Tuesday, September 24, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

आरोग्यदायी ओट्सचा चविष्ट नाश्ता

आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या आहारातून कित्येक महत्त्वाची धान्यं हद्दपार करत आहोत. ओट्स त्यापैकीच एक बेचव असलेलं हे धान्य. त्यामुळेच अनेक जण ओट्स खाणं टाळतात. ओट्समध्ये शरीराचं संतुलन निर्माण करणारे इतके घटक आहेत की, आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला आहारात या धान्याशिवाय पर्याय नाही.

नॉर्वे, अजटिना, रशिया, कॅनडा या भागात ओट्स या धान्याची पैदास मोठया प्रमाणावर होते. थोडंसं गव्हासारखं दिसणारं हे धान्य आता भारतीयांच्याही आरोग्याची काळजी घेण्यास सज्ज झालं आहे. ओट्सवर नुकतंच एक संशोधन झालं. त्या संशोधनातून ओट्सचे आरोग्यदायी गुणधर्म जगासमोर आले. कोरडी त्वचा, एक्झिमाचा त्रास असणा-यांनी ओट्सचा वापर आहारात केला पाहिजे. या धान्यात तंतूमय पदार्थ (फायबर), प्रथिनं (प्रोटिन्स) यांचं प्रमाण सर्वाधिक असतं. मधुमेहाचा आजार असणा-यांनी ओट्सपासून बनवलेले पदार्थ खावेत. ओट्समुळे मधुमेह नियंत्रित राहतो. वजन कमी करण्याची इच्छा असणा-यांनी, सतत भूक लागणा-यांनी त्यांच्या आहारात ओट्सचं प्रमाण वाढवावं. या तृणधान्यामुळे रक्तातील वाईट प्रकारच्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. हृदयाच्या आरोग्यासाठी ओट्स खावेत.

वाढत्या वयातील मुलांच्या आहारातील ओट्सचं प्रमाण वाढलं पाहिजे. ओट्समुळे पचनसंस्था सुधारते. त्यासाठी मुलांच्या ओट्सपासून बनवलेले पदार्थ खाण्याची सवय लावावी. हल्ली बाजारात ओट्सचं पीठ, फ्लेक्स, सत्त्व मिळू लागलं आहे. ओट्सच्या पिठाचा वापर रोजच्या कणकेत, सूप बनवताना, कटलेट, बिस्किटं बनवण्यासाठी करता येईल.


धिरडी

साहित्य – अर्धी वाटी ओट्सचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, चवीला मीठ, अर्धी वाटी दही, एक चमचा आलं-मिरची-लसूण ठेचा, गरम पाणी.

कृती – वरील सर्व साहित्य एकत्र करून पीठ भिजवावं. पीठ साधारण अर्धा तास तरी ठेवून द्यावं. धिरडी करायला घेताना पिठात मीठ घालावं. गरमागरम धिरडी चटणीबरोबर एकदम चविष्ट लागतात.

फायदे – सकाळच्या वेळी शरीराला लागणारी प्रथिनं, कबरेदकांची या पोषणमूल्यांची गरज यातून सहज भागेल. यात वापरलेल्या लसणीच्या ठेच्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. शरीरातील चरबी कमी होते.


इडली

साहित्य – सव्वा दोन वाटया तांदूळ, पाऊण वाटी उडदाची डाळ, एक चमचा मेथ्या, अर्धी वाटी जाडे पोहे, एक चमचा घोटलेली साय, दीड वाटी ओट्स फ्लेक्स, मीठ, तेल किंवा तूप.

कृती – डाळ, तांदूळ, पोहे आणि मेथ्या हे सर्व साहित्य आठ-नऊ तासांसाठी भिजवायचं. भिजवलेले पदार्थ उपसून घेऊन वाटून घ्यावं. मिश्रण १० ते १२ तासांसाठी झाकून ठेवावं. छान फुगून आल्यावर त्यात दीड वाटी ओट्सफ्लेक्स घालावेत. इडलीचं पीठ व्यवस्थित एकजीव करावं. इडल्या तयार करायला घेताना पिठात घोटलेली साय घालावी. पुन्हा एकदा पीठ एकत्र करावं. इडलीपात्राला थोडं तेल लावून त्यात इडलीचं पीठ घालावं. इडलीपात्रातून किंवा कुकरमधून इडल्या उकडून घ्याव्यात.

फायदे – या पाककृतीतून तंतुमय घटक पदार्थ, कॅल्शियम आणि प्रथिनं मिळतील. ओट्सच्या चार इडल्या खाणं म्हणजे पूर्ण जेवणच जेवल्यासारखं आहे. या इडलीत भाज्या उकडून घातल्यास त्यातील पौष्टिक घटकांत वाढ होईल. मधुमेहाचा त्रास असणा-यांनी तसंच वजन कमी करणा-यांनी ही इडली जरूर खावी.


अप्पे

साहित्य – एक वाटी ओट्स, एक वाटी मिक्स्ड भाज्या (मटार, फ्लॉवर, मका, गाजर, टोमॅटो, फरसबी), कोथिंबीर, एक चमचा आलं-मिरची पेस्ट, मीठ, तेल, एक चमचा घोटलेलं सायीचं दही, दूध किंवा गोडं ताक.

कृती - सर्व भाज्या वाफवून घ्याव्यात. तेल वगळून बाकी सर्व साहित्य एकत्र करावं. थोडंसं पाणी घालावं. मिश्रण दूध किंवा ताकात भिजवावं. पीठ तीन ते चार तासांसाठी ठेवून घ्यावं. १५ ते २० मिनिटांनी
नेहमीप्रमाणे अप्पे बनवावेत.

फायदे – शरीरासाठी गरजेचे असणारे तंतुमय घटक या धिरडयांमधून मिळतील. ताकामध्ये असणा-या लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे पोटाचं आरोग्य सुधारेल.

Read More »

गरज स्वच्छ, शुद्ध पाण्याची!

जलप्रदूषण आणि त्यातून पसरणारे जलजन्य आजार यांची कारणं शोधण्यासाठी आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रात काम करणा-या युरेका फोर्ब्स आणि जीएफके या संशोधन संस्थेने नुकतंच एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणाचं शीर्षक होतं, 'क्या आपका पानी बीमार है'! त्यातूनच जलजन्य आजार आणि पिण्याच्या पाण्याचं प्रदूषण हा गंभीर मुद्दा समोर आला..

नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणा-या जलप्रदूषणाखाली देशातील बहुतेक शहरं भरडत आहेत. त्याला मुंबईही अपवाद नाही. आपल्याकडे दरवर्षी ९८ हजार मुलं अतिसार आणि पाण्यामुळे होणा-या इतर आजारांनी त्रस्त असतात. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे केला गेलेला अलीकडचा अभ्यास असं दर्शवतो की, भारतात दरवर्षी एक लाखांहून अधिक लोक पाण्यामार्फत पसरणा-या आजारांना बळी पडतात.

या अभ्यासातून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील २० राज्ये आणि ६०० जिल्ह्यांमधील ७० दशलक्ष लोकांना भूपृष्ठावरील पाण्यातील अतिरिक्त फ्लोराइडचा धोका आहे. तर १० दशलक्ष लोकांना पाण्यातील अर्सेनिकचा.

नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणा-या गंभीर जलप्रदूषणाखाली मुंबई शहरही भरडलं जात आहे. मुंबई तसंच देशभरात होणारं जलप्रदूषण आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम यासंबंधी जाणून घेण्यासाठी आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रात काम करणा-या युरेका फोर्ब्स आणि जीएफके या संशोधन संस्थेने नुकतंच एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण केलं. 'क्या आपका पानी बीमार है' असं थेटच या सर्वेक्षणात विचारलं गेलं होतं. मुंबईतील ५९६ घरांमध्ये मुलाखती घेतल्या. मुंबईतील ७७ टक्के घरांसाठी पाण्याचं प्रदूषण हा सर्वात मोठा मुद्दा असल्याची कठोर वस्तुस्थिती उघडकीस आली. तसंच परीक्षण केलेल्या भूपृष्ठावरील पाण्याच्या नमुन्यांवरून असं आढळलं की, मुंबईतील काही भागांना जलप्रदूषणाचा मोठा फटका बसला आहे. जलप्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या टोटल डिझॉल्वड् सॉलिड्स (टीडीएस), काठिण्य, क्लोराइड्स, नायर्ट्ट्स इत्यादींची पातळी मुंबई तसंच उपनगरातील आणि ठाणे परिसरात येणा-या बदलापूर, देवनार, दिवा, गोरेगाव, मिरा रोड, नालासोपारा, कांदिवली, गोवंडी, विरार, कळवा या भागांतील पाण्यात मर्यादेपेक्षाही वाढली आहे. अर्सेनिक, शिसे यासारखी विषारी रसायने आणि रोगबाधा करणारे विषाणू जलप्रदूषणातील धोकादायक वाढीला हातभार लावत आहेत.

सर्वेक्षण केल्या गेलेल्या घरात, परिसरात राहणा-या मित्रपरिवारात गेल्या वर्षभरात कोणी ना कोणीतरी आजारी असल्याचं आढळून आलं. मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करणा-या एकूण आजारांपैकी सुमारे ८३ टक्के आजार हे जलजन्य आजार होते. कॉलरा, कावीळ, टायफॉईडसारखे घातक आजार सर्वसाधारणपणे सर्दी, खोकला आणि ताप या पाण्यापासून होणा-या तसंच मलेरिया, डेंग्यू या डासांपासून होणा-या आजारांपेक्षा जास्त असल्याचं आढळलं. आजारी पडलेल्या लोकांना त्यांच्या आजाराची कारणं विचारली असता त्यांनी दूषित पाणी हेच प्रमुख कारण सांगितलं.

पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी प्राथमिक पद्धत म्हणून जलशुद्धीकरण यंत्राचा वापर ६२ टक्के केला जातो. त्यापाठोपाठ २० टक्के लोक पिण्याचं पाणी उकळून तर पाच टक्के लोक दैनंदिन वापरासाठी बाटलीबंद पिण्याचं पाणी वापरतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही मुंबईत १३ टक्के घरांमध्ये थेट नळामधून घेतलेलं पिण्याचं पाणी वापरलं जातं. हे पाहता पिण्याचं पाणी वापरताना किती काळजी घेतली पाहिजे, ते लक्षात येईल.

पाण्याची गुणवत्ता आणि त्याचे प्रदूषण या गोष्टींनी भारतात धोकादायक पातळी गाठली आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. पाण्याचं प्रदूषण, काठीण्य, पाण्यापासून होणा-या आजारांचं वाढतं प्रमाण हे काही प्रमुख मुद्दे धक्कादायक आणि धोक्याची सूचना देणारे आहेत. पाण्यातील शिसं या घटकामुळे विषबाधा वाढते. मज्जासंस्था, मूत्रपिंडाचं आरोग्य बिघडतं. मुलांच्या बुद्धिमत्तेवरही परिणाम होतो. आपल्या घरी दूषित पाणी येत असल्यास पाणी नीट गाळून, उकळून प्या. – डॉ. थुप्पिल व्यंकटेश प्राध्यापक, सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बंगळूरु

दूषित पाणी पिण्याने आजारी पडणे हा सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण पाणी पिण्याच्या महत्त्वाबाबत लोकांना शिक्षित करणं महत्त्वाचं आहे. – अवधूत दाभोळकर महाव्यवस्थापक, ग्राहकानुभव


हे माहीत आहे का?

>> भारतातील एकूण आजारांपैकी पिण्याच्या पाण्यापासून होणा-या आजारांचं प्रमाण ७७ टक्के आहे.

>> प्रदूषण, पाण्याचा रंग, चव (७१ टक्के), पाण्याचं काठीण्य (३० टक्के), वास (१० टक्के) या सर्व घटकांवर पिण्याच्या पाण्याची शुद्धता अवलंबून असते.

>> दूषित पाणी आणि वाईट चवी हे मुंबईच्या पाणी समस्येबाबतचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. कोलकात्यात कठीण पाण्याचा प्रश्न अधिक आहे. लखनौमध्ये पाण्याच्या रंगामुळे नागरिक हैराण आहेत.

>> पुणे आणि हैदराबादमधले १६ टक्के लोक आजही नळाचं पाणी पितात.

>> ५३ टक्के भारतीय यंत्रांद्वारे जलशुद्धीकरण करतात. तर १७ टक्के लोक पाणी पिण्यापूर्वी उकळवतात. तर १४ टक्के लोक हे बाटलीबंद पाणी पितात.

>> दूषित पाणी आणि कठीण पाणी हे चिंतेचं प्रमुख कारण आहे.

Read More »

सांभाळा आपल्या हृदयाला

हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू येण्याचं भारतातील प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवाडीनुसार जगभराच्या तुलनेत सध्या भारतामध्ये सर्वाधिक संख्येने हृदयविकाराचे रुग्ण आढळतात. त्यामुळे भविष्यात हृदयाशी संबंधित रोगांमुळे २०१५ पर्यंत जवळपास २० दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतील आणि ते प्रामुख्याने भारतीय उपखंडातील असतील, असं भाकीतही आरोग्य संघटनेने वर्तवलं आहे. येत्या २९ सप्टेंबरला जागतिक हृदयरोग आहे त्यानिमित्ताने तुम्हीही तुमच्या हृदयाशी हितगुज करा.

भारतीयांच्या जीवनशैलीमुळे हल्लीच्या काळात वाढू लागलेला एक आजार म्हणजे हृदयरोग. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) आणि दी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार २५ ते ६९ या वयोगटांतील सुमारे २५ टक्के मृत्यू हे हृदयविकाराने होतात. या आजारावर जास्तच विचार केला तर हृदयरोग हा मानवनिर्मित आजार आहे हे समजून येते. पूर्वी एका ठरावीक वयानंतर हृदयरोग व्हायचा. पण गेल्या दोन-तीन वर्षातील हृदयरोगाच्या रुग्णाचा अभ्यास केल्यास स्त्रिया आणि मुलांचं त्यातील प्रमाण वाढत आहे. कुमारवयीन तसंच तरुणांमध्येही हृदयाशी संबंधित आजाराची लक्षणं दिसून येतात. बैठी जीवनशैली, धावपळीचं जीवन ही त्यापाठची कारणं म्हणायला हवीत.

'भारतामध्ये हृदयरोगाचा त्रास असलेले अंदाजे ५० दशलक्षाहून अधिक रुग्ण आहेत' ही माहिती आरजीआय आणि आयसीएमआरच्या संयुक्त अहवालात नमूद केली आहे. अहवालामध्ये असे सुचवण्यात आले आहे की, 'शहरी जीवन पद्धतीतील ताणतणावांमुळे आरोग्यावर मोठया प्रमाणात नकारात्मक परिणाम होण्याचा धोका संभवतो. दरवर्षी हृदयाशी संबंधित आजारामुळे तसेच हृदयविकाराच्या झटक्यामुळे ९.४ दशलक्ष लोक मृत्युमुखी पडतात. वेळेवर काळजी घेतली तर हे टाळता येऊ शकते.' हा अहवाल हेही सांगतो की, गेल्या पाच वर्षामध्ये महिलांमध्ये हृदयविकाराच्या बळींची संख्या १६ ते २० टक्क्यांनी वाढल्याचं समोर आलं आहे. लहान वयात लठ्ठपणा आल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. जर यावर नियंत्रण ठेवले नाही तर लहान वयात हृदयरोग होण्याची शक्यता असते. यावरून आपल्याला आपल्या हृदयाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे, याचा अंदाज येईल.

प्रतिबंधात्मक उपाय

हृदयरोग कसा होतो आणि त्यापासून संभवणारे धोके याविषयी प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी पुढील उपाय करावेत.

>> एका ठरावीक वयानंतर हृदयाची नियमित तपासणी / चाचणी करावी.

>> हृदयरोगाशी संबंधित अन्य आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आदी) कोणते याचीही माहिती घ्यावी.

>> रोगाचे वेळेवर निदान आणि उपचार करून घ्यावेत.

>> मुलांना, तरुणांना सुदृढ हृदयाचं महत्त्व पटवून द्यावं. त्यासाठी कोणता आहार तसंच व्यायाम केला पाहिजे याचीही माहिती द्यावी.

पाश्चिमात्यांच्या तुलनेत भारतीयांना त्यांच्या वयाच्या दहा वर्षे आधीच हृदयरोगाचा धोका संभवतो. आरोग्यविषयक शिक्षण, रोगाचे लवकर निदान, तपासणीतील महत्त्वपूर्ण घटक आणि वेळेवर होणारे उपचार ही काळाची गरज आहे.- डॉ. प्रवीण कुलकर्णी (कार्डिओलॉजिस्ट), ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe