Tuesday, March 17, 2015

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

सदैव आनंदी राहण्यासाठी..

दिवसभर कामाचा रगाडा उपसायचा तर आपल्या अंगी ऊर्जा असायला हवी. ही ऊर्जा आपल्याला अन्नपदार्थातून मिळते. पण आजकाल आपल्याला धड जेवायलाही वेळ नसतो. त्यामुळे थकवा किंवा मरगळ येते. दुस-या दिवशी काम करण्याचा उत्साह संपून जातो. चांगलं काम करायचं असेल तर आनंदी असणं गरजेचं आहे. अन्नपदार्थ सेवन करताना काय काळजी घ्यावी किंवा कोणत्या पदार्थाचं सेवन करावं म्हणजे आपल्याला ऊर्जा मिळेल आणि आपण आनंदी राहू शकतो हे जाणून घेऊया.

दिवसेंदिवस कामाचा ताण वाढतोच आहे. त्याचबरोबर कामाचे तासही वाढतायेत. भरपूर काम करायचं तर सकाळी उठल्याबरोबरचा उत्साह दिवसाच्या शेवटापर्यंत कायम राहणं आवश्यक आहे. आपल्या शरीराला त्यासाठी ऊर्जेची गरज आहे.

शरीराला आपल्या आहारातून ऊर्जा मिळते हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. हे अन्न अधिकाधिक हेल्दी कसं मिळेल याचा आपण कधी विचारच करत नाही, शरीराला ऊर्जा हवी असेल तर ऊर्जेचं गणित आपल्याला जाणून घ्यायला हवं. म्हणूनच दिवसभर उत्साही, आनंदी राहण्यासाठी कशा प्रकारचं अन्न सेवन करायला हवं हे आपण जाणून घेऊया.

ब-याचदा आपण भूक लागली असो वा नसो. खात बसतो. पण हे बरोबर नाही. कारण बहुतांश लोकांना भूक लागणे म्हणजे काय हेच नेमकं माहीत नसतं. कित्येकदा बाहेर रस्त्या रस्त्यावर अनेक पदार्थाच्या गाडया उभ्या असतात की त्या पदार्थाचा मोह झाल्याशिवाय राहात नाही.

अशा वेळी शरीराला गरज नसतानाही खाल्लं जातं. दुसरं असं की काही लोकांच्या मनावर दिवसातून किमान चार वेळा तरी अन्न सेवन केलं पाहिजे, असा पगडा बसला आहे. म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळची न्याहारी आणि रात्रीचं जेवण इ. त्यामुळे दर चार तासांनी काहीतरी खाल्लं पाहिजे असा काहीसा विचार ही मंडळी करतात.

या विचारानेदेखील भूक लागली नसतानाही जेवणाच्या वेळा पाळल्या जातात. मग अशा वेळी अधिक पदार्थाचं सेवन केलं जातं परिणामी नको असलेल्या पदार्थाचं चरबीत रूपांतर होतं. म्हणूनच भूक लागल्यावरच अन्नाचं सेवन केलं पाहिजे. म्हणजे अन्न अधिक रुचकर लागतं. तसंच अन्नाचं पचनही लवकर होतं. योग्य प्रकारे पचन झाल्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळतं. परिणामी उत्साही आणि आनंद वाटतो.

ताज्या पदार्थाचं सेवन आवश्यक

काही जणांना ताजं अन्न म्हणजे नुकतंच शिजवलेलं अन्न असं वाटतं. पण ताजं याचा अर्थ बिया, दाणे, अंडी.. असे पदार्थ. आहारात शक्य तितक्या प्रमाणात बिया आणि दाण्यांचा समावेश करणं आवश्यक आहे. मोड आलेले कडधान्य हा शरीराला ऊर्जा देणारा अतिशय उत्तम स्रोत आहे. आपल्या शरीराला याचा अधिक लाभ हवा असल्यास हे पदार्थ कच्चेच खाणं उचित ठरतं.

कच्चे किंवा भाजलेले दाणे, उकडलेली अंडी आणि मोड आलेली कडधान्यं रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास पाहा बरं कसं ताजतवानं वाटतं. तसंच आहारात ताजी फळं आणि भाज्यांचाही समावेश असावा. हल्ली महिला कामाला जातात म्हणून कित्येकदा आठवडयाभराची भाजी फ्रीजमध्ये आणून ठेवतात आणि मग ती आठवडाभर पुरवतात.

अगदीच मार्केट लांब असेल तर ठीक आहे. पण आजकाल नवीन इमारत झाली की त्याच्या आसपास फास्ट फूडप्रमाणेच भाजीपाला, फळ, दूध, इतर किराणामालाच्या वस्तू अशी दुकानं उघडली जातात. म्हणूनच येता-जाता आपण सहजच ताजी भाजी खरेदी करू शकतो.

अशा दररोज ताज्या भाज्या खरेदी करून त्यांचं सेवन करा. कधीही प्रक्रिया केलेलं, पॅकिंग किंवा कॅन्डमध्ये स्टोरेज असलेलं अन्न सेवन करणं चुकीचं आहे. यामुळे शरीराला योग्य आहार मिळतो, अन्नाचं पोषण चांगलं होतं आणि शरीराला उत्तम ऊर्जा मिळते.

रंगीत आहार

आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटात अधिकाधिक रंगांचा समावेश असेल याकडे लक्ष द्या, रंग भरा म्हणजे आहारात विविध भाज्या किंवा सलाड असतील याकडे लक्ष द्यायला हवं. एका बाजूला भाजी असेल तर दुस-या बाजूला कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी यांची कोशिंबीर करावी.

लोणचं किंवा चटणी आणि वरण-भात यांचा समावेश असावा. खास सलाडसाठीच्या पालेभाज्याही बाजारात मिळतात. त्या एकत्र करून त्यावर कांदा, लिंबू घालून छान सलाड बनवा. आवडत असल्यास फळ आणि भाज्यांचंही सलाड करून खाल्लं तरी चालतं.

यामुळे आहारातून विविध प्रकारची जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळायला मदत होते. शरीराला आवश्यक असलेली पोषणमूल्यं तर मिळतातच शिवाय, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि शरीराला आपोआपच ऊर्जा मिळते.

द्रवपदार्थाचा समावेश करा

कित्येक जणांच्या आहारात दररोज दही किंवा ताक, आमटी, सार अशा द्रवपदार्थाचा समावेश असतो. याबरोरबच कधीतरी फळं आणि भाज्यांचा ज्यूस घ्यायला हरकत नाही. कोबी, दुधी तसंच पपई, चिकू, किवी, गाजर अशा फळांचा आणि भाज्यांचा ज्यूस घ्यायला हरकत नाही. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. शर्रीराची ऊर्जा वाढते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

चावून खा

एक घास बत्तीस वेळा चावून खा असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात आपण किती वेळा एक घास चावून खातो हे तपासून बघा. एक तर आपल्याला भरभर खाऊन जायचं असतं. त्यामुळे आपण कसंबसं अन्न पोटात ढकलतो.

त्यात कित्येक जण टीव्ही बघत जेवतात. त्यामुळे आपण काय आणि कसं खातोय याकडे त्यांचं लक्ष नसतं. असं अन्न पचायला वेळ लागतो किंवा जेवल्यासारखं वाटतं नाही.

परिणामी अपचनाचा सामना करावा लागतो. पण सावकाश आणि प्रत्येक घास चावून चावून खाल्ल्याने अन्नात लाळ मिसळते आणि अन्न व्यवस्थित पचतं. अधिक वेळ चर्वण केल्याने आपण काय खातोय याकडेही आपलं लक्ष राहातं. अन्नाची चव लागते आणि चवीने खाल्लेलं अन्न शरीरासाठी अधिक उपयुक्त ठरतं.

अशा काही साध्या-सोप्या मार्गाचा अवलंब केला तुम्हाला आहाराचा आनंद अनुभवता येईल शरीरातील ऊर्जा वाढेल आणि तुम्हाला आरोग्यदायी, उत्साही आणि आनंदी वाटेल.

Read More »

सरोगेट मातृत्व म्हणजे काय?

जोडप्याला प्रजननाचे प्रयत्न करूनही स्वत:च्या बाळासाठी गर्भधारणा राहात नाही अशा जोडप्यांमध्ये थर्ड पार्टी रिप्रॉडक्शनची किंवा सरोगेशनची मदत घेतली जाते. यात अंडं, शुक्रपेशी, गर्भ किंवा गर्भाशय यांचा वापर केला जातो. जे वंध्यत्व असलेल्या व्यक्तीला किंवा जोडप्याला पालकत्व लाभण्यासाठी तिस-या व्यक्तीने दान केलेले असतात. सामान्यपणे, या तंत्रज्ञानाचा वापर करण्याशिवाय गर्भधारणेची कोणतीही आशा नाही, असं वाटल्यानंतरच या पद्धतीचे प्रजनन गृहीत धरलं जातं.

वंध्यत्व असलेले पालक तसेच समाजामध्ये या आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाबद्दल अनेकदा गोंधळ असल्याचं लक्षात येतं. याचं मुख्य कारण म्हणजे जननक्षमतेच्या मूलभूत आव्हानांना लोक समजून घेत नाही. त्याचप्रमाणे सत्य परिस्थितीचं केलेलं अवास्तव नाटकीकरण आणि खोटं प्रदर्शन यामुळे हा गोंधळ उडतो.

यासोबतच, अनेकदा दात्यांची आणि सरोगेटची निवड उपलब्धता तसंच मूल्य, यशस्वी होण्याचं प्रमाण, धोके, कायदेशीर सूत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नतिकता यांबद्दल प्रश्न विचारले जातात.

कोणतेही वैद्यकीय उपचार आणि निर्णयासोबत, जोडप्याने उपचार प्रक्रियेबद्दल सल्ला आणि समुपदेशन करून घ्यायला हवं. तसंच आíथक आणि मानसिक अंमलबजावणी विस्तृतपणे करायला हवी.

थर्ड पार्टी रिप्रॉडक्शन चालू करण्याआधी जोडप्याने, त्यांना डॉक्टरांनी सांगितल्यास त्यांच्या जननक्षमतेचं अन्वेषण करण्यासाठी सत्य चाचणी द्यायला हवी. दाता किंवा सरोगेटचे युग्मक किंवा गर्भ स्वीकारणं हा फार सोपा टप्पा नसल्यामुळे या गोष्टीला संवेदनशीलपणे हाताळायला हवं. हा उपचार घेत असलेल्या जोडप्याची गोपनीयता कठोरतेने पाळायला हवी आणि त्यांना याबाबतीत वास्तव अपेक्षा द्यायला हव्यात.

» थर्ड पार्टी रिप्रॉडक्शन स्वीकारताना लक्षात ठेवायची काही महत्त्वाची सूत्रं :

» एआरटी (असिस्टेड रिप्रॉडक्टिव टेकनिक) जोडप्याच्या संमतीशिवाय केली जाऊ नये.

» एआरटीमधून जन्माला येणारं बाळ त्या जोडप्याचेच विवाहनंतर झालेले व दोन्ही जोडीदारांच्या संमतीने झालेलं बाळ असण्याची कल्पना केली जावी.

» थर्ड पार्टी रिप्रॉडक्शन करायच्या जोडप्याला दाता अंडे, शुक्रपेशी, गर्भ किंवा गर्भाशय आणि सरोगसी यांमध्ये अनुभव असलेले व ज्ञान असलेले चिकित्सक आणि कर्मचारी यांचं मार्गदर्शन दिलं जाऊ शकतं.

शुक्रपेशी दान

नर्सिंगकपणे किंवा पुरुषांसाठी शस्त्रक्रिया करूनसुद्धा शुक्रपेशींची प्राप्ती होण्याची शक्यता नसल्यास जोडप्याला शुक्रपेशींचं दान केलं जातं. या दाता शुक्रपेशींचा वापर एकतर स्रीला गर्भवती करण्याच्या (आययूआय) किंवा (आयव्हीएफ) प्रक्रियेमध्ये तिच्या अंडयाला जननक्षम बनविण्यासाठी केला जातो. निश्चितच, या प्रक्रियेची अंमलबजावणी आणि यामध्ये समाविष्ट प्रक्रिया याबद्दल जोडप्याचं समुपदेशन केलं जातं.

सर्व दाता शुक्रपेशींचे नमुने प्रस्थापित आणि नोंदणीकृत शुक्रपेशी बँकमधून उपलब्ध केले जातात. हे नमुने जननक्षम दात्यांकडून घेतले जातात. त्यांची संसर्गजन्य आजारांसाठी आणि सामान्य लैंगिक आजारांसाठी चाचणी केलेली असते. नवीन दाता किंवा माहिती नसलेले दाता यांचा कधीही वापर केला जात नाही. शुक्रपेशी बँकेने दिलेल्या कोड क्रमांकानुसार हे नमुने ओळखले जातात.

अंड दान

ज्या स्त्रियांच्या अंडयाचा कोणत्याही कारणांमुळे अवेळी ऱ्हास होतो, किंवा ज्या स्त्रियांचे अंडे तज्ज्ञ अधिका-याकडून मूल्यांकन करून कमी दर्जाचे असल्याचे लेखी दिलेले असते. त्या स्त्रियांना हा उपचार लागू केला जातो.

अंड दात्यांना ओळखलं जातं, त्यांचं समुपदेशन केलं जातं, त्यांची वैद्यकीय तपासणी करून खात्री केली जाते आणि सुपररिव्होल्यूशन आणि ऊसाईट र्रिटायव्हल प्रक्रियेमधून, दात्यांच्या अंडाशयामधून अंडं घेतलं जातं. प्राप्तकर्ता जोडीदाराकडून मिळालेल्या शुक्रपेशींचा या अंडय़ांना जननक्षम बनविण्यासाठी वापर केला जातो.

प्राप्तकर्त्यांच्या गर्भाशयामध्ये एक किंवा दोन परिणाम झालेले गर्भ पाठवले जातात. गर्भधारणा झाल्यास प्राप्तकर्ता शारीरिकरित्या पालक असेल परंतु बाळासोबत त्याचे जननिक संबंध नसतील. तिचा जोडीदार (शुक्रपेशी त्याने पुरवल्यास) शारीरिक आणि जननिक दोन्हीरीत्या त्या बाळासोबत संबंधित असेल.

अंड दान कोणी करावे व कोणी करू नये?

ती व्यक्ती निरोगी असावी आणि वैद्यकीयरित्या गर्भधारणेसाठी तयार असावी. त्यांचं समुपदेशन झालेलं असावं आणि स्वाक्षरीकृत संमती घेतलेली असावी. कोणत्याही स्त्रीने गर्भधारणा होण्याच्या आधी रुबेला किंवा जर्मन गोवर या लसी घेतल्याची खात्री करावी.

दात्याची वैद्यकीय तपासणी केली जावी. दात्याचे वय २१ वर्षापेक्षा कमी किंवा ३५ वर्षापेक्षा जास्त नसावं. आयसीएमआर (इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च)ला दाता निनावी असणं आवश्यक आहे. अंड मातृपेशी दान करतो तो, कधीही सरोगेट आई म्हणून त्या जोडप्यासोबत वागू शकणार नाही.

सरोगसी म्हणजे काय?

सरोगसी ही वैद्यकीयरित्या आणि भावनिक स्तरावर गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ज्याला वैद्यकीय आणि कायदेशीर व्यावसायिकांकडून काळजीपूर्वक मूल्यांकनाची आवश्यकता आहे. ज्यामुळे सरोगेट आणि पालक दोन्हींचे समाधान होतं. सरोगेट ही एक स्त्री असते, जी इतर जोडप्यासाठी किंवा स्त्रीसाठी गर्भवती राहते.

जी स्त्री काही वैद्यकीय कारणांमुळे गर्भवती राहू शकत नाही आणि जिचे गर्भ यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकत नाही. अशा स्त्रीसाठी ही प्रक्रिया असते. भारतामध्ये आपल्या कायद्याने केवळ गर्भावस्थेमध्ये सरोगसीलाच परवानगी दिली आहे.

ज्यामध्ये सरोगेट स्त्री बाळ हवं असलेल्या पालकांचे शुक्रजंतू व अंड घेऊन गर्भवती राहते. आवश्यकता असल्यास एक युग्मक दात्याकडून असू शकते, परंतु तो सरोगेटच्या गर्भाशयामध्ये हस्तांतरित केला जाऊ शकत नाही. जीसी गेस्टेशनल सरोगेटचा त्या बाळासोबत कोणताही जननिक संबंध नसेल.

सरोगेट आईने काय करावे आणि काय करू नये?

»  सरोगेट आईचं वय २१ वर्षापेक्षा कमी किंवा ३५ वर्षापेक्षा जास्त नसावं.

»  स्त्रीने त्या विशिष्ट जोडप्याच्या बाळासाठी सरोगेट होण्याआधी तिची एआरटी चाचणी केली जाते (आणि त्याची नोंद ठेवली जाते) जेणेकरून त्यावरून ती स्त्री सर्व निकष पूर्ण करून यशस्वीरित्या पूर्णपणे गर्भवती राहू शकते का हे समजते.

»  स्त्री आणि तिचा पती यांचे मानसशास्त्रीय समुपदेशन केलं जातं, ज्यावरून त्यांना या अडचणीमध्ये काय अंमलबजावणी करायची हे समजतं. वैद्यकीय औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर पालक सरोगेटसह आणि तिचा पती कायदेशीर करारावर स्वाक्षरी करतात, ज्यावरून त्या स्त्रीला अशा जन्म देण्यासाठी कायदेशीररित्या सरोगेसी प्राप्त होते. त्यासोबतच सरोगेटची वैद्यकीय आणि सामाजिक काळजी घेतली जाते.

»  ज्या स्त्रीच्या आयुष्यात तीन गर्भधारणा झालेल्या आहेत अशी स्त्री सरोगेट म्हणून काम करू शकत नाही.

»  जोडपे भारतीय नागरिक नसल्यास हे तत्त्व फारच कठोरतेने पाळलं जातं. कायदेशीर विवाहित झालेल्या जोडप्याने त्यांच्या निवासी देशांमधून तसेच सरोगेसी स्वीकारण्यापूर्वी भारतीय अधिका-याकडून मंजुरी घेणं फार आवश्यक आहे.

थोडक्यात थर्ड पार्टी रिप्रॉडक्श्नचा जेवढा जास्त प्रमाणात वापर होतो, तेवढेच त्यामध्ये नतिकता आणि कायदेशीर अडचणींना समजून घेण्याची आवश्यकता असते. या प्रक्रियेला शक्य तेवढं सहजतेने पुढे नेणं आणि निरोगी बालकाला जन्म देण्यामध्ये समावेश असलेल्या सर्वाना आनंद व समाधान देणं हे यामागचं अंतिम ध्येय आहे. तरीसुद्धा दाता आणि उपचार घेणारे जोडपे यांची आवड उपचार देत असलेल्या डॉक्टरकडून सुरक्षित ठेवली जाते.

Read More »

बहुगुणी पपनस

पपनस हे संत्रं, मोसंबी अशा सायट्रस वर्गातील फळ असून ते प्रामुख्याने आशियात आढळतं. आशिया इतकं जगाच्या अन्य कोणत्याही भागात ते प्रचलित नाही.

पपनस हे संत्रं, मोसंबी अशा सायट्रस वर्गातील फळ असून ते प्रामुख्याने आशियात आढळतं. आशिया इतकं जगाच्या अन्य कोणत्याही भागात ते प्रचलित नाही. इंग्रजीत पोमेलो तर हिंदी आणि मराठीत पपनस या नावाने प्रचलित आहे.

आतील गर हा अतिशय उपयुक्त असून, तो रंगांने गुलाबी असतो तर पपनसाची साल बाहेरून हिरवी किंवा पिवळ्या रंगांची असते. त्याचा आतला गर हा पांढरा किंवा पातळ असेल तर तो खाण्यास अयोग्य असतो.

मात्र त्यात भरपूर प्रमाणात पोषणतत्त्वं आहेत, ज्यात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्व सी आणि बी-६, पोटॅशियम, पाचक फायबर, मॅग्नेशियम आदी गोष्टींचा भरणा आहे.

» अँटिअ‍ॅक्सिडंट म्हणून काम करते. शरीराला हानी पोहोचवणा-या फ्री रॅडिकल्सना थोपवते आणि पांढ-या पेशींची वाढ करते.

» सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या विषाणूंपासून संरक्षण करते.

» पचनशक्ती सुधारते.

» प्रत्येक पपनसमध्ये पोटॅशियमचं प्रमाण ३७ टक्के असतं. त्यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण राहातं. त्यामुळे हार्टअ‍ॅटॅकसारख्या आजारापासून बचाव करतं.

» स्नायूंमध्ये येणारे क्रॅम्प रोखण्याचं काम करतं.

» हाडं मजबूत होतात. त्यामुळे ऑस्टिओपोरायसिससारख्या आजारापासून संरक्षण होतं.

» काळानुसार त्वचेवर येणा-या सुरकुत्या थांबवण्याचं काम पपनस करतं. याबरोबरच पिंपल्स, अ‍ॅक्नेसारख्या विकारांवर मात करून त्वचेचा पोत सुधारतो.

» वजन नियंत्रित राखण्यास मदत होते.

» तोंडातील किटाणू नष्ट करून दात, हिरडया यांचं आरोग्य सुधारतं.

» किडणी रुग्णांनी किंवा कमी-उच्च रक्तदाब असलेल्यांनी हे फळ खाऊ नये.

» रक्ताभिसरण सुधारते. स्त्रियांची मासिक पाळीदरम्यान झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यात मदत करते.

» संत्र्याप्रमाणे याच्या सालीचा उपयोग होत असून त्यात बायोफ्लेवोनाइट्स असल्यामुळे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी उपयोग होतो.

» याच्या नियमित सेवनाने लघवी स्वच्छ होते.

» केसातील कोंडा नष्ट होतो, केस गळण्याची समस्याही काही प्रमाणात दूर होते.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe