Monday, May 27, 2013

आयपीएलचे नवीन राजे

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
"आयपीएलचे नवीन राजे "

चेन्नईचा धुव्वा उडवत मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सहाव्या मोसमाचे जेतेपद पटकावले


Read More »

स्मार्टफोनमुळे होते २२ दिवसांची बचत

मोबाइल फोन घराघरात पोहोचल्यानंतर या मोबाइल फोनच्या अतिसुधारित आवृत्त्यांमधील स्मार्टफोन हा प्रकार आता सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. या फोनमध्ये असलेल्या वेगवेगळ्या सुविधांमुळे त्याला स्मार्टफोन हे नाव देण्यात आले आहे.

मोबाइल फोन घराघरात पोहोचल्यानंतर या मोबाइल फोनच्या अतिसुधारित आवृत्त्यांमधील स्मार्टफोन हा प्रकार आता सर्वाधिक लोकप्रिय होत आहे. या फोनमध्ये असलेल्या वेगवेगळ्या सुविधांमुळे त्याला स्मार्टफोन हे नाव देण्यात आले आहे. या फोनच्या माध्यमातून अनेक कामे चुटकीसरशी करता येत असल्याने हा फोन स्मार्ट असल्याचे म्हटले जाते.
या फोनबाबतच्या या धारणेची आता एका संशोधनाने पुष्टी केली आहे. स्मार्टफोनच्या वापरामुळे त्याचा वापर करणारा दिवसातील त्याच्या कामाच्या वेळेतील ८८ मिनिटांची बचत करू शकतो. म्हणजेच वर्षातील २२ दिवसांची बचत होऊ शकत असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.
हॅरिस इंटरॅक्टिव या सर्वेक्षण करणा-या कंपनीने सुमारे २१२० प्रौढ प्रतिसादकर्त्यांचे निरीक्षण करून हा निष्कर्ष काढला आहे. त्यांच्या पाहणीत असे दिसून आले की स्मार्टफोन वापरणा-यापैकी ९७ टक्के लोक त्यातील किमान एका अ‍ॅप्लिकेशनचा (एखादे काम सोपे व जलदगतीने करणारी विशेष सुविधा) वापर करत असतो.
स्मार्टफोनच्या अ‍ॅप्लिकेशनच्या वापरातून वाचणा-या वेळेची सरासरी काढली असता ही सरासरी ८८ मिनिटे दिवसाला म्हणजेच वर्षाला २२ दिवस वर्षाकाठी असल्याचे स्पष्ट झाले.
सतत वापरल्या जाणा-या अ‍ॅप्समध्ये ई-मेल अ‍ॅप्सचा समावेश होता. त्याखालोखाल 'टेक्स्ट' आणि सोशल नेटवर्किंग अ‍ॅप्सचा समावेश होता. स्मार्टफोन वापर करणा-यांच्या म्हणण्यानुसार या फोनच्या या वापराशिवाय अ‍ॅप्सचा वापर मोबाइल गेम खेळण्यासाठी, इंटरनेट सर्फिगसाठी, हवामानाने नकाशे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) आणि कॅलेंडर फंक्शन यांसाठी करण्यात येतो.
जरी ई-मेल अ‍ॅप्सचा सातत्याने वापर केला जात असला तरी संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरल्या जाणा-या टेक्स्ट अ‍ॅप्समुळे दिवसाला सरासरी ५३ मिनिटांची बचत होत होती. तर ई-मेल अ‍ॅप्सच्या वापरामुळे ३५ मिनिटांची बचत होत असल्याचे आढळले. जे कामगार ई-मेल अ‍ॅप्सचा वापर करत होते त्यांना या अ‍ॅप्समुळे त्यांच्या कामाचा वेग खूपच वाढल्याचे दिसून आले. या सर्वेक्षणातून काढलेले निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत.
सध्याच्या नावीन्यपूर्ण मोबाइल तंत्रज्ञानामुळे जे फायदे होत आहेत, त्यापेक्षा कितीतरी जास्त फायदे मिळवून देण्याची या स्मार्टफोनची क्षमता आहे, असे या सर्वेक्षण करणा-या कंपनीच्या अधिका-यांचे म्हणणे आहे. केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे तर व्यवसायामध्येही त्याचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांना वाटते. स्मार्टफोनचा वापर करणा-यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
या उपकरणाचा वापर केवळ वैयक्तिक कामासाठी नव्हे तर कार्यालयीन कामासाठीही उपयोगाचा असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. पाचपैकी एक व्यक्ती या स्मार्टफोनमधील जीपीएस व ई-मेल अ‍ॅप्लिकेशनचा वापर केवळ कार्यालयीन कामासाठी करत असल्याचे, तर तीनपैकी एक व्यक्ती वैयक्तिक व कार्यालयीन अशा दोन्ही कामांसाठी करत असल्याचे दिसून आले.
मात्र, जरी या फोनचा सातत्याने वापर केला जात असला तरी या फोनचा पुरेपूर उपयोग केला जात नसल्याचे बहुतेक जणांना वाटत आहे. या फोनमधील सर्व वैशिष्टयांचा वापर केला जात नसल्याचे ८२ टक्के लोकांचे म्हणणे आहे.

Read More »

बायर्न म्युनिचला जेतेपद

बोरुसिया डॉर्टमुंडला २-१ असे नमवत बायर्न म्युनिचने पाचव्यांदा 'यूएफा' चॅँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धा जिंकली. वेम्ब्ली स्टेडियमवर शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच जर्मनीचे दोन संघ आमनेसामने आले होते.
लंडन - बोरुसिया डॉर्टमुंडला २-१ असे नमवत बायर्न म्युनिचने पाचव्यांदा 'यूएफा' चॅँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धा जिंकली. वेम्ब्ली स्टेडियमवर शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच जर्मनीचे दोन संघ आमनेसामने आले होते. आर्येन रॉबेनने ८८व्या मिनिटाला केलेला गोल बायर्नच्या विजयात मोलाचा ठरला. रॉबेनचा हा निर्णायक गोल होईपर्यंत मैदानात जबरदस्त चुरस पाहायला मिळाली.
सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना १-१ बरोबरी असल्याने निकालासाठी अतिरिक्त वेळेचा अवलंब केला जाण्याची शक्यता होती. मात्र फ्रॅँक रिबेरीकडून मिळालेल्या पासवर मॅट्स हमेल्सला चकवत रॉबेनने सुरेख गोल नोंदवला. पहिल्या सत्रातही गोल करण्यासाठी दोन्ही संघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच राहिला.
रॉबेनला गोल करण्याच्या दोन संधी होत्या. मात्र त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. दुस-या सत्रात ६०व्या मिनिटाला रॉबेनकडून मिळालेल्या पासवर मारियो मॅँडझ्युकीकने बायर्नचे खाते उघडले. मात्र त्यांची आघाडी फार काळ टिकली नाही. कारण ६६व्या मिनिटाला डांटेने बॉल मारण्याच्या नादात डॉर्टमुंडच्या मार्को रुसच्या पोटात 'कीक' मारली. त्यामुळे रेफ्रींनी डॉर्टमुंडला पेनल्टी बहाल केली. त्याचा फायदा घेत इकाय गुंडोगॅनने ६८व्या मिनिटाला बरोबरी साधणारा महत्त्वपूर्ण गोल केला. मात्र रॉबेनच्या 'लेट' गोलमुळे डॉर्टमुंडचे १९९७ नंतर ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. त्यातच त्यांचा फॉर्मात असणारा 'स्टार' रॉबर्ट लेवानडोवस्की सपशेल अपयशी ठरला.
रॉबेनला अश्रू आवरले नाहीत यापूर्वी २०१० आणि २०१२ मध्ये बायर्नने अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यावेळी भरीव योगदान देण्यास रॉबेन असमर्थ ठरला होता. गेल्या वर्षी घरच्या मैदानावर अंतिम फेरी खेळताना चेल्सीविरुद्ध 'पेनल्टी कीक'चा फायदा रॉबेनला उठवता आला नाही. परिणामी तो 'व्हिलन' ठरला होता. मात्र यंदा त्याने मोक्याच्या क्षणी गोल करत संघ सहका-यांसह चाहत्यांना खूष केले. या गोलनंतर रॉबेनला अश्रू आवरले नाहीत. २०१० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीतही रॉबेनला हॉलंडसाठी गोल करता आला नव्हता. त्यामुळे तीन वर्षात तीन मुख्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळून त्याला अपयश येत होते. मात्र यावेळी वेम्ब्लीचा तो ख-या अर्थाने 'हिरो' ठरला.
जर्मन कपनंतर हेन्केस पायउतार होणार
बायर्नचे ६८ वर्षीय प्रशिक्षक जुप हेन्केस या हंगामाअखेर निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी बार्सिलोनाचे माजी प्रशिक्षक पेप गार्डियोला यांची वर्णी लागली आहे. यंदा बायर्नला जर्मनीतील बुंदेस्लिगाचे जेतेपद विक्रमी वेळेत जिंकून देण्यात हेन्केस यांचा मोठा वाटा आहे. त्यात आता चॅँपियन्स लीगची भर पडली. हेन्केस यांचे मॅनेजर म्हणून हे दुसरे जेतेपद ठरले. यापूर्वी त्यांनी रेआल माद्रिदला १९९८ मध्ये ही स्पर्धा जिंकून दिली आहे. २०११ मध्ये तिस-यांदा हेन्केस यांनी बायर्नच्या मॅनेजरपदाची सूत्रे स्वीकारली होती. जर्मन कपच्या अंतिम लढतीत एक जूनला बायर्नची लढत स्टुटगार्टशी होणार आहे. हे जेतेपद जिंकून मोसमाचा शेवट गोड करण्याचा तसेच हेन्केस यांना विजयी निरोप देण्यासाठी बायर्न संघ उत्सुक आहे.
.. आणि जर्मन चाहते भिडले
इंग्लिश फुटबॉलच्या वातावरणात जर्मनीचे दोन संघ आमनेसामने आल्याने लंडनच्या वेम्ब्लीकडे जाणा-या रस्त्यांवर जर्मनीच्या चाहत्यांची मोठी गर्दी दिसत होता. तब्बल दीड लाख जर्मन चाहत्यांनी सामन्याचा आनंद लुटला. मात्र सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या चाहत्यांनी एकमेकांवर मोठय़ा प्रमाणात वस्तू फेकल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता.
सेलिब्रिटींमध्ये फर्ग्युसन यांच्यासह कपिलदेव आणि अभिषेक बच्चन
अपेक्षेप्रमाणे वेम्ब्लीवर सेलिब्रिटी मोठया संख्येने आले होते. मात्र त्यात लक्षवेधी ठरले ते मॅँचेस्टर युनायटेडचे निवृत्त प्रशिक्षक अ‍ॅलेक्स फर्ग्युसन. फर्ग्युसन यांनी प्रेक्षक म्हणून सामन्याचा आनंद लुटला. जर्मनीच्या चान्सलर अ‍ॅँजेला मर्केल यांनीही अंतिम लढतीत उपस्थिती दर्शवली होती. भारतीय वेळेप्रमाणे अंतिम लढत मध्यरात्री झाली असली तरी सामन्याचा आनंद लुटलेल्या फुटबॉलप्रेमींची संख्या कमी नव्हती, हे ट्विटर आणि फेसबुकवरील प्रतिक्रियांमधून दिसून येते. अंतिम लढतीला भारताचे माजी क्रिकेट कर्णधार कपिलदेव आणि बॉलिवुड अभिनेता अभिषेक बच्चन उपस्थित होता.
अभिषेक हा फुटबॉलचा चाहता आहे. मात्र यंदा त्याचा आवडता संघ चेल्सी अंतिम फेरीत नसल्याबद्दल तो निराश दिसला. कपिलदेव यांनी क्रिकेट कारकीर्द गाजवली असली तरी फिटनेससाठी तरुणवयात फुटबॉलदेखील खेळलेत. ''स्टेडियम 'हाउसफुल्ल' होतात तेव्हा सवरेत्तम कामगिरीसाठी क्रीडापटूंना मोठे प्रोत्साहन मिळते. फुटबॉलच्या लढतींना नेहमीच प्रेक्षकांचा विक्रमी प्रतिसाद लाभतो. त्याचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी आपण इथे आलो,'' असे कपिलदेव यांनी म्हटले.
भुतियाचा अंदाज योग्य ठरला
बायर्न म्युनिच जिंकेल, असा अंदाज भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने सामन्यापूर्वी वर्तवला होता. त्याचा अंदाज खरा ठरला. या हंगामात सातत्याने कामगिरी उंचावणारा बायर्न मागील खेपेतील निराशा भरून काढतील, असे भुतियाने म्हटले होते.

Read More »

मध्य रेल्वे की मृत्यूचा सापळा?

सर्वसामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल मृत्यूचा सापळा बनली आहे.यामुळे प्रवाशांकडून सुरक्षा अधिभार घेणा-या रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ठाणे - सर्वसामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल मृत्यूचा सापळा बनली आहे. गेल्या ११ वर्षात मध्य रेल्वे  मार्गावर २४ हजार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, २२ हजार प्रवासी जखमी झाले आहेत. ठाणे जिल्हा रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष ओम प्रकाश शर्मा यांनी माहिती अधिकारांतर्गत केलेल्या पत्रव्यवहारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे प्रवाशांकडून सुरक्षा अधिभार घेणा-या रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
 लोकलमधून दररोज तब्बल २० लाख प्रवासी प्रवास करतात. दारात लोंबकाळत उभे असताना, दोन्ही डब्यांच्या मधल्या जागेत किंवा टपावर बसले असताना तोल जाणे, रेल्वे रूळ ओलांडताना अपघात होणे, चालती गाडी पकडण्याच्या प्रयत्नात  किंवा धक्काबुक्कीत हात निसटून खाली पडणे, अशा अनेक घटनांमध्ये प्रवाशांना आपली जीव गमवावा लागतो. मुंबईतील ९५ ते ९८ टक्के प्रवासी सीझन पास किंवा तिकीट काढून प्रवास करतात. मुंबईतील उपनगरी रेल्वे हा रेल्वे खात्याला फायदा देणारा विभाग आहे. तरी प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे. मृत्यू पावणाऱ्या जवळच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई देण्याबद्दल रेल्वे खात्याची भूमिका नकारात्मक आहे. काही जखमी झालेल्या प्रवाशांना अपंगत्व येते. त्यांनाही नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ही सर्व प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवावीत, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.
 रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक अपघात 
मध्य रेल्वेवर एकूण ८३ स्थानके असून गेल्या अकरा वर्षात रेल्वे रूळ ओलांडत असताना मृत्यू पावलेल्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक म्हणजे १४ हजार ५५४ आहे. चालत्या गाडीतून खाली पडून मृत्यू पावलेल्या प्रवाशांची संख्या ४ हजार ५६१ आहे. खांबांना डोके किंवा हातपाय आपटून मृत्यू पावलेल्या प्रवाशांची संख्या २५३ आहे. फलाट आणि लोकलवरून पडून ९० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अन्य अपघातांमध्ये ४ हजार १५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. चालत्या गाडीतून पडून जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक म्हणजे ११ हजार ९८१ असून रेल्वेमार्ग ओलांडताना ४ हजार ७५३ तर अन्य अपघातांमध्ये ४ हजार ९७२ प्रवासी जखमी झाले आहेत.
 पावणेपाच कोटींचा दंड वसूल
प्रवाशांची रेल्वेमार्ग ओलांडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येते. प्रवासी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असतात. गेल्या १० वर्षात रेल्वे रूळ ओलांडण्याच्या गुन्ह्यात एक लाख ८९ हजार ३९ प्रवाशांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून चार कोटी ७७ लाख ८२ हजार ६६५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Read More »

ठाण्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद!

 जिल्ह्यात कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात १ हजार ९२ जणांना कुत्रे चावले आहेत.
ठाणे - जिल्ह्यात कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यात १ हजार ९२ जणांना कुत्रे चावले आहेत. यातील सर्वाधिक घटना (१३८ जणांना कुत्रा चावला) पालघर तालुक्यात घडल्या. त्यामुळे 'भीक नको, पण कुत्रा आवर' असे म्हणण्याची पाळी आता नागरिकांवर आली आहे.
ठाण्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. चार-पाच कुत्र्यांनी एका चार वर्षीय बालकावर हल्ला केल्याची घटना नुकतीच कळवा येथे घडली होती. श्रीनगर येथील रहिवासी सत्यवान राऊत हे मोटारसायकलने घरी येत असताना रस्त्यातील एका भटक्या कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला होता. या घटनांमुळे रात्री उशिरा पायी किंवा मोटारसायकलने घरी परतणा-या ठाणेकरांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. तर कुत्र्यांच्या अवेळी भुंकण्यामुळे रहिवाशांची झोपमोडही होत असते.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रामनगर, कैलासनगर, इंदिरानगर, साठेनगर, अंबिकानगर, भवानीनगर भागात कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. तर जिल्ह्यातील जव्हार, शहापूर, डहाणू, कासा, मुरबाड, वाडा, अंबाडी फाटा, मोखाडा, तलासरी, वाणगाव, पालघर, बदलापूर, विरार, मनोर या परिसरातही कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चायनीज गाडयानी कुत्र्यांचे पोषण
शहरी भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या चायनीज गाडय़ांचे फॅड आता ग्रामीण भागातही दिसू लागले आहे. या गाडयावरील उरलेले तेलकट पदार्थ रस्त्याच्या कडेलाच टाकले जातात. या पदार्थावरच भटक्या कुत्र्यांचे पोषण
होत आहे.
नसबंदीनंतरही हल्ले कायम
कुत्र्यांना मारण्याची बंदी असल्याने ठाणेकरांना मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे महापालिकेच्या आरोग्य खात्याने आतापर्यंत २८ हजार १४९ कुत्र्यांची नसबंदी केली आहे. नसबंदीमुळे कुत्र्यांच्या संख्येत घट झाली असली तरी त्यांचे रहिवाशांवरील हल्ले काही थांबलेले नाहीत.

Read More »

भारतीय पांढ-या वाघाचे जनुकीय रहस्य उलगडले

वन्य प्राण्यांमध्ये हिंस्र असला तरी एक वेगळाच रुबाब असलेल्या वाघांमध्येही पांढरे वाघ आणखी आकर्षक वाटतात. या वाघांना पांढरा रंग कोणत्या कारणामुळे मिळतो, त्याचे रहस्य उलगडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

वन्य प्राण्यांमध्ये हिंस्र असला तरी एक वेगळाच रुबाब असलेल्या वाघांमध्येही पांढरे वाघ आणखी आकर्षक वाटतात. या वाघांना पांढरा रंग कोणत्या कारणामुळे मिळतो, त्याचे रहस्य उलगडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यांच्या शरीरातील रंग प्रदान करणा-या एका जनुकामुळे हा रंग प्राप्त होत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. चीनमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.
चीनमधील चिमेलाँग सफारी पार्कमध्ये असलेल्या १६ वाघांच्या कुटुंबातील जनुकांचा त्यांनी अभ्यास केला. वाघांच्या या कुटुंबातील तीन पालकांपैकी प्रत्येकाच्या जनुकाची क्रमवारी तयार केली. या जनुकांच्या तपासणीमध्ये त्यांना एसएलसी४५ए२ हे त्वचेला रंग प्रदान करणारे जनुक सापडले. हेच जनुक आधुनिक युरोपीय लोकांना व घोडे, कोंबडय़ा व मासे यांना फिकट रंग प्रदान करण्याशी संबंधित असल्याचे यापूर्वीच दिसून आले होते.
पांढ-या वाघाच्या शरीरात आढळणा-या वैशिष्टय़पूर्ण जनुकामुळे लाल आणि पिवळ्या रंगद्रव्याचे एकत्रीकरण होत असते. पण त्याचा काळ्या रंगावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळेच हा वाघ पांढरा असला तरी त्याच्या शरीरावरील काळे पट्टे मात्र तसेच कायम राहतात याचे उत्तर मिळते. पांढ-या वाघाच्या इतिहासाचा विचार केला तो इ.स. १५०० पर्यंत जातो. या वाघाला मोकळ्या वातावरणात शेवटचे पाहिल्याची नोंद १९५८ची त्याच्या शिकारीच्या वेळची आहे. म्हणजेच या प्रकारच्या वाघांची मोठय़ा प्रमाणात शिकार झाल्याचे स्पष्ट होते.
या वाघांचे मुख्य खाद्य असलेली हरणांसारखी जनावरे रंगांधळी असल्याची शक्यता असते. त्याच प्रकारे बंदिस्त वातावरणात असलेल्या वाघांमध्ये डोळे तिरळे असण्यासारखे काही शारीरिक दोष असल्याचेही दिसून आले आहे. पण त्यासाठी सर्वस्वी मानवाला जबाबदार ठरवावे लागेल. कारण त्यांनी या वाघांचे प्रजनन बंदिस्त वातावरणात केल्यामुळे अशा प्रकारचे काही दोष निर्माण झाल्याची शक्यता आहे.
भारतीय वाघांच्या प्रजातीमधील हा एक वैशिष्टय़पूर्ण प्रकार भारतीय जंगलात आढळल्यावर त्यांच्या पांढ-या रंगाबाबतचे कोडे उलगडत नव्हते. मात्र, आता रंगद्रव्य जनुकामुळे त्यांच्या पांढ-या रंगाबाबतचे स्पष्टीकरण देता आले आहे. पांढरे वाघ नैसर्गिक जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मात्र, हे वाघ नैसर्गिक अधिवासात न राहता केवळ बंदिस्त वातावरणातच पाहायला मिळत आहेत. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याबाबत संशोधक प्रयत्न करणार आहेत.

Read More »

कॅल्शियममुळे स्त्रियांना मिळू शकते दीर्घायुष्य

 दुधाचे पदार्थ आणि माशांमध्ये आढळणारे कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतेच, त्याचबरोबर कॅल्शियममध्ये आणखी वैशिष्टय़पूर्ण गुणधर्म असल्याचे आणि स्त्रियांना ते दीर्घायुष्य प्रदान करू शकत असल्याचे नव्या संशोधनात आढळले आहे.

दुधाचे पदार्थ आणि माशांमध्ये आढळणारे कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतेच, त्याचबरोबर कॅल्शियममध्ये आणखी वैशिष्टय़पूर्ण गुणधर्म असल्याचे आणि स्त्रियांना ते दीर्घायुष्य प्रदान करू शकत असल्याचे नव्या संशोधनात आढळले आहे.
हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम चांगले असल्याचे म्हटले जात असले तरी कॅल्शियमच्या अतिरिक्त पुरवठय़ामुळे हृदयविकाराचा धोका असल्याचे यापूर्वी केलेल्या संशोधनात म्हटले होते.
'कॅनेडियन मल्टिसेंटर ऑस्टिओस्पोरोसिस स्टडी' या आरोग्य केंद्रातील आकडेवारीचा अभ्यास करून कॅल्शियमबाबतची भीती काही प्रमाणात कमी केली आहे. जर माफक प्रमाणात शरीराला कॅल्शियमचा पुरवठा केला तर त्याचा स्त्रियांना फायदा होत असल्याचे त्यांना आढळले आहे.
दररोज गरजेनुसार कॅल्शियमच्या अतिरिक्त पुरवठय़ामुळे स्त्रियांमधील अकाली मृत्यूचा धोका कमी होत असल्याचे आमच्या संशोधनात दिसून आले आहे, असे कॅनडामधील मॉन्ट्रिअल विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डेव्हिड गोल्झमन यांनी सांगितले आहे. ज्या महिला दिवसाला १००० मिलिग्रॅम कॅल्शियम घेत होत्या त्यांना फायदा झाल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यासोबत त्या डी जीवनसत्त्व घेत होत्या की नव्हत्या ही बाब गौण ठरवण्यात आली. १९९५ ते २००७ या काळात कॅनडामधील ९०३३ नागरिकांची पाहणी करून हे निष्कर्ष काढण्यात आले. या काळात पाहणी केलेल्यांपैकी ११६० व्यक्तींचा मृत्यू झाला.
जरी या आकडेवारीतून महिलांच्या दीर्घायुष्याचा संबंध कॅल्शियम सप्लिमेंट्सशी दिसून आला तरी या अभ्यासात पुरुषांना त्याचा फारसा फायदा असल्याचे दिसून आले नाही. त्याच प्रकारे डी जीवनसत्त्वाचा दीर्घायुष्याशी संबंध लावता आला नाही. कॅल्शियम कोणत्या पदार्थातून मिळत आहे याबाबत कोणताही नियम लावता आला नाही. मात्र, कॅल्शियमचा पुरवठा हीच बाब महत्त्वाची ठरली. म्हणजेच दुग्धोत्पादनातून मिळणारे कॅल्शियम किंवा बिगर दुग्धोत्पादनातून मिळणारे कॅल्शियम या दोहोंमधून सारखेच परिणाम असल्याचे दिसून आले.


Read More »

ग्लासांना द्या नवा लुक

आपलं घर सुंदर दिसावं म्हणून आपण गृहसजावटीचे नवनवीन प्रयोग करत असतो. घरातील अंतर्गत सजावटीमध्येही आपली कल्पकता झळकत असते.

आपलं घर सुंदर दिसावं म्हणून आपण गृहसजावटीचे नवनवीन प्रयोग करत असतो. घरातील अंतर्गत सजावटीमध्येही आपली कल्पकता झळकत असते. घरात पाहुणे आल्यावर प्रथमत: आदरातिथ्याची सुरुवात होते, ती ग्लासातून पाणी देण्याने.
अँटिक शेप्समध्ये ग्लास आताशा बाजारात मिळू लागले असले तरी ते ब-याचदा साध्या काचेचे असतात. अशा साध्या काचेच्या ग्लासेसना थोडासा रंगीबेरंगी लुक घरच्या घरी आपल्याला देता येऊ शकतो. कसं ते पाहू या.. बाजारात त्यासाठी खास ग्लास पेंट्स आणि काचेवर चिकटवता येईल अशी विशिष्ट गोंदही मिळते.
ग्लास पेंटमध्ये ही पारदर्शी गोंद मिसळून ग्लासाच्या तळापासून वर आकर्षक रंगसंगतीत नुसत्या ठिपक्यांची रचनात्मक डिझाइन जरी केली तरी ते खूप सुंदर दिसतं. तुमची चित्रकला जर खास असेल तर मात्र तुम्ही सुरेख नक्षीकामही या ग्लासांवर करू शकता. पाहा मग, घरात प्रवेशकर्त्यां पाहुण्यांना तुम्ही या पहिल्याच आदरातिथ्यात कसं खूश करून टाकाल ते!


Read More »

वादाची मालिका कायम सुरूच

 शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या मागे लागलेले हे वादाचे 'लेबल' आजही वादळ उठवू लागले आहे.


बाळासाहेबांनी एखाद्या विषयावर प्रतिक्रिया अथवा मत व्यक्त केले आणि त्यावर वादळ उठले नाही, असे कधीच घडले नाही. आपल्या हयातीत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व ठरलेल्या बाळासाहेबांचा मृत्यूनंतरही वादाने पिच्छा सोडलेला नाही. शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या मागे लागलेले हे वादाचे 'लेबल' आजही वादळ उठवू लागले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कारविधी शिवाजी पार्क मैदानात करण्यावरून वाद उठला. हा वाद संपत नाही तर शिवाजी पार्क मैदानावर त्यांचे स्मारक बांधण्यावरून नव्या वादाला सुरुवात झाली. शिवसेना फुंकर मारून हा निखारा विझवत नाही, तर आता शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांवरील अंत्यसंस्कारावेळी सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी स्क्रीन यावरील खर्चावरून नवा वाद निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनेचेच नाही तर तमाम मराठी आणि हिंदूंचे ते हृदयसम्राट होते.
त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे लाखो चाहते आहेते, याचा प्रत्यय त्यांच्या निधनानंतर १८ नोव्हेंबरला त्यांच्या अंत्ययात्रेदरम्यान आला. 'न भूतो न भविष्यती' असा जनसागर बाळासाहेबांना निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर लोटला होता. त्यामुळे लाखोंच्या संख्येने जमा होणा-या या जनसागराला नियंत्रणात आणणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. त्यामुळेच पोलिसांनी, महापालिकेला सांगून सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी स्क्रिन लावण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. अत्यंत कमी अवधीत हे काम करायचे असल्याने आयुक्तांनी निविदा न मागवता एका कंपनीला हे काम ४ लाख ९९ हजार ४४० रुपयांमध्ये दिले. आयुक्तांनी आपले काम केले. केलेल्या खर्चाला मंजुरी मागण्यासाठी म्हणून मग त्यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आणला.
शिवाजी पार्कवरील अंत्यसंस्काराचा सर्व खर्च शिवसेनेने केला असला, तरी प्रशासनाकडूच असा प्रस्ताव आल्यामुळे या पाच लाख रुपयांचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून झाला असल्याचे स्पष्ट झाले. प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. परंतु ज्याने हा खर्च केला त्याचे नाव त्यांनी पुढे आणले. मुळात हा पैसा कुणी खर्च करायला हवा होता, असा प्रश्न आज उपस्थित होत आहे. हा खर्च शिवसेनेने करायला हवा होता, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण बाळासाहेब हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. या व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी म्हणूनच राज्य सरकारने शिवाजी पार्क मैदानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार विधी करण्यास परवानगी दिली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जर सीसीटीव्ही कॅमेरे व एलईडी स्क्रीन बसवण्यात आल्या असतील तर त्याचा खर्च गृहखात्याने करायला हवा. आणीबाणीची वेळ असल्यामुळे महापालिकेने यासाठी पैसे खर्च केले असले तरी त्यानंतर गृहखात्याने हा खर्च महापालिकेला द्यायला हवा होता. मात्र हा खर्च गृहखात्याने द्यावा, यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने गृहखात्याशी कधी पत्रव्यवहार तरी केला आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. जर महापालिकेनेच खर्च मागितला नसेल तर गृहखाते तरी काय देणार म्हणा.
शिवाजी पार्कसह अन्य सार्वजनिक ठिकाणी जेव्हा कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा सुरक्षेचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात. त्यामुळे हा खर्च गृहखात्याशीच संबंधित असल्यामुळे तो खरे तर त्यांनीच द्यायला हवा. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातही विसर्जनस्थळी कॅमेरे बसवले जातात. हा खर्च महापालिकेच्याच तिजोरीतून केला जातो. तो एकटय़ा शिवसेना पक्षाने करणे चुकीचे ठरेल.
वृत्तपत्रात याबाबतच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख व्यथित झाले. शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. पण महापालिकेत सत्तेवर बसलेले महापौर सुनील प्रभू आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे या शिवसेनेच्या नेत्यांवर कोणताही परिणामी झाला नाही. केवळ पाच लाख रुपयांसाठी शिवसेनाप्रमुखांचा अपमान केला जावा, हे त्यांच्या चाहत्याला पटणारे नाही. त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकणा-यै चाहत्यांना तर नाहीच नाही. त्यामुळे जेव्हा हे वृत्त वाचले तेव्हा अनेकांना दु:ख झाले. परंतु बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे महापालिकेत सत्तेवर बसलेल्या शेवाळे व प्रभू या नेत्यांवर यत्किंचितही परिणाम झाला नाही. त्यामुळेच दुस-या दिवशी या दोघांना मातोश्रीवर बोलावून चांगलाच दम भरण्यात आला. शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्काराचा खर्च शिवसेनेने केलेला असताना, केवळ ५ लाखांमुळे शिवसेनाप्रमुख व पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असेल तर तुमची मला गरज नाही. मी सक्षम आहे, असे उद्धव ठाकरेंनी या दोघांना बजावले आणि पाच लाख रुपयांचा धनादेश महापालिका आयुक्तांकडे पाठवून दिला. यातच शेवाळे व प्रभूंची पक्षावरील व बाळासाहेबांवरील निष्ठा उघड झाली. खरे तर हे प्रकरण वाढल्यानंतर ते शांत करण्याची जबाबदारी या दोघांच्या हाती होती.
याबाबतचे वृत्त आल्यानंतर शेवाळे आणि प्रभूंनी आयुक्तांना त्वरित याबाबतचा खुलासा करण्यास भाग पाडले असते, तर कदाचित हे प्रकरण इतके ताणलेही नसते. तसेच धनादेश दिल्यानंतरही याबाबतचा जो प्रस्ताव मंजूर करण्यात आला तो मागे घेणे अपेक्षित होता, तोच मुळी शेवाळेंनी स्थायी समितीत मंजूर करून आपली अकार्यक्षमता स्पष्ट केली. महापालिकेत शिवसेनेचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. महापालिकेतील शिवसेनेचे हे नेते विकासाची कामे करण्याऐवजी 'लायझनिंग'ची कामे करत स्वत:ची पोटं भरत आहेत. त्यामुळे आज प्रशासनापुढे ही मंडळी हतबल ठरत आहे. धनादेश दिल्यानंतरही प्रशासनातील एक जबाबदार अतिरिक्त आयुक्त, स्थायी समितीत आयुक्तांचा प्रतिनिधी म्हणून बसताना, धनादेश दिला आहे किंवा नाही, कितीचा दिला आहे, कोणी दिला आहे याची आपल्याला कल्पना नाही, असे विधान करतात. उद्धव ठाकरेंनी दिलेला धनादेश वटवला जाऊ नये म्हणून आदल्या दिवशी महापौर अतिरिक्त आयुक्तांना दम भरतात, आणि दुस-या दिवशी दुसरे अतिरिक्त आयुक्त वेगळे विधान करतात. यावरूनच महापालिकेतील शिवसेनेचे नेते पक्षातील अंतर्गत राजकारणासाठी प्रशासनावर चांगला वचक ठेवतात, हे दिसून येते. परंतु नागरी विकासकामांसाठी प्रशासनावर अंकुश ठेवून त्यांच्याकडून ही कामे करून घेण्याची धमक त्यांच्यात नाही. या सर्व प्रकारानंतर प्रस्ताव मंजूर केल्यामुळे शिवसेनेने ५ लाख रुपयांचा धनादेश देऊन दिखावूपणाचे नाटक तर केले नाही ना, असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही.
आयुक्तांनी केलेल्या ५ लाख रुपयांच्या आतील खर्चाचे प्रस्ताव हे थेट महापालिका चिटणीसांकडे येतात, ते असे प्रस्ताव थेट स्वीकारतात. परंतु हा प्रस्ताव आणला म्हणून चिटणीसांवर कारवाई करण्याऐवजी चक्क दोन महिन्यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या चिटणीस विभागातील उपचिटणीसांची चौकशी लावून कारवाईचे आदेश दिले गेले. पण जर प्रस्ताव चुकीचा होता तर मग शेवाळेंनी तो मंजूर का केला, केवळ दुस-याच्या रागापोटी एका सर्वसामान्यांचा बळी देणे हे शेवाळेंना आणि त्यांच्या पक्षाला शोभते का?
आज कोणत्या ना कोणत्या कारणांनी शिवसेनाप्रमुखांचे महत्त्व कमी करण्याचे काम महापालिकेतील शिवसेनेकडून होत आहे. शिवाजी पार्क मैदानावर चौथ-याचे काम आजही अर्धवट आहे. त्याला अद्याप सीआरझेडची मान्यता नाही. बांधकाम झाले तरी ते महापालिकेच्याच ताब्यात आहेत. एका बाजूला शिवाजी पार्क मैदानात 'रेनवॉटर हार्वेस्टिंग' योजना राबविण्यासाठी मनसेचे संदीप देशपांडे यांनी सीआरझेडची मंजुरी मिळवून आणली. परंतु शिवसेनेला ती आणता आली नाही. त्यामुळे तो चौथरा म्हणजे केवळ पत्र्याचे कुंपणच बनले आहे.
याशिवाय पार्क क्लब, रेसकोर्स आदी ठिकाणी बाळासाहेबांचे स्मारक बनविण्याची मागणी होत आहे. पण केवळ मागणी आणि घोषणाच. बाळासाहेबांसारख्या शिखराएवढय़ा व्यक्तिमत्त्वाचे स्मारक हे मोठे असण्याऐवजी ते विचारांनी मोठे असायला हवे. पण आता छोटय़ा छोटय़ा उद्यान, मैदानांनाही बाळासाहेबांचे नाव देत या व्यक्तिमत्त्वाला छोटे बनवण्याचे काम शिवसेनेकडून होत आहे. 

Read More »

गृहसजावटीचा कानमंत्र

गृहसजावट ही एक कलाच आहे. मात्र कलात्मक पद्धतीने घर सजवताना अनेक छोटया-मोठया गोष्टींचं तंत्र बाळगावं लागतं. ते बाळगलं गेलं तर गृहसजावट आकर्षक दिसण्याबरोबरच समतोलितही दिसते. त्यासाठीच्याच या काही टिप्स, खास तुमच्यासाठी..

दिवाणखाना, स्वयंपाकघर आणि इतर खोल्यांमध्ये अनावश्यक वस्तूंचा भरणा टाळावा.
घरातला कोपरा सजवण्यासाठी नेहमी गडद रंगसंगतीचा वापर करावा. एखादा कोपरा कुंडीनेदेखील उठावदार दिसतो.
दिवाणखान्यातली रचना एकसंध असावी. विरोधाभास करणारी रंगसंगती असल्यास ती चुकीची रंगसंगती होणार नाही, याकडे लक्ष द्यावं.
दिवाणखान्यात कोणतंही फर्निचर घेताना जागेचा पुरेपूर वापर करावा. सगळ्यांना बसायला पुरेपूर जागा मिळेल, अशी रचना असावी.
दिवाणखान्याला रंग देताना ऑफ व्हाइट, क्रीम, लेमन यलो, पिस्ता किंवा गुलाबी असे रंग निवडावेत. मात्र जागा मोठी असेल तर एखादी भिंत गडद रंगाची करावी.
दिवणाखान्यात लावले जाणारे फोटो नेहमी हसरे, खेळकर किंवा डोळ्यांना सुखद वाटतील असे असावेत.
प्रवेशद्वार हे आकर्षक त्याहीपेक्षा स्वच्छ असावं आणि त्याचा रंग नेहमी गडद असावा.
बैठक व्यवस्थेमध्ये स्टोअरेज व्यवस्थेचाही विचार करावा. केन किंवा रबरवूडचे फर्निचर आकर्षक दिसते.
मुलांच्या खोल्यांमध्ये अभ्यासाचं टेबल, कपडय़ांचं स्वतंत्र कपाट आणि पलंगासोबतच्या स्टोअरेजमध्येही प्रत्येक वस्तू मुलांना चटकन हाताशी येतील अशाच असाव्यात.
मुलांच्या खोलीला रंग देताना मुलांचं वय, त्यांचा स्वभाव यांचा विचार करून रंग द्यावा.
स्वयंपाकघरातील शोकेस आधुनिक असावी. तसंच किचन ट्रॉलीज आणि कपाटाची रंगसंगती मिळतीजुळती असावी.
रोजच्या फोडण्यांमुळे श्वास कोंडू नये म्हणून मोठी खिडकी, एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी बसवावी.
सगळ्या प्रकारची छोटी-मोठी भांडी हाताला चटकन सापडतील अशीच असावीत.
घरासमोरच्या टेरेसवर कुंडय़ा किंवा झाडं लावून एक छोटेखानी बागही करता येते.
घराची भव्यता दिसण्यासाठी आरसा किंवा भव्य निसर्गचित्राचा वापर करावा.
घरातली फूलझाडं शक्य असल्यास ऋतू किंवा आठवडा किंवा पंधरवडय़ानुसार बदलत राहावी. म्हणजे घर आकर्षक दिसतंच आणि मन प्रसन्न राहतं.
घरी येणा-या पाहुण्यांना कपडे दिसणार नाहीत अशा ठिकाणी ते वाळत घालावेत. गॅलरीत रॅक करून घ्यावा.
कपडे वाळत घालताना शक्यतो एकसारखे कपडे एका रांगेत घालावेत. कसेही वाळत घातलेले कपडे विचित्र दिसतात. त्यामुळे घराची शोभा जाते.
सगळ्यांनी एकत्र बसून जेवण्याची जागा म्हणजे डायनिंग रूम. तिथे सगळ्यांना एकत्र बसता येईल इतकी जागा असवी.


Read More »

हा 'प्रहार' आपल्यासाठीच!

अनधिकृत पार्किंग, रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे, फुटलेल्या जलवाहिन्या, धोकादायक स्थितीतील वीजतारा..

अनधिकृत पार्किंग, रस्त्यांवरील खड्डे, उघडी गटारे, फुटलेल्या जलवाहिन्या, धोकादायक स्थितीतील वीजतारा.. शहरातील समस्यांची जंत्री न संपणारी आहे. या सर्व समस्यांचा सामना अगदी झोपडीपासून गगनचुंबी इमारतींपर्यंत कुठेही राहणा-या मुंबईकरांना करावा लागतोच.
त्याविषयी कुरबुर करणे, आपसात चर्चा करून महापालिका किंवा संबंधित संस्थेला दूषणे देणे किंवा फार तर तक्रार नोंदवणे यापलीकडे काही केले जात नाही. या तक्रारींची दखल घेतली जाईलच, याचीही शाश्वती नसते. त्यामुळेच 'प्रहार'ने वाचकांसाठी हे खास व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तुमच्या समस्या तुम्ही इथे मांडल्यास आणि संबंधित छायाचित्रेही सोबत जोडल्यास त्या प्रश्नांचा पाठपुरावा करून ते दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
संपर्क : प्रहार कार्यालय, इंडियाबुल्स वन सेंटर, ज्युपिटर मिल्स कंपाउंड, फितवाला रोड, लोअर परळ, मुंबई- १३, फॅक्स : ०२२-४०९६९९०० ई-मेल : prahaar.complaint@prahaar.co.in

पश्चिमेकडील जुन्या डोंबिवली मार्गावरील कचरा कुंडी ८ ते १० दिवस साफ केली जात नाही. त्यामुळे कुंडीतील कचरा रस्त्यावर पसरल्याने या भागात दरुगधी पसरलेली आहे. ही समस्या छायाचित्रातून मांडली आहे 'प्रहार'चे वाचक अरुण विष्णू पराडकर यांनी




Read More »

अमेरिकेची पहिलीच वारी!

अमेरिकेला भेट देणा-या मंडळींना विमानाने अथवा बोटीने पोहोचेपर्यंत कोणत्याही स्वरूपाचा फॉर्म भरावा लागत नाही, असं मी नुकतच वाचलं आहे.

अमेरिकेला भेट देणा-या मंडळींना विमानाने अथवा बोटीने पोहोचेपर्यंत कोणत्याही स्वरूपाचा फॉर्म भरावा लागत नाही, असं मी नुकतच वाचलं आहे. मी अमेरिकेत पहिल्यांदाच जाणार आहे, तर मलादेखील असंच काहीसं करावं लागेल की, यापेक्षा काहीतरी वेगळं? तुमच्या मते, मी केव्हा अमेरिकेला भेट द्यावी?
उत्तर : तुम्हाला आय-९४ नावाचा फॉर्म भरावा लागेल. जो कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनशी संबंधित आहे. जो अमेरिकेत भेटी देणा-या मंडळीच्या आगमन आणि निर्गमन करणाच्या वेळी वापरला जातो. काही मर्यादीत परिस्थिती वगळता, ३० एप्रिल २०१३ पासून सर्व प्रवाशांकरिता तयार करण्यात आलेल्या कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनच्या कागदी फॉर्मची जागा 'आय -९४' नावाची स्वयंचलित यंत्रणा घेणार आहे. हवाई आणि समुद्र अड्डयांवर २५ मे २०१३पर्यंत या यंत्रणेची अंमलबजावणी होणार आहे.
कागदी फॉर्म भरून घेण्याऐवजी प्रवाशांना त्यांच्या पासपोर्टवर कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनचा स्टॅम्प प्रदान करण्यात येणार आहे, जो प्रवाशांच्या प्रवेशाची तारीख, प्रवेश वर्ग आणि प्रवेश दिलेल्यापर्यंतची तारीख नमूद करणार आहे. प्रवाशांना अमेरिका सोडण्यापूर्वी यापेक्षा वेगळ्या प्रकारे काहीही करण्याची गरज नाही. 'आय -९४'च्या पेपर प्रतमध्ये दिल्याप्रमाणे कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनने प्रवाशांच्या मदतीसाठी www.cbp.gov/i94 नावाची वेबसाइटसुद्धा बनवली आहे. अमेरिका आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि सीमा सुरक्षा याचं महत्त्व जाणते.
त्यामुळे प्रवाशांच्या आगमन प्रक्रिया शक्य तेवढय़ा लवकर कशा होतील याचबरोबर सीमा सुरक्षेवर लक्षं देणं जास्त गरजेचं असतं. स्वयंचलित 'आय -९४' यंत्रणेमुळे कागदोपत्री कामाचा व्याप कमी होऊन कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनची तपासणीही लवकर करता येणार आहे.
प्रलंबित व्हिसासाठी मला काही दस्तऐवज पाठवायचे आहेत, ते दस्तऐवज नियमित मेलमार्गे पाठवू शकतो का?
उत्तर : नाही. जर कॉन्सुलेटने तुम्हाला २२१(जी) पत्र दिलं असेल आणि त्यात पुढील प्रक्रियेसाठी इतर दस्तऐवज जमा करा, असं नमूद केलं असेल तर तुम्हाला सर्व दस्तऐवज तुम्ही 'टीम स्टॅनली डॉक्युमेंट ड्रॉप ऑफ' असलेल्या ठिकाणी सुपूर्द करावेत. ते तुमचे दस्तऐवज कॉन्स्युलेटकडे पोहोचवतील. तुमच्या आसपास असलेली डॉक्युमेंट ड्रॉफ लोकेशन आणि वेळा तुम्हाला http://www.ustraveldocs.com/in/in-loc-documentdropoff.asp या संकेतस्थळावर मिळतील.

व्हिसा किंवा कॉन्स्युलेटविषयक कुठलीही माहिती हवी असल्यास आमच्या http://mumbai.usconsulate.gov.¹या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या सदरातून आम्ही प्रत्येकाच्या शंकेचं निरसन करू शकत नाही. या सदरातून आम्ही शक्यतो सर्वसामान्य लोकांना कोणते प्रश्न पडू शकतात याविषयी सविस्तर माहिती देतो. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर support-india@ustraveldocs.com. या संकेतस्थळाला भेट द्यावी. व्हिसासाठी अर्ज केलेले किंवा अ‍ॅप्लिकेशन आयडी मिळालेले अर्जदार आपल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac या ठिकाणी जाऊन चेक करू शकता.

Read More »

आज्यांनो, दागिने सांभाळा!

अलीकडे घरफोडीपेक्षाही भर रस्त्यांतही चो-यांचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. हे प्रकार विशेषत: घडतात ते साठी ओलांडलेल्या स्त्रियांच्या बाबतीत आणि त्याही त्यांच्या राहत्या घराच्या आसपासच्या आवारातच! त्यामुळे मध्यमवयीन स्त्रियांच्या बाबतीत सुरक्षेचे प्रश्न नव्याने उद्भवले आहेत. मात्र स्त्रियांनीच यासाठी दक्ष राहिलं आणि आपल्या आसपास लक्ष ठेवलं तर हे प्रकार टाळता येऊ शकतात..

त्या आजी चांगल्या धीराच्या. म्हटल्या तर एकदम स्मार्ट. पटकन फशी पडणा-या नाहीत. पण परवा चोरटय़ांनी त्यांच्या हातातल्या बांगडय़ा लांबवल्या. तेही सोसायटीच्या आवारातून. बहुधा चोरटे आधीपासून पाळत ठेवून असावेत. आजी सकाळी एकटय़ाच फिरायला बाहेर पडतात. सुरुवातीला एक जण धावत धावत आला आणि घाब-याघुब-या आवाजात आजींना म्हणाला तिकडे नाक्यावर सराफाचं दुकान फोडलंय. आजी तुम्ही ताबडतोब घरी जा, इथे फिरणं सुरक्षित नाही. आणि तो धावत धावत निघून गेला.
दोन मिनिटं होतायत न होतायत तोच पाठून दुसरा माणूस धावत आला. इथून कुणी धावत गेलं का, म्हणून आजींना विचारू लागला. आजी म्हणाल्या हो. अहो, मोठा दरोडा पडलाय. तुम्ही इथे काय करताय, म्हणून तो आजींवरच ओरडला. आजी तर घाबरून गेल्या. मग लगेच म्हणाला, इथे सुरक्षित नाही. तुमचे सोन्याचे दागिने काढून रुमालात ठेवा. त्याने स्वत:चा रुमाल काढला.
आजींना वाटलं की तो बहुधा पोलिसच असावा. म्हणून त्यांनी घाईघाईने बांगडय़ा आणि मंगळसूत्र काढून रुमालात ठेवलं आणि त्याने तो रुमाल आजींकडे दिला आणि तो धावत धावत निघून गेला. आपले दागिने त्या रुमालात सुरक्षित आहेत या भ्रमात आजी घरी आल्या आणि रुमाल उघडून बघतात तो त्यात दुसरेच खोटे दागिने होते. आपण गंडवलो गेलो आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं.. पण उशीर झाला होता.
दुस-या आजींच्या बाबतीत साधारण असंच घडलं. पण त्यांना सांगितलं गेलं की, तुमच्या मुलाचा अपघात झालाय. त्याला प्रचंड लागलंय. हॉस्पिटलमध्ये गहाण ठेवायला बांगडय़ा द्या, वेळ नाही जास्त. त्यांनी गडबडीत बांगडया काढून दिल्या.परवा ठाण्यात एका आजींच्या पाटल्यांच्या बाबतीतही असंच घडलं. थोडी गडबड सुरू आहे. अंगावर दागिने ठेवू नका. काढून एका पिशवीत ठेवा. पिशवीत दागिने ठेवल्यावर बाइकवरच्या चोरांनी वेगाने येऊन पिशवी पळवली.
एका आजींच्या बाबतीत तर खूपच दुर्दैवी प्रसंग घडला. एका चोरटय़ांनी त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपला मोबाइल सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे दिला आणि एका चहाच्या टपरीबाहेर बसवून चहा दिला आणि आलोच म्हणून सांगून तो गायब झाला. प्रत्यक्षात त्याने चहात सफाईने गुंगीचं औषध टाकलं. आणि तो बहुधा आजी बेसावध होण्याची वाट पाहत जवळपासच असावा.
मात्र कर्मधर्मसंयोगाने आजींच्या सोसायटीतली एक मुलगी तिथून जात होती आणि कधीही हॉटेलात न बसणा-या आजी इथे कशा याचं आश्चर्य वाटून तिने त्यांना हटकलं. त्यांच्या चेह-यावरची गुंगी पाहून ती आजींना घेऊन गेली. मात्र दिवसभर उपास असल्यामुळे आजींना त्या औषधाची विषबाधा झाली आणि त्यात त्यांचा अंत झाला.
हे सगळे प्रकार साधारण साठी ओलांडलेल्या स्त्रियांच्या बाबतीत मोठय़ा प्रमाणात घडताहेत. आणि बहुतांश घटना राहत्या घराच्या आसपासच घडल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय मध्यमवयीन स्त्रियांच्या बाबतीत सुरक्षेचे प्रश्न नव्याने उद्भवले आहेत. आयुष्यभर जपलेला दागिना चोर असे हातोहात लंपास करताना दिसत आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे एकटंदुकटं फिरताना हल्लीच्या दिवसात सोन्याचे दागिने घालूच नयेत. दुसरं म्हणजे तुमच्या सोसायटीच्या परिसरात किंवा लिफ्टमध्ये तुम्ही खूप सुरक्षित आहात अशा भ्रमात राहू नये.
प्रत्येक पावलावर दक्षता ठेवून सावधानता बाळगावी. सोसायटीतील वॉचमन किंवा सेवाकार्यासाठी येणा-या लोकांशी अघळपघळ गप्पा मारू नये. बोलण्याची वेळ आलीच तर घरातल्या गोष्टी सांगू नये. त्यानिमित्ताने विश्वास संपादन करून तुमची माहिती काढली जाऊ शकते. घरातले पुरुष किती वाजता येतात, किती वाजता जातात, फिरण्याची वेळ कोणती, वगैरे माहिती देऊ नये. परिसरात अनाहूत बाइकवाला फिरत असेल तर लगेच सुरक्षा व्यवस्थेला किंवा पोलिसांना कल्पना द्यावी. दुपारच्या वेळी हेल्मेटधारी बाइक फिरताना दिसल्यास नंबर टिपून ठेवावा.
शक्य झाल्यास तरुणांच्या मदतीने हटकावे. फेरीवाल्यांना परिसरात प्रवेश देऊ नये. तसेच सर्वेक्षणासाठी आल्याचं निमित्त सांगणा-यांची ओळखपत्रे कसून तपासावीत. ही चौकशी त्यांना अपमानास्पद वाटली तरी त्याबाबतीत ढिसाळपणा करू नये. दरोडा, चोरी, आग वगैरेसारख्या आपत्कालीन घटना किंवा निकटवर्तीयांच्या अपघाताबद्दल सांगून कुणी घाबरवून टाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर भांबावून न जाता प्रतिचौकशी करावी. चार ओळखीच्या लोकांना बोलावून घ्यावे. दागिने किंवा तुमच्या जवळील मौल्यवान वस्तूंबद्दल कुणी विषय काढल्यास संशयाची सुई त्याच्याकडे वळवून सावधान राहावं.



Read More »

बैठकीला द्या लोककलेचा रंग

घर कितीही आधुनिक असलं तरी ते कुठेतरी आपल्या संस्कृतीशी जोडलं जावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याच हौसेपायी बैठकीच्या खोलीत पारंपरिक सजावट करण्यावर भर दिला जातो. या सजावटीने घराची शान तर वाढतेच पण काँक्रिटच्या जंगलातही त्याला मातीचा वास येतो. तुमची पारखी नजर जितकी चांगली तितकी या बाबतीत तुम्ही उत्कृष्ट सजावट करू शकता. असे अस्सल मातीतले नमुने गोळा करून त्यांनी तुमची बैठकीची खोली सजवलीत तर त्याचं वेगळेपण का नाही उठून दिसणार?
घर सजवणं ही एक कला आहे. आजकाल धकाधकीच्या जीवनात त्यासाठी फार वेळ मिळत नाही, हे अगदी खरंय. पण आजूबाजूला हिंडताना थोडी तीक्ष्ण नजर ठेवली तर घराच्या सजावटीचे अनेक चांगले पर्याय सहज उपलब्ध होताना दिसतील. घराच्या बैठकीच्या खोलीची सजावट कशी करायची, हा ब-याच जणांसमोर मोठा प्रश्न असतो. महागडं फर्निचर, उंची पडदे आणि आधुनिक यंत्र आणली तरी मनासारखी सजावट होतेच असं नाही.
अनेकदा उपलब्ध जागेत बसणारं चांगलं फर्निचर मिळत नाही. शिवाय त्याच्या रोजच्या देखरेखीचं काम वाढतं, ते निराळंच. छोटी जागा आणि बजेटमधली सजावट या दोन्हींवर मात करायची असेल तर आणखी एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे पारंपरिक वस्तूंचा वापर करून बैठकीची खोली सजवण्याचा. त्यात तुमची कल्पकताही दिसेल शिवाय तुम्हाला पाहिजे तेव्हा ते बदलणं सहज शक्य होईल. इतरांपेक्षा आपल्या घराच्या सजावटीला जरा वेगळेपणा देण्यासाठी त्यात बरंच काही करता येईल.
पाहुण्यांचं स्वागत करताना बैठकीच्या खोलीचा प्रामुख्याने वापर होतो. घरातला आपलाही बराच वेळ याच खोलीत जातो, त्यामुळे त्याच्या सजावटीकडे लक्ष द्यायलाच हवं. यात आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा सुरेख संगम साधता येईल.
घर कितीही आधुनिक असलं तरी ते कुठेतरी आपल्या संस्कृतीशी जोडलं जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्याच हौसेपायी बैठकीच्या खोलीत पारंपरिक सजावट करण्यावर भर दिला जातो. या सजावटीने घराची शान तर वाढतेच पण काँक्रिटच्या जंगलातही त्याला मातीचा वास येतो. अशी बैठक तयार करताना प्रथम काही गोष्टी मनाशी पक्क्या ठरवायला हव्यात. आपल्याला लोककलेला प्राधान्य देऊन बैठक सजवायची असेल तर त्याचे सजावटीचे नमुने गोळा करायला सुरुवात करायला हवी. अगदी पडदे, गालिचे आणि बैठकीवर ठेवायच्या उश्यांच्या अभ्य्रापासून एकेका गोष्टीची आखणी करावी लागेल.
भिंतीवरील पेंटिंग, वॉल हँगिंग, फ्लॉवरपॉट, टी-पॉय किंवा दिव्याची सोय करतानाही याचा विचार सतत आपल्या मांडणीशी जुळता म्हणजेच लोककलेचा वापर करून केला गेला आहे ना याकडे लक्ष ठेवायला हवं. त्यासाठी तुम्हाला आजूबाजूला वावरताना डोळे उघडे ठेवूनच वावरावं लागेल. कोठेही अशी सजावटीची वस्तू दिसली की, त्याचा आपल्या बैठकीत उपयोग होईल का, याचा विचार करावा लागेल. अशा वस्तू खरेदी करण्यासाठी महागडी हस्तकलेची दुकानंच पालथी घालावीत, असं नाही. अगदी रस्त्याच्या कडेला बसलेल्या एखाद्या विक्रेत्याकडेही काही चांगल्या वस्तू सहज मिळून जातात. तुम्ही स्वत: चित्रकला किंवा भरतकाम अगर तत्सम कलेचे जाणकार असाल तर त्यातली काही वेगळी कलाकृती स्वत: तयार करू शकता.
अशा पद्धतीने लोककलेचा रंग बैठकीला द्यायचा झाल्यास त्याची सुरुवात घराच्या रंगापासून करायला हवी. हॉलला रंग देताना तो मातीच्या रंगाशी मिळता-जुळता द्यावा. किंवा एखादी भिंत गेरू रंगात रंगवून घ्यावी. म्हणजे त्यावर हस्तकलेचा नमुना असलेलं एखादं वॉलपेंटिंग किंवा राजस्थानी पेंटिंग लावता येईल. आजकाल बैठकीच्या खोलीला अगदी सांस्कृतिक रंग देण्यासाठी त्यातली एक भिंत वारली पेंटिंग करून घेण्याची पद्धत आहे, तेही छान दिसते. भिंतींच्या रंगावर उठून दिसतील अशी पिवळ्या किंवा बदामी रंगातील पेंटिंग आणखी छान दिसतील. दरवाज्याच्या किंवा खिडक्यांच्या चौकटीदेखील अशा पारंपरिक चित्रकलेच्या माध्यमातून फळा-फुलांची नाजूक नक्षी काढून रंगवता येतील. वारली पेंटिंगऐवजी तुम्ही पौराणिक कथांचा आधार घेऊन एखादं चित्र काढून ती िभत रंगवू शकता किंवा तिथे रामायण, महाभारतातील कथेवर आधारित एखादं वॉल पेंटिंग लावू शकता.
मुख्य बैठकीची व्यवस्था करताना या सगळ्या सजावटीला साजेशी भारतीय बैठक ठेवलीत तर उत्तमच. दोन- गाद्या घालून त्यावर भरतकाम केलेल्या चादरी आणि उश्या ठेवल्यात तर खोलीला एक वेगळाच लुक येईल. त्याच्या जोडीला बांबूचं फर्निचर ठेवायलाही हरकत नाही. जुने मुढ्ढे नवीन रंग देऊन पुन्हा बैठकीत आणा. केनच्या फर्निचरचा कलात्मक वापर करून त्यावरही कलाकुसर केलेले सोफा कव्हर्स आणि उश्या ठेवल्या तर बैठकीला एक एथनिक लुक यायला काय वेळ लागेल? भारतीय बैठक नको असेल आणि कमी बजेटमध्ये काम करायचं असेल तर आणखी एक करता येईल. घरात ब-याच गोष्टींचे लाकडी-पुठ्ठय़ाचे बॉक्स येतात. त्यात रद्दी भरून ते जड करा. त्यावर हलकीशी पातळ गादी किंवा रजई घाला आणि वरून चांगली चादर अंथरा म्हणजे सेटीसारखी व्यवस्था तयार होईल.
पडद्यांमध्येही तुम्ही अगदी एथनिक लुक देऊ शकता. त्यासाठी पडद्यांची गरज नाही. लांब पट्टय़ाच्या चटया मिळतात. (राजस्थान, हिमाचल, दिल्लीकडे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.) त्याची चांगली रंगसंगती निवडा. त्या पट्टय़ा खिडक्यांवर सोडा. उन्हाळ्याच्या दिवसात वाळ्याचे पडदे सोडून त्यावर पाणी मारलं तर वेगळ्या एसीची गरजच नाही. अशा दिवाणखान्यात लोककलेच्या सजावटीच्या वस्तूंना मात्र नीट स्थान द्यायला हवं. मधे एखादा लाकडी टी-पॉय ठेवून त्यावर नक्षीदार फ्लॉवरपॉट किंवा सुरई ठेवलीत तरी फारच छान दिसेल.
या खोलीत दिव्यांची सोयही वेगळ्या पद्धतीने करायला हवी. रात्रीच्या वेळी मंद प्रकाशात हा सगळा जामानिमा उठून दिसेल. त्यासाठी वेताच्या गोल मडक्यात दिवे सोडावेत. इथे मॅजिक लॅम्प लावायला हरकत नाही. त्यात तेल फक्त आत सोडायची सोय असते. दिवा उलटा केल्यावर ते बाहेर येत नाही. हा तेलाचा दिवा पाच-सहा तास चालतो. सावंतवाडी, गोवा या बाजूला हे खास दिवे मिळतात.
दिवाळीत पणत्या ठेवण्यासाठी मिळणा-या मोठय़ा दिव्यांचाही शो पीस म्हणून चांगला वापर करता येईल. वेत किंवा काथ्यापासून बनवलेले की-चेन होल्डर किंवा न्यूजपेपर स्टँड अशा काही गोष्टी उपयुक्ततेबरोबरच या सजावटीला आणखी शोभा देतील. आपल्या सांस्कृतिक खजिन्यात अशा गोष्टींची कमतरता नाही. तुम्ही त्याचा किती कलात्मक पद्धतीने वापर करता, त्यावर तुमच्या बैठकीच्या खोलीला लोककलेचा रंग चढेल, हे नक्की!


Read More »

वैद्यकीय क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम

 वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असेल तर बारावीनंतर अनेक पर्याय आज खुले आहेत. या पर्यायांमध्ये व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे पर्याय लवकरच तुम्हाला मिळकतीची संधी मिळवून देतात, हे नक्की!

डिप्लोमा इन अँनेस्थेशिया टेक्नोलॉजी
भूलतज्ज्ञांचे मदतनीस म्हणून काम करणारे तंत्रज्ञ व्हायचं असल्यास डिप्लोमा इन अॅनेस्थेशिया टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला कमीत कमी वेदना व्हाव्यात म्हणून भूल देण्याचं काम भूलतज्ज्ञ करतात. या भूलतज्ज्ञांना तंत्रज्ञांची गरज असते. हे तंत्रज्ञ नेमक्या कोणत्या औषधांची, किती प्रमाणात गरज आहे, त्याची उपलब्धता शस्त्रक्रियेदरम्यान आहे का, डॉक्टरांसाठी शस्त्रक्रियेपूर्वीची आवश्यक ती सर्व तयारी करून ठेवणं.. ही सर्व कामं भूलतज्ज्ञ अर्थात अॅनेस्थेशिया टेक्निशिअनला करावी लागतात. थेट ऑपरेशन थिएटरमध्ये यांचं काम असल्यामुळे ते अतिशय जबाबदारीचं असतं. या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असल्यास विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला १२ ते १३ हजार रुपये वेतन मिळतं. नंतर तुमच्या कौशल्य आणि अनुभवानुसार ते ५० हजारापर्यंत वाढत जातं.
काही प्रमुख संस्था
' एमजीएम इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्स, मुंबई
'इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स, पटणा
'महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी, गुजरात
अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटी
'अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स, कोची
'मणिपाल कॉलेज ऑफ अलाइड हेल्थ सायन्स, मणिपाल

डिप्लोमा इन रेडिओग्राफी किंवा मेडिकल इमेजिंग टेक्नोलॉजी
वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या विस्ताराबरोबरच रेडीओग्राफर्स, डायग्नोस्टिक सेंटर्स, रिसर्च लॅबोरेटरीज यांची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यासाठी रुग्णाचा एक्स-रे, सोनोग्राफी, एमआरआय, पीईटी, सीटी स्कॅनयांसारख्या तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्यांसाठी विशिष्ट प्रकारच्या यंत्रांचा वापर करून रुग्णाच्या वेगवेगळ्या भागाचे फोटो काढले जातात.
फोटो काढण्यासाठी रुग्णाने कशा प्रकारे उभं राहावं, झोपावं, श्वास कसा घ्यावा, इतर कोणती खबरदारी घ्यावी, फोटो काढण्याचं मशिन कसं हाताळावं जेणेकरून उत्तम प्रकारे फोटो येऊ शकेल, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन रोडिओग्राफी तंत्रज्ञ करतो. त्यासाठी डिप्लोमा इन रेडिओग्राफी, मेडिकल इमेजिंग टेक्नोलॉजी हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने ते दोन वष्रे असा आहे. रेडिओग्राफर्स हे रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञांना सहाय्यक म्हणून काम करतात.
रेडिओग्राफर्स हे हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक सेंटर्स, रिसर्च लॅबोरेटरीज, इन्स्टिटयूट अॅण्ड मेडिकल कंपनीज या ठिकाणी काम करू शकतात. रेडिओग्राफर्स हे इमेजिंग टेक्नोलॉजीमध्ये कुशल असतात. अशा कुशल तंत्रज्ञांची मोठमोठया डॉक्टरांनाही गरज असते. या अभ्यासक्रमात रेडिओलॉजिकल अॅनोटॉमी अॅण्ड फिजीओलॉजी, रेडिओलॉजिकल फिजिक्स, डार्करूम टेक्निक्स, रेडिओलॉजिकल पोझिशिनग, रेडिओग्राफिक स्पेशल प्रोसिजर्स आणि पेशन्ट केअर हे विषय येतात.
काही प्रमुख संस्था
मद्रास मेडिकल कॉलेज, चेन्नई
उस्मानिया जनरल हॉस्पिटल, हैदराबाद
एसएमएस मेडिकल कॉलेज, जयपूर
जादवपूर युनिव्हर्सिटी, कोलकाता
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी, जमशेदपूर
भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई


डिप्लोमा इन फार्मसी
डी-फार्म म्हणजेच डिप्लोमा इन फार्मसी. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. या अभ्यासक्रमादरम्यान औषधी उत्पादनांचं पॅकिंग कसं करायचं, ते कशा पद्धतीनं वाचायचं, ट्रान्सलेट, कॉपी प्रिस्क्रिप्शन्स आणि औषधांची साठवण कशी करायची याबाबतचं प्रशिक्षण दिलं जातं. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी फार्मास्युटिकल प्रशिक्षणासाठी जातात आणि आपल्या राज्यामधील फार्मसी कौन्सिलमध्ये स्वत:च्या नावाची नोंद करू शकतात. केवळ नोंद केलेल्या व्यक्तीच औषधांच्या दुकानात काम करण्यासाठी, हॉस्पिटल फार्मसीसाठी, फार्मास्युटिकल लॅबोरेटरीज आणि स्वत:चे औषधाचे दुकान सुरू करण्यासाठी पात्र ठरतात.
प्रत्येक औषध दुकानांमध्ये फार्मासिस्टची गरज असते. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे योग्य प्रकारे वाचून, रुग्णाला नेमका काय त्रास होतो, त्यानुसार औषध आहे ना हे तपासून योग्य औषध देण्याची जबाबदारी फार्मासिस्टवर असते.
या अभ्यासक्रमांतर्गत फार्मास्युटिकल केमिस्ट्री, क्लिनिकल पॅथोलॉजी, ह्युमन अॅनोटॉमी यांसारखे विषय असतात.
काही प्रमुख संस्था
जामीया हमदर्द, नवी दिल्ली
दिल्ली युनिव्हर्सिटी ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अॅण्ड रिसर्च, नवी दिल्ली
अमृता विश्व विद्यापीठम युनिव्हर्सिटी, तामिळनाडू

Read More »

अखेर न्याय मिळाला!

एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अपघातात दगावते तेव्हा त्या कुटुंबावर मोठा आघात होतो. मात्र, अशा पीडित कुटुंबाला जेव्हा नुकसानभरपाई देखील मिळत नाही तेव्हा तो दुसरा आघात ठरतो. न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यावर त्यासाठीही बराच काळ जावा लागतो. अशा पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने नेहमीच पुढाकार घेतला आहे आणि मिळालेल्या न्यायामुळे त्यांचे दु:ख काही प्रमाणात हलके करण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्राहक संरक्षण कायद्यान्वये करण्यात येणा-या तक्रारींची दखल लवकर घेण्यात यावी. तारखांवर तारखा पडता कामा नयेत. निकाल वेळेवर लागावेत, त्यांची अंमलबजावणी त्वरेने व्हावी, अशासारख्या अपेक्षा स्वाभाविक आहेत. कारण ग्राहक न्यायालये ही दिवाणी न्यायालयांप्रमाणे चालावीत, अशी अपेक्षा नाही. परंतु असे घडताना दिसत नाही. मुख्यत: त्या कायद्याच्या हेतूमध्ये जे दडलेले आहे, त्या ग्राहक हिताला अंमलबजावणीच्या दरम्यान जणू हरताळ फासला जातो आहे. तरीही न्याय यंत्रणेवरचा ग्राहकांचा विश्वास कायम राहावा, असे निकाल येतात. त्यामुळे हायसे वाटते.
जोगेश्वरी येथे राहणारे जयराम आणि प्रभावती घोले. यांची मुलगी कमल ही दहिसरच्या एका कार्यालयात काम करत होती. ती लाखो चाकरमान्यांप्रमाणे रेल्वेने जोगेश्वरी-दहिसर व परत असा प्रवास करत असे. २४ सप्टेंबर १९९२ हा दिवस तिच्यासाठी जणू 'काळ'दिवस ठरला. ब-याच जणांना आठवत असेल, की (पूर्वी कधीतरी) जोगेश्वरी रेल्वे स्टेशनवरचा पादचारी पूल अचानक कोसळून अपघात झाला होता. तोच हा अपघाताचा दिवस. या अपघातात कमल जखमी झाली, पाठ आणि कंबर यांना जबर मार लागल्यामुळे तिला वेदना सहन कराव्या लागल्या.
इतक्या उंचावरून पडल्यामुळे तिच्या मणक्याला जो मार लागला त्यामुळे तिचा कमरेखालचा भाग लुळा पडला. एक उमलते आयुष्य अपंग झाले. या परिस्थितीतही सुमारे दोन वर्षे तिचे वडील तिला के.ई.एम. रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन जात होते. मात्र, कमल बरी होईल या आशेने सर्व प्रयत्न करणा-या तिच्या वडिलांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्या अपघातामुळे शरीराला केवळ जोरदार मारच बसला नव्हता तर शरीरातील अंतर्गत अवयवही निकामी झाले होते. त्यामुळे १९९४ मध्ये कमल जग सोडून निघून गेली- कायमची.
कमलच्या वडिलांनी अपघातानंतर रेल्वेकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केला होता, पण रेल्वे खात्याने त्यांचा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे ते मार्गदर्शनासाठी मुंबई ग्राहक पंचायतीकडे आले. त्यावेळी एक विशेष बाब म्हणून सदर केस हाती घेण्याचे संस्थेने ठरविले. जिल्हा मंचासमोर ही तक्रार आली असता रेल्वेने अनेक तांत्रिक बाबी उपस्थित केल्या. ही व्यक्ती कोणत्याही प्रकारे नुकसानभरपाईस पात्र नाही, असा आग्रह धरला. मात्र जिल्हा मंचाने रेल्वेचे मुद्दे अमान्य केले. जयराम घोले यांना नुकसानभरपाई म्हणून ४ लाख १५ हजार रुपये रेल्वे बोर्डाने द्यावेत, असा निर्णय जिल्हा मंचाने दिला. तो रेल्वेला मान्य झाला नाही.
रेल्वेने महाराष्ट्र राज्य आयोगाकडे अपील केले. १९९९ साली झालेल्या जिल्हा मंचाच्या निर्णयावरच्या त्या अपिलाचा निर्णय कधी लागला- १८ एप्रिल २०१३ रोजी अंतिम सुनावणी झाली, तेव्हा. म्हणजे जिल्हा मंच ते राज्य आयोग १४ वर्षाचा काळ गेला. तारखांवर तारखा पडत गेल्या; पण मुंबई ग्राहक पंचायतीच्या सक्रिय पाठबळामुळे घोले कुटुंबीयांचे मनोधैर्य टिकून राहण्यास मदत झाली. राज्य आयोगामध्ये तक्रारदारातर्फे अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी स्वत: युक्तिवाद केला.
रेल्वेने मांडलेले मुद्दे येथे लक्षात घेतले पाहिजेत.
कमल घोले रेल्वेची प्रवासी- म्हणजेच ग्राहक होती व अपघात घडला त्या दिवशी रेल्वेने येऊन ती पादचारी पुलावर आल्याचे सिद्ध करणारा पुरावा उपलब्ध केलेला नाही, असे रेल्वेचे म्हणणे होते. दुसरा मुद्दा असा की, कमलचा मृत्यू होण्यास हा अपघात जबाबदार ठरत आहे, असेही दिसत नाही (कारण तिचा मृत्यू १९९४ मध्ये झाला.) म्हणजे एखाद्या अपघातानंतर त्याच्या परिणामांमुळे काही काळाने अपघातग्रस्ताचा मृत्यू झाला तर त्याला अपघात जबाबदार नसतो, असे बहुधा रेल्वेला वाटत असावे.
या मुद्दय़ांवर प्रतिवाद करताना घोले यांनी कमलच्या दहिसरच्या कार्यालयातून आणलेले पत्र महत्त्वाचे ठरले. या पत्रातून कमलच्या दैनंदिनीचा भक्कम पुरावा सादर करता आला.
कमल कार्यालयात रेल्वेनेच ये-जा करत असे, तसेच अपघाताच्या दिवशी ती कामावर किती वाजता आली होती. किती वाजता कामावरून निघाली होती याबाबतचा सर्व तपशील तिच्या कार्यालयातून देण्यात आला. त्यामुळे अपघाताच्या वेळी ती रेल्वे पुलावर होती आणि ती रेल्वेची ग्राहक ठरत आहे, असे म्हणणे शक्य झाले. तिचे तिकीट किंवा पास सादर करण्यात अडचण अशी होती, की अपघातानंतर जो गोंधळ माजतो, त्यात स्वाभाविकच अपघातग्रस्ताकडे असलेले सामान जसे पर्स, पिशवी इत्यादींपेक्षा अपघातग्रस्ताच्या जखमांकडे आणि त्याच्या वेदनांकडेच सर्वाचे लक्ष असते.
त्यामुळे हे सर्व सामान अपघातस्थळावर मिळेलच, असे सांगता येत नाही. कमलच्या प्रकरणातही हा मुद्दा समर्थपणे मांडण्यात आला. तिच्या मृत्यूला रेल्वे पूल कोसळून झालेला अपघातच कारणीभूत ठरला, असेही मानण्यास वाव होता, हे नमूद करण्यात आले. तिने व तिच्या कुटुंबीयांनी तिचे अपंगत्व आणि त्यानंतर तिच्या मृत्यूचा आघात सहन केला. या सर्वासाठी मुळात रेल्वे पादचारी पूल कोसळणे, ही घटना कारणीभूत ठरली.
राज्य आयोगाने रेल्वेकडून नोंदवण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले आणि जिल्हा मंचाने १९९९मध्ये दिलेला निर्णय कायम केला. त्या निर्णयाच्या तारखेपासून १८ एप्रिल २०१३ पर्यंत ४ लाख १५ हजाराच्या नुकसानभरपाई रकमेवर व्याजही देय होत आहे, असे राज्य आयोगाने म्हटले. त्यामुळे या विलंबानंतर घोले कुटुंबीयांना जवळजवळ १५ लाख रुपये मिळणार आहेत. यांसारख्या प्रकरणांमध्ये तक्रारदाराला मार्गदर्शन करण्यास मुंबई ग्राहक पंचायतीचे स्वयंसेवी कार्यकर्ते तत्पर असतानाच, या प्रकरणात ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी स्वत: युक्तिवाद केला. त्यामुळे संस्थेला खर्चापोटी एकूण १० हजार रुपये देण्याचा आदेशही राज्य आयोगाने दिला आहे.


Read More »

'एलबीटी'चे कारण आणि राजकारण

'एलबीटी'च्या प्रश्नावर व्यापा-यांनी सुरू केलेला बंद अखेर मागे घेण्यात आला. अर्थात हा प्रश्न पूर्णपणे संपलेला नाही. त्याच्यावर चर्चा आणि समित्यांचे गु-हाळ सुरूच आहे. मोठया प्रमाणात ताणलेल्या या बंदमध्ये सर्वसामन्यांचे खूप हाल झाले. या बंदमुळे व्यापा-यांच्या भूमिकेबाबत अनेकदा सामान्य माणसांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत राहिल्या. या लांबलेल्या बंदमुळे व्यापा-यांना काय साध्य व्हायचे ते होईल, मात्र राजकीय पक्षांनी या तापलेल्या तव्यावर आपल्या राजकीय पोळया भाजण्याचा चांगलाच प्रयत्न केला. त्यात काही जणांना चटकेही बसले, तर काही जणांची भूमिका कायम तळय़ात-मळय़ातराहिली. सामान्य माणसांचा बंदमुळे जीव मेटाकुटीला आला असताना त्यावर रंगलेले राजकारण मात्र अस्वस्थ करणारे होते.

महानगरपालिका आणि नगरपालिकांना आर्थिक स्थैर्य देणारा जकात कर जाचक वाटू लागल्याने तो रद्द करावा, अशी मागणी व्यापा-यांकडून अनेक वर्षापासून होत होती. एकेकाळी स्थानिक स्वराज्य संस्थांचा आधार असणारा हा कर पुढे किचकट होऊ लागल्याने अनेक राज्यांनी तो रद्द करून त्या ठिकाणी अन्य कर लागू केले. सध्या जगात इथोपिया आणि मुंबई या दोनच शहरात जकात सुरू आहे. जकात वसूल करताना प्रत्येक शहराच्या प्रवेशद्वारांवरील वाहतूक कोंडी, जकात माफियांचे कारनामे यामुळे हा कर रद्द करावा, अशी मागणी गेल्या काही वर्षापासून व्यापा-यांकडून होत होती.
त्यातूनच १९९९ साली नगरपालिका क्षेत्रातून जकात कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने लहान-लहान महानगरपालिकांतून जकात हद्द पार करण्यात आली. पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूर या महापालिकांतील जकात कर रद्द करून तेथे स्थानिक संस्था कर अर्थात 'एलबीटी' लागू करण्यात आला. मुंबई महापालिकेतही 'एलबीटी' लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्या आधी याबाबत विधिमंडळात चर्चा करून हा कर लागू करताना त्यात कशा प्रकारे सुलभता आणता येईल, याची संपूर्ण तयारी सरकारने ठेवली होती.
मात्र विधिमंडळात चर्चा होण्यापूर्वी व्यापा-यांनी 'एलबीटी'विरोधात आंदोलन सुरू केले. बाजारपेठा बंद करून सर्वसामान्यांना वेठीला धरले. आपल्या आंदोलनाला राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना व्यापा-यांना पाठिंबा द्यायचा की, सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहायचे, हा प्रश्न होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या बाजूने उभे राहण्याची ठाम भूमिका घेतली. त्यांनी व्यापा-यांना ठामपणे ठणकावले. 'तुमच्या मागण्या मान्य करून घेण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.
मात्र त्यासाठी सामान्यांना वेठीस धरू नका.' पण व्यापा-यांनी आपला बंद मागे घेतला नाही. सामान्य माणसांना त्रास होऊ लागला तेव्हा कोणत्याही समस्येचे रूपांतर संधी करण्यात पटाईत असणाऱ्या राज ठाकरे यांनी थेट व्यापा-यांना आवाज दिला, 'उद्यापासून दुकाने उघडली नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना दुकाने उघडेल.' व्यापा-यांनी केलेल्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य माणसांच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होणे स्वाभाविक होते.
शिवसेना मात्र या मुद्यावर कायम तळय़ात-मळय़ात भूमिकेत राहिली. 'एलबीटी'ला थेट विरोध करीत असताना सामान्य माणसांना त्रास होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र हे करीत असताना त्यांनी व्यापा-यांना ज्या तऱ्हेने ठणकावायला हवे होते, तसे ठणकावले नाही. उलट 'एलबीटी'ला त्यांनी कडाडून विरोध कायम ठेवत एक प्रकारे व्यापा-यांच्या भूमिकेचीच पाठराखण केली.
व्यापा-यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य हवालदिल झालेले असताना भारतीय जनता पक्षाने मात्र थेट व्यापा-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर व्यापा-यांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेत जेल भरो आंदोलन केले. भाजपचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह अनेकांनी स्वत:ला अटक करवून घेत व्यापा-यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि भाजप हा सर्व सामान्यांचा नव्हे तर व्यापा-यांचाच पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. याच दरम्यान भाजपच्या प्रवक्त्याला पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला तेव्हा त्यांना उत्तरे देणे कठीण होऊन गेले. 'तुमचा पक्ष व्यापा-यांची पाठराखण करणारा आहे की, सर्व सामान्यांची पाठराखण करणारा आहे?' या प्रश्नावर भाजपला आपली भूमिका स्पष्ट करता आली नाही.
व्यापारी, विरोधी पक्ष यांच्याकडून तर 'एलबीटी' रद्द करावा म्हणून दबाव वाढत होताच परंतु सत्तेमध्ये वाटेकरी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात राष्ट्रवादीकडून समन्वय समितीत चर्चा करण्याची मागणीही करण्यात आली. मित्र पक्षांकडून सहकार्य मिळत नसतानाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम होते. जकात रद्द करून 'एलबीटी' लागू करणे कसे आवश्यक आहे, हे ते वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते.
'एलबीटी' मागे घेऊन त्या बदल्यात व्हॅटमध्ये एक टक्का वाढ करावी व तो निधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांसाठी द्यावा, असाही एक प्रस्ताव पुढे आला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी तो प्रस्तावसुद्धा कसा अव्यवहार्य आहे, हे सप्रमाण पटवून दिले. एक टक्का जास्त व्हॅट लावण्याचा निर्णय घेतला, तर शहरी भागाच्या विकासाचा बोजा विनाकारण ग्रामीण भागातील जनतेवर पडेल. हा सर्व निधी सरकारकडे जमा होणार असल्याने तो मिळवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारकडे वारंवार मागणी करावी लागेल.
स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता देण्यात ते अडचणीचे ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा स्पष्ट केले. स्थानिक संस्था करामध्ये काही अडचणी असतील तर चर्चा करून त्यात सुलभता आणण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. इतकेच नव्हे तर व्यापा-यांना आपल्या अडचणी मांडता याव्यात यासाठी राज्याचे मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन केली होती. तरीही व्यापारी आपल्या हट्टापासून मागे यायला तयार होत नव्हते.
अखेर या प्रश्नामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी व्यापा-यांसह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. संपात आघाडीवर असलेल्या व्यापारी संघटनांचे अध्यक्ष मोहन गुरनानी, वीरेंद्र शाह आदी पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी भेटणार होते. मात्र त्या आधीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, मुंबई उपनगरचे पालकमंत्री नसीम खान, खासदार गुरुदास कामत आदी मुंबईतील काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी अन्य व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसह बैठक घेतली. त्यात मुख्यमंत्र्यांनी व्यापा-यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच 'एलबीटी' लागू करण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि पवार यांच्या भेटी आधीच व्यापा-यांचा संप मिटला. यातही श्रेयाचे राजकारण रंगल्याची चर्चा सुरू राहिली.
निवडणुका तोंडावर असतात तेव्हा राजकीय पक्ष कोणत्याही प्रश्नांचे राजकारण करताना दिसतात. मात्र असे पक्षीय राजकारण करीत असताना सर्वसामान्य माणसालात्याची झळ बसणार नाही, याची काळजी सर्वच पक्षांनी घेण्याची गरज आहे. अशा प्रश्नांमागील कारण आणि राजकारण न कळण्याइतकी आता जनता दुधखुळी राहिलेली नाही.


Read More »

व्यवहारचातुर्य अर्थशास्त्राचे..

अर्थशास्त्राचा अभ्यास ज्ञानाची कक्षा वाढवणारा आहे. या अभ्यासाने अनेक बाबी ज्ञात होतात. खरं तर अर्थसाक्षरता ही अर्थशास्त्राच्या अभ्यासानं येऊ शकते. मनुष्य अर्थसाक्षर झाल्यावर तो 'व्यवहारचतुर' बनू शकतो आणि स्पर्धा परीक्षांमध्ये 'व्यवहारचातुर्य' महत्त्वाचं असतं. मात्र अर्थशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन कुणी 'बेरोजगार' असेल तर त्याचा अर्थशास्त्राचा अभ्यास कुचकामीच ठरला, असंच म्हणावं लागेल. एमपीएससी किंवा यूपीएससी स्पर्धा परीक्षेतील यशासाठी 'ब्रिलियन्सी'बरोबरच काकणभर अधिक व्यवहारचातुर्य म्हणजेच 'बिलंदरपणा'ही असावा लागतो आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासाने तो येतोच येतो.

स्पर्धा परीक्षांपैकी एमपीएससीचे, राज्यसेवा परीक्षांचे स्वरूप पूर्णपणे बदलल्याचा धक्कादायक पण भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगला अनुभव परीक्षार्थीनी १८ मे, २०१३च्या पूर्वपरीक्षेत घेतला आहेच. या अत्यंत चांगल्या बदलामुळे 'गुणवत्तेशी तडजोड आता होणार नाही. स्पर्धापरीक्षा विश्वात सध्या प्रचलित असणारी चालू घडामोडीसारखी पुस्तकं आता मोडीत निघतील. आयोगाने प्रत्येक विषयालाच अत्यंत सकारात्मक पद्धतीनं सामोरं जात प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केला आहे. या पूर्वपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहोत.
अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्मलक्षी (micro) आणि समग्रलक्षी (micro) असे दोन भाग केले जातात. या शब्दांचा प्रथमत: वापर रॅगनर फ्रीश यांनी केला. यामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र व्यक्तिगत स्वरूपाचं तर समग्रलक्षी अर्थशास्त्र समुच्चय किंवा एकंदर स्वरूपाचं मानलं जातं. मुळात कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचं संपूर्ण ज्ञान, आकलन होण्यासाठी यांचा अर्थ, अभ्यासविषय व व्याप्ती समजून घ्यावी लागते. आयोगाने अभ्यासक्रमात नमूद केलेला आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्रय़ सर्वसमावेशकता इ. घटक सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा भाग आहेत.
भारतीय अर्थव्यवस्था संमिश्र स्वरूपाची आहे. सार्वजनिक व खासगी हाती उत्पादनाची साधने आहेत. स्वातंत्र्यावेळीच अशा स्वरूपाची अर्थव्यवस्था स्वीकारली, त्यावेळी हा प्रकार काहीसा नवीनच होता. कारण जगाची विभागणीच मुळी भांडवलशाहीप्रधान व साम्यवादी अशी झाली होती. इतर देशांनी एकतर भांडवली अर्थव्यवस्था स्वीकारली किंवा समाजवादी. परिणामी, संमिश्र स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेच्या यशाबाबत जागतिक तज्ज्ञांना शंका होत्या. मात्र पुढील ६० वर्षापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था कोसळण्याचा धोका निर्माण झाला नाही. परंतु भांडवली अर्थव्यवस्था मंदीच्या विळख्यात सापडल्या. साम्यवादी अर्थव्यवस्था अडचणीत आल्या, साम्यवादी चीनने स्वत:मध्ये आमूलाग्र बदल करवून घेतला.
भारताच्या या स्वरूपाच्या पण यशस्वी अर्थव्यवस्थेमुळेच भारतीय अर्थतज्ज्ञांना जगाच्या बाजारपेठेत अलीकडील काळात महत्त्व प्राप्त झालं आहे.
अभ्यास करताना भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्टयांचा विश्लेषणात्मक अभ्यास करायला हवा. या वैशिष्टयांमध्ये..
'कृषिप्रधान अर्थव्यवस्था
'मिश्रस्वरूपाची अर्थव्यवस्था
'राष्ट्रीय उत्पन्न
'दारिद्रय़
'बेरोजगारी
'लोकसंख्या
'औद्योगिकीकरण
'भांडवल
'दळणवळण
या आयामांच्या आधारे आकलन व्हावं. या व्यतिरिक्त भारतीय अर्थव्यवस्थेसमोर जागतिकीकरणाच्या माध्यमातून कोणती आव्हानं उभी आहेत, याचाही विचार करावा व तसं वाचन वाढवावं.
जगातील प्रत्येक अर्थव्यवस्था उत्पादक स्वरूपाची असून आर्थिक क्षमतेत वाढ करून आर्थिक वृद्धी किंवा वाढ साधण्यासाठी प्रयत्नशील असते. मित्रहो, इथे आर्थिक वृद्धी हा शब्द आला. आता आर्थिक वृद्धी या शब्दाचा नेमका अर्थ माहीत हवा. म्हणजे या शब्दाची संकल्पना माहीत असावी. मुळात आर्थिक वृद्धी ही व्यापक संकल्पना आहे. देशाच्या वास्तव उत्पादनात होणारी वाढ म्हणजेच, आर्थिक वृद्धी. हे समजलं असेल तर त्याविषयीच्या इतर बाबी सहज समजतात. मग जगात कोणत्या देशामध्ये आर्थिक वृद्धीची प्रवृत्ती दिसून येते, हा प्रश्न पर्याय दिल्यावरही अवघड वाटत नाही किंवा पर्याय न देता उत्तर देता येतं.
अर्थव्यवस्थेच्या वैशिष्टय़ांमध्ये नसर्गिक साधनसंपत्ती आणि राजकीय सार्वभौमत्त्व (Political Sovereignty) हे दोन कळीचे मुद्दे आहेत. सार्वभौमत्वाचा प्रत्यक्ष संबंध अर्थव्यवस्थेशी असतोच. १९४७ नंतर भारतीय अर्थव्यवस्थेने प्रगती साधली याचं साधं-सोपं उदाहरण 'सार्वभौमत्व' हेही आहे. परकीय राजवट गुलाम जनतेच्या हिताची चिंता करत नाही म्हणून तर आफ्रिका, आशिया मागास राहिला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, लोकहिताचे निर्णय राजकीय सार्वभौम अर्थव्यवस्थेत घेता येतात.
आपल्या अर्थव्यवस्थेसमोरील मूलभूत समस्या समजून घ्याव्यात. यामध्ये उत्पादन, त्याचे वितरण व उपभोग या अनुषंगाने समस्या असतात व प्रत्येक अर्थव्यवस्था त्यावरील उपाययोजना आखत असते. भारतासमोर मग अशा समस्या व त्यावरील उपाय याचा थोडा खोलात जाऊन अभ्यास करावा. उदा. भारताने कोणत्या वस्तू उत्पादित केल्यावर ते परवडू शकतं. अमर्यादित गरजा व मर्यादित उत्पादन साधनं असताना उत्पादनाचा प्रश्न कठीण होतो, पण त्यामध्येच प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. भारताने कोणता प्राधान्यक्रम ठेवला आहे. सर्वसामान्यांच्या गरजा भागवणा-या उपभोग्य वस्तू निर्माण करणं, हे प्राधान्य राहिलं आहे.
या बाबीचा विचार करता..
'अर्थव्यवस्थेतील देशांतर्गत गरजा
'साधनसामग्री मर्यादा
'बाजारपेठेचा आकार
हे मुद्दे लक्षात घ्यावेत.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ग्राहकांच्या गरजांनुसार नफ्यासाठी उत्पादन घेतलं जातं तर समाजवादी व्यवस्थेत उत्पादक व्यवहारावर सामाजिक नियंत्रण असतं. १९९१ नंतर भारतात खासगी क्षेत्र उत्पादन व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत तर सार्वजनिक क्षेत्र सर्व उत्पादन व्यवहाराचे नियमन करत आहे.
मग, मुलभूत आर्थिक समस्या समजल्यावर त्यावरील उपाययोजना शासनाने योजल्या आहेत, हे समजून घ्यावं लागतं.
मित्रांनो, अर्थशास्त्र हा विषय किचकट कधी वाटेल, जर त्यातील शब्दांचे अर्थ इंग्रजीत व मराठीत संकल्पनात्मक पातळीवर समजतील. हे अर्थ समजत नसल्यास अर्थशास्त्र विषय सोपा वाटणार नाही. म्हणून अर्थशास्त्रीय शब्दांचा नेमका अर्थ समजून घ्यावा. या इतक्या छोटया लेखामध्ये सर्व बाबी नमूद करणं शक्य होणार नाही पण दिशादिग्दर्शन तरी होईल.
थोडक्यात, समस्यांबाबत असं म्हणता येईल की, उत्पादन करताना तर श्रमप्रधान किंवा भांडवलप्रधान तंत्राचा अवलंब करावा. मग भारतासाठी दोन्ही पण योग्य आहेत. लोकसंख्येला रोजगार हवा असेल तर श्रमप्रधान तंत्राला प्राधान्य दिलं जातं, पण अलीकडील म्हणजे २१व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भांडवलप्रधान तंत्राचा अवलंब जास्त दिसतो. म्हणून समाजवादी विचारवंत भारताच्या आर्थिक धोरणावर कडाडून टीका करतात.
उत्पादन कोणासाठी करावं, हे देशाच्या ध्येय-धोरणांवर अवलंबून आहे. आर्थिक प्रश्न साधनांच्या दुर्मीळतेमुळे निर्माण होतात. म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रश्न समजणं महत्त्वाचं ठरतं. अर्थशास्त्राच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात व्यवहारातील बहुतांश सर्व आर्थिक घडामोडींबाबत प्रश्न असतात. यात भाववाढ हा मुख्य घटक आलाच. 'भाववाढ' म्हणजे पैशाचे मूल्य कमी होऊन किंमत पातळी वाढते, समजून घ्यावं. मगच लक्षात घेता येतं की, भाववाढ ही वेगाने वाढणा-या किमतीशी संबंधित असते. भाववाढीने किमतीत वाढ होते, त्यामुळे खरेदी शक्तीत घट होते.
त्यानंतर लक्षात येतात ती, भाववाढीची कारणे..
१. वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ (demand)
२. वस्तू व सेवांच्या पुरवठय़ात घट (suppl)
मग मागणीच्या बाजूने सार्वजनिक, खासगी खर्चात वाढ, निर्यात वाढ करकपात, लोकसंख्या वाढ, तुटीचा अर्थभरणा व कर्जाची उपलब्धता ही कारणे सांगता येतात. हे घटक वस्तू व सेवांची मागणी वाढवतात. मग भाववाढ होते तर पुरवठय़ाच्या बाजूने,
'उत्पादक घटकाची टंचाई
'औद्योगिक कलह
'नसर्गिक आपत्ती
'एकतर्फी उत्पादन
'वस्तूची साठेबाजी
अशी कारणं सांगता येतात.
एवढा अभ्यास झाल्यावर भाववाढीचे उत्पादनावरील परिणाम, वितरणावरील परिणाम आणि आर्थिकेतर परिणाम असा इत्थंभूत अभ्यास व्हावा.
- क्रमश:


Read More »

समृद्धीच्या मुळावर निताकत

पश्चिम आशियातील सौदी अरेबिया हा देश अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेला मोठा श्रीमंत देश आहे. भारतातल्या विशेषत: केरळमधल्या हजारो कष्टक-यांसाठी सौदी अरेबिया ही स्वप्नभूमी आणि समृद्ध देणारी भूमी ठरलेली आहे.

पश्चिम आशियातील सौदी अरेबिया हा देश अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेला मोठा श्रीमंत देश आहे. भारतातल्या विशेषत: केरळमधल्या हजारो कष्टक-यांसाठी सौदी अरेबिया ही स्वप्नभूमी आणि समृद्ध देणारी भूमी ठरलेली आहे. कारण या राज्यातील ५ लाख ७० हजार लोक सौदी अरेबियामध्ये कामासाठी जात असतात. तिथे समृद्धी असल्यामुळे या लोकांना तिथे कामाचा अधिक मोबदला मिळतो. त्यातील बराच पैसा भारतात पाठवला जातो. दरवर्षी या लोकांकडून भारतामध्ये ५ लाख कोटी रुपये पाठवले जातात आणि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारते.
केरळमध्ये मुक्त अर्थव्यवस्थेशी संबंधित धोरणाची फार कसोशीने अंमलबजावणी झालेली नसतानासुद्धा तिथे शेतीमध्ये फार मोठी गुंतवणूक झालेली आहे. सौदी अरेबियाला अमेरिकेच्या मंदीचे फटके बसायला लागले आहेत आणि त्याचा परिणाम भारतातील या मजुरांवर झाला आहे. खरे म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था आता सावरली आहे. परंतु गेल्या तीन वर्षात मंदीमुळे सौदी अरेबियामध्ये खूप बेकारी वाढलेली आहे. तिच्यामुळे बराच आरडाओरडा झाला आणि सरकारला त्याची दखल घ्यावी लागली.
या देशातील तीन लाख लोक सध्या बेकार आहेत. सौदीत ३ लाख ४० हजार व्यापारी कंपन्या आहेत. या सर्व लोकांनी भारतीयांना नोक-या दिलेल्या आहेत. देशातले मजूर बेकार असताना परदेशातील लोकांना अशा नोक-या देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न तिथे उपस्थित झाला आहे. म्हणून त्या सरकारने आता 'निताकत' धोरण या नावाने नवे कामगार धोरण जाहीर केले आहे. हे धोरण गेल्या मार्चमध्ये जाहीर करण्यात आले. हे धोरण भारतीयांच्या समृद्धीच्या मुळावर उठले आहे. देशातल्या प्रत्येक संस्थेने किमान एक तरी सौदी मजूर कामावर ठेवावा, असे या धोरणात म्हटले आहे.
देशात ३ लाख ४० हजार संस्था आहेत आणि बेकारांची संख्या ३ लाख आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकाला नोकरी दिली तरी बेकारीचा प्रश्न सुटू शकतो. सौदी सरकारने या धोरणाची सक्ती करायला सुरुवात केली असून आजवर सुमारे २ लाख ७० हजार भारतीय मजूर बेकार झाले आहेत. त्यांना मायदेशी पाठवले जात आहे. परंतु अशी पाठवणी करताना तिथल्या भारतीय दुतावासाकडून त्यांना त्यासंबंधात एक प्रमाणपत्र दिले जाण्याची गरज आहे. दोन लाखांपेक्षा अधिक लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अशी प्रमाणपत्रे द्यायची असतील तर साधारणत: रोज १० हजार लोकांचे अर्ज निकाली काढले जाण्याची गरज आहे.
परंतु भारतीय दुतावासामधील कर्मचा-यांसाठी हे काम आवाक्याबाहेरचे ठरले आहे. हे मजूर प्रमाणपत्राची वाट पाहत तिथे थांबले आहेत. सौदी सरकारने हे धोरण जाहीर करताना भारतीयांना मायदेशी जाण्यासाठी ३ जुलैची मुदत घालून दिली आहे. ३ जुलैनंतर या कामगारांचे वास्तव तेथे अवैध ठरून त्यांना अटक होऊ शकते. भूमिपुत्रांना रोजगार देणे, हे सौदीचे कर्तव्य आहे. मात्र, त्यांनी भारतीय कामगारांच्या बेरोजगारीचा तसेच त्यांना तातडीने आपत्कालीन प्रमाणपत्र मिळाले नाही तर त्यांचे वास्तव अवैध ठरवून त्यांना अटक करण्याचे घाई करू नये. त्यांनी तेथे गाळलेल्या घामाचा आणि दिलेल्या वेळेचा जरूर विचार करावा. सहानुभूती आणि सबुरीने हा प्रश्न हाताळावा.

Read More »

शिक्षक पुन्हा शाळेबाहेर

खासगी आणि सरकारी शिक्षकांना शालाबाह्य कामे न देण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला होता. त्याला तीन आठवडेही उलटले नाहीत तोच या विभागाने हा निर्णय बदलला असून अशी कामे शिक्षकांना द्यावीत, असा आदेश काढला आहे.


संग्रहित छायाचित्र

खासगी आणि सरकारी शिक्षकांना शालाबाह्य कामे न देण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला होता. त्याला तीन आठवडेही उलटले नाहीत तोच या विभागाने हा निर्णय बदलला असून अशी कामे शिक्षकांना द्यावीत, असा आदेश काढला आहे. केवळ तीनच आठवडयांमध्ये शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम करणारा हा निर्णय सरकराने घेतला आहे.
महाराष्ट्रामध्ये १ कोटी ८० लाख विद्यार्थी खासगी आणि सरकारी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु शिक्षण व्यवस्था चांगली राबवण्याच्या दृष्टीने जेवढे शिक्षक हवे आहेत तेवढे राज्यात उपलब्ध नाहीत. याबाबत मोठी विषम परिस्थिती आहे. काही ठिकाणी शिक्षक आहेत तर विद्यार्थी कमी आहेत आणि काही ठिकाणी विद्यार्थी भरपूर आहेत. पण शिक्षक कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत एका शिक्षकामागे किती विद्यार्थी असावेत, याचा नियम तर पाळला जातच नाही. उलट वरचेवर शिक्षण व्यवस्थेत आणि अभ्यासक्रमात बदल होत आहेत. त्यामुळे हे बदल आत्मसात करून आपले शिकवणे कसे सुधारावे, या विवंचनेत शिक्षक मंडळी असतात.
अशा वेळी त्यांना सरकारी कामे नेमून दिली तर त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते आणि परिणामी शिक्षणाचे कसे दशावतार होतात, याची अनेक उदाहरणे वृत्तपत्रांत नेहमीच प्रसिद्ध होत असतात. त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना निवडणूक वगळता कोणतेही काम लावले जाऊ नये, असा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आता हा निर्णय फिरवून जनगणना आणि नसíगक आपत्ती निवारणाची कामे शिक्षकांवर सोपवावीत, असे शिक्षण विभागाने ठरवले आहे. त्या व्यतिरिक्त मतदार याद्यांचे पुनर्परीक्षण आणि छायाचित्रांसह मतदार ओळखपत्र तयार करणे, ही कामेसुद्धा शिक्षकांवर टाकण्यात आली आहेत.
नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी शिक्षकांना कामाला लावण्याचा निर्णय हा अनाकलनीयच म्हणावा लागेल. पण राज्याचे शिक्षण खाते असे काही अगम्य निर्णय घेत असते की, त्याचे सर्वाना कोडे पडावे. राज्यातील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांनी आपल्या शिकवण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्व गोष्टी आपण दुय्यम समजतो. म्हणूनच चार दिवस शाळा बुडली तरी चालेल, ती शिक्षकाविना चालली तरी चालेल, असे आपण मानून चाललो आहोत.
आपल्या देशातील नव्या पिढीला आता कोठे शिक्षणाचे महत्त्व पटायला लागले आहे आणि ग्रामीण भागासह सर्वत्र विद्यार्थ्यांची पटनोंदणी वाढायला लागली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षणाच्या कक्षेत येत आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी वाढली पाहिजे आणि त्यासाठी शिक्षणाला वाहून घेतलेले शिक्षक हवे आहेत. मात्र शिक्षकालाच शाळेबाहेर काढून त्यांना इतर कामांना जुंपणार असू तर शिक्षणाचा दर्जा व विद्यार्थी गळतीचा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही.


Read More »

हव्यास नडला!



आयपीएलमधील एक संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघ व्यवस्थापनातील (मॅनेजमेंट) एक प्रमुख अधिकारी आणि संघमालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन सध्या मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याच्या चौकशीत अनेक नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. मय्यपन हा 'त्यातला' वाटत नसला तरी कायम बुकींच्या संपर्कात असलेला आणि बेटिंग खेळण्यात अत्यंत सराईत असल्याचे उघड झाले आहे. सास-याच्या मालकीच्या संघाची संपूर्ण जबाबदारी हाती आल्यानंतर मय्यपनच्या हाती घबाडच लागले. आधीच अमाप पैसा होता. त्यात आणखी भर पडली. अपेक्षेपेक्षा जास्त पैसा हाती लागल्यानंतर आणि त्या पैशाची 'वाट' लावण्याचा आणखी एक मार्ग सापडल्यानंतर मय्यपन पुरता सुटला. स्पॉटफिक्सिंग प्रकरणात नाव येईपर्यंत एका आयपीएल संघाचा एक सवरेत्तम संघमालक अशी मय्यपनची ओळख होती. मात्र वाममार्गाने पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी करोडो रुपयांचा (गैर)व्यवहार करणारा मय्यपन रस्त्यावर आला आहे. वाईट छंदाने त्याने स्वत:चे आयुष्य बरबाद केलेच, शिवाय चेन्नई संघाचे मालक आणि बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांना पुरते अडचणीत आणले आहे. कर्णधार महेंद्रसिंग ढोणी आणि इतर क्रिकेटपटूंकडेही संशयाची सुई वळली आहे. श्रीनिवासन यांचा जावई ही गुरुनाथची पहिली ओळख. आयपीएल अस्तित्वात आल्यानंतर गेल्या सहा वर्षात चेन्नई संघाचा मुख्य कार्यकारी किंवा सहमालक किंवा मॅनेजर अशी मय्यपनची ओळख झाली. आता त्याला 'सट्टेबाज' अशी जोड मिळाली आहे. मात्र शालेय जीवनापासूनच गुरुनाथ बेटिंग करत असल्याचे त्याचे मित्र सांगतात. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या 'गुरू'चे पैशावाचून कधीच अडले नाही. लहानपणीच्या वाईट सवयीचे पुढे छंदात रूपांतर व्हायला फार वेळ लागला नाही. गुरुनाथ हा चेन्नईतील एव्हीएम सुब्रमणियम यांचा मुलगा आणि एव्ही मय्यपन यांचा नातू. सुब्रमणियम आणि मय्यपन हे चेन्नईतील मोठे प्रस्थ आहे. दक्षिण भारतातील एक सर्वात जुने आणि प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट (फिल्म) प्रॉडक्शन हाउस असलेले एव्हीएम प्रॉडक्शन हे त्यांच्याच मालकीचे आहे. नारायणस्वामी म्हणजे एन. श्रीनिवासन, ही चेन्नईतील एक आणखी एक मोठी असामी. प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून ते प्रचलित आहेत. 'गोल्फ' खेळामुळे श्रीनिवासन आणि गुरुनाथ आणखी जवळ आले. तसेच श्रीनिवासन यांच्या मुलीशी गुरुनाथचे सूत जुळले. १० वर्षापूर्वी गोल्फच्या मैदानावर श्रीनिवासन यांची मुलगी रूपा आणि गुरुनाथची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर पुढे लग्नात झाले. व्यवसाय वाढवण्यात गुरुनाथचा वाटा मोठा होता. त्यामुळे सास-यानेही गुरुनाथवर विश्वास दाखवला. मात्र 'जावई माझा भला', असे म्हणणे श्रीनिवास यांना महागात पडले आहे. जावयाच्या छंदाने श्रीनिवास यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान केले आहे. आर्थिक तोटा भरूनही निघेल. मात्र जावयाच्या 'प्रतापा'मुळे गेलेली अब्रू, पत परत मिळेल का?


Read More »

'चौफेर वाचनाची आवड हवी'

आयआयटी किंवा आयआयएममधील विद्यार्थीही प्रशासकीय सेवांकडे वळत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय या परीक्षेची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय का घेतला?
आपल्या देशात लोकशाही आहे. परंतु तरीही समाजाला पुढे नेण्यात आपण कुठेतरी कमी पडतो आहोत. एका बाजूला लोकांकडे कोटय़वधींची संपत्ती आहे तर दुस-या बाजूला लोकांना दोन वेळेसचे जेवणही मिळत नाही, अशी स्थिती आहे. समाजातील ही मोठी तफावत दूर करण्यासाठी आपलाही हातभार लागावा उद्देशानेच मी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षेसाठी काय तयारी केली?
मी पदवीनंतर लगेचच तयारीला सुरुवात केली. त्यासाठी दिल्लीच्या केंद्राची मदत घेतली. त्यातही चौफेर वाचनावर भर दिला. प्रत्येक मुद्दय़ांचे विविध पैलू हाताळणे, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा काय आणि कसा अभ्यास करता हे जास्त महत्त्वाचे आहे.
तुम्ही याआधीसुद्धा यूपीएससीमध्ये उत्तीर्ण झाला असताना पुन्हा परीक्षा देण्याचे कारण काय?
मी सध्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्समध्ये कार्यरत आहे. मात्र, मला वाटते की आयएएस आणि आयपीएस यांचा सामान्यांशी जास्त संबंध येतो. सामान्यांच्या गरजा पूर्ण करण्याची माझी इच्छा असल्याने मला आयएएस किंवा आयपीएस व्हायला आवडेल. म्हणून पुन्हा प्रयत्न केला, यावेळेस मला ही संधी मिळेल असे वाटते.
या परीक्षेसाठी तयारी करणा-यांना काय सांगाल?
या परीक्षेची प्रक्रिया खूप मोठी आहे. त्यामुळे संयम खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही मानसिकरीत्या स्थिर असाल तरच तुमचा इथे निभाव लागतो. मुळात या प्रक्रियेचा आनंद घेऊन आपण अभ्यास केला तर त्याचे दडपण येत नाही. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासालाही हातभार लागतो. आजची पिढी ही फारच सृजनशील आहे. विशेष म्हणजे आयआयटी किंवा आयआयएममधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थीसुद्धा प्रशासकीय सेवांकडे वळताहेत ही चांगली बाब आहे.
यूपीएससीच्या परीक्षा यंत्रणेविषयी तुम्हाला काय वाटते?
देशातल्या हुशार मुलांना निवडून काढण्याचे काम या परीक्षेद्वारे केले जाते. विशेष म्हणजे, कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे काम केले जाते. यूपीएससीने पर्यायी विषयांची संख्या कमी केली आहे. हा चांगला बदल आहे. यामुळे विद्यार्थ्यांची चाचणी समान स्तरावर होण्याची शक्यता वाढली आहे.
- शब्दांकन : शेफाली मोरे

Read More »

अलिबागचा आंबा दलालांच्या ताटात

जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन ६० टक्के झाले असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दलालांनी त्याचा फायदा घेणे सुरू केले आहे.

पेण - जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन ६० टक्के झाले असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दलालांनी त्याचा फायदा घेणे सुरू केले आहे.
आंबा उत्पादक शेतक-यांकडून कमी दराने आंबा खरेदी करून तो बाजारात चढय़ा किंमतीत विकला जात आहे. दुसरीकडे पेणसारख्या मध्यवर्ती ठिकाणी अलिबाग, मुरूडमधील आंब्याची किरकोळ विक्री धडाक्यात सुरू असल्याने येथील शेतक-यांना फायदा होत आहे.
किरकोळ विक्रीतून जास्त फायदा होत असल्याने दलालांना बाजूला सारून पेणमध्ये आंब्याची बाजारपेठ उभारण्याची मागणी अलिबागमधील आंबा बागायतदारांनी कृषी आणि पणन विभागाकडे केली आहे. अलिबाग येथे झालेल्या बागायतदारांच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.
अलिबाग तालुक्यातील शेतक-यांनी पिकवलेला आंबा हाशिवरे, चिंचवली, बहिरोळे, परहुरपाडा, खंडाळे, कार्लेखिंड, तीनवीरा, पळी, पेझारी, कुडूस, रेवदंडा तसेच मुरूड तालुक्यातून पेणच्या बाजारपेठेत दाखल होतो.
सकाळी नऊपर्यंत हा माल संपत आहे. त्यामुळे या ठिकाणी आंब्याची अधिकृत बाजारपेठ उभारण्याची मागणी कोकणातील भाजीपाला उत्पादकांचे नेते व अलिबाग तालुक्यातील आंबा खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली आहे. अलिबागमधील आंब्याला दलालांच्या पकडीतून सोडवण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read More »

सेबीची पंचविशी

भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबी ही बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. नुकतीच तिने २५ वर्षे पूर्ण केली. सर्व प्रकारच्या भांडवली व्यवहारांवर देखरेख ठेवणारी ही एक नियामक संस्था. भारतातील काही मोजक्या संस्थांविषयी जनमानसात आणि कॉर्पोरेट जगतात अजूनही आदराची आणि विश्वासाची भावना आहे.

भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबी ही बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. नुकतीच तिने २५ वर्षे पूर्ण केली. सर्व प्रकारच्या भांडवली व्यवहारांवर देखरेख ठेवणारी ही एक नियामक संस्था. भारतातील काही मोजक्या संस्थांविषयी जनमानसात आणि कॉर्पोरेट जगतात अजूनही आदराची आणि विश्वासाची भावना आहे.
सेबी ही त्यांतीलच एक. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारतातील संगणक क्रांतीचे प्रणेते मानले जाते, जे अतिशय स्वाभाविक आहे. पण राजीव गांधी यांच्याच पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत सेबीचीही स्थापना झाली. त्याअर्थी सेबीच्या रूपाने देशात झालेल्या आर्थिक क्षेत्रातील क्रांतीचेही तेच जनक होते. सुरुवातीला अर्थ खाते, तसेच इतर अनेक खात्यांमधील नोकरशहा आपल्याकडील अधिकार सेबीकडे सोपवण्यास नाखुश होते. आयडीबीआय बँकेचे तत्कालीन कार्यकारी संचालक सुरेंद्र दवे हे सेबीचे पहिले अध्यक्ष बनले.
त्यांच्या कार्यकाळातील बहुतेक वेळ पत्रव्यवहारांमध्ये आणि सेबीच्या अधिकारकक्षा समजावून घेण्यामध्ये गेला. सुरुवातीच्या वर्षामध्ये सेबी ही नियामक संस्था नव्हती. सेबीला नियामक संस्था म्हणून नावारूपाला आणण्यात सध्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचाही मोठा वाटा होता. सेबीचे दुसरे अध्यक्ष जी. व्ही. रामकृष्ण यांच्या कार्यकाळात सेबीला व्यापक अधिकार मिळाले. तो काळ भारलेला होता. काँग्रेसप्रणीत सरकारने अर्थव्यवस्था खुली केली होती. उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या लाटांवर भारतीय स्वार झाले होते. कधी हिंदकळत होते, डगमगत होते. पण त्या स्वातंत्र्यातून येत असलेल्या भरभराटीचा आनंदही लुटत होते. गुंतवणूकदारांकडे पैसा खेळत होता.
परदेशी गुंतवणूकदार संस्था भारतात येऊ लागल्या होत्या. शेअर बाजाराचा उल्लेख सामान्यांच्या बोलण्यातही होऊ लागला होता. मात्र कोणतेही स्वातंत्र्य अनिर्बंध असू शकत नाही. तसे झाल्यास त्या स्वातंत्र्याची जागा लवकरच अनागोंदी घेऊ शकते. सेबीची स्थापना झाली त्या काळात शेअर बाजारावर दलाल मंडळींचे वर्चस्व होते. बाजारातील चढउतार त्यांच्या मर्जीने चालायचे. त्याला कसलाही धरबंध नव्हता. आजही शेअर दलाल हा या साखळीतला महत्त्वाचा घटक असला, तरी त्याच्या भूमिकेवर, व्यवहारांवर, वायद्यांवर सेबीचे नियंत्रण आले आहे.
सुरुवातीला शेअर बाजार, पोर्टफोलियो व्यवस्थापक, र्मचट बँकर यांना सेबीच्या अधिकारकक्षेत आणण्यात आले. कालांतराने परदेशी गुंतवणूकदार संस्था, पतमानांकन संस्था, साहसवित्त संस्था (व्हेंचर कॅपिटल फंड) यांच्यावरही सेबीचे नियंत्रण आले. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला हर्षद मेहता आणि या दशकाच्या उत्तरार्धात केतन पारेख या उन्मत्त शेअर दलालांनी गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रुपये पाण्यात घातले होते. सुदैवाने अशा घटनांपासून धडा घेऊन, ते टाळण्यासाठी पावले उचलण्याची क्षमता सेबीमध्ये आहे. हे करताना कोणत्याही वर्गाला ही संस्था जाचक वाटणार नाही, याची काळजी वेळोवेळीच्या अध्यक्षांनी घेतलेली आहे.
सेबीची स्थापना करताना नेमण्यात आलेल्या समितीने अमेरिका, इंग्लंड तसेच इतर प्रगत देशांतील नियामक संस्थांचा अभ्यास केला होता. १९९२मध्ये हर्षद मेहता प्रकरण उद्भवले आणि सेबीला संसदेत ठराव संमत करून, कायदा बनवून विशेषाधिकार देण्यात आले. तसे पाहायला गेल्यास भारतातील सर्व नियामक संस्थांमध्ये सेबी सर्वात नवीन आहे. पण वित्तीय आणि राजकीय क्षेत्रातीलही अनेक जाणकारांच्या मते सेबीइतकी कार्यक्षम संस्था भारतात दुसरी नाही. इतर बहुतेक संस्था स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्यानंतर लगेच स्थापन झालेल्या आहेत.
उलट सेबीला नव्याने बदललेल्या भारताच्या आकांक्षांचे आणि जबाबदारीचे प्रतीक मानले जाते. भारताच्या खुल्या अर्थव्यवस्थेतली एक यशोगाथा, असे सेबीचे वर्णन भारताबाहेर केले जाते. मुंबई शेअर बाजार आणि नव्याने स्थापन झालेला राष्ट्रीय शेअर बाजार यांना विश्वासार्ह, कार्यक्षम आणि आधुनिक बनवण्यात सेबीचा वाटा मोठा आहे. इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराची व्याप्ती देशभरातील गुंतवणूकदारांपर्यंत वाढलेली दिसते. २००२पासून एकाही शेअर दलालाने गुंतवणूकदारांचे पैसे बुडवलेले नाहीत. याला कारण 'सेटलमेंट' आणि नियमन या आघाडय़ांवर ही संस्था जागरुक आणि तत्पर राहिली.
एखाद्या प्रगतीशील आणि नव्याने खुल्या झालेल्या अर्थव्यवस्थेतील शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणात त्रुटी असतील, गुंतवणूकदारांचे (ज्यात मोठय़ा प्रमाणावर परदेशी गुंतवणूकदारही आले) पैसे सुरक्षित नसतील, तर अर्थव्यवस्थेविषयी बाहेरच्या जगाला भरवसा वाटत नाही. एक सुरक्षित आणि परिपक्व अर्थव्यवस्था, अशी भारताची प्रतिमा घडवण्यात सेबीचा वाटा मोठा आहे. याबद्दल अर्थातच भारतीय राज्यकर्ते आणि अर्थतज्ज्ञ यांना जसे श्रेय द्यावे लागेल, तसेच गेल्या २५ वर्षामध्ये आलेल्या अर्थमंत्र्यांचेही कौतुक करावे लागेल.
रिझव्‍‌र्ह बँक किंवा सेबी अशा संस्थांच्या स्वायत्ततेचे पावित्र्य राखले गेल्यामुळेच त्यांना आपले काम कार्यक्षमतेने आणि नि:पक्षपातीपणे करता येते. एरवी राजकारणी मंडळींविषयी फार चांगले बोलण्याची परंपरा हल्ली मोडीत निघाल्यासारखी दिसते. पण सेबीच्या पंचविशीनिमित्त या संस्थेचे स्वातंत्र्य आणि पावित्र्य अबाधित राखणा-या राज्यव्यवस्थेलाही सलाम करणे आवश्यक वाटते. अर्थात बदलत्या आर्थिक समीकरणांनी नवीन आव्हाने निर्माण केली आहेत. म्युच्युअल फंडांकडून येणा-या परताव्यांमध्ये अनाकलनीय घट दिसून येते.
शारदा इन्वेस्टमेंट्ससारख्या चिट फंडांनी पश्चिम बंगालमध्ये उच्छाद मांडला आणि लाखोंची मेहनतीची कमाई बुडवली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्येही अशा अनिर्बंध चिट फंडांचे उपद्रवमूल्य वाढू लागले आहे. त्यांच्यावर वचक बसवण्याचे सेबीने ठरवले आहे. सेबीचे उद्दिष्ट केवळ शेअर बाजारांचे नियमन नसून, आर्थिक स्थैर्य हेही आहे, असे या संस्थेचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी नमूद केले आहे.
भविष्यात त्यादृष्टीने सेबीकडून अधिक भरीव कामगिरी अपेक्षित आहे. सेबी, रिझव्‍‌र्ह बँक, विमा नियामक आणि विकास प्राधीकरण (इर्डा) अशा नियामक संस्थांचे एकत्रीकरण करून एखादी 'महानियामक' (सुपर रेग्युलेटरी) संस्था बनवावी, असाही एक प्रस्ताव आहे. पण यात काही समस्या आहेत. एकतर बहुतेक नियामक संस्था स्वतंत्रपणे आपापल्या जबाबदा-या योग्य प्रकारे पार पाडतच आहेत. त्यांना एकत्र आणल्यास एखादे समांतर सत्ताकेंद्र निर्माण होण्याचा धोका संभवतो. विकेंद्रीकरण आणि स्वायत्तता ही परिपक्व आणि उदारमतवादी व्यवस्थेतली मूल्ये आहेत. सेबीला स्वायत्त राहू दिले, तर ही यशोगाथा आणखी दीर्घ काळ चालू राहू शकते. आर्थिक मंदीच्या काळात तर याची अधिकच गरज आहे.


पदावरील भक्षक


महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ महिलांवरीलच नव्हे तर अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटना देशात रोज घडत आहेत व त्या रोखण्यासाठी सरकारला कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदाही करावा लागला आहे. पण महिलांविषयी विकृत दृष्टिकोन, पुरुषप्रधान संस्कृतीचा अजूनही असलेला प्रभाव व पदाचा दुरुपयोग यामुळे लैंगिक शोषणाचे प्रकार सर्वत्र वाढत आहेत.
Read More »
रायवळी आंब्यांची धडाक्यात विक्री

 रायगड परिसरातील शेतक-यांनी दलालांना बाजूला सारून स्वत: रायवळी आंबे मुंबई-गोवा महामार्गावर विक्रीसाठी आणले आहेत.

पोलादपूर - रायगड परिसरातील शेतक-यांनी दलालांना बाजूला सारून स्वत: रायवळी आंबे मुंबई-गोवा महामार्गावर विक्रीसाठी आणले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून मिळालेली आंब्यांची किंमत शेतक-यांना थेट मिळत असून यंदा हापूस सोबतच महामार्गालगतच्या बाजारात रायवळी आंब्यांनाही हक्काची जागा मिळाली आहे. या रायवळी आंब्याचे दर २० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत प्रति डझन असे आहेत.
हापूसच्या तुलनेत स्वस्त असलेल्या रायवळी आंब्यांचीही मोठय़ा प्रमाणात विक्री होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील द-याखो-यातून आणलेल्या या रायवळी आंब्यांमुळे आदिवासी शेतक-यांना रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले आहे.
एक-दोन आंबे किंवा डझनाचा दर ठरवून हे आंबे घेतले जात आहेत. महामार्गावरून येणारे-जाणारे प्रवासी वाहने थांबवून टोपलीच्या टोपलीच विकत घेत आहेत. यापूर्वी या भागातील दलाल फारच कमी किमतीत शेतक-यांकडून आंब्यांची खरेदी करत होते. त्यानंतर हे आंबे जादा दराने विकले जात होते. त्यामुळे शेतक-यांच्या मेहनतीवर दलाल गबर होत असल्याचे चित्र होते.
मात्र यंदा शेतक-यांनी दलालांना आंबे देण्याऐवजी स्वत:च ते विकण्याची तयारी केल्यामुळे त्याचा थेट फायदा शेतक-यांना होत आहे. पोलादपूर एसटी स्थानकासमोर शेतक-यांनी आंबे विक्रीसाठी तात्पुरती दुकाने उभारली आहेत. काही ठिकाणी हापूस आंबा कार्बाईडचा वापर करून पिकवले जात असल्याची शक्यता असल्याने आदिवासी शेतक-यांनी आणलेल्या रायवळी आंब्यांमध्ये अशी फसवणूक होत नसल्याचे ग्राहकांनी सांगितले.

Read More »

महात्मा गांधी जलतरण तलावाची आता ऑनलाइन सदस्य नोंदणी

शिवाजीपार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावात पोहण्यासाठी व सदस्य होण्यासाठी आता ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

मुंबई - शिवाजीपार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावात पोहण्यासाठी व सदस्य होण्यासाठी आता ऑनलाइन नोंदणीची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
सदस्यत्व मिळवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात असलेल्या मागणी व होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सदस्यांना ई-कार्ड देण्यात येणार आहेत. येत्या दीड महिन्यात ही कार्यपद्धती राबवण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी दिली आहे.
महात्मा गांधी जलतरण तलाव पाच वर्षे बंद राहिल्यानंतर सन २०११ मध्ये ऑलिम्पिक दर्जाच्या या तरणतलावाचे नूतनीकरण करून तो जनतेसाठी खुला करण्यात आला. या तलावाचे सुमारे अडीच हजार सदस्य असताना, नव्याने मागवलेल्या अर्जामध्ये तब्बल १० ते १२ हजार अर्जाची विक्री झाली. त्यानुसार सध्या तब्बल ९५०० सदस्य बनले आहेत.
दरम्यान, पालिकेने सुरुवातीच्या अडीच रुपये शुल्काच्या तुलनेत चार हजार ४०० एवढी शुल्कवाढ केली. तरीही सदस्यत्व मिळवण्यासाठी झुंबड उडत आहे. त्यामुळेच ऑनलाइन अर्ज मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जलतरण तलावात सध्या ८ बॅचेस चालवल्या जात आहेत. प्रत्येक बॅचेसमध्ये ३५० सदस्यांना प्रवेश दिला जातो. परंतु जुन्या प्रवेशपत्रांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवून त्यांना ई-कार्ड दिले जाणार आहे.
यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. ऑनलाइन अर्जाच्या माध्यमातून प्रवेश घेणा-या नवीन सदस्यांसाठी बॅचेस वाढवण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी दिली.


Read More »

रिव्हर्स स्विंग, २७ मे २०१३

क्रिकेटच्या मैदानावरील रंजक किस्से
१८८७
इंग्लंडचे एक सर्वोत्तम माजी अष्टपैलू फ्रँक वुली (१८८७-१९७८) यांचा जन्म. डावखुरे वुली स्फोटक फलंदाज तसेच मध्यमगती आणि स्पिन गोलंदाजही होते. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ५० हजारहून अधिक धावा आणि दोन हजारहून अधिक विकेट्सचा दुर्मीळ विक्रम वुली आणि डब्ल्यू. जी. ग्रेस यांच्या नावावर आहे. मात्र धावांमध्ये वुली यांना जॅक हॉब्ज (५८९६९) यांनी मागे टाकले आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये एक हजारहून अधिक झेल घेणारे वुली जगातील एकमेव क्रिकेटपटू आहेत. यातील जास्तीत जास्त झेल त्यांनी स्लिपमध्ये टिपलेत.

१८७८
लॉर्ड्सवर झालेल्या डोमेस्टिक सामन्यात ऑस्ट्रेलियाने एमसीसीला नऊ विकेट्सनी हरवले. डोमेस्टिक क्रिकेटमधील सर्वात 'लो स्कोअिरग' सामना अशी नोंद झालेल्या या सामन्यात केवळ १०५ धावांची नोंद झाली. एमसीसीने ३३ आणि १९ तसेच ऑस्ट्रेलियाने ४१ आणि १ बाद १२ धावा केल्या.

१९१२
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन 'न्यूट्रल' संघांत ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरवर पहिल्या तिरंगी कसोटी स्पर्धेला सुरुवात झाली. दुस-याच दिवशी ऑस्ट्रेलियाने एक डाव ८८ धावांनी ही कसोटी जिंकली.

१९६२
भारताचे माजी कर्णधार, अष्टपैलू क्रिकेटपटू आणि सध्या कॉमेंटेटरच्या भूमिकेत दिसणारे रवी शास्त्री यांचा जन्म. १९८०-८१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत पदार्पणात डावखुरे शास्त्री यांनी पहिल्या चार चेंडूंत तीन विकेट्स घेतल्या. ११ वर्षाच्या कारकीर्दीत शास्त्री यांच्या नावावर ८० कसोटी सामन्यांतून ३८३० धावा आणि १५१ विकेट्स असून, १५१ वनडेतून ३१८० धावा आणि १२९ विकेट्स त्यांनी घेतल्यात. १९९१-९२ मधील सिडनी कसोटीत तब्बल दहा तास मैदानावर उभे राहून केलेली २०६ धावांची खेळी शास्त्री यांच्या कसोटी कारकीर्दीतील एक सवरेत्तम इनिंग होती. ऑस्ट्रेलियात १९८५ मध्ये झालेल्या बेन्सन अँड हेजेस कप स्पर्धेत भारताला जेतेपद मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मालिकावीर म्हणून शास्त्री यांना मिळालेल्या 'ऑडी'च्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्याच वर्षी बडोदाविरुद्धच्या रणजी सामन्यात डावखु-या तिलक राजच्या गोलंदाजीवर सहा चेंडूंत सहा षटकार ठोकण्याचा विक्रमही त्यांनी साकारला.

१९७५
ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील गुणी फलंदाज माइक हसीचा जन्म. पदार्पणानंतर केवळ १६६ दिवसांत त्याने एक हजार धावांचा टप्पा गाठला. सर्वात जलद एक धावा करणारा हसी पहिला कसोटीपटू ठरला. पहिली दोन वर्षे त्याची फलंदाजीतील सरासरी ८६.१८ इतकी होती. कसोटीप्रमाणे वनडेतही हसीचे मोलाचे योगदान आहे. 'फिनिशर' म्हणून त्याची ओळख होती. गेल्या वर्षी त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जतर्फे हसी खेळतो.

१९७७
श्रीलंकेचा सिनियर क्रिकेटपटू माहेला जयवर्धनेचा जन्म. कारकीर्दीतील पहिली आठ कसोटी शतके त्याने मायदेशात ठोकली. २००६ मध्ये जयसूर्यानंतर त्रिशतक ठोकणारा तो लंकेचा दुसरा फलंदाज ठरला. त्यावेळची कुमार संगकारासोबतची तिस-या विकेटसाठीची ६२४ धावांची भागीदारी कुठल्याही विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी आहे.

१९८९
ट्रेंट ब्रिजवर झालेला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील सामना 'टाय' झाला. वनडेच्या इतिहासातील तो केवळ दुसरा 'टाय' सामना होता.

१९९९
वर्ल्डकपमधील एक 'मिस मॅच'..कर्टली अँब्रोस (१०-४-८-२) आणि कर्टनी वॉल्र्शच्या (७-१-७-३) या तेज दुकलीच्या प्रभावी गोलंदाजींच्या जोरावर लीस्टरमध्ये झालेल्या वर्ल्डकप सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडला ३१.३ षटकांत ६८ धावांत गुंडाळले. वेस्ट इंडिजने १०.१ षटकातच आठ विकेट्सनी विजय मिळवला. सर्वात कमी वेळात संपलेला सामना म्हणून या वनडेची त्यावेळी नोंद झाली.

Read More »

फुकट्या प्रवाशांमुळे फायदा!

विनातिकीट प्रवास करणे हा एक सामाजिक अपराध असल्याची उद्घोषणा रेल्वेच्या फलाटांवर कायम सुरू असते. विनातिकीट प्रवासामुळे देशाची संपत्ती असलेल्या रेल्वेला तोटा होत असल्याचे कारण आहे.

मुंबई - विनातिकीट प्रवास करणे हा एक सामाजिक अपराध असल्याची उद्घोषणा रेल्वेच्या फलाटांवर कायम सुरू असते. विनातिकीट प्रवासामुळे देशाची संपत्ती असलेल्या रेल्वेला तोटा होत असल्याचे कारण आहे.
मात्र, पश्चिम रेल्वेने फुकटया प्रवाशांविरोधात धडक मोहीम राबवून या होणा-या तोटयाला फायद्यात बदलले आहे. केवळ एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेला फुकटया प्रवाशांकडून सुमारे ७ कोटी ४५ लाखांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे फुकटय़ा प्रवाशांची संख्याही कमी होण्यास मदत होणार असून नियमांचा बडगा उगारून रेल्वेने कामातली चुणूकही दाखवली आहे.
रेल्वेची तिकिटे किंवा आरक्षण मिळणे, सुट्टीमुळे प्रवाशांची होणारी जादा गर्दी या कारणांमुळे एप्रिल आणि मे या काळात फुकटया प्रवाशांची संख्या वाढते. रेल्वेची फसवणूक करून जाणीवपूर्वक फुकट प्रवास करणा-या प्रवाशांची संख्याही मोठी असल्यामुळे रेल्वेने ही मोहीम हाती घेतली आहे. मुंबईत रेल्वे गाडय़ांमध्ये रोज हजारो लोक विनातिकीट प्रवास करतात. त्यात सुट्टीचा हंगाम असल्याने अनेक प्रवासी मेल, एक्सप्रेस गाडया आणि लोकलमधून सर्रास फुकट प्रवास करतात. एप्रिल आणि मे या काळात मोठया प्रमाणात प्रावासी बाहेरगावी जातात. प्रवाशांची संख्या मोठी असल्याने वेळच्या वेळी तिकिटे मिळत नाहीत. त्यामुळे फुकट प्रवास करणा-यांची संख्याही वाढते.
पश्चिम रेल्वेच्या वतीने एप्रिल महिन्यांत विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांविरोधात अभियान हाती घेण्यात आले होते. या अभियानांतर्गत गेल्या महिनाभरात विनातिकीट प्रवास करणा-या १ लाख ७८ हजार २३५ जणांना पकडण्यात आले. या सर्वाकडून दंड स्वरूपात एकूण ७ कोटी ४५ लाख रुपये रेल्वेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. पकडण्यात आलेले अनेक जण हे लांबपल्ल्याच्या गाडय़ांमधून फुकट प्रवास करताना आढळले आहेत. तर बरेच जण मुंबई फिरण्यासाठी आले होते. ते लोकलमध्ये फुकट प्रवास करताना पकडले गेले आहेत. पण याचा फायदा मात्र पश्चिम रेल्वेला झाला आहे.
तिकीट दलालांनाही हिसका

एकीकडे फुकटयांवर कारवाई करताना दुसरीकडे तिकीट दलाल, भिकारी आणि फेरीवाल्यांनाही पश्चिम रेल्वेने आपला हिसका दाखवला आहे. लांब पल्ल्यांच्या मेल, एक्सप्रेस गाडय़ांचे तिकीट हस्तांतर, दलाली याची ६२० प्रकरणे तडीस नेण्यात आली. या प्रकरणांत दंड म्हणून ६ लाख २१ हजार रुपये वसूल करण्यात आले. तसेच जवळपास १ हजार भिकारी व अनधिकृत फेरीवाल्यांनाही पकडण्यात आले. त्यातील ६५४ जणांना रेल्वे परिसरातून बाहेर काढण्यात आले तर ३५४ जणांवर खटला चालवण्यात आला. शिवाय १५ जणांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यामुळे पश्चिम रेल्वेने ऐन सुटीच्या हंगामात ही धडक मोहीम राबवल्याने रेल्वेचा फायदा झाला आहे.
पश्चिम रेल्वेने सुट्टयांचा काळ लक्षात घेऊन ही विशेष मोहीम आखली होती. तिकिट दलाल, फेरीवाले आणि भिकारी यांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारीही येत होत्या. त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली व त्याला मोठे यश मिळाले.- शरद चंद्रायन, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Read More »

विड्याची चव बिघडली

'खई के पान बनारसवाला, खुल जाऐ बंद अकल का ताला..' म्हणत तोंड लालेलाल करणा-यांच्या तोंडाचा रंग फिका पडण्याची शक्यता आहे.
ठाणे – 'खई के पान बनारसवाला, खुल जाऐ बंद अकल का ताला..' म्हणत तोंड लालेलाल करणा-यांच्या तोंडाचा रंग फिका पडण्याची शक्यता आहे. पानाचा स्वाद वाढवण्यासाठी वापरण्यात येणा-या वेलचीचे दर वाढल्याने पानटपरीधारकांनी अर्क काढलेल्या वेलचीचा वापर करायला सुरुवात केली आहे. मात्र त्यामुळे पान खाणा-यांचे तोंड अधिकच बेचव होण्याची शक्यता जास्त आहे.
जेवण केल्यानंतर तोंडाला स्वाद यावा, यासाठी वेलचीयुक्त पानाचे सेवन करण्याची परंपरा आहे. आजमितीस ठाणे जिल्ह्यातील एक कोटी २० लाख लोकसंख्येपैकी ६० ते ७० टक्के लोक पान व माव्याचे शौकिन आहेत. यात तरुणपिढीची संख्याही ३० ते ४० टक्के आहे. विविध कारणांनी या तरुणपिढीला पान व माव्याचे व्यसन लागले आहे. जेवणानंतर किंवा धकाधकीच्या जीवनातून तणावमुक्त होण्यासाठी तरुणपिढी नकळत या व्यसनाकडे ओढली गेली आहे. राज्य सरकारने मध्यंतरी गुटखाविक्रीवर बंदी आणल्याने पान व माव्याच्या विक्रीचा खपही वाढला आहे.
जिल्ह्यात दररोज सुमारे पाच ते १० लाख रुपयांच्या पान व माव्यांची विक्री होते. मध्यंतरीच्या काळात एका मसालापानाची किंमत आठ ते नऊ रुपये, साधे पान पाच रुपये, १२०-३०० तंबाखू पान पाच ते आठ रुपयांदरम्यान, तर साधा मावा पाच रुपये, तंबाखू मावा पाच रुपये झाला आहे. पान व माव्यासाठी वापरण्यात येणा-या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यात वेलची प्रति किलो १२०० रुपये, सुपारी ४०० ते ४५० रुपये किलो झाली आहे. त्यामुळे अनेक टपरीधारकांनी १००० रुपये किलो दराने अर्क काढलेली वेलची ग्राहकांच्या माथी मारायला सुरुवात केली आहे. मूळ वेलची गडद हिरवी व भरीव असते. तर अर्क काढलेली वेलची पिवळसर व बारीक असते. या निकृष्ट दर्जाच्या वेलचीमुळे पान व माव्याची चव बेचव झाली असून, नियमित सेवन करणा-यांना फटका बसला आहे.

Read More »

सचिनची आयपीएलमधूनही निवृत्ती

आयपीएलच्या सहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली.


कोलकाता – आयपीएलच्या सहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली.
विश्वचषक जिंकण्यासाठी मला २१ वर्षे वाट पहावी लागली. त्याचप्रमाणे आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी सहा वर्षे वाट बघितली आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी ख-या अर्थाने 'स्पेशल'आहे असं सांगत पुढील हंगामात आपण खेळणार नसल्याचे जाहीर केले.
आयपीएलमधून निवृत्ती घेण्याची हीच खरी योग्य संधी आहे. आयपीएल खेळण्याचा हा माझा शेवटचा हंगाम आहे. त्यामुळे आता मला माझ्या सहकार्यांसोबत विजयोत्सव साजरा करायचा आहे, असे सचिनने सांगितले.


Read More »

अंगारकीला येणार १५ लाख भाविक

प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त १५ लाख भाविक येण्याची शक्यता सिद्धिविनायक न्यासाने व्यक्त केली आहे.
मुंबई – प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त १५ लाख भाविक येण्याची शक्यता सिद्धिविनायक न्यासाने व्यक्त केली आहे. भाविकांना व्यवस्थितपणे दर्शन मिळण्यासाठी न्यासाने विविध उपाययोजना केल्या आहेत.
नर्दुल्ला टँक मैदानात ४० हजार चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला असून तेथे सोमवारी रात्री १० वाजल्यापासून प्रवेश मिळणार आहे आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनसाठी रात्री दीड वाजता प्रवेश सुरू होणार आहे, अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष सुभाष मयेकर यांनी दिली. गरोदर महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक, नवजात बालकांना त्यांच्या मातापित्यांना दर्शनासाठी प्रथम प्राधान्य असेल. भाविकांच्या सोयीसाठी मंडपात लाइट, पंखे, पिण्याचे पाणी, चहा व मोबाइल टॉयलेटची व्यवस्था आहे. मंडप आणि परिसरात ८० अग्निशमन यंत्रे ठेवली असून,अग्निशमन बंब तैनात करण्यात येणार आहे. शिवाय डॉक्टरांचे पथक आणि प्रथमोपचार व एक रुग्णवाहिका असेल.
भाविकांसाठी 'आशीर्वाद कार्ड'
न्यासाच्या वतीने भाविकांसाठी स्मार्टकार्डच्या धर्तीवर दोन महिन्यात 'आशीर्वाद कार्ड' योजना राबण्यात येणार आहे. मंदिरातील प्रसाद, दर्शन, पूजा आदी खर्च करता येईल. या कार्डचा वापर घरातील कोणताही सदस्य करू शकतो. मंदिरात रोज २५ ते ४० हजार तर दर मंगळवारी दीड लाख आणि अंगारकीला २० लाखांहून अधिक भाविक येतात. हे कार्ड ५०० रुपयांना मिळणार असून त्यातील पैसे संपल्यानंतर ते 'रिचार्ज' करावे लागेल, असे मयेकर यांनी सांगितले.

Read More »

म्हाडाच्या घरांचे ९२ लाभार्थी बेपत्ता

दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान हक्काचे घर मिळालेल्या ११० लाभार्थ्यांपैकी १८ जणांनी म्हाडाच्या नोटिसांना प्रतिसाद दिला असून, ९२ जण अद्याप बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.
मुंबई - दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान हक्काचे घर मिळालेल्या ११० लाभार्थ्यांपैकी १८ जणांनी म्हाडाच्या नोटिसांना प्रतिसाद दिला असून, ९२ जण अद्याप बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. म्हाडाच्या दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने या लाभार्थीना आता सात जूनपर्यंत शेवटची मुदत दिली आहे. या मुदतीत त्यांनी घरांचा ताबा घेण्याबाबत प्रतिसाद न दिल्यास त्यांची घरे म्हाडा काढून घेणार आहे.
मूळ उपकर इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान इमारतीतील काही रहिवाशांची संक्रमण शिबिरात तर काहींची अन्यत्र व्यवस्था करण्यात आली होती. इमारतीचे पुनर्वसन लवकर होण्याची खात्री नसल्याने रहिवाशांनी आपल्या घरांकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र म्हाडाने या इमारती वेगाने बांधून त्यांच्या ताबा घेण्यास रहिवाशांच्या जुन्या पत्त्यावर सूचित केले. मात्र याबाबत त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर म्हाडाने अनेक वेळा वर्तमानपत्रांत जाहिरात दिल्यावर त्यातील १८ मालकांनी संपर्क केला. परंतु यातील ९२ मालक अद्याप बेपत्ताच आहेत.
म्हाडाने बेपत्ता लाभार्थीच्या जुन्या पत्त्यावर पत्र पाठवली व त्यांना मिळालेल्या घरांवर नोटिसाही चिकटवल्या. वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या व त्यांच्या शेजा-यांकडेही
त्यांच्या ठावठिकाणाबाबत विचारणा केली. मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. नियमानुसार म्हाडाने सात जूनपर्यंत शेवटची मुदत म्हाडाने दिली आहे. या मुदतीनंतरही प्रतिसाद मिळाला नाही, तर या घरांचा मास्टरलिस्टमध्ये समावेश करून पात्र गरजूंना ही घरे देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सह मुख्य अधिकारी डॉ. रमेश सुरवाडे यांनी सांगितले.

Read More »

मय्यपनने पुरवली संघाची अंतर्गत माहिती

बीसीसीआय'चे अध्यक्ष व 'चेन्नई सुपरकिंग्ज' संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन व 'बीग बॉस'फेम विंदू दारासिंग या दोघांमध्ये दूरध्वनीवर झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे आहे.
मुंबई – 'बीसीसीआय'चे अध्यक्ष व 'चेन्नई सुपरकिंग्ज' संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यपन व 'बीग बॉस'फेम विंदू दारासिंग या दोघांमध्ये दूरध्वनीवर झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे आहे. सामन्याच्या सहा तास आधी रेकॉर्ड करण्यात आलेल्या या संभाषणात मय्यपन याने 'चेन्नई सुपरकिंग्ज'चे दोन खेळाडू खेळणार नसल्याची माहिती विंदूला दिल्याचे स्पष्ट होत आहे.
मय्यपन हा विंदूमार्फत आयपीएल सामन्यांवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावत होता. त्यासाठी मय्यपन 'चेन्नई सुपरकिंग्ज' संघाची अंतर्गत माहिती विंदूला देत असल्याचे ठोस पुरावे गुन्हे शाखेकडे आहेत. याबाबत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विंदू आणि मय्यपन या दोघांच्या दूरध्वनी संभाषणाची एक ध्वनिफीत गुन्हे शाखेकडे आहे. ही ध्वनिफीत मय्यपनलाही ऐकवण्यात आली आहे. चौकशीदरम्यान मय्यपन याने आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावल्याचे मान्य केले आहे. मात्र, आपला फिक्सिंगमध्ये सहभाग नसल्याचाच दावा तो करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुन्हे शाखेकडे असलेल्या या ध्वनिफितीनुसार, 'चेन्नई सुपरकिंग्ज'च्या सामन्याच्या सहा तास आधी संघातील दोन खेळाडू खेळत नसल्याची माहिती विंदूला दिली होती. त्यानुसार पुढे विंदू, पवन जयपूर व संजय जयपूर यांनी सट्टय़ाची रणनीती आखली. हा सामना पुढे 'चेन्नई सुपरकिंग्ज' हरला होता. याशिवाय विंदू व मय्यपन या दोघांचे कॉल डिटेल्स रेकॉर्डही गुन्हे शाखेकडे आहेत. त्यानुसार मय्यपन चार दूरध्वनींद्वारे विंदूच्या संपर्कात होता. त्यातील दोन मोबाइल अनोळखी व्यक्तींच्या नावावर असल्यामुळे ते बोगस कागदपत्रांद्वारे खरेदी केल्याचा संशय आहे.
रौफ पाच लाखांचे दागिने घेऊन पळाला
'आयपीएल' सामन्यांचा पंच रौफ हा सट्टेबाजांनी दिलेले पाच लाख रुपयांचे दागिने आणि घडय़ाळे घेऊन पळाल्याची माहिती विंदूच्या तपासात पुढे आली आहे. रौफ यांना पवन जयपूर या सट्टेबाजाने भेटवस्तू असलेल्या दोन बॅग दिल्या होत्या. त्या विंदूने त्याचा साथीदार प्रेम तनेजा याच्यामार्फत कार्गोने दिल्लीला पाठवल्या होत्या. त्यात अॅदिदास व नायकी कंपनीचे प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे सहा बूट, सुमारे दहा हजार रुपयांचे चामड्याचे आठ बूट, लेव्ही, हेलोज, बरॉनच्या १३ जीन्स, बॉस नायकी कंपनीचे १६ टी-शर्ट, पुणे वॉरीयर्स व मुंबई इंडियन्सच्या पाच जर्सी, महिलांचे साहित्य, नऊ पट्टे यांचा समावेश आहे. त्यासाठी पवन जयपूर याने विंदूला एक लाख रुपये दिले होते. पण विंदूने प्रेम तनेजा याला रौफ सोबत खरेदी करण्यासाठी पाठवले होते.


Read More »

सरकारी कर्मचा-यांसाठी 'म्हाडा'ची २२७ घरे

राज्य सरकार व सरकारी उपक्रमांतील अधिकारी, कर्मचा-यांसाठी बांधलेली सेवानिवासस्थाने अपुरी पडत असल्यामुळे सरकारी नोकरदारांचे हाल होत आहेत.
मुंबई – राज्य सरकार व सरकारी उपक्रमांतील अधिकारी, कर्मचा-यांसाठी बांधलेली सेवानिवासस्थाने अपुरी पडत असल्यामुळे सरकारी नोकरदारांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर 'म्हाडा' कुर्ला येथील स्वदेशी मिलच्या जमिनीवर उभारलेली २२७ संक्रमण शिबिरे आता राज्य सरकारला भाडेतत्त्वावर देण्याचा विचार करत आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले.
राज्य सरकार व सरकारी उपक्रमांत नोकरी मिळाली तरी राहण्याची व्यवस्था होत नसल्याने परराज्यातून मुंबईत येणा-या सरकारी अधिकारी-कर्मचा-यांची अनेकदा परवड होते. अशा कर्मचा-यांसाठी यापूर्वी बांधलेल्या काही इमारती तसेच सेवानिवासस्थाने आहेत. पण वाढत्या अधिकारी-कर्मचा-यांच्या तुलनेत सेवानिवासस्थानांसाठी असलेल्या जागा अपुऱ्या पडत आहेत. परिणामी निवासस्थानांसाठीची प्रतीक्षा यादी वाढली. त्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी-अधिका-यांनी वसई, विरार, कल्याण, बदलापूर, कर्जत येथे तात्पुरती घरे घेतली असून, त्यांना तेथून दररोज नोकरीसाठी मुंबई गाठावी लागत आहे. त्यातच परराज्यातून आलेल्या नोकरदारांनी हा रोजचा त्रास सहन न झाल्यामुळे नोकरीला राजीनामा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर 'म्हाडा'ने आता राज्य सरकारला मदतीचा हात देण्याचा विचार केला असल्याचे समजते. मुंबईत बंद पडलेल्या १९ गिरण्यांच्या जमिनींवर 'म्हाडा'ने १० हजार १५२ घरे बांधली आहेत. त्यापैकी सहा हजार ९२५ घरे गिरणी कामगारांना परवडणा-या किंमतीत देण्यात आली आहेत. सोडतीद्वारे पात्र ठरलेल्या कामगारांना या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित तीन हजार २०४ घरे संक्रमण शिबिरे म्हणून 'म्हाडा' वापरणार आहे. या घरांपैकी कुर्ला येथील स्वदेशी मिल येथे असलेली २२७ घरे सेवा निवासस्थानांसाठी 'म्हाडा' राज्य सरकारला देणार आहे. एकाच ठिकाणी असलेल्या इमारतींमध्ये ही घरे असल्याने सेवानिवासस्थानांसाठी वसाहत म्हणून त्यांची निगा राखणे सोपे जाईल. याचा विचार करून ही घरे सरकोरला तीन वर्षाच्या भाडेकरारावर दिली जाणार आहेत. त्यानंतर हा भाडेकरार वाढवण्यातही येईल.
सोडतीतील अर्जाची छाननी आज
'म्हाडा'च्या ३१ मे रोजी काढण्यात येणा-या एक हजार २४४ घरांच्या सोडतीसाठी आलेल्या अर्जाची छाननी सोमवारी, २६ मे रोजी सकाळपासून करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी किंवा मंगळवारी दुस-यादिवशी पात्र, अपात्र अर्जदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अर्जदारांना 'म्हाडा'कडे २७ मे रोजी हरकती दाखल करता येणार असून, हरकतींनंतर अंतिम यादी २८ मे रोजी 'म्हाडा' पुन्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. ३१ मे रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी नऊ वाजता सोडत काढली जाणार आहे.

Read More »

'यूजीसी'च्या नवीन नियमांमुळे महाविद्यालयांची अडचण

विद्यार्थ्यांच्या सर्वागीण हिताचा विचार करून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
मुंबई – विद्यार्थ्यांच्या सर्वागीण हिताचा विचार करून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यामुळे यूजीसी, विद्यापीठ आणि शिक्षण विभागाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करून शिक्षणाचा बाजार मांडणा-या महाविद्यालयांना चांगलीच चाप बसण्याची शक्यता आहे.
यूजीसीने नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राध्यान्य दिले आहे. प्रत्येक महाविद्यालयांना यापुढे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची सर्व माहिती प्रवेश देण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. त्यात महाविद्यालयांकडून देण्यात येणा-या सोयी-सुविधा, त्यांचे शुल्क किती असेल याची इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे.
प्रवेश घेतल्यानंतर एखाद्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्याला महाविद्यालय व व्यवस्थापनाच्याविरोधात तक्रार नोंदवता येणार आहे. यामुळे प्रत्येक तक्रारीचा यापुढे विचार केला जाणार आहे.
प्रवेशापूर्वीच माहिती देणे आवश्यक
प्रत्येक उच्च शिक्षण संस्था, महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रिया राबवण्यापूर्वी सर्व अभ्यासक्रमांची माहिती जाहिरात आणि पुस्तिकांद्वारे प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. शिवाय असलेल्या अभ्यासक्रमांना विद्यापीठांच्या मान्यतेसह यूजीसीच्या मान्यताप्राप्त यादीत नाव आहे काय, याची माहिती, अभ्यासक्रम शिकवण्यासाठीचा कार्यक्रम, त्याचा कार्यकाळ, पाठय़क्रमाचे स्वरूप, शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक, कोणत्याही शुल्कासंदर्भातील सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक असणार आहे.
अभ्यासक्रम, शिक्षण आणि गुणवत्ता
प्रत्येक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची सर्व जबाबदारी विद्यापीठ आणि महाविद्यालयांची असेल. यासाठी विद्यार्थ्यांचे अध्ययन कौशल्य लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे. मात्र, एखाद्या संस्थेत मान्यता असलेल्या भाषांमध्ये शिक्षण, पाठय़क्रम आणि परीक्षा देण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना मिळेल. अभ्यासक्रम शिकवण्यासाठी योग्यता असलेले शिक्षक आणि त्यांची प्रत्येक वर्गासाठी उपस्थिती, याची माहिती घेण्याचाही विद्यार्थ्यांना अधिकार असेल.
शुल्क आकारणी
प्रवेश घेण्यापूर्वी कोणत्याही अभ्यासक्रम आणि इतर शुल्काची माहिती विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून घेता येईल. प्रवेश घेणा-या कोणत्याही अभ्यासक्रमाला किती शुल्क आहे, याची माहिती अगोदरच विद्यार्थ्यांना देणे महाविद्यालयांसाठी बंधनकारक असेल. तसेच अभ्यासक्रम सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी प्रवेश रद्द करणार असेल तर त्याच्याकडून घेतलेले सर्व शुल्कही महाविद्यालयांना परत द्यावे लागणार आहे. यामुळे हजारो रुपयांचे शुल्क न देणा-या महाविद्यालयांना यामुळे मोठा चाप बसेल.
खेळ, मनोरंजन, आरोग्य सुविधा
प्रत्येक विद्यार्थ्यांला विविध प्रकारच्या खेळांसोबतच त्याला विविध प्रकारचे साहित्य, पुस्तके महाविद्यालयांकडून उपलब्ध करून घेण्याचा अधिकार असेल. याशिवाय आरोग्य सुविधाही मिळणार आहेत. महाविद्यालयाचा परिसर, इमारती, वसतिगृह स्वच्छ आणि सर्वसोयींनी परिपूर्ण असली पाहिजेत. त्यात करमणुकीच्या साहित्याचा समावेश बंधनकारक असेल. रॅगिंगच्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना संरक्षणही पुरवावे लागणार असल्याचे माहीतगारांनी सांगितले.

Read More »

फसवणूक करून मिळवली परवानगी

'विजय सावंत शुगर अँड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट' या साखर कारखान्यासाठी परवानगी मिळवताना राज्य आणि केंद्र सरकारची फसवणूक करून कारखान्याला परवानगी मिळविली आहे, असा गौप्यस्फोट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केला.
कणकवली - आमदार विजय सावंत यांनी शिडवणे येथे 'विजय सावंत शुगर अँड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट' या साखर कारखान्यासाठी परवानगी मिळवताना राज्य आणि केंद्र सरकारची फसवणूक करून कारखान्याला परवानगी मिळविली आहे, असा गौप्यस्फोट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केला.
विजय सावंत यांची सव्‍‌र्हे नं. १७३१ मध्ये फक्त ४३ गुंठे जमीन आहे. तर सव्‍‌र्हे नंबर १७८८ ही जागा ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ मठ खुर्द यांच्या मालकीची असून, ती जागा स्वत:ची आहे, असे दाखवत ही परवानगी त्यांनी मिळविली आहे. या कामासाठी त्यांनी शिडवणे येथील मंडल अधिका-याला हाताशी धरून खोटय़ा पद्धतीने नोंदणी केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला चुकीची माहिती त्यांनी फसवणूक केली असल्याचे यावेळी तेली यांनी सांगितले.
एखादा साखर कारखाना काढण्यासाठी दोन कारखान्यांमधील हवाई अंतर २५ किलोमीटरपेक्षा जास्त असावे ही महत्त्वपूर्ण अट असते. मात्र, सावंत यांनी गगनबावडा साखर कारखान्यापासूनचे हवाई अंतर २५ किलोमीटरपेक्षा जास्त भरावे यासाठी ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक मंडळाची जमीन ही आपलीच आहे, असे कागदोपत्री दाखवून साखर कारखान्याची निशाणी रोवली. ज्या ठिकाणी साखर कारखान्याची 'चिमणी' बसणार आहे तो स्तंभ ब्राह्मणेश्वर मंडळाच्या जागेत आहे. ही जागा साखर कारखान्याला देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही किंवा अद्यापपर्यंत तशा प्रकारची परवानगीही घेतलेली नाही, असा आरोप तेली यांनी केला.
तेली पुढे म्हणाले की, साखर कारखाना व्हावा मात्र त्यात फसवणूक होऊ नये, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र, ज्या ठिकाणी साखर कारखाना मंजूर झाला आहे, त्याठिकाणी पाण्याची परिस्थिती फारच गंभीर आहे. त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पाण्याची टंचाई असल्याची माहिती कणकवली पंचायत समितीच्या सभापतींनीही दिलेली आहे. त्यामुळे साखर कारखान्याला परवानगी मिळाली म्हणजे साखर कारखाना उभा झाला, असे होत नाही. साखर कारखान्याबरोबरच अन्य उत्पादने घेण्यासाठी प्रतिदिवशी सात लाख लिटर पाण्याची गरज अपेक्षित आहे. हे पाणी कसे उपलब्ध करणार याबाबत कोणतेही नियोजन नाही. मोठ्या प्रमाणात समभाग विकण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात उसाचे क्षेत्र आणि एक लाख २० हजार टन एवढे होणारे उसाचे उत्पादन लक्षात घेता साडे तीन लाख टन ऊसनिर्मिती जेव्हा होईल तेव्हाच साखर कारखाना चालवणे फायद्याचे ठरेल. शिवाय डी. वाय. पाटील साखर कारखाना, भोगावती आणि गवसे साखर कारखाना यांच्याशी जिल्ह्यातील ऊस उत्पादन शेतकऱ्यांचे करार झाले आहेत. त्यामुळे उत्पादनाचीही मर्यादा या साखर कारखान्यांवर येणार आहे.
तरीही हा साखर कारखाना सुरू होण्यासाठी त्या पद्धतीने आराखडा करण्यात आला किंवा अन्य परवानग्या घेणे गरजेचे होते. ते काम अद्याप झालेले नाही याचा अर्थ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाच्या हेतूने या साखर कारखान्याचे काम विजय सावंत आणि जिल्ह्यातील विरोधक करत आहेत. प्रतिदिवशी साखर कारखान्याला लागणारा पाण्याचा प्रश्न, त्या संदर्भातील व्यवस्था या गोष्टी बाजूला सारून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारखान्यातील यंत्रसामुग्री, शेड किंवा अन्य बांधकामाविषयी कोणत्याही प्रकारची प्रगती नसताना समभाग विकून, विरोधकांना हाताशी धरुन विजय सावंत हे राजकारण करत आहेत. तसेच आमदार सावंत हे सूडबुद्धीने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याबाबत अपप्रचार करत आहेत. हे सर्व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील विरोधकांच्या संगनमताने सुरू असलेले षड्यंत्र असल्याचा आरोप तेली यांनी केला.

Read More »

गडनदी धरणाच्या कालव्याचे काम निकृष्ट

संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरणाच्या कालव्याचे काम संथ गतीने सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत आहे.

संग्रहित छायाचित्र
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरणाच्या कालव्याचे काम संथ गतीने सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत आहे. कालव्यातून जाणारे पाणी, त्याचा असलेला वेग, याचा विचार करून बांधकाम होत नसल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी संतोष येडगे यांनी केला आहे.
कोटय़वधी रुपये खर्च करून धरणाचे काम सद्यस्थितीला पूर्णत्वास जाऊ लागले आहे. या धरणाच्याच कालव्याचा मुख्य दरवाजा २९ ऑगस्ट रोजी तुटला होता. त्याची दुरुस्ती होईपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यानंतर बोगद्याजवळून कालव्यापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी धरणाचे पाणी संथ गतीला आणण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही संरक्षक भिंत सिमेंट, खडी, वाळू व स्टील यांचा आधार घेऊन उभारणे आवश्यक असताना चक्क दगडाचा वापर करून ही भिंत उभी केली जात आहे. हे काम अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण करणारे आहे, असा आरोप धरणाची पाहणी केल्यानंतर येडगे यांनी केला आहे.
धरणातून अत्यंत वेगाने येणारे पाणी कालव्याद्वारे सोडण्यासाठी त्याची गती संथ होण्यासाठी ही संरक्षक भिंत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, नेमून दिलेला ठेकेदाराकडून निकृष्ट काम केले जात आहे. लघुपाटबंधारे विभागाचे अभियंताही याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. हे निकृष्ट काम त्वरित थांबवण्यात यावे, अशी मागणी येडगे यांनी केली आहे.


Read More »

चिपळुणात वाहतूक कोंडीमुळे डोकेदुखी

दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, मुख्य बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा रखडलेला प्रश्न, पार्किंगसाठी अपुरी जागा, नियम धाब्यावर बसवून रस्त्यालगत थाटली जाणारी दुकाने आदींमुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आह़े.
चिपळूण - शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, मुख्य बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाचा रखडलेला प्रश्न, पार्किंगसाठी अपुरी जागा, नियम धाब्यावर बसवून रस्त्यालगत थाटली जाणारी दुकाने आदींमुळे शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आह़े. पालिकेकडून पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध केली जात नसल्याने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
शहर परिसरातील नागरिकांबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्थांचीही शहरात विविध कामानिमित्त वर्दळ असत़े त्यातच बाजारपेठेत विविध हातगाडीवाले व फळविक्रेते राजरोसपणे रस्ता अडवून व्यवसाय करीत आहेत़ या हातगाडी व फळविक्रेत्यांवर अनेकदा पालिकेकडून कारवाई करण्यात आली. मात्र, कारवाई झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याठिकाणी हातगाडीवाले बस्तान मांडतात. शहरात पालिकेतर्फे कुठेही दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वंतत्र अशी पार्किंगची व्यवस्था नाही. काही ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे ते पालिकेतर्फे भेदभाव न करता सरसकट हटवावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती़.
वाढीव बांधकाम हटवल्यास काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नगरसेवक संजय रेडीज यांनी मागील सभेत व्यक्त केली होती. दरम्यान, शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचीही दमछाक होत आह़े त्यामुळे वाहतूक पोलिसांचीही संख्या वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील शिवाजी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. या चौकाच्या रुंदीकरणाचा प्रश्न सोडवण्यात पालिकेला यश आलेले नाही. गेल्या निवडणुकीवेळी पालिकेने या चौकात जेसीबी आणून रुंदीकरणाचा केवळ दिखावा केला. मात्र, प्रत्यक्षात चौकाचे रुंदीकरण झालेलेच नाही. फिरते हातगाडीवाले आणि व्यापा-यांनी गटारावर थाटलेली दुकाने यामुळे वाहतुक कोंडीत भर पडली आहे. अजिंक्य आर्केड परिसरात रस्तारुंदीकरण झाले. मात्र, त्याठिकाणी पुन्हा फळविक्रेते बसू लागले. नो पार्किंगच्या जागी गाडय़ा उभ्या केल्या जातात. पालिकेसमोर, मधु फार्मसीसमोर आणि जुना बसस्थानक परिसरातही फळविक्रेते, भाजीवाले यांनी रस्ता अडवला आहे.
मध्यंतरी पोलिसांनी बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पांढरे पट्टे आखले आणि एकदिवसाआड पार्किंगची व्यवस्था केली. मात्र, सद्यस्थितीत हे नियमदेखील पाळले जात नाहीत. त्यावरील पोलिसांचे नियंत्रणही सुटले आहे. नगर पालिका आणि पोलिस यांच्यामार्फत शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात काढणे सहजशक्य आहे. मात्र त्यासाठी संयुक्त नियोजन केले जावे, अशी मागणी होत आहे.

Read More »

कोकण रेल्वे 'हाउसफुल्ल'

कोकणवायीय परतीच्या प्रवासासाठी मुंबईकडे जाऊ लागले आहेत.


संग्रहित छायाचित्र
कुडाळ – कोकणवायीय परतीच्या प्रवासासाठी मुंबईकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांच्या गर्दीने रेल्वे स्थानक परिसर फुलून गेल्याचे चित्र दिसत आहे.
कोकणवासीय दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत आपल्या गावी येतात. यावेळी कोकणी मेव्यासह, आंबा, काजू, फणस यांचा यथेच्छ लाभ घेतल्यानंतर खरे समाधान मिळते. यंदा तर आंबा, फणस, काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने सुरुवातीच्या काळातील ४५० ते ५०० रू. पर्यंतचा हापूस आंबा दीडशे रुपयांपर्यंत डझनावर मिळू लागला. त्यामुळे कोकणवासीय समाधान व्यक्त करत आहेत. सुट्टीच्या दिवसातील कोकणातील दिवस आपल्या आयुष्यातील खरे आठवणीचे व आनंदाचे दिवस असल्याचे कोकणवासीय सांगतात. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू होतो.
यंदा मात्र वाढत्या गर्दीच्या त्रासापासून वाचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडून कोकणवासीयांची सोय केली आहे. आता परतीचा प्रवास सुरू झाला असून पाऊस सुरू होण्यापूर्वीच मोठ्या संख्येने परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीय रेल्वे स्थानकावर गर्दी करू लागले आहेत.
चाकरमान्यांसाठी राजापुरातून जादा गाड्या
राजापूर – उन्हाळी सुट्टीसाठी आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांना आता परतीचे वेध लागले आहेत. त्यांच्यासाठी राजापूर आगारातून एसटीच्या नियमित गाड्यांबरोबरच मुंबई व बोरिवली मार्गावर जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. खासगी गाडय़ांकडे तसेच रेल्वेकडेही प्रवाशांचा कल दिसून येत आहे.
उन्हाळी सुट्टीत चाकरमानी येण्याचे प्रमाण तालुक्यात मोठे आहे. लग्नसराई, सार्वजनिक पूजा, घरातील धार्मिक कार्य यासाठी मे महिन्याच्या सुट्टीत नियोजन करून चाकरमानी गावाकडे येत असतात. महिनाभराची सुट्टी संपत आल्याने व लवकरच शाळाही सुरू होणार असल्याने आता चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत.
मुंबईला जाणा-या प्रवाशांची राजापूर आगारात गर्दी वाढली आहे. त्यामुळे बोरिवली, मुंबई व नालासोपारा या गाडय़ा या नियमित गाड्यांबरोबरच जादा गाड्याही सोडण्यात आल्या आहेत. एसटीकडून त्यासाठी आगारात आणि ऑनलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसटी बरोबरच खासगी वाहतूक व रेल्वेकडेही प्रवाशांचा कल दिसून येतो. राजापूर रेल्वे स्थानकावर थांबणा-या सावंतवाडी दादर, मांडवी व कोकण कन्या या तिन्ही गाडय़ांना प्रवाशांची गर्दी होत आहे. कोकण रेल्वेने सोडलेल्या जादा गाडय़ांनाही प्रतिसाद मिळत आहे.

Read More »

लग्नाच्या मुहूर्तांना सहा जूनला मिळणार अल्पविराम!

'गंगा सिंधू सरस्वतीच यमुना..' म्हणत अनेकांना सात जन्माच्या बंधनात बांधणा-या विवाहांच्या मुहूर्तांना सहा जून रोजी अल्पविराम मिळणार आहे.
रत्नागिरी – 'गंगा सिंधू सरस्वतीच यमुना..' म्हणत अनेकांना सात जन्माच्या बंधनात बांधणा-या विवाहांच्या मुहूर्तांना सहा जून रोजी अल्पविराम मिळणार आहे. गेले महिनाभर लागोपाठ आलेल्या मुहूर्तानी गजबजलेली मंगल कार्यालये काही काळ विश्रांती घेणार आहेत. सहा जूनला शुक्रअस्त असल्याने थेट ११ जुलैलाच आता लग्नाचा मुहूर्त आहे. जुलैमध्ये अवघे तीनच मुहूर्त लाभणार आहेत.
दरवर्षी तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराई सुरू होते. आयुष्यातील अत्यंत मंगलमय अशा या संस्काराची परिपूर्णता करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे प्रयत्न करत असतो.
संपूर्ण मे महिन्यात लग्नतिथी उत्तम असून, मे महिन्याचा उत्तरार्ध आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळून तब्बल १२ मुहूर्त आहेत. सहा जूनच्या अस्तानंतर थेट ११ जुलैलाच पुन्हा मुहूर्त आहे. त्यानंतर 'शुभमंगल सावधान..' ऐकायला मिळेल ते थेट नोव्हेंबरध्ये तुळशीच्या लग्नानंतरच. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे हा अस्तकाळ चार-पाच महिन्यांचा नाही. त्यामुळे विवाहोत्सुकांना फार काळ थांबावे लागणार नाही.


Read More »

पावसाळा आला तरी चिरा खाणी उघड्याच

पावसाळा ऐन तोंडावर आला असतानाही जिल्ह्यातील चिरा खाणी अद्याप उघडय़ाच आहेत.
रत्नागिरी - पावसाळा ऐन तोंडावर आला असतानाही जिल्ह्यातील चिरा खाणी अद्याप उघडय़ाच आहेत. मृत्यूचा सापळा बनलेल्या या खाणी बुजवण्यासाठी प्रशासन व व्यावसायिकांकडून दुर्लक्षच केले जात आहे. नियम धाब्यावर बसवून खाणी उघडय़ाच ठेवणा-या खाणमालकांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
जिल्ह्यातील बराचसा भाग कातळाचा आहे. त्यामुळे या भागात चि-याच्या अनेक खाणी आहेत. या खाणीतून महसूल विभागाला दरवर्षी मोठा महसूल मिळतो. या खाणी खोदण्यासाठी संबंधित खाणमालकांना खाण बुजवण्याच्या अटीवर परवानगी दिली जाते. मात्र, एकदा का ही परवानगी मिळाली की, खाणमालक सरकारचे नियम धाब्यावर बसवून खोदलेल्या खाणी न बुजवता तशाच उघडय़ा ठेवतात. मात्र, याची मोठी किंमत ग्रामस्थांना मोजावी लागते. अनेकांची गुरे-ढोरे, लहान मुले यामध्ये पडून मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. मात्र, या घटनेचे सोयरसूतक ना खाण मालकाला ना प्रशासनाला असते.
खाण खोदण्यासाठी १०० ब्रासची परवानगी तहसीलदार, १०० ते १००० पर्यंतची परवानगी प्रांताधिकारी तर १००० ब्रासवरील परवानगी जिल्हाधिका-यांकडून दिली जाते. सध्या गुहागर तालुक्यात अनेक वर्षापूर्वी खोदलेल्या खाणीही उघड्याच आहेत. नव्याने खोदण्यात आलेल्या खाणींचीही हीच स्थिती आहे. या खाणी बुजवणे तर दूरच त्याभोवती काटेरी कुंपण घालण्याचीही माणुसकी खाणमालकांना नाही. याचा नाहक फटका लगतच्या ग्रामस्थांना बसत आहे. त्यामुळे चि-याच्या खाणी उघड्या ठेवणा-या खाणमालकांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Read More »

कोकणात पे-यांचे वारे!

फाटीतुटका (स्वयंपाकासाठी जळण), पेंढी पाकळी (गुरांसाठी चरण) आदीची सोय लावून पावसाची बेगमी करण्याच्या कामात सध्या कोकणातील शेतकरी गुंतला आहे. रोहिणी नक्षत्राचा पाऊस शिंपडला रे शिंपडला की, शेतक-यांना वेध लागतात ते पे-यांचे. मग, हारी-कणगीत तजवीज करून ठेवलेलं बियाणं पेरणीसाठी आपोआप शेताचा बांध गाठू लागतं. रानावनातीलं पालापाचोळा (पाथेरी), शेणकीतलं शेण व गवतकाडी शेतावर अंथरूण राबकाढणीसाठी (भाजावण) ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग पट्टय़ातील शेतकरी आता सज्ज झाला आहे.
राबकाढणीनंतर लाल-काळ्या पडलेल्या शेतजमिनीवर भाताचा 'पिवळा' दाणा पेरला जातो. मग, ख-या अर्थाने नांग-यांचा कस लागून वाफ्यावर वाफे काढून पेरणीचा हंगाम सुरू होतो. एखाद्या गावाची 'शीव' (सीमारेषा) ओलांडल्यावर जसा बोलीभाषेचा बाज बदलत जातो, तशी भाताच्या अठरापगड जातींची चव कोकणपट्टय़ातील विविध भागांत चाखायला मिळते. गेल्या काही वर्षात पारंपरिक बियाणांची जागा सुधारित सरकारी वाणांनी घेतली आहे. मात्र 'जुने ते सोने' या उक्तीनुसार ठाण्यापासून सिंधुदुर्ग पट्टय़ापर्यंत जया, रत्ना सुवर्णाच्या भात बियाणांवरील शेतक-यांची 'माया' कायम आहे. आजघडीला महाबीजपासून नाना जातींचे बियाणे तालुका, जिल्ह्याच्या कृषी कार्यालयात सहज उपलब्ध होत असले तरी वाजवी पीक देणा-या जया, सुवर्णा आणि रत्ना यांनाच कोकणातील शेतक-यांची पहिली पसंती मिळत आहे.
बियाणांच्या 'अठरापगड जाती'
ठाणे, रायगड, रत्नागिरी ते अगदी सिंधुदुर्ग पट्टय़ात भाताच्या विविध जाती आढळतात. एकेकाळी भाताचे कोठार असलेल्या रायगडमध्ये कालेसालं, तांबेसालं, चिमणसालं, तांबडा बार, भडशा-पनवेल आदी पारंपरिक भातपिकांवर शेतक-यांच्या उड्या पडत असत. मात्र, गेली अनेक वर्षे जया, सुवर्णा, रत्ना, हलवा कोलम, गुजरात कोलमसारख्या सरकारी वाणांची वरकस (रत्नागिरी) व रायगड (खलाटी) भागातील शेतक-यांना मोहिनी पडली आहे. त्यामुळे 'यंदा काय केलव' याचे ९९ टक्के उत्तरादाखल जया, सुवर्णाचेच नाव पुढे येते. तोकडी वाढ असलेल्या सुवर्णाच्या भातात (खेड) गवतकाडी होत नाही. त्यामुळे कापणीच्या वेळी फारसा त्रास होत नसल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात या बियाण्याला मोठी मागणी आहे. मुंबईला लागून असलेल्या पनवेलपासून ते अगदी महाड, कर्जत, पेण, अलिबाग, खालापूर, खोपोली, माणगाव, तळा तालुक्यांतही जया, सुवर्णावर शेतक-यांचा विशेष जीव आहे. ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यात प्रसिद्ध असलेला वाडा कोलम, शहापूरचा झिणी, हळवार व सिकंदर, वाटाणा ही तशी जुनी वाणं. त्यांच्या जोडीला आता 'आर-१७', 'आर-२४', 'पालघर-३२३', 'गुजरात-११' या सरकारी वाणांचीही साथ लाभत आहे.
थांब जरा उभी राहा!
पावसाळ्यापूर्वी पेरणीकामासाठी तजवीज करून ठेवलेल्या बियाण्यात 'थांब जरा उभी राहा' हे भातबियाणे विशेष प्रसिद्ध आहे. सुवर्णा, गुजरात, मसुरा, हलवा कोलम, गुजरात कोलम, तुला काय पंचाईत, खारा, जीआर-११ आदी बियाणेही कोकणात प्रचलित आहेत. त्याशिवाय तुला काय करायचं हाय, जया, रत्ना, गोदवेल, आयराड, टायचनं, धनभातं, आंबेमोहोर आदी भातपिके घेण्याकडे कोकणातील शेतकऱ्यांचा ओढा आहे. पानावळ शेतीचा भाग असलेल्या रायगडमध्ये सुवर्णा, मसुरा, गुजरात व जयाची पेरणी होते. तर वरकसपट्टय़ातील रत्नागिरी, सिंधुदुर्गनगरीत जया, सुवर्णाचे पीक घेण्याला प्राधान्य आहे.
सिंधुनगरीत 'वरंगळ'ची पेज चवीलाही नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वालय, वरंगळ, जया व सोंफळा या जुन्या बियाण्यावर शेतकऱ्यांचा विशेष जीव. वालय व वरंगळीचा लाल रंगाचा भात म्हणजे (महान पीक) मानलं जायचं. पाहुण्यारावळय़ांसाठी हा भात खायला मिळणे ही मेजवानीच असायची. पण आता वरंगळीच्या लाल भाताची पेज चवीलाही मिळेनाशी झाली आहे. पूर्वजांपासूनच्या वालय, वरंगळीऐवजी जया, सुवर्णाचे पीक घेण्याकडे सिंधुनगरीतील शेतक-यांनी भर दिला आहे. त्याच्या जोडीला सह्याद्री, कोमल व मसुरा आदी भातपिके येथील शेतकरी घेत आहेत. सध्या 'एककाडी' हे हायब्रिड बियाणे भलताच भाव खात आहे. कमी उंचीचे हे भात अवघी एककाडी जमिनीत रोवल्यावरही भरघोस पीक देत असल्याचे कुडाळ तालुक्यातील संतोष राणे यांचे म्हणणे आहे.
कोलम वाड्यांचा, लाभ पंजाबचा
ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून ख-या अर्थाने नावारूपाला आलेला 'वाडा कोलम' मागील पाच वर्षापासून तेथून हद्दपारच झाला आहे. 'कोलम'चे पीक घेण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत, सेंद्रियऐवजी रासायनिक खतांच्या वापरामुळे वाडय़ात सध्या एक टक्कासुद्धा कोलमचे पीक घेतले जात नसल्याचे वास्तव आहे. याउलट गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक जिल्ह्यातील घोटी, इगतपुरी येथील शेतकऱ्यांनी 'कोलम'ची बाजारेपठ काबीज केली आहे. इतकेच नव्हे तर आंध्र प्रदेश, पंजाबमधून येणारा व वाडा कोलमारखाच दिसणारा तांदूळ 'वाडा कोलम'च्या पिशव्यांतून मुंबई, ठाण्यात विकला जात आहे. सुरती व झिणीच्या वाणापासून तयार झालेल्या 'वाडा कोलम'ला १५ ते २० वर्षापूर्वी विशेष मागणी होती. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता कोलमची चव खवय्यांच्या जिभेवर रेंगाळली नाही, तरच नवल. मात्र १९९३ पासून वाडा तालुका 'डी प्लस' झोन जाहीर झाला. त्यानंतर येथील शेतकऱ्यांनी जमिनी विकण्याचा जणू सपाटाच लावल्याने आता कोलमचे पीक घेणे दूरच, पण शेतकऱ्यांची संख्याही प्रचंड घटत चालली आहे.
राबणीविषयी मोलाचे मार्गदर्शन
रायगडमधील कर्जत तालुका हा प्रामुख्याने भातशेतीत अग्रेसर मानला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षात येथे फार्म हाउसचे वारेमाप पीक वाढल्याने भातशेतीचे प्रमाण अगदी टक्क्यावर आले आहे. कर्जत-दोन, कर्जत-तीन, कर्जत-पाच , कर्जत- सात हे सुधारित वाणांचे सरकारी बियाणे स्थानिक शेतक-यांना भरघोस पीक मिळवून देत आहे. भातशेतीला जोड म्हणून बल्लिवेरे व सईसावणे येथील आदिवासी शेतक-यांनी भातासोबत भेंडी, काकडी व इतर भाज्यांचे पीक घेऊन नवी कृषिक्रांती घडवल्याचे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. रवींद्र मर्दाने यांचे म्हणणे आहे. भाताच्या रोपांची काळजी कशी घ्यावी, खतांचा मारा कसा करावा इतपत इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना कृषी मेळावे व चर्चासत्रातून दिली जात असल्याचे ते सांगतात. पेरणीच्या वेळी शेतात तण येऊ नये, यासाठी राबभाजणी कशी करावी, यासाठी विशेष मोहीम राबवली असल्याचे मर्दाने यांनी सांगितले. अधिक मार्गदर्शनासाठी, विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. रवींद्र मर्दाने (९६७४१२०४७०) यांच्याशी संपर्क साधू शकता.
'ड्रम सिडर'चा नवा पर्याय
सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण ते अगदी सायंकाळी घसा ओला करेपर्यंत मजुरांची बडदास्त ठेवणे कोकणातील शेतक-यांना 'महाग' पडत आहे. काहींनी तर वाढत्या मजुरीमुळे शेती (आर्धल) दुस-यांना देण्यास सुरुवात केली आहे. शेतात एकदा उतरल्यावर पेरणी, कापणी, लावणीपासून ते अगदी मळणीपर्यंत खर्चाची जमवाजमव करणे म्हणजे तारेवरची कसरतच होऊन बसली आहे. हा खर्च वाचवण्यासाठी 'ड्रम सिडर'चा नवा पर्याय कोकणातील शेतक-यांना मिळाला आहे. शेतात पडलेला भाताचा दाणा पक्ष्यांच्या मुखी न लागू देता सुधारित पेरणी करणारे हे यंत्र शेतक-यांच्या पसंतीस उतरत आहे. कर्जतमधील वदप ग्रामपंचायतीत सध्या ते उपलब्ध आहे. एका रांगेत बियाण्यांची पेरणी करणारे हे यंत्रलावणीच्या खर्चाचीही बचत करते.

Read More »

असे करा भातपिकाचे नियोजन

बदलते हवामान हा शेतीसाठी सध्या कळीचा मुद्दा ठरत आहे. कधी कमी पाऊस, तर कधी अतिपाऊस. नाहीच तर अवकाळी पावसाचे संकट आहेच. या संकटाचा शेतक-यांना दरवर्षीच सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतक-यांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. तंत्रशुद्ध लागवड, खते व कीटकनाशकांचा प्रमाणशीर वापर, पाणीव्यवस्थापन आणि योग्य बियाण्याची निवड यामुळे शेतक-याची या संकटातून सुटका होऊ शकते. यंदाच्या खरीप हंगामासाठी कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भातपिकाच्या नियोजनाचा सल्ला शेतक-यांना देण्याचा हा प्रयत्न.
मशागत
हंगामाअखेर कापणी करून जमिनीची नागरणी करावी. शेतात पाणी साचले असता उभी व आडवी नांगरट करावी. एकरी १० ते १२ गाडय़ा चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत धानाच्या शेतात मिसळावे. हिरवळीचे खतही फायदेशीर ठरते. भाताची लागवड गादीवाफा तंत्राने केल्यास अधिक फायदेशीर ठरेल. १२० सेंमी रुंद, ८ ते १० सेंमी. उंच आणि योग्य त्या लांबीचा गादीवाफा तयार करावा. गादीवाफ्यात प्रतिगुंठा एक गाडी याप्रमाणे शेणखत घालावे. प्रतिगुंठा दोन किलो युरिया द्यावा. बियाणे गादीवाफ्याच्या रुंदीस समांतर ८ ते १० सेंमी अंतरावर व एक ते दोन सेंमी खोल पेरावे. उगवणीपर्यंत वाफ्यात फक्त ओलावा ठेवावा. रोपांच्या काढणीपूर्वी दोन दिवस आठ ते १० सेंमी. पाणी ठेवावे म्हणजे रोपे सहज उपटता येतात. गादमाशीच्या नियंत्रणाकरता चार गुंठय़ातील नर्सरीला ५०० ग्रॅम फोरेट रोपे उपटायच्या १० दिवस आधी फेकावे. रोप उपटण्याच्या दोन-तीन दिवस आधी मोनोक्रोटोफॉस अधिक बाविस्टिन अधिक युरियाची फवारणी करावी. २५ दिवस वयाचे रोप लावणीस योग्य असते.
लागवड
लावणीपूर्वी चिखलणीच्या वेळी रासायनिक खत टाकून चिखलणी करावी व नंतर सरळ व उथळ, २.५ ते ३.५ सेंमी खोलीवर लावणी करावी. दोन ओळींतील अंतर २० सेंमी व दोन चुडांमधील अंतर १५ सेंमी ठेवावे. एका चुडात दोन ते तीन रोपे लावावी. (संकरित भाताकरता एका चुडात एक किंवा दोनच रोपे लावावी.)
रासायनिक खते
धानाच्या पिकास एकरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फूरद व २५ किलो पालाश द्यावे. यापैकी निम्मे नत्र व संपूर्ण स्फूरद आणि पालाश म्हणजेच दोन बॅग १०:२६:२६ अधिक ३० किलो युरिया अधिक १० किलो झिंक किंवा ५० किलो डीएपी अधिक ४० किलो म्युरेट ऑफ पोटॅश अधिक २५ किलो युरिया चिखलणीच्या वेळी द्यावे व उरलेले निम्मे नत्र दोन हप्त्यांत म्हणजे फुटवे फुटण्याच्या वेळी (युरिया २५ किलो) व लोंबी येण्याच्या सुरुवातीला (युरिया २५ किलो) द्यावे.
पाणीव्यवस्थापन
लावणीपासून मुळे चांगली रुजेपर्यंत शेतात फक्त २.५ सेंमी पाणी राहील अशी व्यवस्था करावी. त्यानंतर दाणे पक्व होईपर्यंत पाच सेंमी पाणी ठेवावे. नंतर पाणी हळूहळू कमी करून कापणीपूर्वी १० दिवसआधी संपूर्ण पाणी बाहेर काढून टाकावे.
कीड व रोगनियंत्रण
धानामध्ये तुडतुड्यांच्या नियंत्रणाकरता, ब्युप्रोफेझिन म्हणजेच फ्लोटिस किंवा अ‍ॅप्लॉड या कीटकनाशकाची फवारणी करावी. खोडकिडय़ाकरता एकरी ३० ते ४० मिली फेम किंवा केल्डान किंवा मेटॅडोर या कीटकनाशकांची फवारणी करावी. विविध रोगांकरिता कॉपर ऑक्सिक्लाराइड किंवा टिल्ट+स्ट्रेप्टोसायक्लीनवरील कीटकनाशकात मिसळून फवारावे. खोडकिडय़ाकरता फवारणी शक्य नसल्यास रोपणीनंतर ३०-३५ दिवसांनी पादान दाणेदार (कारटाप हायड्रोप्लोराइड) एकरी ७-८ किलो जमिनीत टाकावे.
शिफारस
कोमल १०१ : मध्यम बारीक दाणा, ११० ते १२० दिवस कालावधी, दणकट वाण, स्वादिष्ट मोकळा भात.
सिल्की २७७ : संकरित वाणपेक्षाही जास्त उत्पन्न, पीक लोळत नाही, दिसायला आकर्षक, जाड दाणा.
चंदन २१ : बासमती हायब्रिड भात, बारीक व मध्यम दाणा.
थंडर १४ : सॉलिड फुटवे, अधिक उत्पन्न.
(लेखक कृषीधन सीड्सचे संचालक आहेत.)


Read More »

कोकणात पर्यटकांच्या कलाने होतेय पिकाचे नियोजन

कोकणाला विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेली आहे. पर्यटकांना या भागाचे नेहमीच अप्रूप राहिले आहे.
शिवनारी – कोकणाला विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेली आहे. पर्यटकांना या भागाचे नेहमीच अप्रूप राहिले आहे. यामुळे येथील स्थानिकांना रोजगाराचे नवे साधन तर उपलब्ध झाले आहेच, पण त्याबरोबरीने येथे पिकणा-या शेतमालालाही बाजारपेठ मिळू लागली आहे. उन्हाळी शेती म्हणून कोकणपट्ट्यात कलिंगड, काकडी यांसारख्या उन्हाची धग कमी करणा-या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. उन्हाळ्यात समुद्रकिना-यांची सैर करण्यासाठी कोकणात दाखल होणा-या पर्यटकांकडून या पिकांना मोठी मागणी मिळत आहे. आता शेतकरीही हा पर्यटनाचा हंगाम डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या पिकाचे नियोजन करू लागले आहेत. यातून त्यांना चांगला हुरूप मिळाला असून काही शेतक-यांनी तर स्वीटकॉर्नसारख्या पिकाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.
दापोली तालुक्यात हेक्टरी ३५ टन उत्पन्न देणा-या कलिंगडाची लागवड सध्या जोर धरत आह़े पर्यटनाच्या हंगामात या कलिंगडाला मागणी वाढली आहे. गेल्या महिन्यात कलिंगडाला प्रति किलो १५ रुपये दर मिळाला़ आता कलिंगडाचा हंगाम संपत आल्यामुळे दर पुन्हा एकदा वधारले आहेत. प्रति किलो २५ रुपये भाव मिळत आहे. यामुळे उशिरा लागवड केली तर हेक्टरी साडेतीन लाख रुपये जास्तीचे पैसे सहज मिळू शकतील, असे गणित शेतकरी मांडत आहेत़.
दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात कोकणातील विविध ठिकाणी लाखो पर्यटक भेट देतात़ त्या पर्यटनातून इतर व्यवसायांबरोबरच आता शेतक-यांनाही नफा कमावण्याची संधी मिळत आहे. कमी वेळेत येणारे आणि या उष्ण हवामानात पर्यटकांसाठी उपयुक्त ठरेल, असे कलिंगड आणि स्वीटकॉर्नचे (मधुमका) पीक इथला शेतकरी घेऊ लागला आह़े समूह गटांमार्फत १०-१५ शेतक-यांना एकत्र करून कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न घेणे, त्यामुळे शक्य झाले आहे. कलिंगडाची लागवड या परिसरात तर झाली आह़े. पण त्याचबरोबर गेल्या १५-२० वर्षापूर्वी भारतात दाखल झालेल्या आणि पर्यटकांची खास पसंती असलेल्या स्वीटकॉर्नची अर्थात अमेरिकन मक्याची लागवडही इथे होऊ लागली आह़े येथील शेतकरी उदय जोशी यांनी आपल्या शेतात ही स्वीटकॉर्नची लागवड केली आहे. कोकणात येणा-या पर्यटकांचा विचार करूनच त्यांनी ही स्वीटकॉर्नची लागवड थोडी उशिराच केली आह़े. सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या केळशीमध्ये उन्हाळय़ात पर्यटक मोठय़ा संख्येने गर्दी करतात़ यानुसार नियोजन केलेल्या पिकाच्या काढणीचा हंगाम लवकरच सुरू होईल, असे जोशी यांनी सांगितल़े.
स्वीटकॉर्न ६५ ते ८० दिवसांत येणारे पीक आह़े. त्यामुळे शेतक-यांना ४२ दिवस तरी त्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल अशीच आखणी करण्यात आली आह़े. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी लागवड केलेल्या स्वीटकॉर्नला स्थानिक बाजारात चांगली मागणी आह़े त्याच्या एक किलो बियाण्याची किंमत दोन हजार रुपये आह़े मक्याची योग्य निगा राखली गेली तर त्याच्या माध्यमातून २२ ते २८ हजार रुपये सहज मिळवता येऊ शकतात, असे उदय जोशी यांनी स्पष्ट केल़े. केळशी येथील अशाच काही शेतक-यांनी एकत्र येऊन समूह शेतीत कलिंगड आणि स्वीटकॉर्नची (अमेरिकन मका) लागवड केली. त्याच उत्पादन नियोजनाप्रमाणे आता ऐन पर्यटनाच्या मोसमात सुरू झाल्याने शेतकऱ्यांना एरवीपेक्षा जास्त नफा मिळत आह़े.

Read More »

बांबूपासून एकरी दीड लाखाचे उत्पन्न

बांबू लागवड ही कमी मेहनतीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी शेती आहे. कोकणातील हवामान आणि जमीन बांबू लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
कणकवली – बांबू लागवड ही कमी मेहनतीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी शेती आहे. कोकणातील हवामान आणि जमीन बांबू लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे येथे बांबूचे व्यावसायिक उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येऊ शकते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत बांबू लागवडीपासून चांगले उत्पन्न मिळवता येईल. कोकणातील शेतक-यांना नगदी पिकाचा चांगला पर्याय समोर येत असून कृषी विभाग, बँका व वनविभाग यांनी पाठबळ मिळाल्यास शेतक-यांची आर्थिक उन्नती वेगाने होण्यास मदत होईल. बांबूपासून एकरी एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न सहज मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हस्तकला, शेती, फर्निचर, खाद्य, बांधकाम, विविध वस्तू, वाद्यनिर्मिती, कागद उद्योग यांच्यासाठी बांबूचा उपयोग होतो. अलीकडे बांबूचा उपयोग वीजनिर्मितीसाठीही केला जात आहे. सध्या विजेचा तुटवडा जाणवत आहे. जर बांबूचा उपयोग वीजनिर्मितीसाठी होत असेल तर शेतक-यांनी बांबू लागवड करून देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. वर्षानुवर्षे दुर्लक्षित जमिनीवर बांबू लागवड होऊ शकते. शिवाय बांबूसाठी खतपाणी घालावे लागत नाही व निगा राखावी लागत नाही. तरीही बांबू वर्षाकाठी आपल्याला ६० हजारांपर्यंत उत्पन्न मिळवून देते. कोकणात मोठ्या प्रमाणात पडिक जमिनी आहेत. कारण कोकणातील बहुतेक जमीनमालक हे मुंबईत राहतात. या पडिक जमिनीमध्ये बांबू लागवड केल्यास आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करता येते. शिवाय कोकणात जास्त पाऊस पडतो व जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. ही धूप थांबवण्यासाठी बांबू महत्त्वाची भूमिका बजावते. नदीकाठी जर बांबूची लागवड असेल तर त्या नदीकाठच्या जमिनीची धूप होत नाही.
सिंधुदुर्गात बांबू लागवड करण्यासाठी एकनाथ गावडे गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करत आहेत. बांबू ही जलद गतीने वाढणारी, हवामान बदलाला अनुरूप, रोग व किडीला बळी न पडणारी वनस्पती असल्याचे गावडे यांनी सांगितले. बांबू ही वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे इतर वनस्पतींच्या तुलनेत चारपट जास्त प्रमाणात शोषण करते व मोठय़ा प्रमाणात जैवभार निर्माण करते. शेतकऱ्यांना रोजगार योजनेशी निगडित खाजगी, पडिक जमिनीवर वृक्षलागवड व वैरण विकास योजनेंतर्गत अनुदान दिले जाते.
शेतक-यांचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतींना इको व्हिलेजनिर्मितीसाठी सुधारित बांबूची रोपे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बचत गटामार्फत बांबूपासून विविध वस्तू निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यात यावेत, अशी मागणी एकनाथ गावडे यांनी केली आहे.
बांधकाम, फर्निचर, कागदनिर्मितीबरोबरच बांबूचा वापर वीजनिर्मितीसाठी होत आहे. ऑस्ट्रेलिया, युरोप व आफ्रिकेमध्ये भारतीय बांबूची निर्यात होते. बांबूपासून तयार होणारा जैवभार इंधन स्वरूपात वीजनिर्मितीसाठी होत आहे. उसाप्रमाणे बांबूला जमीन व हवामानाची गरज आहे. मात्र कोकणच्या हवामानाचा विचार केल्यास कोकणात बांबू लागवड चांगल्या प्रकारे होऊ शकते. बांबू हा नाशवंत माल नसून त्याची तोडणी केव्हाही करता येते. उसाप्रमाणे बांबू लागवडीसाठी मजुरांची आवश्यकता नाही. शिवाय उसाप्रमाणे बांबूची पुनर्लागवडीची गरज नाही. फक्त एकदाच लागवड करायची व आयुष्यभर उत्पन्न घ्यायचे अशी ही बांबू लागवड आहे. बांबू लागवडीसाठी खत व पाणी याचा वापर केल्यास दरवर्षी ४० ते ६० टन बांबू काठीचे उत्पादन मिळते. बांबूची तोडणी एक वर्षापासून दोन वर्षापर्यंत केव्हाही करता येते. ज्या जमिनीत ऊस येत नाही त्या ठिकाणी बांबू लागवड चांगल्या प्रकारे होते. उसाच्या सहा एकर लागवडीतून मिळणारा जैवभाव हा बांबू एक एकर लागवडीतून मिळवता येतो. बांबू लागवडीपासून जमीन सकस, कसदार व अधिक पिकावू तयार होते. बांबूमध्ये पहिल्या वर्षानंतर तण उगवत नाही. तणाचे नैसर्गिक नियंत्रण होते.


Read More »

लातूरमध्ये १२७ बंधारे नादुरुस्त

लातूर जिल्ह्यातील १२७ कोल्हापुरी बंधारे व पाझर तलाव नादुरुस्त आहेत. याच्या दुरुस्तीसाठी पावणेआठ कोटी रुपयांची गरज आहे.
लातूर - जिल्ह्यातील १२७ कोल्हापुरी बंधारे व पाझर तलाव नादुरुस्त आहेत. याच्या दुरुस्तीसाठी पावणेआठ कोटी रुपयांची गरज आहे. सध्या या बंधा-यांची दुरुस्ती सरकारच्या लालफितीच्या कारभारात अडकली आहे. उन्हाळा संपत आला तरी यासाठी निधीच उपलब्ध झालेला नाही. पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे बंधा-यांच्या दुरुस्तीसाठी कामे कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे व शेतक-यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात सध्या ७१७ सिंचन, कोल्हापुरी, पाझर, गावतलाव आहेत. या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता ७९ हजार ६४ दशलक्ष लिटर आहे. तर सिंचन क्षमता १७ हजार १२२ हेक्टरची आहे. यात सर्वाधिक २४८ कोल्हापुरी बंधारे आहेत. त्यापैकी ७२ कोल्हापुरी बंधारे नादुरुस्त आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी चार कोटी १३ लाख ३९ हजार रुपयांची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने लघु पाटबंधारे विभागाकडे या निधीची मागणी करण्यात आली आहे. पण पावसाळा सुरू होण्यास आता काही दिवस शिल्लक असतानाही हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.
जिल्ह्यात २०१० मध्ये झालेल्या अतिवृष्टीत काही तलाव फुटले होते. त्यांच्या दुरुस्तींसाठीचा निधी २०१३ साल उजाडले तरी उपलब्ध झालेला नाही. यात यलदरी तलावासाठी ११ लाख ७७ हजार, खडक उमरगासाठी नऊ लाख ५८ हजार, भूतमुगळीसाठी साडेतीन लाख, ताजपूरसाठी १३ लाख ७४ हजार, सय्यदपूरसाठी तीन लाख, नळगीरसाठी ३० लाख ९८ हजार, दावणगावसाठी ५ लाख, असराची वाडीसाठी १० लाख अशा आठ तलावांच्या दुरुस्तीसाठी ८७ लाख ५७ हजारांचा निधी लागणार आहे. हा निधी देखील तीन वर्ष होऊन गेले तरी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे गेली तीन वर्ष या तलावात आलेले पाणी वाहून जात आहे.
जिलत सध्या ७२ कोल्हापुरी बंधारे नादुरुस्त आहेत. यात अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक १५ कोल्हापुरी बंधारे आहेत. त्यापाठोपाठ लातूर तालुक्यात १२, उदगीर ११, औसा सात, निलंगा सहा, शिरूर अनंतपाळ चार, देवणी सात व चाकूर तालुक्यातील दोन कोल्हापुरी बंधारे नादुरुस्त आहेत. या बहुतांश बंधा-यांच्या पाया बांधकामातील गळती दुरुस्ती करणे व बाजुची माती कामे करण्याची गरज आहे. पण यासाठी निधीच उपलब्ध होत नाही.

Read More »

कोकणात रातांबा दुर्लक्षितच

कोकणात विपुल प्रमाणात असणारा रातांबा कायम दुर्लक्षितच राहिल्याचे दिसून येते.
रत्नागिरी – आंबा, काजू आदी फळांकडे कोकणातील शेतकरी व्यावसायिकदृष्ट्या पाहतात. मात्र, कोकणात विपुल प्रमाणात असणारा रातांबा कायम दुर्लक्षितच राहिल्याचे दिसून येते.
रातांबा फळाची पिकलेली बी कुठेही टाकली तरी ती सहजपणे उगवते. पावसाळ्यात हे झाड जोमाने वाढते. दोन-तीन वर्षात फळधारणा होते. पिकलेल्या रातांब्याच्या सालीपासून कोकम सरबत बनवतात. शिवाय बियांपासून मिळणारा अर्कही वेदनाशामक असतो. ही वनस्पती सरळ वाढते. कुठेही फांद्यांचा आडवा-तिडवा विस्तार नसतो. पाण्याची आवश्यकता नसल्याने कोकणात डोंगराळ भागातही ही झाडे वाढलेली दिसतात. कोकणात कोकम सरबत बनविण्याचा उद्योग घरोघरी सुरू असतो. मात्र, व्यावसायिकदृष्ट्या कोकम सरबताचा उद्योग करणारे मोजकेच आहेत.
कोकम सरबताप्रमाणे सालीच्या कोकमालाही चांगली मागणी आहे. कधीही कोकम सरबताची मागणी वाढते. मात्र, रातांबे शिल्लक नसतात. जेवढी झाडे अस्तित्वात आहेत, त्यांची फळे काढून विकली जातात. मात्र, नवीन लागवड केली जात नाही. कोकणातील शेतीत अननस, ऊस, गहू आणि पालेभाज्यांपासून सूर्यफुलापर्यंतचे उत्पादन घेण्याचे प्रयोग यशस्वी झाले. मात्र, पारंपरिक पिकांकडे दुर्लक्ष होत आहे. शेतक-यांसाठी काम करणा-या संस्थांनी जनजागृती करण्याची गरज आहे. कोकणातील शेतक-यांनी मानसिकता बदलल्यास व रातांबा या फळझाडाची लागवड केल्यास यातून चांगले आर्थिक उत्पन्न शेतक-यांना मिळू शकते.


Read More »

'शिवरायांनी दुष्काळग्रस्तांना दिले होते शून्य टक्क्याने कर्ज'

दुष्काळात होरपळणा-या जनतेला शिवरायांनी अन्नधान्य पुरवले. शेतक-यांना जनावरे, बी-बियाणे, औजारे घेण्यासाठी शून्य टक्क्याने कर्ज उपलब्ध करून दिले, अशी माहिती इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी दिली.
पुणे – शिवाजी महाराजांचा रयतेबद्दल कणव होती, त्यांनी नि:स्वार्थी आणि आदर्श राज्यकारभार केला. दुष्काळात होरपळणा-या जनतेला अन्नधान्य पुरवले. शेतक-यांना जनावरे, बी-बियाणे, औजारे घेण्यासाठी शून्य टक्क्याने कर्ज उपलब्ध करून दिले, अशी माहिती इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी दिली. वक्तृत्वोजक सभेच्या सहकार्याने साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर वसंत व्याख्यानमालेत 'शिवचरित्रातून आज काय शिकावे' या विषयावर कोकाटे बोलत होते.
हिंदवी स्वराज्य हे केवळ भोसले घराण्याचे नव्हते. तसेच मराठी भाषिकांचे किंवा हिंदूंचे नव्हते. ते खरे रयतेचे राज्य होते, त्यामुळे त्यांच्या सन्यात आणि राज्यात अठरापगड आणि बारा बलुतेदार सुखी आणि समाधानी होते आणि म्हणूनच बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी काशीद यांच्यासारख्या हजारो मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपले प्राण पणाला लावले. कष्टकरी शेतक-यांचे राज्य यावे, ही शिवरायांची इच्छा होती. समतेचे राज्यनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेत, मतभेद न ठेवता आपले राज्य चालवले, असे त्यांनी सांगितले.
स्त्रियांवर वाढलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हिरकणी, सुरतेच्या सरदाराची सुन, असे अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना शिकविले तर स्त्रियांवर अन्याय होणार नाहीत. तसेच त्यांची अर्थनिती, राजनीतीचा अवलंब केल्यास आर्थिक आणि सामाजिक विषमतेचे प्रश्न मार्गी लागतील. आजची लढाई तलवारीची नाही तर संगणकाची आणि लेखणीची आहे. आज रायगड, राजगड सर करण्याची वेळ नाही. माध्यम गड, अर्थनीती गड, न्यायालय गड, प्रशासन गड, सरकार गड सर केले पाहिजेत. मानवता आणि समतेची अमूल्य देणगी शिवचरित्रातून शिकायला मिळते, असे कोकाटे म्हणाले.

Read More »

तपास आता एनआयएकडे

छत्तीसगड नक्षलवादी हल्ला प्रककरणाची सूत्रे आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आली आहेत.
नवी दिल्ली – छत्तीसगड नक्षलवादी हल्ला प्रककरणाची सूत्रे आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आली आहेत.
केंद्रीय गृहसचिव आर.के. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएचे एक पथक सोमवारी छत्तीसगडला रवाना झाले आहे. तपासानंतरचं अहवाल तयार करण्यात येईल.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा निषेध केला होता. या घटनेचा तपास एनआयएकडे देण्यासंदर्भात केंद्र सरकारलाही छत्तीसगड राज्य सरकारने हिरवा कंदील दिला होता.
दरम्यान, छत्तीसगडच्या जगदलपूर जिल्ह्यातील दर्भागती खो-यातून काँग्रेसच्या नेत्यांच्या वाहनांचा ताफा जात असताना नक्षलवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. त्यात माजी मंत्री महेंद्र कर्मा यांच्यासह चार जण ठार झाले तर २८ जणं गंभीर जखमी झाले आहेत.


परिवर्तन यात्रा : नंदकुमार पटेलांची हत्या »


परिवर्तन यात्रेतून अपहरण केलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश याची नक्षलवाद्यांनी हत्या केली.…
Read More »
श्रीनिवासन यांचा मिडियावर 'षटकार'

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजीनामा देण्यासाठी मिडिया माझा पाठलाग करत असल्याचा आरोप बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी लावला आहे.
चेन्नई – आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील दोषींना वाचवले जाणार नाही असे सांगत बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही असे एन.श्रीनिवासन यांनी रविवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र याच प्रकरणी राजीनामा देण्यासाठी मिडिया माझा पाठलाग करत असल्याचा आरोप श्रीनिवासन यांनी लावला आहे.
श्रीनिवासन यांचा जावई आणि चेन्नई सूपर किंग्जचा संघमालक गुरुनाथ मय्यपनला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आयपीएलचा सहावा हंगामातील अंतिम सामन्यादरम्यान लोकांनी श्रीनिवासन यांची चेष्टा केली होती. त्यामुळे त्यांनी आपला राग मिडियावर काढला आहे.
मी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील माझी भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही राजीनाम्यासाठी मिडिया आपला पाठलाग करत आहे. राजीनामा देण्यासाठी माझ्याकडे कोणतेही कारण नाही, अशा शब्दांत श्रीनिवासन यांनी आपले मत व्यक्त केले.
बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी मय्यपनच्या सहभागामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही. बीसीसीआय आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. या प्रकरणातील दोषींवर बीसीसीआय कठोर कारवाई करणार आहे असे त्यांनी ठासून सांगितले होते. दरम्यान घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीमध्ये अरुण जेटली, राजीव शुक्ला, संजय जगदाळे, अजय शिर्के आणि रवि शास्त्री यांचा समावेश आहे.


'राजीनामा देणार नाही'- श्रीनिवासन »


एन. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचा पुनरुच्चार रविवारी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत केला.

Read More »
नऊ बूकींना गुजरात,गोव्यातून अटक

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात गुजरात आणि गोव्यातून सोमवारी नऊ बूकींना अटक करण्यात आली आहे.
मुंबई – स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सोमवारी तीन बूकींना अहमदाबाद येथील एका मंदिरातून अटक करण्यात आली.तर गोव्यातही अंदाजे सहा बूकींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
अनिल कुमार,उत्तमचंद आणि हर्षद रमेश या तिघांना साबरमती भागातील रामजी मंदिर येथून अटक करण्यात आली. या तिघांकडून लॅपटॉप,टीव्ही,सात मोबाईल फोन्स आणि अंदाजे १६ लाख ७८० रुपयांच्या रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यांना सोमवारी स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
तर दुसरीकडे, गोव्यातही आज सहा बूकींना रंगेहाथ पकडण्यात गोवा पोलिसांना यश आले. गेल्या ४५ दिवसांपासून हे सहाजण सट्टा खेळत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पणजीपासून अंदाजे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅन्डोलिम भागात एका भाड्याच्या घरात हे सहाजण राहत होते. त्यांच्याकडून अंदाजे दोन डझनांपेक्षा जास्त मोबाईल्स जप्त करण्यात आले. हे सहाही जण मुळचे मुंबईचे आहेत. गोवा आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करण्यात आली.


श्रीनिवासन यांचा मिडियावर 'षटकार' »


स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजीनामा देण्यासाठी मिडिया माझा पाठलाग करत असल्याचा आरोप बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी लावला आहे.
Read More »
'राजकीय नेत्यांची सुरक्षा महत्वाची'

नक्षलग्रस्त राज्यांतील राजकीय व्यक्तींच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी दिले आहेत.


संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली – छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, नक्षलग्रस्त राज्यांतील राजकीय व्यक्तींच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी दिले आहेत.
केंद्रातील तसेच राज्यातील राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा सविस्तरपणे फेरआढावा घेण्यात यावा. त्यांच्या राजकीय दौ-यात अतिरिक्त सुरक्षेची गरज भासल्यास ती तात्काळ पुरवण्यात यावी असे गृहमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. माओवाद्यांच्या धमक्यांमुळे राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमावर मर्यादा येऊ नये याची काळजी घेण्यात यावी असेही या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या हल्ल्यात महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा यांचा मृत्यू झाला. तर विद्याचरण शुक्ल यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Read More »

दोषींवर कडक कारवाई होणार – जेटली

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी असलेल्या क्रिकेटपटूंवर कडक कारवाई केली जाईल असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष  अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली – स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी असलेल्या क्रिकेटपटूंवर कडक कारवाई केली जाईल असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे सदस्य अरुण जेटली  यांनी स्पष्ट केले.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा तपास ठराविक कालावधीतच पूर्ण केला जाईल. बीसीसीआयचे भष्ट्राचार विरोधी पथक या प्रकरणाचा कसून तपास करत आहे,असे जेटली यांनी सांगितले.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला १५ दिवसांची मुदत दिली आहे. या १५ दिवसांत तपास पूर्ण करुन बीसीसीआयला आपला अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करणे अपेक्षित आहे. या प्रकरणात श्रीशांतसह अनेक अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या अनेक बूकींचा समावेश आहे.


Read More »


टोलविरोधात कोल्हापूरमध्ये सोमवारी टोलविरोधी कृती समितीने कोल्हापूर बंद पुकारला आहे.
कोल्हापूर – टोलविरोधात कोल्हापूरमध्ये सोमवारी टोलविरोधी कृती समितीने कोल्हापूर बंद पुकारला आहे. या बंद दरम्यान काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण कोल्हापूरमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला.
हा बंद यशस्वी करण्यासाठी कोल्हापूरमधून ठिकठिकाणी मोटारसायकल यात्रा काढण्यात आली. कोल्हापूरमध्ये टोलवसूलीचे कंत्राट आयआरबी कंपनीला देण्यात आले आहे. भरमसाठ टोल आकारुनही कोल्हापूरमधील रस्त्याची स्थिती जैसे थेच आहे. याविरोधात आंदोलनं सुरु आहेत. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळेच कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली असल्याचे कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले.

Read More »

घरकूल घोटाळा : ४८ जणांविरुद्ध आरोप निश्चित

घरकूल घोटाळा प्रकरणी सोमवारी गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले.  
जळगाव – घरकूल घोटाळा प्रकरणी सोमवारी गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले.  मात्र न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार सुरेशदादा जैन यांच्याबाबतीतला निर्णय २९ मे रोजी घेण्यात येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुनावणीदरम्यान  अनुपस्थित राहण्याची परवानगी सुरेशदादा जैन यांनी मागितली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Read More »

यशस्वी भव:

सीबीएसस्सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याचा आनंद व्यक्त करताना मोरादाबाद येथील विद्यार्थिनी


Read More »

पंतप्रधानांचे चिंतन

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी




Read More »

श्रद्धांजली…

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ४९ व्या पुण्यतिथीनिमित्त दिल्लीतील शांतीवन समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी



Read More »

…पोटासाठी मीठ-भाकर

मुंबईच्या पूर्व दृतगती महामार्गावर मीठागरात काम करणारा कामगार…


Read More »

खारुताईंचे प्रेम…

नवी दिल्ली येथील पंडित जवाहरलाल नेहरु यांचं समाधीस्थळ असलेल्या शांतीवन येथील खारुताईंचे टिपलेले हे प्रेमळ दृश्य


Read More »

अलविदा…

आयपीएलच्या हंगामातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटच्या चाहत्यांना अभिवादन करताना भावूक झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर





Read More »

प्रीतीची प्रकृती अद्यापही चिंताजनक

वांद्रे येथे अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीती राठीची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले.

मुंबई- वांद्रे येथे अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीती राठीची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले. अ‍ॅसिडमुळे तिचे फुफ्फुस निकामी झाले असतानाच आता तिला मुत्रपिंडाचाही त्रास होत आहे. तिच्या शरिरातील पांढ-या रक्तपेशीही कमी होत आहेत.
एका नळीच्या माध्यमातून प्रीतीच्या पोटात द्रवपदार्थ सोडण्यात येत आहे. तिचा रक्तदाब, मुत्रपिंडाचे काम संतुलित राहावे याकरिता डॉक्टर प्रयत्न करत आहेत. रक्तशुद्धीकरणाचे काम सुरळीत पडावे, यासाठी मशिनचा वापर केला जात आहे. रुग्णालयील फिजीशन, हार्ट, गॅस्ट्रो सर्जन, थोरॅसिक सर्जन असे मिळून १४ डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत.
सोमवारी तिची ब्रोन्कोस्कोपी केली जाणार होती, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी ते करणे टाळले आहे. तसेच तिच्या शरिरातील कमी झालेल्या पांढ-या रक्तपेशी चढवण्यात येत आहेत. तिचा डाव्या डोळ्याची दृष्टीही कमी होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्रीतीची प्रकृती सुधारल्यानंतर तिला कृत्रिम त्वचा लावली जाईल असे रुग्णालयाचे वरिष्ठ प्लास्टीक सर्जन डॉ. अशोक गुप्ता यांनी सांगितले. अ‍ॅसिडमुळे प्रीतीची अन्न नलिका जळाल्याने तेथे छिद्र पडले आहे. श्वसननलिकेला ग्लु लावल्याने श्वसन नलिकेचे एक छिद्र तात्पुरते बुजवण्यात आल्याचे डॉ. सागर साकळे यांनी सांगितले.

Read More »

पुण्याचा सट्टेबाज युरोपला पळाला, दोन अटकेत

गुन्हे शाखेच्या रडारवर असलेला पुण्यातील सट्टेबाज किशोर बादलानी उर्फ किशू पुणे याने अटकेच्या भीतीने भारतातून पलायन केले.

मुंबई- गुन्हे शाखेच्या रडारवर असलेला पुण्यातील सट्टेबाज किशोर बादलानी उर्फ किशू पुणे याने अटकेच्या भीतीने भारतातून पलायन करून युरोप गाठल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या रमेश व्यास याच्याकडील ३० पैकी २ दूरध्वनी लाईनवरून तो पाकिस्तानी सट्टेबाजांच्या संपर्कात होता, असे समजते. दरम्यान, किशू पुणेच्या दोन साथीदारांना याप्रकरणी गुन्हे शाखेने रविवारी रात्री पुण्यातून अटक केली आहे.
गुन्हे शाखेचे मालमत्ता कक्ष व गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने काळबादेवी परिसरातील लालवाणी मेन्शनच्या दुस-या मजल्यावरील रुम नंबर २७ येथून अशोक लजपतराय व्यास (३२) याच्यासह रमेश बजरंगलाल व्यास (५२), पांडुरंग गोविंद कदम (४१) या दोघांना अटक केली होती. त्यातील रमेश व्यास हा सट्टेबाजी क्षेत्रातील सराईत असून पाकिस्तान व दुबईतील बुकींचे दूरध्वनी भारतीय बुकींना जोडून देत होते. त्यातील दोन दूरध्वनी लाईनवरून किशू पुणे हा पाकिस्तानी सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिसही सट्टेबाजीप्रकरणी किशू पुणेचा शोध घेत होती. त्याची कुणकुण लागल्यानंतर त्याने गेल्या आठवड्य़ात भारत सोडून युरोप गाठल्याचे याप्रकरणी अटक केलेल्या त्याच्या दोन साथीदारांच्या चौकशीतून पुढे आले आहे. त्यामुळे आता त्याच्याविरोधात गुन्हे शाखा रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्याच्या तयारीत आहे.


नऊ बूकींना गुजरात,गोव्यातून अटक


स्पॉट फिक्सिंग प्रकरणात गुजरात आणि गोव्यातून सोमवारी नऊ बूकींना अटक करण्यात आली आहे.
यापूर्वीही गुन्हे शाखेच्या प्रकरणात वॉण्टेड असलेले दोन सट्टेबाज पवन जयपूर व संजय जयपूर या दोघांनी अटकेच्या भीतीने दुबई गाठले होते. त्यांना पळवण्यात बीग बॉस फेम विंदू दारासिंग याने मदत केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने किशू पुण्याचे दोन साथीदार देवेश शर्मा व किशोर पावलानी यांना पुण्यातून रविवारी रात्री उशीरा अटक केली. ते किशू पुणा या सट्टेबाजाच्या वतीने पाकिस्तानातील बुकींच्या संपर्कात होते.
Read More »
सेन्सेक्स ३२६ अंकांनी वधारला

रिलायन्स, सन फार्मा आणि भारती एअरटेल यासारख्या महत्त्वाच्या कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये ३२६ अंकांची वाढ झाली.



सग्रहित छायाचित्र
मुंबई- रिलायन्स, सन फार्मा आणि भारती एअरटेल यासारख्या महत्त्वाच्या कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये ३२६ अंकांची वाढ झाली. यामुळे निर्देशांकाने पुन्हा एकदा २०,००० चा टप्पा पार केला आणि तो २०,०३०.७७ अंकावर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात अर्थात निफ्टीतही १०० अंकांची वाढ झाली आणि तो ६,०८३.१५ अंकावर बंद झाला.
ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि नैसर्गिक वायू, दूरसंपर्क या क्षेत्रातील शेअर्सला मागणी होती. सेन्सेक्समधील हेवीवेट कंपनी असलेल्या रिलयान्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सर्वाधिक ५ टक्क्याची वाढ झाली. तसेच सन फार्माही ४.६६ टक्क्यांनी वधारला.
गेल्या आठवडय़ात गुंतवणूकदरांनी केलेल्या नफेखोरीने सेन्सेक्सची मोठी दमछाक झाली होती. मात्र या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी करत सेन्सेक्सने ती कसर भरून काढली असल्याचे इन्व्हेंचर ग्रोथच्या अध्यक्ष नागजी. के. रिटा यांनी सांगितले.

Read More »

सीबीएसईच्या बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसईच्या बारावीचा निकाल ८२.१० टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

मुंबई- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) मार्च-एप्रिलदरम्यान घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सीबीएसईच्या बारावीचा एकुण निकाल ८२.१० टक्के इतका लागला असून सर्वात अधिक निकाल चेन्नई विभागाचा आहे. या विभागात ९१.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र मागील वर्षाप्रमाणेच यंदाही सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थिनीच अव्वल ठरल्या आहेत. यात एकुण निकालाच्या ८७.९८ टक्के विद्यार्थिनी तर ७७.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बारावीच्या परीक्षेला देशभरातून ९ लाख ४४ हजार ७२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सीबीएसईच्या परीक्षेत चेन्नई विभागात महाराष्ट्राचा एकुण निकाल ९३.८७ टक्के लागला आहे. राज्यातून या परीक्षेला ११ हजार २४७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १० हजार ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ५ हजार ८१८ विद्यार्थी तर ४ हजार ७३९ विद्यार्थिनींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचा एकुण निकाल ९२.६३ तर विद्यार्थिनीचा तब्बल ९५.४३ टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत सर्वात अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुंबईतील केंद्रीय महाविद्यालयांच्या शाळांतील आहे.
सीबीएसईच्या बारावीची परीक्षा चेन्नई विभागात ४६४ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेला एकुण ७७ हजार ६१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७१ हजार २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात ३३ हजार २१४ विद्यार्थीनी तर ३८ २हजार ५७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून ते १० जूनपर्यंत समुदेशनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी सीबीएसईशी संबंधित असलेल्या सरकारी, खासगी विद्यालयाचे ४५ पा्रचार्य, प्रशिक्षित समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ आणि समाजशास्त्रातील तज्ज्ञ समुपदेशसाठी असलेल्या हेल्पलाईनवर उपलब्ध असतील. यात भारतात ३७ आणि भारताबाहेर जपान, कुवेैत, दोहा, कतार, सऊदी अरब, युएई आणि ओमान सल्तनत येथे ८ जण उपलब्ध असतील.
हेल्पलाईन
भारताच्या कोणत्याही राज्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईकडून हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात येते. यंदा ही हेल्पलाईन १८००११८००४ या क्रमांकावर उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि इतर येणा-या अडचणी, चिंता याविषयी या हेल्पलाईनवरून थेट प्राचार्य अथवा मार्गदर्शकांशी संवाद साधता येईल.
सीबीएसईच्या तारखांचा गोंधळ
सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या तारखांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची अडचण झाली. तर दहावीचा निकालही रविवारी संध्याकाळी अचानक जाहीर करण्यात आला यामुळे सीबीएसईच्या तारखांच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला.

Read More »

प्रहार बातम्या – २७ मे २०१३
नमस्कार, प्रहार बातम्यांमध्ये आपलं स्वागत…..
»नक्षलग्रस्त राज्यातील राजकीय व्यक्तींच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश
» पुण्याचा सट्टेबाज युरोपात पळाला, दोन अटकेत
» सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी
» सेन्सेक्स ३२६ अंकांनी वधारला
» सचिनची आयपीएलमधून निवृत्ती जाहीर
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा… 27052013

Read More »

राशिभविष्य- २८ मे २०१३

दैनंदिन राशिभविष्य…
मेष : ऐक्याचा मंत्र उपयोगी ठरेल.



वृषभ : वाचेवर नियंत्रण ठेवावे.

मिथुन : पाणी उकळून, गाळून प्या!
कर्क : धर्मादाय संस्थांना मदत कराल.

सिंह : कायद्याचा कीस काढाल.

कन्या : भागीदाराकडून संधी प्राप्त होईल.
तूळ : 'बॅकसीट ड्राईव्हिंग' कराल.

वृश्चिक : संसारोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

धनू : जुन्याचे आग्रही असाल.

मकर : पुत्राकडून आनंदाची बातमी समजेल.

कुंभ : जमिनीचे व्यवहार कराल.

मीन : वडील भावाचे मौलिक सहाय्य मिळेल.

Read More »

राजकीय साठमारीत नाले तुंबले

राजकीय साठमारीत मागील आर्थिक वर्षातील खर्च न झालेली ५७२ कोटींची रक्कम खातेनिहाय जमा झालेली नाही.
ठाणे  - राजकीय साठमारीत मागील आर्थिक वर्षातील खर्च न झालेली ५७२ कोटींची रक्कम खातेनिहाय जमा झालेली नाही. त्यात आता ठाणे शहरात एलबीटी लागू झाल्यानंतर पालिकेच्या तिजोरीत पुरेशी रक्कमही नाही. परिणामी विकासकामांचा खोळंबा झाला असून, ३६ कोटी ३७ लाख ७८ हजार २३० रुपयांच्या नाल्यांच्या कामांनाही फटका बसल्याने या कामांच्या निविदा बंद लिफाफ्यात पडून आहेत. दरम्यान, नाल्यांच्या कामांसाठी रेडीमिक्सर मशिनची अट घातल्याने पदाधिका-यांच्या मागणीमुळे हे काम रखडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मागील वर्षी सत्तेचा तिढा लवकर न सुटल्याने पालिकेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. २०१२-१३च्या अर्थसंकल्पातील ५७२ कोटी खर्चच झाले नाहीत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही रक्कम थकबाकी म्हणून घेण्यात आली. परंतु ती रक्कम विकासकामांसाठी अद्याप इतर खात्यांकडे जमा झालेली नाही. पर्यायाने खात्यात निधी शिल्लक नसल्याने सार्वजनिक बांधकाम खाते, पाणी खाते आणि मलनिस्सारणाची कामे रखडली आहेत. या खात्यांनी विकासकामांच्या निविदा काढल्या आहेत. मात्र पैसे नसल्याने कामांचे आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यात एलबीटीला अद्याप व्यापा-यांचा थंड प्रतिसाद असल्याने या खात्यात जमा रकमही नाही.
पावसाळयापूर्वी नालेबांधणी, सफाईची कामे पूर्ण होणे गरजेचे असले तरी शहरातील घोडबंदर, वर्तकनगर, किसनगर, श्रीरंग, कळवा इत्यादी ठिकाणच्या नाल्यांची कामे करण्यासाठी पालिकेने ३६ कोटी ६७ लाख ७८ हजार रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या, परंतु कंत्राटदाराला देण्यासाठी पालिकेच्या खात्यात पैशांची तरतूद नसल्याने या निविदा अद्याप जैसे थे आहेत. शहरातील मोठया नाल्यांची कामे यापूर्वीच पूर्ण झालेली आहेत.
काही ठिकाणी अतिक्रमणामुळे नाल्याचे काम होऊ शकलेले नाही. तसेच छोटया नाल्यांचे बांधकाम शिल्लक आहे. मोठया नाल्यांची कामे करताना रेडीमिक्सर मशिनचा वापर करण्यात आला होता, परंतु ज्या ठिकाणी मशिन घेऊन जाणे कठीण आहे, त्या ठिकाणी छोटया मिक्सर मशिनद्वारे काम करावे लागणार आहे. दरम्यान, सध्या काढण्यात आलेल्या निविदेतही रेडीमिक्सर मशिनची अट घालण्यात यावी, अशी मागणी काही पदाधिका-यांनी केली असल्याने महापालिकेने आयआयटीचे मार्गदर्शन मागितले आहे.