Thursday, May 30, 2013

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS

करंजा-कोंढरी जेटीचे काम निकृष्ट दर्जाचे

करंजा-कोंढरीपाडाच्या समुद्रकिना-यावर जेटी उभारण्याचे काम सुरू असताना अचानक जेटीचा काही भाग ढासळला.

उरण -  करंजा-कोंढरीपाडाच्या समुद्रकिना-यावर जेटी उभारण्याचे काम सुरू असताना अचानक जेटीचा काही भाग ढासळला. या घटनेमुळे कोळी बांधवांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जेटीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यानेच जेटी ढासळली. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, तोपर्यंत उर्वरित बांधकाम थांबवण्याची मागणी येथील कोळी बांधवांनी केली आहे.

उरण तालुक्यातील करंजा येथे मच्छीमारी करणा-या बोटींना सुरक्षित जेटी मिळावी, अशी मागणी करंजा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, उपाध्यक्ष रमेश नाखवा व त्यांच्या सहका-यांनी राज्य सरकारकडे केली होती. कोळी बांधवांच्या या मागणीची दखल घेत सरकारने कोंढरी विकास आराखडा तयार करून करंजा ते कोंढरी या ५४ मीटरच्या जेटीचे व रस्त्याचे काम राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मंजूर केले. तसेच त्यासाठी ४ कोटी ७२ लाखांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. या जेटीचे काम मागील ५ महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने कोळी बांधवांनी नेहमीच आवाज उठविला.

मात्र, अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. आठवडाभरापूर्वी जेटी बांधणीचे काम सुरू असताना अचानक जेटीचा काही भाग ढासळला. या घटनेमुळे मच्छीमारांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच बांधकामाच्या चौकशीची मागणी केली आहे.

करंजा ते कोंढरी या जेटीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे आम्ही संबंधित खात्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरी कंत्राटदाराने आपले काम सुरूच ठेवले आहे. यामुळे सरकारचे कोटयवधी रुपये पाण्यात जाणार आहेत.  -  प्रदीप नाखवा ,  अध्यक्ष ,  करंजा मच्छीमार सोसायटी

Read More »

समाजोन्नतीसाठी युवकांनी पुढे यावे

आपण ग्रामीण भागातील असलो तरी आपल्यामध्ये टॅलेन्ट आहे. जिद्द व चिकाटीने प्रयत्न करून आपण यशस्वी होऊ शकतो.

कर्जत - आपण ग्रामीण भागातील असलो तरी आपल्यामध्ये टॅलेन्ट आहे. जिद्द व चिकाटीने प्रयत्न करून आपण यशस्वी होऊ शकतो. समाजोन्नतीसाठी सर्वानी सहकार्य केले पाहिजे. भविष्यात युवकांच्या हातातच सारे काही असणार आहे. त्यामुळे युवकांनी पुढे यावे, असे आवाहन अभिनेत्री जुई गडकरी यांनी येथे केले.

येथील रॉयल गार्डनच्या सभागृहामध्ये अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यवर्ती संस्थेच्या वतीने अखिल भारतीय युवा स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जुई गडकरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर वैद्य, उपाध्यक्ष नितीन वैद्य, दिलीप गडकरी, सचिन संजय दिघे, खजिनदार प्रमोद नाचणे, सहसचिव प्रकाश दिघे, रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष राजे, तालुकाध्यक्ष विनायक प्रधान, चंद्रकांत जयवंत आदी उपस्थित होते.

डॉ. गौरव दिघे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. निमंत्रक दिलीप गडकरी यांनी प्रास्ताविकेत युवा स्नेह संमेलनाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर संदीप प्रधान, समीर दिघे, नेहा प्रधान, आनंद वैद्य, शैलेश मोहिले यांच्यासह प्रिया गडकरी यांनी मनोगते व्यक्त केली.

तर, सुभाष राजे, सुधाकर वैद्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका प्रधान यांनी केले. दुपारच्या सत्रात तरुणाईने आपल्यातील सुप्तगुण सादर करून धमाल उडवून दिली.

Read More »

एका क्षणात भिकारी

'अॅब्सोल्यूट पोकर' नावाचा ऑनलाइन खेळला जाणारा जुगाराचा प्रकार काही वर्षापूर्वी खूपच लोकप्रिय होता. त्या वेळी हा प्रकार सुरू करणारे सहा मित्र अमाप श्रीमंतीत जगत होते.

'अॅब्सोल्यूट पोकर' नावाचा ऑनलाइन खेळला जाणारा जुगाराचा प्रकार काही वर्षापूर्वी खूपच लोकप्रिय होता. त्या वेळी हा प्रकार सुरू करणारे सहा मित्र अमाप श्रीमंतीत जगत होते. जुगाराच्या या प्रकारातून अफाट संपत्ती त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. ब्रेंट बेकले, त्याचा सावत्र भाऊ स्कॉट टॉम, गॅरिन गुस्टॅफसन, पेटे बेरोविच, शेन ब्लॅकफोर्ड आणि ऑस्कर हिल्ट या सहा मित्रांनी हा प्रकार सुरू केला.

२००० मध्ये ऑनलाइन पोकर ही नवी संकल्पना नसली तरी इंटरनेटच्या माध्यमातून कमावता येणारा पैसा नवीन होता. या माध्यमाचा वापर करून अमाप पैसा कमावता येईल हे या मित्रांनी ओळखले. हा खेळ चालवण्यामध्ये कोणताही कायदेशीर अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी वकिलांचा सल्ला घेतला. त्यांचा हा खेळ कोणत्याही कायदेशीर कचाटय़ामध्ये सापडणार नाही, असा सल्ला मिळाल्यावर त्यांनी या खेळाची लोकप्रियता वाढवली. बेटिंग या प्रकारासाठी असलेल्या नियमांमधील त्रुटी त्यांनी लक्षात घेतल्या.

पोकर हा खेळ कौशल्याचा आहे नशिबाचा नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. त्यांनी कोस्टा रिकाला त्यांचे मुख्यालय बनवले. या देशात त्यांच्या खेळाला कोणतीही आडकाठी येणार नसल्याचे लक्षात घेतल्यावर, त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीसाठी त्यांनी कोरियामधील गुंतवणूकदार मिळवला. या खेळामधून काही महिन्यातच ते लक्षाधीश झाले. पण त्यानंतर दरवर्षी त्यांच्या कंपनीचा फायदा १०० टक्क्यांनी वाढू लागला. एकेकाळी त्यांच्याकडे १० कोटी डॉलरची मालमत्ता होती.

मिळणा-या अफाट पैशातून त्यांची चैन सुरू झाली. महागडय़ा गाडय़ा, वेगवान दुचाकी आणि पाटर्य़ा असे आयुष्य सुरू झाले. मात्र, २००६ मध्ये अशा प्रकारच्या जुगाराविरोधातील कायदा लागू झाला. अमेरिकेची गुप्तचर संघटना एफबीआयने या कंपनीची चौकशी सुरू केली. दोन वर्षे या कंपनीची चौकशी केल्यावर अखेर तो दिवस उजाडला. १५ एप्रिल २०११ रोजी या कंपनीच्या सर्व साइट ब्लॉक करून टाकण्यात आल्या. या मित्रांसाठी हा दिवस 'ब्लॅक फ्रायडे' ठरला. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

Read More »

बोईसरमधील अनधिकृत इमारत जमीनदोस्त

बोईसर येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेली इमारत महसूल विभागाने धडक कारवाई करून जमीनदोस्त केली. 

पालघर - बोईसर येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेली इमारत महसूल विभागाने धडक कारवाई करून जमीनदोस्त केली. या इमारतीमधील रहिवाशांनी विकासकावर फसवणुकीचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महसूल विभागाकडे केली आहे.

बोईसर येथील संजयनगर भागातील सरकारी जमिनीवर बबलू सिंग या विकासकाने बेकायदा इमारत बांधली होती. सदनिका विकताना त्याने ही खासगी जमीन असल्याचे बनावट कागदपत्र सर्व सदनिकाधारकांना दिले होते. गेल्या आठवडयात महसूल विभागाने ही इमारत अनधिकृत असल्याने खाली करावी, अन्यथा कारवाई करण्याची नोटिस सदनिकाधारकांना बजावली होती.

नोटिसीमुळे धास्तावलेल्या सदनिकाधारकांना विकासकाने इमारतीला २० वर्षाचा स्थगिती आदेश असल्याचे सांगत निर्धास्त राहण्यास सांगितले हाते. मात्र, पालघरचे तहसीलदार सुरेंद्र नवले यांनी चोख पोलिस बंदोबस्तात इमारत जमीनदोस्त केली.

Read More »

जोकोविच, अझारेंकाची विजयी सलामी

कारकीर्दीत पहिल्यांदा फ्रेंच ओपन जिंकण्यासाठी उत्सुक असलेला अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने मंगळवारी पावसाच्या व्यत्ययात विजयी सलामी दिली.

पॅरिस- कारकीर्दीत पहिल्यांदा फ्रेंच ओपन जिंकण्यासाठी उत्सुक असलेला अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने मंगळवारी पावसाच्या व्यत्ययात विजयी सलामी दिली. जोकोविचप्रमाणे तिसरी सीडेड बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने विजयी सुरुवात केली. चौथा सीडेड स्पेनच्या डेव्हिड फेरर, सहावा सीडेड फ्रान्सच्या जो-विल्फ्रेड त्सोंगा आणि चौथ्या सीडेड पोलंडच्या अ‍ॅग्नेस्का रॅडवँस्काने तिस-या फेरीत प्रवेश केला.

पुरुष एकेरीत जोकोविचने बेल्यिजमच्या डेव्हिड गॉफिनला ७-६, ६-४, ७-५ असे नमवत दुसरी फेरी गाठली. पावसामुळे जोकोविचची लढत तब्बल चार तास उशीराने सुरू झाली. मात्र त्याच्यासह प्रेक्षकांनीही संयम सोडला नाही. विजयानंतर जोकोविचने प्रेक्षकांचे आवर्जून आभार मानले. जागतिक क्रमवारीत ५८वे मानांकन असलेला गॉफिनने जोकोविचला पहिल्या आणि तिस-या सेटमध्ये टायब्रेकरवर झुंजवले होते. मात्र जोकोविचने फोरहॅँडचे काही सुरेख फटके लगावत विजय नोंदवला.

बुधवारी झालेल्या लढतींमध्ये महिला एकेरीत बेलारुसच्या अझारेंकानाही रशियाच्या एलिना वेस्निनाचा ६-१, ६-४ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. अझारेंकाची लढतही पावसामुळे मंगळवारऐवजी बुधवारी खेळण्यात आली. स्पेनच्या फेररने त्याच्याच देशाच्या अल्बर्ट मोंटानेसला ६-२, ६-१, ६-३ असे सहज नमवत तिसरी फेरी गाठली. फ्रान्सच्या त्सोंगाने घरच्या प्रेक्षकांसमोर फिनलॅँडच्या यार्को निमिनेनला ७-६, ६-४, ६-३ असे नमवले. याबरोबरच त्सोंगाने तिसरी फेरी गाठली. १०वा मानांकित क्रोएशियाच्या मॅरिन चिलिचनेही सहज तिसरी फेरी गाठली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या निक किगरेइसला ६-४, ६-२, ६-२ असे सहज पराभूत केले. महिला एकेरीच्या दुस-या फेरीत चौथ्या मानांकित पोलंडच्या अ‍ॅग्नेस्का रॅडवँस्कानेही विजय मिळवला. तिने अमेरिकेच्या मॅलोरी बुडेटेवर ६-३, ६-२ असा विजय मिळवला. आठवी मानांकित जर्मनीच्या अ‍ॅँजेलिक कर्बरने तिसरी फेरी गाठताना स्लोव्हाकियाच्या याना सेपेलोवाचा ६-२, ६-२ असा पराभव केला. सातवी मानांकित चेक रिपब्लिकच्या पेट्रा क्विटोवानेही दुसरी फेरी गाठताना फ्रान्सच्या अर्वेन रेझाइला ६-३, ४-६, ६-२ असे नमवले. पुरुष एकेरीत आठवा मानांकित सर्बियाच्या यांको टिपसारेविचने फ्रान्सच्या निकोलस माहुतला ६-२, ७-६, ६-१ असे नमवत विजयी सलामी दिली.

तत्पूर्वी, मंगळवारी उशीरा झालेल्या अन्य लढतीत महिला एकेरीमध्ये १३वी सीडेड फ्रान्सच्या मारियन बाटरेलीला दुसरी फेरी गाठण्यासाठी झुंजावे लागले. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत असला तरी बाटरेलीला बल्गेरियाच्या ओल्गा गोवोटसोवाने झुंजवले. त्यातच या लढतीत सतत पावसाचाही व्यत्यत येत होता. या स्थितीत बाटरेलीने ही लढत ७-६, ४-६, ७-५ अशी जिंकली. पुरुष एकेरीच्या लढतींत १२वा सीडेड जर्मनीच्या टॉमी हासने फ्रान्सच्या गुलॉमी रुफिनचा ७-६, ६-१, ६-३ असा पराभव केला आणि दुसरी फेरी गाठली. नववा मानाांकित स्वित्झर्लंडलडच्या स्टानिस्लास वावरिंकानेही विजयी सलामी देताना हॉलंडच्या थिमो डी बॅकरला ७-५, ६-३, ६-७, ७-५ असे नमवले.

भूपती-बोपण्णा पराभूत, पेस दुस-या फेरीत

महेश भूपती आणि रोहन बोपण्णा ही भारताची जोडी पुरुष दुहेरीच्या सलामीलाच गारद झाली. या जोडीला मंगळवारी टोमास बेडनॅरेक आणि जर्झी जॅनोविझ या पोलंडच्या जोडीकडून ५-७, ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र भारताचा अनुभवी लिअँडर पेसने मात्र ऑस्ट्रियाच्या जुर्जेन मेल्झरसह पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली. या जोडीने पियर ह्य़ुज हर्बट आणि निकोलस रेनावॅँड या जोडीवर ६-३, ६-३ असा विजय मिळवला.

Read More »

कोपरमध्ये बेकायदा रेती उपसा

तालुक्यातील रावे, दादर, कोपर भागांमध्ये बेकायदा रेती उपसा केला जात आहे, याकडे संबंधित अधिकारी कानाडोळा करत असल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 

पेण - तालुक्यातील रावे, दादर, कोपर भागांमध्ये बेकायदा रेती उपसा केला जात आहे, याकडे संबंधित अधिकारी कानाडोळा करत असल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बेकायदा रेती उपसा त्वरित बंद करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी कोपर ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा ठाकूर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

येथील रावे, दादरसह कोपर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सक्शन पंप लावून रेती उपसा केला जात आहे. कोपरमध्ये रेती उपसा केला जातो तेथून जवळच गॅस पाइपलाइन गेलेली आहे. त्यामुळे या रेती उपसामुळे परिसरात जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच रोहे व रावे रस्त्यालगतदेखील सक्शन पंप लावून बेकायदा रेती उपसा केला जात आहे.

एवढया मोठया प्रमाणात रेतीचा उपसा होत असूनही अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे कोपर गावातील ग्रामस्थांनी या प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करावी, अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार डॉ. संदीप चव्हाण यांना दिले. या निवेदनाची प्रत आमदर धौर्यशील पाटील, जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त कोकण भुवन, पेण पोलिस ठाणे यांना देण्यात आले आहेत.

त्यामुळे अनधिकृरीत्या सक्शन पंपाद्वारे रेती उपसा करण्याच्या कामावर तहसीलदार व संबंधित अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

Read More »

माता न तू वैरिणी!

चीनमध्ये नुकतीच एका नवजात अर्भकाची स्वच्छतागृहाच्या पाइपमधून सुटका करण्यात आली.

चीनमध्ये नुकतीच एका नवजात अर्भकाची स्वच्छतागृहाच्या पाइपमधून सुटका करण्यात आली. या इमारतीमध्ये भाडय़ाने राहणा-या २२ वर्षाच्या युवतीने तिच्या पोटी जन्माला आलेल्या या अर्भकाला स्वच्छतागृहाच्या फ्लशमध्ये फेकून दिले होते.

त्यानंतर त्या इमारतीच्या पाइपमधून अग्निशमन दलाच्या जवानांनी तो पाइप कापून काढून डॉक्टरांच्या मदतीने या बालकाला जिवंत वाचवण्यात यश मिळवले. त्या वेळी या अर्भकाला फेकणारी माता बाजूला उभी राहून या अर्भकाला वाचवण्याचे प्रयत्न पाहत होती. तिनेच आरडा-ओरडा करून पाइपमध्ये अर्भक असल्याकडे लक्ष वेधल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, हे अर्भक सापडल्यानंतर पोलिसांनी या इमारतीमधील तिच्या घराची झडती घेतल्यावर तिने या कृत्याची कबुली दिली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दोन दिवसांच्या या अर्भकाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला 'बेबी-५९' असे नाव दिले आहे. पाइपमध्ये अडकलेल्या या अर्भकाच्या कवटीला इजा झाली असून शरीरावर अनेक ठिकाणी खरचटले आहे. या अर्भकाला जिवंत वाचवण्यात आल्यावर व त्याला फेकून देणा-या त्याच्या आईचा पोलिसांनी तपास केल्यावर सध्या ती त्याच्यासोबत रुग्णालयात आहे.

Read More »

कल्याणमध्ये निधीअभावी कंत्राटदारांची बिले थकली

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात निर्मल स्वच्छता अभियानातंर्गत तीन वर्षापूर्वी ३२ दुमजली प्रसाधनगृहे बांधण्यात आली होती.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात निर्मल स्वच्छता अभियानातंर्गत तीन वर्षापूर्वी ३२ दुमजली प्रसाधनगृहे बांधण्यात आली होती. या कामांसाठी एमएमआरडीएकडून महापालिकेला निधी दिला जाणार होता. मात्र, एमएमआरडीएकडून निधीच न आल्याने महापालिकेने तीन वष्रे कंत्राटदारांना कामांची बिले दिलेली नाहीत. दरम्यान, महापालिका पैसे असूनही बिले काढण्यास चालढकल करत असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे.

महापालिका हद्दीत एमएमआर-निर्मल स्वच्छता अभियानातंर्गत कंत्राटदारांमार्फत ३२ स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती.

या बांधकामांपैकी १० कामांची बिले कंत्राटदारांना मिळाली आहेत. तर उर्वरित २२ कामांची बिले तीन वष्रे उलटूनही अद्याप काढण्यात आलेली नाहीत. अडीच कोटी रुपये खर्चाच्या या योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली होती. स्वच्छतागृहे बांधण्यासाठी प्रथम कंपन्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर एमएमआरडीएने मंजूर निधी महापालिकेकडे हस्तांतरीतच केला नाही. त्यामुळे तीन वष्रे महापालिकेने कंत्राटदारांना कामाचे पैसे दिलेले नाहीत.

दरम्यान, कामांची बिले काढण्यासाठी कंत्राटदारांनी एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला असता १ कोटी ७० लाखांचा धनादेश २५ एप्रिलाच महापालिकेस देण्यात आल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. त्यामुळे धनादेश मिळूनही महापालिका बिले काढण्यास चालढकल करत असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे.

एमएमआरडीएकडून निधी न आल्याने कंत्राटदारांची बिले देण्यात आली नव्हती. मात्र, आता निधी मिळाला असल्याने कंत्राटदारांना लवकरच त्यांच्या कामांचे पैसे मिळतील.- पी. के. उगले , शहर अभियंता ,  केडीएमसी 

Read More »

रायगडवासीयांना त्वरित जातीचे दाखले द्यावेत

 रायगडमधील कुणबी समाजातील लोकांना जातीचे दाखले देताना होणा-या नाहक त्रासाबद्दल सखोल चौकशी करावी.

नागोठणे - रायगडमधील कुणबी समाजातील लोकांना जातीचे दाखले देताना होणा-या नाहक त्रासाबद्दल सखोल चौकशी करावी. तसेच येथील लोकांना त्वरित दाखले द्यावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. कुणबी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत रायगड तालुक्यातील रोहे, मुरुड, पेण, पनवेल, कर्जत, सुधागड, खालापूर तालुक्यातील कुणबी समाजातील लोकांना त्वरित दाखले देण्याचा निर्णय घेण्यात आला.

रोहे येथे झालेल्या कुणबी भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री सुनील तटकरे यांनी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांच्या आग्रही मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आमदार किसन कथोरे, सुरेश लाड, जिल्हाधिकारी जावळे, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर, रामचंद्र जाधव,आदी उपस्थित होते.

बैठकीत मुंबई कूळ वहिवाट अधिनियम १९४८ मधील ६७-४ मधील १ मध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला होता. मात्र, मंत्रालयाला लागलेल्या आगीत सर्व कागदपत्रे नष्ट झाल्याने आता नव्याने प्रस्ताव सादर करावा. त्यानुसार पावसाळी अधिवेशनात त्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

Read More »

एमसीए रिक्रिएशन सेंटरला शरद पवार यांचे नाव

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वांद्रे-कुर्ला संकुलातील रिक्रिएशन सेंटरला आयसीसीचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे.

मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वांद्रे-कुर्ला संकुलातील रिक्रिएशन सेंटरला आयसीसीचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे.

एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय झाला. एमसीए रिक्रिएशन सेंटरला पवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि तो मंजूरही झाला. पवार यांचे नाव रिक्रिएशन सेंटरला देण्यात आल्यानंतर एमसीएच्या कांदिवलीतील स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीला विक्रमादित्य सुनील गावस्कर यांचे नाव द्यावे, अशी मागणी न्यू हिंद क्रिकेट क्लबने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे केली आहे.

वानखेडे स्टेडियममधील पत्रकार कक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय एमसीएने नुकताच घेतला आहे.

Read More »

'ईर्डा'च्या प्रतिज्ञापत्रावर छोटया नर्सिग होमचे भवितव्य

 शहरी भागात १० हजार लोकसंख्येच्या क्षेत्रात कमीत कमी १० खाटांचे रुग्णालय असावे, असे परिपत्रक विमा नियंत्रण प्राधिकरणाने (ईर्डा) काढल्याने १५ खाटांपेक्षा कमी खाटा असलेल्या नर्सिग होममधील कॅशलेस सुविधेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

मुंबई - शहरी भागात १० हजार लोकसंख्येच्या क्षेत्रात कमीत कमी १० खाटांचे रुग्णालय असावे, असे परिपत्रक विमा नियंत्रण प्राधिकरणाने (ईर्डा) काढल्याने १५ खाटांपेक्षा कमी खाटा असलेल्या नर्सिग होममधील कॅशलेस सुविधेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा नर्सिग होममध्ये दाखल झाल्यास रुग्णाला कॅशलेस सुविधा मिळणार नसल्याने काही संघटनांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

यावर न्यायालयाने विमा नियंत्रण प्राधिकरणाला (ईर्डा) प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून, ईर्डाच्या या प्रतिज्ञापत्रावर छोटया नर्सिग होमचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

सरकारी आणि खासगी क्षेत्रातील विमा कंपन्या आणि टीपीए (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटर)करता विमा नियंत्रण प्राधिकरणने(ईर्डा) हे परिपत्रक काढले आहे. शहरी भागात १० हजार लोकसंख्येच्या क्षेत्रात कमीत कमी १० खाटांचे रुग्णालय असावे, असे सांगतानाच, यावर येत्या १ जुलैपासून अंमलबजावणी होणार असल्याचे म्हटले आहे. मुंबईचा विचार केला असता, शहरात १२०० पैकी ६८४ नर्सिग होम १५ खाटांपेक्षा कमी क्षमता असलेले आहेत.

त्यामुळे या परिपत्रकाची अंमलबजावणी झाल्यास त्याचा मोठा फटका रुग्णांना बसणार आहे. मुंबईतच नव्हे, तर देशातील अन्य राज्यांतही १५ खाटांपेक्षा कमी क्षमता असलेले नर्सिग होम असल्याचे 'एएमसी'चे अध्यक्ष डॉ. सुधीर नाईक यांनी सांगितले. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने 'ईर्डा'ला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे
आदेश दिले आहेत.

ईर्डाच्या या प्रतिज्ञापत्रावर छोटया नर्सिग होमचे भवितव्य अवलंबून असेल. दरम्यान, देशात अवघे २० टक्के नागरिक वैद्यकीय विमा उतरवतात. ईर्डाने काढलेले परिपत्रक खूपच अन्यायकारक आहे. या प्रकरणी एएमसीच्या सदस्य असलेल्या डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र वैद्यकीय विमा असलेल्या रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, याकरताच हा प्रयत्न असल्याचे काही डॉक्टरांनी खासगीत सांगितले.

Read More »

नालेसफाई पाहणी दौ-यात शिवसेनेचे पितळ उघडे

पूर्व उपनगरातील नाल्यांचे मुखदर्शन घेतल्यानंतर शिवसेनेने मंगळवारी पश्चिम उपनगरातील नाल्यांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. 

मुंबई - एरव्ही निश्चित केलेल्या ठिकाणीच नेऊन नालेसफाई समाधानकारक झाल्याचे प्रशस्तीपत्रक देणा-या सत्ताधारी आणि पालिका अधिका-यांनी चक्क उद्धव ठाकरे यांच्याच डोळय़ांत 'कचरा'फेक करण्याचा प्रयत्न केल्याचे मंगळवारच्या नालेसफाई पाहणीदरम्यान उघड झाले.

पूर्व उपनगरातील नाल्यांचे मुखदर्शन घेतल्यानंतर शिवसेनेने मंगळवारी पश्चिम उपनगरातील नाल्यांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. या वेळी पालिका अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांना निश्चित केलेल्या ठिकाणी नेण्याची योजना आखली होती. मात्र निश्चित केलेल्या नाल्यांची पाहणी करतानाच, उद्धव ठाकरे यांनी आपली गाडी अचानक लक्ष्मी इंडस्ट्रियलजवळील नाल्याजवळ थांबवली. मात्र त्यांच्या नजरेस पडला, तो कच-याने भरलेला नाला. या वेळी उद्धव ठाकरेसोबत महापौर सुनील प्रभू व सभागृहनेते शैलेश फणसेही उपस्थित होते.

प्रशासनाच्या कार्यक्रमात हा नाला नसताना उद्धव ठाकरे या ठिकाणी थांबल्याने अधिकाऱ्यांसह नेत्यांचीही धावपळ उडाली. आतापर्यंत सफाई होतानाचे नाले पाहणा-या उद्धव ठाकरे यांच्या डोळयात हे चित्र खुपले खरे, मात्र याचा गवगवा नको म्हणून महापौरांनीही अधिका-यांना पुढच्या ठिकाणांवर पिटाळून आपल्या कृतीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्याच नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपले पितळ उघडे पाडल्याने खंतावलेल्या ठाकरे यांनीही तेथून लागलीच काढता पाय घेणे पसंद केले. दरम्यान, केवळ सात ते आठ नाले पाहून समाधानकारक सफाई होत असल्याचा दावा करणा-या शिवसेनेला यानिमित्ताने घरचा अहेरच मिळाला आहे.

Read More »

अक्षय शाहरूखला भिडणार

शाहरूखसारख्या कलाकाराला भिडायचे तर अक्षयला इतके करावे लागणारच नाही का?

मुंबई  -  बॉलिवुड कलाकारांतील शीतयुद्ध या ना त्या निमित्ताने पुढे येतच असतं. चित्रपट रीलिज करणं असो; अन्यथा अन्य काही, हे कलाकार एकमेकांवर होता होईल, तितकी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतच असतात.

या कुरघोडी करण्यात सलमान खान, आमीर खान आणि शाहरूख या आघाडीच्या नावांसोबतच अजून एका नावाची भर पडली आहे, ती म्हणजे अक्षयकुमारची. आपल्या आगामी 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन' या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने चक्क शाहरूख खानवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट येत्या ईदला रीलिज होणार आहे.

शिवाय या चित्रपटातील नफाही तो शेअर करणार आहे, तो वेगळाच. आता शाहरूखसारख्या कलाकाराला भिडायचे तर अक्षयला इतके करावे लागणारच नाही का?याच वेळी शाहरूखचाही 'चेन्नई एक्सप्रेस' हा चित्रपट रीलिज होतोय. पण त्याही पुढे जात

 

अक्षयने आधीच आपल्या चित्रपटाचे प्रोमो लाँच करून शाहरूखला मात देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणे!
या चित्रपटासाठी अक्षयने २३ कोटी रुपये घेतले आहेत.

Read More »

युरोप फुटबॉलवर दबदबा बायर्न म्युनिचचा

चॅँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत जेतेपद पटकावणारा बायर्न म्युनिच संघाने मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करतानाच त्यांनी जगातील सर्वात मोठा ब्रॅँड होण्याचा मान पटकावला आहे.

लंडन- चॅँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत जेतेपद पटकावणारा बायर्न म्युनिच संघ युरोपच्या या हंगामातील सर्वोत्तम फुटबॉल संघ ठरला. मात्र बायर्नची 'किक' तेवढय़ावरच थांबली नाही. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करतानाच त्यांनी जगातील सर्वात मोठा ब्रॅँड होण्याचा मान पटकावला आहे. त्यात त्यांनी यंदा मॅँचेस्टर युनायटेडला मागे टाकले. जर्मनीचा संघ असलेल्या बायर्नने यंदा बुंदेस्लिगाचे जेतेपद विक्रमी वेळेत पटकवल्यानंतर चॅँपियन्स लीग जिंकली. त्यामुळे २०१२ पेक्षा यंदा त्यांच्या किंमतीत ९ टक्यांनी वाढ झाली त्याचाच फायदा त्यांना 'युरोपातील सर्वात मोठा ब्रॅँड' ठरवून गेला. या उलट यंदा इंग्लिश प्रिमियर लीग जिंकलेल्या युनायटेडच्या 'ब्रॅँड'मध्ये २०१२ पेक्षा दोन टक्क्यांची घसरण झाली. चॅँपियन्स लीगच्या अंतिम १६ मध्ये रेआल माद्रिदकडून झालेला पराभव युनायटेडचा 'ब्रॅँड' कमी होण्यास कारणीभूत ठरला आहे.

रेआल माद्रिद यंदा स्पॅनिश ला-लिगा, चॅँपियन्स लीग जेतेपदांपासून वंचित राहीला तरी त्यांच्या 'ब्रॅँड'मध्ये चार टक्यांची वाढ झाली. त्यामुळे त्यांना तिसरे स्थान मिळवता आले. याउलट चॅँपियन्स लीगच्या उपांत्य फेरीत बायर्नकडून ०-७ अशा मोठय़ा फरकाने पराभव स्वीकारावा लागलेल्या बार्सिलोनाच्या 'ब्रॅँड'मध्ये एका टक्याची घसरण झाली आहे. मात्र २०१२ प्रमाणे त्यांना चौथे स्थान राखता आले. यंदा चॅँपियन्स लीगचे उपविजेतेपद मिळवणारा बोरुसिया डॉर्टमुंड या जर्मन संघाला पहिल्या १० मध्ये स्थान मिळवता आले. गेल्या वर्षी ते ११व्या स्थानी होते. इंग्लिश प्रिमियर लीगच्या अन्य संघांना अव्वल १० मध्ये मात्र स्थान मिळवता आले आहे.

''बायर्न म्युनिचचा दबदबा सर्वाधिक आहे. चॅँपियन्स लीगमध्ये दरवर्षी सरस कामगिरी करून सर्वाधिक 'ब्रॅँड' मिळवणारा संघ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांना मागे टाकणे हे आता बुंदेस्लिगातील अन्य संघांसह चॅँपियन्स लीगमधील त्यांच्या प्रतिस्पध्र्यावर अवलंबून असेल,'' असे ब्रॅँड फिनान्सच्या क्रीडा विभागाचे प्रमुख डेव चॅटॅवे यांनी म्हटले. ''सध्याच्या इंग्लिश फुटबॉलच्या तुलनेत जर्मन संघात सामन्यासाठी स्वस्त तिकिटे, प्रेक्षकांची मोठी संख्या, क्लबच्या मालकांची उत्तम आर्थिक परिस्थिती दिसते. हे पाहता बुंदेस्लिगा ही जर्मनीतील लीग आकर्षक वाटते. जर्मन संघाचे फुटबॉल ज्या तऱ्हेने जगात ओळखले जाते, ते बुंदेस्लिगामधून टिकवले गेले आहे. याउलट आर्थिक डबघाईत आलेल्या काही इंग्लिश फुटबॉल संघांनी बुंदेस्लिगाच्या आयोजनाकडून शिकायला हवे,'' असे ब्रॅँड फिनान्सच्या क्रीडा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड हाय यांनी म्हटले.

Read More »

'बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान दुस-याला मारक नाही'

 'बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान मरणारे नाही व दुस-याला मारकही नाही.सिद्धार्थ महाविद्यालयात साज-या झालेल्या गौतम बुद्धांच्या २५५७ व्या जयंती समारंभात ते बोलत होते. 

मुंबई - 'बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान मरणारे नाही व दुस-याला मारकही नाही. एका विशिष्ट कालखंडात संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि म्यानमार हे सर्व देश बुद्धिस्ट होते. तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि धम्मप्रसाराचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अव्याहत सुरू राहील,' असे प्रतिपादन पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. सिद्धार्थ महाविद्यालयात साज-या झालेल्या गौतम बुद्धांच्या २५५७ व्या जयंती समारंभात ते बोलत होते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. आंबेडकरांची धर्मक्रांतीची भूमिका विषद करत बौद्ध धर्माचा जाज्वल्य इतिहास अनेक पुरावे व दाखले देत उपस्थितांसमोर उभा केला.

या कार्यक्रमाचे विशेष अतिथी असलेल्या प्रशासकीय अधिकारी श्याम तागडे यांनी आपल्या भाषणातून श्रोत्यांना, गौतम बुद्धांच्या धम्मातील पंचशील, दहा पारमिता आणि अष्टांग मार्गाचे आपल्या प्रत्यक्ष जीवनात आपण किती आचरण करतो, या मार्गावर माझी स्वत:ची नेमकी स्थिती व प्रगती काय आहे, याचे प्रत्येकाने परीक्षण करायला हवे, असे आवाहन केले.

तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. अशोक तळवटकर यांनी बौद्ध धर्माच्या आचरणाचा व्यक्ती व पर्यायाने सामाजावर होणारा सकारात्मक परिणाम स्पष्ट केला. माणसाचे मन, शरीर आणि वाणी नियंत्रित करणा-या बौद्ध धर्माचा अंगीकार करून डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचे भारतात पुनरुज्जीवन केले असल्याचे सांगितले.

Read More »

भाड्याचा घरांचा वाद रंगणार

सर्वसामान्य गरजूंना मुंबईत घर मिळावे, या उद्देशाने म्हाडा सोडतीद्वारे घर देते. हे घर ज्या व्यक्तीला मिळाले आहे, त्यांनी ते विकू नये, असा नियम आहे.

सर्वसामान्य गरजूंना मुंबईत घर मिळावे, या उद्देशाने म्हाडा सोडतीद्वारे घर देते. हे घर ज्या व्यक्तीला मिळाले आहे, त्यांनी ते विकू नये, असा नियम आहे. मात्र आता भाडयाने घरे देण्याबाबतची घोषणाच खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने ख-या गरजूंना परवडणा-या किमतीत घर देण्याच्या उद्देशालाच तडा जाण्याची शक्यता आहे. या घोषणेवर येत्या काही दिवसांत होणा-या प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे यापुढे भाडयाने घरांचा निर्णय योग्य व अयोग्य अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटणार असल्याने भाडयाच्या  घरांचा वाद आता रंगणार आहे.

सध्या घरांच्या किमती प्रचंड वाढल्याने घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. ज्यांना मुंबईत घर नाही, असे सर्वसामान्य गरजू म्हाडाच्या परवडणा-या घरांच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळेच दरवर्षीच्या सोडतीसाठी लाखाच्या वर अर्ज येतात. सोडतीत अनेक गरजूंना घरे लागल्याने मुंबईत हक्काचे घर घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होते. मात्र मिळालेले घर भाडयाने देऊ नये, असा म्हाडाचा नियम आहे. काही वर्षापूर्वी भाडयाने घरे देण्याचा मुद्दा पुढे आला होता, मात्र त्या वेळचे म्हाडाचे उपाध्यक्ष गौतम चटर्जी यांनी त्याला विरोध करून हा मुद्दा निकाली काढला होता. मात्र आता पुन्हा हा मुद्दा उपस्थित झाल्याने यावर शिक्कामोर्तब कधी होतेय, याकडे धनदांगडयाचे लक्ष वेधले आहे.

हा निर्णय झाल्यास म्हाडाची घरे कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळवायची व ती भाडय़ाने देण्याचा धंदा करायचा, असा प्रकार सुरू होणार आहे. याचा फायदा दलालांना होण्याची भीती आहे. आधीच म्हाडाच्या घरांवर दलालांचा डोळा असतो. मोठय़ा किमतीची आमिषे दाखवून घरे कशी हडप करता येतील, असा प्रयत्न दलालांचा असतो. अशा प्रकारची काही प्रकरणेही उघड झाली आहेत. आता भाडयाच्या घरांचा प्रश्न आयताच पुढे आल्याने या दलालांचे फावणार आहे.

म्हाडा कायदा मिळकत व व्यवस्थापन (सदनिका विक्री व हस्तांतरण) कलम २५अन्वये पाच वर्षापर्यंत घर भाडयाने देता येत नाही. तसेच त्याची विक्रीही करता येत नाही. मात्र ही अट रद्द करण्याचा प्रस्ताव म्हाडाने सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर सरकारनेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. भाडयाने घर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास गरजूंना घरे मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी चर्चाही केली जात आहे. सोडतीतील घरांसाठी बनावट अर्ज भरून अनेक वेळा घरे हडप करण्याची प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. सोडतीत विविध नावांनी अर्ज करून हव्या असलेल्या उत्पन्न गटातील घरे मिळवायची आणि ती भाडयाने द्यायची, हा प्रकार सुरू होणार आहे. त्यामुळे घरे मिळवायची आणि भाडयाने घरे देण्याचा धंदा सुरू करण्याचे प्रकार सुरू होतील.

तसे झाले तर गरजू घरांपासून वंचित राहतील, अशा जाणकारांच्या प्रतिक्रिया आहेत. सोडतीत घरे लागलेल्यांना घरांचा ताबा घेतेवेळी बँकेकडून कर्ज मिळण्यास अनेक अडचणी येतात. या वेळी जास्त किंमत देऊन ही घरे विकत घेणारे दलालही आहेत. त्यामुळे सोडतीत घर लागूनही ज्यांना घराची रक्कम भरणे शक्य नाही, अशा लाभार्थ्यांना दुप्पट किंमत देत ही घरे विकत घेऊन ती भाड्याने द्यायची प्रथा सुरू होईल. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून गुंतवणूक करणा-यांची संख्या वाढेल आणि म्हाडाचा गरजूंना परवडणा-या किमतीत घरे हा मूळ उद्देश पुसला जाण्याची भीती आहे.

Read More »

..तर मुंबईचा पाणीपुरवठा बंद करू

मागील १३ वर्षात मुंबई महानगरपालिकेने ग्रामीण जनतेला फसवी आश्वासने देऊन धरणांची कामे पूर्ण करून घेतली आहेत.

ठाणे  -  मागील १३ वर्षात मुंबई महानगरपालिकेने ग्रामीण जनतेला फसवी आश्वासने देऊन धरणांची कामे पूर्ण करून घेतली आहेत. मात्र स्थानिक जनतेला पाणी देण्यासाठी ठाणे जिल्ह्याला ना हरकत दाखला अजून दिलेला नाही. त्यामुळे कुणबी सेना आक्रमक झाली असून, ठाणे जिल्ह्यातील सर्व धरणांची कामे बंद पाडून, मुंबईचा पाणीपुरवठा बंद करू, असा इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठाणे जिल्ह्यातील धरणांतून स्थानिकांना पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी मिळावे, ही मागणी मुंबई महानगरपालिकेने ना हरकत दाखला न दिल्यामुळे पूर्ण होऊ शकली नसल्याची माहितीजिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी नुकतीच कृषिमंत्री विखे-पाटील यांना दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सर्वाधिक धरणे असतानाही धरणालगतच्या खेड्यात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. मुंबई शहराची तहान दिवसेंदिवस वाढत चालली असून, ठाणे जिल्ह्यातील पाणी, रेती, विटा, लाकूड या नसर्गिक संपत्तीची लयलूट मुंबईकर करत आहेत.

मात्र स्थानिक जनता या सर्व मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय पाण्याअभावी संपुष्टात आला असून, ग्रामीण जनतेकडे उपजीविकेचे साधन राहिले नसल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला वाचवायचे असेल तर या सर्व लगतच्या महानगरपालिकांनी ठाणे जिल्ह्यातील खेडी दत्तक घ्यावीत आणि तिथे पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवून त्यांच्या विकास कामात मदत करावी, असे आवाहन केले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेसाठी गारगाई, पिंजाळ, शाही आदी धरणांची निर्मिती होणार आहे.

कुणबी सेना या धरणांविरोधात पूर्वीपासून आंदोलने करत आली आहे. मात्र यापुढे आंदोलन न करता अस्तित्वाची लढाई करावी लागेल. ठाणे जिल्ह्यातील जनता पाण्याविना मरणार असेल तर कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशाराही विश्वनाथ पाटील यांनी या परिषदेतून दिला आहे.

Read More »

हट्टाच्या आजारावर औषध काय?

हट्ट-मुळातच हाताळायला अवघड असा विषय. मूल हट्ट का करत असेल? यापेक्षाही फक्त लहान मुलंच हट्ट करतात का? घरातली काही मोठी माणसं, आजीआजोबासुद्धा कधीतरी हट्ट करतातच की! असे अनेक प्रश्न पडतात. त्यासाठी हट्ट म्हणजे काय, या अगदी मूळ प्रश्नावर प्रथम विचार करू या. मागच्या लेखात मुलांचा हट्टीपणा, त्यामुळे येणारा आततायीपणा हे आपण पाहिले. हट्ट मुळातच जर चुकीचा असेल तर कधी ठामपणे पण गोड शब्दांत तर कधी कठोरपणे त्या हट्टाला विरोध करावाच लागतो. पण हट्टाला विरोध हे आजारी पडल्यानंतरचं औषध झालं. आजार होऊच नये म्हणूनही काळही घ्यायला हवीच ना..

कोणत्याही वयातील हट्टी स्वभावाचे प्रमुख कारण असते, ते म्हणजे हट्ट करणा-या व्यक्तीला 'घरात आपल्याला योग्य ते स्थान मिळत नाही, योग्य तो आदर मिळत नाही किंवा आपल्याकडे कुणाचे लक्षच नाही', असं वाटणं. मुळात, मनात असणारी ही असुरक्षिततेची भावना, मग ती कोणत्याही स्वरूपाची असेल. ही असुरक्षितता इतरांना दिसू न देण्याचा किंवा आपले अस्तित्व जाणवून देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हट्ट! मग मुले दुकानात का बरं हट्ट करत असतील? मुलांना अचूक माहीत असते, दुकानात गोंधळ घातला, एखाद्या वस्तूचा हट्ट केला की, सुरुवातीला आईबाबा नाही म्हणतील, नंतर जरा ओरडतील. ते ओरडले की, आपण अजून हट्टाला पेटायचं.. हे त्यांचं ठरलेलं असतं. घरी जसे ओरडतील किंवा फटकावतील तसे दुकानात तर नाही करणार. तेवढया मोठया आवाजात ओरडणारही नाहीत. ते तसे वागले तर आजूबाजूचे लोक काय म्हणतील, हा विचार त्यांच्या डोक्यात नक्कीच असतो. म्हणूनच ते तिथे हट्ट करतात. आपलं अस्तित्व जाणवून देतात.

अशाच एका हट्टी मुलीच्या आईने एक प्रयोग केला. मैत्रिणीच्या मुलाला वाढदिवसाला भेट द्यायची म्हणून खेळण्याच्या दुकानात या मायलेकी गेल्या. मुलीने स्वत:लाही खेळणं हवं म्हणून हट्ट सुरू केला. काही केल्या मुलगी ऐकेना, अखेरचे अस्र् म्हणून त्या मुलीने तिथेच जमिनीवर मांडी ठोकली आणि आणखी जोरजोरात रडू लागली. बघ्यांची गर्दी झालीच. क्षणभर काय करावं, हे आईलाही कळेना. अखेरीस आईही मुलीसमोर फत्कल मारून बसली आणि माझ्याकडे तुला खेळणं घेऊन द्यायला पैसेच नाहीत, असं सांगून जोराजोरात रडण्याचं नाटक करू लागली. असं आईचं रूप मुलीने प्रथमच पाहिलं. लोक आपल्याकडे पाहून हसतात याची जाणीव तिला चटकन झाली. आणि तीच आईला सांगू लागली, ''मला काही नको, पण तू आधी उठ.'' त्या आईच्या धर्याला खरोखरच दंडवत! असा इलाज उपयोगी ठरेल हे माहीत जरी असले तरी सर्वासमक्ष असं वागणं प्रत्येकाला जमेलच असं नाही आणि मुळात तशी अपेक्षाही नाही. म्हणूनच, मोठमोठया मॉल्समध्ये गेल्यावर मुलगी-मुलगा बोट ठेवेल ती वस्तू त्यांना देण्याचे लाड आपणच सुरुवातीपासून थांबवायला हवेत. शिवाय कोणत्याही दुकानात जाण्यापूर्वी आपल्याला जे आवश्यक आहे, तेच मी घेणार, उगीचच नको ते घ्यायचंच नाही, असं मुलांच्या मनावर ठाम बिंबवावं आणि तसंच वागावं.

काही मुलांचा तर असाही हट्ट असतो की, तू माझ्या शेजारी अभ्यासाला बसशील, तरच मी अभ्यास करेन. आणि हा हट्ट काही लहान मुलांचाच असतो असं नाही तर अगदी बारावी किंवा त्यापुढील अभ्यासामध्येही आईला शेजारी बसवणारे विद्यार्थी आणि रात्ररात्रभर मुलांच्या अभ्यासासाठी जागणारे आईवडील आजूबाजूला दिसतात. कसला तरी अकुंश डोक्यावर असल्याशिवाय, कोणीतरी सतत ह्यांना पुढे ढकलायला असल्याशिवाय यांच्याकडून काही केलं जात नाही. मुळातच इथे आड येतो तो न्यूनगंड. हा न्यूनगंडदेखील माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही, कोणाला माझं कौतुक नाही तर मी कशाला काही करायचं, या भावनेतूनच आलेला असतो.

पण स्वत:च्या पायात पुरेशी ताकद असताना कशाला कुबडयाचा वापर करायचा? आणि तसंही अशा कुबडय़ा किती दिवस पुरणार?, याचा विचार ज्याचा त्यालाच करायला हवा. पालकवर्ग काही ठिकाणी मुलांची अवाजवी काळजी करतात. पहिलीपासून प्रत्येक विषयात स्टार मिळाला पाहिजे, हा अट्टहास. मग मुलांकडून त्यांच्या क्षमतेहून जास्त अभ्यास हे पालक करून घेणार. त्यांच्या मागे लागणार, त्यांना प्रश्नोत्तरे लिहून देणार, त्यांच्याकडून ती पाठ करून घेणार आणि या सर्व गोष्टींची ज्या वेळी मुलाला सवय लागते, नेमकं त्याच वेळी पालकांना त्या सर्व गोष्टींचा कंटाळा येऊ लागतो, अभ्यास घ्यायला वेळ मिळेनासा होतो, थकायला होतं वगैरे वगैरे. ''मी शेजारी बसले नाही तर काहीसुद्धा करता येत नाही'', अशी वाक्यं सहज फेकली जातात. पण मागे वळून पाहा ना.. या सगळ्याची नक्की सुरुवात कशी झाली? कुणी केली?

अभ्यास घेताना न कळलेली गोष्ट त्यांना समजावून सांगा. प्रश्नोत्तरे लिहिण्यात मदत करा पण त्यांच्याकडून घोकून घेत बसू नका. त्यांना ठरावीक एक वेळ द्या. त्या वेळेत, 'एवढे वाच आणि मला सांग की तुला काय कळलं ते किंवा हे प्रश्न पाठ कर, पाहू किती येतात ते.. ' इतपतच तुमचा सहभाग असू द्या. मग पाठ कसे झाले नाहीत, तर बस माझ्यासमोर आणि सुरू कर, हे असले काहीही नको. अभ्यासाची जबाबदारी त्या मुलांची आहे आणि ती त्यांची त्यांना पेलू द्या. मधेच कधीतरी थोडीशी मदत लागली तर नक्कीच करा. पण मुलांच्या अभ्यासाची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर घेऊ नका.

जी मुले माझा अभ्यास झालेला आहे. आता मला कितपत येतं हे समजून घेण्यासाठी आईवडिलांच्या हातात पुस्तक देतात, त्यांना स्वत:हून प्रश्न विचारायला सांगतात, अशीच मुले आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होतात. मुलांचं घरात एक स्वतंत्र अवकाश (स्पेस) निर्माण करणं आणि ते जपणं, हे पालकांचं कर्तव्य असतं. सुरुवातीला हे सारं करणं कदाचित कठीण जाईल. पण यातूनच मुलांचा आत्मविश्वास वाढीस लागेल. आत्मविश्वास असलेल्या कोणत्याही व्यक्तीला समाजात, घरात आपलं स्वत:चं अस्तित्व आहे, असं सतत इतरांना जाणवून द्यायला लागत नाही.

लहानपणापासून घरात स्वतंत्र अवकाश निर्माण न झालेल्या मुलांना जर पुढे कॉलेजमध्ये, मित्रमंडळींत असं अवकाश मिळालं तर ते साहजिकच घराबाहेर जास्तीत जास्त काळ राहू लागतात, आईवडिलांचं ऐकेनासे होतात. बरेचदा असंही असतं की, या मुलांच्या मनात 'हे घर आमचं थोडीच आहे. आईबाबांचं आहे. त्यांच्या मताप्रमाणेच इथे सारं घडतंय..', ही धारणा पक्की असते. याला काही अंशी पालकही जबाबदार असतात. मुलं आईवडिलांना त्यांच्या काळजीपोटी काही गोष्टी सांगत असतील किंवा घरामध्ये कसलं काम (रंगकाम, नूतनीकरण) काढलं असता त्यामध्ये या मुलांचा सहभाग नसेल, त्यांच्या कल्पनांना थाराच नसेल, तर मात्र ही मुलं घरापासून दुरावतात आणि नको तिथे हट्टीपणा करतात. म्हणूनच प्रत्येक घर हे घरातल्या प्रत्येकाचं आहे आणि हे घरच प्रत्येकाच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक स्वास्थ्याचा आसरा आहे, असं वातावरण घरोघरी असायला हवं.

Read More »

तरुणांचा ओढा एकत्र कुटुंबाकडे!

पुन्हा एकदा मॅट्रिमोनियलच्या जाहिरातीत एकत्र कुटुंबात राहणा-या मुलाची मागणी वाढतेय. एका सर्वेक्षणात असं दिसून आलंय की, नव्या जमान्यातील ५४ टक्के मुली आजकाल संयुक्त कुटुंबाला प्राधान्य देताना दिसत आहेत. मुलांनाही आपल्या कुटुंबाशी जुळवून घेणारी पत्नी हवी असते. करिअर करायचं तर घरची सपोर्ट सिस्टीम चांगली हवी या उद्देशाने का होईना पण सगळ्यांबरोबर राहण्याची सुरुवात तर होतेय. हा एक चांगला संकेत म्हणायला हवा..

 लग्न ठरवायला किंवा आपला मनपसंत जोडीदार निवडायला मदत करणा-या 'शादी डॉट कॉम'या वेबसाइटने एक वेगळाच निष्कर्ष समोर आणला आहे. त्यांच्या मते, या साइटवर मनपसंत जोडीदार निवडण्यासाठी येणाऱ्या ५४ टक्के मुला-मुलींनी एकत्र कुटुंबात राहणाऱ्या जोडीदाराला पसंती दर्शवली आहे. यात मुलींची संख्या लक्षणीय आहे. कारण काहीही असो, पण एकीकडे एकल कुटुंबात जन्मलेल्या आणि नात्यांना मुकलेल्या मुला-मुलींना आता माणसं हवीशी वाटत आहेत. लहानपणापासून घरात एकटेच वाढलेले किंवा विभक्त कुटुंबात वाढलेले मुलं-मुली आपल्या संसाराचा आता विचार करू लागली आहेत, तेव्हा त्यांना एकत्र कुटुंब असावं, असं वाटतंय. म्हणजे भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे, तो अजूनही भक्कम आहे, असं म्हणायला हरकत नाही. केवळ भारतातच नाही, तर चीन आणि बहुतांश आशियाई देशात एकत्र कुटुंबाला प्राधान्य दिलं जातंय. आपण पुन्हा आपल्या पूर्वजांच्या मार्गावर जात आहोत, ही यातली सगळ्यात समाधानाची बाब म्हणायला हवी.

आज एकत्र कुटुंबाची एवढी मोठी क्रेझ का वाटू लागली आहे, याला अनेक कारणं आहेत. एकतर ज्या मुलांनी घरात फार माणसं पाहिलेली नाहीत किंवा ज्यांना नात्यांची आस आहे त्यांना आपल्या संसारात एकत्र कुटुंब असावं, असं वाटत राहतं. याचं दुसरं कारण एकत्र कुटुंबात घरात मिळणारा पाठिंबा हेही आहे. आज नवरा-बायको दोघांना नोकरी करावी लागते. अशा वेळी घरात कोणीतरी असण्याची किंमत काय असते, हे आता त्यांना कळून आलं आहे. यात घरात केवळ कुणीतरी कामं करायला असायचा भाग नाही तर वेळेला मायेने पाठीवर हात फिरवणारं, आजारपणात आपलेपणाने चौकशी करणारं किंवा आपल्या अनुपस्थितीत कुणीतरी घराकडे लक्ष ठेवणारं असेल तर बाहेरच्या जबाबदाऱ्या किती निश्चिंतपणे पार पाडता येतात, याची जाणीव आता नव्या पिढीला होऊ लागली आहे. यात कधी त्यांचा स्वानुभव असेल किंवा कुणाकडे एकत्र कुटुंब पद्धत पाहून त्याची जाणीव झाली असेल पण त्याची जाणीव होत आहे, हेही काही कमी नाही.

आजवर एकत्र कुटुंब म्हणजे केवळ भांडयाला भांडं लागणं, स्वातंत्र्य गमावणं किंवा मनाप्रमाणे निर्णय न घेता येणं, असंच चित्र रंगवलं गेलं होतं. (यात माध्यमांचा फार मोठा वाटा आहे!) पण आपली जबाबदारी झटकून न टाकणा-या नव्या पिढीतल्या काही शिलेदारांना कर्तव्य आणि भावना यांचा मध्य गाठायचा असेल तर एकत्र कुटुंबाशिवाय पर्याय नाही, याची जाणीव झाली आहे. आर्किटेक्ट असलेली सुरभी म्हणते, 'माझं बालपण अर्धवेळ पाळणाघरात आणि अर्धवेळ शाळेत गेलं. कारण आई-बाबा दोघंही नोकरी करायचे.

आजी-आजोबांशी पटत नाही म्हणून त्यांच्यापासून आम्ही कायम दूर राहिलो, पण जेव्हा माझ्या मैत्रिणी आजीच्या हातचा डबा आणायच्या किंवा त्यांच्या आजोबांबरोबर बागेत किंवा इतर ठिकाणी फिरायला जायच्या तेव्हा मला खूप एकटं वाटायचं. त्यामुळे मी ठरवलं की, मला एकत्र कुटुंबात संसार करायचा आहे. मला मुलांना सगळी नाती मिळवून द्यायची आहेत. त्यासाठी काही गोष्टींची तडजोड करावी लागते. प्रसंगी तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज् बदलाव्या लागतात पण त्यातून मिळणारं समाधान मोठं आहे. मी वेळी-अवेळी घराबाहेर पडले तरी घरात मुलांनी जेवण केलं असेल का किंवा त्यांचा अभ्यास झाला असेल का, अशी काळजी मला करावी लागत नाही. कारण घरात त्यांची आजी, काकू, काका अशी सगळी माणसं आहेत.'

विहारचा अनुभव त्याहून वेगळा आहे. तो म्हणतो, 'मागच्या पिढीच्या चुकांकडून आपण काही शिकलं पाहिजे. माझे आई-वडील त्यांच्या आई-वडिलांकडे राहिले नाहीत. पण म्हातारपणी आजीआजोबांकडे पाहायला कोणी नाही, याची खंत त्यांना कायम जाणवायची. ही परिस्थिती आपली होऊ नये, याची काळजी मी घेतो. कारण कितीही मतभेद झाले तरी आईवडिलांची काळजी ही वाटतेच. त्यांनाही भरल्या घरात राहण्यासारखं सुख नाही. त्यामुळे मी एकत्र कुटुंबात राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या बायकोने त्याला पूर्ण साथ दिली. त्यामुळे आज माझ्या मुलांना आजीआजोबांचं प्रेम मिळतंय.'

आज पुन्हा एकदा नवी पिढी एकत्र कुटुंबाला प्राधान्य देताना दिसतेय. कारणं काहीही असली तरी त्यांना या परस्पर जिव्हाळ्याची ओढ वाटतेय. ते पार कसं पाडायचं हा विचार आता त्यांनी करायला हवा. आजवर स्वतंत्र शैलीत राहण्याची सवय झाली असेल तर आपल्या मतांना थोडी मुरड घालायची आणि परिस्थिती सांभाळून घ्यायचं कौशल्य त्यांनी दाखवायला हवंय. एकत्र कुटुंबात राहताना काही गोष्टी टाळल्या तर हा सहवास अधिक सुखकारक होऊ शकतो. मोठय़ांचं म्हणणं एकदम खोडून काढू नका. काही गोष्टी पटल्या नसतील तरी एकदम नकाराचा सूर लावू नका. प्रश्न मांडल्याने सुटतील यावर विश्वास ठेवा. कोणतीही समस्या समोरासमोर बसून सोडवली तर चांगली सुटते. सतत आपल्याच फायद्याचा विचार न करता समोरच्या व्यक्तींचंही स्वातंत्र्य जपायला हवं. त्यांच्याही मनोरंजनाची आणि इतर गरजांची जाणीव आपण ठेवायला हवी. प्रेम दिल्याने वाढतं, हे लक्षात ठेवलं तर काहीच अवघड नाही.

मोठयाचा आदर तुम्ही करायला शिका आणि मुलांना करायला शिकवा, म्हणजे मुलंही मोठी झाल्यावर तुम्हाला आदर देतील. घरात कितीही मतभेद झाले तरी ते चार भिंतीत राहू द्या. त्याला बाहेर पडायची संधी दिलीत की, एकमेकांवरचा विश्वास कमी होईल. त्यामुळे बाहेर आम्ही एक आहोत हा संदेश कायम गेला पाहिजे. काही चुका झाल्या तरी तात्काळ आरोप करू नका. शहानिशा करून विचारविनिमय करा. दोष दिल्याने नाती तुटतात. एकत्र कुटुंबात राहण्याचा निर्णय घेत असाल तर या गोष्टींवरही एकदा विचार करा. म्हणजे या मार्गातले खाचखळगे पार करणं सोपं जाईल!

Read More »

गजबजलेला 'लोहार चाळ'परिसर

झुंबर घ्यायचंय, गिझर घ्यायचाय, घरातलं वायरिंग बदलण्यासाठी भली मोठी वायर आणायची आहे, इतकंच कशाला कपडे वाळत घालायला रॉड, हँगर, मांडणी, विविध रंगांची फुलं किंवा फुलांच्या माळा, कच-याची बादली, क्रॉकरी.. असं बरंच काही घ्यायचं असेल तेही आपल्या बजेटमध्ये तर लोहार चाळ परिसरात फेरफटका मारायला काहीच हरकत नाही.

लोहार चाळ हा दक्षिण मुंबईतला तसा अतिशय प्रसिद्ध परिसर. मरिन लाइन्स स्टेशनला उतरून सरळ धोबीतलावकडे चालत आलं की आपण लोहार चाळ या परिसराजवळ येऊन पोहोचतो. व्हीटी आणि मरिन लाइन्स ही दोन्हीही तशी जवळची स्थानकं. व्हीटीला उतरून आलं की पोलिस मुख्यालयाच्या समोरची गल्ली. रस्ता क्रॉस करताना समोरच आपल्याला पांढ-याशुभ्र रंगातली जुम्मा मशीद दिसते. पोलिस चौकी ते जुम्मा मशीदपर्यंतची संपूर्ण गल्ली म्हणजे एक छोटंसं मार्केटच आहे हे तिथे नजर टाकल्याबरोबर आपल्या लक्षात येतं. काय नाही मिळत तिकडे असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कपडे आणि लहान मुलांच्या खेळण्यांपासून गृहोपयोगी वस्तूंपर्यंत सगळं काही या गल्लीतच मिळतं.

कार्पेट, ट्रे, कपपासून ते बोल्सपर्यंत विविध क्रोकरीचं सामान, सोफा, फ्रीज किंवा टीव्ही-टेबलवर घालायचे क्लॉथ, हँगर, विविध आकाराची आणि रंगांची पायपुसणी, गोल चौकोनी, षट्कोनी आकाराच्या अनब्रेकेबल वस्तू, प्लॅस्टिकचे लहान-मोठे डबे, चिमटे, फ्रीजवर लावण्यात येणारी विविध म्युरल्स, गालिचे, चादरीचा सेट.. असं बरंच काही या गल्लीतच सापडतं. ही यादी मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच जाईल. थोडक्यात गृहसजावटीचं सगळं सामान आपल्याला या गल्लीत सापडतं असं म्हटलं तरी चालेल. तिथेच पुढे गेलं की कपडय़ांचं होलसेल मंगलदास मार्केट आहे. पुढे दवा बाजार आहे. पण हा काही लोहार चाळ परिसर नाही. या गल्लीच्या तोंडाशीच असलेली गल्ली 'लोहार चाळ परिसर' म्हणून प्रसिद्ध आहे.

या गल्लीच्या तोंडावर एक पोलिस चौकी दिसेल. त्या चौकीच्या पाठीमागे 'काशिनाथ उत्कर्ष मंडळ' अशी पाटी दिसते. तिथून पुढे आलं की डाव्या हाताला एक गल्ली जाते, ही गल्ली म्हणजेच लोहार चाळ परिसर होय. नावावरूनही या ठिकाणी लोहार नावाची चाळ आहे की काय, असंच वाटेल मात्र अशी एकही चाळ नाही. या गल्लीचंच नाव 'लोहार चाळ'आहे. हा गमतीचाच भाग आहे म्हणा ना! दुकानांच्या पाटयावर लिहिलेल्या पत्त्यावर नजर टाकलीत तर तुमच्या सहज हे लक्षात येतं. परिसराला नाव लोहार असलं तरी या परिसराला 'लोहार चाळ' असं नाव का पडलं याची कोणालाच माहिती नाही. फार पूर्वी कदाचित या ठिकाणी लोहाराची दुकानं असतील अशी जुजबीच माहिती सांगोवांगी मिळते. याला काही ठोस पुरावा नाही. होलसेलच्या वस्तू मिळत असल्याने सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत या ठिकाणी गि-हाइकांची प्रचंड गर्दी असते. या गर्दीतच वाट काढत कित्येकदा एखाद्-दुसरी मोटार जात असते. त्यामुळे संध्याकाळी तर या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नसते.

गल्लीच्या तोंडाशी अनब्रेकेबल ट्रेचं आणि घरातले कोपरे सजवणारी फुलदाण्या, आणि त्या फुलदाण्यांत असलेली लहान-मोठी, आकर्षक रंगांची प्लॅस्टिकची फुलं विकणारी पाच-सहा दुकानं आहेत. समोरच्या बाजूला हँगर, लाँड्री बॅग, कच-यांच्या बादल्या, कपडे वाळत घालयच्या रॉडदेखील रस्त्यांवर मांडलेले दिसतात. तिथून जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपल्याला एकापेक्षा एक अशी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची रांग दिसते. या दुकानांमध्ये झुंबरं, पंखे, इस्त्री, वायर, गिझर, ओव्हन, मिक्सर, ब्लेंडर, टोस्टर अशा सगळ्या वस्तू सापडतात. आणखी थोडं पुढे गेलं की दिवाळीमध्ये किंवा अन्य कोणत्याही समारंभाच्या वेळी घरासमोर लावण्यात येणा-या विविध इलेक्ट्रॉनिक दिव्यांच्या डिस्को माळाही याच गल्लीत मिळतात. इतकंच काय पण नळ, पाइप थोडक्यात सॅनिटरीच्या सगळ्या वस्तूदेखील इथेच मिळतात. दहा-पंधरा दुकानं रांगेने आढळतात. जेमतेम एक माणूस शिरेल इतकी छोटी छोटी दुकानं असली तरी अशा दुकानांमध्ये प्रचंड गर्दी आढळते.

कारण ही सगळी दुकानं म्हणजे अँकर, रोमा, पॅनासोनिक, लीग्रँड, पॉलीकॅब अशा ब्रँडेड वस्तूंचे होलसेलर डीलर्स आहेत. त्यामुळे थोडीशी घासाघीस केली की आपल्याला हवी असलेली वस्तू हव्या त्या ब्रँडमध्ये अगदी सहजच सापडतात. दरवर्षी या ठिकाणी खरेदीला येणा-या चिराबाजारच्या विजया तांबे म्हणतात, 'कोणतीही नवी वस्तू घ्यायची असली की आम्ही याच ठिकाणी येतो. इथे आम्हाला आमच्या बजेटमध्ये वस्तू मिळतात. त्याही ब्रँडेड! शिवाय टिकण्याच्या दृष्टीने या वस्तू उत्तम असतात. त्यामुळे काहीही घ्यायचं झालं की आम्ही इथेच येतो.' तर या परिसरात गेली चाळीस वर्षे काम करणारे दत्ता सावंत म्हणतात, मी जवळच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे. आम्हाला हा बाजार जवळचा आहे. इथे सगळं काही वाजवी दरात मिळत असल्याने कुठल्याही मॉलमध्ये जाण्यापेक्षा मी याच ठिकाणी येणं अधिक पसंत करते. मॉलपेक्षा अधिक सोयीस्कर वाटतं.'

आजकाल आपण मॉल संस्कृतीत खूप रुळलो आहोत. काहीही घ्यायचं म्हटलं की मॉलमध्ये धाव घेतो. अशा या मॉलसंस्कृतीत हा परिसर आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे, यात काही शंका नाही.

Read More »

कोळसा खाणींचा लिलाव जूनपासून

कोळसा खाण वाटप घोटाळय़ामुळे खाणींचे वाटप होऊ शकले नव्हते. खाण वाटप लिलावाला अखेर मुहूर्त मिळाला असून सरकारने कोळसा खाणींचा लिलाव जूनमध्ये घेण्याचे ठरवले आहे.

नवी दिल्ली - कोळसा खाण वाटप घोटाळय़ामुळे खाणींचे वाटप होऊ शकले नव्हते. खाण वाटप लिलावाला अखेर मुहूर्त मिळाला असून सरकारने कोळसा खाणींचा लिलाव जूनमध्ये घेण्याचे ठरवले आहे. यामध्ये ऊर्जा कंपन्याव्यतिरिक्त अन्य कंपन्यांनाही कोळसा खाणींचे वाटप करण्यात येणार आहे.

कोळशाअभावी देशातील ऊर्जानिर्मिती कंपन्यांना इंधनाचा मोठा तुटवडा जाणवत असल्याने संसदीय समितीने कोळसा खाणींचे वाटप करण्यात विलंब होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. देशात कोळशाच्या मोठय़ा खाणी उपलब्ध नाहीत, तसेच ऊर्जा क्षेत्राची गरज लक्षात घेता त्यांना मोठय़ा खाणी आवश्यक असतात. त्यामुळे केवळ सहा ते सात खाणींचा लिलाव पुकारण्यात येणार आहे, असे कोळसा सचिव एस. के श्रीवास्तव यांनी सांगितले.

कोळसा खाणीच्या उत्खननात अडथळे येऊ नये म्हणून कोळसा मंत्रालयाने सात खाणींबाबत केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाचे मत मागवले आहे. त्यामुळे पर्यावरणविषयक कोणतीही अडचण आल्यास त्याचे निवारण करता येऊ शकेल. आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत, असेही ते म्हणाले.

Read More »

सरकारवरील कर्जाचा भार वाढला

गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत सरकारवरील कर्जात वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत कर्जात ०.४ टक्क्याने वाढ झाली असून ते ४०.८३ लाख कोटी रुपयांवर गेले आहे.

नवी दिल्ली - गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत सरकारवरील कर्जात वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत कर्जात ०.४ टक्क्याने वाढ झाली असून ते ४०.८३ लाख कोटी रुपयांवर गेले आहे, अशी माहिती कर्ज व्यवस्थापनावरील तिमाही अहवालात देण्यात आली आहे.

डिसेंबर २०१२ मध्ये सरकारवरील कर्ज ४०,६४,७५५ कोटी रुपये होते. त्यात ०.४ टक्क्याने वाढ झाली. देशातील अंतर्गत कर्जाचा वाटा ९१.१ टक्के असून ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान हे प्रमाण ९०.७ टक्के होते. सरकारचे थकित कर्ज ३७ लाख १८ हजार ६३३ कोटी रुपये असून त्याचे प्रमाण एकूण देशांतर्गत उत्पादन दराच्या (जीडीपी) तुलनेत ३७.१ टक्के आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ दरम्यान हेच प्रमाण ३६.८ टक्के होते.

जानेवारी २०१३ रोजी रिझव्‍‌र्ह बँकेने सीआरआरच्या प्रमाणात ०.२५ टक्के कपात केली. तसेच खुल्या बाजारातून ३३,५४९ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. त्याचबरोबर रेपो दरातही कपात केली असून तो दर ७.५० टक्क्यापर्यंत आणला. फेब्रुवारीत थेट परकीय गुंतवणूक आणि परदेशी वित्त संस्थातर्फे येणा-या निधीत वाढ झाली. तसेच परकीय निधीचा ओघ वाढल्याने रुपयांवरील दबाव कमी झाला आहे. मात्र डॉलरसमोर रुपयाचे अवमूलन सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. मार्च २०१३ मध्ये डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची किंमत ५४.४ होती तर डिसेंबर २०१२ मध्ये तो ५४.८ रुपये होती.

Read More »

करसंकलनात १९ टक्क्यांची वृद्धी होईल

चालू आर्थिक वर्षात करसंकलनाचे लक्ष्य गाठण्यात यश येईल. एप्रिल ते मार्च २०१४ या वर्षभरात ६.६८ लाख कोटींचे प्रत्यक्ष करसंकलन होईल.

नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात करसंकलनाचे लक्ष्य गाठण्यात यश येईल. एप्रिल ते मार्च २०१४ या वर्षभरात ६.६८ लाख कोटींचे प्रत्यक्ष करसंकलन होईल, असा विश्वास प्राप्तिकर खात्याने व्यक्त केला आहे. २०११२-१३ मध्ये ५.५९ लाख कोटींचा कर संकलित करण्यात आला होता.

यंदाच्या अर्थसंकल्पात करसंकलन १९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असून त्याचा करसंकलनास फायदा होईल. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार करसंकलन १९ टक्क्यांनी वाढण्यात यश मिळेल, असा विश्वास केंद्रीय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षा पूनम किशोर सक्सेना यांनी व्यक्त केला आहे.

कर मंडळाने आपल्या संरचनेत काही बदल केले आहेत. नव्या उमेदीच्या कर्मचा-यांकडून चांगल्या प्रकारे करवसुली केली जाईल, असा विश्वासही सक्सेना यांनी व्यक्त केला. गेल्याच आठवडय़ात केंद्रीय मंत्रिमंडळाने प्राप्तिकर खात्यामध्ये २०,७५१ नवीन जागा भरण्यास परवानगी दिली. त्यामुळ मनुष्यबळ वाढणार असून किमान २५,००० कोटींचा अतिरिक्त कर संकलित केला जाईल.

Read More »

पालकच कार्टून बनतात त्याची गोष्ट..

मुलं पाहिलेल्या, ऐकलेल्या प्रत्येक घटना, गोष्टींचं अनुकरण करीत असतात. हंगामा, पोगो, कार्टून नेटवर्क, सोनिक, नीक या चॅनेल्सवर २४ तास कार्टून्स दाखवली जातात. त्यात नियमित चालणा-या काही कार्टून्सनी मुलांवर भुरळ पाडली आहे.

परवा घरात शिरल्याबरोबर माझा सहा वर्षाचा मुलगा म्हणाला, ''पप्पा, आप बडे बेवकूफ हो।'' मुलाच्या या वाक्याने मी थंडच झालो. मुलगा हसायला लागला अन् म्हणाला, ''पप्पा, गंमत केली!'' नंतर मला समजलं की, हंगामा चॅनेलवरील 'शिंचैन' हा वात्रट मुलगा हे वाक्य नेहमी वापरतो. मुलं पाहिलेल्या, ऐकलेल्या प्रत्येक घटना, गोष्टींचं अनुकरण करीत असतात. हंगामा, पोगो, कार्टून नेटवर्क, सोनिक, नीक या चॅनेल्सवर २४ तास कार्टून्स दाखवली जातात. त्यात नियमित चालणा-या काही कार्टून्सनी मुलांवर भुरळ पाडली आहे.

परवा बीसीसीसीने (ब्रॉडकास्टिंग कटेंट कम्प्लेंट कौन्सिल) तमाम पालकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला. अनेक कार्टून्सचे विषय लहान मुलांच्या समजुतीच्या पलीकडले आहेत. त्यावर ही कौन्सिल लक्ष देणार आहे. केवळ लहान मुलांना बघता येतील, असेच कार्यक्रम या चॅनेल्सनी दाखवावेत, असा फतवा या कौन्सिलने काढला आहे. 'निंजा हतोडी'मध्ये मारामारीच्या पलीकडे काही दाखवलंच जात नाही. तर 'डोरेमॉन'मध्ये नोबीता आणि शिझुका याचं प्रेमप्रकरण सतत वेगवेगळी वळणं घेत राहतं, औगी अॅण्ड कौकरोजेस सदैव घाणीत पडलेले असतात तर अभ्यासाचा कंटाळा आला की नोबीता डॉरेमॉनला एखादे गॅझेट मागतो आणि एका फटक्यात होमवर्क पूर्ण होतो! यातून मुलं कोणता बोध घेणार? यांच्या मेंदूचा कसला विकास होणार?

परिश्रमाला कोणत्याही क्षेत्रात पर्याय असूच शकत नाही, हे जगभर सिद्ध झालं असताना ही चॅनेल्स मात्र मुलांच्या मनावर दैव, चमत्कृती आणि आळस ठासून भरण्याचं काम करीत आहेत.

सततच्या कार्टून्सच्या वेडाने मुलं घरकोंबडी बनली आहेत, आक्रमक बनली आहेत. स्थूलपणा वाढतोय. नेमकं कुणाचं खरं? आवडत्या कार्टून पात्राचं की सतत बोअर करणाऱ्या पालकांचं, या कात्रीत मुलं सापडली आहेत. आई-वडिलांना घरात, मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुलं बाहेर, शेजारी किंवा उन्हात, पावसात जाऊन काही नवं संकट आणतील या भीतीनं आपणच त्यांना कार्टूनची सवय लावली आहे. आता मात्र पाणी नाका-तोंडात जातेय म्हणून पालक हैराण आहेत.

या कार्टून्सचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर मोठया प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पालक आणि मुलं यांच्यात अंतर निर्माण झालं आहे. या बाबत पालकांसाठी एखादी कार्यशाळा घेण्याची गरज आहे. संस्कारक्षम वयात याची काळजी घेतली नाही तर हेच संस्कार मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनतात. आपण आपले अहंकार सोडून मुलांचा मित्र, सखा बनायला सुरुवात करायला हवी. नाही तर आपले कार्टून बनायला वेळ लागणार नाही!

Read More »

विषमतेमुळे द्वेषभावनेचा उद्रेक

कोणत्याही देशात होणारे स्थलांतर हे त्या देशातील पोषक वातावरणामुळे होत असते, त्याचबरोबर त्या देशाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची गरज स्थलांतरितांकडून भागवली जात असल्याने होणा-या स्थलांतराबद्दल विरोधाची भावना नसते. मात्र, स्थलांतराची ही प्रक्रिया निरंतर सुरू राहून लोकसंख्या वाढीमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला तर त्या विरोधातला असंतोष वाढत जातो आणि त्याचा भडका उडतो. दक्षिण आफ्रिका आणि स्वीडनमध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळत असले तरी स्थलांतरितांना वेगळी वागणूक न देता त्यांना त्या संस्कृतीत सामावून घेऊन एकात्मतेसाठी प्रयत्न करण्याची शिफारस विचारवंतांनी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात सध्या स्थलांतरितांविरोधात तीव्र वातावरण आहे. तेथील परदेशी वंशाच्या लोकांच्या दुकानांना लक्ष्य केले जात आहे. परदेशी दुकानदारांच्या दुकानांवर हल्ले करून लूटमार करण्याचे प्रकार होत आहेत. या प्रकारांनी भेदरलेले परदेशी दुकानदार त्यांचे सामान ट्रकमध्ये लादून ते पळ काढण्याच्या तयारीत आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी सशस्त्र पोलिस दलाची वाहने शहरामध्ये फिरत होती. तर लूटमार करणा-या दंगेखोरांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना रबर बुलेटचा मारा करावा लागल्याने त्यांचा खच आणि जळालेले टायर रस्त्यात जागोजागी दिसत होते.

गोळीबारामुळे दंग्याची सुरुवात जोहान्सबर्गच्या एका भागातील एका सोमाली दुकानदाराने दोन व्यक्तींची कथित हत्या केल्याच्या घटनेनंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळला. हे दोघे जण आपले दुकान लुटण्याच्या प्रयत्नात होते, असे या सोमाली दुकानदाराचे म्हणणे होते. मरण पावलेले दोघे जण झिंबाब्वेचे होते. गोळीबाराच्या घटनेनंतर जमावाने या भागातील काही दुकाने लुटली. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून हिंसक जमावाला पांगवले.

गरिबी, बेरोजगारी आणि वैफल्य या शहरात ज्या भागात हे दंगे झाले त्या भागात मोठय़ा प्रमाणात असलेली गरिबी, बेरोजगारी आणि वैफल्य यांमुळे असंतोषाचा भडका उडत असतो. त्याचे रूपांतर स्थलांतरितांविरोधातील हिंसाचारामध्ये होते. या भागात मी माझा जीव धोक्यात घालतो. येथे अनेक समस्या आहेत. अनेक लोक दुकाने लुटतात, असे एका सोमाली माणसाचे म्हणणे आहे.

स्थानिकांकडून सोमालींचा तिरस्कार
येथील काही स्थानिक तर फारच आडमुठी भूमिका घेताना दिसतात. परदेशी लोकांचा ते तिरस्कार करतात. आम्हाला सोमाली लोक अजिबात आवडत नाहीत. त्यांनी येथून निघून गेले पाहिजे, असे एका स्थानिकाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीला सांगितले आहे.

'झेनोफोबिक' दंग्यांच्या पुनरावृत्तीची भीती
२००८मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये परदेशी निर्वासित आणि स्थानिक असे दंगे उसळले होते. १९८४ नंतर दक्षिण आफ्रिकेत सुमारे अडीच ते साडेतीन लाख मोझांबिकन पळून आले होते. त्यांना तत्कालीन वर्णद्वेषी सरकारने दक्षिण आफ्रिकेतील काही विशिष्ट भूभागात स्थायिक होण्याची परवानगी दिली होती. हे स्थलांतरित आपल्या मालमत्तेवर अधिकार सांगतील ही भीती तेथील स्थानिकांच्या मनात निर्माण झाली होती. या भावनेतूनच तेथे जे दंगे उसळले त्यालाच 'झेनोफोबिक' दंगे म्हणून ओळखले जाते. या दंग्यांमध्ये ६२ लोकांचे बळी गेले होते. अशाच प्रकारचे वातावरण दक्षिण आफ्रिकेत सध्या पाहायला मिळत असल्याने त्या दंग्यांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलची टीका
आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटना अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने दक्षिण आफ्रिकेमधील या हिंसाचाराबद्दल सरकारवर टीका केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये आलेल्या आफ्रिकी स्थलांतरितांविरोधात होणा-या या घटनांकडे पोलिस डोळेझाक करत आहेत. त्यांच्या सहकार्यानेच हे प्रकार आणखी गंभीर रूप धारण करत असल्याचे ताशेरे या संघटनेने ओढले आहेत.

शांत स्वीडनमध्येही हिंसाचाराचे लोण
अलीकडील काही दशकांमध्ये राजाश्रय घेणाऱ्यांसाठी आणि स्थलांतरितांसाठी अतिशय सुरक्षित आश्रयस्थान अशी ओळख निर्माण करणा-या स्वीडनमध्येही द्वेषभावना पसरू लागली आहे. स्थलांतराबाबत स्वीडनच्या उदार धोरणांमुळे या देशात ब-याच स्थलांतरितांनी आश्रय घेतला होता. त्यामुळे कालांतराने त्यांच्या संख्येत वाढ होऊन, सध्या स्वीडनच्या लोकसंख्येमध्ये त्यांचे प्रमाण १५ टक्के झाले आहे. स्वीडनमध्ये झालेल्या हिंसाचाराला काही जण स्थलांतरितांविरोधातील असंतोष कारणीभूत असल्याचे मानतात. तर येथील सामाजिक-आर्थिक कारणांमुळे हा असंतोष असल्याचा दुसरा मतप्रवाह आहे.

तरुणांमध्ये असंतोष
गेला आठवडाभर सुरू असलेल्या या हिंसाचारात गाडयांना आगी लावण्यात आल्या आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. स्टॉकहोममधील स्थलांतरितांचे प्रमाण जास्त असलेल्या भागात झालेल्या या हिंसाचारात तरुणांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता. व्हारबर्ग या भागात गस्त घालणा-या पोलिसांच्या गाडीवरही काही तरुणांनी दगडफेक केली. मात्र, यात कोणही जखमी झाले नाही.

दंगे शमवण्यासाठी पालकांचा सहभाग
मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार करणा-या तरुणांना शांत करण्यासाठी पोलिसांबरोबरच अनेक पालक आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दंगेखोरांना शोधून त्यांना परावृत्त करण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते गस्त घालत होते. एकीकडे भडकलेल्या तरुणाईबरोबरच शांत डोक्याच्या या सुजाण नागरिकांमुळे पोलिसांचा आत्मविश्वासही वाढला. अशा प्रकारच्या सद्प्रवृत्तींमुळे हे दंगे लवकरच आटोक्यात येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्थलांतरितांचा प्रश्न
स्वीडनमध्ये स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वेगवेगळ्या देशांमधून येणा-या या स्थलांतरितांना या देशाशी जुळवून घेणे कठीण जाते. ब-याच स्थलांतरितांना भाषा शिकण्यामध्ये अडचण येते व त्यामुळे सरकारकडून त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जाऊनही त्यांना नोक-या मिळू शकत नाहीत.

वांशिक संघर्ष नाही
स्वीडनमध्ये झालेल्या या हिंसाचारामागे वांशिक कारण नसून येथे निर्माण झालेल्या विषमतेमुळे तरुणांच्या भावना तीव्र असल्याचे काहींचे मत आहे. रोजगाराचा प्रश्न आणि इतर प्रकारच्या सामाजिक विषमतेमुळे असंतोषाचा उद्रेक होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथील श्रीमंत वर्गाला अधिकाधिक सवलती, करमाफी मिळत असून गरीब वर्गाला करांचा बोजा सहन करावा लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

समानतेवर भर हवा
स्वीडनमध्ये तरुण वर्ग आणि त्यांचे पालक यांच्यात संवाद आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. त्याच प्रकारे स्थलांतरितांसाठी वेगळे कार्यक्रम राबवणे थांबवले पाहिजे. कारण त्यामुळे त्यांच्यात वेगळेपणाची भावना निर्माण होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनाही स्वीडनच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेऊन सर्वाना समानतेने वागवून एकात्मतेचे उद्दिष्ट साध्य केले पाहिजे.

Read More »

संधीसाधू बंडखोर

कोणतेही खंबीर नेतृत्व नसल्यामुळे सध्या भाजप एक फार मोठा गंमतीशीर पक्ष बनत चालला आहे. नेतृत्वाच्या अभावामुळे प्रत्येक ज्येष्ठ नेत्याने आपापले समांतर असे सत्ताकेंद्र तयार केले आहे. त्यामुळे कधी आडून आणि कधी उघडपणे हीच सत्ताकेंद्रे त्यांच्या 'कार्यकर्तृत्वा'मुळे पक्षाला अडचणीत आणत आहेत. अशातच कधी भाजप तर कधी अपक्ष असा 'तळय़ात-मळय़ात' प्रवास करत आणि संधी मिळेल तिथे पोळी भाजून घेणारे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व भाजपचे राज्यसभेचे खासदार राम जेठमलानी यांनी आपल्या वाचाळपणाने भाजपला जेरीस आणले आहे. भाजपने त्यांचे सहा वर्षासाठी निलंबन करून तूर्तास तरी त्यांच्या वाचाळपणाला आळा घातला आहे. मात्र, अशा 'स्वकर्तृत्वान' व्यक्तिमत्त्वांची संख्या भाजपमध्ये वाढतच आहे. पंचतारांकित गुन्हेगारांचे 'मसिहा' अशी राम जेठमलानी यांची ओळख आहे. हर्षद मेहता, केतन पारेख असो की, मनू शर्मा. त्यांच्या सारख्या पंचतारांकित गुन्हेगारांना तुरुंगाबाहेर काढण्यासाठी ते कायम 'कार्यतत्पर' असतात. आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदी यांचाही खटला ते चालवणार आहेत. वयाच्या १८ व्या वर्षापासून कार्यरत असलेला कायद्याचा हा पंडित भाजपमध्ये दाखल झाला. मात्र, राम नामाचा जप करत सत्ता मिळवणा-या भाजपचे आणि या रामाचे संबंध कायम ताणलेले राहिले. भाजपची प्रतिमा राष्ट्रीय पक्षाची आणि शिस्तीची असली तरी आपण ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असल्याचा तोरा जेठमलानी यांनी पक्षाचे सदस्य आणि खासदार झाल्यानंतरही कायम ठेवला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात ते कायदामंत्री होते. मात्र, वाजपेयी यांना त्यांच्याबद्दल कधी विश्वास वाटला नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला संधी मिळायला हवी, यासाठी ते जागरूक असतात आणि अशी संधी त्यांना मिळाली नाही की ते बंडखोर बनतात. १९८७मध्ये ते राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढले. १९९५मध्ये त्यांनी लोकशाहीत पारदर्शकता आणण्यासाठी स्वत:चा पवित्र हिंदुस्तान कझहगम पक्ष स्थापन केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदा आणि नगरविकासमंत्री पद भूषवल्यानंतरही त्यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात दंड थोपटले आणि २००४मध्ये लखनौमध्ये त्यांच्याविरोधातच अपक्ष म्हणून उभे राहिले. त्यांचा पराभव झाला ही, गोष्ट अलाहिदा. २०१०मध्ये पुन्हा भाजपमध्ये आले. असा राजकीय प्रवास आणि इतिहास असलेल्या जेठमलानी यांनी नितीन गडकरी यांच्या दुस-यांदा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याला आक्षेप घेतला आणि त्यांच्यावर अवाजवी टीका केली. याबाबत भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. पण त्यालाही ते बधले नाहीत. भाजपला जेरीस आणण्याचे काही त्यांनी सोडले नाही. मी काळय़ा पैशाविरोधात घेतलेल्या मोहिमेमुळेच माझ्या हितशत्रूंकरवी माझे निलंबन झाले आहे. त्यांचे पितळ मी उघडे पाडीन. भाजपची वाटचाल आता आत्मघाताकडे चालली आहे, असे निलंबनाचे वृत्त समजल्यावर बोलायला भाजपचा हा राम बिचकला नाही. या निलबंनाच्या कार्यकाळात त्यांना संधी मिळाली तर ते पुन्हा अपक्ष म्हणून उभे राहतीलही किंवा नवा पक्ष स्थापून कोणतीतरी मोहीम सुरू करतील, याचा काही नेम नाही.

Read More »

'गुगल ग्लास'ला 'आयवॉच'ची टक्कर

 गेल्याच आठवडय़ात सादर करण्यात आलेल्या गुगलच्या चष्म्याच्या काचेतील कॉम्प्युटर स्पर्धा करण्याची तयारी आयपॅड उत्पादक अॅपलने चालवली आहे.

सान फ्रान्सिस्को - गेल्याच आठवडय़ात सादर करण्यात आलेल्या गुगलच्या चष्म्याच्या काचेतील कॉम्प्युटर स्पर्धा करण्याची तयारी आयपॅड उत्पादक अॅपलने चालवली आहे. कॉम्प्युटरला चष्म्यातून न आणता तो मनगटावर घडय़ाळाच्या स्वरूपात आणण्यात येणार असल्याची माहिती अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी दिली आहे. 

आयटी गॅझेट्सना विविध रूपांमध्ये आणण्यात अॅपलची खास ओळख आहे. गुगलने सादर केलेला 'गुगल ग्लास' हा कॉम्प्युटर सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरेल असे वाटत नाही. अॅपल मात्र हातामधील घडय़ाळाप्रमाणे घालता येण्याजोगा कॉम्प्युटर तयार करण्यास उत्सुक असल्याचे कुक यांनी सांगितले. कॅलिफोर्नियामधील 'ऑलथिंग्सडी' या

परिषदेत त्यांनी अॅपलची भविष्यातील योजनांची माहिती दिली. वेरिएबल कॉम्प्युटिंगवर सध्या अनेक कंपन्या काम करत आहेत. अॅपलकडून अशा प्रकारच्या डिव्हाइसवर संशोधन करत आहे. लोक ज्याप्रकारे घडय़ाळ घालतात त्या आकाराचा कॉम्प्युटर विकसित करण्यावर (आयवॉच) अॅपल भर देत असल्याचे कुक यांनी सांगितले. मनगटावर कॉम्प्युटर असावा, यावर आपण विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वच लोक चष्मा घालतात असेही नाही. त्यामुळे गुगल ग्लासला काही मर्यादा आहेत, असेही त्यांनी सांगितले. पुढच्या वर्षात अॅपल आयवॉचला बाजारात आणेल, असेही त्यांनी सांगितले.

Read More »

स्वयंशिस्तीचा 'मार्ग'

महाराष्ट्रात व देशात वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे अपघातांची संख्याही वाढत आहे. सर्व प्रकारच्या वाहतूक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेल्या राज्यात होणा-या वाढत्या अपघातांची संख्या आणि त्यात होणारी प्राणहानी ही अतिशय चिंताजनक आहे. मुंबई-गोवा महामार्गावर होणा-या अपघातांची संख्या पाहिली तर हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनत चालल्याचे दिसून येत आहे…

महाराष्ट्रात व देशात वाहनांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे अपघातांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्र हे तर देशात उद्योग-व्यवसाय आणि कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य. त्यामुळे या राज्यात गाड्या, बस आणि अवजड वाहने यांची वाहतूक अहोरात्र सुरू असते. या राज्यातील सगळेच महामार्ग आणि मोठे रस्ते यावरील वाहतुकीला जराही खंड नसतो. अशा या सर्व प्रकारच्या वाहतूक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेल्या राज्यात होणा-या वाढत्या अपघातांची संख्या आणि त्यात होणारी प्राणहानी ही अतिशय चिंताजनक आहे. मुंबई-गोवा महामार्गावर होणा-या अपघातांची संख्या पाहिली तर हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनत चालल्याचे दिसून येत आहे. माणगाव ते महाड दरम्यान मंगळवारी सात अपघात होऊन त्यात सहा प्रवासी मृत्युमुखी पडले तर २६ जण जखमी झाले. माणगाव तालुक्यातील मुगवली फाटा येथे सुमो आणि ट्रकची टक्कर होऊन तीन प्रवासी जागीच ठार झाले तर पाच प्रवासी जखमी झाले. महाडजवळ सोमवारी मध्यरात्री एक कार उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कारचा चालक ठार झाला तर माणगाव तालुक्यात रेपोली येथे एक कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात कारचा चालक ठार झाला. तसेच या अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी बसवर एक कार आदळून गाडीतील दोघे जण जखमी झाले. तसेच महाड तालुक्यात एक तवेरा गाडी उलटून झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले. अन्य दोन अपघातात एक तरुणी ठार व दोघे जण जखमी झाले आहेत. रविवारी एकवीरा देवीचे दर्शन घेऊन खासगी वाहनाने परतणा-या एका कुटुंबाचे वाहन चालकाचे नियंत्रण सुटून एका भिंतीवर आदळले व या कुटुंबातील पाच माणसे ठार झाली. शनिवारी रात्री मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीनजीक बोरघाट येथे एक भरधाव जीप एका टेम्पोवर आदळल्याने जीपमधील एक जण ठार व आठ जण जखमी झाले आहेत. बुधवारी डहाणू येथे एका आरामगाडीला झालेल्या भीषण अपघातात १४ लोक ठार तर ४१ जण जखमी झाले आहेत. म्हणजे राज्यातील अपघातांची ही अंगावर शहारे आणणारी मालिका चालूच आहे व ती रोखण्यासाठी आता काही ठोस उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. कारण या अपघातांमध्ये होणारी जीवितहानी ही एक गंभीर समस्या आहे. या अपघातात सामान्य मजुरांपासून ते मोठ्या अधिका-यांपर्यंत आणि उद्योगपतींपर्यंत अनेकांचा मृत्यू होतो. क्रियाशील आणि निर्मितीक्षम मनुष्यबळाची होणारी ही हानी भरून निघणारी नाही व ते राष्ट्रीय नुकसानच म्हणावे लागेल. वाहतुकीचे नियम न पाळणे, अतिशय वेगाने वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालविणे, दुस-या वाहनाला ओव्हरटेक करणे यामुळे हे जीवघेणे अपघात घडत आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये अभिनेते आनंद अभ्यंकर हे आपल्या सहका-यांसह मुंबईला येत असताना समोरून येणा-या एका भरधाव टेम्पोने दुभाजक तोडून त्यांच्या गाडीला धडक दिली व त्या अपघातात अभ्यंकरांसह अभिनेता अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगाही ठार झाले. राज्यातील अपघातांचे प्रमाण मोठे व चिंताजनक आहे. यात मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असून मुंबई-गोवा महामार्गाचा क्रमांक तिसरा लागतो. मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या वर्षी सुमारे १७८० अपघात झाले व त्यात ४९० जणांचा मृत्यू झाला तर ६७९ जण गंभीर जखमी झाले. मुंबई-कोल्हापूर-बंगळूरू या महामार्गावर गेल्या वर्षात १५५१ अपघात झाले. त्यात ४८७ जणांचा मृत्यू व ८० लोक गंभीर जखमी झाले. याच काळात मुंबई-गोवा महामार्गावरील १२२७ अपघातात २५४ जण ठार तर ७०७ गंभीर जखमी झाले. राज्यातील सहा महामार्गावर गेल्या वर्षभरात झालेल्या अपघातात १९६६ लोक मृत्युमुखी पडले व ३२२३ जण गंभीर जखमी झाले. अपघातांचा हा चढता आलेख पाहिला तर त्याचे गांभीर्य लक्षात यावे. अपघातांचा हा भयावह आलेख या वर्षीही खाली आलेला नाही. या वर्षाच्या पहिल्या अडीच महिन्यातच मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट ते परशुराम घाट या सुमारे ५० किलो मीटरच्या टप्प्यात २६ अपघात झाले व त्यात ४४ जणांचा बळी गेला. या मार्गावर खेडजवळ एका पुलावरून प्रवासी बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३७ लोक मृत्युमुखी पडले. चीड आणणारी बाब ही की, हा वाहनचालक दारू पिऊन गाडी चालवत होता व त्यामुळे त्याला पुलाच्या रुंदीचा अंदाज आला नाही व बस पुलावरून नदीत कोसळली. आपण दारू प्याल्याची कबुलीही या चालकाने पोलिसांकडे दिली. अपघातांची ही मालिका व त्यात होणारी मनुष्यहानी पाहिली की, संबंधित सर्व यंत्रणांनी हे अपघात रोखण्यासाठी त्वरेने पावले उचलणे व वाहतूकविषयक नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या संबंधात पोलिसांचा वाहतूक विभाग आणि राज्य परिवहन विभाग यांनी सरधोपट पद्धतीने न वागता चालकांचे प्रबोधन, मार्गदर्शन आणि वाहतूक कायदे व नियमांची कडक अंमलबावणी याबाबतीत नव्या पद्धती व धोरण अवलंबले पाहिजे. गाडी, बस आणि अवजड वाहनांच्या चालकांनी वाहन चालवताना कोणती काळजी घेतली पाहिजे, ओव्हरटेक करताना काय खबरदारी घेतली पाहिजे, कुठल्याही कारणाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले असताना वाहनाचे मागचे पिवळे दिवे लावलेले असले पाहिजेत वगैरे मार्गदर्शन करणा-या पुस्तिकांचे वितरण मोठय़ा प्रमाणावर करण्यात आले पाहिजे. या बाबी चालकांना माहीत नाहीत असे नाही. परंतु वेळोवेळी होणा-या मार्गदर्शनाने नियमांचे गांभीर्य चालकांच्या मनावर बिंबवले जाऊ शकते. होणा-या अपघातांमध्ये ८० टक्के अपघातात ट्रक, टेम्पो वा टँकरसारख्या अवजड वाहनांचा समावेश असतो. मुंबईमध्ये वाहन चालकांची मद्यपानासाठी तपासणी होते त्याप्रमाणे मुंबईबाहेरच्या वाहन चालकांनी मद्यपान केले आहे की, नाही याची आकस्मिक तपासणी झाली पाहिजे. वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक चालकाची तपासणी करणे कठीण आहे, ही गोष्ट खरी. पण आकस्मिक तपासणीचा मर्यादित प्रमाणात का होईना उपयोग होऊ शकतो. अनेक चालक वाटेत धाब्यावर वेळ काढतात व मग गेलेला वेळ भरून काढण्यासाठी वाहन वेगाने नेतात. त्यामुळेही बरेच अपघात होतात. दुभाजक तोडून समोरून येणा-या वाहनावर अवजड वाहन आदळते व अपघात होतो. ओव्हरटेक हे अपघाताचे आणखी एक कारण. ब्रेक लागत नाही, टायर फुटला यामुळेही अपघात होतात. महामार्गाचे रुंदीकरण हा वाढते अपघात रोखण्याचा आणखी एक उपाय आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. या महामार्गावर पनवेलपासून सिंधुदुर्गापर्यंत १३ धोकादायक ठिकाणे आहेत व जास्त अपघात याच ठिकाणी झाले आहेत. या अपघातप्रवण क्षेत्रांचीही सुधारणा होणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे वाहनांचे वेगनियंत्रण. चालकांनी आपल्या वाहनांचा वेग नियंत्रित केल्याशिवाय व स्वयंशिस्तीवर भर दिल्याशिवाय हे अपघात कमी होणार नाहीत.

बीसीसीआयमधील 'श्री'चा निवास

मोठे प्रस्थ, मग ते कोणत्याही क्षेत्रातील असोत, राजकारण असो, उद्योग असो, क्रीडा असो, ते कुठल्याही तत्त्वापेक्षा आपले हितसंबंध राखूनच व्यवहार करत असतात. आरोप-प्रत्यारोप करत असतात, भांडत असतात व वेळ पाहून गळ्यात गळेही घालत असतात. गेल्या काही दशकात क्रिकेट आणि राजकारणी हे जवळ आले आहेत.

Read More »

पेस्की कॉलला २०,००० रुपयांचा दंड

हॅलो, मी अमूक बॅँकेचा प्रतिनिधी बोलतोय. आमच्या बॅँकेने नवीन खाते उघडण्यासाठी ऑफर दिली आहे.', 'मी विमा कंपनीतून बोलतोय. आमच्या कंपनीने नवीन पॉलिसी आणली आहे.'

नवी दिल्ली - 'हॅलो, मी अमूक बॅँकेचा प्रतिनिधी बोलतोय. आमच्या बॅँकेने नवीन खाते उघडण्यासाठी ऑफर दिली आहे.', 'मी विमा कंपनीतून बोलतोय. आमच्या कंपनीने नवीन पॉलिसी आणली आहे.' असे अनेक कॉल्स आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळी येत असतात. आपला दूरध्वनी क्रमांक त्यांच्याकडे नसतानाही ते आपल्याशी संपर्क साधतात. यामुळे देशातील दूरध्वनी ग्राहक हैराण झाले आहेत. ग्राहकांची या 'पेस्की' कॉल्सपासून सुटका करण्यासाठी दूरसंपर्क खात्याने अशा कंपन्यांवर मोठा दंड आकारण्याची तयारी चालवली आहे.

यामध्ये एका कॉलला किमान २०,००० रुपयांचा दंड आकारावा, अशी शिफारस डॉटने केली आहे.गेल्या काही वर्षात मोबाइल क्षेत्राची झपाटय़ाने वाढ झाली आहे. यामुळे जाहिरातदारांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे नवीन माध्यम उपलब्ध झाले आहे. त्यांनी याचा फायदा उचलत ग्राहकांपर्यंत थेट दूरध्वनी व एसएमएसचे माध्यम निवडले. विमा कंपन्या, बॅँका, डीटीएच कंपन्यांनी याचा मोठा फायदा उचलला.

ग्राहकांना भंडावून सोडण्याचा विडाच सगळ्यांनी उचलला. त्यामुळे ग्राहकांना त्याचा त्रास होऊ लागला. अखेर 'ट्राय'ने मध्यंतरी मार्केटिंग कॉलसाठी १४० हा क्रमांक सक्तीचा केला. तरीही अनावश्यक कॉल्सचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे अनावश्यक पेस्की कॉल्सला अटकाव करण्यासाठी दूरसंपर्क नियामक प्राधिकरणाने (डॉट) ने प्रत्येक पेस्की कॉल मागे टेलि-मार्केटिंग कंपनीवर किमान २०,००० रुपयांचा दंड आकारण्याची शिफारस केली आहे. 'खासगी आयुष्याचा हक्क' या विधेयकामध्ये पेस्की कॉलबाबत दंडात्मक कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पेस्की कॉलबाबत येणा-या तक्रारी वाढल्या आहेत. ग्राहकांना मार्केटिंगचे अनावश्यक कॉल करणा-या कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी डॉटकडून ही शिफारस करण्यात आली आहे. अवैध पेस्की कॉल्ससंदर्भात आकारण्यात येणारी दंडात्मक रक्कम दोन कोटीपर्यंत वाढवण्याची शिफारस दूरसंपर्क खात्याने केली. सध्या ही रक्कम एक कोटी आहे.

पहिल्यांदा पेस्की कॉल किंवा एसएमएस केल्यास २५ हजार रुपये दंड आकारावा. त्यानंतर ही रक्कम वाढवत सहाव्यांदा पेस्की कॉल केल्यास संबंधित कंपनीवर २.५ लाख रुपयांचा दंड आकारला जात आहे. नवीन कायद्यातील तरतुदीनुसार नोंदणीकृत आणि नोंदणी नसलेल्या टेलि-मार्केटिंग कंपन्यांनी पेस्की कॉल केल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावेत. या यादीतील कंपन्यांचे कनेक्शन रद्द झाल्यास त्यांना दोन वर्षे नवीन क्रमांक दिला जाणार नाही, अशी शिफारस करण्यात आली आहे.

सध्याची दंडाची नियमावली
पहिल्यांदा कॉल केल्यास २५,००० रुपये दंड आकारला जाणार असून त्यानंतर यामध्ये प्रत्येक टप्प्याला वाढ होईल. सहाव्यांदा पेस्की कॉल किंवा मेसेज केल्यास संबधित कंपनीवर २.५ लाख रुपये दंड आकारला जाणार आहे.

Read More »

१० लाख करचुकव्यांना लवकरच नोटिस

करचुकवेगिरी करणा-यांच्या विरोधात प्राप्तिकर खात्याने दंड थोपटले आहेत. करसंकलनावर भर देणा-या प्राप्तिकर खात्याकडून लवकरच तब्बल १० लाख जणांना लवकरच नोटिस पाठवण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली - करचुकवेगिरी करणा-यांच्या विरोधात प्राप्तिकर खात्याने दंड थोपटले आहेत. करसंकलनावर भर देणा-या प्राप्तिकर खात्याकडून लवकरच तब्बल १० लाख जणांना लवकरच नोटिस पाठवण्यात येणार आहेत.

प्राप्तिकर खात्याने त्यांच्याकडील माहितीवरून कर न भरणा-यांची यादी तयार केली आहे. यामध्ये तब्बल १० लाख जणांनी कर भरलेला नाही. या सर्वाना पत्र पाठवून विवरण सादर करण्यास सांगणार आहोत. करचुकव्यांना शोधून काढण्यासाठी प्राप्तिकर विभाग कर्मचा-यांपेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे, असे एका अधिका-याने सांगितले.

महसूल विभागाने प्राप्तिकर न भरणा-या १.७५ लाख करदात्यांना पत्रे पाठवली आहेत. यात या व्यक्तींच्या वर्षभराच्या आर्थिक व्यवहारांची माहिती दिली आहे. पॅनकार्डवरून प्राप्तिकर विभागाने हा रेकॉर्ड तयार केला आहे. तसेच वार्षिक माहिती परतावा (एआयआर), केंद्रीय माहिती शाखा (सीआयबी) आणि टीडीएस/टीसीएस परताव्याची छाननी केली जाणार आहे. तसेच आर्थिक गुप्तचर शाखेची या कामात मदत घेतली जाईल.

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सर्व करदात्यांना सौजन्याच्या भाषेत कर भरणा करण्यासाठी पत्र पाठविण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाला दिले होते. त्यानुसार ही पत्र पाठवण्यात येत आहेत. सरकारने यंदा ६.६८ लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष करसंकलन करण्याचे ठरवले आहे.

Read More »

पाकिस्तान-श्रीलंका आमनेसामने

आयसीसी चॅँपियन्स ट्रॉफी वनडे स्पर्धेतील सराव सामन्यांना गुरुवारपासून (३० मे) सुरुवात होत असून पहिल्या सराव लढतीत पाकिस्तान आणि श्रीलंका झुंजतील.

बर्मिंगहॅम- आयसीसी चॅँपियन्स ट्रॉफी वनडे स्पर्धेतील सराव सामन्यांना गुरुवारपासून (३० मे) सुरुवात होत असून पहिल्या सराव लढतीत पाकिस्तान आणि श्रीलंका झुंजतील.

सराव लढतींद्वारे इंग्लंडमधील वातावरण आणि खेळपट्टय़ांशी लवकरात लवकर जुळवून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करेल. यजमान इंग्लंड आणि त्यांच्याविरुद्ध नुकतीच कसोटी मालिका खेळलेल्या न्यूझीलंडला सराव लढतींमधून वगळण्यात आले आहे. श्रीलंकेला सर्वाधिक तीन सराव लढती खेळण्याची संधी मिळेल. याउलट पाकिस्तानच्या वाटय़ाला दोन सराव लढती आल्यात. स्कॉटलंड आणि आर्यलडमध्ये वनडे मालिका जिंकून पाकिस्तान संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांचा वनडे सराव झाला आहे.

याउलट श्रीलंकेचे अनेक क्रिकेटपटू आयपीएलखेळून थेट इंग्लंडमध्ये दाखल झालेत. वनडे फॉरमॅटशी जुळवून घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. वेळ : सायं. ५:३० वा. थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेटवर.

'प्रेक्षक वर्ग अब्जच्या घरात जाणार'

दुबई- पुढील आठवडय़ापासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू होणा-या आयसीसी चॅँपियन्स ट्रॉफीचे थेट प्रक्षेपण पाहणा-यांची संख्या दीड अब्जच्या घरात जाईल, अशी अपेक्षा आयसीसीने व्यक्त केली आहे. ''इंग्लंड आणि वेल्समध्ये प्रत्यक्ष स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित न राहणारे प्रेक्षक टीव्हीवरून स्पर्धेचा आनंद लुटतील. ते पाहता चँपियन्स ट्रॉफी चाहत्यांचा आकडा दीड अब्जच्या घरात जाईल,'' असे आयसीसीचे मुख्य अधिकारी डेव्हिड रिचर्ड्सन यांनी म्हटले. या स्पर्धेचे समालोचन अव्वल १६ समालोचक करतील. त्यात सुनील गावस्कर यांच्यासह संजय मांजरेकर, सौरव गांगुली, हर्षा भोगले आदींचा समावेश आहे. चॅँपियन्स ट्रॉफीचे थेट प्रक्षेपण स्टार क्रिकेटवरून केले जाणार आहे.

Read More »

लंपट अधिका-यावर कारवाई हवीच!

सर्वसामान्य माणसाचीही अनेक श्रद्धास्थाने असतात. लाल-पिवळी एसटी हे त्यापैकी एक. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रात लक्षावधी प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचवणा-या एसटीचे आणि सर्वसामान्य लोकांचे वर्षानुवर्षाचे जिव्हाळ्याचे नाते आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागातील एक वरिष्ठ अधिकारी आपल्या हाताखालील महिला कर्मचा-यांकडे लैंगिक सुखाची मागणी करीत आहे आणि ती पूर्ण न केल्यास या महिलांनाच बदनाम करण्याची धमकी देत आहे. विशेष म्हणजे महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनाही हा अधिकार दाद देत नाही. हा अधिकारी वेळीच शोधून काढून त्याच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. नाहीतर ही विकृती अधिकच बोकाळेल.

सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात अनेक आस्थापना असतात आणि त्यात वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत कर्मचा-यांचा मोठा ताफाही असतो. कनिष्ठ कर्मचा-यांनी आपल्या वरिष्ठांचा सन्मान ठेवणे आणि वरिष्ठांनी कनिष्ठांना अभय देणे, हेच सर्वसाधारणपणे अभिप्रेत असते. पण त्याला छेद देऊन आपल्या हाती अधिकार आले म्हणजे आपण काहीही करायला मोकळे झालो, अशा मुजोर प्रवृत्तीतून वागणारेही अनेक जण असतात. 

एसटी महामंडळातील अधिका-याने तेच केले आहे. या महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे असून दीपक कपूर हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या दोघांनीही महिला कर्मचा-यांशी असभ्य वर्तन करणा-या अधिका-याच्या चौकशीचे आश्वासन दिले आहे. याचाच अर्थ हा जो कोणी अधिकारी आहे तो गोरे आणि कपूर यांनाही जुमानण्याच्या पलीकडे गेला आहे. हातात अधिकार आले की, विकृत माणसे कुठल्या टोकापर्यंत जातात, हे अलीकडेच इन्फोसिसचे वरिष्ठ अधिकारी फनीश मूर्ती यांच्या वर्तनातून दिसून आले. गुंतवणुकीसाठी खिशात रक्कम असेल तर सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव यायचे ते इन्फोसिसचे. ही सर्व कमाल फनीश मूर्ती यांची होती; पण हा एवढा कर्तबगार माणूसही विकृत बनला आणि त्याने इन्फोसिसमधीलच एका महिला कर्मचा-याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. अशी प्रकरणे लपून राहत नाहीत. मूर्तीनी केलेल्या लैंगिक शोषणाचा गाजावाजा झाला आणि त्यांना इन्फोसिस सोडणे भाग पडले. कंपनीच्या प्रमुखांनी मग त्या महिलेला प्रचंड मोठी भरपाई देऊन या प्रकरणावर पडदा टाकला. पण मूर्तीचे चाळे काही थांबले नाहीत. त्यांनी नंतर स्वत:ची कंपनी काढली. ती नावारूपालाही आणली, पण महिला कर्मचा-यांशी लगट करण्याचे, चाळे करण्याचे सुरूच ठेवले.

दुसरे उदाहरण तसे आपल्या जवळचे. माणूसही प्रसिद्ध आणि सर्वसामान्य माणसांनाही परिचयाचा. हे गृहस्थ म्हणजे 'उपरा'कार लक्ष्मण माने. माने साहेबांनी आपले लैंगिक शोषण केल्याची तक्रार त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेतील महिला कर्मचा-यांनी केल्यानंतर चौकशी होऊन लक्ष्मण माने यांना थेट तुरुंगातच जावे लागले.

परस्त्रीला सन्मानानेच वागवले पाहिजे, हा छत्रपती शिवरायांचा आदर्श दुर्दैवाने इतिहासाच्या पुस्तकातच राहिला आहे. कारण वृत्तपत्रांतून, विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून कधीकधी पाच वर्षाच्या बालिकेपासून ७४ वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार केल्याच्या बातम्या आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळतात तेव्हा लाजेने मान खाली घालण्याखेरीज आपल्या हाती काही नसते. स्त्री विवाहित असो वा अविवाहित, परिचयाची असो वा नसो, तिच्याकडे फक्त विकृत आणि विखारी नजरेनेच पाहायचे, असा पक्का समज असलेला एक पुरुष वर्ग आपल्या समाजात अगदी नक्की आहे. विदर्भातील मुरमोडी गावातील तीन चिमुरडय़ा बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाला. यामागचे कारण अद्यापही कुणाला कळले नसले तरी त्यांनाही कामांधांच्या अत्याचाराला बळी जावे लागले असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

नोकरीतून अधिकार पद प्राप्त झालेले सर्वच अधिकारी हाताखालच्या महिलांकडून लैंगिक सुखाची मागणी करतात, असे म्हणता येणार नाही; पण प्रत्येक अधिका-याच्या कल्पना निश्चित असतात आणि त्या अंमलात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आधीच अन्यायाने त्रस्त झालेल्या लोकांना आणखी जमेल तेवढा त्रास देऊन त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा आनंदही काही अधिका-यांना मिळवायचा असतो. ज्या शहराला भारनियमन लागू नाही, तेथेही ऐन उन्हाळय़ात सहा-सात तास भारनियमन करून लोकांच्या त्रासात भर टाकणारेही अधिकारी आहेत.

स्त्रीला अबला म्हणणे कुणालाही आवडत नाही; पण प्रसंगपरत्वे स्त्रियांवर संकटे येतात. अ‍ॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेली प्रीती राठी सध्या रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. प्रीती उच्चशिक्षित होती. तिला अबला म्हणताच येणार नाही; पण अचानक हल्ला झाला आणि तिचा घात झाला. हा लैंगिक हल्ला नसला तरी एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाला असल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

स्त्रियांवर होणा-या अन्यायाचे समर्थन करण्याचे कारणच नाही; पण असे अन्याय अनादी काळापासून सुरू आहेत. त्या-त्या काळात स्त्रियांनी ते सहन केले आहेत. छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्त्री-सन्मानाचा आदर्श घालून दिला; पण त्या आधीच्या काळाचे काय? महाभारतात द्रौपदीला अनेक राजे-महाराजांसमोर वस्त्रहरणाला सामोरे जावे लागले. श्रीकृष्ण मदतीला धावून आला आणि पुढील अनर्थ टळला. पण, द्रौपदीला भर सभेत ही मानहानी सहन करावी लागली, ही दुर्दैवी बाब आहे. बहिणीच्या अपमानाने दुखावलेल्या आणि सीतेच्या रूपाने भाळलेल्या रावणाने तिचे अपहरण केले. पेशवाईत बाजीराव आणि मस्तानीचे किती प्रेम होते, हे रंगवून सांगितले जाते; पण यात तथ्य किती आणि बाजीरावाच्या वैभवाचा प्रभाव किती याचा लेखाजोखा कुणी करायचा?

एसटी महामंडळातील कर्मचारी आणि त्यांच्या नेत्यांना वेतनवाढीच्या कराराची अंमलबजावणी कधी होणार, याची काळजी लागून राहिली आहे. त्यासाठी मोर्चे आणि आंदोलनाचे इशारे देणे त्यांनी सुरू केले आहे; पण आपल्याच महामंडळातील एक अधिकारी महामंडळातीलच महिला कर्मचा-यांच्या अब्रुवर उठला आहे. त्याच्या विरोधात एखादा मोर्चा काढावा, अशी बुद्धी एसटी कर्मचा-यांच्या नेत्यांना का होत नाही? का हा साराच प्रकार म्हणजे सगळेच एकमेकांना सामील असण्यासारखा आहे? महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणाला वाचा फोडून 'प्रहार'ने आपले कर्तव्य केले; पण त्यानंतर या महिलाही अधिक त्वेषाने या स्त्री लंपट अधिका-याविरोधात उभ्या ठाकणे, अभिप्रेत आहे. एखादी पत्रकार परिषद घेऊन सबंधित अधिका-याचे नाव त्यांनी जाहीर केले असते, तर त्यावरून पुढील कारवाई करण्यास आणि त्या महिलांचा त्रास कायमस्वरूपी संपण्यास वेळ लागला नसता.

..तर भारताच्या अडचणी वाढतील!

चीनच्या पंतप्रधानांच्या भारत दौरा सुरू असतानाच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनीही भारताला भेट दिली. करझाई यांच्या दौ-याला प्रसारमाध्यमांतून फारसे महत्त्व मिळाले नसले तरी हा दौराही तितकाच महत्त्वाचा आहे. २०१४मध्ये अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून माघारी जाणार आहे. अशा परिस्थितीत दहशतवादी आणि तालिबानशी लढण्यासाठी युद्धसामग्रीची मदत भारताने करावी, अशी मुख्य मागणी घेऊन करझाई भारतात आले होते.

Read More »

दुष्काळग्रस्तांना भावनिक आधार

महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून खूप मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना केंद्राचीही मोलाची साथ लाभलेली असली तरी दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखीही मदतीची अपेक्षा आहे. ती मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहेच. या प्रयत्नांना लवकरच यश येईल, अशी शक्यता काँगेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मंगळवारच्या दौ-यामुळे निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांनी दुष्काळग्रस्त भागातील जनतेच्या वेदना जाणून घेण्यासाठी, त्यांना सहानुभूती देण्यासाठी आणि सरकारच्या प्रयत्नांबाबतची माहिती देऊन या संकटावर मात करण्यासाठीचा मानसिक आधार देण्यासाठी या भागाचा दौरा केला. या दौ-यावेळी त्यांनी दुष्काळ निवारणासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली. यामध्ये औरंगाबाद जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त गावांना त्यांनी भेटी देऊन तेथील जनतेशी संवाद साधला. राहुल यांनी आजवर केलेले दौरे हे कधीच दिखाऊपणासाठी अथवा प्रसिद्धीसाठी केलेले नाहीत. देशातील सत्ताधारी पक्षातील प्रमुख पदाधिकारी या नात्याने आणि सर्वसामान्य जनतेविषयी असलेल्या आत्मीयतेपोटी ते जनतेशी सातत्याने संवाद साधत असतात. त्यांच्या समस्या जाणून घेत असतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच राहुल गांधी यांचीही ही एक कार्यशैली आहे. सरकारच्या प्रयत्नांविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा एकमेव अजेंडा असलेल्या मंडळींकडून दुसरी अपेक्षाही करता येत नाही; राहुल यांनी आपल्या या दौ-यात दुष्काळग्रस्तांच्या वेदनांवर फुंकर घालतानाच त्यांना केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या अन्नसुरक्षा विधेयकाविषयीही माहिती दिली. तसेच या विधेयकाचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डाची असलेली आवश्यकता समजावून सांगतानाच 'मनरेगा'तील मजुरीचे पैसेही आता थेट बँकेच्या खात्यात जमा होतील. अन्नसुरक्षा विधेयकाच्या अंमलबजावणीमध्ये विरोधी पक्षांनी खोडा घातल्यामुळे हे विधेयक मागे पडले आहे. त्यामागे त्यांचे स्वार्थी राजकारणाचे षड्यंत्र आहे. परंतु याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार असून त्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. हे विधेयक जर संमत झाले तर त्याचा आगामी निवडणुकीत काँग्रेसला लाभ होईल, अशी भीती भाजप आणि इतर विरोधी पक्षांना आहे. त्यामुळेच त्यांनी या विधेयकाला खो घातला आहे. परिणामी, आज धान्याची गोदामे भरलेली असतानाही प्रत्यक्ष गरजूंपर्यंत ते पोहोचवण्यामध्ये अडचणी आहेत. एकीकडे, अशा प्रकारे लोकहितकारी नव्या सरकारी योजनांमध्ये मोडता घालायचा आणि दुसरीकडे सरकार काहीच करत नाही, असा गवगवा करायचा अशी दुहेरी खेळी विरोधक खेळत आहेत. कोणत्याही संकटाप्रसंगी आíथक मदत जितकी महत्त्वाची असते तितकाचा महत्त्वाचा असतो मायेचा ओलावा, आपुलकी असणारा मानसिक आणि भावनिक आधार. राहुल यांनी आपल्या दौ-यातून तो या दुष्काळग्रस्तांना दिला आहे.

Read More »

गुटखाबंदीची 'काळी' बाजू

देशामध्ये गुटख्यामधील घातक रसायनांचे मानवी शरीरावर होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारने गेल्या वर्षी २० जुलैला गुटखा व पानमसाल्याच्या विक्री, उत्पादन, साठवणूक आणि सेवनावर बंदी घालणारा क्रांतिकारी कायदा केला. राज्य सरकारला यातून सुमारे सव्वाशे कोटींचा महसूल मिळत असतानाही त्यावर पाणी सोडायचे ठरवून अशा प्रकारची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी त्याची अंमलबजावणी करणे, कठीण ठरणारे आहे, याची कल्पना सर्वाना होती. याचे कारण केवळ एका राज्याने अशा प्रकारची बंदी घालून फारसा उपयोग होत नाही, हे आजवर दिसून आले आहे. सीमेलगतच्या राज्यांमध्ये गुटखा बंदी नसल्यामुळे राज्यात जरी बंदी घातली तरी परराज्यातून इथे गुटखा आणून तो काळ्या बाजारात विकला जातो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याला दुजोरा दिला आहे. मंगळवारी तंबाखूविरोधी कार्यक्रमावेळी बोलताना त्यांनी राज्यात लपूनछपून सुरू असलेल्या गुटखाविक्रीबाबत भाष्य करताना गृहखात्याच्या ढिल्या कारभारावरही टीका केली. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्यात सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असल्याचे निदर्शनाला आणून दिले आहे आणि वास्तवात परिस्थितीही तशीच आहे. विशेषत: महाराष्ट्रातील कर्नाटकच्या सीमेलगत जी गावे आहेत त्या भागात तर गुटख्याची खुलेआम विक्री होताना दिसते. विशेष म्हणजे, बंदी केल्यानंतर सुरुवातीच्या काळात या पुडय़ांच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ करून विकल्या जात होत्या. त्याही आता पूर्वीच्या दरांनुसार विकल्या जात आहेत. तसेच याच भागातून राज्यात इतरत्रही मोठय़ा प्रमाणात गुटखा चोरटय़ा मार्गाने विक्रीसाठी नेला जातो. सीमेलगतच्या गावातील अनेक नागरिकांनी तर हा जोडधंदाच सुरू केला आहे. कामानिमित्त कर्नाटकाच्या हद्दीतील गावांमध्ये जाऊन येताना दोन-चार पुडे आणायचे आणि त्याची विक्री करायची, असा अनेकांचा नित्यक्रम सुरू आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रात येणारा गुटखा रोखणे, हे एक मोठे आव्हान बनले आहे. मुंबईमध्ये तर रेल्वेच्या मार्गाने मोठय़ा प्रमाणात गुटखा आणला जातो आणि त्याची विक्री केली जाते. काही महिन्यांपूर्वी 'एफडीए'ने तीन कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता. अन्न व औषध प्रशासनाकडील अपुरे कर्मचारी, पोलीस व अन्न-औषध प्रशासन यांच्याकडील वेळेचा आणि समन्वयाचा अभाव हीदेखील गुटखाबंदीच्या अपयशामागील कारणे आहेत. वर्षाला जवळपास १० लाख लोक तंबाखूशी संबंधित असलेल्या ३३ प्रकारच्या आजारांचे बळी ठरतात. कर्करोगासारख्या असाध्य आजार मोठय़ा प्रमाणात वाढण्यात तंबाखूसह गुटख्याचा वाटा मोठा आहे. त्यामुळे जनप्रबोधनासाठी व्यापक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा घातक पदार्थावर एक-दोन राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात बंदी घालणे गरजेचे आहे.

Read More »

देहविक्रय व्यवसायातील महिलांची मुलेही शाळेत

देहविक्रय करणा-या महिलांसोबतच तृतीयपंथीयांनी पालकत्व स्वीकारलेल्या मुलांनाही शाळेचे दरवाजे उघडले गेले आहेत.

मुंबई- देहविक्रय करणा-या महिलांच्या मुलांना शाळेत प्रवेशासाठी पालकांचे नाव लावण्याची सक्ती केली जाणार नाही. तसेच निवासी दाखलाही सक्तीचा केला जाणार नाही. शिक्षण हक्क अधिकार कायद्याप्रमाणे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून या निर्णयांची अंमलबजावणी राज्यातील सर्वच शाळांना करण्याच्या सूचना लवकरच देण्यात येणार आहेत. देहविक्रय करणा-या महिलांसोबतच तृतीयपंथीयांनी पालकत्व स्वीकारलेल्या मुलांबाबतही हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे तृतियपंथीयांच्या मुलांनाही शाळेचे दरवाजे उघडले गेले आहेत.

राज्यात तृतीयपंथीय व देहविक्रय करणा-या महिलांच्या मुलांकडे पित्याची नोंद आणि निवासाचा दाखला नसल्यामुळे हजारो मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. राज्य शालेय शिक्षण विभागाने या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून शिक्षण हक्क अधिकार कायद्याप्रमाणे शिक्षण मिळवून देण्यासाठी नुकताच एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात कोणत्याही शाळांमध्ये या मुलांना पालक आणि रहिवासी पुराव्याची सक्ती केली जाणार नाही. त्यासाठी काढण्यात आलेल्या सूचनांची माहिती राज्यातील सर्व शाळांना लवकरच देण्यात येणार आहे. राज्यातील खासगी व काही ठिकाणी सरकारी, अनुदानित शाळांमध्येही तृतीयपंथीय व देहविक्रय करणा-या महिलांच्या मुलांना पालक आणि रहिवासी, निवासी पुरावा नसल्याचे कारण सांगून प्रवेश नाकारले जात होते. यासंदर्भात असंख्य तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नव्हती. त्यामुळे हजारो मुले शिक्षणापासून वंचित राहात होती.

या पार्श्वभूमीवर देहविक्रय करणा-या महिला आणि तृतीयपंथी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत एप्रिल महिन्यात दोन बैठका घेण्यात आल्या. शिक्षण हक्क अधिकार कायद्यात राज्यातील ६ ते १४ या वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. यामुळे सर्वच बालकांना शाळेत प्रवेश देऊन त्यांचे पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, या कायद्याचा फायदा देहविक्रय करणा-या महिला व तृतीयपंथीयांच्या मुलांना होत नसल्याचे समोर आले होते. त्यामुळेच अशा मुलांच्या पालकांची व निवासाच्या पुराव्याची सक्ती प्रवेशासाठी यापुढे शाळांना करण्यात येणार नसल्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.

सरकारी आणि महापालिकेच्या शाळांमध्ये अनाथ मुलांना प्रवेशाबाबत अडचण येत नव्हती. मात्र, तृतीयपंथी व देहविक्रय करणा-या महिलांच्या मुलांना शाळा प्रवेशासाठी पालक व निवासाच्या पुराव्याची सक्ती करून प्रवेश नाकारला जात होता. त्यामुळे शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाची अंमलबजावणी योग्यरित्या व्हायला हवी. – प्रिती पाटकर, सचिव, प्रेरणा संस्था, मुंबई

शिक्षण विभागातील अधिका-यांना सरकारच्या सूचना

देहविक्रय करणा-या महिला व तृतिपंथीयांना शाळा प्रवेशासाठी अडथळे येऊ नयेत म्हणून राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व प्रशासनातील अधिका-यांना सरकारकडून सूचनाही देण्यात आल्या आहेत. सोबतच महिला व बालविकास विभागाने या दुर्लक्षित समाज घटकांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनाही या नवीन निर्णयाची माहिती द्यावी, असे सरकारने सूचित केले आहे.

Read More »

'केईएम'मधील निम्म्या डायलिसीस मशिन बंद

परळच्या केईएम रुग्णालयात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने डायलिसीस उपचार घेणा-या रुग्णांना त्याचा फटका बसत आहे.

मुंबई- परळच्या केईएम रुग्णालयात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने डायलिसीस उपचार घेणा-या रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. दुरुस्तीकामामुळे रुग्णालयात सध्या चारच डायलिसीस मशिन सुरू आहेत, त्यांचा वापर रुग्णालयातील रुग्णांसाठीच होत आहे. त्यामुळे डायलिसीस उपचार घेण्यासाठी दूरहून येणा-या रुग्णांची हेळसांड होत आहे. दुरुस्तीकामामुळे आणखी चार दिवस डायलिसीस मशिन बंद राहणार आहे.

केईएम रुग्णालयात मिळणा-या उपचारांमुळे राज्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोप-यातून रुग्ण उपचाराकरता येत असतात. त्यातच सध्या रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र गेल्या शनिवारपासून रुग्णालयातील डायलिसीस मशिन बंद करून ठेवण्यात आले आहे. काही रुग्णांवर डायलिसीसचे उपचार अर्धवट केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णालय प्रशासनाकडे डायलिसीसकरता ८ मशिन आहेत. मात्र नूतनीकरणाच्या कामामुळे केवळ ४ मशिन सुरू आहेत. जे गंभीर रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना चार मशिनद्वारे डायलिसीस सुविधा पुरवली जात आहे. त्यामुळे बाहेरून येणा-या नव्या रुग्णांना डायलिसीसकरता आणखी चार दिवस थांबा, असे सांगितले जात आहे.

पूर्वी रुग्णालयात प्रतिदिवस ३५ डायलिसीस केले जात होते. पण तिस-या मजल्यावर असलेले डायलिसीस युनिट हे दुस-या मजल्यावर आणल्यामुळे दिवसाला अवघे २० डायलिसीस केले जात आहेत. गेल्या वर्षभरात आठ हजारांहून अधिक डायलिसीस झाल्याचे मूत्रपिंडविकार विभागाचे प्रमुख डॉ. एन. हसे यांनी सांगितले. ठरलेल्या वेळेप्रमाणे मशिन्सच्या नूतनीकरणाचे काम होणे अपेक्षित होते, मात्र ते काम वेळेत झालेले नाही. येत्या दोन-तीन दिवसांत हे काम पूर्ण होईल, असेही डॉ. हसे यांनी सांगितले. खासगी रुग्णालयात डायलिसीसकरता दीड ते दोन हजार रुपये घेतले जातात.

मात्र केईएममध्ये अवघ्या साडेचारशे रुपयांत डायलिसीस केले जाते. तर नूतनीकरणाच्या कामामुळे सध्या डायलिसीस मशिन बंद आहेत हे खरे आहे. त्यामुळे अतिदक्षता उपचारातील रुग्णांनाच डायलिसीस करावे, अशा सूचना देण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. संध्या कामथ यांनी सांगितले. दरम्यान येत्या दोन-तीन दिवसांमध्ये डायलिसीस सुविधा पुन्हा सुरू होईल, अशी शक्यता डॉ. कामथ यांनी व्यक्त केली.

गेल्या चार महिन्यांत रुग्णालयात हार्टलंग मशिन, एन्डोस्कोपी मशिन, एक्स-रे मशिन बंद पडल्याचे प्रकार घडले आहेत. परिणामी त्याचा त्रास रुग्णांना सोसावा लागला होता.

१२ नवीन मशिन्समुळे डायलिसीसची क्षमता वाढणार.

परिणामी रुग्णांना डायलिसीसकरता वेटिंगलिस्टवर राहावे लागणार नाही.

नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण झालेले नाही.

१२ नव्या मशिन सेवेत येणार

सध्या डायलिसीसकरता ८ मशिन आहेत. डायलिसीसकरता येणा-या रुग्णांची संख्या पाहून आणखी १२ नवीन डायलिसीस मशिन खरेदी करण्यात येणार आहेत. १२ नवीन मशिनमुळे रुग्णालयाकडे एकूण २० डायलिसीस मशिन होतील. परिणामी रुग्णांना डायलिसीसकरता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही.

Read More »

रिव्हर्स स्विंग, ३० मे २०१३

क्रिकेटच्या इतिहासात ३० मे रोजी घडलेल्या ठळक घडामोडी…

१८७९
इंग्लंडचे डावखुरे स्पिनर कॉलिन 'चार्ली' ब्लायथे (१८७९-१९१७) यांचा जन्म. त्यांनी १९ सामन्यांत बरोबर १०० विकेट्स घेतल्या. पहिल्या महायुद्धावेळी बेल्जियममध्ये चार्ली यांचा मृत्यू झाला.


१८९५
महान फलंदाज डब्ल्यू. जी. ग्रेस यांनी मोसमातील एक हजार धावा पूर्ण केल्या. त्यावेळी मोसम सुरू होऊन केवळ २२ दिवस झाले होते.


१९०२
इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टनवरील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ ३६ धावांत संपला. कसोटीतील तो त्यांचा नीचांक ठरला.


१९०९
वेस्ट इंडिजचे माजी कसोटीपटू जॉर्ज हेडली (१९०९-८३) यांचा जन्म. पहिले कृष्णवर्णीय कर्णधार म्हणून त्यांची नोंद. २२ कसोटी सामन्यांत ६०.८३ सरासरीने २१९० धावा फटकावणा-या हेडली यांना 'ब्लॅक ब्रॅडमन' म्हटले जाई. त्यांनी १० शतके ठोकली. १९३९ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्सवर दोन शतके ठोकणारे ते पहिले फलंदाज आहेत. त्यांचा मुलगा रॉडने वेस्ट इंडिजचे तर नातू डीनने इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले.


१९४०
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा जन्म. १९९७-२००० दरम्यान त्यांनी अध्यक्षपद भूषवले. सध्या ते बंगाल क्रिकेट असोसिएशन्सचे (कॅब) अध्यक्ष आहेत.


१९४९
इंग्लंडचे माजी कर्णधार आणि सवरेत्तम तेज गोलंदाज बॉब विलिस यांचा जन्म. त्यांनी ९० कसोटीत ३२५ विकेट्स घेतल्या. कर्णधार म्हणूनही विलिस यांची कारकीर्द गाजली. १९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीतील (४३ धावांत आठ विकेट्स) कामगिरी त्यांच्या कारकीर्दीतील सवरेत्तम कामगिरी ठरली.


१९५७
एजबॅस्टनवर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचे महान फलंदाज रोहन कन्हाय यांनी कसोटी पदार्पण केले. कन्हाय यांचे पदार्पण (४२ आणि १) तितके सनसनाटी ठरले नाही.