ये सहावा मानांकित फ्रान्सच्या जो-विल्फ्रेड त्सोंगाने चौथी फेरी गाठताना २५वा मानांकित त्याच्याच देशाच्या जेरेमी चार्डीला ६-१, ६-२, ७-५ असे नमवले. चौथी मानांकित पोलंडच्या अ‍ॅग्नेस्का रॅडवांस्कानेही अंतिम १६मध्ये प्रवेश करताना जर्मनीच्या दिना फिझेनमेयरचा ६-३, ६-४ असा पराभव केला. पाचवी मानांकित इटलीच्या सारा इरॅनीने तिस-या फेरीत ३२वी मानांकित जर्मनीच्या सॅबिन लिस्कीला ६-०, ६-४ असे नमवले. आठवी मानांकित जर्मनीच्या अ‍ॅँजेलिक कर्बरने चौथी फेरी गाठताना २९वी मानांकित वॅवॅरा लेपचेन्कोचा ६-४, ६-७, ६-४ असा पराभव केला.
१४वी मानांकित सर्बियाच्या अ‍ॅनो इवानोविचने फ्रान्सच्या व्हर्जिन रॅझानोवर ६-३, ६-२ असा विजय मिळवला. याबरोबरच इवानोविचने चौथ्या फेरीत प्रवेश केला.
पेस – मेल्झर जोडी पराभूत
भारताच्या लिअ‍ॅँडर पेसला आणि त्याचा ऑस्ट्रियाचा सहकारी जुर्जेन मेल्झरला शनिवारी पुरुष दुहेरीच्या दुस-या फेरीत पराभवाचा धक्का बसला. नवव्या सीडेड पेस-मेल्झर जोडीला उरुग्वेचा पॅब्लो क्युवास आणि
अर्जेटिनाचा होरासिया झेबॅलोस या जोडीकडून ७-५, ४-६, ६-७ अशी हार स्वीकारावी लागली. भारताचे पेस-मेल्झरच्या पराभवामुळे भारताचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. महेश भूपती आणि रोहन बोपण्णाचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले.

Read More »

राशिभविष्य- दोन जून २०१३

दैनंदिन राशिभविष्य…
मेष : लोकांच्या आदरास पात्र व्हाल.



वृषभ : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मिथुन : गुंतवणुकीचे लाभ कळून येतील.
कर्क : लेखन प्रसिद्ध होईल.
सिंह : छोटया, पण महत्त्वाच्या गोष्टी सांगाल.

कन्या : टीकात्मक लेखन कराल.
तूळ : चांगल्या बाबी प्रथम अभ्यासाल.
वृश्चिक : नाटयाभिनयाचा सराव कराल.
धनू : यशस्वी मध्यस्थी कराल.
मकर : पुस्तके खरेदी कराल.

कुंभ : ज्ञानाने नम्र व्हाल.
मीन : खेळाची माहिती करून घ्याल.