Tuesday, August 20, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

उपवासाचे घावन

घावन कसे बनवायचे…

साहित्य : एक वाटी वरी तांदूळ, एक वाटी साबुदाणे, दोन हिरव्या मिरच्या, दोन चमचे नारळाचा चव,दोन  चमचे दाण्याचे कूट, एक चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, साजूक तूप

कृती : साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे, पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती दोन इंच एवढी असावी. अशा प्रकारे दोन्ही साहित्य साधारण ४-५ तास भिजवावं. दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरं, दाण्याचा कूट, मीठ घालावं. आपण नेहमीच घावनाला जेवढं घट्ट भिजवतो तेवढंच हे मिश्रण घट्ट भिजवावं. म्हणजे त्याच अंदाजाने मिक्समध्ये पाणी घालावं. नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावं. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावं. कडेने एक चमचा तूप सोडावं. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली की दुसरी बाजू नीट होऊ द्यावी. गरम गरम घावन नारळाच्या चटणीसोबत सव्‍‌र्ह करावं.

टीप :
१) कधी कधी साबुदाणा चिकट असला तर वाफ काढल्याने घावन गदगदलेलं होतं आणि घावन कालथ्याने उलथवायलाही त्रास होतो. म्हणून पहिल्या घावनाला वाफ काढून पाहावी. जर ते चिकट होत नसेल तर वाफ न काढता मध्यम आचेवर दोन्ही बाजू नीट भाजून घ्याव्यात.

२) घावनात थोडीशी चिरलेली कोथिंबीरसुद्धा छान लागते.

३) मिरची आवडीनुसार कमी-जास्त वापरावी.

Read More »

खोब-याचा पौष्टिक मेवा

सध्याचे दिवस हे सणासुदीचे आणि उपासतापासांचे आहेत. पण अति उपासाचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. उपवासामुळे थकवा येऊन गळल्यासारखं वाटतं. अशा वेळी खोब-याचे पदार्थ आवर्जून खावेत. त्यामुळे शरीरास भरपूर ऊर्जा मिळते. कारण नारळापासून मिळणारं खोबरं हे बलदायी समजलं जातं. खास नाराळीपौर्णिमेच्या निमित्तानं खोब-यापासून बनवलेल्या पदार्थाचा हा खाद्यनजराणा
'कल्पवृक्ष' हा मुळातच बहुगुणात्मक आणि बहुपयोगी. या झाडाच्या 'नारळ' या फळाचा उपयोग आपल्या दैनंदिनीतील विविध कार्यात विशेषत: जेवणात, विविध प्रकारच्या खाऊच्या प्रकारांमध्ये या ना त्या निमित्तानं केला जातो. कधी पातळ रश्शाला घट्टपणा आणि चविष्टपणा येण्यासाठी मसाला (वाटण) म्हणून तर कधी औषध म्हणून. थोडक्यात काय तर नारळाशिवाय आपलं (त्यातही कोकणवासीयांचं आणि कोळी बांधवांचं जास्तच) पानच हलत नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

नारळापासून मिळणा-या खोब-यातील गुणधर्म हे अत्यंत प्रभावी असतात. त्यामुळेच रोजच्या जेवणासह, अनेक प्रकार मिठायांमध्येही खोब-याचा सढळ हस्ते वापर केला जातो. कुठल्याही पदार्थात खोबरं घातल्यानं त्याला लगेच दाटसरपणा येतो. पदार्थाच्या चविष्टपणात वाढत होते. खोब-यात 'अ' जीवनसत्त्व आणि चांगल्या दर्जाचे फॅट्स आहेत. तरीही खोबरं खाताना अनेक बंधन येतात. उच्चरक्तदाब, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण वाढल्यामुळे हृदयविकाराचा धोका या आजारांचा त्रास असणा-यांना मात्र खोबरं खाण्याचा मोह टाळावा लागतो. अतिलठ्ठ माणसांनीही आहारात खोब-याचा वापर बेतानंच करावा. खोब-यापेक्षा शहाळं वापरावं. तेही अतिशय पातळ खोबरं (मलई) असलेलं. असं शहाळं हे बुद्धिवर्धक समजलं जातं. खोबरं मुळातच पौष्टिक असल्यामुळे लहान मुलं, भरपूर खेळणारी माणसं, नियमित व्यायाम वा कष्टाची काम करणा-यांनी त्याचा आहारात आवर्जून उपयोग करावा. त्यांनी नारळाच्या रसात भिजवलेल्या कणकेपासून बनवलेली पोळी, भाकरी खावी. नारळापासून मराठी खाद्यसंस्कृतीतील नारळीपाक, नारळीभात अशा पारंपरिक पदार्थाशिवाय अजूनही काही पदार्थ तयार करता येतात. त्या पदार्थाविषयी..


चटणी

साहित्य : ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, लिंबू, जिरे, कोथिंबीर, मीठ.

कृती : सर्व साहित्य प्रमाणानुसार आणि आपल्या आवडत्या तिखट मिठाच्या चवीनुसार एकत्र करून चटणी वाटावी.
या चटणीत दही घालून वरून तुपावर जि-याची फोडणी देऊन वेगळया प्रकारची चटणी करता येईल. नारळाच्या चटणीत थोडं दाण्याचं कूट घालून चटणी वाटल्यास चव अप्रतिम लागते. चवीत थोडा बदल हवा म्हणून नाराळाच्या चटणीत कैरी किंवा कच्ची चिंचही घालावी.

फायदे : ओल्या खोब-यात 'अ' आणि 'ब' जीवनसत्त्व असतं. हिरव्या मिरचीमुळे पदार्थाला चव येते. हिरवी मिरची कृमीघ्न आहे. कृमीघ्न म्हणजे आतडयांत होणा-या जंतांवर ती उपयुक्त ठरते. लिंबात 'क' जीवनसत्त्वाचा साठा मोठया प्रमाणावर असतो. आयुर्वेदानुसार 'दीपन-पाचन' हा लिंबाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. दीपन म्हणजे भूक भरपूर वाढवणं. पाचन म्हणजे खाल्लेलं अन्न पचवण्याचं काम करणं. मिठामुळे पदार्थाला चव येते. शिवाय मिठात असणारं सोडियम क्लोराइड, इलेक्ट्रॉलचे क्षार शरीरासाठी उपयोगी असतात. कॅन्सरविरोधी घटक ही कोथिंबिरीचा प्रमुख गुणधर्म आहे. शिवाय कोथिंबिरीमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं. कोथिंबिरीमुळे पदार्थाला चवही छान येते.


खांडवी

साहित्य : एक वाटी वरी तांदळाचा रवा, दोन वाटया खडीसाखरेची पूड, दोन वाटया नारळाचं दूध, तीन ते चार वेलदोडयांची पूड, गुलाबपाणी, साजूक तूप, चिमूटभर मीठ.

कृती : तुपावर वरीच्या तांदळाचा रवा चांगला भाजून घ्यावा. नारळाच्या दुधात साखर विरघळू द्यावी. दुधाला उकळी आली की त्यात भाजलेला रवा, चवीनुसार मीठ घालावं. इसेन्स आणि वेलदोडयांची पूड घालावी. पातेल्यातील मिश्रण चांगलं ढवळून त्यावर झाकण ठेवावं. पातेल्यावर झाकण ठेवावं. खमंग वास आल्यावर पातेल्यात सगळ्या बाजूनं एक चमचा तूप सोडावं. तूप लावलेल्या थाळीत थापावं. वरून ओलं खोबरं भुरभुरावं. थापलेलं मिश्रण गार झाल्यावर वडया कापाव्यात.

फायदे : वरीच्या तांदळात तसे फारसे आरोग्यदायी गुणधर्म नाहीत. मात्र उपवासाच्या दिवसात सपाटून भूक लागण्याचं प्रमाण वरीमुळे कमी होतं. वेलदोडयांमुळे जुनाट (चिघळलेला) कफ वितळायला मदत होते. गुलाबपाणी पित्तशामक आहे. साजूक तुपातील स्निग्ध गुणधर्मामुळे पदार्थ पचण्यास हलका होतो.


पुलाव

साहित्य : दोन वाटया बासमती तांदूळ, एक वाटी ओलं खोबरं, एक मोठा चमचा तेल, दोन मोठे चमचे साजूक तूप, चमचाभर उडीद डाळ, थोडीशी मोहरी, दोन ते तीन दालचिनीचे तुकडे, तीन-चार लवंगा, चार-पाच हिरव्या मिरच्या, दहा-पंधरा कढीपत्त्याची पानं, थोडंसं बारीक चिरलेलं आलं, आवडीप्रमाणे काजू नाहीतर शेंगदाण्याचे दाणे, चवीपुरतं साखर, मीठ.

कृती : दोन वाटया बासमती तांदूळ मोकळा करून घ्यावा. भात शिजताना त्यात चवीपुरतं मीठ घालावं. एक मोठा चमचा तेल आणि एक मोठा चमचा साजूक तूप तापत ठेवावं. त्यात एक चमचा उडदाची डाळ घालावी. डाळीचा रंग बदलायला लागला की मोहरी घालावी. दोन-तीन दालचिनीचे तुकडे, तीन-चार लवंगा, चार-पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची पानं, एक चमचा बारीक चिरलेलं आलं घालावं. दहा-बारा काजूचे तुकडे करून घालावेत. काजू आवडत नसतील तर मूठभर शेंगदाणे घालू शकता. वाटीभर ओलं खोबरं घालून भात परतावा. खोबरं लालसर झालं पाहिजे. आता मोकळा केलेला भात यात घालावा. चवीला थोडं मीठ टाकून ढवळून घ्यावं. ढवळलेल्या भातावर वरून तूप सोडून वाफ येऊ द्यावी. लिंबाचा रस मिसळून गरमागरम भात वाढावा.

फायदे : उडदाची डाळ, चण्याच्या डाळीमुळे पदार्थाला चव प्राप्त होते. यातील उच्च दर्जाची प्रथिनं शरीरासाठी उपयोगी ठरतात. मोहरी कृमीघ्न आहे. म्हणजे आतडयात होणा-या जंतांचा नाश मोहरीमुळे होतो. दालचिनी, लवंगा, कढीपत्ता या घटकांमुळे पदार्थाला सुवास येतो. मात्र त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म निराळे आहेत. जसं दालचिनी हृदयसंरक्षक समजली जाते. दालचिनीमुळे शरीराला घातक असणारी चरबी वितळली जाते. लवंगा पचनासाठी उत्तम समजल्या जातात. कढीपत्त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होतं. आल्यामुळे पदार्थाचं पचन होतं. जिभेला चव येते. आल्यामुळे अॅसिडिटी कमी होते. काजूपेक्षा शेंगदाण्याचा वापर पदार्थात जास्त करावा. काजूमुळे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढतं. मात्र शेंगदाण्यातील प्रथिनं शरीरासाठी उपयोगी असतात.

Read More »

सोरायसिसमध्ये आत्मविश्वास महत्त्वाचा!

सोरायसिस हा संसर्गजन्य आजार नाही. पण या आजारात त्वचेवर निर्माण होणारे चट्टे रुग्णांच्या भावनांवर, वागणुकीवर परिणाम करतात. अशा वेळी सकारात्मक वृत्तीनं या आजारावर उपचार घेतल्यास नक्की बरं होता येतं. फक्त संयम आणि काळजी महत्त्वाची असते.

राजेश दहा वर्षाचा होता. तेव्हा त्याच्या मानेवर एक छोटीशी पुळी आली. नंतर ती पुळी पिकली. पुळी गेल्यानंतर तिथं तपकिरी करडया रंगाचा डाग तयार झाला. त्यानंतर राजेशला काही दिवसांनी मानेवर ज्या ठिकाणी पुळी आली होती, तिथून थोडया अंतरावर आणखी एक पुळी आली. ती पुळी गेल्यावर तिथेही तपकिरी करडया रंगाचा डाग तयार झाला. हळूहळू राजेशच्या मानेवरच्या या डागांचा पृष्ठभाग खडबडीत होत गेला. त्या डांगांवरचे पापुद्रे सुटू लागले. ते चट्टे लालसर-पांढ-या रंगाचे दिसू लागले. चट्टयांचं प्रमाणही वाढू लगालं. तो त्वचारोगतज्ज्ञांकडे गेला. तिथे त्याला 'सोरायसिस' असल्याचं निदान झालं.

सोरायसिस या रोगाचे बरेच प्रकार आहेत. त्यात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा प्रकार म्हणजे लाल रंगाचे चट्टे उठणं. सोरायसिस झालेल्यांपैकी ८० टक्के लोकांमध्ये हाच प्रकार दिसून येतो. यामध्ये लालसर रंगाच्या चकत्या येतात. या चकत्या गोलाकार किंवा लंबवर्तुळाकार असतात. चकतीचा पृष्ठभाग खडबडीत असतो. कधी-कधी तो पांढ-या खवल्यांचा असतो. हे सफेद चंदेरी रंगाचे खवले सैलसर चिकटलेले असतात. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाजवल्यानंतर भुशाप्रमाणं खाली पडतात. त्वचेच्या बाह्यपेशींचं फारच जलदगतीनं विभाजन झाल्यामुळे त्वचा जाड होते. पातळ पापुद्रयासारखे खवले निघतात. चट्टे हे साधारणत: सर्वप्रथम कोपर, गुडघे, डोक्याची त्वचा आणि पाठीच्या खालच्या भागात जास्त प्रमाणात दिसतात. काही रुग्णांमध्ये नंतर ते हळूहळू अंगभर पसरतात. घडीचा, ठिपक्यांचा, नखांचा, पुळीचा, डोक्याचा, सर्वागभर, सांध्यांचा, हातापायांचा हे सोरायसिसचे काही प्रकार आहेत.

कारणं

या आजाराचं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. दारू पिण्याचं वा सिगारेट ओढण्याचं व्यसन असणा-यांनाही सोरायसिस होतो. हिवाळयात या आजाराचं प्रमाण वाढतं. तर उन्हाळयात कमी होतं. परंतु कधी-कधी जास्त सूर्यप्रकाशही हानिकारक ठरू शकतो. तर कधी औषधांमुळेही सोरायसिसचा आजार बळावतो. जसं की, मलेरियाची औषधं (क्लोरोक्विन), वेदनाशामक औषधं (रअकऊर), उच्चरक्तदाब कमी करण्याची औषधं, 'लिथिअम'सारखी मानसिक आजारांवरील औषधं.

'इंडियन सोरायसिस फाउंडेशन'ने सोरायसिस या आजाराच्या उगमाची कारणं शोधली. त्यात त्यांना असं दिसून आलं आहे की, हा आजार म्हणजे शरीरांतर्गत पेशींची एकमेकांमधली लढाई आहे. या आजाराचं दुसरं कारण आहे आनुवंशिकता. सोरायसिसच्या ३० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिकता हे कारण आढळून आलं आहे. जर आई-वडील दोघंही सोरायसिसनं आजारी असतील, तर मुलाला सोरायसिस होण्याची शक्यता ३० टक्क्यांनी वाढते.

सोरायसिसचे प्रकार

घडीतला सोरायसिस – यात शरीरात घडी पडणा-या भागांवर चट्टे येतात. स्त्रियांच्या स्तनांच्या खाली किंवा जांघेत चट्टे येतात. चट्टे अडचणीच्या जागेत येतात. अशा जागांमध्ये सतत घाम येतो व तो पुसला न गेल्यामुळे ते भाग ओलसर राहतात. या चट्टयांवर खवलं कमी दिसतात.

नखांचा सोरायसिस – हाता-पायांच्या बोटांच्या नखांच्या आकारात बदल होतो. नखं जाड होतात. नखांवर एक ते दोन मिमी आकाराचे छोटे खड्डे दिसतात. ठिसूळ बनतात. नखांचा कडक भाग त्याच्या गादीपासून वेगळा होतो. हळूहळू ती पिवळी दिसायला लागतात. नखांखाली तेलाचा चट्टा आल्यासारखा दिसतो.

पुळीचा सोरायसिस – सोरायसिसच्या या प्रकारात शरीराच्या ज्या भागावर तो होतो, त्या ठिकाणी खवलं येत नाहीत. तर प्रथम त्वचा लालसर होते. त्यावर पूनं पिकलेल्या छोटया-छोटया पुळया येतात. नंतर त्या पुळया करडया रंगाच्या होऊन नंतर त्या सुकतात.

ठिपक्यांचा सोरायसिस – यात छातीवर, पाठीवर छोटे-छोटे ठिपके पसरलेले दिसतात. सोरायसिसचा हा प्रकार ब-याचदा लहान मुलं आणि तरुणांमध्ये आढळून येतो. या प्रकारच्या सोरायसिसची सुरुवात ही ब-याचदा टॉन्सिलायटिस, घशाचा दाह अशा संसर्गजन्य आजारांनंतर होते.

सर्वागपूर्ण सोरायसिस - नावाप्रमाणंच या प्रकारातला सोरायसिस सर्वागावर येतो. मात्र हा साधारण सोरायसिसपेक्षा वेगळा दिसतो. संपूर्ण त्वचा लालसर दिसते. त्यावरून पातळ पापुद्रे सुटायला लागतात. मात्र भरपूर खाज येते.

डोक्याचा सोरायसिस - यामध्ये फक्त डोक्यावरच लालसर चट्टे येतात. त्यावर पांढ-या रंगाची खवले असतात.

हातापायांचा सोरायसिस – सोरायसिसचा हा प्रकार अतिशय वेदनादायी असतो. यामध्ये प्रथम हाताच्या तळव्यांवर काही ठिकाणी त्वचा जाड, कडक होते. काही ठिकाणी त्वचेवर भेगाही पडतात. या भेगा अत्यंत वेदनादायी असतात. नंतर जाड झालेल्या त्वचेचे पापुद्रे सुटायला लागतात. खाजही येते.

सांध्यांचा सोरायसिस – सोरायसिसचा आजार असणा-या पाच टक्के रुग्णांना या प्रकारचा सोरायसिस होतो. यात बोटांचं शेवटचं पेर सुजतं. इतकं की ते दुखायला लागतं. इतरही लहान सांधे दुखतात. हा त्रासदायक प्रकार वाढल्यास हाडांचा वरचा पातळ थर नष्ट होतो. बोटं लहान व्हायला लागतात.

सर्वसाधारणपणे त्वचेच्या अन्य प्रकारच्या आजारांमध्ये निरोगी त्वचा यायला सर्वसाधारणपण२८ दिवसांचा कालावधी लागतो. परंतु सोरायसिसमध्ये हेच काम चार दिवसात होतं. त्यामुळे जिथे कमकुवत त्वचा तयार होते, तिथे पांढरे, चंदेरी पापुद्रे सुटतात. त्यांना 'स्केल्स' म्हणतात. सगळयात महत्त्वाचं म्हणजे या आजारात पांढरी खवलं पडत नाहीत. तसंच यामुळे कोणताही जंतुसंसर्ग होत नाही.

साधारणपणे असा समज आहे की, हा त्वचारोग चुकीच्या खाण्यापिण्यामुळे होतो. परंतु सोरायसिस हा प्रकार जास्त वा कमी खाण्यामुळे किंवा जीवनसत्त्वांच्या अभावामुळे होत नाही. तरीही पथ्य पाळाले तर चांगलंच आहे. म्हणजे औषधाची मात्रा लवकर लागू पडते. म्हणजे -

>> आहारात मिठाचा वापर बेतानंच करावा.

>> कारल्याच्या रसात एक चमचा लिंबाचा रस मिसळून प्यावा.

>> जेवणात गाजराचा कीस, कोबी, काकडीपासून बनवलेले पदार्थ असावेत. हे पदार्थ स्वच्छ धुवून कच्चे खाल्ल्यास काहीच हरकत नाही.

>> शाहाळयाचं पाणी प्यावं.

>> बीट, भोपळयापासून बनवलेले पदार्थ खावेत.

>> मोड आलेल्या कडधान्यांपासून बनवलेल्या पदार्थाचा आहारात समावेश असावा.

>> चहा, कॉफी, तंबाखू, दारूचं व्यसन सोडावं.

आजार कसा आटोक्यात ठेवाल?

सोरायसिसची उपचार पद्धती, हा सर्वात महत्त्वाचा पण दुर्लक्षिला जाणारा भाग आहे. रुग्णाच्या सहकार्याशिवाय ती व्यवस्थितपणे पूर्ण होत नाही आणि पर्यायानं आजार पूर्णपणे बरा होत नाही. त्यासाठी पुढील पथ्य पाळणं गरजेचं आहे.

>> मानसिक ताणतणाव कमी करणं. त्यासाठी योगासनं, प्राणायाम हे प्रकार खूप फायदेशीर ठरू शकतात.

>> दारू, सिगारेट आणि तंबाखूच्या व्यसनांपासून स्वत:ची सुटका करून घ्या.

>> ज्या-ज्या ठिकाणी त्वचेला इजा पोहोचते, तिथे सोरायसिसचा आजार असण्याची वा आधी होऊन गेलेला असल्यास तो पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे छोटया-मोठया जखमांपासून सावध राहा. 

>> सुती, मऊ आणि सैलसर कपडे वापरा.

>> सर्वसाधारणपणे अल्कली गुणधर्म जास्त नसणा-या सौम्य साबणांचा वापर करावा. तसंच आंघोळीच्या आधी तेल किंवा तत्सम स्निग्ध पदार्थ आवर्जून लावावेत.

>> तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही बाहेरची औषधं स्वत:च्या मनानं घेऊ अथवा वापरू नका. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा वापर अचानकपणे स्वत:च्या मनानं बंदही करू नका.

थोडक्यात काय तर थोडं संयमानं, सकारात्मक वृत्तीनं घेतल्यास या आजारावर नक्की मात करता येईल. शेवटी आत्मविश्वास महत्त्वाचा!

सकारात्मक दृष्टिकोन ठेवा

सोरायसिस हा आजार वनौषधींच्या सहाय्यानं तसंच व्यवस्थित पथ्यं पाळल्यास बरा होऊ शकतो. हा आजार संसर्गजन्य नाही. तसंच तो फक्त पाच ते दहा टक्के या प्रमाणातच आनुवंशिक आहे. त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता सोरायसिसच्या रुग्णांनी औषधोपचाराकरता स्वत:हून पुढाकार घ्यावा. या आजाराचा औषधोपचार स्वत:च करू नये. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावा. –  डॉ. प्रमोद अंबळकर (एमडी. अल्टरनेटिव्ह मेडिसीन) अध्यक्ष, इंडियन सोरायसिस फाउंडेशन

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe