Saturday, May 25, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS

"आम्ही जिंकलो"

राजस्थानवर चार विकेटने विजय मिळवत मुंबईने आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली

Read More »

श्रीनिवासन अध्यक्षपदी राहिल्यास प्रायोजकत्व काढून घेणार

आयपीएलमधून काढता पाय घेतल्यानंतर आता सहारा परिवाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयला धारेवर धरले आहे.

नवी दिल्ली - आयपीएलमधून काढता पाय घेतल्यानंतर आता सहारा परिवाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयला धारेवर धरले आहे. यावेळी त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

''क्रिकेट कसे चालवावे, हे श्रीनिवासनसारख्या माणसांना कळत नाही. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर ते राहिले तर भारतीय संघाचे प्रायोजकत्व काढून घेऊ,'' असा इशारा रॉय यांनी शुक्रवारी दिला.

बीसीसीआयचे धोरण 'अहंकारी' असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ''कोणत्याही वादावर तोडगा काढण्यास बीसीसीआय तयार नाही. त्या परिस्थितीत आम्हाला आयपीएलमधून माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता,'' असे सुब्रतो रॉय यांनी स्पष्ट केले. जावई गुरुनाथ मय्यप्पन यांना स्पॉटफिक्सिंगप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याच्या मागणीने आणखी जोर धरला आहे. रॉय यांनी यापूर्वीही भारतीय संघाच्या प्रायोजकत्वाचा करार रद्द केला होता. मात्र त्यावेळी बीसीसीआयने रॉय यांची समजूत काढल्याने भारताचा 'सहारा' कायम राहिला होता.

Read More »

आय-लीगच्या पुढील मोसमात चार नवे संघ

आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या पुढील मोसमात आणखी चार नवे संघ खेळतील, असे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे (एआयएफएफ) अध्यक्ष अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले.

मुंबई - आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या पुढील मोसमात आणखी चार नवे संघ खेळतील, असे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे (एआयएफएफ) अध्यक्ष अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले.

''आय-लीगची स्वतंत्र ओळख आहे. त्यात आणखी चार संघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण सहभागी संघांची संख्या १४ वर पोहोचेल.

संघांची संख्या वाढल्याने स्पर्धेतील चुरस आणखी वाढेल. आय-लीगमध्ये दोन नवे क्लब समाविष्ट करण्यासाठी एआयएफएफने यापूर्वीच निविदा काढल्या आहेत,''असे एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मुंबईत झालेल्या फेडरेशनच्या वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रमादरम्यान सांगितले.

'एफपीएआय' इंडियन फुटबॉल अ‍ॅवॉर्ड्सचा (२०१३) दिमाखदार सोहळा गुरुवारी बॉम्बे जिमखान्यावर पार पडला. यावेळी माजी कर्णधार बायचुंग भुतिया, 'स्टार' फुटबॉलर सुनील छेत्री, बॉलीवुड अभिनेता अभिषेक बच्चन उपस्थित होते.

२०१७ मध्ये होणारा १७ वर्षाखालील फुटबॉल वर्ल्डकपचे यजमानपद भारताला नक्की मिळेल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. ''चार वर्षानी होणा-या १७ वर्षाखालील फुटबॉल वर्ल्डकपच्या यजमानपदासाठी भारतीय फुटबॉल फेडरेशन नक्की प्रयत्न करेल. पुढील वर्षी त्यासाठी निविदा मागवल्या जातील. या स्पर्धेचे यजमानपद मिळण्यासाठी आम्ही दावेदारी पेश करू,''असे ते म्हणाले.

फुटबॉल खेळ सध्या भारतात खूपच प्रसिद्ध होत चालला आहे, असे पटेल यांनी यावेळी म्हटले. ''एकच खेळाचा बोलबाला सध्या भारतात आहे. मात्र फुटबॉलप्रेमींची संख्या कमी नाही. युवांमध्ये हा खेळ खूप प्रिय आहे. जवळपास ७० टक्के युवा फुटबॉल स्पर्धाचा आनंद लुटताना दिसतात. भारतात फुटबॉलचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी एआयएफएफ प्रयत्नशील आहे,''असे पटेल यांनी सांगितले.

सर्वोत्कृष्ट भारतीय फुटबॉलपटू
लेनी रॉड्रिग्ज (चर्चिल ब्रदर्स).
चाहत्यांच्या पसंतीचा पुरस्कार
झोहिब अमिरी (मुंबई एफसी).
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक
डेरेक परेरा (पुणे एफसी).
सर्वोत्कृष्ट परदेशी फुटबॉलपटू
रॅँटी मार्टिन्स (प्रयाग युनायटेड).
सवरेत्कृष्ट युवा फुटबॉलपटू
अल्विन जॉर्ज (पैलान अ‍ॅरोज).
सवरेत्तम ठिकाण : युनायटेड सिक्कीम.

Read More »

ब्रिटनमधील शहीद सैनिकाशी केला नियतीने खेळ

लंडनमध्ये दोन दिवसांपूर्वी ज्या सैनिकाची हत्या झाली तो ली रिग्बी हा सैनिक अफगाणिस्तानात ब्रिटनच्या फौजांसाठी लढला होता. २००६मध्ये तो ब्रिटनच्या लष्करात दाखल झाला होता. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्याची लष्कराच्या बँड पथकामध्ये 'ड्रमर' म्हणून नियुक्ती झाली होती.

लंडनमध्ये दोन दिवसांपूर्वी ज्या सैनिकाची हत्या झाली तो ली रिग्बी हा सैनिक अफगाणिस्तानात ब्रिटनच्या फौजांसाठी लढला होता. २००६मध्ये तो ब्रिटनच्या लष्करात दाखल झाला होता. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्याची लष्कराच्या बँड पथकामध्ये 'ड्रमर' म्हणून नियुक्ती झाली होती. २००९मध्ये अफगाणिस्तानातील अतिशय धोकादायक मानल्या जाणा-या हेल्मंड प्रातांत तैनात असलेल्या तुकडीमध्ये त्याने 'मशिनगनर' म्हणून काम केले होते.

या भागात त्यावेळी तालिबान्यांचा उपद्रव शिगेला पोहोचला होता. त्यामुळे दररोज गोळीबार आणि बॉम्बस्फोटाच्या छायेत प्रत्येक दिवशी मृत्यूशी सामना होत होता. त्या वर्षी अफगाणिस्तानमध्ये ब्रिटनच्या सैन्याने १०८ सैनिक गमावले. रिग्बीच्या तुकडीतील ६ सैनिक त्या वर्षी अफगाणिस्तानात शहीद झाले. त्यामध्ये रिग्बीचा अतिशय जवळचा मित्र होता. अफगाणिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या तीन सैनिकांपैकी तो एक होता. त्यामुळेच मृत्यूला इतक्या जवळून पाहिल्यानंतरही रिग्बीने मरणाला चकवा दिला आणि अफगाणिस्ताननंतर त्याने सायप्रस व जर्मनीमध्येही काम केले.

त्या भागातील कामगिरी पूर्ण केल्यावर तो ब्रिटनमध्ये परतला. त्याच्या बँड पथकाला शाही राजवाडय़ाच्या बाहेरही कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले होते. २०११मध्ये त्याने लंडनमधील 'रेजिमेंटल रिक्रूटमेंट टीम'मध्ये पद स्वीकारल्याने वुलविच शाही तोफखाना दलाच्या बराकींवर त्याची नियुक्ती झाली. ब्रिटनमधील या शांत असलेल्या ठिकाणी त्याला अतिशय सुरक्षित वाटत होते. अफगाणिस्तानमध्ये सतत मृत्यूच्या छायेत वावरलेल्या रिग्बीला या भागातील शांत आणि सुरक्षित वातावरणामुळे समाधान वाटत होते.

दुसरीकडे ब्रिटनच्या शाही पोलिस दलात काम करणारी त्याची मैत्रीण अफगाणिस्तानात नियुक्त असल्याने रिग्बी सतत तिच्या काळजीत होता. त्या भागात प्रत्येक दिवशी मृत्यूचा सामना करावा लागत असल्याची चांगलीच जाणीव असलेल्या रिग्बीला त्याच्या मैत्रिणीची चिंता भेडसावत होती. पण दुर्दैवाचा भाग म्हणजे अफगाणिस्तानसारख्या अतिधोकादायक भागात मृत्यूला हुलकावणी देणा-या रिग्बीला ब्रिटनमधील वुलविचसारख्या अतिशय सुरक्षित आणि शांत भागात कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात बळी जावे लागले.

स्वत:ला सुरक्षित मानणा-या आणि धोकादायक प्रदेशातील मैत्रिणीच्या जीविताची चिंता करणा-या रिग्बीच्या अशा प्रकारे झालेल्या मृत्यूने जगभरात हळहळ व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील या जवानाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. अफगाणिस्तानसारख्या भागात कर्तव्य पार पाडतानाही ज्याला मृत्यू आला नाही त्याला ब्रिटनमधील वुलविचसारख्या शांत भागात मृत्यूने गाठावे, हा नियतीचा खेळच म्हणावा लागेल.

Read More »

बेटिंग अधिकृत करा

क्रिकेटमधून बाहेर पडणारा भ्रष्टाचार पाहता बेटिंग अधिकृत करावे, अशी मागणी भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया आणि इंग्लंडचे माजी कसोटीपटू, समालोचक जेफ्री बॉयकॉट यांनी केली आहे.

मुंबई/लंडन - क्रिकेटमधून बाहेर पडणारा भ्रष्टाचार पाहता बेटिंग अधिकृत करावे, अशी मागणी भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया आणि इंग्लंडचे माजी कसोटीपटू, समालोचक जेफ्री बॉयकॉट यांनी केली आहे.

''युरोपमध्ये बेटिंग अधिकृत आहे. क्रिकेटप्रमाणे फुटबॉलमध्ये दरदिवशी भ्रष्टाचाराचे नवे प्रकरण समोर येत नाही. मात्र सध्या क्रिकेटमध्ये जे प्रकार समोर येत आहेत ते पाहता बेटिंग अधिकृत करण्याची गरज आहे, असे वाटते. त्यातच काही व्यक्तींमुळे संपूर्ण आयपीएलला दोषी ठरवता येणार नाही. कारण खेळापेक्षा मोठा कोणी नाही,'' असे भुतियाने मुंबईत बोलताना सांगितले.

खेळातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी बेटिंग अधिकृत करणे, हा एकमेव पर्याय वाटतो, असे समालोचक बॉयकॉट यांचे मत पडले. ''प्रत्येक मिनिटाला भारतात बेटिंगची नवी प्रकरणे उघडकीस येत आहेत. बेटिंग अधिकृत केले तर गैरव्यवहारांना आळा बसेल. भारत सरकारने क्रिकेटमधील बेटिंग अधिकृत करण्यासाठी पावले उचलावीत.

घोडयांच्या शर्यतीदेखील अधिकृतपणे आयोजित होतात. तसेच क्रिकेटमधील किंवा आयपीएलमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी बेटिंगला अधिकृत करावे,'' असे बॉयकॉट यांनी म्हटले आहे.

Read More »

निसानच्या 'मायक्रा', 'सनी' सदोष

जपानची मोटार उत्पादक निसान मोटार इंडिया मायक्रा आणि सनीमधील मास्टर ब्रेक सिलिंडर सदोष असल्यामुळे २२,१८८ मोटारी परत घेऊन त्यामधील सदोष पार्ट मोफत बदलून दिला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – जपानची मोटार उत्पादक निसान मोटार इंडिया मायक्रा आणि सनीमधील मास्टर ब्रेक सिलिंडर सदोष असल्यामुळे २२,१८८ मोटारी परत घेऊन त्यामधील सदोष पार्ट मोफत बदलून दिला जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

चेन्नई प्रकल्पामध्ये हॅचबॅक श्रेणीतील 'मायक्रा' तसेच सेडान प्रकारातील 'सनी'चे उत्पादन घेतले जाते. मात्र या दोन्ही मोटारींमधील मास्टर ब्रेक सिलिंडर सदोष असल्याचे कंपनीच्या निदर्शनात आले आहे. अशा प्रकारच्या २२,१८८ मोटारी असून त्यांच्यामधील सदोष पार्ट नि:शुल्क बदलून दिला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

सदोष मास्टर ब्रेक सिलिंडर असलेल्या मोटारींच्या मालकांची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार कंपनीने आपल्या डीलर्सना सूचना दिल्या आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यामध्ये कुठलीही हयगय केली जाणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, सदोष ब्रेकमुळे कुठलीही दुर्घटना झाली नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. दरम्यान, जागतिक पातळीवरही कंपनीने जवळपास २.५ लाख मोटारींना परत घेऊन त्यामधील सदोष पार्ट बदलला आहे.

Read More »

सहाव्या मोसमावर परदेशी ठसा

आयपीएलचा सहावा मोसम अंतिम टप्प्यात आहे. स्पॉटफिक्सिंगमुळे प्रत्यक्ष लढतींपासून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष थोडे विचलित झाले असले अंतिम फेरी शिल्लक असल्याने स्पर्धेतील रंगत कायम आहे.

मुंबई - आयपीएलचा सहावा मोसम अंतिम टप्प्यात आहे. स्पॉटफिक्सिंगमुळे प्रत्यक्ष लढतींपासून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष थोडे विचलित झाले असले अंतिम फेरी शिल्लक असल्याने स्पर्धेतील रंगत कायम आहे. सहावा हंगाम परदेशी क्रिकेटपटूंनी गाजवला.

त्यात ऑस्ट्रेलियाचा माइक हसी, जेम्स फॉकनर, शेन वॉटसन, मिचेल जॉन्सन आणि ब्रॅड हॉजसह धडाकेबाज ख्रिस गेल, ड्वायेन ब्राव्हो, कीरॉन पोलार्ड या वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. 

चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांच्या पाचव्या 'फायनल'पर्यंतच्या सवरेत्तम प्रवासात सलामीवीर माइक हसी आणि मध्यमगती ड्वेन ब्राव्होने मोलाचा वाटा उचलला आहे. सर्वाधिक धावा आणि विकेट घेण्यात दोघेही अव्वल स्थानी आहेत. हसीने १६ लढतींमध्ये सहा अर्धशतके ठोकताना विजयाला हातभार लावला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो तरी अद्याप खूप क्रिकेट शिल्लक आहे, हे हसीने त्याच्या बॅटने दाखवून दिले. केवळ आक्रमकतेवर त्याने भर दिलेला नाही.

अनेक लढतींमध्ये हसीने सावध सुरुवात केल्याचे दिसते. 'क्वॉलिफायर १' मध्ये मुंबईविरुद्धची त्याची अप्रतिम खेळी खूप काही सांगून जाते. या खेळीत संयम आणि आक्रमकतेचा सुरेख संगम हसीने साधला. हसीसमोर आव्हान होते ते गेलचे. स्वभावाप्रमाणे आक्रमक बॅटिंग करणा-या गेलने प्रतिस्पर्धी गोलंदाजांसह सर्वाचीच झोप उडवली होती.

मात्र अंतिम टप्प्यात त्याची बॅट चालली नाही. अन्य सहकारीही 'फ्लॉप' ठरले. साखळीतच आव्हान संपुष्टात झाल्याने सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजासाठी दिली जाणारी 'ऑरेंज कॅप' आता हसीच पटकावणार, हे निश्चित आहे. हसी आणि गेलनंतर वॉटसन, आरोन फिंच, डेव्हिड मिलर आणि डेव्हिड वॉर्नरने दमदार फलंदाजी करताना आपापली छाप पाडली.

बीसीसीआयची स्पर्धा असूनही फलंदाजांप्रमाणे गोलंदाजीतही परदेशी क्रिकेटपटूंनी छाप पाडली. प्रमुख गोलंदाज नसूनही प्रभावी मारा करताना ड्वेन ब्राव्होने चेन्नईची गोलंदाजी मजबूत होण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला आहे. त्याला जेम्स फॉकनरने चांगलीच चुरस दिली आहे. त्यामुळे 'ऑरेंज कॅप'च्या तुलनेत 'पर्पल कॅप'साठी मोठी चुरस आहे.

ब्राव्हो आणि फॉकनरनंतर ऑफस्पिनर सुनील नारायण आणि तेज गोलंदाज मिचेल जॉन्सन (प्रत्येकी २२ विकेट) तसेच डेल स्टेनने (२१ विकेट) अचूक मारा केला आहे. अष्टपैलू कामगिरी करण्यात परदेशींनी बाजी मारली आहे. सवरेत्तम अष्टपैलूंमध्ये शेन वॉटसनने आघाडी घेतली आहे. त्याने ५३७ धावा करतानाच १२ विकेट घेतल्यात. त्याच्यानंतर कीरॉन पोलार्डचा (३४९ धावा आणि ७ विकेट) क्रमांक लागेल. डॅरेन सॅमीनेही ब-यापैकी योगदान दिले आहे.

असाही 'षटकार'
माइक हसी (७५६ धावा)
ख्रिस गेल (७०८ धावा)
ड्वेन ब्राव्हो (२८ विकेट)
जेम्स फॉकनर (२७ विकेट)
शेन वॉटसन (५३७ धावा आणि १२ विकेट)
कीरॉन पोलार्ड (३४९ धावा आणि ७ विकेट)

Read More »

लिओनाडरे डिकॅप्रियो 'द बीच'

'टायटॅनिक'मुळे लिओनाडरे अमेरिकेच्या सीमा ओलांडून बाहेर पोहोचला. 'द बीच'मुळे तो विशेषत: युवा वर्गाला अधिक 'आपल्या'तला वाटू लागला.

'द ग्रेट गॅट्सबी' या बाझ लुअरमनकृत सिनेमामुळे लिओनाडरे डिकॅप्रियोचे नाव सध्या चर्चेत आहे. सिनेमाविषयी संमिश्र मतं आहेत आणि मोठ्या प्रमाणावर तो लोकांना फारसा आवडलेला नाही, असं दिसतंय. 'मूलां रूज'प्रमाणेच हा सिनेमाही चकचकीत टेक्नोकल्लोळ वाटतो. अमेरिकेत १९२०च्या दशकातील पार्टीलाइफ भारतात सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. विविधरंगी, लखलखाटी आणि उबगवाणं. लिओनाडरे डिकॅप्रियो हा हॉलिवुडमधला एक अतिशय गुणी आणि हरहुन्नरी अभिनेता आहे. 'ग्रेट' या बिरुदापासून तो अवघा एक ऑस्कर दूर आहे. 'जँगो अनचेन्ड' आणि आता 'ग्रेट गॅट्सबी' या सिनेमांनंतर लिओनाडरे आणि त्याच्या चाहत्यांची ऑस्करची प्रतीक्षा अजून काही काळ सुरू राहील असं दिसतं. गेल्या दशकात लिओनाडरेनं अक्षरश: उच्छाद मांडला होता. या काळात 'कॅच मी इफ यू कॅन', 'गँग्ज ऑफ न्यूयॉर्क', 'दि एव्हिएटर', 'ब्लड डायमंड', 'द डिपार्टेड', 'शटर आयलँड', 'इन्सेप्शन' अशा सिनेमांतून एक अभिनेता आणि बॉक्स ऑफिस पुलर ही लिओनाडरेची ओळख अधोरेखित झाली. १९९८मध्ये आलेल्या 'टायटॅनिक'नं लिओनाडरे आंतरराष्ट्रीय सुपरस्टार झाला. त्याच्या जरा आधी आलेल्या 'रोमिओ-ज्युलिएट'नं त्याचा रोमँटिक अवतार दिसून आला. पण आजचा लेख या कोणत्याही सिनेमाविषयी किंवा त्यांतील लिओनाडरेच्या अभिनयाविषयी नाही. सन २००० मध्ये त्याचा जरा कमी गाजलेला, पण अत्यंत वेगळा असा 'द बीच' प्रदर्शित झाला. 'स्लमडॉग मिल्यनेअर'चा दिग्दर्शक डॅनी बॉइल याचाही हा जरा कमी गाजलेला सिनेमा. काहींना या सिनेमाची थीम किंवा त्यातील लिओनाडरेचा अभिनय अजिबात आवडला नव्हता. 'द बीच'साठी लिओनाडरेला हॉलिवुडमधील वात्रट मंडळींनी 'राझी' अवॉर्डही 'बहाल' केलं होतं. ते काहीही असलं, तरी 'द बीच'ची थीम वेगळी होती. 'टायटॅनिक'चा आवाका, स्टोरी आणि टेकिंगमुळे तो सिनेमा हिट होणारच होता. त्यात लिओच्या अभिनयाचा वाटा कितपत होता, हे सांगता येणार नाही. उलट 'द बीच'पासून पुन्हा एकदा लिओनाडरेला आणि हॉलिवुड किंवा बाहेरच्या दिग्दर्शकांना, तो एकटय़ाच्या बळावर सिनेमा खेचून नेऊ शकतो याची खात्री पटली. 

अमेरिकेतील एक सडाफटिंग, बॅकपॅकर, व्यसनी तरुण रिचर्ड (लिओनाडरे डिकॅप्रियो) थायलँडमध्ये येतो. मायानगरी, रम्यनगरी अशी सारी वर्णनं या देशातील शहरांना, गावांना यथार्थ लागू पडतात. काही तरी वेगळं आणि भन्नाट करण्याची रिचर्डची मनीषा असते. यातली पहिली लिंक त्याला मिळते, डॅफीच्या (रॉबर्ट कार्लाइल) रूपानं! डॅफी म्हणजे हिप्पींचा २१व्या शतकातला अवतार. एका दुर्गम बेटावरील रमणीय बीच ही त्याची, स्वत:ला हरवून टाकण्याची संकल्पना असते. अशा बीचचा नकाशा डॅफीकडे असतो. डॅफी अचानक मरतो, पण त्याचा नकाशा रिचर्डच्या हातात पडतो. मग त्याला भेटतात फ्रान्सवा (व्हर्जिनी लेडोयेन) आणि एटीन (गुलेमा कानाट) हे फ्रेंच प्रेमिका नि प्रेमी. त्यांनाही रिचर्ड त्या कुठल्याशा सिक्रेट बीचला चलण्याची गळ घालतो. बीचच्या वाटेवर अनेक थरारक अडथळे. कधी मरिहुआना प्लँटेशनमध्ये ऑटोमॅटिक रायफलधारी शेतक-यांचा हल्ला, कधी दोन मैल भर समुद्रातून पोहून जाण्याचं आव्हान. पण तिघंही सिक्रेट बीचवरच्या त्या अद्भुत वस्तीवर पोहोचतात आणि त्यांच्यातले होऊन जातात. हो-नाही करत या उप-यांना तिथं सामावून घेतलं जातं. बाहेरच्या जगाशी जवळपास शून्य संबंध आणि थाय शेतकरी-कम-माफियांशीच थोडाफार सामंजस्याचा व्यवहार. रिचर्डला हवं असलेलं सारं काही तिथं मिळतं. रिकामटेकडं आयुष्य, बीचवरची धमाल, कधी फ्रान्सवाशी थोडं फ्लर्टिंग वगैरे. अर्थात हे सगळं शाश्वत नसतं आणि त्यांच्या वस्तीचा सुगावा बाहेरच्या जगाला लागतोच. रिचर्ड अमेरिकेत परततो, पण निराश मनानं नव्हे, तर समाधानी आणि अनुभवानं समृद्ध होऊन!

हा सिनेमा पाहताना भारतीय तरुणांनाही त्या वस्तीचा, तिथल्या चित्रविचित्र, विक्षिप्त मंडळींचा हेवा वाटल्यावाचून राहात नाही. ही मानसिकता रिचर्डच्या माध्यमातून व्यक्त होते. जे-जे पाप म्हणून त्याज्य आहे, त्या सगळ्यांतलं थ्रिल एकदा तर अनभवून पाहणं ही तारुण्यसुलभ प्रवृत्ती सीमातीत आणि वैश्विक आहे. फक्त ते अनुभवण्यासाठी स्वत:चा 'स्पेस' नसल्यामुळे सगळीकडे ते चोरून-मापून अनुभवलं जातं. पण सिक्रेट बीचवर कसलीच बंधनं नाहीत. याचा अर्थ नागडा स्वैराचार चालतो असंही नाही. सगळे जण आपापली कर्तव्यं पार पाडतात आणि फावल्या वेळेत मजा लुटतात. त्या स्वातंत्र्यातही एक काहीतरी सिस्टिम असते. 'टायटॅनिक'मुळे लिओनाडरे अमेरिकेच्या सीमा ओलांडून बाहेर पोहोचला. 'द बीच'मुळे तो विशेषत: युवा वर्गाला अधिक 'आपल्या'तला वाटू लागला. बॅकपॅकरचा उत्साह, हिम्मत, भेदरटपणा, धांदरटपणा आणि तरीही जिवंत राहिलेली संवेदनशीलता लिओनाडरेनं विविध छटांमधून उलगडून दाखवली. त्याच्या (अजूनही टिकलेल्या!) पोरसवदा चेह-याचा त्या भूमिकेला फायदाच झाला. 'द बीच' हा लिओनाडरे डिकॅप्रियोच्या आयुष्यातला एक टप्पा होता. त्यानंतरच्या त्याच्या भूमिका तुलनेनं प्रौढ व्यक्तींच्याच होत्या, हे लक्षात येईल.

Read More »

'गिधाडे' करताना..

विजय तेंडुलकरांचं 'गिधाडे' हे नाटक पुन्हा रंगमंचावर आलं आहे आणि प्रेक्षकांची पसंतीही मिळवत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन करताहेत अभिनेत्री अतिषा नाईक. आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणातच 'गिधाडे'सारखं आव्हानात्मक नाटक त्यांनी का केलं?

विजय तेंडुलकरांचं 'गिधाडे' नाटक पुन्हा रंगभूमीवर येतंय आणि त्याचं दिग्दर्शन एक रंगभूमीवरची अभिनेत्रीच करतेय, या दोन्ही बातम्यांनी काही दिवसांपूर्वी उत्सुकता चाळवली होती. स्पष्टच सांगायचं तर दिग्दर्शकाच्या भूमिकेत अतिषा नाईक असणार, ही गोष्ट सगळ्यांच्या मनात कुतूहल निर्माण करणारी होती. अतिषा दिग्दर्शनात उतरणार आहेत, ही गोष्ट जेवढी आश्चर्यकारक होती, तेवढीच त्यांनी आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणासाठी तेंडुलकरांसारख्या नाटककाराच्या मराठी रंगभूमीवरचा मैलाचा दगड ठरलेल्या नाटकाची 'गिधाडे'ची निवड केली, ही चकित करणारी गोष्ट होती. खरं तर तेंडुलकरांची नाटकं करायला भलेभले पुढे येत नाहीत. कारण ती आधी कळावी लागतात. हे लक्षात घेता अतिषा यांनी धाडसच केलं आहे. परंतु अतिषा यांनी हे आव्हान नुसतंच पेललं नाही तर यशस्वीही केलंय. तीन महिन्यांत 'गिधाडे'चे १७ प्रयोग केले आहेत आणि या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय.

१९७० साली रंगभूमीवर आलेल्या या नाटकाच्या नव्या रूपाबद्दल अतिषा भरभरून बोलतात. दिग्दर्शक म्हणून पहिलंच नाटक करताना तुम्हाला 'गिधाडे'सारखं आव्हानात्मक नाटक का करावंसं वाटलं, असं विचारल्यावर अतिषा सांगतात, ''तेंडुलकर हे काळाच्या पुढे जाणारे नि अत्यंत प्रगल्भ लेखक होते, असं माझं मत आहे. म्हणून त्यांनी साठ-सत्तरच्या दशकातले विषय आजच्या काळालाही चपखल लागू होणारे आहेत. मी फक्त गिधाडे या नाटकाबद्दल बोलत नाही तर 'घाशीराम कोतवाल' असो की 'सखाराम बाईंडर', या सगळ्याच नाटकांबद्दल असं लक्षात येईल. मी 'सखाराम बाईंडर'मध्ये काम केलं असल्याने मला ते अधिक ठळकपणे जाणवतं. ही नाटकं काहीतरी वेगळी होती आणि अशीच वेगळी नाटकं करायला मिळाली पाहिजेत, असं मला वाटायचं. आपण तडजोडी तर लहानसहान सगळ्याच बाबतीत करत असतो. असं असताना 'आउट ऑफ वे' जाऊन काही करायला मिळणं, ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. कुठली संधी तुम्हाला काय देईल, वगैरेचा मी विचार करतच नाही. माणूस म्हणून मला त्यातून काय मिळतं, हे समाधान माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ते मला तेंडुलकराचं नाटक देतं. मग तो रंगमंचीय आविष्कारच नव्हे तर ते नाटक वाचलं तरी त्यातून मला मिळतं. आता 'गिधाडे' माझ्याकडे कसं आलं ते सांगायचं तर, मी सुरुवातीला त्यात फक्त रमाची भूमिका करणार होते. तोपर्यंत या नाटकाचं काहीच तयार नव्हतं. अगदी दिग्दर्शकही ठरला नव्हता आणि माझ्याव्यतिरिक्त कुणाचं कास्टिंगही झालं नव्हतं. त्यानंतर तीन-चार महिने हे नाटक दिग्दर्शनासाठी तीन-चार जणांकडे गेलं.

परंतु काही कारणास्तव त्यांनी ते केलं नाही. एके दिवशी अचानक मला सांगण्यात आलं की, 'आता कुठल्याही दिग्दर्शकाकडे नाटक पाठवलं जाणार नाही. तू चार महिने या नाटकावर काम केलं आहेस. तुला नाटकाचं स्क्रिप्ट उलटंही पाठ आहे, तेव्हा तूच का नाही दिग्दर्शन करत?' त्यावर मी म्हटलं, तेंडुलकरांचं नाटक दिग्दर्शित करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण नुसतं वाचन असणं आणि नाटक करणं यात फरक आहे. त्याला अभ्यासच हवा. परंतु नाटकाच्या निर्मात्या कल्पिता तळपदे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. मग मी नाटक दिग्दर्शित करायचा निर्णय घेतला. कारण विश्वास टाकणारी माणसं आजकाल दुर्मीळ झालीत. इथे विश्वास टाकणारी माणसं तर होतीच, पण ती पैसाही लावत होती. शिवाय आपल्या आवडत्या लेखकाचं नाटक करायला मिळणं, त्याला नव्याने समजून घ्यायला मिळणं यासारखी सुखद गोष्टच नव्हती माझ्यासाठी.''

तेंडुलकरांनी १९७० साली हे नाटक लिहिलं तेव्हा त्यातील कौटुंबिक हिंसा आणि आक्रमक भाषा यामुळे तो सुन्न करणारा अनुभव ठरला होता. आज हे सारे संदर्भ बदलले आहेत. काळ बदललाय. आज हिंसेची नित्य नवी रूपं थरकाप उडवत आहेत. त्यातही महिलांच्या बाबतीत होणारा हिंसाचार विचारी, सुसंस्कृत माणसांना अस्वस्थ करणारा आहे. या पार्श्वभूमीवर या नाटकाचा परिणाम चाळिसेक वर्षापूर्वी होता तेवढाच आजही आहे की, त्यातील हिंसा पातळ झालीय, या प्रश्नावर अतिषा म्हणतात, ''असं अजिबात झालेलं नाही. कारण आजच्या घडीलाही आपल्याकडे ओरबाडलेपण कायम आहे. बसच्या रांगेतले कसे बस येईपर्यंत इमानेइतबारे उभे असतात, पण बस आली की, बसमध्ये चढण्यासाठी अक्षरश: चेंगराचेंगरी करतात. कारण प्रत्येकाला दुस-याच्या आधी जायचं असतं. ही वृत्ती म्हणजे एक प्रकारचं ओरबाडलेपण असतं. हे एक रोजच्या जीवनातलं एक छोटं उदाहरण आहे. हे आपल्याला जागोजागी दिसतं. माणसाच्या पातळीवरील हीच हिंसा, हे तेंडुलकरांच्या नाटकाचं वैशिष्टय आहे आणि ती नेमकी सादर करणं, ही सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट आहे.''

हे नाटक करताना आधीच्या 'गिधाडे'ची त्याच्यावर कुठलीही छाप नाही. कारण आपण आधीचं नाटक पाहिलेलंच नाही आणि त्याच्याविषयी आज काहीच उपलब्ध नाही, असं अतिषा सांगतात. त्यांनी या नाटकासाठी कुणाचीही मदत घेतलेली नाही. ''हे नाटक म्हणजे पूर्णपणे माझा अभ्यास आहे. कारण मला तेंडुलकर आवडतात,'' असं त्या सांगतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसतो.

१९७० मध्ये हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आलं तेव्हा त्याचं दिग्दर्शन डॉ. श्रीराम लागूंसारख्या मातब्बर रंगकर्मीने केलं होतं. अतिषाने केलेलं नाटक त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना तेही आवडलं. त्यांनी सगळ्यांचं कौतुक केलं. इथे एक प्रश्न असा मनात येतो की, स्त्री दिग्दर्शक असल्याने नाटकाच्या एकूण दिग्दर्शकीय दृष्टिकोनात काही फरक पडलाय का? तेंडुलकरांच्या नाटकातील अनुभव हा मुळात अत्यंत माणूसपणाच्या पातळीवरचा असतो. तरीही एका स्त्री दिग्दर्शकाने हे नाटक दिग्दर्शित केल्यावर त्यात काही बदल झाला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर अतिषा सांगतात, ''मी हे नाटक केवळ दिग्दर्शक म्हणून केलं. आता स्त्री दिग्दर्शक म्हणून विचाराल तर त्यातील माणिक आणि रमा या स्त्री पात्रांची होणारी घुसमट आहे, ती मला अधिक जाणवली. पुरुष दिग्दर्शकाला कदाचित ती जाणवणार नाही. विशेषत: या दोन व्यक्तिरेखा स्त्री म्हणून पुरुष दिग्दर्शकाला वाटल्या नसतील इतक्या जास्त जवळच्या वाटल्या.

परंतु दिग्दर्शन करताना मी निव्वळ दिग्दर्शक म्हणूनच संपूर्ण नाटकाचा विचार केला. त्या वेळी कुठेही असा जेंडर बाळगला नाही की, मी स्त्री आहे म्हणून मला काही वेगळं म्हणायचं आहे किंवा एखादी व्यक्तिरेखा वेगळी घडवायची आहे. मुळात तेंडुलकर कळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि मी म्हणेण की, मला अजूनही पूर्णपणे कळलेले नाहीत म्हणजे त्यांच्या लेखनाच्या पातळीपर्यंत जाऊन.''

'गिधाडे'च्या निमित्ताने मराठीत आणखी एका दिग्दर्शकेची भर पडलीय, या गोष्टीची दखल घ्यावीच लागते. विजया महेता, प्रतिमा कुलकर्णी, सुषमा देशपांडे, इरावती कर्णिक, नीना कुलकर्णी, विभावरी देशपांडे, लता मनस्वीनी रवींद्र अशा काही महिला दिग्दर्शकांनी मराठी रंगभूमीवर छाप पाडली असली तरी त्यांची कमीच म्हणायला हवी. दिग्दर्शनाकडे जास्त महिला का येत नाहीत, या प्रश्नावर अतिषाचं म्हणणं असं की, याचं कारण नेमकं सांगता येत नाही. मुळात ती करेल असा विश्वास तिच्यावर टाकायला हवा. तशी तयारी दाखवायला हवी, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या बाबतीत सांगायचं तर मला आव्हान पेलायला आवडतं आणि माझ्यावर विश्वास ठेवणारी माणसंही भेटली. स्क्रिप्ट चांगलं असेल तर मी यापुढेही नाटकं करीन. 'गिधाडे'च्या निमित्ताने मी जुनंच नाटक नव्याने सादर केलं, पण पूर्णपणे नवं नाटक करायलाही मला आवडेल. फक्त काम करताना गंमत आली पाहिजे. मग ते सिरियस असो किंवा कॉमेडी.'  

Read More »

अजूनही शिकतो आहे – केदार शिंदे

त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं आणि केदार शिंदे हे मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रातलं खणखणीत नाव बनलं. बारा चित्रपट, तितकीच  व पाच ते सहा मालिका आज केदारच्या नावावर जमा आहेत. त्याचा 'खोखो' हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होतोय. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा…

एकांकिका स्पर्धामध्ये आपली गुणवत्ता दाखवून देण्यासाठी धडपडणारा एक तरुण आपल्या दोन-तीन मित्रांना घेऊन सतत काहीतरी करत असायचा. एकांकिका स्पर्धामध्ये त्याने इतकं यश मिळवलं की, ही मुलं काही तरी वेगळं करतायत, असं सगळ्यांच्या लक्षात झालं. एकांकिकांनंतरची पुढची पायरी नाटकांची होती. तीही यशस्वीरीत्या केल्यावर टीव्ही मालिका आणि चित्रपट. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं आणि केदार शिंदे हे मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रातलं खणखणीत नाव बनलं. बारा चित्रपट, तितकीच नाटकं व पाच ते सहा मालिका आज केदारच्या नावावर जमा आहेत. त्याचा 'खोखो' हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होतोय. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा.

केदार अनेक वर्षानी तू चित्रपट घेऊन येतो आहेस?

हो ना, तब्बल तीन वर्षानंतर मी चित्रपट घेऊन येतोय. तसे माझे दोन चित्रपट आता लागोपाठ येत आहेत. एक गंमत मात्र वाटतेय की, माझ्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी मी जितका नव्‍‌र्हस नव्हतो त्यापेक्षा आज अधिक नव्‍‌र्हस आहे. गेल्या तीन वर्षापासून या चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया सुरू होती. या वेळी संहितेवर भरपूर काम करण्यात आलं. नव्या तंत्राच्या वापरामुळे अनेक नवीन आव्हानं झेलावी लागली होती. मात्र अगदी शांतपणे एक एक काम हातावेगळं करत गेलो. मध्यंतरीच्या काळात मालिकेतही व्यग्र होतो. काम करत असलो तरी हा नव्‍‌र्हसनेस गमतशीर वाटतोय.

'लोच्या झाला रे' या तुझ्या नाटकावरच 'खोखो' बेतला आहे. नाटकाचा सिनेमा करताना काय बदल केलेस?

ही दोन्ही वेगळी माध्यमं असल्यानं जे काही बदल करावे लागले ते तर मी केलेच. जेव्हा मी 'लोच्या झाला रे' हे नाटक करत होता, तेव्हाच अनेक गोष्टी करायच्याठरवल्या होत्या. मात्र रंगमंचाच्या मर्यादेमुळे त्या वेळी ते शक्य झालं नव्हतं. त्या वेळीच सुचलेल्या अनेक कल्पना मी चित्रपटातून प्रत्यक्षात उतरवू शकलो. या चित्रपटात स्पेशल इफेक्ट्स करण्यात येणार असल्यानं पटकथाही वेगळय़ा पद्धतीने करावी लागली होती. त्याचबरोबर यात काही नवी पात्रंही आलेली आहेत. जी रंगभूमीवर शक्य नव्हती. काही काही प्रसंग हे नाटकात बरे वाटतात किंवा ते संवादातून दाखवता येतात, मात्र चित्रपटात ते आपण प्रत्यक्षात पडद्यावर दाखवू शकत असल्यानं ते लक्षात घेऊन अनेक बदल केले. नाटकाची मध्यवर्ती कल्पना घेऊन साकारण्यात आलेली ही एक नवीनच कलाकृती आहे, असं मी म्हणेन. 

चित्रपटाची नेमकी कथा काय आहे?

एक शिक्षक आपल्याच गावात बदली मागून घेतो. आपल्या गावात आपल्याला निवांत जीवन जगता येईल, असा त्याचा विचार असतो. तो गावात आल्यावर मात्र उलटच होतं. त्या गावातल्या त्याच्या वाडय़ावर अनेकांचा डोळा असतो. त्यामुळे ते त्याला गाव सोडायला सांगतात. हा पापभिरू माणूस त्यालाही तयार होतो. त्याच वेळी त्याला एका पुस्तकात आपल्या घराण्याचा इतिहास सापडतो. या घराण्यात अनेक शूरवीर होऊन गेल्याचं त्याला कळतं. इतकंच नाही तर हे सगळे जण त्याला दिसतात, त्याला ही लढाई लढण्यासाठी मदत करतात, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे. त्यात अनेक वळणंही आहेत.

मराठी माणसांचा स्वाभिमान, अस्मिता वगैरेवर आधारितच या चित्रपटाचं कथानक आहे, असं नाही वाटत?

नाही, हा चित्रपट केवळ मराठी माणसांविषयीच बोलतो नाही. हा चित्रपट खास करून बोलतो, तो माणसांमधल्या आत्मविश्वासाविषयी. बदलत्या सामाजिक रचनेत व्यक्तीला आपला स्वाभिमान जपणं आवश्यक आहे. तो केवळ मराठी माणसांचाच आहे, असं नाही तर सर्वाचाच आहे. अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची भावनाही वैश्विकच आहे. या भावनेचं माझ्या पद्धतीने केलेलं सादरीकरण आहे, एवढंच मी म्हणेन.

तुझ्या नाटकांना व 'अगंबाई अरेच्चा' या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला, नंतर मात्र तसं झालं नाही..

यासाठी मी दुस-या कोणालाही जबाबदार धरणार नाही. जेव्हा एकाच वेळेस अनेक कामं करायची असतात, तेव्हा काही कामं ही दुस-यांवर सोपवली जातात. त्यामुळे जेव्हा शेवटी प्रॉडक्ट बाहेर येतं, तेव्हा त्यातून प्रेक्षकांचं समाधान होत नाही, असं मला आढळून आलंय. आता तसं पाहता त्यात कलाकृतीत कुठेही वैगुण्य राहू नये, याची दक्षता संपूर्ण टीमच घेत असते. मात्र माझ्याबाबतीत तसं घडलं हे खरं आहे. मात्र कलाकार हा शेवटी सतत काही ना काही शिकत असतोच. 'खोखो' या चित्रपटात मी ही चूक सुधारलीय. तुम्हाला सांगतो की, या चित्रपटातला अगदी दरवाजा बंद करण्याचा प्रसंग असला तरी तो मी स्वत:च घेतलाय. कोणत्याही कामात तडजोड करायची नाही, हे तत्त्व मी जपलंय. पटकथा, कॅमेरा, लोकेशन्स या सगळय़ाच गोष्टींवर आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे.

तंत्रांचा वापर करण्याचं तुझ्याकडे अप्रतिम कौशल्य आहे. या चित्रपटातला तसा एखादा प्रसंग सांगशील का?

एक प्रसंग सांगतो, क्लायमॅक्सला या शिक्षकाचे सर्वच पूर्वज त्याच्यासमोर येतात. हा स्पेशल इफेक्टचा प्रसंग होता. ते सगळे जरी एकाच वेळेस त्याच्यासमोर अवतीर्ण होताना दिसणार असले तरी प्रत्यक्षात त्यांचं चित्रीकरण स्वतंत्ररीत्या करण्यात आलं होतं. भरत जाधवच्या शरीरात एकेका पूर्वजांचा प्रवेश होतो, तेव्हा त्याचा जो वेगवेगळया भूमिकांमधला अभिनय आहे, तो तर जबरदस्त आहे. आम्ही ट्रॉली वापरून हा सीन केलाय. तो पडद्यावर पाहाल, तेव्हा या माध्यमाची पकड तुमच्या लक्षात येईल.

'तो बात पक्की'नंतर तू पुन्हा हिंदी चित्रपट केले नाहीस?

तो चित्रपट माझ्याकडे आला होता, तो माझं मराठीतलं काम पाहूनच. मी पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा कलाकारांना दिग्दर्शित करत होतो. म्हणजे बघा, तब्बूला मी त्याआधी केवळ पडद्यावरच पाहिलं होतं. ती फार मोठी अभिनेत्री आहे. तिच्याबरोबर काम करताना सुरुवातीला मीही तणावात होतो. त्या चित्रपटानंतर माझ्याकडे हिंदी चित्रपटांविषयी चर्चा होते, विचारणा होते मात्र अजूनही सांगण्यासारखं काही घडलेलं नाही. तसं काही घडल्याबरोबर मी तुम्हाला सांगेनच.

'खोखो'बरोबर तुझे इतर कोणते चित्रपट येतायेत?

'श्रीमंत दामोदर पंत' या माझ्या नाटकावर आधारित असलेला चित्रपट आता लवकरच येतोय. 'खोखो' आणि हा चित्रपट जवळजवळ एकाच वेळेस तयार झाले होते. मात्र 'खोखो' हा चित्रपट आधी प्रदर्शित करायचं ठरवलं, त्यामुळे तो आधी आला.

Read More »

विद्रोहाचा नवा 'फॉर्म' चित्रकथी

काही एकांकिका अनेक प्रयोग झाल्यामुळे प्रेक्षकांपर्यंत पोचतात; तर काही प्रयोगिकतेमुळे किंवा त्यातील असामान्य विचारधारेमुळे. १९७८ साली रुपारेल महाविद्यालयाची 'चित्रकथी' ही केवळ सहा प्रयोग झालेली एकांकिका! परंतु ती आजही लक्षात राहिलीय ती त्यातील सादरीकरणाच्या अनोख्या फॉर्ममुळे.

आंतर महाविद्यालयीन स्पर्धाचा आढावा घेताना दोन महाविद्यालयांमध्ये असलेल्या चुरशीचा, त्यांच्यातील चढाओढीचा, संघर्षाच्या मानसिकतेचा विचार प्रकर्षाने करावा लागतो. अगदी शैक्षणिक दर्जा टिकवण्याच्या हेतूने ही स्पर्धात्मक वृत्ती काही अंशी जरी सकस मानली तरी त्याचे परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतून थेट 'रायव्हलरी' (शत्रुत्व)पर्यंत दिसून येतात. रुईया आणि रुपारेल या दोन महाविद्यालयांमधले सांस्कृतिक शत्रुत्व जगजाहीर आहे. महाविद्यालयात प्रवेश घेताना साहजिकच कुणा पालकांनी याचा विचार करण्याचा प्रश्नच नसतो; परंतु सांस्कृतिकदृष्टया रुईयाचा विद्यार्थी हा रुईयाचाच आणि रुपारेलचा विद्यार्थी रुपारेलचाच असतो. ही दोन महाविद्यालयं पारंपरिक सांस्कृतिक संघर्ष विद्यार्थ्यांमध्ये प्रखरपणे भिनवतात. एकमेकांना आपले प्रतिस्पर्धी मानून सांस्कृतिक वाटचाल करताना आजही आढळतात. ही चढाओढ चांगली की वाईट, याबद्दल विचार न करता त्यातून मिळालेल्या 'आउटपुट'मुळे मात्र एकांकिका माध्यम विकसित झालेलं आढळतंय.

काही एकांकिका अनेक प्रयोग झाल्यामुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात तर काही प्रयोगिकतेमुळे किंवा त्यातील असामान्य विचारधारेमुळे, रुपारेल महाविद्यालयाची 'चित्रकथी' ही १९७८ साली केवळ सहा प्रयोग झालेली एकांकिका; परंतु ती आजही लक्षात राहिलीय ती त्यातील सादरीकरणाच्या फॉर्ममुळे. एके दिवशी प्राचार्य शिंदेंनी भालचंद्र झा यांना बोलावून सांगितलं, ''यंदाच्या एकांकिकेची जबाबदारी तुझ्यावर सोपवतोय. अट एकच की, रुईयाची मोनोपॉली तोडायची..!'' जबाबदारी साधी आणि सोपी नव्हती. त्यात 'लक्ष्य' होते भालचंद्र झा. ते त्या वेळी कमलाकर सोनटक्केसरांच्या अकादमीसाठी काम करत. चांगल्या कलाकृतीसाठी अर्थातच चांगल्या संहितेची गरज होती. अनंत अमेंबलनी एक कविता झांच्या समोर ठेवली. ती कविता होती मनोहर वाकोंडेंची 'एक होता एको महार.' कवितेत प्रचंड नाटय सामावलेलं होतं; पण सादरीकरणात ती 'आणखी एक दलित नाटय' ठरली असती. त्या वेळी समाजातील दुर्लक्षित, पीडित आणि अत्याचाराला सामो-या जाणा-या नाटकांची एक लाट उसळली होती. भालचंद्र झा 'एको महार'मध्ये वेगळेपण कसं अधोरेखित करता येईल, या प्रक्रियेत गुंतून गेले. एके दिवशी मनोहर वाकोडेंशी चर्चा झाली. त्यांनी पहिल्याच भेटीत त्या कवितेवर एकांकिका लिहून देण्याचं मान्य केलं. प्रत्येक दिग्दर्शक प्रत्येक लेखकाला आळशीच समजतो.

लिखाणाच्या प्रक्रियेला वैचारिकतेची जोड द्यावी लागते. त्यामुळे मेंदूतून कागदावर अक्षरं उमटायला लागणारा कालावधी अर्थातच लेखक वगळता इतरांच्या दृष्टीने अस्वस्थ करणारा असतो. झा यांनी मनोहर वाकोडेंना रुपारेलला बोलावून घेतलं आणि सांगितलं, ''तुम्हाला लिखाणासाठी जागा देतो.. तुम्ही इथे बसा आणि लिखाण करा.'' वाकोडेंनी मान्य केलं. रुपारेल कॉलेजच्या जिमखान्याच्या खालच्या खोलीत स्वत:ला कोंडून घेऊन वाकोडे एकांकिका लिहायला बसले. झांनी दुपारी एक वाजता बाहेरून कुलूप ठोकत विचारलं.. ''किती वाजता येऊ?'' वाकोडेंनी संध्याकाळी पाच वाजताची वेळ दिली. पाच वाजता झा जाऊन बघतात तर, मनोहर वाकोडे शांतपणे झोपले होते. काहीशा धाकधुकीने झांनी त्यांना विचारताच वाकोडेंनी त्यांच्यासमोर पूर्ण एकांकिका ठेवली. 'चित्रकथी'ची संहिता एकटाकी असून ती कुठल्याही शब्दाची फिरवाफीरव न करता जशीच्या तशी सादर झाली.

भालचंद्र झा मुळातच नवीन विचारसणीच्या, नव्या जाणिवांनी स्वत:च्या भूमिका ठामपणे मांडणारा माणूस. भलावण, लांगुलचालन, आपपरभाव न बाळगणारा माणूस. खोटेपणा म्हटला की, या माणसाची तार अजूनही सटकते. त्यामुळे झांच्या प्रत्येक दिग्दशर्कीय कामांमध्ये प्रामाणिकपणा जाणवायचा. 'चित्रकथी' त्यांच्या प्रामाणिक सादरीकरणामुळे पुरेपूर भरलेली. एकांकिकेचा आकृतीबंध काय असावा, याविषयी डोक्यात चाललेल्या निरनिराळय़ा संकल्पनांमध्ये ती चित्ररूपाने सादर कशी करता येईल, याचा ते ठळकपणे विचार करीत होते. प्रत्येक प्रसंग पडद्यावर चित्रित करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या प्रेरणेतून चित्रांच्या पडद्यांनी जन्म घेतला. विनोद पवारने प्रसंगानुरूप कागदावर चित्रं काढली. आता ती प्रेक्षकांसमोर आणणं भाग होतं. म्हणून मग खांद्यावर एका कठीला पडदा बांधून तो सूत्रधारांमार्फत रंगमंचावर सादर करायचं ठरवलं. पडदा मंचावर येताना त्या पडद्यामागून पात्रं मंचावर येत. सूत्रधार कथाकथनाला सुरुवात करून देत आणि पडदा घेऊन विंगेत जात. पडद्यामागून आलेले कलाकार एकामागोमाग एक असे प्रसंग सादर करत असत. हा सादर होणारा 'फॉर्म' मराठी रंगभूमीसाठी नवीन होता. पारंपरिक चौकटी मोडीत काढणारा होता. त्याहूनही प्लस पॉइंट होता तो व्यक्तिरेखांच्या सादरीकरणात..!

भालचंद्र झा कँटिनमध्ये बसले होते. चंदू नावाचा पो-या टेबल साफ करत होता. मध्येच तो 'ब्रेक डान्स'सारखं काहीतरी करायचा. झांनी त्याला ती 'मूव्हमेंट' परत परत करायला लावली. त्यात त्यांना एकांकिकेतील पात्रांच्या हालचालींची 'भाषा' सापडली. चित्रकथीतील प्रत्येक पात्र 'ब्रेक' या नृत्यप्रकारासारख्या हालचाली करत बोलत असे. आंगिक अभिनयाद्वारे 'ब्रेक' करत संवाद साधण्याचा हा अभिनव प्रकार पाहून प्रेक्षक थक्क होऊन जात. प्रत्येक व्यक्तिरेखेला त्यांच्या स्वभाव गुणधर्मानुसार पूर्ण शरीराला रंग देण्यात आला होता. काही पात्रं पांढरीशुभ्र होती. काही काळी तर पाटील आणि त्याचा मुलगा पूर्ण लाल रंगाने रंगवण्यात आला होता. या एकांकिकेत सूत्रधाराची भूमिका करणारे अशोक हांडे आणि अजित भुरे नट म्हणून येण्याआधी 'गायक नट' म्हणून चित्रकथीतून प्रेक्षकांपुढे सर्व प्रथम आले. झा यांना त्यांच्या आवाजातील रांगडेपणा अपेक्षित होता. केवळ एक हलगी आणि लग्नाच्या प्रसंगी वाजवण्यात येणारा चंडा या दोन वाद्यांच्या बळावर अनंत अमेंबलने कवितासदृश नाटय़ाला सुरेख चाली बांधल्या होत्या.

ग्रामीण गायकीतल्या राकटपणाने दोघांच्या आवाजातून एकांकिका सुरू व्हायची आणि प्रेक्षकगृहातून टाळडयाचा कडकडाट सुरू व्हायचा. एको महाराची भूमिका शिरीष जोशी (अभिनेत्री स्पृहा जोशीच्या वडील) करत असत. पहिला प्रयोग 'आयएनटी'ला संघात झाला. काहीतरी अफलातून एकांकिका भालचंद्र झांनी रुपारेलकडून केलीय, याचीच बातमी कर्णोपर्णी पसरत गेली आणि साहित्य संघ मंदिर अंतिम फेरीला केवळ 'चित्रकथी'
मुळे हाउसफुल्ल झालं. स्पध्रेमध्ये लोकाग्रहास्तव बाल्कनी उघडली गेल्याची पहिली घटना संघाच्या कारकीर्दीत 'चित्रकथी'मुळे घडून आली.

मनोहर वाकोडेंना भालचंद्र झांनी एकांकिकेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी एकांकिका आवडली नसल्याचं सांगितलं. याचं प्रमुख कारण होतं, वाकोडेंनी लिहिलेल्या शेवटामध्ये आणि दिग्दर्शकाने केलेल्या शेवटामध्ये थोडा फरक करण्यात आला होता. वाकोडे हा कम्युनिस्ट लेखक म्हणून तात्कालिक नियतकालिकांना ज्ञात होता. एको महारावरील अन्यायाने सारा समाज पेटून उठतो आणि आभाळाकडे हात दाखवून आपली अगतिकता व्यक्त करण्याची मूव्हमेंट भालचंद्र झांना रुचत नव्हती. आपल्या प्रस्थापितांचे, भांडवलदारांचे सरंजामी जुलूम फेकून देऊन नव्या पिढीने विद्रोहाची भाषा निर्माण केली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणूनच अगदी शेवटच्या प्रसंगात एक लहान मुलगा हातात शस्त्र घेऊन अन्यायाविरोधात उभं राहण्याचं धाडस दाखवतो.. हा प्रसंग अंगावर काटा आणयचा! परंतु डाव्या विचारसरणीच्या मनोहर वाकोडेंना हे पटत नव्हतं. शेवटी या प्रसंगाची कारणमीमांसा भालचंद्र झांनी समजावल्यावर आणि दृश्यात्मकता प्रेक्षकांच्या टाळय़ातून समोर आल्यावरच लेखकाच्या मनातील अनिच्छेचा बोळा निघाला. 'चित्रकथी' नामक एक लोककला प्रकार कोकणातील कुडाळ मधल्या पिंगुळी इथे अशाच चित्रप्रदर्शनाने सादर केला जातो. भालचंद्र झा यांना याबद्दल माहितीही नव्हतं. ते लक्षात आणून दिलं, कमलाकर नाडकर्णी यांच्या याच एकांकिकासंदर्भातील भाष्याने. झांच्या मते हा योगायोग होता. तर समीक्षकांच्या मते अभ्यास!

'चित्रकथी'चे इन मीन सहा प्रयोग झाले. पैकी दोन प्रयोग आयएनटी, दोन उन्मेष, एक पुणे आणि सहाव्या ६१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात. साडेतीन-चार हजार प्रेक्षकांसमोर, आत्माराम भेंडे (नाटयसंमेलनाध्यक्ष) आणि तमाम नाटयसृष्टीसमोर ही एकांकिका मोठय़ा दिमाखात सादर झाल्यावर तिचे प्रयोग पुढे करणं स्वत: दिग्दर्शकाला गरजेचं वाटलंच नाही. आज मनोहर वाकोडे आपल्यात नाही; पण भालचंद्र झांनी जेव्हा या एकांकिकेची प्रक्रिया सांगितली तेव्हा एकच जाणवलं की, एवढय़ा कमी प्रयोगात जास्तीत जास्त प्रेक्षक मिळवलेली 'चित्रकथी' ही एकमेव एकांकिका असावी..!

Read More »

सितारवादकाची हृद्य आठवण

भारतीय रागदारी संगीतात उत्तम भावनाविष्कार करण्यासाठी सितार किंवा सतारसारखं दुसरं मधुर वाद्य नाही. सतारीच्या तारांवरून रात्री उंदीर धावत गेला तरी राग मालकंस वाजतो, असं पूर्वी गंमतीने म्हटलं जायचं. तसं म्हटलं तर सतारीचा इतिहास जेमतेम तीनशे वर्षाचा! मुघलांच्या काळात अमीर खुस्रोने हे वाद्य लोकप्रिय केलं. 'कोलकाता' ही या वाद्याची जन्मभूमी! तिथल्या हिरेन दास यांच्या सितारी आजही जगप्रसिद्ध आहेत. सितार वादनातील मिंड आणि गायन प्रकारात विविध भावछटा निर्माण करण्याची असामान्य क्षमता आहे. उस्ताद विलायत खान यांचं सुश्राव्य सितारवादन याचं एक उत्तम उदाहरण आहे. राम गांगुली, मुहम्मद शफी, अब्दुल हलिम जाफरखान, जयराम आचार्य आणि रईस खान यांचं तर अध्र्याहून अधिक आयुष्य आपल्या अप्रतिम सतारवादाने फिल्मी संगीत समृद्ध करण्यात गेलं. सर्वात गाजली ती सितारवादक जयराम आचार्य यांची कारकीर्द.

पाच वर्षापूर्वी ध्यानीमनी नसताना अचानक कुशल गोपालका आणि अनिल नगरकर यांच्याबरोबर जयराम आचार्याना त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. शिवाजी पार्कच्या त्या ऐतिहासिक जागेत १९५८ पर्यंत संगीतकार सी. रामचंद्र स्वत: राहत होते. त्यांनीच ही जागा जयराम आचार्याना दिली.

जयराम आचार्य तामिळनाडूमधील सेलम जिल्हयातील. त्यांचे पिता विष्णुपंत हेब्बर हे सितारिए होते. ते स्वत: स्टाफ आर्टिस्ट म्हणून बॉम्बे टॉकिजमध्ये नोकरीला होते. जयरामना गायक बनायचं होतं. बॉम्बे टॉकीजच्या 'नया संसार' (१९४१) चित्रपटातील 'नया जमाना आया लोगो' गाण्यातील कोरसमध्ये ते गायले होते. खुद्द विष्णुपंत हेब्बरच जयरामजींचे सितारवादनातील गुरू. शिवाय त्यांनी क्लासिकल संगीताचीही चांगली तालिम घेतली. सितारवादनाचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी ते बोरिवलीला पं. रविशंकरजींकडे गेले. त्यांनी विशेष काही शिकवलं नाही; परंतु अत्यंत महत्त्वाचा गुरुमंत्र दिला. ते म्हणाले,''जयराम तुम्हारा हाथ तो बडा ही तेज चलता है। जैसे वीणावादिनी सरस्वती सुंदर दिखती है। ठिक उसी तरह हमें भी बजाते समय या गाते समय व्यवस्थित रूप से पेश आना चाहिए। सितार बजाते समय मेरी उंगलिया बिखरे नहीं, पर साथ रहे, इस बात पर विशेष ध्यान रखने के लिये कहा।'' त्यांनी फक्त एकच दिवस प्रशिक्षण दिलं; पण त्यांनीच जयरामजींचा हात सुधारला. त्यांनी शिकवलेल्या सरगम- मुर्छनावर जयरामजी आजही रियाज करतात. उस्ताद विलायत खान, पंडित रविशंकर यांचं सितारवादन ऐकूनच त्यांनी रियाज केला. सितारीचा टोन, जवारी यावर लक्ष केंद्रित करून आपलं वादन सुधारलं. फिलिप्सच्या टेपरेकॉर्डरवर आपलं वादन सतत ऐकून त्यातील दोष सुधारले.

१९४९ मध्ये संगीतकार स्नेहल भाटकर यांनी एचएमव्हीसाठी त्यांची पहिली ऑडिशन (वादनाची चाचणी) घेतली. तिथे त्यांची नोकरी पक्की झाली. त्यावेळची आठवण सांगताना ते म्हणाले, ''भाटकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गीता रॉयच्या गाण्यात मला सितारींवर दोन पीस (दोन सोलो तुकडे) वाजवायचे होते. एक पीस वाजला, दुसरा काही मी त्या वेळी वाजवू शकलो नाही. घरी जाऊन मी त्याची खूप प्रॅक्टिस केली; पण त्याचवेळी मी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा धडा शिकलो. यापुढे सितारीचा असा कोणताही पीस नसेल जो मी कधी वाजवू शकणार नाही. त्या अपयशानेच मला ही प्रेरणा दिली. त्यामुळेच मी दिवस-रात्र रियाज करू लागलो. त्यानंतर जेव्हा कधी स्नेहल भाटकर मला भेटले, तेव्हा त्यांना मी तोच पीस वाजवून दाखवे, जो त्या वेळी मला वाजवता आला नव्हता.''

वादक कलाकार म्हणून फिल्मी उद्योगात प्रवेश मिळणं त्या काळी इतकं सोपं नव्हतं. जयसिंग मोईनी 'नृसिंह अवतार' (१९४९) मध्ये संगीतकार वसंत देसाईंकडे त्यांना सितारवादनाची पहिली संधी मिळवून दिली. हळूहळू इतर संगीतकारही त्यांना आपल्याकडे बोलावू लागले. काही काळ 'राजकमल कलामंदिर'मध्ये महिना दोन रुपये पगारावर त्यांच्या संगीत विभागात नोकरी केली. संगीतकार सी. रामचंद्र यांची ओळख राजकमलमध्येच झाली. कालांतराने ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले.
'मुहब्बत ही न जो समझे' आणि 'आपनी कहो कभी मेरी सुनो' (परछाई), 'नैन सो नैन नाही मिलाओ' (झनक झनक पायल बाजे) यातील त्यांचे सोलो पीस खूप लोकप्रिय झाले. राजकमलच्या 'तीन बत्ती चार रस्ता' चित्रपटातील एका गीतात तर मेकअप करून पडद्यावर त्यांनी स्वत: सितार वाजवली आहे. एक सज्जाद हुसैन सोडले तर बहुतेक संगीतकारांकडे त्यांनी सितारवादन केलं आहे. त्यांच्या अलौकिक प्रतिमा शक्तीची साक्ष देण्यास मला वाटतं ही गाणी पुरेशी आहेत.

'ओऽऽ सजना, बरखा बहार आयी' (परख), हे गीत आधी बंगाली भाषेत 'ना जेयो ना' ध्वनिमुद्रित झालं होतं. नंतर ते 'परख'मध्ये आलं. संध्याकाळची वेळ! अंधार पडू लागला आहे आणि टप टप अशा सरींच्या आवाजाने पावसाला सुरुवात होते. गावाबाहेर झोपडीच्या दारात उभी राहून नायिका साधना तो नजारा पाहत आहे. पार्श्वभूमीवर सितारीवर जयराम आचार्य यांचं सितारवादन सुरू होतो. त्यांच्या सितारीचा टोन आणि लय पावसाच्या सुखद शिडकाव्याची अनुभूती देतो. संगीतकार सलिल चौधरींनी यामध्ये वेस्टर्न कॉर्ड्स सिस्टीमचा इतका सुरेख उपयोग केला आहे की, मानना पडता है. वाजवायला अतिशय कठीण; पण ऐकायला अतिशय मधुर असा हा पीस आहे. 'छोटे नबाब' (१९६१) मधील 'घर आजा घिर आए, बदरा सावरियाँ' गाण्यातील सितारीचे पीस ऐकून उस्ताद रईसखान स्वत: जयराम आचार्य यांचं अभिनंदन करण्यास आले होते. याशिवाय त्यांनी वाजवलेली-

पिया ऐसो जिया में.. (साहिब बीवी गुलाम)
आंखो ही आंखों में.. (सीआयडी)
ज्योती कलश छलके.. (भाभी की चुडिया)
रसिक बलमा.. (चोरी चोरी)
पुछो ना कैसे मैने.. (मेरी सुरत तेरी आंखे)
काली घटा छाए मोरा.. (सुजाता)
मैं ने चांद और सितारों की.. (चंद्रकांता)
ही गाणी आजही फिल्मी संगीतात माइलस्टोन समजली जातात.

त्याकाळची ध्वनिमुद्रण पद्धतींविषयी जयरामजी सांगत होते, ''आरसीए मशिनमध्ये मॅग्नेटिक टेपवर ध्वनिमुद्रण होत होतं. तंतुवाद्यं आणि वाद्यवृंदासाठी एक माइक तर तालवाद्यांसाठी दुसरा आणि गायकांसाठी एक वेगळा माइक दिला जात असे. कुठच्याही एका वादकानेही चूक केली तर संपूर्ण गाणे पुन्हा रिटेक करावे लागत असे. कसलीही पंचिंग सिस्टिम नव्हती. म्हणून मी आजही म्हणतो पूर्वीचे गायक आणि वादक कलाकार खरंच महान होते. लताजींचा दीमाग तर कार्बन पेपरसारखा आहे. त्यांना एकदा गाणं ऐकवलं की परत दुस-यांदा ऐकवण्याची गरज भासत नसे. संगीतकार ओ. पी. नय्यरही नेहमी फक्त एकाच टेकमध्ये आपलं गाणं ओके करत. ते सर्व सोलो वादक कलाकारांना अॅरेंजर सबॅस्टियनबरोबर आपल्या कार्यालयात बोलावून घेत. आम्हा सर्वाना ते आपापले नोटेशन देत. सर्व कलाकार पूर्ण तयारी करूनच फायनल टेकसाठी जात.''

''जयकिशन फार विद्वान संगीतकार होते. सिनेमाला पार्श्वसंगीत देतानाची त्यांची पद्धतच निराळी होती. ते आधी सिनेमाचे संपूर्ण रीळ चालू करून पाहत. ते पाहताना हार्मोनियमवर वाजवत जात. अॅरेंजर सबॅस्टियन त्यांच्याबरोबर बसून नोटेशन काढत. एका रिहर्सलमध्ये ते संपूर्ण सिनेमाचे पार्श्वसंगीत तयार करत. प्रत्येक फ्रेमवर फिट करत रोशन स्वत: उत्तम जलतरंग वादक होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'सुरिले इन्सान थे'. आजही मला 'सारी सारी रात तेरी याद सताए'चे रेकॉर्डिग आठवते. महालक्ष्मीच्या फेमसमध्ये रिबॉन माईकवर लता सफेद चार सुरात गात होती. मी त्यांच्यासमोर उभा राहून खुर्चीवर एक पाय ठेवून सतार वाजवत होतो. बंगाली रेकॉर्डिस्ट होता. मुकुल बोस की इशान घोष? नीट आठवत नाही. रोशनकडे मी 'बरसात की रात', 'ताज महल' आदी पिक्चर्स केले. ओ.पी. नय्यरने तर मी किंवा रईस खान सतारीवर असल्याशिवाय गाणे ध्वनिमुद्रित केले नाही. संगीतकार सी. रामचंद्र यांच्या 'अनारकली'मधील लताचं 'यह जिन्दगी उसी की है' हे गाणं म्हणजे सर्व सितारियासाठी (सतारवादकांसाठी) ऑडिशन साँग आहे. हे गाणं बरोबर वाजवता आलं म्हणजे तुम्हाला सितारवादन करता येतं, असं समजण्यात येई. या गाण्यात कधी तेरा बारानंतर तर कधी अडीच बारनंतर सितारीचा तुकडा आहे. तो अत्यंत आठवून नाही तर प्रत्यक्ष बार मोजून, नोटेशन समोर ठेवूनच वादन करावं लागतं. सी. रामचंद्रबरोबर तर मी अनेक पिक्चर्स केले. स्टेज प्रोग्राम्स केले.''

''रागदारीचं सखोल ज्ञान सुरांचा सच्चेपणा असलेला अत्यंत विद्वान संगीतकार म्हणजे सी. रामचंद्र! ध्वनिमुद्रण प्रसंगी ते अत्यंत भावुक आणि विनम्र होत. त्या क्षणी सूर आणि ताल याशिवाय जगातील कोणताही विषय त्यांच्या मनाला स्पर्श करत नसे. एक दिवस ओ. पी. नय्यरच्या रेकॉर्डिगमुळे मी सी. रामचंद्र यांच्या रेकॉर्डिगला उशिरा पोहोचलो. अण्णा (सी. रामचंद्र) माझी वाट पाहत खूप नाराज झाले होते. कारण त्यांच्याबरोबर निर्माते दिग्दर्शक एल. व्ही. प्रसाद, लता, आशा सारेच माझ्यासाठी खोळंबले होते. अण्णांनी माझ्यासाठी सितारीचे खास पीस कंपोझ केले होते. मला खूप टेन्शन आलं होतं. मी कुणाशीही काही न बोलता सितार वाजवायला बसलो. त्याच मन:स्थितीत मी ते गीत वाजवलं, ते राग शंकरावर आधारित ते गीत होतं. 'ओ चांद जहाँ वो जाए..' फिल्म 'शारदा'मधलं! टेक ओके झाला. रेकॉर्डिग संपलं. मला अण्णांनी प्रेमाने मिठी मारली.''

''म्हणता म्हणता माझ्या सितारवादनाच्या कारकीर्दीला ५१ र्वष पूर्ण झाली. मनात विचार आला, आता कधी तरी मला या क्षेत्रातून निवृत्त व्हायलाच पाहिजे. शेवटी १९५५-५६ मध्ये मी स्वेच्छेने निवृत्ती पत्करली.''

८५ वर्षाचे जयराम आचार्य आजही शिवाजी पार्कला राहतात. त्यांना दोन मुले आणि तीन मुली आहेत. पत्नीचा स्वर्गवास झाला आहे. मोठा मुलगा शरद एमिरेटस एअरलाइन्समध्ये तर छोटा शशी चेन्नईमध्ये सितारवादक आहे. मोठी मुलगी प्रभावती चेन्नईमध्ये शास्त्रीय नृत्य शिकवते. तर दुसरी मुलगी संगीतकार अमर हळदीपूर यांची पत्नी आहे. सर्वात धाकटी भारती. ती आचार्याबरोबरच शिवाजी पार्कला राहते. इतक्या मोठय़ा कलाकाराच्या दर्शनाने मी सद्गदीत झालो होतो. काय बोलावं ते न कळल्यामुळे त्यांचे चरणस्पर्श केले. शिवाजी पार्कवरून रात्री घरी आलो. तरी डोक्यात त्यांच्या सितारीचे मधाळ स्वर घोळत होते. त्यांची गाणी पुन्हा ऐकली.
बीती ना बिसाई रैना.. (परिचय)
चलते चलते यूंही कोई मिल गया है.. (पाकिजा)
गौरी तोरी पैजनिया.. (महबुबा)
गणराज रंगी नाचतो.. (संगीत – हृदयनाथ मंगेशकर)

जयराम आचार्य अनेक र्वष सिने म्युझिशियन्स असोसिएशनचे प्रेसिडंट होते. पंडित रविशंकर यांच्या 'गोदान'मधील गाणी त्यांनीच वाजवली होती. १९७४ मध्ये, लताबरोबर लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये त्यांनी शो केला. ६१ील्ल(रेन) ऑकेस्ट्रामध्ये वादन केलं. २००३ मध्ये दादासाहेब फाळके अॅवॉर्ड्सनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. इतके मानसन्मान, प्रसिद्धी मिळाली तरी त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वापुढे ती कुठेतरी कमीच आहे, असं वाटलं. काही स्मृती, आठवणी श्रद्धेने हृदयात जपून ठेवल्या आहेत. त्यातील ही एक हृद्य आठवण!

Read More »

बायर्न म्युनिच की डॉर्टमुंड

बायर्न म्युनिच आणि बोरुसिया डॉर्टमुंड या दोन जर्मन संघांमध्ये शनिवारी (२५ मे) चॅँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे.

लंडन - बायर्न म्युनिच आणि बोरुसिया डॉर्टमुंड या दोन जर्मन संघांमध्ये शनिवारी (२५ मे) चॅँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. इंग्लिश फुटबॉलचे घर मानण्यात येणा-या वेंब्ली स्टेडियमवर जर्मन फुटबॉल बहरात आलेला दिसेल. विजेता कोणीही ठरला तरी चषक जर्मनीतच येणार, हे निश्चित आहे. अंतिम फेरीत जर्मनीचे दोन्ही संघ खेळण्याची स्पर्धेची ही पहिलीच वेळ आहे.

उपांत्य फेरीत गतउपविजेता बायर्नने बार्सिलोनाला आणि डॉर्टमुंडने रेआल माद्रिदला नमवत स्पेनच्या संघांची या स्पर्धेतील दादागिरी संपवली. बायर्नला गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीत चेल्सीकडून पराभवाचा धक्का बसला होता. डॉर्टमुंडला १९९७ नंतर ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यातच डॉर्टमुंडचा 'स्टार' मिडफिल्डर मारियो गोएट्झे दुखापतीमुळे अंतिम लढतीला मुकणार आहे. त्याची जागा केविन ग्रॉसक्रूयेट्झ घेण्याची शक्यता आहे.

उभय संघांची आकडेवारी पाहिली तर बायर्नने दबदबा राखलेला दिसून येतो. त्यातच गेल्या वर्षी उभय संघांत झालेल्या चार लढतींत बायर्न पराभूत झालेला नाही. ते पाहता यंदादेखील ते जेतेपदाचे दावेदार वाटतात. पाचव्यांदा बायर्नला ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. आतापर्यंत लिव्हरपूलने पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. बायर्नला २००१ नंतर ही स्पर्धा जिंकण्यात अपयश आले. स्पर्धेत बायर्न पाच वेळा उपविजेता राहिला आहे. त्यांनी गेल्या चार वर्षात तिस-यांदा अंतिम फेरी गाठून दाखवली आहे.

बायर्न म्युनिच
थॉमस म्युलर (१२ सामन्यांत ८ गोल)
आर्येन रॉबेन (८ सामन्यांत ३ गोल)
टोनी क्रूस (९ सामन्यांत ३ गोल), फ्रॅँक रिबेरी (११ सामन्यांत १ गोल), मॅँडझ्युकिक (९ सामन्यांत २ गोल), मारियो गोमेझही (६ सामन्यांत २ गोल) फॉर्मात.

डॉर्टमुंड
मॉकरे रुस (१२ सामन्यांत ४ गोल)
रॉबर्ट लेवानडोवस्की (१२ सामन्यांत १० गोल)
लुकास पिस्झेक आणि फेलिपे सॅँटानादेखील फॉर्मात.

Read More »

इन्सायडर ट्रेडिंग वेगाने फोफावणारा रोग

शेअर बाजारात 'इन्सायडर ट्रेडिंग'चा रोग वेगाने फोफावत आहे. यावर जालिम उपाय करून हा रोग समूळ उखडून टाकण्याची आवश्यकता असल्याकडे शुक्रवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सेबीचे लक्ष वेधले.

मुंबई - शेअर बाजारात 'इन्सायडर ट्रेडिंग'चा रोग वेगाने फोफावत आहे. यावर जालिम उपाय करून हा रोग समूळ उखडून टाकण्याची आवश्यकता असल्याकडे शुक्रवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सेबीचे लक्ष वेधले. या रोखाने आपले सर्व अधिकार एकवटून सेबीने कामाला लागायला हवे. यासाठी नियामकाची अधिकारकक्षा रुंदावण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

परदेशी गुंतवणुकीचा मार्ग सुकर करण्याबाबतही पंतप्रधानांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमुख बँका, सोव्हरेन वेल्थ, युनिव्हर्सिटी आणि पेन्शन या फंडांना देशात गुंतवणुकीसाठी आकर्षक वातावरण तयार करायला हवे, असे त्यांनी सांगितले. २५व्या वर्षाची वाटचाल साजरी करणा-या सेबीच्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. सेबीच्या उमेदीच्या काळाचे साक्षीदार आणि पहिले अध्यक्ष एस. दवेही रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

सेबीची वाटचाल उत्साहवर्धक राहिली असली तरी सवरेत्तम कामगिरी अद्याप बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक क्षेत्रातील इन्सायडर ट्रेडिंगचा रोग नष्ट करण्यात सेबी कितपत सक्षम आहे, याबाबत आपण अधिक बोलणार नाही. पण हा आर्थिक क्षेत्राला वेगाने ग्रासणारा रोग असून तो चिंताजनक ठरत असल्याचे सिंग म्हणाले. पंतप्रधान यांनी १९८२-८५ या कालावधीत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले आहे.

या दृष्टिकोनातून पंतप्रधानांचा सल्ला सेबीसाठी मोलाचा ठरणारा आहे.घरगुती बचत अधिक परतावा देणा-या भांडवली बाजारात आणण्यासाठी आर्थिक क्षेत्रातील प्रत्येकाचा प्रमुख उद्देश राहिला पाहिजे. छोटय़ा गुंतवणूकदरांना भांडवली बाजाराकडे वळवण्यात राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. आता गुंतवणूकदार परिपूर्ण माहितीने सजग झाला आहे. यात तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असून जगभरात भारतीय शेअर बाजारांनी वरचे स्थान राखले आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

घरगुती बचत अधिक परतावा देणा-या भांडवली बाजारात आणण्यासाठी आर्थिक क्षेत्रातील प्रत्येकाचा प्रमुख उद्देश राहिला पाहिजे. बचत आणि गुंतवणुकीचा टक्का वाढता राहिल्यानेच गेल्या दशकभरात अर्थव्यवस्था विकास दराने उच्चांकी झेप घेतली. 
- पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

अधिकारांत वाढ करा

सर्वसामान्यांकडून बेकायदा पैसा उभारणीचे प्रकार वाढत आहेत. हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. अशा योजनांना रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील, अशी ग्वाही बाजार नियामक 'सेबी'चे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी शुक्रवारी दिली. बाजार आणि गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी सरकारकडून यापुढेही पाठबळ मिळत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी 'सेबी' रौप्यमहोत्सवी वर्षात व्यक्त केली आहे.

'सेबी'रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. गुंतवणूकदारांच्या पैसा सुरक्षित राहण्यासाठी नियामक म्हणून गेल्या २५ वर्षात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या प्रवासात अनेक अडचणींवर मात करताना सेबीने देशात गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यात यश मिळवले आहे.
रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सिन्हा म्हणाले की, सेबीच्या चढत्या आलेखात सरकारचा मिळालेला पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरला. यापुढेही असाच पाठिंबा राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विविध कंपन्यांकडून आजच्या घडीला गुंतवणुकीच्या नावावर बेकायदा पैसा उकळण्याच्या प्रकारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हा किरकोळ गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील विषय असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. अशा योजनांपासून गुंतवणूकदारांचा बचाव करण्यासाठी संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

'सेबीच्या खडतर वाटचालीची २५ वर्षे'
१९८८मध्ये 'सेबी'चा स्वतंत्र नियामक म्हणून प्रवास सुरू झाला, तो आयडीबीआयमधील सहा अधिका-यांसह एस. ए. दवे यांनी पहिला अध्यक्ष म्हणून सेबीचा कारभार सांभाळला.

आयडीबीआयच्या कार्यालयात ही वाटचाल सुरू झाली. मात्र १९९२मध्ये सेबी कायद्यांतर्गत तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात सेबीला सर्वप्रथम वैधानिक अधिकार प्राप्त झाले. अर्थजगतात खळबळ उडवून देणारा हर्षद मेहता घोटाळा याच काळातील. यानंतर १९९५ आणि २००१-०२ या काळात या अधिका-यांत आणखी वाढ झाली. त्याला केतन पारेखच्या घोटाळय़ाची पार्श्वभूमी लाभली.

तर सहारा समूहातील कंपन्यांनी किरकोळ गुंतवणूकदारांकडून स्वीकारलेली बेकायदा गुंतवणूक प्रकरणात सेबीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या प्रकरणातील गुंतवणूक परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सेबीचा आज वटवृक्ष झाला आहे. ६००हून अधिक कर्मचारी आता सेबीचा पसारा सांभाळत आहेत.

गुंतवणूकदारांच्या हितालाच प्राधान्य द्या
छोटय़ा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास ढळता कामा नये. यासाठी सेबीने बाजारावर आपल्या पद्धतीने नियंत्रण राखावे, जेणेकरून या गुंतवणूकदारांचे हित जपले जाईल. यात कोणासमोरही नमते घेण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पाठिंब्याची खात्री दिली.

छोटय़ा गुंतवणूकदारांचा विश्वास जिंका. जोपर्यंत सेबीची करडी नजर आहे, तोपर्यंत आपला गुंतवलेला पैसा सुरक्षित आहे, असा विश्वास त्यांच्यात निर्माण करा. हा दिवस उजाडेल तेव्हाच सेबीचा उद्देश पूर्ण झाला असे म्हणता येईल, असे चिदंबरम म्हणाले. कोणत्याही दबावाला न जुमानता बाजारातील व्यवहारांचे नियमन करा, असे त्यांनी सांगितले. सेबीचा विस्तार आणि कामगिरीही कौतुकास्पद आहे. मात्र यापेक्षाही अधिक विस्तार अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

Read More »

वेगाची झिंग

वेगाने बाइक चालवत वा-याशी स्पर्धा करणारे आपल्याला अधूनमधून दिसतात. मागचा किंवा पुढचा टायर हवेत उचलून केल्या जाणा-या या करामती 'बाइक स्टंट म्हणूनच ओळखल्या जातात. वेगाची केवढी मोठी नशा त्यांच्या डोक्यावर चढलेली असते. एखाद्याला एवढया वेगात बाइक चालवताना किंवा अशा करामती करताना बघूनच बघणा-याच्या काळजाचा ठोका चुकतो. पण करणा-याला मात्र त्याचं काहीच वाटत नाही. एवढा बिनधास्तपणा कुठून येतो?

एकदा माझ्या आईने मला सहजच विचारलं, ''ही तुझ्या वयाची मुलं एवढया जोरात बाइक चालवतात, ते बघूनच आम्हाला भीती वाटते. अशा उचापती करताना त्यांना स्वत:ला काहीतरी होईल किंवा जीव जाईल, याची भीती कशी नाही वाटत?'' आईच्या प्रश्नावर मी निरुत्तर झाले. पण त्यानंतरही तिच्या त्या प्रश्नावर विचार करणं मला फारसं गांभीर्याचं वाटलं नाही.

मात्र अलीकडेच, अगदी तीन महिन्यांपूर्वी माझ्यापेक्षा फक्त एक वर्षाने लहान असलेल्या माझ्या एका मित्राचा जीव या बाइक स्टंट्समुळेच त्याला गमवावा लागला. तेव्हा मात्र प्रत्येक तरुणाला त्यांच्या ऐन तारुण्याच्या वयात स्वत:कडे खेचणा-या वेगाच्या नशेत नेमकं असतं तरी काय, या प्रश्नाचं उत्तर शोधणं जास्त गरजेचं वाटू लागलं.

भर रस्त्यावर खुलेआम स्टंट्स करणारी ही मंडळी उत्तरं देताना मात्र बिचकतात, ''जोरात बाइक चालवली तर ट्रॅफिक पोलिस पकडतात. बाइक रेसिंग करणं किंवा स्टंट्स करणं हा कायद्याने गुन्हा आहे. या सर्वाबद्दल शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे आम्ही माहिती देऊ शकत नाही'' ही उत्तरं त्यांच्याकडून ऐकायला मिळतात. त्यांच्या उत्तराचं हसूही येतं. आपण चुकीचं करतोय हे त्यांना ठाऊक असतं. पकडलो गेलो तर शिक्षाही होईल, याची भीती कुठेतरी या बायकर्सच्या मनात असते. तरीही ते बाइक स्टंट करणं काही सोडत नाहीत.

ब-याच प्रयत्नांनंतर बायकर्स मित्रांपैकी एक जण माहिती देण्यास तयार झाला. सँडीने (नाव बदलून) नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. तो आहे अगदी काडी पहिलवान. मुली हातात बांगडय़ा भरतात तसे रंगबिरंगी रबरी बँड्स हातात घालण्याची त्याला खूपच हौस. त्याने केसही मानेपर्यंत वाढवलेले होते. सोनेरी रंगाने रंगवले होते. त्याच्या तो अवली लुक पाहून मला 'लफंगे परिंदे' या चित्रपटातला नंदू आठवला. मात्र त्याच्या किडकिडीत शरीरयष्टीकडे पाहून हा इतकी वजनदार बाइक कसा काय उचलत असेल, अशी शंका वाटू लागली.

पण हा पठ्ठया म्हणतो, ''एकदा माझा ग्रुप कॉलेजच्या कट्टय़ावर बसला असताना ग्रुपचं लक्ष बाइकस्वार मुलांकडे गेलं. ती बाइकस्वार मुलं मस्त स्टंट करत होती. अनोख्या स्टंटबाजीमुळे मुलं 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन' ठरत होती. आम्ही मुलं तर त्यांच्या एकेकाभन्नाट स्टंट्सवर टाळ्या वाजवत होतो. त्यांच्या नावाने ओरडत होतो. ते पाहून मुली तर वेडयाच झाल्या होत्या. कॉलेजमधल्या सुंदर मुली त्यांच्या मैत्रिणी होत्या. तसं तर अख्खं कॉलेज त्यांच्या या स्टंटबाजीमुळे त्यांना ओळखत होतं. मग मीसुद्धा ठरवलं त्यांच्यासारखं बनायचं.

कॉलेजमध्ये भाव मिळेल. एखादी तरुण सुंदर मुलगी माझ्यासाठी वेडी होईल. त्यामुळे मीही बाइक स्टंटबाजीकडे वळलो. सुरुवातीला स्टंट करणं मला जमायचं नाही. ब-याच वेळा माझा अपघात झाला. किरकोळ दुखापती व्हायच्या. घरी विचारचे की मी काहीतरी खोटंनाटं सांगून वेळ मारून न्यायचो. आजही घरातल्यांपासून लपवून स्टंट करतोच. पण मी बाइक स्टंट करतो, असं घरी कळलं तर वडील बाइकच काढून घेतील, हे नक्की!''

या वेगवान दुनियेत स्वत:ला झोकून देणा-या अस्लमशीही (नाव बदलले आहे) बोलण्याची संधी मिळाली. हा अस्लम म्हणजे वेगाच्या दुनियेतला मात्तबर खिलाडी. वयाच्या पंधराव्या वर्षापासून आपल्या मित्रांची बाइक चालवायला शिकलेला. शिक्षण सोडून उनाडक्या करत बसणारा वीस-एकवीस वर्षाचा टपोरी मुलगा. रस्त्यावर भरधाव वेगाने बाइक चालवणं आणि एखाद्या रस्त्यावर चालणा-या माणसाला कट मारून जाणं, विशेषत: मुलींना.. हे त्याला जरा जास्तच आवडतं.

मात्र अस्लमची दुनिया आहे, ख-या-खु-या स्पध्रेची. तो सांगतो, ''माझ्यासारखी वेगाची आवड असणारी २० ते २४ वयोगटांतील आम्ही मुलं एकत्र जमतो. रात्री ज्यावेळेस रेस लावायची आहे, तेव्हा आमच्यापैकी एक जण पोलिसांची नाकाबंदी कुठे आहे किंवा पोलीस कुठे कुठे उभे आहेत, याची पाहणी करतो. ही सगळी माहिती ग्रुपला पुरवतो. त्यानंतर सुरू होतो, आमच्या वेगाचा खेळ.'' जोरजोरात आवाज करत, वा-यालाही टक्कर देतील, अशा वेगात आपल्या बाइकवर स्वार होत हे 'लफंगे परिंदे' निघतात. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच हे कुठच्या कुठे पसार झालेले असतात.

या शर्यतीतील मुख्य नियम म्हणजे, जो कोणी शेवटी येईल त्याला आपली बाइक शर्यतीत पहिला येणा-याच्या कायमस्वरूपी स्वाधीन करावी लागते. आपण हरणार असल्याचं रेसरच्या लक्षात आलं तर तो आपली बाइक ठोकूनसुद्धा देतो. काही वेळा आपली बाइक इतरांना देण्याचं दु:ख त्यांना कमीच असतं. कारण जुन्या-पुराण्या बाइकच शक्यतो खेळासाठी ते वापरत असतात. इकडे जिंकणं सर्वाना अधिक महत्त्वाचं असतं. बॉलिवुडच्या पार्टीमध्ये दाखवतात तसं ग्लॅमरसुद्धा इकडे असतं. ही स्पर्धा कितीही उशिरा असली तरी बघ्यांची संख्याही इकडे खूप असते.

स्पर्धेत प्रत्येक वेळी टिकणं इकडे महत्त्वाचं असतं. या सा-याची कधी भीती नाही वाटत का, या माझ्या प्रश्नावर अस्लम अगदी एखाद्या हिरोसारखंच उत्तर देतो, '' इस खेलमें जो डर गया, वो मर गया. स्टंट करताना आम्हाला जरा जरी भीती वाटली किंवा आमचं लक्ष, आत्मविश्वास कमी झाला तरी आमच्यासोबत काहीही वाईट घडू शकतं.

इथे कुठल्याच प्रकारच्या भीतीला थारा नाही. जिसको डर लगता है, उन लोगोंको हम बोलते है, इधर आनेकाइच नही. वही अपने घर पेही बैठनेका!''या तिघांना भेटून झाल्यावर एक गोष्ट मात्र नक्की कळली की, हे तरुण भीतीच्याही पलीकडे गेलेले आहेत. त्यांना परिणामांची पर्वा नाही. स्वत:सोबत किती वाईट होऊ शकतं, याची कल्पना असतानाही काहीवेळा केवळ वेगाचं थ्रिल अनुभवायचं, मित्रांमध्ये टशनमध्ये राहायचं आणि येणारा प्रत्येक दिवस 'आज कुछ तुफानी करते है!'ची झिंग घेऊन जगायचं, हेच यांचं विश्व !

Read More »

इतिहादमुळे जेट एअरवेजचा नफा वाढेल

अबुधाबीच्या इतिहाद एअरवेजला २४ टक्के हिस्सा विक्री करण्यास जेट एअरवेजच्या समभागधारकांनी मंजुरी दिली. शुक्रवारी झालेल्या कंपनीच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हिस्सा विक्रीला मान्यता देण्यात आली.

मुंबई - अबुधाबीच्या इतिहाद एअरवेजला २४ टक्के हिस्सा विक्री करण्यास जेट एअरवेजच्या समभागधारकांनी मंजुरी दिली. शुक्रवारी झालेल्या कंपनीच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हिस्सा विक्रीला मान्यता देण्यात आली. यामुळे कंपनीचा खर्च कमी होणार असून नफा वाढेल, असा विश्वास जेटचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी व्यक्त केला आहे.

हवाई क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी इतिहादची गुंतवणूक महत्त्वाची ठरेल, असे गोयल यांनी सांगितले. विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते.इतिहादला प्रेफरन्शियल शेअर देण्यास समभागधारकांनी मान्यता दिली आहे. सध्या हिस्सा विक्रीचा प्रस्ताव भारतीय स्पर्धा आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. जेट २४ टक्के हिस्सा इतिहादला २,०५८ कोटींना विक्री करणार आहे. हवाई क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्यानंतर या क्षेत्रातील जेट आणि इतिहादचा पहिलाच मोठा प्रस्ताव आहे.

इतिहादमुळे जेटला आपल्या हवाई नेटवर्कचा विस्तार करता येणार आहे. ज्यामुळे महसूल वाढण्यास मदत मिळेल आणि खर्च कपातीवर भर दिल्याने नफा वाढेल.
- नरेश गोयल, अध्यक्ष, जेट एअरवेज

तोटा वाढला
कंपनीला जानेवारी ते मार्च या तिमाहीत ४९५.५३ कोटींचा तोटा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये वाढ झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २९८.१२ कोटींचा तोटा झाला होता. तसेच महसुलातही घट झाली असून ३,९२१.९२ कोटींचा महसूल मिळाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. २०१२ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला ४,०४१.६१ कोटींचा महसूल मिळाला होता. गेल्या वर्षभरात इंधनांच्या वाढत्या किमतींमुळे नफ्यावर परिणाम झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Read More »

रेसकोर्स सांगा कुणाचा?

मुंबईतील काँक्रिटच्या जंगलात मोकळा श्वास घेण्यासाठी जी काही ठिकाणं शिल्लक आहेत, त्यापैकी सर्वात मोठी जागा म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स. गेली ९९ वर्षे घोडयांच्या टापा आणि शर्यतींच्या गोंधळाने ही २२७ एकर जमीन व्यापली होती.

मुंबईतील काँक्रिटच्या जंगलात मोकळा श्वास घेण्यासाठी जी काही ठिकाणं शिल्लक आहेत, त्यापैकी सर्वात मोठी जागा म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स. गेली ९९ वर्षे घोडयांच्या टापा आणि शर्यतींच्या गोंधळाने ही २२७ एकर जमीन व्यापली होती.

स्थानिकांची 'मॉर्निग वॉक'ची आवडती जागा म्हणूनही रेसकोर्स प्रसिद्ध आहे. आता मात्र, जागेच्या दरांबाबत जगात सहाव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईत एवढी मोठी मोकळी जागा सर्वाच्याच नजरेत भरू लागली आहे.

मुंबई महापालिकेतील सत्ताधा-यांना आता त्यामुळेच ३१ मे २०१३ ही तारीख खुणावत आहे. याच तारखेला महालक्ष्मी रेसकोर्सवरील 'रॉयल वेस्टर्न टर्फ क्लब'चा भाडेकरार संपत आहे. त्या करारास मुदतवाढ न देता ही जमीन आपल्या ताब्यात घेण्यासाठी महापालिकेतील सत्ताधा-यांनी कंबर कसली आहे.अर्थात, महापालिकेच्या ताब्यात येणारी जमीन २ लाख ५८ हजार २४५ चौरस मीटर एवढी असली तरी त्यावरच टर्फ क्लबचे बहुतांश बांधकाम असल्याने ती महत्त्वपूर्ण आहे. उरलेली ५ लाख ९६ हजार ९५३ चौरस मीटर जागा नगरविकास खात्याकडे आहे.

त्यामुळे, भाडेकरारावरून आक्रमक भूमिका घेणा-या महापालिकेची बाजू हे प्रकरण न्यायालयात गेल्यास कितपत तग धरेल, हे आताच सांगता येणार नाही. जुलै २००४ साली उच्च न्यायालयाने टर्फ क्लबने पेगॅसस कंपनीशी केलेला करार रद्द करवून बांधकामास मज्जाव केला होता. १९६७ सालच्या भाडेकराराचा दाखला देत मोकळा भूखंड केवळ अश्वशर्यतीसाठी वापरावा, असेही न्यायालयाने सुनावले होते. त्यानंतर, २००५ पासून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना ही जागा परत घेण्यासाठी आग्रही आहे.

मात्र, आता खुद्द महापौर सुनील प्रभू यांनी टर्फ क्लबला अनधिकृत बांधकाम पाडा किंवा तसेच ठेवा, आम्ही त्याचा मोबदला देऊ, असे सांगून इथल्या अनधिकृत बांधकामाविषयीची पालिकेची भूमिकाच संदिग्ध करून ठेवली आहे. जर पालिकेला अनधिकृत बांधकामाचे वावडे आहे तर त्याचा मोबदला देण्याचा पर्याय आला तरी कुठून? यामुळे, या सर्व प्रकरणात दाखवला जातोय तितका पारदर्शकपणा किंवा उदात्त विचार आहे की राजकारण आहे, याबाबत साशंकता निर्माण होत आहे.
'रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब' हा भारतातील सर्वात जुना घोडय़ांच्या शर्यतीचा क्लब असून ३० जून २०१० पर्यंतच्या आकडेवारीनुसार या क्लबचे ७५६६ सदस्य असल्याची नोंद आहे.

सर कुस्रे वाडिया यांनी दिलेल्या जागेवर हा रेसकोर्स उभा राहिला आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबोर्नच्या रेसकोर्सप्रमाणे हा अंडाकृती रेसकोर्स बांधण्यात आला असून २४०० मीटर्सचा शर्यतीचा ट्रॅक हा मुंबईची शान वाढवणाराच आहे. महालक्ष्मी रेसकोर्स ही मुंबईतील एक प्रसिद्ध स्थळ ही ओळख जरी असली तरी पर्यटकांच्या दृष्टीने ती केवळ बाहेरून पाहण्याची जागा आहे. वर्षभरातील जेमतेम ७० दिवस शर्यती होत असल्याने या जागेच्या वापराबाबत अनेक मतप्रवाह असणे स्वाभाविक आहे. त्यातच, ही जागा म्हणजे केवळ श्रीमंतांसाठीच असल्याचा एक दृष्टिकोन आहे. तो योग्य नाही.

अर्थात, अश्वशर्यती हा काही तसा सर्वसामान्यांचा खेळ नाही. सध्या सुरू असलेल्या फिक्सिंगच्या चर्चेत तर या शर्यतीसुद्धा बेटिंगचाच एक भाग असल्याने त्यास समाजमान्यता मिळणे शक्य नाही. मात्र, तरीही गुरुवार व रविवार या शर्यतींच्या दिवशी रेसकोर्सवर जमणा-या श्रीमंत शौकिनांबरोबरच सर्वसामान्यांची संख्याही नऊ-दहा हजारांच्या घरात असते, हे दुर्लक्षिता येणार नाही. रेल्वेमध्ये अश्वशर्यतींची पुस्तके चाळणारे अनेकदा सर्वाना दिसले असतील. या शर्यतींचा प्रतिसाद कमी होऊ लागला आहे, हेही तितकेच खरे आहे. मनोरंजनाचे आणि पैसे उधळण्याचे विविध पर्याय उपलब्ध झाल्याने तसे होत असले तरी रेसकोर्सचे ऐतिहासिक महत्त्व त्यामुळे कमी होत नाही.

इतिहासात डोकावले तर खुद्द बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनीही या विषयाला फारसे महत्त्व दिले नव्हते, असेच दिसते. 'प्रहार'च्या एका वाचकाने तर याबाबत पत्र लिहून एक आठवण सांगितली आहे.  १५ ऑगस्ट १९७२ रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी येथे हजारो कामगारांसह सत्याग्रह केला होता.

रेसकोर्सच्या विशाल मैदानावर कामगारांसाठी अल्प दरात घरे बांधून देण्याची त्यांची मागणी होती. त्यावेळी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्टांना विरोध केला होता. बाळासाहेब हे स्वत: पर्यावरणप्रेमी होते. मैदाने, बागा, वृक्षवल्लींवर त्यांचे विशेष प्रेम होते. युतीच्या सत्ताकाळात प्रमोद नवलकर सांस्कृतिक मंत्री असताना त्यांच्या पुढाकाराने जगातील पहिले नाना-नानी पार्क गिरगाव चौपाटी येथे बांधण्यात आले. त्याचे उद्घाटन बाळासाहेबांच्या हस्ते झाले होते.

त्यावेळी, संध्याकाळी उशीर झाला असतानाही बाळासाहेबांनी कमी उजेडात या पार्कची पाहणी केली होती आणि वाळू हटवून उभे राहिलेल्या या उद्यानाबाबतच्या विविध शंकांचे समाधान करवून घेतले होते. तेव्हा, त्यांनी मुंबईत अशीच हिरवळ ठिकठिकाणी दिसली पाहिजे, असे सांगतानाच इथे सिमेंटचे बांधकाम करू नका, असा सल्लाही दिला होता. बाळासाहेब जर आज असते, तर त्यांनाही कदाचित या रेसकोर्सच्या मोकळ्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या जागेवर 'बीओटी'वरील उद्यान बांधले जावे, असे नक्कीच वाटले नसते.

तसेच आज महापालिकेच्या ताब्यातील उद्यानांची अवस्था पाहता प्रत्येक वॉर्डमधील उद्यानांसाठी अर्थसंकल्पात प्रत्येकी ५ कोटी रुपयांची तरतूद केली जाते, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. त्यामुळे, महापालिकेने आधी स्वत:च्या ताब्यातील रिकाम्या मोकळ्या जागांवर नवी उद्याने उभारावीत तसेच जी आहेत त्यांची अवस्था सुधारावी. तीच बाळासाहेबांना महत्त्वपूर्ण आदरांजली ठरेल.

एकूणच काय तर महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवरून निर्माण झालेला वाद राजकीयदृष्टया विशेषत: भावनिकदृष्टय़ा महत्त्वाचा केला जाऊ पाहत आहे. खरे तर, मुंबईतील प्रेक्षणीय स्थळ म्हणून महालक्ष्मी रेसकोर्समध्ये पर्यटकांना प्रवेश देण्याबाबत आजवर का पावले उचलली गेली नाहीत, याचा विचार होणे आवश्यक आहे. जागा श्रीमंतांची आहे की गरिबांची, यापेक्षा ती जागा शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आहे, हे महत्त्वाचे नाही का? आणि मुंबईतील भाडेकरारावरील जागांचाच विचार करायचा, तर महापालिकेच्या एकूण २९२९ मालमत्ता (मोकळ्या जागा, वास्तू वगैरे) या १० ते ९९९ वर्षाच्या कालावधीसाठी भाडेकरारावर दिल्या आहेत. त्यापैकी ५८४ मालमत्ता ९९ वर्षांसाठी, १९२ मालमत्ता २५ ते ७० वर्षासाठी आहेत. त्यांच्या नूतनीकरणावेळीही असेच राजकीय हेतूने प्रेरित वाद होणार आहेत का?

Read More »

पार्वती सुळक्याच्या मार्गे माहुली गड!

माहुली गड सुळक्याच्या आधाराने सर करणं, हे एक प्रकारचं आव्हानच! ते आव्हान लीलया पेललंय शैलभ्रमरच्या टीमने. माहुली गड त्यांनी 'पार्वती' या अंजिक्य सुळक्याच्या मार्गे सर केला, त्या मोहिमेचा हा वृत्तांत..

दरवर्षी पावसाळ्यातून राजमाचीला जाणं, हा आमचा ठरलेला कार्यक्रम. राजमाचीला जाऊन आले की, खूप आनंद व्हायचा. इतका की, काही तरी मोठ्ठं केल्यासारखं वाटायचं. राजमाचीची चढाई असतेच निराळी. तर राजमाची सर केल्यापासून मला क्लायंबिंगची गोडी लागली. गेल्या वर्षीच्या दिवाळीत बाबांनी मला क्लायंबिंगला येण्याबाबत विचारलं. तेव्हा मी चटकन होकार दिला. ठिकाण होतं, माहुली. काही कारणांमुळे ती दिवाळीत होणारी आमची राजमाचीची मोहीम बारगळली.

गेल्या मार्च महिन्यात आम्ही राजमाचीला जाऊन आलो. ठरल्याप्रमाणे १० मार्च २०१३ रोजी मुंबईतून सकाळी ७.३० ची लोकल ट्रेन पकडली. सोबत माझे बाबा प्रकाश वाळवेकर, हितेंद्र मोरे(गोटू), मिथून रेडकर, सुरेश मसुरकर, सुनील तोत्रे, वैशाली राणे, प्रकाश शिंदे, विश्वेश महाजन, प्रसाद सावंत, राजेश जाधव असे अकरा जण होते. बरोबर सकाळी साडेदहाच्या सुमारास आम्ही वाशिंद स्टेशनला पोहोचलो. स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला. तिथेच असणा-या जवळच्या बाजारातून थोडीफार खरेदी केली.

पिवळी वांद्रे गाव गाठलं. गावात पोहोचल्यावर क्षणभर विसाव्यासाठी डेरेदार झाड पाहिलं. त्या झाडाखाली बसून प्रत्येकाच्या बॅगेत सोबत असलेलं थोडं थोडं सामान देऊ केलं. तिथून मग आम्ही बेसकॅम्पसाठी माहुली परिसरातील गुंफेच्या दिशेने चालू लागलो.सुरुवातीला जरा सोप्पा रस्ता होता. नंतर जसजशी चढणं येत गेली, तसतशी तहान लागत होती. डिहायड्रेशन होत होतं. नंतर थोडय़ा वेळाने आम्ही एका नदीपाशी सावलीत थांबलो. तिथे जरा विश्रांती घेतली, पाणी प्यायलो. इतक्या उन्हाळ्यातही नदीचं पाणी आत्ताच फ्रिजमधून आणलेल्या पाण्यासारखं होतं.

पाणी पिऊन तोंड धुऊन बाटल्या भरून चालायला सुरुवात केली. हळूहळू रस्ता कठीण होत होता. मधे माती आणि बारीक दगडांचा एक रस्ता आला. तो चालताना मी धपकन् खाली पडलेही. दुपारी अडीचच्या सुमारास आम्ही आंब्याच्या पाण्याजवळ सावलीत थोडा वेळ विश्रांती घेतली. तिथून चालताना थकवा तर जाणवतच होता आणि रस्ता कठीणही होत होता. बेसकॅम्पपासून थोडय़ा अंतरावर एका दगडातून थेंब-थेंब पाणी पडत होतं. बेसकॅम्पपाशी पाण्याची कोणतीच सोय नसल्याने तिथे गोटू दादाने एक प्लॅस्टिक लावलं.

जेणेकरून ते थेंब-थेंब पाणी तिथे साचलं. शेवटी सुमारे सात तासांच्या मेहनतीनंतर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आम्ही बेसकॅम्पवर पोहोचलो. आमचा बेसकॅम्प म्हणजे शैलभ्रमरच्याच काही सदस्यांनी मिळून तयार केलेली गुंफा. नवरा-सुळक्याच्या पोटात असलेल्या या गुंफेच्या समोरच भले मोठे वाजंत्री, वाजंत्रीची आणि डमरू असे सुळके होते.

सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती. म्हणून सर्वानी आपापल्या बॅगा योग्य जागेवर ठेवून सूर्यास्त होण्याआधी किचन बनवलं. म्हणजेच चूल मांडली. भाज्या, कडधान्य योग्य ठिकाणी ठेवली. रात्रीच्या जेवणाचा बेत तयार होत होता. ताकाची कढी आणि भात. वैशालीने मस्त कढी बनवली. सोबतीला सलाड होतंच. मग आम्ही तिथे पोटभर जेवलो. तिथे पाण्याची एवढी कमतरता होती की, एरव्ही सारखं पाणी उपसणा-या मला टिशू पेपरने ताट पुसण्यावरच समाधान मानावं लागलं. नंतर दुस-या दिवसाचे बेत ठरवून झोपायची तयारी केली. चालून भरपूर अंगमेहनत केल्यामुळे लवकर झोप लागली.

मोहिमेचा दुसरा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठलो. नित्यर्कम आटोपून पुढच्या मोहिमेला निघालो. सुळक्याकडे जाण्यासाठी सगळ्यांनी तयारी सुरू केली. हारनेस घालून सगळे निघाले. वैशाली, सुरेंद्र काका, गोटू दादा आणि मिथून दादाने पुढे जाऊन वाट बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला रस्ता जास्त कठीण नव्हता. पुढे एका ठिकाणाहून वजीर सुळका दिसत होता. काही लोकांची त्यावर चढाई सुरू होती. पुढे रस्ता कठीण झाला. रोप फिक्स करावा लागला. तिथून चढताना जरा भीती वाटत होती.

शेवटी एकदाचे आम्ही त्या अजिंक्य सुळक्याच्या वेशीपाशी पोहोचलो. त्या सुळक्याला नाव द्यायचं होतं. ब्रह्म, विष्णू आणि शंकराच्या शेजारी असलेल्या त्या सुळक्याला 'पार्वती' नाव देण्यात आलं. शूटिंगकरिता आमच्यासाठी पॉन पिनॅकलची जागा सोयीची होती. त्यासाठी विश्वेशने पॉनवर क्लायंबिग करून त्या पार्वती सुळक्यावर बोल्ट्स ठोकले. मग त्याच्यामागून मिथून दादा, मग बाबा आणि मी तिथे गेले. मी आणि बाबा पॉनवर तर मिथून दादा एका छोटया सुळक्यावर बसला होता. पार्वती सुळक्यावर गोटू दादाने लिड क्लायंबिंग सुरू केलं. सुनील काका सेकन्ड मॅन होता. तर राजेश होता थर्ड मॅन. मिथून दादा आणि बाबा शूटिंग घेत होते. मी क्लायंबिंग बघत होतो.

गोटू दादाने क्लायंबिंगला सुरुवात केली. सुळक्याची भिंत सपाट होती. चढाई कठीण होती. पहिला भाग त्याने मोठय़ा हिमतीने पार केला. त्यावर पहिला बोल्ट ठोकला. सेकंड मॅन असलेला सुनील काका तिथे पोहोचला. दुस-या भागात एक कॅरेबिनल होता. तो तर फार कठीण होता. शरीराची एक बाजू त्या कॅरेबिनलमध्ये घुसवून जाम करावी लागली होती. फ्रेंडी तिथे घट्ट बसत नव्हता. त्यामुळे सुळक्यावर जाण्याचा मार्ग अजूनच कठीण झाला होता. तो दुसरा भागसुद्धा त्याने अगदी धाडसाने पार केला.

दुसरा बोल्ट त्याने ठोकण्याचा प्रयत्न केला; पण दगड जास्त मजबूत नव्हता. मग त्याने दुसरीकडे बोल्ट ठोकला. तिस-या भागाचं क्लायंबिग सुरू केलं. पहिल्या दोन भागांपेक्षा तिसरा भाग सोपा होता. तो त्याने सहजतेने क्लाइंब केला. तोपर्यंत पाच वाजले होते. म्हणून त्याने खाली येण्याची तयारी केली. मी त्याचं क्लायंबिग बघत होते. त्याचं क्लायंबिग चित्तथरारक होतं, अगदी 'फुलऑन पैसा वसूल' असं! आम्ही बेसकॅम्पकडे यायला निघालो. पॉनवरून बेसकॅम्प गाठण्यासाठी रॅपिलग करत खाली यावं लागलं. बेसकॅम्पवर आल्यावर प्रसाद दादाने मस्त कोकम सरबत केलं. ते प्यायल्यावर अगदी फ्रेश वाटलं. मग आम्ही गरमागरम चहा प्यायलो. रात्रीच्या जेवणावर मस्त ताव मारला. त्या रात्री बाहेर गार वारा सुटला होता. थंडीही वाजत होती. मग झोपण्याची तयारी करून स्लिपिंग बॅगमध्ये घुसलो.

तिस-या दिवशी सकाळी मुंबईकडे परतण्यासाठी सज्ज झालो. माहुलीगडाचा ट्रेक डेंजर असतो, हे बहुतेकांच्या तोंडून ऐकलं होतं. प्रत्यक्ष मोहीम केल्यावर ट्रेकच्या 'डेंजर'पणाची कल्पना आली. खरंच माहुलीच्या ट्रेकचे ते तीन दिवस अविस्मरणीय होते. त्या तीन दिवसांत खूप काही शिकता आलं. 'टीम स्पिरीट' काय असतं, याचीही प्रचिती आली. मुख्य म्हणजे आम्ही शैलभ्रमरांनी 'पार्वती' सुळक्याचं अजिंक्य पद जिकलं.

Read More »

तपासयंत्रणांची कानउघाडणी

महाराष्ट्रातले मालेगाव हे शहर अत्यंत संवेदनशील शहर म्हणून गेल्या अनेक वर्षापासून ओळखले जाते. १९६७पासून या शहरात अनेकदा दंगली झाल्या आहेत. आता या शहरात २००६साली एका शुक्रवारी शहरातील नामवंत मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाले.

महाराष्ट्रातले मालेगाव हे शहर अत्यंत संवेदनशील शहर म्हणून गेल्या अनेक वर्षापासून ओळखले जाते. १९६७पासून या शहरात अनेकदा दंगली झाल्या आहेत. आता या शहरात २००६साली एका शुक्रवारी शहरातील नामवंत मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाले. त्यात ३१ लोक मारले गेले आणि १२५जण जखमी झाले. या स्फोटांमागे पाकिस्तान समर्थक संघटनांचा हात असणार, असे गृहित धरून तपासकाम सुरू झाले. लष्कर-ए-तय्यबा किंवा त्यासारख्याच दहशतवादी संघटनेने केले असणार, असे गृहित धरून काही मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली होती.

याच पाठोपाठ बांगलादेशातील 'हुजी' या संघटनेचेही हे काम असू शकते, असे मानून याही संघटनेच्या एक-दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. हा सारा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष दहशतवाद प्रतिबंधक पथकाकडून सुरू होता. त्यांनी अशा प्रकारे नऊ जणांना अटकही केली आणि तपास कामाची कोंडी फुटली असल्याचे जाहीरही केले. परंतु स्फोटाच्या घटनेचा आणि अटक झालेल्या तरुणांचा संबंध जोडण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास 'एनआयए' म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी या यंत्रणेकडे सोपवण्यात आला.

या यंत्रणेने मालेगावामधीलस्फोट हे हिंदुत्ववादी संघटनांनी केले असावेत, असा शक्यता व्यक्त करून त्या दिशेने तपास सुरू केला. 'एनआयए'ने या प्रकरणात चौघांना आरोपी केले. त्यांचा सूत्रधार कालसंग्रा हा फरारी आहे आणि प्रज्ञासिंह, त्याचबरोबर असीमानंद या दोघांचा या स्फोटांशी काही संबंध आहे काय, याचाही तपास अजून सुरू आहे. त्याच सुमाराला समझोता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटातील आरोपी आणि मालेगाव स्फोटातील आरोपी यांचे लागेबांधेही तपासणे सुरू आहे. 'हिंदू टेररिझम' म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात आली.

या प्रकरणात दहशतवादविरोधी दलाने नऊ मुस्लिमांची अटक केली होती. मात्र, पुढे तपासात ते निरपराध असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणामुळे त्यांची समाजात बदनामी झाली आणि त्यांना तुरुंगात छळ सहन करावा लागला. या घटनेमुळे मुस्लिम समाजातही नाराजी व्यक्त होत होती. अल्पसंख्यांक समाजातील निरपराध तरुणांचा असा नेहमी छळ होतो, असाही प्रचार काही मुस्लिम संघटनांनी केला. या प्रकरणात कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा हात होता, असे पुरावे सापडले आणि या प्रकरणाचा अधिक तपास सीबीआयने करावा, असे 'एनआयए'ने म्हटले होते.

केंद्र सरकारने या पुढे संशयितांना अटक करण्यापूर्वी किंवा त्यांची चौकशी करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत निर्दोष व्यक्तींचा छळ होऊ नये, या संबंधात योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मुळात हाती ठोस पुरावे असल्याशिवाय एखाद्याला अटक करता येत नाही, असे असताना तपास यंत्रणांनी या ९ जणांची कोणत्या कलमांखाली चौकशी केली आणि ही चौकशी का लांबली, याचाही विचार व्हायला हवा. यात केंद्राची कोणतीही भूमिका नसताना केंद्राने या प्रकरणात लक्ष घालून तपासयंत्रणांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. असे करणे, हे सरकार आपले कर्तव्य आणि जबाबदारीही समजते. सगळयाच बाबींकडे सरकारचे बारिक लक्ष असते, याचेही हे द्योतक आहे.

Read More »

तेजोमय वाणीचा स्मरणोत्सव

स्वामी विवेकानंद १८९३ साली शिकागोला गेले. शिकागो येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्व धर्म परिषदेत सहभागी होणे, हा त्यांचा हेतू होता. त्यासाठी ते मुंबईतून ३१ मे रोजी बोटीत चढले. त्याला आता १२० वर्षे पूर्ण होत आहेत.

स्वामी विवेकानंद १८९३ साली शिकागोला गेले. शिकागो येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्व धर्म परिषदेत सहभागी होणे, हा त्यांचा हेतू होता. त्यासाठी ते मुंबईतून ३१ मे रोजी बोटीत चढले. त्याला आता १२० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मुंबईत रामकृष्ण मिशन या संस्थेतर्फे 'स्वामी विवेकानंद स्मरणोत्सव' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याच वर्षी विवेकानंदांची १५०वी जयंती साजरी होत आहे. त्याच वर्षी हा १२०वा वर्धापन दिन येत आहे, हा दुग्धशर्करा योग म्हटला पाहिजे. लोकांचा असा समज आहे की, स्वामीजी शिकागोला गेले, त्यांनी तिथे जाऊन जोरदार भाषण केले आणि अमेरिकेला जिंकले. पण प्रत्यक्षात घडलेल्या घटना वेगळ्या आहेत. स्वामीजींना अमेरिकेत अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले.

कित्येकदा उपासमारसुद्धा सहन करावी लागली. थंडीत कुडकुडत दिवस काढावे लागले. मुक्कामाचा ठिकाणा नाही, राहण्याची सोय नाही, जेवणाची व्यवस्था नाही, अशा बिकट परिस्थितीत त्यांनी दिवस काढले. शिकागोची ती सर्व धर्म परिषद सप्टेंबरमध्ये व्हायची होती. त्याचे वेळापत्रकसुद्धा स्वामीजींना आणि त्यांच्या हिंतचिंतकांना माहीत नव्हते.

स्वामीजी जूनमध्येच शिकागोला पोहोचले होते. तेथे गेल्यानंतर आपण चुकीच्या वेळी आलो आहोत, हे त्यांच्या लक्षात आले. १५०व्या जयंतीनिमित्त स्वामीजींच्या या सफरीवर बरेच काही ऐकायला मिळणार आहे. परंतु, मुंबईपासून शिकागोपर्यंत त्यांनी जो प्रवास केला त्या प्रवासातील एक गोष्ट लोकांना माहीत नाही. स्वामीजी देशाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक अशा सर्व अंगांनी विकास कसा होईल, याचे चिंतन करत होते. त्यांच्या या सफरीमध्ये त्यांची जमशेदजी टाटा यांच्याशी भेट झाली आणि या दोघांमध्ये काही बोलणे झाले. ही गोष्ट ब-याच जणांना माहीत नव्हती.

परंतु, स्वामीजींच्या निधनाच्या काही दिवस आधीच टाटा यांनी त्यांना जे पत्र पाठवले होते त्या पत्राची प्रत सापडली असून त्या पत्रावरून या दोघांत काय बोलणे झाले, यावर प्रकाश पडला आहे. टाटांनी त्या पत्रात लिहिलेले आहे की, आपल्या सूचनेप्रमाणे देशातील शास्त्रज्ञांना एकत्रित राहता यावे आणि संशोधन करता यावे, यासाठी संस्था स्थापन करावयाचे मी ठरवलेले आहे. परंतु माझी तुम्हाला अशी विनंती आहे की, या संस्थेचे प्रमुख म्हणून आपण काम पाहावे. भारतातील शास्त्रज्ञ खूप विद्वान आहेत.

पण त्यांना संशोधन करण्याची संधी मिळत नाही, त्यासाठी टाटांनी काहीतरी करावे, असे स्वामीजींचे म्हटले होते. अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला असला तरी या अमेरिकेला आम्ही धर्म शिकवणार आहोत, असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. त्या वाणीची गाज, त्या वाणीचे साक्षीदार आपल्याला बनला आले नाही. मात्र, त्या वाणीचा तेजोमय प्रतिध्वनी त्यांच्या स्मरणोनिमित्त पुन्हा घुमू लागेल. त्याचे साक्षीदार आपल्याला सहज बनता येईल.

Read More »

नव्या पिढीचे तानसेन आणि कानसेन

एकीकडे शास्त्रीय संगीत म्हणजे 'आ-ऊ करणे' असा सर्वसाधारण समज असताना दुसरीकडे मात्र 'हमिर' रागाचा गोडवा जपणारं 'मधुबन मे राधिका नाचे रे', 'देवदास' सिनेमातलं 'पुरिया धनश्री' रागाच्या अंगाने जाणारं 'काहे छेड छेड मोसे' किंवा अलीकडच्या 'तलाश'मधलं सोना मोहपात्रा आणि रवींद्र उपाध्याय यांच्या विरुद्धांगी आवाजामुळे बहार आणणारं 'जिया लागे ना' यासारख्या गाण्यांना तरुणाईने अक्षरश: डोक्यावर घेतलं. पण कित्येकदा शास्त्रीय संगीताचा गंध नसलेल्या तरुणाईला आपल्या मोबाइलच्या 'प्ले लिस्ट'मधली कितीतरी गाणी भारतीय शास्त्रीय संगीतावरच आधारलेली आहेत, याबद्दल माहिती नसते. एकंदरीतच शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या आणि इतर तरुणांचा शास्त्रीय संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याबाबत असलेली जागरूकता याविषयीचा हा छोटेखानी सांगीतिक आढावा

भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या ६४ कलांपैकी अतिशय जुनी आणि लोकाश्रय लाभलेली कला म्हणजे संगीत. प्रदीर्घ इतिहास 'संगीत' या कलेच्या गाठीशी आहे. संगीताचे प्रामुख्याने दोन भाग केले गेले ते म्हणजे 'सुगम' आणि 'शास्त्रीय'. भावगीत, लावणी, चित्रपटगीत, अभंग, यासारख्या संगीत प्रकारांचा समावेश केला जातो तो सुगम संगीतात. तर ख्याल, बंदिश, तराणा, नाटयसंगीत, ठुमरी, ध्रुपद, धमार यासारखे गायनप्रकार शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीत या प्रकारात गणले जातात. सुगम संगीत हे सर्वसाधारण सामान्य माणसाच्या अधिक परिचयाचं आहे. कारण ते या ना त्या मार्गातून सतत आपल्या कानावर पडत असतं. कॅ सेट, सीडी, इंटरनेट, एमपीथ्री अशा एक ना अनेक माध्यमांद्वारे क्षणोक्षणी आपल्या संपर्कात येत असतं. मुख्यत: सुगम संगीत हे 'शब्दप्रधान' असल्याने बहुतांश गाण्यांचे शब्द कळायला सोपे असतात. ते सोपे असल्याने माणूस सहजतेने त्याचा अर्थ समजू शकतो. शिवाय अशा गाण्यांच्या ओळी ठरावीक छंदांमध्ये लिहिलेल्या असतात. शब्दसंख्येचं बंधन त्यावर असतं आणि पर्यायाने तालाचं व लयीचं. सोप्या, सुटसुटीत ओळी आणि गाण्याच्या चालीला साजेसा वेगवान ठेका यामुळे गाणं न शिकलेल्या कोणत्याही माणसाला हे संगीत सहजपणे समजतं आणि म्हणूनच भावतं.

शास्त्रीय संगीताचा थाट हा सुगम संगीतापेक्षा बराच भिन्न आहे. वेगवेगळ्या स्वरसंगतीतून निर्माण झालेले राग, ब्रीज, हिंदी किंवा उर्दूचा लहेजा असलेल्या भाषेतल्या बंदिशी, ताना, आलाप, राग, ख्याल, लयकारी, विलंबीत आणि द्रुत लयीतले ताल या प्रकारच्या अनेक घटकांनी मिळून 'शास्त्रीय संगीत' परिपूर्ण होतं. 'ठेहराव' हा या संगीत प्रकाराचा प्राण म्हणता येईल. आपली लय जपत रागाचा एकेक स्वराविष्कार रसिकांसमोर उलगडला जातो. त्यामुळे एखाद्या मैफिलीत ख्याल गाणा-याबरोबरच तो ऐकणा-यालाही त्या ठेहरावाबरोबर स्वरप्रवास करता आला तरच शास्त्रीय संगीताचा खरा आनंद घेता येऊ शकतो. कदाचित हे एक कारण असावं ज्यामुळे शास्त्रीय संगीत एका ठरावीक अभिजन वर्गापर्यंत मर्यादित राहिलं.

पण या सगळ्यात एक चुकीची समजूत होते ती अशी की, समजायला सोपे ('सु-गम') ते सुगम संगीत आणि याउलट (समजायला कठीण) ते शास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीताकडे असं पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे त्याबाबतच्या काही कल्पना लोकांच्या मनात रूढ झाल्या आहेत. विशेषत: शास्त्रीय संगीत न शिकणारी किंवा ज्यांचा शास्त्रीय संगीताशी जवळून संबंध आला नाही, अशी आजची तरुण पिढी फिल्मी गाण्यांकडे पटकन आकर्षित होते. साधारण वीस ते तीस या वयोगटातल्या तीस तरुणांना 'तुम्ही शास्त्रीय संगीत ऐकता का आणि ऐकण्या व न ऐकण्यामागची कारणे' याबाबत विचारले असता संमिश्र चित्र दिसलं. पन्नास टक्के तरुणांनी 'ऐकत नाही' तर पन्नास टक्के तरुणांनी 'ऐकतो' असं सांगितलं. दोन्ही बाजूंच्या तरुणांची कारणं थोड्याफार फरकाने सारखीच आहेत. केवळ बॉलिवुड म्युझिक ऐकणारी स्नेहल सावंत म्हणते, 'मला शास्त्रीय संगीताबाबत आदर आहे, पण माझा तो पिंडच नाही. त्याऐवजी मी बॉलिवुड किंवा हॉलिवुड सिनेमांतल्या गाण्यांना अधिक पसंती देते. कारण शास्त्रीय संगीतातले राग ऐकण्याच्या वेगवेगळ्या वेळा असतात. कोणत्या वेळी कोणता राग ऐकावा याची मला माहिती नसल्यामुळे चुकीचं ऐकलं जाऊ शकतं आणि मग त्याचा परिणाम आपल्या मूडवर होतो. त्यापेक्षा असा कोणताही विचार न करता एमपीथ्री चालू केल्यावर जे गाणं लागलेलं असेल ते ऐकायला सुरुवात करायची, हे मला जास्त आवडतं.'

देवदास, भूलभुलैया किंवा सावली यासारख्या संगीतप्रधान चित्रपटांमध्ये बंदिशी, तराणे, सरगम, ठुमरी या माध्यमांतून शास्त्रीय संगीत आपल्यासमोर येतं, 'नटरंग'मधला किरवाणी रागातला लेहरा आपल्या मनात इतका ठसलाय की बहुतेकांना तो 'नटरंग सिनेमाचं थीम म्युझिक' म्हणूनच लक्षात राहिलाय. म्हणजेच शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसतानाही सामान्य माणसाला या गाण्यांतलं वेगळेपण जाणवतं. काहीतरी भव्यदिव्य, खोल, विचार करायला लावणारं असं यात आहे, याची कल्पना येते. 'पंचम सूर में अनहद गुंजे, दसों द्वार के खोले' असं 'अग्नि बॅण्ड'च्या 'कबिरा' या गाण्यात म्हटलेलं आहे. पण त्या 'पंचमा'मधली 'जादू काय आहे' हे कळण्याआधी त्यात 'जादू आहे', हे कळणं आवश्यक आहे आणि हीच शास्त्रीय संगीताचा 'रसिक वर्ग' तयार होण्याची पहिली पायरी आहे. 'मुंबई विद्यापीठ – संगीत विभाग' आणि 'शारदा संगीत विद्यालय' या ठिकाणी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असलेला मानस विश्वरूप याबाबत सांगताना म्हणाला, 'की हल्ली ब-याच हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये शास्त्रीय संगीताचा वापर केलेला दिसतो, ही निश्चितच चांगली बाब आहे.

कारण त्या मार्गाने शास्त्रीय संगीत अधिकाधिक तरुणांच्या कानावर पडतंय. त्यामुळे या मार्गानेही तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड वाढू लागेल, असं वाटतं. कारण ही गाणी आपल्यासमोर फिल्मच्या माध्यमातून येत असली तरी त्यांच्यावर मूळ संस्कार शास्त्रीय संगीताचेच असतात. त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या धाटणीची पण तरी काहीशी फिल्मी वाटणारी ही गाणी तरुणांना आवडत आहेत. आज माझ्याकडे येणारे कितीतरी विद्यार्थी ही गाणी ऐकून प्रेरित होऊन शास्त्रीय संगीताकडे वळतात. कारण गाणं कितीही आवडलं तरी त्या गाण्यातली हरकत किंवा एखादी जागा गाण्यासाठी शास्त्रीय संगीताचा पाया आवश्यकच असतो. त्यामुळे या जिज्ञासेतून तरुण शास्त्रीय संगीताकडे वळत आहेत.'

'संगीत' हे करमणुकीचं माध्यम तर आहेच, पण त्याहीपलीकडे त्याचा विस्तार आहे. 'संगीतोपचारां'नी ते सिद्ध करून दाखवलं आहे. अनेक दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाल्याचे अनेक दाखले वाचायला मिळतात. अनेक बुजुर्ग शास्त्रीय गायक तर 'शास्त्रीय संगीत साधना हा ब्रह्मशोधाचा मार्ग आहे, असं मानतात. आपल्या दैनंदिन जीवनातही शास्त्रीय संगीताचा बराच फायदा होतो. शास्त्रीय संगीत शिकत नसले तरी त्याची 'श्रवणभक्ती' करणा-या तरुण मंडळींनी सांगितलं की, 'आजच्या धावपळीच्या युगात मनाला शांतता हवी असते. ही शांतता शास्त्रीय संगीतातून नक्कीच मिळते. शास्त्रीय संगीतातली निर्मळता, शुद्धता इतर कोणत्याही सांगीतिक प्रकारातून मिळणार नाही. या शास्त्राने नेमून दिलेले राग त्या त्या प्रहराप्रमाणे ऐकले तर निसर्गाच्या सान्निध्यात गेल्याचा एक वेगळाच अनुभव मिळतो. कदाचित गायक काय गात आहे, कोणता राग गात आहे, ही माहिती नसेल पण यातून मिळणारं आंतरिक समाधान हे अवर्णनीय आहे, याची मात्र खात्री पटते.' 'शास्त्रीय संगीत ऐकणे' हा मन एकाग्र करण्याचा आतिशय परिणामकारक मार्ग आहे, याबाबत आजची तरुण पिढी निश्चितच जागरूक आहे.

सूर, ताल, लय हे संगीताचे अविभाज्य भाग आहेत. पण त्यातही 'ताला'ची जादू काही औरच आहे. विलंबित लयीपेक्षा द्रुतलियीतलं संगीत तरुणांना जास्त भावतं. शिवाय 'फ्युजन'मध्ये पाश्चिमात्य ढंगाचा वापर असतो. आणि म्हणूनच 'फ्युजन' या प्रकारात शास्त्रीय संगीताचा कितीही वापर केला असला तरी एरवी 'कंटाळवाणं' म्हणून शास्त्रीय संगीताकडे बघणारा तरुणवर्ग 'फ्युजन'च्या कार्यक्रमांना मात्र गर्दी करतो. 'कोणत्याही एका चौकटीत अडकून न राहता प्रत्येक प्रकारच्या संगीताला समर्थपणे साथ करता आली पाहिजे', असं ध्येय बाळगणारा तरुण तबलावादक प्रसाद पाध्ये म्हणाला, 'फ्युजन' हा प्रकार तरुणांना आवडेल असाच आहे. यात 'तालाशी खेळणं' हा प्रकार असल्याने तरुण प्रभावित होतात आणि फ्युजनच्या कार्यक्रमांना मोठया प्रमाणावर गर्दी करतात. पण 'फ्युजन' म्हणजेच शास्त्रीय संगीत नव्हे. 'शास्त्रीय संगीताकडे लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं माध्यम' म्हणून फ्युजनकडे पाहिलं पाहिजे. कारण अशा कार्यक्रमांना बरीच गर्दी होत असल्याने यातून आर्थिक फायदा बराच होतो. पण कोणत्याही वादकाने 'आपल्या कलेमुळे शास्त्रीय संगीत ऐकणारा, जाणणारा एक वर्ग तयार झाला की थांबायचं' हे ठरवूनच 'फ्युजन'कडे वळलं पाहिजे. कारण सध्याचं फ्युजन हे 'आयपीएल'सारखं आहे. प्रेक्षकांची तुफान गर्दी होत असली तरी त्याच्या आहारी जाता कामा नये, आपल्याला पुन्हा 'टेस्ट मॅच' खेळायची आहे, हे कायम लक्षात असलं पाहिजे.'

संगीताच्या कोणत्याही कार्यक्रमात गायकांबरोबरच वादकांची भूमिकाही तितकीच तोलामोलाची असते. रूढार्थाने चालत आलेली केवळ 'साथीदार' ही ओळख पुसून टाकत आज शास्त्रीय संगीत आणि इतर क्षेत्रांत 'स्वतंत्र वाद्यवादना'तून आपला वेगळा ठसा उमटवणारे अनेक तरुण वादक तयार होत आहेत. गेली १७ वर्षे हार्मोनियम वादनाची तालिम घेणारा सुधांशू घारपुरे याबाबत सांगतो, 'मी आवड म्हणून हार्मोनियम शिकायला सुरुवात केली. पण सात-आठ वर्षानंतर त्यातली खोली कळत गेली. त्यामुळे गोडी वाढली. पूर्वी बहुतकरून हार्मोनियम हे केवळ 'नाटयसंगीताला साथ करणारं वाद्य' यापुरतंच मर्यादित होतं. लोक अजूनही 'हार्मोनियम वादनाचा स्वतंत्र कार्यक्रम' ही संकल्पना पटकन स्वीकारायला तयार होत नाहीत. पण हळूहळू स्वतंत्र वादनाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. 'शास्त्रीय एकल वादन' अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात वादकाचा वाटा सर्वात मोठा असतो. त्यामुळे तुमच्या कलाभ्यासावर असलेला तुमचा विश्वास आणि गुरूचा पाठिंबा या आधारावर तुम्ही 'एक स्वतंत्र वादक' म्हणून तुम्ही तुमची ओळख निर्माण करू शकता.'

शास्त्रीय संगीत हा एक प्रवास आहे. वादक म्हणून असो किंवा गायक म्हणून असो 'शास्त्रीय संगीतात करिअर' करण्यासाठी प्रामाणिक संगीत साधनेशिवाय पर्याय नाही. स्वरांची ओळख झाल्यानंतर शास्त्रीय संगीताच्या शिक्षणातला श्रीगणेशा म्हणजे 'अलंकार' आणि अनेक वर्षाच्या सांगीतिक तपश्चर्येनंतर लौकिकार्थाने मिळणारी पदवीसुद्धा 'अलंकार'च! हे नामसाधम्र्य म्हणजे अखंड संगीतसाधना केल्यानंतरही 'ही सुरुवात आहे' याची जाणीव करून देणारे सूचकच जणू! सुगम संगीतातल्या ठरलेल्या चाली गाण्यापेक्षा एखादा राग मांडताना त्यातून त्या रागाबाबतचा विचार आणि सृजनशीलता दरवेळी नव्याने मांडता येते म्हणून शास्त्रीय संगीतातल्या ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याचा अभ्यास करणारी तरुण गायिका दीपिका भिडे सांगते, 'शास्त्रीय संगीत ऐकणारे आणि या क्षेत्राचा अभ्यास करणारे बरेच तरुण आहेत. पण या क्षेत्रात करिअर करायचं तर अनिश्चितता आहेच.

कारण शास्त्रीय संगीत शिकणे ही एक प्रक्रिया आहे. इथे 'रिअलिटी शो' हा प्रकार नाही. त्यामुळे 'झटपट प्रसिद्धी' या क्षेत्रात नाही. संयमाने, निष्ठेने अणि प्रामाणिकपणे गायनसेवा करत राहणं गरजेचं असतं. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा दिल्या म्हणजे तुम्हाला उत्तम गाणं आलं असं होत नाही. त्यामुळे करिअर करायचं असेल तर 'कशाला तरी पर्याय' किं वा 'साइड बाय साइड' म्हणून गाणं करता येत नाही. शिवाय लोकांना चांगलं गाणं ऐकवायचं आहे की फक्त पैसे मिळवायचे आहेत, हे गायकाला ठरवावं लागतं. त्यामुळे शास्त्रीय संगीतात करिअर निश्चितच होऊ शकतं पण संयम आणि अव्याहत कलाभ्यास गरजेचा आहे.'

'बोलांत बोबडीच्या संगीत जागविले,
लयतालसूरलेणे सहजीच लेवविले,
एकेक सूर यावा नाहून अमृताने,
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे'

असं शांताबाई शेळके यांनी लिहून ठेवलं आहे. खरोखरच, एक उत्तम कलाकार घडण्यासाठी त्या शिष्याला उत्तम गुरू लाभणं गरजेचं असतं. 'तस्मै श्रीगुरवे नम:' म्हणून कलाभ्यास करणारे अनेक नवोदित गायक शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवू पाहत आहेत. देशपातळीवर शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मोलाचं काम करणा-या 'पंचम निषाद' या संस्थेचे सर्वेसर्वा शशी व्यास याबाबत बोलताना म्हणाले की, 'तरुण आणि शास्त्रीय संगीत याबाबत बोलायचं झालं तर सध्या १० ते १५ या वयोगटातली मुलं अजून म्हणावं तितकं शास्त्रीय संगीत ऐकत नाहीत. कारण या वयात शारीरिक ऊर्जा जास्त असते. त्यामुळे अंतर्मुख करणारं संगीत या मुलांकडून कमी ऐकलं जातं. २० ते ३० या वयोगटातलली मंडळी शास्त्रीय संगीताकडे वळत आहेत.

सावनी शेंडये, राहुल देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी, संजीव अभ्यंकर यासारख्या तरुण शास्त्रीय गायकांचं गायन ऐकण्यासाठी ही मुलं जास्त उत्सुक आहेत. तर ३० ते ४० या वयोगटातला केवळ मराठीच नाही तर गुजराती, साऊथ इंडियन, बंगाली रसिकवर्गही आम्हाला कार्यक्रमांदरम्यान बघायला मिळत आहे. मुळात शास्त्रीय संगीत हे 'लिसनर फ्रेंडली' बनवलं पाहिजे. शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून गायकाला श्रोतृवर्गाशी जवळीक साधता आली पाहिजे. प्रत्येक पिढी आपलं संगीत घेऊन येत असते. त्याकाळी तानसेन जसा एखादा राग आळवत असेल, तसाच आत्ता गायला जात नाही. प्रत्येक कलाकाराला त्याच्या पद्धतीने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य त्याच्या गुरूने दिलंच पाहिजे. एखाद्या शिष्याची वयाची चाळीशी उलटल्यानंतरही जर गुरू त्याला सांगत असेल की 'अभी तुम्हारा सिखना बाकी है' तर तो कलाकार लोकांसमोर कधी येणार? आपल्याकडे वयाची सत्तरी-पंच्याहत्तरी ओलांडली तरी शिष्यांना मागे ठेवून लोक स्वत:च गात राहतात. पण आपण पूर्वायुष्यात ग्रहण केलेले अनुभव नवीन पिढीला देत त्यांची जडणघडण करणे हे 'वानप्रस्थाश्रमा'तील व्यक्तीचं कर्तव्य आहे. शास्त्रीय संगीताबाबतच्या रूढी आधी दूर केल्या पाहिजेत. 'पं' ही पिढी तरुण पिढीला नकोय. आजची तरुण पिढी चांगल्या गाण्याला उत्तम दाद देण्याएवढी सुजाण आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणात काळाप्रमाणे बदल झाले पाहिजेत.'

आजची तरूण पिढी ही 'तंत्रज्ञानप्रेमी' आहे. तंत्रज्ञानाची कास धरून आपल्या कलेसाठी तरुण त्याचा उपयोग करून घेत आहेत. आजमितीला मोबाइलवर अनेक अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत ज्याचा वापर आपण शास्त्रीय संगीतासाठी करून घेऊ शकतो. शास्त्रीय संगीताशी निगडित 'तानपुरा ड्रॉइड', 'रागा-क्रुक्स लाइट', 'से ताल-मात्रा-प्रो' यासारखी अॅप्लिकेशन्स आज आपल्या हातात आहेत. पण ही अॅप्लिकेशन्स वापरण्याआधी त्याची विश्वासार्हता तपासून पाहणं आवश्यक असतं. बहुतेक सर्वच कलाकार सूर- ताल- लय यांच्या बाबतीतली अचूकता पडताळून पाहिल्याशिवाय त्यांचा वापर करत नाहीत. एक सोय म्हणून या अॅप्लिकेशन्सचा वापर केला जातो. रियाज करताना प्रत्येक वेळी साथीदार असतोच असं नाही, अशा वेळी ही अॅप्लिकेशन्स मदत करतात. पण प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या सादरीकरणात बहुतांश कलाकार मॅन्युअल वाद्यं वापरणंच पसंत करतात. कितीही अॅप्लिकेशन्स आली तरी प्रत्यक्ष वाद्याची साथ असणं किती महत्त्वाचं आहे, याची जाण तरुण कलाकारांना आहे. 'कानसेन' मंडळीही शास्त्रीय संगीताची ओळख करून घेण्यासाठी या अॅप्लिकेशन्सचा वापर करू शकतात.

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातली एक आनंददायक गोष्ट म्हणजे २४ बाय ७ चालणा-या वाहिन्यांच्या मांदियाळीत शास्त्रीय संगीताला वाहिलेली 'इनसिंक' ही वाहिनीसुद्धा नव्याने प्रवेश करत आहे. येत्या जून महिन्याच्या अखेरिस ही वाहिनी संपूर्ण भारतभर प्रक्षेपित होईल. या वाहिनीचे व्यवस्थापकीय संचालक रतीश तागडे यांनी सांगितलं की, 'गेल्या दहा वर्षापासून इव्हेंट मॅनेजमेंट करत असताना आमच्या लक्षात आलं की, शास्त्रीय संगीताचा मोठा रसिकवृंद आहे. पण या वर्गाला उत्तम गाणं ऐकायला मिळत नाही. तसंच उत्तम गुणवत्ता असलेले शास्त्रीय संगीतातले कलाकार आपल्याकडे आहेत. पण या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. कारण शास्त्रीय संगीतातल्या बुजुर्ग व्यक्तींनंतरचे शास्त्रीय संगीत गायक, वादक सर्वसामान्य लोकांना माहीतच नाहीत. त्यामुळे ही मधली पोकळी भरून काढण्यासाठी 'चॅनल' हे सशक्त माध्यम आहे, असं आम्हांला वाटलं. मग खरंच शास्त्रीय संगीत ऐकणारा तरुणवर्ग आहे का? त्यांना अशी वाहिनी बघायला आवडेल का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वेक्षण केलं, तरुणांशी चर्चा केल्या आणि त्यानंतर ही वाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. शास्त्रीय संगीताचा प्रेक्षकवर्ग वाढवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. त्यामुळे तरुणांना आवडेल अशा प्रकारे कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात येईल. शिवाय शास्त्रीय संगीत कसं ऐकावं, त्यातल्या सौंदर्यस्थळांचा अनुभव कसा घ्यावा, यादृष्टीनेही काही कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत ऐकणारा वर्ग वाढवण्यास मदत होईल.'

एकंदरीतच शास्त्रीय संगीताबाबतचं एकूण चित्र आशादायी आहे, असं वाटतं. अनेक कलासंपन्न तरुण कलाकार या क्षेत्रात येत आहेत. 'कालाय तस्मै नम:' म्हणत शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणात हळूहळमू बदल होत आहेत. सीडी, एमपीथ्री, इंटरनेट यासारख्या तंत्रज्ञानामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. आणि शास्त्रीय संगीताची थिएरी माहिती नसली तरी त्याचे प्रॅक्टीकल फायदे आहेत, हे 'कानसेन' तरुण जाणतात. 'मालवून टाक दीप' किंवा 'जीवलगा' ही गाणी कोणत्या रागातली आहेत हे माहीत नसलं तरी त्यातून जाणवणारी 'आर्तता' ही भावना वैश्विक आहे.

कारण शेवटी मानवाच्या प्रत्येक जाणीवेमध्ये संगीत आहे. सूर, ताल, लय यांना आपण आपल्यापासून वेगळं करू शकत नाही. त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या बाहयरूपात आवश्यक बदल झाले तरी त्याचा गाभा मात्र तरुणांना आकर्षित करतच राहील, असा विश्वास टाकतो. 

Read More »

फिक्सिंग हा जुगारच

श्रीशांत आणि अन्य दोन खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्यानंतर त्यांच्यासह १४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग रोखण्यासाठी कायद्यात अद्याप तरतूद नाही. असे असले तरी असे गरप्रकार म्हणजे जुगार खेळून इतरांची फसवणूकच आहे. क्रिकेट नियामक मंडळाच्या आचारसंहितेचा हा भंग असून लाखो प्रेक्षकांची ती फसवणूक आहे. म्हणून या दोषी आढळणा-या आणि फिक्सिंग करणा-या प्रत्येकाला कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. असे गरव्यवहार रोखण्यासाठी कडक कायद्याची तरतूद होणे, हे क्रिकेटची विश्वासार्हता टिकवण्यासाठीही महत्त्वाचे आहे.

आयपीएलच्या सामन्यात श्रीशांत आणि अन्य दोन खेळाडूंसह काही सट्टेबाजांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांवरून अटक झाल्यानंतर क्रिकेट विश्वातील काळे सत्य पुन्हा एकदा समोर आले. यामध्ये दिवसागणिक नवनवीन गौप्यस्फोट होत असल्यामुळे याची पाळेमुळे खोलवर रुतलेली असल्याचे स्पष्ट होते. त्याचबरोबर फिक्सिंगचा हा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू असल्याचे त्यावरून स्पष्ट होते. क्रिकेटमध्ये फिक्सिंग किंवा सट्टेबाजी होणे, ही तशी नवीन गोष्ट म्हणता येणार नाही.

काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, भारतात क्रिकेटमध्ये सट्टेबाजीतून वर्षाला सुमारे २५०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक रकमेचा गरव्यवहार होतो. स्पॉट फिक्सिंगसाठी अजून कायदा अस्तित्वात आला नसला तरी असे प्रकार करणे, हे एकप्रकारे जुगार खेळण्यासारखेच आहे. असे करून संबंधित आरोपींनी क्रीडा रसिकांची मोठी फसवणूक केली आहे. ज्यांनी फिक्सिंग घडवून आणले, तेही जुगारीच आणि त्यांच्या इशा-यांवरून जे खेळाडू खेळले तेही जुगारीच ठरतात. क्रिकेटसारखा खेळ हा जुगार खेळण्याचा धंदा नाही.

त्यामुळे ही क्रिकेटविश्वाची, क्रिकेट नियामक मंडळाची आणि हजारो रुपये खर्च करून खेळ पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचीही फसवणूक आहे. त्यामुळे हा गुन्हा ४२० कलमाखाली मोडतो. या कलमाखाली आरोपीला जी शिक्षा देण्यात येते, तीच सध्या स्पॉट फिक्सिंग करणा-यांना होईल. यासाठी त्यांना दंडही भरावा लागेल आणि किमान दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागेल. स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंग करणे हे क्रिकेट नियामक मंडळाच्या आचारसंहितेत नाही. त्यामुळे हा आचारसंहितेचाही भंग आहे. त्यासाठी आरोपींना कोणती शिक्षा द्यायची, हे क्रिकेट नियामक मंडळाने ठरवायचे आहे. 'बीसीसीआय'च्या आचारसंहितेत खेळाडूंनी कसे खेळावे, कोणते नियम पाळावेत, कोणत्या प्रकारचा पेहराव त्यांनी खेळताना वापरावा, कोणत्या गोष्टी त्यांनी करू नयेत, याचे नियम ठरवून दिलेले असतात. या खेळाडूंनी त्याचे उल्लंघन केले आहे.

जुगारी व्यक्ती पकडली गेल्यास तिच्यावर जी कारवाई करण्यात येते तीच स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी झालेल्या सर्वावर व्हायला हवी. म्हणजे ज्यांनी खेळाडूंना बॉल कसा टाकायचा ते सांगितले, त्यासाठी त्यांनी सिग्नल दिले, त्यांच्या इशा-यावर ज्या खेळाडूंनी खेळ केला ते सर्व या आरोपाखाली दोषी आहेत. आपल्या देशात कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. कोणत्याही मोठय़ा पदावरील व्यक्तीने गुन्हा केला तरी सामान्य माणसाला जो कायदा तोच त्या व्यक्तीलाही लागू होतो. त्यामुळे कोणत्याही लोकप्रिय खेळाडूने गुन्हा केला असला तरी त्याला कायद्यातून सूट मिळणार नाही. श्रीशांतसारख्या खेळाडूने खेळात लोकप्रियता मिळवली असली तरी त्याला कायद्याचा सामना करावाच लागेल.

कायदा सर्वाना समान असल्यामुळे व्यक्ती कोण आहे, हे तो पाहत नाही. थोडक्यात आपल्याकडे कायद्याचे राज्य आहे. पण, काही लोक कायद्याचे राज्य अवलंबण्याऐवजी 'काय द्या' या प्रश्नाच्या मागे लागलेले असतात आणि त्यांच्याकडून कायद्याचा भंग होतो. अशा लोकांची कायद्याविरुद्धची कृत्ये ही सामाजिक फसवणूक असते. स्पॉट फिक्सिंगही त्यापैकीच एक आहे.

आपल्या देशातील क्रिकेटप्रेम सर्वश्रूत आहे. लाखो लोक क्रिकेट पाहत असतात. स्पॉट फिक्सिंग किंवा मॅच फिक्सिंग ही या लाखो क्रिकेटप्रेमींशी करण्यात आलेली प्रतारणा आहे. आताच्या आयपीएलमध्ये ज्या खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केले ते तरुण खेळाडू आहेत. वास्तविक, त्यांना क्रिकेटमधून कोटयवधी रुपयांची कमाई होत असते. इतके असूनही ही पिढी अशा गरमार्गाला का जाते, याचा विचार करायला हवा. इतक्या टोकाची भूमिका घेऊन ही पिढी बिघडते याचे कारण त्यांच्यासमोर कोणी आदर्श नाही. मागच्या पिढीतील लोकांनी त्यांना गुन्हे करायला शिकवले असण्याची शक्यता जास्त आहे. गुणी माणसे गुणांची पारख करू शकतात. अशी अवगुणी माणसे पुढे येत असतील तर त्यांची पारख करण्यासाठी कोणी गुणी माणसे शिल्लक नाहीत, असाही त्याचा अर्थ होतो.

आजच्या तरुण पिढीपुढे गरव्यवहार करणा-यांचेच आदर्श आहेत. मागच्या पिढीतील माणसे सन्मार्गाने पुढे गेली तर पुढची पिढीही त्यांचे अनुकरण करते. पण, अशी आदर्श माणसे आज नसल्यामुळे पुढच्या पिढीला सन्मार्गाचा अवलंब करून पुढे जावे, असे वाटत नाही. खासदार व्हायचे असेल तर त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करावे लागतात, हे सा-यांना माहीत आहे. इतके पैसे खर्च केले की, पुढे जाता येते, अशी पुढच्या पिढीची मानसिकता बनलेली आहे. चांगल्या वर्तनाची माणसे एका कोप-यात पडतात.

भानगडी केल्या की, पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होतो, असे वाटल्याने पुढची पिढी त्याच मार्गाने जाते. पंतप्रधान कार्यालयातील अधिकारीही गरव्यवहारात गुंतलेले असल्याचे समोर येते. मूल्यांवरील विश्वास उडण्यासाठी हे पुरेसे आहे. त्यामुळे मूल्य हरवून पुढची पिढी गरव्यवहारात गुंतली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. थोडक्यात पुढच्या पिढीला आम्हीच बिघडवले आहे. त्यामुळे अशा गरव्यवहारांची जबाबदारी आपणही (मागच्या पिढीने) घ्यायला हवी.

वाईट मार्गाने गेल्यास चांगले होते, हे दाखवून दिल्यास मूल्यांवरचा विश्वास उडतो. आपण ऐकतो तसे पाहतही असतो. श्रीशांत आणि त्याच्या दोन सहका-यांनी जे केले ते करताना त्यांचे कान आणि डोळेही उघडे होते. त्यांनी असे प्रकार या आधी झालेले पाहिले होते. असे केल्याने फारसे काहीही बिघडत नाही. काही काळ गेला की, पुन्हा प्रगतीचा मार्ग सापडतो, हे त्यांना माहीत होते. त्यामुळे आपणही त्या मार्गाने गेले तर काय हरकत आहे, असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. परिणामी स्पॉट फिक्सिंगप्रकरणी एकटा श्रीशांत आणि त्याच्या दोन सहका-यांवर सा-या आरोपांचे खापर फोडून चालणार नाही.

वाईट मार्गाने गेल्याने यश मिळते, हे त्यांनी पाहिले असल्याने मूल्यांवरचा विश्वास उडून त्यांनी हे कृत्य केले. एक आंबा नासला की, तो ज्या पेटीमध्ये असतो त्या पेटीतील इतर आंबेही नासतात. आजच्या खेळाडूंसमोर फारसे आदर्श नाहीत. सध्या खेळाडूंसाठी खेळ हा केवळ पैसा कमावण्याचे साधन बनलेला आहे. स्पॉट फिक्सिंगसाठी अजून कायदा नसला तरी ही फसवणूक आहे. त्यामुळे फसवणुकीच्या गुन्हय़ाखाली होणारी शिक्षा आरोपींना होईल. तसेच कायद्याअभावी कडक शिक्षा झाली नाही तरी प्लेअर्स असोसिएशनला त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार आहे. ते या खेळाडूंवर खेळण्यास आजीवन बंदी घालू शकतात. या आधीही क्रिकेटमध्ये अनेक गरव्यवहार झाले होते. त्यातील खेळाडूंना कडक शिक्षा न झाल्यामुळे नवीन पिढीतील खेळाडूही अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींकडे आपोआप ओढले जातात. म्हणूनच असे गरप्रकार टाळण्यासाठी कडक कायद्याची तरतूद केली पाहिजे.

मॅच फिक्सिंगविरोधात अद्याप कोणतेही कलम नाही
२०००मध्ये झालेल्या 'पेप्सी कप' मॅच फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलीस आजपर्यंत न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकलेले नाहीत. १४ वर्षापूर्वी झालेल्या एका मॅच फिक्सिंग प्रकरणात कोणत्याही कायद्यांतर्गत या क्रिकेटपटू विरोधात आरोपपत्र दाखल करता येऊ शकत नाही, असे सांगून सीबीआयने हे प्रकरण बंद करून टाकले होते. १९९९मध्ये दिल्ली पोलिसांनी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हन्सी क्रोनिएबरोबर भारतीय संघाचा कर्णधार महम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा आणि असे मोठे खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा खुलासा केला होता. नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. दोन वर्षाच्या तपासानंतर सीबीआयला हे खेळाडू दोषी असल्याचे आढळले आणि त्यांच्या विरोधात पुरावेही गोळा करण्यात आले. पण, कायद्याच्या कोणत्याही कलमात मॅच फिक्सिंगचा गुन्हा दाखल करता न आल्याने खेळाडूच्या विरोधात आरोपपत्र दाखल होऊ शकले नाही. त्यामुळे या खेळाडूंना कोणती शिक्षाही झाली नाही. मात्र, 'बीसीसीआय'ने अझरुद्दीन आणि अजय शर्मावर आजीवन बंदी घातली.

 

Read More »

पदावरील भक्षक

महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ महिलांवरीलच नव्हे तर अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटना देशात रोज घडत आहेत व त्या रोखण्यासाठी सरकारला कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदाही करावा लागला आहे. पण महिलांविषयी विकृत दृष्टिकोन, पुरुषप्रधान संस्कृतीचा अजूनही असलेला प्रभाव व पदाचा दुरुपयोग यामुळे लैंगिक शोषणाचे प्रकार सर्वत्र वाढत आहेत.

महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ महिलांवरीलच नव्हे तर अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटना देशात रोज घडत आहेत व त्या रोखण्यासाठी सरकारला कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदाही करावा लागला आहे. पण महिलांविषयी विकृत दृष्टिकोन, पुरुषप्रधान संस्कृतीचा अजूनही असलेला प्रभाव व पदाचा दुरुपयोग यामुळे लैंगिक शोषणाचे प्रकार सर्वत्र वाढत आहेत.

लैंगिक शोषणाचे हे गुन्हे सगळ्या क्षेत्रात घडत आहेत व आपल्या पदाचा दुरुपयोग करणा-या अधिका-यांची दुष्कृत्ये जेव्हा प्रसारमाध्यमातून चव्हाटय़ावर येतात तेव्हा एकच खळबळ उडते. लैंगिक शोषणाच्या या कथा सरकारी व निमसरकारी आस्थापना, स्वायत्त संस्था, शाळा, आश्रम शाळा, लहानमोठय़ा खासगी कचे-या, कॉर्पोरेट कंपन्या अशा सर्व ठिकाणी घडत असतात. असा लैंगिक छळ करणारे केवळ उच्चपदस्थ व अधिकारीच असतात असे नव्हे, तर ते सामाजिक कार्यकत्रे, शिक्षक, आश्रमशाळांचे व्यवस्थापक, गतिमंद मुलींच्या संस्थांचे चालक असतात.

यामध्ये होणा-या असंख्य महिलांच्या लैंगिक शोषणाच्या कथा बराच काळ बाहेर येतच नाहीत. त्या बाहेर येतात तेव्हा त्यातील व्यक्ती कधी कधी एवढय़ा मान्यवर असतात की, प्रथम त्यावर विश्वासच बसत नाही. अनेकदा या मंडळींचे राजकारण्याशी संबंध असल्याने दबाव येऊन अशी प्रकरणे दडपली जातात. लेखक आणि सामाजिक कार्यकत्रे 'उपरा'कार लक्ष्मण माने यांच्याविरोधात त्यांच्या संस्थेमधील पाच ते सहा महिलांनी लैंगिक शोषणाची तक्रार केली. प्रथम दोन महिलांनी माने यांच्याविरुद्ध तक्रार केल्याबरोबर सर्वत्र एकच खळबळ उडाली.

लोकांचा यावर विश्वासही बसेना. लक्ष्मण माने या दोन महिलांच्या तक्रारीनंतर बेपत्ताच झाले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध आणखी तीन महिलांनी लैंगिक शोषणाबद्दल तक्रारी केल्या. अखेर ब-याच दिवसांनंतर माने पोलिसांना शरण आले. आपल्या संस्थेतील महिला व मुली या आपल्या वासनापूर्तीसाठीच आहेत, असे मानणारे संस्थाचालक परिस्थितीचा फायदा घेऊन स्त्रियांवर अत्याचार करत असतात. नव्या मुंबईतील नेरुळ येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेतील १९ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याबद्दल संस्थेचा संचालक सतीश पागी याला सत्र न्यायालयाने दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

संचालकांच्या अत्याचाराला कंटाळून आश्रमातील ३१ मुली आश्रमातून पळून जात असताना गस्तीवरील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, तेव्हा हा प्रकार उघडकीला आला. गतिमंद मुलींच्या संस्थांमधील मुलींचे, चालक वा व्यवस्थापक यांच्याकडून लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक घटना अलीकडे उघडकीला आल्या आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाची ही कथा आणि व्यथा सर्व क्षेत्रात अव्याहतपणे चालू असते.

सरकारी वा निमसरकारी कार्यालयात व विविध कंपन्यांच्या कार्यालयात महिलांचे मोठया प्रमाणावर लैंगिक शोषण होते. वरिष्ठांच्या दबावाखाली कर्मचारी वर्ग असल्याने ब-याचदा अशा प्रकारांविरुद्ध आवाज उठवला जात नाही. तसेच आपलीच बदनामी होईल, या भीतीने अनेक महिला तक्रार करायला पुढेही येत नाहीत. महाराष्ट्राच्या खेडोपाडी धावणारी एसटी हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय. भारतातच काय, पण जगात सार्वजनिक क्षेत्रात एवढा व्याप असलेली सर्वात मोठी वाहतूक संस्था कुठेही नसेल.

एखाद्या संस्थेतील काही अधिका-यांना आपले काम कार्यक्षमतेने करण्याऐवजी त्यांचे 'लक्ष्य' दुसरेच असते. राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागातल्या एका वरिष्ठ अधिका-याचे लक्ष असेच चळले आहे व काही महिला कर्मचा-यांकडे तो लैंगिक सुखाची मागणी करत आहे. या अधिका-याचा छळवाद खूपच वाढल्याने अखेर तीन महिलांनी महामंडळाचे व्यवस्थपकीय संचालक दीपक कपूर आणि अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे व या अधिका-याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही वर्षापासून वाहतूक विभागात हा प्रकार सुरू आहे. ज्या महिला वाहतूक अधिका-यांच्या इच्छेला बळी पडत नाहीत, त्यांना त्रास देण्याचे सत्र चालू होते. अनेक महिला लोकोपवादाच्या भीतीने अनेक वष्रे गप्प बसला होत्या. ज्या महिला आपल्याला दाद देत नाहीत त्या महिलांना किरकोळ कारणांवरूनही त्रास देणे, मेमो देणे, त्यांच्या कामावर प्रतिकूल शेरे मारणे, वगैरे प्रकार या विभागात चालू झाले. आपल्याला 'अनुकूल प्रतिसाद' न देणा-या महिला कर्मचा-यांना हा वरिठ अधिकारी 'माझी वपर्यंत ओळख आहे, तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही' अशा धमक्याही देत असतो.

वाहतूक विभागातील काही महिलांनी या अधिका-याच्यात्रासाला कंटाळून आपली दुस-या विभागात बदली करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. खरे म्हणजे या प्रकाराची दखल घेऊन वरिष्ठ अधिका-यांनी या वासनांध अधिका-याला वेळीच वेसण घालायला हवी होती. पण या आधी काही महिलांनी व्यवस्थापकीय संचालकांकडे तोंडी तक्रार केली असूनही त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. पण वरिष्ठांनी या तक्रारींकडे लक्ष दिले नाही. त्यांनी वेळीच दखल घेऊन जर कारवाई केली असती तर गोष्टी या थराला गेल्या नसत्या. पण अनेकदा अशा ज्येष्ठ अधिका-याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारींकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करतात व जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात.

कशाला आपण या भानगडीत पडायचे, असा विचार करून हे वरिष्ठ अधिकारी कातडी बचाऊपणा करतात व त्यामुळेच अशा अधिका-यांचे फावते. 'प्रहार'ने प्रकरण लावून धरल्याने महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी आता या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांनीही या प्रकरणी कडक कारवाई करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरकारी व खासगी कार्यालयात सुंदर स्त्रियांकडे लक्ष असणारे व त्यांना आपल्या जाळ्यात या ना त्या मार्गाने ओढू पाहणारे, असे अनेक वासनांध अधिकारी असतात.

अशा अधिका-यांना तेथील कर्मचा-यांनी वेळीच आळा घातला नाही तर मग प्रकरण विकोपाला जाते. भाजपच्या माजी आमदाराने लग्नाचे आमिष देऊन पक्षातील एका महिला कार्यकर्तीचे २० वर्षे लैंगिक शोषण केले. काळाचौकी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर या आमदाराला आपल्या पक्ष प्रवक्ता पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

इन्फोसिसचे माजी अध्यक्ष आणि आय-गेटचे सध्याचे अध्यक्ष असलेल्या फनीश मूर्ती यांची लैंगिक शोषणाच्या आरोपावरूनच या दोन्ही कंपन्यांमधून हकालपट्टी करण्यात आली. असे काही अधिकारी आपल्या पदाचा फायदा घेऊन लैंगिक शोषणाची आपली चटक भागवून घेतात. स्त्रिया नीतीनियमांचे उल्लंघन करतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतो, म्हणणारी पुरुषप्रधान संस्कृती पुरुषांच्या लैंगिक वागणुकीबाबत मात्र चकार शब्द काढत नाही. पदाचा दुरुपयोग करून हे भक्षक लैंगिक शोषण करत असतात. अशा पदावरील भक्षकांना पदभ्रष्ट करून, तुरुंगवासाची शिक्षा देऊन, त्यांच्यावर सामाजिक बहिष्काराचा 'प्रहार'ही केला पाहिजे.

प्रगतीपथावर दमदार पावले

गेली चारही वर्षे यूपीए सरकारला अनेक अडचणींना, आव्हानांना, आरोपांना, वादळांना व विरोधकांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. पण तरीही हे सरकार वादळातल्या दीपस्तंभाप्रमाणे अढळ, अचल व जनतेला अखंड मार्गदर्शन करत राहिले, हे या सरकारचे वैशिष्ट्य होय.

Read More »

रिव्हर्स स्विंग, २५ मे २०१३

क्रिकेटच्या मैदानात घडलेले रंजक किस्से

१८६८
इंग्लंड दौ-यावर जाणा-या पहिल्या परदेशी संघाचा (ऑस्ट्रेलियन अ‍ॅबॉरिजिन्स) सरे जंटलमन संघाविरुद्ध पहिला सामना सुरू झाला. या संघाचे नेतृत्व चार्ल्स लॉरेन्स यांनी केले. लॉरेंस त्यापूर्वी सरे आणि मिडलसेक्सतर्फे खेळले होते. सरेने हा सामना एक डाव आणि सात धावांनी जिंकला.


१८९७
न्यू साउथ वेल्स आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू अलॅन किपाक्स (१८९७-१९७२) यांचा जन्म. ऑस्ट्रेलियातर्फे ते २२ कसोटी सामने खेळले. सहज 'लेट कट' फटका मारण्यात त्यांची खासियत होती.


१९३६
भारताचे माजी अष्टपैलू रुसी सुरती यांचा जन्म. डावखु-या सुरती यांनी २६ कसोटी सामन्यांत १२६३ धावा आणि ४२ विकेट्स घेतल्या. कसोटीत त्यांनी नऊ अर्धशतके ठोकली. मात्र शतक ठोकण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. रुसी दोनदा ९९ धावांवर बाद झाले. या वर्षी?जानेवारी महिन्यात त्यांचे निधन झाले.


१९८५
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अ‍ॅलन बोर्डर यांनी इंग्लंड दौ-यात डर्बीशायरविरुद्ध शतक ठोकले. डोमेस्टिक क्रिकेटमधील या दौ-यातील त्यांचे हे सलग चौथे शतक होते. त्यापूर्वी सॉमरसेट, वुस्र्टरशायर आणि एमसीसीविरुद्ध बोर्डर यांनी शतके झळकावली. मात्र बोर्डर यांच्यासह ऑस्ट्रेलियासाठी ती अ‍ॅशेस मालिका वाईट ठरली. पाहुण्यांना १-३ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.


१९९०
द ओव्हलवर झालेली न्यूझीलंडविरुद्धची दुसरी वनडे जिंकत सरस इंग्लंडने दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. मात्र सरस धावगतीवर यजमानांनी टेक्साको ट्रॉफी पटकावली. मध्यमतेज गोलंदाज डेव्हॉन माल्कमचे वनडे पदार्पण सनसनाटी ठरले. त्याने ११-५-१९-२ अशी अचूक गोलंदाजी टाकली. सलग २८ निर्धाव चेंडू माल्कमने टाकले.


१९९५
सचिन तेंडुलकरची घरची इनिंग सुरू! विक्रमवीर सचिन तेंडुलकरने पेशाने डॉक्टर असलेल्या अंजली मेहताशी लग्न केले. अंजली बालरोगतज्ञ आहे.


२००३
पोर्ट ऑफ स्पेन कसोटी ३९ धावांनी जिंकत यजमान वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाची सलग २१ सामन्यांची मालिका खंडित केली. या विजयाने वेस्ट इंडिजची सलग ११ पराभवाची मालिकाही संपुष्टात आली.


२००७
बांगलादेशविरुद्धच्या मिरपूर कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताने बिनबाद ३२६ धावा केल्या. राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर अनुक्रमे ८८ आणि ९ धावांवर खेळत होते. मग इतक्या धावा कशा झाल्या? वासिम जाफर आणि दिनेश कार्तिकने १७५ धावांची सलामी दिल्यानंतर पायात गोळे आल्याने कार्तिक निवृत्त झाला. कार्तिकच्या जागी आलेल्या द्रविडने जाफरसह धावांचा सिलसिला कायम राखला. मात्र २८१ धावा असताना पायात गोळे आल्याने जाफरही 'रिटायर्ड हर्ट' होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर द्रविडने तेंडुलकरसह पहिल्या दिवसातील उर्वरित षटके खेळून काढली.


२००७
ऑस्ट्रेलियाचे माजी डावखुरे मध्यमतेज गोलंदाज विल्यम जॉन्स्टन (१९२२-७०) यांचा मृत्यू. ४० कसोटी सामन्यांत १६० विकेट्स घेणारे जॉन्स्टन हे सर डॉन ब्रॅडमनोंच्या १९४८ मधील विजयी संघातील एक म्हणून ओळखले जातात.

Read More »

चेन्नई सट्टाकिंग!

मय्यपनही सट्टा खेळायचा आणि यंदाच्या आयपीएलमध्ये तो १० लाख रुपये हरला होता, अशी माहिती एका मॉडेलच्या चौकशीत पुढे आली आहे.

मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपनही सट्टा खेळायचा, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपरकिंग्ज संघावरच सट्टा लावला होता आणि त्यात तो १० लाख रुपये हरला होता, अशी माहिती एका मॉडेलच्या चौकशीत पुढे आली आहे.

अभिनेता विंदू दारासिंग याच्या चौकशीतून मय्यपनही सट्टा खेळत असल्याची बाब पुढे आली. या दाव्याला मुंबईतील लोखंडवाला संकुलात राहणा-या एका मॉडेलनेही दुजोरा दिला. मय्यपनने चेन्नई सुपरकिंग्जवर लावलेला १० लाखांचा सट्टा हरल्याचे त्याने या मॉडेलला सांगितले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आता मय्यपनची याबाबत चौकशी करणार आहे. या मॉडेलनेही यंदा आयपीएलमधील सामन्यांवर १६ लाख रुपयांचा सट्टा लावला होता. पण तिलाही त्यात अपयश आले. हे पैसे तिने एका हवाला ऑपरेटरकडून चार टक्के व्याजाने घेतले होते. त्यातील काही रक्कम तिने या हवाला ऑपरेटरला दिली असल्याचेही तिने चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे अल्पेशकुमार पटेल या हवाला ऑपरेटरसह आणखी एका हवाला ऑपरेटरचे नाव याप्रकरणी पुढे आले असून, गुन्हे शाखा आता या मॉडेलच्या दाव्यांची पडताळणी करत आहे. विंदू दारासिंगशी घनिष्ठ संबंध असलेल्या दोन मॉडेलच्या चौकशीतून ब-याच जणांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

विंदूने आणखी दोन बुकींना पळण्यास मदत केली

पवन जयपूर व संजय जयपूर यांच्यासह आणखी दोन बुकींना देशाबाहेर पळून जाण्यास विंदूने मदत केली होती, अशी माहिती त्याच्या चौकशीत पुढे आली आहे. चितू आणि राजा ही या बुकींची टोपणनावे असून ते पवन व संजयचे साथीदार असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात पुढे
आले आहे.

असद रौफ यांना कार्गोमार्फत पाठवल्या भेटवस्तू

पवन जयपूर या बुकीने पाकिस्तानी पंच असद रौफ याला महागडी भेटवस्तू दिली होती. या भेटवस्तूच्या दोन बॅगा विंदूने त्याचा साथीदार प्रेम तनेजा याच्यामार्फत कार्गोने पाठवल्या होत्या. याबाबत गुन्हे शाखा चौकशी करणार आहे. चौकशीच्या भीतीने रौफ भारतातून पळून जाण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखा सायबर फॉरेन्सिकची मदत घेणार

विंदू दारासिंग याच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या आयपॅडमधील काही नोंदी नष्ट करण्यात आल्याची बाब गुन्हे शाखेच्या तपासात पुढे आली आहे. आता गुन्हे शाखा ही माहिती पुन्हा मिळविण्यासाठी सायबर फॉरेन्सिकचही मदत घेणार आहे.

अद्याप १५ सट्टेबाज वॉन्टेड

याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक झाली असली, तरी याप्रकरणी आणखी सट्टेबाज वॉन्डेट आहेत. त्यात राकेश जयपूर, संजय जयपूर, पवन जयपूर, ज्युपिटर जयपूर, लोकेश दिल्ली, टिंकू दिल्ली, जतीन गुजरात, लंबू गुजरात, किशोर पुणे, कार्तिक, कोठारी, बबलू, केतन शोभन, परेश, बंटी या सट्टेबाजांचा समावेश आहे.

श्रीनिवासन गोत्यात!

स्पॉटफिक्सिंग प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यपनचे नाव आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

''जावयाची चौकशी होणार असल्याने श्रीनिवासन संशयाच्या भोव-यात सापडले आहेत. त्यांना नैतिकता व सार्वजनिक जबाबदारीचे भान असेल, तर त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा,'' अशी मागणी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी शुक्रवारी केली. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा, असे त्रिपाठी म्हणाले.

'चेन्नई सुपरकिंग्ज'शी मय्यपनचा संबंध नाही

स्पॉटफिक्सिंगप्रकरणी इंडिया सिमेंटचे व्यावस्थापकीय संचालक श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपनची चौकशी होणार असली तरी, मय्यपनचा 'चेन्नई सुपरकिंग्ज' (सीएचके) संघाशी काहीही संबंध नसल्याचे 'इंडिया सिमेंट'ने शुक्रवारी स्पष्ट केले. ''सीएचके संघाचा मय्यपन मालक नाही. तो संघाचा विशेष कार्यकारी अधिकारी वा संघप्रमुखही नाही. तो केवळ संघव्यवस्थापनातील सदस्य आहे,'' असे इंडिया सिमेंटचे कार्यकारी अध्यक्ष टी. एस. रघुपती यांनी सांगितले.

Read More »

पहिली, दुसरीच्या पुस्तकांची अखेर छपाई सुरू

'प्रहार'मधील वृत्ताच्या दणक्याने जागे झालेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळाने पहिली आणि दुसरीच्या सर्व पुस्तकांचा मसुदा तयार करून तो बालभारतीकडे छपाईसाठी दिला असून यातील पहिली व दुसरीच्या पुस्तकांची छपाई सुरू झाली आहे.

मुंबई- यंदा पहिली-दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. जूनपासून शाळा सुरू होत असताना या दोन्ही वर्गाच्या पुस्तकांचा मसुदाच तयार नसल्याने ही पुस्तके बालभारतीकडे छपाईसाठी उपलब्ध झाली नसल्याचे वृत्त 'प्रहार'मध्ये ९ मे रोजी 'पहिली, दुसरीची पुस्तके मिळणार उशिरा' या मथळ्याखाली छापून आले होते.

या वृत्ताच्या दणक्याने जागे झालेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळाने पहिली आणि दुसरीच्या सर्व पुस्तकांचा मसुदा तयार करून तो बालभारतीकडे छपाईसाठी दिला असून यातील पहिली व दुसरीच्या पुस्तकांची छपाई सुरू झाली आहे.

मागील आठवडय़ापर्यत पुस्तकांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून मसुदा तयार केला नव्हता. यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रत्येक विषयासाठी लागणारी सुमारे ९० लाखाहून अधिक पुस्तके विद्यार्थ्यांना उशिरा मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र पहिली आणि दुसरीच्या बालभारती, गणित या दोन विषयांची एकुण ४० लाख पुस्तके छापण्याची ऑर्डर महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे (बालभारती) आली असून अन्य पुस्तके छापण्यासाठी लवकरच आदेश दिले जाणार असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली.

पहिली, दुसरीची पुस्तके मिळणार उशिरा

नवीन पुस्तकांचा मसुदा तयार करून बालभारतीकडे छपाईसाठी उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचे उघड झाले आहे.

किमतीत दुपटीने वाढ

यंदाच्या पहिली आणि दुसरीच्या नवीन पुस्तकांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. 'बालभारती' हे पुस्तक १० रुपयांऐवजी ३३ रुपयांना मिळणार आहे. 'गणिता'च्या पुस्तकाची किंमत १२ रुपयांहून ३३ आणि 'माय इंग्लिश' या पुस्तकाची किंमत १७ रुपयांवरून ३६ रुपये केली. या पुस्तकांचा आकार, त्यातील रंगीत पाने वाढविल्याचा दावा बालभारतीने केला.

Read More »

आंबा विक्रीतील तोट्याने तो बनला चोर

एलबीटीचे आंदोलन सुरू झाल्याने सीझनमध्ये आंबा विकून भरपूर पैसे कमवण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्याने तो चोर बनला.

कल्याण- सीझनमध्ये आंबा विकून आपण भरपूर पैसे कमवावे असे नवी मुंबईत राहणा-या रोशन डोंगरे या तरुणाला वाटत होते. त्याने मोठी गुंतवणूक करून आंबे खरेदी केले. त्याचवेळी एलबीटीचे आंदोलन सुरू झाल्याने त्याचे आंबा विक्री करून पैसे कमवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. त्यात त्याला तोटा सहन करावा लागल्याने तो कसा भरून काढायचा, असा प्रश्न त्याला पडला. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने चक्क चोरीचा मार्ग अवलंबल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली असून त्याला अटक केली आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे राहणारा रोशन रोहिदास डोंगरे (२२) याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. सध्या सीझन असल्याने आंबा विक्रीचा व्यवसाय करण्याचे त्याने ठरवले. मात्र, त्याचवेळी राज्यात एलबीटी कर रद्द करण्यासाठी व्यापा-यांनी जोरदार आंदोलन छेडले. संपूर्ण बाजारपेठा ओस पडल्या. सर्वसामान्य जनतेचे हाल झाले. त्याचाच फटका नव्याने व्यवसाय करणा-या रोशन डोंगरेला बसला. त्याने खरेदी केलेले आंबे सडून गेल्याने त्याला मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. हे नुकसान कसे भरून काढावे असा प्रश्न त्याला पडला. यासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबला.

कर्जत रेल्वे स्थानकात वासंती सावंत या रेल्वे रूळ ओलांडत असताना रोशनने त्यांच्या गळ्यातील साडे तीन तोळ्याचे दागिने खेचून पळ काढला. सावंत यांनी जोरजोराने आरडाओरड सुरू केल्यानंतर प्रवाशांनी त्याला पकडून चोप दिला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Read More »

शिक्षकांवर पुन्हा शाळाबाह्य कामांचे ओझे

तीन आठवड्यापूर्वी घेतलेल्या निर्णयावर शालेय शिक्षण विभागाने पलटी मारली असून शिक्षकांना नैसर्गिक निवारण कार्य, जनगणनेच्या कामाला जुंपण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई- शिक्षकांना निवडणुकीशिवाय इतर शाळा बाह्यकामातून वगळण्याचा निर्णय शालेय विभागाने तीन आठवडय़ापूर्वी घेतला होता. या निर्णयावर शालेय शिक्षण विभागाने पलटी मारली असून शिक्षकांना नैसर्गिक निवारण कार्य, जनगणनेच्या कामाला जुंपण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. याचे परिपत्रक राज्यातील शिक्षण विभागाशी संबंधित सर्व विभागांना पाठविले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ३ मे रोजीच्या परिपत्रकात शिक्षकांना अध्यापन कार्याऐवजी इतर शाळाबाह्यकामास वापरणे अनुचित असल्याचे स्पष्ट केले होते. निवडणूक वगळता अन्य कोणतेही काम देऊ नये असा निर्णय झाला होता. मात्र हे परिपत्रक रद्द करून शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीबरोबरच जनगणना, नैसर्गिक आपत्ती निवारण कार्य ही कामे बंधनकारक केली आहेत. मतदार यादी, पुन:परिक्षण व छायाचित्र ओळखपत्र तयार करणे आदी कामेही शिक्षकांवर टाकण्यात आली.

राज्यात शिक्षण हक्क अधिकार कायद्याप्रमाण्ेा सर्व विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी लागणारे शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनामार्फत चालविण्यात येणा-या १ लाख ३ हजार ६२५ शाळा असून यात सुमारे १.८० कोटी विद्यार्थी शिक्षण घेताहेत.

सरकारच्या या निर्णयासोबतच राज्यात सध्या तात्पुरत्या स्वरूपात सेवा वर्ग होऊन शाळा बाह्यकामे करणा-या शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेवर नियुक्त करण्यात येणार आहेत. यामुळे १ जून २०१३ नंतर कोणत्याही शिक्षकांच्या सेवा अधिनियम, २००९ चे कलम २७ खाली येणारी प्रयोजने अथवा कामे वगळता इतर कामासाठी शिक्षकांना काम दिल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिका-यांच्याविरोधात प्रशाकीय कारवाई करण्यात येणार आहे.

Read More »

लोकप्रतिनिधीगृहांतील गोंधळ चिंताजनक

''संसद आणि विधिमंडळांमध्ये लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होणारा गोंधळ आणि त्यामुळे वारंवार तहकूब होणारे कामकाज चिंताजनक आहे,'' अशी खंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

सिमला- ''संसद आणि विधिमंडळांमध्ये लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होणारा गोंधळ आणि त्यामुळे वारंवार तहकूब होणारे कामकाज चिंताजनक आहे,'' अशी खंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ठोस तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ''राजकीय पक्षांच्या नेत्यांनी समस्या सोडवण्यासाठी चर्चा करायला हवी. जनता मतदान करते, त्यामुळे लोकप्रतिनिधी निवडून येतात. मतदारांचा विश्वास संपादन केल्यानंतर लोकप्रतिनिधीला काम करण्याची संधी मिळते.

त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करावा. संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी बहुमत मिळालेल्या लोकप्रतिनिधींनी सरकार स्थापन करावे तर अल्पमतातील पक्षांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावावी. मात्र संसदीय नियमांच्या चौकटीत राहूनच या गोष्टी करायला हव्यात,'' असे राष्ट्रपतींनी सांगितले.

Read More »

तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई- मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर कल्याण-ठाणेदरम्यान अपजलद मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

या कालावधीत कल्याणहून सीएसटीला जाणा-या जलद गाडय़ा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या सर्व स्थानकांवर थांबतील. तर 'हार्बर'वर सीएसटी ते कुर्ला डाउन मार्गावर मेगाब्लॉक असेल.

शिवाय वडाळा आणि वांद्रेदरम्यान अप-डाउन या दोन्ही मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून दुपारी ३ वाजून १० मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल.

पश्चिम रेल्वेवरही महालक्ष्मी ते सांताक्रूझदरम्यान डाउन धीम्या मार्गावर जम्बोब्लॉक असेल. सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.

Read More »

ठाण्यातील सरकत्या जिन्यांना १० जूनचा मुहूर्त

'एलबीटी'विरोधात पुकारण्यात आलेल्या संपामुळे जिन्यांना आवश्यक असलेले स्टिल उपलब्ध होऊ शकले नसल्याचे सांगत, मध्य रेल्वेने या जिन्यांसाठी आता १० जूनचा मुहूर्त काढला आहे.

मुंबई- 'एलबीटी'विरोधात पुकारण्यात आलेल्या संपात स्टिल उत्पादक व विक्रेते सहभागी झाल्यामुळे ठाणे स्थानकात बसवण्यात येणा-या सरकत्या जिन्यांना मुहूर्त मिळाला नसल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. या संपामुळे जिन्यांना आवश्यक असलेले स्टिल उपलब्ध होऊ शकले नसल्याचे सांगत, मध्य रेल्वेने या जिन्यांसाठी आता १० जूनचा मुहूर्त काढला आहे.

यापूर्वी हे जिने १५ मार्च, १५ एप्रिल आणि नंतर १५ मे या तारखांना सुरू होतील, असे मध्य रेल्वेने जाहीर केले होते, मात्र प्रत्यक्षात १५ मेचा मुहूर्त जाऊनही हे जिने सुरू करण्यात आलेले नाहीत. 'एलबीटी'विरोधात स्टिल व्यापा-यांनी पुकारलेल्या संपामुळे हे जिने १५ मेला सुरू होऊ शकले नसल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. आता स्टील उपलब्ध झाले असून, १० जूनपर्यंत सरकते जिने सुरू होतील, असे आश्वासनही रेल्वेकडून देण्यात आले आहे.

वृद्ध, गर्भवती महिला आणि अपंगांना होणारा त्रास पाहता, मध्य रेल्वेने तीन स्थानकांत सरकते जिने लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दादर, ठाणे आणि कल्याण या स्थानकांत हे जिने लावले जाणार आहेत. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ३, ४ आणि ५ व ६वर जिने लावण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी १ कोटी २० लाख रुपये खर्च येणार आहे.

Read More »

पोलिस अधिका-यांच्या बढत्या-बदल्या

महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील ३९ अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.

मुंबई- महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील ३९ अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. तर पोलिस निरीक्षक संवर्गातील १०२ अधिका-यांना पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

राज्यातील पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले आहेत ते अधिकारी व नवीन नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे-

१) राज्य पोलिस नियंत्रण कक्ष, मुंबई सुभाष खाडे (ठाणे शहर सहायक आयुक्त), २) सहायक आयुक्त, पुणे शहर विठ्ठल पवार (सहायक आयुक्त, ठाणे शहर), ३) बृहन्मुंबई गुन्हे शाखेत सहायक आयुक्त लियाकत नदाफ (ठाणे शहर सहायक आयुक्त), ४) बृहन्मुंबई सहायक आयुक्त नूर मोहम्मद अब्दुल मुलाणी (उपअधीक्षक, राज्य पोलिस नियंत्रण कक्ष, मुंबई ), ५) नागपूर शहर सहायक आयुक्त अनंत थोरात (विशेष महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र), ६) पुणे गुन्हे अन्वेषण विभागातील अपर अधीक्षक दगडू माळी (बीड उपविभागीय अधिकारी ), ७) नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमी सहायक संचालक पुलकेशिन मठाधिकारी (ठाणे शहर सहायक आयुक्त), ८) नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमी सहायक संचालक दीपक भावसार (बृहन्मुंबई सहायक आयुक्त), ९) धुळे शहर उपविभागीय अधिकारी मोनिका राऊत (ठाणे शहर सहायक आयुक्त ), १०) बुलढाणा उपविभागीय अधिकारी कल्पना बारावकर (औरंगाबाद ग्रामीण उपविभागीय अधिकारी ), ११) संगमनेर उपविभागीय अधिकारी राजेंद्र पगार (नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमी सहायक संचालक ), १२) परभणी-गंगाखेड उपविभागीय पोलिस अधिकारी एन.डी.गोरे (अहमदपूर उपविभागीय अधिकारी), १३) सेलू उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत अलसटवार (किनवट उपविभागीय अधिकारी ), १४) परभणी उपविभागीय अधिकारी राहुल माकणीकर (फलटण उपविभागीय अधिकारी ), १५) जिंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत बच्छाव (जळगांव उपविभागीय अधिकारी), १६) यवतमाळ उपविभागीय अधिकारी लता फड (परभणी उपविभागीय पोलिस अधिकारी), १७) अंबेजोगाई उपविभागीय अधिकारी स्वाती भोर (अहमदनगर उपविभागीय अधिकारी), १८) बीड उपविभागीय अधिकारी संभाजी कदम (बारामती उपविभागीय अधिकारी), १९) वाशिम-मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी अकबर पठाण (फोर्स वन पोलिस उपअधीक्षक), २०) उस्मानाबाद-कळंब उपविभागीय अधिकारी पंजाब भगत (नागपूर शहर सहायक आयुक्त), २१) औरंगाबाद ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी पल्लवी बर्गे (कोल्हापूर उपविभागीय अधिकारी), २२) वैजापूर उपविभागीय अधिकारी अपर्णा गिते (नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमी सहायक संचालक), २३) निलंगा उपविभागीय अधिकारी पंडित नवसारे (वैजापूर उपविभागीय अधिकारी), २४) ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी प्रकाश हरमळकर (बृहन्मुंबई सहायक आयुक्त), २५) कंधार उपविभागीय अधिकारी गीता चव्हाण (नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमी सहायक संचालक), २६) नांदेड जिल्ह्यातील बिलोली उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार चव्हाण (नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमी सहायक संचालक), २७) दर्यापूर उपविभागीय अधिकारी काकासाहेब डोळे (अंबेजोगाई उपविभागीय अधिकारी), २८) बारामती उपविभागीय अधिकारी नामदेव मिट्टेवाड (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे अपर अधीक्षक), २९) दौंड उपविभागीय अधिकारी शंकर केंगार (परभणी- गंगाखेड उपविभागीय अधिकारी), ३०) करमाळा उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब बंडगर (पुणे शहर सहायक आयुक्त), ३१) नागपूर शहर सहायक आयुक्त मारुती पवार (मुंबई लोहमार्ग सहायक आयुक्त ), ३२) किनवट उपविभागीय अधिकारी चंद्रकांत गवळी (धुळे शहर उपविभागीय अधिकारी), ३३) ठाणे शहर सहायक आयुक्त अनिल पाटील (करमाळा उपविभागीय अधिकारी), ३४) कोल्हापूर उपविभागीय अधिकारी महेश सावंत (राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई अपर उपआयुक्त), ३५) करवीर उपविभागीय अधिकारी जयवंत देशमुख (पुणे लोहमार्ग उपअधीक्षक), ३६) जळगांव उपविभागीय अधिकारी पंढरीनाथ पवार (करवीर उपविभागीय अधिकारी ), ३७) जळगाव-मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी पंडित पवार (धुळे, साक्री उपविभागीय अधिकारी), ३८) सोलापूर शहर सहायक आयुक्त चतुर्भूज रोडे (सेलू उपविभागीय अधिकारी), ३९) मुंबई अे.सी.बी. अपर अधीक्षक शेषराव सूर्यवंशी (नवी मुंबई सहायक आयुक्त).

याशिवाय पोलिस निरीक्षक संवर्गातील १०२ अधिका-यांना उपअधीक्षक, सहायक आयुक्त (नि:शस्त्र) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

Read More »

महाराष्ट्रातील सुंदर शहरांसाठी सिंगापूरचे सहकार्य

सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शहरांची आखणी आणि नियोजन करून त्यांना सुंदर करण्यासाठी सिंगापूर सरकार महाराष्ट्राला संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षन्मुगारत्नम यांनी दिले.

मुंबई- सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शहरांची आखणी आणि नियोजन करून त्यांना सुंदर करण्यासाठी सिंगापूर सरकार महाराष्ट्राला संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षन्मुगारत्नम यांनी दिले. राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकाधिक चांगले होण्यासाठीही सिंगापूर सरकार मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षन्मुगारत्नम आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात शुक्रवारी बैठक झाली. राज्यातील मुंबई, पुणे तसेच इतर मोठय़ा शहरांत नवीन पायाभूत सुविधांची उभारणी करताना सिंगापूरच्या धर्तीवर या सुविधा कशा राबवता येतील, याचा विचार झाला. या वेळी षन्मुगारत्नम म्हणाले की, भारताच्या तुलनेत सिंगापूर हा खूप छोटा देश असून, उत्तम नागरी नियोजन आणि शहरांची उभारणी, यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून आम्ही प्रगती केली आहे. अत्युच्च दर्जाच्या नागरी पायाभूत सुविधा आणि चांगली वाहतूक व्यवस्था, यासाठी सिंगापूर ओळखले जाते. मात्र अजूनही आम्हाला अधिक सुधारणा करण्याची संधी आहे. महाराष्ट्र हे भारतातील एक मोठे राज्य असून, पूर्वीपासूनच सिंगापूर आणि महाराष्ट्र यांच्यात चांगले औद्योगिक संबंध आहेत. महाराष्ट्राला उत्तम नगरांची उभारणी, नागरी सुविधांचे व्यवस्थापन त्याचप्रमाणे जल व सांडपाणी प्रक्रिया यात मदत करण्याची आणि त्यासाठी महाराष्ट्रातील अधिका-यांसाठी विशेष मार्गदर्शन करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

राज्यातील प्रमुख शहरांतील प्रगतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागरी नियोजनाबरोबरच राज्यातील विमानतळे, मेट्रो, मोनो वाहतुकीचा विस्तार, अर्थ, आरोग्य, हॉस्पिटॅलिटीसारख्या क्षेत्रांत सिंगापूरमधील उद्योजक व गुंतवणूकदारांना संधी आहे. राज्यातील मनोरंजन, उद्योग, तंत्रज्ञान तसेच शिक्षण क्षेत्राविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. सिंगापूर मॉडेलचा विस्तृत अभ्यास करण्यासाठी व तेथील चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात राबवण्यासाठी राज्यातून संबंधित अधिका-यांना प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांना सिंगापूरमध्ये पाठवण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या बैठकीस सिंगापूरचे मुंबईतील वाणिज्यदूत लिन चुंग यिंग, दिल्लीतील उच्चायुक्त कारेन टॅन त्याचप्रमाणे राजशिष्टाचारमंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अजित कुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव व श्रीकांत सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read More »

अहमदाबादमध्ये बुकीला अटक, सव्वा कोटी जप्त

अहमदाबाद येथे सॅटेलाईट भागातून विनोद मूलचंदानी या सट्टेबाजाला शनिवारी सकाळी अटक केली.

अहमदाबाद- स्पॉट फिक्सिंग प्रकरणी देशभरात पोलिसांचे छापा सत्र सुरूच असून शनिवारी सकाळी अहमदाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिका-यांनी सॅटेलाईट भागातून विनोद मूलचंदानी या सट्टेबाजाला अटक केली. तसेच त्याच्या घरातून एक कोटी २८ लाख रुपये, लॅपटॉप, मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलमधील सामन्यांवर तो सट्टा लावत असे. मुंबईतील सट्टेबाजांशी संपर्क असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला.  त्याला अटक केली आली. त्याच्याकडे काही सोन्याची बिस्किटेही सापडल्याचे वृत्त आहे. 

विनोदचा आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणाशी काही संबंध आहे का? याचा पोलिस शोध घेत आहेत.

Read More »

नागपुरातील 'त्या' मुलीचा मृत्यू

रात्रभर अत्याचार केल्यानंतर पेटवून दिलेल्या ‘त्या’ तेरा वर्षांच्या मुलीचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला.

नागपूर - तीन- चार युवकांनी गुरुवारी रात्रभर अत्याचार केल्यानंतर अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलेल्या ‘त्या’ तेरा वर्षांच्या मुलीचा शनिवारी सकाळी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गानगर परिसरात राहणारी सातवी इयत्तेत शिकणारी ही १३ वर्षाची मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती. दिवसभर शोधाशोध करुनही ती न सापडल्याने तिच्या आईने रात्री आठ वाजता सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र तरीही तिचा काहीच सुगावा लागला नव्हता. शुक्रवारी सकाळी मनीषनगरातील रिलायन्स फ्रेशसमोर बांधकाम सुरू असलेल्या एका चार मजली इमारतीच्या दुस-या मजल्यावरून सकाळी आठ वाजताच्या सुमारास धूर निघत असल्याचे बघून स्थानिक रहिवाशांनी वर जाऊन बघितले असता तेथे जळालेल्या अवस्थेत ही मुलगी रडताना आढळली. तिला उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र तिची प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याने ती मृत्यूशी झुंज देऊ शकली नाही.

या इमारतीचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. मुलीचे वडील चौकीदार असून आई धुणीभांडी करते. तीन ते चार युवकांनी त्या मुलीवर दारू पिऊन रात्रभर अत्याचार केला असावा. त्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा, असे प्रत्यक्ष घटनास्थळावरुन मिळालेल्या वस्तूंच्या आधारे पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Read More »

'तंबाखू'विरोधी जाहिरात लटकली

तंबाखूमुळे होणा-या दुष्परिणामांची माहिती देण्याकरता राज्य सरकार महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन, जनजागृतीपर जाहिरात तयार करत आहे.

मुंबई- तंबाखूमुळे होणा-या दुष्परिणामांची माहिती देण्याकरता राज्य सरकार महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन, जनजागृतीपर जाहिरात तयार करत आहे. मात्र या जाहिरातीच्या चित्रीकरणाचा खर्च जास्त असल्याने ही अद्याप लटकली आहे. ही जाहिरात ३१ मे या 'तंबाखूविरोधीदिनी' प्रसिद्ध करण्याचा राज्य सरकारचा मानस होता.

'दो बूंद जिंदगी के' म्हणत महानायक अमिताभ बच्चन यांनी 'पल्स पोलिओ'ची जाहिरात केली होती. या जाहिरातीच्या प्रभावामुळे देशात आजघडीला एकही पोलिओचा नवा रुग्ण सापडलेला नाही. याबाबतची दखल राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने घेऊन, महानायक अमिताभ बच्चन यांना तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीपर जाहिरात करण्याची विनंती केली होती. अमिताभ बच्चन यांनीदेखील सरकारच्या विनंतीला होकार देत, नि:शुल्क जाहिरात करू, असे सांगितले होते.

लहान मुले आणि तरुणांकडून होणारे तंबाखूचे सेवन पाहता, अमिताभ बच्चन यांनी, तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केल्यास हे प्रमाण घटेल आणि कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांनादेखील जगण्याची प्रेरणा मिळू शकेल, हा यामागील हेतू होता. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ४० सेकंदांची ही जाहिरात असणार आहे. या जाहिरातीत अमिताभ बच्चन पोलिस निरीक्षकाच्या भूमिकेत आहेत. मात्र या जाहिरात चित्रीकरणाचा खर्च ९० लाख रुपये येणार आहे. हा खर्च कमी करावा, याकरता आरोग्य विभाग जाहिरात निर्मात्याला विनंती करत आहे.

२८ एप्रिलपासून या जाहिरातीच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. मात्र खर्चामुळे सध्या या जाहिरातीचे चित्रीकरण लटकले असल्याची माहिती आरोग्य विभागातील एका अधिका-याने दिली.

दरम्यान, रेल्वे स्थानकांत मोफत तंबाखूविरोधी जनजागृतीपर पोस्टर्स लावण्यास रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली आहे.

Read More »

'जीवन अमृत सेवा योजना' ऑगस्टपासून मुंबईत

सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 'जीवन अमृत सेवा योजने'ला (ब्लड ऑन कॉल) मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही योजना राज्यभर लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई- सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 'जीवन अमृत सेवा योजने'ला (ब्लड ऑन कॉल) मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही योजना राज्यभर लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या ऑगस्टपासून मुंबईत, तर ऑक्टोबर महिन्यापासून ही योजना राज्यभर राबवण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांच्या दालनात गुरुवारी झालेल्या बैठकीत 'जीवन अमृत सेवा योजने'चा आढावा घेण्यात आला. ही योजना ऑगस्टपासून मुंबईत सुरू करण्यात येणार असल्याने नुकतीच महानगर रक्तपेढीसोबत बैठक घेण्यात आली. मुंबईत या योजनेसाठी सरकारी व निमसरकारी रुग्णालयांत आठ ठिकाणी रक्त साठवणी केंद्र (ब्लड स्टोरेज युनिट) तयार करण्यात येणार आहेत. या प्रत्येक युनिटसाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री लवकरच खरेदी करण्यात येणार असल्याचेही शेट्टी यांनी या बैठकीत सांगितले.

सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अत्याधुनिक रक्तपेढीतून या आठ केंद्रांना २४ तास रक्तपुरवठा केला जाणार आहे. १०२ क्रमांकावर फोन केल्यास गरजूंना मोटारसायकलद्वारे शीतपेटीच्या माध्यमातून रक्तपुरवठा केला जणार आहे. या मोटरसायकलना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात येणार असून, त्यावर निळा दिवादेखील बसवण्यात येणार आहे. दरम्यान, जूनअखेर गडचिरोली, अमरावती, परभणी आणि अहमदनगर जिल्ह्यांत ही योजना सुरू करण्यात येणार असून, उर्वरित महाराष्ट्रात ऑक्टोबरपासून ही योजना लागू होणार आहे. त्यासाठी ब्रँड अँबेसेडरची नेमणूकही करण्यात येणार आहे.

Read More »

व्हेंटिलेटर भ्रष्टाचारातील चौकशीसाठी समिती

२००८ ते २०१० या काळात व्हेंटिलेटर खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने चार सदस्यीय समिती नेमली आहे.

मुंबई- २००८ ते २०१० या काळात व्हेंटिलेटर खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने चार सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आणि अन्य तीन जणांची चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करणार आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने २००८ ते २०१० या काळात कोटय़वधी रुपये खर्च करून व्हेंटिलेटर खरेदी केले होते. मात्र, ते बाजार भावापेक्षा जास्त दराने खरेदी केल्याचा लाचलुचपत विभागाचा आरोप आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर खरेदीत भ्रष्टाचार झाल्याने २०११ मध्ये लाचलुचपत विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, गोविंद रणखांबे, डॉ. बालाजी शेवाळकर आणि चिंतामणी चव्हाण यांच्या विरोधात विशेष सत्र न्यायालयात अभियोग दाखल करावा, असा प्रस्ताव अप्पर पोलिस आयुक्तांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार संबंधित चार जणांविरोधात अभियोग दाखल करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व कागदपत्रांचे सखोल विश्लेषण होणे आवश्यक आहे. त्याकरता वैद्यकीय शिक्षण विभागाने अखेर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली आहे. त्यात वित्त विभागाचे उपसचिव नारायण रिंगणे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संध्या कामत, केईएमच्या रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत देशमुख यांचा समावेश आहे.

व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणात लाचलुचपत विभागाने घेतलेल्या आक्षेपांची ही समिती सखोल चौकशी करणार आहे. व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी ठरवेलली किंमत देखील पुन्हा तपासण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर तांत्रिक तपासणीत निविदा नाकारण्यात आली होती का, बाजारभावापेक्षा जास्त किमतीत व्हेंटिलेटर खरेदी केल्याप्रकरणी आक्षेप घेतला आहे का, त्यामुळे निविदेतील बाबी, प्रत्यक्ष पुरवठादाराने केलेले काम आदी बाबींची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, ही समिती राज्य सरकारला १५ दिवसांत अहवाल सादर करणार असल्याचे लाचलचुपत विभागातील वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

Read More »

मुंबईत पाऊस, ढगाळ वातावरण, उकाडा वाढला

घामाच्या धारांनी वैतागलेल्या मुंबईकरांना शनिवारी सकाळी हलक्‍याशा पावसाने दिलासा दिला.

मुंबई- घामाच्या धारांनी वैतागलेल्या मुंबईकरांना शनिवारी सकाळी हलक्‍याशा पावसाने दिलासा दिला. सकाळी आठच्या सुमारास उपनगरातल्या गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि जोगेश्वरी परिसरात पावसाने हजेरी लावली.

अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.  मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी ऊनपावसाचा खेळ चालू आहे.

या पावसाच्या सरींनी मुंबईकरांना दिलासा मिळण्याऐवजी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

Read More »

सरदारांकडूनच सेनापतींचा 'गेम'

उद्धव ठाकरे यांच्या धनादेशाला केराची टोपली दाखवली जाणार असून, सरदारांनीच पालिकेतील वजन वापरत प्रशासनावर दबाबतंत्र राबवत ही किमया साधली आहे.

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅ मेरे, एलईडी स्क्रीन व इतर व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी खर्च करण्यात आलेल्या पाच लाख रुपयांचा धनादेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:च देत महापौर व स्थायी समिती अध्यक्षांना चांगलेच खडसावले होते. त्यामुळे या दोघांनी याचा वचपा याबाबतचा प्रस्ताव मंजूर करत काढला. शिवसेनेने धनादेश दिल्यामुळे हा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तो मागे घेतला नाही. तसेच स्थायी समितीनेही प्रस्ताव मागे घेण्यासाठी दबाव न टाकता तो मंजूर केला. त्यामुळे ठाकरे यांच्या धनादेशाला केराची टोपली दाखवली जाणार असून, सरदारांनीच पालिकेतील वजन वापरत प्रशासनावर दबाबतंत्र राबवत ही किमया साधली आहे. यामुळे यात सेनापतींचाच गेम झाला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा खर्च महापालिकेने केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतरही महापालिकेतील एकाही नेत्याने या खर्चाची जबाबदारी उचलली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी महापौर सुनील प्रभू आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांना चांगलेच खडसावले. हा खर्च करण्यास शिवसेना सक्षम असल्याचे सांगत त्यांनी पक्षाच्या वतीने ५ लाखांचा धनादेश प्रभारी आयुक्त राजीव जलोटा यांच्याकडे पाठवून दिला होता. त्यामुळे प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेणे अपेक्षित होते.

मात्र, याबाबतचा धनादेश स्वीकारला किंवा नाही, तो कितीचा आहे, याबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही, असे शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करावा. तो मागे घेण्यात येणार नाही, असे म्हैसकर यांनी सांगितले. मात्र, बाळासाहेबांच्या अंत्यविधीचा सर्व खर्च हा शिवसेनेने केला होता. केवळ सुरक्षेसाठी पालिकेने पाच लाख रुपये खर्च केले. प्रत्यक्षात तो खर्च राज्य सरकारच्या गृहखात्याने करायला हवा होता. पण त्यांनी न करता एकप्रकारे महाराष्ट्राचा अपमानच केला आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी या वेळी सांगितले.
मात्र, प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेण्यास नकार दिल्यानंतर अध्यक्षांनी अथवा गटनेत्यांनी जलोटा यांच्याशी संपर्क साधून यावरचे मत जाणून न घेता अनुकूल-प्रतिकूल करत हा प्रस्ताव मंजूर करून टाकला. त्यामुळे हा खर्च आता पालिकेच्याच तिजोरीतून करण्यात आला असून, शिवसेनेच्या धनादेशाची कोणतीच किंमत उरली नाही.
उपचिटणीसांचा बळी

समितीचा अध्यक्ष म्हणून हा प्रस्ताव मी पटलावर घेतला नाही. तर ५ लाखांच्या आतील आयुक्तांनी केलेला खर्च ७२(३) अंतर्गत येतो. त्यामुळे हा अधिकार पालिका चिटणीसांना आहे. त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला. त्यामुळे संबंधित अधिका-याची चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश शेवाळे यांनी बजावले. परंतु, तत्पूर्वीच उपचिटणीसांना भाजप गटनेत्यांच्या समक्ष दम भरत मेमो दिला होता. उपचिटणीसांवर निष्काळजीपणाचा आरोप ठेवत मेमो देणा-याच शेवाळे यांनी हा प्रस्ताव मंजूर करून टाकला. त्यामुळे शेवाळे यांच्यावर शिवसेना काय कारवाई करते, याकडे सर्वाचे लक्ष आहे. मात्र, यामुळे चिटणीस विभागात असंतोषाचे वातावरण असून, नगरसेवकांनीही याचा तीव्र निषेध केला आहे. चोर सोडून सन्याशाला शिक्षा दिली जात असून, यामध्ये सर्वच गटनेत्यांनी गप्प राहण्याची भूमिका घेणे हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मनसेचे संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली.

Read More »

'एलबीटी'साठी व्यापारीही राजी

'एलबीटी'च्या मुद्दय़ावरून व्यापा-यांनी पुकारलेला बंद मागे घेतल्यानंतर शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत पुन्हा व्यापारी संघटनांच्या पदाधिका-यांची बैठक झाली.

मुंबई- 'एलबीटी'च्या मुद्दय़ावरून व्यापा-यांनी पुकारलेला बंद मागे घेतल्यानंतर शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत पुन्हा व्यापारी संघटनांच्या पदाधिका-यांची बैठक झाली. 'एलबीटी'त सुलभता आणावी, अशी मागणी करत व्यापारी अखेर या करप्रणालीसाठी राजी झाले. तर 'एलबीटी'ची अंमलबजावणी करताना त्यात सुधारणा करण्यासाठी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत व्यापा-यांनी आपले प्रतिनिधी पाठवावेत. त्यांच्या सूचनांचा नक्की विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी दिले.

मुंबईतील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याशी गुरुवारी यशस्वी चर्चा झाल्यानंतर व्यापा-यांनी 'एलबीटी'विरोधात पुकारलेला बंद मागे घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी उर्वरित व्यापा-यांच्या शिष्टमंडळांनी कृषिमंत्री पवार, मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. 'आपला एलबीटीला विरोध नसून, त्यातील क्लिष्टपणाला विरोध आहे,' असे व्यापा-यांनी या वेळी सांगितले. कर आकारणी आणि कर निर्धारणाची जबाबदारी विक्रीकर विभागावर सोपवावी, अशी मगणीही व्यापा-यांनी केली. 'फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा'चे अध्यक्ष मोहन गुरनानी त्याचप्रमाणे 'फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष विरेन शहा यांच्यासह इतरही व्यापा-यांनी यावेळी आपली मते मांडली.

'मुंबईत अद्याप 'एलबीटी' लागू केलेला नाही. मुंबई महापालिकेने सर्वसंमतीने याबाबत निर्णय घ्यावा. त्यानंतर विधिमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण चच्रेअंती 'एलबीटी' लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल,' असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले. 'व्यापारी हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, त्यांना कर भरताना त्रास होऊ नये तसेच करप्रणालीदेखील सुटसुटीत असावी,' अशी शासनाची भूमिका आहे. राज्यात 'एलबीटी' लागू करताना विविध व्यापारी संघटनांकडून आलेल्या २५ सूचनांचा सरकारने विचार केला आहे. 'एलबीटी'साठी नोंदणीची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली असून, ई-नोंदणी, ई-पेमेंट अशी सॉफ्टवेअर विकसित करून कर आकारणीचे काम सोपे केले जाईल,' असे चव्हाण यांनी सांगितले. तसेच व्यापा-यांनी आपल्या प्रतिनिधींची नावे मुख्य सचिवांच्या समितीकडे सादर करावीत. त्यांच्या सूचनांचा संपूर्ण विचार करून मुंबईतील 'एलबीटी' प्रणालीचा प्रस्तावित आराखडा तयार केला जाईल,' असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

'मुंबई महापालिकेने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला 'एलबीटी'संदर्भात अभ्यास करण्यास सांगितले असून, त्यांच्या सूचनांचादेखील आवश्यकतेप्रमाणे विचार करता येऊ शकेल. मुंबईसाठी 'एलबीटी' प्रणाली कशी योग्य ठरू शकेल तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी असलेल्या कायद्यात कशा प्रकारे सुधारणा कराव्यात, जेणेकरून व्यापा-यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल,' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृषिमंत्री पवार यांनीदेखील यासंदर्भात व्यापा-यांनी राज्य सरकारला सहकार्य करावे आणि समितीसमोर सूचना मांडाव्यात, असे आवाहन केले.

Read More »

वसई किल्ल्याच्या दुरवस्थेकडे कोण पाहणार?

नरवीर चिमाजी अप्पा यांच्या स्मृती जागवण्यासाठी शनिवारी २७५ वा विजयोत्सव वसईत साजरा करण्यात येणार आहे.

वसई- पोर्तुगीजांशी चार हात करून वसईला गुलामगिरीतून मुक्त करणा-या नरवीर चिमाजी अप्पा यांच्या स्मृती जागवण्यासाठी शनिवारी २७५ वा विजयोत्सव वसईत साजरा करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही हा विजयोत्सव थाटात साजरा करण्यात येणार असून, वसई-विरार महापालिकेच्या तिजोरीतून सुमारे ३५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, ऐतिहासिक आठवणी जागवताना इतिहासाचा साक्षीदार असलेल्या वसई किल्ल्याचा प्रशासन व सत्ताधा-यांना विसर पडला असून, त्याच्या दुरवस्थेकडे ढुंकूणनही पाहण्यास त्यांना वेळ नसल्याची नाराजी स्थानिकांतून व्यक्त होत आहे.

नरवीर चिमाजी अप्पा यांनी शोर्य गाजवून सन १७३९ रोजी पोर्तुगीजांचा पाडाव करून वसईकरांना परकीय शक्तींच्या दास्यातून मुक्त केल्याचा इतिहास आहे. या ऐतिहासिक घटनेचे निमित्त साधून वसई इतिहास व संस्कृती गौरव समिती, सर्वधर्म इतिहास अभ्यासक आणि वसई-विरार महापालिकेतर्फे'वसई विजयोत्स'व साजरा करण्यात येत आहे. यंदा या विजयोत्सवाचे तिसरे वर्ष आहे.

विविध कार्यक्रमांची रेलचेल

वसई विकास कला महाविद्यालयातर्फे किल्ले बांधणी स्पर्धा.
शनिवारी दुपारी तीन वाजता वज्रेश्वरी ते वसई किल्ल्यापर्यंत मशाल यात्रा.
दुपारी चार वाजता चिमाजी अप्पा मैदानापासून स्वागतयात्रा.
शनिवारी रात्री ७.३० वाजता १५० कलाकारांचे सादरीकरण.

महापालिकेला डागडुजीस मनाई

शेकडो वर्षापासून इतिहासाची साक्ष देणा-या वसई किल्ल्याची पूर्णपणे पडझड झाली आहे. किल्ल्याच्या दगडाची जागा छोटय़ा-मोठय़ा झाडांनी घेतली आहे. मात्र, या किल्ल्याच्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. प्रत्यक्षात हा किल्ला हा पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतो. मात्र, पुरातत्व विभाग कोणतीही जबाबदारी घेत नसून महापालिककेलाही डागडुजी करण्यास अटकाव घालत आहे.

संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न

वसई विजयोत्सवासाठी खर्च अमाप होत असला तरी वसईतील पारंपरिक संस्कृती जोपासण्याचा हा प्रयत्न आहे. महापालिका केवळ रस्ते, गटारे बांधण्याचे काम करत नसून, तरुण पिढीला इतिहास सांगण्यासाठी हा प्रयत्न आहे. किल्याच्या दुरवस्थेला पुरातत्व विभाग जबाबदार आहे. - नारायण मानकर, महापौर, वसई

विजयोत्सवाच्या नावाखाली वारेमाप खर्च

पहिल्या वर्षी विजयोत्सवाला पालिकेने ३५ लाखांची मंजुरी दिली होती. त्या वेळी प्रत्यक्षात हा खर्च ६२ लाखांपर्यंत गेला. यंदाही उत्सवासाठी ३५ लाख रुपये खर्चास पालिकेने मंजुरी दिली आहे. यंदाही हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजयोत्सव केवळ देखावा आहे. विजयोत्सवात नागरिकांचा सहभाग कमी असून, कार्यकर्त्यांची गर्दी अधिक आहे. केवळ चहापाणी, जेवण आणि सांस्कृतिक कार्यकमांवर वारेमाप खर्च केला जात आहे. -विनायक निकम, विरोधीपक्ष नेते, वसई महापालिका

Read More »

ठाण्यात रिक्षाचालकांची दंडेली सुरूच

जवळचे भाडे नाकारणे, दादागिरी, विनापरवाना रिक्षा चालवणे आणि प्रसंगी प्रवाशांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेलेल्या ठाण्यातील रिक्षाचालकांची दंडेली सुरूच आहे.

ठाणे- जवळचे भाडे नाकारणे, दादागिरी, विनापरवाना रिक्षा चालवणे आणि प्रसंगी प्रवाशांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेलेल्या ठाण्यातील रिक्षाचालकांची दंडेली सुरूच आहे. रिक्षा भाडे देण्यावरून अंबरनाथमध्ये एका रिक्षाचालकाने प्रवाशाची हत्या केल्याच्या घटनेने रिक्षाचालकांच्या मुजोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 'मंगल' रिक्षावाल्यांच्या टोळीने शहवासीयांच्या खिशाला कात्री लावण्याचा उद्योग सुरूच असून, या टोळीतील काही सदस्य प्रवाशांच्या डोळय़ांत धूळफेक करून टॅक्सी व रिक्षाचे जुने टेरिफ कार्ड दुमडून प्रवाशांकडून अवाच्या सव्वा भाडे वसुली करत आहेत.

मंगल रिक्षावाल्यांच्या टोळीतील काही सदस्य प्रवासी घरी जाण्याच्या घाईत असल्याचा फायदा उठवत मीटरप्रमाणे भाडे आकारण्याऐवजी थातुमातुर सांगून लूट माजवत आहेत. प्रवाशांनी वाढीव भाडय़ाबद्दल विचारणा केल्यानंतर मारामारीपर्यंत रिक्षाचालकांची मजल जाते. यासंदर्भात प्रवासी उपप्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे (आरटीओ) तक्रारी नोंदवत नसल्याने रिक्षाचालकांचे फावत आहे. प्रवाशांसोबत उद्धट वर्तन करणा-या रिक्षाचालकांविरोधात तक्रारी केल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून तात्पुरती कारवाई होत असल्याने च्या कारवाया दिवसेंदिवस वाढतच आहेत.

ठाणे शहरात ४० हजार रिक्षाचालक असून यापैकी १९ हजार रिक्षाचालक परवानाधारक आहेत. दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, शास्त्रीनगर, वर्तकनगर, कोपरी, कळवानाका, किसननगर, घोडबंदर रोड आदी महत्त्वाच्या ठिकाणी रिक्षा थांबे आहेत. मात्र, बरेचदा रिक्षाचालकांकडून जवळचे भाडेही नाकारले जात असल्याने नेमकी दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न प्रवासी करत आहेत.

रिक्षाचालकांची दादागिरी प्रवाशांच्या जीवावर

काही वर्षापूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी व रिक्षाचालकात वाद झाला होता. या भांडणातून रिक्षाचालकाने प्रवाशाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. दोन वर्षापूर्वी वर्तकनगर परिसरातही भाडे देण्यावरून एका रिक्षाचालकाने प्रवाशाची हत्या केली होती.

मुजोरीविरोधात येथे तक्रार करा!

भाडे नाकारणा-या, जादा भाडे आकारणा-या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक शाखेच्या (९५९४११५११५) या क्रमांकावर तसेच www.dcptraffic@thanepolice.org या संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येते. या तक्रारीत रिक्षाचालक, ठिकाण, दिनांक, वेळ, तक्रारदाराचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक आदी तपशील देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Read More »

मय्यपन २९ मेपर्यंत पोलिस कोठडीत

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेला गुरुनाथ मय्यपन याला न्यायालयाने २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.