Thursday, May 23, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS

अधिका-यांच्या मानसिकतेत अडले २५ टक्के आरक्षणाचे घोडे….

एखादी योजना कितीही चांगली असली तरी तिचे यश त्या योजनेच्या अंमलबजावणीवरच अवलंबून असते. मात्र अंमलबजावणी नीट झाली नाही की एखाद्या योजनेचा बोजवारा कसा उडतो, याचा उत्तम नमुना म्हणजे खासगी शाळांतील २५ टक्के आरक्षणाचा मुद्दा.

एखादी योजना कितीही चांगली असली तरी तिचे यश त्या योजनेच्या अंमलबजावणीवरच अवलंबून असते. मात्र अंमलबजावणी नीट झाली नाही की एखाद्या योजनेचा बोजवारा कसा उडतो, याचा उत्तम नमुना म्हणजे खासगी शाळांतील २५ टक्के आरक्षणाचा मुद्दा. देशातील आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांत प्रवेश मिळावा, यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असा शिक्षण हक्क अधिकार कायदा केंद्र सरकारने २००९मध्ये संमत केला होता. या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यात २०१२च्या एप्रिलपासून सुरू झाली. यंदा या अंमलबजावणीचे दुसरे वर्ष आहे. खासगी शाळांत २५ टक्के आरक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यात तरतूद असली तरी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अधिका-यांच्या उदासीनतेमुळे यंदाही मुंबई आणि परिसरात या आरक्षणासंदर्भात वाईट अवस्था आहे.

मुंबईतील सर्वच इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा श्रीमंतवर्गाच्या हाती आहेत. या शाळांच्या लेखी प्रत्येक विद्यार्थी पैसे कमवून देणारी वस्तू आहे. अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्क, विविध प्रकारचा निधी बिनदिक्कत या शाळा पालकांकडून वसूल करतात. काही शाळांचे प्रवेश लाखो रुपयांचा निधी दिल्याशिवाय होतच नाहीत. म्हणूनच या शाळांच्या लेखी २५ टक्के आरक्षण म्हणजे आपण सरकारला आणि गोरगरीबांना देत असलेली भीकच आहे, अशी मानसिकता आहे. आपण नियम तोडले तरी सरकार आपले काहीही वाकडे करू शकत नाही, असा ठाम विश्वासच या संस्थाचालकांत दिसतो. आणि त्यातूनच राज्याच्या आणि केंद्राच्या सर्वच कायद्यांची त्यांच्याकडून पायमल्ली होताना दिसते.

गेल्या शैक्षणिक वर्षात राज्याच्या शिक्षण विभागाने मुंबई आणि राज्यात २५ टक्के आरक्षणाचा अध्यादेश एप्रिलमध्ये जारी केला होता. हा अध्यादेश डिसेंबरमध्ये जारी करणे अपेक्षित होते, परंतु तो उशिरा जारी झाल्यामुळे राज्यातील सर्वच खासगी शाळांनी आपले प्रवेश पूर्ण केले होते. उशिरा अध्यादेश काढणे, ही शालेय शिक्षण विभागाची पहिल्याच वर्षातली सर्वात मोठी चूक ठरली. योजना चांगली होती, परंतु अधिका-यांची मानसिकता योग्य नव्हती. परिणामी उशिरा अध्यादेश काढून खासगी शिक्षण संस्थाचालकांना पळवाट निर्माण करून दिल्याचा आरोप अनेक पालक संघटनांनी केला. नंतर हा आरोप खराही ठरला. उशिरा काढण्यात आलेल्या आदेशानंतर जो पाठपुरावा अधिका-यांनी करायला हवा होता, त्यात खूपच हलगर्जी झाली. मुंबई शिक्षण विभागातील एक-दोन अधिकारी सोडले तर त्यात सर्वच अग्रेसर होते. त्यातही शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेतील सर्वाचा प्रामुख्याने समावेश होता. तरीही शिक्षण विभागाने किमान काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी नीट करावी, यासाठी मुंबई आणि परिसरात मुंबई शिक्षण व्यापारीकरणविरोधी अभियान, अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंच, ह्युमन राइट लॉ नेटवर्क, समान शिक्षण मूलभूत अधिकार समिती, ऑल इंडिया फोरम फॉर राइट टू एज्युकेशन, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया इत्यादी अनेक संस्था-संघटनांनी बराच पाठपुरावा केला. केंद्र सरकारची ही योजना किती प्रभावशाली आहे, त्यामुळे उपेक्षितांना कसा न्याय मिळेल, याबाबत प्रचार-प्रसारही काही संघटनाकडून करण्यात आला होता. आरक्षण नियमाप्रमाणे मिळावे, यासाठी आझाद मैदानापासून चर्नी रोडच्या बालभवनपर्यंत आंदोलने, निदर्शने करण्यात आली. परंतु पुढे काहीही झाले नाही. समान शिक्षण मूलभूत अधिकार समिती आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी तर कोणत्या शाळा आरक्षण देत नाहीत, याची लेखी माहिती आणि तक्रारीही शिक्षण विभागाकडे केल्या, परंतु एकाही शाळेवर मागच्या वर्षी कारवाई होऊ शकली नाही. कारवाईच्या नावाखाली पद्धतशीर पळवाटा शोधून काढण्यात आल्या.

या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात किमान या आरक्षणाची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा होती, परंतु झाले तेच. किमान जानेवारीपर्यंत यंदा २५ टक्के आरक्षणाचा अध्यादेश निघण्याची अपेक्षा होती, परंतु यंदाही अधिकारीवर्गाची मानसिकताच नसल्याचे दिसत आहे. शिक्षण विभागाने हा अध्यादेश लवकर काढावा, यासाठी मुंबईतील चर्नी रोडच्या कार्यालयावर शिक्षण बचाओ समिती, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया इत्यादी संघटनांना जानेवारी ते एप्रिलच्या पहिल्या आठवडयापर्यंत आंदोलने करावी लागली. त्यानंतर जाग आलेल्या शिक्षण विभागाने नाइलाजाने का होईना १५ एप्रिलला अखेर अध्यादेश जारी केला. शालेय शिक्षण विभागच्या या दिरंगाईचा यंदाच्याही २५ टक्के आरक्षणावर मोठा परिणाम झाला. बहुतेक शाळांनी यंदाही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. तर उरलेल्या आणि आरक्षण देण्याची मुळातच मानसिकता नसलेल्या शाळांनी आतापर्यंत आम्हाला या अध्यादेशाची माहितीच नसल्याचे सांगून पद्धतशीर आरक्षण नाकारले. तर काहींनी जे प्रवेश झाले, त्यातच या आरक्षणाला सामील करून आपली पोळी भाजून घेतली. हे सर्व प्रकार होत असताना शालेय शिक्षण विभागाला माहीत नव्हते असे नाही. तरीही गेल्या दीड महिन्यात शालेय शिक्षण विभागाकडे अनेक शाळांत आरक्षण मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. तर काही संघटनांनी आरक्षण नाकारणा-या शाळांची यादीच शिक्षण विभागाला देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पुढे जे व्हायचेच ते झाले.

अंमलबजावणी करणारी यंत्रणाच साथ देत नसल्यामुळे दाद कोणाकडे मागणार, यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत अनेक संघटनांनी या आरक्षणाच्या लढय़ातून माघार घेतली. या संदर्भातील लढा मुंबई आणि परिसरात जवळपास शांत होण्याच्या मार्गावर आहे, परंतु सामाजिक जबाबदारी म्हणून मुंबईतील प्रत्येक शिक्षण अधिका-यांची जबाबदारी नाही का, ज्या समाजातून आपण आलो आहोत, त्याचे किमान भान ठेवले तरी बोटावर मोजण्याइतक्या गोरगरीबांच्या मुलांना या शाळांत प्रवेश मिळाला असता, पण याचे भान या अधिका-यांना खरोखरच येईल का?

Read More »

मुरबे खाडीतील मासेमारी धोक्यात !

एमआयडीसीमधून रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता मुरबे खाडीत सोडण्यात येत असल्याने येथील मासेमारी नष्ट होत आहे.व्यवसाय करण्यास सरकारने सहकार्य करावे, अशी मागणीही मच्छीमारांनी केली आहे.

तारापूर - एमआयडीसीमधून रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता मुरबे खाडीत सोडण्यात येत असल्याने येथील मासेमारी नष्ट होत आहे. प्रदूषित पाण्यामुळे काही माशांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे खाडीतील मासेवारीवर उदरनिर्वाह करणा-या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, एमआयडीसीचे अधिकारी प्रदूषण कमी झाल्याचा दावा करून सरकारची फसवणूक करत असल्याचा आरोप येथील मच्छीमारांनी केला आहे. तसेच पारंपरिक मच्छीमारी करणा-यांना जोड व्यवसाय करण्यास सरकारने सहकार्य करावे, अशी मागणीही मच्छीमारांनी केली आहे.

एके काळी मुरबे खाडीतील मासेमारीवर शेकडो कुटुंबे आपला उदरनिर्वाह करत होती. तर, काही लोकांना रोजगार उपलब्ध होत होता. खाडीत मासेही मुबलक प्रमाणात होती. मात्र, एमआयडीसीमधून खाडीत सोडण्यात येणा-या सांडपाण्यामुळे प्रदूषणात वाढ होत असून खाडीतील मासे मरत आहेत. प्रदूषणामुळे माशांच्या काही जाती नष्ट झाल्या आहेत. निवटय़ा, चिंभोरी, शिंपल्या, पापलेट, बोंबिल, शेवंड, लहान कोळंबी अशा येथे हमखास आढळणा-या माशांचे प्रमाण कमी झाले आहे. तर, शिल्लक मासे खाण्या किंवा विकण्यात योग्य नसल्याने २० ते २५ वर्षापूर्वी खाडीतील मासेवारीवर उदरनिर्वाह करणारे अनेक जण आज अन्य व्यवसाय व रोजगाराच्या शोधात आहेत.

एमआयडीसीत निर्माण होणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी येथे एक सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. पण, या प्रक्रिया केंद्राची क्षमता फक्त २५ एमएलडी आहे. तर एमआयडीसीतून दररोज ७० एमएलडी पाणी बाहेर सोडण्यात येते. त्यामुळे सांडपाणी शुद्धीकरणाच्या अपु-या सुविधेमुळे मोठया प्रमाणात सांडपाणी प्रक्रिया न करताच औद्योगिक क्षेत्रातील एस. झोनच्या मागील नाल्यातून मुरबे खाडीत सोडले जाते. यामुळे आगवन-पंचाळी ते मुरबे यादरम्यान असलेल्या खाडीतील मासे मरत आहेत. येथील काही मच्छीमार खाडीतील पाण्यात मासेमारी करतात. पण, दूषित पाण्यामुळे मच्छीमारांमध्ये त्वचेच्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे.

मुरबे गावात एकूण ६५ बोटी आहेत. एका बोटीची किंमत सुमारे ३० ते ३५ लाख रुपये आहे. एका बोटीवर २३ कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. परंतु, येथील मासेमारी नष्ट होत असल्याने खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणा-या अनेक कुटुंबीयांना रोजगाराची चिंता भासू लागली आहे. दरम्यान, २००१ मध्ये गावातील मच्छीमारांनी एकत्र येऊन खाडी बचाव जन आंदोलन समितीची स्थापना केली होती. या समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी कारखान्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रदूषण मंडळाच्या अधिका-यांनी दिले होते. मात्र, एक वर्ष झाले तरी येथील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले नाही, असे खाडी बचाव जन आंदोलन समितीचे सदस्य नितीन देव यांनी सांगितले.

तारापूर एमआयडीसमध्ये मोठय़ा संख्येने रासायनिक कारखाने आहेत. तसेच येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र अपुरे पडत आहे. पण, आम्ही वेळोवेळी कारखान्यांवर कारवाई करत आहेत. - डी. बी. पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

रासायनिक पाण्यामुळे खाडीतील पाण्यावर रसायनांचा एक तरंग साचलेला असतो. यामुळे बोटीच्या लाकडांचा कीड लागत असून बोटी खराब होत आहेत. या खाडीतील गाळ काढण्याच्या कामासाठी बंदर खात्याकडून ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. पण, अद्याप हा गाळ काढलेला नाही. त्यामुळे मुरबे येथील मच्छीमार त्रस्त झाले आहेत.

वर्षभरापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण कमी करण्यासाठी अवैध उत्पादन करणाऱ्या आणि सांडपाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडणा-या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. पण, वर्षभरानंतरही येथील प्रदूषण कमी झालेले नाही.- नितीन देव, सदस्यखाडी बचाव जन आंदोलन समिती

Read More »

वसईत तिवरांची तोड

वसई व नायगाव परिसरात मोठया प्रमाणात तिवरांची तोड करून अनिधकृत बांधकामे केली जात आहे.

मुंबई - तिवर क्षेत्रापासून किमान ५० मीटर अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पण, न्यायालयाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत वसई व नायगाव परिसरात मोठया प्रमाणात तिवरांची तोड करून अनिधकृत बांधकामे केली जात आहे.

नायगावमधील मच्छीमार संस्था तसेच पूर्वेकडील सिटीझन को-ऑपरेटीव्ह सोसायटी परिसरात तिवरांची बेकायदा तोड करून भराव टाकून चाळी बांधल्या जात आहेत. येथे यापूर्वीच १५० ते २०० घरे बांधण्यात आली आहेत. किल्लाबंदर ते जेटी परिसर आणि भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ मोठया प्रमाणात तिवरांची कत्तल सुरू आहे. तसेच वसई पश्चिमेकडील सुरूची बाग येथे असलेल्या तिवरांच्या विस्तीर्ण प्रदेशावर भराव टाकून बांधकामांसाठी जमीन तयार केली जात आहे. याविरोधात हरित वसई संरक्षण समितीने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. मात्र, ही माहिती प्रश्नार्थक स्वरूपाची असल्याचे कारण देत तहसील कार्यालयाने माहिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे समितीने प्रथम अपिल अधिका-यांकडे माहिती मागवली. त्यावर अपिल अधिका-यांनी तहसील कार्यालयाला माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तहसील कार्यालयाने अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही.

सागरी जैवविविधतेत तिवर महत्त्वाची भूमिका बजावतात. तिवरांची मुळे पाणी शोषून घेत असल्याने तिवरांमुळे किना-यावर धडकणा-या सागरी लाटांचा वेग कमी होतो. परिणामी किना-यांची धूप रोखण्यास मदत होते. किना-यावरील उथळ पाण्यात अनेक मासे अंडी घालतात. तिवरांच्या दाट झाडीमुळे या अंडय़ांचे संरक्षण होते. मात्र, मोठ्या प्रमाणात होणा-या तिवरांच्या तोडीमुळे किना-याची धूप होत आहे. त्यामुळे भरतीचे पाणी किना-यावरील घरांमध्ये शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. तिवरांच्या तोडीचा परिणाम येथील मासेमारीवरही झाला आहे. वसईत पूर्वी आढळून येणारे ताम, निवटी, सारंगा हे मासे नामशेष होत आहेत.

 वसई किना-यावरील तिवरांची तोड झाल्याने गेल्या १०- १२ वर्षामध्ये किना-याची मोठय़ा प्रमाणात धूप झाली आहे. तिवर हे स्वच्छतेचे काम करतात. समुद्रातील कचरा तिवरांत अडकतो. मात्र, तिवराच्या तोडीमुळे आता किना-यावर कचरा पसरलेला असतो. येथील मासेमारीवही याचा परिणाम झालेला आहे- मिल्टन सौदिया, महासचिव, हरित वसई संरक्षण समिती 

Read More »

उरणमधील मिठागरे नामशेष होण्याच्या मार्गावर

१०४ पैकी फक्त ६ मिठागरे शिल्लक राहीले असल्यामुळे मिठागरांवर काम करणा-या कामगारांवर उपासमाराची वेळ आली आहे.

उरण- वाढते औद्योगिकीकरण आणि मिठागरांच्या जमिनींवर टाकला जाणारा भराव यामुळे उरण तालुक्यातील मिठागरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी १०४ च्या घरात असलेली येथील मिठागरांची संख्या पाहता आता फक्त ६ मिठागरे शिल्लक आहेत. यामुळे मिठागरांवर काम करणा-या कामगारांवर उपासमाराची वेळ आली आहे.

मिठागरांमध्ये तयार झालेले मीठ गोण्यांमध्ये भरणे, गोण्या शिवणे, मीठ ट्रक किंवा मचवा (छोटी बोट) मध्ये चढवणे, अशा विविध कामांसाठी मिठागरांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी तालुक्यात दोन संघटना स्थापन करण्यात आल्या होत्या. जसखार गावचे तुकाराम वाजेकर यांनी १९४६ मध्ये तालुक्यात उरण पेठा मीठ उत्पादक सहकारी संघ लि. ही संघटना स्थापन केली. या संघटनेचे १६८९ कामगार सदस्य होते. तर उरण पेठा मिठागर कामगार संघ लि. या दुस-या कामगार संघटनेचे १५७१ कामगार सदस्य होते. त्या काळात उरणमध्ये १०४ मिठागरे होती. आज त्यापैकी जुई, खोपटा, पिरकोन, गोवठणे, फुंडे अशी फक्त सहा मिठागरे शिल्लक आहेत. तर, मिठागरांवर काम करणा-या कामगारांची संख्याही रोडावली असून आता बोटावर मोजण्या इतके कामगार मिठागरांमध्ये काम करत आहेत.

मीठ तयार करणे हे मोठे कष्टाचे काम असते. समुद्रातील पाणी सुरुवातीला तापवणीत घेतात. हे पाणी दोन-चार दिवस तापविल्यानंतर कोंडीत सोडतात. कोंडीत हे पाणी दोन दिवस ठेवले जाते. या काळात पाण्याचे बाष्पीभवन होऊन लालसर मीठ तयार होते. त्यानंतर बांबूच्या काठीला लोखंडी दातेरी लावून मीठ हलविले जाते. या प्रक्रियेत मिठाच्या मोठय़ा खडयाचे लहान तुकडे होतात. त्यानंतर त्यातील उरले-सुरलेले पाणी निघून जावे यासाठी ते कोंडीच्या बांधावर ठेवले जातात. बांधावर खडेदार पांढरेशुभ्र मीठ तयार होते. नंतर या मिठाचेच ढिगारे केले जातात आणि गोणीत भरले जातात. येथेच मिठाची खरेदी केली जाते. मीठ तयार करण्याच्या प्रक्रियेला साधारणपणे ६ ते ७ दिवस लागतात, अशी माहिती सोनारी गावचे मीठ उत्पादक बाळाराम कडू यांनी दिली.

दरम्यान, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उरणमधील मिठागरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यावर काम करणा-या कामगारांची उपासमार होऊ लागली आहे. मिठागरांतील कामगारांच्या प्रश्नांबाबत माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अद्याप येथील कामगारांना योग्य सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे शिल्लक कामगारही काम सोडून जात आहेत. मीठ बनविण्याचे काम डिसेंबर ते मे महिन्यांमध्ये चालते. उर्वरित काळात मिठागरांवरील कामगार वेठबिगारी किंवा मच्छीमारी करून उदरनिर्वाह करतात, असे संघाचे सचिव किशोर घरत यांनी सांगितले.

Read More »

सुसरी नदीतून मातीचा बेकायदा उपसा

तहसीलदारांना करवाईचे आदेश.अधिकारी, तलाठी कोणतीच कारवाई करत नसल्याने सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

 डहाणू ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी बेकायदा रेती चोरी करणा-यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही डहाणू तालुक्याच्या दुर्गम भागातील भातशेती, नदी, ओढे, तलावातून अनधिकृत खोदकाम करून मातीचा बेकायदा उपसा केला जात आहे. येथील सुसरी नदीपात्रातून दररोज मोठय़ा प्रमाणात मातीचा उपसा केला जात आहे. याबाबत तक्रार करूनही अधिकारी, तलाठी कोणतीच कारवाई करत नसल्याने सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

तालुक्यातील रानशेत बोलाडपाडा येथे सुसरी नदीच्या पात्रातून मोठया प्रमाणात खोल खोदकाम करून दररोज हजारो ब्रास मातीचा उपसा केला जात आहे. सुसरी नदीपात्रातून वनखाते व लघु पाटबंधारे विभागाच्या बंधा-यांची नासधूस करून नियमांचे उल्लंघन करून माती उपसा केला जात आहे. ही माती घेऊन जाण्यासाठी येथून सतत ट्रकची ये-जा सुरू असते. पण, याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रानशेत, गंजाड, औढाणी येथून दररोज बेकायदा खोदकाम केले जात आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी जव्हारच्या निवासी उपजिल्हाधिका-याकडे तक्रार केली आहे. 

Read More »

पोलादपूरमध्ये ८ गावे ३६ वाडयात पाणीटंचाई

तालुक्यात उष्णतेने कहर केल्याने भूजल पातळी खालावली आहे. या टंचाईग्रस्त गावे-वाडय़ांना दोन दिवसाआड ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पोलादपूर - तालुक्यात उष्णतेने कहर केल्याने भूजल पातळी खालावली आहे. गावे-वाडयामधील जलस्त्रोतही कोरडे पडले आहेत. काही गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनांचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गेल्या वर्षी तालुक्यातील ८ गावे ३८ वाडयामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होती. या वर्षीही ८ गावे ३६ वाडयामध्ये टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईग्रस्त गावे-वाडय़ांना दोन दिवसाआड ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

वर्ष २०१३ च्या पाणीटंचाई निवारण कृती आराखडयाच्या मंजुरीनुसार पाणी टंचाईग्रस्त गावे-वाडय़ांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या अंतर्गत आतापर्यंत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे-वाडयामध्ये ४० कूपनलिका खोदण्यात आल्या आहेत. त्यापैकी २५ ठिकांणी पाणी उपलब्ध झाले असून १५ कूपनलिका कोरडया आहेत. तालुक्यातील पाण्याची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन पोलादपूर पंचायत समिती प्रशासनातर्फे विविध उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. टंचाईग्रस्त गावे-वाडय़ांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

तालुक्यातील दुर्गम भागातील गावे-वाडयामधील ग्रामस्थांना मार्च ते मे या तीन महिन्यांत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यासाठी वाडयांच्या जवळपासच्या परिसरात पाण्याचा उद्भव पाहून गुरुत्वबळी पाणीयोजना राबवण्यावर पंचायत समिती प्रशासन भर देत आहे.

 दुर्गम व अतिदुर्गम भागांना जवळ पडेल आणि जिथपर्यंत गाडी जाऊ शकेल तिथपर्यंत पाण्याच्या साठयासाठी २ हजार लिटरच्या साठवण टाक्यांचे वाटप करण्यात आले आहे. या टाक्या पोलादपूर पंचायत समितीच्या मार्फत देण्यात आल्या आहेत. पण, समाजसेवी संस्थांकडून पाण्याच्या टाक्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.- दिलीप भागवत, सभापती, पोलादपूर   

Read More »

नोकरदार सून आता नकोशी!

वाढत्या महागाईमुळे पतीप्रमाणेच पत्नीनेही नोकरी करावी असं बहुतेक कुटुंबियांना वाटतं. पण, आता मात्र असं वाटणा-यांचं प्रमाण कमी झालं आहे. विवाहित स्त्री नोकरी करणारी असेल तर ती मुलांच्या संगोपनासाठी आणि घरच्या अन्य कामांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने पती आणि मुलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे आता लग्न करणा-या तरुणांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबियांनाही घरचा उंबरठा ओलांडून आत येणारी गृहलक्ष्मी गृहिणीच असावी असं वाटू लागलं आहे. 'डिन्क' म्हणजेच 'डबल इन्कम नो किडस्'च्या विचारधारेला जर खरंच फाटा दिला जात असेल तर ते स्वागतार्ह मानायला हवं का?

गेल्या काही वर्षात मुलाचं लग्न ठरवायचं असलं तर त्याची होणारी पत्नी कोठे नोकरी करते आणि ती किती पैसे मिळवते किंवा लग्नानंतर ती नोकरी करणार का, याकडे अधिक लक्ष दिलं जातं. महागाई प्रचंड वाढल्याने संसार चालवण्यासाठी दोघांनी कमाईसाठी हातभार लावावा या भावनेतून असा विचार केला जातो. पण, आता लग्नाला सज्ज असणा-या मुलांना नोकरी करणा-या पत्नीपेक्षा घरी राहून गृहिणीपद सांभाळणारी पत्नी अधिक प्रिय झाली आहे. आता उच्चशिक्षित तरुण आणि त्याच्या कुटुंबियांचीही घरात येणा-या नववधूबाबतची अपेक्षा बदलत आहेत. नोकरी न करता गृहिणीपदाची जबाबदारी सांभाळणा-या तरुणींना पत्नीचा दर्जा देण्याची मागणी १५ टक्क्यांनी वाढली असल्याचं एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटने आपल्या सर्वेक्षणात्मक अहवालात म्हटलं आहे. यामुळे नोकरी करणा-या पत्नीकडे केवळ तरुण वर्गच नाही तर त्यांचे कुटुंबीय हळुहळू दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट होतं.

नोकरी करणा-या मुलींना लग्नासाठी प्राधान्य दिलं जात नसलं तरी सुशिक्षित कुटुबियांमध्ये शिक्षिकेची नोकरी करणा-या मुलींना अजूनही मागणी आहे. खासकरून शिक्षकाची नोकरी करणारी तरुण मुलं पत्नी म्हणून शिक्षिकेलाच अधिक प्राधान्य देतात. तरुण शिक्षकांप्रमाणेच अन्य वर्गातील युवावर्गही शिक्षिकांना आपली जोडीदार बनवण्यासाठी उत्सुक असतो. इतर नोक-या करणा-या मुलींच्या तुलनेत शिक्षिका नोकरी करताना घरासाठीही जास्त वेळ देऊ शकतात.

नोकरी करणा-या महिला कुटुंबियांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने त्यांचे पती, मुलांना अनेक अडचणी येतात. पती-पत्नी दोघंही नोकरी करत असल्यामुळे घराच्या आर्थिक स्थितीत फारसा फरक पडत नाही. पण, कुटुंबाची सुख-शांती हरवते आणि मुलांचं पालनपोषण चांगल्या पद्धतीने होत नाही असं अनेक युवकांना वाटतं. काही वर्षापूर्वी आपली महिला सहकारी नेहमी घरी फोन करत असल्याचं तिची दुसरी सहकारी पाहत असे. आपली सहकारी घरची कामंही ऑफिसमधूनच करते, असं त्या महिलेला वाटत असे. त्यानंतर फोन करणा-या त्या महिलेने एक दिवस राजीनामा दिला. त्यावेळी तिच्या ख-या परिस्थितीचा तिच्या सहकारी महिलेला अंदाज आला. तिचा आठ महिन्यांचा मुलगा फार आजारी होता. बरोबर आई-वडील नव्हते आणि नोकरी करणारी स्त्रीही विश्वासपात्र नव्हती.

मागच्या काही वर्षात भारतातील सामाजिक, कौटुंबिक आराखडा फार वेगाने बदलला आहे. आता एकत्र कुटुंब पद्धत फारशी दिसत नाही. आधी कुटुंबातील स्त्रिया आणि शेजारच्या स्त्रियाही एकत्र येऊन घरची कामं आणि मुलांचं पालनपोषण करत असत. आता छोटय़ा छोटय़ा गरजांसाठीही लोक पैसे देऊन मिळणा-या नोकरांवर अवलंबून राहू लागले आहेत. त्यामुळे आजच्या पिढीला त्यांच्या कमाईपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. पती आणि पत्नी दोघंही नोकरी करणारे असतील तर त्यांना कमाईतील मोठा भाग नोकर, स्वयंपाकी, टय़ुशन्स वगरे गोष्टींवर खर्च करावा लागतो. त्याचप्रमाणे डबाबंद खाण्यावरही मोठय़ा प्रमाणावर पैसा खर्च होतो. एखादी महिला किंवा पुरुष घराबाहेर पडतात त्यावेळी त्यांचा खर्चही वाढत असतो. उत्तम कपडे, गाडी यांची त्यांना गरज असते. नोकरी करणारी ८० टक्के जोडपी ताणतणाव, दडपण यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी ग्रस्त असतात असं अ‍ॅसोचॅमने आपल्या अध्ययनानंतर सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे. पण, केवळ भारतातच अशी स्थिती आहे, असं नाही तर सा-या जगात नोकरी करणा-या दाम्पत्यांच्या बाबतीत करण्यात आलेल्या अध्ययनातून असेच परिणाम समोर आले आहेत.

सध्या सुमारे ४८ टक्के अमेरिकन जोडपी दुहेरी उत्पन्न मिळवणारी आहेत. कॅनडामध्ये ही आकडेवारी ७० टक्के आहे तर संयुक्त राष्ट्रामध्ये दोन तृतियांश दाम्पत्य दुहेरी उत्पन्न मिळवतात. पण, दोघांनीही उत्पन्न मिळवण्याचा हा ताण परस्पर संबंधांवरही विपरित परिणाम करणारा ठरतो. ब्रिटनमध्ये नोकरी करणा-या दाम्पत्यांमध्ये परस्परांमध्ये शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा वेगाने कमी होत आहे. हे एक प्रकारचं लक्षण आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्रिटनमध्ये प्रत्येकी आठपैकी एक स्त्री आणि सुमारे एक चतुर्थाश पुरुष या लक्षणांनी ग्रस्त आहेत.

संयुक्त राष्ट्रांमध्ये पुरुषांनी नोक-या सोडण्याच्या साखळीमध्ये वेगाने वाढ होत आहे, असं त्या राष्ट्रांची संख्यात्मक आकडेवारी सांगते. २०११ मध्ये तिथे केवळ १९ हजार पुरुष घरी बसून होते. २०१२ मध्ये त्यांच्या संख्येत दोन लाख २७ हजार इतकी वाढ झाली. आर्थिक मंदी हे त्यामागचं खरं कारण आहे. पण, मंदीमुळे ज्या पुरुषांना आपल्या नोक-या सोडाव्या लागल्या आणि ज्यांची आयुष्याची जोडीदार चांगली कमाई करत होती त्यांनी अन्य ठिकाणी काम करण्याऐवजी घरी बसून मुलांचं संगोपन करण्यालाच प्राथमिकता दिली. या कारणामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये 'स्टे अ‍ॅट होम डॅड्स' ही संकल्पना विकसित होत आहे. दुहेरी उत्पन्न मिळत असेल तर ते चांगलं आहे पण, त्यामुळे आपल्या नातेसंबंधात बाधा येते असा विचार लोक आता करू लागले आहेत.

काही वर्षापूर्वीपर्यंत भारतात पुरुष हाच घरातील एकटी पैसे कमावणारी व्यक्ती असे. पत्नी नोकरी करत असेल तर तिच्याकडे वाईट दृष्टीने पाहिलं जात असे. हळूहळू या परिस्थितीत फरक पडला. मुली शिकल्या आणि त्या नोकरी करू लागल्या तर त्या आत्मनिर्भर झाल्या, या दृष्टीकोनातून मुलींकडे पाहिलं जाऊ लागलं. त्या मुलींची लग्न झाली की त्या गृहिणीच्या भूमिकेतून बाहेर पडून नोकरीला प्राधान्य देऊ लागल्या. दोघंही नोकरी करणारी असल्यामुळे पैसे जास्त येत असल्याने अशा दाम्पत्याला प्रतिष्ठा दिली जाऊ लागली.

पण, नोकरी करणा-या महिलांच्या घरच्या कामांची यादी कमी झाली नाही. भारतीय स्त्रिया दिवसातील १६ तास काम करत असतात, असं एका अध्ययनातून सांगण्यात आलं. त्यामध्ये घरातील कामांशिवाय मुलांना शिकवणं आणि बाहेरच्या कामांचाही समावेश आहे. त्यामुळे नोकरी करणा-या स्त्रियांना किती ताण येत असेल त्याचा अंदाज करता येऊ शकतो. एकीकडे हे होत असताना नोकरी देणा-यांनी त्यांना बरोबरीचा दर्जा दिला नाही. बहुतांश प्रकरणात त्यांचे पगार पुरुषांपेक्षा कमीच राहिले. एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार २००१ मध्ये नोकरी करणा-या महिलांना सरासरी पगार साडेचार हजार रुपये मिळत होता. आता तो साडेनऊ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

येथे बहुतांश महिला नोक-या सोडून देतात. एका संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, बहुतांश भारतीय स्त्रिया लग्नानंतर घरगुती जबाबदा-या किंवा मुलांच्या संगोपनासाठी नोक-या सोडतात. पण, आता नोक-या सोडून घरी बसणा-या स्त्रियांनी इतरांना काय वाटेल याची काळजी करण्याचं कारण नाही. याचं कारण आपल्या पत्नीने किंवा सुनेने नोकरीपेक्षा घरात जास्त वेळ द्यावा आणि तिने येथील जबाबदा-या उचलून कौटुंबिक दुवा मजबूत राखावा, असं तिच्या सासरच्या मंडळींनाच वाटू लागलं आहे.

Read More »

खानदानी राजधानीचा 'मँगो फेस्टिव्हल'

आंबा पिकतो, रस गळतो

कोकणचा राजा, झिम्मा खेळतो..

आंब्याची रसाळ चव चाखताना हे गाणं हमखास आठवतं. उन्हाळा सुरू झाला की, बच्चेकंपनीसह मोठय़ांनाही आंब्याच्या आगमनाचे वेध लागतात. खवय्यांच्या नगरीत या हापूस आंब्याची मूळ चव अबाधित राखत नानाविध प्रयोग करून आता उपाहारगृहांनीही आंब्याच्या रसास्वादाने खवय्यांना आकर्षित करण्याचं मनावर घेतलं आहे. 'खानदानी राजधानी' या शाकाहारी थाळीसाठी प्रसिद्ध असलेल्या उपाहारगृहामध्ये सध्या 'मँगो फेस्टिव्हल'ची धूम आहे.

कुर्ल्यातील कमानी मार्गाच्या सुरुवातीला एखाद्या प्रशस्त राजवाडय़ाप्रमाणे उभारलेल्या खानदानी राजधानीमध्ये सध्या खवय्यांचा मुक्काम वाढलाय. बाराचा काटा सरकला की, शाकाहारी पदार्थाची अस्सल चव चाखण्यासाठी इथे खवय्यांची गर्दी जमते. 'अतिथी देवो भव:' ही आपली मूळ परंपरा अबाधित राखत पुरुषवर्गाला टिळा लावत सोबतिणीसह ओवाळणी करत स्मितहास्याने स्वागत होतं. टेबलावर आसनस्थ होऊन स्थिरावतो न् स्थिरावतो तोच समोर थंडगार 'कैरी पन्हं' सादर! उकडलेल्या कैरीचा रस, साखर आणि बर्फाच्या क्रंचमधलं हे पन्हं क्षणार्धात पोटात गुल होतं. राजधानीच्या व्हेज थाळीत काय काय पंचपक्वान्न असतील, हा विचार आधीच टेबलावर मांडून ठेवलेल्या थाळीच्या आकारानं बांधता येतो. नऊ वाटय़ा, दोन डिश, दोन ग्लास.. यात काय काय म्हणून वाढलं जाईल, हे विचार कल्पनानगरीत घर करून बसतात.

पहिल्यांदा चटपटीत चटणीसह ढोकळा सादर होतो. नंतर मँगो डाल ढोकली आपल्या थाळीत हजर होते. डाळीत बुडवलेला काहीसा वेगळा पदार्थ समोर आल्यावर या पदार्थाची चव चाखण्याचा मोह आवरता येत नाही आणि स्ट्रॉबेरी हलवा 'स्टार्टस' रूपात.. गोड पदार्थ परमप्रिय असणारे या स्ट्रॉबेरी हलव्याला नाकारूच शकत नाहीत. त्यानंतर रोजच्या थाळीतील पनीर कोफ्ता, गठ्ठे की सब्जी, आलू पालक या त्यांच्या पारंपरिक डिशमध्ये हळूच कैरीच्या भाजीची एन्ट्री होते. 'आम की लुंजी' असं नामकरण असलेल्या या कैरीच्या भाजीची चव चाखताच आंबट-तुरट-तिखट असा तिन्ही चवींचा आस्वाद अनुभवता येतो. मोर्चा गोड पदार्थाकडून सरकल्याचं समाधानही चेह-यावर झळाळतं. तेवढय़ातच कांदा आणि कैरीची गरमागरम भजी पुढय़ात हजर.. एव्हाना भाज्यांवर ताव मारण्यासाठी गरमागरम चपाती, कडधान्यांपासून बनवलेली कुरकुरीत भाकरी पुढय़ात आलेली असते. सध्या सुरू असलेल्या मँगो फेस्टिव्हलमध्ये या ताटात आम्रखंडाला पूरक पुरीदेखील ताटात विराजमान होत आहे.

भारतीय खवय्यांच्या जगतात राजधानीत शनिवारी जायचा बेत असेल तर गोलमटोल तुपात बुडालेल्या पुरणपोळीवर ताव मारण्याची संधी लाभेल. बरं जिलेबी आणि ताकाची फर्माइशही इथे न बोलताच पूर्ण होत असेल तर मग खाने का मजा दुगना हो जाता है.. पुलाव, खिचडीबरोबर गोडी आणि तिखट डाळ उपलब्ध आहे. व्हेजथाळीचा फडशा पाडल्यानंतर सर्वात शेवटी आमरसाचा पर्याय ठेवला असेल तरच मनसोक्त आनंद लुटता येतो.

खानदानी राजधानी हे शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असलेलं उपाहारगृह विशेषत: फेस्टिव्हल स्पेशल खाण्यासाठीच प्रसिद्ध आहे. आता उन्हाच्या सीझनमध्ये आंब्याच्या खवय्यांसाठी कैरी पन्हं, आमरस असे नानाविध पदार्थ रोजच्या जेवणात समाविष्ट आहेत.

मात्र रोजच्या आंब्यांच्या टिपिकल पदार्थासह आंब्याची आगळीवेगळी चव चाखण्यासाठी राजधानी हा सर्वोत्तम पर्याय आहे. फळाच्या राजाची ही राजेशाही दावत खानदानी राजधानीमध्ये ३१ मेपर्यंत सुरू आहे. तेव्हा आजूबाजूच्या खानदानी राजधानीमध्ये आंब्याच्या या आंबटगोड पदार्थावर ताव मारण्यासाठी सज्ज व्हा!

Read More »

तिचं 'गा-हाणं' गाभा-यात घुमलं!

अनेक धार्मिक कार्यात परंपरेने आलेल्या पुरुषांच्या मक्तेदारीला ललकारत आता कोकणातल्या स्त्रिया पुढे सरसावू लागल्या आहेत. मंगळागौर, फुगडी यांसारख्या धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या खेळांतून गिरक्या घेत आता या स्त्रिया 'देवा महाराजा.' म्हणत गा-हाणं घालतानाही दिसतात. खरं सांगायचं तर, एकीकडे शहरी स्त्री कॉर्पोरेट जगतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यसंस्कृतीत आत्मविश्वासाने उभी राहिलेली असताना आता ग्रामीण स्त्रीनेही तिच्या कवेतलं जग जिंकायला सुरूवात केली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

महाराष्ट्राच्या लोककलांमध्ये महिलांचा वावर थोडासा मर्यादित आढळतो. एकूण ६४ लोककलांमध्ये मंगळागौर आणि फुगडी याच प्रकारांत स्त्रियांची पुढारकी. देवस्थानी किंवा पूजाअर्चा आटोपताना स्त्री आपल्या यजमानांच्या पाठीशी किंवा कोप-या आड उभी राहून हजेरीचा कार्यक्रम पार पाडते. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 'नारायणी भगिनी महिला मंडळा'ने मात्र या खुंटीक परंपरांना छेद देत गावातील महिलांना एकत्र करून धार्मिक कार्यातील पुरूषी मक्तेदारीला आव्हान दिलं आहे. गावातील स्त्रियांना एकत्र करून दशक्रोशीत पालखी सोहळा पार पाडण्याचं काम हे महिला मंडळ करत आहे. आज स्त्री सर्व क्षेत्रांत भरीव कामगिरी करत असताना धार्मिक कार्यापासून दुरावलेल्या स्त्रीला तिच्या कार्यक्षमतेची ओळख व्हावी, हा या महिला मंडळाचा मुख्य हेतू आहे.

चैत्र ते फाल्गुन या महिन्यांतील मराठी सणांचा नव्या पिढीला सखोल परिचय करून द्यावा, यासाठी सामाजिक स्तरांवर समाज प्रबोधनात्मक उपक्रमांमध्ये महिलांना एकत्र आणण्यासाठी २००७ साली शीतल शितुत आणि वासंती धनवटकर यांच्यासह बाराजणींनी मिळून नारायणी भगिनी मंडळाची स्थापना केली. एरव्ही उंबरठयाबाहेर जाण्याची धमक नसलेल्या या महिलांना गोळा करणं, या मागील दिव्य शीतल शितुत अगदी भरभरून सांगतात. तरुण पिढी ही आधुनिक होण्याच्या नादात स्वत:च्या मूळ ओळखीपासून भरकटत असल्याने तिला वेळीच मार्गावर आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा, या संकल्पनेतून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा सल्ला देत त्यांनी महिलांना गोळा केलं.

पहिल्यांदा पतितपावन मंदिरात छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला. चैत्रातील गुढीपाडवा, आषाढातील दिंडी, श्रावणातील मंगळागौर अशा सामाजिक उपक्रमांतून महिलांचा आत्मविश्वास दुणावत गेला. असंच एकदा गावातील जत्रेत सिंधुदुर्गातील एका महिला मंडळाकडून दशावतार सादर करताना पाहिल्यानंतर अचंबित झालेल्या शितुत यांनी 'नमन' सादर करण्याची संकल्पना आपल्या मंडळात मांडली. गणपती, नटवा, संकासूर या तिन्ही भूमिका आपणच सादर करण्याचं मनोधैर्य आणणं हे आजपर्यंतच्या शर्थीच्या प्रयत्नातून पुढचं पाऊल होतं. कित्येकिंनी स्पष्ट नकार कळवला. जमणार नाही, आम्ही मंडळात येतच नाही, असा काहीसा सूर उमटल्यानंतर शीतल यांनी कंबर कसली.

पुरुषांची मक्तेदारी असलेला धार्मिक विधी आपणही निर्विघ्नपणे पार पाडू शकतो, हा विश्वास निर्माण करण्याचं जोखमीचं काम करण्यात महिने लोटले. आधीच्या कार्यक्रमांच्या जोरावर आता एक नवं पाऊल उचलायला हरकत नाही, हे पटल्यानंतर काहीजणी राजी झाल्या. फाल्गुनातील होळी साजरी करण्याअगोदर दशक्रोशीत पालखी नेऊन 'गाऱ्हाणं' सादर करण्याच्या त्यांच्या निर्भीडतेला सर्वाची दाद मिळाली. या सात वर्षाच्या काळात नारायणी भगिनी मंडळाने गावोगावी जाऊन समाजप्रबोधनात्मक अनेक उपक्रम राबविले आहेत. समाजाकडून या धार्मिक कामाची प्रशंसा केली जाते. मात्र महिलांकडून प्रतिसाद मिळत नाही. ज्या दिवशी स्त्रिया सर्वार्थाने पुढाकार घेऊन गावातील धार्मिक कार्यामध्ये पुढाकार घेतील, त्या दिवशी आपल्या प्रयत्नांना यशाची पालवी फुटेल, असं शितल शितुत प्रांजळपणे सांगतात.

Read More »

या हट्टाचं करायचं काय ?

मुलं एकदा का हट्टाला पेटली की, जोपर्यंत त्यांचा तो हट्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत ती कुणाचच ऐकत नाहीत. पण या हट्टी मुलांत एक प्रकारची ऊर्जा असते. या ऊर्जेला सकारात्मक वळण दिलं गेलं तर त्यांच्या हट्टातूनही चांगलंच स्फुरेल.. त्यासाठी हवी त्यांच्या आणि तुमच्याही मनाची पूर्वतयारी!

''तुम्ही सांगता घराच्या कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या म्हणून. माझा मुलगा एवढा हट्टी आहे की, त्याला हवी ती प्रत्येक गोष्ट मी त्याच्या हातात द्यायला लागते. परवाचेच उदाहरण सांगते, आम्ही सगळेजण बाहेरून आलो. मी फारच दमले होते. आल्याआल्या त्याला थंड पाणी हवं होतं. त्याचे वडील किचनमध्ये गेले आणि पाणी घेऊन आले. याचं डोकं फिरलं. त्याच्या हातात पाण्याची बाटली दिली, त्याने पाणी ओतून दिलं सगळं. नुसती आदळआपट. मी पाणी घेऊन आले नाही म्हणून फक्त. काय करायचं तुम्हीच सांगा.''

''अहो, पण तुम्ही नोकरी करता ना? त्यावेळी तो काय करतो?''

''मी घरी नसते तेव्हा आजीला धारेवर धरतो. तिचा तर जीव अगदी नकोसा करून टाकतो.''

''त्याचे ऐकण्याशिवाय आमच्याकडे काही पर्यायच नसतो.'' वडिलांचाही हळूच आवाज आला. ''या दोघी बडबडत असतात की, माझ्या वडिलांचाच पुनर्जन्म झाला म्हणून.''

''अहो, खरंच. माझे सासरेही असेच हट्टी होते. त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द फक्त समोरच्याने झेलायचा. खरचं असं काही असतं का हो?''

''असं काही असेल किंवा नसेलही. त्यावर विचार करण्यात काय फायदा. पण एवढं नक्की अशा प्रकारचे हट्ट ज्या मुलांमध्ये असतात त्यांच्यात प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते. त्यांच्या अंगातल्या या ऊर्जेचा योग्य ठिकाणी वापर केला जात नाही आणि मग ती अशा नको त्या स्वरूपात बाहेर येते.''

किंवा काही मुलं स्वभावत:च फार हट्टी असतात. दोन्ही वेळी आपला संयम वाढवणं आणि आपल्यातील हट्ट कायम राखणं (चांगल्या अर्थी) फार गरजेचं असतं.''

सर्वात प्रथम ज्यांच्या मुलांच्या अंगात एवढी ऊर्जा आहे त्या सर्व पालकांचं मनापासून अभिनंदन आणि खूप सा-या शुभेच्छा! अभिनंदन याकरिता की, इतर पालक आपल्या पाल्यांच्या मागे लागतात ऐक रे, कर रे.. वगैरे. मात्र या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार नाहीत, कारण जर तुम्ही सांगता आहात ती गोष्ट त्यांना पटली, आवडली किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीचं जर त्यांनी स्वत:हून निरीक्षण केलं तर कोणत्याही कटकटीशिवाय ते मनापासून त्या गोष्टी करायला सुरुवात करतील. आणि शुभेच्छा यासाठी की त्यांना रोज नवनवीन विचारांचं खाद्य तुम्हाला पुरवावं लागेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या व्यापामुळे जर हे शक्य होत नसेल तर निदान उद्याच्या दिवसाचं वेळापत्रक, तुमचं आणि त्यांचंही त्यांच्या नकळत रोजच्या रोज त्यांच्या मनावर िबबवावं लागेल. हो, पण अगदी रोजच्यारोज. आणि जर तुम्हाला हे वेळापत्रक पाळता आलं नाही तर ही मुलं तुमच्या चुका अगदी न चुकता दाखवतील, तेव्हा चिडचिड करून चालणार नाही.

पण खरंच याचा फायदा होतो का, अशी शंका वाटतेय. जे कोणी हट्टी असतात, आपल्या मतांबाबत आग्रही असतात, त्या प्रत्येकाने पुढे काय करायचं, आपल्याला काय हवं, काय नको.. अशा प्रश्नांचा ढोबळ विचार तरी मनात केलेला असतोच.

या विचारांना जेव्हा इतरांकडून तडे जातात, तेव्हा त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार राग, चिडचिड, आदळआपट वगरे सुरू होते. जसं मुलांचं होतं, तसं आपलंही होतं. ऑफिसमधल्या कटकटींपासून घरी गेल्यावर शांतता मिळेल, ही अपेक्षा असते आणि घरी मुलांनी किरकिर केली की आपलं डोकं फिरतं. आज घरी येताना आईबाबा आपल्यासाठी काहीतरी आणतील हा विचार मुलांच्या मनात अचानक येऊन जातो आणि रिकामे हात दिसले की संपलं सारं!

म्हणूनच मुलं लहान असेपर्यंत त्यांच्या मनाची तयारी आपण करून द्यायची. उद्या कोणकोण काय करेल हे साधारण त्यांना सांगायचं. थोडक्यात, त्यांच्या मनाची पूर्वतयारी! पण यामुळे आपल्यावरील जबाबदारी निश्चितच वाढते. याचं अगदी छान उदाहरण पाहू या.

राज्य स्तरावर कबड्डी खेळणारा एक मुलगा. शाळेचा सर्वाधिक लाडका खेळाडू. पण मागच्या काही सामन्यांत खेळताना त्याला काय व्हायचं तेच कळत नव्हतं. त्याच्या क्षमतेएवढं तो खेळूच शकायचा नाही. कोणती तरी अदृश्य शक्ती जणू त्याला खेळापासून अडवून ठेवी. एक की दोन सामने त्याच्या या ताणामुळे तो हरला. मग त्याची नुसती चिडचिड. नंतर नंतर तर मी खेळणारच नाही, अशी वाक्यं सुरू झाली. सा-यांनी बोलून पाहिलं पण काही उपयोग होईना. सामन्यातून मागे फिरणं शक्य नव्हतं. सरतेशेवटी एक मार्ग त्याला, त्याच्या आईला सांगितला. त्या सांगण्याप्रमाणे त्याची आई सामन्याच्या आदल्या रात्री त्याला घेऊन एका खोलीत बसली. त्याला डोळे मिटायला सांगितले आणि मनातल्या मनात शंभरपासून एकपर्यंत उलटे आकडे त्याला म्हणायला सांगितले. तो आकडे म्हणत असताना तिने त्याच्या दुस-या दिवशीच्या सामन्याचं पूर्ण वर्णन केलं. तो किती छान खेळतो आहे, प्रतिस्पर्धी खेळाडूवर त्याने कशी मात केली आहे आणि अखेरीस तो कसा सामना जिंकला याचं वर्णन. हे सारं आईचं बोलणं ऐकताना निश्चितच त्याच्या डोळ्यांसमोर सारं चित्र येत गेलं आणि अक्षरश: आईच्या वर्णनाप्रमाणे मुलगा सामना जिंकला. हे खरं घडलेलं उदाहरण. आणि असं एकच उदाहरण नाही तर कित्येक आहेत. मुलांच्या मनावरील परिक्षेचा ताण दूर झालेला आहे. सतत संतापाने फेकाफेकी करणारी मुलंही शांत झालेली आहेत.

फक्त अशा मुलांशी बोलताना, त्यांना सूचना देताना, 'तू नेहमीपेक्षा दिवसभर शांत आहेस, सगळ्यांनाच कौतुक वाटतंय. सगळे किती खूष आहेत. पण सगळ्यांचं कौतुक ऐकल्यावर तुला मधेच पुन्हा सगळ्यांना त्रास द्यायची लहर येते. मग मात्र सगळे तुझ्यावर चिडतात. कोणी ओरडत नाही, पण तुझ्याशी कोणी बोलतंही नाही. मग तू 'कशी मजा केलीस ना सगळ्यांची', असे सांगतोस.' अशाप्रकारचे संवाद हवेत. या संवादात आरोप, नावं ठेवणं वगरे काही नाही. सारे सकारात्मक. पण सकारात्मक बाजू मांडताना काही विपरित केलंस तर मात्र आम्ही माफ करणार नाही या आपल्या मतावर ठाम रहावं. जर मुलं फारच लहान वयातील असतील, एका जागी डोळे मिटून स्वस्थ बसूही शकत नाहीत इतकी लहान असतील तर त्यांना रात्री झोपताना हेच सारं गोष्टीरूप सांगायचं. गोष्टीत मुलं रमतातही आणि त्यांना गोष्टी पटतातही. पण गोष्ट ऐकताना एका गोष्टीचं भान नक्कीच हवं. गोष्ट आपलीच आहे, असं त्याला वाटता कामा नये. त्याच्यासारखाच पण दुसरा कोणीतरी मुलगा किंवा मुलगी (नावात बदल करायला अजिबात विसरू नका आणि बदललेलं नाव वर्गातल्या किंवा शेजारच्या, आजूबाजूच्या एखाद्या मित्राचं असेल तर मुलाच्या वर्तनात होणारा बदल! तुम्हीच अनुभवा.)

हे सारे प्रश्न झाले लहान मुलांचे. पण ज्यांना कळतं, जे मुलंमुली सातवी-आठवी पुढील आहेत आणि ज्यांच्यामधला आततायीपणा हा त्यांना कळणारा आहे, मुद्दाम केलेला आहे, त्यांचं काय? असेही अनुभव येतच असतात की आपल्याला. भेटु या पुढच्या लेखात. तोपर्यंत तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला सांगायला विसरू नका.

Read More »

मिरा-भाईंदरमधली सात आश्चर्याची मिरासदारी

भारतातला ताजमहल, पॅरिसचा आयफेल टॉवर, इजिप्तमधील गिझाचा भव्य पिरॅमिड, इटलीचा कोलासियम, ब्राझिलचा ख्राइस्ट द रिडीमर, अमेरिकेचा स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, चीनची भिंत.. ही जगातील सात आश्चर्य! ही सात आश्चर्य बघायची म्हणजे आपल्याला संपूर्ण जगाचीच सफर कराण्याशिवाय पर्याय नाही. मात्र मिरा-भाईंदर येथे ही ही जगातील सात आश्चर्य आणि लास वेगास, ग्रीक, इटली, चीन, पॅरिस अशी विविध ठिकाणांची सफर घडवणारं हे मुंबईतील एकमेव उद्यान आहे.

त्यासाठी आपल्याकडे भरपूर पैसे असायला हवेत. पैसे असले तरीदेखील एवढी सगळी ठिकाणं फिरून होतीलच, असं काही सांगता येणार नाही. जगाचं कशाला अगदी भारतातला दिल्लीचा ताजमहाल तरी आपल्यापैकी किती जणांनी प्रत्यक्ष पाहिला असेल, याबाबत शंकाच असेल. पण ही आश्चर्य जवळून कशी दिसतात हे तुम्ही कुठेही लांब न जाता पाहू शकता, तेदेखील मुंबईतल्या पश्चिम उपनगरात वर्धमान फॅण्टसी नावाच्या उद्यानात.

मिरा-भाईंदर स्थानकाच्या मधोमध हे वर्धमान फॅण्टसी नावाचं ११ एकराचं भलं मोठं उद्यान आहे. त्या उद्यानाचं प्रवेशद्वारच इतकं आकर्षक आहे की, लहान मुलंच काय पण मोठय़ांनाही उत्सुकता वाटल्याशिवाय राहत नाही. ते प्रवेशद्वार पाहून आत जाण्याचा मोह न होणारा माणूसच विरळा म्हणावा लागेल. प्रवेशद्वारातून आत गेलं की पहिलं बॅग काउंटर आहे. तिथे बॅगा आणि?खाण्या-पिण्याचं सामान ठेवावंच लागतं. तिथून पुढे गेलं की समोरच टेक्सासचा काऊबॉय दिसतो. तर दाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला गावातल्या घराप्रमाणे रचना असलेल्या काही खोल्या दिसतात. या खोल्या म्हणजे त्या उद्यानाचं कार्यालय आहे. हे ग्रीकमधील गाव उभारलं आहे. तिथे २ रुपये प्रवेश शुल्क भरून त्या उद्यानात प्रवेश करता येतो. शुल्क घेऊन पुढे आलं की उजव्या हाताला 'स्पॅनिश फुड कोर्ट' आहे आणि तिथेच पुढे 'लेक वेनेतिया' नावाचा तलाव आहे. तिथे तुम्ही बोटिंग करू शकता.

समोर दिसणारं ते कारंजदेखील इतकं आकर्षक आहे, की त्याच्यामधोमध अशोकाच्या सिंहाप्रमाणे चार मुलं उभी आहेत. त्यांनी हातात पृथ्वी धरली असून त्यावर 'वर्धमान फॅण्टसी' अशी अक्षरं लिहिलेली आढळतात. तिथेच पुढे गेलं की उजव्या हाताला अ‍ॅडव्हेंचर झोन आहे. याठिकाणी मुलांना अ‍ॅडव्हेंचर करता येतील असे विविध रोप वेचे खेळ ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून मुलांना काहीतरी अ‍ॅडव्हेंचर केल्याचा फील येईल.

समोरच आपल्याला इटलीचा कोलासियम दिसतो. तोच जगातील सात आश्चर्याचा विभाग होय. तिथे ताजमहल, आयफेल टॉवर, गिझाचा पिरॅमिड, ब्राझिलचा ख्राइस्ट द रिडीमर, अमेरिकेचा स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, आणि चीनची भिंत या सगळ्या आश्चर्याची प्रतिकृती उभ्या केल्या आहेत. त्यांची माहिती देणारे इंग्रजी आणि मराठी भाषेतील भले मोठ्ठे फलक लावलेले दिसतात. या फलकाचा आकार पुस्तकाच्या पानाप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यावरची अक्षरंदेखील अतिशय स्पष्ट असल्याने मुलांना लांबूनही ती व्यवस्थित वाचता येतात. यामुळे प्रत्येक आश्चर्याची सहज माहिती मिळते. या प्रतिकृती फायबरच्या करण्यात आल्या आहेत. मूळ आराखडा लोखंडाचा आणि त्यावर फायबरचं फिनिशिंग केलं असून ती त्या जागीच उभारण्यात आली आहे. त्यामुळे ती अतिशय मजबूत आहेतच शिवाय जागच्या जागी आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या रंगाप्रमाणेच अगदी हुबेहूब उभारण्यात आल्यामुळे लोकांच्या ती चांगलीच पसंतीस उतरत आहेत.

आपल्याकडच्या कुठल्याही उद्यानात अशा प्रकारची संकल्पना कोणी मांडलेली नाही. म्हणून या संकल्पनेबाबत उद्यानाचे सर्वेसर्वा राजेश वर्धन सांगतात, 'मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारितली ही ११ एकर जागा आहे. ती तीस वर्षासाठी वर्धमान ग्रूपला भाडय़ानं देण्यात आली आहे. त्यावर नुसतंच पार्क तयार करण्यापेक्षा काहीतरी वेगळं द्यावं या हेतूतून मला ही संकल्पना सुचली. भारतात आजपर्यंत अशा स्वरूपाचं थीम पार्क झालेलं नाही. तसंच आपल्याकडच्या कित्येक लोकांना जगाची सफर करायची खूप इच्छा असते. पण इच्छा असूनही त्यांना जाताच येत नाही. अशा लोकांना निदान त्याची माहिती व्हावी आणि त्यांचं मूळ स्वरूप समजावं या हेतूनं ही संकल्पना मांडली.' असं वेगळ्या संकल्पनेचं पार्क असल्याने कित्येक पालक आपल्या मुलांना घेऊन उद्यानाला आवर्जून भेट देतात. त्यांची माहिती करून देतात. आपल्या मुलांसमवेत उद्यानाला भेट देणारे वाळकेश्वरचे संतोष पुजारी सांगतात, 'गेम्सझोन काय किंवा विविध प्रकारचे खेळ काय कोणत्याही पार्कमध्ये नेहमीच आढळणारी गोष्ट आहे. पण अशी थीम कोणत्याही उद्यानात पाहायला मिळत नाही. तसंच जागतिक आश्चर्य उभारण्याची ही संकल्पनादेखील वेगळी आहे. यांची माहिती इंटरनेटवर अगदी सहज उपलब्ध आहे. पण या ठिकाणी ती प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळते. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याची माहिती व्हावी म्हणून मी माझ्या मुलाला आणि भाच्यांना घेऊन आलो आहे.'

या जागतिक आश्चर्याच्या विभागासमोरच अमेरिकेच्या शहराचं नाव असलेला 'लास वेगास' नावाचा एक विभाग आहे. त्याठिकाणी डॅशिंग कार, फ्री फॉल, टॉफ्रीसबी अशा विविध राइड्सचा आणि 'फन टू?रश' नावाचं कम्प्युटर गेम्सझोनचा विभाग आहेत. त्यात तुम्हाला विविध गेम्स खेळायला मिळतात. इतकंच नव्हे तर स्नूकरदेखील मुलांना खेळता येतो. भयपटाचा अनुभव यावा यासाठी 'जुरासी जंग'तयार करण्यात आलं आहे. याशिवाय उद्यानात मधूनच कुठे कुठे मि. लासो, फेरी, वेनी, वॉरिअर, फॅट प्रिन्सेस अदामा असे पुतळे उभारले आहे. या उद्यानाची आणखी एक आकर्षक गोष्ट म्हणजे तिथे ठेवण्यात आलेल्या कच-याच्या कुंडय़ा. या कच-याच्या कुंडय़ांचे मुलांना आवडतील असे आकार आहेत. काही बुटाच्या आकाराचे तर काही टॉम आणि कासवाने पकडलेल्या बास्केट असे केले आहेत.

लास वेगास, ग्रीक, इटली, चीन, पॅरिस अशी विविध ठिकाणांची सफर घडवणारं हे मुंबईतील एकमेव उद्यान आहे. प्रवेश फी कमी असली तरी फूड झोन किंवा बोट रायडिंग किंवा गेम्स झोन या ठिकाणी वेगवेगळी किंमत भरावी लागते. मात्र सात आश्चर्य पाहण्यासाठी प्रवेश शुल्क पुरेसं आहे. अशा कमीत कमी खर्चात जगाची सफर घडवणा-या या उद्यानाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. काहीतरी चांगलं पाहिल्याचा अनुभव नक्कीच गाठीशी असतो.

Read More »

'कोणतीही परीक्षा कठीण नसते'

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही पास होण्यास कठीण असल्याचा आपल्याकडे समज आहे. मेहनत आणि ध्येय दोन गोष्टी एकत्र आणल्या की अशक्य असे काहीच नाही. समाजातील खटकणा-या गोष्टींकडे कानाडोळा करण्यापेक्षा उपाय शोधण्यात आपला हातभार कसा लागेल, याचा विचार करावा, असे मत व्यक्त केले यूपीएसीच्या परीक्षेत २४८व्या क्रमांकावर आलेल्या प्रतीक ठुबे याने… 

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याचे तू कधीपासून ठरवले?

मी २०१०ला अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील स्टेट इस्टिटय़ूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर येथून अभ्यास केला. तसेच अविनाश धर्माधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. याशिवाय मला स्वत:ला आधीपासूनच सामाजिक विषयाचा अभ्यास होता. सरकारी योजना आणि त्याचे जनसामान्यांना होणारे फायदे यावर बारकाईने लक्ष असायचे.

घरच्यांकडून पाठिंबा होता का?

होय, मुळात माझे आई-वडील दोघेही अभियंते आहेत. माझे वडील राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यात उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत आहेत. वडिलांच्या सततच्या बदलीमुळे मला राज्यातील बहुतेक ठिकाणे हिंडता आली. माझे माध्यमिक शिक्षण अहमदनगरमधील शाळेत झाले. त्यामुळे ग्रामीण जीवनाशी परिचय झाला. त्यांच्या समस्या जवळून पाहता आल्या. या समस्या सोडवण्यासाठी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ही संधी असल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे मी लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे वळलो.

कोणत्या सेवेत जावेसे वाटते?

देशपातळीवर प्रशासनाची पर्यायाने समाजाची सेवा करता यावी, यासाठी मी यू.पी.एस.सी. सेवा देण्याचे ठरवले. विषयाचा गाभा समजून घेतला. खरं तर यंदाचा माझा दुसरा प्रयत्न होता. गेल्या वर्षी अगदी पाच गुणांच्या फरकाने माझे यादीत नाव झळकले नाही. यंदाचा क्रमांक पाहता मला भारतीय पोलिस सेवेत नियुक्ती होण्याची चिन्हे आहेत.

या परीक्षेची तयारी करताना कोणती गोष्ट प्रकर्षाने जाणवली ?

इथे एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबाबत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये थोडी उदासीनता आहे. महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा कल आहे. राज्याबाहेर जाण्याची तयारी नसल्यामुळे याबाबत आणखी जागरूकता होणे गरजेचे आहे.

Read More »

आयपीएल नावाचा तमाशा

इंडियन प्रिमियर लीगमधील ताज्या स्पॉटफिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयचे धोरण बोटचेपेपणाचे असल्याचे कडक ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ओढले. त्याच दिवशी सहारा पुणे वॉरियर्स या सहारा समूहाची मालकी असलेल्या आयपीएल फ्रँचायझीने स्पर्धेतूनच माघार घेणे, हा योगायोग नाही. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर बोटचेपेपणाचा ठपका ठेवला, तर दुसरीकडे सहारा समूहाने 'बीसीसीआय केवळ पैशाचाच विचार करते' या शब्दांत हल्लाबोल केला. आयपीएल रद्दच करावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. आयपीएल आता रद्द होऊ शकणार नाही, कारण कित्येक व्यक्ती आणि समूहांचे कोटय़वधी रुपये या जत्रेमध्ये गुंतलेले आहे. आयपीएल गुंडाळणे, हा बीसीसीआयच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ठरू शकतो. एरवी भारतीय संघाला 'बीसीसीआयचा संघ' म्हणण्यापर्यंत या मुजोर बोर्डाची मजल गेली होती. पण स्वत:ची पत राखण्यासाठी आयपीएलला देशाची प्रतिष्ठा म्हणून संबोधण्यास ही मंडळी मागेपुढे पाहणार नाहीत. २००८मध्ये आयपीएलला सुरुवात झाली. त्यानंतर जवळपास प्रत्येक वर्षी ही स्पर्धा कोणत्या ना कोणत्या वादामुळे गाजत आहे. सहारा पुणे वॉरियर्स ही आयपीएलमधून बाहेर पडलेली दुसरी फ्रँचायझी आणि तिसरी कंपनी. यापूर्वी कोची टस्कर्स केरळ ही फ्रँचायझी गेल्या हंगामाच्या आधी रद्द झाली, तर हैदराबाद फ्रँचायझीची मालकी मूळ मालकांनी सोडली आणि ती नवीन मालकांकडे आली. २०११मध्ये पंजाब आणि राजस्थान या फ्रँचायझींना, भागभांडवल धारणेमध्ये अफरातफर केल्याप्रकरणी बीसीसीआयची नोटिस मिळाली होती. दोन्ही फ्रँचायझींची परिस्थिती आजही फार चांगली नाही आणि पुरेसा नफा न झाल्यास येत्या काही वर्षात या दोन्ही फ्रँचायझी गुंडाळल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे वॉरियर्सची मालकी असलेल्या सहारा समूहाची मुळात आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यांच्यावर कोटय़वधी रुपयांची देणी आहेत. याबद्दल अनेक वेळा थेट सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी झालेली आहे. आयपीएलमध्ये खेळण्याचा त्यांचा परवाना रद्द झाला, कारण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आवश्यक फ्रँचायझी शुल्क ते भरू शकले नाहीत. दहा वर्षासाठी सहारा पुणे वॉरियर्सनी बीसीसीआयकडे फ्रँचायझी फीपोटी जवळपास २००० कोटी रुपये अदा करायचे होते. यांतील १२० कोटी रुपये त्यांनी या हंगामाच्या सुरुवातीला भरले. वास्तविक त्यांनी २०० कोटी रुपये भरणे अपेक्षित होते. या रकमेबाबत मुख्य वाद होता. कारण गेल्या वर्षी आयपीएलमध्ये ९४ ऐवजी ७४ सामने झाले. त्यामुळे सामने कमी झालेत, तर फ्रँचायझी फीदेखील कमी करावी, अशी सहाराची विनंती होती. बीसीसीआयने ती मानली नाही, त्यावेळी गेल्या वर्षीच खरे तर सहाराने माघार घेतली होती. पण त्यावेळी तोडगा काढण्याचे ठरवून तात्पुरता समझोता झाला. यावेळी मात्र सहारा आणि बीसीसीआय हे दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम राहिले. सहाराने हमी म्हणून जमा केलेली रक्कम (बँक गॅरंटी) बीसीसीआयने आपल्याकडे वळती केली. आयपीएलमधील सर्वाधिक महागडी फ्रँचायझी अशा रीतीने अल्पायुषीच ठरली! आजच्या घडीला मुंबई इंडियन्स, हैदराबाद सनरायझर्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइटरायडर्स या चारच फ्रँचायझी आर्थिकदृष्टय़ा सुदृढ स्थितीत आहेत. उर्वरित चार फ्रँचायझींना आर्थिक समस्यांनी ग्रासले आहे. आयपीएलच्या या सहाव्या वर्षात आतापर्यंत आठपेक्षा अधिक फ्रँचायझींनी खेळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पुढील वर्षी आयपीएल होईल, त्यावेळी मूळ आठच संघ पुन्हा दिसतील. त्यातही एखाद- दुस-या फ्रँचायझीची गळती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कसलाही मुलाहिजा न बाळगता लावलेला प्रचंड पैसा, ही आयपीएलची सर्वात मोठी समस्या आहे. या स्पर्धेमुळे केवळ क्रिकेटमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशात आर्थिक आणि सामाजिक असमतोल आणि पर्यायाने असंतोष निर्माण झाला. क्रिकेट सामने म्हणजे इव्हेंट बनल्या. क्रिकेटपटूंपेक्षा सिने नटनटय़ा, उद्योगपती, त्यांचे कुटुंबीय यांचे महत्त्व वाढले. चौकार-षटकार मारल्यानंतर किंवा विकेट पडल्यानंतर त्यांच्या अ‍ॅक्शन-रिप्लेआधीच चिअर-गर्ल्सचा ओंगळवाणा नाच पाहणे, क्रिकेटरसिकांच्या नशिबी आले. सामन्यात खेळून थकल्या-भागल्या क्रिकेटपटूंना आरामाची, निद्रेची उसंत मिळेनाशी झाली. त्यांनी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पाटर्य़ाना हजेरी लावणे बंधनकारक बनले. क्लब आणि विद्यापीठ स्तरावरील क्रिकेटपटूंना रणजी किंवा राष्ट्रीय संघाऐवजी आयपीएल खुणावू लागली. फलंदाज नेट प्रॅक्टिसच्या वेळी शास्त्रशुद्ध फटक्यांचे तंत्र घोटवून घेण्याऐवजी आडवीतिडवी बॅट फिरवायला लागतात. अचूक टप्प्यांचे चेंडू टाकण्याचे शिकण्याऐवजी गोलंदाजही आखुड टप्प्याचे चेंडू टाकून नेटमध्येच स्वत:ची लय बिघडवून टाकतात. इतका पैसा येऊनही श्रीशांतसारख्या काही क्रिकेटपटूंना बुकींशी संधान साधावेसे वाटते. राहुल द्रविडसारखा अत्यंत निष्ठावान आणि आदर्श कर्णधार असूनही त्याच्या संघातले तिघे स्पॉटफिक्सिंगप्रकरणी सापडतात. ज्या दिवशी राहुल किंवा सचिनसारखे ऋषितुल्य क्रिकेटपटू पूर्णपणे निवृत्त होतील, त्या दिवसापासून काय होईल याची कल्पनाही करवत नाही. सलग दुस-या वर्षी आयपीएलमध्ये स्पॉटफिक्सिंग घडते आहे. जगात इतर कोणत्याही देशात इतक्या सातत्याने फिक्सिंग आढळलेले नाही. बुकींची आयपीएलमधील घुसखोरी ही नवी बाब नाही. अशा परिस्थितीत 'आम्ही त्यांना रोखू शकत नाही' असे सांगून बीसीसीआय हात झटकणार असेल, तर हॉकी संघटना किंवा ऑलिंपिक संघटना यांच्याप्रमाणेच बीसीसीआयलाही सरकारने बरखास्त केले पाहिजे. एक क्रीडा संघटना म्हणून बीसीसीआयची स्वायत्तता सरकारने जपायची आणि त्या बदल्यात बीसीसीआय मात्र आपली जबाबदारी झटकत राहणार, हे किती दिवस चालायचे? विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे चेन्नई फ्रँचायझीचे अध्यक्षही आहेत. त्यांच्यासाठी २००८मध्ये बीसीसीआयच्या घटनेत दुरुस्ती केली गेली. २००९मध्ये मुंबई इंडियन्सकडून पाच परदेशी क्रिकेटपटू खेळले. आयपीएलची स्वत:ची नियमावली आहे. पण मैदानाबाहेर आणि मैदानात तिला पायदळी तुडवण्यात बोर्डाचीच मूक किंवा जाहीर संमती असते. आयपीएलमधील गडगंज पैशामुळे आणि अत्यंत त्रोटक सुरक्षा कवचामुळे लवकरच ही स्पर्धा म्हणजे बुकी आणि अंडरवर्ल्डचे आगार बनून जाईल. तसे होऊ द्यायचे नसेल, तर आतापासून ठोस पावले उचलावी लागतील. तशी इच्छाशक्ती सध्याचे बीसीसीआयचे नेतृत्व दाखवत नाही, हे दुर्दैवी वास्तव आहे.

'बीसीसीआय' हतबल, सट्टेबाज मोकळे

'आयपीएल'मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली असून याचे धागेदोरे विदर्भापर्यंतही पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांनी विदर्भाचा माजी रणजीपटू मनीष गड्डेवार याच्यासह आणखी तिघांना अटक केली आहे. हे तिघेही औरंगाबाद आणि नागपुरातून सट्टा खेळत असत.

तिढा सुटला, अढी कायम

  कुठल्याही प्रश्नावर पटकन आंदोलन पुकारायचे व जनतेला वेठीला धरायचे, हा अलीकडे काही संघटनांचा शिरस्ता झाला आहे. महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या संघटनांनी नुकताच ९० दिवसांचा संप केला व विद्यार्थ्यांना वेठीस धरले. या संपासंबंधातआणि प्राध्यापकांच्या मागण्यासंबंधात सरकारने ठाम भूमिका घेतली आणि अखेर हा लांबलेला किंवा मुद्दाम लांबवण्यात आलेला हा संप अखेर चच्रेनंतर मागे घेण्यात आला.

Read More »

डोंगरची काळी मैना दुर्लक्षित

रानावनातील डोंगरची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंदांची झाडे दुर्मीळ होत आहेत.

कुडूस- मुंबईतील लोकलट्रेनमध्ये द्रोणातून विकली जाणारी काळी करवंदे, जांभळे आणि ती आवडीने विकत घेणारे प्रवासी, हे चित्र आता कमी होण्याची शक्यता आहे. वाडा तालुक्यातील रानावनातील डोंगरची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी करवंदांची झाडे दुर्मीळ होत आहेत. बेसुमार वृक्षतोड, वणवे व कारखान्यांच्या प्रदूषणामुळे काळी करवंदे व जांभळांचा गोडवा केवळ आठवणीतच राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ठाणे, रायगडमधील डोंगरद-यांमध्ये वणवे पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा हे वणवे मानवाच्या चुकांमुळे पेटत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या वणव्यांमध्ये करवंदे, आवळा, जांभूळ, चिंच, बोराची झाडे नामशेष होऊ लागली आहेत. मागील २० वर्षाच्या तुलनेत अलीकडच्या काळात खूपच कमी झाडे रानात शिल्लक राहिली असल्याची खंत आदिवासी शेतकरी यशवंत चौधरी यांनी व्यक्त केली.

वाडा तालुका 'डी प्लस झोन' जाहीर झाल्याने या ठिकाणी कंपन्यांचे जाळे पसरत चालले आहे. या कारखान्यांतून होणा-या प्रदूषणामुळे येथील नैसर्गिक संपदा कमी होत चालली आहे. वायू व जलप्रदूषणामुळे करवंदे आणि जांभळाचा बहर पूर्वीसारखा राहिला नसल्याचे आदिवासींनी सांगितले. येथील गोरगरीब आदिवासी रानमेव्याची विक्री करून उदरनिर्वाह करतात, परंतु झाडे कमी झाल्यामुळे त्यांचा रोजगारही धोक्यात आला आहे.

रात्रीच्या वेळेत पेटलेल्या वणव्यांमुळे मोठमोठे वृक्ष राख होत आहेत. औषधी वनस्पतीही कमी होऊ लागली आहेत. या वणव्यांचा आणि प्रदूषणाचा फटका येथील मध गोळा करण्याच्या व्यवसायालाही बसला आहे. दूरवरील रानावनात जाऊनही मधाची पोळी सापडत नसल्याचे मध गोळा करणा-या महिलांनी सांगितले. फुलझाडेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे मध कमी झाल्याचेही म्हटले जात आहे. या झाडाझुडपांवर अवलंबून असलेल्या पशुपक्ष्यांनाही या वनसंपदेच्या ऱ्हासाचा फटका बसत आहे. त्यामुळे निसर्गातील जैवविविधताही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Read More »

बांधिलकी ना लोकांशी, ना धोरणांशी

'शेठजी आणि भटजीं'चा पक्ष अशी भाजपची ओळख त्याच्या स्थापनेपासूनच आहे. यातील शेठजींबरोबर भाजपचे अजूनही साटेलोटे आहे. ब्राह्मणांनी मात्र पटले तरच भाजप अन्यथा दुसरा पक्ष अशी भूमिका कधीच स्वीकारली आहे. आता नरेंद्र मोदी यांना पुढे करून भाजप केंद्रातील सत्ता ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. मोदी नावाचा 'मसिहा' आपल्याकडे आहे, असा पद्धतशीर प्रचार भाजपने चालवला आहे. मात्र, कर्नाटकमधील पराभवामुळे मोदी यांचा सिक्का खोटा निघाला, याची जाणीवही भाजपला अगदी चांगलीच झाली आहे. भाजपने सत्तेवर असताना जी धोरणे राबवायला सुरुवात केली होती ती धोरण सत्तेवर आलेल्या दुस-या पक्षाने राबवायला सुरुवात केली की, भाजप अशा आपणच मान्य केलेल्या धोरणांविरोधात राजकारण सुरू करतो. त्यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरले जाते. भाजपला ना आपल्या धोरणांशी बांधिलकी आहे ना लोकांशी हे यातून दिसते.

राजकीय पक्ष कोणताही असो, त्याच्या सामाजिक बांधिलकीचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूसच असला पाहिजे. राजकीय पक्षांनी राज्याच्या किंवा राष्ट्राच्या पातळीवर जी काही धोरणे स्वत:ची म्हणून स्वीकारली असतील त्यांचा पाठपुरावा अन्य पक्षाने केल्यास त्याला आंधळेपणाने विरोध करता कामा नये. भाजप गेल्या काही वर्षात या दोन्ही आघाडय़ांवर अपयशी ठरल्याचे निदर्शनाला आले आहे. सध्या भाजप केंद्रात सत्तेवर येण्याच्या गोष्टी करत असला तरी भूतकाळातील अनेक निर्णय या पक्षाला मारक ठरणारे आहेत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर असताना परराष्ट्रमंत्री या नात्याने जसवंत सिंह यांनी अमेरिकेबरोबर अण्वस्त्र सहकार्याचे धोरण स्वीकारले होते. अमेरिकेबरोबर त्या संदर्भात करार करण्याचाही विचार त्या सरकारने केला होता. त्या नंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवरून जाऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्या सरकारने जुन्या सरकारचेच अमेरिकेबरोबरच्या अण्वस्त्र सहकार्याचे धोरण मान्य करून तसा करारही अमेरिकेबरोबर केला. हे पाऊल उचलताच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मनमोहन सिंग सरकारने अमेरिकेसमोर लोटांगण घातल्याची टीका करून गहजब सुरू केला. रिटेल व्यापारात थेट परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्याचे धोरण जाहीर केले होते. ते सुयोग्य असल्याचे लक्षात आल्यानंतर मनमोहन सरकारने त्याच धोरणाची अंमलबजावणी करून रिटेलमध्ये थेट परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्याचे धोरण जाहीर केले. मात्र, भाजपने त्याला विरोध करून देशभर मनमोहन सरकारच्या विरोधात आंदोलने केली. 

टू-जी प्रकरणात मनमोहन सिंग सरकारमधील दूरसंपर्कमंत्री डी. राजा यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना अटकही झाली; पण या टू-जी प्रकरणाच्या खोलात गेल्यास हे भाजपचेच अपत्य असल्याचे लक्षात येते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना त्या सरकारमध्ये प्रमोद महाजन दूरसंपर्कमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळातच टू-जीमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची उघड चर्चा झाली होती. २००४ सालची लोकसभा निवडणूक जिंकून पुन्हा सत्ता आपल्याकडेच घ्यायची, असा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रयत्न होता. त्यासाठी प्रचार यंत्रणेवर हजारो कोटींचा खर्च करण्याचे ठरवण्यात आले आणि मग त्यातूनच 'शायनिंग इंडिया'चा नारा देण्यात आला. त्या निवडणुकीत भाजपने केलेला प्रचार अक्षरश: डोळे दिपवणारा होता. पण भाजपचे 'शायनिंग' काही झाले नाही आणि देशभरातील जनतेचे काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. प्राथमिक चौकशीत राजा दोषी ठरले. म्हणून त्यांना प्रायश्चित मिळाले; पण संपूर्ण पारदर्शक सरकारचा नारा देणा-या अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रमोद महाजन यांना मोकळे रान दिले त्याचे काय?

महाराष्ट्रात गेला महिनाभर 'एलबीटी'वरून व्यापार बंद करून आंदोलन करणा-या व्यापा-यांनी आपला संप मागे घेतला. त्याचा आनंद आहेच पण व्यापा-यांचे आंदोलन असताना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबला होता. महाराष्ट्रातील कोटय़वधी लोकांना वेठीस धरले असताना भारतीय जनता पक्षाने राज्यातील लोकांच्या बाजूने उभे राहून व्यापा-यांना बंद मागे घेण्यास भाग पाडायला हवे होते, पण तसे घडले नाही. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी व्यापा-यांची तळी उचलून धरली. अगदी अलीकडेच व्यापा-यांनी मुंबईत रास्ता रोको आंदोलन केले. त्यात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे, महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि किरीट सोमय्या या नेत्यांनी रास्ता रोकोत सहभागी होऊन स्वत:ला अटकही करून घेतली. एरव्ही सामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टी करायच्या आणि राजकारणातील फायदा म्हणून सामान्यांना नाडणा-या व्यापा-यांच्या बाजूने उभे राहायचे याची संगती कुणी आणि कशी लावावी? गोपीनाथ मुंडे यांचा थाट काही औरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी आमदाराने भाजपमध्ये प्रवेश करताना जणू काही सारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचा आव मुंडे यांनी आणला. वर्ष-दोन वर्षापूर्वी विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचे आमिष दाखवून मुंडे यांनी अनेक कार्यकर्त्यांना आपल्या भजनी लावले होते; पण आपल्या ओळखीच्या आमदारांनी दिलेल्या पासवर विधान भवनाच्या आवारात फिरून येण्याखेरीज या कार्यकर्त्यांच्या हाती दुसरे काही लागले नाही.

सर्वात महत्त्वाची घटना उत्तर प्रदेशातील बाबरी मशिदीच्या पतनाची. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार असतानाच बाबरी मशीद पाडण्यात आली. ही मशीद पाडून त्याच ठिकाणी मंदिर उभे राहिले पाहिजे, हा भाजपचाच नारा होता. त्यासाठीच लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली आणि नंतरच्या काळात मंदिराच्या बांधकामासाठी देशभरातून विटाही गोळा करण्यात आल्या होत्या. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्या आधीचा एकूण घटनाक्रम पाहिला असता ही मशीद पाडण्याची नैतिक जबाबदारी भाजपचीच होती, हे स्पष्ट होते. मशीद पडली उत्तर प्रदेशात; पण त्याचे हिंसक पडसाद उमटले ते तेथून हजारो मैल लांब असलेल्या मुंबईत. मशीद पडल्याचा घटनेपासून म्हणजे ६ डिसेंबर ९२पासून पुढे जानेवारी ९३पर्यंत भीषण दंगली आणि त्यानंतर मार्च १९९३ मध्ये मुंबईभर बारा ठिकाणी झालेले बॉम्बस्फोट. या सा-या हिंसाचारात हजारो निष्पाप मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले. बाबरी मशीद पाडण्याच्या भाजपच्या हौसेतूनच हे सारे घडले होते. याची जबाबदारीही भाजपवरच येते.

आपले निर्णय चुकणार नाहीत, धोरणे फसणार नाहीत याची काळजी भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी घेतली असती तर त्यांच्या पक्षाचे नुकसान झाले नसतेच. पण, वेळोवेळी लोकांना जी किंमत मोजावी लागली तेही टळले असते.

'शेठजी आणि भटजीं'चा पक्ष अशी भाजपची ओळख त्याच्या स्थापनेपासूनच आहे. यातील शेठजींबरोबर भाजपचे अजूनही साटेलोटे आहे. ब्राह्मणांनी मात्र पटले तरच भाजप अन्यथा दुसरा पक्ष अशी भूमिका कधीच स्वीकारली आहे. याचे प्रत्यंतर अलीकडेच कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागेवर आले. या मतदारसंघात भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी दिली होती; पण केळकर स्वत: ब्राह्मण असूनही मतदार संघातील ब्राह्मणांना ते आपल्याकडे वळवू शकले नाहीत. या मतदारसंघातील रत्नागिरीपासून ठाणे-डोंबिवलीपर्यंतच्या ब्राह्मण मतदारांनीच केळकर यांना कडाडून विरोध केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यामागे ताकद उभी करून त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणले. आता नरेंद्र मोदी यांना पुढे करून भाजप केंद्रातील सत्ता ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. मोदी नावाचा 'मसिहा' आपल्याकडे आहे, असा पद्धतशीर प्रचार भाजपने चालवला आहे. पण नुकत्याच कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकांत नरेंद्र मोदी यांनी जेथे प्रचार केला त्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मोठय़ा मतांनी निवडून आले. आगामी लोकसभा निवडणुकांत काही मोजक्या शहरी भागात भाजपचे मोदी नावाचे नाणे कदाचित चालेलही. पण ग्रामीण भागात अजूनही काँग्रेसचाच प्रभाव आहे. काळाच्या कसोटीवर ते सिद्धही होईल. राज्यात विविध प्रादेशिक पक्षांचा मोठा प्रभाव आहे. 'मोदी-मोदी' करून हा प्रभाव फुसला जाणार नाही, हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

कर्नाटकच्या पराभवाने नरेंद्र मोदींची कोंडी

कर्नाटकातील दारुण पराभवानंतर भाजपच्या गोटात विचारमंथन व 'चिंतन' सुरू झाले आहे. यामध्ये मोदींचा करिष्मा चालला तर नाहीच पण कर्नाटकमधील पराभवानंतरही त्याची जबाबदारी राष्ट्रीय म्हणवणा-या मोदी यांनी स्वीकारली नाही. मोदींनी ज्या भागात प्रचारमोहिमा राबवल्या त्या भागात तर भाजपची मोठय़ा प्रमाणात पिछेहाट झाली.

Read More »

जलसंवर्धनावर लोकसहभाग हाच उपाय

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा उच्चांक नोंदवायला सुरुवात झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तापमापकातील पारा ४७ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. नागपुरात तर तापमापकाने ४८ अंशाची पातळी ओलांडल्याने ५९ वर्षातला उच्चांक स्थापित झाला आहे. ५९ वर्षापूर्वी असा उन्हाळा झाला असेल पण तो एवढा तापदायक ठरला नसेल कारण आता उच्चांकी तापमानासोबतच विक्रमी पाणीटंचाईही आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची टंचाई गेल्या शंभर वर्षात जाणवली नसेल, एवढी जीवघेणी ठरली आहे. मराठवाडय़ात सर्वाधिक तापमान नांदेड, परभणी या जिल्हय़ात ४२ अंशापर्यंत तापमान वाढले आहे. लातूर जिल्हय़ापासून पुढे विदर्भात जायला लागतो तसतसे अतिशय तीव्र उन्हाळा जाणवतो. गेल्या आठवडय़ात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, राज्यातील जलसाठवण तलावामध्ये केवळ २४ टक्के जलसाठा शिल्कक होता. तो जलसाठा फुटात सांगायचा झाल्यास ३१२ अब्ज घनफूट एवढा आहे. केवळ मराठवाठय़ाचा विचार केला तर एकंदर साठा १९ अब्ज घनफूट असून उपयुक्त साठा केवळ ७ टक्के एवढा आहे. म्हणून पाण्याच्या दुíभक्ष्याच्या पातळीवर उन्हाळा अधिक तीव्रपणे जाणवत आहे. मुंबईमध्ये तापमापकाचा पारा ३७ अंशांवर आलेला आहे. मुंबईमध्ये तापमान ३५ डिग्रीच्या पुढे जाणे, हेही असहय़ वाटते. महाराष्ट्रातील ही तापमानाची स्थिती अजून दोन दिवस कायम राहील, असा अंदाज आहे. मुंबईमध्ये तापमान वाढले की, नागपूरप्रमाणे कोणाला उष्माघात होत नाही. परंतु घामाच्या धारा वाहायला लागतात आणि चालणे-फिरणे अशक्य होऊन बसते. साधारणपणे ४० अंश तापमान नोंदले गेले आणि उकाडा भयंकर जाणवायला लागला की, संध्याकाळी हमखास पाऊस पडतो. त्यानुसार ज्या-ज्या जिल्हय़ांमध्ये ४० ते ४२ अंश एवढी तापमानाची नोंद झाली. त्या जिल्हय़ामध्ये गेल्या आठवडय़ाभरात अवकाळी पाऊस पडला आहे. या पावसाने काही तासांपर्यंत दिलासा मिळाला असेल. पण विजांच्या कडकडाटासह तो पडल्यामुळे आणि वादळाला सोबत घेऊन आल्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर जिल्हय़ात उभ्या असलेल्या फळबागांचे नुकसान झाले आहे. या वर्षी तीन वेळा अवकाळी पावसाचा असा फटका बसला आहे. शेतक-यांची अवस्था मोठी दयनीय झालेली आहे. या वर्षी मे महिना संपताना बिकट अवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्वच जण पावसाची वाट पाहत आहेत. जूनमध्ये अगदी वेळेवर पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त झाला आहे. पण पाऊस पडला की, लगेच काही जलाशये भरत नाहीत. पाण्याची स्थिती एकदम सुधारत नाही. म्हणजे जून महिनासुद्धा पूर्णपणे कठीण जाणार आहे. जुलैनंतर मोठा पाऊस पडतील तेव्हा जलाशयांत पाणी साचायला लागेल. पाण्याची योग्य ते नियोजन करून दुष्काळ निर्माण होणार नाही, यासाठी लोकांनी मानसिकता बनवली पाहिजे. कुठे शिरपूर पॅटर्न राबवला जात आहे तर कोठे जलाशये खोल केली जात आहेत. अनेक ठिकाणी जलाशयांतील गाळ काढण्याची मोहीम सुरू आहे तर अनेक ठिकाणी स्वयंस्फूर्तीने तलाव खोदली जात आहेत. पुढे अशी परिस्थिती राज्यात उद्भवू नये, यासाठी राज्य सरकारने लोकसहभागातून जलसंचयनाचे प्रकल्प राबवणे आवश्यक आहेत आणि त्यासाठी लोकांनीही पुढाकार घेतला पाहिजे.

Read More »

चक्रीवादळापासून धडा घ्यावा

जगात कुठे ना कुठे अशी वादळे येऊन जीवित आणि वित्तहानीचे प्रचंड नुकसान होत असते. भारतात ओरिसाच्या समुद्रकिना-याला आताच 'महासेन' या लहान वादळाने तडाखा दिला. भारतासारख्या मागास आणि गरीब देशात आणि त्यातल्या त्यात ओरिसासारख्या राज्यात वादळ लहान असले तरीही होणारे नुकसान मोठे असते. अमेरिकेसारख्या प्रगत देशात अशा संकटाने होणारी जीव आणि वित्तहानी तुलनेने कमी असते. तिथे होणा-या नुकसानीवरून संकटाची तीव्रता मोजता येत नाही. कारण तिथे प्रतिबंधात्मक यंत्रणा सज्ज असतात आणि आपत्कालीन यंत्रणा सतत सावध असतात. तिथल्या अशा यंत्रणांचा भारतासारखा बोजवारा उडालेला नसतो. अमेरिकेतल्या मूर आणि ओक्लाहोमा या शहरांना मंगळवारी बसलेल्या वादळाच्या तडाख्याची स्थिती अशीच आहे. एक मैल रुंदीचे वादळ ताशी ३२० प्रतितास वेगाने आले आणि तब्बल ४० मिनिटे धुडघूस घातला. या वादळात ५१ लोक ठार झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण बुधवारी त्यात केवळ २४ जण ठार झाल्याचे सांगण्यात आले. हवामान खात्याने या वादळाचा स्तर ईएफ ५ असा असल्याचे म्हटले आहे. या स्तराच्या वादळात वा-याचा वेग ताशी २२० ते २४० किलोमीटर असतो. भारतात आपल्याला वादळाचे अतिशय मोठे तडाखे बसतात तेव्हा वा-याचा वेग ताशी ८० ते ८५ किलोमीटर्स असतो. पण तेवढय़ानेही वाताहत होते. ओक्लाहामाच्या वादळात वा-याचा वेग त्याच्या अडीच पटापेक्षा जास्त आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या वादळातून फेकली गेलेली ऊर्जा हिरोशिमा येथील टाकलेल्या पहिल्या अणुबॉम्बपेक्षाही अधिक होती. आणखी वेगळ्या शब्दात सांगायचे तर ओक्लाहामाचे हे वादळ मानवाच्या ज्ञात इतिहासातले सर्वात विनाशकारी आणि तीव्र स्वरूपाचे वादळ आहे. या वादळाने अमेरिकेसारख्या प्रगत देशात अनेक इमारती पडाव्यात हे तर नवलाचे आहे. पण तिथे आता एवढय़ा इमारती पडल्या आहेत की, त्या इमारतींचे अवशेष काढण्याचे कामही शक्य झाले नाही. सुरुवातीला बचाव तुकडय़ांना या शहरांची हवाई पाहणी करावी लागली आणि मगच बचावकामाचा आराखडा तयार करता आला. मंगळवारचे वादळ हिरोशिमाच्या बॉम्बस्फोटाच्या ८ ते ६० पट अधिक तीव्रतेचे होते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. या वादळातले वारे एवढे वेगवान होते की, त्यापासून बचाव करण्यासाठी जमिनीखाली आश्रय घेणे, हाच एकमेव उपाय होता. असे वादळ भारताच्या एखाद्या किना-याला धडकले तर आत्पकालीन उपाययोजना काय आहेत, हे पाहिले पाहिजे. भारताचा समुद्रकिनारा हा मोठा आहे. या आधीही भारताला लहान-लहान वादळांचा धोका निर्माण झाला होता. हे पाहता भविष्यातील धोका वेळीच ओळखून त्या प्रमाणे पावले उचलायला हवीत.

Read More »

३० वर्षाची प्रतीक्षा तीन महिन्यांवर?

कोणत्याही राज्याच्या विकासात धरणांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. जलसिंचन, पिण्याचे पाणी, वीजनिर्मिती, पर्यटन, जलवाहतूक, असे अनेक उद्देश धरणांमुळे पूर्ण होत असतात. मात्र, या प्रकल्पांमुळे विस्थापित होणा-या प्रकल्पग्रस्तांचे अपेक्षित पुनर्वसन हा कळीचा मुद्दा बनतो. महाराष्ट्र आणि गोवा यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचा अपेक्षित पुनर्वसनाच्या मागणीसाठी सुमारे ३० वर्षापासून संघर्ष सुरू होता. मात्र, ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महाराष्ट्र आणि गोवा यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी प्रकल्पाच्या उभारणीची सुरुवात ८०च्या दशकात झाली. हा प्रकल्प २००९ मध्ये पूर्ण झाला. हा प्रकल्प दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प असल्याने या प्रकल्पामुळे बाधित होणा-या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी दोन्ही राज्यांची होती. प्रकल्पग्रस्तांना दोन्हीपैकी कोणत्याही एका राज्यातील शासकीय सेवेत सामावून घेतले जाण्याची अपेक्षा होती. मात्र, गोव्याकडून या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जबाबदारीबाबत नेहमीच चालढकल करण्यात आली, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे होते. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांकडून त्यातही या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा असलेल्या गोव्याकडून प्रकल्पग्रस्तांच्या योग्य पुनर्वसनाबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आंदोलन उभारले. या आंदोलनांनंतर या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

संयुक्त उपसमितीच्या बैठकीत दिलासा

तिलारी प्रकल्पग्रस्तांना ३१ मार्च ही निर्णयाची अंतिम 'डेडलाइन' देऊनही याबाबत दोन्ही शासनाने ठोस निर्णय घेतला नव्हता. अखेर सोमवारी तिलारीचा तिढा सोडविण्यासाठी दोन्ही राज्यांच्या संयुक्त उपसमितीची बैठक येथील विश्रामगृहावर झाली. जवळपास एक तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे दोन्ही राज्यांच्या गठीत करण्यात आलेल्या समन्वय उपसमितीचे अध्यक्ष आणि कोकण पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता पी. बी. सोनावणे यांनी सांगितले. तिलारी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सहा महिन्यांच्या आत मार्गी लागेल, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. या बैठकीस जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एन. डी. अग्रवाल, गोवा सिंचन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस. टी. नाडकर्णी, गोव्याचे मुख्य अभियंता टी. बी. कामत, दक्षिण रत्नागिरी कोकण पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता वाघमारे आदी सदस्य उपस्थित होते.

शासकीय नोक-यांचा प्रश्न जिव्हाळ्याचा

तिलारी प्रकल्पग्रस्तांसाठी शासकीय नोक-यांचा प्रश्न जिव्हाळय़ाचा बनला असतानाच गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या सामंजस्य करारात प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास असमर्थता दर्शवली. इतकेच नव्हे तर दोन राज्यांतील सामंजस्य करार तपासून पाहिला जाईल. मात्र, करारात प्रकल्पग्रस्तांना सवलत द्यावी, असा उल्लेख नसेल तर प्रकल्पग्रस्तांना गोवा राज्याच्या शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत कोणताही विचार केला जाणार असे स्पष्ट केले होते. त्यामुळे गोवा व महाराष्ट्र दोन्ही राज्यांकडून तिलारीच्या प्रकल्पग्रस्तांना शासन सेवेत सामावून घेण्यावर कोणतेच ठोस धोरण अद्याप ठरवले गेले नाही.

प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक निर्णय

शासकीय नोक-यांबाबत गोवा सरकारने हात वर केल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती. त्यातच कालवा दुरुस्तीसाठी तिलारीचे गोव्याच्या दिशेने जाणारे, महिनाभर बंद ठेवण्यात आलेले पाणी १० डिसेंबर २०१२ रोजी पूर्ववत करण्यात येणार होते. त्याच पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक निर्णय घेतला होता. ज्या राज्याची तहान भागवण्यासाठी आम्ही सर्वस्वाचा त्याग केला, त्यांना जर त्याची काहीच पर्वा नसेल तर आम्हालाही जशास तसे उत्तर द्यायला हवे, असा निर्णय घेतला. गोवा शासन तिलारी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेत नसेल तर तिलारीचे पाणी गोव्याला देणार नाही, असा पवित्रा संघर्ष समितीने घेतला होता व यातूनच रविवारी (९ डिसेंबर २०१२) मध्यरात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी केली. सुमारे २१ दिवस हे ठिय्या आंदोलन केले होते.

आंदोलनामुळे प्रशासनाला जाग

२१ दिवस केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे अखेर प्रशासनाला जाग आली. संबंधित प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख निश्चित करत प्रकल्पग्रस्तांना आशा दाखवली खरी. परंतु, पुढे त्यानुसार कार्यवाही करण्यामध्ये दिरंगाई होत होती. प्रत्यक्ष डेडलाइननंतर सुमारे दीड महिन्यानी याबाबत कार्यवाहीस सुरुवात झाली. सोमवारी २० मे रोजी दोन्ही राज्यांच्या गठीत करण्यात आलेल्या समितीची संयुक्त बैठक तिलारी विश्रामगृहावर संपन्न झाली. या बैठकीनंतर कोकण पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता पी. बी. सोनावणे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती दिली.

अधिवेशनामुळे निर्णयाला विलंब

तिलारी प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आंदोलनानंतर त्यांच्या मागण्यांबाबत ३१ मार्चपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात याबाबत निर्णय घेण्यासाठी या तारखेनंतरही दीड महिना उलटून गेला. या निर्णयाला इतका विलंब का झाला, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर सुरुवातीला महाराष्ट्र विधिमंडळाचे आणि त्यानंतर गोवा राज्याचे अधिवेशन आल्यामुळे निर्णय प्रक्रिया होऊ शकली नाही, अशी माहिती सोनावणे यांनी दिली. बैठकांच्या तारखा निश्चित होऊनही दोन वेळा आकस्मिक कारणांमुळे बैठक होऊ शकली नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्प्रग्रस्तांबाबत सकारात्मक निर्णयाची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील सहा महिन्यांच्या आत निर्णय होईल असे ते म्हणाले.

तीस वर्षाची प्रतीक्षा

तिलारी प्रकल्पाला ८०च्या दशकात सुरुवात झाली होती. त्या वेळी या प्रकल्पासाठी सुरू झालेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुमारे तीस वर्ष उलटली आहेत. पण अजूनही या प्रकल्पग्रस्तांचे अपेक्षित पुनर्वसन झालेले नाही. मात्र, आता जो आशेचा किरण निर्माण झाला आहे, त्याबाबत असलेल्या उत्सुकतेमुळे, हा प्रश्न सोडवण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल? अशी विचारणा करण्यात आली. साधारण सहा महिन्यांत निर्णय होईल का? असा सवाल पत्रकारांनी सोनावणे यांना केला असता छे! सहा महिने कशाला? अगोदरच, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तीस वर्षाची प्रतीक्षा आता तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र, निर्णयानंतरच खरे प्रकल्पग्रस्तांचे खरे समाधान होणार आहे.

Read More »

विलायती शिरीष वृक्ष मरणासन्न

केवळ सांताक्रूझच नाही, तर मुंबईच्या विविध भागांतील शिरीष झाडे मरणासन्न अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे.

मुंबई- सांताक्रूझ स्थानक परिसरातील सुमारे ४० शिरीष वृक्ष (रेन ट्री) एका बुरशीजन्य रोगामुळे सुकून गेल्याची बातमी गेल्या आठवडय़ात 'प्रहार'ने प्रसिद्ध केली होती. परंतु केवळ सांताक्रूझच नाही, तर मुंबईच्या विविध भागांतील शिरीष झाडे मरणासन्न अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. किंग्ज सर्कल, दादर भागातील शिवसेना भवन आणि राऊतवाडी भागांतील वृक्षांचा समावेश आहे.

सांताक्रूझ भागातील वृक्षांची पाहणी केल्यावर, झाडावरील बुरशी पावसासोबत निघून जाऊन झाडे पूर्ववत होतील, असे 'फ्रेंड्स ऑफ ट्री'च्या वृक्षतज्ज्ञांचे म्हणणे होते. परंतु यापूर्वी ज्या भागांतील झाडे अशा पद्धतीने मरणासन्न स्थितीत होती, ती कायमची सुकल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

राऊतवाडी परिसरातच राहणारे पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांच्या सांगण्यानुसार, गेल्या ३-४ वर्षापासून या भागातील शिरीष झाडे सुकत चालली आहेत. गेल्या वर्षी राऊतवाडीतील एका झाडातून उग्र वास येऊ लागल्याने हे झाड तोडावे लागले होते.

यंदाही एका झाडातून असाच उग्र वास यायला सुरुवात झाली आहे. गेल्या ३-४ वर्षापासून ही झाडे अशा पद्धतीने सुकत असली तरी वृक्ष प्राधिकरणाने अद्याप एकदाही या झाडांची पाहणी तसेच औषधांची फवारणी केलेली नाही, असेही ते म्हणाले.

झाडांची ही जात मूळची दक्षिण अमेरिकेतील असून, ती दक्षिण आशियातही मोठय़ा प्रमाणात पाहण्यात येते. ही झाडे वेगाने आणि विस्तीर्ण वाढतात. थंडगार सावली मिळावी, यासाठी ही झाडे महापालिकेने मुंबईतील रस्त्यांच्या दुतर्फा लावली आहेत. मुंबईसारख्या औद्योगिक शहरांत वाढणारे कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेण्यासही ही झाडे मदत करतात. दरम्यान, जैवविविधतेच्या दृष्टीनेही या 'विलायती शिरीष' या वृक्षांची भूमिका महत्त्वाची आहे.

झाडांवर 'अॅफिड' कीटकांचा हल्ला

याबाबत वृक्ष प्राधिकरणाशी संपर्क साधला असता, शिरीष वृक्ष सुकण्याचे कारण बुरशीजन्य रोग नसून या झाडांवर 'अॅफिड' नावाच्या कीटकांचा हल्ला झाल्याचा हा परिणाम असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांनी सांगितले. या झाडांना 'अॅफिड'ची गंभीर लागण झाली असल्याचे सांगण्यात आले. हा कीटक झाडाच्या अग्रभागावर हल्ला करून झाडातील रस शोषून घेतो. त्यामुळे ही झाडे सुकत आहेत. यावर उपाय म्हणून वृक्ष प्राधिकरण प्रत्येक वॉर्डमध्ये 'मोनो कोटो फॉस' या औषधाची फवारणी करणार असल्याचेही एका अधिका-याकडून सांगण्यात आले.

वुली अॅफिड हा किडा साधारणत: कोवळी साल किंवा पालवीच्या ठिकाणी वाढतो. झाडातील रस हा किडा शोषून घेतो. त्यामुळे पानगळती होते. पण यामुळे झाडे मरण्याची शक्यता कमी असते. कारण पाऊस पडल्यावर हा किडा झाडावर राहत नाही. वृक्ष प्राधिकरण 'मोनोकोटोफॉस' या औषधाची फवारणी करणार आहे. परंतु झाडांची उंची, गजबजलेल्या वस्तीत या झाडांची झालेली वाढ लक्षात घेता हा निर्णय अव्यवहार्य ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या औषधाऐवजी कडुनिंबासारख्या जैविक औषधाची फवारणी करणे सोईस्कर ठरेल. - डॉ. विद्याधर ओगले, निवृत्त विभागप्रमुख, लँडस्केप विभाग, भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र

तीव्र औषधांमुळे त्रास होण्याची शक्यता

ही झाडे बहुतांश मुंबईच्या गजबजलेल्या भागांमध्ये आहेत. त्यामुळे कोणतेही तीव्र औषध फवारल्यास त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होऊ शकतो. त्यातल्या त्यात सौम्य औषधच आम्ही फवारू शकतो. पण जर ही लागण अगदीच गंभीर स्वरूपाची असेल, तर कदाचित या औषधाचा त्यावर काही परिणाम होणारही नाही. मात्र, कमी लागण झालेल्या झाडांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे वृक्ष प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.

झाडांवर 'अॅफिड' कीटकांचा हल्ला

याबाबत वृक्ष प्राधिकरणाशी संपर्क साधला असता, शिरीष वृक्ष सुकण्याचे कारण बुरशीजन्य रोग नसून या झाडांवर 'अॅफिड' नावाच्या कीटकांचा हल्ला झाल्याचा हा परिणाम असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांनी सांगितले. या झाडांना 'अॅफिड'ची गंभीर लागण झाली असल्याचे सांगण्यात आले. हा कीटक झाडाच्या अग्रभागावर हल्ला करून झाडातील रस शोषून घेतो. त्यामुळे ही झाडे सुकत आहेत. यावर उपाय म्हणून वृक्ष प्राधिकरण प्रत्येक वॉर्डमध्ये 'मोनो कोटो फॉस' या औषधाची फवारणी करणार असल्याचेही एका अधिका-याकडून सांगण्यात आले.

भूजल पातळी कमी झाल्याचा परिणाम

या झाडांची मुळे खोलवर न जाता आडव्या पद्धतीने वाढतात. त्यामुळे भूजल पातळी खालावल्यास झाडांच्या वाढीवर त्याचा विपरित परिणाम होतो. मुळे खोल जात नसल्यामुळे त्यांची जमिनीतील पकड कमकुवत असते, त्यामुळे सोसाटय़ाच्या वा-यात ही झाडे उन्मळून पडण्याची संख्या जास्त असते. शिवाय मुंबईत ठिकठिकाणी काँक्रिटीकरण झाल्यामुळे झाडांच्या आसपास आवश्यक असलेला ओलसरपणाही नाहीसा झाला आहे. त्यामुळेही या झाडांच्या वाढीसाठी आवश्यक पाणी मिळेनासे झाले आहे.

Read More »

रिव्हर्स स्विंग, २३ मे २०१३

क्रिकेटच्या मैदानात २३ मे रोजी घडलेल्या निवडक घडामोडी

१९१८
इंग्लंडचे एक सवरेत्तम 'स्टायलिश' माजी कसोटीपटू डेनिस कॉम्प्टन (१९१८-९७) यांचा जन्म. ७८ सामन्यांत ५०.०६च्या सरासरीने त्यांनी ५८०७ धावा केल्या. त्यात १७ शतकांचा समावेश आहे. कॉम्प्टन चपळ क्षेत्ररक्षक तसेच धोकादायक डावखुरे स्पिनरही होते. एमसीसीतर्फे सर्वाधिक जलद त्रिशतक तसेच विक्रमी १८ शतकांसह एका वर्षात (१९४७) सर्वाधिक ३८१६ धावा असे अनेक डोमेस्टिक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. दुस-या महायुद्धानंतर 'ब्रायलक्रीम'च्या जाहीरातीतही कॉम्प्टन चमकले.


१९२३
भारताचे माजी कसोटीपटू निरोडे रंजन चौधरी (१९२३-७९) यांचा जन्म. केवळ दोनच सामने ते खेळले. बिहारतर्फे खेळलेले ते पहिले कसोटीपटू होते.


१९२४
भारताचे माजी मध्यम तेज गोलंदाज वेंकटरामन नारायण स्वामी (१९२४-८३) यांचा जन्म. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला पहिल्या कसोटी (१९५५) सामन्याद्वारे त्यांनी कसोटी पदार्पण केले. मात्र त्यांच्या कारकीर्दीतील तो पहिला आणि शेवटचा सामना ठरला. कसोटी पदार्पण करूनही एकही धाव आणि विकेट त्यांच्या नावावर नाही.


१९६३
वेस्ट इंडिजचे तेज गोलंदाज टोनी ग्रे यांचा जन्म. केवळ पाच कसोटी आणि २५ वनडे सामने खेळलेले ग्रे यांनी कसोटी १७.१३ आणि वनडेत १८.९७च्या सरासरीने गोलंदाजी टाकली. प्रत्येक २९ चेंडूंनंतर त्यांनी विकेट घेतली. त्यात १९९०-९१ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (५०-६) सवरेत्तम गोलंदाजीचा समावेश आहे.


१९६५
भारताचा माजी सलामीवीर वुर्केरी वेंकट रामनचा जन्म. तो ११ कसोटी आणि २७ वनडे खेळला. १९८७-८८ मध्ये चेन्नईत वेस्ट इंडिजविरुद्ध रामनने कसोटी पदार्पण केले. त्या सामन्याद्वारे लेगस्पिनर नरेंद्र हिरवाणीनेही कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. दोघांनीही यशस्वी पदार्पण केले. मात्र सामन्यात १६ विकेट्स घेणा-या हिरवाणीच्या 'मॅचविनिंग' कामगिरीने डावखु-या रामनची ८३ धावांची खेळी झाकोळली गेली. रामनला कसोटीत शतकाने हुलकावणी दिली. मात्र वनडेत एक शतक त्याच्या नावावर आहे.


१९६६
इंग्लंडचा माजी कसोटीपटू ग्रॅमी हिकचा जन्म. १० वर्षाच्या कारकीर्दीत हिकने ६५ कसोटी सामन्यांत ३१.३२च्या सरासरीने सहा शतकांसह ३३८३ धावा आणि १२० वनडेत ३७.३३च्या सरासरीने पाच शतकांसह ३८४६ धावा केली. कारकीर्दीत अनेक वेळा पायचीत झालेल्या हिकने १९८८ मध्ये सॉमरसेटविरुद्ध नाबाद ४०५ धावांची खेळी केली होती. एका डोमेस्टिक मोसमात (१९८६) दोन हजार धावा करणारा हिक सर्वात युवा क्रिकेटपटू आहेत. त्याने २०व्या वर्षी ही कामगिरी केली. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ६४हजारहून अधिक धावा आणि १३६ शतके हिकच्या नावावर आहेत.


१९६९
इंग्लंडचे माजी कसोटीपटू कॉलिन मिलबर्न (१९४१-९०) यांच्या कारकीर्दीतील एक वाईट दिवस. कार अपघातात गंभीर इजा झाल्याने मिलबर्न यांचा डावा डोळा निकामी झाला. या अपघातापूर्वी दोन महिने त्यांनी पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी केली होती.


२००१
क्रिकेटमधील भ्रष्टाचारासंबंधित काँडॉन अहवाल याच दिवशी सादर झाला. या अहवालात कुणाचाही नव्याने नामोल्लेख नसला तरी २४ शिफारसी करण्यात आल्या.

Read More »

कुपुत्र

काही जण चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात. एका मोठय़ा माणसाच्या यशात आपलं जीवन व्यतित करतात. जेव्हा स्वत:ला काही करण्याची वेळ येते तेव्हा आपण नेमकं काय करतोय, याचे भान त्यांना राहत नाही. ज्या माणसाच्या कर्तृत्वामुळे आपण हे उपभोगतोय किमान त्या माणसाच्या तत्त्वांशी तरी आपण बांधील राहावे हेही ते विसरतात. यशस्वी माणसांची मुले किमान निव्र्यसनी राहिली तरी ते यशच समजले जाते. दारा सिंग यांचा मुलगा असलेला विंदू दारा सिंगचे नेमके काय चुकले हाच प्रश्न सगळय़ांना सतावत आहे. विंदू वाढला तो एका पंजाबी घरात. एका बाजूला चित्रपट तर दुस-या बाजूला कुस्ती, असे त्याच्या घरातले वातावरण होते. हा लाडका मुलगा, आपल्या मुलाने शिकावे, असे दारा सिंग नेहमी म्हणायचे मात्र विंदूने काही उच्च शैक्षणिक अर्हता मिळवली नाही. शेवटी इतर स्टार पुत्रांप्रमाणेच तो चित्रपटांत आला. तेही त्याला जमले नाही. १९९४ ते ९६ अशा दोन वर्षामध्ये त्याने चित्रपटात आपले नशीब आजमावले. मात्र त्याला यश मिळालं नाही. त्याचा हिंदी चित्रपट 'करन' व पंजाबीतला 'रब ते रखा' या दोन्ही चित्रपटांतून त्याची छाप पडली नाही. आपल्या रूपामुळे तो नायक झाला नाही. तसेच चांगला अभिनेता म्हणूनही त्याचे नाव झाले नाही. ही कमतरता त्याने आपल्या वागणुकीतून भरून काढली. त्याची वागणूक जगन्मित्र अशी राहिली. २००९ साली तो जेव्हा बिग बॉसचा विजेता झाला होता, तेव्हा त्याला 'बडे दिल वाला' अशी उपाधी देण्यात आली होती. विजयानंतर त्याच्या विनम्र वागणुकीचे कौतुक सगळीकडे झाले होते. सगळय़ांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा त्याचा हा गुणधर्मच त्याला या सट्टेबाजीत घेऊन गेला असावा, असे वाटते. संपर्काना कोणत्याही व्यवसायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यशाची ती एक गुरुकिल्लीच म्हणायला हवी. ही बाब जशी कायदेशीर व्यवसायांना लागू होते, तशीच ती बेकायदेशीर व्यवसायांनाही लागू होते. या संपर्कामुळे तो अनेकांच्या जवळ आला असावा. अशा व्यवसायात एकदा माणूस आला की त्याला पैशांची नशा लागते. या नशेमुळे आपण नेमकं काय करतोय, याचं भान त्याला राहिलं नाही. विंदूचा आतापर्यंतचा इतिहास व अटक केल्यानंतरचा त्याचा चेहरा पाहता त्याला या प्रकरणात कुणी अडकवले आहे, असे वाटत नाही. त्याच्याशी कोण कशाला शत्रुत्व ठेवेल? आपल्या संपर्काचा उपयोग करून पैसे कमावताना ते कशाच्या व कुणाच्या आधारे बनवतोय, याचे भान त्याला राहिले नाही. विंदूचा चेहरा पाहता आपल्याला काहीही होणार नाही हा आत्मविश्वास त्याच्या चेह-यावरून झळकताना दिसून येतो. इथे इतकी मोठी माणसं आहेत की आपण साखळीतले एक लहान घटक आहोत हे त्याला माहीत आहे. त्यामुळे आपल्याला फार काही होणार नसून हे काही काळापुरते संकट आहे, असा विचार तो करतोय का? आयपीएलमधला सट्टा उघडकीस आला असला तरी हे क्षेत्र इतके व्यापक आहे की, त्याचा थांग सर्वसामान्यांना लागणे कठीण आहे. दुसरीकडे परदेशात सट्टय़ाला बेकायदेशीर समजत नसल्याने आपण काही बेकायदेशीर करतोय, याची जाणीव तरी त्याला झाली असेल की नाही हे सांगता येत नाही. आयपीएल हा क्रिकेटपेक्षा पैशांचाच खेळ अधिक असल्याने सध्या तरी विंदू बाद झाला आहे, एवढेच आपल्याला म्हणावे लागेल.

Read More »

मधमाश्या घेणार भूसुरुंगांचा शोध

जमिनीखाली असलेले भूसुरुंग शोधण्यासाठी क्रोएशियामध्ये मधमाश्यांना प्रशिक्षण देत आहेत.

क्रोएशियामध्ये नव्वदच्या दशकात झालेल्या युद्धाच्या काळात पेरले गेलेले भूसुरुंग आजही या देशासाठी डोकेदुखी ठरत आहेत. या भूसुरुंगांच्या स्फोटांमुळे अद्यापही अनेकांचे बळी जात आहेत. त्यामुळेच देशाच्या अनेक भागात पेरलेले हे भूसुरुंग कसे निकामी करावेत याच्या उपायांवर विचार केला जात आहे. त्यातूनच एक वेगळा उपाय करण्याचा क्रोएशियामधील संशोधकांचा प्रयत्न आहे. हे संशोधक जमिनीखाली असलेले भूसुरुंग शोधण्यासाठी मधमाश्यांना प्रशिक्षण देत आहेत.

निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या देशात भूसुरुंगानी युक्त असलेल्या प्रदेशाचा विस्तारही मोठा आहे. सुमारे ७५० चौरस किमी क्षेत्रफळामध्ये आजही भूसुरुंगांचा धोका आहे. त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी संशोधकांनी हा अभिनव उपाय शोधून काढला आहे. मधमाश्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ निकोला केझिक त्यांच्या तरुण सहका-यांच्या सहकार्याने मधमाश्यांना स्फोटके शोधण्याचे प्रशिक्षण देत आहेत. मधमाश्यांचे गंधज्ञान अतिशय चांगले असते. त्यामुळे ते स्फोटकांचा वास सहजपणे ओळखू शकतील, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळेच मधमाश्यांना स्फोटकांच्या वासाच्या साहाय्याने त्यांचे अन्न शोधण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. निकोला यांनी याबाबत केलेल्या प्रयोगांमध्ये त्यांना यश मिळाले आहे. युरोपीय संघाच्या अर्थसाहाय्याने स्फोटके शोधण्याचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 'तिरामिसू' नावाच्या या प्रकल्पासाठी युरोपीय संघाने लाखो युरोंचे अर्थसाहाय्य देऊ केले आहे.

या प्रयोगासाठी एका जाळीदार तंबूच्या शेजारी विविध ठिकाणी मधमाश्यांचे खाद्य ठेवण्यात आले. त्यापैकी केवळ काही ठिकाणांवर स्फोटकांचे कण होते. त्या जे अन्न खातात त्या सोबत स्फोटकांचा वास ठेवण्याची ही युक्ती यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे. स्फोटके टाकलेल्या साखरेच्या द्रावणाच्या भांडय़ाभोवती मधमाश्या जमा होतात व दुसरा वास असलेल्या भांडय़ाच्या भोवती त्या जमा होत नाहीत, असे दिसून आले. ज्या ठिकाणी स्फोटके आहेत, त्या ठिकाणी गेल्यावर साखरेच्या द्रावणाची मेजवानी मिळत असल्याचे लक्षात आल्यावर मधमाश्या या वासाच्या दिशेनेच जाऊ लागतात. साहजिकच मधमाश्यांना स्फोटके शोधण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे केझिक यांचे म्हणणे आहे.

१९९१मध्ये झालेल्या बाल्कन युद्धाच्या सुरुवातीला भूसुरुंगाच्या स्फोटात सुमारे २५०० जणांचा बळी गेला होता. तर या युद्धाच्या चार वर्षाच्या काळात देशभरात पेरलेल्या भूसुरुंगांमुळे सुमारे ९०००० लोक ठार झाले होते. हे भूसुरुंग कोणतीही योजना न आखता किंवा त्यांचा नकाशा तयार न करता पेरलेले असल्याने ते शोधून काढणे अतिशय त्रासदायक ठरले आहे.

Read More »

नानांच्या स्मारकासाठी शिवडी-वडाळ्यात जागा?

मुंबईचे आद्य शिल्पकार व समाजसुधारक नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांच्या स्मारकासाठी महापालिका प्रशासनाने वडाळा-शिवडी येथील एक जागा निश्चित केली आहे.
मुंबईमुंबईचे आद्य शिल्पकार व समाजसुधारक नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांच्या स्मारकासाठी महापालिका प्रशासनाने वडाळा-शिवडी येथील एक जागा निश्चित केली आहे. परंतु प्रशासनाने ही जागा निश्चित केली असली तरी नाना शंकरशेठ स्मारक समितीला ही जागा किती भावते यावर सर्व अवलंबून आहे. या समितीला ही जागा न आवडल्यास प्रशासनाला पुन्हा नव्याने जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.

नाना शंकरशेठ यांच्या स्मारकाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एका बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क, पार्क क्लब, महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेसाठी पराकाष्ठा करणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला अद्याप नानांच्या स्मारकासाठी जागा निश्चित करता आलेली नाही. त्यामुळे नाना शंकरशेठ स्मारक समितीने बुधवारी महापौर सुनील प्रभू यांची भेट घेऊन स्मारकासाठी काही सात ते आठ जागा सुचवल्या. महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, सभागृहनेते यशोधर फणसे, स्मारकासाठी लढा पुकारणारे माजी नगरसेवक अ‍ॅड. मनमोहन चोणकर, स्मारक समितीचे प्रमुख सुरेंद्रभाई शंकरशेठ, सच्चिदानंद हटकर, सूर्यकांत कल्याणकर, शशिकांत पावसकर, उपायुक्त (सुधार) मिलिन सावंत, मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चौरे आदी उपस्थित होते.

स्मारक समितीने ज्या जागा सुचवल्या होत्या, त्या प्रत्येक जागांवर चर्चा करून निष्कर्ष काढण्यात आला. परंतु स्मारक समितीने सूचवलेल्या जागांपेक्षा प्रशासनाने त्यांच्यापुढे शिवडी-वडाळा येथील जागेचा पर्याय ठेवला. स्मारक समितीच्या पदाधिका-यांनी विकास नियोजन विभागाच्या अधिका-यांसोबत जाऊन ही जागा पाहावी. त्यानंतर जर मान्य नसेल तर त्यांनी दिलेल्या पर्यायांचा विचार केला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. येत्या १५ दिवसांमध्ये याबाबत निर्णय न झाल्यास पुन्हा स्मारक समितीची बैठक बोलावून यावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महापौर सुनील प्रभू यांनी या वेळी स्मारक समितीला दिले.

Read More »

प्रा. संदीप देसाईंसाठी आता रेल्वेचे दरवाजे खुले

प्राध्यापक संदीप देसाई यांना त्यांचे शैक्षणिक कार्य पुढे नेण्यासाठी निधी गोळा करता यावा, यासाठी आता रेल्वे पोलिसच त्यांना मदत करणार आहेत.

मुंबई – प्राध्यापक संदीप देसाई यांना त्यांचे शैक्षणिक कार्य पुढे नेण्यासाठी निधी गोळा करता यावा, यासाठी आता रेल्वे पोलिसच त्यांना मदत करणार आहेत. त्यासाठी घ्यावी लागणारी परवानगी आणि केली जाणारी प्रक्रिया याबाबत पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तच देसाई यांना माहिती देणार आहेत. गेल्या आठवडय़ात शाळांसाठी रेल्वेत निधी गोळा करत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्याच अधिका-याने देसाई यांच्यावर भीक मागणे आणि सहप्रवाशांना त्रास देण्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र ही कारवाई चुकीचे असल्याचे सांगत न्यायालयाने संबंधित अधिका-यांना फटकारले होते.

कोकण आणि विदर्भात सर्वसामान्य मुलांसाठी शाळा असाव्यात, यासाठी प्रा. देसाई गेल्या काही वर्षापासून झटत आहेत. त्यासाठी ते रेल्वेमधून फिरून निधी गोळा करतात. मात्र, पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने त्यांना चक्क भिकारी ठरवले आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली. याची गंभीर दखल पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त राजेंद्र रुपनवार यांनी घेतली. देसाई करत असलेले कार्य हे कौतुकास्पद असून, रेल्वेकडून त्यांना मदत केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना परवानगीही दिली जाईल. याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून सहकार्य घेतले जाणार आहे. जेणेकरून, यापुढे देसाई यांना रेल्वेतून निधी संकलन करण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही. दरम्यान, आपण लवकरच परवानगी मागणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. रेल्वेने परवानगी नाकारली, तरी आपण आपले कार्य सुरूच ठेवू, असेही ते म्हणाले.

सामाजिक कार्यकर्ता रेल्वेसाठी भिकारी!

पश्चिम रेल्वेने शुक्रवारी शाळा उभारण्यासाठी प्रवाशांकडून आर्थिक मदत मागणा-या प्रा. संदीप देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.

Read More »

विंदूने सट्टेबाजीतून जिंकले १७ लाख

विंदूला सट्टेबाजीतून  यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने १७ लाखांची कमाई केली होती, अशी माहिती त्याच्या चौकशीतून पुढे आली आहे.

मुंबई – विंदूला सट्टेबाजीचे एवढे वेड होते की, तो प्रत्येक सामन्यावर सट्टा खेळायचा. आयपीएलसह २०११च्या विश्वचषक स्पर्धेतील अनेक सामन्यांतही त्याने सट्टा लावला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने १७ लाखांची कमाई केली होती, अशी माहिती त्याच्या चौकशीतून पुढे आली आहे.

'जॅक' या नावाने विंदू एक लाखापर्यंतचा सट्टा स्वत:च्या बोलीवर खेळायचा. मात्र, त्यावरील रक्कम तो ज्युपिटर, पवन व संजय यांच्याकडे द्यायचा. त्यासाठी त्यांना १० टक्के कमिशन द्यायचा आणि स्वत: एक टक्का कमवत होता. त्याल १७ लाखांची कमाई अंतिम सामन्यानंतर मिळणार होती. हा सर्व व्यवहार 'हवाला'मार्फत चालत होता.

पाच जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

स्पॉटफिक्सिंगप्रकरणी अटक केलेल्या सहा बुकींना पोलिस रिमांड देण्याचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा अर्ज अतिरिक्त महानगर दंडाधिकारी एम. एन. सलीम यांनी फेटाळला. या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी बुकींना पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. पण ती नाकारताना दंडाधिका-यांनी बुकींना पाच जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. अटक झालेल्या बुकींनी महानगर दंडाधिका-यांकडे जामीन अर्ज केला असून, गुन्हे शाखा त्यावर २४ मे रोजी उत्तर सादर करणार आहे.

'सहारा'कडून थेट संपर्क झालाच नाही
आर्थिक बाबींवरून वाद उद्भवल्याने आयपीएलमधून संघ काढून घेण्याचा निर्णय सहारा इंडियाने मंगळवारी जाहीर केला. मात्र या प्रकरणी सहाराने आमच्याकडे थेट संपर्क साधलाच नाही, असे बीसीसीआयतर्फे बुधवारी स्पष्ट करण्यात आले.

''फ्रँचायझीची वार्षिक फी भरण्याची अंतिम तारीख तीन एप्रिल होती. ही तारीख केव्हाच टळून गेली आहे. त्यानंतर हा मुद्दा चर्चेने निकालात काढण्यासाठी प्रथम १२ एप्रिल आणि त्यानंतर २४ एप्रिलला आयपीएल गव्हर्निग कौन्सिलने सहारा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स लिमिटेडला दोन पत्रे पाठवली. मात्र संबंधित रक्कम न भरतानाच दोन्ही पत्रांचे उत्तर देणे सहाराने टाळले. त्यामुळे अनामत रक्कम जप्त करण्यावाचून पर्याय उरला नाही,'' असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Read More »

'म्हाडा'च्या सोडतीसाठी ८८,९२१ अर्ज

यंदाच्या सोडतीतील 'महागडी घरे' अशी टीका होत असतानाच घरांसाठी अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मुंबई – यंदाच्या सोडतीतील 'महागडी घरे' अशी टीका होत असतानाच घरांसाठी अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तीन दिवसांत अर्ज भरणा-यांच्या संख्येत ब-यापैकी वाढ झाल्याने बुधवारी शेवटच्या दिवशी अनामत रकमेसह ८८,९२१ अर्ज आल्याची नोंद झाली आहे. १,२४४ घरांसाठी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढली जाणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २१ मे रोजीच्या सायंकाळपर्यंत अनामत रकमेसह ७५ हजार अर्ज आल्याची नोंद झाली होती. दुस-या दिवशी सारस्वत बँकेत अनामत रकमेसह अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत होती. मात्र, तरीही अर्जदारांनी बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. मंगळवापर्यंत बोरिवली-मागाठाणे येथील अत्यल्प उत्पन्न गटातील ६२ घरांसाठी अनामत रकमेसह सर्वाधिक ११,०१५ अर्ज आल्याची नोंद झाली आहे. पवई तुंगा येथे महागडी घरे असल्याची टीका केली जात असतानाही येथील घरांसाठीही अर्जदारांचा ब-यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. अर्जाची छाननी २६ मे रोजी सकाळी सुरू होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी सोडतीतील पात्र-अपात्र अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. २७ मे रोजी अर्जदारांना म्हाडाकडे हरकती करता येणार असल्याचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी एन. के . सुधांशू यांनी सांगितले.

विरार-बोळिंज येथील घरांची सोडत दिवाळीत
विरार-बोळिंज येथील २,४५० घरांची सोडत येत्या दिवाळीत काढण्याचा निर्णय म्हाडाच्या कोकण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे यंदा ३१ मे रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीत कमी घरे असल्याने नाराज झालेल्या इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. विरार-बोळिंज येथील गृहप्रकल्प जवळपास पूर्ण झाला होता. यंदाच्या सोडतीत या घरांचाही समावेश करण्यात येणार होता. मात्र १७ ते २२ मजल्यांसाठी इमारतीची उंची २४ मीटरऐवजी ७० मीटपर्यंत वाढवण्यासाठी वसई-विरार महापालिकेची परवानगी मिळत नसल्याने अखेर ही घरे सोडतीतून वगळण्यात आली होती. मात्र नंतर पालिकेकडून परवानगी मिळाली.

Read More »

'सेट-नेट' पात्रताधारक संघटनेचे उपोषण

माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांच्या भरतीसाठी रिक्रूटमेंट बोर्डाची स्थापना करावी, या प्रमुख मागणीसाठी अखिल महाराष्ट्रीय सेट-नेट पात्रताधारक संघटनेने तीन दिवसांचे उपाषण सुरू केले आहे.
मुंबई – माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांच्या भरतीसाठी रिक्रूटमेंट बोर्डाची स्थापना करावी, या प्रमुख मागणीसाठी अखिल महाराष्ट्रीय सेट-नेट पात्रताधारक संघटनेने तीन दिवसांचे उपाषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांनी बुधवारी सकाळी सीएसटी रेल्वे स्थानक ते आझाद मैदानापर्यंत डोक्यावर पुस्तके घेऊन आणि काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या प्राध्यापकांच्या भरतीला संघटनेने विरोध केला आहे. पात्रताधारक उमेदवारांना नोकरी मिळावी, यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ करावे, तसेच बेरोजगार पात्रताधारक उमेदवारांना पदाच्या वेतनाच्या ५० टक्के रक्कम बेकारीभत्ता म्हणून द्यावी, विनाअनुदानित तत्त्वावरील सर्व महाविद्यालयांना अनुदान द्यावे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

Read More »

सेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्काराच्या सुरक्षेचा खर्च मनसे उचलणार

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्या अंत्यसंस्काराच्या सुरक्षेचा खर्च मनसे उचलणार असल्याचे असे मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी सांगितले.

मुंबईहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सुरक्षेसाठी महापालिकेने सुमारे पाच लाख रुपये खर्च केले. परंतु, बाळासाहेबांच्या आशीवार्दामुळे महापालिकेत सत्ता उपभोगणा-या शिवसेनेच्या नेत्यांनी करदात्यांच्या खिशातून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हा खर्च केल्यामुळे सर्वत्रच असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांचा निषेध करत मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी हा खर्च मनसे स्वत: उचलेल, असे जाहीर केले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यविधीसाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला होता. अंत्यविधीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होणार असल्यामुळे येथील सुरक्षेसाठी पोलिस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी शिवाजी पार्कवर सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी व इतर व्यवस्था पुरवणे अत्यंत आवश्यक असल्याचे महापालिकेला सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने मेसर्स बसेस डिजिटल सिस्टीम या कंपनीतर्फे ही सुविधा पुरवली. त्यासाठी चार लाख ९९ हजार ४४० रुपये खर्च केले. हा खर्च आयुक्तांच्या अखत्यारीत करण्यात आला असून, याबाबतचा प्रस्ताव केवळ माहितीसाठी स्थायी समितीपुढे मांडण्यात
आला आहे. त्यामुळे यासाठी सुमारे पाच लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीतून खर्च केल्याचे उघड झाले आहे.

याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाल्यानंतर एकच असंतोष पसरला. त्यावर मनसेचे गटनेते दिलीप लांडे म्हणाले की, बाळासाहेबांच्या अंत्यविधीसाठी राज्याच्या गृहखात्याने परवानगी दिली. त्यामुळे त्यांनीच यावर पैसे खर्च करणे आवश्यक होते. यासाठी महापालिकेला खर्च करायला लावणे चुकीचे आहे. त्यानंतर आयुक्तांनीही स्वत:च्या अधिकारात हा खर्च करायला हवा होता. त्याची जाहीर माहिती स्थायीपुढे आणण्याची गरज नव्हती. त्यामुळे आयुक्तांनी एकप्रकारे बाळासाहेबांची बदनामीच केली असून, ही बदनामी शिवसेनेचे नेते खपवून घेत असले तरी मनसे ती खपवून घेणार नाही, असा इशारा लांडे यांनी दिला.

अंत्यविधीचा खर्च शिवसेनेचाच
शिवाजी पार्क मैदानात अंत्यविधीसाठी शिवसेनेने खर्च केला आहे. परंतु सीसीटीव्ही, एलईडी व इतर व्यवस्था पुरवण्यासाठी पोलिसांच्या सूचनेनुसार महापालिकेने खर्च केला आहे. पण त्याची कल्पना पक्षाला देण्यात आली नव्हती, असे महापौर सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.

खर्च महापालिकेच्या नोंदीवर राहणार
महापालिकेने सीसीटीव्ही, एलईडी व इतर व्यवस्था पुरवण्यासाठी निविदा न मागवता कंपनीला काम दिले. त्याची रक्कमही देण्यात आली आहे. पण आता जर कोणी व्यक्ती अथवा पक्ष हा खर्च देणार असेल तर ती महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल. पण तो अन्य महसुलात दर्शवला जाईल. परंतु हा खर्च महापलिकेने यापूर्वीच केला असल्यामुळे पैसे दिले तरी ही नोंद पुसली जाणार नाही, असे महापालिकेच्या लेखा विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

Read More »

'एलबीटी' लागू होण्यापूर्वीच उधळपट्टी

एलबीटी लागू करण्यास व्यापारी वर्गाकडून तीव्र विरोध होत असला तरी मुंबई महापालिकेने एक ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला आहे.

मुंबई - मुंबईसह राज्यांतील महापालिकांमध्ये जकातऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यास व्यापारी वर्गाकडून तीव्र विरोध होत असला तरी मुंबई महापालिकेने एक ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला आहे. 'एलबीटी'ची आकारणी करण्यापूृर्वी त्याबाबत अभ्यास करण्यासाठी महापालिकेने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची नेमणूक केली असून, त्यासाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. देशभरात याबाबत होणाऱ्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी विमान प्रवासखर्चासाठी लाखो रुपयांची ही उधळपट्टी केली जाणार आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार, मुंबई महापालिकेने येत्या एक ऑक्टोबरपासून जकातीऐवजी 'एलबीटी' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या करप्रणालीमुळे सध्याच्या जकातीमधील अडथळे दूर होऊन माल आणण्याची प्रक्रिया सुलभपणे पार पडेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने 'एलबीटी'ची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

जकातकराऐवजी 'एलबीटी'ची आकारणी करताना होणा-या बदलांचा अभ्यास करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ही संस्था एप्रिल ते डिसेंबर २०१३ या नऊ महिन्यांच्या कालावधीत आपला अहवाल सादर करेल. यासाठी या संस्थेवर २५ लाख ९५ हजार ६०० रुपये रुपये खर्च केले जाणार आहेत. देशभरात 'एलबीटी'बाबत आयोजित केल्या जाणा-या कार्यशाळा, कार्यक्रम व मेळाव्यांना हजर राहण्यासाठी अभ्यासगटातील सदस्य, कर्मचारी, संशोधक व सहयोगी यांच्या विमान प्रवासासाठी हा खर्च करण्यात येणार आहे, असे करनिर्धारण व संकलन विभागाने स्पष्ट केले आहे.टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने त्यांच्या अटी व शर्तीमध्ये एकूण खर्चाच्या ३० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे त्यासाठी आणखी आठ लाख ७४ हजार रुपये, असे एकूण सुमारे ३५ लाख रुपये खर्च करण्यास महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरी मागितली आहे. त्यामुळे 'एलबीटी' लागू होण्यापूर्वी लाखो रुपयांची उधळपट्टी सल्लागारांवर केली जात असल्याचे दिसून येत आहे.

Read More »

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी चौघांविरुद्ध दोषारोपपत्र

मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय चौकशी यंत्रणेने (एनआयए) बुधवारी विशेष न्यायालयात चार आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.

मुंबई – मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी राष्ट्रीय चौकशी यंत्रणेने (एनआयए) बुधवारी विशेष न्यायालयात चार आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. पण, 'एनआयए'ने ठरलेल्या मुदतीत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने मुख्य सूत्रधार धनसिंग चौधरी याला २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

'एनआयए' बुधवारी लोकेश शर्मा, धनसिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर या चौघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. त्यांच्याविरोधात खून आणि भारतीय दंडविधान आणि स्फोटके कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. तर या प्रकरणीतील संशयित आरोपी रामचंद्र कालसंगरा ऊर्फ रामजी, संदीप डांगे आणि अमित हलका अजूनही फरारी आहेत.

या स्फोटांचा मुख्य सूत्रधार धनसिंग याला अटक केल्यानंतर 'एनआयए'ने त्याच्याविरोधात ४५ दिवसांत विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक होते. पण मुदतीत दोषारोपपत्र दाखल न केल्याने 'एनआयए'ने पुन्हा २० दिवासांची मुदत मागून घेतली होती. पण तरीही 'एनआयए'ने दोषारोपपत्र दाखल केले नाही. यामुळे त्याचा जामीन मंजूर करण्याची त्याचे वकील जे. पी. मिश्रा यांनी केलेली मागणी विशेष न्यायालयाने मान्य केली. त्याला न्यायालयाने २५ हजार रुपयांचा जामीन दिला असल्याचे अ‍ॅड. मिश्रा यांनी सांगितले.

Read More »

अधिका-यांची मजा अन् कर्मचा-यांना सजा

एसटीच्या कर्मचा-यांच्या पगारवाढीचा प्रश्न ताटकळत ठेवणा-या अधिका-यांनी मात्र आपल्या भत्त्यांमध्ये भरघोस वाढ करून घेतली आहे.
मुंबई – एसटीच्या कर्मचा-यांच्या पगारवाढीचा प्रश्न ताटकळत ठेवणा-या अधिका-यांनी मात्र आपल्या भत्त्यांमध्ये भरघोस वाढ करून घेतली आहे. त्यांना रजा प्रवासभत्ता नऊ हजारांपासून २० हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे. वैयक्तिक भत्त्यातही ९०० ते १२०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यातील पगारापासून याची अंमलबजावणी होईल. याबाबतचा प्रस्ताव एसटी तोटय़ात असल्याने दोन वेळा फेटाळला गेला होता. मात्र, व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्या मेहरबानीने तोच प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान याला कामगार संघटनांनी विरोध केला आहे.

एकीकडे एसटी तोटय़ात आहे. गेल्या महिन्याचा पगार देण्यासाठीही एसटीकडे पैसे नव्हते. राज्य सरकारने २०० कोटी दिल्याने गेल्या महिन्यात कर्मचा-यांचा पगार होऊ शकला. असे असतानाही एसटीची बाजू सावरून घेण्याची जबाबदारी असलेल्या व्यवस्थापकीय संचालकांनीच अधिका-यांच्या भत्त्यात भरघोस वाढ केली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळावर जादा बोजा पडणार आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांचे हे भत्ते दुप्पट झाले आहेत. त्यानुसार रजा प्रवासीभत्ता हा वेतनश्रेणी नुसार ९०००, १२०००, १६००० आणि २०,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच वैयक्तिक भत्त्यात ९००, १०००, ११०० आणि १२०० रुपयांची वाढ देण्यात येणार आहे. आगार व्यवस्थापकांच्या भत्त्यात २५० ते ६०० रुपये वाढ करण्यात येणार आहे. एकीकडे सर्वसामान्य कर्मचा-यांच्या पगारवाढीवरून ओढाताण करणा-या अधिका-यांनीच स्वत:च्या पगारवाढीबाबत मात्र हात ढिले सोडले. वातानुकूलित दालनात बसून निर्देश देणा-या या अधिका-यांच्या भत्त्यात झालेली वाढ ही एसटीला ख-या अर्थाने पुढे नेणा-या कर्मचा-यांवर अन्याय करणारीच आहे, अशी भावना कर्मचा-यांमध्ये व्यक्त होत आहे.

Read More »

शाळेची घंटा खणखणणार १७ जूनपासून

राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा १७ जूनपासून सुरू होणार आहेत.
मुंबई – राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा १७ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भातील तापमान लक्षात घेऊन येथील शाळा २६ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.

३० एप्रिल २००७च्या सरकारी निर्णयाप्रमाणे सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात सुधारणा करून विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा १७ जून रोजी सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. सध्या राज्यात एक लाख तीन हजार ६२५ शाळा असून यापैकी ६७ हजार ७१७ शाळा या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आहेत. २१ हजार २६१ शाळा या अनुदानित आणि १३ हजार ९८८ शाळा या विनाअनुदानित आहेत.

Read More »

सुंदर दिसणं ठरतंय धोकादायक?

सुंदर दिसणे किती धोक्याचे ठरू शकते याचा प्रत्यय सध्या राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणा-या काही महिलांना येत आहे.
मुंबई – सुंदर दिसणे किती धोक्याचे ठरू शकते याचा प्रत्यय सध्या राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणा-या काही महिलांना येत आहे. वाहतूक विभागातील एका अतिवरिष्ठ अधिका-याकडून महिला अधिका-यांना हेरून त्यांच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार एसटी महामंडळात घडला आहे. या अधिका-याची अरेरावी दिवसेंदिवस वाढल्याने शेवटी तीन महिलांनी व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. संबधित अधिका-याविरुद्ध तात्काळ कडक कारवाई करावी, अशी लेखी मागणी या पीडित महिला अधिका-यांनी केली आहे.

गेल्या काही वर्षापासून एसटीच्या वाहतूक विभागात हा प्रकार होत आहे. ज्या महिला वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या अमिषांना बळी पडत नाहीत, त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. अब्रू वेशीवर टांगली जाऊ नये, या भीतीने त्या अनेक वर्षे गप्प बसल्या होत्या. या काळात त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवरून त्रास देण्याचे उद्योग सुरू होते. मेमो देणे, कामात व्यत्यय आणणे, चुकीचे शेरे मारणे, एकटीलाच दालनात बोलावले जात होते. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बसून हा वाहतूक अधिकारी महिला कर्मचा-यांना आपली ओळख मोठी आहे. तुम्ही माझे काही करू शकत नाही, अशा पद्धतीनेही धमकावत असल्याचे पीडित महिला अधिकारी सांगतात. विशेष म्हणजे हा अधिकारी दोन महिन्याने निवृत्त होणार आहे. दरम्यान, धमकावण्याचे आणि त्रास देण्याचे प्रकार वाढतच गेल्यामुळे शेवटी लेखी तक्रारीचा मार्ग या महिलांनी अवलंबला आहे.

हा धक्कादायक प्रकार असून या विरुद्ध एसटी महामंडळ संबधित अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करते की, हे प्रकरण दाबून काही घडलेच नाही, असा आव आणते हे पाहावे लागणार आहे. मात्र काही झाले तरी शेवटपर्यंत लढण्याचा आणि त्या अधिका-याला अद्दल घडवण्याचा निर्धार पीडित महिलांनी 'प्रहार'शी बोलताना व्यक्त केला.

>वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिका-याचे चाळे
>महिला अधिका-यांकडे लैंगिक सुखाची मागणी
>व्यवस्थापकीय संचालकांकडे तीन महिलांच्या लेखी तक्रारी
>न ऐकणा-या महिलांना कारवाईची दिली जाते धमकी

तक्रारींना केराची टोपली!
पीडित महिलांनी लैंगिक शोषणाबाबत एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे यापूर्वी तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता लेखी तक्रार द्यावी लागत असल्याचे पीडित महिलांनी सांगितले. काही महिलांनी तर आपले विभाग बदलण्याची मागणीही केल्याचे समजते. मात्र वरिष्ठांकडून त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.

Read More »

गडनदीमध्ये सोडले शिवडाव धरणाचे पाणी

कणकवली पंचायत समितीने यावर्षी तालुक्यामध्ये प्रत्येक वहाळ व नदीवर साडे आठशे कच्चे बंधारे बांधले.

कणकवली – कणकवली पंचायत समितीने यावर्षी तालुक्यामध्ये प्रत्येक वहाळ व नदीवर साडे आठशे कच्चे बंधारे बांधले. त्याचा फायदा परिसरातील विहिरी आणि मुख्य पाण्याच्या उद्भवाला झाला. त्यामुळे मे महिन्याच्या अखेपर्यंत हे उद्भव प्रवाहित राहिले. त्यामुळे शेर्पे, कुरंगवणे अशा भौगोलिकदृष्टय़ा उंचावर असलेले गाव वगळता तालुक्यातील अनेक ठिकाणी कच्च्या बंधा-यांचा फायदा पाणी सोडवण्यासाठी झाला.

तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी काही वाडी-वस्त्या वगळल्यास मुबलक पाणीसाठा आहे. कणकवली शहरामध्येही यंदा गडनदीवर मराठा मंडळ येथे बांधलेल्या केटी बंधा-यामुळे पाणीटंचाई संपुष्टात आली. या बंधा-यांमुळे शहराला पाणीपुरवठा करणा-या विहिरीचा पाझर वाढला. तर सांगवे, हरकुळ, कनकनगर येथील बंधा-यांमुळे परिसरातील गावांनाही पाण्याची सोय झाली. तसेच केटी बंधा-यातील पाणी गडनदीमध्ये सोडले. त्यामुळे किना-यावरील गावांची पाण्याची समस्या सुटली.

गतवर्षी गडनदी कोरडी पडल्याने शिवडाव धरणाचे पाणी नदीमध्ये सोडले होते. यावर्षी तीवट्रंचाई तीव्र नसली तरी शिवडाव धरणातील पाणी गडनदीपात्रात सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर सांगवे आणि हरकूळ येथील बंधा-यातील काही प्रमाणात पाणी गडनदी पात्रात सोडण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील नळ पाणी योजना मराठा मंडळनजीक बांधलेल्या बंधा-यामुळे सुस्थितीत चालू आहे. परिसरातील गावांना पाण्याची समस्या उद्भवली त्यानंतर ग्रामस्थांच्या वाढत्या मागण्यांमुळे धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष गोटय़ा सावंत यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे हरकूळ आणि सांगवे येथील केटी बंधाऱ्यांमधून काही प्रमाणात पाणी नदीप्रवाहात सोडले. त्यामुळे भागातील जनावरांना पाण्याची सोय झाली. तसेच परिसरातील विहिरींचा पाणीसाठा वाढल्याने किरकोळ स्वरूपात भासणारी पाण्याची टंचाईही संपुष्टात आली.

गडनदी ही मे महिन्याच्या अखेरीस पाण्याविना कोरडी पडते. त्यामुळे लोकांप्रमाणे जनावरे आणि पक्ष्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागते. म्हणूनच यावर्षी शिवडाव येथील धरणाचे पाणी गडनदीत सोडण्यासाठी प्रयत्न झाले. आणि गतवर्षीप्रमाणे यंदा कणकवलीवासीयांना पाण्याची समस्या भासली नाही. मराठा मंडळ येथे गडनदीपात्रात हजारो लिटर पाणी साठवून बंधारा बांधला त्यामुळे संपूर्ण कणकवली शहराची पिण्याच्या पाण्याची तहान पूर्ण झाली. केटी बंधा-यातील बॅक वॉटर आणि कणकवली नळपाणी योजनेसाठी असलेल्या विहिरीची पाण्याची पातळी समांतर रेषेत आली. त्यामुळे शहराला पाण्याचा प्रश्न भेडसावला नाही. तर या बंधा-यामुळे आशिये मठ, वागदे या परिसरातील जवळपासच्या भागालाही पाण्याची टंचाई भासली नाही. अशा पद्धतीने गडनदीवरील बंधारे पाणीटंचाई रोखण्यास वरदान ठरले आहेत.

Read More »

स्पाइसमनच्या सतर्कतेने अनर्थ टळला

तुळजापूर येथील रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी भद्रावती ऑर्डिनन्स फॅक्टरी येथून गोहाटीकडे दारुगोळा नेणा-या मालगाडीच्या दोन डब्यामध्ये असलेल्या दारुगोळ्याने पेट घेतल्याचे झेंडा दाखवणा-याच्या लक्षात येताच त्याने वेळीच स्टेशन मास्तरांना कळवल्याने मोठा अनर्थ टळला.
वर्धा – जिल्ह्यातील तुळजापूर येथील रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी भद्रावती ऑर्डिनन्स फॅक्टरी येथून गोहाटीकडे दारुगोळा नेणा-या मालगाडीच्या दोन डब्यामध्ये असलेल्या दारुगोळ्याने पेट घेतल्याचे झेंडा दाखवणा-याच्या लक्षात येताच त्याने वेळीच स्टेशन मास्तरांना कळवल्याने मोठा अनर्थ टळला. नाहीतर ही गाडी बर्निंग ट्रेन व्हायला वेळ लागला नसता. यातील आग आटोक्यात आणणे हाताबाहेर गेले असते. राष्ट्राची संपत्ती असलेली अमूल्य स्फोटके आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती.

ही घटना सोमवारी साडेसातच्या सुमारास घडली. ४२ डब्यांची मालगाडीतील (इंजिन. २९२३ क्रमांकांच्या) मधल्या दोन डब्यात आग लागून धूर निघत असल्याचे झेंडा दाखवणाऱ्या स्पाइसमनला दिसले. त्याने लगेच या घटनेची माहिती स्टेशन मास्तरांना दिली. त्यामुळे ही गाडी तुळजापूर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. लगेच आग लागलेल्या दोन्ही डब्यांसह बाजूचा एक असे तीन डबे वेगळे करून आउटरला घेऊन बाकी गाडी पुढे रवाना करण्यात आली. तोवर या दोन डब्यांमधून स्फोट होणे सुरू झाले. रात्री दहाच्या दरम्यान पुलगाव येथून दोन आणि भद्रावती येथून दोन आणि वर्धाचे दोन असे एकंदर सहा बंब घटनास्थळी पोहोचले आणि ही आग आटोक्यात आली. ही कारवाई अतिशय वेगाने करण्यात आली.

संरक्षण खात्याच्या अंतर्गत येणा-या या दारुगोळा खात्याच्या मालागाडीची ने-आण अतिशय सावधानपूर्वक केली जात असते. या गाडीतील डब्यात ज्वलनशील व्हाइट फॉस्फरस हे रसायन असल्याची माहिती पुढे आली. स्फोटकांना लागलेली आग प्रखर उष्णतेने लागली असावी असा कयास आहे, मात्र संबंधित खात्याकडून यास दुजोरा मिळाला नाही. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Read More »

हवाला प्रकरणाची शक्यता आढळल्यास खेळाडूंची चौकशी

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खेळाडूंचा हवाला रॅकेटशी संबंध असल्याचे आढळल्यास त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याबाबतचा निर्णय मुंबई पोलिस घेतील, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केले.
मुंबई – स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या खेळाडूंचा हवाला रॅकेटशी संबंध असल्याचे आढळल्यास त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याबाबतचा निर्णय मुंबई पोलिस घेतील, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केले.

पाटील यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीत मुंबई पोलिस विरुद्ध दिल्ली पोलिस, अशी चढाओढ लागल्याच्या वृत्ताचे त्यांनी या वेळी खंडन केले. आयपीएल क्रिकेट सामन्यांतील स्पॉट फिक्सिंगचे आणखी धागेदोरे शोधण्याच्या कामी दोन्ही महानगरांतील पोलिस दल एकत्रितपणे आणि समन्वयाने कामगिरी करत आहेत. त्यांच्यात कोणतीच स्पर्धा नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

'राजस्थान रॉयल्स्'चा गोलंदाज श्रीसंत आणि अन्य खेळाडूंच्या हालचालींची मुंबई पोलिसांना कल्पना होती. त्यांचा ठावठिकाणाही पोलिसांना माहीत होता, असे पाटील यांनी सांगितले. मुंबई पोलिस अत्यंत सक्षमपणे आणि तत्परतेने काम करत असल्याचा निर्वाळा गृहमंत्र्यांनी दिला.

मराठी अभिनेत्रीचा समावेश नाही
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मराठी अभिनेत्रीच्या समावेशाचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत खंडन केले. पोलिसांकडून मी याबाबत माहिती घेतली आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कोणत्याच मराठी अभिनेत्रीचा संबंध आढळलेला नाही, अशी माहिती मला पोलिसांनी दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Read More »

कुडूसमध्ये वार्षिक बाजार सुरू

शंभर वर्षापूर्वीपासूनची परंपरा असलेल्या कुडूस वार्षिक बाजाराला सोमवारपासून सुरुवात झाली.

कुडूस - शंभर वर्षापूर्वीपासूनची परंपरा असलेल्या कुडूस वार्षिक बाजाराला सोमवारपासून सुरुवात झाली. हा बाजार १५ दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे. या बाजारात विक्रीसाठी आलेल्या मालाचे भाव निश्चित करण्यात आले असून, ठरलेल्या बाजारभावापेक्षा जास्त दराने माल विकत घेऊ नये, असे आवाहन सरपंच मिलिंद चौधरी यांनी केले आहे.

वाडा, भिवंडी, शहापूर, विक्रमगड आदी तालुक्यांतील शेतकरी पावसाळयात लागणा-या वस्तूंची पावसाळयापूर्वी साठवण करून ठेवतात. शेतक-याना लागणा-या या वस्तू विकत घेता याव्यात, यासाठी हा वार्षिक बाजार भरत असतो. या बाजारात नाशिक, इगतपुरी, घोटी, सिन्नर येथील व्यापारी मसाल्याचे पदार्थ, कांदा, बटाटे, तंबाखू, घोंगडी इत्यादी वस्तू विकण्यासाठी घेऊन येत असतात.

यंदाच्या बाजारात लाल लसूण ७० रुपये किलो, तर सफेद लसूण ४५ रुपये किलो, हळद १२०, धने ११०, राई ४५, मेथी ५०, जिरे १६०, खोबरे ६४, ओवा १२०, शेपू ६०, राजिणे ११०, कांदा ७०० रुपये प्रति क्विंटल असे भाव निश्चित करण्यात आले आहेत. हे भाव पंच कमिटीतील ज्येष्ठ ग्रामस्थ व व्यापारी मंडळ बाजार समितीने निश्चित केले आहेत

Read More »

'बेस्ट'चा पांढरा हत्ती

'आधीच दुष्काळ, त्यात तेरावा महिना' अशीच काहीशी अवस्था सध्या बेस्टच्या ताफ्यात असलेल्या वातानुकूलित गाडयांची झाली आहे.

मुंबई - 'आधीच दुष्काळ, त्यात तेरावा महिना' अशीच काहीशी अवस्था सध्या बेस्टच्या ताफ्यात असलेल्या वातानुकूलित गाडयांची झाली आहे. वातानुकूलित गाडया आधीच तोटयात असताना, आता त्यांच्यात बिघाड होण्याचे प्रमाणही वाढले असल्याने बेस्टसाठी या गाडय़ा म्हणजे 'पांढरा हत्ती' ठरले आहेत. विशेष म्हणजे या गाडया कमी धावत असतानाही त्यांच्यातील बिघाडाचे प्रमाण मात्र अधिक आहे.

बेस्टच्या ताफ्यात २९० वातानुकूलित गाडया आहेत. गेल्या वर्षी या गाडया १ कोटी ४१ लाख किलोमीटर चालल्या. त्यात १ हजार ६९५ वेळा बिघाड झाला. तर या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत ८० हजार किलोमीटरच धावल्या आहेत. मात्र बिघाड होण्याचे प्रमाण १ हजार २०२ एवढे आहे. सेरिटा आणि अशोक लेलँड कंपनीच्या असलेल्या या गाडयापैकी २८२ गाडया सेरिटा कंपनीच्या आहेत. या कंपनीच्या गाडया बंद पडण्याचे प्रमाण मोठे आहे. या गाडय़ा परदेशी बनावटीच्या असल्याने त्यांचे बिघडलेले भाग परदेशातून आयातकरावे लागतात.यात तीन महिन्यांचा कालावधी जातो.

२०११-१२ या वर्षात वातानुकूलित गाडयात १ हजार ६९५ वेळा बिघाड झाल्याचे समोर आले आहे. तर २०१२-१३ मध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार १ हजार २०२ वेळा या गाडयात बिघाड झाला आहे. मार्चपर्यंतची आकडेवारी समोर आल्यास हा आकड आणखी वाढू शकतो. या गाडयांचा देखभाल खर्च न परवडणारा असल्याने आता बेस्टला २० वातानुकूलित गाडया आपल्या ताफ्यातून काढाव्या लागणार आहेत. आयुर्मर्यादेआधीच या गाडयांचे बिघडण्याचे प्रमाणही जास्त असल्याने या गाडया पोसणे बेस्टला परवडणारे नाही. या बाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत मांडण्यात आला असून, यावर पुढील बैठकीत चर्चा होणार आहे.

Read More »

अवैध वाळू उपसा करणारे ३२ ट्रक जप्त

पैठण येथे गोदावरीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे तब्बल ३२ ट्रक औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी जप्त केले असून, ३० ट्रकचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
औरंगाबाद – पैठण येथे गोदावरीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे तब्बल ३२ ट्रक औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी जप्त केले असून, ३० ट्रकचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूरपासून ते शहागडपर्यंत गोदावरी नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणावर वाळूचा अवैधरीत्या उपसा होतो. ही वाळू औरंगाबाद तसेच नगर जिल्ह्यात जाते. वाळूमाफियांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून सुमारे आठवडाभरापूर्वी वैजापूर येथे उपजिल्हाधिकारी मुकेश भोगे यांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे महसूल अधिकारी आणि ग्रामीण पोलिस खडबडून जागे झाले आणि वाळूमाफियांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी सोमवारी दुपारी पैठण तालुक्यातील वाळूपट्टय़ांत अवैधरीत्या वाळू उपसा करणारे वाळून भरलेले ट्रक जप्त करण्यास सुरुवात करण्यात आली. वाळूने हे भरलेले ट्रक पैठण येथील पोलिस ठाण्याजवळ उभे करून ट्रकचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले असले तरी ही कारवाई आणखी किती दिवस सुरू राहील, याबद्दल शंकाच आहे. कारण यापूर्वीही अनेकदा कारवाई झालेली आहे; तथापि अवैध वाळू उपसा थांबलेला नाही.

Read More »

विदर्भ भाजला

गेल्या तीन दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे विदर्भ भाजून निघत आहे.
अमरावती – गेल्या तीन दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे विदर्भ भाजून निघत आहे. नागपूर शहरात बुधवारी ४७.९ सेल्सियस नोंदवले जाऊन विक्रम झाला आहे. चंद्रपूरला ४८.२, ब्रह्मपुरी ४७.६, अमरावती व वर्धा येथे ४७.५, गोंदिया ४६.१, वाशीम ४३.९ सेल्सीयस तापमान नोंदवले गेले. उष्णतेच्या लाटेने विदर्भातील जनजीवन होरपळत आहे.

उन्हापासून बचाव करण्यासाठी पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला आहे. उन्हाच्या झळा सहन करण्यापेक्षा स्थानिक रहिवासी घर व कार्यालयात राहणे पसंत करीत आहेत. जलतरण तलावावर सकाळी व संध्याकाळी झुंबड उडत आहे. ग्रामीण भागात उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी घरासमोर पाणी मारण्याचा प्रयोग केला जात आहे.

देशात सर्वोच्च तापमानाच्या बाबत राजस्थान आघाडीवर आहे. देशातील सर्वाधिक तापमानाच्या पहिल्या दहापैकी सात नोंदी राजस्थानमधील आहेत. उरलेल्या दोन नोंदी आहेत त्या ओदिशामधील तितलागड, तर एक नोंद आहे उत्तर प्रदेशातील गोंडा या ठिकाणची. अल्वर (५०.६ अंश), तितलागड (५०.१), धोलपूर (५०), गंगानगर (५०) या चार ठिकाणी तापमानाने ५० अंशांचा आकडा गाठला आहे. त्यानंतर पहिल्या दहामध्ये बाडमेर, गोंडा, दामोह, सिकर, टोंक या ठिकाणांचा क्रमांक लागतो.

Read More »

गोसे खुर्द प्रकल्पासाठी हजार कोटींचे पॅकेज

गोसे खुर्द पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित होणा-या १५ हजार १५५ कुटुंबांना पुनर्वसनापोटी एक हजार १९९ कोटी ६० लाख रुपये इतके आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई – भंडारा जिल्ह्यातील गोसे खुर्द पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित होणा-या १५ हजार १५५ कुटुंबांना पुनर्वसनापोटी एक हजार १९९ कोटी ६० लाख रुपये इतके आर्थिक पॅकेज देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

या पॅकेजनुसार २५ हजार २४६ खातेदारांना आणि तीन हजार ३६३ भूमिहीन शेतमजुरांना प्रतिहेक्टरी दोन लाख रुपये देण्यात येतील, नोकरीऐवजी त्या कुटुंबास २ लाख ९० हजार रुपये देण्यात येतील, याशिवाय गुरांचे गोठे बांधण्यासाठी १५ हजार रुपये, घर बांधणी अनुदान म्हणून प्रतिकुटुंब ८३ हजार ५०० रुपये तसेच पुनर्वसन अनुदान देण्यात येईल. या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ५१ गावठानात विविध अशा १८ नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम पूर्ण होऊनही केवळ प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर न झाल्यामुळे धरणात पाणीसाठा करणे शक्य झालेले नाही. या धरणाच्या पुढील कामाला गती देण्यासाठी तातडीने हे आर्थिक पॅकेज मंजूर केले असून, पुनर्वसन पॅकेजची अंमलबजावणीसाठी १२० अधिकारी व कर्मचा-यांचा विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

Read More »

कल्याण पालिकेतील सत्ताधा-यांची मलमपट्टी

रस्ते व पायवाटांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणा-या शिवसेना-भाजप युतीने स्थानिकांच्या जीवनाशी निगडित रुग्णालयातील सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने या बालिकेला जीव गमवावा लागला.

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील 'न्यूओ नेटल केअर युनिट' बंद असल्याने नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. या घटनेनंतर मलमपट्टी करण्यासाठी केडीएमसीतील सत्ताधारी जागे झाले असून, नवनिर्वाचित महापौर कल्याणी पाटील यांच्यासह पालिकेतील पदाधिका-यांनी बुधवारी रुग्णालयाची पाहणी केली.

रस्ते व पायवाटांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणा-या शिवसेना-भाजप युतीने स्थानिकांच्या जीवनाशी निगडित रुग्णालयातील सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने या बालिकेला जीव गमवावा लागला. त्यामुळे या बालिकेचा जीव जाण्याची ते वाट पाहत होते का, असा संतप्त सवाल शहरवासीयांतून उपस्थित होत आहे.

कल्याण-शिळ रस्त्यालगतच्या दावडी गावातील पवन गील यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १८ मे रोजी त्यांनी एका बालिकेला जन्म दिला. मात्र, शास्त्रीनगर रुग्णालयात 'न्यूओ नेटल केअर युनिट'ची सोय नसल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील शीव रुग्णालयात पाठवण्यात आले.

तिच्यावर तेथे उपचार न झाल्याने केईएम व वाडिया असा प्रवास करत पुन्हा शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. मात्र, वाटेतच बालिकेला मृत्यूने गाठले. तज्ज्ञ डॉक्टर्स व परिचारिकांअभावी शास्त्रीनगर रुग्णालयातील एनआयसीयू (पेडियाट्रिक वॉर्ड) गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे या बालिकेवर उपचार होऊ शकले नाहीत. तिला वेळीच उपचार मिळाले असते, तर तिचे प्राण वाचू शकले असते. प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर केडीएमसीतील सत्ताधा-यांची झोप उडाली. त्यामुळे उशिरा जाग आलेल्या शिवसेनेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाकडे धाव घेतली. शास्त्रीनगर रुग्णालयाच्या पाहणीत स्वच्छता, कर्मचा-यांच्या बदल्या, रुग्णांशी गैरवर्तणूक याविषयी त्यांनी माहिती घेतली. याप्रसंगी सभागृह नेते रवी पाटील, नगरसेवक दीपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, संजय पावशे आदी उपस्थित होते.

नवजात बालकाने पोटात 'शी' केल्याने त्याच्या फुप्फुसात संसर्ग झाला होता. बालरोगतज्ज्ञांनी अर्भकावर प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी त्याला शीव रुग्णालयात पाठवण्यात आले. बालरोगतज्ज्ञ व नर्स नसल्याने रुग्णालयातील एनआयसीयू (पेडियाट्रिक वॉर्ड) बंद आहे. फिजिशियन, सर्जन, स्टाफ व नर्सची संख्या अपुरी आहे. – रेखा सारस्वत, मुख्य वद्यकीय अधिकारी

गरीब रुग्णांचे हाल कायम
१९९५ रोजी केडीएमसीची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्या वेळी शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. आघाडीच्या सत्तेची अडीच वष्रे सोडली तर १९९५ पासून ते २०१३ पर्यंत पालिकेत शिवसेना-भाजप सत्तेवर आहे. पालिका क्षेत्रातील नागरिकांना उच्च दर्जाची रुग्णसेवा पुरवणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. मात्र, पालिकेच्या रुग्णालयाची अवस्था खूपच बिकट आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना महागड्या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. १५०० कोटी रुपये अर्थसंकल्प असलेली महापालिका ५०० कोटी रुपये केवळ रस्तेकामासाठी खर्च करत आहे. मात्र, सत्ताधा-यांना एवढय़ा वर्षात रुग्णालयातील सोयींकडे पाहता आले नाही.

Read More »

रायगडवाडीत पुरातन अवशेषांची पडझड

इतिहासाची साक्ष देणा-या रायगडवाडीतील मूर्ती, शिवलिंग व इतर शिवकालीन अवशेषांची दुरवस्था झाली असून, सरकार व पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

महाड – इतिहासाची साक्ष देणा-या रायगडवाडीतील मूर्ती, शिवलिंग व इतर शिवकालीन अवशेषांची दुरवस्था झाली असून, सरकार व पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडावर स्वराज्याचे तोरण बांधले. याच रायगडाच्या पायथ्याशी इतिहासाच्या आठवणी जागवणारे रायगडवाडी हे गाव आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या गावात शिवकाळातील अनेक पुरावे आढळतात. मात्र, हा पुरातन ठेवा जतन केला जात नसल्याने इतिहासाचाच विसर पडल्याची नाराजी शिवप्रेमींतून व्यक्त होत आहे. सात वाड्यांचे मिळून असलेले रायगडवाडी हे गाव शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे मानले जाते.

शिवाजी महाराज ज्या वेळी पुण्याहून रायगडाकडे येत, तेव्हा ते या गावातील 'झोलाई देवी'चे दर्शन घेऊनच रायगडची चढाई करत असत. येथे शिवकाळात मोठी लोकवस्ती होती. आजही येथे अस्तित्वात असलेले छोटे-मोठे बुरुज व तट इतिहासाची साक्ष देतात. ब्राह्मणवाडा, कुंभारबाव हे जुन्या नावानेच ओळखले जाते. रायगडवाडीत हेन्री ऑफजिडेन्ट आणि कर्नल प्रॉथर हे इंग्रज अधिकारी काही काळ वास्तव्यास होते. कुंभारबाव परिसरात आजही पुरातन अवशेष आढळतात. गावाच्या एका बाजूला फड असे नाव दिले आहे. तेथे काही जुन्या समाधीही आढळतात. येथे एक जुनी फळबाग व दगडी विहीर आहे. गावातील होळीच्या माळावर असलेली एक तोफ व लोखंडी गोळे आजही पाहावयास मिळतात. तसेच शिवकालीन शिवमंदिराचे अवशेष व कोरीवकाम काम केलेले पिंड तसेच आजूबाजूला पडलेले खांबही दिसतात. मात्र, ऐतिहासिक आठवणी जागवणा-या या पुरातन अवशेषांची देखभाल व दुरुस्ती राखली जात नसल्याने पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राज्य सरकारने या परिसराचा विकास करण्यासाठी प्रथम येथील ऐतिहासिक वास्तूंचे संशोधन करावे. हा ठेवा भावी पिढीला प्रेरणादायी ठरण्यासाठी त्याचे जतन करण्याची गरज आहे. -प्रभाकर सावंत, ग्रामस्थ

Read More »

'स्वा. सावरकर जयंती' निमित्त रविवारपासून विविध कार्यक्रम

'स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती'निमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई'स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती'निमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने २६, २७ आणि २८ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रविवार, २६ मे रोजी सुप्रसिद्ध पत्रकार नितीन शास्त्री यांनी संग्रहित केलेल्या भारत-चीन युद्धातील सुमारे २५० दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होईल. हे प्रदर्शन रात्री १० वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले असेल. २६ मे रोजी संध्याकाळी सुप्रसिद्ध लेखक आणि अर्थतज्ज्ञ गिरीश जाखोटिया यांचे 'स्वातंत्र्यवीर सावरकर आणि एकविसाव्या शतकातील दहशतवाद' या विषयावर व्याख्यान होईल.

या तीनदिवसीय महोत्सवात दुस-या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील काही वेधक घटना, प्रसंग सांगणा-या रंजक निवेदनासोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर रचित तसेच इतर मराठी, हिंदी, देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अजय मदन यांनी केले आहे. वर्षा भावे, सागर सावरकर, चैतन्य कुलकर्णी, शैलजा सुब्रह्मण्यम् आदी गायकांचा यात सहभाग असेल. हा कार्यक्रम संध्याकाळी ६.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होईल. तसेच मंगळवार, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार, स्मृतिचिन्ह पुरस्कारांचे वितरण स्मारकाचे अध्यक्ष डॉ. अरुण जोशी करणार आहेत. पुरस्कार वितरण समारंभानंतर १९६२च्या भारत-चीन युद्धात सहभागी झालेले कर्नल केशव पुणतांबेकर आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ६.३० वाजता होईल. 

Read More »

नागोठणेनजीक बस झाडावर आदळून तीन ठार

भरधाव लग्झरी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात तिघे ठार तर २९ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर घडली.

नागोठणे – भरधाव लग्झरी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात तिघे ठार तर २९ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. नागोठणेनजीक पळस गावाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत संदीप राणे (३५, रा. मालवण), सुहास गोडे (३२, रा. सोमलेवाडी देवगड), अतुल तावडे (३५, रा. बागडेआळी, कणकवली यांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या प्रवाशांत ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील रहिवाशांचा समावेश आहे.

मालवणजवळील मसुरा येथून मुंबईकडे निघालेली ही बस नागोठणेनजीक पळस गावाजवळ पहाटे चारच्या सुमारास पोहोचली. त्या वेळी तंद्रित असलेल्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. त्यानंतर सहा ते सात फूट खोल असलेल्या शेतात जाऊन कोसळली. हा अपघात घडला तेव्हा बहुतेक प्रवासी झोपेत असल्याचे अपघातातून बचावलेल्या विजय गोडे याने सांगितले. गोडे यांचा दीड वर्षाचा पुतण्याही या अपघातातून सुदैवाने बचावला आहे. मात्र, साहिलचे वडील सुहास गोडे या अपघातात ठार झाले आहेत, तर आई सुहासिनी गोडे या अत्यवस्थ आहेत. अपघातातील जखमींना पनवेल व मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नागोठणेतील प्राथमिक आरोग्य केंद्र व डॉ. सुनील पाटील खासगी रुग्णालयातही जखमींवर उपचार सुरू आहेत.

जखमींची नावे
सुहासिनी गोडे, सायली पेडणेकर, विनय राणे, दशरथ चव्हाण, फिलिप्स जॉन फर्नाडिस, इनेक्स फर्नाडिस, भिकाजी परब, आशाली लोबो, सिद्धेश जुवेकर, संजय पाटकर, फॉस्फू लोबो, इस्प्रण लोबो, प्रांजल शिंगाडे, यज्ञेश पाटकर, एक्स लोबो, ऐली लोबो, एक्सवर्ड फर्नाडिस, संतोष सावंत, एलिन सीके, अनंत पांचाळ, केदार जुवेकर, अपर्णा जुवेकर, पराग परब, विजय गोडे, साहिल गोडे, विजया गोडे, आकाश गोडे अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांतील आहेत. या अपघाताची चौकशी नागोठणे पोलिस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Read More »

मय्यपनची चौकशी होणार

चेन्नई सुपरकिंग्जचे संघमालक श्रीनिवासन यांचा जावई मय्यपनची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक चेन्नईला रवाना झाले आहे.
मुंबई – चेन्नई सुपरकिंग्जचे संघमालक श्रीनिवासन यांचा जावई मय्यपनची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक चेन्नईला रवाना झाले आहे. त्याशिवाय चेन्नई सुपरकिंग्ज संघातील खेळाडूंचीही यावेळी चौकशी केली जाणार आहे.

विंदू दारासिंग रांधवा याच्या चौकशीमध्ये विंदू मय्यपनसाठी सट्टा लावत असल्याचे उघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी मय्यपनच्या चौकशीसाठी समन्स जारी केला होता. मात्र मुंबईत येण्यासाठी मय्यपनने काही वेळ मागितला होता. चौकशी अधिक जलदरितीने व्हावी यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक चेन्नईला रवाना झाले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोणी याची पत्नी साक्षीचीही याप्रकरणी चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, विंदू आणि मय्यपन यांच्यातील संभाषणाची प्रत मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे. मय्यपनची बोलून झाल्यानंतर विंदू सट्टेबाज रमेश व्यास याच्या मदतीने आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावत असल्याचे उघड झाले आहे.

Read More »

'आयडॉल'चे ऑनलाइन प्रवेश जूनअखेर

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत जूनच्या शेवटच्या आठवडयापासून प्रवेश सुरू करण्यात येतील, अशी माहिती अधिका-यांकडून देण्यात आली.

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठीचे ऑनलाइन प्रवेश जूनअखेपर्यंत सुरू होणार आहेत. मुंबई विद्यापीठांतर्गत येणा-या अधिकाधिक विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी सहज प्रवेश मिळावा, याकरता 'आयडॉल'कडून मागील काही वर्षात अनेक योजना राबवल्या जात आहेत. गेल्या चार वर्षात आयडॉलमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या झपाटय़ाने वाढली असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षात ही संख्या आणखी वाढावी, यासाठी जूनच्या शेवटच्या आठवडयापासून प्रवेश सुरू करण्यात येतील, अशी माहिती अधिका-यांकडून देण्यात आली.

आयडॉलमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह विविध ३४ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात पदवीसाठी बी.., बी.कॉम., बी.एस्सी अभ्यासक्रमांच्या पाच शाखा, तर पदव्युत्तरच्या एमए., एमकॉम., एमएस्सी, एमसीए, पीजीडीएफएम., पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमांच्या ११ शाखांच्या विविध विषयांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जातील. या संदर्भात जूनअखेर अथवा जुलैच्या पहिल्या आठवडयात ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. ऑनलाइन प्रवेशासाठीची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

मागील शैक्षणिक वर्षात आयडॉलसाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ३० जुलैपासून सुरू झाली होती. ही प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यांत पूर्ण झाली होती. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून तब्बल ७५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक ३ ते १८ सप्टेंबरदरम्यान उपलब्ध करून देण्यात आले होते. यंदा आयडॉलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अधिकाधिक सुलभ जावी, यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

Read More »

श्रीनगरमध्ये लष्करचा दहशतवादी ठार

दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तैयब्बाचा दहशतवादी ठार झाला. हिलाल मोलवी असे त्या दहशतवाद्याचे नाव होते. 

संग्रहित छायाचित्र

श्रीनगर – दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तैयब्बाचा दहशतवादी ठार झाला. हिलाल मोलवी असे त्या दहशतवाद्याचे नाव होते.

गेल्या वर्षी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिलाल मुख्य सुत्रधार होता. श्रीनगर येथील नरपरिस्तान भागात पोलिस आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत हिलालला ठार मारण्यात आले अशी माहिती वरिष्ठ पोलिस महासंचालक सईद बुखारी यांनी दिली. या चकमकीत तीन पोलिसही गंभीर जखमी झाले आहेत. 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, चार पोलिस शहीद

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिसांची शहीद झाले आहेत.

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, बुधवारी पहाटेच्या सुमारास नागोठणेनजीक लग्झरी बसलेला झालेल्या अपघातात तिघा जणांचा नाहक बळी गेला आहे.

नागोठणे - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, बुधवारी पहाटेच्या सुमारास नागोठणेनजीक लग्झरी बसलेला झालेल्या अपघातात तिघा जणांचा नाहक बळी गेला आहे. या दुर्घटनेमुळे मृत्यूचा महामार्ग बनलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकमेकांना चकवा देण्याच्या नादात किंवा अवघड वळणावर हे अपघात घडत असून, मागील तीन महिन्यांत घडलेल्या विविध अपघातांत ५० हून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत.

राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. मात्र, ही अभियाने केवळ कागदोपत्रीच ठरत असून, महामार्गावरील अपघातांच्या घटना रोखण्यात अपयश येत आहे. सुरक्षा सप्ताहाऐवजी अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना अंमलात आणण्याची मागणीही जोर धरत आहे. गेल्या वर्षभरापासून पळस्पे ते इंदापूर या ८४ किमी अंतरावर सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे अपघात वाढल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

प्रवाशांची सुरक्षा वा-यावर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना कंत्राटदारांनी प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. महामार्गावर पळस्पे ते इंदापूर आणि पळस्पे ते पोलादपूरदरम्यान पहिला व पोलादपूर ते इंदापूर दरम्यान दुस-या टप्प्यात रुंदीकरणाचे काम सुरू आहे. महामार्ग रुंदीकरणातील एका बाजूकडील बहुतांश काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील जुन्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम केले जात आहे. मुंबई-गोवा महामार्ग दोन्हीकडे खोदण्यात आल्याने साइडपट्टीच राहिली नाही. रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला साइडपट्टी असल्याचे दिसते. त्यामुळे वाहनचालक रस्त्याच्या कडेला गेल्यावर हे अपघात होत असल्याचा अंदाज आहे. नवीन रस्त्यावरून जुन्या रस्त्यावर वळण्यासाठी अनेक ठिकाणी कंत्राटदारांकडून 'डायव्हर्जन' दाखवण्यात आले आहे. जेथे वळण तयार करण्यात आले आहे. तेथे दोन्हीकडून येणारी वाहने समोरासमोर येतात. त्या ठिकाणी दुभाजकांची गरज आहे. मात्र, काही ठिकाणी दुभाजक असले तरी 'रिफलेक्टर' नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दुभाजक दिसत नाही. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला सुरक्षापट्टी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर दिवसाकाठी हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. या रस्त्यावर काही ठिकाणी अरुंद व धोक्याची वळणे असल्याने अपघात वाढत आहेत.

अपघातांना निमंत्रण कशामुळे?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेल सोडल्यावर एकाही रस्त्यावर दुभाजक नाही. त्यामुळे दुचाकी व अन्य छोटी वाहने चालवणारे चालक 'ओव्हरटेक' करण्याच्या नादात वाहतूक कोंडी करतात. प्रत्येक जण एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघातांना निमंत्रण देत आहेत. रात्रीच्या वेळेस या महामार्गावर राज्य महामार्ग पोलिसांचा पुरेसा ताफा नसतो. वडखळ ते नागोठणे परिसरात रात्रीच्या वेळी अवजड वाहने नियमापेक्षा जादा वजन घेऊन जातात.

विविध दुर्घटनांतील बळी
>आठवडाभरापूर्वी पांडापूर-कासूनजीक तवेरा-जीप धडकेत तीन ठार, चार जखमी
>दोन दिवसांत झालेल्या दोन अपघातांत पाच जण ठार, २९ जखमी
>काही दिवसांपूर्वी गडबनजीक मोटारसायकल अपघातात दोन ठार

Read More »

करचुकवेगिरी प्रकरणी 'अँपल'ला दणका

आयपॅड आणि आयफोनची निर्मिती करणारी अँपल करचुकवेगिरी प्रकरणी वादात सापडली आहे.

वॉशिंग्टन – आयपॅड आणि आयफोनची निर्मिती करणारी अँपल करचुकवेगिरी प्रकरणी वादात सापडली आहे. जवळपास ४४ अब्ज डॉलरचा कर चुकवल्याचा ठपका अँपलवर ठेवण्यात आला असून याची चौकशी केली जात आहे. अब्जावधी डॉलर्सचा कर चुकवण्यासाठी अँपलने बनावट उपकंपनीचा आधार घेतला असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकन करप्रणालीतून करचुकवेगिरी करण्यासाठी अँपलने आपल्या उपकंपनीचा आधार घेतला. ही कंपनी आर्यलडमधील असल्याचे दाखवून त्यावर कंपनीने आपला नफा फिरवला असल्याचे या प्रकरणाची चौकशी -करणा-या सिनेटच्या समितीने म्हटले आहे. आर्यंलंडमध्येकर नसल्याने कंपनीचा कराचा पैसा वाचला, असे या समितीने म्हटले आहे. अँपलने या आर्यलडमधील कंपनीला २००९ ते २०१२ मध्ये ३० अब्ज डॉलरचा नफा झाला असल्याचे म्हटले आहे. मात्र तांत्रिकदृष्टय़ा ही कंपनी आर्यलडमधील असल्याने अमेरिकेत कर भरला नाही, तर २०११ मध्ये २२ अब्ज डॉलरवर कंपनी ०.५ टक्के कर भरणा केला होता.

कंपनीने अमेरिका आणि आर्यलडमधील करप्रणालीचा गैरफायदा घेतला आहे. तीन बनावट उपकंपन्यांच्या माध्यमातून अँपलने अमेरिकेत आणि इतर देशांमध्ये किमान पाच वर्षे कर विवरण सादर केलेले नाही. यामुळे अमेरिकन सरकारचे मोठे नुकसान झाले असल्याचे सिनेटचे म्हणणे आहे. गेल्या चार वर्षात कंपनीने किमान ४४ अब्ज डॉलरचा कर बुडवला असल्याचे सिनेटने म्हटले आहे. तर २०१२ मध्ये नऊ अब्ज डॉलरचा कर बुडवला आहे. यामुळे याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

कंपन्या केवळ कागदावरच!
अँपलच्या आर्यलडमधील तीन कंपन्या या कागदोपत्री असून यांचे कुठलेही कार्यालय नाही आणि यामध्ये कुठलाही कर्मचारी काम करत नाही. मात्र यांच्यामधून बँकिंग व्यवहार होत असल्याचे सिनेटने म्हटले आहे. यातील अँपल सेल्स इंटरनॅशनलने २००९ ते २०१२ मध्ये ७४ अब्ज डॉलरची विक्री केली असल्याचे दाखवले आहे.

आर्यलड सरकारशी साटेलोटे
अँपलच्या कर चुकवेगिरीची चौकशी करणाऱ्या सिनेटच्या समितीने अँपल आर्यलड सरकारशी दोन टक्के कर आकारण्याबाबत वाटाघाटी करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आर्यलडमध्ये आपल्या उपकंपन्या दाखवून कंपनीने आयरिश सरकारला दोन टक्के कर लागू करावा, अशी मागणी केली आहे. अमेरिकेच्या १२ टक्के कराच्या तुलनेत हा खूपच कमी आहे. अॅपल आणि आर्यलड सरकारमध्ये कराबाबत साटेलोटे सुरू असल्याचे या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

आरोप चुकीचे
कंपनीवर कर बुडवल्याचा करण्यात आलेला आरोप चुकीचा असल्याचे अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी म्हटले आहे. अमेरिकन सरकारसाठी कंपनी सर्वात मोठी करदाता आहे. २०१२ मध्ये कंपनीने कराच्या स्वरूपात सहा अब्ज डॉलर रोख भरले असल्याचे कुक यांनी म्हटले आहे. कंपनीने सर्व कर भरला असून या वर्षी यामध्ये वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.

Read More »

व्होडाफोनला भारतात १०,००० कोटींचा नफा

आघाडीची दूरसंपर्क कंपनी व्होडाफोन इंडियाला ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात १०,६४०.६ कोटींचा नफा झाला.

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – आघाडीची दूरसंपर्क कंपनी व्होडाफोन इंडियाला ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात १०,६४०.६ कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नफ्यामध्ये २४.५ टक्क्यांची वाढ झाली. त्याचबरोबर महसुलातही १० टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीला ३५,८८५.८ कोटींचा महसूल मिळाला आहे.

व्हॉइस आणि डेटामधून चांगला महसूल मिळत असल्याने दुहेरी आकडय़ात विकास झाला असल्याचे व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीयसंचालक मार्टेन पिटर्स यांनी सांगितले. महसूल आणि नफ्यात जरी वाढ झाली असली तरी कर वजा करता अजूनही नफा मिळवण्यात कंपनीला यश आलेले नाही.

२०११-१२ मध्ये कंपनीला ८,५४९.३ कोटींचा नफा झाला होता. तर ३२,५६४.३ कोटींचा महसूल मिळाला होता. गेल्या वर्षात डेटा सेवेमधून मिळणारा महसूल ५० टक्क्यांनी वाढला. कंपनीच्या एकूण महसुलाच्या तब्बल सात टक्के महसूल डेटामधून मिळतो. गेल्या वर्षात यातून १,९९८.८ कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान, बाजारातील हिस्सा वाढवण्यासाठी कंपनीकडून गुंतवणुकीवर भर दिला जाणार आहे. २००७ पासून कंपनीने भारतात ५७,००० कोटींची गुंतवणूक केली आहे. तर गेल्या वर्षी ४,७३०.१ कोटींची गुंतवणूक केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Read More »

'पीएफ'चे दावे निकाली काढण्यात मुंबई कार्यालये सुस्त

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) कांदिवली आणि वांद्रे कार्यालयातील दावे निकाली काढण्याची प्रक्रिया चांगलीच सुस्तावली आहे.

नवी दिल्ली – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) कांदिवली आणि वांद्रे कार्यालयातील दावे निकाली काढण्याची प्रक्रिया चांगलीच सुस्तावली आहे. एप्रिलमध्ये कांदिवली कार्यालयातून एकूण दाव्यांच्या केवळ १८ टक्के दावे निकाली काढण्यात आले असून देशातील इतर 'ईपीएफओ' कार्यालयांच्या तुलनेतील ही सर्वात निराशाजनक कामगिरी ठरली आहे.

'ईपीएफओ'च्या माहितीनुसार, इंदोर, दिल्ली, दक्षिण रायपूर आणि कोइंबतूर या कार्यालयांनी १०० टक्के दावे निकाली काढले तर भुवनेश्वर आणि वांद्रे या कार्यालयांनी एक महिन्याच्या कालावधीत अनुक्रमे १९.०९ टक्के आणि २८.१७ टक्के दावे निकाली काढले आहेत. कांदिवलीबरोबर जलपैगुडी आणि डेहराडून या कार्यालयांची दावे निकाली काढण्याची कामगिरी निराशाजनक ठरली.

भविष्य निर्वाह निधीचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी ईपीएफओ संघटनेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. सध्या सर्व यंत्रणा ऑनलाइन करण्यात आलेली आहे. ठरावीक मुदतीत दावा निकाली काढण्यासाठी संघटनेकडून नियमावली तयार करण्यात आलेली आहे. भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन, ठेवी आणि विम्याचे दावे ३० दिवसांत निकाली काढले जाणे आवश्यक आहे. पीएफ खातेधारकांना ई-पासबुकची सुविधाही देण्यात आलेली आहे, मात्र असे असतानाही निर्वाह निधीचे दावे निकाली काढण्यास विलंब होत असल्याचे खातेदारांमध्ये नाराजी आहे.

Read More »

इमिग्रेशन सुधारणा विधेयकाला मंजुरी

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अमेरिकेच्या इमिग्रेशन सुधारणा विधेयकाला मंगळवारी सिनेट ज्युडिशरी कमिटीने मंजुरी दिली.

वॉशिंग्टन – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अमेरिकेच्या इमिग्रेशन सुधारणा विधेयकाला मंगळवारी सिनेट ज्युडिशरी कमिटीने मंजुरी दिली. ३०० सुधारणा करून इमिग्रेशन विधेयक मंजूर करण्यात आले असून यामुळे जवळपास एक कोटी १० लाख नागरिकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यात २,६०,००० भारतीयांचा समावेश आहे. मात्र असे असले तरी माहिती आणि तंत्रज्ञानातील कंपन्यांना या विधेयकामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. अमेरिकन नागरिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची अट या सुधारणा विधेयकात घालण्यात आली आहे.

इमिग्रेशन विधेयकात ३०० सुधारणा करून इमिग्रेशन सुधारणा कायदा १३ मतांनी मंजूर करण्यात आला. सिनेट ज्युडिशरी कमिटीच्या मंजुरीनंतर हा कायदा १०० सिनेटच्या सभागृहात पाठवण्यात आला असून याला मंजूर होण्यासाठी ६० मतांची आवश्यकता आहे. इमिग्रेशनमधील सुधारणांचा अमेरिकन जनतेला मोठा फायदा होईल. अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या इमिग्रेशन प्रणालीमध्ये होणारा बदल हा देशासाठी ऐतिहासिक असल्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. कित्येक दशके आपल्या कुटुंबापासून विभक्त राहिलेल्यांचे प्रश्न नव्या सुधारणा विधेयकामुळे सुटणार आहेत. नव्या इमिग्रेशन विधेयकामुळे एक कोटी १० लाख लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे. यामध्ये २,६०,००० भारतीयांना अमेरिकन नागरिकत्व बहाल केले जाणार आहे. मात्र सुधारणा विधेयक आयटी कंपन्यांच्या मुळाशी येण्याची शक्यता आहे.

देशातील माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांचा सर्वाधिक महसूल हा अमेरिकेतून मिळतो. या कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतीयांना त्या ठिकाणी नोकरीसाठी ठेवतात. मात्र व्हिसासंदर्भातील नव्या नियमावलीने भारतीय कर्मचा-यांच्या संख्येवर मर्यादा येऊ शकते, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सुधारणा विधेयकामध्ये भारतीय आयटी कंपन्यांनी नोकरीत पहिल्यांदा कुशल अमेरिकन नागरिकांना प्राधान्य द्यावे. अमेरिकनांची संख्या कमी असल्यास किंवा ते उपलब्ध न झाल्यास ती कंपनी इतर देशातील कर्मचारी नियुक्त करू शकते, अशी अट घालण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकेत नोकरीसाठी आवश्यक असणा-या एच-१बी व्हिसाची संख्या १,१५,००० पर्यंत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

इमिग्रेशन व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वपूर्ण आहे. सिनेट सदस्यांनीही हे विधेयक तात्काळ मंजूर करावे. ज्यामुळे अमेरिकन नागरिकांना याचा फायदा होईल.- बराक ओबामा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

नोकरीत अमेरिकनांना प्राधान्य देण्याची अट
नव्या इमिग्रेशन सुधारणा विधेयकात अमेरिकेतील आयटी कंपन्यांतील नोक-यांमध्ये अमेरिकनांना प्राधान्य देण्याची अट घालण्यात आली आहे. अमेरिकन संबंधित पदांसाठी उपलब्ध नसतील, तेव्हा ती कंपनी इतर देशांतील कर्मचा-यांना एच-१बी व्हिसाच्या माध्यमातून नोकरीवर ठेवू शकते. यामुळे आयटी कंपन्यांना अमेरिकन नागरिकांना नोक-यांमध्ये प्राधान्य द्यावे लागणार हे निश्चित झाले आहे.

Read More »

विक्रमजीतने हादरवले

नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर हैदराबादचा कर्णधार कॅमेरॉन व्हाइटने प्रथम फलंदाजी करणे पसंत केले.
नवी दिल्ली - राजस्थान रॉयल्सचा मध्यम तेज विक्रमजीत मलिकच्या (२ विकेट) सुरुवातीच्या धक्क्यांमुळे आयपीएलच्या सहाव्या हंगामातील 'एलिमिनेटर'मध्ये बुधवारी हैदराबाद सनरायर्झची अवस्था दोन बाद तीन अशी बिकट झाली होती. मात्र शिखर धवन आणि कर्णधार कॅमेरॉन व्हाइटने डाव सावरल्याने १० षटकांत त्यांनी दोन बाद ४२ धावा केल्या.

नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर हैदराबादचा कर्णधार कॅमेरॉन व्हाइटने प्रथम फलंदाजी करणे पसंत केले. मात्र त्यांचा निर्णय तितका योग्य ठरला नाही. संधी मिळालेल्या विक्रमजीतने वैयक्तिक आणि डावाच्या पहिल्याच षटकात सलामीवीर पार्थिव पटेलला (१) संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात हनुमा विहारीला (१) केवॉन कूपरकडे झेल देण्यास भाग पाडले.

तत्पूर्वी, सनरायझर्सने एक बदल करताना आनंद राजनच्या जागी मध्यम तेज इशांत शर्माला संधी दिली. राजस्थानने विक्रमजीत मलिक आणि दिशांत याग्निकला अंतिम संघात स्थान दिले.

Read More »

भौमिक यांचा चर्चिल ब्रदर्सना रामराम

आय लीग फुटबॉलमधील एक संघ असलेल्या चर्चिल ब्रदर्सचे तांत्रिक संचालक सुभाष भौमिक यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

पणजी - आय लीग फुटबॉलमधील एक संघ असलेल्या चर्चिल ब्रदर्सचे तांत्रिक संचालक सुभाष भौमिक यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. संघ व्यवस्थापनाशी बिनसल्यानंतर भौमिक यांनी मंगळवारी चर्चिल ब्रदर्स क्लबचे मालक चर्चिल आलेमाव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

चर्चिल ब्रदर्सला दुस-यांदा आय लीग जेतेपद मिळवून देण्यात भौमिक यांचे मार्गदर्शन आणि सल्ला मोलाचा ठरला होता. मात्र आय लीग सामन्यांदरम्यान आलेमाव यांच्याशी त्यांचे मतभेद झाल्याचे समजते. भौमिक यांच्या मते, लढत सुरू असताना बदली फुटबॉलपटू पाठवण्यावेळी आलेमाव हस्तक्षेप करत होते. जेतेपद पटकावूनही मुदतवाढ न मिळणारे भौमिक हे चर्चिलचे दुसरे प्रशिक्षक आहेत. भौमिक हे ईस्ट बंगाल किंवा मॉहमेडन स्पोर्टिगशी करारबद्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी २००९ मध्ये चर्चिल ब्रदर्सला पहिलेवहिले आय लीग जेतेपद मिळवून देणारे सर्बियाचे प्रशिक्षक झोरान जोर्डजेविक यांनाही मुदतवाढ दिली गेली नव्हती.

Read More »

भारताची अपयशी सलामी

एएफसी महिलांचा आशियाई कपच्या पात्रता फेरी फेरीत गटवार साखळीत (ड गट) सलामीला भारताला म्यानमारकडून ०-२ असे पराभूत व्हावे लागले.

रामल्लाह (पॅलेस्टाइन) – एएफसी महिलांचा आशियाई कपच्या पात्रता फेरीत गटवार साखळीत (ड गट) सलामीला भारताला म्यानमारकडून ०-२ असे पराभूत व्हावे लागले. म्यानमारकडून झालेले दोन्ही गोल पूर्वार्धातील आहे. अल हुसेनी स्टेडियमवर मंगळवारी रात्री झालेल्या लढतीत पाचव्या मिनिटालाच नॅव फॅवने म्यानमारचे खाते उघडले. त्यानंतर २६व्या मिनिटाला खिन मोइ वाइने त्यात आणखी भर घातली. पुढच्याच मिनिटाला म्यानमारला आणखी एका गोलाची संधी होती. मात्र यी यी उचा सुरेख फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला.

कृत्रिम टर्फशी जुळवून घेण्यात भारताच्या फुटबॉलपटू अपयशी ठरल्या. सुरुवातीच्या गोलांनंतर भारतीय संघ दडपणाखाली आला. त्यातून ते शेवटपर्यंत सावरले नाहीत. पूर्वार्धात भारताला बरोबरीची संधी होती. मात्र स्ट्रायकर बाला देवीला कर्णधार ओइनम बेमबेम देवीकडे अचूक पास देता आला नाही.

दुस-या सत्रात भारताने आक्रमक खेळावर भर दिला. मात्र संधीचे सोने करण्यात त्यांना अपयश आले. गटवार साखळीतील दुस-या लढतीत गुरुवारी (२३ मे) भारताची गाठ तैवानशी पडेल. भारत-म्यानमारपूर्वी झालेल्या सलामीच्या लढतीत तैवानने यजमान पॅलेस्टाइनचा ६-० असा धुव्वा उडवला. मिडफिल्डर लिन या हॅनची हॅटट्रिक हे तैवानच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.

Read More »

चेन्नई सुसाट

आयपीएल-६च्या 'क्वालिफायर १'मध्ये मुंबई इंडियन्सना हरवत चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईला पराभूत व्हावे लागले तरी त्यांच्यासमोर आणखी एक संधी आहे.
नवी दिल्ली – आयपीएल-६च्या 'क्वालिफायर १'मध्ये मुंबई इंडियन्सना हरवत चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईला पराभूत व्हावे लागले तरी त्यांच्यासमोर आणखी एक संधी आहे.

सर्व आघाडय़ांवर चेन्नईची बाजी
आयपीएलच्या सर्वच्या सर्व सहा मोसमांत अंतिम चार संघांत चेन्नईने स्थान मिळवले आहे. त्यामुळे निर्णायक लढतींमध्ये कशी कामगिरी उंचवायची, हे ढोणी आणि सहकाऱ्यांना चांगले ठाऊक आहे. मंगळवारचा दिवस चेन्नईचा होता, असेच म्हणावे लागेल. त्यांनी सर्वच आघाडय़ांवर बाजी मारली. नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा होता. या मोसमात धावांचा पाठलाग करण्यात मुंबईचा हातखंडा असला तरी कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. सावध सुरुवात आणि त्यानंतर फटकेबाजीचे तंत्र फलंदाजांनी अवलंबले. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची सुरेख साथ लाभली. यात ढोणीचे नेतृत्वही कमालीचे प्रभावी ठरले.

हसीची पुन्हा एकदा निर्णायक खेळी
माइक हसीने बहारदार फलंदाजी करत चेन्नईच्या सर्वोत्तम वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. मुंबईविरुद्ध त्याने मुरली विजयसह ५२ धावांची सलामी दिली. मात्र ही सलामी झटपट नव्हती. दोघांच्या फलंदाजीत अधिक संयम दिसला. चेन्नईला शतकी मजल गाठायला १२.४ षटके ७६ चेंडू लागले. मात्र पुढील ९२ धावा त्यांनी अवघ्या ४२ चेंडूंत फटकावल्या. यावरून हसी आणि सुरेश रैनाने केलेल्या आतषबाजीचा अंदाज येतो. सावध सुरुवातीनंतर हसीने १० चौकार आणि दोन षटकारांसह ५८ चेंडूंत केलेली नाबाद ८६ तसेच पाच चौकार आणि तितक्याच उत्तुंग षटकारांसह ४२ चेंडूंतील रैनाच्या नाबाद ८२ धावांमुळे चेन्नईने आरामात एक बाद १९२ अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्येक वेळी इतक्या मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग सोपा नसतो, हेही खरेच.

स्मिथ खेळला, पण ..
ड्वायेन स्मिथची फटकेबाजी आणि त्यामुळे पहिल्या आठ षटकांत प्रति षटकामागे १० हून अधिक धावा पाहता मुंबई चांगली चुरस देईल, असे वाटले. मात्र स्मिथला बाद केल्यास सामन्यावर वर्चस्व मिळवता येईल, असे ढोणीने 'स्ट्रॅटेजी ब्रेक'मध्ये संघ सहकाऱ्यांना सांगितले होते. फटकेबाज स्मिथची विकेट जडेजाने घेतल्यानंतर सामना फिरला. दिनेश कार्तिक (११), कर्णधार रोहित शर्मा (८) आणि किरॉन पोलार्डला (२४) दमदार सुरुवातीचा फायदा उठवण्यात अपयश आले. ड्वायेन ब्राव्होसह रवींद्र जडेजाने (प्रत्येकी ३ विकेट) प्रभावी मारा केला. त्यात नऊ झेल टिपणाऱ्या क्षेत्ररक्षकांचीही त्यांना उत्तम साथ लाभली. चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर वाईट वाटल्याचे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. मात्र त्यांना आणखी एक (क्वॉलिफायर २) संधी आहे.

ऑरेंज आणि पर्पल कॅप चेन्नईकडे
सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजाला दिली जाणारी ऑरेंज आणि सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांला दिली जाणारी पर्पल कॅप चेन्नईने राखली आहे. मुंबईविरुद्ध नाबाद ८६ धावा करताना हसीने खिस गेलला (७०८ धावा) मागे टाकले. सध्या १६ सामन्यांत ७३२ धावा हसीच्या नावावर आहेत. ऑरेंज कॅप तोच मिळवणार, हे जवळपास निश्चित आहे. तीन विकेट घेणा-या मध्यमगती ब्राव्हो एकूण विकेटची संख्या २८ वर नेताना अव्वल स्थान राखले आहे. त्याच्यासमोर राजस्थान रॉयल्सच्या जेम्स फॉकनरचे (२६ विकेट) आव्हान आहे.

Read More »

गुंतवणूकदारांना अर्थमंत्र्यांचा दिलासा

निर्देंकांत झालेल्या घसरणीमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना अर्थमंत्र्यांनी दिलासा दिला आहे.

नवी दिल्ली – जागतिक बाजारातील दबावामुळे गुरुवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये ३५० अंशांची घसरण झाली. या घसरणीमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी जागतिक बाजारातील दबावामुळे सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे.मात्र त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष बीन ब्रेनेक यांनी स्टिम्यूलस पॅकेज काढून घेण्याची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांनी शेअर्स विकण्याचा सपाटा लावला. त्यामुळे पहिल्या सत्रात मुंबई शेअर बाजारात ३६५ अंशांची घट नोंदवली गेली. मात्र काही वेळानंतर निर्देशांकात पुन्हा वाढ दिसून आली.

भारतीय शेअर बाजारात नेहमी जागतिक बाजारातील घडामोडींप्रमाणे वाहावत न जाता निर्माण झालेल्या स्थितींचा अचूक अभ्यास केला जातो. त्यामुळे सध्या निर्माण झालेल्या स्थितीत गुंतवणूकदारांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जून आणि दुस-या सहामाहीत शेअर बाजारातील उत्साह परत येईल असा विश्वास अर्थमंत्री पी.चिदंमबरम यांनी व्यक्त केला.

मुंबई शेअऱ बाजारात आज झालेल्या घसरणीवर आमचे बारीक लक्ष आहे. ब्रेनेक यांच्या घोषणेमध्ये स्टिम्यूलस पॅकेज टप्प्याटप्प्याने काढून घेण्यात येईल असे स्पष्ट म्हटले होते. तरीही निर्देशांकात घट नोंदवली गेली, असे अर्थमंत्री म्हणाले.

Read More »

मुंबई पोलिसांची चेन्नईवारी फुकट

बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन आणि त्यांचा जावई गुरुनाथ मय्यपन त्यांच्या चेन्नईस्थित सिनोटाप रोड येथील घरी उपस्थित नसल्यामुळे गुरुवारी चौकशी होऊ शकली नाही.

चेन्नई – बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन आणि त्यांचा जावई गुरुनाथ मय्यपन त्यांच्या चेन्नईस्थित सिनोटाप रोड येथील घरी उपस्थित नसल्यामुळे गुरुवारी चौकशी होऊ शकली नाही. त्यामुळे मय्यपन यांच्या चौकशीसाठी तडकाफडकी चेन्नईत दाखल झालेल्या मुंबई पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी मय्यपन याला समन्स बजावला होता. मात्र मय्यपनने पोलिसांसमोर येण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या चार सदस्यांचे एक पथक मय्यपन यांच्या घरी दुपारी २.१५ मिनिटांनी दाखल झाले. मात्र मय्यपन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरच्या सुरक्षारक्षकांनी अडवल्यामुळे तब्बल २० मिनिटे मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या या पथकाला घराबाहेर वाट पहावी लागली. मात्र त्यानंतरही या दोघांची भेट होऊ शकली नाही. 

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू रांधवा याच्या चौकशीत मय्यपन यांचे नाव पुढे आले होते.

Read More »

जवानांच्या उत्कर्षासाठी….

भारतीय सैन्य दलाच्या गुडगाव येथील विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभाप्रसंगी उपस्थित असलेले पंतप्रधान मनमोहन सिंग

 

Read More »

शपथ घेताना नवे महालेखापाल

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे संरक्षण सचिव शशिकांत शर्मा यांना राष्ट्रपती भवनात महालेखापालपदाची शपथ दिली.

 

Read More »

यशशिखर गाठताना…

मनात जिद्द असली की ध्येय गाठता येऊ शकतं हे  ८० वर्षांच्या यूचिरो मिऊरा आजीबाईंनी सिद्ध केले आहे.मूळच्या जपानी असलेल्या या मिऊरा आजींनी माऊंट एव्हरेट पार करण्याचा विक्रम केला आहे.

Read More »

आंदोलन…

एअर इंडियाविरोधात आंदोलन करणारे पेटा संस्थेचे कार्यकर्ते

 

Read More »

पंतप्रधान-अर्थमंत्री एकत्र

राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या महालेखापाल पदाच्या शपथ सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी.चिदंबरम एकत्र आले होते.

 

Read More »

'फेसबुक'वरुन मैत्रिणीला गंडवले

ठाण्यातील तरुणीला 'फेसबुक'वर सोलापूरच्या तरुणाशी केलेली मैत्री महागात पडली आहे.

ठाणे- ठाण्यातील तरुणीला 'फेसबुक'वर तरुणाशी केलेली मैत्री महागात पडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून या तरुणाने संबंधित तरुणीला ४८ हजार रुपयांना गंडा घातला. त्यानंतरही त्याने पुन्हा पैशांची मागणी केल्याने 'डोळे उघडलेल्या' या तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सोलापूर येथे राहणा-या अविनाश दळवे याला अटक केली आहे.

ठाण्यात रहाणा-या एका २७ वर्षाच्या तरुणीची फेसबुकच्या माध्यमातून अविनाश या २५ वर्षाच्या तरुणाशी ओळख झाली. अविनाशनने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून ठाण्याला भेटायला येतो असे सांगितले. भेटायला आल्यावर त्याने या तरुणीकडून महत्त्वाचे काम आहे असे सांगून ४८ हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतरही या तरुणाने संबंधित तरुणीकडे आणखी पैशांचा तगादा लावला. तरुणीने आणखी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर अविनाशने तरुणीच्या आईवडिलांची हत्या करून स्वत:चेही 'बरेवाईट' करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने राबोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अविनाशला सोलापूरहून अटक केली आहे.

Read More »

अंपायर आसद रौफला चॅम्पियन्स ट्रॉफीतून डच्चू

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप असलेला पाकिस्तानचा अंपायर आसद रौफला आयसीसीने चॅम्पियन ट्रॉफीमधून गुरूवारी डच्चू दिला.

नवी दिल्ली- आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप असलेला पाकिस्तानचा अंपायर आसद रौफला आयसीसीने चॅम्पियन ट्रॉफीमधून गुरूवारी डच्चू दिला.

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळांडूना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या चौकशीत फिक्सिंग प्रकरणात आसद रौफचा सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे आयसीसीने लंडनमध्ये होणा-या  चॅम्पियन ट्रॉफीमधून रौफला डच्चू दिल्याचे सांगण्यात येते.

आयसीसीने दिलेल्या पत्रकात,  रौफला सहा जून ते २१ जूनपर्यंत होणा-या चॅम्पियन ट्रॉफीमधून वगळण्यात आले असल्याचे म्हटले आहे. रौफची मुंबई पोलिस चौकशी करत आहेत. अशावेळी रौफने तटस्थ राहणेच योग्य असल्याचे आयसीसीचे मुख्य अधिकारी डेविड रिचर्डसन यांनी सांगितले.

यापूर्वी, लिना कपूर नावाच्या मॉडेलशी काही वर्षे शारिरीक संबंध ठेऊन नंतर लग्नास नकार दिल्याचे रौफचे प्रकरण गेल्यावर्षी चांगलेच गाजले होते.

Read More »

स्वरक्षणासाठी भारत सक्षम- पंतप्रधान

संपूर्ण देशाचे संरक्षण करण्यास भारत सक्षम असल्याचा निर्वाळा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी दिला.

गुडगाव- त्रासदायक शेजारी लाभल्याने भारताला सुरक्षेविषयक विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मात्र मागील काही वर्षात देशाची संरक्षणक्षमता वाढली असून, महासागर क्षेत्रासह संपूर्ण देशाचे संरक्षण करण्यास भारत सक्षम असल्याचा निर्वाळा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी दिला.

''भारताला संरक्षणविषयक अनेक आव्हानांच्या सामना करावा लागत आहे. ही आव्हाने अटळ आहेत, कारण देशाला पारंपरिक, योजनात्मक व अपारंपरिक आव्हानांना खतपाणी घालणारा शेजार लाभला आहे. मात्र मागील नऊ वर्षात भारताची संरक्षणक्षमता समाधानकारकरीत्या वाढली आहे. या कालावधीत देशाने संरक्षणविषयक धोरणांना उत्तम आकार दिला आहे,'' असे पंतप्रधान म्हणाले. येथील बिनोला गावातील भारतीय राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचे (इंदू) भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. महासागर क्षेत्रातील भारताचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जबाबदारीसुद्धा तितकीच आहे. या अनुषंगाने भारताने विशेषत: सायबर व अंतराळ क्षेत्रातील अपारंपरिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत साधनसामुग्रीच्या बाबतीत सक्षम आहे. सायबर सुरक्षेसाठी राष्ट्रीय धोरणाचा अवलंब केला जात असून, लवकरच राष्ट्रीय सायबर संरक्षण समन्वयक कार्यालय स्थापन करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

जागतिक एकत्मीकरणामुळे देशाच्या सीमा धूसर होत असतानाच संघर्ष आणि स्पर्धेचे स्वरूपही झपाटय़ाने बदलत आहे. त्यामुळे स्वरक्षणासोबतच भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय संपत्तीचे जतन करणेही क्रमप्राप्त आहे. भारताची संरक्षणक्षमता तर वाढली आहेच, शिवाय आंतरराष्ट्रीय संबंधांतही प्रचंड सुधारणा झाली आहे. तसेच आशिया प्रशांत, हिंद महासागर आणि पश्चिम आशिया क्षेत्रात भारताचे राजकीय, आर्थिक व धोरणात्मक संबंध गहन झाले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

या विद्यापीठातून पदवी घेऊन जे बाहेर पडतील त्यांनी भविष्यातील आव्हानांचा विचार करतानाच संरक्षण व अर्थ, अंतर्गत व बाह्य सुरक्षा आणि संरक्षण व मुत्सेद्देगिरी यांच्यातील परस्पर संबंधांचाही अभ्यास करणे गरजेचे आहे, असा सल्लाही डॉ. मनमोहन सिंग यांनी या वेळी दिला.

'इंदू'ची स्थापना करून देशाच्या सुरक्षेबाबत आपण किती गंभीर आहोत, हे काँग्रेसप्रणीत सरकारने दाखवून दिले असल्याचे संरक्षणमंत्री ए. के. अँटनी या वेळी म्हणाले. हे देशातील पहिले विद्यापीठ आहे, जे केवळ लष्करी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करणार आहे. लष्करी कमांडर किंवा त्या दर्जाचा अधिकारी या विद्यापीठाचा प्रमुख असेल, असेही ते म्हणाले.

हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा, परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद, संरक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह व तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Read More »

एलबीटीविरोधातील संप मिटला

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर एलबीटीविरोधात सुरू असलेला संप पूर्णपणे मागे घेत असल्याची घोषणा गुरुवारी व्यापारी संघटनांनी केली.

मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्था करावरून (एलबीटी) अनेक दिवस सुरू असलेला संप पूर्णपणे मागे घेत असल्याची घोषणा गुरुवारी व्यापारी संघटनांनी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर व्यापा-यांनी हा निर्णय घेतला. मुंबईत एलबीटी लागू करण्यासाठी कोणतीही डेडलाइन निश्चित करण्यात आली नसून सर्वसहमती मिळाल्यानंतरच कायद्यात दुरुस्ती करून एलबीटीबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी व्यापा-यांच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार शुक्रवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मात्र तत्पूर्वीच 'एलबीटी'वर तोडगा निघाला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे काँग्रेस पक्षाचे मुंबईतील खासदार, मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि काही प्रमुख व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नसिम खान, सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर, खासदार गुरुदास कामत, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त आदी या वेळी उपस्थित होते.

एलबीटी आंदोलनादरम्यान व्यापा-यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात व्यापा-यांच्या भावना आपण समजून घेतल्या असून, योग्य त्या सूचना संबंधितांना देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. ''जकात रद्द करावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनीच अनेक वेळा केल्यामुळे एलबीटीचा निर्णय घेण्यात आला.

मात्र आता त्याला व्यापा-यांचाच विरोध होऊ लागला आहे. त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन कायद्यात योग्य तो बदल करता येऊ शकतो. वॅटमध्ये अधिक वाढ करून एलबीटी रद्द करावी, अशी मागणी काही संघटनांनी केली होती. मात्र ती मान्य केल्यास शहरांच्या विकासासाठी ग्रामीण भागातील जनतेवर कराचा अधिक बोजा येणार आहे, तसेच महानगरपालिकांच्या आíथक स्वायत्ततेवरही त्याचा विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे तो पर्याय व्यवहार्य नव्हता,'' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एलबीटी करप्रणाली अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी प्राप्त होणा-या सूचनांचा विचार करण्याची राज्य सरकारची अजुनही तयारी आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला व्यापारी संघटनांनी सुधारणा सुचवाव्या. चांगल्या सुधारणा व सूचनांचा विचार एलबीटीसंदर्भातील कायद्यात करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर व्यापा-यांचे समाधान झाले आणि त्यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

Read More »

प्रहार बातम्या – २३ मे २०१३

नमस्कार प्रहार बातम्यामध्ये आपलं स्वागत…

»एलबीटीविरोधातील संप मिटला
»स्वरक्षणासाठी भारत सक्षम- पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा निर्वाळा
»श्रीनगरमध्ये लष्करचा दहशतवादी ठार
»'फेसबुक'वरुन मैत्रिणीला गंडवलं
»अंपायर आसद रौफला चॅम्पियन्स ट्रॉफीतून डच्चू

ऐकण्यासाठी येथे क्लिक करा… 23052013

Read More »

एसटीतील लैंगिक शोषणाची चौकशी

एसटीतील लैंगिक शोषणाची विभागीय चौकशी करणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

मुंबई- एसटीच्या वाहतूक विभागातल्या वरिष्ठ अधिका-याकडून काही महिला अधिका-यांकडे लैंगिक सुखाची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार 'प्रहार'ने उघड केला. त्याची गंभीर दखल राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी घेतली असून, या प्रकरणाची विभागीय चौकशी करणार असल्याचे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

महामंडळाच्या 'लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समिती'मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर एसटी महामंडळातल्या कामगार संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, जबाबदार अधिका-याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या अधिका-यावर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. इंटकचे नेते आणि आमदार जयप्रकाश छाजेड यांनी हा प्रश्न आता विधान परिषदेच नेणार असल्याचे सांगितले.

हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. येत्या अधिवेशनात विधान परिषदेत हा प्रश्न मांडणार आहे. - आ. जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस.

एसटी महामंडळातल्या महिला अधिकारी किती असुरक्षित आहेत आणि त्यांच्या वरिष्ठ अधिका-याकडून त्यांना कशी हीन वागणूक दिली जाते, याबाबतची बातमी 'प्रहार'ने गुरुवारी प्रसिद्ध केली. एसटी महामंडळाने गुरुवारीच याची दखल घेऊन तातडीने सर्व सूत्रे हलवण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी झालेल्या प्रकाराचा निषेध करत या प्रकरणाची विभागीय चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.

हा प्रकार अत्यंत हीन असून, संबंधितांवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी. संबंधित अधिका-याला निलंबित करावे. - सुनील निरभवणे, कास्ट ट्राइब राज्य परिवहन संघटना

Note: There is a poll embedded within this post, please visit the site to participate in this post's poll.

 

Read More »

राशिभविष्य, २४ मे २०१३

दैनंदिन राशिभविष्य…

मेष : आचारसंहितेचे धडे द्याल.



वृषभ : वरिष्ठांना खूश ठेवाल.

मिथुन : घरातील रीतीरिवाजांचे पालन कराल.
कर्क : सरकार-दरबारी गौरवले जाल.

सिंह : वक्तव्य प्रभावी होईल.

कन्या : विनोदी लिखाण कराल.
तूळ : पुत्राकडून सुवार्ता समजतील.

वृश्चिक : आकर्षक जाहिरात कराल.

धनू : दौरे यशस्वी होतील.

मकर : तुमचे लेख गाजतील.

कुंभ : परिसरात आदरणीय असाल.

मीन : मैफली गाजवाल.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe