Wednesday, November 6, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

दिवाळी फराळ आणि आरोग्य संबंध

दिवाळीचा फराळ चविष्ट खरा, परंतु त्यात आरोग्यदायी पदार्थाचा वापर नसेल तर असा फराळ आरोग्यासाठी नक्कीच चांगला नाही. तळलेले पदार्थ त्यातही ते मैदा-साखरेचे बनवलेले असतील तर हा फराळ खाऊन आरोग्य सुधारण्याऐवजी ते बिघडण्याचीच पाळी येईल. दिवाळी फराळाला आपल्याकडे कित्येक शतकांची परंपरा आहे, पण त्यावेळचा फराळ आरोग्यसंपन्न होता. आता बनवला जाणारा फराळ कितपत पौष्टिक आहे याचा विचार करूनच त्यावर ताव मारा.

दिवाळी हा जसा दिव्यांचा-रोषणाईचा सण आहे तसाच तो सुप्रसिद्ध आहे फराळासाठी! रुचकर स्वादाचे, वेगवेगळ्या आकारांचे, विविध रंगारूपांचे एकाहून एक सरस असे जिभेला लालसावणारे फराळाचे पदार्थ हे आपल्या दिवाळसणाचं वैशिष्टयच म्हणायला हवं. दिवाळी जवळ येऊ लागल्याचं समजतं ते घराघरांमधून दरवळणा-या, नाकाला असीम आनंद देणा-या रुचकर सुगंधांनी! मुळात दिवाळसण हा अश्विन महिन्यात येतो, जो निसर्गसौंदर्याच्या आविष्काराचा आणि धान्याच्या संपन्नतेचा काळ असतो. धान्य चांगलं उत्पन्न झाल्याने धनाचीही प्राप्ती होणार असते, एकंदरीतच या वेळी धनधान्याचा सुकाळ असतो. साहजिकच सगळीकडे आनंदीआनंद असतो. हे धान्य मिळवण्यासाठी ज्याला हे काबाडकष्ट करावे लागले तो शेतकरी या मागच्या चार महिन्यांतल्या पर्जन्यकाळामधील कृषिकामाने थकून गेलेला असतो आणि आता त्या कष्टाचा आनंद घेण्यासाठी आतुर झालेला असतो. ही आहे पार्श्वभूमी दिवाळसणामध्ये पौष्टिक गोडधोड खाण्याची. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनेही विचार करता हा विसर्गकाळ आहे. निसर्गात होणारे बदल शरीरबल वाढवण्यास पोषक ठरतात. निसर्गातील त्या सकारात्मक बदलांना पौष्टिक आहाराने अधिकच बलदायक बनवण्याचा सण म्हणजे दिवाळी, जो मुख्यत्वे थंडीमध्ये येतो. मुबलक अन्न उपलब्ध असताना शीतकाळामध्ये पौष्टिक आहार सेवन करण्याचा विचार मानवाने प्राण्यांच्या निरीक्षणातूनच केला असावा. अन्न उपलब्ध आहे तेव्हा शरीरामध्ये त्या अन्नाचा (तत्जन्य चरबीचा) पुरेसा साठा करून ठेवायचा, जेणेकरून नंतर उन्हाळ्यामध्ये अन्नाचे दुíभक्ष होईल, तेव्हा त्या साठवलेल्या चरबीच्या साठयावर शरीराला गुजराण करता येईल, हा त्या अतिमात्रेमध्ये पौष्टिक अन्नसेवनाचा मूळ हेतू, जो नसíगक अवस्थेमधील प्राण्यांनी आजही अवलंबलेला दिसतो. निसर्गावर संपूर्णत: अवलंबून असलेल्या, कृषीआधारित जीवन असलेल्या मानवालाही या संकटाचा सामना काही प्रमाणात करावा लागत होता व त्यातूनच दिवाळीसारख्या अधिक ऊर्जा पुरवणा-या पौष्टिक आहाराची सांगड दिवाळी फराळाशी घातली गेली, जेणेकरून पुढे येणारा ग्रीष्मातला उन्हाळा आणि वर्षातला पावसाळा या अन्नाचा सुकाळ नसणा-या व आरोग्य दुर्बल होणा-या काळामध्ये शरीर तगून राहावं.

'शरीर निरोगी करणे' या विचाराने या सण-उत्सवादी योजना आपल्या चतुर पूर्वजांनी केल्या आहेत. त्यामुळे दिवाळी हा पूर्वापार चालत आलेला सण आहे हे निश्चित. अनेक पौराणिक कथांवरून हे सिद्ध होतंच. पण दिवाळीच्या सणाचा इतिहास पुराणकाळाच्याही मागे जाऊन पोहोचतो. उपनिषदकाळामधील गृहसंस्कारातल्या 'पार्वण, आश्वयुजी व आग्रयण' या पाकयज्ञांचं एकीकरण व रूपांतर होऊन आपण ज्याला दीपावली म्हणतो, तो उत्सव अस्तित्वात आला असावा, असं प्रसिद्ध वेदाभ्यासक 'ऋग्वेदी' म्हणतात. या पाकयज्ञांमध्ये नवीन धान्याची खीर, नवीन भातांचे पोहे वा पोह्यांचा गोड पदार्थ अशी मिष्टान्नं बनवली जायची. प्रत्यक्षात आज आपण जो फराळ बनवतो, त्या फराळामधील विविध खाद्यपदार्थाचे उल्लेख ज्या क्षेमकुतूहल, भोजनकुतूहल आदी पाकशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये सापडतात, ते साधारण अकराव्या शतकात रचलेले ग्रंथ आहेत. सुप्रसिद्ध जगप्रवासी आल्बेरुनीच्या अकराव्या शतकातील भारतदर्शनामध्ये दिवाळीमधील उत्सवाचं वर्णन आहेच, जे आपल्या दिवाळ फराळाची निदान एक वर्षाची परंपरा सिद्ध करतं. या प्राचीन ग्रंथांमध्ये दिवाळी फराळाला बनवले जाणारे खाद्यपदार्थ आहेत पुढीलप्रमाणे: अपूप (अप्पे/घारगे), शालिपूप (अनारसे), शंखपाला (शंकरपाळे), सम्पाव (सारोटी), मधुशीर्षक (खाजे), शष्कुली(करंजी), चणकपुरीका (बेसनाच्या तिखट पु-या),मुद्गलड्ड (मुगाचे लाडू), सेविका (शेवया), चक्रिका (चकली) वगरे-वगरे! या खाद्यपदार्थाची नुसती यादी वाचली तरी आपल्या आहारपरंपरेची संपन्नता ध्यानात येते आणि बर्गर-पिझ्झा अशा अर्धवट पदार्थाचं कौतुक करणा-यांची कीव येते. पाश्चात्त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याकडे एक प्रदीर्घ आहार परंपरा आहे. दिवाळीचा फराळ हे त्या आहार परंपरेचं-पाककलेचं कौशल्य आहे, ते येरागबाळीचं काम नाही. तुमच्या विशीपंचविशीच्या सुनेला वळीदार खुसखुशीत करंज्या बनवता येतात का नाही, हा एक पाककौशल्याचा भाग होता. आपली पाककलेची परंपरा सुदृढ ठेवण्यामध्ये अशा प्रकारे दिवाळी फराळ मोठीच भूमिका बजावत होता. दुर्दैवाने आज नाही कोणाला त्या पाककलेचं सोयर, नाही ती आहार परंपरा जिवंत ठेवण्याचं सूतक!

सोळाव्या-सतराव्या शतकाच्या आसपास विविध प्रदेशांच्या सफरीवर व्यापाराच्या उद्देशाने निघणारे युरोपियन्स आपल्यासोबत जे पदार्थ घ्यायचे त्यातले प्रमुख पदार्थ म्हणजे पांढरी साखर, पांढरे पीठ (मैदा) व पॉलिश केलेला पांढरा तांदूळ. या गोड-दाणेदार-स्वच्छ साखरेची व मुलायम मैद्याची संपूर्ण जगाला हळूहळू अशी काही भुरळ पडली की, एकोणिसाव्या शतकापर्यंत मैद्याचे व साखरेचे पदार्थ खाणं ही केवळ श्रीमंतांची मिजास होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळामध्ये झालेल्या रोलरमिल्सच्या निर्मितीनंतर रिफाइंड साखर व मैदा मुबलक उपलब्ध होऊ लागला आणि विसाव्या शतकामध्ये त्याची एक मुख्य बाजारपेठ बनला भारत. मागच्या संपूर्ण शतकामध्ये दशकागणिक गुळाची जागा घेतली साखरेनं आणि तांदूळ-गहू-मूग आदी धान्यांची जागा घेतली मैद्यानं. मैदा व साखरेमुळे पदार्थ बनवणं सोपं झालं. ते अधिक आकर्षक दिसू लागले आणि खाताना तर असे खुसखुशीत लागत की जीभ एकदम तृप्त. मात्र चार इंची जीभ ही पाच फुटी देहाला नेहमीच अडचणीत आणते, तसंच इथेही घडलं. समाजातील ज्या सर्वोच्च स्तरातील धनिक लोकांना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साखर व मैदा परवडत होता, त्यांच्यामध्येच मधुमेह-हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्व संबंधित विकृती आदी आजार दिसू लागले. हे आजार श्रीमंतांचे आहेत, असं म्हणणा-या मध्यम व कनिष्ठ वर्गाकडेही मागच्या तीन-चार दशकांमध्ये थोडा पैसा वाढला आणि त्यांचंसुद्धा साखर व मैद्याचं सेवन वाढलं आणि साहजिकच दिवाळी फराळसुद्धा साखर आणि मैद्यापासून बनू लागला. मागील तीन-चार दशकांमध्ये आपल्या म्हणजे समाजातल्या मध्यम व निम्न स्तरातील घरांमध्ये शिरलेल्या मधुमेह-हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्व आदी विकारांमागे मैदा व साखर हे एक महत्त्वाचं कारण आहे, असं अनेक संशोधक छातीठोकपणे सांगत आहेत. आता बोला? त्यात पुन्हा आपण मागील काही वर्षामध्ये माव्याचे गोड पदार्थ बनवू लागलो आहोत. जो मावा चारपाचशे जोरबैठका मारणा-यांनी खावा, ही अपेक्षा असते. मग इतका जड पदार्थ असलेला मावा घरबैठया लोकांना कसा काय पचणार? जरी पचला तरी तो मधुमेह-हृदयरोग-स्थूलत्व आदी रोगांना आमंत्रण देणारच.

महत्त्वाचं म्हणजे वर सांगितलेल्या दिवाळीआधीचे काबाडकष्ट, केवळ थंडीमध्ये अन्नाची उपलब्धता, ग्रीष्म-वर्षामध्ये अन्नाचं दुíभक्ष आदी गोष्टी एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला लागू होतात का? अन्नाचा सुकाळ नाही, अशी परिस्थिती आपल्यावर येणार आहे का? अन्नाशिवाय राहावं लागणार नसेल तर कशाला हवा एवढा पौष्टिक आहार? नेहमीच मुबलक ऊर्जायुक्त अन्न सेवन करणा-या आपल्याला कशाला हवाय अतिऊर्जायुक्त आहार? सदासर्वदा सहज अन्न उपलब्ध असणा-या तुम्हा-आम्हाला कशाला हवा आहे, शरीरामध्ये चरबीचा साठा आहे का? अन्नाचं दुíभक्ष होणार आहे का? मग एवढया अतिमात्रेमध्ये-इतक्या अधिक ऊर्जेने ठासून भरलेला असा पौष्टिक आहार काय करेल? निश्चितच आजारांना आमंत्रण देईल. नव्हे देत आहेच! त्यामुळे मैदा-साखर या अनारोग्यकर पदार्थानी बनवलेल्या खाद्यपदार्थाची आपल्याला गरज आहे का, याचा विचार गंभीरतेने करण्याची वेळ आली आहे. एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला एवढया पौष्टिक आहाराची गरज नाही हे समजून या दिवाळी फराळामध्ये बदल व्हायला हवा. हल्ली फराळ बनवणं हे शहरी रहाटगाडयामध्ये कितपत शक्य होतं व किती घरांमध्ये फराळ बनतो, हा तसा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. तरीही आरोग्याला पोषक असा दिवाळी फराळ बनवायचा तर तो मैद्याशिवाय बनला पाहिजे. मैद्याऐवजी तांदूळ, नाचणी, गहू, मूग आदी धान्यांचा वापर करा. साखर तर अजिबात नको, त्याऐवजी अर्थातच गुळाचा वापर करा. होता होईतो तळलेले पदार्थसुद्धा नको आणि महत्त्वाचं म्हणजे हा फराळ कष्ट-परिश्रम करणा-यांसाठी आहे, हे विसरू नका. मुळात परिश्रम नाहीच, व्यायाम केलाच तर तो एसी जिममध्ये जाऊन, घाम न काढता केलेला व्यायाम कसा हो? व्यायाम नाहीच. तर भरपूर चाला. दिवसाला निदान ५००० पावलं तरी चाललं पाहिजे. तुमच्यातले अनेक जण दिवसाला एक००० पावलंसुद्धा चालत नसतील. त्यांनी कशाला खावा पौष्टिक दिवाळी फराळ? यानंतरही तुम्हाला भरपूर प्रमाणात दिवाळी फराळ खायचा असेलच तर घरात येऊ घातलेल्या आगंतुक आजारांची तयारी आत्तापासून सुरू करा. काय?

Read More »

ऋतूबदलानुसार अन्नसेवन

आपल्याला जर निरोगी राहायचं असेल, तर अन्नाचं सेवन करताना, ऋतू व त्या-त्या ऋतूतील हवामानाचा अंदाज हा घ्यायलाच हवा.
आपल्याला जर निरोगी राहायचं असेल, तर अन्नाचं सेवन करताना, ऋतू व त्या-त्या ऋतूतील हवामानाचा अंदाज हा घ्यायलाच हवा. सध्या ऑक्टोबर महिना म्हणजेच ऋतूनुसार शरद ऋतू सुरू आहे. या ऋतूत सूर्य अधिक प्रकाशमान होऊ लागतो, शरीरातील दोषांमध्ये (वात, पित्त, कफ) होणारे बदल स्पष्ट होऊ लागतात.

ऑक्टोबर महिना म्हणजेच शरद ऋतूच्या काळात शरीरातील पित्त बाह्य उष्णतेने वाढू लागतं. या दिवसांदरम्यान नवरात्र हा सण येतो. नवरात्रीचे उपवास करण्याची प्रथा ही तत्त्वाला धरून आहे. हे उपवास केल्याने शरीर नवीन ऋतूसाठी तयार होतं व शरीरातील आमाचं पाचन होतं. तसंच नवरात्रींचं शीतल चांदणं नैसर्गिकरीत्या पित्तशमनाचं कार्य करतं.

विशेषत- या कालावधीत शरीरात नैसर्गिकरीत्या वाढलेल्या पित्ताचं शमन करण्यासाठी व शरीरातील बल वाढवण्यासाठी येते ती कोजागरी पौर्णिमा. शरद ऋतूतील गुणधर्मानुसार दिवसा तप्त, तर रात्री शीतल असं वातावरण असतं. खरं तर, हा निसर्गानंच साधलेला समतोल आहे. या तत्त्वावर आधारलेली अशी ही कोजागरी पौर्णिमा. या पौर्णिमेला रात्रीच्या चंद्र प्रकाशात साखर, बदाम, चारोळी, केशर, वेलची-जायफळ पूड यांची भरड आटवलेल्या दुधात मिसळून ते दूध पिण्याची पद्धत आहे. कारण दूध आणि रात्रीची (चंद्र प्रकाशाची) शीतलता ही दिवसभरातील उष्णतेने शरीरात निर्माण झालेल्या पित्ताचं शमन करते. अशा तऱ्हेने अश्विन महिन्यातील पित्त शमनाचं कार्य दसरा आणि कोजागरी या सणांद्वारे होतं.

आता आपण 'ऑक्टोबर हिट' सुसह्य होण्याकरिता आपल्या दररोजच्या खाण्यात कोणकोणत्या प्रकारच्या आहाराचा समावेश करता येईल, ते पाहूया. सकाळी शक्यतो वेळेवरच उठून प्रातर्विधी उरकून तांब्याचा कलश वा जारमध्ये ठेवलेलं मध्यम गरम पाणी, नित्यानं एक मध्यम पेलाभर प्यावं. ज्यांचा चहाशिवाय दिवस सुरूच होत नाही, अशांनी चहा उकळताना त्यात सुंठ पावडर, धणे पावडर आणि बडीशेप पावडर प्रत्येकी पाव चमचा घालावी. असा चहा प्यायल्याने कफ व पित्ताचं शमन होतं. सकाळी रिकाम्या पोटी नुसताच चहा घेऊ नये, त्यासोबत बिस्किटांऐवजी राजगिरा चिक्की बिस्किटं, मेथीचा खाकरा असे हलके पदार्थ जरूर खावेत. साधारण अध्र्या-पाऊण तासानंतर फिटनेससाठी घरच्या घरी करता येतील अशी सोपी योगासनं, सांधे (शरीर) मोकळे करणारे व्यायाम करावेत.

सकाळच्या घाईत थोडा वेळ असल्यास भाजलेल्या मुगाच्या डाळीत गोडाच्या प्रमाणानुसार गूळ व थोडं साजूक तूप घालून बनवलेली खीर व त्यासोबत एखादं केळं खाल्लं की झाली तुमची सकाळची पौष्टिक न्याहारी. कधी मूगडाळ व तांदूळ यांच्या मिश्रणाचे डोसे, लापशी रव्याचा शिरा किंवा पातळ लापशी, अगदीच न जमल्यास दूध आणि पोळी (गव्हाची चपाती) खाऊनच घराबाहेर पडावं.

सकाळीच अगदी तिखट, मसालेदार न्याहारी घेऊ नये. जेणेकरून पित्ताशी संबंधित त्रास उद्भवणार नाहीत. घराबाहेर पडण्यापूर्वी गरजेनुसार लागणारी पाण्याची बाटली (ओझं म्हणून न टाळता), ग्लूकॉन-डी, इलेक्ट्रॉल पावडरची पाकिटं न चुकता सोबत असावीत. उन्हामुळे, थकव्यामुळे, उपाशी राहिल्यामुळे चक्कर आल्यास इलेक्ट्रॉल पावडर जिभेवर टाकल्यास चक्कर थांबते. अंगाला थोडे सैल, फिक्या रंगाचे कपडे घालावेत. यामुळे सूर्याची उष्णता व हवेतील उष्णता शरीरात कमी प्रमाणात खेचली जाते. प्रवासातील चालत जाण्याच्या वेळी छत्री किंवा टोपीचा वापर न लाजता करावा. आहाराविषयी कितीही पथ्यं पाळायची म्हटलं, तरी सर्वसामान्यपणे सगळ्यांचा कल हा रुचकर, चमचमीत खाण्याकडेच असतो. म्हणूनच तुम्हाला घरीच बनवता येतील, अशा काही 'रुचकर परंतु पथ्यकर' अशा पाककृती देत आहे. नक्कीच करून बघा. पुढील लेखात अजून काही आरोग्यवर्धक पाककृती पाहूया.


मुगाची हिरवी धिरडी
साहित्य - तीन वाटया मोड आलेले मूग, तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा चमचा ठेचलेलं आलं, एक चमचा बारीक चिरलेला लसूण, दोन वाटया घट्ट दही, एक वाटी ताक, अर्धा चमचा हिंग, एक ते दोन चमचे साखर, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ.

कृती - मूग, कोथिंबीर, दही, हिंग, आलं-लसूण, मिरच्या, साखर व मीठ यांचं एकत्रित मिश्रण वाटून घ्यावं. एका पातेल्यात हे मिश्रण घेऊन त्यात ताक घालावं (मिश्रण घट्टसरच राहायला हवं). एक मिनिटं हे मिश्रण झाकून ठेवावं. डोशाच्या तव्यावर एक चमचा तेल पसरावं, त्यात साधारण थालीपीठाच्या आकाराएवढं हे मिश्रण पसरावं. ही धिरडी डोशाच्या आकाराइतकी पसरू नयेत, कारण उलटताना ती तुटू शकतात. दोन्हंी बाजूंनी खरपूस भाजून घ्यावीत. ही न्याहारीत वा डब्यातही नेऊ शकता.


आरोग्यवर्धक मिक्स फ्रूट सलाड
साहित्य – पपईचे तुकडे, चिकूचे तुकडे, आंब्याचे तुकडे, सफरचंदाचे तुकडे, पेअरचे तुकडे, डाळिंबाचे दाणे, (काही फळे ऋतूनुसार उपलब्ध असल्यास) प्रत्येकी अर्धी वाटी, एक वाटी दही (घट्ट टांगलेलं) लहान मुलं वा ज्येष्ठ नागरिकांना देताना दह्याऐवजी दुधाची घट्ट साय वापरावी, तीन ते चार चमचे सुकामेव्याचं मिश्रण (काजू, बेदाणे, काळ्या मनुका, अक्रोडाचे तुकडे), दोन ते तीन चमचे दुधाचा मसाला.

कृती - सर्व फळांचे तुकडे एकत्र करावेत. एका बाऊलमध्ये दही किंवा दुधाची घट्ट साय व दुधाचा मसाला यांचं मिश्रण एकजीव करावं. खायला देताना, वाटीत वा बाऊलमध्ये आधी दही किंवा दुधाची घट्ट साय व दुधाचा मसाला यांच्या मिश्रणाचा थर, त्यावर एकत्र केलेले फळांचे तुकडे आणि वरून सुकामेव्याच्या तुकडय़ांचा थर द्यावा. हे मोठं वाटीभर सलाडही सकाळची उत्तम न्याहारी आहे.

Read More »

उटण्याचं अभ्यंगस्नान

दिवाळी.. सण चैतन्याचा, लक्ष-लक्ष दिव्यांच्या साक्षीने अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा, उत्तुंग आकाशाशी नाते साधत तेजाची लकेर उमटवू पाहणा-या आतषबाजीचा, गोडधोडाच्या मेजवानीचा, उत्सवाच्या उत्साही रंगाचा आणि तनासोबत मनामनावरही सुगंधाचा दरवळ पसरवणारा! प्रथा, परंपरेनुसार दिवाळीची पहिली अंघोळ सुगंधी उटण्याशिवाय पूर्ण होत नाही. मात्र उटण्याचा वापर ही केवळ प्रथा नसून त्यामागे शास्त्रीय कारणही दडलं आहे. काय आहे ते कारण? जाणून घेऊया, उटण्याच्या रूपातील याच सुगंधाबाबत..

भारतातील प्रत्येक सण वैशिष्टयपूर्ण आहे. प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. याच परंपरेनुसार दिवाळीच्या सणात अभ्यंगस्नान आणि या स्नानासाठी वापरल्या जाणा-या उटण्याला विशेष महत्त्व आहे. दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात आणि थंडी म्हटली की त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी आयुर्वेदिक उटणं उपयुक्त ठरतं. उटण्याच्या वापरामुळे मृत त्वचा नष्ट होऊन त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्वचा कोमल आणि सुगंधी होते. त्यामुळेच हे उटणं परंपरा आणि विज्ञानाशीही नातं साधतं. चेहरा आणि त्वचेबाबत जागरूक असलेली आजकालची तरुणपिढी उटणं लावायला कंटाळा करते. प्रथा-परंपरेनुसार चालत आलेलं आणि दिवाळीतील अभ्यंगस्नानासाठी महत्त्वपूर्ण असलेलं उटणं पुढील काही वर्षात भूतकाळात विलीन तर होणार नाही ना?

उटणं बनवताना कपूर कचरी, नागरमोथा, वाळा, आंबाहळद, बावची, कचुरा वडा, गुलाबफूल, दवणा, मारवा, चंदन पावडर यांचे सम प्रमाणात मिश्रण करावे आणि ते एकरूप झालं की त्याचं सुगंधी उटणं तयार होतं.

वाळा अतिशय थंड असल्यामुळे याचा उपयोग या दिवसांत करण्यात येतो. आंबेहळदीमुळे त्वचा मुलायम, नाजूक होते, चेह-यावर लावल्यास तजेलपणा जाणवतो. इतर आयुर्वेदिक मिश्रणाने त्वचेवर इतर कोणताही उपाय होत नाही; परंतु वापरल्याने प्रसन्न वाटतं. उटण्यातील कपूर कचरी, नागरमोथा, दवणा, मारवा अशा बहुतेक औषधी या सुगंधी आहेत त्यामुळेच उटण्याचा एक विशिष्ट सुवास दरवळत असतो.

काही महिला उटणं दररोज लावतात. साबणाचा वापरही करत नाहीत. चंदनाचा उपयोग त्वचेला प्रसन्न ठेवण्यासाठी करण्यात येतो. उटण्याच्या मिश्रणाचा साबणही बाजारात खास दिवाळीसाठी उपलब्ध आहे.

हिंदू संस्कृतीप्रमाणे अभ्यंगस्नानाच्या वेळी सुगंधी उटणं लावून दिवाळीच्या पहिल्या दिवशी अंघोळ करणे म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवसाची एक प्रसन्न सुरुवात झाल्यासारखे वाटते.

Read More »

ऑक्टोबर हिट तरी राहा फिट

२० ऑक्टोबरचा रविवार या वर्षीचा 'अतिउष्ण दिवस' म्हणून घोषित केला गेला. या हिटचे परिणाम शरीरावरही होऊ लागले आहेत. त्यामुळे रोज प्रवास करणा-यांनी, कामासाठी बाहेर फिरणा-यांनी, इतकंच नव्हे तर घरात राहणा-या महिला, लहान मुलं यांचीदेखील या उष्णतेमुळे शारीरिक क्षमता कमी होऊन शरीराला थकवा येतो आहे. अशा या बदलत्या वातावरणात स्वत:ची काळजी घेणं जरुरीचं झालं आहे.

'चुभती, जलती, गरमी का मोसम आया..', 'अरे किती किती ही उष्णता..', 'दुपारी चालता चालता डोळ्यांसमोर अचानक अंधारी आली आणि तिथेच खाली पडले..', 'दुपारी १२ नंतरच काय पण सकाळी १० नंतरही घराबाहेर पडायला नको..' अशी वाक्यं आता आपल्या कानावर पडायला लागली आहेत. येणाऱ्या थंडीपूर्वी समोरं जावं लागतंय ते ऑक्टोबर हिटला. ऑक्टोबर हिटचा त्रास होण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर संपत आला तरी अंगाची लाही लाही काही कमी झालेली नाही. गेल्या काही दिवसांतच तापमानात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.

धावत जाऊन ट्रेन पकडायची, रिक्षा, बससाठी तासन् तास तापत्या उन्हात उभं राहायचं, शिवाय कामासाठी होणारी धावपळ असतेच. मात्र ऑक्टोबरमध्ये या गोष्टी नकोशा वाटू लागतात. पावसामुळे थंडगार झालेली जमीन तापमानात झालेल्या वाढीमुळे लगेच तापते. बाहेर फिरताना याचा त्रास मोठया प्रमाणात जाणवतो. त्यामध्ये दिवाळीची तयारी सुरू असते. खरेदी करण्यासाठी सगळेच बाहेर पडतात. गर्दीच्या ठिकाणी अशा वातावरणात घुसमट होते, घामाच्या धारा वाहू लागतात. अतिप्रमाणात घाम वाहून गेल्यामुळे चक्कर येण्याचं प्रमाण वाढतं. आपण वातावरण काही बदलू शकत नाही. परंतु या वातावरणात आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता असते. रखरखत्या उन्हामुळे, अचानक वाढलेल्या तापमानामुळे शरीरातील ग्लुकोज, व्हिटॅमिन कमी होतं. शिवाय अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे आपल्या शरीराला त्या वातावरणाशी जुळवून घ्यायलाही थोडा त्रास होतो. त्यामुळे या दिवसांत आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. पण हो त्याला सामोरं जाऊन, स्वत:चं आरोग्य जपायला नक्कीच काळजी घेऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आपण जशी काळजी घेतो त्याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये काळजी घेणे आवश्यक असते.

काय कराल
>> बाहेर जाताना किंवा घरातही शक्यतो घट्ट कपडे घालणं टाळावं. सैल, वजनाने आणि रंगाने हलके असणाऱ्या कपडय़ांचा वापर जास्त करावा.

>> उन्हामध्ये शरीरातील उष्णताही वाढते. घामाच्या धारा वाहू लागतात. अशा वेळी ग्लुकॉन डी, इलेक्ट्रोल पावडरचं पाणी सोबत ठेवावं. त्यामुळे शरीरात थंडावा राहण्यास मदत होईल.

>> प्रखर उन्हातून प्रवास करताना चक्कर येण्याची शक्यता असते, त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन जी औषधे तत्काळ उपयोगी पडतील ती नेहमी सोबत ठेवावीत. शरीरातील शर्करेचं प्रमाण कमी होता कामा नये यासाठीच औषध नाही तर साखरेची पुडी किंवा लिमलेटच्या गोळ्यांचं पाकिटसुद्धा सोबत ठेवावं.

>> सकाळी अंघोळ करताना जास्त गरम किंवा अगदीच थंड पाण्याने आंघोळ करू नये. त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. दिवसभर बाहेर फिरल्यामुळे घामाने शरीर चिकट होतं. त्यामुळे या दिवसांत रात्री पुन्हा अंघोळ करावी. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि दिवसभराचा ताण कमी होईल.

>> अशा उन्हात स्कीनची काळजी जास्त प्रमाणात घ्यावी. एसपीएफ असलेल्या क्रीम वापराव्यात. ज्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण होईल.

>> गाडी पार्क करताना ती सावली असेल अशा ठिकाणी पार्क करावी. त्यामध्ये असलेलं इंजिन आणि गाडीचा रंग भडक असेल तर त्यामुळे ती गाडी पटकन तापते. त्यामुळे प्रवास करताना त्याचा त्रास होतो. आणि जर गाडी तापलीच असेल तर त्या गाडीत दमट वातावरणाची निर्मिती झाल्यामुळे अशा गाडीतून लहान मुलांना बाहेर नेणं टाळावं.

Read More »

जाणूया आहारप्रणाली..

'अन्नदाता (शेतकरी) आणि अन्नपूर्णा (गृहिणी) सुखी भव!' असं आपल्या भारतीय परंपरेत म्हणण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. परंतु या दोघांच्याही कृपेनं आपल्याला मिळणा-याअन्नाचा आपण किती आदर करतो आणि त्याचा आपल्याला किती फायदा करून घेतो, याचं विचारमंथन करणं ही आजच्या काळात उद्भवलेली एक अत्यावश्यक गरज आहे. म्हणूनच जीवनशैली आणि आहाराची सांगड सोप्या आणि आरोग्यदायी पद्धतीनं कशी घालता येते, ते या सदरातून जाणून घेऊया..
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे दिवसभरात खायला सोपं आणि शक्य होत असेल तेव्हा खाणं, अशी आहाराची व्याख्या करावी लागेल. हे विधान बहुतांशी जरी खरं असलं, तरी आपल्याला माहीतच आहे, की मराठी वा इंग्रजी महिने बारा असले, तरी ऋतू केवळ सहाच आहेत. त्यानुसार प्रत्येक ऋतूत आपल्या अवती-भवतीच्या वातावरणात होणारा बदल हा अपरिहार्य असतो, ज्याचा मानवी शरीरावरही निश्चितच परिणाम होत असतो. या प्रत्येक ऋतूतील बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना, तसंच सर्वत्र प्रचंड प्रमाणात वाढलेल्या प्रदूषणात तग धरून सुदृढ आरोग्य टिकवायचं असेल, तर त्या-त्या ऋतुमानानुसार आहाराचंही नियोजन करणं अत्यावश्यक आहे. ऋतुमानानुसार आहार घेण्यासाठी आहारशास्त्र व आयुर्वेदशास्त्राने काही नियम, पथ्यं ठरवून दिली आहेत. ही आहारप्रणाली आणि त्याच्या पद्धती सर्वसमावेशकतेनं माहीत व्हाव्यात, यासाठी निसर्गानेच पूर्वपरंपरागत सणांचं प्रयोजन केलेलं आहे.

हल्ली मोठया प्रमाणावर शाकाहाराचा प्रचार व प्रसार सर्वत्रच होऊ लागला आहे. शाकाहारही मांसाहाराइतकाच ताकदीचा असू शकतो, हे पटवून देणं हाच याचा हेतू. हाच शाकाहार योग्य वेळी, संतुलित प्रमाणात घेतला तर तुम्ही चिरकाल आरोग्यदायी बनू शकता. यासाठी आपणच आपल्या खाण्या-पिण्याच्या वेळा जुळवून शक्य तितका पोषक आहार घेतला पाहिजे.

तुम्ही कितीही तणावजन्य मानसिकतेत, कितीही घाईगडबडीत असाल, तरीही सकाळी घराबाहेर पडताना, न काही खाता-पिता कधीही पडू नये. न्याहारीसाठी काहीच बनवायला मिळत नसेल वा निघण्याच्या घाईमुळे खायला जमत नसेल तर किमान दुधात पोहे (भाजलेले जाडे पोहे) घालून खावेत. हे बनवण्यासाठी वेळही लागत नाही आणि गॅसही खर्च होत नाही. सकाळच्या धावपळीत केल्या जाणाऱ्या न्याहारीसाठी घरामध्ये कायम फळ असणं केव्हाही सोयीचं. म्हणजे ऑफिससाठी तयार होताना, एखादं केळं, सफरचंद आणि एक पेला दूध प्यायलं, की दुपारच्या जेवणापर्यंतचा प्रश्न मिटला म्हणून समजा. मात्र, पोळी-भाजीचा डबा घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नये. सायंकाळच्या भुकेसाठीही आपल्यासोबत एखादं सफरचंद, राजगि-याची चिक्की, खाकरा (गुजराती खाद्यपदार्थ) असे पौष्टिक, डाएटसाठीही चांगले आणि सहजपणे कुठेही खाता येण्याजोगे पदार्थ ठेवावेत.

कधीही जास्त तास उपाशी राहू नये. त्यामुळे शरीरात पित्ताचा संचय होऊन, भुकेच्या वेळी शरीरात प्रज्वलित झालेल्या अग्नीमध्ये वेळेवर अन्न न पडल्यास (पोटात भुकेने कावळे ओरडत असताना न खाणं) हे पित्त उग्ररूप धारण करून शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचून त्रासदायक ठरतं. प्रसंगी रोगकारक स्थितीही उद्भवते. आहाराच्या अयोग्य सेवनामुळे आम्लपित्तासारखी जगभर भेडसावणारी स्थिती शरीरात ठाण मांडून बसते. ज्यांना शक्य आहे, त्यांनी शरीराला संतुलित, चौरस आहार मिळेल अशा पूर्णान्नाचा डबा न्यावा. अधूनमधून वा सायंकाळी काहीतरी अरबट-चरबट खाणं तर टाळावंच, शिवाय हळूहळू चहा पिणंही कमी करावं आणि नंतर सोडावं. रात्रीच्या जेवणात तसंच एरव्हीही जास्त अतिमसालेदार वा पचायला जड अशा पदार्थाचा समावेश करू नये. जास्तीत जास्त सौम्य, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित, आनंदी ठेवणारा आहार घ्यावा.

त्याचप्रमाणे कुठेही बाहेर जाताना न विसरता स्वत:सोबत कोमट पाण्याची बाटली ठेवावी व घरी असतानाही फ्रीजचं थंडगार पाणी (जे तात्पुरता गारवा देऊन, शरीराचं तापमान वाढवतं) पिण्याऐवजी, कोमट पाणीच प्यावं. भूक असेल तितकंच खावं. प्रत्येक घास काटेकोरपणे चावून मगच गिळावा, म्हणजे अन्नात लाळ चांगल्या प्रकारे मिसळते. घरातल्या गृहिणीनं, आईनं अत्यंत प्रेमानं, कौटुंबिक आरोग्याच्या हिताचा विचार करूनच बनवलेल्या प्रत्येक पदार्थाचा आदर करावा. त्यांना नावं न ठेवता 'अन्न हे पूर्णब्रह्म..' असं समजूनच ते पदार्थ जसे झाले असतील, तसे आनंदाने स्वीकारावेत.

Read More »

ब्रेन स्ट्रोकची अदृश्य लक्षणं

आपण कित्येकदा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकतो. पण या आजाराचं मूळ आपल्या जीवनशैलीत आहे याची खूप कमी जणांना माहिती आहे. तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक असून दिवसेंदिवस वाढत जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. अशा या ब्रेन स्ट्रोकविषयीची माहिती जाणून घेऊया.
बदलती जीवनशैली, जंक फूडचं अतिरिक्त सेवन यामुळे तरुणांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत चाललं आहे. दिवसेंदिवस वाढणारं हे प्रमाण तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकची वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणानुसार सिद्ध झालं आहे. स्ट्रोकपूर्वी जी काही लक्षणं दिसतात ती कित्येकदा आपल्याला कळतच नाहीत. साहजिकच त्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. परिणामी मृत्यूही ओढवतो. एका सर्वेक्षणानुसार जगामध्ये दरवर्षी दोन कोटी लोकांना ब्रेन स्ट्रोक होतो. त्यात साधारणत: ५० लाख लोकांचा मृत्यू होतो. कित्येक लोकांना अपंगत्व येतं. दर दिवशी तीन ते चार लोकांना ब्रेन स्ट्रोकची लागण होते. याकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवावर बेततं. भारतीय लोक या स्ट्रोकविषयी आणि मेंदूमधील बिघाडाविषयी अनभिज्ञ असल्याचं सत्यही या सर्वेक्षणातून उघड झालं आहे. इतकंच नव्हे तर ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील नागरिकांना स्ट्रोकबाबत माहिती नसल्याची बाब उघड झाली आहे. अशा या ब्रेन स्ट्रोकची आपण माहिती करून घेऊया.

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?
मेंदूला पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा न मिळाल्यामुळे मेंदूच्या पेशी मृत होतात. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी फाटली असता हा त्रास उद्भवू शकतो. यामुळे कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणं आवश्यक आहे. याबाबत बहुसंख्य लोकांना माहिती नसते. चार तासांच्या आत विशिष्ट गुठळी कमी करण्याकरिता उपाय केले गेले नाहीत तर मृत्यू ओढवू शकतो.

बंगळूरुमधील ६८ टक्के लोकांना तर मुंबईतील ५८ टक्के लोकांना स्ट्रोकबाबत माहिती नाही. तर दिल्ली आणि कोलकात्यामधील नागरिकांना याबाबत माहिती नसल्याची बाब सर्वेक्षणात उघड झाली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळूरु, कोलकाता या शहरांतील २५-५० वयोगटांतील नागरिकांची सर्वेक्षणाकरिता मदत घेण्यात आली. स्ट्रोक ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. स्ट्रोकची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि स्ट्रोक झाल्यावर केली जाणारी तत्काळ उपाययोजना याविषयी जनजागृतीचा अभाव असल्याचे मत इंडियन स्ट्रोक असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. शिरीष हस्तक यांनी सांगितलं. जागतिक आकडेवारीनुसार, प्रतिवर्षी जगात २ कोटी लोकांना स्ट्रोकची बाधा होते. भारतात हे प्रमाण हळुवारपणे वाढत आहे. मलेरिया, क्षयरोग, एचआयव्ही-एड्सच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे. जीवनशैलीत बदल आणि थोडा व्यायाम करून या दोन्हींवर नियंत्रण मिळवता येतं.

लक्षणं
> डोळ्यांपुढे अंधारी येणं

> चालताना अडखळणं अथवा शरीराचं संतुलन बिघडणं

> बोलताना अडखळणं

> समरणशक्तीवर परिणाम होणं

> बधिरता येणं

> अशक्तपणा येणं

> धुरकट किंवा दुहेरी प्रतिमा दिसणं

> अचानक डोकेदुखी उद्भवणं

लहान स्वरूपाच्या स्ट्रोकमध्ये मात्र अशी कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र तरीही मेंदूच्या पेशी निकामी करण्याचं काम होत असतं.

प्रतिबंधक उपाय
ब्रेन स्ट्रोकवर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. ते बदल कोणते ते पुढीलप्रमाणे -

>> आपल्याला असणाऱ्या उच्च रक्तदाबाची आपल्याला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तसंच त्यावर संयम कसा ठेवावा याचीही तितकीच माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून पटकन उपचार करता येऊ शकतो.

>> धूम्रपान टाळावं

>> कोलेस्टेरॉल वाढवणारे चरबीयुक्त पदार्थ टाळावेत

>> विटॅमिन बी असलेले पदार्थ ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव करू शकतात

>> आहारात टोमॅटोचा समावेश करावा. टोमॅटोत अँटिऑक्सिडंट असल्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्यापासून बचाव होतो

>> अ‍ॅरोबिकसारखे व्यायाम नियमित करावेत

>> मानसिक ताणावर नियंत्रण ठेवावं

कोणाला होऊ शकतो?
0 ५५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कोणालाही

0 विशेषत: पुरुषांना

0 आनुवंशिकता असल्यास

0 उच्च रक्तदाब असलेल्यांना

0 शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असलेल्यांना

0 धूम्रपान करणा-यांना

0 मधुमेहाचे रुग्ण

0 माइल्ड स्ट्रोक अ‍ॅटॅक आलेले

0 नैराश्य आलेले किंवा मानसिक तणावाखाली असणारे

0 अल्कोहोलचं अतिरिक्त सेवन करणारे

Read More »

काळजी घेणारे बॅक्टेरिया..

आपल्या भवताली रोग पसरवणारे अनेक जीवजंतू असतात आणि या रोगजंतूच्या संपर्कात येणारी तान्ही बाळं आणि शिशू त्यांना बळी पडण्याची शक्यता सर्वात जास्त असते. मोठया माणसांची प्रतिकारशक्ती विकसित झालेली असल्याने अशा रोगजंतूशी त्यांना लढा देता येतो, मात्र नवजात अर्भकांसहीत लहान मुलांची रोग प्रतिकारशक्ती अपरिपक्व आणि विकसनशील असल्यामुळे ते आजारी पडण्याचा धोका असतो. अशा वेळी त्यांच्या मदतीला येतात ते चांगले बॅक्टेरिया जे त्यांना त्यांच्या आईकडून मिळतात आणि याला कारण असतं प्रोबायोटिक्स.

अनेकदा तुम्ही नवजात शिशूंना काचेच्या पेटीत ठेवलेलं पाहिलं असेल. त्यांची प्रतिकारशक्ती मोठया व्यक्तीपेक्षा साहजिकच कमी असल्याने अर्भकं सहजगत्या एखाद्या संसर्गजन्य रोगाला बळी पडू शकतात. परंतु तान्ह्या बाळालादेखील रोगजंतूपासून बचाव करण्यासाठी मदत करणारे बॅक्टेरिया असतात. जन्मनाळेद्वारे नवजात अर्भकास त्याच्या मातेकडून चांगले बॅक्टेरिया प्राप्त होतात. हे चांगले बॅक्टेरिया आईच्या दुधातदेखील असतात आणि विपुल प्रमाणात स्तनपान करविण्यात आलेल्या अर्भकांमध्ये या चांगल्या बॅक्टेरियांचे पुरेसे प्रमाण असते. हे चांगले बॅक्टेरिया आपल्या शरीरात सैनिकासारखे कार्य करत असतात जे आपल्या शरीराची सुरक्षाप्रणाली तत्परतेने काम करेल, असं पाहतात. तिच्या क्षमतेत वाढ करतात. ते हानिकारक मायक्रोऑर्गेनिझम्सना आपल्या शरीरात प्रत्यक्ष प्रवेश करण्यापूर्वीच मारून टाकतात.

प्रोबायोटिक्स म्हणजे शरीराचा बचाव करणा-या गोष्टींचा अंर्तभाव करून घेणारी सुरक्षा प्रणाली. यामुळे चांगले बॅक्टेरिया आपल्या लहान आतडयात फोफावतात. सामान्यपणे खाद्यान्नामध्ये मिसळण्यात येणा-या प्रोबायोटिक्सचा प्रकार हा लहान आतडयात आढळणा-या चांगल्या बॅक्टेरियासारखा असतो. हे सुरक्षित असतात आणि संपूर्ण विश्वभरात याचे फायदे ओळखले जातात. स्तनपान करविण्यात येत असलेल्या नवजात अर्भकास हे महत्त्वपूर्ण प्रोबायोटिक्स आईच्या दुधातून प्राप्त होतात. म्हणून दररोज प्रोबायोटिक्स घेतल्याने आतडयातील चांगल्या बॅक्टेरियांची सघनता वाढते आणि प्रतिकारकशक्तीसाठी मदत होते.

जन्मापासून ते सहा वर्षापर्यंतचा काळ मुलांच्या सुरक्षा तंत्रास आकार देणा-या संधीचा काळ म्हणून ओळखला जातो. म्हणूनच अ‍ॅलर्जिक त्वचारोगांसारखी परिस्थिती असो किंवा डायरिया. संपूर्ण आयुष्यभरासाठी मुलांमध्ये सर्वागीण रोगप्रतिकारशक्तीची निर्मिती करण्यासाठी जगातील डॉक्टर्स प्रोबायोटिक्सवर त्यांच्या बचावात्मक फायद्यांसाठी विश्वास ठेवतात, असे कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमधील पीआयसीयू अँड पेडियाट्रिक कार्डियाक आयसीयू येथील नेनॉटॉलॉजी कन्सलटंट डॉ. विजय जोशी यांनी सांगितले.

मानवी शरीर हे करोडोहून जास्त मायक्रोस्कोपिक जंतूंचे घर आहे आणि ते अगदी जिभेपासून, केसांपासून ते आपल्या त्वचेपर्यंत आणि रक्तात आढळतात, हे वैद्यकीय संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ५०० पेक्षा अधिक विविध प्रकारचे बॅक्टेरिया जे आपल्या सखोल पाचन प्रणाली मार्गात राहतात ते आपल्या प्रकृतीसाठी फार आश्चर्यजनक कार्य करतात. हे चांगले बॅक्टेरिया लहान आतडयात राहतात आणि आपण खाल्लेल्या अन्नामधून आपल्या शरीरात प्रवेश करणा-या वाईट बॅक्टेरियाशीदेखील झुंज देतात. आतडयात राहणा-या चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियातील संतुलन आरोग्य आणि चांगल्या प्रकृतीच्या निश्चितीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

Read More »

बहुगुणी कोकम सरबत

इतर कोणत्याही कृत्रिमरीत्या थंडगार केलेल्या शीतपेयांपेक्षा कोकम सरबताचे गुण आणि फायदे निश्चितच जास्त आहेत. कोकम उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कोकणच्या वैभवातही भर पडेल.
आजकाल पित्तखडयांच्या ऑपरेशनसाठी किमान ६० ते ८९ हजार रुपये ऑपरेशन, हॉस्पिटलमधील वास्तव्य, औषधोपचार इत्यादींसाठी खर्च होतात. शरीरात नियमित पद्धतीने पित्त निर्माण होते आणि त्याचा चयापचय या शरीरांतर्गत व्यवहाराशी संबंध येतो. खाण्यापिण्याच्या नको त्या सवयी, तेलकट, मांसाहारी पदार्थ, मसालेदार पदार्थ, आपल्या कुवतीपेक्षा जास्त खाणे किंवा अनेक अनियमित पद्धतींचा वापर इत्यादी कारणांने पित्ताची अतिरिक्त निर्मिती होते. आनुवंशिकता असेल तर पित्तनिर्मितीस चालना मिळते. आमचा या व्याधीशी संबंध आल्याने आता त्याची विशेषत्वाने जाणीव झाली. परंतु याच पित्त विकारावर अतिशय गुणकारी असं औषधी फळ आहे ते म्हणजे कोकणातील रातांबा ऊर्फ कोकम.

नियमित कोकम सरबताचे प्राशन केल्यास पित्त विकार दूर होण्यास मदत होते. रातांब्यापासून बनवलेले कोकम सरबत हे गुणांनी आणि चवीनेही अतिशय मधुर असते. आता सुरू होणा-या उष्ण दिवसांमध्ये हे सरबत जरूर प्यावे. रातांब्याचे झाड बहुगुणी आहे, म्हणूनच कोकणी आहारात कोकमांच्या सोलांचा म्हणजे आमसुलांचा वापर होतो. तसंच कोकमाच्या आगळाचाही स्वयंपाकात वापर केला जातो. कोकमामुळे अंगात शीतलता आणि माधुर्य वाढून जळजळ, दाह कमी होतो. जगाच्या बाजारात हजारो कोटी रुपयांची कृत्रिम शीतपेयांची निरुपयोगी उत्पादनं खपतात.

कोकम सरबत हे अशा कृत्रिम शीतपेयांना योग्य प्रतिस्पर्धी ठरू शकते. कोकणात कोकमाचे उत्पादन वाढवल्यास त्याचा कोकण प्रांताला फायदा होईल. कोकणातील रातांबा या पिकाचे योग्य प्रकारे जर संवर्धन झाले तर जगाला ते वरदान ठरणार आहे. पित्त विकाराने ग्रस्त असणा-या रुग्णांसाठी कोकम आणि कोकमापासून बनवलेली उत्पादने फायदेशीर आहेत. रातांब्याची हिरवी फळे काठीने झोडून जमिनीवर पाडतात आणि ती कापून त्यात मीठ घालून वाळवतात. त्याऐवजी पिकलेली रातांबा फळे झाडावरच तयार झाली तर ती अधिक मौल्यवान ठरतील. दैनंदिन आहारात कोकम सोलांचा वापर हवा. कोकमाच्या

बियांपासून बनवलेल्या तेलाचाही वापर डोळ्यांची आणि तळपायांची जळजळ कमी करण्यासाठी होतो. पित्त विकाराचे नियंत्रण करण्याची शक्ती कोकमात आहे.

Read More »

स्वास्थ्यपूर्ण कोजागरी

कोजागरी पौर्णिमा म्हटलं की चंद्राचा उत्सव, चांदण्यांचा खेळ, चंद्रकिरणांचा मनमुराद आनंद लुटण्याचं पर्व. मानवाला नेहमीच निसर्गाचं आकर्षण वाटत आलं आहे. तो निसर्गाची जोपासना आणि पूजा पिढयान् पिढया करीत आला आहे. निसर्गातील एक आकर्षण म्हणजे चंद्र. सौंदर्य, शीतलता, प्रेमाचे प्रतीक म्हणून चंद्राचे आकर्षण सर्वाना नेहमीच असतं. कोजागरी पौर्णिमेनंतर आरोग्यातही शीतलता वाढली पाहिजे, असा आहार या काळात असला पाहिजे.

कोजागरी पौर्णिमेचे आगमन ऋतूत होतं. साधारणत: या काळात पावसाचा ऋतू संपलेला असतो. निसर्ग सारा बहरून आलेला असतो. सगळीकडे कसं स्वच्छ हिरवंगार असतं. आकाशही निरभ्र असतं, हवेतील धूलिकण कमी झाल्यामुळे चांदणंही स्वच्छ आणि टिपूर पडतं. कडाक्याच्या थंडीला अजून सुरुवात व्हायची असते; परंतु हवेत थोडा गारवा असतो. दिवसभराच्या उकाडयानंतर रात्रीची हवा छान आल्हाददायक वाटते. दिवसा ऑक्टोबर हीट इतकी जाणवते जणू छोटा उन्हाळाच. या शरदाच्या उन्हाच्या तडाख्याने शरीरात पित्ताचा प्रकोप होऊन पित्त वाढते, रक्त दूषित होतं. उष्णता, पित्त व रक्त यांचे विकार संभवतात. या वाढलेल्या पित्ताला म्हणजेच शरीरातील अग्निमहाभुताला कमी करण्यासाठी शरद ऋतूमध्ये निसर्गत:च चंद्र आपल्या पूर्ण शक्तीनुसार आपली शीतलता पृथ्वीवासीयांना प्रदान करीत असतो. तसेच आयुर्वेदानुसार पित्तशमन करण्यासाठी शीत गुणांची आवश्यकता असते. तसेच गोड, कडू, तुरट रस उपयुक्त असतात. विरेचन या शोधन पंचकर्म उपयोगानेही प्रकृपित झालेले पित्त बाहेर काढावे व दूषित झालेले रक्त रक्तमोक्षणा वाटे बाहेर काढावे, असा शास्त्रादेश आहे. म्हणूनच या काळात शारदीय पंचकर्म उत्सव म्हणून विरेचन व रक्तमोक्षण प्रकल्प राबवला जातो. याचा लाभ घेऊन उष्णता – पित्त- रक्त यांचे विकार कायमचे व मुळापासून कमी व्हावे म्हणून आपल्या पूर्वजांनी कोजागरी पौर्णिमेची परंपरा सुरू केली. व्रताचे नाव दिले, धार्मिकतेच्या चौकटीत बसवले, की आपोआप माणूस त्याचे पालन करतो हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय़ आहे.

रक्तातील उष्णतेचे शमन व्हावे, शरीरातील प्रकृपित पित्त शांत व्हावे, याकरिता या दिवशी दुग्धप्राशन करण्याचे योजून दिलेले आहे. म्हणून कोजागरीच्या रात्री मंद-मंद वा-यात, चंद्राच्या दिव्य शीतल किरणांत आटवलेले मसाल्यांनी सिद्ध, खडीसाखर घातलेले, गुलकंद घातलेले दूध घ्यावे. परंतु आजकाल कोजागरीच्या नावाखाली नाईट पार्टीज अरेंज केल्या जातात. त्यात भरघोस प्रमाणात तळीव पदार्थ, तिखट, मसालेदार पदार्थ असतात. सोबत फ्रुट्स सॅलड, मिल्कशेक्स, कोल्डड्रिंक असे चविष्ट पदार्थ आगीत तेल ओतायचं काम करीत असतात. म्हणजेच शरीरातील प्रफुल्लित पित्त, उष्णता कमी करण्याचे सोडून वरील पित्त वाढविणारे पदार्थ खाल्ले जातात. यामुळे फायदा होण्याएवजी नुकसानच होते.

बेपर्वाईने साजरा केलेला उत्सव व पौराणिक गोष्टी अशा या दोन टोकांमध्ये खरंच लॉजिकल, बुद्धीला पटेल, असं काही शास्त्रीय कोजागरीत असेल काय? तर ते नक्कीच आहे.. समाजाच्या स्वास्थ्याची आयुर्वेदाची तत्त्वांशी सांगड घालूनच पूर्वजांनी, प्राचीन ऋषीमुनींनी धार्मिक सण, रूढी, परंपरा स्थापल्या आहेत. असा हा चंद्रोत्सव पंधरवडयानंतर येणा-या दीपोत्सवाचे आरोग्यमय तेज घेऊन येतो. म्हणूनच या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून ही कोजागरीची सुंदर रात्र प्रेमाची माणसं आणि गारव्याच्या सोबतीने साजरी करूयात.

Read More »

रंगरंगोटी केसांची!

केसांना रंग लावणं ही आजकाल फॅशन नाही तर हेअर स्टायिलगमधला अत्यावश्यक प्रकार मानला जातो. केस छोटे असोत वा मोठे, रंग लावून त्यांचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र केसांवर रंग लावण्याआधी त्या उत्पादनाची आणि त्यामुळे होणा-या परिणामांची पूर्ण माहिती करून घेणं आवश्यक आहे.

स्त्रीसौंदर्याचा मुकूट म्हणजे केस. म्हणूनच केसांना अलंकाराचा दर्जा दिला जातो. लांबसडक केस सौंदर्यात भरच टाकतात. अशा सौंदर्यात भर टाकणा-या केसांची निगा राखण्यासाठी अनेक महिला नाना प्रकारची औषधं, शॅम्पू, महागातली तेलं वापरत असतात. केसांची देखभाल करण्यासाठी महिला खूप धडपड करत असतात. त्यातीलच एक प्रकार आहे तो म्हणजे केसांना रंग लावून आकर्षक बनवण्याचा. आकर्षक दिसत असले तरीही केसांना रंग केल्यावर केसांची अवस्था कशी होईल याचा विचार करून कित्येक महिला हेअर कलर लावायला घाबरतात. केसांना रंग लावल्यानंतर केस रूक्ष होऊन तुटतात, खराब होतात असा समज असतो. म्हणूनच केसांना रंग करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्सचा विचार केलात तर तुम्ही बिनधास्तपणे केस रंगवू शकता.

> रंगाची निवड करण्यापूर्वी तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग, त्वचा यांचा विचार करूनच स्वत:ला शोभेल असाच रंग निवडा.

> सुरुवातीला केसांच्या दोन बटांनाच रंग लावा. एक बट हलक्या तर दुसरी गडद रंगात रंगवावी. त्यानंतर जो रंग योग्य वाटतो, तोच रंग संपूर्ण केसांना लावावा.

> सामान्य रंगाच्या त्वचेला मध्यम ब्राऊन, लाल व तपकिरी, सोनेरी रंग छान दिसतो, तर काळ्या किंवा सावळ्या त्वचेला तपकिरी, सोनेरी आणि गडद चॉकलेटी रंग खुलून दिसतात.

> केसांना रंग लावल्यानंतर चेह-यावर हलकासा मेकअप करावा. म्हणजे रंगासोबत तुमचा चेहराही उजळेल.

> केस डॅमेज होण्याची किंवा तुटण्याची भीती वाटत असेल तर रंग लावण्यापूर्वी केस एकदा हेअर स्पेशालिस्टला दाखवून त्यांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

> खरं म्हणजे केस तुटणे अथवा दुभंगणे याबाबत केसांना लावलेले रंग पूर्णत: दोषी नसतात. यूवी किरणांचा परिणाम केसांवर होऊन केस दुभंगण्याची भीती अधिक असते.

> रंग लावल्यानंतर केस धुतले, की ते सुकवण्यासाठी अधिक तापलेल्या हेअर ड्रायरचा वापर करू नये. त्यामुळे केस जळून खराब होण्याची भीतीच अधिक असते. रंग लावल्यानंतर नैसर्गिक पद्धतीने केस सुकवावेत, जेणेकरून केसांचा रंग सुंदर दिसेल.

> निवडक शॅम्पू किंवा कंडिशनर लावल्याने केसांची दुर्दशा होणार नाही. सतत शॅम्पू बदलल्याने केसांवर परिणाम होतो. म्हणूनच नेहमी एकाच कंपनीचा शॅम्पू वापरा.

> केसांना रंग लावण्यापूर्वी अंडयाचा बलक केसांना लावून केसांची निगा ठेवू शकता. केस धुण्यापूर्वी केसांना अंडयाचा बलक लावून थोडा वेळ सुकू द्यावा. त्यानंतर केस धुवावेत. हा अंडयाचा बलक कंडीशनरप्रमाणे काम करून केसांना मुलायम करतो. यामुळे तुमच्या केसांचा रंग आणखी उठून दिसेलच शिवाय केसांना एक वेगळी चमक येईल. मुगाची डाळ वाटून तिची पेस्ट केसांना लावून केस धुतल्यास केस मुलायम होण्यास मदत होते.

> रंगवलेल्या केसांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. केस मुळातच रफ असतील तर रंग लावल्यानंतर तुम्हाला त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. मुख्य म्हणजे केसांचा यूवी किरण किंवा धुळीपासून बचाव करावा लागेल.

> केसांचा आणि भुवयांचा रंग एकमेकांपासून विरुद्ध असायला हवा. नैसर्गिक रंग लावणार असाल तर भुवयांचा आणि केसांचा रंग एकसमान होणार नाही याची काळजी घ्यावी.

> केसांच्या देखभालीसाठी केसांना नियमित तेल लावावे. आठवडयातून दोन वेळा केस धुवावेत.

> उन्हापासून केस सुरक्षित ठेवावेत. हंगामी उन्हाळ्यापेक्षा सहज येणा-या उन्हातील हानिकारक यूवी किरणांमुळे आपले केस शुष्क होण्याची शक्यता असते, यासाठी केसांचं उन्हापासून संरक्षण केलं पाहिजे.

> ब्युटीशियन्सच्या सल्ल्याने रंगाची निवड करावी. रंगामध्ये असणा-या अमोनियामुळे केस खराब होतात हे तर आपल्याला माहीतच आहे. म्हणूनच अमोनियारहित रंगांकडे आकर्षित होत असाल तर त्याबाबत आणखी माहिती मिळवा. अमोनियारहित रंगावर विश्वास असेल तर आणखी काळजी घ्यावी. कारण अमोनियारहित रंगही अमोनियाप्रमाणेच केसांसाठी हानिकारक आहेत. काही हेअर कलर उत्पादनांवर 'नो अमोनिया' किंवा 'अमोनिया फ्री' असं म्हटलं जातं. मात्र यामध्ये अमोनियाऐवजी अल्कायझर एमईएचा वापर केला जातो. सर्व स्थायी रंगांत अल्कायझरची आवश्यकता असते. जेणेकरून रंग केसांमध्ये जाऊ शकेल आणि त्यांना रंगवू शकेल. मात्र काही कंपन्या अमोनियारहित हेअर कलर सांगून त्यात अल्कायझर एमईएचा वापर करतात. स्थायी हेअर कलरप्रमाणेच रंग प्राप्त करण्याकरता एमईएमध्ये कधी कधी अमोनियाच्या तुलनेत उच्च केंद्रीकरणाचा वापर केला जातो. जो केसांसाठी हानिकारक असू शकतो. एमईए हा अल्कायझरचा घटक डमी परमनंट कलरमध्ये वापरला जातो. या अल्कायझरच्या तुलनेत अमोनिया एवढा हानिकारक नाही. रंग करताना अमोनियाचा वास येत असल्याने आपल्याला तो हानिकारक आहे असं वाटतं. मात्र अमोनिया हा अत्यंत लहान अणू असून त्याचं त्वरित बाष्पीभवन होतं. म्हणूनच त्याचा उग्र वास येतो. तुलनेत एमईएचे अणू जड असतात. ते केसांवर जास्त काळ टिकून राहतात. त्यांना केसांवरून हटवणं कठीण असतं. केसांवर जे सतत प्रक्रिया करत असतात त्यांच्यासाठी असे रंग केसांना हानिकारक आहेत.

वेल्ला हेअर कलरने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमोनियारहित रंग केसांसाठी हानिकारक आहेत. वेल्ला हेअर कलर तज्ज्ञ मारिया कास्ट म्हणतात, 'एमईए आणि अमोनिया दोन्ही चांगले किंवा वाईट नाहीत, त्यांच्यातील अल्कायझरच्या अर्कावर ते अवलंबून असतं. केसांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात अमोनियारहित स्थायी कलरचे कोणतेही फायदे दिसले नाहीत. यासाठी वेल्लाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमोनियारहित रंग केसांसाठी हानिकारक नाही असं होत नाही.'

योग्य रंग आणि केसांची काळजी घ्यायची असेल तर नेहमी चांगले रंग वापरा. जेणेकरून आपल्या सौंदर्यात भरच पडेल.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe