Friday, May 31, 2013

सुलभतेचा पर्याय देणारा 'माय बडी' टॅबलेट | आता साडीत रोजच दिसा आकर्षक!

 
पाच गोलंदाजांसह खेळण्यास ढोणी उत्सुक

 वनडेतील नवे नियम तसेच इंग्लंडमधील खेळपट्टय़ा आणि वातावरण पाहता पाच 'स्पेशालिस्ट' गोलंदाजांसह खेळू, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने सांगितले.

बर्मिगहॅम - वनडेतील नवे नियम तसेच इंग्लंडमधील खेळपट्टय़ा आणि वातावरण पाहता पाच 'स्पेशालिस्ट' गोलंदाजांसह खेळू, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने सांगितले. अष्टपैलू रवींद्र जडेजा त्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्याने म्हटले.
''भारतीय उपखंडाच्या तुलनेत इंग्लंडमधील खेळपट्टया आणि वातावरण खूपच वेगळे आहे. तेथील वातावरणाला अनुसरून आम्हाला गोलंदाजीतील डावपेच ठरवावे लागतील. इंग्लंडमधील तेज खेळपट्टया आणि वनडेतील नवे नियम पाहता पाच गोलंदाजांसह खेळण्याला आमचे प्राधान्य असेल. जडेजाच्या रूपाने भारताला एक चांगला अष्टपैलू मिळाला आहे. दहा षटकांचा कोटा टाकतानाच तो फलंदाजीत योगदान देऊ शकतो. इंग्लंडमध्येही जडेजाची कामगिरी सर्वोत्तम होईल,''असा विश्वास ढोणीने व्यक्त केला.
मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माला सलामीला उतरवण्यात आले होते. मात्र विद्यमान स्पर्धेत मुरली विजय आणि शिखर धवन डावाची सुरुवात करतील, असे ढोणीने स्पष्ट केले. ''धवन आणि विजयच्या समावेशामुळे फलंदाजी मजबूत झाली आहे. दोघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी केली. विजय आणि धवन या नियोजित सलामीवीरांसह पहिल्या लढतीत आम्ही खेळू. त्यानंतर रोहितचा विचार करू. दिनेश कार्तिकला मी मधल्या फळीतील 'स्पेशालिस्ट' फलंदाज मानतो,''असेही ढोणीने यावेळी स्पष्ट केले.
वनडेतील नव्या नियमांच्या अमलबजावणीनंतर भारतीय संघ प्रथमच परदेशात खेळत आहे. चँपियन्स ट्रॉफीसाठी निवडलेले क्रिकेटपटू या नियमांशी जुळवून घेतील, असा आशावाद ढोणीने व्यक्त केला. स्पॉटफिक्सिंग प्रकरणाचा भारतीय संघावर काहीही परिणाम झालेला नसून संघाला वादापासून दूर ठेवणार आहे, असे यावेळी ढोणीने सांगितले.


Read More »

चामडयाच्या वस्तूंची निर्यात वाढली


अमेरिका आणि युरोपातील मागणी वाढल्याने देशातील चामडयाच्या वस्तूंच्या निर्यातीत एप्रिल महिन्यात ११.६ टक्क्याची वाढ झाली.
नवी दिल्ली- अमेरिका आणि युरोपातील मागणी वाढल्याने देशातील चामडयाच्या वस्तूंच्या निर्यातीत एप्रिल महिन्यात ११.६ टक्क्याची वाढ झाली. या महिन्यात ३६ कोटी ७० लाख डॉलर्सच्या चामडयाच्या वस्तूंची निर्यात झाली.
लेदर एक्सपोर्ट कौंसिलने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल २०१२ मध्ये ३२ कोटी ८० लाख डॉलर्सची निर्यात झाली होती. गेल्या महिन्यात अमेरिकेतून चामडयांच्या वस्तूंना चांगली मागणी होती. तसेच युरोपियन बाजारपेठांची स्थितीही सुधारत असून यातील मागणी वाढली आहे. परिणामी निर्यातीला फायदा झाला असल्याचे एका अधिका-याने सांगितले.
भारतीय चामडयांच्या वस्तूंना अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली या देशांमध्ये चांगली मागणी आहे. त्याचबरोबर जपान, चीन, आफ्रिका येथील बाजारपेठांमधूनही मागणी वाढत असल्याचे या अधिका-याने सांगितले. चालू वर्षात चामडी वस्तूंच्या निर्यातीत २० टक्क्यांची वृद्धी होईल, अशी अपेक्षाही कौंसिलने व्यक्त केली आहे.
गेल्या महिन्यात चामडयाच्या वस्त्रांच्या निर्यातीत सर्वाधिक २३ टक्के वृद्धी झाली. तर चामडी वस्तूंच्या निर्यातीत २१ टक्के आणि चपलांच्या निर्यातीत १३ टक्के वृद्धी झाली. २०११-१२ मध्ये भारताने पाच अब्ज डॉलर्सच्या चामडी वस्तू निर्यात केल्या होत्या.

Read More »

सेरेना, स्टॉसूर तिस-या फेरीत


अव्वल सीडेड अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने बुधवारी फ्रेंच ओपनची तिसरी फेरी गाठली. तिने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाला ६-१, ६-२ असे सहज नमवले.

पॅरिस - अव्वल सीडेड अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने बुधवारी फ्रेंच ओपनची तिसरी फेरी गाठली. तिने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाला ६-१, ६-२ असे सहज नमवले. जागतिक क्रमवारीत ११४वे रॅँकिग असणा-या कॅरोलिनचा सेरेनासमोर निभाव लागला नाही. पहिल्याच सेटमध्ये सेरेना ५-० अशी आघाडीवर होती.
नववी मानांकित ऑस्ट्रेलियाच्या सामंथा स्टॉसूरनेही तिसरी फेरी गाठताना फ्रान्सच्या क्रिस्तिना माडेनोविचचा ६-४, ६-३ असा पराभव केला. १८वी मानांकित सर्बियाच्या येलेना यान्कोविचनेही तिस-या फेरीत प्रवेश केला. येलेनाने स्पेनच्या गॅबिन मुगूझावर ६-३, ६-० असा पराभव केला. फ्रान्सच्या गेल मॉन्फिल्सने घरच्या प्रेक्षकांसमोर कामगिरी उंचावताना पुन्हा तिसरी फेरी गाठली. त्याने लॅटवियाच्या अर्नेस्ट गुल्बिसला ६-७, ६-४, ७-६, ६-२ असे नमवले.
मॉनफिल्सने पहिल्या फेरीत पाचवा मानांकित चेक रिपब्लिकच्या टोमास बर्डिचला पराभवाचा धक्का दिला होता. महिला एकेरीत १४वी मानांकित सर्बियाच्या अ‍ॅना इवानोविचने फ्रान्सच्या मॅथिल्डे जोहान्सनचा ६-२, ६-२ असे सहज पराभव करत तिस-या फेरीत प्रवेश केला. पाचवी मानांकित इटलीच्या सारा इरॅनीनेही तिसरी फेरी गाठताना कझाकस्तानच्या युलिया पुटिनसेवाचा ६-१, ६-१ असा पराभव केला.
२६वा मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवने फ्रान्सच्या लुकास पोलीचा ६-१, ७-६, ६-१ असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. तिस-या फेरीत दिमित्रोवची गाठ अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचशी पडण्याची शक्यता आहे. २२ वर्षीय दिमित्रोवने गेल्या महिन्यात माद्रिद ओपन एटीपी स्पर्धेत जोकोविचला नमवत सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते.
सोमदेवचा फेडररसमोर निभाव लागला नाही
शेवटपर्यंत चुरस देणारा टेनिसपटू म्हणून भारताचा सोमदेव देववर्मन ओळखला जातो. मात्र दुसरा सीडेड स्वित्झर्लंडलडच्या रॉजर फेडररसमोर बुधवारी त्याचा निभाव लागला नाही. सोमदेवला फेडररकडून २-६, १-६, १-६ असा अवघ्या एक तास आणि १२ मिनिटांत पराभव स्वीकारावा लागला. सोमदेवच्या पराभवामुळे भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. या लढतीपूर्वी फेडररविरुद्धच्या सामन्यासाठी प्रोत्साहन देणा-या चाहत्यांचे सोमदेवने 'ट्विटर'वरून आभार मानले होते. त्याला पाठिंबा द्यायला प्रेक्षकांमध्ये काही भारतीय चाहतेही होते. मात्र फेडररचा सवरेत्तम खेळ आणि अनुभवासमोर सोमदेवचे काहीच चालले नाही.


Read More »

कसोटी सामने खेळा अन्यथा दर्जा धोक्यात


अन्य क्रिकेट प्रकारांसाठी कसोटी सामन्यांचा बळी दिला जात असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच फ्यूचर टूर्स प्रोग्रॅमप्रमाणे (एफटीपी) कसोटी सामने न खेळल्यास त्या संघाचा कसोटी दर्जा धोक्यात येईल

दुबई - अन्य क्रिकेट प्रकारांसाठी कसोटी सामन्यांचा बळी दिला जात असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच फ्यूचर टूर्स प्रोग्रॅमप्रमाणे (एफटीपी) कसोटी सामने न खेळल्यास त्या संघाचा कसोटी दर्जा धोक्यात येईल, असा इशारा आयसीसी क्रिकेट समितीने कसोटी खेळणा-या देशांना दिला आहे.
''अन्य प्रकारांसाठी गेल्या वर्षी कसोटी सामने कमी करण्यात आले. याची गंभीर दखल घेत पुढील चार वर्षात निश्चित केलेले सामने खेळणे प्रत्येक संघाला अनिवार्य आहे. तसे न झाल्यास कसोटी दर्जा धोक्यात येईल,'' असे आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या बैठकीत सुचवण्यात आले आहे. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयसीसी क्रिकेट समितीची बैठक बुधवारी झाली.
वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांच्याकडून पदभार घेतल्यानंतर कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच क्रिकेट समितीची बैठक झाली. क्रिकेट समितीच्या बैठकीत एका वर्षात कमीत कमी चार येत्या चार वर्षात कमीत कमी १६ सामने प्रत्येक संघाने खेळण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचे समजते.
काही संघांच्या मागणीनुसार, वनडे आणि टी-२० सामन्यांची संख्या वाढवताना कसोटी सामने कमी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००९ ते २०१३ या चार वर्षात इंग्लंडने सर्वाधिक ४९ कसोटी सामने खेळताना आघाडी राखली आहे. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी ३१ आणि बांगलादेशने १८ सामने खेळलेत.
द्विपक्षीय एफटीपी सामन्यांच्या शेवटी कसोटी 'प्ले ऑफ' स्पर्धा खेळवण्याच्या संकल्पनेला क्रिकेट समितीने पाठिंबा दर्शवला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीच्या आधारे या स्पर्धेसाठी संघ पात्र ठरवले जातील, असे त्यांनी म्हटले आहे.
पारंपारिक कसोटी क्रिकेट कायम राखण्यासह वनडे क्रिकेटमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे समितीच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे. 'स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप हे वादग्रस्त फटके मारण्याची मुभा फलंदाजांना यापुढे असावी, असेही समितीला वाटते. ''स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप या फटक्यांबाबतचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. माजी आणि विद्यमान क्रिकेटपटूंसह आंतरराष्ट्रीय अंपायरच्या मते, ते फटके सर्वोत्तम आहे. मात्र स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप मारण्यासाठी चांगले कौशल्य लागते. मात्र दोन्ही फटके यापुढेही क्रिकेटमध्ये कायम असावेत,' असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे.


Read More »

शेरास सव्वाशेर


एका वृद्ध शेतक-याला तीन मुलगे होते. ते खूप कष्ट करायचे, तरीही घरची गरिबी जात नव्हती. मोठया मुश्किलीने घराचा गाडा चालला होता.

एका वृद्ध शेतक-याला तीन मुलगे होते. ते खूप कष्ट करायचे, तरीही घरची गरिबी जात नव्हती. मोठया मुश्किलीने घराचा गाडा चालला होता. एक दिवस वृद्ध शेतक-याने आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाला, 'मी ऐकलंय की शेजारच्या गावातील जमीनदाराला एका चाकरी माणसाची गरज आहे. तुमच्यापैकी कुणीतरी ती चाकरी मिळवावी, त्यामुळे आपले दैन्य मिटण्यास थोडी फार मदत होईल'.
बराच विचारविनिमय केल्यावर थोरला मुलगा जाईल, असं ठरलं. थोरला मुलगा गेलाही, पण काही दिवसांतच उदासवाणा चेहरा घेऊन माघारी आला. त्यानं सांगितलं की, जमीनदाराने मजुरी तर दिली नाहीच, शिवाय काम येत नाही म्हणून परत हाकलून लावलं. नंतर मधला मुलगा मोठया आत्मविश्वासानं जायला तयार झाला. सगळ्यांनी त्याला अनुमती दिली. पण तोही काही दिवसांतच परत आला. जमीनदाराने त्याचीही थोरल्याप्रमाणेच बोळवण केली गेली.
हे पाहून धाकटया मुलाला भयंकर राग आला. तो आपल्या वडिलांजवळ जमीनदाराकडे जाण्याचा हट्ट धरू लागला. धाकटा वृद्ध शेतक-याचा लाडका होता. परंतु त्याच्या हट्टापुढे त्याचा निभाव लागला नाही. त्याने परवानगी दिली.
धाकटा मुलगा जमीनदाराकडे गेला. त्याला जमीनदाराने संपूर्णपणे न्याहाळले. मग म्हणाला, 'अच्छा! म्हणजे तू आता माझ्याकडे काम करणार? मोठे भाऊ तर बिनकामाचे होते, आता तू तरी काय करणार आहेस?'धाकटा मुलगा म्हणाला, 'मला एक संधी द्या. मी मोठी मेहनत करून दाखवीन.'जमीनदार म्हणाला, 'सांगितलेलं काम केलं नाहीस, तर तुला मजुरीही मिळणार नाही, समजलास?''मला मंजूर आहे, मालक', तो तरुण म्हणाला.
काही दिवस जमीनदाराने त्याला शेताच्या कामाला जुंपले. मग एक दिवस जमीनदार त्याला म्हणाला, 'इकडे लक्ष दे, घरामागच्या पहाडावर वेळूचं बन आहे. त्याची पालवी चारवायला बैलाला घेऊन ये आणि लक्षात ठेव, पानं तोडायची नाहीत. बैलाला झाडावर चढवून चारायचं.'
जमीनदार मनातल्या मनात आनंदला होता. विचार करत होता, याच्याने काही काम होणार नाही आणि आपल्याला इतक्या दिवसांची मजुरीही द्यावी लागणार नाही. तिकडे धाकटय़ाने वेळूच्या बुंध्याला बैल बांधला आणि चाबूक घेऊन बैलाला फटकारू लागला. वर मोठय़ाने म्हणू लागला, 'अरे बैला, शेंडयावर चढ.. अरे बैला, शेंडयावर चढ.'
बिचारा बैल वर चढणार कसा? तिथून जाणारे-येणारे लोक ती गंमत पाहायचे आणि हसत हसत निघून जायचे. ही बातमी जमीनदाराला समजली. तो धावतच तिथे आला आणि म्हणाला, 'मूर्खा, त्या बैलाला मारून टाकतोस की काय?''बघा ना मालक, हा निर्बुद्ध बैल झाडावर चढेनाच झालाय..!'
जमीनदार वरमला. त्याने आपला आदेश मागे घेतला. पण तो मनातल्या मनात कुढत राहिला. तरुणही मनातल्या मनात म्हणाला, 'या कपटी राक्षसाला अशी अद्दल घडवतो की, सात जन्मात विसणार नाही.'
आता जमीनदाराने दुसरी चाल खेळली. तो म्हणाला, 'हे बघ, भाजीपाल्याची लागवड करायची आहे. पण ही लागवड माझ्या घरावर करायची. थंड हवा आहे, तू कोबी लावण्याची तयारी कर.'
जमीनदाराने विचार केला होता की, कौलारू घरावर कोबी लावता येणार नाही आणि मग आपली मजुरी वाचेल. दुस-या दिवशी तरुण कुदळ घेऊन घरावर चढला. तो खोदण्यासाठी कुदळीचे घाव घालू लागला. कौले फुटून खाली पडू लागली. ब-याच उशिराने झोप झाल्यावर जमीनदार उठला. पाहतो तर घरात कौलांच्या तुकडय़ांचा ढीग पडलेला. तो किंचाळून म्हणाला, 'अरे दुष्ट माणसा, तुला कौलं फोडायला कुणी सांगितली होती?' तरुण अगदी नम्रतेने म्हणाला, 'मालक, कोबी लावायची असतील तर पहिल्यांदा खोदलं तर पाहिजे आणि खोदताना कौलं फुटणारच.'
जमीनदारने रागाने आपले दात-ओठ चावले. त्याचा हा डावसुद्धा उलटला. त्याने आपला आदेश मागे घेतला. तरुण खाली आला.
जमीनदार त्याची मजुरी हडपण्यासाठी नवी युक्ती शोधू लागला. काही दिवसांनंतर अचानक त्याच्या चेह-यावर स्मित झळकले. तो तरुणाला म्हणाला, 'हे बघ, दुष्काळ पडला आहे. कडक उन्हामुळे धान्याचं शेत वाळून चाललं आहे. त्यासाठी तू त्याला उद्या घरी घेऊन ये. म्हणजे सावलीत सुखणार नाही.'
तरुण नेहमीप्रमाणे निश्चिंत होऊन म्हणाला, 'ठीक आहे मालक, जशी आपली आज्ञा.'
दुस-या दिवशी पहाटेच तरुणाने जमीनदाराच्या घराचे दरवाजे तोडले. नंतर चौकट उखडून टाकली. मग कुदळ घेऊन भिंत पाडू लागला. जमीनदाराच्या बायकोची झोप या खटखटीच्या आवाजाने मोडली. पाहिल्यावर ती आश्चर्यचकितच झाली. तिने त्याला खूप सांगितले, पण तो ऐकायला तयार नव्हता. भिंतींवर घाव घालतच सुटला. शेवटी ती भयभीत होऊन जमीनदारला उठवायला गेली.
जमीनदार घाबरून धावतच बाहेर आला. त्यानं पाहिलं की, दारं-खिडक्या आणि चौकट जमीनदोस्त झाली आहेत. भिंतीला भलं मोठं भगदाड पडलं आहे. तरुण कुदळ घेऊन भिंतीवर घाव घालत होता. जमीनदाराचा पारा चढला. तो अक्षरश: जीव तोडून किंचाळला. 'अरे देवा, काय रे केलंस तू हे? तुला दरवाजा-भिंत तोडायला कोणी सांगितलं होतं?'
तरुणानं न ऐकल्यासारखं केलं आणि आपलं काम सुरूच ठेवलं. हे पाहून जमीनदाराचा राग अनावर झाला. तो आरडत-ओरडत नाचू लागला. 'अरे, तुझा हात चालवायचा थांबव. हे काय करतो आहेस तू?'
तरुण शेतकरी त्याला म्हणाला, 'इतके ओरडता का आहात. तुम्हीच म्हणाला होतात ना की, शेत घरात आण म्हणून. आता इतके मोठे शेत एवढयाशा दरवाजातून कसे बरं येणार? म्हणून..'
तरुणाने पुन्हा कुदळ हातात घेतली. तशी जमीनदाराच्या छातीत कळ आली. तो काकुळतीला आला आणि हात जोडून त्याला म्हणाला, 'अरे, बस्स कर बाबा! माझं घर नको तोडूस. यापुढं असली कामं तुला सांगणार नाही.'
तीन वेळा हरल्यावर जमीनदाराला अक्कल आली. तरुण जमीनदाराच्या विचार-बुद्धीपेक्षाही पुढे निघाला. त्या दिवसापासून पुन्हा कधी त्याने कुणाला धोका दिला नाही आणि वर्षाच्या शेवटी तरुणाला त्याची झालेली सगळी मजुरीही देऊन टाकली.

Read More »

इंडियन ऑइलला नफा


सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने २०१२-१३ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत १४,५१२.८१ कोटी रुपये नफा कमविला आहे.
नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने २०१२-१३ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत १४,५१२.८१ कोटी रुपये नफा कमविला आहे. कंपनीने नियंत्रित किमतीने इंधनाची विक्री केल्याने झालेला तोटा अनुदानाच्या रूपाने सरकारने भरून दिला आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने डिझेल, केरोसिन, स्वयंपाकाचा गॅस अनुदानित दराने विकल्याने कंपनीला नुकसान सोसावे लागत होते, मात्र सरकारने २०१२-१३ या वर्षात कंपनीला ५३,२७८.०७ कोटी रुपयांचे अनुदान दिले तर गेल्या वर्षी कंपनीला सरकारकडून ४५,४८५.८४ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले. तसेच ओएनजीसीने कंपनीला ३१,९६६.८४ कोटी रुपयांचे अनुदान दिले.
२०१२-१३ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला कच्च्या तेलाच्या प्रत्येक पिंपामागे २.३९ डॉलर्स फायदा झाला. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात कंपनीला २.२६ डॉलर्स मिळाले होते. कंपनीने प्रति समभाग ६.२० रुपये लाभांश जाहीर केला आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षात कंपनीला ५,००५.१७ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. २०११-१२ या वर्षात कंपनीला ३९५४.६२ कोटी रुपये नफा झाला होता.

Read More »

अंतराळातली सौरऊर्जा थेट पृथ्वीवर


आपल्या अवतीभवती अनेक गोष्टींचा वापर आपण रोजच्या जगण्यात करत असतो. पण अति परिचयाच्या असूनही आपल्याला त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती नसते. म्हणूनच आमच्या छोट्टम-मोठ्ठम खास दोस्तांसाठी आम्ही आपल्या रोजच्या वापरातील काही गोष्टींची रंजक माहिती घेऊन येत आहोत..

पाण्यापासून वीजनिर्मितीबाबत आपण बरंच काही वाचलं आहे. वीजनिर्मिती करण्याचे इतरही अनेक पर्याय आपण विज्ञानाच्या पुस्तकात अभ्यासले आहेत. पण लंडनच्या शास्त्रज्ञांनी अंतराळातल्या सौरउपग्रहांची चाचणी केली आहे आणि त्यातून असा निष्कर्ष निघाला की, अंतराळातली सौरऊर्जा लेझर किंवा सूक्ष्मलहरींद्वारे पृथ्वीपर्यंत पोहोचवली जाऊ शकते. त्यानंतर जमिनीवरील उपकरणाद्वारे त्या सूर्यकिरणांचे विजेत रूपांतर केले जाते. हा फक्त वीजनिर्मितीचा मार्ग नाही तर ही सौरऊर्जा दुर्गम भागांपर्यंतही पोहोचवली जाऊ शकते.









आता विमानांचेही 'मेक-ओव्हर्स'

आजवर तुम्ही अनेक सिनेतारकांचे किंवा आजूबाजूच्या काही व्यक्तींचे 'मेक-ओव्हर' झालेले पाहिले असतील. पण आता वाहनांचेही मेकओव्हर होत आहेत. 'नेक्स्ट जेन' हे कोण्या नव्या पिढीला वापरलेले विशेषण नसून 'नासा' आणि अमेरिकन शासनाच्या इतर शाखांनी तयार केलेल्या नव्या विमानाचे नाव आहे. ही विमाने आपल्याला नव्या रूपात दिसणार आहेत. केवळ बाह्यरूपातच नाही तर विमानाच्या रचनेतही काही बदल करण्यात आले आहेत. या विमानांचे पंख चौकोनी असतील. 'नेक्स्ट जेन' विमानांमधील इंजिनही आता वेगळ्या जागी बसवलेले आहे. यामुळे विमानाचा वेग वाढेल आणि इंधनाचीही बचत होईल.

Read More »





आपले भारतरत्न


‘भारतरत्न' हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशाची कीर्ती वाढवणा-या व्यक्तीला भारत सरकारकडून या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं.
 डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती आहेत. २००२ ते २००७ या काळात त्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषविले. त्यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम् येथे झाला. त्यांनी चेन्नई शहरातील मद्रास इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून 'एरोस्पेस इंजिनीअरिंग' या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
१९९८ साली भारताने केलेल्या 'पोखरण-२' या अणुचाचणीमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ते भारताचे 'मिसाइल मॅन' म्हणून ओळखले जातात. आपल्या 'भारत २०२०' या पुस्तकात त्यांनी भारताला एक प्रगत राष्ट्र बनवण्यासाठी काही योजना दिल्या आहेत.
डॉ. कलाम हे 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्कारासह अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. प्रेरणादायी भाषणे आणि विद्यार्थ्यांशी सुसंवाद करणे, यासाठी ते लोकप्रिय आहेत.


Read More »

आयसीसी चॅँपियन्स ट्रॉफीचा इतिहास


तत्कालीन आयसीसी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या कल्पनेतून साकारलेल्या आयसीसी चॅँपियन्स ट्रॉफीला १९९८ मध्ये सुरुवात झाली.
मुंबई - तत्कालीन आयसीसी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या कल्पनेतून साकारलेल्या आयसीसी चॅँपियन्स ट्रॉफीला १९९८ मध्ये सुरुवात झाली. उदयोन्मुख संघांना आर्थिक सहाय्य मिळावे आणि आयसीसीलाही आर्थिक लाभ व्हावा, हा उद्देश ठेवून ही स्पर्धा सुरू करण्यात आली. सुरुवातीला आयसीसी नॉकआउट स्पर्धा (विल्स इंटरनॅशनल कप) असे या स्पर्धेचे नाव होते. २००२ पासून चॅँपियन्स ट्रॉफी म्हणून ही स्पर्धा नावारूपास आली.
२००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपला सुरुवात झाल्यावर चॅँपियन्स ट्रॉफीने 'बॅकस्टेज' घेतले. यंदा होणारी आवृत्ती ही सातवी आणि शेवटची आहे. गेल्या वर्षी झालेल्या आयसीसीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत चॅँपियन्स ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. चॅँपियन्स ट्रॉफीतील प्रेक्षकांची तुरळक उपस्थिती हे स्पर्धा रद्द करण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले.
'विस्डेन'नेही नेहमीच या स्पर्धेच्या उणीवांवर बोट दाखवले आहे. स्पर्धेचे फॉरमॅटच नाही तर स्पर्धेचा कालावधीही चुकीचा निवडल्याचे अनेक वेळा लक्षात आले. चँपियन्स ट्रॉफीऐवजी भविष्यात जागतिक कसोटी स्पर्धा आयोजित केली जाईल, असे आयसीसीतर्फे सांगण्यात आले. आजवर सहा वेळा चॅँपियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंतच्या झालेल्या स्पर्धात कसोटी न खेळणा-या देशांचाही समावेश होता. यंदा मात्र सर्वोत्तम आठ संघांनाच स्थान देण्यात आले आहे. आजवरच्या सहा आवृत्तींवर टाकलेली एक नजर ..

द. आफ्रिका प्रथमच मोठय़ा स्पर्धेत विजयी
१९९८-९९ (बांगलादेश)
विजेते : दक्षिण आफ्रिका
उपविजेते : वेस्ट इंडिज
सहभागी देश : ९
स्पर्धेतील सर्व सामने ढाक्यातील बंगबंधू स्टेडियमवर खेळण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने जिंकलेली आयसीसी पातळीवरील ही पहिली मोठी स्पर्धा ठरली. वर्ल्डकपमध्ये सातत्याने अपयश येत असताना सर्व संघांचा समावेश असलेली एक तरी स्पर्धा जिंकण्याचे द. आफ्रिकेला आव्हान होते. शॉन पोलॉक, लान्स क्लुजनर, अ‍ॅलन डोनाल्ड या मुख्य क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत द. आफ्रिकेने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजला नमवत बाजी मारली. दिवंगत कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि अष्टपैलू ज्याक कॅलिस त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. त्यांना वेस्ट इंडिजकडून पराभूत व्हावे लागले.

न्यूझीलंडचे वर्चस्व
२०००-०१ (केनिया)
विजेते : न्यूझीलंड
उपविजेते : भारत
सहभागी देश : ११
केनयातील क्रिकेटला आर्थिक मदत मिळावी हा उद्देश ठेवून सर्व सामने नैरोबीत आयोजित करण्यात आले होते. बाद फेरी पद्धतीने खेळवलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत भारतावर मात करत न्यूझीलंडने जेतेपद पटकावले. सामन्यांना फारच कमी प्रेक्षकवर्ग लाभल्याने नैरोबीत स्पर्धा आयोजित करण्याचा आयसीसीचा प्रयत्न फोल ठरला.
बाद फेरीत केनिया आणि ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत गतविजेता दक्षिण आफ्रिकेलाही नमवण्यात भारताला यश आले. मात्र अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून चार विकेट्सनी पराभव झाला. भारताला अंतिम फेरी गाठून देण्यात सौरव गांगुलीचे (चार सामन्यांत ३४८ धावा) योगदान महत्त्वपूर्ण होते.

..आणि 'चॅँपियन्स ट्रॉफी' हे नाव पडले
२००२-०३ (श्रीलंका)
विजेते : भारत/श्रीलंका
सहभागी देश : १२
या आवृत्तीपासून स्पर्धेला 'चॅँपियन्स ट्रॉफी' हे नाव पडले आणि बाद फेरी प्रकार संपला. ५० षटकांच्या वर्ल्डकपपूर्वी पाच महिने आयोजित करण्यात आलेल्या या चॅँपियन्स ट्रॉफीचे नवीन फॉरमॅट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाही. तिकिटांच्या किंमती कमी ठेवूनही प्रेक्षकवर्ग कमीच लाभला. भारत आणि श्रीलंका हे शेजारील देश अंतिम फेरीत आमनेसामने आले. मात्र पावसाने बाजी मारली. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्याने जेतेपद विभागून देण्यात आले. साखळीत तीनही लढती जिंकून भारताने उपांत्य फेरी गाठली. मात्र उपांत्य फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला.

मोठया कालावधीनंतर विंडिजला यश
२००४ (इंग्लंड)
विजेते : वेस्ट इंडिज
उपविजेते : इंग्लंड
सहभागी देश : १२
वेस्ट इंडिजला ब-याच कालावधीनंतर आयसीसीची मोठी स्पर्धा जिंकण्यात यश आले. अंतिम फेरीत त्यांनी यजमान इंग्लंडचा पराभव केला. या स्पर्धेचे वैशिष्टय म्हणजे स्पर्धेतील अमेरिका संघाचा समावेश. मात्र त्यांना साखळीतील दोन्ही लढतीत पराभूत व्हावे लागले.
भारताने निराशा केली. उपांत्य फेरी गाठणेही त्यांना जमले नाही. पाकिस्तानविरुद्धचा पराभव भारताचे आव्हान साखळीत संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरला.

ऑस्ट्रेलियाची जेतेपदाची उणीव दूर
२००६-०७ (भारत)
विजेते : ऑस्ट्रेलिया
उपविजेते : वेस्ट इंडिज
सहभागी देश : १०
भारतात प्रथमच चँपियन्स ट्रॉफी आयोजित करण्यात आली होती. ५० षटकांच्या वर्ल्डकपवर बाजी मारणा-या ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत या स्पर्धेच्या जेतेपदाने हुलकावणी दिली होते. मात्र भारतात त्यांनी उणीव भरून काढली. मुंबईतील सीसीआयच्या ब्रेबर्न स्टेडियमवर झालेल्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने गतविजेता वेस्ट इंडिजला नमवले.
घरच्या प्रेक्षकांसमोर भारताला खेळ उंचावता आला नाही. साखळीत तीनपैकी एकच लढत जिंकल्याने उपांत्य फेरी दूरच राहिली.

ऑस्ट्रेलियाचे सलग दुसरे जेतेपद
२००९-१० (दक्षिण आफ्रिका)
विजेते : ऑस्ट्रेलिया
उपविजेते : न्यूझीलंड
सहभागी देश : १०
पाकिस्तानात सप्टेंबर २००८ मध्ये होणारी चँपियन्स ट्रॉफी सुरक्षेच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे द. आफ्रिकेला यजमानपद मिळाले. ही स्पर्धा प्रेक्षकांच्या चांगल्या उपस्थितीमुळे आणि काही चुरशीच्या लढतींमुळे गाजली. रिकी पॉँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने जेतेपद राखले. अंतिम फेरीत न्यूझीलंडला नमवत सलग दुसरे जेतेपद त्यांनी नावावर केले. पॉँटिंग (पाच सामन्यांत २८८ धावा) आणि शेन वॉटसनने (पाच सामन्यांत २६५ धावा) जेतेपदात मोलाचे योगदान दिले.

भारताने या स्पर्धेत निराशा केली. साखळीत तीनपैकी एकच लढत त्यांना जिंकता आली. पाकिस्तानकडून पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. चँपियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारत एकदाही पाकिस्तानविरुद्ध जिंकू शकला नसल्याचे ठळकपणे समोर आले.


Read More »

रोहितची खोड


अनेक गोष्टींमध्ये असतं, तसंच एक आटपाट नगर होतं. सगळया प्रकारच्या सोयी-सुविधांनी सज्ज! छान-छान घरं, शाळा, कॉलेज, बागा, इतकंच काय अगदी मॉल्स, सिनेमागृह असं सग्गळं होतं.

अनेक गोष्टींमध्ये असतं, तसंच एक आटपाट नगर होतं. सगळया प्रकारच्या सोयी-सुविधांनी सज्ज! छान-छान घरं, शाळा, कॉलेज, बागा, इतकंच काय अगदी मॉल्स, सिनेमागृह असं सग्गळं होतं. त्याच नगरातल्या एका टुमदार घरात एक मुलगा राहात होता. त्याचं नाव रोहित. तो हुशार आणि चटपटीत होता. गुणीदेखील होता; पण त्याला एक वाईट खोड होती. त्याला सतत वाटायचं फक्त आपणच सगळ्यात हुशार.
आपल्यालाच सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे त्याच्या बरोबरीच्या सगळया मुलांना आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींना तो कमी लेखायचा. ''छे! एवढंसंही कसं जमत नाही तुम्हाला?'' ''हे ठीक वाटतंय; पण माझ्याइतकं छान नाही जमणार कुणालाच,'' असं सतत बोलून सगळयाचा विरस करायचा. त्यांच्या चांगल्या गोष्टींतही सतत खोड काढायचा. यावरून त्याच्या आई- बाबांनीही त्याला अनेकदा समजावलं; पण तो मात्र कुणाचंच ऐकायचा नाही.
सुरुवातीला रोहितचे मित्र-मैत्रिणी आपलाच मित्र म्हणून त्याचं हिणवणं सहन करायचे. मनाला लावून घ्यायचे नाहीत. पण नंतर मात्र त्यांनाही त्याचा राग येऊ लागला. त्यांनी रोहितला समजावूनसुद्धा पाहिलं; पण तो ऐकेचना! मग मात्र रोहितची त्याच्या मित्र-मैत्रिणींबरोबर वारंवार भांडणं होऊ लागली. हळूहळू एकेक करत त्याचे सगळे मित्र-मैत्रिणी त्याच्यापासून दूर होत होते. त्याला फार एकेकटं वाटू लागलं. पण त्याच्याशी कुणीच बोलत नाही, याचं त्याला दु:ख नव्हतं, तर त्याच्या बढाया कुणाला ऐकवता येत नाहीत, याचं त्याला जास्त वाईट वाटत होतं.
रोहितची आई चतुर होती. त्याच्या आईला ही गोष्ट समजताच तिने एक युक्ती योजली.रोहितच्या सगळया मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांना भेटून काही गोष्टींची चर्चा केली. त्यानंतर सगळे मित्र-मैत्रिणी पुन्हा त्याच्याशी नीट बोलायला लागले. शाळेच्या फळयावर काही लिहायचं असलं की यालाच सांगायचं. चित्र काढायची असली की यालाच सांगायचं. वर्गात गाणी-गोष्टीही त्यालाच सांगायला लावायची. शिक्षकांनी सांगितलेली कामंही त्यानेच करायची. सुरुवातीला या सगळय़ांची त्याला गंमत वाटली. तो आवडीने ही सगळी कामं करत होता.
पण नंतर नंतर त्याला याचा कंटाळा आला. सगळं मीच का म्हणून करायचं? अमकीचं अक्षर इतकं सुरेख आहे तरी फळा मीच लिहायचा, तमका सफाईने कामं करतो, तरी ती पण मीच करायची? याच्याकडे तर गोष्टींचा मोठ्ठा खजिना आहे, तरी मीच गोष्ट का सांगायची दरवेळी? रोहितची ही सगळी तणतण आईने ऐकली आणि आपली युक्ती सफल झाल्याची जाणीव तिला झाली.
आई त्याला म्हणाली ''अरे, पण तुझ्यापेक्षा चांगलं काही करणं कोणाला जमतच नाही, तर तुलाच करायला हवं ना?'' त्यावर त्याच्या शाळेतल्या कुणा-कुणाला काय-काय छान येतं याची भली मोठी यादीच त्याने धडाधडा आईला ऐकवली आणि हे करत असतानाच आपली चूक त्याच्या लक्षात आली. शरमेनं त्याची मान खाली गेली. आपल्या चुकीची त्याला जाणीव झाली. तेव्हापासून इतरांना कमी लेखणं त्याने सोडून दिलंच; इतकंच नाही तर कोणत्याही व्यक्तीच्या चांगल्या गोष्टींचंही कौतुक तो करू लागला.

Read More »

अमेरिकेत पुन्हा 'विषारी पत्रप्रपंच'


अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावाने त्यांच्या सिनेटरला काही काळापूर्वी विषारी पत्र पाठवण्याचा प्रकार घडल्यानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा न्यूयॉर्कच्या महापौरांच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावाने त्यांच्या सिनेटरला काही काळापूर्वी विषारी पत्र पाठवण्याचा प्रकार घडल्यानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा न्यूयॉर्कच्या महापौरांच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर मायकेल ब्लूमबर्ग आणि त्यांच्या वॉशिंग्टनमधील सामाजिक संस्थेच्या नावाने दोन निनावी पत्रे आली आहेत. या पत्रांवर अतिशय विषारी रायसिनचे अंश सापडले आहेत.
मॅनहटन आणि वॉशिंग्टन येथील टपाल कार्यालयात ही पत्रे तपासण्यात आली. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत दोन्ही पत्रांवर रायसिनचा अंश असल्याचे दिसून आले.
मात्र, अधिक चाचण्या केल्यावरच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येईल, असे न्यूयॉर्क शहर पोलिसांचे म्हणणे आहे. श्रेव्हपोर्ट येथून ही पत्रे पाठवण्यात आल्याचे शिक्के या पत्रांवर आहेत.ब्लूमबर्ग हे शस्त्र नियंत्रण कायद्याचे समर्थक आहेत आणि या कायद्याबाबत अमेरिकन लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहेत.
महापौरांच्या कार्यालयातील जे लोक या पत्राच्या संपर्कात आले त्यांच्यावर काही विपरित परिणाम झाल्याची कोणतीही चिन्हे दिसली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, ज्या पोलिस अधिका-यांनी नंतर या पत्रांची हाताळणी केली, त्यांच्यावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे आढळले.
नंतर हा परिणाम कमी झाला. या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास सुरू असल्याने या पत्रांमधील तपशीलाबाबत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

Read More »

अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीतून सावरतेय


बेरोजगारी आणि मंदीची मोठी झळ बसलेली अमेरिकेची अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
वॉशिंग्टन- बेरोजगारी आणि मंदीची मोठी झळ बसलेली अमेरिकेची अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेला विकासाच्या पथावर आणण्यासाठी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोघांनी पक्षाभेद विसरून एकत्रित काम केले पाहिजे असे आवाहन व्हाइट हाउसकडून करण्यात आले आहे. तसेच पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता व्हाइट हाउसकडून व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकन अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत आहे. २००८ पासून आर्थिक महासत्तेला मंदीने ग्रासले होते. मात्र यातून अर्थव्यवस्था सावरत असल्याचे व्हाइट हाउसच्या प्रसारमाध्यम विभागाचे सचिव जे. कार्ने यांनी सांगितले. देशातील गृहनिर्माणची क्षेत्राची स्थिती सुधारत असून यामुळे एकूण अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. मंदीच्या काळात गृहनिर्माण क्षेत्राची मोठी दमछाक झाली होती. मात्र या क्षेत्रातूनही चांगले संकेत मिळत असल्याचे कार्ने यांनी सांगितले.
अजूनही कित्येक अमेरिकन नागरिक नोकरीच्या शोधात आहेत. रोजगार वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विविध क्षेत्रांमध्ये रोजगार वाढवण्यासाठी आणि पायाभूत क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोघांनी पक्षाभेद विसरून एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे कार्ने यांनी म्हटले आहे.
पायाभूत सेवा क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशा क्षेत्रांतील गुंतवणूक वाढण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. ऊर्जा निर्मितीत अमेरिकेला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारकडून योग्य ती पावले उचलली जात असून लवकरच ते साध्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read More »

सामान्य ज्ञान


२८ मे हा दिवस म्हणजे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट सोसलेल्या आणि सिद्धहस्त कवी व लेखक असलेल्या बुद्धिमान व्यक्तिमत्त्वाविषयी हे काही प्रश्न
१)  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म कोणत्या साली झाला?
२)  त्यांना 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी कोणी बहाल केली?
३)  स्वा. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा किती वर्षासाठी झाली होती?
४)  १९०९ साली ब्रिटिश सरकारने सावरकरांच्या कोणत्या पुस्तकांवर बंदी घातली होती?
५)  जुलै १९०९ मध्ये स्वा. सावरकर कोणती परीक्षा उत्तीर्ण झाले?
६)  गांधीहत्येसाठी विनायक दामोदर सावरकरांना कधी अटक करण्यात आली  ?
७)  सावरकरांची मार्गदर्शक तत्त्वे कोणती ?
८)  'ने मजसी ने' हे अजरामर काव्य स्वा. सावरकरांनी कुठे लिहिले ?
९)  बॅ. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकरांचे पहिले मराठी आत्मचरित्र कोणी व कधी लिहिले ?
१०)  स्वा. सावरकरांच्या पत्नीचे नाव काय  ?

उत्तरे-
१) १८३३ २) प्रल्हाद केशव अत्रे ३) ५० वर्षे ४) १८५७ चे स्वातंत्र्यसमर ५) बॅरिस्टर ६) ५ फेब्रुवारी, १९४८ ७) मानवतावाद, बुद्धीप्रामाण्य, उपयुक्ततावाद, व्यवहार्यता ८) ब्रायटनच्या समुद्रकिना-यावर ९) सदाशिव राजाराम रानडे (१९२४) १०) यमुनाबाई

Read More »

रत्नागिरी शहराला तीन दिवस अपुरा पाणीपुरवठा


शहराला पाणी पुरवठा करणा-या शीळ येथील महावितरणच्या वाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येत आहे.

रत्नागिरी - शहराला पाणी पुरवठा करणा-या शीळ येथील महावितरणच्या वाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येत आहे. आधीच एमआयडीसीने पाणी पुरवठय़ात कपात केल्याने, नागरिकांचे पाण्याविना हाल होऊ लागले आहेत.
रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणा-या शीळ धरणामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी असूनही, गेले काही दिवस वारंवार पाईपलाइन फुटत असल्यामुळे पाणी पुरवठय़ात कपात केली जात आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शीळ जॅकवेलमधून पाणी उचलले जाते. या जॅकवेलजवळ असणा-या वाहिन्यांमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे पाणी पुरवठय़ात खंड पडला. त्यातच जलवाहिन्या दुरुस्त करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा तीन दिवस कमी दाबाने होणार आहे. याबाबत नगर परिषदेकडून नागरिकांना सूचना देण्यासाठी माहिती देणारी गाडीही फिरविण्यात येत आहे.
अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकही हैराण झाले आहेत. आधीच एमआयडीसीकडून होणा-या पाणी पुरवठय़ामध्ये कपात झाल्याने, शहरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे. त्यातच ही परिस्थिती निर्माण झाले आहेत.


Read More »

जॅक स्वॅगर


अमेरिकेचा कुस्तीपटू जॅक स्वॅगर याचे खरे नाव जॅकोब 'जेक' हॅगर, ज्युनियर आहे. पण कुस्तीच्या रिंगणात तो जॅक स्वॅगर या नावाने प्रसिद्ध आहे.
अमेरिकेचा कुस्तीपटू जॅक स्वॅगर याचे खरे नाव जॅकोब 'जेक' हॅगर, ज्युनियर आहे. पण कुस्तीच्या रिंगणात तो जॅक स्वॅगर या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म 'पेरी' या शहरात झाला. तो शाळेत असताना पाच वर्षाचा असल्यापासून कुस्ती खेळत आहे. ज्येष्ठ कुस्तीपटू डॅनी होज यांच्या नातवाबरोबर त्याने शाळेत असताना कुस्ती खेळली होती. माध्यमिक शिक्षण घेत असताना तो फुटबॉल आणि कुस्ती असे दोन खेळ खेळत असे. तो वर्गप्रमुखही होता. लहान असताना 'स्टेट रेसलिंग चॅम्पियनशिप'मध्ये २१५ पाउंड या प्रकारात तो विजेता ठरला होता.
त्यानंतर २००० सालच्या मे महिन्याच्या सुट्टीत जॅक 'ज्युनियर नॅशनल यूएसए रेसलिंग टीम'मध्ये सहभागी झाला. २००६ मध्ये त्याने वित्त (फायनान्स) हा विषय घेऊन आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. तो ओक्लहोमा विद्यापीठाचा विद्यार्थी होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो नोकरी करणार होता. पण रुजू होण्याच्याच दिवशी त्याला 'डब्लूडब्लूइ'मध्ये कुस्ती खेळण्यासाठी विचारणा करण्यात आली. २००६ सालच्या सप्टेंबर महिन्यात त्याने 'डब्लूडब्लूइ'मध्ये प्रवेश केला. या क्षेत्रातील त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याने जॉन सिना आणि उमागाचा सुरक्षारक्षक म्हणून काम केले आहे.
२००८ सालच्या शेवटी त्याने इसीडब्लू या ब्रॅण्डसाठी 'जॅक स्वॅगर' या नावाने खेळायला सुरुवात केली. जॅकने त्याची पहिली 'इसीडब्लू चॅम्पियनशिप' ही पहिली 'वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप' जानेवारी, २००९ मध्ये मॅट हार्डी याच्याविरुद्ध जिंकली. २०१० साली 'रॉ-बॅण्ड'चा सभासद असताना त्याने रेसलमेनिया २६ ची 'मनी इन द बँक लॅडर मॅच' जिंकली. २०१२ मध्ये त्याने झॉक रायडर याच्याविरुद्ध 'युनायटेड स्टेट्स चॅम्पियनशिप' जिंकली. 'द ऑल-अमेरिकन अमेरिकन', 'मिस्टर मनी इन द बॅंक', 'अ रियल अमेरिकन' या टोपण नावांनीही तो कुस्ती खेळला आहे.

Read More »

पावसामुळे २२ हजार वीज ग्राहक अंधारात


विजेच्या कडकडाटासह मंगळवारी रात्री कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील २२ हजार वीज ग्राहकांची वीज खंडित झाली.


संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी - विजेच्या कडकडाटासह मंगळवारी रात्री कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील २२ हजार वीज ग्राहकांची वीज खंडित झाली.
मान्सूनपूर्व पावसाचा फटका गेले दोन-तीन दिवस वीज ग्राहकांना बसत आहे.मंगळवारी झालेल्या पावसामुळे राजापूर उपकेंद्रातील नाटे फिडरवरील वीज वाहिनीवर डिओ खराब झाला. त्यामुळे वीजपुरवठा रात्री साडेनऊपासून बुधवारी सकाळपर्यंत बंद होता. याचा फटका ३ हजार वीज ग्राहकांना बसला. रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील वीजपुरवठा रात्री नऊ वाजल्यापासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत बंद होता.
कोंडय़े उपकेंद्रातील हातीवले वाहिनीवर झाडाची फांदी पडल्याने रात्री साडेनऊ वाजल्यापासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. याचा फटका ६०० वीज ग्राहकांना बसला. राजापूर उपकेंद्रातील धारतळे वाहिनीत बिघाड झाल्याने सुमारे ६८०० वीज ग्राहक अंधारात होते. त्यांना पर्यायी मार्गाने वीजपुरवठा करण्यात आला.
रत्नागिरी तालुक्यातील चाफे उपकेंद्रातील खंडाळा वाहिनीवरील पीन इन्स्युलेटर फुटल्याने मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता खंडित झालेला सुमारे ७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी दोन वाजता सुरू झाला.गुहागर येथील मार्गताम्हाने वाहिनीवर रात्री साडेअकरा वाजता झाडाची फांदी पडल्याने सकाळी ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. याचा फटका साडेतीन हजार वीज ग्राहकांना बसला. रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर परिसराला वीज पुरवठा करणा-या वाहिनीचा इन्स्युलेटर फुटल्याने साळवीस्टॉप परिसरात मध्यरात्री दीड ते साडेतीन वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत होता. मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसल्याने सुमारे २२ हजारपेक्षा अधिक वीज ग्राहकांना ऐन उन्हाळय़ात अंधारात रहावे लागले. महावितरणच्या कर्मचा-यांनी धावपळ करीत अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत केला.

Read More »

सना सईद


सना सईद ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असून तिने बालकलाकार म्हणूनही हिंदी सिनेमांत काम केले आहे. 'कुछ कुछ होता है' या सिनेमातील छोटया अंजलीच्या भूमिकेकरता उत्तम अभिनय करून तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.
सना सईद ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असून तिने बालकलाकार म्हणूनही हिंदी सिनेमांत काम केले आहे. 'कुछ कुछ होता है' या सिनेमातील छोटया अंजलीच्या भूमिकेकरता उत्तम अभिनय करून तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. हा तिचा पहिलाच चित्रपट होता. सुमारे २०० मुलांमधून तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. त्यानंतर तिने हर दिल जो प्यार करेगा, बादल या सिनेमांमधूनही बालकलाकार म्हणून काम केले.
करण जोहरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमात सहअभिनेत्री म्हणून ती प्रेक्षकांसमोर आली. सनाच्या या भूमिकेसाठी दिग्गजांकडून तिची प्रशंसा केली गेली. सनाचा जन्म गुजरातमध्ये झाला. सध्या ती मुंबईत राहते. मोठया पडद्याबरोबरच तिने छोटया पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 'बाबूल का आंगन छूटे ना' तसेच 'लो हो गयी पूजा इस घर की' या मालिकांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.
तसेच अभिनयाबरोबरच ती मॉडेलिंगच्या क्षेत्रातही काम करत आहे. 'बेंचमार्क मॉडेल्स'साठी तिला करारबद्ध करण्यात आले आहे.

Read More »

तलावात मगरीची पिल्ले सापडली


सावंतवाडीतील मोती तलावात मंगळवारी मोठी मगर दिसून आल्यानंतर बुधवारी मगरीच्या पिल्लाचे त्याच जाग्यावर दर्शन झाले.

सावंतवाडी - सावंतवाडीतील मोती तलावात मंगळवारी मोठी मगर दिसून आल्यानंतर बुधवारी मगरीच्या पिल्लाचे त्याच जाग्यावर दर्शन झाले. तीन फूट लांबीचे हे पिल्लू बराच वेळ पाण्याबाहेर होते. यामुळे मोती तलावात मोठी मगर आणि तिची पिल्ले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सावंतवाडीतील मोती तलावात मगरीचा संचार सुरू झाला आणि या तलावाबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी तलावातील मगर दिसेनाशी झाली होती. आता पुन्हा एकदा या मगरीचे अस्तित्व जाणवून आले आहे.
मंगळवारी सुमारे १० फूट लांबीच्या मगरीचे दर्शन झाले होते. यानंतर बुधवारी ३ फूट लांबीच्या मगरीच्या पिल्लाचे दर्शन मोठी मगर आणि तिची पिल्ले मोठय़ा संख्येने या तलावात असण्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे. नगरपालिका प्रशासन मगरींच्या या संचाराबद्दल काय दखल घेते, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. पुन्हा एकदा 'मगर पकड मोहीम' हाती घेतले जाईल का, अशी विचारणा नागरिकांमधून होऊ लागली आहे.


Read More »

कलांगणचे 'स्वरांगण'


वर्षा भावे यांच्या 'कलांगण' या संस्थेच्या गुरुकुल निवासी छंदशाळेचं या वर्षीचं ठिकाण होतं, मालगुंड! डॉ. निशी पोंक्षे यांच्या 'ट्रॅन्क्विलिटी रिसॉर्ट'च्या प्रांगणात ही छंदशाळा आयोजित करण्यात आली होती.
समुद्राची गाज.. कौलारू घर.. मोबाइल, टीव्ही यांचा थांगपत्ता नव्हता.. आई-बाबासुद्धा सोबत नव्हते.. त्या ५० मुलांच्या सोबतीला होते फक्त 'संगीताचे सूर'! वर्षा भावे यांच्या 'कलांगण' या संस्थेच्या गुरुकुल निवासी छंदशाळेचं या वर्षीचं ठिकाण होतं, मालगुंड! डॉ. निशी पोंक्षे यांच्या 'ट्रॅन्क्विलिटी रिसॉर्ट'च्या प्रांगणात ही छंदशाळा आयोजित करण्यात आली होती. आठ दिवसांच्या या निवासी छंदशाळेत ही छोटी मुलं सुरांच्या विश्वात रमली होती. हे या कार्यशाळेचं अकरावं र्वष होतं. आतापर्यंत तारापूर, अक्षी, क-हाड, तळेगाव, लोणेर, कुडाळ यांसारख्या मुलांना 'आजोळी' गेल्याचा आनंद देणा-या वेगवेगळ्या ठिकाणी 'कलांगण'च्या या निवासी छंदशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
मुलांसाठी हा उपक्रम चालू करण्याची कल्पना कशी सुचली याविषयी सांगताना समस्त बच्चेकंपनीची आवडती मावशी आणि 'कलांगण'च्या संचालिका वर्षा भावे म्हणाल्या, 'माझं संगीताचं शिक्षण गुरुकुल पद्धतीने झालं आहे. त्यामुळे गुरूंसोबत शिष्याचं निर्माण होणारं नातं, त्यांच्या घरचं वातावरण, गुरूंच्या सहवासात राहून घेतलेली तालीम यांचे संस्कार आपल्या मनावर होत असतात आणि त्यातूनच शिष्य तयार होत असतो. असं असताना, अलीकडे अभ्यासाच्या इतर विषयांसारखेच गाण्याचेही 'क्लासेस' सुरू झाले आहेत. पण संगीत हा विषय गणितासारखा शिकवून चालणार नाही. त्यामुळे मी जसं गुरुकुल पद्धतीत शिकले, तसं गाणं मला या लहान मुलांना शिकवायचं होतं आणि ती शांतता मुंबईत मिळणं शक्य नाही. म्हणून शहरापासून लांब या निवासी छंदशाळा आयोजित करण्याचं ठरवलं. कारण शास्त्रीय संगीताची आवड असणारी, त्याची जाण असणारी पिढी घडणं महत्त्वाचं आहे.'
१२ ते २० या वयोगटांतली मुलं या मालगुंडच्या निवासी छंदशाळेत सहभागी झाली होती. कौलारू घरं, झोपाळे, नारळाची झाडं आणि समोर अथांग समुद्र.. अशा वातावरणात ही छोटी मुलं रंगून जातात. त्यांचे हे आठही दिवस संपूर्णपणे संगीतमय असतात. सांगितलेल्या थीमवर अभ्यास करून दिवसाच्या शेवटी मुलं ते सादर करून दाखवतात. फक्त 'भैरवी' रागातली गाणी, केवळ 'शुद्ध स्वरां'मध्ये संगीतबद्ध केलेली गाणी किंवा १९७० पूर्वीची गाणी यांसारख्या संकल्पनांवर ही लहान मुलं अभ्यास करून येतात आणि उत्तम सादरीकरण करतात. त्यांनी घेतलेली मेहनत दिसून येते, असं वर्षाताई सांगतात. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, साहित्य अशी वेगवेगळ्या क्षेत्रांची आवड असणारी बच्चेकंपनी या छंदशाळेला आवडीने येते आणि या सर्व कलांशी गाण्याचं नातं असल्याने त्यांच्या कलेसाठी गाण्याची मदतच होते.
या वर्षी मालगुंडच्या छंदशाळेत मुलांनी अवघड समजल्या जाणा-या 'झुमरा' तालात तब्बल चार तास सलग ख्याल गायला, रामकली राग आळवला. 'रामकली राग आणि झुमरा तालात मुलांना ख्याल शिकवणं हे माझ्यासाठी शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं. पण मुलांना खूप मजा आली. ख्याल गात असताना पन्नास मुलं एकाचवेळी बरोब्बर सम गाठतात तेव्हा त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहून विलक्षण समाधान मिळतं. काही वेळा मुलं कंटाळतात आणि ते साहजिकच आहे. पण या 'सुरेल तुरुंगा'तून त्यांची सुटका नसते. कंटाळा आला आहे का, असं विचारल्यावर ते खुशाल 'हो' म्हणून सांगतात. पण त्यांनाही गाणं शिकायचं असतं. त्यामुळे मुलं या प्रवासाची मजा घेतात', वर्षाताई सांगतात.
'कलांगण'च्या या छंदशाळेत गाणं फक्त शिकायचंच नसतं, तर ते सर्वासमोर सादरही करायचं असतं. त्यामुळे माईकवर गाणं, सर्वासमोर तबला आणि हार्मोनियमच्या साथीने आपलं गाणं सादर करणं, हे नवीन अनुभव घेण्यासाठी मुलं उत्सुक असतात. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करतो, चांगल्या पुस्तकांचं वाचन करतो, थोरा-मोठयाची चरित्र वाचतो. रात्री गप्पा मारताना तुमचे मित्र कोण, मैत्रिणी कोण, गाणं शिकताना काही अवघड गेलं का, आठवणीतला सगळ्यात आनंदाचा आणि दु:खाचा प्रसंग याविषयी प्रत्येकाला बोलायला सांगतो. यामुळे त्यांची आपापसात घट्ट मैत्री होते. पहिल्या दिवशी काहीशी लाजाळू, सर्वामध्ये पटकन न मिसळणारी मुलं छंदशाळेच्या शेवटच्या दिवशी आत्मविश्वासाने गाणं सादर करतात आणि बक्षीस मिळवून जातात, हेच या कार्यशाळेचं खरं यश म्हणावं लागेल.
निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन, मोबाइल, टीव्ही यांसारखी प्रलोभनं दूर ठेवून आठ दिवस अविरत रियाजाचा आनंद मिळवून देणारी ही 'कलांगण'ची निवासी छंदशाळा छोटय़ांनाच काय तर मोठयानाही हवीहवीशी वाटेल, अशीच आहे.

Read More »

पुनर्भरणाने जलसमृद्धी


चौरासपट्टा म्हणून ओळखला जाणा-या पवनी- लाखांदूर तालुक्यात आतापर्यंत १३० पुनर्भरण विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत.

भंडारा - चौरासपट्टा म्हणून ओळखला जाणा-या पवनी- लाखांदूर तालुक्यात आतापर्यंत १३० पुनर्भरण विहिरी पूर्ण करण्यात आल्या असून, यामुळे गेल्या पावसाळ्यात अंदाजे ३०० कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी जमा होऊन चौरास भागाला फायदा झाला आहे. या प्रकल्पामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी एक ते दोन मीटरने वाढली असून, यावर्षी २१ नवीन विहिरी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत़
अतिविकसीत पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या अती उपसा केल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी दरवर्षी खाली जात असून, निकट भविष्यात चौरासचे वाळवंट होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. ही परिस्थिती उद्भवू नये, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी म्हणून या भागात शिवकालीन पाणी साठवण ही महत्त्वाकांक्षी योजना लोकसहभागातून राबवली जात आहे.
२००४ पासून पुनर्भरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. गोसे प्रकल्पामुळे चौरास भागातील पाण्याचे झरे बंद होऊन विहिरीची पातळी खालावली़ येथील माती चिकन व पिवळसर असल्याने पाण्याचा निचरा होत नाही़ त्यामुळेही पातळी वाढत नाही़ भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणे गरजेचे असून, ग्रामपंचायत व गावक-यांनी विहिरी उपसण्याचे काम हाती घेतले नाही तर निकट भविष्यात चौरास भागाला भीषण पाणी संकटाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा वरिष्ठ भूवैज्ञानिक चन्ने यांनी दिला आहे.
लाखांदूर तालुक्यातील मांदेड गावातील गोपाल भर्रे यांच्या शेतातील विहिरीला दोन वर्षापूर्वी पाणी नव्हत़े परंतु प्रकल्पामुळे पाण्याची पातळी वाढली असून, यावर्षी त्यांनी उन्हाळी धानाचे पीक घेतले आह़े पवनी तालुक्यातील कोंढाकोसरा येथील विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली असून, प्रकल्पाचा फायदा ३ ते ४ किमी परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यास होतो़ पावसाळ्याच्या ४ महिन्याच्या कालावधीत जमिनीमध्ये ४ कोटी लिटर पाण्याचा निचरा होत असून, त्या प्रकल्पाचा खर्च सुमारे ५ लाखापर्यंत असल्याची माहिती चन्ने् यांनी दिली़


Read More »

ब्रेकिंगच्या पलीकडचे यंग जर्नो


मुलांच्या सर्वागिण विकासाच्या दृष्टीने ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. पण जसजसा काळ पुढे जात आहे, तसतसा अनेक नवीन संकल्पनांचा अवलंब शाळांमध्ये केला जात आहे.
नेहमीचे अभ्यासाचे विषय, खेळाचा तास, चित्रकला आणि हस्तकला या विषयांच्या पलीकडे जाऊन आता अनेक मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा नवनवीन विषय त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करत आहेत. या विषयांबरोबरच संगणक, संगीत, विविध प्रकारचे खेळ हे विषयही गेल्या काही वर्षात अनेक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. मुलांच्या सर्वागिण विकासाच्या दृष्टीने ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. पण जसजसा काळ पुढे जात आहे, तसतसा अनेक नवीन संकल्पनांचा अवलंब शाळांमध्ये केला जात आहे.
सध्याच्या 'मनोरंजन क्षेत्राच्या' रुंदावत जाणा-या कक्षा आणि त्याचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन 'रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्स'ने त्यांच्या शाळांमध्ये २००८ साली iceplex हे अभियान सुरू केलं. या अंतर्गत विद्यार्थ्यांना 'मीडिया'चं शिक्षण दिलं जातं. ११ ते २१ या वयोगटांतला कोणताही विद्यार्थी; मग तो 'रायन स्कूल'चा असो वा इतर कोणत्याही शाळेचा, या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतो. बीबीएन (बियॉण्ड ब्रेकिंग न्यूज), वायजे व्हॉइस (यंग जर्नो व्हॉईस), विन वी मॅग (द बीबीएन मॅगझीन), आयएएफए (आइसप्लेक्स अ‍ॅडफिल्म अ‍ॅवॉर्डस्), फिल्म प्रॉडक्शन कोर्स असे वेगवेगळे विषय यात हाताळले जातात. या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा दिवसांचा आहे. 'आइसप्लेक्स'चा हा उपक्रम संपूर्ण वर्षभर चालू असतो. शिवाय हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे दोन पर्याय आहेत.
सलग सहा दिवसांत हा अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो किंवा 'सहा शनिवार'च्या बॅचसाठी ही तुम्ही नावं नोंदवू शकता. प्रत्येक विद्यार्थ्यांला वैयक्तिक मार्गदर्शन करता यावं यादृष्टीने प्रत्येक बॅचमध्ये १० ते ११ विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. २० ते २५ मे या अलीकडेच झालेल्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांनी 'आयपीएलचा भ्रष्टाचार', 'संजय दत्तला झालेली अटक', 'हिरोशिमा डे – सहा ऑगस्ट' अशा विषयांवर काही 'न्यूज बुलेटिन' सादर केली. तर 'स्त्रीभ्रूण हत्या', 'नागरिकांना कायद्यात अडकण्याची भीती', 'रक्तदान' या विषयांवर ३० सेकंद ते १ मिनिटांच्या माहिती देणाऱ्या फिल्म्स तयार केल्या आहेत. या उपक्रमाबाबत सांगताना 'आइसप्लेक्स'च्या कंटेंट डेव्हलपमेंटच्या प्रमुख शिबानी शर्मा म्हणाल्या, 'सध्या मीडियामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.
त्यामुळे लहान वयातच या क्षेत्राशी मुलांची ओळख व्हावी आणि त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी 'रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्स'चे अध्यक्ष डॉ. ऑगस्टाइन पिंटो यांच्या पुढाकाराने पाच वर्षापूर्वी हा उपक्रम चालू करण्यात आला. मीडियाच्या क्षेत्राला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे आमच्या या उपक्रमात आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांला सर्व गोष्टी करण्याची संधी देतो. स्क्रिप्ट लिहिणे, ती कॅमेरासमोर सादर करणे यांसारख्या विषयाची तयारी आणि तांत्रिक सामुग्री अशा दोन्ही बाजू हाताळल्यामुळे विद्यार्थी आपल्याला नेमकं काय आवडतंय आहे, हे जाणून घेऊ शकतात आणि करिअर निवडताना याची त्यांना मदत होऊ शकते.'
संपूर्ण भारतभर रायन ग्रूपच्या १२० शाळा आणि तीन स्टुडिओ आहेत. मालाड, चेंबूर आणि बंगळुरु या ठिकाणी हे स्टुडिओ आहेत. आपापल्या सोयीप्रमाणे जवळच्या स्टुडिओत जाऊन या उपक्रमाचं शुटिंग आणि रेकॉर्डिग केलं जातं. दुरून आलेल्या विद्यार्थ्यांची राहण्याचीही सोय शाळेतर्फे केली जाते. त्यामुळे सहा दिवसांच्या अभ्यासक्रमादरम्यान आपली मुलं राहतील कुठे, ही काळजी पालकांना नसते. या उपक्रमाचं वैशिष्टय़ म्हणजे येथील विद्यार्थ्यांना थेट दूरदर्शनवर झळकण्याची संधी मिळते.
'टॉपर' या लहान मुलांसाठी चालवल्या जाणा-या अभ्यासक्रम वाहिनीवर या उपक्रमातल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले न्यूज बुलेटिन्स 'बियॉण्ड ब्रेकिंग न्यूज' या कार्यक्रमात प्रक्षेपित केले जातात. दर शनिवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता.
'रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्स'ने उचललेलं हे पाऊल म्हणजे 'मीडिया प्रोफेशनल्स' तयार करण्याची पहिली पायरीच आहे. मित्रांनो, काय मग! आपला अभ्यास 'छडी लागे छमछम' पुरता न ठेवता 'मीडियाच्या क्षेत्रात' झळकण्यासाठी तुम्हीही सज्ज होताय नं ?

Read More »

शालेय वस्तूंमध्येही कंत्राटदारांचेच हित


मुंबई महापालिका नेमके कोण चालवते, हे मोठे कोडेच आहे. महापौर आणि सत्ताधारी मंडळी की, कंत्राटदार, असा प्रश्न अलीकडील काळात सामान्य मुंबईकरांना पडू लागला आहे. सार्वजनिक विकासकामांमध्ये असणारा कंत्राटदारांचा दबाव, त्यातून होणारा भ्रष्टाचार, थैलीशाही आणि पर्यायाने होणारी निकृष्ट दर्जाची कामे, यांचा अनुभव गेली काही वर्षे मुंबईकर घेत आहेतच.

मुंबई महापालिका नेमके कोण चालवते, हे मोठे कोडेच आहे. महापौर आणि सत्ताधारी मंडळी की, कंत्राटदार, असा प्रश्न अलीकडील काळात सामान्य मुंबईकरांना पडू लागला आहे. सार्वजनिक विकासकामांमध्ये असणारा कंत्राटदारांचा दबाव, त्यातून होणारा भ्रष्टाचार, थैलीशाही आणि पर्यायाने होणारी निकृष्ट दर्जाची कामे, यांचा अनुभव गेली काही वर्षे मुंबईकर घेत आहेतच; पण विकसित समाज घडवणारे आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणा-या शिक्षणक्षेत्रातही कंत्राटदारांचीमर्जी राखण्यासाठी काही निर्णय घेतले जातात किंवा घेतलेले बदलले जातात, ही मोठी खेदाची गोष्ट आहे.
त्याचा प्रत्यय नुकताच आला. महापालिकेच्या शाळातील पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना शालेय वस्तू दिल्या जातात. यामध्ये रेनकोट, छत्री, दप्तर, बूट इत्यादी प्रकारचे २७ शालेय साहित्य विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते. यासाठी ठराविक रकमेचे कंत्राट कंत्राटधारकांना दिले जाते. मोफत शालेय साहित्य वाटपाची योजना जाहीर करून शिवसेना-भाजप युतीने स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. परंतु या वस्तूंच्या खरेदीमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप अलीकडे वारंवार होत आहे.
काही महिन्यांपूर्वी या खरेदीतील भ्रष्टाचाराबाबत मनसेचे संदीप देशपांडे यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शालेय साहित्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. गॅस सिलिंडर, केरोसीनची सबसिडी ज्याप्रमाणे आधारकार्डाच्या मदतीने थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, तशाच प्रकारची ही योजना आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नावे तर पाचवीनंतरच्या विद्यार्थ्यांची खाती त्यांच्याच नावे उघडण्याचे या योजनेनुसार ठरवण्यात आले. वास्तविक, ही योजना चांगली असून त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होणार आहे.
परंतु ती जाहीर झाली तेव्हाच कंत्राटधारकांनी आणि पालिकेतील काही नेत्यांनी त्याच्या विरोधात रान उठवले होते. महापालिका सक्षमपणे वस्तूंचे वाटप करते, खात्यात पैसे जमा केल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार नाही. त्यामुळे वस्तूंचेच वाटप व्हायला हवे, असा सूर या मंडळींनी आळवला होता. त्याचवेळी थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या योजनेचा बोजवारा उडणार आणि ती बासनात गुंडाळली जाणार, अशी शक्यता वर्तवली जात होती आणि झालेही तसेच काहीसे. या वर्षी हा निर्णय अचानकपणे फिरवून शालेय वस्तूंचे वाटप करण्याची भूमिका घेण्यात आली.
आपल्याकडे चांगल्या योजनांचे पैसे थेट लाभार्थीपर्यंत अत्यल्प पोहोचतात, ही बाब सर्वश्रुत आहे. वस्तुत:, सरकारी अनुदानाप्रमाणेच इतर सरकारी क्षेत्रातही अशा प्रकारे मोफत वस्तूंचे वाटप होते तेथे हा थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याचा पर्याय उपयोगी ठरू शकतो. शालेय वस्तूंच्या वाटपाबाबतही केवळ मुंबई महापालिकेनेच नव्हे तर सर्वच पालिका-महापालिकांनी हा पर्याय स्वीकारायला हवा. याचे कारण वस्तूंचे वाटप दरवर्षी योग्य वेळेत होतेच, असे नाही. अनेकदा रेनकोट, छत्री यासारख्या वस्तू विद्यार्थ्यांना हिवाळ्यात अथवा पुढील वर्षी जानेवारी महिन्यातही दिल्या गेल्याच्या घटना आपल्याकडे घडल्या आहेत.

Read More »

मराठी शिलेदारांचा मराठी बाणा


गेल्या पन्नासहून अधिक वर्षापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद धुमसत आहे. चर्चिला जात आहे. महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी सीमेलगतच्या बेळगाव, कारावार, खानापूर, निपाणी आणि इतर गावातील नागरिकांनी प्रचंड मोठा लढा उभारला.


संग्रहित छायाचित्र

गेल्या पन्नासहून अधिक वर्षापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद धुमसत आहे. चर्चिला जात आहे. महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी सीमेलगतच्या बेळगाव, कारावार, खानापूर, निपाणी आणि इतर गावातील नागरिकांनी प्रचंड मोठा लढा उभारला. यामध्ये १०६ पेक्षा जास्त हुतात्म्यांनी बलिदानही दिले आणि आजही हा लढा सुरू आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी जनांचा लढा चिरडण्याचे प्रयत्न अनेकदा झाले आहेत.
विशेषत:, भाजपप्रणित सरकार तेथे आल्यापासून ते अधिक प्रकर्षाने घडल्याचे समोर आले. अलीकडील काळात मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी लढणाऱ्या या मराठीजनांच्या चळवळीमध्ये फूट पडली. त्यानंतर आता या लढय़ाचे, आंदोलनाचे, चळवळीचे काय होणार, अशी भीती वाटू लागली होती. लोकांनी इतके अन्याय सहन केले आहेत की, त्यांनीच यंदा एकजुट केली आणि आंदोलनांमधील राजकारणाकडे, फुटीकडे, हेवेदाव्यांकडे दुर्लक्ष करत यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या मराठी उमेदवारांच्या पदरात जास्तीत जास्त मते टाकण्याचा प्रयत्न केला.
अर्थातच, एकीकरण समितीने गेल्या वर्षभरात मराठी भाषिकांच्या न्यायासाठी जोरदार आघाडी घेतली होती. परिणामी, यंदा समितीने उभ्या केलेल्या पाच उमेदवारांपैकी दोन उमेदवार विजयी झाले. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील संभाजी पाटील आणि खानापूर मतदारसंघातील अरविंद पाटील या दोन्ही आमदारांना निवडून आणत सीमाभागातील मराठी जनांनी एकीचा आणि आवाजाचा कौल दिला. बुधवारी त्यांनी आपला हा मराठी बाणा थेट कर्नाटकच्या विधानसभेतही तितक्याच बाणेदारपणे दाखवून देत आमदारकीची शपथ मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून घेतली.
चौदाव्या कर्नाटक विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनाला या दोन्ही मराठी शिलेदारांनी पारंपरिक फेटा परिधान करून उपस्थिती लावली. त्यांना पाहताक्षणीच माध्यमांच्या प्रतिनिधींचा रोख त्यांच्याकडे वळला होता. सर्वानीच त्यांना 'कन्नडमधून शपथ घेणार का?' असा सवाल केला होता. परंतु त्याचवेळी त्यांनी 'नाही, मी मराठी या आमच्या मातृभाषेतूनच शपथ घेणार' असे नि:क्षून सांगितले होते आणि सदनाबाहेर दिलेला शब्द त्यांनी सदनामध्येही खरा करून दाखवत तमाम कन्नडिगांपुढे आपल्या मराठी बाण्याचे दर्शन घडवले.
त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी बेळगावहून मराठी नगरसेवक आणि शेकडो कार्यकत्रेही तेथे आले होते. या दोन्ही आमदारांकडून सीमाभागातील लोकांना अपेक्षा आहेत. विशेषत: सरकारी कार्यालयातून मराठी भाषेतून कागदपत्रे मिळावीत, यासाठी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे. सीमाभागातील मराठी बांधवांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ही जबाबदारी हे दोघेही आमदार पेलतील आणि आपल्या कामातूनही आपला मराठी बाणा कायम राखतील, अशी अपेक्षा आहे.

Read More »

दृश्यकलेचा जादूगार


विषय आणि आशय यांच्या जोरावर चित्रपट रसिकांच्या मनाची पकड घेतात. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणा-या बंगाली चित्रपटांचे तेच शक्तिस्थळ राहिले आहे. ३२ राष्ट्रीय पुरस्कार पटकावणा-या सत्यजीत रे यांच्यापासून सुरू असलेली ही परंपरा पुढे नव्या पिढीतील दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांनीही समर्थपणे सुरू ठेवली आणि बंगालीसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाहवा मिळवली. ऋतुपर्णो यांनी कथानकाबरोबर दृश्यात्मकतेवर भर दिल्यामुळेच १९९४ ते २०१३पर्यंतच्या त्यांच्या दोन दशकांच्या कार्यकाळात त्यांनी निर्माण केलेल्या चित्रपटांची दखल देशात आणि विदेशात घेतली गेली. दिग्दर्शन, पटकथा आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे तब्बल १२ राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या नावावर जमा झाले होते ते याच कामगिरीमुळे. कोलकात्यासारख्या विविध कलागुणांचे आगार असलेल्या शहरात ऋतुपर्णो यांचा जन्म झाला. आई-वडील दोघेही कलावंत होते. वडील सुनील घोष उत्कृष्ट माहितीपटकार आणि चित्रकार होते. अर्थशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी त्या क्षेत्रात न जाता जाहिरात संस्थेत नोकरी पत्करली. इथूनच दृश्यकलेशी त्यांचा असलेला संबंध अधिक दृढ झाला. पुढे १९९२पासून त्यांनी चित्रपट निर्मितीला सुरुवात केली. चौफेर वाचन, बंगाली साहित्य आणि साहित्यिकांबद्दल आदर, दृश्यकलेची उत्तम जाण असलेले घोष १९९४मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिरेर अंगली' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आले. 'उनीशे एप्रिल' या १९९५मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपट आणि सवरेत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार मिळाला. जाहिरात क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे कथेची पक्की दृश्यात्मक मांडणी त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटात केली. प्रासंगिक, समकालीन विषयांपासून ते गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या अभिजात साहित्याचा सखोल अभ्यास करून त्यावर चित्रपट निर्माण करण्याचे धाडस त्यांनी केले. रवींद्रनाथ ठाकूर यांच्या 'चोखेर बाली' या कादंबरीचे चित्रपट रूपांतर करणे, त्यातील मुख्य भूमिकेसाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची निवड करणे, हे निर्णय त्यांची कारकीर्द पणाला लावणारेच होते. या चित्रपटानेही सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार तर पटकावला पण त्याचबरोबर लोकनरे, टोरंटो आणि भारतातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रसिकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. उत्कृष्ट दिग्दर्शकाबरोबरच ते उत्तम पटकथाकार, गीतकार होते. काही चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी बंगालीबरोबरच, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. बच्चन कुटुंबातील प्रत्येकाबरोबर काम करणारे ते एकमेव दिग्दर्शक होते. बंगालीच नव्हे तर एकंदरच सर्जनशील निर्मितीचा प्रवाह पुढच्या टप्प्यावर नेऊन ठेवणा-या या प्रतिभावंताच्या अकाली जाण्यामुळे एक 'ऋतू' संपला आहे.

Read More »

दुष्काळाचा ससेमिरा कायमचा थांबवा!


नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या दुष्काळाच्या आणि अभूतपूर्व पाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यातून महाराष्ट्र जात आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने व पडलेला पाऊसही अवकाळी झाल्याने पिकांचे नुकसान तर झालेच पण पाणी आणि गुरांच्या दाणा-वैरणीची टंचाई निर्माण झाल्याने शेतक-यांना आपली गुरेढोरेही वाचवणे बरेच कठीण गेले. विशेषत: मराठवाडयात परिस्थिती तीव्र आहे.
नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या दुष्काळाच्या आणि अभूतपूर्व पाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यातून महाराष्ट्र जात आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने व पडलेला पाऊसही अवकाळी झाल्याने पिकांचे नुकसान तर झालेच पण पाणी आणि गुरांच्या दाणा-वैरणीची टंचाई निर्माण झाल्याने शेतक-यांना आपली गुरेढोरेही वाचवणे बरेच कठीण गेले. विशेषत: मराठवाडयात परिस्थिती तीव्र आहे. राज्याच्या धरणांमध्ये काही दिवसांपूर्वी ३४ टक्के पाणीसाठा होता, तो आता केवळ ११ टक्के आहे. पण दिलासा देणारी बाब ही की, यंदा मोसमी पावसाची वाटचाल योग्य त-हेने व योग्य दिशेने चालू आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या वा दुस-या आठवडय़ात पाऊस सुरू होईल.
पावसाचे प्रमाणही अगदी समाधानकारक म्हणजे ९६ ते ९८ टक्के पाऊस असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडय़ातील दुष्काळाची तीव्रता एवढी आहे की, तेथे गुरांच्या चा-यापाण्याच्या टंचाईमुळे गुरांचे काय करायचे, असा प्रश्न शेतक-यांपुढे आणि गुरांच्या मालकांपुढे होता. त्यामुळे सरकारने राज्यात मराठवाडय़ासह अनेक ठिकाणी गुरांसाठी चारापाण्याच्या छावण्या उघडल्या व गुरांच्या मालकांना दिलासा दिला आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्याने केंद्र सरकारकडे निधी मागितला व केंद्राने तो तत्परतेने दिलाही.
परंतु केंद्राला इतर दुष्काळी राज्यांनाही मदत देण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. केंद्राचा निधी घेऊन व अन्य तरतुदी करून राज्याने या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीला तोंड दिले. दुष्काळाचा व पाणीटंचाईचा बराच मोठा टप्पा राज्याने पार केला आहे. पाऊस आता दाराशी आला आहे. कोल्हापूर व लगतच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी पाऊस पडलाही. याच दरम्यान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दुष्काळग्रस्त मराठवाडय़ाला भेट दिली आणि आपद्ग्रस्तांची आस्थेने विचारपूस केली. औरंगाबाद जिल्हय़ातील काही दुष्काळी भागांना त्यांनी भेट दिली, गावक-यांशी संवाद साधला व 'रोहयो'वरील मजुरांची आपुलकीने चौकशी केली. त्यांच्या या दौ-याने संकटग्रस्त गावक-यांना दिलासा मिळाला व त्यांचा आपण या दुष्काळातून लवकरच बाहेर पडू, असा विश्वासही बळावला.
राज्य सरकारने दुष्काळ निवारणाच्या दिशेने वेगाने हालचाली चालू केल्या. मराठवाडा, विदर्भ, अहमदनगर व सांगली जिल्ह्यासह अनेक जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली आले. मराठवाडय़ातील उस्मानाबाद, औरंगाबाद व जालना जिल्ह्यात डिसेंबरमध्येच जलपातळी तीन टक्क्यांहून खाली गेली. म्हणजे तेथे आज काय परिस्थिती असेल याची कल्पना करावी. यंदा २० लाख हेक्टरमध्ये पेरण्याच झाल्या नाहीत. राज्यावर दुष्काळाचे सावट दर वर्षी कमीअधिक प्रमाणात पडत आहे व त्याची कारणे दूर करण्यासाठी सरकार व जनता यांनी ठोस उपाय योजण्याची गरज आहे.
पर्यावरणाचा वेगाने होणारा ऱ्हास, वाढते शहरीकरण, बेसुमार जंगलतोड यामुळे पर्जन्यमान कमी होत गेले. तसेच पडणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी जलसंधारणाच्या लहान-मोठय़ा योजना हाती घेण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर व खाजगीरीत्याही पूर्वी फारसे झाले नाहीत. शिवाय पाण्याचा उपसाही मोठय़ा प्रमाणावर होत राहिला व परिणामी भूपृष्ठाखालील आणि भूपृष्ठावरील पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे. यामुळे पाणीटंचाई अधिकाधिक तीव्र होत गेली. कूपनलिका खोलवर खणूनही पाणी लागत नाही. पण परिस्थिती काहीही असली तरी सरकार आणि जनतेने आत्मविश्वासाने दुष्काळाचा सामना करून आपण कितीही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हे दाखवून दिले आहे, हे विशेष होय.
जलसंधारणेचे महत्त्व लक्षात आल्याने अनेक गावात लोकांनी गावतळी व तलाव खोदण्याचा कार्यक्रम कुणाचीही मदत न घेता हाती घेतला. हे प्रयत्न फार मोठया प्रमाणावर झाले नसले तरी लोकांना जलसंधारणांच्या योजनांचे महत्त्व पटत आहे व स्वावलंबनाने पाणीटंचाई दूर करता येते, असा विश्वास निर्माण होत आहे, ही या दुष्काळी परिस्थितीत जमेची बाजू आहे. महत्त्वाची बाब ही की, या दुष्काळाचे आणि पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात येताच सरकारने काहीही हातचे राखून न ठेवता जनतेला याची कल्पना देऊन दुष्काळ व पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी तातडीने पावले टाकली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाडा आणि अन्य भागातील परिस्थितीची माहिती घेऊन जिल्हाधिका-यांना लोकांना याबाबत मदत करण्याच्या सूचना दिल्या. विशेषत: गुरांसाठी चारापाण्याची तातडीने व्यवस्था करण्यासाठी मराठवाडय़ासह अनेक भागात छावण्या उभारण्यात आल्या. त्यामुळे एरवी गुरेढोरे कसाईखान्यात पाठवाव्या लागणा-या गुरांच्या मालकांना दिलासा मिळाला. दुष्काळाचे स्वरूप तीव्र होताच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मराठवाडय़ाचा दौरा केला व तेथील टंचाईग्रस्त भागाची पाहणी केली. यंदा अनेक ठिकाणी पावसाने दिलेल्या ओढीमुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमुळे सुमारे ७० लाख टन धान्योत्पादन कमी झाल्याचा अंदाज आहे.
विशेषत: तांदळाच्या उत्पादनावर अपु-या पावसाचा परिणाम झाला. तसेच कडधान्याचे उत्पादनही कमी झाले आहे. अपुरा पाऊस, अवेळी पाऊस, गारपीट यामुळे धान्याचे नुकसान तर झालेच, पण नाशिक व उत्तर महाराष्ट्राच्या अन्य भागात द्राक्षे व कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यंदा धान्योत्पादन जरी कमी झाले असले तरी तरी शिलकी धान्यसाठय़ामुळे वेळ निभावून जाईल. दुष्काळातून आपण बाहेर पडत आहोत, ही गोष्ट खरी. ठरल्याप्रमाणे जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस सुरू झाला आणि तो सातत्याने पडला तरी पाणीटंचाई पूर्णपणे दूर व्हायला साधारण जुलै उजाडेल. दुष्काळ निवारणाच्या कठीण टप्प्यातून राज्य बाहेर पडले तरी ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे नियोजन, जलसंधारण, पाणी बचत आणि उपलब्ध पाणीसाठय़ाचे वाटप यांचा सरकारला व लोकांनाही विचार करावा लागणार आहे.
आपली मनोधारणा अशी आहे की, या सर्व बाबींचा आपण दुष्काळात विचार करतो आणि पाऊस सुरू झाला की, आपल्या या विचारांवर व योजनांवर पावसाचे पाणी पडते व ते पावसाच्या पाण्याबरोबरच वाहून जातात. म्हणून आपल्या या पारंपरिक मनोधारणेत बदल होण्याची आवश्यकता आहे. कुठलेही संकट येण्यापूर्वीच त्याच्या बंदोबस्ताचा विचार करावा लागतो, हे आपल्या ध्यानीही नसते. दुष्काळ निवारण ही आपत्कालीन व्यवस्था झाली, पण मुळात दुष्काळ आणि पाणीटंचाईला तोंड देण्याची पाळीच राज्यावर येणार नाही, यासाठी कसून आणि सातत्याने प्रयत्न झाले पाहिजेत. दुष्काळ निवारण नव्हे, तर दुष्काळ कायमचा हटवण्याची महाराष्ट्राची क्षमता निश्चित आहे, पण त्यासाठी इच्छा व जाणीव होणे आवश्यक आहे. याची जाणीव लोकांमध्ये उशिरा का होईना निर्माण होत आहे. हा दुष्काळ शेवटचा आहे, अशी खूणगाठ मनाशी बाळगून गेली अनेक वर्षे सुरू असलेला दुष्काळाचा हा ससेमिरा कायमचा थांबवला पाहिजे.


स्वयंशिस्तीचा 'मार्ग'


महाराष्ट्रात व देशात वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे अपघातांची संख्याही वाढत आहे. सर्व प्रकारच्या वाहतूक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेल्या राज्यात होणा-या वाढत्या अपघातांची संख्या आणि त्यात होणारी प्राणहानी ही अतिशय चिंताजनक आहे. मुंबई-गोवा महामार्गावर होणा-या अपघातांची संख्या पाहिली तर हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनत चालल्याचे दिसून येत आहे…
Read More »

जेट एअरवेजच्या माहितीसाठी नवीन अ‍ॅप


हल्ली बहुतेकांकडे स्मार्ट फोन असतात आणि स्मार्ट फोन म्हटल्यावर वेगवेगळे मोबाइल अ‍ॅप्स आलेच.

हल्ली बहुतेकांकडे स्मार्ट फोन असतात आणि स्मार्ट फोन म्हटल्यावर वेगवेगळे मोबाइल अ‍ॅप्स आलेच. सध्या ब-याच कंपन्यांनी स्वत:ची अशी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स तयार केली आहेत. मग त्यात ट्रॅव्हल कंपन्या मागे कशा राहतील?
जेट एअरवेजने खास नोकिया कंपनीच्या विंडोज मोबाइलसाठी 'जेट कनेक्ट' हे ट्रॅव्हल मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. ज्यामुळे प्रवासी कोणतेही कष्ट न घेता एका क्लिकसरशी आपल्या जेट विमानाचं तिकीट बुक करू शकतात. तसंच विमानतळाचा मार्ग, फ्लाइटची स्थिती, फ्लाइटची अचूक वेळ, बातम्या याबद्दलची माहिती लगेच आपल्या मोबाइलवर उपलब्ध होऊ शकते.
'जेट कनेक्ट' हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विंडोज फोन ७, विंडोज फोन ७.८, विंडोज फोन ८, विंडोज फोन यूआय मोबाइलसाठी मोफत वापरता येणार आहे. यूजर्स 'विंडोज अ‍ॅप्लिकेशन सेंटर'मधून हे 'जेट कनेक्ट' मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकणार आहेत, तर इतर कंपन्यांचे मोबाइलधारक हे ५६३८८ वर 'जेट अ‍ॅप्स' असा 'एसएमएस'करून हे अ‍ॅप्लिकेशन आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकतात.

Read More »

आव्हान निसर्गतांडव रोखण्याचे


अलीकडच्या काळात निसर्गाचे चक्र कोलमडले आहे. त्याच्या लहरीपणाचा सामना माणसाला करावा लागत आहे. या सा-या स्थितीला ढिसाळपणा आणि चुकांमधून धडा न घेणे, बाबी कारणीभूत आहेत. परिणामी पुढील ३० वर्षामध्ये मुंबईत मोठय़ा प्रमाणात एकाच वेळी मुसळधार पाऊस पडण्याचा आणि पुढील ५० वर्षामध्ये मोठया प्रमाणात उकाडा वाढत जाण्याचा अंदाज 'टेरी' या संस्थेने अहवालात वर्तवला आहे. वातावरणात हे बदल होण्यास जागतिक तापमान वाढ हे मुख्य कारण आहे. कार्बनडाय ऑक्साईडसह तीन वायूंमुळे तापमानवाढ होत आहे. भविष्यातील निसर्गतांडवाला रोखण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेवर भर दिला जाणे आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले जाणे, आवश्यक आहे.

निसर्गाचे चक्र सातत्याने बिघडत असून त्यामध्ये आता कमालीचे असंतुलन आले आहे. पावसाळ्याच्या दिवसात पुरेसा पाऊस पडेलच, असे नाही. कधी तो थंडीच्या किंवा उन्हाळ्याच्या दिवसातही येऊ शकतो. उन्हाळ्यात देखील तापमान केव्हा कधी वाढेल हे सांगता येत नाही. हवामानात होणा-या या बदलांनी आता माणसांच्या आयुष्यावरही परिणाम होऊ लागला आहे. अलीकडेच 'द एनर्जी अँड रिसोस्रेस इन्स्टिटय़ूट' (टेरी) या संस्थेने राज्य सरकारला सादर केलेल्या हंगामी अहवालात एक गंभीर इशारा दिला आहे.
वाढते प्रदूषण, हवामानातील फेरबदल आणि नाहीसे होत जाणारे नाले यामुळे मुंबईला पुन्हा २६ जुलैसारखा तडाखा बसण्याची शक्यता आहे तसेच मोठय़ा प्रमाणात उकाडा सहन करावा लागणार आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. येत्या ६० वर्षात वातावरणात होणारा बदल, तापमान, विकास आणि अन्य परिस्थितीचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने या संस्थेकडे शास्त्रीय अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
या अहवालात नमूद करण्यात आलेला धोका गंभीर आहेच. पण, हवामानात असे बदल का झाले, याचा विचार या निमित्ताने करावा लागेल. या सा-या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत. मानवी चुकांमुळेच आज निसर्गाने आपल्या चक्रात बदल केला आहे. वातावरणात हे बदल होण्याचे मुख्य कारण तापमान वाढ आहे. तापमान वाढीला कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन हे वायू जबाबदार आहेत. हवामानात बदल होण्यासाठी कार्बनडाय ऑक्साईडचा वाटा ७० टक्के इतका प्रचंड आहे.
तापमान वाढीमुळे हवामानात काय बदल झाले, याचा विचार करताना मानवानेच ते घडवून आणले आहे, असे लक्षात येते. आता जंगले आणि झाडांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. झाडे कार्बनडाय ऑक्साईडचा वापर अन्न तयार करण्यासाठी मोठया प्रमाणावर करतात आणि त्या बदल्यात हवेत ऑक्सिजन सोडतात. पण, कार्बनडाय ऑक्साईडचा वापर करणा-या झाडे आणि जंगलांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण आपोआप वाढले. तो झाडांमार्फत शोषला जात नाही. त्याचा वापर होत नसल्यामुळे त्याचा फटका हवामानात बदलाच्या रूपाने बसत आहे.
हवामानातील या बदलांचा विषुववृत्तावरील देशांना मोठा धोका आहे. या देशांमध्ये प्रामुख्याने चक्रीवादळासारख्या आपत्तींचा धोका संभवतो. या परिस्थितीची शास्त्रज्ञांना कल्पना असल्याने त्यांनी आपल्याला आधीच सावध केले आहे. पण, त्याचा काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. तापमान वाढीमुळे हवामानाचे चक्र इतके बिघडले आहे की, कधी पाऊस पडेल तर कधी तो पडणार नाही. पावसाळ्यात तो केवळ दोन दिवसात इतका पडेल की, सा-या पावसाळ्यातील पाणी या दोन दिवसात पडेल, तर कधी तो अजिबात न पडता दुष्काळ निर्माण होईल. अनेकदा वेळीअवेळी पावसाचा सामना करावा लागेल. तापमा वाढीची ही लक्षणे दिसत असूनही ती कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी आपण काहीच उपाय केलेले नाहीत.
हवामानातील हे फेरबदल टाळायचे असतील तर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे वृक्षतोड थांबवून झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे. पण, असे न करता आपण सिमेंटची जंगले उभी करण्यासाठी झाडांची तोडणीच सातत्याने करत आहोत. वृक्ष हा निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक आहे. त्यांनाच संपवायला निघालो तर निसर्गाचे चक्र आपसूकच बिघडणार. केवळ भारतानेच नाही तर सा-या जगाने याचा विचार फार गांभीर्याने करायला हवा. झाडे आणि जंगलांचे प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढवण्यात सर्वात जास्त वाटा अमेरिकेचा आहे. त्यानंतर चीन आणि युरोपातील देश आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकावर भारत येतो.
झाडांचे प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळू लागले आहे. समुद्राची पातळी वाढू लागली. हे लक्षात घेऊन आपला देश समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, हे लक्षात आल्यानंतर मालदीवने उपाययोजना सुरू केल्या. केवळ मालदीवलाच नव्हे तर हवामानाची स्थिती अशीच राहिल्यास भारतालाही तो धोका आहे. अशीच परिस्थिती राहिली तर अंदमान-निकोबारसारखी बेटे पाण्याखाली बुडण्याची शक्यता आहे. हे धोके लक्षात घेऊन हवामानाचे चक्र संतुलित राखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढण्यास औद्योगिक कारखाने आणि वाहनांची वाढती संख्या मोठय़ा प्रमाणावर जबाबदार आहे. आज प्रत्येक शहरात कारखान्यांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढते आहे. औद्योगिक प्रगती दाखवण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार त्यासाठी चालना देत आहे. पण, कारखान्यातून बाहेर पडणा-या कार्बनडाय ऑक्साईडचे काय करायचे, याची चिंता करावी, असे कोणाला वाटत नाही. वाहनांची वाढती संख्याही याला कारणीभूत आहे. आज मोठया शहरात प्रत्येक कुटुंबात प्रतिव्यक्ती एक वाहन असते. म्हणजे एका घरात चार माणसे असतील तर त्यांच्याकडे चार वाहने असतात. ही वाहने चालवताना कार्बनचे मोठय़ा प्रमाणावर उत्सर्जन होत असते आणि वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड वाढायला त्यामुळे मदत होते. या सर्व घटकांचा विचार या निमित्ताने व्हायला हवा.
पर्यावरणाचे संतुलन राखून निसर्गचक्र अबाधित ठेवण्यासाठी आतापर्यंत बरेच लोकप्रबोधन करण्यात आले आहे. पण, त्याचा लोकांवर फारसा परिणाम होताना दिसत नाही. पर्यावरणावर आघात केला तर त्याचे वाईट परिणाम दिसायला बराच वेळ लागतो. त्यामुळे तो लगेच दिसत नसल्याने नंतर वाईट परिणाम होणार असेल तर आपल्याला काय त्याचे, असा विचार करून लोक दुर्लक्ष करतात. पण, हा दुर्लक्षपणाच त्यांना भोवणार आहे. पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर त्यामुळे अनेक धोके निर्माण होऊ शकतात, हे लक्षात आल्यानंतरही लोक सावध होत नाहीत. या सा-या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. सा-या जबाबदा-या केवळ सरकारवर ढकलून चालणार नाही.
वातावरणातील फेरबदल टाळण्यासाठी सरकारकडून उपाययोजना आखण्यात येतील, अशी अनेकांची भावना असते. पण, सरकारकडून त्या कधी होतील तेव्हा होतील. त्यासाठी न थांबता त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून करायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने स्वत:च्या पातळीवर होईल तेवढे वृक्षारोपण करून झाडांची वाढ होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. वाहनांचे प्रमाण कमीतकमी कसे राहील आणि त्यांचा कमीतकमी वापर कसा होईल, याकडेही प्रत्येकाने लक्ष द्यायला हवे. सिमेंटची जंगले उभी करण्याचे प्रमाणही रोखायला हवे. इमारती बांधण्यासाठी वृक्षतोड होत असेल तर त्याला आळा घालायला हवा. अशा प्राथमिक गोष्टी लक्षात घेतल्या तरी निसर्गाच्या तांडवाला आळा घालता येऊ शकेल.


Read More »

नको तो नक्षलवाद


गेल्या शनिवारी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात जगदलपूरच्या मार्गावर असलेल्या घनदाट दर्भा जंगलाच्या परिसरात काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर सशस्त्र हल्ला चढवला, बेछुट गोळीबार केला, बॉम्बस्फोट घडवले आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील काँग्रेसचे नेतृत्वच संपवून टाकले.
गेल्या शनिवारी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात जगदलपूरच्या मार्गावर असलेल्या घनदाट दर्भा जंगलाच्या परिसरात काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर सशस्त्र हल्ला चढवला, बेछुट गोळीबार केला, बॉम्बस्फोट घडवले आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील काँग्रेसचे नेतृत्वच संपवून टाकले. शनिवारची संध्याकाळ मृत्यूच्या काळोखात विलीन झाली. गेल्या शनिवारी तारीख होती २५ मे, २०१३. नक्षलवाद्यांच्या दृष्टीने या तारखेला फार मोठे महत्त्व आहे. १९६७मध्ये २५ मे रोजीच दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबाडी गावात नक्षलवादी चळवळीची पहिली ठिणगी पडली होती. 'शोषित, पीडितांच्या न्याय्य हक्कांसाठी पुकारलेला संघर्ष', अशा आकर्षक वेष्टनातील मार्क्‍सवादी-लेनिनवादी गटांच्या विचारधारेचा तो पहिला सशस्त्र आविष्कार म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही. एका भूमिहीन मजुराला सरकारने देऊ केलेली जमीन हिसकावून घेणा-या गावगुंडांना त्या वेळी नक्षलवाद्यांनी धडा शिकवला होता. तेव्हाच या चळवळीचे याच गावाच्या नावाने बारसे झाले.
आता काळाच्या ओघात बरेच पाणी वाहून गेले आहे. तेव्हा आदिवासींच्या हक्कांसाठी गावगुंडांच्या विरोधात उभे ठाकलेले नक्षलवादी आज अनेक भागांत शोषणकर्ते ठरले आहेत, गावगुंडांच्याच आवेशात खाणमालक, उद्योगसमूह यांच्याकडून खंडणी वसूल करत आहेत. अराजक माजवायचे हे एकमेव उद्दिष्ट झाल्यागत चळवळीसाठी पैसा या नावाने खंडणी वसुली, शस्त्र खरेदी, अन्नधान्याची बेगमी आणि मग जमले तर आदिवासी, शोषितांचे हितसंरक्षण हे आजच्या नक्षलवादाचे वास्तव आहे.
नक्षलवादी चळवळीचा अभ्यासक असलेला चंद्रपूरचा पत्रकार देवेंद्र गावंडे गेली अनेक वर्षे याविषयी सातत्याने लिहीत आहे. नक्षलवादी चळवळीबद्दल जाणतेपणाने लिहिणा-या ज्येष्ठ पत्रकारांचे परखड बोल या तत्त्वज्ञानाची फोलपटे समोर आणतात. नक्षलवादी चळवळीच्या शर्करावगुंठीत विचारधारेची भुरळ पडून त्या काळात अनेक बुद्धिजीवी या चळवळीचे पाठीराखे झाले होते. आजही आहेत..
जनकल्याणाच्या नावाखाली अराजकाचे, हिंसाचाराचे, रक्तपाताचे, निष्पापांचे बळी घेण्याच्या पाशवी वृत्तीचे समर्थन करायला ही मंडळी जेव्हा पुढे येतात तेव्हा 'जगा आणि जगू द्या' या जगण्याच्या सरळसाध्या विचारसरणीचा अवलंब करणा-या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना ते झेपतच नाही. छत्तीसगडमधील ताज्या हिंसाचारानंतर एका वृत्तवाहिनीने नक्षलवादाविषयी लागोपाठ दोन दिवस ज्येष्ठ-श्रेष्ठ तज्ज्ञ, माहीतगारांमध्ये चर्चा घडवून आणली. या चर्चेत प्रत्येक जण नक्षलवादाविषयी बोलत होता, नक्षलवाद्यांविषयी बोलत होता, त्यांच्या विचारधारेविषयी बोलत होता. त्यांना या देशाचे कायदेच मान्य नाहीत, ही राज्यपद्धतीच कशी मान्य नाही, म्हणूनच ते स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनही पाळत नाहीत याचेही कुणी समर्थन करत होता. सर्व विषयाचा सर्वानी अनेक अंगानी कीस पाडला. सर्वसामान्यांच्या बाजूने मात्र कुणीच बोलले नाही. आदिवासींपासून तुम्हा-आम्हा सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, आम्हाला हिंसा मान्य नाही, झटपट न्यायदानाचा आव आणून एखाद्याचा जीव घेणे, गोळ्यांनी शरीराची चाळण करणे, प्रवाशांनी भरलेली अख्खी बस बॉम्बने उडवून देणे, पोलिसांवर, सीआरपीएफच्या बेसावध जवानांवर अंदाधुंद गोळीबार करून, त्यांचे हालहाल करून मारणे, मेलेल्या जवानांच्या पोटात स्फोटके भरून आणखी घातपात घडवण्याच्या आसुरी योजना आखणे यातील काही काही आम्हाला पटत नाहीत. आमच्या जगण्याच्या साध्यासोप्या व्याख्येत हे बसत नाही. नक्षलवादी विचारधारा हिंसेचे समर्थन करत असेल तर ती सर्वसामान्यांसाठी काडीचीही उपयोगाची नाही, या सगळ्यांबद्दल या चर्चेत वा नंतरही कुणी ज्येष्ठ-श्रेष्ठ, थोर थोर मंडळी कुठे बोलल्याचे आढळले नाही.
सर्वसामान्यांची ही भावना काही अंशाने प्रकटली ती प्रेक्षकांच्या, वाचकांच्या प्रतिक्रियांमधून. रोजच्या रहाटगाडग्याला खेचत, हालअपेष्टा, खस्ता सोसत, अडचणींना सामोरे जात आपण सगळेच जगतो आहोत. पण म्हणून आपण सगळ्यांनीच शस्त्रे हाती घेतलेली नाहीत वा घातपाताची कटकारस्थाने रचलेली नाहीत वा कुणावर गोळी झाडलेली नाही. कारण तुमचा आमचा जगण्याच्या तत्त्वज्ञानावर अढळ विश्वास आहे. या सगळ्यांची भावना आणखी प्रकर्षाने व्यक्त व्हावी म्हणून हे सगळे पोटतिडिकीने सांगावेसे वाटले.
नक्षलवादी चळवळीचे शहरांत सुखाने राहणारे बुद्धिजीवी समर्थक यामुळे कदाचित नाराज होतील. या लेकाला नक्षलवादी चळवळच मुळात माहिती नाही, ती विचारधाराच समजलेली नाही, अशीही टीका करतील. मान्य आहे. आयुष्यावर प्रेम करणा-या हजारो सर्वसामान्यांपैकीच एक असल्यामुळे आम्हाला त्या वाटेला जायचेच नाही. कितीही विपरीत झालं, सोसावं लागलं तरी याच सर्वसामान्यांनी अजून लोकशाही टिकवून ठेवली आहे. मानवता, बंधुभाव, मूल्यं यांना सर्वोच्च मानलं आहे. आम्हाला आमच्या देशाबद्दल अजूनही प्रेम आहे, अभिमान आहे आणि ज्यांचे उद्दिष्टच मुळी या देशाला, इथल्या व्यवस्थेला नख लावायचं आहे त्यांच्याशी आम्हाला काडीचंही घेणंदेणं नाही!

Read More »

सुलभतेचा पर्याय देणारा 'माय बडी' टॅबलेट


सध्याची पिढी ही तंत्रज्ञानप्रेमी आहे. महाविद्यालयीन तरुणांपासून ते नामांकित कंपन्यांच्या उच्चपदावर कार्यरत असलेल्या अधिका-यांपर्यंत सर्वच जण 'टक्नोसॅव्ही' होत चालले आहेत.
सध्याची पिढी ही तंत्रज्ञानप्रेमी आहे. महाविद्यालयीन तरुणांपासून ते नामांकित कंपन्यांच्या उच्चपदावर कार्यरत असलेल्या अधिका-यांपर्यंत सर्वच जण 'टक्नोसॅव्ही' होत चालले आहेत. आपल्या मोबाइलमध्ये असलेल्या सुविधांचा कसा वापर करून घ्यायचा, हे या पिढीला चांगलंच ठाऊक आहे. ही बाब लक्षात घेऊनच ग्राहकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यासाठी डिजिटल कंपन्या प्रयत्नशील आहेत.
'अ‍ॅमट्रॅक इन्फो सिस्टीमस प्रा. लि.' या कंपनीने नुकताच 'माय बडी – ए ७१२ जी' हा कॉलिंग टॅबलेट बाजारात आणला आहे. हा सात इंची टॅबलेट एक 'स्मार्ट सोशल सोल्यूशन' असून तो वैयक्तिक सुरक्षा, तुमच्या आवडीची पुस्तकं आणि भरपूर माहिती साठवण्यासाठी सज्ज आहे. २-जी सेवांसाठी हा सिंगल सिम मॉडेल आहे. अ‍ॅड्राँईड ४.० ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा या टॅबलेटमध्ये कॉर्टेक्स ए-८, १.० गिगाहर्ट्झ इतक्या क्षमतेचा सीपीयू जोडलेला आहे. चार जीबी अंतर्गत साठवण क्षमता असून ३२ जीबी अतिरिक्त साठवण क्षमता आहे. ०.३ मेगापिक्सेल फ्रंट तर दोन मेगापिक्सेल रीअर कॅमे-याची सोय या 'माय बडी – ए ७१२ जी'मध्ये आहे.
माय बडी आय वॉच, बुकचम्स, हंगामा माय प्ले अशा वेगवेगळ्या फिचर्सनी हा टॅबलेट सुसज्ज आहे. पाच वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये हा टॅबलेट उपलब्ध आहे. तुमच्या गरजांनुसार तुम्ही तुमच्या आवडत्या टॅबलेटची निवड करू शकता. ग्राहकांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास या कंपनीचा १८००१०२९५०९ हा टोल फ्री क्रमांक त्यांच्या सेवेसाठी हजर असेल.

किंमत : ८, २९९ रुपये

Read More »

आता साडीत रोजच दिसा आकर्षक!


असं म्हटलं जातं की, भारतीय स्त्रीचं सौंदर्य हे साडीत सर्वाधिक खुलून दिसतं. साजेशी साडी नेसल्यावर तिच्या उपजत सौंदर्यातून एक अनोखं लावण्य निर्माण होतं.
असं म्हटलं जातं की, भारतीय स्त्रीचं सौंदर्य हे साडीत सर्वाधिक खुलून दिसतं. साजेशी साडी नेसल्यावर तिच्या उपजत सौंदर्यातून एक अनोखं लावण्य निर्माण होतं. प्रत्येक क्षणी अधिकाधिक सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या रंगसंगतींची आधुनिक डिझाइन्स असलेल्या साडया या तरुणींना विशेष आकर्षति करतात. अशा या 'स्त्री-वस्त्राला' मान देत 'टेलिब्रॅण्ड'तर्फे 'मंडे टू सॅटर्डे डिझाइन साडी' या नावाचं कलेक्शन बाजारात सादर करण्यात आलं आहे.
खास सोमवार ते शनिवार अशा सहा दिवसांसाठी तयार करण्यात आलेल्या 'मंडे टू सॅटर्डे डिझाइन साडी' कलेक्शनद्वारे दर दिवशी विविध रंगछटा व डिझाइन्सच्या साडया परिधान केल्यामुळे तुमचं सौंदर्य अधिकच खुलून दिसेल, असा दावा कंपनी करते.
सहा प्रकारांमध्ये हे कलेक्शन उपलब्ध आहे. सहावारी साडी, त्याच्यासोबत प्रिंटेड ब्लाऊज, मशिनमध्येही धुता येऊ शकेल असं उत्तम दर्जाचं सूत यामुळे या साडया लोकप्रिय ठरत आहेत. डोळ्यांना सुखावणारा निळा रंग, हवाहवासा वाटणारा गुलाबी रंग, 'समर' लुक देणारा पिवळा रंग, दैनंदिन वापरासाठी तयार केली गेलेली लाल-पांढ-या रंगांची संमिश्र रंगसंगती, व्यक्तिमत्त्वात आगळीच चमक आणणारा काळा रंग, पार्टीत तसंच महत्त्वाच्या समारंभांना अनेकदा वापरला जाणारा हिरवा रंग अशा साध्या लुक आणि डिझाइन्समधील या साडया आकर्षक दिसतात. चला तर मग, सोमवार ते शनिवार दिसा अगदी निराळं, प्रत्येक रंगात!

Read More »

सौंदर्य जपणारी बॅग!


लेडिज पर्स किंवा बॅग म्हटली की त्यात काय काय असू शकतं, याची तुम्ही कल्पना करू शकता? कदाचित नाही, कारण आपल्या कल्पनेतही न मावणा-या गोष्टी स्त्रियांच्या बॅग या प्रकारात मावत असतात.
लेडिज पर्स किंवा बॅग म्हटली की त्यात काय काय असू शकतं, याची तुम्ही कल्पना करू शकता? कदाचित नाही, कारण आपल्या कल्पनेतही न मावणा-या गोष्टी स्त्रियांच्या बॅग या प्रकारात मावत असतात. हे स्वत: एक सौंदर्यवतीही कबूल करते. यंदाच्या फेमिना मिस इंडिया २०१३ ची रनर-अप झोया अफ्रोज सांगते, 'माझी आई म्हणते, मी माझ्या पर्समध्ये अख्खं जग घेऊन फिरते.' खरंच ही गोष्ट प्रत्येक स्त्रीमनाला पटवणारी आहे. म्हणूनच केवळ एका बॅगेने आपलं भागत नाही. आपल्याला ड्रेसेसप्रमाणे बॅगेचंही कलेक्शन लागतं आणि तेही बदलत्या ऋतूनुसार. म्हणून बॅगेचं उत्तमोत्तम कलेक्शन सादर करणा-या व्हीआयपी ब्रॅण्डने नुकतंच बॅगमध्ये यंदाची 'स्प्रिंग समर' रेंज सादर केली आहे. कॅप्रिज नावाने हे कलेक्शन आता व्हीआयपीच्या सर्व शो-रुम्समध्ये तुमच्या हातात सजायला सज्ज झालं आहे. फेमिना मिस इंडियाची सौंदर्यवती नवनीत कौर ढिल्लोन आणि रनर-अप शोभिता ढुलीपाला व झोया अफ्रोज यांनी वांद्रेच्या व्हीआयपी शो-रुममध्ये नुकतंच या कॅप्रिज बॅग्जचं अनावरण केलं.
तरुणाईला खास भावणा-या फ्रेश आणि ब्राइट रंगातली या कॅप्रिज बॅग्ज तुमच्या हातात असतील, तेव्हा इतरांचं लक्ष नक्कीच आकर्षित करतील, यात शंका नाही. सध्याच्या 'बोल्ड' ट्रेण्डला साजेसे असे टॅन्गी ऑरेंज, क्रिस्पी कोरल, पॉपी रेड, क्लासिक ब्लॅक अ‍ॅण्ड टॅन, ब्रिक रेड, निऑन ब्लू, मडी ब्राऊन, ऑर्क यलो.. असे रंग या बॅग्जमध्ये आहेत. या कलेक्शनचं वैशिष्टय म्हणजे यात आकारांचंही वैविध्य भरपूर आहे. चौकोनी, आयताकृती, छोटया- मोठया, उभट आणि पसरट.. म्हणजे आपल्या सोयीनुसार कधी ट्रॅव्हल बॅग म्हणून तर कधी केवळ आपलं मेकअप किट, एखादी छोटी पर्स, मोबाइल सामावेल अशा आकारातली आणि खास समारंभात मिरवता येईल अशी.. असे हे आकार आपल्या लुकलाही आकर्षक बनवतात.
शिवाय होबोज, क्लचेस, टोट्स, सॅचेल्स वापरून बनवण्यात आलेल्या या डिझायनर बॅग एकूणच व्यक्तिमत्त्वाला स्टायलिश बनवतात. खरं सांगायचं तर, प्रत्येक बॅगेचा लुक हा वेगळा आहे. जवळ जवळ १५० स्टाइलमध्ये या बॅग्ज उपलब्ध आहेत. त्यामुळे हे कलेक्शन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमची बॅग ही तुमच्या मैत्रिणीसारखीच असेल, असं अजिबातच होणार नाही. फॅशन कशाशी खातात हे आम्हालाच विचाराव, अशा जमान्यात वावरणा-या आपण सध्याच्या तरुणी आम्ही आमच्या ड्रेस कलेक्शनवरही क्षणार्धात पाच-पाच हजार रुपये खर्च करतो, तर काय २००० ची बॅग खरेदी करायला मागे-पुढे पाहणार आहोत? पण खरंच, स्टायलिंग आणि मजबुती तरीही फेमिनाइन लुक आणणा-या या बॅग्स जर चारचौघांत तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी चमकवत असतील तर पैसे बाळगणा-या बॅगसाठी थोडे जास्त पैसे खर्च करायला काय हरकत असणार आहे. पण पैशाचा विचार शोरुम मध्ये प्रवेश केल्यावर तुमच्या डोक्यातही येणार नाही. कॅप्रिजचं कलेक्शन तुमची नजर आकर्षित करेल आणि तिथं गेल्यानंतर तुमच्या आवडीची बॅग क्षणाचाही विलंब न करता, तुमच्या खांद्याशी येईल, हे नक्की!

Read More »

छोटयांच्या फॅशनमधलं 'कांचनयुग'


'छोटा बच्चा समझके हमको ना समझाना रे' म्हणत मला कोणती शर्ट-पॅण्ट छान दिसते, कोणता फ्रॉक घातला की मला मैत्रिणी छान म्हणतात, असं मुलं आपल्या पालकांना ऐकवताना दिसतात.
'छोटा बच्चा समझके हमको ना समझाना रे' म्हणत मला कोणती शर्ट-पॅण्ट छान दिसते, कोणता फ्रॉक घातला की मला मैत्रिणी छान म्हणतात, असं मुलं आपल्या पालकांना ऐकवताना दिसतात. वयाने लहान असली तरी आजची बच्चेकंपनी आपल्या 'लूक'बाबत प्रचंड जागरूक असते. आजी म्हणते, 'आमच्या वेळी मुलींचे एवढे नखरे नसायचे हो! कपाळाला लाल कुंकू लावल्याशिवाय एक मुलगी दिसेल तर शपथ!' आई म्हणते, 'किमान टिकली तरी असावी कपाळावर!' ताई म्हणते, 'मी काही टिकली लावणार नाही, इट्स व्हेरी ओल्ड फॅशन!' तर छोटी भाची म्हणते, 'माझ्या मैत्रिणीच्या ताईसारखा टॅटू तू पण काढ ना!' म्हणजेच जसजसा काळ बदलतोय, त्याप्रमाणे फॅशन बदलत आहे आणि आजची फॅशन नेमकी कशी आहे, याबाबत मोठयांपेक्षाही छोटी मुलं अप टू डेट आहेत.
'इनोव्हेशन' हा सध्याचा फॅशन ट्रेण्ड दिसतो. म्हणजे संपूर्णपणे नवीन उत्पादन बाजारात आणण्यापेक्षा जुन्या उत्पादनांमध्ये बदल करून ती नव्याने ग्राहकांसमोर आणली जातात. केवळ निळ्या रंगाच्या अनेक वर्षे वापरल्या जाणा-या जीन्सच्या मूळ रंगातच बदल करून आता हरत-हेच्या रंगीबेरंगी जीन्स मुलं वापरत आहेत. नेहमीच्या केशरी, हिरव्या, पिवळ्या रंगाच्या घडयाळांच्या ऐवजी मुलांच्या आवडत्या कार्टून्सची चित्रं असलेली किंवा त्या कार्टूनमध्ये वापरली जाणा-या गॅझेटसारखी दिसणारी घडयाळं मुलं वापरतात. इतकंच नाही, तर आता मोठयांबरोबरच लहान मुलंही सोन्याच्या दागिन्यांकडे आकर्षित होतील, अशी दाट शक्यता आहे. बाजारात इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी दागिने मिळत असताना सोन्याचे दागिने घालायचा छोटया मुलांना कंटाळा येतो. सणा-समारंभाला आई-बाबांसारखे खरे दागिने हवे म्हणून मुलं हट्ट करतात. पण आपल्याबरोबरच्या मुला-मुलींनी घातलेले वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेण्डी दागिनेच त्यांना आकर्षित करतात. यावर उपाय म्हणून आता 'एमरल्ड' कंपनीने खास २० वर्षापर्यंतच्या मुलांसाठी सोन्याचे फॅशनेबल दागिने तयार केले आहेत .
'एफ. एफ. एफ' या नावाने हा ब्रॅण्ड बाजारात येणार आहे. लहान मुलं आणि टीनेजर्सच्या आवडी-निवडी, फॅशन लक्षात घेऊनच या सोन्याच्या दागिन्यांच्या डिझाइन्स तयार करण्यात आल्या आहेत. फुलपाखरू, पतंग, कार, फुलं अशा मुलांना आवडणा-या नक्षीचे दागिने सुंदर दिसतात. शिवाय यात सोन्याबरोबरच लाल, गुलाबी, निळा, हिरवा असे विविध प्रकारचे रंग वापरलेले आहेत. त्यामुळे मुलांना ते आकर्षित करतात. १८ कॅरेटच्या अंगठया ,पेंडण्ट्स, ब्रेसलेट असे वेगवेगळे दागिने आपल्यासमोर सादर होतात. हे दागिने मुलांना निश्चितच आवडतील. आता छोटयांना गिफ्ट द्यायचं असेल तरी हा चांगला पर्याय आहे.


Read More »

रिव्हर्स स्विंग – ३१ मे २०१३


क्रिकेटच्या मैदानावरच्या रंजक गोष्टी 
१९०२
ऑस्ट्रेलियाने कसोटीतील सर्वात नीचांकी धावसंख्येची नोंद केली. पहिल्या डाव दीड तासांतच ३६ धावांवर गडगडल्यानंतर ३४० धावांनी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णित राखला. तीन दिवसांच्या या सामन्यात शेवटच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला हे शक्य झाले. विल्फ्रेड ऱ्होड्स यांनी सात विकेट्स मिळवल्या.

१९२६
भारताचे सर्वोत्तम यष्टिरक्षक खोखान सेन यांचा जन्म. १९४७-४८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत चार झेल पकडत त्यांनी सर्वानाच प्रभावित केले. १९५१-५२मध्ये मद्रास येथील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत त्यांनी विनू मंकड यांच्या गोलंदाजीवर पाच फलंदाजांना यष्टिचीत केले. त्यामुळे भारताला हा सामना जिंकता आला.

१९२८
भारताचे पंकज रॉय यांचा जन्म. १९५५-५६मध्ये मद्रास येथील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत पंकज रॉय (१७३) यांनी विनू मंकड (२३१) यांच्यासह त्या वेळी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम ४१३ धावांची भागीदारी रचली. इंग्लंडमधील नऊ कसोटीत त्यांना १३च्या सरासरीनेच धावा कुटता आल्या. त्यात ते सहा डावांत पाच वेळा शून्यावर बाद झाले. १९५९मध्ये लॉर्ड्स कसोटीत त्यांनी एकदाच भारताचे नेतृत्व सांभाळले. त्यांचा मुलगा प्रणवही भारतातर्फे कसोटी क्रिकेट खेळला.

१९४६
कसोटीतील सर्वात अनुभवी पंच स्टीव्ह बकनर यांचा जन्म. बकनर यांनी डिकी बर्ड यांचा विक्रम २००२मध्ये मागे टाकून २००५मध्ये कसोटीत १०० सामन्यात पंचगिरी करणारे ते पहिले पंच ठरले. १९९२-२००७मध्ये सलग पाच वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पंचगिरी करताना त्यांनी विक्रम नोंदवला. काही महत्त्वाचे चुकीचे निर्णय देणा-या बकनर यांना निवृत्तीच्या दोन वर्षेआधीच म्हणजे २०११मध्ये निवृत्त व्हावे लागले. बकनर यांनी फुटबॉल वर्ल्डकपच्या पात्रता फेरीच्या सामन्यातही रेफ्री म्हणून काम पाहिले आहे.

१९६६
श्रीलंकेचा फलंदाज रोशन महानामाचा जन्म. त्याने १९९७-९८मध्ये कोलंबो येथे सनथ जयसूर्यासह दुस-या विकेटसाठी ५७६ धावांची भागीदारी रचली. कसोटीत आजही हा विक्रम कायम आहे. दोन दिवस फलंदाजी करणारी ही पहिली जोडी ठरली. त्यांच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेने ६ बाद ९५२ धावा केल्या. हाही एक विक्रम ठरला. १९९२-९४ दरम्यान आक्रमक फलंदाजी करत महानामाने सहा कसोटीत तीन शतके झळकावली.

१९७३
दुस-या महायुद्धानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा न्यूझीलंडचे ग्लेन टर्नर पहिले फलंदाज ठरले. ऐन बहरात असलेल्या टर्नर यांनी नंतर ११, ९, ४, ११ आणि ८१ अशा धावा केल्या.

१९८४
वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी सादर केली. ओल्ड ट्रॅफर्ड येथील टेक्सास ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजची अवस्था ७ बाद १०२ आणि त्यानंतर ९ बाद १६६ अशी असताना रिचर्ड्स यांनी मायकेल होल्डिंग यांच्यासह शेवटच्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केल्यामुळे विंडीजला २७२ धावा फटकावता आल्या. रिचर्ड्स यांनी १७० चेंडूत २१ चौकार आणि पाच षटकारांसह १८९ धावा तडकावल्या. हा सामना वेस्ट इंडिजने १०४ धावांनी जिंकला.

१९९९
वर्ल्डकपमधील नॉर्दम्प्टन येथील सामन्यात पाकिस्तानला दुबळ्या बांगलादेशकडून पराभूत व्हावे लागल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या. खराब फटकेबाजी आणि चुकीच्या पद्धतीने स्वत:ला धावबाद करवून घेत पाकिस्तानने स्वत:चेच मुंडके छाटले, असे कामरान अब्बासी यांनी 'विस्डेन क्रिकेट मंथली'मध्ये म्हटले. या सामन्यात खेळलेले सलीम मलिक यांनीही 'पाकिस्तानची संशयास्पद कामगिरी' अशी टीका केली होती.


Read More »

अंतराळप्रवासाचा 'शॉर्टकट'


आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर(आयएसएस) जाण्यासाठी तीन अंतराळवीरांना घेऊन निघालेल्या सोयूझ या रशियन अंतराळ प्रक्षेपकाने नुकताच अंतराळ प्रवासाचा नवा विक्रम केला.
आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर(आयएसएस) जाण्यासाठी तीन अंतराळवीरांना घेऊन निघालेल्या सोयूझ या रशियन अंतराळ प्रक्षेपकाने नुकताच अंतराळ प्रवासाचा नवा विक्रम केला. या अंतराळ प्रक्षेपकाने पृथ्वीवरून झेपावल्यावर केवळ सहा तासांत अंतराळ केंद्रावर जाण्यात यश मिळवले. प्रत्यक्षात अंतराळ केंद्रावर जाण्यासाठी दोन दिवस म्हणजेच ४८ तास लागतात. परंतु या प्रक्षेपकाने अंतराळ केंद्राकडे जाण्यासाठी वेगळ्या कक्षेचा वापर केला. या कक्षेतून प्रवास केल्यामुळे अंतराळ केंद्रावर अतिशय कमी वेळेत पोहोचणे शक्य झाले आहे. यापूर्वी या कक्षेचा वापर फारच कमी वेळा करण्यात आला आहे. कारण या कक्षेतील प्रवासामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर जास्त ताण निर्माण होत असतो.
मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला अशा प्रकारच्या अंतराळ प्रवासाचा प्रयोग यशस्वी ठरला होता. म्हणून रशियाने पुन्हा एकदा या कक्षेचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंतराळप्रवासाच्या कालावधीत कमालीची घट झाली. भविष्यात अंतराळकेंद्राकडे जाण्यासाठी सहा तासांची कालमर्यादा निर्धारित करण्याचा उद्देश आहे. कझाकस्तानमधील बैकानूर अंतराळकेंद्रावरून या प्रक्षेपकाने मंगळवारी यशस्वी उड्डाण केल्यावर बुधवारी अंतराळवीर असलेली सोयूझ कॅप्सूल अंतराळकेंद्राशी यशस्वीरीत्या जोडली गेली.
अशा प्रकारे सोयूझ या अंतराळ प्रक्षेपकाने दिलेली कामगिरी फत्ते केली. त्या वेळी सोयूझ ताशी ७५०० किमी. वेगाने प्रवास करत होते. सोयूझ प्रक्षेपकावर असलेल्या कॅप्सूलमध्ये नासाचे करेन नायबर्ग, रशियाचे फ्योदोर युरचिखिन व इटलीचे ल्युका पारमितानो हे तीन अंतराळवीर होते. कॅप्सूल अंतराळकेंद्राशी जोडली गेल्यावर अंतराळकेंद्र आणि कॅप्सूलमधील दाब समान होण्यासाठी दोन तास थांबावे लागले. अंतराळवीरांचा एका भागातून दुस-या भागात सुरक्षित प्रवेश होण्यासाठी दाब समान असणे आवश्यक असते.
तिन्ही अंतराळवीरांचा अंतराळकेंद्रात प्रवेश झाल्यावर तेथे आधीपासून असलेल्या नासाच्या ख्रिस सेसिडी, रशियाचे अ‍ॅलिएंडर मिसुरिकिन व अंतराळस्थानकाचे कमांडर पावेल विनोग्रेडोव यांनी त्यांचे स्वागत केले. हे अंतराळवीर तेथे मार्च महिन्यापासून आहेत. नुकतेच गेलेले अंतराळवीर तेथे सहा महिने वास्तव्य करणार आहेत.

Read More »

'अनधिकृत घरात राहणा-यांना बेघर करणार नाही'


मुंबईतून मराठी माणूस कमी होण्यास शिवसेना जबाबदार आहे, असा प्रहार उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला.
ठाणे – मुंबईतून मराठी माणूस कमी झाला. त्यास शिवसेना जबाबदार आहे. गिरण्यांच्या जमीनी विकल्पामुळे मराठी माणूस बेरोजगार झाला आहे. शिवसेनेने त्यांच्या पोटापाण्यासाठी कोणता उद्योग दिला. मनोहर जोशींनी मात्र ४२० कोटींना कोहिनूर मील विकत घेतली. ते कायम जनतेला लूबाडत आहेत.त्यांनाच जनता पुन्हा कशी निवडून देते असा सवाल उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ठाण्यात गुरुवारी आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात केला.
ठाण्यात अनधिकृत घरात राहण्यांना बेघर होऊ देणार नाही. पूर्वी अनधिकृत बांधकामांचा विषय न्यायालयात असतानाही ही बांधकामे तोडण्यात आली नाहीत. या घरांमध्ये राहणारी जनता आमची आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आनंदाने आघाडी केली नाही. तो तडजोडीचा भाग होता, असे राणे म्हणाले.

Read More »

'आपलं पर्यावरण' चित्रपट महोत्सव पाच जूनपासून


पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण दक्षता मंचातर्फे पाच ते सात जूनमध्ये 'आपलं पर्यावरण चित्रपट महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई - राज्य सरकारचा पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्यातर्फे पाच ते सात जून या कालावधीत 'आपलं पर्यावरण चित्रपट महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणा-या या महोत्सवाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होईल. पर्यावरणाशी संबंधित प्रश्न समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत, हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
या महोत्सवात वसुंधरा लघुचित्रपट स्पर्धेतील सहभागी लघुचित्रपटांचे चित्रीकरण करण्यात येईल. ४८ स्पर्धक त्यात सहभागी झाले होते. या चित्रपटांचे परीक्षण सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे, दूरदर्शन निर्माते रविराज गंधे, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर, आयझॅक किहिमकर आणि समीक्षक हेमंत देसाई यांनी केले. स्पर्धेच्या विजेत्यांची निवड करण्यात आली असून, चित्रपट महोत्सवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.
कचरा, जंगलतोड आदी विषयांवरील लघुचित्रपटांचा सहभाग असला, तरी पाणी प्रश्नांवरील चित्रपटांची संख्या यंदा जास्त आहे, असे या स्पर्धेचे आयोजक प्रसाद दाते यांनी सांगितले. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणविषयक अनेक वाद निर्माण झाले आहेत. मात्र एकीकडे पर्यावरणाचा -हास होत असताना, वैयक्तिक पातळीवर लोकांमध्ये पर्यावरणाविषयी सजगता आहे. अशा उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी व्हावेसे वाटते, ही बाब दिलासा देणारी आहे. महाराष्ट्रात असा उपक्रम राबवला जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे या स्पर्धेचे परीक्षक हेमंत देसाई यांनी 'प्रहार'ला सांगितले. या महोत्सवात मोफत प्रवेश असून, प्रवेशअर्ज माहीम येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान, नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे ३० मेपासून उपलब्ध होतील. जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read More »

पदवीसाठी ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी सुरू


मुंबई विद्यापीठात यंदा पहिल्यांदाच पदवीच्या प्रवेशांसाठी ऑनलाइन नोंदणीपूर्व प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

मुंबई- मुंबई विद्यापीठात यंदा पहिल्यांदाच पदवीच्या प्रवेशांसाठी ऑनलाइन नोंदणीपूर्व प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, सायंकाळपर्यंत ५००हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
या प्रक्रियेतून विद्यापीठाच्या अंतर्गत येणा-या सर्व कला, विज्ञान, वाणिज्य आणि विधी (पाच वर्ष) महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. त्याचबरोबर बीएमएम, बीएमएस, एमएस, बीएसडब्ल्यू, बीएस्सी (आयटी) बीएस्सी (नॉटिकल आणि होम सायन्स मेरिटाइम हॉस्पिटॅलिटी, फोरेन्सिक सायन्य आदी), बी. कॉम (बी अँड आय), बी. कॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बी. कॉम (फायनान्स अँड मार्केट), बी. कॉम (आउटसोर्सिंग अँड फायनान्स), बी. कॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स), प्रथम वर्ष बी.एस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), प्रथम वर्ष बी. एसडब्ल्यू आणि बीएमएस आदी पदवी अभ्यासक्रमांचेही प्रवेश आणि त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
विद्यापीठाच्या या ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रियेला गुरुवारी सुरुवात झाल्यानंतर सायंकाळपर्यंत तब्बल साडेपाचशे विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. तर पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. विद्यापीठाने या नोंदणीसाठी http://www.mu.ac.in संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे.
Note: There is a poll embedded within this post, please visit the site to participate in this post's poll.
प्रवेश प्रक्रियेचा तपशील
प्रवेश अर्जाचे वितरण – ३० मे ते ६ जून
प्रवेशपूर्व नावनोंदणी अर्ज भरणे – ३० मे ते ७ जून
अर्जपूर्व नावनोंदणी अर्जाच्या प्रिंटसह भरणे – ६ ते १० जून, दुपारी ३ वाजेपर्यंत
पहिली गुणवत्ता यादी – ११ जून रोजी दुपारी १.३० वाजता
प्रवेश शुल्क भरणे – ११ ते १२ जून दुपारी १.३० वाजेपर्यंत
दुसरी गुणवत्ता यादी – १२ जून सायं. ६ वाजता
प्रवेश शुल्क भरणे – १३ ते १४ जून दुपारी १.३० वाजेपर्यंत
तिसरी गुणवत्ता यादी – १४ जून सायं. ६ वाजता
प्रवेश शुल्क भरणे – १५ ते १७ जून दुपारी १.३० वाजेपर्यंत

Read More »

म्हाडाची सोडत आज


म्हाडाची घरांसाठीची सोडत शुक्रवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी १० वा. काढण्यात येणार आहे.

मुंबई- म्हाडाची घरांसाठीची सोडत शुक्रवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी १० वा. काढण्यात येणार आहे. १,२४४ घरांपैकी मुख्यमंत्री कोटय़ातील २४ घरे वगळून १,२२० घरांची सोडत काढली जाणार आहे. या घरांसाठी आलेल्या ८७,६४७ अर्जदारांमधून विजेते ठरवले जाणार आहेत.
दरम्यान, माजी आमदार-खासदार, शहिदांचे कुटुंबीय व केंद्रीय कर्मचारी या प्रवर्गात घरांपेक्षा कमी अर्ज आल्याने यातील सोडतीपूर्वीच १५ अर्जदार विजेते ठरले आहेत. माजी आमदार, खासदार या प्रवर्गात काही ठिकाणी अर्जच न आल्याने १६ घरे रिकामीच राहणार आहेत.
ढोलताशे वाजणार
सोडतीत घरांच्या संकेतानुसार विजेते घोषित झाल्यावर मंडपाबाहेर ढोल-ताशे वाजवून विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येणार आहे.
यंदा प्रथमच ढोल-ताशांचा नाद सोडतीच्या मंडपाबाहेर घुमणार आहे. तसेच दरवर्षी सोडतीच्या वेळी सूत्रसंचालन करण्यासाठी बाहेरील व्यक्ती बोलावली जाते. मात्र यावेळी चक्क म्हाडाचे आयपीएस अधिकारी रामराव पवार सूत्रसंचालन करणार आहेत.

Read More »

लबाड प्रेम तनेजा होता सट्टेबाजांच्या 'ब्लॅकलिस्ट'मध्ये


सट्टेबाजीप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या प्रेम रामचंद्र तनेजाने दिल्लीतील अनेक सट्टेबाजांनाही गंडा घातल्यामुळे सट्टेबाजांनीही त्याला 'ब्लॅकलिस्ट'मध्ये टाकले होते.
मुंबई – सट्टेबाजीप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या प्रेम रामचंद्र तनेजाने दिल्लीतील अनेक सट्टेबाजांनाही गंडा घातल्यामुळे सट्टेबाजांनीही त्याला 'ब्लॅकलिस्ट'मध्ये टाकले होते. त्यामुळे तो विंदूमार्फत सट्टा खेळत होता, अशी माहिती त्याच्या चौकशीतून पुढे आली आहे.
नवी दिल्लीतील करोलबाग येथील नाईवाला परिसरात राहणारा प्रेम तनेजा हा सट्टेबाजांच्या वर्तूळात बराच चर्चेत होता. विंदूचा मध्यस्थी म्हणून काम करणा-या तनेजाने अनेक सट्टेबाजांना गंडा घातल्याचे चौकशीत पुढे आले आहे. सट्टेबाजीचा नाद असणारा तनेजा एकाच वेळेला दोनही संघांवर वेगवेगळा सट्टा खेळायचा. मात्र, हरलेले पैसे तो बुकिंना द्यायला टाळाटाळ करायचा. त्याच्या या कार्यपद्धतीबाबत दिल्लीतील अनेक सट्टेबाजांना माहिती झाल्यामुळे तो नेहमी वेगवेगळ्या सट्टेबाजांकडे पैसे लावायचा. विंदूमार्फतही त्याने अनेक वेळा सट्टा खेळल्याचे निष्पन्न झाले आहे.
तनेजा हा विंदू दारासिंग व सट्टेबाज पवन जयपूर व संजय जयपूर यांच्यासाठी मध्यस्थी म्हणून काम करायचा. त्यातून तो अनेक वेळा पाकिस्तानी पंच असद रौफ याला खरेदीसाठी घेऊन जात होता. पवन व संजय या दोघांनीही रौफला खरेदीसाठी विंदूकडे पैसे दिले होते. त्यातील एक लाख रुपये विंदूने तनेजाला दिले होते. त्यातूनच मुंबईतील एका मॉलमधून रौफने महागड्या वस्तूंची खरेदी केली होती. त्यानंतर त्याच्या अटकेची कुणकुण लागल्यामुळे दुबईला पळण्याच्या तयारीत असताना, मुंबई विमानतळावरून गुन्हे शाखेने त्याला अटक केली.
तनेजा हा दिल्लीतील मोठा 'चिटर' आहे. विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांनी क्रिकेटपटू श्रीशांतला अटक केली त्यावेळी त्याच्यासोबत त्या तीन मुली कोण होत्या, याचीही माहिती तनेजाला असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
दोन मॉडेलचा सहभाग उघड
जुहूतील ऑकवूड व नोव्हेटाईल या दोन हॉटेलमध्ये संजय जयपूर व पवन जयपूर हे दोनही सट्टेबाज अनुक्रमे १६ व १७ मे रोजी राहिले होते. तेथील सीसीटीव्हीच्या पाहणीत दोन मॉडेल त्यांच्या खोल्यांमध्ये जात असल्याची बाब पुढे आली आहे. मूळच्या कझाकिस्तानच्या असणा-या या मॉडेलना विंदूने तेथे पाठवले असल्याचेही चौकशीत पुढे आले आहे.
टिंकूला आज मुंबईत आणणार
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेल्या अश्विन जयनारायण अगरवाल उर्फ टिंकू याच्याविरोधात गुन्हे शाखेने न्यायालयाकडून अटक वॉरण्ट प्राप्त केला आहे. दिल्ली न्यायालयाच्या संमतीनुसार टिंकूला शुक्रवारी मुंबई आणण्यात येणार असून, त्यानंतर गुन्हे शाखा स्थानिक न्यायालयात त्याच्या कोठडीची मागणी करणार आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या रमेश व्यास याच्याकडील दूरध्वनी लाईनवरून तो पाकिस्तान व दुबईतील सट्टेबाजांच्या संपर्कात होता.
चेन्नईतील हॉटेल मालकाची आज चौकशी
चेन्नईतील हॉटेल व्यवसायिक विक्रम अगरवाल याला गुन्हे शाखेने समन्स पाठवले असून, शुक्रवारी त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. रॅडीसोन ब्लू इगमोर या हॉटेलचा मालक असलेल्या विक्रमने विंदूची ओळख मय्यपनशी करून दिली होती. या दोघांच्याही चौकशीत त्याचे नाव आल्याने तो मुंबई पोलिसांच्या रडारवर आला होता. त्याने पत्नीच्या नावावरील सीमकार्डच्या सहाय्याने आयपीएल सामन्यांदरम्यान किट्टी या सट्टेबाजाशी तो संपर्कात होता, असे निष्पन्न झाले आहे.

Read More »

प्रीती राठीच्या प्रकृतीत किंचित सुधारणा


वांद्रे येथील अँसिड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीती राठीच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचे बॉम्बे हॉस्पिटलचे वरिष्ठ प्लॅस्टिक सर्जन डॉ. अशोक गुप्ता यांनी सांगितले.
मुंबई – वांद्रे येथील अँसिड हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीती राठीच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचे बॉम्बे हॉस्पिटलचे वरिष्ठ प्लॅस्टिक सर्जन डॉ. अशोक गुप्ता यांनी सांगितले. जोपर्यंत तिची प्रकृती सुधारत नाहीत, तोपर्यंत तिच्यावर मोठ्या शस्त्रक्रिया करणे शक्य नाही. प्रीतीची प्रकृती प्रचंड चिंताजनक झाली होती, मात्र बुधवारी त्यात किंचित सुधारणा झाली.
अॅसिड हल्ल्यामुळे प्रीतीच्या अन्ननलिकेसह फुप्फुसाला इजा झाली आहे. सततच्या अंतर्गत रक्तस्रावामुळे तिची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे प्रीतीला दररोज पाच ते सहा बाटल्या रक्त दिले जात आहे. तिच्या शरिरातील रक्तपेशींची संख्या ५० हजारांवर आली असून, ती
एक लाख इतकी असणे आवश्यक आहे. प्रीतीच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी झाले आहे. अन्ननलिकेला इजा झाल्याने तेथून येणारे रक्त हे फुप्फुसाच्या दिशेने जमा होत आहे. जमा झालेले रक्त बाहेर काढण्याकरता डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र प्रीतीची प्रकृती सुधारत नाही, तोपर्यंत शस्त्रक्रिया करणे जोखमीचे ठरेल, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
सध्या प्रीतीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. अशा अवस्थेत एखाद्या चाचणी अथवा शस्त्रक्रियेसाठी तिला अन्यत्र हलवणे शक्य नाही, असेही डॉ. गुप्ता म्हणाले. रुग्णालयातील १७ तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक प्रीतीवर उपचार करत आहेत. अॅसिडमुळे चेहरा आणि हाताची त्वचा जळाली होती. तेथे डॉक्टरांनी तात्पुरती त्वचा बसवली आहे. ती काही दिवसांनी काढण्यात येणार आहे.
प्रीतीला दररोज दूध आणि प्रोटिनयुक्त पदार्थ खाण्यास दिले जात आहेत. दरम्यान प्रीतीचा वैद्यकीय खर्च एका व्यक्तीने उचलण्याची तयारी दाखवली आहे. मात्र त्या व्यक्तीने आपले नाव उघड करण्यास नकार दिला आहे.


Read More »

सुशांत शेलारला उच्च न्यायालयाचा दिलासा


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत बनावट मतपत्रिका प्रकरणी अभिनेता सुशांत शेलारच्या अटकपूर्व जामिनावर १३ जूनला निर्णय घेण्यात येईल असे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना दिले.
मुंबई – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत बनावट मतपत्रिका तयार करून त्या दोन दिवसांत मतपेटीत टाकल्याप्रकरणी अभिनेता सुशांत शेलार याच्या अटकपूर्व जामिनावर १३ जून रोजी निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत त्याला अटक करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना दिले. या प्रकरणी शिवडी सत्र न्यायालयाने २८ मे रोजी त्याचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी परिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेता मोहन जोशी हजर होते.
२३ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत नाट्य परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया झाली. यामध्ये एक हजार ९९१ बनावट मतपत्रिका आणि पाकिटाच्या सहाय्याने १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी बोगस मतदान केल्याची तक्रार निवडणूक अधिका-यांनी शिवाजी पार्क पोलिसांत केली. पोलिसांनी याचा तपास करताना पाच-सहा संशयितांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी, सुशांत शेलार आणि रुपेश पालव यांना बनावट मतपत्रिका निवडणुकीच्या शेवटच्या चार दिवसांत यशवंत नाट्यमंदिर येथील मतपेटीत टाकण्यासाठी दिल्या होत्या, अशी माहिती पोलिसांना दिली. बनावट मतपत्रिका दोन बॅगांमध्ये भरून आणण्याचे काम सुशांत आणि रुपेश यांनी मिळून केले होते, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीच्या जबाबावरून निष्पन्न झाली तसेच रुपेश पालवची पोलिस कोठडी घेतली असता त्यानेही सुशांतनेच त्या दोन बॅगा आणल्याची माहिती दिली होती. यामुळे सुशांतचा या गुन्ह्यात प्रामुख्याने सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुशांतला यापूर्वी ब-याच वेळा चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. पण या बॅगा कोणी आणल्या, त्यातील मतपत्रिका कोठे छापल्या गेल्या, याबद्दल माहिती देण्यास तो टाळाटाळ करत असल्याने, ही माहिती तो पोलिस कोठडीतच देईल, असे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे.
१,९९१ बनावट मतपत्रिकांची छपाई कोणत्या छापखान्यात झाली, बनावट मतपत्रिकेवर ज्या सदस्यांच्या बनावट सह्या केल्या आहेत, त्यांच्या सह्यांचे नमुने घेणे आवश्यक आहे आणि सुशांतसह रुपेश पालवची एकत्र चौकशी करणे आवश्यक आहे, मतपत्रिकांसाठी ज्या दोन बॅगा आणल्या त्या कोणाकडून आणल्या व त्यामागे कोणाचा हात आहे, याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे आणि अन्य माहितीही सुशांतकडून मिळणार असल्याने त्याला जामीन देण्यास पोलिसांनी विरोध केला, असे सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी उच्च न्यायालयाचे न्या. अभय ठिपसे यांच्यासमोर सांगितले. शिवडी सत्र न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन २८ मे रोजी रद्द केला आहे, असे अॅड. शिंदे म्हणाल्या. तर सुशांतच्या वकील ज्योती चव्हाण यांनी त्याच्या अटकपूर्व जामिनावर नियमित न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यावर निर्णय घ्यावा, असे न्यायालयास सांगितले.

Read More »

म्हाडाची 'ऑनलाइन' प्रणाली सामान्यांसाठी त्रासदायक


संगणकाची माहिती नसलेल्या किंवा स्कॅनिंगसह इतर तांत्रिक बाबींपासून अनभिज्ञ असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुविधा त्रासदायक ठरणार आहे.

मुंबई- म्हाडाच्या सोडतीत घर लागणा-यांची पात्रता कागदपत्रे स्वीकारण्यासाठी व त्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी यंदा 'ऑनलाइन' पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यासाठी सॉफ्टवेअरही तयार करण्यात आले आहे.
मात्र संगणकाची माहिती नसलेल्या किंवा स्कॅनिंगसह इतर तांत्रिक बाबींपासून अनभिज्ञ असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुविधा त्रासदायक ठरणार आहे. म्हाडाच्या नव्या पद्धतीमुळे ज्यांच्याकडे संगणक किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, त्यांना साहजिकच यासाठी सायबर कॅफेमध्ये जावे लागणार आहे. येथे संगणकाचा वापर व सादर कराव्या लागणा-या सात ते आठ पुराव्यांच्या स्कॅनिंगसाठी मिळून दीडशेहून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत.
एवढे करूनही एखाद्या कागदपत्राची प्रत व्यवस्थित स्कॅन न झाल्यास ते पुन्हा पाठवावे लागणार आहे. अर्थात पुन्हा खर्च वाढणार. सोडतीत घर लागलेल्यांचा वेळ वाचवण्यासाठी व त्यांना दलालांच्या कचाटय़ातून सोडवण्यासाठी ही 'ऑनलाइन' अवलंबण्यात येत असल्याचे म्हाडाचे म्हणणे असले तरी यामुळे तंत्रज्ञानापासून दूर असलेल्यांची डोकेदुखी वाढणार आहे.


म्हाडाची सोडत आज


म्हाडाची घरांसाठीची सोडत शुक्रवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी १० वा. काढण्यात येणार आहे.
Read More »

शेतक-यांना उद्योगांसाठी माफक दरात जमिनी देणार


शेतक-यांच्या मुलांनी औद्योगिक क्षेत्रात यावे, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याबरोबरच मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत शेतक-यांना उद्योगांसाठी माफक दरात जमीन देणार, असे आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी औरंगाबाद येथे दिले.
औरंगाबाद – विविध प्रकल्पांसाठी शेतजमिनी संपादित करण्यात येत असतात. मात्र शेतक-यांच्या मुलांनी औद्योगिक क्षेत्रात यावे, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याबरोबरच मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पांतर्गत शेतक-यांना उद्योगांसाठी माफक दरात जमीन देणार, असे आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी औरंगाबाद येथे दिले.
अतिरिक्त शेंद्रा औद्योगिक क्षेत्र (करमाड) येथील भूसंपादित क्षेत्रातील शेतकऱ्यांना धनादेशवाटप कार्यक्रमात उद्योगमंत्री राणे बोलत होते. यावेळी खासदार रावसाहेब दानवे, आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुरेश नवले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नाहिदाबानो पठाण, करमाडच्या सरपंच कांताबाई मुळे, उपसरपंच कैलास उकिर्डे, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे आदी उपस्थित होते.
डीएमआयसी प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. परिसरातील तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा. स्थानिक तरुणांमधूनच उद्योजक, कारखानदार तयार व्हावेत, अशी अपेक्षा या वेळी उद्योगमंत्री राणे यांनी व्यक्त केली. एमआयडीसीमार्फत उद्योगांसाठी विविध सोयीसुविधा पुरवल्या जातात. औद्योगिक क्षेत्रामुळे गावाची, शहराची प्रगती होते. विविध प्रकल्पांसाठी शेतजमिनी संपादित होतात. डीएमआयसीसाठी करमाड परिसरातील ज्या शेतक-यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या त्यांना एकरी २३ लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतक-यांना उर्वरित रक्कम लवकर देण्यात येणार असल्याचेही यावेळी राणे यांनी सांगितले. मात्र, शेतक-यांनी मिळालेल्या या मोबदल्याचा योग्य विनियोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अतिरिक्त शेंद्रा औद्योगिक क्षेत्राच्या भूसंपादित क्षेत्रातील शेतक-यांना या वेळी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले. खासदार रावसाहेब दानवे व आमदार डॉ. कल्याण काळे यांचीही यावेळी भाषणे झाली. एकनाथ सोळंके यांनी शेतक-यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.

Read More »

रेसकोर्सचा करार आज संपणार


रॉयल वेस्टर्न क्लबला १९ वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेचा करार शुक्रवारी संपणार आहे.
मुंबई - रॉयल वेस्टर्न क्लबला १९ वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेचा करार शुक्रवारी संपणार आहे. त्यामुळे एक जूनपासून ही जागा ताब्यात घेण्यास महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्ष आग्रही आहे. तेथे उद्यान उभारून त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा घाट शिवसेनेकडून घातला जात आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेचे महापालिकेतील नेते ताब्यात घेतात, की त्यावर भगवे झेंडे लावण्यात शिवसेनेला अपयश येते याकडे सर्वाचे लक्ष आहे.
महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जागा मुंबई महापालिकेने एक जून १९९४ ते ३१ मे २०१३ पर्यंत भाडेतत्त्वावर देत १९ वर्षाचा करार केला होता. या करारामध्ये भाडेतत्त्वाच्या अटी आणि शर्ती तसेच विशेष अटी आणि शर्तीवर नूतनीकरण करण्यास मंजुरी आहे. मात्र, ही जागा महाराष्ट्र सरकारच्या अनुसूची 'डब्ल्यू' अंतर्गत मालमत्तेत समाविष्ट असल्यामुळे यावर सर्वाधिक जास्त अधिकार राज्य सरकारकडे आहेत. ही जागा राज्य सरकारचीच असून, भाडेकरार हे महापालिका व राज्य सरकार यांचा स्वतंत्र नसून एकच आहे. त्यामुळे महापालिकेने जरी ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तरी राज्य सरकारचे नगरविकास खाते या क्लबच्या भाडेकराराचे नूतनीकरण करू शकते. त्यामुळे ही जागा ताब्यात घेणे महापालिकेसाठी तेवढे सहज शक्य नाही, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता त्याठिकाणी अनधिकृत बांधकामांतर्गत नूतनीकरण केले आहे. भाडेकराराचा कालावधी ३१ मे २०१३ पर्यंत असताना बी. जे. आर. यांच्याशी एक जुलै २००८ ते ३० जून २०१८ पर्यंत म्हणजेच 'सबलीज' (उपकंत्राट) करत भाडेकरार संपुष्टात येण्याच्या दिनांकानंतरही पुढील काळापर्यंत हॉटेल चालवण्यास दिले आहे. महापालिकेच्या संमतीशिवाय त्रयस्तास रेस्तराँ इमारतीमधील अंतर्गत बांधकामात सुधारणा व नूतनीकरण करण्याचे परस्पर अधिकार दिले. महापालिकेची मालमत्ता पोटभाड्याने दिल्याने त्यांच्याकडून भाडेकराराचा भंग झाला आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे त्यांना वारंवार विचारणा करूनही त्यांनी याची पूर्तता केली नाही. त्यामुळे भाडेकरार संपुष्टात आणण्याचे पत्र या कंपनीला याआधीच पाठवण्यात आले असून, या जागेवरील ताबा सोडून महापालिकेच्या स्वाधीन करा, असे त्यांना प्रशासनाने बजावले आहे.
याबाबत प्रशासनाच्या अधिका-यांनी नगरविकास खात्याशीही पत्रव्यवहार केला असून, त्यांनीही राज्य सरकारने ही जागा ताब्यात घ्यावी किंवा महापालिकेच्या ताब्यात द्यावी, अथवा महापालिका व राज्य सरकार यांनी संयुक्तपणे ही जागा ताब्यात घ्यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे एक जून उजाडताच या रेसकोर्सवर कोणते दर्शन घडतेय, याकडे सर्वाचे लक्ष आहे. शिवसेनेने हा विषय ताणून धरल्यास शिवाजी पार्कमधील स्मारकाच्या मुद्दयासारखेच या ठिकाणीही त्यांना तोंडघशी पडावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
…तर क्लबवर कारवाई
महालक्ष्मी रेसकोर्सवरील जागेचा भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर ही जागा महापालिकेच्या ताब्यात आपोआपच येईल. मात्र, त्यानंतरही क्लबने ती जागा न सोडल्यास त्यांना महापालिकेतर्फे 'एमआरटी'अंतर्गत (१०५-बी) नोटिस बजावून कारवाई केली जाईल. ही जागा मोठय़ा उद्यानाच्या निर्माणासाठी महापालिकेला दिली जावी, यासाठी राज्य सरकारकडे विनंती केली जाणार असल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव सुधार, स्थायी समितीच्या बैठकीपुढे आणून रीतसर ठराव केला जावा, ही नगरसेवकांची मागणी आहे. मात्र, सभागृहाने ठराव केल्यास महापालिका प्रशासनाला निर्णय घेणे बंधनकारक असल्याचे सांगून अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे सांगितले.
'जागा रेसकोर्सलाच द्यावी'
रेसकोर्सच्या जागेत राज्य सरकारचाही वाटा असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय राज्यसरकारच घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. परंतु सदर जागा रेसकोर्सलाच द्यावी अशी आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे ते म्हणाले. रेसकोर्सच्या साडेआठ लाख चौरस मीटर जागेपैकी सहा लाख चौरस मीटर जागा ही राज्य सरकारच्या मालकीची आहे. तर अडीच लाख चौरस मीटर जागा ही मनपाच्या मालकीची आहे. त्यामुळे या जागेसंदर्भात कोणताही निर्णय घ्यावयाचा असल्यास राज्यसरकारलाच घ्यावा लागणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

Read More »

तंबाखू विक्रेत्यांचा कायद्याला हरताळ


मुंबईतील ९८ टक्के तंबाखू विक्रेत्यांनी 'सिगारेट्स अ‍ॅण्ड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स' (कोटपा) या कायद्यालाच हरताळ फासल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबई- मुंबईतील ९८ टक्के तंबाखू विक्रेत्यांनी 'सिगारेट्स अ‍ॅण्ड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स' (कोटपा) या कायद्यालाच हरताळ फासल्याचे निदर्शनास आले आहे. तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करताना त्याच्या दुष्परिणामांची सूचना दुकानात कायद्याने बंधनकारक असताना विक्रेते त्याला चक्क केराची टोपली दाखवत आहेत. या दुकानदारांवर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाला यादी सोपवण्यात येणार असल्याचे 'सलाम बॉम्बे' संस्थेच्या कार्यक्रम संचालिका देविका चढ्ढा यांनी गुरुवारी सांगितले.
'सलाम बॉम्बे'तर्फे मुंबईतल्या २४ प्रभागातील ११०० दुकानांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातील ९८ टक्के तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणा-या दुकानांनी 'कोटपा' कायद्याला हरताळ फासला आहे. या कायद्याच्या कलम ६ नुसार 'सिगारेट्स किंवा तंबाखू उत्पादनांची विक्री केली जाते, त्या जागेत मालकाने तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती मोठय़ा शब्दांत नमूद केली पाहिजे'. ११०० पैकी काही दुकानांनी ही सूचना अडगळीत लावली होती, असा आरोप चढ्ढा यांनी केला आहे. १८ वर्षाखालील व्यक्तीला तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करणे हा गुन्हा असताना त्याच्याही सूचना लावल्या जात नाहीत. तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन करणा-या कंपन्या विक्रेत्यांना दुकानांच्या दर्शनी भागावर जाहिरात करण्याचे पैसे देत आहेत.
या सर्वेक्षणाची माहिती राज्य सरकार, अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेच्या आस्थापना विभागाला देण्यात येणार आहे. या सर्वावर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. 'कोटपा' कायद्यानुसार पहिल्यांदा दोषी आढळल्यास दोन वर्ष तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंड आणि दुस-यांदा दोषी आढळल्यास पाच हजार रुपये दंड आणि ५ वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. मुंबईतील काही विक्रेते पहिल्यांदा दोषी आढळल्यास त्यांचा दंड हा तंबाखू उत्पादन करणा-या कंपन्या भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे पुरावेही महापालिका आणि राज्य सरकारला लवकरच देऊ असेही चढ्ढा म्हणाल्या.

Read More »

मुंबई-नाशिक मार्गावर रुग्णवाहिकेला अपघात


मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावाजवळील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पुढे चालकाचा रुग्ण वहिकेवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात रुग्ण महिला ठार झाली.

संग्रहित छायाचित्र
भिवंडी – मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावाजवळील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पुढे चालकाचा रुग्ण वहिकेवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात रुग्ण महिला ठार झाली. तर सातजण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता घडली. अपघतातील जखमींवर नारपोली येथील स्व. काशिनाथ पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रंजना नामदेव वारुडकर (३५) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर, परशुराम अमलदार (४१ ), नामदेव वारुडकर (४०), भास्कर नथु जाधव (४४), लक्ष्मण पोळ (३२), डॉ. शोएब सईद पटेल (२७), छायाबाई वारुडकर (३२, सर्व रा. सोनारी, जि.जळगाव) आणि चालक पराग चौधरी (३१), अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
रंजना वारुडकर यांना दम्याचा त्रास होता. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव येथून रुग्णवाहिकेने मुंबईतील केईएम रुग्णालयात आणले जात होते. मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे गावच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला आणि रुग्णवाहिका थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डय़ात कलंडली. या अपघातात डोक्याला मार बसल्याने रंजना वारुडकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रुग्णवाहिकेतील सातजण जखमी झाले.


Read More »

बदलापूरमध्ये बालिकेवर सामूहिक बलात्कार


बदलापूरमधील हेंद्रेपाडा येथील एका नऊ वर्षीय बालिकेवर तिघांनी सहा महिने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.
उल्हासनगर - बदलापूरमधील हेंद्रेपाडा येथील एका नऊ वर्षीय बालिकेवर तिघांनी सहा महिने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर बदलापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बबन पवार, युवराज पवार व निलेश म्हस्कर अशी या तिघांची नावे आहेत.
बदलापूर येथील हेंद्रेपाडा परिसरात बबन ऊर्फ गितेश पवार (२०) हा तरुण राहतो. त्याच्या शेजारी पीडित मुलगी राहते. सहा महिन्यांपूर्वी मुलीची आई घरी नसताना त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला होता. याबाबत बबनचा भाऊ युवराज ऊर्फ हितेश पवार व मित्र निलेश म्हस्कर(४०) यांना कळताच त्यानीही या मुलीवर लैगिंक अत्याचार केला. हा प्रकार सहा महिने सुरू होता. पीडित मुलगी वाशी येथे आपल्या मावशीकडे गेली असता तिच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिच्या मावशीने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. मावशीने मुलीकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.


Read More »

मध्य रेल्वेवरील १५ डबा लोकल वादात


मध्य रेल्वेवरील पंधरा डब्यांची लोकल वादात सापडली आहे.
मुंबई- मध्य रेल्वेवरील पंधरा डब्यांची लोकल वादात सापडली आहे. ही लोकल चालवण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाची पुन्हा परवानगीच घेतलेली नाही. त्यामुळे ही लोकल अनधिकृतपणे चालवली जात आहे, असे रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाचे म्हणणे आहे. दरम्यान, लोकल चालवण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.
मध्य रेल्वेवर ऑक्टोबर २०१२ पासून १५ डब्यांची एक लोकल चालवली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही लोकल चालवण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाने रेल्वेला ऑक्टोबर २०१२ ते डिसेंबर २०१२ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिली होती. त्यानंतर ही गाडी सुरक्षेच्या दृष्टीने चालवणे कितपत योग्य आहे, याचा अहवाल रेल्वेने सुरक्षा आयुक्तालयाला देणे बंधनकारक होते. त्यानंतर ही लोकल नियमित चालवण्यासाठी परवानगी दिली जाणार होती. मात्र, असा कोणताही अहवाल म.रे.ने दिला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यानंतर ही लोकल अनधिकृतपणे चालवली जात असल्याचा दावा रेल्वेचे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी केला आहे.
दरम्यान, त्यांचा हा दावा मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी फेटाळला असून, या लोकलच्या सुरक्षेबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करून दोन वेळा ती आयुक्तालयाकडे पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले.
अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणारी शटल ट्रेनही अनधिकृतपणे चालवली जात असल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाने सांगितले.

Read More »

काँग्रेसचा पक्षादेश झुगारणा-यांना दणका


शहर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत गैरहजर राहून काँग्रेस उमेदवाराविरोधात मतदान करणा-या उपमहापौर नूरुद्दीन अन्सारी व नगरसेविका रेहाना सिद्दिकी यांचे नगरसेवक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
भिवंडी – शहर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत गैरहजर राहून काँग्रेस उमेदवाराविरोधात मतदान करणा-या उपमहापौर नूरुद्दीन अन्सारी व नगरसेविका रेहाना सिद्दिकी यांचे नगरसेवक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
पक्षाच्या 'व्हीप'चे झुगारल्याने काँग्रेस गटनेत्याने कोकण आयुक्तांकडे याप्रकरणी दावा दाखल केला होता. गुरुवारी दुपारी यावरील सुनावणीत कोकण आयुक्त विजय नाहटा यांनी ही कारवाई केली. पालिका निवडणुकीत काँग्रेसचे २६ नगरसेवक निवडून आले. काँग्रेसने शिवसेनेच्या मदतीने महापौर निवडणुकीची जोरदार तयारी केली होती.
११ जून २०१२ रोजी पार पडलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या रेहाना सिद्दिकी व डॉ नूरुद्दीन अन्सारी यांनी पक्षादेश झुगारून अनुपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे कोणार्क विकास आघाडीच्या महापौरपदाच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. नूरुद्दीन अन्सारी यांनी उपमहापौरपदावर समाधान मानून पाटील यांना मदत केली होती. अन्सारी व सिद्दिकी यांच्या भूमिकेविरोधात काँग्रेसचे गटनेते जावेद दळवी यांनी पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कोकण आयुक्त विजय नाहटा यांच्याकडे दावा दाखल केला होता.


Read More »

विकासकामांसाठी अधिका-यांना हवे दोन टक्के!


विकासकामांच्या प्रस्तावावर आर्थिक तरतुदीसाठी पालिकेतील अधिका-यांना दोन टक्के द्यावे लागतात, असा थेट आरोप करत ठाण्यातील नगरसेवकांनी गुरुवारी पार पडलेल्या महासभेत खळबळ उडवून दिली.
ठाणे – विकासकामांच्या प्रस्तावावर आर्थिक तरतुदीसाठी पालिकेतील अधिका-यांना दोन टक्के द्यावे लागतात, असा थेट आरोप करत ठाण्यातील नगरसेवकांनी गुरुवारी पार पडलेल्या महासभेत खळबळ उडवून दिली. मागील वर्षात सर्वपक्षीय नगरसेवकांनी सूचवलेल्या कामांसाठी अद्याप आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. ही सर्व कामे बजेट नसल्याचे कारण पुढे आल्याने प्रलंबित आहेत. या वर्षीच्या कामांना टोकन बजेट देण्यात आले तर, मागील वर्षीच्या कामांनाही ते का देण्यात आले नाही, असा सवालही या वेळी नगरसेवकांनी उपस्थित केला.
मागील तहकूब महासभा गुरुवारी घेण्यात आली. प्रस्ताव मंजूर करत असताना प्रशासनाने अद्याप अर्थसंकल्पी मंजुरीचे प्रकरण सभेपुढे आणले नसताना भिमनगर येथे बांधण्यात येणा-या शौचालयाच्या प्रस्तावासाठी आर्थिक तरतूद कशी मंजूर झाली, असा मुद्दाही नगरसेवकांनी उपस्थित केला. माजी महापौर अशोक वैती यांनी या संदर्भातील खुलासा मागितला. या कामासाठी पाच लाख रुपयांचे टोकन बजेट घेण्यात आल्याचा खुलासा लेखाधिकारी सुधीर नाकाडी यांनी केला.विकासकामांसाठी फायलीवर आर्थिक तरतूदीसाठी दोन टक्के घेतले जातात. तसेच नगरअभियंता यांच्या कार्यालयातून कंत्राटदारांना फोनवरून निविदा मागे घ्या, नाही तर तुम्हाला काळ्या यादीत टाकू, अशी धमकी दिली जात असल्याचा आरोपही वैती यांनी केला. आम्ही २० वर्षात कधी असे केले नाही. मात्र, आमच्या पद्धतीने एका दिवसात सर्व फाइली मंजूर करून घेऊ शकतो. हे अधिकाऱ्यांनी विसरू नये, अशी तंबीही वैती यांनी दिली.
टक्केवारीशिवाय फाइल पुढे सरकतच नव्हती
काही वर्षापूर्वी ठाणे महापालिकेत ४१ टक्क्यांचे वाटप झाल्याशिवाय फाइल पुढे सरकत नव्हती. यासाठी नंदलाल समिती नेमण्यात आली होती. या समितीने काही अधिकारी व नगरसेवकांवर ठपका ठेवला होता. त्यानंतर पुन्हा एकवार सारे काही टक्केवारीसाठीचे प्रकरण पुढे आले आहे.
पुरावे दिल्यास कारवाई
वैती यांनी केलेला दोन टक्के लाचेचा आरोप गंभीर आहे. १९९२-९३ मध्ये आनंद दिघे यांनी ४१ टक्के ठाणे पालिकेचे अधिकारी लाच घेतात, अशी तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत २० वर्षे शिवसेनेची ठाणे महापालिकेत सत्ता आहे. तरीही शिवसेनेला भ्रष्टाचार संपवता आला नसल्याची टीका काँग्रेसचे नगरसेवक नारायण पवार यांनी केली. या टक्केवारीच्या आरोपाची चौकशी आयुक्तांनी करावी, अशी मागणीही केली. प्रभारी आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी या प्रकरणासंदर्भातील पुरावे दिल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले.


Read More »

कल्याणमध्ये नालेसफाई गाळातच!


पावसाळा तोंडावर येऊनही कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
कल्याण – पावसाळा तोंडावर येऊनही कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. नालेसफाईच्या कामासाठी पालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांची तरतूद करूनही वरवरची सफाई होत असल्याने पावसाळय़ात शहरातील अनेक भागात नाले तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंत्राटदारांच्या या ढिलाईकडे पालिकेतील सत्ताधा-यांचे दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांत तीव्र नाराजी पसरली आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील साधना हॉटेल जवळील नालेसफाईस अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या नाल्यातच कच-याचा डोंगर तयार होत आहे. इतर छोट्या- मोठ्या नाल्यांची सफाई न झाल्याने यंदाची नालेसफाई गाळात अडकल्याची परिस्थिती आहे.
नालेसफाईच्या कामास सुरुवात झाल्याचे पालिका अधिका-यांकडून सांगितले जात असले तरी मोठय़ा नाल्यांच्या सफाईसाठी कंत्राटदार अद्याप मुहूर्त शोधत असल्याची परिस्थिती आहे. प्रत्येक प्रभाग क्षेत्रातंर्गत नालेसफाईचे खासगी कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, कंत्राटदाराच्या कामाकडे पालिका अधिकाऱ्यांची डोळेझाक सुरू आहे. महापालिका क्षेत्रात एकूण १३ मोठे नाले आहेत. पावसाळय़ापूर्वी जेसीबी व पोकलेनच्या मशीनच्या मदतीने नालेसफाई होणे गरजेचे आहे. मात्र, कंत्राटदाराकडून केवळ वरचेवर सफाई सुरू असल्याने नालेसफाईचा बो-या वाजणार असल्याची चिन्हे आहेत.
छोट्या नाल्यांच्या सफाईचे काय?
शहरातील छोट्या नाल्यांची सफाई मजूर संस्थामार्फत करण्यात येणार असून, याकरता सुमारे ७० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. मात्र, अवघ्या आठवडाभरावर पाऊस येऊनही या नाल्यांच्या सफाईच्या कामालाही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे छोटय़ा नाल्यांच्या सफाईचे काय, असा सवाल शहरवासीय करत आहेत.
नालेसफाईचे कामे ६० ते ७० टक्के झाली आहेत. मोठय़ा नाल्यांच्या सफाईची पहिली फेरी झाली आहे. नाल्याची सफाई केल्यानंतर नागरिकांकडून प्लास्टिक पिशव्या व कचरा टाकला जातो. त्यामुळे या नाल्यांत कचरा दिसत आहे. एकदा साफ सफाई झाल्यानंतर दुस-यांदाही नालेसफाई करण्यात येणार आहे. – रवींद्र जौरस, कार्यकारी अभियंता, केडीएमसी


Read More »

ठाणे जिल्ह्याचा ६८.९५ टक्के निकाल


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत ठाणे जिल्ह्याचा ६८.९५ टक्के निकाल लागला.
ठाणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत ठाणे जिल्ह्याचा ६८.९५ टक्के निकाल लागला. यामध्य विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. त्यामुळे ठाणे शहर आणि ग्रामीण भागात निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेमध्ये एकच गर्दी केली होती.
बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एक लाख १७ हजार २१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी एक लाख १५ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ६४ हजार ६१० विद्यार्थी तर, ५१ हजार १७२ विद्यार्थिनी होत्या. यापैकी ३९ हजार १६१ विद्यार्थिनी आणि ४० हजार ६७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेत ७६.५३ टक्के विद्यार्थिनी तर, ६२.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना सहा जूनला गुणपत्रिका मिळणार आहेत.
डोंबिवलीची आघाडी
बारावीच्या परीक्षेत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ७० टक्के निकाल लागला. शहरातील १५ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यापैकी १२ हजार २८३ विद्यार्थी उत्र्तीर्ण झाले. डोंबिवलीतील रुईया महाविद्यालयाचा विरल गाला या विद्यार्थ्यांला ९५ टक्के गुण मिळाले. तर, बिर्ला महाविद्यालयातील शुभम डेरे याला ९२.३३ टक्के, नेरूळकर महाविद्यालयातील शुभम भिरूड याला ९०.१६ टक्के आणि रॉयल महाविद्यालयातील हर्षद कोठारी याला ९०.५० टक्के गुण मिळाले आहेत.

Read More »

ठाण्यात नालेसफाईचा पोलखोल


पावसाच्या पहिल्या सरीत नाल्यातील गाळ मिश्रित पाणी शिरून नुकसान झालेल्या इंदिरानगर परिसरातील १२० रहिवाशांना कंत्राटदारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश पालिकेचे प्रभारी आयुक्त शामसुंदर पाटील यांनी दिले.
ठाणे - पावसाच्या पहिल्या सरीत नाल्यातील गाळ मिश्रित पाणी शिरून नुकसान झालेल्या इंदिरानगर परिसरातील १२० रहिवाशांना कंत्राटदारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश पालिकेचे प्रभारी आयुक्त शामसुंदर पाटील यांनी दिले.
मंगळवारी मध्यरात्री पडलेल्या पावसाच्या एका सरीनेच इंदिरानगर भागात अनेक घरांत पाणी शिरल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले होते. ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाची नालेसफाईवरून पोलखोल झाली. विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी गुरुवारी पार पडलेल्या महासभेत नालेसफाईवर लक्षवेधी मांडून सत्ताधा-यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. महापालिकेने एकात्मिक नालेविकास प्रकल्पासाठी तब्बल ३०० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, अनेक नाल्यांच्या संरक्षक भिंतीचे कामही पूर्ण झाले नाही. त्यामुळे पाऊस पडल्यावर या नाल्यांतील पाणी नागरिकांच्या घरांत शिरण्याची शक्यता असल्याचे जगदाळे यांनी निदर्शनास आणून दिले. शहरातील नाल्यांची सफाई योग्य पद्धतीने होत नाही. पावसाळा तोंडावर येऊनही नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असल्याचे जगदाळे म्हणाले.
कंत्राटदार पावसाची वाट पाहतात!
नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी पावसाची वाट पाहत कंत्राटदार थांबतात. अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने शहरातील नालेसफाई होत नसल्याचा आरोपही केला. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी डोंगरावरील नाल्यांची सफाई होत नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणली. त्यामुळे यापुढे प्रायोगिक तत्वावर शहरातील दोन नाल्यांची वर्षभर सफाई करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. ठाणे शहरातील नालेसफाई ६४ टक्के झाली असून १० जूनपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त श्यामसुंदर पाटील व महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी दिले.
वर्षभर दोन नाल्यांची प्रायोगिक तत्वावर सफाई
ठाणे महापालिका क्षेत्रात एकीकडे नालेसफाईचा बो-या वाजला आहे. तर दुसरीकडे मात्र शहरातील दोन नाल्यांची वर्षभर प्रायोगिक तत्वावर सफाई करण्याचा निर्णय गुरुवारी सर्वसाधारण सभेत घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Read More »

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थंडावली


आयुक्तांचाच धाक नसल्यामुळे फेब्रुवारी महिन्यांपासूनच अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई थंडावली आहे.

मुंबई- मुंबईतील अनधिकृत बांधकामांची यापुढे गय केली जाणार नाही, असे सांगत अशा बांधकामांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतला होता. मात्र, त्यांना आता स्वत:च्या निर्णयाचा विसर पडला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यांपासूनच अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई थंडावली असून, आयुक्तांचाच धाक नसल्यामुळे वॉर्ड अधिका-यांनीही शांत राहण्याचीच भूमिका घेतली असल्याचे महापालिकेच्याच कारवाईच्या आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे.
मुंब्रा येथील लकी कंपाउंड इमारत दुर्घटना आणि वरळीतील कॅम्पा कोला कंपाउंड इमारतींमधील अनधिकृत मजल्यांच्या प्रकरणानंतर महापालिका आयुक्त कुंटे यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात कडक धोरण जाहीर केले होते. त्यानुसार महापालिकेच्या २४ प्रभागांमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागांमधील सहाय्यक अभियंत्यांवर अनधिकृत बांधकामांची जबाबदारी निश्चित करत त्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, एकूण २४ अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करूनही कारवाईला मात्र गती आलेली नाही. उलट फेब्रुवारी आणि मार्च २०१३ यामध्ये अनुक्रमे ६२६ आणि ७५४ बेकायदा बांधकामांवर कारवाई झाली आहे.
अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अत्यंत धिम्या गतीने होत असतानाही आयुक्त कुंटे यांच्याकडून याची दखल घेतली जात नाही. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांनी, अतिक्रमणांवरील कारवाई सुरूच असल्याचे सांगत वॉर्डाच्या इमारत व कारखाना विभागाच्या वतीने नोटिस बजावून कारवाई करणे आवश्यक असते. मात्र त्यानंतरही कारवाई न झाल्यास अतिक्रमण विभागातर्फे कारवाई केली जाते. पावसाळ्यात नव्याने बांधल्या जाणा-या झोपडय़ा, बांधकामे, यांवर मात्र कारवाई सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.

Read More »

जलबोगद्याचा खर्च १०० कोटींनी वाढला


विरोधकांच्याच हाती असलेल्या मुंबई महापालिकेच्या जलप्रकल्पाच्या कामाचा खर्च कोटय़वधी रुपयांनी वाढला आहे.

मुंबई- जलसिंचनाच्या प्रकल्पांचा खर्च कोटय़वधी रुपयांनी वाढल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु विरोधकांच्याच हाती असलेल्या मुंबई महापालिकेच्या जलप्रकल्पाच्या कामाचा खर्च कोटय़वधी रुपयांनी वाढला आहे. महापालिकेने हाती घेतलेल्या मरोशी ते रुपारेल कॉलेज जलबोगद्याच्या कामाच्या प्रकल्पाला विलंब झाला असून, त्याचा खर्च तब्बल १०० कोटींनी वाढला आहे.
मुंबईतील पाणी समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेने मरोशी ते रुपारेल महाविद्यालय भूमिगत जलबोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी ३७७.३६ कोटींच्या कामाला नोव्हेंबर २००७ मध्ये मान्यता देण्यात आली. त्यानंतर त्याचे काम सुरू झाले. हा प्रकल्प मे २०१२पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना त्याला विलंब झाला. त्यामुळे महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला डिसेंबर २०१३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु या विलंबाबरोबरच या प्रकल्पाचा खर्च वाढून तो ४८७.३६ कोटींवर पोहोचला. उपायुक्त रमेश बांबळे यांनीही याला दुजोरा दिला असून, सादिलवार तरतुदींमध्ये वाढ झाल्याने कंत्राट किमतीत वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पाला स्थायी समितीनेही मंजुरी दिली या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निमाण अभियानांतर्गत १४७ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले असल्याचेही बांबळे यांनी नमूद केले.
जलबोगद्याचे आज उद्घाटन
मरोशी ते रुपारेल कॉलेज जलबोगद्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, त्याचे शुक्रवारी उद्घाटन होत आहे. सद्यस्थितीत या खणलेल्या बोगद्याचे सिमेंट-काँक्रिटचे अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मरोशी ते वाकोला हा सुमारे ५.८३० किलोमीटर लांबीचा जलबोगदा पहिला टप्प्यात पूर्ण होऊन आता कार्यान्वित होत आहे. यामुळे वांद्रे ते जोगेश्वरी पूर्व भागातील काही भाग तसेच वांद्रे ते सांताक्रूझ पश्चिम भाग आदी भागांतील पाणी समस्या मिटणार आहे.

Read More »

क्रिकेटच्या बदनामीमुळे सचिन दु:खी


आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आपले मौन सोडले आहे.
मुंबई – कोणत्याही चूकीच्या कारणामुळे क्रिकेटची बदनामी होत असेल तर मला खूप दु:ख होतं असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने सांगितले. स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर सचिनने शुक्रवारी मिडियाला पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली.
गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटसंदर्भातल्या वाईट आणि नकारात्मक बातम्या झळकत आहेत. त्यामुळे माझ्या मनाला खूप दु:ख होत आहे असे सचिन म्हणाला.


Read More »

राजकारण-खेळ वेगवेगळे – पंतप्रधान


आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर पंतप्रधान मनमोहन  सिंग यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली –  आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण आणि खेळ यांच्यात कोणतीही गफलत नको. यासंदर्भात अधिक चौकशीनंतरच चित्र स्पष्ट होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.
संसदेच्या कामकाजात गदारोळ घालणा-या विरोधकांनाही पंतप्रधानांनी चपराक दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी  यांच्यात कोणतेही मतभेत नसल्याचे  पंतप्रधानांनी सांगितले.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Read More »

यंदापासून पुनर्मूल्यांकनाची सुविधा


ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल, त्यांनी छायांकित प्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत मंडळाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे- फेब्रुवारी-मार्च २०१३ परीक्षेपासून उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल, त्यांनी छायांकित प्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत मंडळाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुणपत्रिका महाविद्यालयांना गुरुवारी ६ जून रोजी सकाळी ११ वाजता वितरीत करण्यात येतील. ज्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विहित शुल्कासह १७ जूनपर्यंत मंडळाकडे अर्ज करता येतील. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील.
फक्त अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच खेळाचे गुण
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू विद्यार्थ्यांना देण्यात येणारे २५ गुण यंदापासून फक्त अनुत्तीर्ण होण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांनाच देण्यात येणार आहेत. त्यानुसार यंदा १७३१ खेळाडू विद्यार्थ्यांपैकी ४८५ विद्यार्थ्यांना या गुणांचा फायदा झाला. गेल्या वर्षी खेळाडू असलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट २५ गुण देण्यात आले होते. ८ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला होता. यंदा सरसकट गुण न देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे अर्जही अत्यल्पच आले होते, असे महामंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले.
जाधव यांनी व्यक्त केली दिलगिरी
भूगोलाच्या पुस्तकात नकाशा चुकीप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली. ही चूक अनवधानाने झाली होती. यापुढे अशी चूक होऊ नये, यासाठी अभ्यास मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. नवीन अभ्यास मंडळावर तज्ज्ञ आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच काही विषयांच्या बाबतीत सहसंचालकदर्जाचे पद निर्माण करण्याचा विचार आहे. बरखास्त करण्यात आलेल्या अभ्यास मंडळातील तज्ज्ञांना यापुढे मंडळाच्या कारभारात सहभागी करून घेतले जाणार नाही. एवढेच नाही तर या तज्ज्ञांना अन्य मंडळांवरूनही काढून टाकण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
साडेदहा लाख पुस्तकांचे वितरण थांबवले
नववीच्या भूगोलाच्या पुस्तकातील नकाशा चुकल्यामुळे सुमारे साडेदहा लाख पुस्तकांचे वितरण थांबवण्यात आले आहे. काही पुस्तके वितरित झाली आहेत. त्यामुळे नववीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांला शाळेमार्फत सुधारित नकाशाचे वाटप करण्यात येणार आहे.
कोकण अव्वल
रत्नागिरी- फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने राज्यात बाजी मारली आहे. कोकणचा विभागाचा निकाल ८५.८८ टक्के लागला आहे. कोकण विभागामध्ये उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८९.३२ टक्के आहे.
कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ८९.६४ टक्के असून, रत्नागिरीची टक्केवारी ८३.६९ टक्के इतकी आहे. कोकण विभागात एकूण २८ हजार ५८४ विद्यार्थ्यांची नोंदणी होऊन २८ हजार ४९७ विद्यार्थी परीक्षेस बसले. रत्नागिरी जिल्ह्यात शास्त्र, वाणिज्य, कला आणि एमसीव्हीसी या चार विभागांत मिळून एकूण १५ हजार ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालामध्ये शास्त्र विभागाचा निकाल ९१.९८ टक्के लागला. वाणिज्य शाखेचा निकाल ७६.१६ टक्के, कला शाखेचा निकाल ८३.५४ टक्के लागला आहे. एमसीव्हीसीचा निकाल ९८.३१ टक्के लागला. त्यामध्ये ७७४ विद्यार्थी विशेष प्राविण्यामध्ये उत्तीर्ण झाले. ६ हजार ६९० विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी तर १४ हजार १४७ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली. एकूण २४ हजार ४७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Read More »

सेन्सेक्समध्ये २९७ अंशांची घसरण


मार्च महिन्याच्या चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा दर पाच टक्क्यांपेक्षा खाली घसरल्याचा परिणाम शुक्रवारी मुंबई शेअर बाजारावर दिसून आला.
मुंबई – मार्च महिन्याच्या चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा दर पाच टक्क्यांपेक्षा खाली घसरल्याचा परिणाम शुक्रवारी मुंबई शेअर बाजारावर दिसून आला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात दलालांनी मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री केल्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात २९७ अंशांची घट नोंदवण्यात आली. सेंन्सेक्सनेही २० हजारांची पातळी तोडली.
सकाळच्या पहिल्या सत्रात निर्देशांकात १५० अंशांची घट झाली. त्यानंतरही ही घसरण कायम राहिली आणि अवघ्या तासाभरात निर्देशांकात २९७ अंशांची घट झाली. आयटी सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त घट नोंदवण्यात आली.
जानेवारी – मार्च २०१३ या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा दर ४.८ टक्क्यांपर्यंत खाली घसल्यामुळे निर्देशांकातही निराशा दिसून आली. गेल्या वर्षी याच तिमाहीत अर्थव्यवस्थेचा दर ५.१ टक्क्यांपर्यंत होता. दुपारच्या सत्रापर्यंत सेन्सेक्स १९९३२ अंशांवर असून त्यात २८२ अंशांची घट झाली आहे. तर निफ्टी ६०३२ अंशांवर असून त्यात ८८ अंशांची घट नोंदवण्यात आली आहे.


Read More »

म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी सोडत


म्हाडाच्या १२४४ घरांसाठीच्या सोडतीला वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात सकाळी दहा वाजता सुरुवात झाली.

मुंबई- म्हाडाच्या १२४४ घरांसाठीच्या सोडतीला वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. रविंद्र थोरात यांनी म्हाडाचे पहिले भाग्यवान विजेत्याचा मान पटकावला. थोरात यांना बोरिवलीतील मागाठाणे येथे घर मिळाले आहे.
एकूण ९३ हजार ५५९ अर्ज आले होते. त्यातील ८७ हजार ६४७ अर्ज पात्र ठरले. यावर्षी म्हाडाने खास बँडची व्यवस्था केली आहे. लॉटरीत घरे लागणा-यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही व्यवस्था केली आहे.
सोडतीआधीच १५ भाग्यवंत विजेते
म्हाडाच्या सोडतीआधीच १५ जण विजेते ठरले आहेत. ही सर्व घरे राखीव कोट्यातील असून केंद्र सरकारचे कर्मचारी, आमदार, खासदार आणि संरक्षण क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी राखीव असलेल्या १५ घरांसाठी एका कॅटेगरीत एकच अर्ज आल्याने ते लॉटरीआधीच विजेते ठरले. राखीव कोट्यातील १६ घरांसाठी अर्जच आले नसल्यामुळे ही घरे पडून राहणार आहेत. ही घरेही लोकप्रतिनिधींच्या राखीव कोट्यातील आहेत.

Read More »

मोनोरेलची क्रेन कोसळून एक ठार

मुंबईतील आर्थर रोड तुरुंगाजवळ मोनोरेलचे काम सुरू असताना क्रेन कोसळल्यामुळे क्रेनखाली सापडून एका मजुराचा मृत्यु झाला.

मुंबई- मुंबईतील आर्थर रोड तुरुंगाजवळ वडाळा-सात रस्ता येथील जेकब सर्कल मार्गावरील मोनोरेलचे काम सुरू असताना क्रेन कोसळल्यामुळे क्रेनखाली सापडून एका मजुराचा मृत्यु झाला. अद्याप या मजुराचे नाव समजू शकलेले नाही.
अपघात होताच मोनोचे काम थांबवले आहे. या भागात काम करताना विशेष खबरदारी घेतली जाईल, असे मोनो रेल प्रशासनाने सांगितले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य तुरुंग आणि टाडा न्यायालय असलेल्या या संवेदनशील भागात सुरक्षेची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.
मोनो रेलेवर वारंवार अपघात होण्याचे प्रकार सुरूच आहेत. यापूर्वी नऊ डिसेंबर २०१२ रोजी शीव-कोळीवाडा येथील सरदार नगरातील इमारत क्रमांक १८ समोर मोनो रेलची लोखंडी कमान कोसळली. यात एकजण जखमी झाला. त्याआधी जुलै महिन्यातही वडाळ्याजवळ मोनो रेलचे काम सुरू असताना पूल कोसळल्यामुळे अपघात झाला होता. त्यावेळी अपघातात मोठी जीवितहानी झाली होती.

Read More »

आर्थिक विकास दरात घसरण


जानेवारी-मार्च या तिमाहीत  देशाचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
नवी दिल्ली – उद्योग, खाणकाम क्षेत्रात झालेल्या घसरणीमुळे जानेवारी-मार्च २०१३ या तिमाहीत देशाच्या आर्थिक विकास दरात घट झाली आहे. या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. गेल्या दहा वर्षांतला सगळ्यात कमी दर असल्याने आर्थिक जगतात चिंतेचे वातावरण आहे.
केंद्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च २०१२-१३ या तिमाहीत उद्योगाचा विकास दर २.६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात शून्य पॉईंट एक टक्क्यांची घट झाली आहे. तर खाणकाम क्षेत्रातही ५.२ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.कृषी क्षेत्राचा विकासदरही १.९ टक्क्यांपर्यंत खालावला आहे. गेल्या वर्षी हा दर ३.६टक्क्यांपर्यंत होता.
या दोन सेक्टर्समधील घसरणीचा परिणाम आर्थिक विकास दरावरही दिसून येत आहे. २०११-१२ या आर्थिक वर्षांत विकास दर ६.२ टक्के होता. दरम्यान, जानेवारी-मार्च या तिमाहीत सेवा क्षेत्राचा विकासदर९.१ टक्क्यांपर्यत खाली घसरला आहे.
आर्थिक विकास दरात झालेल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकातही सकाळच्या सत्रात २९७ अंशांची घसरण झाली.

Read More »

सिद्धार्थ त्रिवेदी सरकारी साक्षीदार


आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू सिद्धार्थ त्रिवेदी सरकारी पक्षाच्यावतीने साक्ष देणार आहे.

नवी दिल्ली - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू सिद्धार्थ त्रिवेदी सरकारी पक्षाच्यावतीने साक्ष देणार आहे. स्पॉट फिक्सिंगमध्ये  राजस्थान संघाच्याच एस.श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना अटक झाली आहे.
राजस्थान संघातील मुख्य फिक्सर अजित चंडिलाने बुकींनी आयोजित केलेल्या पार्टीचे सिद्धार्थ त्रिवेदीला निमंत्रण दिले होते. पण त्रिवेदीने हे आमंत्रण नाकारले तसेच बुकींनी दिलेले पैसे आणि भेटवस्तूही त्याने नाकारल्या.
त्रिवेदीला सरकारी पक्षाचा साक्षीदार बनवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिली. चंडिलाने ब्रॅड हॉग आणि केविन कूपर या राजस्थान संघातील अन्य क्रिकेटपटूंनाही फिक्सिंगच्या जाळयात ओढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनीही ही ऑफर नाकारली होती.

Read More »

"अस्थी दर्शन"

काँग्रेसचे दिवंगत नेते महेंद्र कर्मा यांच्या अस्थीकलशाचे अलहाबादमध्ये काँग्रेस नेत्या रिटा बहुगुणा आणि कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले.


Read More »

"विवेकानंदाचे स्मरण"


जागतिक धर्म परिषदेसाठी स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या प्रवासाला निघाल्याच्या घटनेला १२० वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने  मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती आणि लालकृष्ण अडवाणी.


Read More »

स्पॉटफिक्सिंग- न्यायलयाची क्रीडा मंत्रालयाला नोटीस


बीसीसीआयवर क्रीडा मंत्रालयाचे नियंत्रण ठेवण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी क्रीडा मंत्रालय, बीसीसीआयला नोटीस पाठवली आहे.
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर क्रीडा मंत्रालयाचे नियंत्रण ठेवण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी क्रीडा मंत्रालय, बीसीसीआयला नोटीस पाठवली आहे.
आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयवर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयच्या सर्व बाबतीत नियंत्रण ठेवावे असे याचिकेत म्हटले आहे. यावर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने क्रीडा मंत्रालय, बीसीसीआय आणि दिल्ली सरकारला १४ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.
आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगमुळे बीसीसीआयचे विश्वास गमवला असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Read More »

'कान'मध्ये भारतीय नायिका


एकेकाळी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या केवळ बातम्याच वाचायला मिळायच्या. क्वचित एखादा भारतीय चित्रपट यात दाखवला जात असे.
एकेकाळी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या केवळ बातम्याच वाचायला मिळायच्या. क्वचित एखादा भारतीय चित्रपट यात दाखवला जात असे. गेल्या काही वर्षापासून अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची दखल घेतली जाते. 'कान' चित्रपट महोत्सवात यावर्षी अनेक भारतीय कलाकारांनी हजेरी लावली. त्यातल्या काही अभिनेत्रींची एक झलक आपल्या कॅमे-यात टिपण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या माध्यमांनी एकच गर्दी केली. ऐश्वर्या राय बच्चन तर जणू घरचंच कार्य असल्यासारखी वावरत होती. या वर्षी विद्या बालनने रेड कार्पेटवर खास भारतीय साडीत येऊन सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्यांना मिळणारा हा सन्मान केवळ त्यांचा नसून भारतीय चित्रपटसृष्टीचा आहे, असं समजायला हरकत नाही.

सचिन श्रॉफ बाहेर
मालिका एखाद्या कलाकाराला खूप मोठं करतात. त्यातूनच पुढे त्यांना चित्रपटाची दारं खुली होतात. अशाच प्रकारे 'नियती' या सहारा वनच्या मालिकेचा नायक सचिन श्रॉफ आता दक्षिणेतील चित्रपटात पदार्पण करतोय. या महिन्याच्या अखेरीस या नव्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार असल्याने त्याने या मालिकेला अलविदा म्हटलंय. आता त्याच्या चित्रपटालाही मालिकेप्रमाणे यश मिळतं का ते पाहायचं आहे.

'एनिमी'चे ध्वनिफीत प्रकाशन
'पिने वालों को पिने का बहाना चाहिये..' हे गीत सगळय़ांनाच ठाऊक आहे. त्याच धर्तीवर आता नाचनेवालों को.. असं एक गीत तयार करायला पाहिजे. आपण ज्या कौशल्यासाठी प्रसिद्ध आहोत ते कधीही कुणासमोरही करायला ही कलाकार मंडळी तयार असतात. त्यात जर हे कलाकार मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर व सुनील शेट्टीसारखे असतील तर धमालच. या तिघांचंही सादरीकरण पाहण्याची संधी नुकतीच त्यांच्या काही चाहत्यांना मिळाली. 'एनिमी' या त्यांच्या नव्या चित्रपटाच्या ध्वनिफीत प्रकाशनाच्या निमित्ताने हे तिघे आणि या चित्रपटातले इतर कलाकार रंगमंचावर आले. मग काय विचारता? त्यांनी आपल्या नृत्याच्या सादरीकरणानं या संपूर्ण कार्यक्रमावरच आपली अशी काही छाप सोडली की सारेच खूश झाले. आता पडद्यावर हा चित्रपट किती गर्दी खेचतो ते पाहायचंय.


सुपर पूजा
छोटय़ा पडद्यावर येणा-या अनेक नायिका या अगदी नाजूक-साजूक कचकडयांच्या बाहुल्यांप्रमाणेच असतात. त्या बिचा-या त्यांच्यावर होणारे अनेक अन्याय अत्याचार सहन करतात. बहुसंख्य मालिकांची कथानकं ही अशाच प्रकारची असतात. याला काही अपवादही आहेतच. आता या पूजा बॅनर्जीचंच पाहाना. 'घर आजा मेरे परदेसी' या मलिकेत रुद्रा या साध्याभोळ्या मुलीची भूमिका करणा-या पूजाने चित्रीकरण सुरू असताना एक कमालच केली. चित्रीकरण सुरू असतानाच त्यांच्या सेटवर कुणीतरी इनफिल्ड बाइक घेऊन आलं, इतरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असलं तरी पूजा मात्रा वेगळीच निघाली. तिनं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या बाइकच्या मालकाला शोधून काढलं. त्याला पाच मिनिटं या बाइकवर सफर करण्याची विनंती केली. आता एका अभिनेत्रीची विनंती कोण नाकारेल. त्याने काहीसं भीतभीतचं तिला चावी दिली. पण पठ्ठी फारच तयारीची निघाली. तिनं अगदी आरामात ही जड बाइक चालवली. पाहणाऱ्यांना मजा येत होती, मात्र निर्मात्याने देव पाण्यात घातले होते.

क्रांती रेडकरचे स्टंट
आपल्या बिनधास्त वागण्याने व विविधांगी भूमिकांनी रसिकांच्या स्मरणात राहिलेल्या क्रांती रेडकरने आता चक्क सलमान खानच्या शैलीत स्टंट केला आहे. तिच्या आगामी 'कुणी घर देता का घर' या चित्रपटात एका मारधाडीच्या दृश्यात तिने हा स्टंट केलाय. यात ती एकाच वेळेस चार जणांना मारते. अशा प्रकारच्या प्रसंगासाठी तिने क्रेनच्या वायरने स्वत:ला बांधून घेत हा स्टंट केलाय. त्यासाठी तिला फार त्रास पडला असला तरी अशा लहान-मोठय़ा त्रासाने त्रासून जाणारी अभिनेत्री आपण नाही हे तिनं दाखवून दिलंय.

आता डीआयडी सुपर मॉम
अनेक रिअ‍ॅलिटी शोजमधून अनेक स्पर्धक भाग घेतात. हे स्पर्धक आपली कला पेश करतात तेव्हा समोर बसलेल्या त्यांच्या आयांची अवस्था काय होत असेल याची कल्पना कोणी करू शकेल. एकाच वेळेस आपल्या मुलाच्या यशाचं टेन्शन व दुसरीकडे त्याची काळजी अशा दुहेरी भावनांमध्ये त्या असतात. नृत्यांच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तर अनेक आया आपल्या मुलांची तयारी करून घेतात. त्यातल्या काहींनी आपल्या मुलांसाठी आपली स्वत:ची नृत्याची आवडही बाजूला ठेवलेली असते. अशा आयांना त्यांची कला दाखवण्याची संधी देणारा कार्यक्रम 'झी'टीव्ही वर येत असून 'डान्स इंडिया डान्स' या त्यांच्या कार्यक्रमाचं हे खास सत्र आहे. त्यांच्यातल्या नृत्याचं कौशल्य पारखण्यासाठी महागुरू मिथुन चक्रवर्ती व फराह खान सज्ज झाले असून हा कार्यक्रम सर्व आयांना दिलेली एक सलामीच ठरणार आहे. दर शनिवारी व रविवारी रात्री नऊ वाजता झी हिंदी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

गौतम बुद्ध यांच्यावर मालिका
भारतीय संस्कृतीत गौतम बुद्धांची शिकवण फार महत्त्वाची समजली जाते. अनेक धर्मग्रंथांमधून ही शिकवण विविध माध्यमांतून लोकांपर्यंत आलेली आहे. आता गौतम बुद्धांचं संपूर्ण जीवनच छोटया पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार असून 'झी' नेटवर्क या वाहिनीवर येणा-या 'गौतम बुद्ध' या मालिकेच्या चित्रीकरणाला बुद्ध पौर्णिमेपासून सुरुवात झाली. अभिनेते कबीर बेदी, अनिल कपूर व इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मालिकेच्या मुहूर्ताचा प्रसंग समीर धर्माधिकारी व कबीर बेदी यांच्यावर चित्रित करण्यात आला. या मालिकेत राजपुत्र सिद्धार्थ यांच्या राजघराण्याचा इतिहासही उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून गौतम बुद्धांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरू आहे. या मालिकेने पौराणिक मालिकांच्या विश्वात एक नवा विक्रम प्रस्थापित होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला आहे.

'गंमत'चा मुहूर्त
कोणताही चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक गंमतच असते. मात्र 'गंमत' या नावाच्याच एका चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. धकाधकीच्या जीवनात काही क्षणांचा विरंगुळा मिळावा, यासाठी या चित्रपटाची निर्मिती करत असल्याचं निर्माते शरदकुमार श्रीवास्तव यांचं मत आहे. या चित्रपटाचा मुहूर्तही एका आयटम साँगनंच करण्यात आला. सौम्या सिंग हिच्यावर हे आयटम साँग चित्रित झालं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद कवडे करणार असून या चित्रपटात संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी, स्मिता गोंदकर, अदिती सारंगधर, विजय पाटकर, आरती सोलंकी व सतीश तारे हे कलाकार चमकणार आहेत. नवरा-बायकोच्या नात्यातली गंमत दाखवणारा हा सिनेमा आता तिकीट बारीवर काय गंमत दाखवतो हे पाहायचंय.

'७२ मैल' २६ जुलैला
अक्षय कुमार व अश्विनी यार्दी यांची महत्त्वाकांक्षी निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट '७२ मैल' हा येत्या २६ जुलैला प्रदर्शित होत आहे. एका मुलाच्या प्रवासाची कथा सांगणारा हा चित्रपट यशस्वी करण्यासाठी स्वत: अक्षय पुढे सरसावला आहे. मला अनेक दिवसांपासून मराठी चित्रपट तयार करायचा होता. ही संधी माझ्यासाठी फार महत्त्वाची असल्याचंही अक्षयनं म्हटलं आहे. या चित्रपटातून स्वातंत्र्योत्तर भारताच्या ग्रामीण भागाचं खरखुरं चित्र प्रेक्षकांसमोर उभं राहणार आहे, जे फार महत्त्वाचं असल्याचं अक्षय म्हणतो. आता या चित्रपटाचं कथानक पाहता अनेक आघाडीचे अभिनेते मराठी चित्रपटांकडे वळतील अशी आशा धरायला काही हरकत नाही.

Read More »

"घनचक्कर विद्या"


घनचक्कर चित्रपटातील "लेझी लाड" गाण्याच्या लॉन्च प्रसंगी बॉलिवुड अभिनेता इम्रान हाश्मी आणि अभिनेत्री विद्या बालन.


Read More »

भुताचा हनिमून


भूत ही कल्पना खरी आहे की खोटी, यावर सतत वाद होत असतात. खरं-खोटं कोणी जाणत नसलं तरी चित्रपट उद्योगाला ही कल्पना फार आवडते.
भूत ही कल्पना खरी आहे की खोटी, यावर सतत वाद होत असतात. खरं-खोटं कोणी जाणत नसलं तरी चित्रपट उद्योगाला ही कल्पना फार आवडते. अशाच एका कल्पनेवर आधारित 'भुताचा हनिमून' हा चित्रपट लवकरच येत असून नुकतीच या चित्रपटाच्या संगीताची सीडी प्रकाशित करण्यात आली. भरत जाधव या चित्रपटात एका रोमँटिक भूमिकेत चमकत असून त्याच्याबरोबर रुचिता जाधव आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मोहिते यांनी केलं असून या चित्रपटात संदीप पाठक महत्त्वपूर्ण भूमिकेत चमकणार आहे. 'भुताचा हनिमून' या चित्रपटात विजय चव्हाण, संतोष मयेकर, जयराज नायर, मधू कांबीकर यांच्याही भूमिका आहेत.

'टीएल'सी वर 'स्पाइस ट्रिप'
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही वेळ काढून स्वत:ला ताजेतवानं करण्यासाठी अनेक जण पर्यटन करतात. करमणूक वाहिन्याही या पर्यटकांना वेळोवेळी आवश्यक ती माहिती देत असते. 'टीएलसी' या खास पर्यटनविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीने आता या पर्यटनात तिखट-मीठ टाकण्यासाठी एक नवी मालिका आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.
पर्यटनाबरोबरच जगातल्या उत्तमोत्तम मसाल्यांच्या पदार्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न 'स्पाइस ट्रिप' या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. दर सोमवार ते शुक्रवार रात्री दहा वाजता हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मेक्सिकोमधील मिरच्या, झांझीबारच्या लवंगा, कांबोडियातल्या काळीमिरी, ग्रेनेडा या कॅरिबियन बेटावरची जायफळं, टर्कीतलं जिरं आणि केरळच्या दालचिनीचा शोध घेण्यात येणार आहे. या ठिकाणच्या या मसाल्यांच्या पदार्थाना इतकी प्रसिद्धी कशी मिळाली, त्याची कारणं काय आहेत. या ठिकाणी या मसाल्यांचं उत्पादन व व्यापार पाहता पाहताच या ठिकाणच्या अनेक वैशिष्टय़ांची सफरही घडवण्यात येणार आहे.


तगडा फरहान 
काही काही कलाकार आपल्या मेहनतीसाठी फार प्रसिद्ध असतात. आमिर खान, ऋतिक रोशन यांच्याच पावलावर पाऊल टाकून आता फरहान अख्तरही या परफेक्शनिस्टच्या पंक्तीत येऊन बसलाय. त्याच्या 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटात तो प्रसिद्ध धावपटू मिल्खासिंगची भूमिका करतोय. या भूमिकेसाठी त्याने गेल्या दोन वर्षापासून कठोर मेहनत घेतली आहे. त्यात त्याने खास धावपटूंसारखं स्वत:चं शरीरही तयार केलं. दिवसभर कष्ट घेऊन त्याने एक धावपटू जसाच्या तसा साकारला आहे. इतकंच नव्हे तर मिल्खासिंग यांच्या पत्नीनेही त्याचं कौतुक केलं. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी या चित्रपटाची शिफारस ऑस्करसाठी केली. फरहान अख्तरसाठी ही सगळय़ात मोठी दाद होती. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत एका नव्या पर्वाची सुरुवात करेल, असं म्हणायला हरकत नाही.

रणवीरचा अ‍ॅटीटय़ुड
एकेकाळी अनेक कलाकार त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या नख-यांसाठीचं अधिक प्रसिद्ध होते. त्या काळात कलाकार कमी असायचे. चित्रपटनिर्मिती बेताचीच असल्याने त्यांचे नखरे सहन केले जायचे. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. आता निर्मिती वाढलीय. चित्रपट क्षेत्राने एका उद्योगाचा दर्जा मिळवलाय. त्यामुळे साहजिकच इथलं कामही आता अधिक व्यावसायिक झालं आहे. पूर्वीच्या अभिनेत्यांप्रमाणे वागण्याची लहर आजच्या काही अभिनेत्यांनाही येते. त्याने त्यांचा फायदा कमी मात्र नुकसानचं अधिक होताना दिसते. आता हेच पाहाना 'झूम'ने दिलेल्या एका बातमीनुसार रणवीर सिंगला एक चांगली संधी गमवावी लागलीय. झालं असं की त्याला एका आंतरराष्ट्रीय मोबाइल कंपनीच्या जाहिरातीची संधी आली. त्यात त्याला काही स्टेज शोही करायचे होते. त्यांना गुळगुळीत दाढी केलेला कलाकार हवा होता, मात्र रणवीर काही आपल्या रामलीलाच्या 'लुक' मधून बाहेर यायला तयार नाही. याउलट त्याने या कार्यक्रमात लूडबुड सुरू केली. हेच नको, तेच हवं अशा त्याच्या सततच्या मागण्यांनी आयोजकही कंटाळले व त्यांनी त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आता विनम्रता हाच खरा अ‍ॅटीटय़ूड झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Read More »

बीसीसीआयची तातडीची बैठक आठ जूनला होण्याची शक्यता-बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्या गच्छंतीवर निर्णय होण्याची शक्यता


बीसीसीआयची तातडीची बैठक आठ जूनला होण्याची शक्यता-बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्या गच्छंतीवर निर्णय होण्याची शक्यता

Read More »

खिडकाळीजवळ जलवाहिनी फुटली


ठाणे व नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची जलवाहिनी शुक्रवारी दुपारी खिडकाळी गावाजवळ अचानक फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले.

डोंबिवली- ठाणे व नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची जलवाहिनी शुक्रवारी दुपारी खिडकाळी गावाजवळ अचानक फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. पाण्याचा प्रेशर अधिक असल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच ठाणे व नवी मुंबईचा पाणी पुरवठा खंडीत झाला होता. एमआयडीसीची जलवाहिनी फुटण्याचा हा आठवडयातील दुसरा प्रकार आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरच खिडकाळी गाव आहे. ठाणे व नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची १७७२ मीमी व्यासाची जलवाहिनी मानपाडा रोड मार्गे गेली आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.
रस्त्याच्या शेजारी असलेल्या बांधलेल्या तंबूमध्ये, टप-यांमध्ये तसेच वीटभट्टीमध्येही पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले. कल्याण शीळ रस्त्यावर पाणी साचल्याने जलमय झाला होता. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून वाहने मार्गक्रमण करीत होती. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागले.
एमआयडीसीच्या अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन कामास सुरूवात केली. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू असून संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होईल असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता क्षीरसागर यांनी सांगितले.

Read More »

» ब्रेकिंग न्यूज » पेट्रलच्या दरात ७५ पैशांनी वाढ » आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार


» ब्रेकिंग न्यूज-
» पेट्रलच्या दरात ७५ पैशांनी वाढ
» आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार

Read More »

जलवाहिनी फुटली


ठाणे व नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची जलवाहिनी शुक्रवारी दुपारी खिडकाळी गावाजवळ अचानक फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले.


Read More »

नक्षलवाद्यांवर संयुक्त कारवाई


छत्तीसगड येथील बस्तर भागात नक्षलवाद्यांवर केंद्रीय सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांतर्फे लवकरच संयुक्त कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी केली.
रायपूर- छत्तीसगड येथील बस्तर भागात नक्षलवाद्यांवर केंद्रीय सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांतर्फे लवकरच संयुक्त कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी केली. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर प्रत्येक नक्षलग्रस्त राज्याने 'ग्रे हाऊंड' तुकडी तयार करावी असे आदेश दिले.
२५ मे रोजी कॉँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदा गृहमंत्री शिंदे यांनी छत्तीसगडचा दौरा केला. राजभवनात मुख्यमंत्री रमण सिंह आणि वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेतली. बस्तर येथे नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करणार असून राज्य पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सुरक्षा दले सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पाच जून रोजी बैठक बोलवण्यात येणार आहे.

Read More »

» स्पॉटफिक्सिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अजय शिर्के यांचा राजीनामा


» स्पॉटफिक्सिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अजय शिर्के यांचा राजीनामा

Read More »

स्पॉटफिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयची लवकरच बैठक


बीसीसीआयचे संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पॉटफिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयची लवकरच बैठक होईल, असे शुक्रवारी म्हटले.
नवी दिल्ली- बीसीसीआयचे संयुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पॉटफिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयची लवकरच बैठक होईल, असे शुक्रवारी म्हटले. या बैठकीची तारीख आणि वेळ मात्र शनिवारी निश्चित होणार आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठ मे रोजी बैठक होण्याची शक्यता आहे.
''बोर्डाच्या अनेक सदस्यांशी माझी चर्चा झाली त्यानुसार मी अध्यक्षांना (श्रीनिवासन) लवकरच स्पॉटफिक्सिंग प्रकरणी चर्चा करण्यासाठी बैठक बोलवावी असे सांगितले आहे.
बीसीसीआयची बैठक होणे गरजेचे आहे. लवकरच ही बैठक होईल. बीसीसीआयचे खजिनदार अजय शिर्के यांनाही यास्वरुपाची बैठक हवी आहे. ही बैठक झाल्यास प्रत्येकाला आपली मते मांडता येतील,'' असे ठाकूर यांनी म्हटले.
आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणी अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. या बैठकीत श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read More »

पेट्रोल, डिझेल महागले


पेट्रोलच्या दरात ७५ पैसे तर डिझेलच्या दरात ५० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घेतला आहे.
नवी दिल्ली- पेट्रोलच्या दरात ७५ पैसे तर डिझेलच्या दरात ५० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घेतला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. यामुळे मुंबईतील पेट्रोलचे दर प्रतिलिटर मागे ७१.१८ रुपये झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरी डॉलर्सच्या तुलनेत रुपयाचे मोठे अवमूल्यन झाल्याने आयात महागली आहे.

Read More »

शिर्के, जगदाळे यांचे राजीनामे


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय जगदाळे आणि खजिनदार अजय शिर्के यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय जगदाळे आणि खजिनदार अजय शिर्के यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जगदाळे आणि शिर्के यांच्या राजीनाम्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे.
आयपीएलमधील स्पॉटफिक्सिंगप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जगदाळे आणि शिर्के यांनी राजीनामा दिला आहे.

Read More »


नमस्कार प्रहार बातम्यांमध्ये आपल स्वागत..
» स्पॉटफिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयची तातडीची बैठक
» बीसीसीआयचे सचिव जगदाळे आणि खजिनदार शिर्के यांचा राजीनामा
» सोनिया गांधी यांच्यासोबत मतभेद नाहीत- पंतप्रधान
» विकास दर दशकभराच्या नीचांकावर
» स्पॉटफिक्सिंग प्रकरणी सिद्धार्थ त्रिवेदी साक्ष देणार
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा31052013

Read More »

पेट्रोलच्या टाकीचा स्फोट होऊन दुचाकीवरील दोघे ठार


दुचाकीवरून जात असलेल्या तिघांना पोलिसांनी हटकल्यामुळे पळून जाताना दुचाकीची प्रवासी वाहतूक करणा-या जीपला धडक बसली आणि दोघेजण जागीच ठार झाले.
पुणे- दुचाकीवरून जात असलेल्या तिघांना पोलिसांनी हटकल्यामुळे पळून जाताना दुचाकीची प्रवासी वाहतूक करणा-या जीपला धडक बसली. धडक इतकी जोरदार होती, की दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीचा स्फोट होऊन दोघेजण जागीच मृत्युमुखी पडले. तर एकजण गंभीर जखमी झाला.
शुक्रवारी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावर घोडेगाव येथे सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. शरद बोलवटे (२२, रा. पारुंडे, जुन्नर) आणि सुनिल पारधी (२६, रा. साकोरे, आंबेगाव) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर दत्तात्र्यय धनकुटे हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Read More »

सोने आणखी स्वस्त होणार

नजिकच्या काळात सोने २,००० रुपयांनी स्वस्त होईल, असा अंदाज औद्योगिक संघटना 'असोचेम'ने व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली- गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये घसरण होत आहे. ही घसरण आणखी काही काळ सुरूच राहणार असून नजिकच्या काळात सोने २,००० रुपयांनी स्वस्त होईल, असा अंदाज औद्योगिक संघटना 'असोचेम'ने व्यक्त केला आहे. सोन्यावरील गुंतवणूकदारांचा भरवसा कमी होत असल्याने त्यांच्याकडून सोन्याची विक्री केली जात आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावामध्ये मोठी घट झाली आहे.
एप्रिलमध्ये १० ग्रॅम सोन्यासाठी ३२,९९० रुपये मोजावे लागत होते. तोच दर आता २७,७९० रुपयांपर्यंत घसरला आहे. येत्या काळात सोन्याच्या दरात आणखी २,००० रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. जर सोन्याच्या किंमती २५ हजार रुपयांपेक्षा कमी झाल्यास ग्राहकांकडून खरेदी वाढू शकते. तसेच रुपयाची घसरण होत असल्याचा परिणामही सोन्याचे दर वाढण्यात होऊ शकतो. त्यामुळे सोन्याचा भाव २५,००० रुपयांच्या खाली येणार नाही, असे असोचेमने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा सोन्याचा मोठा खरेदीदार आहे. गेल्या काही वर्षामध्ये सोन्याच्या आयातीत मोठी वाढ झाली आहे.

Read More »

राशिभविष्य, एक जून २०१३


दैनंदिन राशिभविष्य…
मेष : स्वत:च्याच मूडमध्ये असाल.



वृषभ : विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.

मिथुन : गुणांनी पुढे जाल.
कर्क : आनंदाची बातमी समजेल.

सिंह : श्रेष्ठत्व सिद्ध होईल.

कन्या : क्रीडा स्पर्धेत भाग घ्याल.
तूळ : बद्धकोष्टतेच्या तक्रारी भेडसावतील.

वृश्चिक : कौटुंबिक सहलीचे आयोजन कराल.

धनू : एकतेचा मंत्र द्याल.

मकर : कौटुंबिक कथालेखन कराल.

कुंभ : अभ्यासदौरे घडतील.

मीन : गुंतवणुकीचे लाभ पदरी पडतील.

Read More »