Tuesday, December 17, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

इम्युनोथेरपी गर्भधारणेसाठी आशेचा किरण

इम्युनोथेरपी म्हणजे नक्की काय आहे, त्याची माहिती फारशी कोणाला नाही. त्यासाठीच डॉ. मोहन राऊत यांच्या इम्युनोथेरपी फाउंडेशन आणि आयसीपीआरएमद्वारे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. त्यात 'कोणतंही कारण नसताना येणारं वंध्यत्व' या विषयावर मार्गदर्शन केलं गेलं. 
इम्युनोथेरपी म्हणजे नक्की काय आहे, त्याची माहिती फारशी कोणाला नाही. त्यासाठीच डॉ. मोहन राऊत यांच्या इम्युनोथेरपी फाउंडेशन आणि आयसीपीआरएमद्वारे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. त्यात 'कोणतंही कारण नसताना येणारं वंध्यत्व' या विषयावर मार्गदर्शन केलं गेलं. गर्भधारणेसाठी आशेचा किरण असलेल्या इम्युनोथेरपीविषयी उपस्थित तज्ज्ञ मंडळींनी त्यांचे विचार यावेळी स्पष्ट केले. ज्या महिलांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागले आणि त्यांच्यावर इम्युनोथेरपीचे उपचार केल्यानंतर ज्यांना गर्भधारणा झाली, अशा महिलांनी आपले अनुभव यावेळी सांगितले. त्यात होत्या परीक्षा धुरी. त्या म्हणाल्या, 'वारंवार गर्भपात व्हायचा.

त्यासाठी खूप उपचार केले. अनेकदा गर्भपात झाल्यामुळे आपल्याला कधीच बाळ होणार नाही, असंच वाटत होतं. कारण कोणतेही उपचार लागू होत नव्हते, पण इम्युनोथेरपीमुळे माझ्या आयुष्यात आनंद आला. आता एका निरोगी बाळाची मी आई आहे.' दुसरी महिला मरियम फक्री. त्यांनी सगळ्या तपासण्या केल्या होत्या, पण सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. तरीही त्यांना मूल होत नव्हतं. तेव्हा डॉक्टरांनी अ‍ॅक्टिव्ह इम्युनोथेरपीबाबत सांगितलं. उपचार पूर्ण झाल्यावर त्यांना एक मुलगी झाली. आता ती तीन वर्षाची आहे.

कार्यक्रमातील आपल्या भाषणातून युरोपियन सोसायटी ऑफ रिप्रॉडक्टिव्ह इम्युनॉलॉजीचे महासचिव डॉ. ओ. बी. ख्रिश्चनसेन यांनी इम्युनोलॉजीच्या विविध अंगांना स्पर्श केला आणि हे तंत्रज्ञान वैद्यकीय पथदर्शक असून त्यामुळे मूल नसलेल्या आणि वारंवार गर्भपात होणा-या जोडप्यांना आपलं निरोगी मूल असण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार असल्याचं मत नोंदवलं. डॉ. ख्रिश्चनसेन यांनी १९९५ आणि २००२ मध्ये डेन्मार्कला प्लासिबो नियंत्रित इम्युनोलॉजिकल ट्रायल्स केल्या. ते म्हणाले की, त्याचे परिणाम वेगवेगळे दिसले तरीही त्यात मोठ्या प्रमाणावर यश आलं आहे. तसंच गर्भपाताला कारणांची अनिश्चितता असली तरी काही परिस्थितींमध्ये स्त्रियांच्या वंध्यत्वाचे प्रश्न हे एका बीजांडाच्या गर्भात रुजण्यात आलेल्या अपयशामुळे किंवा गर्भात रुजलेल्या बीजांडाच्या लवकरच्या गर्भपातामुळे उद्भवतात.

इम्युनोथेरपीवरील चर्चासत्राचं नेतृत्व करणा-या व इम्युनोथेरपी फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. उषा कृष्णन यांच्या मते, भारतात नैसर्गिक गर्भपाताच्या घटना खूप जास्त आहेत आणि वारंवार गर्भपात होणा-या स्त्रियांना त्याचा खूप त्रास होतो. अशा स्त्रियांच्या आयुष्यात इम्युनोथेरपीमुळे एक आशेचा किरण येऊ शकतो. डॉ. मुग्धा राऊत या गेली २१ वष्रे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत असून, त्यांनी ही पद्धती भारतात आणली. त्यांनीही यावेळी इम्युनोथेरपीबाबत मत व्यक्त केलं.

डॉ. मोहन राऊत आणि डॉ. मुग्धा राऊत हे वारंवार गर्भपात, रोपणातील अपयश आणि कारण नसताना वंध्यत्व अशा गोष्टींनी पीडित असणा-या रुग्णांवर उपचार करतात. डॉ. राऊत यांचे हे केंद्र आयसीपीआरएम या नावाने ओळखले जात असून ते कार्लटन अपार्टमेंट, वाकोला व्हिलेज, वाकोला मशिदीजवळ, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व) येथे आहे. त्याला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि आरोग्य सेवा महासंचालनालय (डीजीएचएस) कडून इम्युनोथेरपी उपचारासाठी मान्यता मिळाली आहे.

प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. मोहन राऊत गेली २४ वष्रे कार्यरत आहेत. डॉ. मुग्धा राऊत एक अनुभवी प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ असून त्यांना २१ वर्षाचा अनुभव आहे. वारंवार गर्भपात आणि वाईट प्रसूती इतिहास या क्षेत्रातील केईएम रुग्णालयाच्या डॉक्टर उषा कृष्णन यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे. या कार्यक्रमाला डॉ. ख्रिश्चनसेन यांच्या पत्नी उल्ला ख्रिश्चनसेन, एमओजीएसच्या अध्यक्ष डॉ. सुचित्रा पंडित, डॉ. इंदिरा हिंदुजा असे मान्यवर उपस्थित होते.

Read More »

चवळीच्या शेंगेसारखं व्हायचंय!

अलीकडे लोक जितके टेक्नोसॅव्ही झाले आहेत, तितकेच आरोग्याबाबत जागरूकही होऊ लागले आहेत. प्रत्येकाला सडपातळ, काटक व्हावंसं वाटतं. आरोग्याबाबत खूप वाचलंही जातं. पण पण ते आचरणात आणायला वेळ मिळत नाही, ही तक्रार कायम असते. अशा व्यक्तींसाठी शेंगाभाज्यांचा आहारातील समावेश, हा बांधा सडपातळ ठेवण्यास एक चांगला उपाय आहे. विशेषत: तरुण मुलींना 'चवळीच्या शेंगे'सारखं सडपातळ व्हायचं असतं. पण हीच शेंग आणि तिच्या वर्गातील शेंगाभाज्या या प्रत्येकालाच सडपातळ ठेवण्यात मोलाचा हातभार लावतात, हे तुम्हाला माहीत आहे का? त्यामुळे व्यायामासाठी वेळ मिळाला नसला तरी आहारात शेंगाभाज्यांचं प्रमाण वाढवून चवळीच्या शेंगेसारखं कमनीय होता येणं शक्य आहे.

आपल्या आहारात शेंगाभाज्यांपैकी वालपापडी, घेवडा, सुरती पापडी असे पापड्यांचे प्रकार, चवळीच्या शेंगा, गवार, फरसबी, वाटाण्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा इ.चा आपल्या दैनंदिन आहारात आलटूनपालटून समावेश असायलाच हवा. विशेषत: हिवाळ्यात सुरती पापडी, मटार या हंगामी शेंगाभाज्या जास्त येतात. त्या-त्या हंगामात येणा-या भाज्यांमध्ये जास्त ताजेपणा असतो आणि त्यातील जीवनसत्त्वंही आरोग्यावर अधिक परिणामकारक ठरतात.

वाटाण्याच्या शेंगांव्यतिरिक्त इतर सर्व शेंगाभाज्यांची सालं काढावी लागत नाही. मग वाटाण्याच्या शेंगांची सालं तरी का टाकून द्यायची? त्यांचाही वापर करता येतो. मटारच्या कोवळ्या शेंगांच्या सालींमध्ये आतल्या बाजूस असलेला चिवट पारदर्शक पापुद्रा काढून टाकल्यावर (तो सहज निघतो) त्याचे बारीक तुकडे करून इतर शेंगाभाज्यांप्रमाणेच फोडणी देऊन भाजी करता येते किंवा उकडून सूपमध्येही याचा वापर करता येतो. या सालांमधून डोळ्यांची दृष्टी उत्तम ठेवणारे घटक आणि 'ई' जीवनसत्त्व मिळतं.

पापडी या वर्गातील असलेली घेवडा ही भाजी चवीला उगट्र लागते, इतर शेंगाभाज्यांच्या तुलनेने घेवड्याच्या पिकाला पटकन कीड लागत असल्यामुळे त्यावर प्रचंड प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. परंतु याच घेवड्याची भाजी करण्यापूर्वी तो स्वच्छ धुऊन, वाफवून घेऊन मग त्याचा वापर करावा. कारण ही भाजी चवीला जरी चविष्ट नसली, तरी त्वचा दोषनाशक, स्मरणशक्तीवर्धक, हृदयाला हितकारक असून स्नायूंमध्ये अचानक येणारे वळ (क्रॅम्प्स) ही भाजी खाल्ल्यानं नियंत्रणात राहतात.

गवार ही देखील उग्र आणि कडवट चवीची असते. पण बहुतेक घरांमध्ये ती या ना त्या पद्धतींनी चमचमीत करून खाल्ली जाते. गवारीच्या शेंगांमध्ये ज्या बिया असतात त्यांच्यापासून गोंद तयार करतात. शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की, गवारीच्या भाजीमार्फत हा नैसर्गिक स्वरूपातील गोंद आपल्या पोटात गेल्यास रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास तो उपयुक्त ठरतो.

चवळीच्या शेंगांमध्ये असणारा चांगल्या दर्जाचा तंतूमय पदार्थ आतड्यातील चिकटलेली घाण आणि विषजन्य पदार्थ बाहेर काढतो. आधुनिक आहारशास्त्राच्या संशोधनानुसार, चवळीच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि काही प्रमाणात प्रथिनंही आहेत.

आयुर्वेदानं शेवग्याच्या शेंगांचं महत्त्व कित्येक वर्षापूर्वीच पटवून दिलेलं आहे आणि आधुनिक वैद्यकशास्त्रानेही ते मान्य केलं आहे. शेवग्याच्या शेंगा या उष्ण गुणात्मक आहेत, परंतु हिवाळ्यात त्यांचा उत्तम हंगाम असल्याने त्या खाण्यास काहीच हरकत नाही. या शेंगांची रस्साभाजी करून किंवा वरणात, आमटीत तसंच पिठल्यात त्याचे तुकडे घालून त्या जरूर खाव्यात. भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रथिनं, 'अ' जीवनसत्त्व या भाजीत आहे. दररोज एक शेंग उकडून तिचा आहारात समावेश केल्यास केसांची होणारी गळती थांबून, नवीन केस येऊ लागतात. शेवग्याच्या पानांमध्येही लोह आणि 'अ' जीवनसत्त्वाचं प्रमाण मुबलक असतं. नवीन संशोधनानुसार डेंग्यू तापामध्ये रक्तातील कमी झालेलं प्लेटलेट्स (पांढ-या पेशी)चं प्रमाण वाढवून ते नियंत्रित करणारे महत्त्वपूर्ण घटक या शेवग्याच्या पानांमध्ये आहेत.

हिवाळ्यात तुरीच्या शेंगांचा हंगाम असतो. त्याच्या दाण्यांचा उसळीप्रमाणेच, कटलेटमध्ये किंवा विशेषत: गुजराथी पद्धतीच्या उंधियो या मिश्र भाजीतही वापर केला जातो. परंतु हे दाणे पित्तवर्धक असल्यामुळे त्यांचा बेतानेच वापर केलेला बरा.

हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हाच की, 'वेळीच डोळे उघडा, आवडी-निवडी बाजूला ठेवा आणि सध्या ढासळत चाललेलं आरोग्य कसं सांभाळता येईल, याकडे डोळसपणे लक्ष द्या!'

हे अवश्य करा..

= बहुतेक शेंगभाज्या या जरी उग्र किंवा कडसर चवीच्या असल्या, तरी त्या अत्यंत गुणकारी असल्यामुळे टंगळमंगळ न करता खायलाच हव्यात.
= घेवडा, गवार या शेंगाभाज्यांना इतर शेंगाभाज्यांच्या तुलनेत किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. यासाठी त्यावर तितकीच प्रभावी कीटकनाशकं फवारलेली असतात. म्हणूनच या शेंगाभाज्या वापरताना, त्या पाण्याखाली स्वच्छ धुऊन आणि पाण्यात थोडय़ाशा वाफवून घेऊन मग वापराव्यात.

Read More »

कार्टून, सिनेमे आणि खादाडपणा

'आय अ‍ॅम पोपाय द सेलर मॅन.. कॉज आय इट्स मी स्पीनज..' हे गाणं आठवतंय ना..! पोपाय स्पीनज अर्थात पालक खायचा म्हणून त्याला लगेच शक्ती मिळायची आणि तो प्ल्यूटोला मारायचा.. त्या वेळी पोपाय पाहणा-या मुलांचं नक्कीच पालक या भाजीवर प्रेम वाढलेलं. कारण पोपाय तीच भाजी खायचा.. पण आता पोपायसारखी जुनी कॉर्टुन्स बंद पडली आणि त्याची जागा शिन चॅन, डोरेमोन, छोटा भीम यांनी घेतली आहे. शिवाय लहान मुलांसाठी कुंफू पांडा, श्रेकसारखे सिनेमेही आले आहेत. अशा कार्टुन्स आणि सिनेमांमधून लहान मुलं जे पाहत असतात त्याचं ते लगेच अनुकरण करू लागतात. त्याचा परिणाम त्यांच्या खाण्या-पिण्यावरही पडू लागला आहे.
शाळेत चिंटू मार खाऊन आल्यावर घरी पाय ठेवताच आईला ऑर्डर देतो, 'आई माझ्यासाठी लाडू बनवून ठेव. उद्या दाखवतोच पिंट्याला..' आणि दुस-या दिवशी शाळेत जाताना आईकडून लाडू मागतो. पण कामामुळे आईला लाडू बनवता आले नव्हते, त्यामुळे घरीच असलेले तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू त्याला दिले. संध्याकाळी पुन्हा चिंटू मार खाऊन येतो आणि आई तू पिवळ्या रंगाचे लाडू दिले नाहीस म्हणून रडू लागतो.. आईला काही लाडूची भानगड कळेना.. त्याच्याशी नीट बोलल्यावर तिला कळलं की, छोटा भीम लाडू खाऊन समोरच्याशी सामना करतो आणि म्हणूनच चिंटूलाही लाडू खायचे आहेत. या लहान मुलांच्या अनुकरणाच्या गोष्टी काही नव्या नाहीत. घरोघरी आता हे डायलॉग्ज ऐकू येऊ लागले आहेत.

मुलं घरी असली की टीव्हीवर सतत कार्टुन्स पाहत असतात. त्या कार्टूनमधील त्यांच्या फेवरेट कॅरेक्टरचं ते अनुकरण करू लागतात. त्यांच्यासारखं बोलणं, चालणं, त्यांच्यासारखे कपडे घालणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासारखंच खाणं.. त्यामुळे लाडू, चोकोचिप्स, चॉकलेट, वेफर्स अशा खाद्यपदार्थासाठी मुलांची डिमांड वाढत चालली आहे. छोटा भीम हे तर छोट्या दोस्तांचं अतिशय लाडकं कॅरेक्टर. या भीमाचं आवडीचं खाणं म्हणजे 'लाडू'. आधी 'लाडू खा' असं म्हणून मुलांना जबरदस्ती करावी लागायची, मात्र आता स्वत: लाडूचा डबा शोधून लाडू खाऊ लागले आहेत. लाडू हा खाद्यपदार्थ खाण्यासाठी चांगला असला तरी तो खाण्याला काही मर्यादा असते.

दिवसाला दोन लाडू पुरेसे असतात. भीमप्रमाणे एका वेळेला वीस-पंचवीस लाडू खाल्ले तर नक्कीच एक लठ्ठपणा येईल. भीमप्रमाणे इतरही काही कार्टून कॅरेक्टर आहेत, ज्यांना पाहून मुलं त्यांचं अनुकरण करू लागली आहेत. त्यातलंच एक आवडीचं कार्टून म्हणजे शिन चॅन. या कार्टूनचे तर सिनेमेही आहेत. या शिन चॅनला शिमला मिरची हा भाजीचा प्रकार बिलकूल आवडत नाही. आणि त्याच्या आईने ती भाजी केलीच तर तो कितीतरी युक्त्या वापरून ती भाजी न खाता टाकून देतो. हे सगळं छोटी मंडळी अगदी आवडीने पाहत असतात. केवळ शिमला मिरचीच नाही तर मुलांना एखादी भाजी आवडत नसेल तर गुपचूप शिन चॅनच्या युक्त्या वापरून भाजी टाकून दिली जाते. केवळ कार्टून कॅ रेक्टर किंवा सिनेमाच नाही तर जाहिरीतींमुळेही जंक फूडची क्रेझ लहान मुलांमध्ये वाढत चालली आहे. चिप्स, चॉकलेटच्या जाहिरातीत लहान मुलांना घेतलं जातं. ते पाहून छोटी मुलं त्याकडे अजून आकर्षित होतात. घरातलं आरोग्यदायी खाणं न खाता जंक फूडच्या आहारी जातात.

सिनेमांमधून, कार्टुन्समधून कुठेना कुठे या जंक फूडची एक प्रकारे जाहिरातच होत असते. तेच पदार्थ खायचे म्हणून मुलं हट्ट करू लागतात. त्यांच्या हट्टापुढे पालकांचं काही चालत नाही. त्यांना ते पदार्थ द्यावेच लागतात. कधीतरी असे पदार्थ खाल्ले तर त्याचे परिणाम होणार नाहीत. पण रोजच अशा पदार्थाचं सेवन होत असेल तरी ती चिंतेची बाब ठरेल. कारण अशा पदार्थामध्ये साखर, मीठ आणि तेलाचं प्रमाण अधिक असतं. शिवाय चीजयुक्त, जास्त बटर वापरून केलेला पदार्थ त्यांना जास्त आवडू लागतो. पण तो पदार्थ कधीतरी आणि मर्यादेतच खावा. शरीरात त्या पदार्थाचं प्रमाण जास्त झाल्यास त्याचा परिणाम लगेचच शरीरावर होऊ लागतो. अतिरिक्त चरबी साठायला सुरुवात होते. परिणामी मुलं स्थूल होतात. सुदृढ असणं आणि स्थूल असणं हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणूनच पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे, त्यांच्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

काय कराल?

= वेफर्स, चॉकलेट अशा पदार्थापासून मुलांना दूर ठेवावं.
= मुलांनी जास्त हट्ट केल्यास एखादंच चॉकलेट द्यावं.
= ते कार्टून, सिनेमे पाहत असताना त्यांच्यासोबत बसून यांच्या आवडीचं कॅरेक्टर तो विशिष्ट पदार्थ का खातोय, त्या मागचं कारण समजावून सांगावं.
= आपला मुलगा काय आणि किती प्रमाणात खातोय याकडे लक्ष दिलं पाहिजे.
= स्थूलपणा कमी करण्यासाठी मैदानी खेळ खेळायला पाठवलं पाहिजे. काही मैदानी खेळांची स्वत:च माहिती पुरवावी आणि तो खेळ मुलांना खेळायला लावावा.
= घरात शिजवलेल्या जेवणाची गोडी कशी वाढेल याकडे लक्ष पुरवावं.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe