Tuesday, June 18, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

आठळ्याची करंजी

सारणासाठी :- १२-१५ फणसाच्या बिया, ४-५ मिरच्या, १ छोटा चमचा आलं-लसूण पेस्ट, १ कांदा, कोथिंबीर आवडीप्रमाणे, मीठ, लिंबाचा रस, साखर चवीप्रमाणे, तेल

साहित्य :
सारणासाठी :- १२-१५ फणसाच्या बिया, ४-५ मिरच्या, १ छोटा चमचा आलं-लसूण पेस्ट, १ कांदा, कोथिंबीर आवडीप्रमाणे, मीठ, लिंबाचा रस, साखर चवीप्रमाणे, तेल
पारीसाठी :- मैदा १ वाटी, चवीपुरतं मीठ,

कृती :
फणसाच्या बिया उकडून घ्याव्यात, त्यानंतर त्याची भरड वाटून घ्यावी. एका भांडयात थोडसं तेल टाकून त्यात कांदा बारीक चिरून परतून घ्यावा. त्यात मिरची-आलं-लसूण पेस्ट, फणसांच्या बियांची भरड घालावी, चवीप्रमाणे मीठ घालून पाण्याचा एक हबका मारून एक वाफ आणावी.

त्यानंतर चवीप्रमाणे साखर घालावी व वाफ आल्यानंतर लिंबाचा रस आणि वरून कोथिंबीर घालावी आणि मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावं. मैदाच्या पीठाच्या पुरीएवढी पोळी लाटून घ्यावी. त्यात हे सारण भरून करंजीचा आकार द्यावा. गरम तेलात तळून घ्याव्यात.टोमॅटो कॅचअपसोबत ह्या गरमागरम आठळयांच्या करंज्या सव्‍‌र्ह कराव्यात.

Read More »

सत्त्वयुक्त नाचणी

राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. नाचणीत असणा-या कॅल्शियमच्या विपुल साठयामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुलं यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात.

हाडांचा अशक्तपणा, हाडं ठिसूळ होणं, हाडं खिळखिळी होणं हे आजार आजकाल दर दहा जणांपैकी एकामध्ये आढळतात. इतके हे आजार सर्वसामान्य होत आहेत. जीवनशैलीचं बदलतं स्वरूप या आजारांचं प्रमुख कारण आहे. हाडांचे आजार असणाऱ्यांना आहारात 'नाचणी'शिवाय दुसरा पर्याय नाही. नाचणीत कॅल्शियमबरोबरीने तंतुमय पदार्थाचं (फायबर) प्रमाण सर्वात जास्त असतं. नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील शर्करेचं प्रमाण संतुलित राहतं. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने नाचणीसारखा दुसरा पुरक आहार नाही.

लोकप्रियता वाढत आहे..
एक जमाना असा होता की, नाचणी हे तृणधान्य फक्त महाराष्ट्र आणि दक्षिण भारतापुरतंच मर्यादित होतं. पण या तृणधान्याच्या पौष्टिक गुणधर्मामुळे 'स्वास्थ्यप्रेमी' लोकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढली आहे. परिणामी नाचणीची लोकप्रियता जगभरात दिवसागणिक वाढत आहे. मिलेट, रागी, सालू आणि सातेमाऊ या नावानेही नाचणी ओळखली जाते.

दक्षिण भारतात खेडयांमध्ये राहणा-या लोकांच्या आहारात नाचणी हा प्रमुख घटक असल्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या ४० टक्क्यांनी कमी झाल्याचा अहवाल 'जागतिक आरोग्य संघटने'ने नोंदवला आहे. त्यामुळे आजच्या स्वास्थ्यप्रेमी लोकांच्या आहारात नाचणीचं स्थान महत्त्वाचं आहे. नाचणी थंड गुणाची असते. त्यामुळे उष्ण तसंच दमट हवामानाच्या प्रदेशात नाचणीचे पदार्थ मोठय़ा प्रमाणावर खाल्ले जातात.

वजनावरही नियंत्रण ठेवते

शरीरबांधा सडपातळ असावा, असं प्रत्येकालाच वाटतं. ही इच्छा ठेवणा-या प्रत्येकाने तांदळाच्या पदार्थाऐवजी नाचणीपासून बनवलेले पदार्थ खावेत. नाचणीमुळे शरीराला फक्त आणि फक्त ऊर्जाच मिळत नाही तर 'अमिनो अ‍ॅसिड' नावाचं आम्ल मिळतं. या आम्लामुळे तसंच त्यात असणा-या तंतुमय पदार्थामुळे आपल्याला लागणा-या भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवली जाते.

लहान मुलांसाठीही गुणकारी
नाचणीचा हलवा, लहान मुलांसाठीचा पोषक आहार समजला जातो. साधारण लहान मुलांना सहा महिन्यांनंतर बाहेरचा आहार दिला जातो. अशा वेळी मुलांना बाहेरचे पदार्थ देण्याऐवजी गूळ आणि गायीच्या तुपापासून बनवलेला नाचणीचा हलवा द्यावा. त्यातून मुलांना योग्य ती पोषणद्रव्यं मिळतातच. शिवाय या आहारामुळे मुलांची पचनशक्ती सुधारते.

नाचणीच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळे भाकरीशिवाय शेवया, इडली, डोसा, थालीपीठ, धिरडी, बिस्किटं, चकली, पिझ्झा बेस यांसारखे पदार्थ तयार केले जातात.

शीतल पेय
एक चमचा नाचणीचं पीठ किंवा सत्त्व एक ग्लास गरम पाण्यात मिसळा. त्यात चवीपुरतं मीठ घालावं. गाळून प्यावं. या पेयामुळे शरीराला फक्त थंडावाच मिळत नाही, तर शरीराला शक्तीही मिळते.

शंभर ग्रॅम नाचणीतून मिळणारी पोषणद्रव्यं
कॅल्शियम : ३५० मिलिग्रॅम
लोह : ३.९ मिलिग्रॅम
नायसिन : १.१ मिलिग्रॅम
थायमिन : ०.४२ मिलिग्रॅम
रिबोफ्लेविन : ०.१९ मिलिग्रॅम

Read More »

मला झोपू द्या..

झोपेची वेळ अनियमित असली की, संपूर्ण दिवस झोपेत असल्यासारखं वाटतं. त्याने निरुत्साह येतो. यासाठी दुपारची झोप टाळावी आणि रात्री वेळेत झोपावं..

''सुमित, हे काय सुरू आहे? दिवसभर खाऊन-पिऊन नुसता झोपून असतोस. किती वेळा सांगितलंय, दुपारी जेवणानंतर असं अंथरुणात लोळत राहू नकोस म्हणून. तुझी रूम स्वच्छ ठेव, किती पसारा केलायंस, तो आधी आवर. रूम नीटनेटकी ठेव. वयात इतका निरुत्साही आहेस. काही शिकू इच्छित नाहीस का रे? वेळेचं तर भानच नाही तुला.. कुंभकर्णासारखा झोपतच असतो नुसता.. तुझ्या शरीराकडे बघ, वजन वाढत चाललंय तुझं. सारखे तळलेले पदार्थ, तेल, तूप, चीझ, मैदा असलेले पदार्थ खात राहतोस. तुला काहीही सांगितलेलं आवडतही नाही.'' सतत झोपाळलेल्या अवस्थेत असणा-या पाल्यांच्या घरी आईवडिलांचा हाच सूर!

यावर मुलांची उत्तरं ठरलेली, ''आई तू सारखी कटकट करू नकोस. सकाळी कॉलेजला गेलो होतो. आता १ वाजता आलो. थोडंसं खाऊन आडवा झालो, तेवढयात माझ्या रूममध्ये शिरून तुझी कटकट सुरू झाली. दुपारी झोपणार नाही, तर कधी झोपणार?'' खरं तर दुपारची झोप अजिबात योग्य नाही. आपले वरिष्ठ म्हणूनच सांगतात की, दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी करावी किंवा शतपावली करावी. जे जाडजूड (मेदस्व) आहेत, ज्यांच्या आहारात तेल-तूप, मिठाई, आईस्क्रीम, चीझ यांसारखे पचायला जड पदार्थ असतात त्यांनी दुपारी झोपूच नये. झोप प्रत्येकाला हवी आहे.

शारीरिक स्वास्थ्यासाठी झोपेची गरज असते. पण वाटेल तेव्हा नव्हे. अशी झोप स्वास्थ्य आणि आयुष्यासाठी हानिकारक आहे. दिवसा झोपल्याने आणि रात्रीच्या जागण्यामुळे अनेक वायू आणि कफाचे रोग होऊ शकतात. उन्हाळ्यात मेहनतीचं काम करणा-यांनी दुपारी थोडी झोप घेणं योग्य. ज्यांना खूप बोलावं लागतं, सारखं मजुरीचं काम करावं लागतं, त्यांनी आराम केलेला एकवेळ ठीक.

वयस्कर, लहान मुले किंवा रात्री शिफ्ट्समध्ये काम करणा-यांना दुपारची झोप गरजेची आहे. पण ज्यांचा दमा(अस्थमा) उसळलाय, उचक्या लागल्यात, हगवण लागलीय अशांनी मात्र दुपारी झोपू नये. मेदस्वी, जाडजुड व्यक्ती दुपारी वाटेल तेव्हा झोपायला लागल्या की सर्दी, पडसं, ताप, डोकेदुखी होते. भूक मंदावते आणि पचनशक्तीही मंदावते.

वरच्यावर झोपणं शरीराला त्रासदायक ठरतं. जेवण तेल-तूपकट न घेता सकस आहार घ्यावा. नाकात तीक्ष्ण(झणझणीत) नस्य द्यावे. रिकामटेकडं राहण्याऐवजी काही काम करत राहिल्यास शारीरिक आणि मानसिकरीत्या गुंतून राहता येतं. त्याने झोप नाहीशी होते. शिवाय दुपारी झोपल्यास अनेकांना रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही. मग सकाळी त्याच निरुत्साहात दिवसाची सुरुवात होते. असाच प्रत्येक दिवस सुरू राहतो. त्यामुळे दुपारची झोप टाळून, रात्री योग्य वेळेत झोपावे व सकाळी लवकर उठावे.

Read More »

रिमझिम वातावरणात, विषाणूंशी दोन हात

आपल्यापैकी अनेकांसाठी पावसाळा रम्य असतो. पण पाऊस आपल्याबरोबर अनेक आजारही घेऊन येतो. पावसाळ्यात ब-याचदा ताप येतो. हा ताप अनेक प्रकारचा असतो. त्याचे योग्य निदान झाले तर गंभीर आजारापासून बचाव होऊ शकतो.

अनेक कवींनी पावसाळ्याचं इतकं रम्य वर्णन केलं आहे की, पाऊस म्हणजे स्वर्गीय सुख असंच आपल्याला वाटत असतं. अर्थात या जीवसृष्टीला नवं जीवन देणा-या पावसाचं महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे. पण पावसाळा जसं जीवन घेऊन येतो, तसंच अनेक आजारही बरोबर घेऊन येतो. अर्थात याला पूर्णत: पावसाळाच कारणीभूत आहे असं नाही.

कारण मानवी करणीमुळे पाण्याचं प्रदूषण वाढलं आहे आणि पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी होत असल्याने साहजिकच प्रदूषित पाण्याचाही त्रास आपल्याला सोसावा लागतो. पावसाळ्यात अनेक साथीचे आजार उचल खातात. त्यांची सुरुवात साध्या तापापासून होते. म्हणूनच या तापाविषयी आपण जागरूक राहणं आवश्यक असतं.

आपल्या शरीरावर जेव्हा जीवाणू किंवा विषाणू हल्ला करतो तेव्हा आपलं शरीर आपोआपच त्याला मारण्याचा प्रयत्न करतं. त्याच हेतूने शरीर आपलं तापमान वाढवतं, तेव्हा आपल्याला ताप आला असं आपण म्हणतो. शरीराचं तापमान जेव्हा सामान्य तापमानापेक्षा (९८.३) वाढतं तेव्हा तो ताप असतो. सर्वसाधारणपणे लहान मुलांना जेव्हा ताप येतो, तेव्हा त्यांचे हात-पाय थंड राहतात, पण त्यांचं डोकं आणि पोट तापलेलं असतं. त्यामुळे त्यांचा ताप पोट पाहून तपासतात.

ताप जर मलेरिया किंवा डेंगूचा असेल तर तो १०१ ते १०३ डीग्री फॅरनहीटपर्यंत पोहोचतो. व्हायरल ताप मात्र किती वाढेल, हे सांगता येत नाही. एरवी कोणताही ताप पाच दिवस राहिला तर त्यानंतर आणि पावसाळ्यात तर एक दिवस जरी ताप आला तरी लगेच डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. औषध घेतल्यानंतर ताप कमी झाला तर काही प्रश्नच नाही. पण औषध घेतल्यानंतरही ताप १०३ डीग्री फॅरनहीटवर जात असेल तर मात्र काळजीचं कारण आहे. डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घेण्याची गरज आहे. कारण इतका ताप रुग्णाच्या मेंदूवरही परिणाम करू शकतो.

ताप जर १०० डीग्री फॅरनहीटच्या आसपास असेल तर त्यावर घरच्या घरीच उपचार करता येतात. उदाहरणार्थ, पाण्याच्या पट्टय़ा ठेवून. मात्र क्रोसिन, पॅरासिटॉमॉल आणि अ‍ॅस्पिरिनसारखी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊच नयेत. रुग्णाचा ताप कमी होत नाही तोपर्यंत पट्टया त्याच्या कपाळावर ठेवल्या जाव्यात. सामान्य पाण्याचीच पट्टी ठेवली जावी. कपाळावर पट्टी ठेवल्यावर ती गरम होते, म्हणून ती एक मिनिटाच्या वर कपाळावर ठेवू नये. डोक्याबरोबर शरीरही जर गरम असेल तर नॉर्मल पाण्यात कापड भिजवून त्याने सर्व शरीर पुसून घ्यावं.

एखाद्या विषाणूपासून ताप होतो, तेव्हा त्याला 'व्हायरल फीवर किंवा ताप' असं म्हणतात. व्हायरल ताप येण्याची अनेक कारणं असू शकतात. मात्र त्यातील प्रमुख कारण आहे, ते म्हणजे सांडपाण्यात पिण्याचं पाणी मिसळणं (पावसाळ्यात हे नेहमी होतं ) आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या विविध वस्तूंना स्पर्श करणं. व्हायरल ताप हा सर्वसाधारणपणे हवामान बदलल्यावर होतो. पण पावसाळ्यात याचं प्रमाण अधिक असतं. हा ताप तीन ते चार दिवस राहतो. ताप, डोकेदुखी, नाक गळणं, सांधेदुखी आणि स्नायूदुखी या तापाची लक्षणं आहेत.

डेंगू
डेंगू पावसाळ्यात आणि त्यानंतर लगेचच्या महिन्यांत म्हणजे जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांत अधिक प्रमाणात फैलावतो. कारण याच महिन्यांत डासांची पैदास अधिक प्रमाणात होते. डेंगूच्या तापाने आजारी असलेल्या व्यक्तीच्या रक्तात डेंगूचा विषाणू अधिक प्रमाणात असतो. जेव्हा एडिस या जातीचा डास अशा व्यक्तीला चावतो आणि रक्त शोषून घेतो, तेव्हा डेंगूचा विषाणूही त्याच्याबरोबर डासाच्या शरीरात जातो. आणि जेव्हा हा डास निरोगी व्यक्तीला चावतो, तेव्हा त्याच्यामार्फत डेंगूचा विषाणूही निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातो. अशा त-हेने डेंगूचा फैलाव होतो. डास चावल्यानंतर साधारण तीन ते पाच दिवसांमध्ये त्या व्यक्तीत डेंगूच्या तापाची लक्षणं दिसू लागतात. तापाचा कालावधी तीन ते दहा दिवसांचाही असू शकतो.

मलेरिया
प्लाझ्मोडियम नावाच्या पॅरासाइट किंवा परोपजीवी जंतूमुळे हा आजार होतो. एनोफिलीस डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया किंवा हिवताप होतो, हे तर सर्वानाच माहीत आहे. हे डास स्वच्छ पाण्यात तयार होतात आणि पावसाळ्यात त्यांचं प्रमाण अधिक असतं. संध्याकाळच्या वेळी हे डास विशेषकरून चावतात. जुलै ते नोव्हेंबर या काळात या आजाराचा फैलाव जास्त होतो. या आजारात रुग्णाला तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, उलटी, अशक्तपणा येतो. यात सर्वसाधारणपणे एक दिवसाआड ताप येतो आणि रुग्णाला थंडी वाजून ताप येतो.

टायफॉइड
याला 'एंट्री फिवर' असंही म्हणतात. सेल्मोनिया नावाच्या जीवाणूमुळे हा ताप येतो. या जीवाणूमुळे आतडय़ाला जखम म्हणजे अल्सर होतो आणि त्यामुळे हा ताप येतो. पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळणं हे या तापाचं प्रमुख कारण आहे. टायफॉइड कोणत्याही हंगामात होऊ शकतो, पण पावसाळ्यात याचं प्रमाण अधिक असतं, कारण याच काळात सांडपाण्याची व्यवस्था खराब झालेली असते. तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, उलटी ही या तापाची लक्षणं आहेत. सर्वसाधारणपणे हा ताप थंडी वाजून येत नाही.

पावसाळ्यात आलेल्या तापाकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करू नका. या हंगामात ताप येऊच नये, यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पाणी उकळून प्यावं, मैद्याचे पदार्थ कमी खा आणि शिळे अन्न खाणं टाळा. आहारात हळद, आलं, ओवा, हिंग यांचा जास्तीत जास्त समावेश असू दे. पावसाळ्यात पालेभाज्या, फ्लॉवर शक्यतो खाऊ नयेत. पचायला हलका असा आहार घ्यावा.

झोप पूर्ण घ्या, पाणी भरपूर प्या. मसालेदार आणि तळलेले पदार्थ कमी खा. जेवढी भूक असेल त्यापेक्षा थोडे कमीच खा आणि पनीरसारखे जड पदार्थही कमी खावेत. याशिवाय तुळशीचा काढा, हळद घालून पाणी पिणं यांसारखे घरगुती उपायही तुम्हाला करता येतील. क जीवनसत्त्व असलेले पदार्थ अधिक खाण्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहते. योगासारखे व्यायामही करायला हवेत. एकूणच तंदुरुस्त राहण्यासाठी स्वच्छता आणि खबरदारी हे दोन उपाय सर्वात महत्त्वाचे आहेत.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe