Wednesday, January 15, 2014

FeedaMail: PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

feedamail.com PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS » मजेत मस्त तंदुरुस्त

तीळगूळ खा, धष्टपुष्ट राहा!

आज या लेखाच्या निमित्तानं अतिशय छान योगायोग जुळून आला आहे, तो म्हणजे मकर संक्रांत आणि आजचा आहारमंत्र! या दिवसापासून सूर्यनारायणाचं मकर राशीत संक्रमण म्हणजेच प्रवेश होतो, म्हणूनच आजचा दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा करतात. हा सण एकट्यादुकट्यानं साजरा करायचा नसून तो एकमेकांना गोडधोड (आनंद) वाटून, परस्परांमध्ये गोडवा आणण्याचा संदेश देणारा असा उत्सव आहे. अशा या गोडवा आणणा-या सणाच्या निमित्तानं शरीरात उष्णता निर्माण करणा-या पदार्थाविषयी थोडक्यात.

मकर संक्रांत म्हणजेच 'तीळ आणि गूळ' हे वर्षानुवर्षापासूनचं समीकरण आहे. परंतु यामागे नैसर्गिक कारणही आहे. निसर्गातील बदलत्या ऋतुचक्रानुसार जशी विविध फळं आणि वनस्पतीही उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे हंगामी विकारही होण्याची संभावना असते. म्हणूनच निसर्ग ठरावीक ऋतूमधील ठरावीक आजारानुसार औषधी वनस्पती, फळं निर्माण करतो. हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे शरीरातील स्नायू व सांधे आखडतात. रक्ताभिसरण क्रियाही मंदावते.

रक्तवाहिन्यांवरही थंडीचा परिणाम होत असल्यामुळे शरीराला रूक्षता (कोरडेपणा) येते. अशा वेळी शरीराला स्निग्धतेची गरज असते. तिळामध्ये स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीनं तीळ आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात. हिवाळी हंगामात शेतातून ताजे तीळ बाजारपेठांमध्ये व तिथून थेट घरात येतात. त्यामुळे शुष्क बनणाऱ्या शरीरासाठी तिळाहून अधिक गुणकारी औषध कोणतं असू शकतं!

आयुर्वेदशास्त्रात तिळाचं महत्त्व आणि मोल अपरंपार आहे. तीळ हे तेलबिया या वर्गातील असून त्याचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान ताजे तीळ मिळतात. या तिळांमध्ये जास्तीत जास्त गुणवत्ता असते. तिळापासून काढलं जाणारं तेल हे उष्ण गुणात्मक, कार्यकारी शक्ती वाढवणारं असल्याने त्याचे शरीरावर दिसून येणारे परिणामही उष्ण असून हिवाळ्यात ते आपल्या शरीराला सात्म्य होतात. ते भाजी, आमटी, पोळीची कणीक भिजवतानाही वापरले जायला हवेत. तसंच तिळाची चटणी ही दीपन-पाचन (भूक व अन्नपचन या दोन्ही शरीरक्रिया उत्तम प्रकारे सांभाळणारी) असून ती जिभेलाही रुची आणणारी आहे. तिळाच्या तेलाचा वापर अभ्यंगासाठी म्हणजेच शरीराचं मालीश करण्यासाठी करतात. त्याचप्रमाणे तिळाच्या तेलानं केसांच्या मुळांना मालीश केल्यास केस जोमानं वाढतात व त्यांची मुळंही घट्ट होतात. रोजच्या आहारात दोन चमचे तिळाचं तेल वापरल्यास चेहे-याच्या कांतीचं तेज दीर्घकाळ टिकतं. कोलेस्टेरॉलचं प्रमाणही कमी होतं.

तीळ व तिळाच्या तेलातही हृदय संरक्षक रसायनद्रव्य (ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड्स) असतं. त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आहे. म्हणूनच दररोज प्रत्येकानं भाजलेले तीळ जमेल त्या स्वरूपात खावेत. काळे तीळ हे पांढ-या तिळांपेक्षा जास्त उष्ण असतात. पण त्यात लोहाचं प्रमाणही अत्युच्च आहे. ते केवळ थंडीतच व विशेषत: थंड प्रदेशात राहणा-यांनी खाल्ल्यास उत्तम परिणाम साधला जातो.

तीळ म्हटल्यावर त्यासोबत गूळही आलाच. नंतर भाजलेले शेंगदाणे, सुकं खोबरं, खसखस, जायफळ, वेलदोड्याची पूड हे सर्व जिन्नस तिळाच्या लाडूंमध्ये समाविष्ट असतात. गूळ हासुद्धा उष्ण गुणात्मक असतो. म्हणूनच हिवाळ्यात याचा सढळ हातानं उपयोग करावा. गुळामध्येही भरपूर प्रमाणात लोहतत्त्व, साखर, कॅल्शियम आहे.
शेंगदाण्यांना तर 'गरिबांचे काजू' असं म्हटलं जातं. काजू, बदामाइतकी पोषणमूल्य शेंगदाण्यातही आहेत. मूठभर भाजलेले शेंगदाणे गुळासोबत खाणं, हे एक उत्तम नैसर्गिक टॉनिक आहे. शेंगदाण्यांमध्ये उत्तम दर्जाची प्रथिनं, बुद्धिवर्धक तत्त्वं, कबरेदकं आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वं आहेत. शेंगदाण्यापासून काढण्यात येणा-या रिफाइंड (ब-याच प्रक्रियांद्वारे अतिशुद्ध करण्यात आलेलं) तेलापेक्षा फिल्टर्ड (गाळलेलं) तेल वापरावं (परंतु तेही प्रमाणातच). कारण रिफाइंड करण्याच्या प्रक्रियेमुळे त्यातील पोषणमूल्यं निघून जातात. तुलनेनं फिल्टर्ड तेलामध्ये ती टिकून राहतात.

उष्णता निर्माण करणा-या पदार्थाच्या वर्गातील खसखस हा प्रकार सर्वात महाग मिळतो. गोड पदार्थ वा चमचमीत पदार्थामध्ये खसखस भाजून वापरतात. खसखसमधील नैसर्गिक तेलात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि हृदय संरक्षक रसायन आहे.

जून ओला नारळ आतून पूर्णपणे सुकेपर्यंत तसाच ठेवून दिल्यास सुक्या खोब-याच्या वाट्या तयार होतात. मुबलक प्रमाणात स्निग्धता व मेदजन्य घटक यात आहेत. म्हणून स्वयंपाकात याचा वापर जरा बेतानंच करावा. विविध भाज्या, मांसाहार यामध्ये याचा वापर होत असला, तरीही यासोबत वापरल्या जाणा-या कांद्याचं प्रमाण जास्त व सुकं खोब-यांचं प्रमाण कमी ठेवावं.

Read More »

बहुगुणी मोहरी

मसाल्याच्या डब्यातला रोजच्या फोडणीतला अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मोहरी. ही खरं तर पालेभाजी असून ती हिंदीत सरसों या नावाने ओळखली जाते. मक्याच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडीने खाल्ली जाते.
मसाल्याच्या डब्यातला रोजच्या फोडणीतला अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मोहरी. ही खरं तर पालेभाजी असून ती हिंदीत सरसों या नावाने ओळखली जाते. मक्याच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडीने खाल्ली जाते. या पालेभाजीला ज्या छोट्या बिया असतात त्यांना मोहरी किंवा राई असं म्हटलं जातं. पांढरी (Brassica alba), पिवळी (Brassica campestris), तेलाची (Brassica napus), भाजीची (Brassica juncea) आणि काळी (Brassica nigra)मोहरी अशा मोहरीच्या ब-याच जाती आहेत. मोहरीची सर्वत्र लागवड होते. भारतात पंजाब, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड होते.

महाराष्ट्रात मिळणारी मोहरी भुरकट, आकाराने लहान तर पंजाब आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी मिळणारी मोहरी तांबूस, काळपट आणि आकाराने मोठी असते. मोहरीची पानं-फुलं आणि बियांचा उपयोग केला जातो. फोडणीत वापर केला जात असल्याने प्रत्येक घरात मोहरी असतेच. मोहरीचा गुणधर्म उष्ण असल्याने कित्येक आजारांवर ती गुणकारी ठरते.

आयुर्वेदानुसार मोहरी तेलकट असून कोरडा, कडू, तिखट, कफवातनाशक, पित्तवर्धक, वेदना दूर करणारे, गर्भाशय व हृदय यांना उत्तेजना देणारे तसंच कृमिनाशक असते.
मोहरीच्या तेलात मीठ टाकून दररोज दात घासल्याने दात चमकदार होतात आणि प्रयोग नियमित केल्यास दात खराब होत नाहीत.

> कापूरमिश्रित मोहरी तेल केसांना लावल्याने केस अकाली पांढरे होत नाहीत, तसंच ते घनदाट होतात. रोज मालीश केल्याने डोकं शांत राहतं आणि झोपही चांगली लागते.

> ऐकण्याची शक्ती क्षीण असलेल्यांनी दिवसातून ४-६ वेळा दोन्ही कानांमध्ये मोहरीच्या तेलाचे एक किंवा दोन थेंब घालावेत. ऐकण्याची क्षमता सुधारते.

> टॉन्सिल्स किंवा गळ्याच्या आजारावर मोहरीचा काढा घेतला जातो.

> दातदुखीवर मोहरीच्या काढ्याच्या गुळण्या कराव्यात.

> शरीरावर आलेला एखादा फोड पिकत नसेल तर मोहरीचं चूर्ण तयार करून त्याचा लेप त्यावर लावल्याने लवकर आराम पडतो.

> मोहरी उष्ण असल्याने वाताचं शमन करते, म्हणून संधीवातावर मोहरीचं तेल अत्यंत गुणकारी असतं.

> लकवा, कंबरदुखी, चिकनगुनिया यांसारख्या आजारांत रुग्णांच्या हातापायांना मोहरीच्या तेलाने मालीश करावं.

> कुष्ठरोग झाला असल्यास, अंगाला खाज येत असल्यास किंवा घाम येत नसेल तर मोहरीचं तेल लावावं.

> बाळंतिणीलाही मोहरीच्या तेलाने मालीश करतात.

> थंडीच्या दिवसांत लहान मुलांचं झोपण्यापूर्वी मालीश करावं. जेणेकरून शरीरात ऊब निर्माण होऊन सांधे आणि हाडं मजबूत होतात.

> दररोज फोडणीत लहानसा चमचा मोहरीचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारून पोटाचे विकार दूर होतात.

Read More »

दमछाक करणारा दमा

शरीरातील फुप्फुस आदी भागांमध्ये नेणा-या वाहन प्रणालीमध्ये अतिरिक्त कफ जमा झाला तर साहजिकच बाहेरची हवा आणि त्या हवेतील प्राणवायू कमी प्रमाणात शरीरात प्रविष्ट होतो. साहजिकच अधिक वेगाने श्वासोच्छ्श्वास करावा लागतो. रुग्ण यामुळे दमतो, थकून जातो, त्याच्या डोळ्यांभोवती अंधार येऊ लागतो. या आजाराला बोलीभाषेत 'दमा' आणि आयुर्वेदीय शास्त्रानुसार 'श्वास व्याधी' म्हटलं जातं.

जन्मापासून मृत्यूपर्यंत सातत्याने कोणती क्रिया कळत नकळत, अनाहूत, अथकपणे चालू असते, तर ती म्हणजे श्वसनक्रिया. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला किंबहुना मातेच्या शरीरातून विलग झालेल्या तान्हया बाळालाही कोणतंही प्रशिक्षण न देता, कोणतीही गोष्ट कळत नसतानाही जी क्रिया समजते ते म्हणजे श्वसन आणि ही एकच अशी क्रिया आहे की, जी मृत्यूपर्यंत अविरतपणे चालणारी क्रिया असते.

पण हे झालं निरोगी माणसाबद्दल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या परीक्षणानुसार सुमारे १५० ते २०० लाख भारतीयांमध्ये दम्याचा त्रास आहे. २०२५पर्यंत जगातल्या दमेक-यांची संख्या १००० लक्ष होण्याची दाट शक्यता आहे. समाजात आज सुमारे २५ ते ३० टक्के व्यक्ती अशा आहेत की, ज्यांना सहजतेने श्वास घेता येत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अशा स्थितीला 'दमा' असं म्हणतात.

सर्वसाधारण दमेकरी माणूस म्हटला म्हणजे त्या माणसाला सतत किंवा अधूनमधून होणा-या श्वासामध्ये प्रयत्नपूर्वक श्वास घ्यावा लागतो, झोपलेलं असताना श्वास घ्यायला त्रास होतो, उठून बसल्यावर बरं वाटतं, छातीला आणि पाठीला तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीने शेकल्यावर बरं वाटतं. आभाळ निरभ्र असताना त्रास होत नाही किंवा कमी होतो. परंतु मळभ आल्यावर किंवा पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागली, तसेच दुर्दिन (दिवसा सूर्य ढगाआड गेल्याने पुरेसा प्रकाश पृथ्वीतलावर नसलेली) या काळात श्वासोच्छश्वासाचा त्रास वाढतो. अनेकदा तोंड उघडं ठेवून श्वास घ्यावा लागतो. अशी लक्षणं आढळल्यास ती व्यक्ती दमा किंवा दम्याच्या आजाराने त्रस्त असण्याची शक्यता दाट असते. अशा व्यक्तींचं परीक्षण करताना त्यांना हृदयाचा कोणताही आजार नाही, हेही पडताळून पाहाणं आवश्यक असतं.

ज्या व्यक्तींना श्वासोच्छश्वास क्रियेस त्रास होत आहे आणि झोपल्यावर त्रास आहे, असं दिसतं त्या वेळी दमा असण्याची दाट शक्यता असते. या व्यक्तीला खोकल्याची ढास लागल्यावर (याला आयुर्वेदिक भाषेत वेग येणं असं म्हणतात) डोळ्यापुढे अंधारी येणं, परिश्रमपूर्वक श्वास घ्यावा लागणं, कपाळावर, चेह-यावर, छातीवर घाम फुटणं अशीही लक्षणं दिसतात.

खूपदा असाच त्रास विशिष्ट फुलांच्या वासाने अगर त्यातल्या रज:कणांमुळे, अगरबत्तीच्या वासाने, अत्तरादींच्या फवा-यांचा वापर केल्याने वाढतो. श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर आवाज येतो, खूप प्रयत्नपूर्वक खाकरल्यानंतर अल्पप्रमाणात अत्यंत चिकट सफेद रंगाचा, पिवळ्या रंगाचा किंवा हिरवट छटा असलेला कफाचा बडका पडतो. त्यानंतर काही काळ बरं वाटतं व पुन्हा त्रास सुरू होतो. गरम पाणी पायल्यावर बरं वाटतं, वारंवार पोट फुगतं, धुळीच्या वातावरणात, दमेकरी व्यक्ती अत्यंत अस्वस्थ असतात. एसीमध्ये काम करणं, थंड पाणी पिणं, शीतपेयं, थंड हवेची ठिकाणं, केळी (विशेषत: हिरव्या सालीची), अननस, द्राक्षं किंबहुना कोणतीही रसाळ फळं खाल्ल्यावर त्रास वाढतो.

प्राणवह स्त्रोतांमध्ये म्हणजे बाहेरची हवा शरीरात- शरीरातील फुप्फुस आदी भागांमध्ये नेणा-या वाहन प्रणालीमध्ये अतिरिक्त कफ जमा झाला तर साहजिकच बाहेरची हवा आणि त्या हवेतील प्राणवायू कमी प्रमाणात शरीरात प्रविष्ट होतो. साहजिकच अधिक वेगाने श्वासोच्छश्वास करावा लागतो. रुग्ण यामुळे दमतो, थकून जातो, त्याच्या डोळ्याभोवती अंधार येऊ लागतो. या आजाराला बोलीभाषेत 'दमा' आणि आयुर्वेदीय शास्त्रानुसार 'श्वास व्याधी' म्हटलं जातं.

दिवसभर गादीवर, बिछान्यावर घातलेल्या चादरीवर धूलिकण बसलेले असतात. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दिवसभर वापरलेली चादर बदलणं आवश्यक असतं. फिक्या रंगाची शक्यतो सफेद चादर रात्री झोपण्यापूर्वी बिछान्यावर घातल्यास दिवसभर बसलेले चादरीवरील धूलिकण किंवा तत्सम घटकांचा त्रास आपसूकच टाळला जातो.
विविध प्रकारची उत्पादनं अशा स्थितीतही काम करतात, अशी जाहिरात आपण अनेकदा वाचतो; परंतु ती उत्पादनं शरीराला हानी तर पोहोचवीत नाहीत ना? दीर्घ प्रयोगाने नुकसान पोहोचवू शकणा-या घटकांचा त्यात वापर तर केलेला नाही ना, अशा अनेक शंका रुग्णांच्या मनात येणे अस्वाभाविक नाही. याचसाठी पूर्णत: मानकीकृत व सुरक्षिततेची खात्री देणा-या अर्थात स्टँडर्डाइझ्ड औषधांचा वापर करणं इष्ट असतं.

अननस, पपनस, मोसंबी, संत्री, हिरव्या सालीची केळी, त्यासारखी फळं, द्राक्षं टाळावीत. पपईसारखी उष्ण गुणाची फळं, डाळिंबासारखं पथ्यकर फळ आणि कुळथासारख्या गरम (उष्ण) गुणधर्माच्या धान्याचा योग्य प्रकारे केलेला वापर दम्याच्या रुग्णांना लाभकर ठरतो. त्याचप्रमाणे पावसात बिलकुल न भिजणं, थंडपाणी कधीही न पिणं, फालुदा आईस्क्रीम यांसारखे पदार्थ कटाक्षाने टाळणं आवश्यक असतं.

प्राणवह स्त्रोतस् अर्थात नाकपुडयांतून शरीरात प्रविष्ट झालेला बाहय वायूचा संपूर्ण प्राणवह स्रोतसात – श्वासनलिका, श्वासनलिकेचे विभागून झालेले दोन भाग, तसेच संपूर्ण फुप्फुस या ठिकाणी संपर्क येत असतो. अनेकदा इतर कोणतीही कारणं न घडताही केवळ अतिबाष्पयुक्त हवा, अतिसूक्ष्म धूलिकण किंवा तत्सम नाकावाटे प्रविष्ट झालेल्या घटकांचा प्राणवह स्रोतांच्या आतल्या भागाशी आलेला संपर्क हाही दमा निर्माण करण्यास कारणीभूत झाल्याचं दिसतं. यावर एक अत्यंत सोपा उपाय म्हणजे किंचित कोमट केलेल्या तिळाच्या तेलामध्ये कनीनिका अर्थात करंगळीचा टोकाचा भाग बुडवून त्याला लागलेल्या तेलाचा स्पर्श नाकपुडयांतील अंत:त्वचेला होईल, अशा पद्धतीने वापर करावा. जेणेकरून नाकपुड्यांच्या आतल्या भागाला तीळतेलाचा संपर्क येईल. ही कृती किमान दोन वेळा- सकाळी बिछान्यातून उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावी.

Read More »
 
Delievered to you by Feedamail.
Unsubscribe