Tuesday, July 9, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

बेक्ड पकोडे

 पाऊण कप मैदा, पाव कप बेसन, पाव कप गव्हाचे पीठ, प्रत्येकी १/३ कप लाल आणि हिरवी ढबू मिरची, १/३ कप बारीक कापलेला कांदा

साहित्य : पाऊण कप मैदा, पाव कप बेसन, पाव कप गव्हाचे पीठ, प्रत्येकी १/३ कप लाल आणि हिरवी ढबू मिरची, १/३ कप बारीक कापलेला कांदा, अर्धा चमचा गरम मसाला, २ चमचे तेल, दीड चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, १/३ कप दही, १/३ कप दूध, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि लाल

मिरची पूड
कृती : ओवन २०० डिग्री सेल्सिअसवर गरम करायला ठेवा, बेकिंग शिटवर पार्चमेंट पेपर ठेवा. एका कढईमध्ये गरम तेल करा, त्यात कांदा, ढबू मिरची, गरम मसाला आणि थोडे मीठ टाकून थोडा वेळ शिजू द्या. या भाज्या गार होण्यासाठी ठेवा. एका मिक्सिंग बोलमध्ये सगळी पिठे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, लाल मिरची पूड, मीठ चाळून घ्या आणि थोडे थोडे दूध टाकून त्या सगळ्याचा थोडा पातळ गोळा तयार करा. या गोळ्याचे चमच्याने छोटे-छोटे पकोडे बेकिंग शिटवर टाका. या पकोडय़ावर थोडे तेल ब्रशने लावा किंवा कुकिंग ऑइल स्प्रे करा. बेकिंग ट्रे ओवनमध्ये ठेवून हे पकोडे सोनेरी रंग होईपर्यंत शिजू द्यावेत.

टीप : तेलाचा अतिशय कमी वापर होत असल्याने डाएटचा उद्देश सफल करणारे हे पकोडे चटपटीत खाण्याची मजा मात्र तेवढीच देतात.

Read More »

पाऊस झेला.. पण जरा जपून

पावसाळा आपल्याला जसा रोमँटिक वातावरणामुळे हवाहवासा वाटतो, तसाच तो बरेचदा संसर्गजन्य आजारांमुळे नकोसाही वाटतो. पावसाळय़ात निर्माण होणारे संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी कानमंत्र, खास तुमच्यासाठी!

पावसाची रिमझिम पाहिली की, त्याचे थेंब अंगावर झेलण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. काही पावसाचे थेंब ओंजळीवर झेलतात, तर काही चेह-यावर. काहींना पावसात फक्त केसच भिजवायला आवडतं तर काही पावसात ओलेचिंब होण्यात धन्यता मानतात. या सगळय़ांना एकच सांगणं आहे की, पावसात भिजा, पण जरा जपूनच. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. त्यासाठी काही कानमंत्र लक्षात ठेवा. कदाचित हे कानमंत्र तुम्हाला ठाऊकही असतील.. पण त्यांची विस्मृती झाली असल्यास पुन्हा एकदा ही उजळणी..

पाणी उकळून प्या
कित्येकदा या मोसमात पिण्याच्या पाण्यात पावसाचं पाणी मिसळतं. त्यामुळे पावसात पाण्यापासून होणा-या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच पावसात पिण्याचं पाणी गाळून, उकळून प्या. लहान मुलं, वृद्ध मंडळी, गरोदर स्त्रिया, स्तनदा यांना उकळलेलं पाणी पिण्यास द्यावं.

घरचा खाऊच उत्तम
टायफॉइड, कावीळ, मलेरिया, डेंग्यू या आजारांच्या प्रमाणात पावसात अचानक वाढ होते. पैकी टायफॉइडच्या आजाराची लागण नीट काळजी न घेतलेलं अन्न आणि दूषित पाणी प्यायल्याने होते. मुलांनी कितीही बाहेरचं खाणं खाण्याचा हट्ट केला तरी त्यांचं मनपरिवर्तन करण्याची जबाबदारी पालकांची आहे. स्वच्छतेची काळजी घेऊन बाहेरचे पदार्थ तयार केलेलेच असतील, याची खात्री देणं अशक्यच आहे. त्यामुळे सँडविच, समोसे, भजी, डोसा, बर्गर, पिझ्झा, पराठा हे पदार्थ आरोग्यदायी पद्धतींचा वापर करून घरी तयार करावेत. अगदीच पर्याय नसेल तर पॅक्ड फूडचा वापर करावा. ते वापरताना त्यावरची मुदत समाप्ती तारीख (एक्स्पायरी डेट) पाहावी.

त्वचारोग आणि पावसाळी पादत्राणं
चिखल आणि दूषित पाण्यापासून पायांचं संरक्षण करणं हीही आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असते. काळजी न घेतल्यास रोगांची खासकरून त्वचा रोगांची लागणही होऊ शकते. त्यासाठी गम्बुट्स किंवा क्रॉक्स हा चांगला पर्याय आहे. लहान मुलांना पावसात गम्बुट्स वापरायला द्यावेत.

नखं खाण्याची सवय मोडाच..
आपल्यापैकी कित्येकांना नखं खाण्याची, बोटं तोंडात घालण्याची सवय असते. पावसात तरी नखं खाणं, तोंडात हाताची बोटं घालण्याच्या मोहावर आवर घातला पाहिजे. कारण नखांमध्ये असणारे रोगजंतू हे पावसात अधिक क्रियाशील होतात. नखं खाणं तसंच बोटं तोंडात घालण्याच्या सवयींमुळे हे सूक्ष्म जंतू थेट पोटात जातात. त्यापासून पोटाच्या आजारांच्या समस्या निर्माण होतात.

काही इतर स्वच्छतेचे आरोग्यदायी पर्याय
जास्त दिवस फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ थंडगार असताना लगेचच खाऊ नका. यामुळे उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ शकतो. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ थोडा वेळ बाहेर ठेवा. सामान्य तापमानाला आल्यावर त्या पदार्थाचा गंध, चव तसंच रंगावरून पदार्थ खाण्यायोग्य आहे का, याचा अंदाज येतो. पदार्थ खाण्यायोग्य असल्यास तो गरम करून खावा.

पावसाळ्यातही दिवसातून दोनदा अंघोळ करावी. हात तसंच पायांच्या बोटांच्या बेचक्या, तळवे हेही साबणाने स्वच्छ धुवावेत. भेगा तसंच चिखल्यांचा त्रास असणा-यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घेऊन लावावीत.

बाहेर जाणार असाल तर स्वत:बरोबर कपडय़ांची जास्त जोडी घेऊन जाण्यास विसरू नका. ओल्या कपडय़ांनिशी बसल्यामुळे ताप, सर्दी, खोकला यांची लागण होऊ शकते.

घराची स्वच्छता ठेवताना अँटिसेप्टिक क्लीनर्सचा वापर करावा. त्यामुळे पावसात बुरशी तसंच जंतूंमुळे होणारे संसर्गजन्य आजार होत नाहीत.

उशी-तक्का यांचे अभ्रे, चादरी तसंच पडद्यांचीही काळजी घ्यावी. ते स्वच्छ आहेत की नाही, हे पडताळून पाहावं. जाड कापडाचे पडदे, चादरी यांचा वापर पावसात करू नये. त्याऐवजी पातळ कापडाचे, वजनाला हलक्या चादरी, पडदे, उशी तसंच तक्क्याचे अभ्रे यांचा वापर करावा. पावसात हे सुकतातही लवकर. घरांच्या खिडक्यांनाही पातळ पडदे लावावेत.

Read More »

वाढता वाढता वाढे वजन..

'फास्टफूड' जीवनशैलीने आपल्याला अनेक आजारांचीही चांगलीच चव चाखवलेली दिसते. खरं तर ह्या जीवनशैलीतून येणारे आजार हे एकटे-दुकटे येत नसून ते श्रँखलित स्वरूपातील असल्याने संपूर्ण शरीरावरच ते परिणाम करतात. असाच विविध आजारांना निमंत्रण देणारा आणि पूर्वी केवळ आनुवंशिकच समजला जाणारा 'स्थूलता' हा आजार आता आपल्या जीवनशैलीनेही आपलासा केलेला दिसतो.

'स्थूलता' म्हणजे शरीरात जास्त प्रमाणात चरबी साठणे होय. या दीर्घकाळ, बहुधा कायमस्वरूपीच शरीरात राहणा-या आजाराने जगभरातील दोन अब्जाहून अधिक लोक ग्रासलेले आहेत. अमेरिकेसह अन्य प्रगतशील राष्ट्रात तर स्थूलता ही एक महत्त्वाची आरोग्यविषयक समस्या बनली आहे.

अर्थातच पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीचं आणि एकूणच जीवनशैलीचं आपण भारतीय दुबाहूंनी स्वागत करत असल्याने अनुषंगाने भारतातही 'स्थूलता' फैलावत आहे. रोजच्या कामांतील यांत्रिकतेमुळे क्रियाशीलतेचं प्रमाणंही कमी कमी होत चाललं आहे, ही त्याला जोड.जेव्हा आपण आवश्यकतेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थ ग्रहण करतो, तेव्हा त्याचे अतिरिक्त मेदात (चरबीत) रूपांतर होऊन ती शरीरात साचत जाते.

ह्या साचत गेलेल्या चरबीमुळे शरीराचं आकारमान वाढतं. चरबीचं प्रमाण वाढत असल्याने चरबीतील पेशींची संख्याही वाढते. अशावेळी आपण वजन घटवलं तरी त्या पेशी आकुंचन पावतात. मात्र त्यांची संख्या तितकीच राहते. आनुवंशिकता आणि जीवनशैलीबरोबरच वय, लिंग, मानसिक रचना, वातावरणातील बदल आणि झोप हेही स्थूलतेसाठी कारणीभूत ठरतात.

आनुवंशिकता : स्थूलतेला कारणीभूत ओबी नावाचे जनुक मनुष्याच्या शरीरात असल्याचं आढळून आलेलं आहे. प्रोओपिओमेलॅनोकॉर्टिन (पीओएमसी) मधील आनुवंशिक विकृतींमुळे स्थूलता निर्माण होते.

वय : वाढत्या वयानुसार स्नायू कमी होत जाऊन चरबी साठण्याचं प्रमाण वाढत जातं. चयापचयाची क्रियाही मंद होते. त्यामुळेच वयानुसार खाद्यपदार्थातील स्निग्धतेचं प्रमाण कमी करणं गरजेचं असतं.

लिंग : पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत जास्त स्नायू असतात. शिवाय त्यांना जास्त ऊर्जा निर्माण करावी लागत असल्याने स्निग्धपदार्थाचं अधिकचं सेवनही त्यांच्यासाठी आवश्यक असतं. तसंच पुरूष स्त्रियांपेक्षा जास्त शारीरिक कामे करत असल्याने, कमी आराम करत असल्याने स्त्रियांमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण अधिक असतं. त्याशिवाय गर्भावस्थेमुळेही स्त्रियांमध्ये स्थूलता येऊ शकते.

मानसिक रचना वा भावना : अनेकदा नैराश्य, चिंता, अति राग, मानसिक दबाव अशा अनेक कारणांमुळे अधिक खाण्याची मानसिकता दिसून येते. त्यात भूक हा भागच नसतो. याचा अर्थ असा नाही की वजनाचे आधिक्य किंवा स्थूलता असणा-या लोकांना भावनांच्या समस्या इतर लोकांपेक्षा अधिक असतात. खरं तर अशा व्यक्ती भावनेच्या भरात जास्त अन्नग्रहण करतात. कारण त्यांच्या शरीराच्या आकारमानात विचित्रपणा आलेला असतो. अशा भावनिक समस्यांचा सामना करणा-या लोकांना केलेली मानसिक मदत त्यांना उपयुक्त ठरू शकते.

वातावरणातील घटक : थोडक्यात जीवनशैलीचाच अधिक प्रभाव असणारी ही गोष्ट. आपल्या खाण्याच्या सवयी आणि आपली क्रियाशीलता आपल्या आसपास राहणा-या लोकांकडून आपण शिकत असतो. अति खाणं आणि दीर्घकाळ एका जागी बसून काम करण्याची अलीकडची कार्यसंस्कृती घातक ठरत आहे.

झोप : झोप आणि स्थूलता यांचा आपसात संबंध असल्याचं अलीकडेच अमेरिकेतील स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनच्या प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन विभागातील टीमने संशोधनांती म्हटलं आहे. जे तरूण कमी झोप घेतात आणि अधिक खातात, त्यांना लठ्ठपणाचा त्रास उद्भवू शकतो असं म्हटलं आहे. अमेरिकन अ‍ॅकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या सल्ल्यानुसार तरुणांनी कमीत कमी ९-१० तास झोप घ्यावी.

याव्यतिरिक्त हायपोथायरॉडिजम, कशिंग सिंड्रोम, पॉलिसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम (स्त्रियांच्या गर्भाशयासंबंधित समस्या), प्राडर विली सिंड्रोम, लॉरेन्स मून बाडेर्ट बिडल सिंड्रोम तसंच इन्सुलिनोमा, ग्लॅड्स यांसारखे आजार, शिवाय स्टेरॉइड, अँटिडिप्रेसंट, गर्भनिरोधक गोळ्या अशा औषधांमुळेही स्थूलता उद्भवते.

स्थूलतेची वरील अनेक कारणं असली तरी स्थूलतेमुळे उद्भवणा-या समस्याही तितक्याच गंभीर स्वरूपाच्या असल्याचं भारतातील ज्येष्ठ आणि प्रख्यात बॅरियाट्रिक सर्जन डॉ. रमण गोएल सांगतात, 'स्थूलतेमुळे हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, घोरणं, गॉल स्टोन, ऑस्टिओआर्थरायटिस, कॅन्सर(पुरूषांमध्ये- कोलोन, रेक्टम, प्रोस्टेट कॅन्सर तर स्त्रियांमध्ये- गल ब्लॅडर, बिल्ड डक्ट, ब्रेस्ट, सेर्विक्स कॅन्सर), स्लीप एप्निया(झोपेत सहज श्वसनक्रिया बंद होणे), सेल्युलायटिस (त्वचेखालील पेशीजालात पसरणारा दाह) अशा अनेक आजारांची शक्यता नाकारता येत नाही.' सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे 'श्रृंखलित स्वरूपातील आजार' या शब्दप्रयोगाचा अभिप्रेत अर्थ हाच!

स्थूल व्यक्तींच्या एकूणच मानसिकतेबद्दल ते बोलतात, 'आत्मविश्वास कमी होणं, समाजापासून दूर राहावंसं वाटणं या वजनवाढीमुळे निर्माण होणा-या काही सर्वसाधारण समस्या आहेत. बहुतेक स्थूल व्यक्ती या सतत वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात आणि एकीकडे त्यांची अशीही धारणा होते की, वजन कमी करण्यासाठी केलेला कोणताच उपाय हा कायमस्वरूपी टिकू शकत नाही.'

वजन कमी करून स्थूलपणामुळे होणारे आजार टाळणं शक्य असल्याचं शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झालं आहे. त्यासाठी योग्य-संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे सूत्र आहे. मात्र स्थूलतेची सीमा ओलांडलेल्या अतिस्थूल व्यक्तींसाठी हा पर्यायही निकामी ठरतो. अशा व्यक्तींची नितंब, मांडय़ा, पोट, कंबर या भागांत जमा झालेली अतिरिक्त चरबी व्यायाम आणि आहार नियंत्रणानेही कमी होत नसेल तर त्यासाठी विनाशस्त्रक्रिया चरबी कमी करण्याचा पर्याय म्हणजे, लायपोलायसिस एंडर मोलोंज.

जागतिक दर्जाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असलेल्या या उपचार पद्धतीत कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन, शस्त्रक्रिया, वेदना, आरक्तपणा नसतो. एका तासात १ ते ३ इंच चरबी कमी करता येते. त्याव्यतिरिक्त स्थूलता कमी करण्यासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया म्हणजे, 'बॅरिएट्रिक सर्जरी'. अलीकडे मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि त्याचा स्थूलतेही असलेला गहिरा संबंध लक्षात घेता, मधुमेही रुग्णांसाठी विशेष वरदान ठरत असलेली ही शस्त्रक्रिया समजली जाते. कारण केवळ स्थूल व्यक्तींसाठीच नव्हे तर स्थूल नसणारे तरीही मधुमेही, उच्च रक्तदाब रुग्ण, निद्रानाशासंबंधित विकारांशी झुंजणा-या रुग्णांसाठीही ही शस्त्रक्रिया प्रभावी ठरत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मात्र शस्त्रक्रिया म्हटली की, आपण आधीच घाबरून जातो. त्याविषयी अनेक शंकाकुशंका मनात घर करू लागतात. बॅरिएट्रिक सर्जरीविषयक काही महत्त्वाच्या शंकांचं निरसन करताना डॉ. गोएल सांगतात, 'बॅरिएट्रिक सर्जरी कोणी करावी हे अगदी साध्या शब्दात सांगायचं तर ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा २५ किलोंनी अधिक आहे किंवा ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी ही शस्त्रक्रिया करून घ्यावी. वैद्यकीय नियमांप्रमाणे ३२.५ पेक्षा अधिक बीएमआय असलेल्या व्यक्ती या बॅरिएट्रिक सर्जरीकरिता योग्य मानल्या जातात. एखादी व्यक्ती शस्त्रक्रियेस उत्सुक नसल्यास त्यांचं काय, तर अशांसाठी फारच मर्यादित प्रमाणात पर्याय उपलब्ध आहेत. कारण आहार किंवा व्यायामावर आधारित अन्य कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यानंतर पुन्हा वजन वाढण्याचं प्रमाण ९८ टक्के असल्याचं डॉ. गोएल अधोरेखित करतात.

ते सांगतात, 'या शस्त्रक्रियेनंतर जर रुग्णाने बेफिकिरीने तळलेले किंवा गोड पदार्थ खाण्यास सुरूवात केली तरच वजन पुन्हा वाढू शकतं. शस्त्रक्रियेनंतरही जेव्हा रुग्णाचं वजन कमी होऊ लागतं तेव्हा विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. प्रथिनांचे उच्च प्रमाण असलेला आहार आणि त्याच्या जोडीने जीवनसत्त्व व कॅल्शियमचंही पुरेसं प्रमाण असलेल्या पदार्थाचं नियमितपणे सेवन करणं खूप महत्त्वाचं ठरतं. साधारणपणे दोन आठवडे रूग्णांना पातळ पदार्थ खायला दिले जातात आणि दोन ते चार आठवडे मऊ अन्न खाण्यास सांगितलं जातं. बॅरिएट्रिक सर्जरी झाल्यापासून एक महिन्यानंतर रूग्णांना संपूर्ण आहार घेण्याची परवानगी दिली जाते.'

शस्त्रक्रियेनंतर आता आपलं वजन वाढणारच नाही, अशा भ्रमात राहणं चुकीचं आहे. भविष्यातील सुदृढ जीवनशैलीसाठी आहार आणि व्यायामाचं नियोजन सुरूच राहायला हवं. म्हणून डॉ. गोएल सांगतात, 'बॅरिएट्रिक सर्जरीनंतर २४ तासांतच रूग्णास चालण्याचा व्यायाम करण्यास उत्तेजन दिलं जातं. तसंच शस्त्रक्रियेनंतर तीन आठवडय़ांनंतर पोहणं आणि चार आठवडय़ांनंतर जीममधील व्यायाम सुरू करण्याचा सल्लाही रूग्णांना दिला जातो. मात्र तीन महिन्यांपर्यंत पोटाशी संबंधित व्यायाम टाळणं गरजेचं असतं.'

मुळात ही वेळ येऊ देण्यापेक्षा जितकं आपण आपल्या बाह्यसौंदर्याबाबत सजग असतो तितकंच किंबहुना अधिक आरोग्याशी निगडीत अंतर्गत गोष्टींबाबतही असलं पाहिजे. अंतर्बाह्य सौंदर्य आणि सुदृढतेसाठी 'चालणं' हा उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं जातं. या 'पायपिटासना'च्या सर्वज्ञात फायद्यांना तर अलीकडेच इंपिरिअल कॉलेज लंडन आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन या संस्थांनी सूक्ष्म संशोधनाने पुन:श्च दुजोरा दिला आहे.


स्थूलता कशी ठरवली जाते..
सर्वसामान्यत: व्यक्तीचे वय आणि उंची यांनुसार अपेक्षित असणारे वजन २० टक्क्याहून अधिक असेल तर त्या व्यक्तीची स्थूलतेत-लठ्ठपणात गणती होते. शास्त्रीयदृष्टय़ा स्थूलता ठरविण्यासाठी 'शरीरातील द्रव्यमान निर्देशांक (बॉडी मास इंडेक्स- बीएमआय)',

'अँथ्रोपोमेट्री (त्वचेच्या वळ्यांचा जाडपणा)', 'डेन्सीटोमेट्री (पाण्याच्या खालचं मोजमाप)', 'कम्प्युटर टोमोग्राफी (सीटी)' किंवा 'एमआरआय अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल इम्पेडन्स' अशी वेगवेगळी परिमाणं आहेत.

यात बॉडी मास इंडेक्स(बीएमआय) हे परिमाण सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचं प्रमाण खालीप्रमाणे:-
वाजवीपेक्षा कमी वजन असलेला:- १८.५ किग्रॅ/मी पेक्षा कमी
सामान्य वजन : १८.५ – २४.९ १८.५ किग्रॅ/मी
जादा वजन : २५- २९.९ किग्रॅ/मी
स्थूलता : ३०-३३ किग्रॅ/मी
अतिस्थूलता : त्यापेक्षा अधिक
तसंच कंबर-नितंब (वेस्ट-हिप) गुणोत्तरसुद्धा स्थूलता ठरविण्यात मदत करू शकतं. स्थूलतेसंबंधित स्कँडिनेव्हिया अभ्यासात असं दिसून आलं आहे की, आपल्या शरीरात चरबी आपल्या कमरेभोवती जमा होते. आणि हा प्रकार नितंब आणि मांडीवर जमा होणा-या चरबीच्या प्रकारापेक्षा जास्त घातक असतो.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe